मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मरण – स्मरण ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मरण – स्मरण ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपली प्रिय व्यक्ती मृत्यूशय्येवर असाहाय्यपणे पडून असलेली पहावे लागणे हा आपल्या नशिबातला फार मोठा भोग म्हणावा लागेल! त्यात त्या व्यक्तीला असह्य वेदना होत असतील तर जवळच्या व्यक्तींना होणा-या मानसिक वेदना कल्पनातीत असतात. त्या व्यक्तीची या जगण्यातून मरणाने सुटका करावी, अशीच मनोमन प्रार्थना केली जाते, हे वास्तव आहे! 

अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जीवनाचा मोह सुटत नाही, हे नैसर्गिक आणि स्वाभाविकच आहे. याला फार मोजके लोक अपवाद असतील! जगण्याची नसली तरी शरीर श्वास घेणं स्वत:हून थांबवत नाही.

असाध्य व्याधी असलेली व्यक्ती तिच्या शेवटच्या क्षणांत कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसते. अनेकवेळा व्यक्ती दीर्घ किंवा कायमच्या बेशुद्धावस्थेत असते. काहीवेळा कधीही बरे न होण्याची स्थिती समोर नजरेला दिसत असते. ज्यांना शक्य आहे असे लोक या व्यक्तीला आधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करतात. प्रचलित वैद्यकीय कायद्यांनुसार व्यक्तीची जीवन रक्षक प्रणाली काढून टाकता येत नाही. उपचार थांबवायचे झाल्यासही एक कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. यातून अनेक प्रकारची आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि विशेषत: नैतिक गुंतागुंत निर्माण होते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा स्थितीत खूप कठीण काळ समोर उभा थकतो.

व्यक्ती फार काळ तग धरू शकणार नाही, हे सर्वांना ठाऊक असते. पण प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताही मार्ग उरत नाही. जीवन रक्षक प्रणाली अजूनही खूप खर्चिक आहेत. विविध शस्त्रक्रिया केल्यानंतरही विविध गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात नातेवाईकांची मोठी आर्थिक हानी सुद्धा होत राहतेच. रुग्ण घरी आणणे आणि त्याची सुश्रुषा करणे विविध कारणांनी जिकीरीचे होऊन बसले आहे. मुळात उपचार थांबवणे, रुग्णाला दुस-या रुग्णालयात किंवा पर्यायी व्यवस्थेत हलवणे इत्यादी निर्णय कुणी घ्यायचे यावर एकमत होत नाही… आणि तोवर रुग्ण जन्मा-मरणाच्या उंबरठ्यावर निष्कारण ताटकळत राहतो. आणि रुग्णाची मन:स्थिती समजण्याची काहीही सोय नसते… केवळ अंदाज लावावा लागतो. रुग्णाच्या अत्यंत जवळच्या अर्थात पती, पत्नी, मुलगा या नातलगांवर या गोष्टीचा प्रचंड मोठा ताण येतो. त्यांची स्वत:ची मानसिक कुचंबणा तर होत असतेच, शिवाय अपराधीपणाची भावनाही मूळ धरू शकते! 

यावर उपाय शोधणे ही परिस्थितीची निकड बनलेली असताना भारतात यासंबंधी कोणताही स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही. परंतू २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यानुसार व्यक्तीला स्वत:ला स्वत:वर होणारे उपचार स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे. याला कायदेशीर भाषेत लिविंग विल अशी संज्ञा आहे.

अत्यवस्थ रुग्णावर Ventilator अर्थात कृत्रिम किंवा यंत्राच्या साहाय्याने श्वासोच्छवास देणे, CPR (Cardiopulmonary Resuscitation) अर्थात विशिष्ट वैद्यकीय कृती, उपकरणाच्या साहाय्याने हृद्य कार्यान्वित करणे, नळीवाटे, शीरेतून पोषण पुरवणे, Dialysis अर्थात यंत्राच्या साहाय्याने रक्त शुद्धीकरण करणे इत्यादी प्रकारांनी प्राणरक्षक उपचार केले जातात. जे खर्चिक आहेतच, शिवाय रुग्णाला वेदनादायक आहेत, असे दिसून येते. अर्थात इतक्या वेदना होत असतानाही रुग्णाला जगायचे आहे की नाही, हे समजणे शक्य नसते! अगदी मरावेसे वाटण्याची अत्याधिक इच्छा असली तरी अखेरीस तसं व्हावं, अशी रुग्णाची इच्छा असेलच असंही निश्चित म्हणता येत नाही!… मरणाचा अनुभव हा पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष असला पाहिजे, असे वाटते. असो. या विषयाला विविध बाजू आहेत.

आपल्या अंतकाळी आपल्या जवळच्या नातलगांना कोणताही निर्णय घेण्यात अडचण येऊ नये, अशी कायदासंमत व्यवस्था आता अस्तित्वात आलेली असून प्रक्रिया सोपी आहे. आपण मानसिकदृष्ट्या निर्णय घेण्यास सक्षम असतानाच आता लिविंग विल अर्थात आपल्यावर शेवटी कसे उपचार व्हावेत किंवा होऊ नयेत, हे आपण ठरवू शकतो. महाराष्ट्र राज्य या कायद्याची अंमलबजावणी करू पाहणारे पहिले राज्य ठरले आहे. इच्छामरण या पेक्षा हा कायदा वेगळा आहे, अये विधिज्ञ लोकांनी स्पष्ट केले आहे.

थोडक्यात आपण जर अत्यवस्थ अवस्थेत गेलो, तर आपल्यावर कोणते उपचार करावेत किंवा करू नयेत याबाबत आपण आधीच कायदेशीर सूचना देऊन ठेवायच्या. आपण अशा अवस्थेत पोहोचेपर्यतच्या कालापर्यंत आपण या सूचना रद्दही करू शकतो, ही यातील महत्त्वाची तरतूद आहे! 

मी वर जे काही लिहिलं आहे, ते माझ्या समजूतीनुसार लिहिले आहे, आणि हा लेख म्हणजे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हे! परंतू विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने, व अनेक लोकांना याबाबत कल्पना नसण्याची शक्यता असल्याने मी आपलं समोर मांडलं आहे. तज्ज्ञ, विचारवंत, वैद्यकीय व्यावसायिक, कायदेतज्ज्ञ याबाबत आणखी माहितीप्रद लेखन करतीलच, अशी आशा आहे.

वेळेपूर्वीच प्रत्येकाने याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असं वाटतं! 

संदर्भांसाठी आजच्या दैनिक सकाळ, पुणे मधील एका बातमीचे छायाचित्र सोबत जोडले आहे. सर्वांना शुभेच्छा. जीवेत शरद: शतम!

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८५ आणि ८६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८५ आणि ८६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८५ – – – 

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।

जपू नेमिला नेम गौरीहराचा ।

स्वये नीववी तापसी चंद्रमौळी । 

तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ।।८५।।

अर्थ : योगेश्वरांचे विश्रांतीस्थान असलेले रामनाम जपा. प्रत्यक्ष गौरीहर म्हणजे शंकर देखील नित्यनेमाने आपला ठरलेला रामनामाचा जप पूर्ण करतात. या नामजपाने भगवान शंकरांना देखील शांती मिळते. असा हा श्रीराम अंतकाळी आपली सुटका करील.

विवेचन : रामनामाचे महत्व सांगताना समर्थ म्हणतात की रामनाम हे योग्यांचा विश्राम म्हणजे विश्रांती आहे. इथे समर्थांनी त्यासाठी ‘ योगेश्वर ‘ शब्द वापरला आहे. या शब्दाचे तीन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ जो समर्थांना अपेक्षित आहे तो म्हणजे योगेश्वर भगवान शंकर. आपण श्रीकृष्णाला देखील योगेश्वर म्हणतो. पांडुरंगशास्त्री आठवले तर आपल्या स्वाध्यायात श्रीकृष्णाला ‘ योगेश्वर भगवानच ‘ म्हणतात. हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ म्हणजे जे योगी साधक आहेत, तप करणारे आहेत ते. तेव्हा यातील कोणत्याही अर्थाने योगेश्वर शब्द घेतला तरी सर्व श्रेष्ठ पुरुष शेवटी रामनामाचाच आश्रय घेतात. रामनाम हे त्यांचे विश्रांतीस्थान आहे हेच यातून स्पष्ट होते.

श्रीकृष्ण देखील रामनामाचा जप करत असत असा पुराणात उल्लेख आहे. कलियुगात रामनाम हेच तारक आहे असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले होते. श्रीकृष्ण आणि श्रीराम दोघेही विष्णूचेच अवतार. त्यांच्यामध्ये भेद नाही. पण कलियुगात भक्तीचा सोपा मार्ग म्हणून श्रीकृष्णांनी रामनाम घेण्याचा उपदेश केला आहे. राम, कृष्ण आणि शंकर यांच्यातही भेद नाही. जसे भगवान शंकर रामनामाचा जप करीत असतात तसेच श्रीराम देखील भगवान शंकराचे पूजन करीत असतात. शंकराचार्यांनी याच अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन केले होते. परमेश्वर एकच आहे. आपण त्याचे जे कोणते नाम घेऊ, त्यावर आपली दृढ श्रद्धा हवी.

भगवान शंकरांसारखा योगिराणा देखील नित्यनेमाने श्रीरामांचे नामस्मरण करतो. आपल्या नामस्मरणाचा जो नेम आहे, त्यात खंड पडू देत नाही. तपस्वी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांचा दाह रामनामानेच शांत झाला. रामनाम हेच त्यांचे विश्रांतीचे ठिकाण आहे. तिथेच ते रमतात. आपणही या रामनामाचे नित्यनेमाने स्मरण करावे. रामनामाची जीवाला सवय असली तरच अंतकाळी आपल्या मुखात रामनाम येईल. रामनामामुळे आपली ऊर्जा ऊर्ध्वगामी होते. विकारांमुळे आपली ऊर्जा अधोगामी होते. आयुष्यात जाणीवपूर्वक जर नियमितपणे रामनाम घेतले तर अंतकाळी देखील मुखातून तेच बाहेर पडेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” रामनाम ही अंतकाळी आपल्या मुखातून बाहेर पडणारी शेवटची गोष्ट असली पाहिजे. ” असे नाम आपल्या मुखात अंतकाळी आले तर श्रीराम आपली या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद :: 

१. ज्याप्रमाणे श्रेष्ठ योगेश्वरांचे ‘रामनाम’ हे विश्रांतीस्थान आहे, तसे माझे मन संसाराच्या धावपळीतून थकल्यावर रामनामात विसावा शोधते का? 

२. वेगवेगळ्या देवांमध्ये किंवा पंथांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझे चित्त कलुषित करतो आहे, की सर्वांभूति एकच तत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो? 

३. माझ्या दैनंदिन जीवनातील विकारांमुळे माझी ऊर्जा ‘अधोगामी’ (खाली) जात आहे की नामस्मरणामुळे ती ‘ऊर्ध्वगामी’ (सकारात्मकतेकडे) प्रवास करत आहे? 

४. गोंदवलेकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “रामनाम ही अंतकाळी मुखातून निघणारी शेवटची गोष्ट असावी” यासाठी मी आजपासूनच नामस्मरणाचा ‘नित्यनेम’ आणि त्याची गोडी मनाला लावली आहे का?

== == == == == == == 

श्लोक क्र. ८६ – – – 

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।

सदानंद आनंद सेऊनि राहे ।

तयावीण तो सीण संदेहकारी ।

निजधाम हे नाम शोकापहारी ।।८६।।

अर्थ : विश्राम म्हणजे विश्रांती कुठे आहे तर ज्याच्या मुखात रामनाम आहे तेथेच ! ज्याच्या मुखी रामनाम आहे असा मनुष्य अखंड आनंदाचे सेवन करीत असतो. रामनामाशिवाय अन्य काही करणे म्हणजे व्यर्थ शिणवणे आणि संदेह उत्पन्न करणारे आहे. नाम हेच निजधाम असून ते सर्व शोक हरण करणारे आहे.

(सदानंद – अखंडित आनंद, सीण – शीण/कष्ट/ताप, संदेहकारी – संशय निर्माण करणारा, शोकोपहारी – शोक/दुःख हरण करणारा)

विवेचन :  रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की ज्याच्या मुखी हे रामनाम आहे त्याला त्या ठिकाणी शांती, समाधान आणि आनंद या गोष्टी प्राप्त होतात. विश्राम म्हणजे विश्रांती. विश्राम शब्दातही ‘ राम ‘ आहे. आपण आनंद मिळावा म्हणून किंवा विश्रांती मिळावी म्हणून आयुष्यभर केवढी खटपट करत असतो ! घर, पत्नी, मुलेबाळे ही सर्व आनंदाची ठिकाणे आहेत असे आम्ही सांसारिक मानतो. तिथेच विश्रांती मिळते असे समजतो. विश्रांतीसाठी काही लोक निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहतात. व्यावहारिक दृष्ट्या हे सर्व बरोबरच आहे. परंतु ज्याला अध्यात्मसाधना करायची आहे, अशा व्यक्तीने अंतर्मुख होऊन या बाह्य गोष्टींकडे दुर्लक्षच करणे श्रेयस्कर.

कोणत्याही प्रापंचिक माणसाचा संसाराचा अनुभव संपूर्णपणे सुखद आहे असे होत नाही. तो तिथे सुख शोधू पाहतो पण क्षणिक सुखाचे काही क्षण सोडले तर त्याला दुःख आणि विषादाचीच प्राप्ती होते. मात्र ज्याच्या मुखात रामनाम आहे किंवा भगवंताचे नाम आहे असा माणूस कितीही विपरीत परिस्थिती असली तरी विचलित होत नाही. त्याचा आनंद सुखाने वाढत नाही किंवा दुःखाने कमी होत नाही. म्हणून तर भगवंताच्या नामात असलेले संत एका अनोख्या मस्तीत राहताना आपल्याला आढळतात. त्यांच्या मुखावर तेज असते, ते अंतर्यामी असणाऱ्या आनंदामुळे विलसत असते. हा आनंद अखंडित असतो. ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग ‘ अशी संतांची अवस्था असते ती याचमुळे.

प्रापंचिक माणूस कधी कधी केवळ नामाने मला भगवंताची प्राप्ती खरंच होईल का अशी शंका घेतो. हा संशय वाढत गेला की नामस्मरणावरील त्याचा विश्वास कमी होऊ लागतो. तो पुन्हा विषयविकारात अडकतो. तिथे आनंद शोधू लागतो. पण त्याची ही खटपट व्यर्थ शिणवणारी असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

” नामपरते तत्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशील झणी । 

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनि श्रीहरी जपे सदा ।।”

गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” नामातच भगवंताचा वास आहे. ” म्हणून नाम हेच निजधाम आहे. आपल्याला स्वस्वरूप जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी नाम हेच साधन आहे. परमेश्वर वेदांनाही अगम्य आहे म्हणजे वेदही त्याला पूर्णपणे जाणू शकत नाहीत. तो आपल्या कल्पनेपलिकडे आहे. पण नामात त्याचा वास आहे. म्हणून आपण नाम घ्यावे. वैखरी, मध्यमा, पश्यन्ती आणि परा या वाणीच्या चार अवस्था आहेत. अखंड नामस्मरण करीत राहिल्याने एक वेळ अशी येते की आपले नाम परा वाणीपर्यंत पोहोचते. नामस्मरण अखंड सुरु राहते. देहाला सुखदुःखे जाणवत नाहीत. माणूस त्याच्यापलीकडे जातो. तो अखंड आनंदाचे सेवन करतो.

स्वसंवाद :: 

१. मी ज्या घर, कुटुंब किंवा निसर्गरम्य ठिकाणी ‘विश्रांती’ शोधत आहे, ती मला कायमची शांतता देऊ शकते का ?

२. “केवळ नामाने भगवंत मिळेल का?” अशा ‘संदेहकारी’ (संशयी) विचारांमुळे मी माझे नामस्मरण अर्धवट सोडून पुन्हा संसाराच्या चक्रात तर अडकत नाहीये ना ? 

३. माउलींनी हरिपाठात म्हटल्याप्रमाणे, “वाया आणिक पंथा जाशील झणी” हे ठाऊक असूनही माझे मन इतर निरर्थक मार्गांवर का भटकत असते ? 

४. माझे नामस्मरण केवळ वरवरच्या ‘वैखरी’ वाणीत सुरू आहे, की ते माझ्या अंतर्मनाचा ठाव घेऊन ‘परा’ वाणीपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील आहे?

– क्रमशः श्लोक श्लोक ८५  आणि ८६ 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका कोंकणी ब्राह्मणाची कहाणी.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एका कोंकणी ब्राह्मणाची कहाणी.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

 दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन

पहिल्या महायुद्धात बर्लिन शहरावर बॉम्ब टाकणाऱ्या कोकणी ब्राह्मणाची कहाणी 

पहिला भारतीय वैमानिक म्हणजे दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन.. यांचा जन्म १० जुलै १८८३ रोजी रत्नागिरी येथे झाला. ‘दत्तू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दत्तात्रयांचे शिक्षण पाचवी इयत्तेपर्यंतच झाले. परंतु त्यांच्या खोडकर व हट्टी स्वभावामुळे त्यांचे वडील लखूतात्या यांनी त्यांना घराबाहेर काढले. *

दत्तूचे नामकरण

दत्तू चालत कोल्हापूरला गेले आणि तिथून विनातिकीट मुंबईला पोहोचले. तिथे त्यांनी ‘मस्जिद बंदर’ येथे सहा महिने रेल्वे हमाल म्हणून काम केले. त्यानंतर ते माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये ‘वायरमन’ म्हणून रुजू झाले आणि पुढे ‘इंजिन ड्रायव्हर’ बनले. नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी आपले आडनाव बदलून ‘अँग्लो-इंडियन’ पद्धतीचे केले – ‘डी. लॅकमन पॅट’ (D. Lacman Pat) असे नामकरण केले. एके दिवशी अचानक, मुंबई बंदरात उभ्या असलेल्या ‘स्ट्रान्स फेल्स’ (Strance Fells) या जर्मन जहाजावर ते चढले आणि तपासणीच्या वेळी कोळशाच्या गोणीत लपून बसले. जहाज समुद्रात दूर गेल्यावर, त्यांनी जर्मन कॅप्टन हेन्रिक ज्योडेल यांची मनधरणी केली आणि वायरमन व इंजिन-देखभाल (maintenance) करण्याचे काम मिळवले. हेन्रिक त्यांना पासपोर्टशिवाय जर्मनीला घेऊन गेले आणि हॅम्बर्ग येथे त्यांना ‘मरीन इंजिनिअरिंग’चे प्रशिक्षण दिले. त्यानंतर दत्तू स्कॉटलंडला गेले आणि ‘ओशन किंग’ (Ocean King) या जहाजावर मरीन इंजिनिअर म्हणून रुजू झाले. 

मरीन इंजिनिअर ते पायलट

*१९११ मध्ये हे जहाज लिव्हरपूल आणि न्यूयॉर्क दरम्यान अनेकदा ये-जा करत असे. त्यांच्या इंजिनिअरिंगच्या कामावर खूश होऊन, १९१२ मध्ये त्यांना ‘तुकाराम’ या जहाजावर इंजिन बसवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले. १९१४ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा दत्तू ब्रिटनच्या ‘वॉर ऑफिस’मध्ये (युद्ध कार्यालयात) गेले आणि त्यांनी ‘अँब्युलन्स कोअर’मध्ये (रुग्णवाहिका पथकात) काम मिळवले. त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना ‘ससेक्स’ ब्रिगेडमध्ये ‘सैनिक’ म्हणून बढती देण्यात आली. तिथे त्यांना अत्याधुनिक शस्त्रे, बंदुका आणि तोफा चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष रणांगणावर लढण्यासाठी फ्रान्सला पाठवण्यात आले. पुढे त्यांची ‘रॉयल एअर फोर्स’मध्ये (हवाई दलात) निवड झाली. तिथे त्यांनी मालवाहू (कार्गो) आणि बॉम्बर विमाने चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि ते एक कुशल वैमानिक बनले. दाट धुक्याचा फायदा घेत दत्तू यांनी थेट बर्लिनवर बॉम्बफेक केली. शत्रूच्या ‘अँटी-एअरक्राफ्ट’ (विमानविरोधी) तोफांचा मारा चुकवत त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली आणि थेट ‘कैझर पॅलेस’वर बॉम्ब टाकले. बर्लिनवर बॉम्बफेक करणारे जगातील पहिले ‘बॉम्बर पायलट’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. किंग जॉर्ज पाचवे यांनी स्वतः दत्तू यांच्या कोटावर लष्करी सन्मान आणि शौर्यपदक लावून त्यांचा गौरव केला. त्यांना ‘स्वर्ड ऑफ मिलिटरी ऑनर’ (लष्करी सन्मानाची तलवार) देऊन सन्मानित करण्यात आले. *

पायलट दत्तूच्याआयुष्यातील भाग्यवान क्षण

*या समारंभानंतर, दत्तू यांनी इंग्लंडच्या राजाला सांगितले की त्यांचे खरे नाव दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन आहे आणि ‘डी. लॅकमन पट’ (D. Lacman Pat) हे अँग्लो-इंडियन नाव धारण करूनच ते सैन्यात दाखल झाले होते. हे ऐकून राजाने अतिशय आनंदाने आणि कौतुकाने उद्गार काढले – “आमच्या हवाई दलात एक मर्द मराठा तरुण!” आणि त्यांनी दत्तू यांच्यावर चुकीचे नाव धारण केल्याबद्दल (impersonation) कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. ही घटना २४ एप्रिल १९१९ रोजी घडली. त्यांची ‘लेफ्टनंट’ या पदावर पदोन्नती झाली आणि त्यांना दरमहा बाराशे रुपये इतका भरघोस पगार मिळू लागला! दत्तू उत्स्फूर्तपणे उद्गारले – “हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान क्षण आहे!”* 

१९२१ मध्ये भारतात परत

*१९२१ मध्ये मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरनी दत्तू यांना ‘शाही पाहुणे’ (Royal Guest) म्हणून आमंत्रित केले. दत्तू रत्नागिरीला परतले आणि त्यांनी अमरावतीच्या चंद्रताई शेवडे यांच्याशी विवाह केला. १९३० मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्या साहसी कामगिरीची माहिती २५ मार्च १९१९ रोजी ‘लंडन गॅझेट’मध्ये प्रकाशित झाली. लंडनची वर्तमानपत्रे आणि ‘ग्राफिक’ (Graphic) या नियतकालिकाने १३ मे १९१९ रोजी त्यांचे सविस्तर चरित्र प्रसिद्ध केले. प्रसिद्ध मराठी दैनिक ‘केसरी’नेही १३ मे १९१९ रोजी दत्तू यांच्या पराक्रमाचा सविस्तर वृत्तांत दिला. रत्नाकर शिवराम वाशीकर आणि अनंत लक्ष्मण मराठे यांनी लिहिलेले ‘इंडियाज फर्स्ट पायलट’ (India’s First Pilot) हे पुस्तक १८ ऑक्टोबर २००३ रोजी प्रकाशित झाले. दुसरे महायुद्ध (१९३९) – १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि लंडनहून आलेल्या आदेशानुसार, दत्तू यांच्यावर दिल्ली येथे ‘ऑल इंडिया मिलिटरी, नेव्हल अँड एअर फोर्स अकादमी’ (सर्व-भारतीय लष्करी, नौदल आणि हवाई दल अकादमी) स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दत्तू यांनी या अकादमीमध्ये अनेक भारतीयांना प्रशिक्षण दिले. *

कर्करोगामुळे निधन

*१८ ऑक्टोबर १९४३ रोजी कर्करोगामुळे दत्तू यांचे निधन झाले. त्यांची पत्नी आणि मुलगा नागपूर येथे स्थायिक झाले. त्यांचे नातू – प्रभाकर पटवर्धन हे मुंबईतील कांदिवली येथे आपला स्वतःचा अभियांत्रिकी व्यवसाय चालवत आहेत. जे. आर. डी. टाटा यांचा उल्लेख नेहमीच ‘भारताचे पहिले वैमानिक’ असा केला जातो. त्यांनी १९२७ मध्ये विमान चालवले होते; परंतु त्याआधीच, १९१४ मध्ये दत्तात्रय पटवर्धन यांनी ‘बॉम्बर पायलट’ (बॉम्बफेकी विमानाचे वैमानिक) म्हणून इतिहास घडवला होता. त्यामुळे, त्यांनाच ‘भारताचे पहिले वैमानिक’ म्हणून सन्मानित केले जाणे आवश्यक आहे. * 

समस्त मराठी जनांना ही अभिमानास्पद गोष्ट आहे. 

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(अजय सिंग यांच्या पायांखाली शत्रूने पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा भयावह स्फोट झाला. झाडाच्या जमिनीवर आलेल्या मूळाने बरेचसे स्फोटक अडवले होते पण तरीही अजय सिंग यांचा उजवा पाय घोट्याच्या थोडासा वर तुटून दूर जाऊन पडला..! आणि हा स्फोट झाल्या झाल्या गोळीचा आवाजही कानी पडला. याचाच अर्थ शत्रू जवळच दडून बसला आहे…! आता इथून निसटून मागे जायला पाहिजे.. अन्यथा संपूर्ण पथकाचा जीव धोक्यात निश्चित येणार! ) 

इथून पुढे – – 

आपला पाय तुटून पडला आहे याची अजय सिंग यांना बराच वेळ जाणीवच झाली नाही… अंगावर मांसाचे तुकडे चिकटलेले होते… रक्त लागलेले होते… पण त्यांचे सारे लक्ष लपून बसलेल्या शत्रूकडे केंद्रित झाले होते. त्यांनी त्या दिशेला रायफल वळवली आणि गोळीबार करण्याच्या पवित्र्यात आले!

सहकारी म्हणाला… ”अजय, एकही गोली चली है… ” 

त्यावर अजय सिंग म्हणाले, ”ते त्यांच्या रायफली नीट साफ करीत नसतील म्हणून एकच गोळी सुटू शकली! ” याही परिस्थितीत दोघे हसले!

तेवढ्यात सहकाऱ्याचे लक्ष अजय सिंग यांच्या तुटून पडलेल्या पायाकडे गेले… बूट असलेला पाय रक्ताने माखलेला! “अजय… तुम्हारा पैर! ” सहकारी उद्गारला.

“सिर्फ एक पैर ही उड गया है.. बाकी बॉडी तो अभी ठीक है… पहले गोली कहां से आयी देखते हैं! ” 

सहकारी अजय सिंग यांच्याकडे बघतच राहिला! खरं तर शत्रूच्या बाजूने गोळीबार झालाच नव्हता. क्लेमोर माईनसाठी जो डेटोनेटर असतो, तो या धावपळीत फुटला आणि त्याचा गोळीसारखा आवाज झाला होता… पण ते लगेच लक्षात आले नव्हते. अजयसिंग यांच्या सहकाऱ्याला वाटले की पाकिस्तान्यांनी बहुदा आर. पी. जी. (रॉकेट प्रोपेल्ड गन) फायर केली आहे ज्यामुळे मोठा खड्डा पडू शकतो!

इतरत्र लपून बसलेल्या पथकांनाही शत्रूचा गोळीबार झाल्याचे वाटले! अशा वेळेस तिथून सुरक्षित माघारी फिरणे हा मार्ग उरला होता. कारण त्या बाजूने पाकिस्तानी सेना येण्याची शक्यता होती, आणि आपले सैनिक जवळजवळ त्यांच्या सीमेत घुसले होते..! स्फोटाच्या आवाजाने पाकिस्तानची आणखी कुमक आपल्या मागावर येण्याची दाट शक्यता होती.

आता या जखमी अवस्थेत अजयकुमार यांना सोडून माघारी फिरता येणार नव्हतं… कुणाही सैनिकाला दुसरा सैनिक असं सोडून येत नाही!

अजय यांना खांद्यावर टाकून त्यांचा ‘Buddy’ (सहकारी) मागे निघाला.. त्यावर अजय म्हणाले… ”ठहर जा! जिसने गोली चलायी है उसे खतम कर के जायेंगे! ” यावर त्यांचे काही न ऐकता सहकारी पुढे चालत राहिला. अजय सिंग मात्र एका हातात तुटलेला पाय सावरत, दुसऱ्या हातातली एके-४७ रोखून सज्ज होते गोळीबाराला उत्तर द्यायला!

या पथकात अगदी हट्टाने सहभागी झालेला एक वैद्यकीय साहाय्यकही होता. त्याचा फायदा झाला. त्याने त्याच्याकडच्या चाकूने सलाईनची बाटली फोडली आणि ते सर्व द्रव अजय सिंग यांच्या जखमेवर ओतले. हे सर्व अंधारात होत होतं. विजेरी पेटवणे धोक्याचे होते! द्रव ओतल्यावर मात्र प्राणांतिक वेदना सुरु झाल्या. पण तोंडातून एक अस्फुट किंकाळीसुद्धा मारता येणार नव्हती!

आपल्या सहकाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत मागे सोडून निघून यायचे नाही अशी पक्की शिकवण भारतीय सैनिकांना दिलेली असते. सहकारी म्हणजे Buddyचं स्वत:चं वजन ९५ किलो.. अजय सिंग त्याला म्हणाले, ”आपल्याला इथवर पोहोचायला दोन दिवस लागले होते. तू मला खांद्यावर घेऊन असं किती अंतर धावशील? मला इथंच सोड. मी मागे कुणी आले तर त्याचा समाचार घेईन! ” अर्थात buddy त्यांचं ऐकणार नव्हताच… त्याने अजय सिंग यांना उचलून धावायला सुरुवात केली!

स्ट्रेचर तयार करणे शक्य नव्हते. buddy ने अजय सिंग यांना स्वत:च्या पटक्याने स्वत:भोवती गुंडाळून घेऊन बांधले. पुढे तीस फूट खोल उतरून जायचे होते. तो अजय सिंग यांना घेऊन घसरत खाली गेला आणि दोघेही एका ओढ्यात कोसळले. सलाईनची सुई निघून आली. जखमेवरच्या पट्ट्या ओल्या झाल्या!

भारतीय सीमा अजून बरीच दूर होती. काल रात्री चालायला सुरुवात केली होती. आजच्या दिवसाची संध्याकाळ होत आली होती तरीही वाट उरकेना. पुढे चालताना एका दगडावरून buddy चा पाय निसटला आणि तो अजय यांना घेऊन खाली कोसळला.. यावेळी त्याचा पाय दोन दगडांच्या सापटीमध्ये विचित्र पद्धतीने अडकून बसला. घोटा सुजला. पाय बाहेर काढता येईना. मागून आलेले दोन सैनिक थांबले. त्यांनी त्या ओढ्यात पडलेल्या एका झाडाची जाड फांदी आणली आणि ते दोघे आणि अजय सिंग यांनी जोर लावून तो दगड थोडा बाजूला करण्यात यश मिळवले. buddy च्या पायातील बूट कापून काढावा लागला. सूज प्रचंड होती. पायाचे हाड मोडलेच असावे. तरीही त्याची अजय सिंग यांना खांद्यावर घेऊन चालायची तयारी होती! सोबत प्रत्येकी ३५ किलोचे ओझे होतेच!

आता पुढे आणखी दोन डोंगर चढून जावे लागणार होते. आता शत्रूच्या सीमेपासून काही अंतर पुढे आल्याने त्यांनी थांबून त्यांचे शर्टस, टीशर्टस फाडून स्ट्रेचर तयार केले. पहिला डोंगर चढण्याच्या प्रयत्नात अजय यांच्या पायाचे ड्रेसिंग निघून आले. अंधार आणि निसरडा रस्ता. अजय सिंग स्ट्रेचरवर जवळजवळ बसलेल्या स्थितीत होते. डोंगर चढताना ते ही हाताला लागेल ते गवत धरून जोर लावत होते. पुढे उतार लागला आणि हे सर्वजण पुन्हा खाली घसरून पडले.. पुन्हा उठले.. ”भाई को साथ लेके जायेंगे… ऐसे थोडेही न पिछे छोडके जायेंगे… ” हे म्हणताना आता ते सर्वजण हसत होते!

अजय यांच्या पायांतून रक्त जास्त वाहू लागल्याचे त्यांना जाणवले. मग त्यांनी एक स्लीपिंग bag उपयोगात आणली. तिच्या आत अजय यांचा पाय सरकवला. आतल्या आत विजेरी चालू केली आणि त्या तेवढ्याशा उजेडात ड्रेसिंग केले! शत्रूला उजेड दिसला असता तर त्यांनी तिथे निश्चित गोळीबार केला असता!

सहकाऱ्यांचे हास्यविनोद सुरूच होते. मात्र त्यांच्या मनात अजय यांच्याबद्दल खूप काळजी दाटून आलेली होती. कारण जखमेतून खूप रक्त वाहून गेले होते! मोडलेल्या पायाने चालणारा पहिला buddy तिथवर पोहोचला आणि त्याने अजय यांना पुन्हा खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली…! Don’t Leave Enemies Alive… Don’t Leave Friends Behind! शत्रूला जिवंत सोडू नका… आणि मित्राला रणांगणात सोडून माघारी येऊ नका… असा भारतीय सैनिकांचा दंडक आहे!

आता ते एका पोस्टवर पोहोचले होते पण जिथून हेलीकॉप्टर मिळू शकेल अशी पोस्ट आणखी खूप दूरवर होती!

त्या पोस्टवर पोर्टर लोकांना बोलावून घेतले गेले. ते सारे जण जीवाच्या आकांताने अजय यांना घेऊन धावले. सकाळी साडेसात वाजता हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचले पथक…! रुग्णालयात पोहोचेपर्यंत अजय सिंग शुद्धीवर होते… आणि शांत होते! त्यांचा पाय आणखी वरपर्यंत कापून काढावा लागला!

आपल्याला काही झाले तर घरच्यांना कळवावे यासाठी अजय यांनी त्यांच्या हातावर घरचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता. पण इकडे मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांच्या युनिटमधील एका सैनिकाकडून त्यांच्या गावातील एकाचा क्रमांक मिळवला आणि संपर्क साधला. पण अजय यांचे वडील शेतात गेलेले होते. काही वेळाने त्यांच्याशी बोलणे झाले. साहेब म्हणाले, “आपल्या मुलाचा एक पाय तुटला आहे… पण बाकी शरीर सुरक्षित आहे.. जीवाला धोका नाही! ” त्यावर वडिलांना विश्वास बसला नाही. ते म्हणाले, “अगर ठीक है तो मेरी उसकी बात करावो साब! ” 

यावेळी अजय यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले होते त्यामुळे लगेच त्यांच्याशी बोलणे करून देणे अशक्य होते. साहेब म्हणाले, “अभी बात नहीं हो सकेगी! ” त्यामुळे तर वडिलांची खात्रीच पटली.. आपला अजय गेला! त्यांनी घरी काहीही सांगितले नाही. अजय यांच्या पत्नीला सांगितले की तिच्या माहेरच्या एका माणसाचा रस्ता अपघात झाला आहे, त्याला बघायला जातो आहोत.. आणि ते लगोलग जीपमधून श्रीनगरकडे निघाले सुद्धा!

अजय यांच्या मातोश्रींना मात्र अंदाज आला होता.. कारण अजयच्या वडिलांनी तिला एकांतात घेऊन सांगितले होते… ”अजय को प्रोब्लम हुवा है! ”

 इकडे अजय यांच्या पायांवर प्रारंभिक उपचार झाले आणि त्यांना बाहेर आणण्यात आले. साहेबांनी पुन्हा अजय यांच्या वडिलांना फोन लावला. त्यावर त्यांना अजयच फोनवर बोलत आहेत यावर विश्वास बसला नाही. त्यावर त्यांच्या सोबत जीपमध्ये असलेल्या व्यक्तीने अजय यांचा फोन घेतला आणि खात्री करून घेतली की अजय जिवंत आहेत! अजय त्यांना सांगत होते की, तुम्ही माघारी जा. इथवर येण्यास खूप वेळ लागेल. बरा झालो की मी गावी येणारच आहे लवकर. पण बापाचे काळीज काही मानायला तयार होईना!

इकडे गावात कर्णोपकर्णी वार्ता पसरली. लोकांची अंत्यविधीची तयारी झाली. अजय यांच्या पत्नीला मात्र काहीच खबर नसल्याने त्या शेजारी जाऊन हास्यविनोद करून येत होत्या, नेहमीची कामेही सुरु होती. अजय यांच्या मातोश्री मात्र त्यांना चोरून लपून रडून घेत होत्या. सुनेला धक्का बसू नये याची त्यांना काळजी होती! शेवटी त्या गावातल्या मंदिरात जाऊन बसल्या!

अजय यांच्या वडिलांना त्यांच्या धाकट्या मुलाचा फोन आला. त्यांनी परिस्थिती सांगितली. तोही म्हणाला, ‘जब तक शकल न देखो… तब तक वापीस नहीं आना! ‘

अजयचे वडील शेवटी खूप तासांनी श्रीनगरमध्ये पोहोचले. पोराचा एक पाय तुटलेला त्यांनी पाहिला आणि रडतच बाहेर पडले. माघारी निघाले आणि अर्ध्या वाटेतून माघारी फिरले.. रुग्णालयात आले म्हणाले… एकच पाय पाहिला… दुसरा पाय दाखव!

संपूर्ण उपचार प्रक्रियेत अजय यांनी वेदना मोठ्या धीराने सहन केल्या. कितीही दुखले तरी ते चेहऱ्यावर दाखवत नसत… जणू आपण किती वेदना सहन करू शकतो याची ते स्वत:च स्वत:ची परीक्षा पहात होते.. यावर डॉक्टरही आश्चर्यचकीत होत असत! पाय अनेक वेळा कापावा लागला, त्यात संसर्ग झाला. पण सोबती असलेल्या buddy ने खूप सेवा केली आणि पाय वाचवला.

पुढील उपचारांसाठी अजयकुमार पुण्याच्या लष्करी उपचार केंद्रात आले. त्यांच्यासारखे कित्येक जखमी सैनिक त्यांनी पाहिले आणि आपली परिस्थिती बरी आहे, याची जाणीव त्यांना झाली. पण आपण असे पंगू होऊन राहायचे नाही, अशी त्यांनी मनोमन प्रतिज्ञा घेतली. कित्येकवेळा शस्त्रक्रिया झाल्या.. पण या सर्व वेदनांवर मात करीत ते कृत्रिम पाय लावून, काठीच्या आधाराविना चालायला आणि पुढे पळायलाही शिकले! आणि पुन्हा सेनेत सहभागी झाले. पूर्ण कार्यक्षमतेने. पण आता प्रत्यक्ष लढाईला जाता येणार नव्हते!

परंतू कामाच्या दर्जामुळे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेवर आफ्रिकन देशांत दोन वेळा धाडले गेले. तेथेही त्यांनी पारितोषिकप्राप्त कामगिरी बजावली. पण पायाला कृत्रिम पायामुळे जखमा होत होत्याच. सहकारी सैनिक, अधिकारी यांनी वैय्यक्तिक पातळीवर आर्थिक मदत उभारून परदेशातून उच्च दर्जाचा कृत्रिम पाय उपलब्ध करून घेतला!

या सर्व प्रवासात त्यांचे सहकारी त्यांच्या मागे सावलीसारखे उभे होते. एकदा ते मेस मध्ये सर्वांसोबत भोजन करीत होते. खीर आणायला उठले आणि त्यांच्या हातातली खिरीची वाटी खाली पडली. खीर जमिनीवर सांडली. ते पाहून त्यांचा buddy पुढे आला. त्याने ती जमिनीवर पडलेली खीर हाताने खायला सुरुवात केली… म्हणाला.. माझ्या भावाची खीर आहे… यावर सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते… सैनिक एकमेकांचे बंधू असतात ते असे…!

सैनिकी सेवेत काही जगावेगळे करावे असे या वीर सैनिकाच्या मनाने घेतले आणि मग एक निराळाच प्रवास सुरु झाला. पाठीवर दहा किलोचे ओझे, पूर्ण युद्धसाहित्य घेऊन चालण्याचा अहोरात्र सराव केला. पाय चांगला असताना अजयकुमार पर्वतारोहण अतिशय वेगाने करण्यासाठी प्रसिद्ध होते. कृत्रिम पायाच्या साहाय्याने हवालदार अजयकुमार जगातील सर्वांत उंचावर असलेली युद्धभूमी असलेल्या कुमार पोस्टपर्यंत चढले… त्यांच्या समवेत असे आणखी आठ जवान होते… हा एक जागतिक विक्रम ठरला.

पुढे अजयकुमार यांनी या पायांवर विमानातून छत्रीच्या साहाय्याने यशस्वी उड्या मारल्या. स्कुबा डायविंग शिकून घेतले. नेमबाजीत केवळ ४५ दिवसांचा सराव करीत राष्ट्रीय पातळीवर मेडल मिळवले. देशभरातल्या अनेक marathon स्पर्धांत सहभाग घेतला.

अजयकुमार आता तरुणांसाठी प्रोत्साहन देण्याचे उपक्रम करतात. त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरी ते अपुरेच वाटेल अशी त्यांची कामगिरी आहे. असे सैनिक भारतीय सैन्याला लाभले हे देशाचे सुदैवच म्हणावे लागेल!

— समाप्त — 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८३ आणि ८४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८३ आणि ८४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८३ – – – 

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।

उमेसी अती आदरे गूण गातो ।

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।

परी अंतरी नामविश्वास तेथे ।।८३।।

अर्थ : मदनाला म्हणजेच कामदेवाला ज्या भगवान शंकरांनी जाळून भस्म केले, ते शंकर स्वतः रामाचे ध्यान करतात. श्रीरामांचे गुण अत्यंत आदरपूर्वक पार्वतीला सांगतात. ज्यांच्या ठायी महान सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य हे गुण एकवटले आहेत, अशा भगवान शंकरांच्या अंतरंगात नामाबद्दलचा दृढ विश्वास वास करून आहे.

(ध्यातो – ध्यान करतो, उमा – पार्वती) 

विवेचन :  या श्लोकातही समर्थ रामनामाचे महत्व आपल्याला पटवून देत आहेत. रती आणि मदन ही जोडी म्हणजे कामभावनेच्या देवता मानल्या जातात. कामभावनेचे मानवी जीवनात काही एक महत्व जरूर आहे. परंतु जेव्हा ही कामभावना अतिरेकी रूप धारण करते, तेव्हा ती माणसाला विनाशाकडे नेते. रावणासारख्या पौराणिक व्यक्तिरेखा आणि नंतरच्या काळातही अगदी आजपर्यंत अतिरेकी कामवासनेने ज्यांचा विनाश घडवून आणला अशा अनेक व्यक्तींची नोंद इतिहासात आढळते. त्यातूनच युद्धे देखील उद्भवली आहेत. कामवासना जर ज्ञान, वैराग्य आणि कर्तव्याच्या आड येत असेल तर तिला जाळून भस्म करणेच योग्य ठरते. तेच भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून केले. तिसरा डोळा हा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. त्याचा दुसरा अर्थ असा की ज्ञानाच्या साहाय्याने कामभावनेवर नियंत्रण मिळवावे.

भगवान शंकरांनी त्यांची तपस्या भंग करणाऱ्या कामदेवाला आपला तिसरा डोळा उघडून भस्म केले. एवढे सामर्थ्य असणारे भगवान शंकर पार्वती मातेला श्रीरामांचे गुणवर्णन करून सांगतात. भगवान शंकर म्हणजे सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत प्रतीक! माता पार्वती देखील काही कमी नाही. ती देखील ज्ञान, वैराग्य आणि साधना यांचे प्रतीक आहे. पण या दोघांमध्ये एक समानता आहे. दोघांच्याही अंतरात रामनामाबद्दल अतूट श्रद्धा आहे. एवढे प्रचंड सामर्थ्य ठायी असलेले भगवान शंकर आणि पार्वती जेथे प्रभू श्रीरामाचे ध्यान करतात तेव्हा रामनामाची महती सांगण्यासाठी आणखी कोणते उदाहरण द्यायला हवे?

आपल्या मनातील कामवासना अनियंत्रित होत असेल, तर त्यावर नियंत्रण मिळवण्यास रामनाम हे अचूक आणि अमोघ अस्त्र आहे. परंतु अशा व्यक्तींनीच रामनाम घ्यावे असा याचा अर्थ नाही. ज्यांच्या ठायी ज्ञान, वैराग्य आणि शक्ती आहे अशा व्यक्ती देखील रामाचे ध्यान करतात. किंबहुना ज्ञान, वैराग्य आणि शक्ती प्राप्त होण्यासाठी रामनामासारखा दुसरा उपाय नाही असे देखील म्हणता येते. ज्ञान, वैराग्य आणि शक्ती यांचे अधिष्ठान रामनाम आहे. संत कबीर म्हणतात, ” कबिरा राम हृदय बसे, काम कहाँ घर होय? ” जिथे हृदयात रामाला स्थान दिले, तिथे कामासारख्या गोष्टींसाठी जागाच कुठे उरते?

स्वसंवाद ::

१. भगवान शंकर आणि माता पार्वती अत्यंत आदराने रामगुणांचे गायन करतात तरी देखील रामनामाचे महत्व मला स्वतःला पटवून देण्यासाठी अन्य गोष्टींची आवश्यकता वाटते का?

२. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हे गुण माझ्याकडे नसले, तरी या तिन्ही गुणांचे अधिष्ठान असणारे ‘रामनाम’ घ्यावे असे मला वाटते का?

३. माझ्या मनात जेव्हा एखादा वाईट विचार किंवा अनावर वासना डोके वर काढते, तेव्हा मी माझ्या ‘ज्ञानाचा तिसरा डोळा’ (विवेक) उघडून तिला भस्म करतो का?

– – – – 

श्लोक क्र. ८४ – – – 

विठोने शिरी वाहिला देवराणा ।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।

जिवा सोडवी राम हा अंतकाळी ।।८४।।

अर्थ :  प्रत्यक्ष विठ्ठलाने देवराणा म्हणजे श्रीशंकराला डोक्यावर धारण केले आहे. त्या श्रीशंकराच्या हृदयात मात्र रामनामाचा ध्यास आहे हे आपल्याला माहिती नाही का? मस्तकी चंद्र धारण करणाऱ्या महान तपस्वी अशा भगवान शंकराचा दाह रामनामाने शांत झाला. आपल्या अंतकाळी रामनामच आपल्याला सोडवणार आहे.

(विठोने – विठ्ठलाने, देवराणा – देवांचा राजा /महादेव, नेणा – जाणत नाही, तापसी – तपश्चर्या करणारा, चंद्रमौळी शिरावर चंद्र धारण करणारा (शंकर), निवाला – शांत झाला)

विवेचन : रामनामाचे महत्व पुन्हा स्पष्ट करणारा हा सुंदर श्लोक आहे. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे सर्व संत, वारकरी यांचे दैवत. पांडुरंग हा श्रीकृष्णाचाच अवतार मानला जातो. असा हा भक्तांचा लाडका असणारा पांडुरंग स्वतःच्या मस्तकावर श्रीशंकराला धारण करतो. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवाच्या पिंडीचा आकार दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे पांडुरंग स्वतःच श्रीशंकराचे गुणगान करतो. या अर्थाने देखील तो शंकराला डोक्यावर घेतो असे म्हणता येईल. कारण एखाद्याचे गुणगान करणे म्हणजे त्याला मस्तकी बसवणे. तेच पांडुरंगाने केले आहे. पण समर्थ पुढे म्हणतात की ज्या विठ्ठलाने श्रीशंकराला आपल्या शिरावर घेतले आहे, त्या भगवान शंकरांच्या हृदयात देखील रामानामाचा ध्यास आहे. या ठिकाणी श्रीरामाचे आणि रामनामाचे महत्व फारच सुंदररित्या आपल्याला पटवून दिले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे समर्थ रामनामाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर ठसवण्यासाठी वारंवार श्रीशंकराचे उदाहरण का देत आहेत याचाही विचार केला पाहिजे. ज्यांच्याकडे अथांग ज्ञान आणि वैराग्य आहे, तेच जर नामाचा आश्रय घेत असतील, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचा अहंकार गळून पडायला हवा, हाच समर्थांचा यामागील हेतू असावा.

श्रीशंकरांना रामनामाचा ध्यास लागलेला आहे. रामनाम म्हणजे जणू त्यांचा श्वास आहे. अशा पद्धतीचा ध्यास आपल्यालाही लागावा अशीच समर्थांची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महान तपसामर्थ्य अंगी असणारे भगवान शंकर जेव्हा सातत्याने रामनाम जपतात, तेव्हा आपण तर सामान्य माणसे! या श्लोकात भगवान शंकरांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात, “स्वये निवाला तापसी चंद्रमौळी. ” इथे निवाला शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे रामनामामुळे त्यांच्या जीवाला शांती लाभली. दुसरा अर्थ आपल्याला परिचित आहे. तो म्हणजे भगवान शंकरांनी जेव्हा हलाहल (विष) प्राशन केले तेव्हा त्यांच्या कंठाचा जो दाह होऊ लागला, तो कशानेही शमेना. त्यांनी मस्तकी गंगा धारण केली, गळ्याभोवती शीतल नाग धारण केला, शीतल असणारा चंद्र मस्तकी धारण केला. परंतु त्यांचा दाह केवळ रामनामानेच शांत झाला. या अर्थानेही ‘ निवाला ‘ हा शब्द वापरला आहे.

श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत आहे. त्यांना नेहमी तो समोर दिसत असतो. म्हणून ते कधीही ‘ तो राम ‘ म्हणत नाही. तर ‘ हा राम ‘ असे म्हणतात. एवढी त्यांची रामाशी एकरूपता आहे. पांडुरंगाने ज्यांना मस्तकी धारण केले आहे असे श्रीशंकर सुद्धा रामानामाचा ध्यास घेतात, तेव्हा असे पावन, पवित्र असे रामनाम आपली देखील अंतकाळी या भवसागरातून सुटका करील असे समर्थांना सांगायचे आहे.

स्वसंवाद :: 

१. पंढरीचा विठ्ठल आणि कैलासीचा राणा शिव यांच्यात जर कोणतेही द्वैत नाही, तर मी मात्र जाती-पाती, पंथ किंवा संप्रदायांच्या खोट्या भेदांमध्ये का अडकून पडलो आहे?

२. संसारातील वेगवेगळ्या संकटांमुळे किंवा वासनांमुळे जेव्हा माझ्या मनाचा ‘दाह’ होतो, तेव्हा मी तो शांत करण्यासाठी बाह्य गोष्टींकडे धावतो, की भगवान शंकरांप्रमाणे रामनामाचा आश्रय घेतो?

३. समर्थांना प्रभू श्रीराम जसे ‘हा राम’ म्हणून अगदी जवळ (अंतर्यामी) भासतात, तशी आत्मीयता आणि ओढ मला कधी नाम घेताना जाणवते का?

४. “अंतकाळी हाच राम आपल्याला सोडवणार आहे” हे अंतिम सत्य ठाऊक असूनही, मी माझा आजचा अमूल्य वेळ केवळ नश्वर गोष्टींची चिंता करण्यातच घालवत आहे का?

– क्रमशः श्लोक श्लोक ८३ आणि ८४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

सातवी इयत्तेत असतानाच त्याने मनात पक्के ठरवले… फौजेतच जायचं. त्यासाठी शारीरिक क्षमता उच्च दर्जाच्या लागतात, हे समजल्यावर तर रोज व्यायामाचा धडाका सुरु केला! गावातले अनेक तरुण फौजेत होतेच. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकायचे होते.

१९९९ मध्ये भारत-पाक कारगिल युद्ध झाले आणि त्यानंतर भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात सैन्यभरती सुरु झाली. इथवर त्याच्या वयाची सोळा वर्षे पूर्ण झाली होती. घरून वडिलांचे प्रोत्साहन होतेच. वडील तो भरतीसाठी निघाला की त्याच्या हातावर दोन हजार रुपये ठेवीत. आणि हरियाणाच्या बाहेरच्या राज्यात भरती असली की पाच हजार. पण ते वयच काहीसे अल्लड होते. बंगळूरु येथे होणार असलेल्या भरतीसाठी गेलेला असताना हा पठ्ठ्या चक्क सिनेमागृहात जाऊन बसला आणि एकाच चित्रपटाचे सलग तीन खेळ पाहून आला… तोवर इकडे भरतीसाठी त्याचे मित्र गेटच्या आत दाखल झालेले होते… याला काही प्रवेश मिळाला नाही! पण या लष्करी केंद्रावर त्याने PARA SF चे जवान पाहिले… त्यांचा रुबाब पाहिला आणि मग बस्स… आयुष्यात असाच गणवेश पाहिजे… असा प्रण केला.

पुढच्याच महिन्यात अजयकुमार भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले! प्रशिक्षणादरम्यान एक पाय मोडला… बरं होण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि प्रशिक्षण पूर्ण केलेच. आणि काहीच कालावधीत त्यांनी त्यांचे PARA COMMANDO बनण्याचे स्वप्न पूर्ण केले! ही फार मोठी झेप होती!

अजयकुमार यांचा स्वभावच जणू free style. संथ आयुष्य त्यांना आवडतच नसे. सुदैवाने त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये नेमणूक मिळाली आणि एका बहादूर सैनिकाची कारकीर्द सुरु झाली! बर्फाळ प्रदेशात प्रचंड आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अजयकुमार अतिरेक्यांशी लढण्यासाठी सज्ज झाले होते.

सैनिकी दल कोणत्याही मोहिमेवर निघताना त्या दलाचा वाटाड्या ही मोठी जबाबदारी असते. अजयकुमार आणि महाराष्ट्राचे प्रवीण पाटील हे कमांडो स्काउटच्या कामासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत!

खांद्यावर एम. एम. जी. , अंगावर पस्तीस किलो युद्ध साहित्य घेऊन मैलोनमैल चालण्याची सवय करून घ्यावी लागली!

दहा अतिरेकी, त्यांचे पाच कमांडर, असे एकूण पंधरा जण होते. त्यांच्या मागावर जाण्याचे आदेश मिळाले. या पहिल्याच मोहिमेत दोन अतिरेक्यांना टिपण्याची संधी मिळाली! काही वर्षांत सात मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या… एकूण तीस-पस्तीस अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात सहभागी होता आले! दोन दिवसाची मोहीम असताना त्याच ठिकाणी नाऊ दिवस थांबावे लागले. जवळचे अन्न संपल्यावर झाडाची पाने, वनस्पती खाऊन दिवस काढले! आणि तीन अतिरेकी टिपले!

पुढे पुढे तर परिस्थिती अशी होती की, ‘ऑपरेशन’ मिला मतलब भगवान मिल गया! म्हणजे सातत्याने अतिरेकी विरोधी कारवाया आपल्याला करायला मिळाव्यात, देशाचे शत्रू आपल्या हातून मारले जावेत.. अशी सैनिकांची आंतरीक इच्छा असे!

हवालदार अजयकुमार सिंग यांची ही सैनिकी वाटचाल सुरु होती. जवळजवळ सात-आठ वेळा ते मृत्यूला हुलकावणी देऊन परत आले होते. आणि एके दिवशी….

देखण्या, तरण्याबांड मुलाचा नडगीखालून तुटलेला पाय पाहून ती माऊली जागेवरच मूर्च्छा येऊन कोसळली! बापाची प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीच देऊन झाली होती… त्यामुळे आज तो शांत होता आणि सुनेकडे पहात होता. सारं घर सुन्न होऊन स्तब्ध होऊन बसलं होतं. प्रत्येकाच्या मनातला प्रश्न निराळा होता….!

खरं तर आपला लेक ज्या नोकरीत आहे, त्या नोकरीत हे असं काही घडणं साहजिकच होतं, हे आई-वडील, पत्नीला ठाऊक होतंच. त्यांच्या गावात, आसपासच्या परिसरात, नात्यांत असे अनेक तरुण त्यांनी पाहिले होतेच… आणि त्यांच्या गावात दोन पुतळेही उभारलेले होते… युद्धात कामी आलेल्या सैनिकांचे!

“बेटा, तू जिंदा लौट आया… यही मेरे लिये बहुत है! इस बुढे बाप में इतनी तो ताकद है की तुम्हें बिठा के खिला सकुं… जब तक मेरी जान में जान होगी तब तक! ” म्हाताऱ्याने बोलता बोलता त्याचा इरादा आणि मर्यादा सांगून टाकल्या आणि दुसरीकडे पहात डोळे पुसून घेतले!

हे शब्द ऐकताच मरणालाही न भिणारा तो बहादूर तरुण मनातून थरथरला… आणि दुसऱ्याच क्षणी पेटून उठला! परावलंबित्व आणि तेही म्हाताऱ्या आई-वडिलांवर? एक पाय नसला म्हणून काय झालं….. दुसरा पाय, दोन हात आणि एक काळीज तर आहे शाबूत!

आणि हा काही त्याला आताच यावेळी सुचलेला विचार नव्हता…. ज्यावेळी पाय तुटून पडलेला पाहिला… त्याचवेळी जीव बचावल्याचे समाधान होतेच… म्हणजे आणखी काही शत्रू यमसदनी पाठवण्याची संधी! आणि उर्वरीत शरीर आणि मुख्य म्हणजे मेंदू शाबूत राहिला याचेच कौतुक जास्त होते त्याच्या मनात!

बारा विशेष सैनिकांची एक तुकडी शत्रूसाठी अगदी सीमेनजीक सापळा रचून बसली होती सात-आठ दिवस. पण हाती काही लागले नाही… शिकारीला जाऊन काहीच न मिळणं ही किती निराशाजनक गोष्ट असते.. हे कसलेल्या शिकाऱ्यांनाच समजू शकते.

मग तळावर परतण्याचा आदेश प्राप्त झाला. तळपायांना आलेले मोठमोठे फोड, सुजलेली बोटं, भिजलेली शरीरं घेऊन हे शूर माघारी फिरले जड पायांनी. आठ दिवसांनी पूर्ण ताटभर अन्न मिळणार होतं. पहिला घास तोंडात घातला आणि खबर आली…. शिकार टप्प्यात आलेली आहे… मारली पाहिजे!

आता हे बारा जण तर तिथून सुट्टी मिळून शांत क्षेत्रात आरामासाठी जायचे होते… पण ते दुसऱ्या दिवशी. म्हणजे नियमानुसार आज ते मोहिमेवर जाऊच शकत होते. मोठ्या साहेबांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला… पण त्यांना मनातून ठाऊक होतं…. ही पोरं आता काही थांबणार नव्हती! ‘ऑपरेशन मिल गया… समझो भगवान मिल गया’ अशी यांची धारणा असते! आपण किती अतिरेकी शोधून मारले या संख्येचा सैनिकांना मोठा अभिमान असतो!

“चलो, फटाफट! ” म्हणत अगदी काहीच मिनिटांत दल सज्ज झाले! सोबत घ्यायचे अन्न वजनाने हलके आणि शस्त्रं जड निवडण्यात आली. दोन दिवसांची पायपीट करायची होती. पाकिस्तानी सीमेच्या अगदी नाकाजवळ जाऊन कारवाई करायची होती. या आधीही यांनी अनेक शिकारी केल्या होत्या, आणि तिथल्या कार्यकालात हा स्कोअर आणखी वाढवूनच सुट्टीवर जाण्याचा सर्वांचा निश्चय होता.

सीमेवर काही ठिकाणी तिथल्या भौगोलिक रचनेनुसार भारत-पाक सीमाचौक्यांतले अंतर काही ठिकाणी खूपच जास्त तर काही ठिकाणी खूपच कमी आहे. त्यामुळे काही सैन्यचौक्या आणि त्यांतील माणसं उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतात. त्यांचे बोलणेही ऐकू येते! त्यामुळे इथे डोळ्यांत अधिक तेल घालावे लागते. भारताच्या चौक्यांत किती माणसे आहेत, ते किती जागरूक आहेत, याचा अंदाज पाकिस्तान सैन्य नेहमीच घेत असते.

पाकिस्तानला भारताच्या हद्दीत अतिरेकी घुसवायचे होते तिथून. कारण त्यांना वाटत होते की, त्यांच्या समोर असलेली चौकी फारशी जागरूक नाही! काही ठिकाणी तर चक्क बनावट चौकी असते… म्हणजे केवळ सांगाडा असतो… तिथे कोणीही नसते… आणि हे दोन्ही बाजूंचे सैनिक करीत असतात! म्हणून ते रात्रीच्या काळोखात सलग तीन दिवस अगदी जवळ येऊन त्या चौकीवर दगड मारून पहात होते… अंदाज घेत होते… आणि आपण काही कारवाई करण्याच्या आत त्यांच्या सीमेत पळून जात होते. ते तीनदा आले म्हणजे पुन्हा एकदा कधीतरी येतीलच, अशी आपल्या अधिकाऱ्यांची खात्री होती!

आपले सैन्यपथक रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी सीमेच्या अगदी हाकेच्या अंतरावर जाऊन लपून बसले. दिवसा अजिबात हालचाली करता येत नाहीत. चिखल, पाऊस, थंडी.. एकाजागी शांत बसून राहायचे, आणि रात्र पडली की शत्रूच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे. खाद्यपदार्थ शिजवायचे नाहीत… कारण वास जाईल त्यांना. मग कच्ची मॅगी चावून खायची… सोबतीला काजू, बदाम असले तर उत्तमच.. अन्यथा खाणे हा उपक्रम अगदीच अनिवार्य असतो म्हणून करायचा… खरं ध्येय एकच… शत्रूच्या नरडीचा घोट घेणे!

शत्रूला इथून यायचे असेल तर एकच सोयीची वाट होती. एका उथळ ओढ्यातून येणारी. त्यांच्या उजव्या बाजूला उंच डोंगर होता आणि डाव्या बाजूला खोल दरी. आपले सैनिक आपल्या सैन्यचौकीच्या खालच्या बाजूला जाऊन बसलेले होते. एका तुकडीचे तीन गट केले गेले. अतिरेकी आलेच तर त्यांना पाकिस्तानी बाजूला असलेल्या सगळ्यात शेवटच्या तुकडीने पुढे जाऊ द्यायचे. मधल्या तुकडीने त्यांच्यावर हल्ला चढवायचा आणि त्यातून ते मागे फिरले तर मागची तुकडी आहेच आणि पुढे निसटून गेले तर पुढेही आपली माणसं सज्ज बसलेली असतीलच!

सीमेवर दोन्ही सैन्यांनी भूसुरुंग पेरून ठेवलेले असतातच. पण ज्या अर्थी ते लोक आपल्या चौकीपर्यंत येत होते म्हणजे त्या रस्त्यावर भूसुरुंग नसलेली जागा त्यांनी शोधून ठेवल्या असाव्यात. आता त्याच रस्त्यावर सुरुंग पेरून ठेवणे गरजेचे होते. पण खोदून भूसुरुंग लावणे धोक्याचे होते. त्यासाठी लांब केबल असलेला आणि लांबून कार्यान्वित करण्याजोगा सुरुंग लावण्याची योजना झाली. हे सुरुंग अंधार पडल्यावर लावायचे… आणि सकाळी लवकर काढून घेऊन यायचे असे ठरले. कारण दिवसा त्याचा काही उपयोग नव्हता. शत्रू आला तर डोळ्यांनी दिसणारच होता!

हे काम सतत सहा दिवस झाले. गेल्या दिवसांत सलग तीन रात्री येऊन गेलेला शत्रू या सहा दिवसांत एकदाही आला नाही! हे वाट पाहणे किती जीवघेणे असेल, याची कल्पना करता येणार नाही!

अजय सिंग यांच्याकडे सुरुंग लावण्याचे काम सोपवले गेले होते… कारण या कामात ते अगदी कुशल झालेले होते. इतक्या वर्षांचा अनुभव पाठीशी होता. पण यादिवशी काही वेगळेच घडत होते. सुरुंग लावायला निघालेल्या अजयकुमार यांना त्यांच्या साहेबांनी दोन वेळा थांबवले होते… पहिल्या वेळी “अजून अंधार व्हायचा आहे! ” म्हणून दुसऱ्या वेळी “काहीतरी खाऊन जा! ” असं सांगत.

शेवटी त्या रात्री अजय सिंग पुढे निघाले. सोबत सहकारी होताच. सुरुंग लावायच्या जागेजवळ पोहोचले तेवढ्यात त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना जोरदार लाथ मारून दूर ढकलून दिले. अजय सिंग यांचा पाय एका वायरवर पडणारच होता तेवढ्यात सहकाऱ्याने पाहिले. त्या वायरचे दुसरे टोक पालापाचोळ्यात लपवून नेत एका झाडाच्या फांदीवर एका मिठाईच्या डब्यात पोहोचवले गेले होते. पाकिस्तानात बनवलेल्या गुलाबजामूनचा डबा होता. त्यात एक किलो स्फोटके भरलेली होती! दोघांनी मिळून ती स्फोटके निकामी केली.

आता अजय सिंग क्लेमोर नावाचा सुरुंग लावायला सज्ज झाले. हा सुरुंग शत्रूच्या बाजूला त्यातून उडालेली स्फोटके जातील अशा रचनेचा असतो, आणि त्याला दूर अंतरावरून कार्यान्वित करता येते. अजय सिंग यांनी याही वेळी अचूक क्लेमोर लावला आणि ते माघारी आले.

ती रात्र काहीही न घडता उलटून गेली. आता मात्र खूप कंटाळा आला होता सर्वांना! आज शनिवार. मागे झालेली चकमक शनिवारीच झाली होती. म्हणजे बजरंग बलींच्या आशीर्वादाने आज निश्चित contact होगा! अशी सर्वांचीच खात्री होती.

आजचीच रात्र इथे थांबायचे ठरले. नाहीतर उद्यापासून मोहिम थांबवण्याचे आदेश प्राप्त झालेले होते. सायंकाळचा सूर्य बुडाला आणि इकडे सर्वांनी मोहिमेवर निघायची पुरती तयारी केली. याजागी पुन्हा यायचे नाही, त्यामुळे मागे कोणत्याही खुणा राहता कामा नयेत, याची व्यवस्था केली.

अजय सिंग क्लेमोर लावण्याच्या ठिकाणाकडे दबकत निघाले. अजय सिंग यांना आज स्फोटक लावण्याची जागा काहीशी निराळी भासली. त्यांनी लावलेला डेटोनेटर तिथून हलवला गेल्याचा संशय आला. कदाचित सहकारी सैनिकाने चुकून तसे केले असावे असे क्षणभर त्यांना वाटले.

अजय सिंग गुडघ्यात वाकून खाली बसलेले होते. त्यांच्या शेजारी असलेल्या एका झाडाचे जमिनीवर आलेले एक जाडसर मूळ अगदी जवळच होते… आणि एक जोरदार स्फोट झाला…!

अजय सिंग यांच्या पायांखाली शत्रूने पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा भयावह स्फोट झाला. झाडाच्या जमिनीवर आलेल्या मुळाने बरेचसे स्फोटक अडवले होते पण तरीही अजय सिंग यांचा उजवा पाय घोट्याच्या थोडासा वर तुटून दूर जाऊन पडला..! आणि हा स्फोट झाल्या झाल्या गोळीचा आवाजही कानी पडला. याचाच अर्थ शत्रू जवळच दडून बसला आहे….! आता इथून निसटून मागे जायला पाहिजे.. अन्यथा संपूर्ण पथकाचा जीव धोक्यात निश्चित येणार!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चंदामामातर्फे ओवाळणी” ☆ डॉ. शिरीन वळवडे ☆

डॉ. शिरीन वळवडे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “चंदामामातर्फे ओवाळणी” ☆ डॉ. शिरीन वळवडे ☆

(सौजन्य – ‘विपुलश्री’ – जुलै 2026)

पश्चिम सहारा डेझर्टमध्ये अलिकडे एक उल्का सापडली. ती अबुधाबीच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. उल्केचं, ‘नॉर्थ वेस्ट आफ्रिका12691/NWA12691 असं नामकरण करण्यात आलं. परीक्षणांती, हा चंद्राचा तुकडा आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. चंदामामाने ही आपल्याला भेट पाठवली.

या उल्केचे वजन साडे तेरा किलो आहे. अनेक खनिजं तिच्यात आहेत. त्यामुळे ती रंगीबेरंगी दिसते. शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार एखादा धूमकेतू किंवा एखादी उल्का चंद्रावर आदळून हा टवका निघाला असावा. मुळात तो खूप मोठ्या आकाराचा असावा. कित्येक वर्षे तो अवकाशात फिरत असावा. पृथ्वीकडे तो खेचला जाऊन, तो सहारा वाळवंटातही हजारो वर्षे पडून राहिला असावा. कोरडेपणामुळे तो सुस्थितीत राहिला असावा. वाळवंटाच्या एकसुरी रंगाच्या पार्श्वभूमीवर हा रंगीबेरंगी तुकडा उठून दिसला व सापडला.

चंद्रावरून तिथल्या दगड-मातीचे नमुने आणायला मानवानं किती प्रयत्न केले. किती पैसा खर्च केला… 

…. पण ही उल्का म्हणजे चंदामामाने आपल्याला धाडलेली अनोखी भेट आहे.

© डॉ. शिरीन वळवडे

मो. 9911244701

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय विद्यार्थ्यांचा एक निर्भेळ विजय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय विद्यार्थ्यांचा एक निर्भेळ विजय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

मी अनेक वर्षे JEE भौतिकशास्त्र शिकवले आहे. तो पेपर तीन तासांत हुशार मुलांनाही थकून टाकतो.

ही परीक्षा पाच तास सिद्धांत आणि पाच तास प्रयोगशाळेतील कामाची आहे, आणि या पाच जणांनी त्यात जवळजवळ परिपूर्ण गुण मिळवले.

खरं तर काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो.

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड ही शालेय भौतिकशास्त्राची जागतिक स्पर्धा आहे. ही ५६ वी आवृत्ती होती. 

ही स्पर्धा कोलंबियातील बुकारामंगा येथे ५ ते १२ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

३८१ विद्यार्थी. ८५ हून अधिक देश. त्यातील प्रत्येक जण आपापल्या देशातील सर्वोत्तम भौतिकशास्त्राचा विद्यार्थी होता.

भारताने पाच मुलांना पाठवले होते.

… ते पाचही जण सुवर्णपदक घेऊन परत आले.

त्यांची नावे आहेत: 

पुण्याचा कनिष्क जैन. इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाळे. दिल्लीतील द्वारका येथील ऋषित गर्ग. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया. अहमदाबादचा स्वरित जोशी.

आपण शंभर क्रिकेटपटूंना त्यांच्या टोपणनावाने ओळखतो, पण या मुलांपैकी एकालाही नाही.

त्या निर्भेळ विजयामुळे भारत संयुक्तपणे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. चीन, रशिया, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत बरोबरी साधली.

हे असे देश आहेत जे विज्ञान शिक्षणात प्रचंड पैसा आणि राष्ट्रीय अभिमान ओततात.

– – – आपण त्यांच्या बरोबरीने उभे आहोत.

आता, परीक्षा नेमकी कशी होती ते पाहूया.

दोन पेपर्स. प्रत्येक पाच तासांचा.

सैद्धांतिक पेपरमध्ये तीन प्रश्न होते.

– – एक पॅरामॅग्नेटिक कूलिंगच्या थर्मोडायनॅमिक्सवर. एक ओझोनच्या फोटोआयनायझेशनवर. एक इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन जोड्यांच्या डायनॅमिक्सवर.

– – प्रायोगिक पेपर हा प्रयोगशाळेत आणखी पाच तासांचा होता, ज्यात द्रवांमधील उष्णता हस्तांतरण आणि थर्मोडायनॅमिक प्रक्रियांचा अभ्यास करायचा होता.

… याचा अर्थ असा की, तुम्हाला अशी उपकरणे दिली जातात जी तुम्ही कधीही पाहिलेली नसतात, आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रयोग तयार करावा लागतो, स्वतःची मोजमापे घ्यावी लागतात, चुका दुरुस्त कराव्या लागतात आणि अचूक उत्तरापर्यंत पोहोचावे लागते.

बहुपर्यायी प्रश्न नाहीत. कोणतेही शॉर्टकट नाहीत. पॅटर्न ओळखण्याची सोय नाही. एकतर तुम्हाला भौतिकशास्त्र समजते किंवा तुम्ही तिथे पाच तास बसून राहता.

 एचबीसीएसईच्या मते, भारतीय विद्यार्थी सिद्धांतामध्ये जवळपास परिपूर्ण आणि प्रात्यक्षिकांमध्येही उत्कृष्ट होते.

आता, आयपीएचओमधील (IPhO) भारताचा हा २७ वा सहभाग होता.

या सर्व वर्षांमध्ये, सुमारे ४४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ४१ टक्क्यांनी रौप्य, तर १० टक्क्यांनी कांस्य पदक जिंकले आहे.

– गेल्या दहा वर्षांत, प्रत्येक भारतीय विद्यार्थी पदक घेऊन घरी परतला आहे. ६२ टक्के सुवर्ण, ३८ टक्के रौप्य.

– गेल्या दशकात एकही विद्यार्थी रिकाम्या हाताने परत आलेला नाही.

– – एका वर्षात पाच सुवर्णपदके जिंकण्याची घटना फक्त दोनदाच घडली आहे. या वर्षी आणि २०१८ मध्ये.

तर हे कोणी उभारले?

हा कार्यक्रम *एचबीसीएसई, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र* द्वारे चालवला जातो. हे टीआयएफआरच्या (TIFR) अंतर्गत येते, जे अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत येते.

ते संपूर्ण प्रक्रिया चालवतात.

– एक राष्ट्रीय परीक्षा, त्यानंतर एक राष्ट्रीय ऑलिम्पियाड, मग एक कठोर निवड आणि प्रशिक्षण शिबिर, आणि देशातील प्रत्येकातून, पाच मुले विमानात बसतात.

– या टीमचे नेतृत्व एचबीसीएसई-टीआयएफआरचे प्राध्यापक अन्वेश मजूमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या डॉ. लीना जोशी यांनी केले.

– वैज्ञानिक निरीक्षकांमध्ये आयआयएसईआर कोलकाताचे प्राध्यापक आनंद दासगुप्ता आणि *रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या निशा केळकर* यांचा समावेश होता.

होय. रत्नागिरी. महाराष्ट्रातील एका किनारपट्टीच्या शहरातील महाविद्यालय. 

हे सार्वजनिक शिक्षण असे काहीतरी करत आहे, जे खाजगी कोचिंग इंडस्ट्री स्वतःच्या बळावर कधीच करू शकली नसती.

कोचिंग इंडस्ट्री एका गोष्टीत खूप चांगली आहे. तुम्हाला एखादी ज्ञात समस्या वेगाने सोडवायला शिकवणे.

जेईई आणि नीट याच गोष्टीला पुरस्कृत करतात, आणि मी हे प्रेमाने म्हणत आहे कारण मी त्या जगाचा एक भाग होतो.

पण ऑलिम्पियाडच्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही ज्ञात प्रकार नसतो.

तिथे शॉर्टकटचा कोणताही धडा नसतो. तुम्हाला वाचवणारी कोणतीही सूत्रपत्रिका नसते.

तुम्हाला कधीही न पाहिलेल्या समस्येसोबत बसावे लागते आणि विचार करावा लागतो.

तो एक पूर्णपणे वेगळाच स्नायू आहे.

– – – आणि एक सरकारी अनुदानित केंद्र गेल्या २७ वर्षांपासून भारतीय किशोरवयीन मुलामुलींमध्ये ही प्रतिभा शांतपणे घडवत आहे.

तर हो, अभिमान बाळगा. तोही मोठ्याने.

एचबीसीएसईने (HBCSE) हेही सांगितले की, भारतातील सुमारे ६४ टक्के ऑलिम्पियाड पदक विजेते पुढे पीएचडी करतात. पण केवळ ३२ टक्के पदक विजेतेच भारतात स्थायिक होतात.

… मी हे क्षण खराब करण्यासाठी सांगत नाहीये.

या मुलांचे देशावर काहीही देणे लागत नाही.

त्यांना मिळालेला प्रत्येक पर्याय त्यांनी स्वतःच्या मेहनतीने मिळवला आहे.

… पण यातून आपल्याला एक गोष्ट कळायला हवी. ही प्रतिभा शोधण्यात आपण उत्कृष्ट आहोत.

तिला प्रशिक्षण देण्यात आपण उत्कृष्ट आहोत. पण तिला राहण्यायोग्य जागा देण्यात आपण अजूनही तितके चांगले नाही.

अभिनंदन कनिष्क, रिद्धेश, ऋषित, श्रेष्ठ आणि स्वरित.

… या वर्षी एका भारतीयाने केलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी ही एक आहे आणि देशातील बहुतांश लोकांना याबद्दल कधीच कळणार नाही.

लेखक : अज्ञात 

(भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या एका शिक्षकाकडून आलेला संदेश) 

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानसूर्य महर्षी वेदव्यास… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ज्ञानसूर्य महर्षी वेदव्यास… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

* ज्ञानसूर्य महर्षी वेदव्यास *

         – – – एका अलौकिक जीवनप्रवासाची कथा ! 

१. तपोवनातील बालपणीचा ध्यास

गंगा आणि यमुनेच्या पवित्र संगमाजवळील एका शांत, नयनरम्य बेटावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. पिता पराशर ऋषींचे अगाध ज्ञान आणि माता सत्यवतीची अलौकिक माया यांच्या छायेत हे बालक लहानाचे मोठे होऊ लागले. बेटावर (द्विपावर) जन्म झाल्यामुळे आणि अंगावर सावळ्या (कृष्ण) रंगाची सुंदर झाक असल्यामुळे माता-पिता त्यांना प्रेमाने ‘कृष्णद्वैपायन’ असे म्हणत. तर पराशर ऋषींचे पुत्र म्हणून त्यांना समाज ‘पाराशर्य’ या नावानेही ओळखू लागला.

बालपणापासूनच कृष्णद्वैपायन यांच्या मनात संसाराच्या ऐहिक सुखांपेक्षा अध्यात्माची, परम सत्याची आणि ज्ञानसाधनेची ओढ तीव्र होती. वयाच्या अगदी छोट्या टप्प्यावर त्यांनी मातेकडे जाऊन वनात तपश्चर्चेसाठी जाण्याची अनुमती मागितली. मातेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी घोर अरण्यात प्रवेश केला. तेथे त्यांनी अत्यंत कठोर ज्ञानसाधना व तपश्चर्या केली. या तपाच्या तेजाने त्यांना संस्कृत भाषेचे संपूर्ण मर्म, सृष्टीचे गूढ नियम आणि अलौकिक ज्ञानाची प्राप्ती झाली.

२. वेदविभागणीचा महान यज्ञ

त्या काळात मानवी समाजाकडे ज्ञानाचा अथांग साठा होता, पण तो सर्व ‘वेद’ नावाच्या एकाच विशाल राशीमध्ये एकत्र गुंफलेला होता. काळ बदलत होता, मानवी बुद्धी आणि स्मरणशक्ती मर्यादांमध्ये बांधली जात होती. एकच विशाल वेद पाठ करणे किंवा समजून घेणे सामान्य माणसालाच नव्हे, तर विद्वानांनाही कठीण जाऊ लागले होते.

हे पाहून कृष्णद्वैपायनांनी ज्ञानाच्या त्या अथांग सागराचे सुलभ आणि पद्धतशीर वर्गीकरण करायचे ठरवले. त्यांनी एका वर्तुळातील व्यासाप्रमाणे (Diameter) ज्ञानचक्राच्या दोन्ही टोकांना जोडणारे आणि निसर्गाच्या ‘प्रवृत्ती’ व ‘निवृत्ती’ या दोन्ही मार्गांचे सखोल विश्लेषण करणारे महान कार्य हाती घेतले. ज्ञानाचे स्पष्टीकरण (विशद) करून वेदांचे सुटसुटीत भाग पाडले, म्हणूनच जगाने त्यांना आदराने ‘व्यास’ ही पदवी दिली.

व्यासांनी ज्ञानराशीचे चार मुख्य भाग केले:

ऋग्वेद: त्यांनी सर्व ऋचा (छंदोबद्ध मंत) एकत्र करून ज्या स्तवनांचे पठण केले जाऊ शकते, त्यांचा ‘ऋग्वेद’ तयार केला.

सामवेद: ज्या ऋचांचे मधुर गायन करता येते, त्यांना संगीतमय ‘सामवेदात’ ग्रथित केले.

यजुर्वेद: यज्ञ-याग, कर्मकांड आणि विधींचे तपशीलवार वर्णन करणाऱ्या गद्य मंत्रांना ‘यजुर्वेद’ हे नाव दिले.

अथर्ववेद: मानवी जीवनातील लौकिक व्यवहार, औषधी, आणि दैनंदिन रक्षणासाठी लागणाऱ्या मंत्रांचे संकलन करून ‘अथर्ववेद’ रचला.

– – त्या काळातील सर्व श्रेष्ठ आचार्य आणि विद्वानांनी व्यासांच्या या अद्वितीय आणि वैज्ञानिक वर्गीकरणाला नतमस्तक होऊन मान्यता दिली.

३. महाभारत, पुराणे आणि ब्रह्मसूत्रांची निर्मिती

वेदांचे ज्ञान अत्यंत गूढ आणि क्लिष्ट होते. ते अगदी शेवटच्या घटकापर्यंत, सामान्यातील सामान्य माणसापर्यंत कसे पोहोचवायचे? या प्रश्नाचे उत्तर म्हणून व्यासांनी कथा आणि इतिहासाचे माध्यम निवडले.

त्यांनी ‘महाभारत’ या महाकाव्याची रचना केली. पांडव आणि कौरव यांच्या संघर्षाच्या कथेतून त्यांनी मानवी जीवनातील धर्म-अधर्म, सत्य-असत्य आणि चांगले-वाईट यातील सूक्ष्म भेद स्पष्ट केले. महाभारताच्या रूपात त्यांनी मानवी स्वभावाचा आणि जीवनमूल्यांचा एक भव्य आरसाच जगासमोर ठेवला.

त्यानंतरही त्यांचे ज्ञानसत्र थांबले नाही. त्यांनी अठरा महापुराणांची रचना केली, ज्यामध्ये ‘भागवत पुराण’ हे भक्तीचा आणि ज्ञानाचा शिरोमणी ग्रंथ ठरला. या पुराणांमध्ये त्यांनी सृष्टीच्या नियमांचे खालील ५ मुख्य भागांत वर्गीकरण करून रंजक कथांद्वारे ज्ञान दिले:

१. सर्ग: जगाची, निसर्गाची मूळ निर्मिती.

२. प्रतिसर्ग: प्रलयानंतर होणारी पुर्नरचना किंवा प्रलय.

३. मन्वंतर: काळाचे मोठे कालखंड आणि त्यातील जीवनमान.

४. वंश: देव, ऋषी आणि राजांची वंशावळ.

५. वंशानुरचित: त्या महान राजांचे आणि पुरुषांचे चरित्र.

याशिवाय उपनिषदांमधील परम सत्याचा गूढ अर्थ उलगडून दाखवण्यासाठी त्यांनी **’ब्रह्मसूत्रां’**ची रचना केली, ज्याने भारतीय तत्त्वज्ञानाला एक भक्कम वैचारिक पाया दिला.

४. गुरुपौर्णिमा आणि व्यासांचे अमर स्थान

व्यासांनी जगातील अशा कोणत्याही विषयाला सोडले नाही, ज्याचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये केले नाही. म्हणूनच “व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्” (म्हणजेच जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उष्टे आहे/व्यासांनी आधीच स्पर्श केलेले आहे) अशी म्हण रूढ झाली.

ज्या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला, तो आषाढ पौर्णिमेचा दिवस! आपल्या संस्कृतीने या महान ज्ञानसूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ किंवा ‘व्यासपौर्णिमा’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. जगतगुरू म्हणून महर्षी व्यास हे केवळ भूतकाळात होऊन गेलेले ऋषी नाहीत, तर ते आपल्या अवतीभवती विचारांच्या, ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या रूपात सदैव जिवंत आहेत.

आपली संपूर्ण भारतीय संस्कृती, आपली विचारसरणी आणि आमचे जीवनमूल्य हे व्यासांच्या महाभारत आणि पुराणांवर आधारित आहे. भारतीय संस्कृतीचे मूळ समजून घ्यायचे असेल, तर व्यासांच्या साहित्याचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. अशा या महान, दिव्योदात्त, परम विद्वान आणि सर्वश्रेष्ठ साहित्यकाराचा जन्म आपल्या भारतभूमीत झाला, हा आपल्यासाठी अनंत काळापर्यंत अभिमानाचा विषय आहे. 

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर या आद्यगुरु महर्षी वेदव्यास यांच्या चरणी शतशः प्रणाम!

©  विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३४ ☆ मंजिरी येडूरकर ☆

मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३४ ☆ मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

टागोर पर्वाचा अंत

वयाच्या ७७ व्या वर्षी रविंद्रनाथांना त्वचेचा जंतुसंसर्ग (Erysipelas) झाला होता. त्याच्याच गुंतागुंतीमुळे १० सप्टेंबर १९३७ रोजी ते चक्कर येऊन पडले व त्यातच ते कोमा मध्ये गेले. जवळजवळ ६० तास ते कोमात होते. त्याकाळी खाजगी टेलीफोन ची सुविधा नसल्यामुळे डॉक्टरांना शांतिनिकेतनात पोहोचायला वेळ लागला. मात्र सुदैवाने रविंद्रनाथांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला व ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना खोलीत पडलेला एक प्लायवुडचा तुकडा दिसला व त्यांनी ब्रश व रंग मागितले कारण त्यांना खिडकीतून दिसणारी निसर्गशोभा कुंचल्याने चित्रबद्ध करायची होती. तेंव्हा ते शुद्धीवर येऊन फक्त तीन दिवस झाले होते. त्या चित्राला त्यांनी शीर्षक दिलं, ‘A dark wood with streaks of yellow light breaking through it’s gloom. ‘पुढे आणखी १० च दिवसांनी त्यांनी एक कविता लिहिली व पुढच्या तीन महिन्यात त्याच कवितेला घेऊन १८ कवितांची एक शृंखला (poem cycle) लिहिली. तिला शीर्षक दिलं प्रांतिक. ही poem cycle पुढच्या कांही महिन्यात (१९३८) प्रकाशितही केली. या कवितांच्या केंद्रस्थानी ‘जीवन, मृत्यू, मृत्युपश्चात जीवन’ हाच विषय आहे. या सर्व अठरा कविता त्यांच्या स्वतःच्या मूळ बंगाली कवितांचं इंग्रजी भाषांतर आहे. कोमात असताना, जीवनमृत्यूच्या दरम्यानच्या दोलायमान स्थितीमुळे त्यांच्या नकळत त्यांच्या अंतर्मनात जे तरंग उठले असतील त्यांचं हे प्रकटीकरण असू शकतं.

‘On Deathland dying’ या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका एलिझाबेथ म्हणतात “रविंद्रनाथ टागोरांइतका मृत्यूविषयी सखोल विचार कुणी केला नसेल. ” 

तरुण वयातच जिवलग मैत्रीण व स्फूर्ती स्थान असलेल्या कादंबरी देवींच्या आकस्मिक मृत्यू मुळे त्यांच्या मनाला ज्या असह्य वेदना झाल्या, त्यामुळे कदाचित उर्वरित आयुष्यात मृत्यू हाच त्यांचा जिवलग सखा झाला असावा. वयाच्या ५० व्या वर्षी लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात ते म्हणतात, “सूर्य, चंद्र, तारे, जमीन, आकाश, झाडं झुडपं, नद्या, समुद्र सगळं कांही जिथल्या तिथं असताना माझी जिवलग सखी मात्र एका क्षणात होत्याची नव्हती झाली. हे स्वप्न की सत्य हे कळायच्या आत घडूनही गेलं. एखादा कपडा कशात तरी अडकून कांही कळायच्या आत टर्रकन फाटून जावा व त्या फाटलेल्या भोकातून पलिकडे सर्व अंधारच अंधार दिसावा तसं झालं. “

ह्या मृत्यू नामक अंधारानेच मग त्यांना भुरळ पाडली. जीवन जर क्षर आहे तर अक्षर काय आहे, याचा शोध घेण्याची प्रेरणा त्यांना या प्रसंगाने दिली. सावलीतलं झाड जसं सूर्यप्रकाशाच्या शोधात आपल्या फांद्यांचे हात पाय पसरतं तसाच मृत्यूच्या अंध:कारात अडकलेला त्यांचा आत्मा सकारात्मक विचारांच्या प्रकाशाचा शोध घेत होता.

सन १९३७ मध्ये कोमात जाण्याच्या घटनेनंतर रवींद्रनाथ पूर्ण बरे कधीच झाले नाहीत. त्याची प्रकृती दिवसें दिवस ढासळतच चालली होती. त्यातच त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांच्या किडनीज् हळूहळू निकामी होऊन युरेमिया व इतर गुंतागुंत निर्माण झाली. हवापालट करण्यासाठी म्हणून १९४० मध्ये टागोरांच्या सून प्रतिमा देवी त्यांना किलामपोंग येथे घेऊन गेल्या पण तिथे त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना शांतिनिकेतनात परत आणण्यात आलं.

आणि ७ मे १९४१ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.

—–

गीत : १००

DIVE down into the depth of the ocean of forms, hoping to gain the perfect pearl of the formless.

No more sailing from harbour to harbour with this my weather-beaten boat. The days are long passed when my sport was to be tossed on waves.

And now I am eager to die into the deathless.

Into the audience hall by the fathomless abyss where swells up the music of toneless 

strings I shall take this harp of my life.

I shall tune it to the notes of for ever, and, when it has sobbed out its last utterance, lay down my silent harp at the feet of the silent.

—-

मराठी भावानुवाद : गीत : १००

या अथांग, अतल सागरी

शोधिले जन्मजन्मांतरी

*

कुठे मिळेना, असा शिंपला

ज्या मोत्यांत, अनंग लपला

*

शोध शोधुनी दमलो मी पण

शीड फाटले, होडीचे पण

*

पुरे अता मज नाही साहवत

तुझ्याविना प्रभू नाही राहवत

*

अमर्त्य अशा तुझ्या अंतरी

मम मृत्युला स्थान दे परी

*

शेषशायी तू, क्षीरसागरी 

येईन म्हणतो, तुझ्या मंदिरी

*

माझी हृदयस्थ वीणा छेडुनि

मूकपणाने तारा झंकारुनि

*

चिरंतनाचे सूर लावुनि

तुटतील तारा मूक होउनि

*

शांतच वीणा, शांतच तूही

चिरशांती मम उजळील देही

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

गीत : १०१

EVER in my life have I sought thee with my songs. It was they who led me from door to door, and with them have I felt about me, searching and touching my world.

It was my songs that taught me all the lessons I ever learnt; they showed me secret paths, they brought before my sight many a star on the horizon of my heart.

They guided me all the day long to the mysteries of the country of pleasure and pain, and, at last, to what palace gate have they brought me in the evening at the end of my journey?

—–

मराठी भावानुवाद : गीत : १०१

तुझ्याचसाठी गीते रचितो

तुझ्याचसाठी ती मी गातो

त्या गीतातून तूच स्पर्शितो

मम विश्वाचा एक कोपरा

शोध शोधिले तुला प्रियकरा॥

*

या गीतांनी मला शिकविले

मार्ग मुक्तीचे मज दावियले

मनःचक्षुंनी मग साठविले

तारांगण हृदयात, मधुकरा

शोध शोधिले तुला प्रियकरा॥

 *

ही गीते मज घेऊनि जाती

सुखदुःखाचे देश दाविती

गूढ तयांचे अर्थ सांगती

अंतिम समयी तुझिया द्वारा

मजला नेती हे सर्वेश्वरा॥

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares