मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अग्निहोत्र गोशाळा आणि उद्योग ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अग्निहोत्र गोशाळा आणि उद्योग ☆ प्रा. भरत खैरकर ☆

इशिताच्या आजोबांनी १९७८ साली तिच्या बाबाची मुंज केली होती. आप्पा बळवंत चौकात फिरत असताना फूटपाथवर जुन्या बुक स्टॉलवर एक पुस्तक मिळालं त्याचं नाव होतं ‘इन सर्च ऑफ हॅपिनेस’! त्या पुस्तकांमध्ये अग्निहोत्र ह्या आयुर्वेदिक इलाजाबद्दल विस्तृत लिहिलेलं होतं. तेव्हापासूनच आजोबांच्या डोक्यामध्ये अग्निहोत्र हे योग्य पद्धतीने करावं म्हणून घर केलं होतं.

अग्निहोत्र म्हणजे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे ह्या विधीसाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, गाईचं तूप तेही देशी गाईचं! देशी गाईच्या पाठीवर एक उंचवटा असतो. ती सूर्यकेतू नाडी असते. ती सूर्याची ऊर्जा शोषून घेते. हवेतील वातावरण शुद्ध करणे हा अग्निहोत्राचा मूळ हेतू आहे. सूर्यास्त, सूर्योदयाच्या वेळी वातावरणात जे बदल होतात त्यासाठी अग्निहोत्राची गरज भासते.

यामध्ये केवळ दोन मंत्र असतात. सात आठ मिनिटाआधी ती तयारी करावी लागते. धूर नको व्हायला म्हणून व्यवस्थित प्रज्वलित अग्नी होऊ द्यायचा असतो. अग्निहोत्राचा रोजचा वेळ हा ठरलेला असतो. ह्या विधी मधून २०-२५ गॅसेस.. वायू वातावरणात सोडले जातात त्याचा परिणाम पुढील बारा तासासाठी कायम राहतो. यामध्ये दोन आहुती दोन मंत्र यांचा समावेश असतो. अग्नेय स्वाहा! ईदम न मम! असे ते मंत्र आहेत.

अग्निहोत्र करायचं असेल तर त्यासाठी शुद्ध शेणाच्या गोऱ्या असाव्या लागतात म्हणून सुरुवातीला चार-पाच देशी गाई घेऊन १४ वर्षांपूर्वी इशिताच्या आई-वडिलांनी गोशाळा सुरू केली. आता ह्या गोशाळेमध्ये देशी गायी, गीर गायी, खिल्लार कामरेज, कोकण कपिला, अशा एकंदर ९५ गायी वासरांचा लवाजमा आहे. इशिताने मागच्या तीन वर्षापासून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर गोशाळेचा कारभार सांभाळला आहे. कोणत्या गायीचं कोणतं वासरू आहे.. कुणाचं काय नाव आहे?  कुणाची आजाराची हिस्टरी काय आहे?  गाईंची ‘फॅमिली ट्री’ काय आहे?  कोण कुणाची मावशी.. भाची लागते?  हा सगळा डेटा इशिताने आपल्या कॉम्पुटरवर तयार केला आहे. जवळपास सगळ्याच गायींचा संगणक डेटा तिच्याकडे उपलब्ध आहे व तो तिला तोंडपाठही आहे!

वेळोवेळी मॉनिटर करून कॅल्शियमचे इंजेक्शन देणे, दुधाची क्षमता ओळखणे, चारा कुणाला किती द्यायचा?  हे ठरविणे शेजारच्या शेतकऱ्यांकडून ठराविक चाऱ्यासाठीच मागणी करणे.. गायींच्या विविध आजारांवर.. जसं की हाड तुटणे, डोळ्यात इन्फेक्शन होणे, विविध रोग, लंम्पी सारखे रोग, इत्यादींवर इशिताचा बारीक डोळा असतो!

गाय वासरा शिवाय दूध देत नाही.. मात्र डेअरी असलेल्या ठिकाणी जर्सी गाईचं वासरू मेल तरी भुसा भरून तिच्यासमोर उभं करतात आणि दूध काढले जाते. हे कटू सत्य इशिताने सांगितले.. देशी गायीच्या तुलनेत जर्सी गायीची आय क्यू लेव्हल कमी असते, हा तिचा अभ्यास सांगतो!

गाईच्या शेणाच्या गोव-या बनविणारी मशीन हवी आहे. इथून उचलून दुसरीकडे शेण ट्रान्सपोर्ट करण्याचा खर्च खूप होतो. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा प्रोटोटाईप आणि जागच्या जागी गोवऱ्या करता येईल, तसा पीव्हीसी मोल्ड बनवून मिळाला तर चांगलं होईल. शिवाय गोवऱ्या सुकायला तीन-चार दिवस लागतात. त्या जर लवकर सुकल्या तर लगेचच बाजारात पाठवायला सोपं जाईल.. यावर तिचं संशोधन सुरू आहे!

पांढऱ्या रंगाच्या खिल्लार गायी महाराष्ट्राच्या, लाल रंगाच्या गिर गाय गुजरात मध्ये, शिंग टोकदार असलेल्या कामरेज, बुटक्या कोकणी गायी, ह्या सर्व गायींचे स्वभाव व अग्रेशन अलग अलग असते. असं ती सांगते.

तोंडखोरी पायखुरी हे नेहमीचे आजार गायींमध्ये आढळतात. त्यासाठी फुफाटा किंवा मातीत चालवावे लागते अशी माहिती इशिताने दिली.

नेपियर, शाळू, ग्रीन जवार, सुकलेला कडबा, तसेच कणीस इत्यादींचा मिक्स करून ती चारा म्हणून आपल्या गायींसाठी वापरते. इशिताने अलीकडे ‘फ्लावर रेमेडीज’ नावाचा कोर्स केलेला आहे. ‘टेलिफॅथिक सायन्स’चाही तिचा अभ्यास आहे. भाषा विकसित व्हायच्या आधी टेलिपथीचाच वापर व्हायचा असं ती बोलते. ती एक आर्ट आहे. आता आपण ती विसरलो आहे.. गाईचं वासरू आणि माणसांची मुलं सारखीच असतात.. खेळतात.. पळतात.. दंगामस्ती करतात.. गायीचा चेहरा पाहून तिला काहीतरी झालेलं आहे़.. झालं आहे किंवा काहीतरी गडबड आहे.. हे समजतं.. काय झालं असेल?  काय होऊ शकतं?  असा एकांगी विचार आधी व्हायचा. आता मात्र ‘ॲनिमल कम्युनिकेशन’ शिकल्यामुळे त्यात खूप बदल झाला आहे.. असं इशिता बोलते.

आजारपणाची लक्षणे जसे की गायी चारा खाणे थांबवतात.. त्यांचं नाक वाहत.. त्या एका जागी बसून राहतात.. हालचाल करीत नाही.. लंम्पी, तोंडखुरी.. पायखुरी.. त्यांच्या नखांना खुऱ्यांना सूजन येते.. ताप, सर्दी, गरम तापमान याचा परिणाम होतो. हे सगळं ‘ॲनिमल कम्युनिकेशन’ शिकल्यामुळे इशिताला सोपं झालं. गायीच्या डिलिव्हरी वेळी औषध पाणी गरजेचे आहे. गायीमध्ये पण २१ दिवसांचं ‘हीटिंग सायकल’ असतं त्यावरून प्रेग्नेंसी डेट काढता येते. गायीमधेसुद्धा नऊ महिने नऊ दिवस असं बाळ तिच्या पिशवीत राहतं. गोशाळेमध्ये होत असलेल्या अग्निहोत्रामुळे येथे हे जनावराचं आजारपणाचे प्रमाण खूप कमी झाल्याचे इशिता सांगते.

ललशेडच्या बाहेर थोडी मोकळी हवेशीर जागा ठेवली आहे. त्याला ते गायरान म्हणतात. पोट खराब झालं असेल तर गाय स्वतः खुल्या वातावरणात गायरानातील प्रॉपर औषध शोधून खायच्या. त्यासाठी इथेही त्यांना खुल्या जागेत सोडले जाते. पाण्याचा टॅंक आहे म्हणजे टाकं आहे.. जे रोज स्वच्छ केले जाते व पाणी इथे टॉप-अप केल्या जाते.. रवंथ करायला मोकळी जागा ठेवली आहे.. गव्हाच्या भुशांमध्ये औषध टाकून गाईंना टॅबलेट देण्याची सोय इथे आहे..

या ठिकाणी इशिता अग्निहोत्र, फ्लॉवर रेमेडीज, ॲनिमल कम्युनिकेशन आणि नॅचरल कंडिशनिंग तसेच फ्रेश चारा, कमी केमिकलचा उपयोग, आयुर्वेदिक उपाय, इत्यादी डॉक्टर बर्कलेने सांगितलेल्या ३९ उपचार पद्धतीचा वापर करून उपचार करते. डॉक्टर बर्कलेच्यानुसार आपल्या शारीरिक रोगाचे मूळ कारण मनामध्ये किंवा माईंड मध्ये आहे. याचाच वापर करून इशिता ही गोशाळा अग्निहोत्र आणि आपल्या परंपरा सांभाळून एक नवा उद्योग.. एक नवी दिशा घेऊन मार्गक्रमण करीत आहे..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ग्रंथराज श्रीमद् दासबोध : महात्म्य निरूपण ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ग्रंथराज श्रीमद् दासबोध : महात्म्य निरूपण ☆ श्री दिवाकर बुरसे

आयुर्वेद रोगनिवारण नव्हे तर रोग होऊ नयेत यासाठी मार्गदर्शन करणारी उपचारपद्धती आहे. तसाच श्रीमद् दासबोध सुद्धा अशीच _सकारात्मक जीवनदृष्टी देणारा अलौकिक ग्रंथ_ आहे. आपत्ती आल्यानंतर उपाय सांगण्याऐवजी, विवेक, चातुर्य व सजगतेने त्या टाळण्यावर समर्थ रामदासांचा भर आहे. दासबोध भक्तिमार्गाचा पुरस्कार करतो. तो माणसाला दुःख–सुखाच्या पलीकडे नेऊन आनंदरूप आत्मारामाकडे घेऊन जातो. _” भक्तिचेनि योगे देव । निश्चये पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथी ॥“

समर्थांनी दासबोधाचा आरंभ पारंपारिक पद्धतीने, म्हणजे गणेश वंदना, सरस्वती, सद्गुरू वंदना करून न करता अतिशय अभिनव पद्धतीने केला आहे. पहिल्या दशकाच्या पाहिल्या समासाच्या पहिल्याच ओवीत ग्रंथाचे नाव, त्याचा प्रतिपाद्य विषय सांगून हा ग्रंथ लिहिताना उपयोगात आणलेल्या अनेक संदर्भ ग्रंथाची, भगवद्वचनांची सूचीच ते सादर करतात. येवदं करूनही ते थांबलेले नाहीत, पुढे ते स्पष्ट करतात की हे सर्व संदर्भ, त्यातील सिद्धांत, तत्वे आणि सूत्रे आम्ही आत्मप्रचितीच्या निकषावर घासून, त्यांचा स्वतः अनुभव घेऊन वाचकांना सांगत आहोत. केवढा हा आत्मविश्वास!

दासबोध संसाराचा तिरस्कार करत नाही. उलट, “संसार करावा नेटका” असे सांगत, तो रामरायाचा आहे या भावनेने विवेकपूर्वक व यशस्वी करण्याचा आग्रह धरतो. संसारात राहूनही परमार्थ साधता येतो; वनवास, देहक्लेश किंवा अघोरी साधनांना येथे स्थान नाही.

समर्थांच्या मते _नरदेह अत्यंत दुर्लभ घबाड आहे. तो भगवंताचे राऊळ असून, साधना, सेवा व भक्तीसाठीच वापरायचा आहे. देह म्हणजे मी नव्हे, हे जाणून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अखेरीस देह नाश पावतो, पण “मरावे परी कीर्तिरूपी उरावे” हे जीवनधर्म आहे.

समर्थांना आळशी, बावळट, दांभिक अध्यात्म मान्य नाही.  त्यांचा आदर्श पुरुष उद्यमशील, चाणाक्ष, चिकित्सक, नम्र व गुणसंपन्न आहे. अध्यात्मिक वृत्तीच्या माणसाने दरिद्री राहावे असे त्यांना अभिप्रेत नाही. भौतिक समृद्धी आवश्यक आहे; ती सचोटी, प्रयत्न व कौशल्याने मिळवावी. मात्र ही समृद्धी आत्मारामाच्या प्राप्तीसाठी साधन असावी, अंतिम ध्येय नव्हे.

व्यक्तिमत्व विकासावर समर्थांचा ठाम विश्वास आहे.  जन्मदत्त गुण दैवाधीन असले तरी, प्रयत्नाने भाग्यरेषाही बदलता येतात हा त्यांचा सिद्धांत आहे. विविध विद्या, कला, साहित्य, संगीत, वक्तृत्व, राजकारण, अर्थकारण यांत निपुण होऊन स्वतःची आणि समाजाची उन्नती साधावी, असे दासबोध सांगतो. आत्मोन्नती आणि समाजोन्नती या दोन्हींचा येथे समतोल आहे.

औपचारिक शिक्षण न घेता समर्थांनी जीवनविश्वविद्यालयातून प्रचंड ज्ञान मिळविले आणि ते दासबोधात अनुभवसिद्ध स्वरूपात मांडले. त्यांनी देशभर मठांची स्थापना करून संघटन, जनजागृती व राष्ट्रउभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेत त्यांचे मार्गदर्शन निर्णायक ठरले.

दासबोधात  व्यवस्थापनशास्त्रातली मूलतत्त्वे आढळतात.

संवादकौशल्य, नेतृत्व, नियोजन, मनुष्यबळ विकास, प्रेरणा, वेळेचे व्यवस्थापन, संघबांधणी इत्यादी विषयांचा सूक्ष्म विचार येथे आहे. त्यामुळे हा ग्रंथ व्यवस्थापन अभ्यासकांसाठीही मौलिक ठरतो.

ग्रंथाची मांडणी अत्यंत शास्त्रशुद्ध, स्पष्ट व आधुनिक आहे.  भाषा सुबोध, रसाळ व नादमधुर असून, समर्थ कधी प्रेमाने तर कधी कठोरपणे वाचकाला योग्य दिशा दाखवतात. राष्ट्रभक्ती, मानवप्रेम आणि ईश्वरप्रेम हे त्यांच्या काव्याचे आत्मतत्त्व आहे.

दासबोध हा अनुभवसिद्ध ग्रंथ आहे. “असे आहे” या ठाम भूमिकेतून समर्थ बोलतात. काही विचार आज कालसुसंगत नसले तरी, त्यावरून संपूर्ण ग्रंथ नाकारणे योग्य नाही.

अखेर,  दासबोध हा केवळ पारायणाचा नव्हे तर जगण्याचा ग्रंथ आहे. 

चारशे वर्षांपासून तो मानवजातीला प्रकाश देत आहे आणि पुढेही देत राहील. म्हणूनच तो प्रत्येकासाठी वाचनीय, चिंतनीय व अनुकरणीय आहे आणि त्याचा प्रसार होणे अत्यावश्यक आहे.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अंतिम प्लासिबो इफेक्ट – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ अंतिम प्लासिबो इफेक्ट – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

डॉ. एलेन लॅंगर

अंतिम प्लासिबो इफेक्ट!

काठीच्या आधाराने चालणाऱ्या वृद्ध पुरुषांचा एक गट एका घरात शिरला… आणि आठवड्याभराने ते धावत बाहेर पडले!

ना औषध, ना शस्त्रक्रिया.

फक्त त्यांच्या मेंदूतला एक छोटासा स्विच ‘ऑन’ केल्यामुळे.

कसे..?

ही घटना १९७९ साली घडली.

हार्वर्ड विद्यापीठातील एक अत्यंत बुद्धिमान मानसशास्त्रज्ञ – 

डॉ. एलेन लॅंगर – यांनी काहीतरी विलक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचे होते, पण कोणत्याही मशीनशिवाय.

त्यांनी जवळजवळ ८० वर्षांचे आठ वृद्ध पुरुष निवडले. काहींना काठीशिवाय चालता येत नव्हते, काहींचे हात थरथरत होते, काहींना मोतीबिंदू होता, तर काहींना स्वतःचे नावसुद्धा नीट आठवत नव्हते.

त्यांच्या मुलांना वाटले की त्यांच्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जात आहे.

पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांच्या वडिलांना १९५९ साली पाठवले जात होते!

नाही, कोणतेही जादुई जग नव्हते.

डॉ. लॅंगर यांनी बोस्टनमधील एका जुन्या मठाची सजावट पूर्णपणे १९५९ च्या शैलीत केली होती. तिथे १९७९ चा कसलाही मागमूस नव्हता. टीव्ही काळा-पांढरा होता, त्यावर १९५९ मधील बातम्या आणि Ed Sullivan Show चालू होते. रेडिओवर त्या काळातील गाणी होती. मासिके, वर्तमानपत्रे—सगळेच वीस वर्षे जुने!

आता कथेतला पहिला धक्का…

ते आठ वृद्ध पुरुष तिथे पोहोचल्यावर त्यांना वाटले की कोणी तरी येऊन त्यांचे सामान खोलीत नेऊन देईल—जसं त्यांच्या घरी होत असे.

पण डॉ. लॅंगर ठामपणे म्हणाल्या,

“इथे कोणीही तुमची मदत करणार नाही. तुम्हालाच तुमच्या बॅगा उचलून न्याव्या लागतील. ”

ते चिडले, कुरकुरले.

पण पर्याय नसल्यामुळे जड सूटकेसेस घेऊन जिना चढले.

आणि तिथेच त्यांच्या मेंदूला पहिला संदेश गेला—

“मी असहाय नाही… मी हे करू शकतो. ”

एकच अट होती—या एका आठवड्यासाठी त्यांना असे वागायचे होते की साल १९५९ आहे.

त्यांना भूतकाळात बोलायचे नव्हते, फक्त वर्तमानकाळात.

उदा. “आत्ता राष्ट्राध्यक्ष आयझनहॉवर काय करत आहेत? ”

किंवा “हवाना मध्ये कास्त्रो काय करत आहेत? ”

त्या काळातील राजकारण, खेळ, चित्रपट—सगळ्यांवर चर्चा करायची होती, जणू ते अजूनही तिथेच जगत होते.

ज्या वयात त्यांच्यात जी ऊर्जा होती—५५–६० वर्षांची—त्याच ऊर्जेने बोलायचे होते.

पहिले दोन दिवस फार अवघड गेले.

पण तिसऱ्या दिवसापासून एक विचित्र जादू सुरू झाली.

संधिवातामुळे सरळ बसू न शकणारा माणूस आता जेवणाच्या टेबलावर ताठ बसून राजकारणावर वाद घालत होता.

ज्याला नीट ऐकू येत नव्हते, तो रेडिओचा आवाज कमी करून गाणी ऐकत होता.

तो संपूर्ण वातावरणच त्यांना सांगत होते—

“तुम्ही म्हातारे नाही… तुम्ही अजूनही मजबूत, मध्यमवयीन आहात. ”

सर्वात मोठा धक्का आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बसला.

आश्रमासमोरील मैदानातले दृश्य पाहून डॉ. लॅंगर यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

आठवडाभरापूर्वी बसमधून उतरताना इतरांची मदत घेणारे हे वृद्ध पुरुष आता मैदानात ‘टच फुटबॉल’ खेळत होते!

हो, फुटबॉल!

त्यांना धावताना पाहून असं वाटत होतं, जणू त्यांचे वय खरंच २० वर्षांनी कमी झाले आहे.

प्रयोगाच्या शेवटी जेव्हा त्यांची शारीरिक तपासणी झाली, तेव्हा डॉक्टरही थक्क झाले.

त्यांची पकड (grip strength) वाढली होती, सांध्यांची लवचिकता सुधारली होती, दृष्टी आणि श्रवणशक्तीही सुधारली होती!

चष्म्याशिवाय लहान अक्षरे वाचता येत होती.

त्यांचा IQ स्कोअरही वाढला होता.

सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे—

प्रयोगापूर्वी आणि नंतरचे फोटो जेव्हा अशा लोकांना दाखवले गेले ज्यांना या प्रयोगाबद्दल काहीच माहीत नव्हते, ते म्हणाले,

“नंतरच्या फोटोमध्ये हे लोक खूपच तरुण दिसतात! ”

म्हणजे फक्त त्यांची भावना नाही, तर चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी झाल्या होत्या.

जैविकदृष्ट्याही त्यांचे वय मागे गेले होते!

डॉ. एलेन लॅंगर यांनी हे सिद्ध केले की जेव्हा आपण स्वतःला सांगतो—

“मी म्हातारा झालोय, आता माझ्याकडून होत नाही”—

तेव्हा आपले शरीर ते मान्य करते आणि हळूहळू बंद पडू लागते.

आपला समाज आपल्याला शिकवतो की म्हातारपण म्हणजे आजारपण.

आणि आपण तेच स्क्रिप्ट फॉलो करतो.

पण जेव्हा त्या वृद्ध लोकांचे वातावरण बदलले आणि त्यांना अजूनही तरुण आहोत असे वाटायला लावले, तेव्हा त्यांच्या शरीरानेही तसाच प्रतिसाद दिला.

यालाच म्हणतात “Mind–Body Connection” — किंवा अंतिम प्लासिबो इफेक्ट!

म्हणून मित्रांनो,

कधी कधी म्हणता 

“मूड नाहीये, थकवा आलाय, माझ्याकडून नाही होणार…”

जरा विचार करा 

८० वर्षांचे लोक फक्त विचार बदलून काठ्या फेकून देतात आणि फुटबॉल खेळतात, तर तू काय नाही करू शकणार?

तुझ्या मर्यादा शरीरात नाहीत, त्या मनात आहेत…..

जेव्हा तू स्वतःला कमकुवत समजतोस, तेव्हा तू कमकुवत होतोस.

आणि जेव्हा तू स्वतःला सुपरहिरो समजतोस, तेव्हा मेंदू शरीराला तसा सिग्नल देतो.

फोन बाजूला ठेव, आरशात बघ आणि म्हण—

“मी बॉस आहे. माझ्या ऊर्जेला मर्यादा नाहीत. ”

माझ्यावर विश्वास ठेव—

तुझं शरीर ते ऐकायलाच लागेल.

सुरुवात कर.

जग तुझी वाट पाहत आहे..!

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६९ आणि ७० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६९ आणि ७० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र.  ६९ – – 

सुखानंदकारी निवारी भयाते ।

जगीं भक्तिभावे भजावे तयाते ।

विवेके तजावा अनाचार हेवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६९।।

अर्थ – –  भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आणि भयाचे निवारण करणारा आहे.  त्याला भक्तिभावाने आराधना करावी.  विवेकाच्या साहाय्याने अनाचार म्हणजे अनीतीने वागणे आणि इतरांचा हेवा किंवा द्वेष यांचा त्याग करावा.  प्रभात समयी श्रीरामाचे (भगवंताचे) चिंतन करावे.

(सुखानंदकारी – सुख आणि आनंद देणारा, तजावा – सोडून द्यावा, अनाचार – अनीतीचे वागणे)

विवेचन – – भगवंताचे गुण वर्णन करताना समर्थ म्हणतात की भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आहे.  सुख आणि आनंद हे शब्द आपण सामान्यपणे समानार्थी समजतो पण त्यात फरक आहे.  सुख हे क्षणिक असून इंद्रिये आणि भौतिक गोष्टींवर अवलंबून असते.  माणूस आयुष्यभर या सुखाच्या मागे धावत असतो.  आनंद ही एक वृत्ती किंवा मानसिक अवस्था असून ती दीर्घकाळ टिकणारी आहे.  ती परिस्थितीवर अवलंबून नसते.  जो स्वस्वरुपी स्थिर असतो, त्याच्याकडे कायमच आनंदी वृत्ती असते.  भगवंत या दोन्हींचा दाता आहे.  तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे.  दुःख हरण केल्यानंतर उरतो तो आनंद आणि सुख.

भगवंत हा भयाचे देखील हरण करतो.  माणसाला या ना त्या कारणाने आयुष्यभर कुठल्यातरी भयाने पछाडलेले असते.  माझा पैसा टिकेल का, मुलेबाळे मला म्हातारपणी विचारतील का? एक ना दोन अशा अनेक चिंतांनी मनुष्य ग्रस्त असतो.  पण सर्वात मोठे भय असते ते मरणाचे.  भगवंत या भीतीतून देखील आपली मुक्तता करतो.  जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका झाली तर मृत्यूचे देखील भय नाहीच!

पण या सुखानंदकारी अशा भगवंताच्या कृपेचा अनुभव यायचा असेल तर त्यासाठी कोणती अट आहे? ती समर्थ पुढील ओळीत सांगतात.  ते म्हणतात, “जगी भक्तिभावे भजावे तयाते. ” अत्यंत भक्तिभाव आपल्या ठायी असला पाहिजे.  त्यासाठी मनाने आपण त्याचे होऊन जावे.  आपले सर्वस्व त्याला अर्पण करावे.  भगवंत माझा आहे आणि मी भगवंताचा आहे अशी दृढ भावना आपल्या ठायी असली पाहिजे.  तुकाराम महाराज म्हणतात…  

नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मतारीची ।

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ।।

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी भगवंत आळवावा ।

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।

भगवंत प्राप्तीसाठी वनात जाण्याची जरुरी नाही.  कोणतेही कष्ट, उपासतापास करण्याची गरज नाही.  आपण आहोत तेथेच त्याचे नामस्मरण करावे.  मनाने त्याचेच होऊन राहावे.

पण भगवंत प्राप्तीसाठी निर्मळ, शुद्ध अंतःकरणाची गरज असते.  जी माणसे अनाचाराने म्हणजे अनीतीने वागतात, दुसऱ्यांचा द्वेष किंवा मत्सर करतात, अशांना भगवंत कसा प्राप्त होईल? स्वच्छ पाण्यातच प्रतिबिंब दिसते.  तसेच मनही शुद्ध, स्वच्छ हवे.  अनीती, मत्सर, हेवेदावे हा मनातील गाळ आहे.  तो काढून टाकायला हवा.  अनीती आणि अनाचाराने वागणारी माणसे कितीही शक्तिमान आणि बलवान असली तरी शेवटी त्यांचा नाश अटळ असतो.  रावण दुराचारी होता.  शक्तिमान आणि विद्वान होता.  पण त्याचा नाश झाला.  तो स्वतः, त्याची मुले यांचा नाश झाला.  अनीतीने वागणारे कौरव युद्धात मारले गेले आणि त्यांचे राज्यही नष्ट झाले.  आपण जसे वागतो, तेच कर्माच्या सिद्धांतानुसार आपल्याकडे परत येते.  हेवा किंवा मत्सर केल्याने दुसऱ्याचे फारसे नुकसान होणार नाही.  पण हे दोष आपल्यालाच आतून संपवतात.  द्वेष केला तर द्वेषच वाट्याला येईल.  प्रेम दिले तर प्रेम परत मिळेल.  म्हणून अनीतीने वागणे, दुसऱ्यांचा द्वेष करणे यासारख्या गोष्टींचा त्याग करायला हवा.

या गोष्टी परमार्थातील अडथळा आहेत.  त्यांचा त्याग विवेकाने म्हणजे विचारपूर्वक करावा.  मला इतरांनी माझ्याशी जसे वागायला हवे असे वाटते, तसेच मी इतरांशी वागायला हवे.  मला कोणी खोटे बोललेले आवडत नाही, कोणी माझा द्वेष केला तर मला आवडत नाही.  मग मीही इतरांशी तसेच वागायला हवे, नाही का? मागील एका मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, ” विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ती कीजे. ” असा विचारपूर्वक मनाला बोध करून, संयम, विवेक आणि वैराग्य यांची कास धरून वाटचाल केली तर भगवंत दूर नाही.  त्यासाठी पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि पुढेही दिवसभर आपली कामे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये.

स्वसंवाद :: 

१.  मी क्षणिक ‘सुख’ शोधतो की चिरंतन ‘आनंद’?

२.  माझ्याकडून नकळत का होईना पण कोणाचा ‘हेवा’ (मत्सर) किंवा द्वेष घडतो का?

३.  “इतरांनी माझ्याशी जसे वागावे असे मला वाटते, तसेच मी इतरांशी वागतो का? “

४.  पहाटे उठल्यानंतर मी प्रथम श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन करतो का?

===== 

श्लोक क्र.  ७० – – 

सदा रामनामे वदा पूर्णकामे ।

कदा बाधिजेनापदा नित्यनेमे ।

मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७०।।

अर्थ – अगदी मनापासून रामनाम घ्यावे.  नित्यनेमाने नाम घेणाऱ्यास संकटांचा त्रास होत नाही.  अहंकार आणि आळस या दुर्गुणांचा त्याग करावा.  आणि प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.

(वदा – म्हणा, पूर्णकामे – अगदी मनापासून, बाधणे – त्रास होणे, आपदा – संकट, मद – अहंकार, आलस्य – आळस)

विवेचन –  या श्लोकात भगवंताचे नाम अगदी मनापासून घ्यावे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत.  त्यासाठी त्यांनी ‘ पूर्णकामे ‘ हा सुंदर शब्द वापरला आहे.  व्यवहारात कोणतीही गोष्ट आपण केली तर आपल्याला तिचे काय फळ मिळेल याकडे आपले लक्ष असते.  फळाची अपेक्षा ठेवूनच आपण कर्म करीत असतो.  पण जेव्हा रामनाम किंवा भगवंताचे नाम आपण घेतो तेव्हा त्यापासून आपल्याला काय फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये.  नाम फक्त नामासाठीच किंवा भगवंतासाठीच घ्यावे.  असे नाम जेव्हा आपण घेऊ त्यावेळी इतर सर्व अपेक्षा आपोआपच नाहीशा होतील.  ते नाम मग मनापासून घेतले जाईल म्हणजेच समर्थ सांगतात तसे ‘ पूर्णकामे. ‘

तसेच समर्थ म्हणतात की नित्यनेमाने नाम घेणाऱ्याला संकटे त्रास देत नाहीत.  नित्यनेमामुळे संकटे येत नाहीत असे नाही, तर संकटातही मनाचा समतोल राखण्याची आणि त्या आपदा सोसण्याची शक्ती रामनामामुळे मिळते असा याचा अर्थ आहे.  संकटांची धाव देहापर्यंतच असते परंतु अखंड नामस्मरण करणाऱ्याला त्यांचा त्रास होत नाही.

परंतु असे अगदी मनापासून नाम घेण्याच्या आड दोन मोठया अडचणी उभ्या राहतात.  एक म्हणजे आपला अहंकार.  मी कशाला नाम घेऊ? मला त्याची काय आवश्यकता? नाम घेणे हे रिकामटेकड्या लोकांचे काम आहे.  त्याशिवाय नुसते नाम घेऊन काय होणार? त्याच्या जोडीला ज्ञान नको का? असे नानाविध विचार मनात येऊन माणूस नाम घेण्याच्या विचारापासून परावृत्त होतो.  पण इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्याच संतांनी नामस्मरणाचा महिमा वर्णन केला आहे.  भगवंत प्राप्तीसाठी नामसारखे सोपे साधन नाही असे ते म्हणतात.  गोंदवलेकर महाराजांनी तर आपल्या प्रत्येक प्रवचनात निरनिराळ्या प्रकारे केवळ नाम घेण्याचा उपदेश केला आहे.

नाम घेण्याच्या आड येणारी दुसरी गोष्ट म्हणजे आळस.  आळसाने मोठमोठी कार्ये नासतात.  चौऱ्यांशी लक्ष योनींचा प्रवास करून आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो असे म्हटले जाते.  मनुष्य प्राण्यांखेरीज इतरांना विचार करण्याची शक्ती परमेश्वराने दिलेली नाही.  या नरदेहाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घेतल्याशिवाय पर्याय नाही.  मूळ स्वरूप म्हणजेच भगवंताचे ज्ञान.  आपली नित्यकर्मे करता करता आपण सहज भगवंताचे नाम घेऊ शकतो.  परंतु प्रत्येक वेळी आपला आळस आपल्याला या गोष्टीपासून प्रतिबंध करतो आणि नामस्मरण करायचे तर निवृत्तीनंतर करू.  आताच काय घाई आहे अशा प्रकारचा सोयीस्कर विचार आपण करत असतो.  पण तो बालपण खेळात जाते, तरुणपण धुंदीत निघून जाते.  मग म्हातारपणी काही करू म्हटले तर शरीर साथ देत नाही.  म्हणूनच समर्थ आपल्याला एका अभंगात सांगतात, “काळ जातो क्षणाक्षणा, मूळ येईल मरणा… ” म्हणून जोवर शरीर साथ देते आहे तोवरच परमेश्वराचे नामस्मरण नित्यनेमाने करावे असे समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद :: 

१.  मी करत असलेल्या उपासनेच्या किंवा चांगल्या कामाच्या मागे काही ‘भौतिक फळाची अपेक्षा’ असते का? की मी ते निरपेक्ष भावनेने करतो?

२.  “नामस्मरण ही केवळ निवृत्तीनंतर करण्याची गोष्ट आहे” असा सोयीस्कर विचार करून मी आजचा वेळ ‘आळसात’ घालवत आहे का?

३.  माझ्या ज्ञानाचा, पदाचा किंवा संपत्तीचा ‘अहंकार’ मला भगवंताच्या चरणी लीन होण्यापासून रोखत आहे का?

४.  काळाचा प्रत्येक क्षण वेगाने पुढे जात असताना, मी माझ्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी दिवसातील काही वेळ नित्यनेमाने नामस्मरणाला देतो का?

– क्रमशः श्लोक श्लोक ६९ आणि ७०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चंचीत जपलेले मौल्यवान धन…  – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ चंचीत जपलेले मौल्यवान धन…  – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

जे कधीही प्राथमिक शाळेत सुद्धा गेले नाहीत साधी अक्षरओळख सुद्धा नाही पण ज्यांच्या नावाने विद्यापीठ आहे अशा दोन महान विभूती महाराष्ट्रात होऊन गेल्या.  त्या म्हणजे गाडगे बाबा आणि बहिणाबाई चौधरी.  गाडगे बाबा यांच्या नावाने अमरावती येथे विद्यापीठ आहे तर बहिणाबाई चौधरी यांच्या नावे जळगाव येथे विद्यापीठ आहे आणि कित्येक विद्यालयात आणि महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात बहिणाबाई यांच्या कविता शिकविल्या जातात आणि त्यांच्या साहित्यावर कित्येकांनी Ph D मिळविल्या आहेत.  

जळगाव जवळील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि त्या काळच्या परिस्थितीनुसार त्यांचे लग्न लवकरच म्हणजे त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी झाले.  त्यांना तीन मुले झाली पण वयाच्या ३० व्या वर्षी त्या विधवा झाल्या.  त्यांच्या ३ मुलांपैकी सोपानदेव चौधरी सुप्रसिद्ध कवी आहेत.  बहिणाबाई यांनी आयुष्यभर शेतात काम केले आणि काम करताकरता कविता रचल्या.  त्यातील फार थोड्या कविता आज उपलब्ध आहेत, त्या सोपानदेवांनी लिहून घेतल्यामुळे.  याबाबत सोपानदेव म्हणाले होते कि आई दिवसभर शेतात जाई आणि शेतात काम करता करता तिला कविता सुचत असत मग संध्याकाळी सर्वांची जेवणे झाली कि सोपानदेवांना..  त्या कविता सांगत त्या कविता सोपानदेव एका कागदावर लिहून ठेवत आणि तो कागद आईकडे देत आई तो कागद तिच्या कमरेला एक चंची असे त्यात ती ठेवून देत आणि ती चंची कागदाने भरली कि त्याच्या घरात जे आढे असे (आढे म्हणजे आडवे लाकूड असे ज्यावर छप्पर असते), त्या आढ्यावर खोचून ठेवीत. अशा अनेक चंची तिथे खोचून ठेवल्या होत्या.  मग सोपानदेव एम ए झाले आणि मुंबईला नोकरीला लागले ते सुद्धा कविता करत आणि त्या कविता त्यावेळी आचार्य अत्रे यांच्या ” दैनिक मराठा ” या दैनिकात प्रसिद्ध होत.  एक दिवस त्यांना मुबईला निरोप मिळाला कि घराच्या व शेतीच्या वाटण्या होणार आहेत तेव्हा तुम्ही गावी या.  तर ते गावाकडे आले.  गावचे पंच जमले होते आणि ते घराबाहेर खुर्च्या टाकून बसले होते.  सोपानदेव आल्यानंतर त्यांनी वाटणी करायला सुरवात करावी म्हणून त्यांच्या भावाने घरात जे काही असेल तर बाहेर आणायला सुरवात केली म्हणजे भांडी कुंडी वगैरे त्यात एक चंची होती तेव्हा सोपानदेव म्हणाले कि तेवढी चंची मला द्या मला बाकी काही नको.  पंचांना वाटले कि त्या चंचीत काही सोने वगैरे आहे काय? पण फक्त कागद निघाले ते सगळे जीर्ण झाले होते.  

मग ते ती चंची घेऊन मुंबईला आले आणि त्यांनी एका वहीत त्या कविता लिहून ठेवल्या आणि त्या कविता नेहमी त्यांच्याबरोबर त्यांच्या शबनम पिशवीत असत.

नेहमीप्रमाणे ते आचार्य अत्रे यांच्याकडे गेले पण ते “दैनिक मराठा” याचा अग्रलेख लिहीत होते म्हणून ते परत यायला निघाले वाटेत त्यांना आठवण झाली कि शबनम अत्रे यांच्या ऑफिस मध्येच राहिली आहे.  ती घेण्यासाठी म्हणून परत आले तेव्हा अत्रे त्या कविता वाचत होते आणि सोपानदेव आल्यानंतर त्यांना म्हणाले कि तुम्ही सोने लपवून ठेवले हा एक मोहरांचा हंडा आहे.  मग त्यांनी त्या प्रसिद्ध केल्या.  अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितांवर दोन अग्रलेख दैनिक मराठ्यांत लिहिले.

सोपानदेव म्हणतात कि पाऊस आला की त्यांच्या आईला फार आनंद होत असे त्यात श्रावण महिना आला कि तिला आनंद होत असे.  सकाळी जात्यावर दळताना, तसेच धान्य पाखडताना, घरात केरवारे करताना ती स्वरचित कविता म्हणे 

तिला एकदा विचारले कि तुला कविता सुचते कशी?

तर तिने सांगितले…  

माझी माय सरस्वती, मला शिकविते बोली /

 एका बहिणीच्या मनी, किती गुपिते पेरली //

 अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी / (घरोटा म्हणजे जाते)

 तसे तसे माझे गाणे, पोटातून येते ओठी //

बहिणाबाईंना माहेरचे खूप प्रेम असे.  त्यांचेकडे नेहमी एक योगी येत असे.  नेहमी माहेर माहेर करणाऱ्या त्या बहिणाबाईंना पाहून तो योगी त्यांना म्हणाला – –

माझे माहेर माहेर, सदा गाणे तुझ्या ओठी 

 मग माहेरून आले मग सासरी कशापोटी //

तेव्हा बहिणाबाई उत्तर देते 

अरे ऎक हे रे योग्या, ऐक काय मी सांगते / 

 लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते //

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने तर बहिणाबाईंची गाणी हा त्यांच्या पाठ्यक्रम याचा भागच बनवला आहे.  माधुरी शानभाग यांनी ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ’ या नावाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या आहेत.  हे भाषांतरही बरेच प्रसिद्ध आहे.  त्यातील बऱ्याच कविता या लोकांना माहित आहेत.  त्यांच्या कवितांच्या ओळीचे वर्णन म्हणीत झाले आहे 

…  “अरे संसार संसार /जसा तवा चुल्ह्यावर /आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर /”

…  “मन वढाळ, वढाळ/ उभ्या पिकातलं ढोर /किती हाकला हाकला /फिरून येते पिकावर /”

…  “मन मोकाट मोकाट /याच्या ठाई ठाई वाटा /जश्या वाऱ्याने चालल्या /पाण्यावरच्या रे लाटा /”

 त्यांच्या कमी प्रसिद्ध असलेल्या (अर्थात माझ्या मते) कविता खालिलप्रमाणे –

बिना कपाशीने उले त्याला बोड म्हणू नई / (उले म्हणजे उलगडले)

हरिनामाविना बोले त्याले तोंड म्हणू नई /

 नही वाऱ्याने हलले त्याले पान म्हणू नई /

 नही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नई /

 पाटा विहिरीवाचून त्याले मळा म्हणू नई /

 नही देवाचे दर्शन त्याले डोळा म्हणू नई /

 निजविते भुक्यापोटी तिले रात म्हणू नई /

 आखडता दानासाठी त्याले हात म्हणू नई /

 नाही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नई /

 जिते नही फुटे पान्हा तिले माय म्हणू नई /

 अरे, वाटच्या दोरीले कधी साप म्हणूं नई 

 इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणूं नई /

इमानाले इसरला त्याले नेक म्हणूं नई 

जल्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणूं नई / 

*दुसरी कविता*

धरित्रीच्या कुशीमध्ये बियबियाणी निजली /

 वर पसरली माती जशी शाल पांघरली /

 बीज डरारे मातीत सर्व कोंब आले वर /

 गहिवरले शेत जस अंगावरती शहार /

ऊनवाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून /

प्रगटली दोन पान जशी हात ती जोडून /

 टाळ्या वाजविती पान दंग देवाच्या भजनी /

 जशी कार्टी करुणा होऊ दे रे आबादानी /

दिसामासा होय वाढ रोप झाली आता मोठी /

आला पिकाला बहर झाली शेतामध्ये दाटी /

 कशी वाऱ्याने डोलती दाणे आले गाडी गाडी /

 देव अजब गारुडी देव अजब गारुडी /

 

या महान कवियत्रीला विनम्र अभिवादन…  

┉❀꧁꧂❀┉

लेखक /लेखिका : अनामिक 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६७ आणि ६८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६७ आणि ६८  ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र.  ६७ – – 

घनःश्याम हा राम लावण्यरूपी ।

महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।

करी संकटी सेवकाचा कुडावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६७।।

अर्थ – –  पावसाळी मेघाप्रमाणे श्यामल वर्ण हा राम अत्यंत सुंदर आहे.  तो महा धैर्यवान आणि गंभीर असा असून अत्यंत पराक्रमी आहे.  संकटात आपल्या भक्ताचे तो रक्षण करतो.  अशा या श्रीरामाचे पहाटे चिंतन करावे.

(कुडावा – रक्षण)

विवेचन – – मनाच्या श्लोकांमधील श्लोक ६६ ते ७६ हा दहा श्लोकांचा एक वेगळा गट आहे.  याचे वैशिष्ट्य असे की या श्लोकांमध्ये समर्थ रामाच्या सगुण रूपाचे वर्णन करतात.  आपल्याला त्याचे ध्यान करायला सांगतात.  परमेश्वराची निर्गुण भक्ती ही श्रेष्ठ आणि सूक्ष्म मानली जाते.  परंतु सगुण भक्ती आपल्यासारख्या सामान्य साधकांसाठी सुलभ आहे.  म्हणून सुरुवात करायची झाली तर ती सगुण भक्तीपासून करावी.  या पृथ्वीवर आपण देह धारण करून आलो आहोत.  परमेश्वर देखील जेव्हा जेव्हा या धरतीवर अवतीर्ण झाला तेव्हा तेव्हा त्याने देह धारण करूनच आपले कार्य केले.  त्यामुळे परमेश्वराच्या सगुण रूपाची कल्पना करणे आपल्याला सोपे जाते.  म्हणूनच समर्थ या दहा श्लोकांच्या माध्यमातून श्रीरामाचे (परमेश्वराचे) सगुण रूप आपल्यासमोर ठेवताहेत.

श्रीरामाचे रूप कसे आहे? तर पावसाळी मेघाप्रमाणे सावळा.  ‘ सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी… ‘ त्या सावळ्या रंगात विलक्षण सौंदर्य आहे.  वेद आणि पुराणात वर्णिल्याप्रमाणे आपले बहुतेक देव सावळेच आहेत.  विष्णू, विठ्ठल, श्रीराम हे सावळेच आहेत.  ‘ सावळे सुंदर, रूप मनोहर.  राहो निरंतर हृदयी माझ्या… ‘ असे संत तुकाराम म्हणतात.  तेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.  श्रीरामाचे रूप वर्णन करताना समर्थांनी राम सुंदर आहे असे न म्हणता लावण्यरूपी असे म्हटले आहे.  ‘ लावण्य ‘ या शब्दात आणखी खोल, गहन असा अर्थ आहे.  त्यात माधुर्य आहे.  म्हणून संतांनी देखील विठ्ठलाला लावण्याचा गाभा असे म्हटले आहे.

या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत समर्थ श्रीरामाचे गुण वर्णन करताना म्हणतात, ‘ महा धीर गंभीर पूर्णप्रतापी. ‘ ‘ महा ‘ हे विशेषण धीर आणि गंभीर या दोन्ही शब्दांसाठी लागू होते.  तो अत्यंत धैर्यशाली आहे.  तसेच तो अत्यंत गंभीर देखील आहे.  इथे गंभीर या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही.  तर जीवनातील सर्व संकटांचा सामना करताना जे धैर्य आणि गांभीर्य लागते, त्या अर्थाने हा शब्द इथे आला आहे.  दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीरामांचे धैर्य आणि शौर्य सागराप्रमाणे अपार आहे.  सागराजवळ अमर्याद जलसाठा आहे.  पण तरीही तो आपले गांभीर्य म्हणजेच आपली मर्यादा सोडत नाही.  तसेच सर्वगुणसंपन्न श्रीराम आहेत.  ते पूर्णप्रतापी आहेत म्हणजे अत्यंत पराक्रमी आहेत.  श्रीराम म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, धैर्य आणि गांभीर्य, पराक्रम! असे अनेकविध गुण त्याच्या ठिकाणी वसतात.

अशा या धीर गंभीर आणि पूर्णप्रतापी श्रीरामांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या सेवकाच्या संकटात धावून जातात, त्याचे रक्षण करतात.  ते भक्तवत्सल आहेत.  ज्या ज्या भक्तांनी संकटकाळी त्यांचा धावा केला, त्यांच्या साहाय्याला ते तात्काळ धावून गेले आहेत.  पण परमेश्वरावर दृढ श्रद्धा हवी.  त्यासाठी परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती करावी लागते.  अनन्यभावाने म्हणजे ‘ हे परमेश्वरा, मला तुझ्याशिवाय कोणी त्राता नाही.  तूच माझे सर्वस्व आहेस. ‘ अशा प्रकारची वृत्ती हवी.  श्रीरामांचे किंवा श्रीकृष्णाचे भक्त हे अशा प्रकारचे होते.  हनुमंताला तर एका रामाशिवाय दुसरे काहीच नको होते.  अशा या रामाचे (भगवंताचे) पहाटे चिंतन करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत.

रात्रीची शांत निद्रा आटोपली की पहाटेच्या वेळी आपले मन एखाद्या नदीच्या डोहासारखे शांत असते.  पाणी जर स्वच्छ आणि शांत असेल तर त्यात आपले प्रतिबिंब दिसते.  त्याचा तळ दिसतो.  पहाटेच्या वेळी अशा शांत आणि इतर विचारांची गर्दी नसलेल्या मनात रामाचे चिंतन करावे.  त्याचेच प्रतिबिंब आपल्या मनात पडावे.  सकाळ जर अशी पवित्र आणि सुंदर झाली तर दिवसही चांगला जाईल.  आपण जेव्हा त्याचे चिंतन करू तेव्हा त्याचे रूप आणि गुण आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात.  आपली सकाळ मोबाईल, टीव्ही किंवा वर्तमानपत्रांच्या बातम्याने बऱ्याच वेळा होते.  त्यातील अपघात, खून, दरोडे, अत्याचार, राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप इ.  नकारात्मक बातम्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात न करता श्रीरामाच्या चिंतनानेच करावी.

स्वसंवाद – – 

१) माझ्या दिवसाची सुरुवात कोणत्या विचारांनी होते? चिंतेने की चिंतनाने?

२) पहाटेच्या शांत वेळेत मी स्वतःसाठी आणि भगवंतासाठी काही क्षण राखून ठेवतो का?

३) संकटसमयी माझी भिस्त भगवंतावर असते का?

४) मी दिवसभरात जास्त कोणत्या गोष्टी मनात साठवतो? नकारात्मक बातम्या की सकारात्मक चिंतन?

५) रामाचे धैर्य, गांभीर्य आणि करुणा हे गुण माझ्यातही यावेत असे मला वाटते का? (क्रमशः)

===== 

श्लोक क्र.  ६८ – – – 

बळे आगळा राम कोदंडधारी ।

महां काळ विक्राळ तोही थरारी ।

पुढे मानवा किंकरा कोण केवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६८।।

अर्थ – – धनुष्य धारण केलेला राम हा पराक्रमाने आगळावेगळा आहे.  सर्व प्राणिमात्रांचा विनाश घडवून आणणारा महाकाळ सुद्धा या रामापुढे थरथर कापतो.  तर अशा या रामापुढे (भगवंतापुढे) सामान्य माणसाची काय कथा? म्हणूनच प्रभात समयी रामाचे चिंतन करावे.

(कोदंडधारी – धनुष्य धारण केलेला, महाकाळ – काळाचाही काळ जो अखिल विश्वाचा विनाश घडवून आणतो, किंकर -दास/सेवक, केवा – महत्व)

विवेचन – – समर्थ या श्लोकाची सुरुवात करताना ‘ बळे आगळा राम कोदंडधारी ‘ असे म्हणतात.  श्रीरामाने कोदंड म्हणजे धनुष्य धारण केले आहे.  त्याच्या धनुष्याचा टणत्कार ऐकल्यावर काळाचा देखील थरकाप होतो.  सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी श्रीरामाने धनुष्य धारण केले आहे.  समर्थांच्या काळात जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले होते, तेव्हा सगळा समाज दुर्बल झाला होता.  गुलामगिरीची वृत्ती निर्माण झाली होती.  अशा वेळी समर्थांनी या धनुर्धारी श्रीरामाचा आदर्श समाजापुढे ठेवला.  तेव्हा साहजिकच श्रीरामाची केवळ पूजा न करता त्याचे गुण देखील अंगी बाणवणे आवश्यक ठरते.  म्हणूनच तर ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ असे समर्थ म्हणतात.

श्रीराम महापराक्रमी तर आहेच पण तो ‘ बळे आगळा का? ‘ तर ज्याची भिती कळीकाळालाही वाटते असा राम आपल्या शक्तीचा उपयोग सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी करणारा आहे.  ज्यांच्याकडे शक्ती, सामर्थ्य आहे असे बरेचसे लोक अनादिकालापासून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात. रावणाजवळही सामर्थ्य होते, पण त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला.  महाभारतात देखील कंसाने आपल्या शक्तीच्या साहाय्याने समाजातील सज्जनांना त्रास दिला. आज समाजात ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि शक्ती आहे अशी बरीचशी मंडळी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात.  म्हणून श्रीराम ‘ बळे आगळा ‘ आहे.

जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे.  काळ हा सर्वशक्तिमान आहे.  सामान्य माणसासाठी यम म्हणजे काळाचेच एक रूप.  सामान्य माणूस यमाचे नुसते नाव जरी काढले तरी घाबरतो.  पण ज्याला सर्वच घाबरतात असा काळ देखील भगवंतापुढे थरथर कापतो.  तर सामान्य माणसाची त्यापुढे काय कथा? म्हणून आपण जर अनन्यभावाने भगवंताची आराधना केली तर अशा सर्वशक्तिमान काळाच्या कचाट्यातून, मरणाच्या भीतीतून देखील तो आपल्याला मुक्त करील.  जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका करील.  मग काळाचा प्रभाव आपल्यावर राहणारच नाही.  तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामांच्या गुणांचे चिंतन कर.

स्वसंवाद – – 

१) मी श्रीरामाची भक्ती करताना केवळ पूजा करतो, की त्याच्या गुणांचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न करतो?

२) माझ्याकडे असलेली शक्ती, ज्ञान, पैसा, पद किंवा अधिकार मी इतरांच्या हितासाठी वापरतो का?

३) माझ्या जीवनात “बळ” म्हणजे काय? इतरांवर प्रभाव टाकणे की स्वतःवर संयम ठेवणे?

४) माझ्या दिवसाची सुरुवात प्रभाती सकारात्मक चिंतनाने होते का?

– क्रमशः श्लोक श्लोक ६७ आणि ६८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्यातील टांग्याची माहित नसलेली ओळख…” – लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्यातील टांग्याची माहित नसलेली ओळख…” – लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्याच्या वाहतुकीचा आणि संस्कृतीचा एक काळ असा होता जो ‘टांग्यांच्या खडखडाटाने’ गाजला.  पेशवेकाळात सुरू झालेली आणि ब्रिटिश काळात वैभव शिखरावर पोहोचलेली पुण्याची टांगेवारी आज इतिहासजमा झाली असली, तरी तिच्या अशा काही रंजक, विस्मरणीय आणि अप्रकाशित बाजू आहेत, ज्या आजच्या पिढीला तर सोडाच, पण जुन्या पुणेकरांच्याही स्मरणातून पुसल्या गेल्या असतील.  पुण्याच्या टांगेवाल्यांविषयीची अशीच काही अनोखी आणि पडद्याआड राहिलेली माहिती

टांग्यांचे नंबर आणि शनिवार वाड्याची ‘पासिंग सिस्टीम’ आज जसे वाहनांचे आरटीओ पासिंग असते, तशीच कडक व्यवस्था ब्रिटिश काळात पुण्यात टांग्यांसाठी होती.  प्रत्येक टांग्याला पितळी नंबर प्लेट असायची.  दरवर्षी या टांग्यांचे पासिंग आणि घोड्यांची तपासणी शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर व्हायची.  तिथल्या मैदानावर टांगे रांगेत उभे राहायचे.  घोड्याचे आरोग्य ठीक नसेल किंवा टांग्याचे लाकूड कमकुवत असेल, तर त्या टांगेवाल्याला ‘पासिंग’ मिळत नसे.

पुण्याचे शाही छकडे विरुद्ध लोकल टांगे:- पुण्यात दोन प्रकारचे टांगे चालत, ज्यांची रचना आणि भाडे वेगळे असायचे.  शाही टांगा यात चार चाके असत आणि वरचे छत मागे-पुढे दुमडता यायचे.  हे टांगे फक्त लष्करातील गोरे अधिकारी, कॅन्टोन्मेंटमधील बडे प्रस्थ किंवा श्रीमंत व्यापारी, सावकार वापरत.  दोन चाकी टांगा (बग्गी): हा अस्सल पुणेरी टांगा होता.  याचे भाडे आण्यांमध्ये असायचे आणि तो सामान्य पुणेकरांसाठी धावायचा.

घोडा-बदली चे थांबे:- पुण्यातून जेव्हा दूरवर प्रवासी जायचे उदा.  पुणे ते खडकी, पुणे ते लोणावळा किंवा पुणे ते सासवड, तेव्हा एकाच घोड्याला संपूर्ण अंतर धावणे शक्य नसायचे.  यासाठी पुण्यात घोडा-बदलीचे थांबे असायचे.  पुणे स्टेशन, संचेती जवळचा परिसर आणि दापोडी येथे असे थांबे होते, जिथे दमलेला घोडा काढून दुसरा घोडा टांग्याला जोडला जाई.  या बदल्यांच्या काळात टांगेवाल्यांची आपापसात एक वेगळीच सांकेतिक भाषा असायची, जी सामान्य प्रवाशांना कधीच कळायची नाही.

अनेकदा तरुण विद्यार्थी टांगेवाल्यांशी दोन-दोन पैशांसाठी हुज्जत घालत.  यातून टांगेवाल्यांनी एक युक्ती शोधली होती, ते अशा हुज्जत घालणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आत सोडणार नाही, बाहेर रस्त्यावरच उतरवणार अशी धमकी द्यायचे.  त्या काळात डेक्कन जिमखान्यावरून कॉलेजच्या मुख्य इमारतीपर्यंत चालत जाणे प्रतिष्ठेचे मानले जात नसल्याने, विद्यार्थी अखेर टांगेवाल्याने मागितलेले भाडे निमूटपणे द्यायचे.

रात्रीची कंदील सक्ती आणि दंड:- ब्रिटिश राजवटीत पुण्याच्या टांग्यांसाठी अत्यंत कडक नियम होते.  सूर्यास्तानंतर प्रत्येक टांग्याच्या दोन्ही बाजूंना घासलेटीचे (केरोसिन) कंदील पेटवणे सक्तीचे होते.  जर रात्रीच्या वेळी शनिवार पेठ, सदाशिव पेठ किंवा कॅम्प भागात एखाद्या टांग्याचा कंदील विझलेला दिसला, तर पोलीस त्या टांगेवाल्याला जागेवरच दोन आणे दंड करायचे.  हा दंड चुकवण्यासाठी अनेक टांगेवाले कंदिलाच्या काचेवर काजळी धरू नये म्हणून त्यात खास तेलाचा आणि सुती वातीचा वापर करत.

टांगेवाल्यांची नजर आणि शनिवार पेठेतील नाके:- पुण्यातील जुने टांगेवाले हे केवळ चालक नव्हते, तर ते शहराचे माहितीगार होते.  शनिवार पेठेतील टांगा नाका किंवा लक्ष्मी रस्त्यावरील थांब्यांवर उभे असणारे टांगेवाले कोणत्या वाड्यात कोण आले, कुठली बैठक चालू आहे, याची खडानखडा माहिती ठेवत.  स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारक आणि भूमिगत नेते ब्रिटीश पोलिसांची नजर चुकवण्यासाठी टांग्याच्या मागच्या बाजूला पडदा लावून प्रवास करायचे आणि अनेक देशभक्त टांगेवाल्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यास मदत केली होती, ज्याची नोंद इतिहासाने फारशी घेतली नाही.

पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकणारी सांकेतिक भाषा:- क्रांतिकारकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना टांगेवाले अत्यंत हुशारीने काम करत.  पोलिसांची गस्त कुठे सुरू आहे, याची पक्की माहिती टांगेवाल्यांना असायची.

जेव्हा एखादा पोलीस अधिकारी किंवा गुप्तहेर टांग्यापाशी घुटमळत असे, तेव्हा टांगेवाले एकमेकांशी बोलताना किंवा घोड्याला हाकताना खास सांकेतिक शब्द वापरत.  उदा, घोड्याचा नाल सैल झालाय किंवा आज दाणा महाग मिळाला अशा वाक्यांचा अर्थ अडचण आहे, क्रांतिकारी प्रवाशाला आता वाड्यातून बाहेर काढू नका असा असायचा.  या कोड लँग्वेजमुळे अनेक मोठे नेते ऐनवेळी पकडले जाण्यापासून वाचले.

पडदा पद्धती आणि दुहेरी ओळख:- त्या काळात स्त्रियांसाठी टांग्याला दोन्ही बाजूंनी जाड कापडी पडदे लावण्याची सोय असायची, जेणेकरून आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही.  या सुविधेचा टांगेवाल्याने क्रांतिकारक यासाठी कल्पकतेने वापर केला.  अनेकदा बरेच क्रांतिकारक वेषांतर करून टांग्यात बसत.  जर पोलिसांनी टांगा थांबवलाच, तर टांगेवाला अत्यंत आक्रमकपणे किंवा पुणेरी उपरोधाने पोलिसांवरच डाफरायचा वाड्यातील बड्या घराण्यातील बायका आत बसल्या आहेत, पडदा बाजूला करून अब्रू घेता का? त्या काळात घरंदाज स्त्रियांच्या बाबतीत पोलीस सहसा कडक भूमिका घेत नसत, आणि टांगेवाल्यांच्या या धाडसामुळे क्रांतिकारक सुरक्षितपणे पेठां मधून पार होत.

गाडीत बसलेला प्रवासी साधा सुती कुर्ता घातलेला कार्यकर्ता आहे की ब्रिटीश सरकारचे १० हजार रुपयांचे बक्षीस असलेला नेता, हे ठाऊक असूनही टांगेवाले कधीही पैशांच्या आमिषाला बळी पडले नाहीत हे विशेष.

क्रांतीच्या साहित्याची अदृश्य वाहतूक:- केवळ नेत्यांचीच नाही, तर सरकार विरुद्धची पत्रके, बंदी घातलेली वृत्तपत्रे आणि काही प्रसंगी शस्त्रे व बॉम्ब बनवण्याचे साहित्य एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्याचे काम या टांग्यांनी केले.  टांग्याच्या खालच्या बाजूला, जिथे घोड्याचा दाणा-पाणी आणि टांगेवाल्याचे सामान ठेवण्याची लाकडी पेटी असायची, तिथे हे प्रतिबंधित साहित्य लपवले जायचे.  वरून घोड्याचे घास-पेंढा टाकलेला असल्याने पोलिसांना कधी संशय आलाच नाही.

इतिहासात टांगेवाल्यांची नावे का नोंदवली गेली नाहीत, यालाही एक ऐतिहासिक कारण आहे.  भूमिगत चळवळीचा पहिला नियमच कमालीची गुप्तता हा होता.  अनेक टांगेवाल्यांना स्वतःलाही माहीत नसायचे की आपण ज्या प्रवाशाला सोडले त्याचे खरे नाव काय आहे, कारण ते एकमेकांना भाई, भाऊ किंवा गुरुजी अशा टोपण नावांनीच हाक मारत.

दुर्दैवाने संशयावरून पोलिसांनी काही टांगेवाल्यांना ताब्यात घेतले, त्यांना बेदम मारहाण केली, त्यांचे परवाने रद्द केले आणि त्यांचे घोडे-टांगे जप्त करून त्यांना कंगाल केले.  परंतु, तरीही त्यांनी पोलिसांसमोर तोंड उघडले नाही.

पुण्याच्या या श्रमकरी वर्गाने स्वतःच्या पोटाची आणि प्राणाची पर्वा न करता, केवळ देश स्वतंत्र झाला पाहिजे या एकाच भावनेने क्रांतीच्या या गाड्याला आपल्या घोड्याच्या टापांनी गती दिली होती.  म्हणूनच, पुण्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा या अज्ञात, देशभक्त टांगेवाल्यांच्या त्यागाशिवाय अपूर्ण आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ४ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ४ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक ३१ ते ४० 

श्ववृत्तिव्यासङ्गो नियतमथ मिथ्याप्रलपनं

कुतर्केश्वभ्यासः सततपरपैशुन्यमननम् ।

अपि श्रावं श्रावं मम तु पुनरेवं गुणगणा-

नृते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम् ॥ ३१॥

*
विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं

न याभ्यामालीढा परमरमणीया तव तनुः ।

अयं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयो-

र्ययोर्नान्तर्यातस्तव लहरिलीलाकलकलः ॥ ३२॥

*

विमानैः स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः

पतन्ति द्राक् पापा जननि नरकान्तः परवशाः ।

विभागोऽयं तस्मिन्नशुभमयमूर्तौ जनपदे

न यत्र त्वं लीलादलितमनुजाशेषकलुषा ॥ ३३॥

*

अपि घ्नन्तो विप्रानविरतमुशन्तो गुरुसतीः

पिबन्तो मैरेयं पुनरपि हरन्तश्च कनकम् ।

विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषा-

मुपर्यम्ब क्रीडन्त्यखिलसुरसम्भावितपदाः ॥ ३४॥

*

अलभ्यं सौरभ्यं हरति सततं यः सुमनसां

क्षणादेव प्राणानपि विरहशस्त्रक्षतहृदाम् ।

त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात्

पुनीते सोऽपि द्रागहह पवमानस्त्रिभुवनम् ॥ ३५॥

*

कियन्तः सन्त्येके नियतमिहलोकार्थघटकाः

परे पूतात्मानः कति च परलोकप्रणयिनः ।

सुखं शेते मातस्तव खलु कृपातः पुनरयं

जगन्नाथः शश्वत्त्वयि निहितलोकद्वयभरः ॥ ३६॥

*

भवत्या हि व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्

परित्राणस्नेहः श्लथयितुमशक्यः खलु यथा ।

ममाप्येवं प्रेमा दुरितनिवहेष्वम्ब जगति

स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः ॥ ३७॥

*

प्रदोषान्तर्नृत्यत्पुरमथनलीलोद्धृतजटा-

तटाभोगप्रेङ्खल्लहरिभुजसन्तानविधुतिः ।

बिलक्रोडक्रीडज्जलडमरुटङ्कारसुभग-

स्तिरोधत्तां तापं त्रिदशतटिनीताण्डवविधिः ॥ ३८॥

*

सदैव त्वय्येवार्पितकुशलचिन्ताभरमिमं

यदि त्वं मामम्ब त्यजसि समयेऽस्मिन्सुविषमे ।

तदा विश्वासोऽयं त्रिभुवनतलादस्तमयते

निराधारा चेयं भवति खलु निर्व्याजकरुणा ॥ ३९॥

*

कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धाङ्गयुवतेः

पुरारेः प्रेङ्खन्त्यो मृदुलतरसीमन्तसरणौ ।

भवान्या सापत्न्यस्फुरितनयनं कोमलरुचा

करेणाक्षिप्तास्ते जननि विजयन्तां लहरयः ॥ ४०॥

मराठी भावानुवाद – – 

सारमेय वृत्ती ठेवुन मी सैरभैर सर्वदा

असत्य भाषण कुतर्कामध्ये गर्क राहतो सदा

सज्जन दुर्जन चाड न ठेवुन करितो परनिंदा

नाम तुझे मी सदैव घेतो पाही मज एकदा ॥३१॥

*

सुंदर नेत्र आकर्ण जरी नाही तुला देखिले

लाभ न काही विशाल नयनी तन्वांग न पाहिले

तव लहरींचे सुरेल संगीत निनादूनी आले

कर्णांची अवहेलना तयांनी ना ऐकले ॥३२॥

*

द्युलोकी जाती पुण्यात्मे बसुन विमानात

पापि जनास स्थान असते केवळ नरकात

कृपेने तुझ्या गङ्गामाते पाप नष्ट होत

तुझा वास नाही तेथे जीवन अशूभ होत ॥३३॥

*

ब्रह्महत्या मद्यपी तथा सुवर्ण शर्विलक

गुरुपत्नीची अभिलाषा मनि असे घोर पातक

अंत्यकाळी परि विलीन होती तव प्रवाही माते

सुरांसि वाञ्छित मोक्षाचे पद प्राप्त होई त्यांते ॥३४॥

*

वियोगशस्त्राने घायळ त्याचा घेई प्राण

अलभ्य सुगंध पुष्पांमधला सदैव ने चोरून

वायूदेवे चंचल लहरी करी त्यांही पावन

पवित्र होती तव लाटांनी विश्वलोक तीन ॥३५॥

*

परोपकारासाठी जगती कितीक या जगतात

पावन आत्मे परलोकाची आंस मनी धरतात

इह-परलोक भार तुजवरी निःशंके सोपवी

जगन्नाथ सुखनिद्रा शांत निवांतशी घेई ॥३६॥

*

नीच पतित पाखंड्यांचे तू करी परित्राण

त्याग तयांचा करणे तुजला होते महाकठीण

पापाचरणी अतीव जडला मोह माझिया मनी

त्याग करणे अशक्य असतो स्वभाव सकल जनी ॥३७॥

*

नर्तन करता त्रिपुरारीच्या जटा जशा विखुरल्या

जटांवरी लहरींच्या तुझिया भुजा रुंद पसरल्या

गुंफेतुनी जलडमरू करतो ध्वनी मधुर सुरेल

शिवतांडव हे दुःख जगाचे खचीत हटवील ॥३८॥

*

विसंबुनीया आर्द्र दयेवर उभा तुझ्या पायाशी

त्यागशील जर मजशी माते घात विश्वासासी

त्रैलोक्यासी तव करुणेचा असे महाऽधार

निष्कपटी करुणेचा होइल उध्वस्त आधार ॥३९॥

*

अर्धांगिनी प्रेमाची वसते वामांगी शिवाच्या

सवति मत्सरे क्रोधित किरणे नयनातून उमेच्या

प्रकट जाहल्या जटेजटेतुन लहरी गङ्गेच्या

विजयी होवो लोभस लहरी देवी भागिरथीच्या ॥४०॥

– क्रमशः भाग चौथा  

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्वप्नातल्या कळ्यांनो!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“स्वप्नातल्या कळ्यांनो! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

ती केवळ दहा वर्षांचीच आणि यापुढेही दहाच वर्षांची राहणार आहे… तिच्या आई-वडिलांच्या आणि त्याच्याही स्मृतींमध्ये. ती एका असाध्य विकाराने ग्रस्त आहे. ती म्हणजे तिचा नाजूक देह. मनाने मात्र ती एखाद्या फुललेल्या गुलाबासारखी टवटवीत… सुहास्यवदना! निष्पाप! 

तिला प्रेमाचा एकच अर्थ इतक्या वर्षांत उमगू शकला आहे. आपल्या माणसाचं सान्निध्य… सततचं. मोठी माणसं त्यासाठीच तर लग्न करतात आणि एकत्रित राहतात… तिचं मन आपलं हे असा विचार करीत असायचं. तिला तो लहानपणापासूनच आवडायचा… एकत्र वाढले होते ते दोघं… रुसवे, फुगवे, भांडणे, खेळ आणि शाळा एकमेकांच्या हातांत हात गुंफूनच होत होती.

तिच्या मनातल्या परीराज्यात स्वप्नीचा राजकुमार दुसरा कुणी नव्हताच… हाच राजकुमार. ती मनात म्हणायची. लग्नगाठ बांधीन तर याच्याशीच. मोठ्या माणसांच्या लग्नसमारंभांना ती जायची याचसाठी की तिथं कसं असतं सगळं, काय काय करतात हे डोळ्यांत साठवून ठेवायचं आणि अगदी तसंच करायचं आपल्याही लग्नात. त्यांच्याकडे बाहुल्या असतात, आणि त्यांचीही लग्नं लावली जातात. पोरांच्या खेळांत!

पण तिला आता खूपच घाई झाली होती. आणखी आठ वर्षे थांबण्याची तिला परवानगी नव्हती. आणि ती मागणारही नव्हती. त्या जीवाला त्याच्या श्वासांची सीमा ठाऊक होती. पैलतीर खुणावतो आहे… आणि काळ त्याबाजूला तिला ढकलतो आहे… ! ही काही शाळा नव्हे… आज मी नाही जाणार शाळेला… असं आईला सांगायला. एकवेळ आई “रहा आजच्या दिवस घरी!” असं म्हणेलही… पण मृत्यूदेवतेचे दूत न्यायला येतातच… आणि मग जावंच लागतं! 

रूग्णालयातल्या शय्येवर निजलेली असताना तिने एकेदिवशी तिच्या वडिलांचा हात हातांत घेतला.. आणि म्हणाली… ”बाबा, मला नवरी व्हायचं आहे. ! त्याच्याशी लग्न करायचं आहे.. तुम्हांला माहीत आहे ना तो… त्याच्याशिवाय मला करमत नाही. !” 

डबडबल्या डोळ्यांनी या वधूपित्याने तयारी सुरु केली. काही काही कमी पडू दिलं नाही या कन्यादानात. पै-पाहुण्यांनी अंगण भरून गेलं. प्रत्येकाच्या चेह-यावरच्या हस-या मुखवट्याखाली एक ठसठसणारी वेदना होती. ती डोळ्यांतून डोकावत होती. खरं तर बापानं सर्वांना बजावलं होतं. माझ्या लेकीच्या आनंदाचा प्रसंग आहे… आसवांना थांबवून ठेवा… पुढे लवकरच त्यांनाही बोलावलं जाईल! 

ती आणि तो… सजले.. धजले… आणि लाजलेही. तो सामोरा येताच ती मुग्ध होऊन त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहिली.. तिचे एवढेसे दोन डोळे. त्याच्या प्रेमाचं सारं ब्रम्हांड साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. जागा पुरणार नव्हती… पण उरणारही नव्हती… ती चालत असलेली वाट मात्र सरणार होती.

त्याने तिचा हात हाती घेतला. टाळ्यांचा कडकडाट झाला. बापाचे थरथरते हात तिच्या खांद्यांवर आणि ओठ तिच्या क्षितिजाएवढ्या कपाळावर. ”सुखी जीवनाच्या शुभेच्छा, बेटा!” तो कसाबसा म्हणाला! आई तर वेदनेचा एक प्रवाह झाली होती. वाहत वाहत दूरवर चालली होती. तिने तिला घट्ट मिठी मारली.. न बोलता खूप काही बोलून गेली! 

सोहळा खरं तर सोळा दिवस होत राहिला पाहिजे… पण चार दिवस आधीच तिच्या शरीरातल्या श्वासांनी प्रस्थान ठेवलं.. पण ती नवपरिणीत पोर सुहास्य वदनाने तिच्या माहेरी. दूर आभाळात निघून गेली.. पुन्हा न परतण्यासाठी! 

… इकडे विल्यम शेक्सपिअर The marriage of true minds लिहित होते… ”दोन पवित्र जीवांच्या मिलनात कोणताही अडथळा यावा, असं कोणतंही कारण मला तरी दिसत नाही. प्रेम म्हणजे समुद्रात भटकणा-या जहाजांचा ध्रुवतारा. दिशादर्शक! खरं प्रेम काळाच्या तडाख्यात मोडून पडत नाही. ते जगाच्या अंतापर्यंत ताठ उभं राहतं… आणि माझं हे म्हणणं जर खरं ठरलं नाही तर असं समजा की मी कधीच काही लिहिलं नाही आणि या जगात कुणी कधी प्रेमच केलं नाही!”

– – – – इंटरनेट म्हणजे एक मोहाची दुनिया. इथं कधी कधी असलं काही हाती लागतं. आणि शब्द मनात थांबत नाहीत! गोष्ट परदेशातली आहे… एका दहा वर्षाच्या मुलीला असाध्य विकार आहे… तिच्याकडे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. तिला तिच्या बालमित्राशी खरंखुरं लग्न करायचं आहे… तसा तिचा हट्टच आहे म्हणा. मग तिच्या आई-वडिलांनीही आणि त्या मुलाच्याही आई-वडिलांनी तिला हा न भविष्यति अनुभव देण्याचं ठरवलं आणि तसं घडवूनही आणलं. ती वधू तिच्या वराच्या डोळ्यांत पाहताना तिच्या डोळ्यांकडे पहा. तुम्हांलाही काहीतरी निश्चित दिसेल… ! 

(छायाचित्र साभार. विल्यम शेक्सपिअर यांच्या कवितेचा मी लिहिलेला अर्थ मूळ अर्थाबरहुकुम असेलच असं नाही. केवळ संदर्भ दिला आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे!” – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे!” – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

अतुल्य के. व्ही.

जर आपल्या घरातील इंटरनेट कनेक्शन, स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर आणि वाहनांमधील इंधन आपल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचत असेल, तर त्यामागे समुद्राच्या खोल अंधारात, श्वास रोखून प्रचंड धोका पत्करून पडद्यामागे काम करणारी एक महिला आहे — अतुल्य के. व्ही.

केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील पट्टाम्बी या छोट्याशा गावात जन्मलेल्या अतुल्य या एक मल्याळी महिला आहेत, ज्यांनी जगाच्या खोल समुद्रात धाडस करून इतिहास घडवला आहे. त्या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक डायव्हर आहेत.

स्कुबा डायव्हिंग हा सामान्यतः समुद्राचे सौंदर्य अनुभवण्यासाठी केला जाणारा एक मनोरंजक उपक्रम असला तरी, अतुल्य यांचे काम व्यावसायिक डायव्हिंगच्या अधिक धोकादायक क्षेत्राशी संबंधित आहे.

जेव्हा मोठ्या पाण्याखालील तेल आणि गॅस पाइपलाइन किंवा इंटरनेट केबल्सचे नुकसान होते, तेव्हा दुरुस्ती, वेल्डिंग आणि देखभालीची कामे करण्यासाठी अतुल्यच समुद्राखाली डुबकी मारतात. अशी कामे करण्यासाठी आवश्यक असलेला व्यावसायिक परवाना असलेली त्या भारतातील एकमेव महिला आहेत.

त्यांनी खोल समुद्राच्या अशा अनेक भागांना भेट दिली आहे, जे आपल्यापैकी बहुतेकांनी कधीही पाहिलेले नाहीत. तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या मागे समुद्राखाली अतुल्यला गुहेसारख्या विलक्षण जलचर रचना आढळल्या.

त्याचप्रमाणे, कोझिकोडच्या किनाऱ्याजवळ डायव्हिंग करताना, कुंजली मराक्करचे आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या भागात तिला प्राचीन बोटी आणि तोफांच्या गोळ्यांमुळे तयार झालेले ठसे आढळले.

अशा शोधांची योग्य नोंद व्हावी आणि इतिहासाचा भाग म्हणून ते जतन केले जावेत, हे अतुल्यचे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे.

ती शक्तिशाली पाण्याखालील प्रवाह आणि स्टोनफिश व स्टिंगरेसारख्या धोकादायक सागरी जीवांचा सामना करत या मोहिमा पूर्ण करते.

अतुल्यच्या मते, समुद्राच्या तळावरील कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थाने आपली नाही. तिथे राहणारे जीव आपल्यासारखेच जीव आहेत. त्यांना त्रास देण्याऐवजी, आपण त्यांच्या जगाचा एक भाग बनले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.

अतुल्या, एक मल्याळी महिला, जी समुद्राच्या अथांग गर्तेत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि इतिहासाचे अवशेष या दोन्हींचे रक्षण करते, ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे.

दुर्दैवाने, हे नमूद केले पाहिजे की विकिपीडियानेही छायाचित्रे आणि योग्य कागदपत्रांसह तिला पुरेसा सन्मान दिलेला नाही.

जगाला तिच्यासारख्या लोकांबद्दल माहिती व्हायलाच हवी—विशेषतः केरळचा अभिमान असलेल्या या तरुणीबद्दल. ही ओळख आपल्यापासून सुरू होऊ द्या.

फक्त एक स्विच ‘ऑन’ केल्याने – – 

जर आपल्या घरातील इंटरनेट कनेक्शन, स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर आणि वाहनांमधील इंधन आपल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचत असेल, तर त्यामागे समुद्राच्या खोल अंधारात, श्वास रोखून प्रचंड धोका पत्करून पडद्यामागे काम करणारी एक महिला आहे — अतुल्य के. व्ही.

केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील पट्टाम्बी या छोट्याशा गावात जन्मलेल्या अतुल्य या एक मल्याळी महिला आहेत, ज्यांनी जगाच्या खोल समुद्रात धाडस करून इतिहास घडवला आहे. त्या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक डायव्हर आहेत.

स्कुबा डायव्हिंग हा सामान्यतः समुद्राचे सौंदर्य अनुभवण्यासाठी केला जाणारा एक मनोरंजक उपक्रम असला तरी, अतुल्य यांचे काम व्यावसायिक डायव्हिंगच्या अधिक धोकादायक क्षेत्राशी संबंधित आहे.

जेव्हा मोठ्या पाण्याखालील तेल आणि गॅस पाइपलाइन किंवा इंटरनेट केबल्सचे नुकसान होते, तेव्हा दुरुस्ती, वेल्डिंग आणि देखभालीची कामे करण्यासाठी अतुल्यच समुद्राखाली डुबकी मारतात. अशी कामे करण्यासाठी आवश्यक असलेला व्यावसायिक परवाना असलेली त्या भारतातील एकमेव महिला आहेत.

त्यांनी खोल समुद्राच्या अशा अनेक भागांना भेट दिली आहे, जे आपल्यापैकी बहुतेकांनी कधीही पाहिलेले नाहीत. तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या मागे समुद्राखाली अतुल्यला गुहेसारख्या विलक्षण जलचर रचना आढळल्या.

त्याचप्रमाणे, कोझिकोडच्या किनाऱ्याजवळ डायव्हिंग करताना, कुंजली मराक्करचे आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या भागात तिला प्राचीन बोटी आणि तोफांच्या गोळ्यांमुळे तयार झालेले ठसे आढळले.

अशा शोधांची योग्य नोंद व्हावी आणि इतिहासाचा भाग म्हणून ते जतन केले जावेत, हे अतुल्यचे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे.

ती शक्तिशाली पाण्याखालील प्रवाह आणि स्टोनफिश व स्टिंगरेसारख्या धोकादायक सागरी जीवांचा सामना करत या मोहिमा पूर्ण करते.

अतुल्यच्या मते, समुद्राच्या तळावरील कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थाने आपली नाही. तिथे राहणारे जीव आपल्यासारखेच जीव आहेत. त्यांना त्रास देण्याऐवजी, आपण त्यांच्या जगाचा एक भाग बनले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.

अतुल्या, एक मल्याळी महिला, जी समुद्राच्या अथांग गर्तेत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि इतिहासाचे अवशेष या दोन्हींचे रक्षण करते, ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे.

दुर्दैवाने, हे नमूद केले पाहिजे की विकिपीडियानेही छायाचित्रे आणि योग्य कागदपत्रांसह तिला पुरेसा सन्मान दिलेला नाही.

जगाला तिच्यासारख्या लोकांबद्दल माहिती व्हायलाच हवी—विशेषतः केरळचा अभिमान असलेल्या या तरुणीबद्दल. ही ओळख आपल्यापासून सुरू होऊ द्या.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares