मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माणुसकीची अनोखी गोष्ट! – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

माणुसकीची अनोखी गोष्ट! – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

माणुसकीची अनोखी गोष्ट!

 – – “ एका चिमणीसाठी ‘न्यायालय’ रस्त्यावर आलं! “

“जिथे जीव वाचवण्याची जिद्द असते, तिथे कायद्याचे दरवाजेही माणुसकीसाठी उघडले जातात! ” केरळच्या उल्लिकलमध्ये एका छोट्याशा चिमणीने संपूर्ण प्रशासनाला कसं कामाला लावलं, ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट नक्की वाचा.

८ एप्रिल रोजी मनोज कुमार नावाच्या मिस्त्रीने पाहिलं की, एका बंद कपड्याच्या दुकानात एक चिमणी अडकली आहे. एका छोट्या पाईपमधून ती आत शिरली, पण बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नव्हता. काचेवर चोच मारून तिचे पंख थकत चालले होते.

दुकान एका मालमत्ता वादामुळे कोर्टाच्या आदेशाने ‘सील’ होतं. दुकान उघडण्याचा अधिकार कोणालाच नव्हता. अग्निशमन दल, गाव अधिकारी आणि अगदी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, पण कायद्याचं उल्लंघन कसं करणार?

ऑटो चालक, दुकानदार आणि गावकऱ्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या छोट्या छिद्रातून चिमणीसाठी दाणे आणि पाणी आत सोडलं, जेणेकरून ती जिवंत राहील. ३ दिवस गावचा जीव टांगणीला होता.

जेव्हा प्रकरण गंभीर झालं, तेव्हा गावकऱ्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जिल्हा न्यायाधीश के. टी. निसार अहमद स्वतः त्या दुकानापाशी पोहोचले आणि माणुसकीच्या नात्याने दुकान उघडण्याची विशेष परवानगी दिली!

अखेर ती उडाली… : १० एप्रिल रोजी दुकान उघडलं आणि तीन दिवसांच्या संघर्षांनंतर ती चिमणी मोकळ्या आकाशात झेपावली. गावच्या आनंदाला पारावार उरला नाही!

एका नगण्य वाटणाऱ्या चिमणीसाठी जेव्हा संपूर्ण गाव आणि न्यायव्यवस्था एकत्र येते, तेव्हा समजतं की माणुसकी अजून मेलेली नाही. ही गोष्ट आपल्याला शिकवते की, प्रत्येक सजीव महत्त्वाचा आहे!

“एका चिमणीचा जीव वाचवण्यासाठी धावून आलेल्या या गावकऱ्यांसाठी आणि संवेदनशील न्यायाधीशांसाठी कमेंटमध्ये एक ‘Heart’ नक्की द्या! माणुसकीच्या या महान कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ” 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “धर्मसंकट!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “धर्मसंकट!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

सुभेदार.. – मेजर सेंगर साहेब – कारगिल युद्धातील विजयाचे प्रातिनिधिक चित्र

मेजर बाळू मोहारे

“ब्रावो, तुम नीचे चले जाव… यह मेरा हुकुम है! ” 

मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे… हे एवढं १९५ मीटर्सचं अंतर चढून गेलं… दोन रात्रींत की… भारतीय सैन्याचे शूर जवान पाकिस्तानी खंदकांमध्ये घुसून हाहा:कार माजवणार आणि शत्रूला तिथून हुसकावून लावणार हे निश्चित होतं… ही सैन्यचौकी परत भारताच्या ताब्यात येणार हेही निश्चित होतं. आणि असं असताना सर्वांत पुढे असणा-या सैनिकाला मोहिमेचे प्रमुख लष्करी अधिकारी आज्ञा देत आहेत… माघारी फिर!

 “नाही, साहेब! मी माघारी नाही जाणार मोहिम अर्धवट सोडून! ” ब्रावो निर्धाराने म्हणाला!

 तो पर्वत त्याच्या मागील बाजूने पाच हजार फूट उंच वर चढून जायचं होतं. खरं तर पुढच्या बाजूने चढत जाणे सोपे आणि कमी वेळ घेणारं होतं… पण या बाजूने वर चढण्याचं धाडस करणं म्हणजे मरणाला स्वत: हाक मारण्यासारखं! कारण कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांच्या वेशात घुसखोरी करून भारताची काही ठिकाणं काबीज करून ठेवलेली होती. अनेक तरुण वीरांच्या प्राणांची बलिदाने देत देत ही सर्व ठिकाणं पुन्हा हस्तगत करण्याची मोहीम सुरु होती. या ठिकाणांपैकी हा पर्वत एक अतिशय अवघड आणि उंच पर्वत होता. शत्रू पर्वताच्या त्या उंच शिखरावर खंदक बनवून बसला होता.. आणि शत्रूच्या सैनिकांची संख्या होती दोनशेपेक्षा अधिक. आणि शस्त्रसज्जता खूप आधी, नियोजनपूर्वक करून ठेवलेली होती. उंचीवर असल्याचा फायदा घेत पाकिस्तान वरून भारतीय फौजांवर थेट आणि अचूक गोळीबार करू शकत होता. आणि म्हणूनच ही पोस्ट पाकिस्तानच्या हातून परत हिसकावून घेणं अनिवार्य झालं होतं!

 मेजर साहेबांनी निवडक वीस जवान सोबत घेतले. योजना तयार होतीच. पण योजना कागदावर जेवढी सोपी वाटत होती तेवढीच अंमलात आणायला महाकठीण. या बाजूने कधीच कुणी वर चढून येऊ शकणार नाही, अशी खुद्द शत्रूचीच खात्री होती. कारण, चढण भयावह सरळसोट. त्यात बर्फ. पाय ठेवण्यात किंचित चूक म्हणजे हजारो फूट खाली कोसळून मृत्यू ठरलेला. इथून वर चढण्याचा विचार कोण करेल?

 हा विचारच नव्हे तर कृतीही करू शकणारी एक सेना जगात आहे… भारताची… हिंद की सेना! एक प्रचंड वळसा घेत सेना निघाली. प्रत्येकाच्या खांद्यावर जगण्यासाठी, झोपण्यासाठी आणि लढण्यासाठीचं सारं अत्यावश्यक साहित्य… वजन खूप.. किमान चाळीस किलो तर निश्चित! एखादा ग्राम जरी वजन कमी नेता यावं म्हणून खाद्यपदार्थांची वेष्टने सुद्धा काढून टाकलेली होती… कारण शरीर त्याच्यावर लादलेल्या प्रत्येक ग्रामचा हिशेब मागत राहतं चालताना, डोंगर चढताना. पायांत खास बर्फातले बूट… बर्फातून वाट काढायची होती… आणि विरळ हवेतील प्राणवायू शक्ती लावून शरीरात ओढून घ्यायचा होता.

 सारा प्रवास रात्रीच्या अंधारात… तशी चंद्रप्रकाशाची थोडीसी सोबत मिळायची पण ती थोडीशीच. चालताना चंद्रप्रकाशही धोक्याचाच होता. वरून जर शत्रूने खाली पाहिले आणि त्याला हालचाल दिसली तर प्राण वाचणार नाहीत असा गोळीबार होणार. दिवसा चालण्याचा प्रश्नच नव्हता. दिवस उजाडू लागला की पांढ-या रंगाचा पोंचू म्हणजे पावसाळ्यात घालतात तसा कोट अंगावर घ्यायचा आणि काहीही हालचाल न करता बर्फात पडून राहायचं… बर्फ मरणाचं थंड… तापमान दर्शवणारा पारा खाली खाली सरकतो आहे. लपण्यासाठी आडोसा कुठेच नाही… सर्वजण जमेल तिथे झोपून जात… पण झोप केवळ म्हणायला… दिवसभर वेळ घालवण्यासाठी गप्पा आणि हास्यविनोद… दबक्या आवाजातले! मोहिमेच्या मुख्य दोन-तीन जणांनी तर ठरवून टाकलं… पुढे आयुष्यात याच जागी यायचं आणि दिवस असाच काढायचा! मरणाच्या वाटेवर चालत असताना भविष्यकाळाचा विचार केवळ शूरच करू जाणे! तसं मोहिमेवर निघताना कमांडर साहेबांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रिय व्यक्तीच्या नावे एक पत्र लिहून द्यायला सांगितलं होतं. जो कुणी मोहिमेवरून परतू शकणार नाही, त्याच्या घराच्या पत्त्यावर हे पत्र पोहोचवले जाणार होतं!

 रात्रीचे चालणं आणि दिवसा बर्फात एखाद्या दगडासारखं पडून राहणं… असं पाच-सहा दिवस चाललं. मुख्य पर्वत लागला तेंव्हा एका रात्रीत शे-सव्वाशे मीटर्सच प्रवास होई… पुढे चालणारे… नव्हे बर्फाच्या पहाडाला स्वत:चं शरीर चिकटवून वर वर जाणारे दोन जवान. अत्यंत अनुभवी आणि कुशल. त्या पर्वतीय भागाची खडानखडा माहिती असलेले जुने जवान. कमरेला दोर. एका हातात टोकदार कुदळ-कु-हाड. खांद्याच्या थोडंसं वर बर्फात कु-हाड टोचायची… मग दुस-या हातातली कु-हाड टोचायची… त्या कु-हाडीवर शरीराचं वजन पेलायचं… एक पाय खालच्या किंचितशा कपारीवर टेकवायचा… पहाडाच्या छातीत खिळा ठोकायचा… त्यात दोर ओवायचा… दोर खाली सोडायचा… त्या दोराला धरून खाली थांबलेले सैनिक वर चढणार… असे एक पाऊल वर टाकायचे म्हणजे घरच्या सपाट बागेत पंधरा मिनिटे सलग फावडे मारण्याइतके श्रम. कोपरापासून हात थंडीने आकडून जायचे. म्हणून एका वेळी एकाने एकएकदा दोर लावण्यासाठी वर जायचे… असे दोघे जण आळीपाळीने हे काम पार पाडीत होते… अजून वरून शत्रूने पाहिले नव्हते! या प्रवासात किती विश्रांती मिळाली असेल? काय खाल्ले असेल? शरीरधर्म कसा पार पाडला असेल? कुटुंबियांची किती आठवण आली असेल? शेवटच्या पत्रात काय लिहिलं असेल? शत्रू संख्येने किती आहे हे माहीत नाही… मोहिमेचा शेवट कसा होईल हे ठाऊक नाही! पण सैनिकांची पावलं थबकली नव्हती!

 वाटेतल्या एका विशिष्ट जागी जवळचं इतर साहित्य ठेवलं गेलं… कारण ते घेऊन वर चढणं कठीण जात होतं. दोर लावून झाला की परत यायचं आणि हे साहित्य सोबत आणण्यासाठी जोडी जोडीने जायचं आणि यायचं. हे अंतर सुमारे दीडशे मीटर्स होतं. एकेदिवशी हे सामान परत आणायला गेलेल्या सैनिकांच्या जोडीच्या हालचाली शत्रूने टिपल्या… त्यांना आपले सैनिक दिसले नाहीत… पण एके ठिकाणी काही खुणा दिसल्या असाव्यात… त्यांनी त्या जागी बॉम्बगोळे टाकले. ते दोघेही सैनिक जबर जखमी झालेच असावेत!

 आता पुढे आलेले अधिकारी आणि एक डॉक्टर त्यांच्या B. F. N. A. (Battle Filed Nursing Assistant) सह मागे पळत निघाले… बर्फात पळणं म्हणजे जमेल तेवढं वेगात चालणं. तेवढ्यात ते दोघे सैनिक यांच्याकडेच येताना दिसले… पुढे असणा-या सैनिकाच्या हातातून रक्ताची धार लागलेली होती.. दुसरा सैनिक त्याच्या काही पावलं मागे होता… डॉक्टर पुढे झाले आणि त्या सैनिकाचा हात हातात घेऊ लागले… तेवढ्यात त्या सैनिकाने डॉक्टरांना जोरात मागे ढकलले… आणि म्हणाला… ”साहब… पिछे वाले मेरे बडी को देखो… उसके सिर में घाव हुआ है! ”

डॉक्टर आणि नर्सिंग असिस्टंट मागे धावले… बॉम्बचा एक तुकडा त्या सैनिकाच्या डोक्याला खोलवर जखम करून गेला होता… रक्त वाहत होतं… त्याही गडबडीत नर्सिंग असिस्टंटने त्या सैनिकाच्या डोक्यावरचे त्या जखमेवरचे केस काढले… आणि एखाद्या सुसज्ज ऑपरेशन थिएटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स घालतात तसे अचूक, नीटस टाके घातले… त्यामुळेच त्या सैनिकाचे प्राण वाचणार होते. सैनिकांनाच नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते… रक्तस्राव थांबवणे, रुग्णाला स्थिर करणे, उपचारासाठी तिथून हलवणे अशी कौशल्ये सैनिकांना अवगत असतात. सफाईदारपणे रायफलचे ट्रिगर्स दाबणारी खडबडीत बोटं एखाद्या विणकर पक्ष्यासारखे नाजूक, अचूक टाके घालतात हे विशेषच म्हणावे लागेल.

 आता केवळ १९५ मीटर्स अंतर उरलं… ते चढून गेलं की थोडी सपाट जागा येईल. तिथं शत्रूचे खंदक असतील… शत्रू आरामात खंदकाच्या खोलीत खोलवर बसून गोळीबार करीत असेल… आणि आपण त्यांच्यावर तुटून पडायचं!

 शेजारच्या पहाडांवरून आपले इतर सैनिक आपल्या या बहादरांचा प्रवास पाहू शकत होते… श्वास रोखून. शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठी आपल्या तोफा खालून वर मारा करीत होत्याच पुढच्या दिशेने… यांना मागून वर चढता यावं अशासाठी ही योजना होती. ही शेवटची चढण चढायला आरंभ करण्याच्या वेळी, म्हणजे अंधार पडायच्या बेतात असताना या मोहिमेच्या प्रमुखाला वरिष्ठ पातळीवरून वायरलेस मेसेज आला… ”ब्रावोला परत पाठवून द्या! त्याच्या घरी आणिबाणीची वैद्यकीय परिस्थिती उदभवली आहे. त्याचे घरी असणे अत्यावश्यक आहे! ”

 ब्रावो बर्फाच्या एका कड्याखाली वर चढायला सुरुवात करण्याआधी थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून बसला होता… साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं… त्याच्या चेह-यावर नेहमीचं एक हास्य होतं… पण त्या हास्याच्या थराखाली एक पुसटशी चिंताही दिसली! सैन्यात बारा-पंधरा वर्षांची सेवा झालेला ब्राव्हो… गावाकडे कुटुंब… आई-वडील, पत्नी. आदर्श मुलगा आणि प्रेमळ पती म्हणून गावात याची ओळख. एक शल्य मात्र मनाला टोचणी लावून होतं… पदरी अपत्य नव्हतं. पत्नी दोनदा आई होण्याच्या अगदी जवळ असतानाच वैद्यकीय कारणांनी घात केला… आणि अपत्यसुख दूर गेलं.

 आणि आज मोहिमेच्या प्रमुख साहेबांना बेस वरून मेसेज आला आहे… पत्नी त्याच अवस्थेत आहे… यावेळी तिच्या जीवाला खूप धोका आहे! या मोहिमेच्या प्रमुखांसमोर एक यक्षप्रश्न उभा राहिला. मोहिम महत्त्वाची आहे… हा सैनिक महत्त्वाचा आहे… त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानेच इथवर दोर लावत लावत आपल्या दलाला सुरक्षित आणलं आहे… आता तर एक दोन रात्रीचीच चढण शिल्लक आहे! पण हा ब्रावो तर जीवाला जीव देणारा… तहान-भूक हरपून याने काम केलं आहे! आता याच्या पत्नीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा तिच्याजवळ तिच्या या निकराच्या प्रसंगी असला पाहिजे… कारण घरी म्हातारे आई-वडील… अशावेळी आपलं माणूस जवळ असावं!

 मोठ्या काळजाच्या प्रमुखाने त्याही स्थितीत एक निर्णय घेतला… ब्रावोने त्याचं काम चोख बजावलं आहे… आता आम्ही उरलेलं काम करू! ते म्हणाले, ”ब्रावो… निघ. घरच्या मार्गाला लाग. इथून खाली जाणं तुलनेने सोपे आहे… वर यायला पाच दिवस लागले… खाली जायला दोनच दिवस लागतील… सोबत एक बडी देतो… जा… वहिनीला तुझी जास्त गरज आहे! ”

 यावर ब्रावो एखाद्या लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला! ते पाहून प्रमुख अधिका-याचेही डोळे भरून आले! अंधार होऊ लागला होता… चढण सुरु करायला पाहिजे… वेळ गमवता कामा नये. पण ब्रावो काही केल्या तयार होईना… म्हणाला… ”साहेब, आपण अगदी जवळ आलोय… दोन रात्रींत पोहोचू वर. या मोहिमेत सहभागी होण्याचे भाग्य लाभावं म्हणून स्वयंस्फूर्तीने तुमच्या दलात आलो… कारण मला माहित आहे… मी डोंगर सफाईदारपणे चढू शकतो… माझा उपयोग होईल मोहिमेत! ” 

 यावर साहेब म्हणाले, ”ब्रावो, तुझी तर वार्षिक रजाही तू घेतली नव्हतीस. आता संधी आहे आणि गरजही. जा तू! ” त्यावर ब्रावो उत्तरला… ”अशा स्थितीत रजेचा विचारही मनाला शिवला नाही, साहेब! ” “हा तर माझ्या रेजिमेंटच्या इज्जतीचा सवाल आहे… नाम, नमक और निशान! ”

 “साहेब, माझ्या सोबतीने आळीपाळीने दोरी लावण्यासाठी वर चढणा-या माझ्या बडीच्याअल्फाच्या पायांना मोठ-मोठे फोड आलेत… मी त्याला सांगितलं आहे… इथून पुढची सर्व चढण मी एकटा चढेन आणि दोर लावेन! ”

 हे बोलणे सुरु असताना ज्याच्या पायांना फोड आलेले आहेत, असा त्याचा बडी, अल्फा पुढे झाला आणि त्यानेही ब्रावोची समजूत काढायला सुरुवात केली… एक एक क्षण पुढे जात होता… मोहिमेला उशीर होत होता!

 सहका-याचे वाक्य पुरे होण्याआधीच ब्रावो एखादा स्फोट व्हावा तसा ओरडून म्हणाला… ”मला मूल झालंच आणि त्याने मला विचारलं… तुम्ही तुमच्या सहका-यांना ऐन लढाईत सोडून घरी निघून का आलात? तर त्याला मी काय सांगू? ” 

 सर्वच शांत झाले… प्रत्येकाच्याच मनात हाच सवाल होता. सर्वच जण एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे सैनिक. कुटुंबांपेक्षा जास्त सहवास लाभलेले वीर. कित्येक मरणं अनुभवलेली पहाडी मनं.

 यात अर्धा पाऊण तास गेला… शेवटी प्रमुखांनी… Its an order, Bravo! असं म्हटल्यावर जड पावलांनी ब्रावो तिथून खाली जायला तयार झाला… त्यानेच लावलेल्या दोरावरून खाली खाली घसरत चालला… एखादी निर्जीव वस्तू असावी तसा!

 इकडे दोन रात्री चढण चढत चढत सैन्य वर पोहोचले… आता केवळ काही मीटर्स अंतर राहिले होते… शत्रूचे खंदक आणि आपल्या सैनिकांत… प्रमुखांनी कवर फायर साठी बेसला मेसेज दिला… तिथून मेसेज आला… नो गन फायर! युद्ध थांबवण्याचा आदेश आला होता… Cease-fire घोषित झाले होते. भारताने ऑपरेशन विजय पूर्ण केले होते. पराभूत पाकिस्तानी सैन्य त्या पर्वतावरून खाली उतरायला सुरुवातही झाली होती!

 इकडे याच वेळी ब्रावो घरी पोहोचला होता… त्याने साहेबांना मेसेज केला… ”साहेब, बाळ-बाळंतीण सुखरूप! मी बाप झालो! ” 

 घरची काळजी बाजूला ठेवत मोहिमेत सहभागी झालेला, डोंगराएवढी समस्या असतानाही डोंगर चढत राहण्यासाठी अडून बसलेला सैनिक, मोहिमेची काळजी असतानाही सहकारी सैनिकाच्या कौटुंबिक समस्येची काळजी वाहणारे कमांडिंग ऑफिसर, मोहिमेतले प्रमुख अधिकारी… या सर्वच गोष्टी अलौकिक! या सर्वांचीच जणू दैवानेच धर्म संकटातून सुटका केली होती!

(प्रस्तुत कहाणी कारगिल युद्धादरम्यान घडलेली आहे. मेजर दीपेंद्रसिंग सेंगर (सेवानिवृत्त) यांनी त्यांच्या एका भाषणात ही कथा सांगितली होती. सैनिकी पद्धतीनुसार त्यांनी त्यावेळी ब्रावो, अल्फा ही नांवे वापरली होती. ही नावे म्हणजे रेडीओ सिग्नल्स असतात. पण पुढे Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी ब्रावोच्या नावाचा उल्लेख केला आहे… सुभेदार मेजर बाळू मोहारे (निवृत्त)! आणि त्यांचे छायाचित्रसुद्धा दाखवले आहे.)

© श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शास्त्रस्तुती… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

✦ शास्त्रस्तुती… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

ज्ञान, अनुशासन आणि मुक्तीचा दिव्य प्रवास

शास्त्र म्हणजे काय

शास्त्र या शब्दाचा उगम आणि अर्थवैभव

‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.

म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—

जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र. 

 

*शास्त्राची तात्त्विक व्याख्या*

भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.

 

प्राचीन व्याख्या सांगते—

“शासनात् शंसनात् शास्त्रम्”

म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—

“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”

म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.

 

*शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप*

कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.

– – या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—

न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)

यांखेरीज—

वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु _त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे. _

 

*शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार*

भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.

शास्त्रांचा पाया उभा आहे—

श्रुति (अध्यात्मिक परंपरा)

युक्ति (तर्कबुद्धी)

अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)

शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.

म्हणूनच शास्त्र हे—

_वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे. _

 

*शास्त्र आणि विवेकबुद्धी*

शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.

ते शिकवते—

सत्य आणि असत्य यातील भेद.

नित्य आणि अनित्य यातील भेद

आत्मा आणि अनात्म याची ओळख

परंतु—

शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.

म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—

विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता

 

*शास्त्र आणि साधकाची भूमिका*

नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर

शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.

बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.

 

*कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन*

काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.

म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे

नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.

 

*शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे*

थोडक्यात—

जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.

शास्त्र हे—

जीवनाला दिशा देते

मनाला स्थैर्य देते

बुद्धीला स्पष्टता देते

 

*समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत*

शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.

शास्त्र —

अज्ञानातून ज्ञानाकडे नेते

अस्थिरतेतून स्थैर्याकडे नेते

मर्यादिततेतून अमर्यादतेकडे नेते

म्हणूनच—

शास्त्र हे नुसते वाचायचे नसते—ते जगायचे असते,

ते नुसते समजायचे नसते—ते आत्मसात करायचे असते.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆

सगुणाबाई जनार्दनराव पेशवे 

समिधाच सख्या या!! …

” मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागत? नावही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!

 आता मीच देते ओळख करून…

मी… *सगुणाबाई*! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!

सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!

गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!

पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??

तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?

पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,

दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.

तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??

असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!

पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!

आणि… आणि… पेशवाईतील…

 *पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली.!

– लेख क्र. १.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे ☆

अर्चना मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे☆

 – एक सामाजिक प्रश्न

एक काळ असा होता की, आई होताना सामाजिक, कौटुंबिक सक्ती असायची. ‘मुलगाच हवा’ हा हट्ट अनेक तरूणीना जाळणारा, विहिरीत ढकलणारा, माहेरी परत पाठवणारा, निराशा, औदासिन्य, ताणतणाव देणारा होता. मूल हवंच आणि मुलगाच हवा यामधल्या ‘च’ ने त्या काळातील मूल न होणार्‍या किंवा मुलगा न होणार्‍या तरूणींचा प्रचंड मानसिक छळ केला. त्या काळातील ‘मूल हवंच’ या विचारामागे शेतात आणि घरात राबण्यासाठी हात हवे असणे. वृद्धापकाळासाठीचा आधार तयार करणे. मृत्यूनंतर मुलाकडून अग्नी मिळाला तरच मोक्षप्राप्ती होते या कल्पनेनुसार सद्गती मिळवणे. अशी काही कारणं होती. मुलांचा सांभाळ हा सहज व्हायचा. तेव्हा एकल पालकत्व, द्विपालकत्व असा काही प्रकार नव्हता. एकत्र कुटुंबपद्धतीत मुलं हसत खेळत मोठी व्हायची. सामाजिक पालकत्व असायचं. मुलांचा खर्च एकत्रितपणे केला जायचा. त्यामुळे पालकत्व निभावताना तणाव नसायचा. मुलांची संख्या कितीही वाढली तरी फारशी अडचण नसायची. ‘ज्याने दिली चोच तो भरेल पोट’ असंही म्हटलं जायचं. मूल नसणं म्हणजे पाप होतं. शाप होता. त्यापेक्षा मुलांना जन्म देऊन सन्मानपूर्वक जगणं किंवा स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा टिकवणं यालाच महत्त्व दिलं जायचं.

काळ बदलला. मानवी संस्कृती – मानवी मूल्ये बदलली. जगण्याची व्याख्या बदलली. सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या. कर्तृत्वाने मोठ्या होऊ लागल्या. ‘मुलगी झाली तर चालेल’ हा विचार समाजात रुजायला लागला. पूर्वीचा ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव! ‘ हा आशीर्वाद मागे पडायला लागला. आताच्या जोडप्यांच्या कुटुंबाच्या उंबरठ्यावर ‘मूल नकोच’ हा शांतपणे, जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय स्तब्ध उभा आहे.

काही वर्षापूर्वी ‘मूल का नाही’ हा प्रश्न विचारला जायचा. आता ‘कशासाठी मूल हवंय’ असा प्रश्न विचारला जातो. मूल नको हा काही नगण्य लोकांचा विचार नाही. तो सामाजिक कल बनला आहे. या विचाराकडे गांभीर्याने बघणं अपेक्षित आहे.

विवाहानंतर दीप आणि निला दोघं पुण्यात स्थायिक झाले. दोघंही आय टी कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी त्यानी अजून मुलाचा विचार केलेला नाही. ते म्हणतात, “शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडणं, स्वत:चं छोटंसं घर घेणं यात १०-१२ वर्षे निघून गेली. आता बाळाचा विचार केला तर नैसर्गिकपणे गर्भधारणेत अडचणी आहेत. डाॅक्टरनी सुचवलेले इतर पर्याय शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रासदायक आहेत. त्यातूनही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतलाच तर आम्ही बाळाला वेळ देऊ शकणार नाही. त्याला पाळणाघरात ठेवणं आम्हाला पटत नाही. नातेवाईकानी आम्हाला स्वार्थी म्हटलं. जबाबदार्‍या नको आहेत असंही म्हटलं. पण आम्ही ठरवलं. लोक म्हणतात म्हणून आम्ही बाळाला जन्म देणार नाही. त्याला उत्तम असं आयुष्य आम्ही देऊ शकत नाही. तर जन्माला घालून त्याच्यावर अन्याय करण्याचा आम्हाला अधिकार नाही. म्हणून आम्ही बाळाला जन्म न देण्याचा निर्णय जबाबदारीने, दोघांच्या विचाराने जाणीवपूर्वक घेतला आहे. “

– – अशी ही पिढी.. या विषयावर जेन झी मोकळेपणाने बोलतात. त्यानी आणखी काही कारणं सांगितली.

नोकरी व्यवसायात खंड पडण्याची भीती – आर्थिक स्वावलंबनाच्या हेतूनेच प्रचंड मेहनतीने शिक्षण पूर्ण केलेलं असतं. नोकरी मिळालेली असते. त्यानंतर थोडं स्थिरस्थावर होतं न होतं तो लगेच बाळाचा विचार करू शकत नाही. नोकरीमुळे बाळाची जबाबदारी नीट पार पाडू शकत नाही. नोकरी तर सोडूच शकत नाही. कारण एकदा खंड पडला तर प्रगती खुंटेल. आणि पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी लागेल. अशी भीती या पिढीला वाटते.

आर्थिक ओझं – एक चांगला पालक होऊ शकतील की नाही याची भीती असते. उत्तम शिक्षण, उत्तम भौतिक सुखं देण्यात ते कमी पडतील असं त्याना सतत वाटत असतं. मुलांचं संगोपन हे आर्थिक ओझं वाटतं. चोवीस तास पालकत्वाची जबाबदारी पेलणं खूप कठीण आहे. या चिंतानीच पालक न होण्याचा निर्णय घेतला जातो.

दूषित पर्यावरण – स्वच्छ हवा, पाणी, अन्न मिळणं अशक्य आहे. आपण मुलाना कोणत्या प्रदूषित वातावरणात ढकलत आहोत याची जाणीव तरूणाना आहे. आम्हालाच जे मिळत नाही, ते आम्ही मुलाना कुठून देणार असाही विचार ही जोडपी करताना दिसतात.

शारीरिक – मानसिक आरोग्य – आजूबाजूचं वातावरण, शैक्षणिक ताण, मित्रांचा दबाव या सगळ्यात मुलं कितपत आरोग्यपूर्ण जगतील ही शंका येते. मुलांना निरोगी आयुष्य देणं ही जबाबदारी पालकांची असते.

उशिरा होणारी लग्नं – आजकाल लग्नाचं सर्वसाधारण वय तीस वर्षे झालं आहे. त्यानंतर गर्भधारणा किंवा प्रसूती यामधली गुंतागुंत वाढू शकते. धोका पत्करायला नको म्हणूनही अपत्यहीन राहण्याचा निर्णय घेतला जातो.

‘मुलगाच हवा’ पासून ‘मूलच नको’ हा प्रवास म्हणजे आधुनिक दर्जेदार जीवनशैली, बदलत जाणारी कौटुंबिक, सामाजिक मूल्ये आणि आर्थिक स्थैर्य याचा प्रभाव असं म्हणावं लागेल. सामाजिक नियमांची चौकट कधीच ओलांडली गेली. आता ‘पाळणा हलणं’ हा वैयक्तिक निर्णय झाला आहे. आधी आपण तर नीट जगू, मग नव्या जीवाला या जगात आणायचं की नाही ते ठरवू असं म्हणणारी ही पिढी आहे.

अपत्यप्राप्तीचा बदलता दृष्टिकोन-

पूर्वीचा काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा मुख्य उद्देश वंश वाढवणे.. हे कौटुंबिक, सामाजिक कर्तव्य आहे असं मानलं जायचं. मुलांना भविष्यातील आर्थिक आधार समजलं जायचं. तेव्हा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र कुटुंबात विभागली जायची. मातृत्व हेच स्री जीवनाचं सार्थक मानलं जायचं. अपत्यप्राप्ती न होणं हा सामाजिक अपमान होता. लग्नानंतर मूल होणं नैसर्गिक पण अनिवार्य होतं. अपत्याकडे म्हातारपणाची काठी म्हणजेच आधार म्हणून बघितलं जायचं.

आधुनिक काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा उद्देश हा वैयक्तिक आनंद मानला जातो. मूल होऊ देण्याचा निर्णय हा स्वेच्छेने घेतलेला असतो. जबाबदारीची जाणीव असते. मुलांच्या संगोपनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. संगोपनाचा खर्च मोठा असतो. विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाचा ताण पालकांवर असतो. पालक स्वत:चं करिअर, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याला महत्त्व देतात. स्वेच्छेने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात. स्वत:च्या म्हातारपणाची काठी स्वत:च होतात. त्यासाठी आर्थिक तरतूद करूनच निर्णय घेतात.

पूर्वी नशीबाने, देवकृपेने मुलं व्हायची. आज निश्चयाने मुलं होतात. आधुनिक जोडपी सर्व आव्हानांचा विचार करतात. मानसिक तयारी करतात. मूल होणं ही आजच्या जोडप्यांची गरज नाही. मूल होऊ देण्यात कोणतीही जबरदस्ती ते ओढवून घेतच नाहीत. नवीन जोडप्याना बाळ न होण्यात अपूर्णत्व वाटत नाही. बाळाला जन्म देण्याचा निर्णय म्हणजे जाणीवपूर्वक स्वीकारलेलं पूर्णत्व असं त्यांना वाटतं. जबाबदार्‍या नको आहेत. स्वातंत्र्य हवंय असं काही नाही. न जन्मलेल्या बाळाचा ते प्रामाणिकपणे विचार करतात. त्यांच्या घरातला पाळणा रिकामा राहिला तरी त्यांचं जग अनेक सुखानी भरलेलं असतं. हेच आधुनिक सामाजिक सत्य आहे. जबाबदारीच्या जाणीवेतून स्वेच्छेने पालकत्व स्वीकारणे ही सजगतेची नांदी आहे. पण मूल होऊच न देणार्‍यांची संख्या वाढते आहे. म्हणूनच ‘पाळणा हलणार की नाही? ‘ हा सामाजिक उंबरठ्यावरचा प्रश्न झाला आहे.

© अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २१ आणि २२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २१ आणि २२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २१ – – 

मना वासना चुकवी येरझारा ।

मना कामना सांडि रे द्रव्यदारा |

मना यातना थोर हे गर्भवासी ।

मना सज्जना भेटवी राघवासी |२१ |

अर्थ: हे मना, वासनेमुळे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात (येरझारा)अडकतो. त्या वासनेचा त्याग कर म्हणजे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार नाही. पैसा आणि स्त्री सुख यांच्याबद्दल मोह बाळगू नकोस. कारण वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो आणि गर्भवासाच्या यातना भयंकर असतात. म्हणून हे मना भगवंताची भेट करून घे.

विवेचन: जन्माआधी आणि जन्माच्या प्रसंगी होणाऱ्या यातना किती भयंकर असतात हे समर्थांनी आधीच्या श्लोकात सांगितले आहे. या श्लोकात ते आपल्याला म्हणतात की वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो म्हणून या वासनांचा त्याग करायला हवा. वासनाच नसतील तर जन्म मृत्यूचा प्रश्नच उद्भवणार नाही. या श्लोकात ‘ चुकवी ‘ हा शब्द वासना आणि येरझारा या दोन्हीसाठी आहे. आपल्याला वासना आणि येरझारा दोन्हीही चुकवायच्या आहेतच. वासना चुकवली तर येरझारा आपोआपच चुकतील.

वासना या निरनिराळ्या प्रकारच्या असतात त्यातही त्यांचे दोन प्रमुख प्रकार सांगता येतील. सद् वासना आणि दुर्वासना. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारची वासना असेल तरी पुनर्जन्म हा अटळ आहे. परंतु त्यातल्या त्यात सद्वासना म्हणजे चांगल्या वासना असतील तर पुन्हा जन्म मिळाला तरी हरकत नसते. समाजोपयोगी कार्य करणे, संतांचा सहवास लाभणे किंवा परमेश्वर भक्तीची इच्छा धरणे या सद्वासना आहेत. या सद्वासनांमुळे आत्मिक उन्नती होण्यासाठी मदत होते. षडरिपूंच्या नादी लागून त्या वासना अपूर्ण जर राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. परंतु त्याने शेवटी मनुष्याची अधोगतीच होते आणि मुक्तीपासून तो दूर जातो.

संत तुकाराम महाराजांना संतसंग आणि भगवद्भक्तीची आस होती. ते म्हणतात – – 

न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा|

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ||

संतांचा, सज्जनांचा संग म्हणजे सहवास मिळावा, परमेश्वराची भक्ती कायम लाभावी म्हणजे जेणेकरून त्यातील गोडी कायम अनुभवता येईल. म्हणून त्यांना गर्भवास म्हणजे पुन्हा जन्म घेणेदेखील मान्य आहे.

तुकाराम महाराजांसारख्या संतांची ही सद्वासना झाली. परंतु या ऐहिक जीवनात सामान्य मनुष्य एवढा गुंतून जातो की त्याच्या अनेक प्रकारच्या वासनांची पूर्ती कधी होतच नाही. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये जेवढे इंधन घालावे तेवढा तो अधिक प्रज्वलित होतो. तशा या दुर्वासना देखील वाढत जातात आणि अंतकाळी या वासना कायम असतील तर त्या पोटी मनुष्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. सत्ता, संपत्ती आणि स्त्री संबंधित वासना कधी संपतच नाहीत. कामिनी आणि कांचन यांच्या वासना सर्वात जास्त प्रबळ आहेत. त्यांच्यावर मात करणे सोपे नाही. इतर वासना त्यामानाने गौण आहेत. आज जगातील घडणारे बहुतेक गुन्हे आणि वाईट घटना कामिनी आणि कांचनाच्या हव्यासापायीच घडत आहेत. चित्रपटातून आणि टीव्हीवरील विविध प्रकारच्या धारावाहिकांमधून अशाच घटना समोर येतात. त्यापासून बोध घेण्याऐवजी त्यातील वाईट गोष्टींचा प्रभाव समाजमनावर अधिक पडतो. भ्रष्टाचाराच्या घटनांबद्दल तर न बोललेले बरे इतक्या त्या नित्याच्या झाल्या आहेत.

वासना अपूर्ण राहिल्या की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्माला आल्यानंतर या वासनांचा भोग तर मिळतो परंतु माणसाची अधिकाधिक अधोगती होते आणि त्याने तो मुक्ती पासून दूर जातो.

परद्रव्य कांता पराची पाहता 

स्मरादि रिपु ओढिती मानसाता 

– – असे श्री दत्त स्तुतीत म्हटले आहे. दुसऱ्याचे धन, दुसऱ्याची स्त्री यांची अभिलाषा धरली तर काम, क्रोध यांसारखे शत्रू मनावर आक्रमण करतात आणि शेवटी ते माणसाचा नाश घडवून आणतात.

म्हणूनच जन्म मृत्यूचा फेरा म्हणजेच येरझारा चुकवायचा असेल तर समर्थ वासनेवर मात करायला सांगतात. आणि त्यासाठी ईश्वर प्राप्तीचे पवित्र ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवावे लागते. केवळ ध्येयवादी मनुष्य असा त्याग करू शकतो. माया मोहात अडकलेले मन आपण ईश्वराकडे लावले तर तेच मन आपल्याला (राघवाची) ईश्वराची भेट घडवून देईल.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात कोणत्या वासना मला सर्वाधिक बांधून ठेवतात?
  • कामिनी आणि कांचनाच्या मोहापासून दूर राहण्यासाठी मी सजग आहे का?
  • संतसंग, सत्संग किंवा आध्यात्मिक चिंतनाला माझ्या जीवनात किती स्थान आहे?
  • माझ्या जीवनाचे ध्येय केवळ भोग आहे की ईश्वरप्राप्ती?

– – – – 

श्लोक क्र. २२ – – 

मना सज्जना हीत माझे करावे ।

रघुनायका दृढ चित्ती धरावे ।

महाराज तो स्वामि वायूसुताचा ।

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ।।२२।।

अर्थ :

हे सज्जन मना, तुला जर तुझे खरे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुकुलाचा नायक असलेल्या श्रीरामाला चित्तामध्ये दृढ धारण कर. तो वायूसुत हनुमंताचा स्वामी आहे आणि तिन्ही लोकांचा उद्धार करणारा आहे. म्हणून अशा त्या श्रीरामाला तू घट्ट धरून ठेव—म्हणजेच नेहमी त्याच्या चिंतनात राहून आपला उद्धार करून घे.

विवेचन :

आधीच्या श्लोकांमध्ये जन्माला येताना जीवाला किती यातना सहन कराव्या लागतात हे समर्थ सांगतात. आयुष्य जगताना देखील नाना प्रकारची दुःखे, संकटे आणि क्लेश सहन करावे लागतात. हे सर्व म्हणजे जन्म-मृत्यूच्या अखंड फेऱ्यांमुळे घडणारे आहे. या येरझाऱ्यातून सुटका करून घ्यायची असेल तर माणसाने आपले खरे हीत करून घ्यायला हवे. मग हे हीत म्हणजे नेमके काय आणि ते कसे साध्य करायचे—याचे उत्तर समर्थ या श्लोकात देतात.

हे जग मायेचा एक मोहक पिसारा आहे. त्याला आपण भुलतो, तेच अंतिम सत्य आहे असे मानतो आणि त्यातच अडकून पडतो. नाना प्रकारची प्रलोभने, विकार आणि वासना आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. परिणामी, आपल्या कल्याणाचा जो अंतिम मार्ग आहे—श्रेयसाचा मार्ग, त्याऐवजी आपली वाटचाल प्रेयसाच्या मार्गाने होत राहते.

खरे पाहता मनच आपला मित्र आणि मनच आपला शत्रू असते. तेच आपले हीत किंवा अहित करू शकते. विषयसुख आणि शरीरसुखालाच आपण जीवनाचे अंतिम ध्येय मानतो. कामिनी आणि कांचनाच्या मागे धावत राहतो. परंतु या सर्व गोष्टी म्हणजे मृगजळासारख्या आहेत. मृगजळ दिसते, पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. तसेच हे बाह्य जग—ते सत्य वाटते, पण ते भासमान आहे. आपण त्याच्या मागे धावत राहतो आणि जे अंतिम सत्य आहे—ब्रह्म किंवा परमेश्वर—त्याकडे दुर्लक्ष करतो.

आपली अवस्था कस्तुरीमृगासारखी होते. कस्तुरी स्वतःच्या नाभीत असतानाही तो तिच्या शोधात रानोमाळ भटकत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या हृदयातच असलेल्या आत्मारामाला आपण विसरतो आणि बाह्य सुखांच्या मागे भटकत राहतो.

मानवी जीवनाचे खरे हीत म्हणजे त्या रघुनायकाला दृढ चित्ती धारण करणे. चित्तामध्ये भगवंताला घट्ट धरून ठेवणे म्हणजेच आपले कल्याण करणे होय. एखाद्या वस्तूचा सतत सहवास लाभला तर ती वस्तू आपल्याला प्रिय वाटू लागते. तसेच भगवंताच्या नामाचा आणि स्मरणाचा सतत सहवास लाभला तर भगवंतही आपल्याला प्रिय वाटू लागतो. आणि जेव्हा भगवंत प्रिय वाटू लागतो, तेव्हा समजावे की आपण योग्य मार्गावर चाललो आहोत.

श्रीराम हे वायूसुत हनुमंताचे स्वामी आहेत. हनुमंत म्हणजे शक्ती, युक्ती आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत प्रतीक. तरीही तो स्वतःला रामाचा दास मानतो. भक्ती कशी करावी हे हनुमंताकडून शिकावे. त्याने श्रीरामांना आपल्या हृदयात कायमचे धारण केले आहे. श्रीरामांच्या कृपेने तो चिरंजीव झाला आहे.

शौर्य, धैर्य, औदार्य आणि शरणागताचे रक्षण—हे श्रीरामांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. ते रघुकुलाचे भूषण आहेत. त्यांचे नाम पापातून मुक्त करणारे आहे, भवसागरातून तारून नेणारे आहे. हजारो वर्षांपासून असंख्य लोकांनी श्रीरामनामाचा आश्रय घेतला आणि या संसारसागरातून तरून गेले.

त्रैलोक्याचा नाथ असलेल्या त्या श्रीरामांनी लोककल्याणाचे व्रत स्वीकारले आहे. म्हणूनच समर्थ अत्यंत तळमळीने आपल्या मनाला सांगतात—

“हे सज्जन मना, त्या श्रीरामांना आपल्या हृदयात दृढ धारण कर; त्यातच तुझे खरे कल्याण आहे. ”

स्वसंवाद : 

  • माझ्या जीवनातील खरे “हीत” काय आहे याचा मी कधी गंभीरपणे विचार केला आहे का?
  • विषयसुख आणि भौतिक यश यांनाच मी जीवनाचे अंतिम ध्येय मानतो आहे का?
  • माझ्या मनाला ईश्वरनाम, सद्गुण आणि सत्कर्म यांचा सहवास मिळतो आहे का?
  • हनुमंताप्रमाणे श्रद्धा, नम्रता आणि सेवाभाव माझ्या जीवनात कितपत आहे?

– क्रमशः श्लोक २१ आणि २२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पश्चात्ताप! ☆ अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ पश्चात्ताप! ☆ अपर्णा परांजपे

आपल्या मनात जर अपराध भावना आली तर दोन मार्ग जाणवतात एक देवाजवळ जायचे व प्रसाद द्यायचा व दुसरा ज्याच्यावर अन्याय झाला त्याला प्रत्यक्ष क्षमा मागायची!

आपण पहिला देवाजवळ जाण्याचा मार्ग धरू! हे ही उत्तमच आहे पण त्याने फारसा उपयोग होणार नाही कारण अंतःकरण शुद्ध नाही. आपण सोपा, सहज मार्ग आपण निवडला. पण प्रत्यक्ष क्षमा मागणे, कमीपणा वाटणे म्हणजेच देहबुद्धी नष्ट न होणे व देहबुद्धी नष्ट न होता केलेली क्षमायाचना भगवंतांना सुद्धा आवडत नाही मग तो नुसता व्यवहार ठरतो

प्रायश्चित्त विरुद्ध शुद्धीकरण 

शास्त्रात दोन संकल्पना आहेत: ‘द्रव्यशुद्धी’ आणि ‘आत्मशुद्धी’.

पहिला मार्ग (देवाजवळ जाणे): जेव्हा आपण देवाला प्रसाद चढवून अपराधमुक्त होऊ पाहतो, तेव्हा ते अनेकदा एक प्रकारची ‘तडजोड’ असते. शास्त्र सांगते की, देव भावाचा भुकेला आहे, द्रव्याचा नाही. जोपर्यंत अंतःकरणात पश्चात्ताप नाही, तोपर्यंत बाह्य उपचारांना केवळ ‘कर्मकांड’ म्हटले जाते. हे मनाला तात्पुरती शांती देऊ शकते, पण अपराधाचे मूळ (बीज) नष्ट करत नाही.

 दुसरा मार्ग (क्षमा मागणे): हा मार्ग ‘सत्य’ आणि ‘धर्मा’वर आधारित आहे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याला सामोरे जाणे म्हणजे स्वतःच्या चुकीचा आरसा पाहण्यासारखे आहे.

 २. देहबुद्धी आणि अहंकार

प्रत्यक्ष क्षमा मागण्यात ‘कमीपणा’ वाटणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे.

शास्त्रीय दृष्टिकोन: देहबुद्धी म्हणजे ‘मी शरीर आहे आणि माझी एक सामाजिक प्रतिष्ठा आहे’ हा भ्रम. जेव्हा आपण क्षमा मागायला कच खातो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला नाही, तर आपल्या ‘अहंकाराला’ वाचवत असतो.

जोपर्यंत हा अहंकार शाबूत आहे, तोपर्यंत केलेली कोणतीही भक्ती ‘सकाम’ असते. भगवद्गीतेनुसार, जो स्वतःला कर्ता मानतो आणि अहंकाराने ग्रासलेला असतो, त्याची बुद्धी शुद्ध नसते.

३. क्षमा‘ – एक आध्यात्मिक साधना

क्षमस्व प्रवृत्तीला शास्त्रात ‘तप’ मानले गेले आहे.

मनःप्रसाद: मनाची प्रसन्नता ही खरी भक्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीचे मन दुखावून आपण देवापुढे उभे राहिलो, तर ते मन विचलित असते. विचलित मनाने केलेली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही, कारण तिथे ‘द्वैत’ (मी आणि तो वेगळा आहे ही भावना) प्रबळ असते.

व्यवहार की परमार्थ: मनाची शुद्धी नसेल तर तो केवळ एक ‘व्यवहार’ ठरतो. व्यवहारात आपण काही देऊन काहीतरी विकत घेतो (प्रसाद देऊन पुण्य विकत घेण्याचा प्रयत्न). पण परमार्थ हा ‘समर्पणाचा’ विषय आहे.

४. मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक सुसंगती

आजचे मानसशास्त्रही सांगते की, जोपर्यंत आपण आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत अपराधभाव मनातून जात नाही. प्रत्यक्ष क्षमा मागितल्याने ‘हृदयग्रंथी’ सुटतात.

जेव्हा आपण नम्र होऊन क्षमा मागतो, तेव्हा देहबुद्धीचा लय होऊ लागतो आणि खऱ्या अर्थाने ‘सात्विक’ भावाचा उदय होतो. असा शुद्ध भाव असलेला भक्तच भगवंताला प्रिय असतो.

थोडक्यात सांगायचे तर:

देवाजवळ जाणे हा ‘भाव’ असेल तर उत्तम, पण तो ‘पळवाट’ असेल तर व्यर्थ आहे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याची क्षमा मागणे हे कठीण असले तरी तोच ‘चित्तशुद्धीचा’ खरा आणि शास्त्रीय मार्ग आहे. कारण देव हा मंदिरात असण्यापेक्षा सर्व भूतांच्या (व्यक्तींच्या) हृदयात ‘अंतर्यामी’ म्हणून वास करतो. त्यामुळे त्या व्यक्तीची क्षमा मागणे हीच प्रत्यक्षात देवाची क्षमा मागणे होय.

श्रीमद्भगवद्गीता (अहंकार आणि भक्ती)

भगवद्गीतेच्या १८ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात:

अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।

विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ (१८. ५३)

अर्थ: जो मनुष्य अहंकार, शक्ती, गर्व, काम, क्रोध आणि परिग्रह (संग्रहवृत्ती) यांचा त्याग करतो, जो ‘ममत्व’ (माझेपणा) रहित आणि शांत असतो, तोच ब्रह्मभाव प्राप्त करण्यास पात्र ठरतो.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे, क्षमा मागताना वाटणारा ‘कमीपणा’ हा या अहंकाराचाच भाग आहे. जोपर्यंत हा अहंकार सुटत नाही, तोपर्यंत देहबुद्धी नष्ट होत नाही.

२. संत तुकाराम महाराज (अंतःकरण शुद्धी)

तुकोबारायांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत मन शुद्ध नाही, तोपर्यंत बाह्य उपचारांना महत्त्व नाही:

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्प तया ॥”

तसेच, प्रसादाच्या किंवा केवळ बाह्य भक्तीच्या संदर्भात ते म्हणतात:

भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेविण शक्ति बोलू नये ॥”

म्हणजेच, जर मनात ‘भाव’ (चुकीची प्रांजळ कबुली) नसेल, तर ती भक्ती केवळ प्रदर्शन ठरते.

३. मनुस्मृती आणि प्रायश्चित्त शास्त्र

धर्मशास्त्रात ‘अनुताप’ (पश्चात्ताप) याला सर्वोच्च प्रायश्चित्त मानले गेले आहे:

ख्यापनेन अनुतापेन तपसा अध्ययनेन च । पापकृन्मुच्यते पापात्… ” (मनुस्मृती ११. २२७)

अर्थ: स्वतःच्या पापाची/चुकीची कबुली देणे (ख्यापन), मनातून पश्चात्ताप होणे (अनुताप) आणि तप करणे, यांमुळेच पापाचे क्षालन होते. केवळ वस्तू अर्पण करून किंवा ‘व्यवहार’ करून पापमुक्त होता येत नाही.

४. संत ज्ञानेश्वर महाराज (अमानित्व गुण)

ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायात ‘अमानित्व’ (अहंकाराचा अभाव) या गुणाचे वर्णन करताना माऊली म्हणतात की, ज्याच्या ठिकाणी ‘मी मोठा आहे’ हा भाव उरलेला नाही, त्याच्याच हृदयात ज्ञान प्रकाशते. प्रत्यक्ष क्षमा मागणे हे ‘अमानित्व’ या गुणाचे प्रकटीकरण आहे.

शास्त्राप्रमाणे, देव हा ‘अंतर्यामी’ आहे. ज्याच्यावर आपण अन्याय केला, त्या व्यक्तीच्या हृदयातही तोच देव आहे. म्हणून त्या व्यक्तीची क्षमा न मागता देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे “मूळ सोडून फांद्यांना पाणी घालण्यासारखे” आहे.

या चिंतनावर काही ओळी सुचल्यात..

अंतरीचा भाव ॥

अपराध घडता हातूनि । मनी दाटे ग्लानी भारी ॥

देवापाशी धावे मन । प्रसादाची थाळी धरी ॥ १ ॥

काय उपेग प्रसादाचा । चित्त शुद्ध नाही जरी ॥

व्यवहाराची ही भक्ती । देवा आवडते का तरी? ॥ २ ॥

क्षमा मागता वाटे हो । कमीपणा देहबुद्धीचा ॥

अहंकाराचा तो पडदा । मार्ग रोखी मुक्तीचा ॥ ३ ॥

ज्यावरी झाला अन्याय । देव वसे त्याच्या हृदयी ॥

पाया पडता तयाच्या । क्षमा करी “आत्मारामा” ॥ ४ ॥

१: जेव्हा आपल्याकडून चूक होते, तेव्हा मन अस्वस्थ होते. पण आपण सोपा मार्ग शोधतो—देवाला काहीतरी ‘अर्पण’ करून स्वतःला मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करतो.

२: हे ‘व्यवहाराचे’ नाते आहे. अंतःकरण शुद्ध नसल्यास बाह्य उपचार केवळ उपचारच राहतात, त्यात ‘भाव’ नसतो.

३: प्रत्यक्ष क्षमा मागताना जो अडथळा येतो, तो म्हणजे आपला ‘अहंकार’. हाच ‘मी’पणा आपल्याला देहबुद्धीच्या पलीकडे जाऊ देत नाही.

४: ईश्वराचे अधिष्ठान सर्वव्यापी आहे. ज्या व्यक्तीचे आपण मन दुखावले, तिच्यातील ईश्वराची क्षमा मागणे म्हणजेच खऱ्या अर्थाने देवाला शरण जाणे होय.

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १९ आणि २० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १९ आणि २० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. १९ – – – 

मना सर्वथा सत्य सांडू नको रे|

मना सर्वदा मिथ्य मांडू नको रे|

मना सत्य ते सत्य वाचे वदावे|

मना मिथ्य ते मिथ्य सोडुनि द्यावे |१९|

अर्थ: हे मना, या जगात केवळ भगवंतच एकमेव सत्य आहे. म्हणून त्याला कधी सोडू नकोस. दृश्य जगत मिथ्या आहे, भासमान आहे. त्याचा पसारा मांडू नकोस. नेहमी बोलताना भगवंताबद्दलच बोल आणि मायेच्या प्रभावाने सत्य वाटणाऱ्या (पण मिथ्या असलेल्या)या भासमान जगाकडे दुर्लक्ष कर.

विवेचन : या जगात सत्य आणि मिथ्य अशा दोनच गोष्टी आहेत. या ठिकाणी सत्य आणि मिथ्य या दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. साधारणपणे व्यवहारात बोलताना आपण मिथ्य म्हणजे खोटे या अर्थाने तो शब्द वापरतो. परंतु आपण जेव्हा अध्यात्माच्या संदर्भात काही बोलत असतो तेव्हा जे खरे नसून खऱ्यासारखे भासते त्या गोष्टीला मिथ्या म्हटले जाते. थोडक्यात म्हणजे त्या गोष्टी भासमान असतात. वाळवंटात भर उन्हात प्रवास करणाऱ्याला जेव्हा तहान लागते तेव्हा त्याला समोर पाणी असल्याचा भास होतो. वाळवंट हे सत्य परंतु पाणी हे भासमान! ते मृगजळ म्हणजेच भास! हे जगही असेच भासमान आहे. परंतु आपण कायमच या जगात वावरत असल्यामुळे आपल्याला हे दृश्य जग सत्य आहे असेच वाटत असते. त्याचे मिथ्यत्व जाणवत नाही. म्हणूनच ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे शंकराचार्य म्हणतात. समर्थ दासबोधत म्हणतात, “प्रकट ते जाणावे असार, अप्रकट ते जाणावे सार. ” हा देह जो प्रकट दिसतो तो असार, अशाश्वत आहे पण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे, ते सत्य आहे त्याचा शोध घेतला पाहिजे.

आता सत्य या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया. सत्य हे चिरंतन असते. ते शाश्वत आणि अपरिवर्तनशील असते. सत्य या शब्दाचा दुसरा अर्थ असाही घेता येईल की ज्यामुळे व्यक्तीचे किंवा समाजाचे हीत किंवा कल्याण होते ती गोष्ट म्हणजे सत्य.

सध्याचे वर सांगितलेले दोन्ही अर्थ परमेश्वराला लागू होतात. परमेश्वर शाश्वत आहे, चिरंतन आहे आणि अपरिवर्तनशील आहे. परमेश्वराची आराधना केल्यामुळे मानवाचे कल्याण होते म्हणूनच समर्थ आपल्याला ‘सत्य सांडू नको रे’ असे सांगतात.

आपण या भौतिक जगात वावरत असल्यामुळे तेच आपल्याला खरे वाटते आणि म्हणून त्याचाच पसारा आपण मांडत असतो. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे असे जे समर्थ सांगतात त्याचा अर्थ हाच आहे. पण आपण आयुष्यभर मिथ्याचाच पसारा मांडण्यात धन्यता मानत असतो. शिक्षण, नोकरी, मुलेबाळे, संसार यातच आपण आयुष्याची इतिकर्तव्यता मानतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर आपण त्याच्या भ्रमजालात एवढे अडकलो आहोत की लाईक्स, व्ह्यूज, सबस्क्राईबर्स, प्रसिद्धी म्हणजेच सगळे काही असे आपल्याला वाटते. आपल्याला कोणी भगवंताची उपासना करण्यास सांगितले तर आपण म्हणतो की अजून मला वेळ आहे. आत्ताच तर कुठे शिक्षण पूर्ण होत आहे. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी, नंतर लग्न, नंतर मुलेबाळे, संसार… त्यानंतर आपण परमेश्वराकडे लक्ष देऊ असे माणूस मनाशी म्हणत असतो. परंतु असे करता करता संपूर्ण आयुष्य निघून जाते. मिथ्याचा मांडलेला हा पसारा सोडून एक दिवस जावे लागते. लहान मुलगी खेळण्यातली भांडी, चूल बोळकी घेऊन संसाराचा खेळ मांडते. परंतु मोठी झाल्यावर अचानक तो खेळ सोडून तिला जावे लागते तसेच आपलेही होते.

चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं

लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं

रेशिम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला.. ||

या गीतात म्हटल्याप्रमाणेच आपली अवस्था होते. लुटुपुटीच्या संसाराची वेळ संपत येते. पण पाय निघत नाही. मायेचे, मोहाचे रेशीम धागे आपल्याला मागे ओढत असतात.

सत्य आणि असत्याची दुसरी एक बाजू आपण या ठिकाणी समजावून घेऊ या. सत्य बोलणे हा आपला धर्म आहे. लहान मुलांना सुद्धा आपण नेहमी खरे बोलावे असे सांगत असतो. महाभारतातील युधिष्ठिर खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध होता म्हणूनच त्याला धर्मराज असेही म्हटले जात होते. सत्य केवळ बोलायचे नसते तर सत्यस्वरूप व्हायचे असते याचे तो मूर्तिमंत उदाहरण होता. परंतु आता सत्याची दुसरी एक बाजू समजावून घेऊ. एखादी गोष्ट बोलण्यामागे आपला उद्देश कोणता आहे यावरही त्या गोष्टीचे सत्य असत्य किंवा धर्म – अधर्म या गोष्टी ठरतात. दुसऱ्याचे कल्याण व्हावे या हेतूने बोललेले असत्य देखील हितकारक असते. येथे ते पाप न ठरता पुण्य ठरते. दुसऱ्याला दुखावण्याचा, त्रास देण्याचा किंवा त्याच्या वाईटाचा हेतू मनात ठेवून बोललेले सत्य हे देखील पापास कारणीभूत ठरते. महाभारतात श्रीकृष्णाला युक्तीने वागताना काही वेळा असत्याचा आधार घ्यावा लागला आहे. परंतु असे करण्यामागील त्याचा उद्देश अनितीचे आणि अन्यायाचे राज्य संपून न्यायाचे राज्य यावे, नीतीने वागणाऱ्या पांडवांना न्याय मिळावा हा होता.

संत तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियाले नाही बहुमता… ” केवळ लोक म्हणतात म्हणून एखादी गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे असे मानण्यापेक्षा त्यांनी आपल्या मनाने दिलेला कौल प्रमाण मानला. मनाचा हा कौल म्हणजेच विवेक. या विवेकाच्या सहाय्यानेच संसार किंवा हे दृश्य जग भासमान आहे हे समजून घ्यावे आणि एकमेव सत्य असलेल्या त्या परमेश्वराची कास धरावी असेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद : 

  • माझ्या जीवनात मी खरेच काय सत्य मानतो, परमेश्वर की भौतिक यश?
  • संसारातील गोष्टींमध्ये गुंतताना त्यांचे क्षणभंगुर स्वरूप मला जाणवते का?
  • मी बोलताना सत्य बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो का?
  • माझ्या बोलण्यामागील हेतू दुसऱ्याच्या कल्याणाचा असतो का?
  • माझ्या आतील विवेकाचा आवाज मी ऐकतो का?

– – – – 

श्लोक क्र. २० – – – 

बहू हिंपुटी होईजे मायपोटी। 

नको रे मना यातना तेचि मोठी॥ 

निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। 

अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥

अर्थ: आईच्या पोटात असताना बालकाला अतिशय कष्ट भोगावे लागतात. त्या मोठ्या वेदनादायी यातना (हे जीवा)तुला भोगणे नको. मातेच्या गर्भात असताना बालक अधोमूख म्हणजे खाली तोंड करून असते. ते सर्व बाजूंनी कोंडले जाते. गर्भातील उष्णतेमुळे ते उकडून निघते. ही अवस्था अत्यंत वेदनादायी असते.

(हिंपुटी – कष्ट/यातना, मायपोटी – आईच्या उदरात असताना, निरोध प्रतिबंध/अडथळा, पचे – शिजणे/उकडून निघणे, अधोमुख – खाली तोंड करून)

विवेचन :

या श्लोकात समर्थ जीव जन्माला येण्याआधीच्या अवस्थेचे वर्णन करतात. ही अवस्था किती कष्टप्रद असते त्याची जाणीव हा श्लोक वाचला म्हणजे होते. समर्थ स्वतः संसाराच्या बंधनात अडकले नव्हते. परंतु मनुष्य कसा जन्माला येतो? त्यावेळी त्याची अवस्था कशी असते, आणि त्याला किती यातना होतात याची पुरेपूर कल्पना त्यांना होती. आजचे आधुनिक विज्ञान आणि मोठमोठे डॉक्टर्स सुद्धा ही गोष्ट मान्य करतात की गर्भामध्ये असताना आणि जन्माला येताना (मातेबरोबरच) बालकाला सुद्धा यातना सोसाव्या लागतात.

एकदा का या मृत्यू लोकात जन्म घेतला की शैशव, तारुण्य, नाना प्रकारचे आजार, वृद्धत्व आणि शेवटी मृत्यू या गोष्टी अपरिहार्य आहेत. जन्माला येताना तर किती यातना जीवाला सोसाव्या लागतात. आईच्या गर्भामध्ये हा जीव कोंडलेला असतो. त्या वातावरणातील उष्णता त्याला सहन करावी लागते. उष्णतेमुळे त्याची वाढ होते हे जरी खरे असले तरी त्यामुळे तो उकडून निघतो हेही तेवढेच खरे. नऊ महिने तो जीव एवढ्याशा जागेत कोंडलेला असतो. आपण त्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. जन्माला येताना बालक अधोमुख असते. त्या अत्यंत अरुंद मार्गातून बाहेर पडताना मातेला आणि बालकाला दोघांनाही भयंकर वेदना सहन कराव्या लागतात.

दिवस जाणे, गर्भारावस्था, बाळंतपण आणि त्यात होणाऱ्या वेदना या सगळ्या अपरिहार्य गोष्टी आहेत म्हणून या अवस्थांमधून जायचेच नाही का? या नैसर्गिक गोष्टी आहेत. या होणारच. यांचा त्रास नको म्हणून कसे चालेल असे आजचे काही विज्ञानवादी विचारवंत म्हणतात. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर हे सगळे बरोबर वाटते परंतु जो मुमुक्षु आहे, म्हणजेच साधक आहे, मोक्ष मार्गावर वाटचाल करणारा आहे, त्याला या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतील तरच त्याची पुढील वाटचाल सुकर होईल. म्हणूनच समर्थ या गोष्टींची जाणीव आपल्याला करून देतात.

केवळ जन्मच नव्हे तर संपूर्ण मानवी जीवन हे दुःखाने भरलेले आहे. काही लोक याला निराशावादी विचार म्हणतील. परंतु संतांचा ही जाणीव करून देण्याचा उद्देश वेगळा असतो. संत हे अध्यात्म मार्गावरील दीपस्तंभ असतात. त्यांचे अनुसरण करूनच पुढे जायचे असते. म्हणूनच ते आपल्याला ही जाणीव करून देतात. वारंवार जन्माला येणे, यातना सोसणे आणि मृत्यू पावणे या चक्रात सामान्य माणूस अडकत राहतो आणि हे चक्र सुरू राहते. पण कुठेतरी हे चक्र थांबावे असे वाटत असेल तर पुन्हा जन्म नको. जन्म नसला तर या सगळ्या गोष्टी आपोआप टळतील. म्हणूनच समर्थ जन्माला येताना होणाऱ्या कष्टांची जाणीव आपल्याला करून देतात.

हा देह नाशिवंत आहे. मलमूत्र इ. घाणीने भरलेला आहे. आयुष्यात दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताएवढे असे तुकाराम महाराज सांगतात. या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव नसते असे नाही. परंतु तरी देखील माणसाला आपल्या देहाचा आणि स्वतःचा केवढा गर्व असतो!

पण एक दिवस हा देह सोडून आपल्याला जायचे आहे. “नाशिवंत देह जाणार सकळ “असे तुकाराम महाराज म्हणतात. पण असे असले तरी हा देह ईश्वर प्राप्तीचे साधन आहे. त्याचा वापर करूनच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचे आहे. आपल्या देहाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मळमुत्राचा बांधा ।

वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा ॥

रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा ।

स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥

– — असा हा आपल्याला लाभलेला मानवी देह आहे. पण म्हणून त्याचा तिरस्कार करता कामा नये. घेता येईल तेवढी त्याची काळजी आपण घेतले पाहिजे कारण हा नरदेह ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला उत्तम कर्म करून राघवची प्राप्ती करून घ्यायची आहे. मानवी जीवनातील दुःख नको असेल आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर भगवंताला शरण जाण्या वाचून पर्याय नाही.

स्वसंवाद : 

  • हे जीवन, हा संसार दुःखमय आहे याची जाणीव मी ठेवतो का?
  • जीवनातील दुःखांकडे मी तक्रारीने पाहतो की त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करतो?
  • जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटावे असे मला मनापासून वाटते का?
  • त्यातून सुटण्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर मी वाटचाल करतो का?

– क्रमशः श्लोक १९ आणि २०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. कांतिलाल टाटिया… – माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. कांतिलाल टाटिया… – माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

डॉ. कांतिलाल टाटिया 

डॉ. टाटिया शहाद्याचे. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील गरीब, वंचित आदिवासी बांधवांच्या सेवेत स्वत:ला पूर्ण वेळ झोवूâन दिले. जिल्ह्याच्या काना-कोपNयातील आदिवासीगावे, पाडे, अतिदुर्गम भागातील हान लहान वस्त्या इथे ते जायचे. रस्त्यांची, विहिरींची कामे, एकशिक्षकी का होईना शाळा, वनखाते, तलाठी, पोलीस या ठिकाणांची असंख्य कामे, पाण्याचे टँकर्स, आवश्यक असलेली बी-बियाणे, रोजगार, रुग्णांना, गर्भवतींना धुळ्यापर्यंत आणून उपचाराची व्यवस्था करणं अशा रचनात्मक कामांमध्ये ते बुडालेले असायचे.

जगापासून तुटलेल्या वनवासी जीवांना ते मनापासून आणि जमेल तेवढी मदत करत. आपल्या जुनाट मोटरसायकलवरून उन्हातान्हाची, पाऊसपाण्याची, थंडी-वाऱ्याची पर्वा न करता ते फिरत. घराघराशी संपर्क ठेवत. त्यांच्या लग्नकार्य, सणा-वारात, उत्सव-समारंभात सामील होत.

एकदा त्यांच्या वाहनाने दगा दिला. त्यांना गंभीर अपघात झालाा. पायाचे हाड मोडल्याने प्रदीर्घ काळ दवाखान्यात बेडवर पडून राहणे भाग पडले. ही बातमी खेडोपाडी पोचली आणि डॉ. टाटियांच्या समाचाराला येणाऱ्या वनवासी लोकांची रीघ लागली.

त्यात उघडेवाघडे पुरुष, ठिपक्या ठिपक्यांच्या तांबड्या फडक्या डोक्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या शेकडो लेकुरवाळ्या बहिणी होत्या. म्हातारे-म्हाताऱ्या, तरुण मुलं, मजूर, झाडून सगळे भेटायला येऊन जात होते. आठवड्याकाठी एखादी दहा रुपयाची एखादी नोट कशीबशी पाहायला मिळणारी, ३-४ रुपये रोजावर कंबरतोड मेहेनत करणारी ही शापित माणसं… भेटीनंतर त्या दवाखान्याच्या आवारातच ठिय्या मारून मिरच्या भााकरी बांधलेली कळकट फडकी सोडून पोटात भरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत घरी जात. उसने-पासने घेतलेले पैसे बस भाड्यासााठी खर्च करून आणि तेही शक्य नसेल, तर मैलोनमैल रस्ता अनवाणी पायंनी तुडवत, रस्ता विचारत विचारत ही माणसे डॉक्टरांना बघायला रांगेने येत होती.

– – भेटणं कसं? एक एक जण घाबरत घाबरत बेडजवळ जाई. शिस्तीत आवाज न करता डॉ. टाटियांचा हात हातात घेई. आया-बाया त्यांची बला घेत. म्हातारी-कोतारी माणसं त्यांच्या डोक्यावरून, कपाळावरून, गालांवरून मायेने हात फिरवीत आणि गहिवरलेल्या अहिराणीत आशीर्वाद देत… पण हा व्हिजिटर एक गोष्ट न चुकता करीत होता. निरोपाचा रामराम झाला, की डॉक्टरांच्या उशीखाली त्यांचा हात जाऊन बाहेर येई. टाटिया कुटुंबातील कुणालाच कळेना, हे काय आहे? एकाला विचारल्यावर उत्तर मिळालं, `काही नाही भाऊ, आहेर करना पडस, आजारी मानुसले. ‘

– – हे ऐकताक्षणी डॉ. टाटियांनी चटकन उशी बाजूला करून पाहीलं आणि बघणारे सगळे थक्क झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं. काही क्षणातच त्या पाण्याचं अश्रूधारा आणि हुंदक्यात रुपांतर झालं.. उशीखाली एक रुपया, दोन रुपये, पाच रुपयांच्या बारीक घड्या घातलेल्या असंख्य मळक्या नोटा, चार आणे, आठ आणे, अगदी दहा-वीस पैशांचीसुद्धा काही नाणी होती.

– – आजारी माणसाला उपचारांचा न झेपणारा खर्च असतो आणि त्याचे मित्र, सगेसंबंधी, जातभाई, रक्ताची माणसे यांनी त्यात जमेल तेवढा खारीचा वाटा उचलणं, हे त्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं, या धारणेतून निर्माण झालेली `आजारपणाच्या आहेरा’ची पिढ्यान पिढ्या सुरू असलेली परंपरा ही माणसं डॉ. टाटियांच्या बाबतीतही इमानाने पालत होती.

खरं तर हॉस्पिटलचं बील बरंच होणार होतं. आणि टाटिया परिवारही काही फार श्रीमंत नव्हता. ही `आहेराची’ सगळी रक्कम मोजली, तरीही दवाखान्याच्या एका दिवसाच्या खर्चाहून अधिक होणार नव्हती. पण एक रुपया, दोन रुपये यांची किंमत काय असते, हे धुळे जिल्ह्यातल्या त्या निष्कांचन, आदिवासी भागात गेल्याशिवाय कुणाला कळणार नाही.

हे आदिवासी जिथे या जगात आले, वाढले आणि जिथे त्यांचा जन्मभरचा रहिवास असणार होता, त्या जंगलातच उगवून वाढलेल्या झाडांइतकीच नैसर्गिक आणि तेवढीच उंची असलेली अशी ही `सहजीवनश्रद्धा’ आहे, नाही का?

अशी `मेडिकल इन्शुअरन्स स्कीम’ त्यांच्या अक्षरशत्रू पूर्वजांना शेकडो वर्षापूर्वी सुचली आणि तिचं एका गुप्त व अखंड चालणाऱ्या परंपरेत रुपांतर झालं असणार.

(धुळ्याचे कार्यकर्ते व मार्गदर्शक धरमचंद चोरडिया यांनी पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला किस्सा)

माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ६१, ६२, ६३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६१, ६२, ६३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

नारद भक्ति सूत्रे : ६१

लोकहानौ चिन्ता न कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् ||६१||

अर्थ : भक्ताने आपला स्व आणि लौकिक व वैदिक कर्मे भगवंताला अर्पण केलेली असतात. म्हणून लोक व्यवहारात हानी झाली तरी त्याने चिंता करू नये.

विवेचन : *श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही, तसे भक्ति करायला शिकवावे लागू नये…! (नारद मुनींची इतकी सूत्रे अभ्यासल्यावर तर अजिबातच नाही…)* तर मनुष्याला श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही…! भक्तिमार्गात जाणे किंवा भक्तीमार्ग लाभणे हे कदाचित दैवाधिन असू शकेल. मागे आपण एक विचार केला की अनुदिनी अनुतापें… अशी स्थिती आल्यावर जर मनुष्य भक्तिमार्गाकडे अग्रेसर झाला तर त्याने तो मार्ग स्वतःहून सोडू नये…

*भक्तीमार्ग अनुसरणे हा एक प्रवास आहे. प्रवासात स्थिर असलेली झाडं आपल्याला पळताना दिसतात… , अर्थात याचे बालपणी जितके नवल अथवा आकर्षण असते, तितके आकर्षण मोठेपणी राहता नाही, कारण आपले वाहन पुढे जात असते, याचे पूर्ण ज्ञान मनुष्याला झालेले असते… *

मनुष्याच्या आयुष्यात येणारी सुखदुःख ही त्या पळणाऱ्या झाडांप्रमाणे खोटी असतात, किंवा आपल्या मनाने तयार केलेली असतात, हे मान्य करण्याचे सामर्थ्य आपल्याला भक्तीच देत असते. परमेश्वर आपल्याला जीवनाचा सारथी आहे. तोच आपला जीवनरथ हाकत आहे आणि आपण त्याच्यावर भार टाकून निर्धास्त झाले पाहिजे ही जाणीव आता साधकाला होऊ लागते. मग तो अधिकाधिक निश्चिंत होऊ लागतो…

भक्तिमार्गात वाटचाल करताना साधक असो व सिद्ध असो सुखदुःख त्याच्या वाट्याला येतातच येतात. कारण त्यामागे त्याचे प्रारब्ध असते. त्याचे त्याला ते भोगून संपवावे लागते. इथे भक्त आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताची इच्छा आहे असे मानून त्यातून अलिप्त होत जातो आणि कर्मबंधांतून मुक्त होत जातो.

एका साधूकडे एक मनुष्य गेला. साधूला म्हणाला की माझ्यामागे भूत लागले आहे. ते मला सोडत नाही. साधूने आपल्या सामर्थ्याने भुताला बोलावले आणि त्याला सांगितले की या मनुष्याला सोडून दे. त्यावर ते भूत म्हणाले की मी आता सोडायला तयार आहे. पण हा मनुष्यच मला सोडत नाही…! सामान्य मनुष्य आपल्या मनाने अशी भीतीची अनेक भुते निर्माण करतो आणि स्वतःच त्यांना धरून ठेवतो, त्यांना चिकटून बसतो आणि आयुष्यभर दुःखी राहतो… 

साधकाने कसे वागावे किंवा साधनेच्या विशिष्ठ टप्प्यावर साधकांची मनोवृती कशी असते किंवा असावी याचे वर्णन माउली पुढील ओवीत करतात…

करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥

(ज्ञानेश्वरी १२. ११८)

जय जय रघुवीर समर्थ

 – – – – 

नारद भक्ति सूत्रे ६२

न तदसिद्धौर लोकव्यवहारो हेयः किन्तु फलत्यागस्तत् साधनं च कार्यमेव ॥ ६२ ॥

अर्थ : जोपर्यंत चिंता न करणे साधले नाही तोपर्यंत साधकाने लौकिक कर्माचा त्याग करू नयेज त्यांना सोडू नये. कर्मफळाचा त्याग मात्र प्रयत्नपूर्वक निष्ठेने करीत रहावे.

विवेचन : काळाच्या पुढे धावती ती काळजी. मनुष्य सर्व काही सोडतो पण तो काळजी सोडत नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की मनुष्याने मनुष्याने नामस्मरणभक्तीच्या सहाय्यानं

काळाच्या छाताडावर नाचावे. पण प्रत्यक्षात मात्र याच्या उलट होताना दिसते…

संताच्या दारी जाऊन आले की मनुष्याला आपण चिंतामुक्त झाल्यासारखे वाटते. पण त्याची काळजी, चिंता घरी पोचण्याआधीच त्याच्या छाताडावर नाचू लागतात.

साधनेत प्रगती होऊ लागली की साधक खऱ्या निश्चिंत होऊ लागतो, पण ती स्थिती कायम राहते असे म्हणणे धाडसाचे ठरते. ज्याप्रमाणे सायकल चालवायला शिकणारा मुलगा सायकल शिकत असतो, तेव्हा तो थोडा थोडा तोल सांभाळू लागतो. त्याला वाटतं आपण सायकल पूर्णपणे चालवायला शिकलो. पण प्रत्यक्षात मात्र तसं होतंच असं नाही… , मनुष्य अनेक वेळा पडतो आणि सायकल चालवायला शिकतो… पण जोपर्यंत त्याच्यात निपुणता येत नाही, तोपर्यंत त्याचे सायकल चालवताना पडणे अगदीच स्वाभाविक असते आणि जोपर्यंत तो निपुण होत नाही, तोपर्यंत त्याने सायकल चालवण्याचा सराव करणे सोडून चालत नाही…

साधकाने असेच करावे असे नारद मुनी आपल्याला सांगत असावेत. साधनेचे विविध टप्पे असतात…! जोपर्यंत नदी सागराला जाऊन मिळत नाही, तोपर्यंत तिची कधी खळखळ, तर कधी शांत प्रवाह असे चालूच राहते. फक्त नदीने वाहणे थांबवून चालत नाही…!

साधकाचे असेच होते असे सर्व संत सांगतात. साधनेच्या काळात देखील थोडीफार भरती ओहोटी असतेच..! घालमेल चालू असतेच…! थोडक्यात साधकाने आपली विहित कर्मे टाकून चालत नाही. जोपर्यंत साधनेत पूर्णत्व येत नाही, तोपर्यंत त्याने आपली विहित कर्म टाकू नयेत. फक्त त्याचे फळ मात्र भगवंताला अर्पण करावे. संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग या सूत्रांचे विवेचन करणारा आहे असे म्हणता येईल.

“नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥२॥ नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥३॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥४॥”

(अभंग क्रमांक 870, सार्थ तुकाराम गाथा. धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ

– – – 

नारद भक्ति सूत्रे ६३

“स्त्रीधन नास्तिकवैरीचरित्रं न श्रवणीयम्‌ ||६३||”

अर्थ : स्त्रिया, धन, संपत्ती, ऐश्वर्य, नास्तिक लोक आणि शत्रू यांचे वर्णन ऐकू नये.

विवेचन : आपल्याकडे सहा विकार प्रमुख सांगितले आहेत. आता विकारांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही…!

दूरदर्शन, दूरचित्रवाणी, चोवीस तास चालणाऱ्या बातम्या, सामाजिक माध्यमे, त्यात भर म्हणून झटपट पैसा देणार अनेक खेळ सध्या मोबाईल वर उपलब्ध आहेत, तसेच आधुनिक जीवनशैली मनुष्याला निसर्गापासून दूर नेत आहे आणि नवनवीन मानसिक, शारीरिक, भावनिक आजारांना आमंत्रण देत आहे. इतक्या व्यवधानातून लक्ष काढून ते *आत*मध्ये वळवणे किती अवघड…!

नारद मुनींच्या काळात फक्त सहा विकार होते. त्यात सुद्धा काम आणि क्रोध हे जास्त महत्वाचे आहेत. या सूत्राच्या सुरवातीला स्त्रीचा उल्लेख झाला आहे. जवळजवळ सर्व साहित्यात पुरुषांना स्त्रीपासून सावधान राहायला सांगितले आहे. थोडा सखोल विचार केला तर मनुष्य स्खलनशील प्राणी आहे. यात स्त्रीपुरूष असा विषय असण्याचे कारण नाही. पण सर्व संतांना हा विश्वास होता की स्त्रिया वाईट मार्गाला जाऊ शकणार नाहीत, पण पुरुषांबद्दल तितका विश्वास त्यांना वाटतं नसावा. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की आजपर्यंत धर्म टिकला तो स्त्रियांमुळेच..!

असो, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रीच्या मोहात पडून अनेक लोक पथभ्रष्ट झाल्याचे आपल्याला आढळेल. गीतेत भगवंत म्हणतात,

“अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया|

स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर||”

(गीताई ०१. ४१)

इथे स्त्री वाईट नाहीच आहे, पण पुरुषांना परस्त्रीबद्दल आसक्ती वाटते ती वाईट आहे आणि यातून त्यांचे पतन होत जाते. आपल्याकडे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यात पहिला आहे धर्म. दुसरा आहे काम, तिसरा आहे अर्थ आणि चौथा आहे मोक्ष.

धर्मावर आधारित आचार, विचार आणि व्यवहार. धर्मावर आधारित काम इथे अपेक्षित आहे. धर्मावर आधारित आचरण, त्यावर आधारित काम आणि त्यावर आधारित अर्थाची प्राप्ती झाली तर मोक्ष नक्कीच दूर नाही.

संत तुकाराम महाराज आपल्या साधनेच्या प्रारंभिक टप्प्यात त्यांचे जे अनुभव आहेत ते अभगांच्या द्वारे लिहिले आहेत. ते म्हणतात,

स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।

काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥

*

नाठवे हा देव न घडे भजन ।

लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु. ॥

*

दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें ।

लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥

*

तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु ।

परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥

*
(अभंग क्रमांक 239 सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

साधकाच्या मनातून स्त्री आणि पुरुष हा भेद जाईपर्यंत काळजी घ्यावीच लागते. एकदा का साधक पक्का झाला की मग त्याच्यावर या कामक्रोधाचा प्रभाव पडत नाही. मला इथे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक घटना आठवते. परदेशात असताना त्यांना एक तरुणी भेटायला आली. तिने त्यांच्याकडे मागणी केली की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. सामान्य

साधक असता तर त्याने काय केले असते हे सांगणे अवघड आहे, पण स्वामी विवेकानंद तिला म्हणाले की माझ्या सारखा मुलगा कशाला हवा आहे, मातोश्री मलाच आपला मुलगा माना, मी आपल्याला माझी आई मानतो.

गीतेत भगवंत म्हणतात,

“काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण|”

“तीन हीं नरक द्वारें टाळावीं चि म्हणूनियां||”

(गीताई १६. २१)

– – धन मिळवणे हा आपल्याकडं पुरुषार्थ मानला गेला गेला आहे. विहीत मार्गाने धन मिळवणे हा पुरुषार्थ आहे. चोरी करून धन मिळवणे यात कसला आलाय पुरुषार्थ?

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात धनाबद्दल आपले मत सांगतात.

“जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।

उदास विचारें वेंच करी।।”

(अभंग क्र. 2864, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

साधना करणे म्हणजे स्वतःला अधिकाधिक नव्हें, तर पूर्ण शुद्ध करणे. त्यासाठी निर्विकार होणे. विकार भगवंताने निर्माण केलें आहेत तर वाईट नसणारच, पण ज्याप्रमाणे औषधाची ठराविक मात्रा असते, तसे विकार त्या मात्रेत घेतले तर ते पूरक ठरू शकतात, अन्यथा विकारांची मालिका चक्रवाढ पद्धतीने वाढू शकते.

भक्तिमार्गात अग्रेसर होत असताना साधकाची दृष्टि आणि मनोवृत्ती अशी होते की त्याला सगळीकडे भगवतांचे अस्तित्व जाणवू लागते. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला प्रत्येक गोष्टीत राम दिसतो.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– नारद भक्तीसूत्रे : ६१, ६२, ६३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares