मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नसानसात फौज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नसानसात फौज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

Once a solider…. always a soldier! असं म्हणतात त्याचा प्रत्यय प्रत्येक सेवानिवृत्त सैनिकांच्या जीवनात येतोच येतो! दुस-या कोणत्याही पेशापेक्षा सैनिकी पेशा अर्थात सैनिकी जीवन माणसाला विविधांगी अनुभवांनी समृद्ध करत असते.

भारतीय सैनिक तर याबाबतीत खूपच सुदैवी म्हणायला पाहिजेत. त्यांना त्यांच्या सेवाकाळात देशाच्या विविध सीमांवर, राज्यांत कर्तव्यावर जावे लागते. प्रचंड उष्ण वाळवंट ते अतिथंड सियाचीन असा सैनिकांचा प्रवास होतो. वर्षातील सुमारे नऊ महिने सैनिक त्यांच्या तुकडीत (युनिट)मध्ये वास्तव्य करीत असल्याने ती तुकडी हेच त्यांचे कुटुंब बनून जाते. त्यांच्या रेजिमेंटची सन्मानचिन्हे, बोधचिन्हे, बोधवाक्ये, ब्रीदवाक्ये आणि युद्धघोषणा या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात… जणू शरीराचा एखादा अवयवच. याच सोबत सैनिकी जीवनातील शिस्तीलाही, भाषेलाही सैनिक सरावलेले असतात. त्यामुळे सेवानिवृत्त होऊन नागरी जीवनात (सिविलीयन) वावरताना त्यांना मोठे समायोजन करावे लागते!

बारीक केस राखणे, गुळगुळीत दाढी करणे, वेळ पाळणे, व्यायाम करणे, कपडे, बूट इत्यादी टापटीप ठेवणे इत्यादी ठळक वैशिष्ट्ये असतात सेवानिवृत्त सैनिकांची. सेवानिवृत्त सैनिक ही सुद्धा देशाचे एक बलस्थान असते. असो.

मागील दोन लेखांत मी भारतीय सैन्यातील 21, Special Forces चे सन्मानचिन्हाबद्द्ल अर्थात ‘वाघनख’ बाबत लिहिले होते. आणि त्यानंतर मेजर दीपेंद्रसिंह सेंगर (सेवानिवृत्त) साहेबांच्या एका मोहिमेबाबत लिहिले होते. त्यात आपल्या महाराष्ट्राचे शूर सैनिक आणि अहिल्यानगरचे रहिवासी सुभेदार मेजर श्री. बाळासाहेब मोहारे (सेवानिवृत्त) साहेब यांचा उल्लेख होता. मोहारे साहेबांशी झालेल्या मोबाईल संभाषणात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण घराबाबत समजले.

मोहारे साहेबांनी त्यांच्या दुमजली घराला नाव दिले आहे… ’वाघनख’! कारण मोहारे साहेब 21, Special Forces मध्ये Commando म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या बंगल्याला नाव दिले आहे… Commando House!

जेंव्हा त्यांनी व्यावसायिक इमारत उभारली तेंव्हा त्या इमारतीवर राष्ट्ध्वज फडकत राहील, अशी व्यवस्था तर केलीच परंतू त्यांच्या 21, Special Forces दलाचे जे चिन्ह आहे, त्या चिन्हाचे नाव या इमारतीवर ठळक अक्षरांत लिहिले… वाघनख! या नावाबाबत बरेच लोक अनभिज्ञ असतील. काही लोकांनी मोहारे साहेबांना विचारलेही… तुमचे आडनाव तर मोहारे आहे… ते बदलून तुम्ही ‘वाघनख’ केले आहे का?

भारतीय सैन्य, सैन्याच्या परंपरा, त्यांची बोधचिन्हे, सन्मानचिन्ह यांबाबत हल्ली हल्ली जागरूकता वाढलेली दिसते. परंतू अजूनही सविस्तर अशी माहिती खूप कमी लोकांपर्यंत पोहोचते.

 वर्ष १९८५. भारतीय सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीची २१वी बटालियन उभारण्यात आली… भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्सचा विचार करता ही बटालियन तशी ‘तरुण’ किंवा नवी कोरी म्हणावी अशी होती. सीमापारचे शत्रू तर आहेतच, परंतू देशांतर्गत शत्रू सुद्धा काही कमी नाहीत. उत्तर-पूर्वेकडे देशाला विशिष्ट असा शेजार लाभलेला आहे. विघटनवादी शक्ती या देशांच्या सीमावर्ती भागांत तसेच त्यांच्या सीमांत लपून भारताविरोधात सशस्त्र कारवाया करीत असतात. या भागातील विशिष्ट भौगोलिक रचना लक्षात घेऊन अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यास सक्षम ठरेल असे PARA SPECIAL FORCES ची एक स्वतंत्र तुकडी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि २१, मराठा लाईट इन्फंट्री चे रुपांतर PARA SPECIAL FORCE मध्ये केले गेले. २१ मराठाचे स्पेशल फोर्सेस दलात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरीतल्या मोरावणे गावात जन्मलेल्या कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांच्या समर्थ खांद्यांवर देण्यात आली. शिंदे साहेबांनीच या दलाचे नाव, हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी क्रूरकर्मा अफजल खान याच्या वधासाठी वापलेले ‘वाघनख’ हे शस्त्र असावे, यासाठी खूप आणि यशस्वी प्रयत्न केले!

मोहारे साहेबांनी इमारतीला ‘वाघनख’ नाव देण्यासोबतच घराचे दरवाजे सुद्धा विशेष बनवून घेतलेले आहेत. त्यावर ‘INDIAN ARMY’, ‘SPECIAL FORCES’ ‘वाघनख’ ही अक्षरे अंकित केलेली असून बलिदान BADGE कोरलेला आहे. आणि 21 आकड्यातील 1 च्या जागी वाघनखाचे चित्र अंकित करण्याची कल्पकताही दाखवली आहे. ही दृश्य प्रतिके लोकांना माहिती तर देतातच परंतू प्रेरणाही देतात!

सैनिक कल्याण कार्यात हिरीरीने सहभागी असलेले सुभेदार मेजर बाळासाहेब ऊर्फ बाळू मोहारे (सेवानिवृत्त) यांनी आपल्या कृतीतून देशभक्तीचे उदाहरण घालून दिलेले आहे. इंग्लंडमधून ‘वाघनख’ महाराष्ट्रात दर्शनार्थ आणले होते. त्या वाघनखाच्या प्रदर्शनाच्या उपक्रमातही मोहारे साहेबांनी हातभार लावला होता. त्यांच्या नसा-नसांत भिनलेली देशभक्ती, भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असाच आहे. धन्यवाद, मोहारे साहेब! जयहिंद!

(पंजाबातले लोक त्यांच्या घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांना विविध आकार देतात… विमान, रणगाडा, पक्षी, प्राणी वगैरे..)

– – – या लेखासाठी मोहारे साहेबांनी छायाचित्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. सैनिकांसाठी कार्य करणा-या ज्योतीताई गोखले-पेंडसे यांच्या सहका-यामुळे मोहारे साहेबांचा संपर्क क्रमांक उपलब्ध होऊ शकला. धन्यवाद!)

 

लेखक : संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही दंतकथा नाही हो…” – लेखक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “ही दंतकथा नाही हो…” – लेखक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

महादेव काशिनाथ गोखले 

पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर.

आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल.

नाव महादेव काशिनाथ गोखले, जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे.

आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला.

महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3. ३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या २१ व्या वर्षी सुरु झाला ते ९० वर्षापर्यंत सुरूच होता.

सहज म्हणून घरातून फिरायला निघायचे आणि लोणावळाला जाऊन यायचे तेही पायी.

शीर्षासन करून फक्त दोन्ही हातावर पर्वती चढायचे तर कधी पाठमोरं चढायचे. आपल्या बायकोला पाठंगुळीवर घेऊन पर्वती चढायचा विक्रम तर ४३ वेळा वेळा केला होता.

आता एवढा व्यायाम असेल तर खुराक पण तसाच हवा नां राव. नव्वद वर्ष पूर्ण केल्यावरही एकावेळी ९० जिलेब्या पैजेवर सहज फस्त करायचे. त्यांचे एक मित्र होते साताऱ्याचे तुळशीराम मोदी. ते त्यांना सकाळच्या नाश्त्याला खास एक किलो कंदी पेढे पाठवून द्यायचे. पुण्याच्या सुप्रसिद्ध काका हलवाई दुकानातून रोज एक किलो पेढे त्यांच्या घरी पोहचवले जायचे.

या अचाट भिडूच्या स्कीलचा वापर कोणी केला नसता तर नवल.

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. तेव्हा त्यांनी क्रॉसकंट्री मॅरेथोन स्पर्धेत २५७ मेडल मिळवले होते. त्यांची किर्ती ऐकून ४ ब्रिटीश अधिकारी त्यांच्याकडून ऑलिम्पिकसाठी ट्रेनिंग घ्यायचे. फावल्या वेळात त्यांना मराठी, हिंदी शिकवायचे.

पुढे त्यांना साठेबिस्कीट कंपनीमध्ये नोकरी लागली. साठे बिस्कीटचे मुख्यालय होते कराचीला. तर बाबुरावांना पावसाळ्याचे ४ महिने सोडले तर कराचीला आठ महिने नोकरीसाठी राहावं लागायचं. पण तिथेही त्यांची अंगातली रग शांत बसायची नाही. कराची-पुणे हा प्रवास ते सायकलवरून करायचे. तिथूनच त्यांनी मानसरोवरला सायकलप्रवास देखील केला होता.

पुण्यात असताना त्यांना बालगंधर्वांच्या गाण्याची आवड निर्माण झाली होती. ते स्वतः उत्कृष्ट तबला वाजवायचे. (आता बास की किती काय करणार)

मग बालगंधर्वांची गाणी ऐकण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचा डोअरकीपर म्हणूनही नोकरी केली होती. तिथे त्यांची सगळी गाणी पाठ झाली. पुढे कराचीला आल्यावर सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसची आई म्हणजेच जद्दनबाई, बेगम आरा या त्याकाळच्या सर्वोत्तम गायिका गोखल्यांकडून गंधर्व स्टाईलचं गाण शिकण्यासाठी येत.

त्यांची किर्ती बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्यापर्यंत पोहचली. बाबुराव गोखलेंना त्यांनी बडोद्याला प्रिंटींग शिकवण्याच्या नोकरीवर ठेऊन घेतलं. पण खरा उद्देश त्यांच्या धावण्याला वाव देणे हा होता.

१९३६ साली जेव्हा बर्लिनमध्ये ऑलिम्पिक होणार होते तेव्हा बडोद्याच्या महाराजांना हिटलरचे खास निमंत्रण होते. सयाजीराव जर्मनीला आपल्या सोबत बाबुराव गोखल्यांना घेऊन गेले.

स्पर्धेदरम्यान गोखल्यांची हिटलरशी ओळख करून दिली. अनवाणी रोज ६०-७० किलोमीटर धावणाऱ्या या अवलिया धावपटूवर हिटलर फुल इम्प्रेस झाला. त्याने गोखल्यांना जर्मनीत काही दिवस ठेवून घेतले. त्यांचा पाहुणचार केला होता. हिटलरशी त्याकाळात त्यांची चांगली मैत्री झाली होती.

पुढे ते जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे जुने शिष्य व तेव्हाचे गव्हर्नर स्वतः आले. हे बघून बडोद्याचे महाराजसुद्धा आश्चर्यचकित झाले होते.

असा हा अवलिया माणूस. तारुण्यात गंमत म्हणून घरात चित्ता, अजगर असे प्राणी पाळायचा.

टिळकांचे नातू म्हणजेच माजी विधानसभा अध्यक्ष जयंतराव टिळक हे त्यांचे खास मित्र. त्यांच्यासोबत अनेकदा शिकारीसाठी रानोमाळ भटकन्ती केली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र स्वतःचं पेपरविक्री आणि बुक बाईंडिंगच छोटसं दुकान उघडलं आणि आयुष्यभर ते संभाळल.

जवळपास १०३ वर्ष जगले. रोज जेवणाला १५ भाकऱ्या खाल्ल्या. आणि हे त्यांच्या शरीरयष्टीकडे बघून जाणवायचं देखील नाही.

आयुष्यात एकदाही दवाखान्याचे तोंडही बघितलं नाही. त्यांच्या मृत्यू नंतर मेडिकल सर्टिफिकेट कुठून आणायचं हा प्रश्न त्यांच्या लेकीला आणि जावयाला पडला होता.

 – – – ही कथा वाचली तरी आपल्याला वाटेल भिडू आपल्याला थापा मारतोय. मात्र आजही पेठेत गेले तर अनेक जण त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या पराक्रमाचे साक्षीदार सापडतील. २००१ साली त्यांना प्रसिद्ध योगगुरु बिसी अय्यंगार, जेष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी, संस्कृत पंडीत लक्ष्मणशास्त्री शेंडे यांच्यासोबत पुण्याचा मानाचा शारदा ज्ञानपीठ सन्मान देण्यात आला.

लेखक : सुधीर गाडगीळ

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

पद्मविभूषण श्री दत्तात्रेय उर्फ काकासाहेब कालेलकर यांनी कविवर्य ‘ऋग्वेदी’ यांच्या ‘अभंग गीतांजली’ (टागोर यांच्या ‘गीतांजली’चा मराठी भावानुवाद) साठी लिहिलेल्या प्रस्तावनेतील वेचक भाग आपल्या माहितीसाठी आज प्रस्तुत करीत आहे.

श्री काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी, म. गांधींचे अनुयायी व सहकारी, थोर समाजसेवक, मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजी भाषांतील साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, अनेकविद्यापीठांचे कुलगुरू असले तरी तेकविवर्य ‘ऋग्वेदी’ यांचे एके काळचे विद्यार्थी होते व रविंद्रनाथ टागोरांबरोबर शांतिनिकेतन मध्ये राहिले असल्यामुळे त्यांच्यामधील माणूस व कवी यांना जवळून ओळखणारे होते; याच कारणांमुळे त्यांनी ‘ऋग्वेदी’ यांच्या ‘अभंग गीतांजली’स प्रस्तावना लिहिण्याचे मान्य केले असावे.

कालेलकर लिहितात, “गीतांजली मध्ये टागोरांनी परमात्म्याला हृदयापासून साद घातली आहे. आपल्या हृदय सागरात भरती /ओहोटी, लहान मोठ्या लाटांचा महोत्सव अखंड चालूच असतो आणि जोपर्यंत असे आहे तोपर्यंत गीतांजली सारख्या हृदय काव्याची आवश्यकता मनुष्याला असणारच. गीतांजली वाचत असताना आपण काव्यसुख घेत आहोत असा अनुभव येत नाही तर हृदयाला दिव्य आहार मिळत आहे, पौष्टिक रसायन पोहोचत आहे, असे वाटते. म्हणूनच गीतांजली हा ग्रंथ जगाच्या धार्मिक साहित्यात कायमचे स्थान मिळवणार आहे याविषयी शंका नाही. ” 

“रवींद्रनाथांनी मानसशास्त्र आणि समाज शास्त्र यामध्ये खूप खोल उतरून कवित्वाचा एक नवाच आणि कष्टसाध्य असा आदर्श आपल्यापुढे ठेवला आहे. या कवीने भारतीय संस्कृतीच्या अंगप्रत्यंगाचे आकलन केलेले असले पाहिजे. प्रेम भावना आणि धर्म भावना यांचे रहस्य त्याला अवगत असले पाहिजे. कोणत्याही कवी मध्ये अद्भुत वशीकरण विद्या असते. तो परिचित आणि अपरिचित सर्वच लोकांचे हृदय काबीज करतो. आणि जणू कांही त्याची ही मोहिनी विद्या पाहूनच सरस्वती देवी त्याला वाचाशक्तीचे वरदान देते. जो भाव व्यक्त करावयाचा असेल त्याला अनुरूप असे शब्द जणू कांही आपोआप न बोलावता येऊन उभे राहतात. एकही शब्द प्रयत्नपूर्वक आणून बसवला असेल अशी शंका देखील मनात येत नाही. तद्वतच या विभुतीने मनुष्य जीवनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्यांच्या वाणीमध्ये आत्मविश्वास, सामर्थ्य आणि व्यापकता आली आहे. टागोरांनी कवित्वाचा एक महान आदर्श जगापुढे मांडला आहे. “

“रवींद्रनाथांची प्रतिभा जितकी स्वतंत्र आहे तितकीच ती आर्य संस्कृतीचे परिपक्व फळ आहे. त्यांच्या लेखात, भाषणात, कवितेत आणि नाटकात हिंदुस्थानातील साहित्याच्या उत्तमांशाची छाप स्पष्ट दिसते. भास, कालिदास यांचा हा कवी वारस आहे, हे ओळखावयास फारसे परिश्रम पडत नाहीत. हिंदुस्थानच्या संत कवींच्या साहित्याचे त्यांनी आकंठ पान केले आहे; याची गीतांजलीतील कोणतेही पद्य साक्ष देऊ शकेल. उपनिषदे, बौद्ध वाङ्मय, वैष्णव संप्रदायाचे साधुसंत आणि महर्षी देवेंद्रनाथ अशा अनेक तत्वज्ञांची छाप रवींद्रनाथांच्या काव्यावर पडलेली दिसते. “

“गीतांजलीत सर्वत्र आर्य भावनाच दिसून येते. गीतांजली ही एक कवी वृत्ती नसून एक सबंध संस्कृतीच आहे. येथून तेथून सर्वत्र ईश्वरभक्ती, ईश्वरनिष्ठा आणि मांगल्याचीच उपासना या कवितांमधून दिसून येते. “

शांतिनिकेतन मध्ये असताना एके दिवशी काकासाहेब त्यांना म्हणाले, ” गुरुदेव, आपल्याकडून काही बोध ऐकावा अशी माझी इच्छा आहे. ” तेव्हा टागोर म्हणाले, “मी कवी आहे. कवीची वृत्ती हीच माझी साधना! मी कोणाचा गुरु होऊ शकत नाही. “

अशा यानिरभिमानी, निरलस, व निरुपाधिक महाकवीस सादर प्रणाम!

—–

☆ गीत : ४९ ☆

YOU came down from your throne and stood at my cottage door.

I was singing all alone in a corner, and the melody caught your ear. You came down 

and stood at my cottage door.

Masters are many in your hall, and songs are sung there at all hours. But the simple carol of this novice struck at your love. One plaintive little strain mingled with the great music of the world, and with a flower for a prize you came down and stopped at my cottage door.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४९ ☆

गात होतो तुझीच गीते

सूर, लय, ताल काहीच नव्हते

*

होती फक्त भक्तीने ओथंबलेली

म्हणूनच तुला ती इतकी भावली

*

शाही तुझे तख्त सोडून आलास

बावरलो मी, पाहून हसलास

*

पाऊल तुझे माझ्या कुटीत

अडखळलो मी तिथेच ताटीत

*

वाटलं, तुझा यक्ष-किन्नरांचा दरबार

मी गीतसागरातील एक तुषार

*

तुझे सारेच प्रहर गीतांचे

माझे सारे तुझ्याच नादाचे

*

भाग्य थोर, ते तुझ्या कानी पडावे

अन् तू माझ्या झोपडीत यावे

*

एक फूल माझ्या हाती दिलंस

आणि हे तुझं बक्षीस म्हणालास

*

अजून कवटाळतो ते फूल उराशी

अन् तुझी चरणधूळ कपाळाशी

*

– भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत : ५० ☆

I HAD gone a-begging from door to door in the village path, when thy golden chariot 

appeared in the distance like a gorgeous dream and I wondered who was this King of all kings! 

My hopes rose high and me thought my evil days were at an end, and I stood waiting for 

alms to be given unasked and for wealth scattered on all sides in the dust.

The chariot stopped where I stood. Thy glance fell on me and thou earnest down with a smile. I felt that the luck of my life had come at last. Then of a sudden thou didst hold out thy right hand and say “What hast thou to give to me?” 

 

Ah, what a kingly jest was it to open thy palm to a beggar to beg! I was confused and 

stood undecided, and then from my wallet I slowly took out the least little grain of corn and gave it to thee.

 

But how great my surprise when at the day’s end I emptied my bag on the floor to find a least little grain of gold among the poor heap. I bitterly wept and wished that I had had the heart to give thee my all.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५० ☆

भीक मागत होतो दारोदार,

मी एक भिक्षेकरी

सुरेख स्वप्नांसारखा,

दिसला रथ तुझा सोनेरी

*

तू फेकलेल्या सुवर्णमुद्रा,

गोळा करीन म्हणतो

वाईट दिवस सरले,

आशेचे किरण पाहतो

*

अचानक थांबला रथ,

माझ्याच समोर येऊन

त्याचं तेज चमकलं,

नशीब उभं दार उघडून

*
‘ओम् भवती भिक्षां देही’ 

तू म्हणालास हात पसरून

असा कसा हा राजा जगतो 

भिकाऱ्याकडे भीक मागून

*

गोंधळलो मी, झोळीतून चार 

दाणे काढून दिले तुला

आल्यावर केली झोळी रिकामी,

तितकेच सुवर्ण दिलेस तू मला

*
मी रडलो, नाही ओळखले 

तुला कसे मी रे!

देण्यासाठी सर्वस्व होते,

सोने झाले असते की रे!

*

– भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ५१ ☆

THE night darkened. Our day’s works had been done. We thought that the last guest 

had arrived for the night and the doors in the village were all shut. Only some said, The king was to come. We laughed and said “No, it cannot be!” 

It seemed there were knocks at the door and we said it was nothing but the wind. We put out the lamps and lay down to sleep. Only some said, “It is the messenger!” We 

laughed and said “No, it must be the wind!” 

There came a sound in the dead of the night. We sleepily thought it was the distant 

thunder. The earth shook, the walls rocked, and it troubled us in our sleep. Only some said, it was the sound of wheels. We said in a drowsy murmur, “No, it must be the rumbling of clouds!” 

The night was still dark when the drum sounded. The voice came “Wake up! Delay not! “We pressed our hands on our hearts and shuddered with fear. Some said, “Lo, there is the king’s flag!” We stood up on our feet and cried “There is no time for delay!” 

The king has come but where are lights, where are wreaths? Where is the throne to seat him? Oh, shame! Oh utter shame! Where is the hall, the decorations? Some one has said, “Vain is this cry! Greet him with empty hands, lead him into thy rooms all bare!” 

Open the doors, let the conch-shells be sounded! In the depth of the night has come the king of our dark, dreary house. The thunder roars in the sky. The darkness shudders with lightning. Bring out thy tattered piece of mat and spread it in the courtyard. With the storm has come of a sudden our king of the fearful night.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५१ ☆

दिवस सरला, रात्र झाली

कष्टकरी दमला, दारे लागली

*

कुणी म्हणालं,

“राजा अजून यायचा आहे”

*

आम्ही हसलो, थाप पडली

वारा असेल, ज्योत विझली

*

कुणी म्हणालं,

“राजाचा दूत आला आहे”

*
गडगडू लागलं, पृथ्वी हलली

थरथरल्या भिंती, सारी दचकून उठली

*

कुणी म्हणालं,

“रथाच्या चाकांचा आवाज आहे”

*

आणखी गडद रात्र, ढोल वाजले

उठा, उशीर नको, शब्द कानी आले

*
कुणी म्हणालं,

“राजाचं निशाण फडकतं आहे”

*

रडू लागलो, दिवे कुठे आहेत?

रथ, दरबार कुठे, पुष्पहार कुठे आहेत?

*

कुणी म्हणालं,

“आता रडणं व्यर्थ आहे “

*

दारे उघडा, रिकाम्या खोलीत बोलवा

रिकाम्या हातांनीच भेटा, शंख वाजवा

*

कुणी म्हणालं,

“मध्यरात्री, भकास घरात राजा आला आहे “

*

अंधाराचा थरकाप, वीज आकाशात

फाटकी चटई, पसरा आवारात

*
कुणी म्हणालं,

“वादळाबरोबर, भयावह रात्रीचा राजा आला आहे”

*

कांही तयारी नको, दार फक्त उघडे ठेवा

तो भावाचा भुकेला, मन मात्र शुद्ध ठेवा

*

कुणी हुषार बोलला, “त्रैलोक्याचा राजा आला आहे”

*

– क्रमशः भाग १७..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठवणींच्या पोतडीतून” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आठवणींच्या पोतडीतून☆ श्री जगदीश काबरे ☆

अवैज्ञानिक मते लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी १९४२ हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हा हॉकिंग यांचा मृत्यूदिन.

हॉकिंग यांना ‘का’ या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले. खरे तर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नातील फरक असा की जनसामान्य आयुष्याच्या रेटय़ात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात. तर हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो. पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते.

अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. *‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आणि विश्वाचे संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे, ’’* असे हॉकिंग म्हणत.

याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण व तर्क. या दोघांच्या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे, ’’ हे त्यांचे मत विचारी माणसाला मान्य होण्यासारखेच आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तू चालत रहा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “डनिंग-क्रुगर इफेक्ट…” ☆ श्री आशिष मुळे ☆

– – – लिंबाचा रस तोंडावर फासून बँकेवर दरोडा घालणारा “मिस्टर इंडिया” आणि त्यातून जन्माला आला एक क्रांतिकारी सिद्धांत डनिंग-क्रुगर इफेक्ट!!!

१९९५ साली एका भरदुपारी पिट्सबर्गमध्ये *मॅकआर्थर व्हीलर* नावाच्या एका धिप्पाड माणसाने तोंडाला साधा रुमालही न बांधता दोन बँका लुटल्या, कारण त्याचा असा ठाम विश्वास होता की चेहऱ्याला लिंबाचा रस फासला की माणूस सीसीटीव्ही कॅमेऱ्याला ‘अदृश्य’ होतो. हे वाचताना आपल्याला हसू येईल, पण या एका ‘येडचाप’ घटनेने जागतिक मानसशास्त्राला ‘डनिंग-क्रुगर इफेक्ट’ नावाचा एक असा क्रांतिकारी सिद्धांत दिला, जो आज आपल्या सोशल मीडिया फीडपासून ते गल्लीतल्या राजकारणापर्यंत प्रत्येक ठिकाणी अगदी तंतोतंत लागू होतो.

****

कोणताही गुन्हेगार चोरी करताना आपला चेहरा लपवतो, पण व्हीलर महाशय चक्क कॅमेऱ्याकडे बघून हसत होते. त्यांना खात्री होती की लिंबाचा रस हा ‘इनव्हिजिबल इंक (अदृश्य शाई) म्हणून वापरला जातो, तर तो चेहऱ्याला लावला की आपला चेहराही अदृश्य होईल. त्यांनी घरी याचा प्रयोगही करून बघितला होता. तोंडाला रस फासून त्यांनी स्वतःचा पोलरॉइड फोटो काढला, पण नेमकं त्याच वेळी डोळ्यात रस गेल्याने त्यांनी डोळे गच्च मिटले आणि कॅमेरा हलला. फोटो कोरा आला आणि या महाशयांना वाटलं, “झाली की फत्ते! आता आपण मिस्टर इंडिया झालो! “

****

पण मुद्दा असा आहे की, व्हीलर हे काही पहिले किंवा शेवटचे ‘अतिशहाणे’ नव्हते. त्यांच्या या अजब पराक्रमाची बातमी जेव्हा कॉर्ननेल विद्यापीठातील डेव्हिड डनिंग आणि जस्टिन क्रुगर या दोन मानसशास्त्रज्ञांनी वाचली, तेव्हा त्यांना एक वेगळाच विचार सुचला. त्यांना प्रश्न पडला की, *एखादा माणूस स्वतःच्या अज्ञानाबद्दल इतका ‘कॉन्फिडन्ट’ कसा असू शकतो? * यातूनच १९९९ मध्ये जन्म झाला *डनिंग-क्रुगर इफेक्ट’चा! *

या सिद्धांतानुसार, ज्या व्यक्तीकडे एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा कौशल्य अत्यंत कमी असते, तीच व्यक्ती त्या विषयात आपण ‘तज्ज्ञ’ असल्याचा सर्वाधिक आव आणते. सरळ सांगतो, अडाणी माणसाला आपण अडाणी आहोत हे समजण्यासाठी जेवढी बुद्धी लागते, तेवढीही त्याच्याकडे नसते. याला मानसशास्त्रात ‘मेटाकॉग्निशन’ची (Metacognition) कमतरता म्हणतात. म्हणजे स्वतःच्याच विचारांचे विश्लेषण करण्याची क्षमता नसणे.

****

आपल्या महाराष्ट्रात अशा नमुन्यांची अजिबात कमतरता नाही. लग्नाच्या पंगतीत एखादा काका भेटतोच, ज्याला इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धापासून ते शेअर मार्केट कोसळण्यापर्यंतच्या सगळ्या कारणांची ‘इनसाईडर’ माहिती असते. या काकांनी आयुष्यात कधी पासपोर्ट काढलेला नसतो किंवा डीमॅट खाते उघडलेले नसते, पण त्यांचा आत्मविश्वास एवढा दांडगा असतो की समोर बसलेला एखादा खरा अर्थतज्ज्ञही गप्प बसतो. हे मान्य करायलाच हवं की, *अज्ञान हे ज्ञानापेक्षा जास्त आत्मविश्वास निर्माण करतं. *

डनिंग-क्रुगर इफेक्ट हा आजच्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या काळात अधिक धोकादायक झाला आहे. एखाद्या विषयावर दोन मिनिटांचा व्हिडिओ पाहिला की लोकांना वाटतं आपण त्या विषयात पी एच. डी. केली आहे. मग ते डॉक्टरला सर्जरी कशी करायची हे शिकवतात आणि इंजिनिअरला पूल कसा बांधायचा याचे सल्ले देतात. व्हीलरने चेहऱ्याला लिंबाचा रस लावला होता, हे लोक बुद्धीलाच अज्ञानाचा लेप लावून फिरत असतात.

****

डनिंग आणि क्रुगर यांनी त्यांच्या संशोधनात असे सिद्ध केले की, जे लोक खरोखर हुशार किंवा कुशल असतात, त्यांना उलट ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ जाणवतो. म्हणजे, त्यांना सतत असं वाटतं की आपल्याला अजून खूप शिकायचं आहे किंवा समोरच्याला आपल्यापेक्षा जास्त समजतंय. याउलट, ज्यांना काहीच येत नाही, ते मूर्खपणाच्या शिखरावर बसलेले असतात.

****

विश्लेषकांच्या मते, या समस्येवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे *बौद्धिक नम्रता*.

आपण सर्वज्ञ नाही आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट माहित नसू शकते, हे मान्य करायला खूप मोठे काळीज लागते. मॅकआर्थर व्हीलरला जेव्हा पोलिसांनी अटक केली आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवलं, तेव्हा तो आश्चर्याने उद्गारला होता, “बट आय वोअर द ज्यूस! ” (पण मी तर रस लावला होता! ). त्याच्यासाठी तो रस म्हणजे एक सुरक्षा कवच होतं, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हतं.

आपल्या दैनंदिन जीवनातही आपण अनेकदा ‘लिंबू रस’ लावून वावरत असतो. कधी राजकारणाच्या चर्चांमध्ये, कधी ऑफिसच्या मिटिंगमध्ये, तर कधी कौटुंबिक वादात.

आपल्याला वाटतं आपण समोरच्याला व्यवस्थित बनवलंय किंवा आपल्याला सगळं समजतंय, पण प्रत्यक्षात आपला चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असतो. संशोधकांचा शोध असं सांगतो की, जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही की “मला खरंच हे माहित आहे का? ” तोपर्यंत तुम्ही डनिंग-क्रुगर इफेक्टचे शिकार आहात.

****

आणखी एक गोष्ट म्हणजे, हा इफेक्ट फक्त मूर्ख माणसांपुरता मर्यादित नाही. अत्यंत बुद्धिमान माणसंही जेव्हा त्यांच्या क्षेत्राबाहेरील विषयात नाक खुपसतात, तेव्हा ते याच सापळ्यात अडकतात. एखादा मोठा शास्त्रज्ञ जेव्हा संगीतावर किंवा साहित्यावर अधिकाराने भाष्य करायला जातो आणि तिथे तो चुकतो, तेव्हा तो व्हीलरच्याच रांगेत उभा असतो. फरक फक्त एवढाच की व्हीलरने लिंबाचा रस लावला होता, हे लोक आपल्या पदव्यांचा रस लावतात.

****

भविष्यात काय होणार? तंत्रज्ञान वाढत जाईल, माहितीचा महापूर येईल, पण जोपर्यंत माणूस स्वतःच्या अज्ञानाचे मूल्यमापन करायला शिकत नाही, तोपर्यंत मॅकआर्थर व्हीलरचे वारसदार बँका लुटत राहतील किंवा सोशल मीडियावर कमेंट्समध्ये भांडत राहतील.

आश्चर्यकारक माहिती ही आहे की, व्हीलरने जेलमध्ये गेल्यावरही बराच काळ हे मान्य केलं नव्हतं की त्याची लिंबाची थिअरी चुकीची होती. त्याला वाटलं कॅमेऱ्यातच काहीतरी दोष असावा.

डनिंग-क्रुगर इफेक्ट हा केवळ एक वैज्ञानिक सिद्धांत नाही, तर तो मानवी स्वभावाचा एक आरसा आहे. हा आरसा आपल्याला सांगतो की, शहाणपणाची पहिली पायरी म्हणजे ‘आपल्याला काहीच माहित नाही’ हे समजणे.

****

शेवटी, व्हीलरच्या त्या लिंबाच्या रसाने त्याला तुरुंगात पाठवलं, पण जगाला एक मोठा धडा दिला. *पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासाने चुकीची माहिती सांगताना दिसेल, तेव्हा चिडण्यापेक्षा फक्त स्मितहास्य करा. समजून जा की, समोरच्याने नकळत आपल्याला लिंबाचा रस चोपडला आहे आणि त्याला वाटतंय की तो जगाला दिसत नाहीये.

तुमच्या आजूबाजूला असा ‘लिंबू रस’ लावून फिरणारा एखादा इसम नक्कीच असेल, जो स्वतःच्या अज्ञानाच्या अंधारात मजेत जगतोय आणि आपण मात्र त्याच्या आत्मविश्वासाकडे बघून थक्क होतोय…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “टाईपरायटर आणि एका भारतीय पिढीचा इतिहास…” –  लेखक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “टाईपरायटर आणि एका भारतीय पिढीचा इतिहास” –  लेखक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे

गोदरेजच्या टाईपरायटरने एका भारतीय पिढीचा इतिहास लिहिला!! 

टाईपरायटर आता अडगळीत गेला आहे. 

कम्प्युटर, स्मार्टफोनच्या युगात जुनाट टाईपरायटर मशीन वापराणार तरी कोण? * *पण या एका मशीनने भारतातल्या २ पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय करून दिली होती. 

 स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडून नोकरी मिळवून देण्यात याच मशीनचा हातभार होता हे तुम्हाला माहित आहे का? या लहानशा मशीनने आधुनिक भारताचा इतिहास लिहिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आज आपण याच टाईपरायटर मशीन विषयी जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून आपण टाईपरायटरकडे एका नव्या दृष्टीने बघू यात शंका नाही.

****

१९४० च्या काळात भारत टाईपरायटर परदेशातून मागवत असे. परदेशातून येणाऱ्या टाईपरायटर मध्ये अमेरिकेतून येणाऱ्या टाईपरायटर्सची संख्या जास्त होती. यात अमेरिकेची रेमिंग्टन ही कंपनी अग्रगण्य समजली जायची. टाईपरायटर वगळता रेमिंग्टनचा आणि भारताचा आणखी एका बाबतीत संबंध आहे. रेमिंग्टन शस्त्र बनवणारी कंपनी आहे. या कंपनीनेच १८५७ साली गाय आणि डुकराची चरबी असलेल्या बंदुका तयार केल्या होत्या. त्यांच्या या घोटाळ्यामुळेच भारतात १८५७ चा उठाव घडून आला.

****

तर, ही रेमिंगटन कंपनी जवळजवळ १९१० पासून खास भारतासाठी मराठी, गुजराती, उर्दू, अरेबिक आणि गुरुमुखी अशा स्थानिक भाषांमधले टाईपरायटर तयार करत होती. स्थानिक भाषा लिहिता येत असल्याने टाईपरायटर भारतात प्रचंड प्रसिद्ध होते. लेखक, पत्रकार, राजकारणी टाईपरायटरचा नियमित वापर करत.

पण भारताला हवा होता आपला स्वतःचा स्वदेशी टाईपरायटर. ही कल्पना १९४८ सालीच सुचवण्यात आली होती, पण पुढे जाऊन ज्या कंपनीने पहिला भारतीय टाईपरायटर बाजारात आणला ती गोदरेज कंपनी त्यावेळी एका अत्यंत महत्वाच्या कामात गुंतली होती. हे काम होतं भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘मतदान पेटी’ तयार करण्याचं.

****

भारतीय टाईपरायटरचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी १९५५ साल उजाडावं लागलं. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी भारतातलीच नव्हे तर आशिया खंडातली पहिली कंपनी ठरली. या पहिल्यावहिल्या टाईपरायटरला नाव मिळालं “गोदरेज प्राइमा”.

आज आपण टाईपरायटरला तितकसं महत्व देणार नाही, पण त्याकाळी ही गोष्ट आधुनिक आणि स्वतंत्र भारताचं प्रतिक मानली गेली. आपल्याला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्ष उलटून गेली होती आणि एवढ्या कमी वेळात भारतीय इंजिनियर्सनी संपूर्णपणे स्वदेशी असा टाईपरायटर तयार केला होता. ही बाब स्फूर्तिदायक ठरली.

काही वर्षातच परदेशी टाईपरायटरच्या जागी ‘गोदरेज प्राइमा’ने संपूर्ण भारत व्यापला. ऑफिस म्हटलं की टाईपरायटर आलाच आणि तिथला तो परिचित असा खडखडचा आवाजही आलाच. या सगळ्या गोष्टींची सुरुवात १९५५ नंतर झाली. सरकारी कार्यालये, कोर्ट, संरक्षण यंत्रणा या गोदरेज टाईपरायटर वापरण्यात पहिल्या क्रमांकावर होत्या.

****

त्याकाळी रेमिंग्टन व्यतिरिक्त हाल्डा (Halda), ओलीवेटी (Olivetti), स्मिथ-कोरोना (Smith-Corona), अॅड्लर-रॉयल(Adler-Royal), ऑलम्पिया (Olympia), नाकाजिमा (Nakajima) या कंपन्या सुद्धा प्रसिद्द होत्या. गोदरेजने फारच कमी वेळात या प्रसिद्ध कंपन्यांना टक्कर द्यायला सुरुवात केली.

गोदरेजचा खप किती होता याची कल्पना येण्यासाठी एक उदाहरण बघूया. त्याकाळी भारतभरातून जवळजवळ १, ५०, ००० टाईपरायटर्सची मागणी असायची. पण कंपनीकडून फक्त ५०, ००० टाईपरायटर्स तयार केले जायचे. भारताबाहेरही गोदरेज प्राईमाचे ग्राहक होते. श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मोझांबिक, अंगोला, मोरोक्को या देशांमध्ये या टाईपरायटर्सचा प्रचंड खप होता.

****

टाईपरायटर आणि महिला सबलीकरण:

टाईपरायटर हे पहिल्यांदा महिलांशी जोडलं गेलं ते अमेरिकेत. अमेरिकन रेमिंग्टन कंपनीने असा विचार केला होता की टाईपरायटरचा सर्वाधिक उपयोय हा महिलांकडून होईल. या विचाराने त्यांनी महिलांसाठी फुलांचं डिझाईन असलेले टाईपरायटर बाजारात आणले. ही कल्पना चांगलीच प्रसिद्ध ठरली. महिला मोठ्या संख्येने टाइपिंगच्या कामाकडे वळल्या.

या ट्रेंडने त्याकाळी उच्चांक गाठला होता. १९१० साली अमेरिकेतील जवळजवळ ८१ टक्के टाईपिस्ट या महिला होत्या. टाईपरायटरने मोठ्या प्रमाणात अमेरिकन महिलांना काम मिळवून दिलं. पण अमेरिकेत याचा एक विपरीत परिणामही झाला. त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या पोर्नोग्राफिक मासिकांमध्ये “टाईपरायटर गर्ल” हा एक नवीन विषय बनला होता. भारतात असा कोणताही प्रकार घडला नाही. उलट या एका मशीनने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं. १९६० नंतरच्या चणचणीच्या काळात अनेक संसार या स्त्रियांच्या मदतीवर उभे राहिले. नोकरी करणारी बायको ही कन्सेप्ट इथून सुरू झाली. पाचवारी साडी, सायकल आणि टायपिंग मशीन या तीन गोष्टी म्हणजे आधुनिक भारतीय स्त्रीचे प्रोफाइल बनले. भारतीय महिलांना घराचा उंबरठा ओलांडून स्वतःच्या पायावर उभं करण्यात टाईपरायटरचा खूप मोठा हातभार लागला.

****

गोदरेज टाईपरायटरची भारतातली प्रसिद्धी

भारतात गोदरेज प्राईमा सुपरहिट का ठरलं? याचं एक प्रमुख आणि गमतीदार कारण आहे. भारतीयांना गोदरेज टाईपरायटरचा खडखडाट प्रचंड आवडला होता. हीच बाब इतर कंपन्यांनी लक्षात घेतली नाही. तसं पाहायला गेलं तर गोदरेज टाईपरायटरचा हा एक अवगुण म्हणता येईल, पण त्यानेच गोदरेजला भारतभर पोहोचवलं.

दिल्लीच्या ‘परवाना प्राधिकरण’ (driving licence authority)च्या ऑफिस बाहेर बसणारे ६० वर्षीय सतीश कालाकोटी गोदरेजच्या सुवर्णकाळाबद्दल सांगताना म्हणतात की, “जर्मन एरिका कंपनी त्यांच्या आवाज न करणाऱ्या आणि टाईप करण्यास अगदी सोप्प्या टाईपरायटर्ससाठी प्रसिद्ध होती. पण मी गोदरेजचा आवाज करणाऱ्या टाईपरायटरची निवड केली. ” सतीश कालाकोटी आजही दिल्लीत टाईपरायटरवर काम करतात. गोदरेज टाईपरायटरचा सुवर्णकाळ जगलेल्या मोजक्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. भारतात टाईपरायटर म्हणजे प्रतिष्ठेचं चिन्ह समजलं जायचं. आजचा मध्यमवर्गी तरुणवर्ग बाइक किंवा कारची स्वप्न बघतो तर त्यावेळचा तरुणवर्ग हा टाईपरायटरची स्वप्न बघायचा. मॅट्रिक पास झालं की टायपिंग, शॉर्टहँड आणि नोकरीत रुजू असा प्रघातच पडलेला होता.

****

त्याकाळच्या गोदरेजच्या जाहिरातीचा मजकूरही बघण्यासारखा आहे. १९५० साली गोदरेजने आपल्या जाहिरातीत म्हटलं होतं, “Godrej presents The all-Indian Typewriter, ”. आणखी एका जाहिरातीत “Today’s typewriter with the touch of tomorrow” हे वाक्य होतं. गोदरेजची टीव्हीवर येणारी ही जाहिरात जुन्याजाणत्या लोकांना नक्कीच नॉस्टॅल्जिक करेल.

****

कॉम्प्युटर आणि टाईपरायटरचा उतरता काळ

कम्प्युटरने टाईपरायटरच्या सुवर्णयुगाचा अंत केला. २००० पासून टाईपरायटरची जागा कम्प्युटरने घेतली. कम्प्युटरच्या लाटेने गोदरेज कंपनीला जबरदस्त धक्का दिला होता. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी तर होतीच, पण गोदरेज कंपनीच शेवटचा टाईपरायटर बनवणारी कंपनी पण ठरली.

गोदरेजने त्यांचा शेवटचा टाईपरायटर १२, ००० रुपयांना विकला होता. २०११ साली त्यांचा मुंबईचा टाईपरायटर तयार करणारा कारखाना कायमचा बंद झाला. यावेळी ५०० टाईपरायटर कारखान्यात पडून होते. गोदरेजच्या पुण्याच्या कारखान्याची अशी दश झाली नाही. कारण हा कारखाना पुढे रेफ्रिजरेटर तयार करण्यासाठी नव्याने वापरण्यात आला.

तर मित्रांनो, गोदरेजच्या टाईपरायटरने अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतरच्या एका संपूर्ण पिढीचा इतिहास लिहिला.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवीन संवत्सराचे नाव “पराभव” का? – लेखक : श्री वैभव साठे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ नवीन संवत्सराचे नाव “पराभव” का? – लेखक : श्री वैभव साठे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

कालनिर्णयचे “मागील पान ” वाचताना १९ मार्च २०२६ ला सुरु होणाऱ्या नवीन संवत्सराचे नाव “पराभव” असे आहे असे वाचले. २०२५ संवत्सराचे नाव “विश्वावसू” असे छान होते. मनात विचार आला, सौर वर्षाचे नाव कोणी पराभव असे कसे ठेवेल. मग थोडासा रिसर्च सुरु केला आणि छान माहिती मिळाली:

संवत्सर म्हणजे हिंदू पंचांगातील एक सौर-वर्ष, ज्याला स्वतंत्र नाव दिलेले असते. ख्रिस्ती संवताप्रमाणे (२०२६ इ. स.) फक्त आकडे न वापरता,

हिंदू कालगणनेत ६० वर्षांचा एक नामांकित चक्र वापरला जातो. याला म्हणतात: षष्टी‑संवत्सर चक्र (६० वर्षांचे चक्र)

या ६० वर्षांना नावे आधीपासून निश्चित केलेली आहेत. नेमकी ६० वर्षेच का? यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे.

गुरू आणि शनी या ग्रहांचा ग्रहपरिभ्रमण (rotation) कालावधी सुमारे गुरू(बृहस्पती) ११. ८६ (~ १२) वर्षे आणि शनीचा परिभ्रमण काळ २९. ४६ (~ ३०) वर्षे आहे. १२ आणि ३० चा ल. सा. वि. (LCM) ६० आहे त्यामुळे साधारण ६० सौर वर्षांनंतर गुरू‑शनी यांची परस्पर स्थिती पुन्हा जवळजवळ तशीच होते.

म्हणून हा ६० वर्षांचा चक्र खगोलशास्त्रावर आधारित आहे.

या ६० संवत्सरांची निश्चित यादी ही यादी कधीही बदलत नाही. संवत्सर चक्र नेहमी याच क्रमाने सुरू होते:

कोणत्या वर्षाला कोणते नाव कसे ठरते? यासाठी कलियुग कालगणना वापरली जाते. हिंदू कालगणनेनुसार: कलियुगाचा आरंभ — इ. स. पू. ३१०२ मध्ये झाला.

त्या दिवसापासून दरवर्षी संवत्सराचे नाव एकाने पुढे सरकत जाते. ६० नंतर पुन्हा पहिल्यापासून सुरू होते.

षष्टी‑संवत्सर चक्र (६० संवत्सरे)

१) प्रभव २) विभव ३) शुक्ल ४) प्रमोदूत ५) प्रजापती ६) आंगिरस ७) श्रीमुख ८) भाव ९) युव १०) धातु ११) ईश्वर १२) बहुधान्य १३) प्रमाथी १४) विक्रम १५) वृष १६) चित्रभानु १७) स्वभानु १८) तारण १९) पार्थिव २०) व्यय २१) सर्वजित २२) सर्वधारी २३) विरोधी २४) विकृति २५) खर २६) नंदन २७) विजय २८) जय २९) मन्मथ ३०) दुर्मुख ३१) हेमलंबी ३२) विलंबी ३३) विकारी ३४) शार्वरी ३५) प्लव ३६) शुभकृत ३७) शोभकृत ३८) क्रोधी ३९) विश्वावसु ४०) पराभव ४१) प्लवंग ४२)कीलक ४३) सौम्य ४४) साधारण ४५) विरोधिकृत ४६) परिधावी ४७) प्रमादी ४८) आनंद ४९) राक्षस ५०) नल ५१) पिंगल ५२) कालयुक्ति ५३) सिद्धार्थी ५४) रौद्र ५५) दुर्मती ५६) दुंदुभी ५७) रुधिरोद्गारी ५८) रक्ताक्षी ५९) क्रोधन ६०) अक्षय

ही यादी सूर्यसिद्धांत, आर्यभटीय, व पारंपरिक पंचांगांनुसार प्रमाणित आहे

प्रत्येक संवत्सर हिंदू नववर्षापासून (गुढीपाडवा / उगाडी) लागू होतो. ६० वर्षांनंतर चक्र पुन्हा प्रभव पासून सुरू होते

गंमत म्हणजे चिनी पंचांगातही ६० वर्षांचे फिरते चक्र आहे. परंपरागत चिनी पंचांगात ६० वर्षांचे चक्र वापरले जाते, याला गान्झी (干支) चक्र म्हणतात.

हे चक्र २००० हून अधिक वर्षांपासून अखंडपणे वापरले जात आहे. हे चक्र दोन स्वतंत्र चक्रांच्या संयोगातून तयार होते:

१) १० स्वर्गीय कांड्या (Heavenly Stems – 天干)

या कांड्या पंचमहाभूत तत्त्वे (five elements) आणि स्त्री‑पुरुष (Yin–Yang) गुणधर्म दर्शवतात.

२) १२ पार्थिव शाखा (Earthly Branches – 地支)

या शाखा म्हणजेच प्रसिद्ध चिनी राशी प्राणी:

उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, शेळी, माकड, कोंबडा, कुत्रा, डुक्कर.

६० वर्षांचे चक्र का होते?

दरवर्षी १ स्वर्गीय कांडी पुढे जाते आणि १ पार्थिव शाखा पुढे जाते. १० आणि १२ यांचा ल. स. वि. (LCM) = ६०

त्यामुळे तोच कांडी‑शाखा संयोग प्रत्येक ६० वर्षांनी पुन्हा येतो.

उदाहरण

१९८४ = Jia‑Zi (लाकूड उंदीर वर्ष) → नवीन ६० वर्षांच्या चक्राची सुरुवात

२०२४ = Jia‑Chen (लाकूड ड्रॅगन)

२०४४ = Jia‑Shen (लाकूड माकड)

२०८४ = Jia‑Zi पुन्हा (चक्र पूर्ण)

म्हणजे “ड्रॅगनचे वर्ष” असे म्हणताना,

त्यामागे तत्त्व + प्राणी + स्त्री‑पुरुष गुणधर्म यांचा एक पूर्ण संयोग असतो.

६० वर्षे हा आकडा पंचांगाचा योगायोग नाही. तो मानवी स्मृतीचा नैसर्गिक नियम आहे.

मानवी पिढी (generation) म्हणजे एकाच काळात जन्मलेले लोक, जे समान सामाजिक, आर्थिक, राजकीय अनुभवांतून गेलेले असतात.

साधारणपणे एका पिढीचा कालावधी: २०–२५ वर्षे असतो. ३ पिढ्या = आजी‑आजोबा → पालक → मुले: ३ × २० ≈ ६० वर्षे

म्हणजे ६० वर्षांत एक संपूर्ण कुटुंबीय अनुभव‑चक्र पूर्ण होते

६० वर्षानंतर अनुभवांची पुनरावृत्ती इतिहासात वारंवार दिसते:

युद्धे

आर्थिक मंदी

सामाजिक आंदोलन

मूलभूत मूल्यांचे चक्र

हेच कारण आहे की अनेक इतिहासकार म्हणतात: “History repeats itself every 2–3 generations. ”

भारत आणि चीनसारख्या संस्कृतींनी ६० वर्षांना पूर्ण कालचक्र मानले आहे.


लेखक : वैभव साठे, अटलांटा, अमेरिका 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक – १७ – – 

मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते ।

अकस्मात होणार होऊनि जाते ।

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥

अर्थ :

संसारात माणूस अनेक व्यर्थ चिंता करत बसतो. परंतु जे घडायचे असते ते अकस्मात घडूनच जाते. कारण प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते. हे सत्य काही लोकांच्या लक्षात येत नाही आणि ते मात्र त्याबद्दल सतत दुःख करत राहतात.

आधीच्या श्लोकात आपण गेलेल्या व्यक्तीचा जो शोक करतो, तो शोक मोह किंवा लोभातून निर्माण होतो असे समर्थ सांगतात. या श्लोकात ते पुढे एक वेगळाच पैलू उलगडतात. माणूस आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या चिंतांनी त्रस्त असतो. परंतु चिंता करून फारसा उपयोग नसतो, कारण जे घडायचे आहे ते कर्मानुसार घडणारच असते.

माणसाचे आयुष्य चिंतांनी भरलेले असते. चिंता नाही असा दिवस फार क्वचितच येतो. विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही याची चिंता असते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरी मिळेल की नाही याची काळजी वाटते. पुढे लग्न होईल की नाही, संसार कसा होईल, मुलं चांगली निघतील का, म्हातारपणी आपली काळजी कोण घेईल? अशा अनेक चिंता माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत सतावत असतात. या चिंतेच्या ओझ्याखाली तो आयुष्य जगत राहतो.

परंतु समर्थ सांगतात की अशा प्रकारची व्यर्थ चिंता करण्याचा काही उपयोग नाही. कारण आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या कर्मानुसारच घडत असते. आपले कर्म चांगले असेल तर त्याचे चांगले फळ मिळते, आणि दुष्कर्म केले असेल तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. बाभळीचे झाड लावून आंब्यांची अपेक्षा करणे जसे अशक्य आहे, तसेच दुष्कर्म करून चांगल्या परिणामांची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे.

महाभारतातील दुर्योधन आणि दुःशासन यांनी नीतीने वागणाऱ्या पांडवांविरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली. त्या दुष्कृत्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि अखेर महाभारताच्या युद्धात संपूर्ण कौरववंश नष्ट झाला. कर्माच्या नियमानुसार फळ मिळते याचे हे ठळक उदाहरण आहे.

आपले जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुंदर आणि अनमोल भेट आहे. या भेटीचा आपण सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, वाईटकडून चांगल्याकडे अशी आपली वाटचाल व्हायला हवी.

जीवनाला अनेकदा रंगमंचाची उपमा दिली जाते. त्या रंगमंचावर प्रत्येकाला एक भूमिका मिळालेली असते. त्या भूमिकेचे प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे सादरीकरण करणे हेच आपले कर्तव्य आहे. एखादा शिक्षक असेल तर त्याने आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असलेली व्यक्ती आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत असेल तर तेच तिचे खरे साधन आहे.

आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजेच आपला स्वधर्म आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात —

“स्वये आचरिता स्वकर्म ।

ते स्वकर्म स्वयं होई ब्रह्म ॥”

म्हणूनच माणसाने आपले कर्म उत्तम करणे आवश्यक आहे. जीवनात येणारी सुखदुःखे ही आपल्या प्रारब्धानुसारच येतात हे ज्यांच्या लक्षात येते, ते शहाणे लोक त्यांचा शांतपणे स्वीकार करतात. ते व्यर्थ चिंता करत बसत नाहीत.

परंतु जे या तत्त्वाला समजून घेत नाहीत, ते मात्र दुःख आणि खेद यांच्या गर्तेत अडकून पडतात. स्वधर्म विसरला की माणूस विकारांच्या आहारी जातो, आसक्ती वाढते आणि त्यातून निर्माण होणारी कर्मे त्याला अधिकाधिक बंधनात अडकवतात. परिणामी तो जन्ममृत्यूच्या चक्रात गुरफटत राहतो.

जर आपण खरोखरच हे मानत असू की जीवन ही परमेश्वराने दिलेली अनमोल भेट आहे, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण सुंदर उपयोग करायला हवा. आपल्या कर्तृत्वाने जीवनपथ उजळून टाकायला हवा. कर्तव्य करताना फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने कर्म करणे आणि ते परमेश्वराला अर्पण करणे हीच जगण्याची खरी रीत आहे. अन्यथा तेच कर्म बंधनकारक ठरून दुःखाला कारणीभूत होते.

स्वसंवाद : 

  • मी माझ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल खूप चिंता करतो का?
  • जे काही घडते ते माझ्या संचिताचे फळ आहे हे मी मान्य करतो का?
  • माझ्या हातातील वर्तमानकाळ मी चांगल्या कर्मासाठी वापरतो आहे का?
  • स्वधर्माचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो का?
  • कर्तव्य करताना मी फळाची अपेक्षा ठेवतो का, की निरपेक्ष भावनेने कर्म करण्याचा प्रयत्न करतो?

– – – 

श्लोक क्र. १८ – – – 

मना राघवेंवीण आशा नको रे |

मना मानवाची नको कीर्ति तू रे|

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे |

तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे|१८|

अर्थ: हे मना एका रामाशिवाय (परमेश्वराशिवाय) तू कशाचीच आशा ठेवू नकोस. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची स्तुती (कीर्ति गाऊ नकोस) करू नकोस. वेद, शास्त्रे आणि पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, त्याचेच वर्णन करणे (स्तुती करणे) योग्य (म्हणजे श्लाघ्यवाणे)आहे. कारण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तोच तुला तारू शकेल.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला आपण व्यर्थ चिंता करीत बसतो असे सांगतात. कारण होणारी गोष्ट पूर्वसंचितानुसार घडणारच असते. पण मग चिंता करायची नाही तर काय करायचे त्याचे उत्तर या श्लोकात आपल्याला मिळते. आपल्याला कोण मदत करेल? कोणाची आशा ठेवायची? कोणाची स्तुती गायची? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या श्लोकात मिळतात.

मनुष्याचा जन्मच वासनेच्या पोटी होतो. त्यामुळे वासना पूर्णपणे सोडणे सोपे नाही. परंतु ईश्वरप्राप्ती शिवाय ठेवलेल्या इतर वासना किंवा कामना दुःखाला कारणीभूत होतात. म्हणून समर्थ सांगतात की हे मना (मानवा)एका भगवंतावाचून तू दुसऱ्या कशाचीही वासना किंवा अपेक्षा ठेवू नकोस.

आपली भारतीय संस्कृती ही मुलत: अध्यात्मप्रधान आहे. ईश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे असे अध्यात्मात मानले जाते. सारी वेद, शास्त्रे आणि पुराणे परमेश्वराचे वर्णन करतात आणि परमेश्वराचा महिमा गातात.

परंतु माणसाच्या ठायी असलेल्या देहबुद्धीमुळे त्याला मानवी जीवनातच धन्यता वाटते. इतर श्रेष्ठ व्यक्तींकडे पाहून आपले जीवनही तसेच असावे असे त्याला वाटल्यास नवल नाही. समाजामध्ये लोक थोर व्यक्तींची प्रशंसा करतात. पूर्वीच्या काळी राजे लोक तर आपल्या दरबारात आपली कीर्ती गाण्यासाठी भाट ठेवत असत. आजही वरिष्ठांची खुशामत करण्याची मानसिकता समाजामध्ये रूढ झाली आहे. आपला फायदा करून घेण्यासाठी किंवा स्वार्थ साधण्यासाठी लोक वरिष्ठांची स्तुती करताना दिसतात. अशा प्रकारच्या स्तुतीने ऐहिक जीवनात थोडाफार फायदा होतही असेल. पण त्याला स्वाभिमानाने जगणे म्हणता येणार नाही. ही एक प्रकारची लाचारीच आहे. दुसऱ्याची स्तुती जरूर करावी. गुणग्राहकता आपल्याजवळ असावी परंतु ती स्वार्थापोटी नसावी. लोकांची मानसिकता अशी असते की ते स्वार्थापोटी आज आपली स्तुती करतील परंतु उद्या त्यांचा स्वार्थ साधत नाही असे दिसले की ते निंदा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

परंतु संकटकाळी किंवा अंतिम प्रसंगी श्रीमंत माणसे, वरिष्ठ लोक किंवा नातेवाईक यापैकी कोणीही उपयोगी पडत नाही. मोक्षमार्गावर वाटचाल करणे, आत्मदर्शन किंवा परमेश्वराची प्राप्ती करून घेणे हे जे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे, अशा प्रसंगी केवळ परमेश्वराचेच सहाय्य आपल्याला होत असते. त्याच्याच कृपेने जीवनातील संकटांना आपण धैर्याने तोंड देऊ शकतो.

महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना परिचित आहे. या कठीण प्रसंगातून आपल्याला सोडवतील म्हणून द्रौपदीने सुरुवातीला दरबारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा पितामह भीष्म, द्रोणाचार्य आदींना विनंती केली. तिचे पती असलेल्या पांडवांची देखील तिला आशा होती. परंतु यापैकी तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. तेव्हा तिने आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तोच तिच्या मदतीला धावून आला. म्हणून आशा करायची ती परमेश्वराची.

हे मानवा, स्तुती करायचीच असेल तर संत, सद्गुरु किंवा परमेश्वराची कर. त्यांचेच गुणगान गा असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी त्या परमेश्वराची स्तुती गुणांचे वर्णन केले आहेत. समर्थ ज्या राघवाची स्तुती करायला आपल्याला सांगतात, तो राघव म्हणजे परमेश्वर सर्व सृष्टीत विराजमान आहे. राघव हा शब्दच किती सुंदर आहे! राघव म्हणजे चैतन्य! हे चैतन्य सर्व चराचरात भरलेले आहे. चैतन्याची अनेक रूपे असतात. त्याला नावेही वेगवेगळी असतात. पण मूळ चैतन्य एकच असते. ते आपल्याला पाहता आले पाहिजे. आपण त्याचेच गुणगान करावे. तोच आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात मी खरोखर कोणावर आशा ठेवतो — माणसांवर की परमेश्वरावर?
  • स्वार्थ साधण्यासाठी मी कधी कोणाची खुशामत तर करत नाही ना?
  • दुसऱ्याच्या गुणांची प्रशंसा करताना माझ्या मनात स्वार्थ तर नसतो ना?
  • माझ्या दैनंदिन जीवनात परमेश्वराचे स्मरण किंवा स्तवन याला किती स्थान आहे?
  • ऐहिक यशापेक्षा आत्मिक प्रगती अधिक महत्त्वाची आहे हे मला खरोखर पटते का? (क्रमशः)

 

– क्रमशः श्लोक १७ आणि १८. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

परंपरा, प्रतीक आणि स्वाभिमानाची उंच पताका

आकाशाला स्पर्शणारा अभिमान

… भारताचा राष्ट्रीय ध्वज — केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी निळे अशोकचक्र.

आपण त्याला तिरंगा म्हणतो; पण रंगांच्या दृष्टीने तो खरे तर चौरंगा आहे.

अशोकचक्रांकित हा ध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची जणू देवताच.

तो भारताच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्म्याचा तेजस्वी प्रतीक आहे.

निरभ्र निळ्या आकाशात डौलाने फडकणारा ध्वज पाहिला की मन भरून येते; छाती अभिमानाने फुलते आणि मस्तक आदराने आपोआप झुकते.

ध्वज म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नसतो.

तो असतो राष्ट्राच्या अस्मितेचा उंचावलेला स्वर.

रणांगणातील पताका

भगवाध्वज आणि जरिपटका

महाराष्ट्राला शिवछत्रपतींच्या परंपरेतून लाभलेला जरिपटका हा स्वाभिमानाचा ध्वज.

पूर्वी युद्धभूमीवर सैन्याच्या अग्रेसर रेषेत हा भगवा झेंडा घेऊन धावणाऱ्या वीराला “बिनीचा सरदार” किंवा “बिनीचा स्वार” म्हणत. याच शब्दावरून बिनिवाले हे आडनाव प्रचलित झाले.

रणांगणावर ध्वज फडकत आहे, याचा अर्थ सैन्य अजून पराभूत झालेले नाही.

बिनीचा स्वार पडला तरी दुसरा वीर पुढे सरसावून ध्वज उचलत असे.

कारण फडकता ध्वज म्हणजे सैन्याचा आत्मसन्मान.

ध्वजाचा तात्त्विक अर्थ

ध्वज म्हणजे उपस्थितीची खूण.

अग्नीला धूम्रध्वज असे म्हणतात, कारण —

“यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र अग्निः”

जिथे धूर दिसतो, तिथे अग्नी असतो.

ध्वज म्हणजे अस्तित्वाची घोषणा.

रामायणातील ध्वज

रामायणकाळात इक्ष्वाकू वंशाच्या ध्वजावर कोविदार (कांचन) वृक्षाचे चिन्ह होते.

अयोध्येतील नव्या राममंदिरावरही याच परंपरेचा ध्वज फडकतो.

रघुवंशाचा ध्वज रक्तारुण वर्णाचा, कमळासारखा लालसर होता आणि त्यावर सूर्यज्वालेसारखी शमीपत्रे होती. म्हणूनच रामाचा ध्वज अरुणध्वज म्हणून ओळखला जातो.

रावणाच्या ध्वजावर मानवी कवटीचे चिन्ह होते.

कुंभकर्णाच्या ध्वजावर शेषनाग,

मेघनादाच्या ध्वजावर सिंह,

तर प्रहस्ताच्या ध्वजावर सर्प.

या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या सामर्थ्याची जाहीर घोषणा.

महाभारतातील ध्वज

महाभारतातील प्रत्येक योद्ध्याची स्वतःची ध्वजपताका होती.

श्रीकृष्ण — गरुडध्वज

अर्जुन — कपिध्वज (हनुमान)

युधिष्ठिर — चंद्र-नक्षत्र

सहदेव — हंस

नकुल — सुवर्णपृष्ठी हरिण

भीष्म — ताडपत्र व तारे

द्रोण — वेदी आणि धनुष्य

कृपाचार्य — वृषभ

दुर्योधन — नाग

घटोत्कच — गिधाड

या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख.

ध्वजात दडलेल्या कथा

जगातील प्रत्येक राष्ट्राच्या ध्वजात त्याच्या इतिहासाची एखादी आठवण किंवा शौर्यकथा दडलेली असते.

– – अमेरिकेच्या ध्वजावरील ५० तारे तेथील राज्यांचे प्रतीक आहेत, तर १३ पट्टे त्यांच्या प्रारंभीच्या वसाहतींची स्मृती जपतात.

– – दक्षिण गोलार्धातील अनेक देशांच्या झेंड्यांवर सदर्न क्रॉस हा तारकासमूह दिसतो. भारतीय २७ नक्षत्रांमध्ये याचा समावेश नसला तरी पुराणकथांमध्ये त्यालाच स्वर्ग आणि मृत्युलोक यांच्या मध्ये लटकणारा त्रिशंकू असे संबोधले जाते.

– – ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, सामोआ आणि ब्राझील यांच्या ध्वजांवर हा तारकासमूह दिसतो.

काही ध्वजांची प्रतीके

जपानचा ध्वज

पांढऱ्या पार्श्वभूमीवरचा लाल सूर्य — उगवत्या सूर्याच्या देशाची ओळख.

चीनचा ध्वज

लाल पार्श्वभूमीवर एक मोठा आणि चार छोटे तारे — क्रांती आणि समाजरचनेचे प्रतीक.

नेपाळचा ध्वज

दोन त्रिकोणांचा असलेला जगातील एकमेव राष्ट्रीय ध्वज — हिमालयाची प्रतीकात्मक आकृती.

जर्मनीच्या ध्वजात तीन आडवे पट्टे आहेत : काळा – लाल – सोनेरी (पिवळसर).

रंगांचा अर्थ:

काळा – दडपशाही व संघर्षातून उभा राहिलेला इतिहास

लाल – स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान व क्रांतीची भावना

सोनेरी – स्वातंत्र्य, एकता आणि उज्ज्वल भविष्य.

श्रीलंकेचा ध्वज

तलवार धारण केलेला सिंह आणि चार पिंपळाची पाने — सिंहली परंपरा आणि बौद्ध मूल्यांचे प्रतीक.

इतर ध्वज

अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्थाचे सुद्धा आपापले ध्वज असतात. त्यांचे कार्यकर्ते हे ध्वज घेऊन अभिमानाने मिरवतात.

ब्रह्मध्वज आणि गुढी

—- नवनिर्मितीची पताका

ब्रह्मध्वज म्हणजे ब्रह्मतत्त्व, ज्ञान किंवा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे प्रतीक असलेला ध्वज.

लोकपरंपरेत याच ब्रह्मध्वजाचे रूप म्हणजे गुढी.

म्हणजे ब्रह्मध्वज हा तात्त्विक शब्द, आणि गुढी हा लोकजीवनातील व्यवहारातील शब्द.

गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी भारतीयांची श्रद्धा आहे. या सृष्टीउदयानाच्या आनंदाप्रीत्यर्थ ब्रह्मध्वज उभारण्याची प्रथा आहे.

वसंत ऋतू — नवनिर्मितीचा काळ.

झाडांना पालवी फुटते, फुले उमलतात.

सृष्टीच्या या नवउदयानिमित्त घरासमोर उभारली जाणारी गुढी म्हणजे नवनिर्मितीचा उत्सव.

समारोप

उंचावलेली पताका

ध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसतो.

तो असतो इतिहासाची आठवण, संस्कृतीची ओळख आणि स्वाभिमानाचा उंचावलेला स्वर.

रणांगणात तो शौर्याची शपथ असतो.

राष्ट्रात तो अभिमानाची ओळख असतो.

आणि गुढीच्या रूपाने तो नवनिर्मितीचा मंगल संदेश देत असतो.

म्हणूनच नववर्षाच्या या पवित्र क्षणी आपण ब्रह्मध्वजाला वंदन करतो —

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।

प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ॥

 

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४८

‘पराभव’ नाम संवत्सर

विक्रम संवत् २०८२–८३

सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

 

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद महाराज की जय!!!

नारद भक्ति सूत्रे ५७

उत्तरस्मादुत्तरस्मात्पूर्वपूर्वा श्रेयाय भवति ||५७ ||”

अर्थ:

भक्तीच्या या तीन प्रकारांपैकी आधी सांगितलेले प्रकार हे नंतरच्या प्रकारांपेक्षा उत्तरोत्तर जास्त कल्याणकारी आहेत.

विवेचन:

तामस गुणी भक्ति, राजस गुणी भक्ति आणि सात्विक भक्ति याबद्दल आपण मागील सूत्रात थोडा विचार केलेला आहे. तरी आपण काही मुद्दे पाहू.

तमोगुणी साधकाची भक्ति सकाम असते. तो अर्थार्थी असतो. प्रपंच आणि प्रपंचातील वस्तूंच्या भोगांचे त्याला आकर्षण असते. अनेक सुखसुविधा अर्थात उत्तम भोग भोगता यावेत म्हणून तो ईश्वराकडे वळतो.

रजोगुणी भक्तास प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पाहिजे असतात. प्रपंचातील आणि परमार्थ मार्गातील विविध अनुभवांनी त्याची थोडी तयारी झालेली असते. जग नश्वर आहे, त्यातील सूखे खऱ्या अर्थांनी आपल्याला समाधान देऊ शकणार नाहीत याची अल्पशी अनुभूती त्याला आलेली असते. त्यामुळे भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न तो करीत असतो.

सत्वगुणी साधकाची भक्ति निष्काम असते. त्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागलेली असते.

असा भक्त जरी प्रपंचात रहात असला तरी त्याची प्रपंचाची आसक्ती सुटलेली असते, परिणामी त्याची अंगी खरे वैराग्य येते.

याचा थोडा वेगळा विचार केला तर या तीन पायऱ्या आहेत असे आपल्या लक्षात येईल.

१. जागे होणे म्हणजे जीवनाचे ध्येय निश्चित करणे.

२. ध्येय प्राप्तीसाठी कार्य करणे. त्यासाठी आवश्यक गोष्टींचा अंगिकार आणि त्याज्य गोष्टींचा बहिष्कार. इथे साधकाला आपल्या दोषांची जाणीव होते.

३. साधक आपले दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करू लागतो.

आपला देश कृषीप्रधान आहे. वरील तीन गोष्टी करणे म्हणजे शेतातील तण, खराब गवत आणि कचरा बाहेर काढून टाकणं. यातून शेताची अर्थात मनरूपी शेताची मशागत होऊन त्यातून चित्त शुद्ध होऊ लागते. चित्तशुद्धी होणे हा परमार्थ मार्गातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गौणी भक्तीतून साधक मुख्य भक्तीकडे जाऊ लागतो, त्याची साधना हळूहळू उच्च पातळीवर जाऊ लागते…!

जय जय रघुवीर समर्थ 

— 

नारद भक्ति सूत्रे ५८

अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ||५८||”

अर्थ : इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग जास्त सुलभ आहे.

विवेचन:

भगवंत प्राप्तीच्या इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग अधिक सुलभ आहे असे सर्व संत आपल्याला सांगतात. याचा विचार आपण या आधी पंचविसाव्या सूत्रात केलेला आहे. या सूत्रात आपण भक्तिमार्गाचे सोपेपण अर्थात सुलभता पाहणार आहोत.

योगमार्गात मनुष्याला अनेक गोष्टी अत्यंतिक काटेकोरपणे कराव्या लागतात. कारण त्या मार्गात तसेच विधिविधान आहे असे आपल्या लक्षात येईल. योगमार्गात आधी शरीरावर ताबा मिळवून मग मनावर ताबा मिळवावा लागतो. त्यासाठी त्याला युक्त आहार विहार करावा लागतो. भगवंत गीतेत म्हणतात –  

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि |

मोजूनि करितो त्यास योग हा दुःख नाशन||”

(गीताई ०६. १७)

सध्याच्या काळात आहार, विहार आणि यथायोग्य झोप घ्यायला मिळणे शक्य आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे सामान्य साधकाला योगमार्ग कठीण ठरू शकतो.

आधी कथन केल्याप्रमाणे मनुष्य कर्म सुद्धा योग म्हणून करू शकतोच असे नाही. तर तो बरेच वेळा करून टाकत असतो, उरकत असतो. अशी कर्म करून मुक्ति मिळू शकेल का? अर्थात सामान्य मनुष्याला, साधकाला कर्म करणे साधू शकते, पण *कर्मयोग* साधणे मात्र जिकिरीचे ठरते.

ज्ञान मार्ग हा बुद्धीचा मार्ग आहे. याची सुरुवात साधन चतुष्ट्याने होते. साधक वैराग्यशील असावा लागतो. अनेक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास अंगी मुरावा लागतो. इतके सगळे करून ज्ञानप्राप्ती झाली तर त्याचा अभिमान होण्याची शक्यता जास्त असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत सांगतात की भगवंताला अहंकार बिल्कुल चालत नाही.

भक्तीमार्ग हा सर्व सामान्य माणसांसाठी अगदी राजमार्गासारखा आहे. या मार्गाला अर्थात भक्तीला राजविद्या असेही म्हणतात. विद्या, संपत्ती, कुळ, वर्णाश्रम, वेदाध्ययन, कठोर तपश्चर्या इत्यादींची भक्तीला अपेक्षा नाही.

सर्वसामान्य मनुष्य आपल्या जवळच्या नातेवाइकांवर, आपल्या आवडत्या वस्तूंवर प्रेम करीत असतो. ते प्रेम कधी स्वार्थी असते तर कधी निःस्वार्थी. प्रेम म्हणजे काय हे दाखवता येत नसले तरी त्या प्रेमाची अनुभूती कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाने घेतलेली असते. हेच प्रेम भगवंताकडे वळवले की त्याचे भक्तित रूपांतर होते.

संत तुकाराम महाराज या प्रेमाने भगवंत कसा जवळ येतो याचे वर्णन पुढील अभंगात करतात. — – 

*”प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥२॥ सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥३॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥४॥”*

(अभंग क्रमांक 432, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५९

प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात् (च) ||”

अर्थ : भक्ति कोणत्याही प्रमाणावर म्हणजे पुराव्यावर अवलंबून नाही तर ती स्वतः सिद्ध आहे, म्हणून ती इतर मार्गांपेक्षा सोपी आहे.

विवेचन : कर्मयोग, ज्ञानयोग यांच्याशी तुलना करताना नारद मुनी २६ व्या आणि ३० व्या सूत्रांत याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये भक्ति स्वयं फलप्रभा आहे असे म्हटले आहे. अर्थात तिला कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही.

प्रमा म्हणजे ज्ञान. ज्यामुळे ज्ञान होते, ते प्रमाण. प्रमाणा मध्ये ज्ञानाचा उगम होतो. भारतीय तर्कशास्त्रात तीन प्रमाण मानली गेली आहेत.

१. प्रत्यक्ष

२. अनुमान

३. शब्द किंवा आप्तवाक्य

  1. इंद्रियांना अनुभवाला येणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. (Perception)
  2. निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढणे म्हणजे अनुमान.
  3. ज्याच्यावर आपला विश्वास आहे, जो आपला हितचिंतक आहे, निःस्वार्थी आहे, त्याचे म्हणणं आपण मान्य करतो. खरे मानतो, ते आप्त वाक्य.

परमार्थ मार्गात जर कर्ममार्ग, ज्ञानयोग अथवा योगमार्गाने जायचे असेल त्यासाठी किमान त्या त्या विषयाचे प्राविण्य अथवा पात्रता (अर्हता) अंगी येणे गरजेचे ठरते.

याउलट भक्तिमार्गात कसलीच लौकिक पात्रता लागत नाही. अनेक संत निरक्षर होते, अनेक संत श्रीमंत होते, अनेक संत अतिशय गरीब होते, काही संतांनी एका नामस्मरणाशिवाय कोणतेही साधन केलेलं नाही. भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला आला, अनेक स्त्री संत आहेत. रामाच्या प्रमुख भक्तांपैकी विभीषण राक्षस, हनुमंत वानर तर शबरी वनवासी होती, पण तिघांनी आपापल्या परीने भक्ति करून रामाची प्राप्ती करून घेतली. रामाने तर हनुमतांचा भरतासारखा भाऊ म्हणून गौरव केला.

ज्याप्रमाणे मातेला आपल्या वात्सल्याचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही, त्याप्रमाणे भक्ताला आपल्या भक्तीचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ६०

शान्तिरूपात् परमानंदरूपाच्च ||६०||”

अर्थ : भक्तीमध्ये स्वभावतः शांति असल्याने आणि ती अपार आनंद रूप असल्यामुळे ती इतर साधनांपेक्षा सुलभ आहे.

विवेचन : सर्वसामान्य मनुष्य आपल्या आयुष्यात कधी प्रयत्नाने तर कधी प्रारब्धाने अनेक गोष्टी मिळवतो. पण मनःशांती मिळवणं त्याला जमतेच असे नाही.

बालपणी त्याला नवनवीन खेळणी मिळाली की सुखशांती मिळेल असे वाटते, थोडा मोठा झाला की त्याला रंगीबेरंगी कपडे, चैनीच्या वस्तू मिळाल्या की सुखशांती मिळेल असे वाटते, मग ही मालिका संपता संपत नाही आणि मनुष्याला शांती लाभत नाही…

अनुदिनी अनुतापें तापलो…! “ अशी त्याची स्थिती होऊन जाते. याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने कमीअधिक प्रमाणात नक्की घेतला असेल.

साधक भक्तिमार्गात लागला की मात्र त्याला शांतीचा लाभ होऊ लागतो. “जितकी भक्ति तितकी प्राप्ति” या न्यायाने तो जितका भक्ति मध्ये रमतो, तितका तो मनाने शांती अनुभवू लागतो. भक्ति म्हणजे शीतगृह असे म्हटले तरी वावगे होऊ नये. तिथे गेले की कोणी कसाही असो, त्याला शांती मिळाल्याशिवाय रहात नाही. भक्तिसाधना दृढ होऊ लागली की साधक निःशंक आणि निर्धास्त होऊ लागतो. आपली काळजी घेणारे, आपल्याला खंबीर आधार देणारे आपले सद्गुरू आहेत, याची त्याला खात्री पटते. साधनेच्या पुढील पडावात त्याच्या लक्षात येते की सर्व काही भगवंतच करतो. आपल्या हातात काहीच नाही आणि भगवंत माझ्या भल्या साठीच सर्व काही करीत आहे, अशी त्याची धारणा होऊ लागते. त्यामुळे तो तटस्थपणे भगवंताची लिला पाहू लागतो. मग त्याचा आनंद, त्याचे समाधान, त्याची शांती कधीही भंग पावत नाही. संत तुकाराम महाराज याचे वर्णन पुढील अभंगात करतात.

आनंदाचे डोही आनंदतरंग |

आनंदचि अंग आनंदाचे || धृ. ||

*

काय सांगों जालें कांहीचियाबाई 

पुढें चाली नाहीं आवडीनें || ||

*

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा |

तेथिचा जिव्हाळा तेथें बिंबे || ||

*

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा |

अनुभव सरिसा मुखा आला || ||

(अभंग क्रमांक २५८२, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ

– भक्ती सूत्र क्र. ५७ / ५८ / ५९ / ६० 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares