मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत – पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले 

गूंजी  हिंदी विश्वमें 

स्वप्न हुआ साकार 

राष्ट्रसंघ के मंच से 

हिंदी की जयकार!

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला.

19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा. ए. सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली. 100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.

देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली. आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली.

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस… राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात 

 जन्म मरण का अविरत फेरा

जीवन बंजारो का डेरा

आज यहाँ कल कहाँ कूच  है

कौन जानता किधर सवेरा…

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

हम पडाव को समझे मंझिल

लक्ष्य हुआ आँखो से ओझल

वर्तमान के मोहजाल मे

आनेवाला कल न भुलाए

आओ फिर से दिया जलाएँ…

आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला, निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची. ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली.

दांव पर सब कुछ लगा है

रुक नही सकते, टूट सकते

है मगर हम झुक नही सकते…

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना म्हणतात 

’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल. ’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव 25 डिसेंबर 2014 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’ देण्यासाठी देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले. अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे. हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे.

२५ डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस “गुड गव्हर्नन्स डे” अर्थात “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४. ☆ प्रा.भारती जोगी ☆

एमिली शेंकल

समिधाच सख्या या!! …

सन १९४५, ऑगस्ट महिना, संध्याकाळ ची वेळ! ती स्वयंपाकघरात नेहमीसारखी कामात… आणि अचानक रेडिओ वर ऐकायला येते… ‘ सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू! ‘

 ती हळूच उठते, बेडरूममध्ये जाते, जिथे तिची जेमतेम ३ वर्षे वयाची मुलगी झोपलेली असते. बिछान्याजवळ गुढगे टेकून बसते आणि आयुष्यात पहिल्यांदाच मनाने कोसळते… अश्रूंचा बांध फुटतो, मनसोक्त रडते. जिच्या दृढतेसाठी, साहसी स्वभावासाठी तिचा पती बाघिन म्हणत असतो… ती रडत होती, शक्तीच संपल्या सारखी!!

 ती होती… एमिली शेंकलकॉंग्रेस योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पत्नी!!

 एमिली च्या डोळ्यांपुढून सगळा जीवनपट सरकू लागला. आठवला तिला तो दिवस… सुभाषबाबूंच्या परिचयाचा!

सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे तुरूंगात गेलेल्या सुभाष बाबूंची तब्येत ढासळू लागली, ब्रिटिश सरकारने उपचारासाठी त्यांना व्हिएन्ना मध्ये ठेवले. हॉस्पिटलमध्ये सुद्धा देशाचाच विचार करणा-या सुभाष बाबूंनी, भारतीय युवकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्रित करण्याचं ठरवलं. द इंडियन स्ट्रगल या नावाने पुस्तक लिहायला घेतलं. त्यासाठी टाइपिस्ट ची गरज भासली. आणि मुलाखतीत निवड होऊन एमिली शेंकल चा सुभाषबाबूंच्या आयुष्यात प्रवेश झाला. हळूहळू रोजच्या भेटीतून… सौम्य स्वभाव, हसतमुख, स्पष्टवक्ती, निस्वार्थी, कामाला वाघ… अशा एमिली कडे सुभाषबाबू आकर्षित झाले. देशप्रेम अग्रस्थानी असलेल्या मनात… एका उदात्त अशा प्रेमाने अलगद प्रवेश केला. आजपर्यंत घरच्यांना लग्नासाठी नेहमीच नकार देणारे दोघेही… नकळतपणे गुंतले.

२६ डिसेंबर १९३७ या दिवशी… एमिली च्या वाढदिवशी… दोघांनी अखेर गुप्त विवाह केला. आणि शेवटपर्यंत तो गुप्तच ठेवला. कारण सुभाष बाबूंसाठी देश सर्वोपरि होता. हे एमिली पूर्णपणे जाणून होती. म्हणूनच उदात्त हेतू आणि एक शोकांतिका असलेलं नातं तिने जोडलं. उदात्त हेतू ला उदात्त अशी साथ देऊन त्यांची खरी हमराज बनली. तिनं सुभाष बाबूंच्या संघर्षाला समजून घेतलं. त्या नात्यात एमिली ने अदम्य साहस, सर्वोच्च गरिमा आणि उच्च त्यागाची भावना… हे गुण पेरले, रूजवले.

लग्नबंधनात बांधल्या नंतरही तिने सुभाषचंद्र ना मात्र आपल्या प्रेमात बांधून न ठेवता… आजाद ठेवलं.

सुभाषचंद्र जरी एक सैनिक, एक योद्धा, एक कूटनीतिचा महारथी होते तरीही… या सगळ्याच्या आंत/आड आणखी एक सुभाष आहे… हे एमिली ने ओळखलं होतं. आणि फक्त त्या मौन स्नेहातलं एक आगळं-वेगळं प्रेम, ते जपणं तिनं ओळखलं. त्यामुळे च तर… १२ वर्षांच्या लग्नाच्या आयुष्यात फक्त ३ वर्षे सहवास लाभला तरीही एमिली ने हे… दुराव्यातलं दृढ नातं ही जपलं! कधीच दुरावू दिलं नाही. सुभाषबाबू आणि तिच्यातलं हे अनोखे, गुप्ततेतले पती-पत्नीचं नातं, हे स्नेहबंध… ख-या अर्थाने बद्ध झाले ते… सुभाषबाबूंनी विविध ठिकाणाहून एमिली ला पाठवलेल्या पत्रांमध्ये! ही पत्रे त्यांच्या मर्मबंधातली ठेव बनली.

पण ही पत्रे… प्रेम पत्रे होती कां? की दोन जीवांचं तादात्म्य पावणं? एकमेकांसाठी संबल… सहयोगी, आधार, ख-या अर्थाने, सहचर बनंत, दूर राहूनही एकमेकांना भेटणं, जपंत रहाणं होतं ते! नात्यातील संबोधने सुद्धा बघा… ते फ्राऊलिन शेंकल ने सुरूवात करीत, आणि तिच्या पत्राची सुरूवात असे.. श्री बोस!!

 त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रात… राजनीती, विविध पुस्तके संगीत, विनोद, आध्यात्मिकता, आणि एकमेकांच्या नाजूक तब्येतीची चौकशी… हा असे… पत्रातल्या मायन्याचा आयना!!!

सुभाष बाबूंनी एकदा आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणा-या… गोएथे या कवीच्या, कालिदासाच्या शाकुंतल मधल्या अनुवादित ओळी शोधायला सांगून… अप्रत्यक्षरित्या भावना प्रकट केल्या. त्या ओळी अशा…

क्या तुम युवा वर्ष के फूलों और उसके पतन के फूलोंको पसंद करोगे?

और वह सब जिससे आत्मा आनंदित हो, तृप्त हो…

 क्या तुम स्वर्ग और पृथ्वी को एक ही नाम से मिला दोगे?

 हे, शकुंतले, मैं तुम्हारा नाम लेता हूं!

बस्स्… हीच ती मनतळातली जाणीव… जिच्या बोधावर एमिली ने नंतरंचं संपूर्ण आयुष्य एक… समर्पित पत्नी, एक आदर्श माता, वृद्ध आईची काठी, लेक अनिता ची सखी, बनून स्वाभिमानाने, स्वबळावर व्यतित केलं.

एमिली ने आपल्या लेकीला… एक अतिशय बुद्धीमान आणि शैक्षणिक रूची असलेली स्त्री बनवलं. एक अर्थशास्त्रज्ञ बनली तिची लेक. विश्वविद्यालयात प्रोफेसर झाली. प्रोफेसर मार्टीन फाफ यांच्या शी विवाह बद्ध झाली.

एमिली… एक आदर्श पत्नी च नाही, तर एक आदर्श माता ही सिद्ध झाली. तिने आपल्या लेकीत… पित्याच्या नावाने मोठी न होता, स्व प्रयत्नाने आपलं आयुष्य उभं करण्याचे, आणि स्व कर्तृत्वाने मोठं होण्याचे, जगाला काहीतरी सकारात्मक देण्याचे संस्कार रूजवले!!!

अशी ही एमिली… जी एका महानायका च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, त्याच्या नंतर ही तितक्याच खंबीरपणे, स्वाभिमानाने, पतीच्या परिवाराकडून भारतात येण्याचा आग्रह नाकारून, एका छोट्या टेलिग्राफ ऑफिस मध्ये, कमी पगारावर नोकरी करून, वृद्ध मातेचा सांभाळ करंत, लेकीला सत्याचा सामना करणारी लढवय्यी बनवंत… शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनातल्या नायका ची आणि जनातल्या महानायका ची मूक नायिका बनून जगली.

या मौन, मूक संवेदनेला, देश प्रेमासाठी राखरांगोळी करणा-या त्या त्यागकुंडातील राखेच्या कणातला एक भाग बनणारी ही… समिधा च ना?

– लेख क्र. ४.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आठवणींचे पक्षी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ आठवणींचे पक्षी☆ सुश्री शीला पतकी 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात त्या वेळचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ, तारकेश्वरी सिन्हा यांना घेऊन आले होते.. काकासाहेब गाडगीळ यांना मी महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासूनच ओळखत होतो.. मुंबई प्रांताचे स्पीकर भाऊसाहेब फिरोदिया व काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते मी संपादीत केलेल्या प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या व्यासपीठावर या पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगरला त्या वेळी (१९६६/६७) केले होते.. पुण्यात यावेळी मी किर्लोस्कर मासिकांचा सहसंपादक होतो.. काकासाहेब यांनी मला जवळ बोलावून तारकेश्वरी सिन्हा यांची ओळख करून दिली होती.. आपल्या उर्दू शेरशायरीयुक्त भाषणांसाठी आणि धारदार वक्तृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या तारकेश्वरी सिन्हा यांचे नाव मला माहीत होते.. संसदेतील आपल्या स्पष्ट मतांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. राम मनोहर लोहियांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबतचे त्यांचे वादविवाद होत असत.. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर, त्यांनी इंदिरा गांधींना सोडून मोरारजी देसाई आणि के. कामराज यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्या इंदिरा गांधींच्या कट्टर टीकाकार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. तथापि, हे देखील उल्लेखनीय होते की जोपर्यंत त्या राजकारणात सक्रिय होत्या, तोपर्यंत इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिले—अगदी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्येही. मी तारकेश्वरी यांना किर्लोस्कर साठी मुलाखत देण्याची विनंती करीत असतानाचे हे छायाचित्र आहे.. कैक वर्षानंतर हा फोटो मला सापडला.. व तो प्रसंग मनात तरळून गेला… आठवणींचे पक्षी. ,. ” 

– प्रा. जवाहर मुथा

– – तारकेश्वरी सिन्हा यांच्याबद्दलची वरची पोस्ट आज वाचली. मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि तेव्हा माहितीचे स्त्रोत पण नव्हते मी नुकतीच कॉलेजमध्ये जाऊ लागले होते तेव्हा त्या सोलापुरात आल्या होत्या. त्या इंदिरा गांधीच्या विरोधक आणि माजी पंतप्रधान माननीय मुरारजी भाई देसाई यांच्या पक्षातल्या.. म्हणजे काँग्रेस एस आणि काँग्रेस आय. तेव्हा त्यांचे भाषण पार्क मैदान वर झाले.

काँग्रेसचे विभाजन झाले होते, त्या एस पक्षातल्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती म्हणजे पार्क मैदान भरले होते त्यापूर्वी कार्यकर्त्यांसाठी जनरल लायब्ररीच्या वरच्या हॉलमध्ये त्यांचे भाषण झाले. त्या दोन्ही कार्यक्रमाला मी होते. मुख्य म्हणजे संपूर्ण दिवसभर मी तारकेश्वरी सिन्हा बरोबर होते जनरल खूप गप्पा झाल्या. आता माझ्या एवढ्या मुलीशी ती एवढी मोठी विदुषी काय गप्पा मारणार ना? … टिळक स्मारक मधला कार्यक्रम संपून आम्ही पार्क मैदान वर गेलो पार्क मैदान वर वॉशरूमची सोय नाही त्या म्हणाल्या काय करायचे मी म्हणलं काहीतरी सोय करू त्या तिथे संपूर्ण पार्क मैदान च्या बागेची सोय पाहणारे माझ्या वडिलांचे मित्र स्वातंत्र्यसैनिक राजमाने राहत होते म्हणजे ए बी राजमानांचे वडील त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि काकांना मी अडचण सांगितली. त्यांच्या घरात छोटे बाथरूम होते ते सगळे बाहेर आले तेव्हात्या वाॅशरूम मध्ये फ्रेश झाल्या. काकांनी त्यांना चहा घ्यायला विनंती केली त्या पाच मिनिटे थांबून पाणी पिऊन त्यांच्या घरातून बाहेर पडल्या राजमान्यांचे घर अत्यंत नेटके आणि स्वच्छ होते त्याचे जाताना कौतुक करायला त्या विसरल्या नाही काकूंचा हात हातात घेऊन त्यांनी त्यांच्या घराचे कौतुक केले होते. त्यांचे पार्क मैदान वर भाषण झाले मी बऱ्याच व्यवस्थेत होते, त्यामुळे मला भाषण सलग ऐकता आले नाही आणि काही कळतही नव्हते. राजकारणातले फारसे ठाऊक नाही. पण त्यांचे वक्तृत्व अप्रतिम होते हे कानावर पडणारे शब्दावरून जाणवत होते.

– – आज मी प्राध्यापक मुथा यांचा लेख वाचला आणि मला जाणवले… इतक्या वर्षांनी.. कि आपण केवढ्या मोठे व्यक्ती बरोबर होतो दिवसभर…! पण आपल्याला काही घेता आले नाही कारण ती व्यक्ती किती मोठी आहे याची जाणीवच नव्हती. त्या इंदिरा गांधींच्या प्रखर टीकाकार होत्या. सोलापुरात एस काँग्रेसचे कार्य आदरणीय डॉक्टर अंत्रोळीकर हे करत होते ते आमच्या वडिलांचे गुरु. त्यानी मला सांगितले होते की तारकेश्वरी सिन्हा यांच्याबरोबर तू दिवसभर राहायचे. आज मला त्याची हळहळ वाटते. केवढ्या मोठ्या बाई माझ्याबरोबर होत्या आणि मी त्यांचा काहीच लाभ घेतला नाही हे आज आत्ता जाणवलं – – – – – आयुष्यात कुठल्या गोष्टीचा कधी पत्ता लागेल काही सांगता येत नाही…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३३ – – – – 

वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा|

शशी सूर्य तारांगणे मेघमाला|

चिरंजीव केले जनी दास दोन्ही |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३३|अर्थ : ही सृष्टी म्हणजे भगवंताची लीला आहे. त्यासृष्टीत मेरूमांदार आदी पर्वत आहेत. चंद्र, सूर्य आणि तारांगणे आहेत. मेघमाला आहेत. ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण दोन्ही चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दोन्ही दासांना चिरंजीव केले आहे. दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(मेरू – स्वर्ग, मत्यू, पाताळ यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत. मांदार – समुद्रमंथनाचे वेळी या पर्वताचा रवी म्हणून वापर केला गेला)

विवेचन : समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करून सांगितले आहे या श्लोकात ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सृष्टी दिसते आहे ती म्हणजे केवळ भगवंताची लीला मात्र आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, अगणित तारे आणि तारका, असंख्य अशा आकाशमाला, बरसणारे ढग या सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

मेरू पर्वत, ज्याला सुमेरू असेही म्हटले जाते, एक पौराणिक पर्वत असून हिमालयात स्थित आहे असे मानले जाते. हा पर्वत म्हणजे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे एक पवित्र स्थान समजले जाते. त्याचप्रमाणे हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्थित असून पृथ्वीची नाभी समजला जातो. हा पर्वत सुवर्णप्रमाणे चमकतो.

मांदार पर्वताचा उल्लेख देखील पौराणिक कथांमध्ये येतो. हा पर्वत बिहारच्या बांका जिल्ह्यात असून त्याची उंची सुमारे ७०० फूट आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनादरम्यान देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागासह या पर्वताला रवीसारखे वापरले होते। हे हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. या अद्भुत पर्वतांसारख्या अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

थोडक्यात सांगायचे तर आपल्याला दिसणाऱ्या या अवघ्या विश्वाचा निर्माता भगवंत आहे. या सृष्टीमध्ये सजीवांसाठी आवश्यक असलेल्या हवा, पाणी, अन्न यासारख्या गोष्टी त्यानेच निर्माण केल्या आहेत. त्याची निर्मिती असलेले चंद्र आणि सूर्य आपल्याला प्रकाश देतात. नद्या आपली तहान भागवतात. मेघातून बरसणारा पाऊस आपल्यासाठी अन्न निर्माण करतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या परमेश्वराचीच निर्मिती आहेत.

जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तारे, चंद्र, सूर्य आपल्याला प्रकाश देत राहतील. मेघ जलाचा वर्षाव करत राहतील ही भूमाता आपल्यासाठी अन्न निर्मिती करील. शतकानुशतके युगानुयुगे या गोष्टी होत आल्या आहेत आणि होत राहतील. परंतु या सृष्टीवर मानवासहित जे सर्व सजीव प्राणी, वनस्पती जन्माला आले आहेत ते सर्व मर्त्य आहेत. त्यांना मृत्यू अटळ आहे.

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात

दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत

या गीतरामायणातील ओळी मानवी जन्म आणि मृत्यू हे कसे एकमेकांशी निगडित आहेत हे सांगतात.

या जगात जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू आहेच हे निश्चित पण असे असले तरी भगवंताने आपल्या दोन दासांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिले. या जगामध्ये सात व्यक्ती चिरंजीव आहेत असे मानले जाते.

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः।

कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरंजिविनः॥

अश्वत्थामा, बळीराजा, वेद व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सप्त चिरंजीव. यातील हनुमान आणि बिभीषण हे दोघे निस्सीम श्रीरामांचे भक्त आहेत. हनुमंताचा जन्म वानर कुळातील तर बिभीषण राक्षस कुळात जन्मलेला. हनुमंत श्रीरामांचा निष्ठावान सेवक आहे हे आपण जाणतो. बिभीषणाची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. त्याचा जन्म राक्षस कुळात झालेला आणि महापराक्रमी रावणाचा तो सख्खा भाऊ. अन्यायी अशा रावणाची साथ सोडून श्रीरामांच्या पक्षात येणे ही गोष्ट त्याच्यासाठी एवढी सोपी नव्हती. परंतु तरी देखील त्याची रामावर असणारी श्रद्धा एवढी प्रचंड होती की तो हा सगळा विरोध सहन करून श्रीरामांना शरण आला. रामाने रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांनी लंकेचा राजा व्हावे अशीही इच्छा बिभीषणाने व्यक्त केली होती. एवढा तो रामभक्त होता.

हनुमंत आणि बिभीषण या दोघांचेही स्वभाव आणि कर्म वेगवेगळे होते. परंतु या दोघांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती. ती म्हणजे ते दोघेही श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांच्या अपार भक्तीमुळे श्रीरामांनी त्यांना चिरंजीव केले. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका केली. या मृत्यू लोकात जन्म घेऊनही ते अमर झाले ही फक्त श्रीरामंचीच कृपा!

खरी निष्ठा आणि भक्ती कशी असते आणि अशा भक्तांवर प्रभू श्रीराम कशी कृपा करतात हे या उदाहरणातून समर्थांनी आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. आणि म्हणून ते पुन्हा आपल्याला सांगत आहेत की श्रीराम हे दासाभिमानी आहेत. आपल्या भक्ताची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत.

स्वसंवाद : 

१) हनुमान आणि बिभीषण यांच्या इतकी भगवंताची भक्ती कदाचित मला जमणार नाही. परंतु किमान त्या मार्गावर चालावे असे तरी मला वाटते का?

२) ही सृष्टी भगवंताची लीला आहे असे मी मानतो का?

३) निसर्गाच्या विशालतेकडे पाहताना माझ्या मनात परमेश्वराप्रती कृतज्ञता येते का की मी ते गृहीत धरतो?

४) चिरंजीव होणे म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. माझ्या भक्तीचे ध्येय केवळ सांसारिक सुखापुरते आहे की मोक्षापर्यंत पोहोचण्याची माझी खरी इच्छा आहे?

– – – –

श्लोक क्र. ३४ – – – 

उपेक्षा कदा रामरुपी असेना|

जिवा मानवां निश्चयो तो वसेना|

शिरी भार वाहेन बोले पुराणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३४|

अर्थ : आतापर्यंतच्या उदाहरणांवरून समर्थांनी आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की) भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. परंतु (आपण असे दुर्दैवी जीव आहोत की) त्याची भक्ती करण्याचा आपला निश्चयच होत नाही. भक्तांची सारी काळजी मी वाहतो असे पुराणात त्याने वचन दिले आहे. दासाभिमानी असलेला श्रीराम आपल्या दासांची म्हणजेच भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(रामरुपी – भगवंताजवळ, जिवां मानवां – जीवरूपी म्हणजेच सामान्य माणसाला)

विवेचन : आपल्या भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करीत नाही. त्याचा संपूर्ण भार तो वाहतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. परंतु त्याच्या पित्याला त्याची विष्णूभक्ती मान्य नव्हती. तो देवांना आपले शत्रू मानत असे. विष्णू भक्ती करू नये म्हणून सुरुवातीला त्याने प्रल्हादाला समजावून पाहिले. परंतु तो जेव्हा ऐकत नाही असे दिसले तेव्हा त्याने विविध प्रकारे प्रल्हादाला ठार मारण्याचे प्रयत्न केले. परंतु सर्व प्रसंगांमध्ये भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटी नरसिंह रूपात प्रकट होऊन श्रीविष्णूंनी अत्याचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला आणि अशा रीतीने आपल्या भक्ताचे संरक्षण केले.

आपल्या प्रजेला परमेश्वराचे नाव घेण्यास आणि ऋषीमुनींना यज्ञ करण्यास कंसाने बंदी घातली होती. त्याने ईश्वर भक्तांचा अनन्वित छळ केला. परंतु भगवंताने श्रीकृष्ण अवतारात या अन्यायी आणि दुराचारी कंसाचा वध करून प्रजेला त्याच्या छळातून मुक्त केले.

अशा विविध प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. त्यांचा भार किंवा काळजी तो आपल्या शिरावर घेतो अशी अनेक उदाहरणे पुराणांमध्ये आहेत.

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

असे वचन त्याने गीतेत आपल्याला दिले आहेच. असे असले तरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला भगवंत आपल्याला सहाय्य करीलच याची खात्री वाटत नाही. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे परमेश्वर अस्तित्वात आहे आणि तो सदैव आपल्याजवळ आहे याची खात्री आपल्याला असत नाही. आपल्या हाकेला तो धावून येईलच याबद्दलही आपण साशंक असतो. त्याच्यावर भार टाकून निर्धास्त राहण्याइतकी निष्ठा किंवा समर्पण आपले नसते.

आपली अशी अपेक्षा असते की भगवंताने आपल्याला प्रपंचात येणाऱ्या अडचणींमध्ये आणि दुःखामध्ये मदत करावी. अशा गोष्टींसाठी आपण भगवंताला गृहीत धरतो. तो प्रसन्न व्हावा म्हणून निरनिराळ्या प्रकारचे नवस करतो, प्रार्थना करतो. भगवंताला निरनिराळ्या प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न करतो. कधी त्याला कोणी भक्त मोठी देणगी देतो तर कधी कोणी सोन्याचा मुकुट अर्पण करतो. परंतु या गोष्टींची भगवंताला अपेक्षा नसते. त्याला अपेक्षा असते ती शुद्ध आणि निरपेक्ष भक्तीची!

आपण परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली की आपली अशी अपेक्षा असते की त्याने आपल्यावर कृपा करावी. आपल्या संकटात धावून यावे. परंतु जेव्हा आपल्याला तसे होताना दिसत नाही तेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास डळमळीत होताना दिसू लागतो. परंतु ही परमेश्वराने पाहिलेली आपली परीक्षा असते असे म्हणावे लागेल.

जो भगवंत आनंदनिधान आहे, कल्पतरू आहे अशा भगवंताकडे भक्ती, मुक्ती आणि मोक्ष मागण्या ऐवजी त्याच्याकडून आपण पैसा, व्यवहारातील यश, सुखाचा प्रपंच यासारख्या क्षुल्लक गोष्टींची अपेक्षा करत असतो. व्यवहारातील यश, पैसा, सुखसमृद्धी या गोष्टींनाच सामान्य माणसे परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे असे समजतात. परंतु सदाचार आणि सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे असे समजावे.

भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे की “योगक्षेमं वहम्याहं. ” भगवंत आपला भार घेतो. त्याला आपली काळजी आहे. या त्याच्या वचनाचा अर्थ आपण असा घेता कामा नये की आपण आपले जे कर्तव्य आहे ते सोडून केवळ त्याच्यावर भार टाकून निवांत बसावे. अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच तर त्याने गीता सांगितली. आपल्या पूर्ण क्षमतेने आपले कर्तव्य करावे, स्वधर्म पार पाडावा. परंतु असे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. संत जनाबाई म्हणतात 

दळीता कांडीता तुज गाईन अनंता |

न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी

– असेच आपणही आपले कर्तव्य करत असताना त्याच्या नामात मग्न राहावे.

स्वसंवाद : 

१) मी भगवंताची भक्ती करतो तेव्हा माझ्या मनात काय असते – निरपेक्ष प्रेम की एखादी अपेक्षा?

२) परमेश्वराप्रती असलेली माझी भक्ती खरोखर निरपेक्ष असून ती “लाच” तर नाही ना?

३) संकटात भगवंताची कृपा दिसली नाही तेव्हा माझी श्रद्धा डळमळीत होते का?

४) “योगक्षेमं वहाम्यहं” हे वचन मला माहीत आहे – परंतु माझे कर्तव्य करताना मी खरोखर त्याच्यावर भार सोपवतो का की प्रपंचाची काळजी मीच वाहत राहतो?

– क्रमशः श्लोक ३३ आणि ३४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

पाकिस्तानात हळदीचा कार्यक्रम अन् पुरणपोळीचा बेत..

‘धुरंधर’मुळं ‘बलुचिस्तान’ जगाच्या नजरेत आलेलं. ‘बलोच’ शब्दाचं सर्चिंग शतपटीनं सोशल मीडियावर वाढलेलं. मात्र, हेच बलुचिस्तानी गेल्या अडीचशे वर्षांपासून शोध घेताहेत आपल्याच मावळ प्रांताचा.. कारण तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या समूहाला पाकिस्तानात ओळखलं जातं ‘बलोच मराठा’ म्हणून. होय. अनोख्या इतिहासाची ही विचित्र वाटचाल डोळे विस्फारून टाकणारी.

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाचा ‘रहमान डकैत’ मूळ बलुचिस्तानातला दाखवलेला. कारच्या बॉम्बस्फोटात मरण्यापूर्वी संजय दत्तचा ‘एसपी अस्लम चौधरी’ फोनवर ‘ए बलोचऽऽ’ म्हणून दम देताना दिसलेला. यामुळं भारतीयांमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तानबद्दल उत्सुकता वाढलेली. त्याचवेळी त्या प्रांतातल्या हजारो नागरिकांनीही या चित्रपटाच्या छोट्या -मोठ्या रिल्सवर कौतुकानं कॉमेंट देण्यास सुरुवात केलेली. यात सर्वाधिक संख्या ‘बलोच मराठा’ नावाची असलेली, कारण त्या मंडळींना ‘बॉलिवूड’बद्दल प्रचंड आकर्षण असलेलं. यातूनच आपल्या पूर्वजांचा शोध घेण्याची धडपड स्पष्टपणे दिसून आलेली. या साऱ्याचं मूळ तब्बल दोनशे पासष्ट वर्षांपूर्वीच्या कहाणीत असल्याचं लक्षात आलेलं.

सन १७६१ साली ‘पानिपत’च्या युद्धानंतर ‘अब्दाली’ खजिन्याविनाच रिकाम्या हाती अफगाण प्रांतात परतला. त्याला युद्धात सैनिकांची मदत करणाऱ्या मीर नासीरखानला मोबदल्यापोटी त्यानं ‘बंदी दुश्मन’ सैनिकांना बलुचिस्तानात सोडलं. तेव्हा ती संख्या होती जवळपास वीस हजार. तेव्हापासून ते तिथंच राहिले. यातले बहुतांश मूळचे मावळ प्रांतातले. सुपीक-सधन मातीतले. त्यामुळं तिथं ओसाड वाळवंटात जगण्यासाठी त्यांना निसर्गाशी लढावं लागलं. आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांशीही संघर्ष करावा लागला. काळाच्या ओघात त्यांची ‘भाषा’ बदलली. ‘वेश अन् देश’ बदलला. ‘संस्कृती’ही बदलली. परंतु, आपल्या मूळच्या ‘चालीरिती’ मात्र त्यांनी हरवू नाही दिल्या. ‘बुगती’ अन् ‘मरारी’ जमातीचा भाग असलेले हे लोक आजही स्वत:ला ‘बलोच मराठा’ म्हणवून घेतात. सातारा राजधानीचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या नावानं ‘साहू मराठा’ अशी उपाधी हे ‘बुगती मराठे’ लावतात. पेशव्यांच्या संदर्भातूनही बरेच ‘पेशवानी‘ नावानं ओळखले जातात.

इराण, पाकिस्तान अन् अफगाणिस्तान सीमेवर आता त्यांची दहावी-अकरावी पिढी जन्माला आलेली. तरीही यांच्यात लग्नावेळी ‘हळदीचा कार्यक्रम’ रंगतो. आजही ‘तांदळाचं माप’ ओलांडूनच वधू-वराचा घरात प्रवेश होतो. अधून-मधून पुरणपोळीही करतात. सैन्यदलात नोकरी, शेती अन् व्यापार हे पोट भरण्याचं माध्यम. यातील बरेच उच्चशिक्षित आता पाकिस्तानच्या सरकारी अधिकारीपदीही कार्यरत. सोशल मीडियावर ‘मराठा ट्राईब’ नावाचा यांचा मोठा ग्रुप सक्रिय. यातील अनेक बलोच सदस्यांनी स्वत:च्या नावापुढं मोठ्या अभिमानानं ‘मराठा’ शब्द मिरवलेला. हा ग्रुप तयार करताना त्यांनी सुरुवातीला ‘मराठा’ शब्द टाईप केलेला. नंतर ‘मरहट्टा’ असा बदल केलेला. पुन्हा मूळ ‘मराठा’ शब्द वापरलेला. त्यामुळं ‘आपण मूळचे कोण आहोत’, हे त्यांना पिढ्यानपिढ्या माहीत असलं तरी ‘आपली नेमकी ओळख काय? ’ या गूढ प्रश्नाचा गुंता त्यांच्यासाठी अद्याप न सुटलेला.

तोंडात बलुची.. कानात मराठी – – – 

बलुचिस्तानातल्या ‘मराठा’ समुहाचा आजपावेतो कैक संदर्भग्रंथात उल्लेख आलेला. कैक कादंबऱ्यांची पानंही रंगलेली. यावर ‘बलोच’ नावाचा मराठी चित्रपटही निघालेला. याचे पटकथा-दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी जेव्हा या नावाची घोषणा केली, तेव्हा सर्वाधिक तिकडच्याच मंडळींनी सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद दिलेला. मात्र, त्यांना मराठी समजत नसल्यानं गोंधळ उडालेला. एका ‘बलुची’नं ‘यूट्यूब’वर विचारलेलं, ‘इस मुव्ही का नाम क्या? ’ तेव्हा महाराष्ट्रातल्या एकानं त्याची खिल्ली उडविली, ‘वाचल्याशिवाय कॉमेंट करतोय.. बेटे मौज कर दी. ‘ परंतु या बिच्चाऱ्याला काय माहीत की, विचारणारा उर्दू भाषिक. थेट इराण-अफगाणिस्तान बाँड्रीवरचा. तरीही पाकिस्तानातल्या त्या लोकांनी मोबाईलवर हा चित्रपट आवडीनं पाहिला. तोंडातली भाषा बलुची असली तरीही कानावर पडलेली मराठी कदाचित आपलीशी वाटलेली. योगायोगाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या नायिका स्मिता गोंदकर यांची कुलदेवताही थेट तिकडचीच. बलुचिस्तानातली हिंगलाज माता.

हिंगलाज देवी ते गडहिंग्लज!

पाकिस्तानातील ‘हिंगलाज देवी’चा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा. एकीकडे अरबी समुद्र, तर दुसरीकडे बलुचिस्तानातल्या हिंगोल नदीचं खोरं. किर्थर पर्वतरांगेतील दुर्गम गुहेत पुरातन मंदिर वसलेलं. इथंच स्थायिक झालेला ‘मराठा’ समुदाय दरवर्षी ‘नानी’ यात्रेत मोठ्या श्रद्धेनं सामील होत असलेला. याच हिंगलाज देवीच्या अनेक उपशाखा महाराष्ट्रात. अमरावतीत मोठं मंदिर. सोलापुरातही हिंगलाबिका नावानं सुप्रसिद्ध. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावाचं नावही तिच्यामुळेच पडलेलं. तिकडून आलेल्या बलुची हिंग व्यापाऱ्यांनी इथं पूर्वी देवीची प्रतिष्ठापना केल्याचं मानलं गेलेलं. लगतचा सामानगड किल्ला अन् हिंगलाज मंदिर यावरून ‘गडहिंग्लज’ नाव पडल्याची आख्यायिका.

थेट साताऱ्याशी नाळ..

‘धुरंधर’मध्ये रणवीरसिंगने रंगवलेला ‘हमजा’ पाहून अनेकांना कुलभूषण जाधव यांची प्रकर्षानं आठवण झालेली. त्यांना २०१६ साली भारतीय एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्ताननं अटक केलेली. यातही दोन गोष्टी किती नवलाच्या बघा. पहिली म्हणजे जाधव हे मूळचे साताऱ्याचे. आनेवाडीत त्यांचं जुनं घर. दुसरी म्हणजे त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी पकडलं बलुचिस्तानातच. तिथल्या तरुणांना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर. म्हणजे २६५ वर्षांनंतरही मराठा माणूस अन् बलुचिस्तान यांचा संबंध काही तुटता तुटेनासा झालेला. विशेष म्हणजे ‘बलाेच’ चित्रपटाचे दिग्दर्शक पवार हेही साताऱ्यातील कुडाळचेच. राहता राहिला विषय शौर्याचा. ‘धुरंधर’मध्ये ‘एसपी चौधरी’ला उडविणाऱ्या बलुची तरुणाचा प्लॅन अत्यंत चक्रावून टाकणारा.

– – – आलं का लक्षात? स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी बलुचिस्तानातल्या या समूहाला आजही पाकिस्तान सरकार का टरकून असतं ते. होय. हाच तो डीएनए. ‘स्वराज्य’साठी लढणाऱ्या ‘गनिमी कावा’चा. लगाव बत्ती..

लेखक : सचिन जवळकोटे

कोल्हापूर.

प्रस्तुती : सुलू साबणे जोशी 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३१ आणि ३२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३१ आणि ३२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३१ – – – 

महा संकटी सोडिले देव जेणे|

प्रतापे बळें आगळा सर्वगूणें|

जयाते स्मरे शैलजा शूलपाणी|

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३१|

अर्थ : सर्व देवांवर जेव्हा अत्यंत कठीण संकट आले तेव्हा प्रभू रामचंद्राने त्यांना त्यातून सोडवले. असा तो श्रीराम पराक्रमाने, बळाने आणि सर्व गुणांनी संपन्न आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पार्वती त्याचे स्मरण करतात. असा हा दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या दासाची म्हणजेच भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही.

विवेचन मागील श्लोकात भगवंताचे सेवक असलेल्या व्यक्तीकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत नाही असे समर्थांनी सांगितले आहे. या श्लोकात तो भगवंत कसा श्रेष्ठ आहे ते सांगताना त्याच्या गुणांचे किंवा चरित्राचे गुणवर्णन समर्थ करतात.

रावण हा महापराक्रमी होता परंतु आपल्या सामर्थ्याचा त्याने दुरुपयोग केला आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने देवांनाही बंदिवान केले. हे म्हणजे देवांवर आलेले मोठे संकट होते. श्रीरामांनी रावणाशी युद्ध करून सीतेची सुटका केली, अनितीने वागणाऱ्या रावणाचा वध केला आणि त्याच्या बंदीवासात असलेल्या देवांना मुक्त केले. असा हा राम महाप्रतापी आणि महाबलशाली आहे.

समर्थ रामाचे वर्णन करताना म्हणतात, ” आगळा सर्वगुणें… “म्हणजे भगवंत सर्व गुणसंपन्न तर आहेच परंतु अनेक परस्परविरोधी गुण त्याच्या व्यक्तिमत्वात एकवटले आहेत. तो जसा महापराक्रमी आणि शूरवीर आहे, त्याचवेळी तो भक्तवत्सल आहे. शबरीची उष्टी बोरे प्रेमाने खाणारा आहे, आपला भक्त असलेल्या पुंडलिकासाठी युगानुयुगे वीटेवर उभा राहणारा आहे, जनाबाईला दळण दळू लागणारा आहे, नाथांघरचे पाणी भरणारा आहे. अशी त्याची किती रूपे वर्णावी!

त्याचप्रमाणे देवांवर जेव्हा संकट आले त्या त्यावेळी विष्णूने अवतार धारण करून देवांचे रक्षण केले आहे. पुराणातून अशा प्रकारच्या कथा आपण नेहमीच वाचतो. जेव्हा जेव्हा देवांवर संकट येत असे तेव्हा तेव्हा सर्व देव इंद्राच्या नेतृत्वाखाली श्रीविष्णूकडे आश्रय मागण्यासाठी जात असत आणि मग तो वेगवेगळे अवतार धारण करून त्यांचे रक्षण करीत असे.

विष्णू हा जगाचा पालन कर्ता आहे. ब्रह्मदेव हा जन्म देणारा आहे आणि भगवान शिव संहार करणारा आहे. पालन करणारा हा नेहमी जन्म देणाऱ्या आणि संहार करणाऱ्या पेक्षाही श्रेष्ठ असतो. यशोदेने श्रीकृष्णाचे पालनपोषण केले, त्याच्यावर संस्कार केले म्हणून जन्म देणाऱ्या देवकीपेक्षा श्रीकृष्णाची माता म्हणून यशोदेला आधी मान मिळतो. मुलांना जन्म देणे सोपे असते परंतु पालक होणे मात्र कठीण! काही लोक मुलांना जन्म देऊन सोडून देतात परंतु जे लोक अशा अनाथ मुलांना आई-वडिलांची माया देतात, त्यांचे पालनपोषण करतात ते माता पिता श्रेष्ठ होत. कुंतीने कर्णाला जन्म देऊन सोडून दिले परंतु धृतराष्ट्राचा सारथी असलेल्या अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांनी कर्णाचा सांभाळ मोठ्या प्रेमाने केला. म्हणूनच तो राधेय म्हणून ओळखला जातो.

अशाप्रकारे संपूर्ण जगाचे पालनपषण करणारे श्रीविष्णू किंवा श्रीराम श्रेष्ठ आहेत. प्रत्यक्ष पार्वती म्हणजे शैलजा आणि शूलपाणी म्हणजे भगवान शंकर हे देखील त्याचे स्मरण करतात एवढा तो श्रेष्ठ आहे. रामनामाचा महिमा प्रत्यक्ष शंकर पार्वतीला वर्णन करून सांगतात. तेव्हा महापराक्रमी, महाबलशाली आणि सर्व गुणांनी संपन्न असलेला हा भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही. हे लक्षात घेऊन आपणही त्याचेच स्मरण नित्य केले पाहिजे.

स्वसंवाद : 

१) देवांनाही संकटे येतात आणि ते परमेश्वराचा आश्रय घेतात मग मी माझ्या संकटात त्याचा आश्रय घेण्यास का संकोचतो?

२) पालनकर्ता हा जन्म देणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो मग माझे खरे पालन करणारा कोण आहे हे मी ओळखले आहे का?

३) प्रत्यक्ष शंकर-पार्वती रामाचे स्मरण करतात. माझ्या दिनक्रमात त्याचे स्मरण कितीपत होते?

४) भगवंत “आगळा सर्वगुणें” आहे. माझ्या जीवनात मी कोणत्या गुणांचा आदर्श त्याच्याकडून घेतो आहे?

– – – – 

श्लोक करा. ३२ – – – 

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली

पदी लागता दिव्य होऊन गेली |

जया वर्णिता शीणली वेदवाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३२|

अर्थ : श्रीरामांच्या पदाचा स्पर्श होताच शिळा झालेली शापित अहिल्या मुक्त झाली. त्यांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. अशा या भगवंताचे वर्णन करताना वेद सुद्धा शीणले आहेत म्हणजे थकले आहेत किंवा त्याचे वर्णन ते करू शकत नाहीत. असा हा अहिल्येचा उद्धार करणारा भगवंत आपला देखील उद्धार केल्याशिवाय राहणार नाही.

विवेचन : या श्लोकांमध्ये समर्थ भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करत आहेत आणि आपल्या भक्तांना तो कशाप्रकारे तारतो हेच यातून आपल्या मनावर ठसवत आहेत. आधीच्या श्लोकामध्ये भगवान रामाने रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांना मुक्त केले असे समर्थांनी सांगितले. या श्लोकात श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा कसा उद्धार झाला ही गोष्ट ते आपल्याला सांगत आहेत.

अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी अत्यंत रुपवती आणि शीलवती होती तसेच ती महान साधवी आणि पतिव्रता होती इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि गौतम ऋषींचे रूप घेऊन त्यांच्या आश्रमात आला. परंतु काही कथांनुसार इंद्राने तिचे शीलभ्रष्ट करण्याआधीच अहिल्येने त्याला ओळखले आणि तो परत फिरला. तर काही कथांनुसार इंद्राच्या कृत्याला ती बळी पडली आणि तिचे पातिव्रत्य भंग झाले असे म्हटले जाते. याच सुमारास गौतम ऋषी आपल्या आश्रमात परत आले आणि त्यांना अहिल्येच्या पातिव्रत्यावर संशय आला आणि त्यांनी तिला तू शिळा होऊन पडशील असा शाप दिला. वास्तविक हे सगळे जे काही घडले यात अहिल्येचा काहीही दोष नव्हता.

खरंतर मूळ वाल्मिकी रामायणात गौतम ऋषींनी अहिल्येला शाप दिल्याची आणि ती शिळा होऊन पडल्याची नोंद नाही. तुलसी रामायणात आणि इतरही अनेक ठिकाणी मात्र ही कथा सांगितली गेली आहे.

समर्थांनी मूळ वाल्मिकी रामायणाचा बारकाईने अभ्यास केला होता. अशा प्रकारची घटना त्यात नाही हे माहीत असताना देखील ते या ठिकाणी त्या घटनेचा उल्लेख करतात. त्याचे कारण म्हणजे ही घटना सर्वांनी स्वीकारली आहे. दुसरी म्हणजे ती रामाची महती सांगणारी आहे. समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम असल्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी कोणतीही गोष्ट असेल तरी त्यांना ती मान्य होते.

श्रीराम हे पतितांना पावन करणारे होते. अहिल्येला इतरांनी जरी शीलभ्रष्ट मानले तरी श्रीरामांनी तिचा तिरस्कार कधी केला नाही. आणि तिला आपल्या पदस्पर्शाने पावन करून तिचा उद्धार केला. या साध्वीचे नाव अत्यंत आदराने पाच पतिव्रतांमध्ये घेतले जाते.

अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा 

पंचकन्यां स्मरे नित्यं महापातकनाशनं 

तेव्हा जो भगवंत शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार करतो, तो आपला सुद्धा उद्धार करेल हा विश्वास समर्थ आपल्याला या ठिकाणी देतात. पतितांना पावन करणारा असा हा भगवंत आहे त्याच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करण्यासाठी वेद सुद्धा कमी पडतात. त्याचे गुण वर्णन करताना ते थकतात. अशा या परमेश्वराची भक्ती जर आपण मनापासून केली तर तो आपलाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी समर्थ आपल्याला देतात. म्हणून प्रत्येकाने एकाग्रतेने आणि मनापासून श्रीरामांची भक्ती करावी. मग तो आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगी सोबत राहील. संत तुकारामांना असा अनुभव आला होता म्हणूनच ते ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं म्हणतात. “

स्वसंवाद ::

१) अहिल्येचा दोष नसताना तिला शाप मिळाला. माझा दोष नसताना माझ्या आयुष्यातही असे अन्यायकारक प्रसंग आले तर माझी परमेश्वरावरील श्रद्धा टिकून राहते का?

२) श्रीरामांनी इतरांनी तिरस्कारलेल्या अहिल्येचा स्वीकार केला. मी माझ्या जीवनात अशा उपेक्षित व्यक्तींशी कसा वागतो?

३) “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” अशी माझ्या दैनंदिन व्यवहारात मला भगवंताची सोबत जाणवते का 

– क्रमशः श्लोक ३१ आणि ३२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

निसर्गातील विविधता, आकर्षकता, चकित करणारे बदल जे क्षणोक्षणी, दिवसा रात्री, ऋतुनुसार, भौगोलिक परिस्थिती नुसार वेगवेगळे व बऱ्याचदा अनपेक्षित असतात, नेत्रसुखद असतात, मानवाच्या बुद्धीच्या, शक्तीच्या पलिकडचे असतात. हे बदल अनुभवताना साहजिकच ही निसर्ग निर्मिती करणाऱ्या शक्ती पुढे आपण नतमस्तक होतो. ‘हे असं का’ हा प्रश्न आपल्याला पडतो तसा तो टागोरांना देखील पडतो. पण आपण त्याची शास्त्रीय, भौगोलिक कारणं शोधण्याचा प्रयत्न करतो पण टागोरांचे हळुवार कवी मन वेगळाच विचार करतं ज्याने आपण चकित होतो.

हे सगळं नेमकं असंच का आणि कसं? म्हणजे फुलात इतके रंग का? फुलांमध्ये मकरंद का? फळात गोड रस का? समुद्राच्या लाटांना गाज का? पानांना सळसळ का? याची उत्तरं त्यांना लहान मुलांकडे पाहिल्यावर मिळतात. या सगळ्या गोष्टींचा संबंध लहान मुलांच्या आनंदाशी असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो म्हणजे अचानकच हा विचार त्यांच्या मनात चमकून जातो आणि मग त्यांच्या कवी मनाला त्यातली सगळी संगती उलगडत जाते. आणि या कविता वाचल्यावर आपल्याला पूर्णपणे पटतं की, “जे न देखे रवी, ते देखे कवी”

ते म्हणतात, रंगीत वस्तू बघितली की मुलांना खूप आनंद होतो म्हणून देवानं निसर्गात रंग निर्माण केले. गोड खाऊ मिळाला की मुलं खुश होतात म्हणून त्यानं मकरंद निर्माण केला, फळांमध्ये निरनिराळे रस निर्माण केले. मुलांना गाणी खूप आवडतात त्यावर ती आपसुकच नृत्य करायला लागतात. त्यासाठीच देवानं सूर निर्माण केले, पानांच्या सळसळीतून, समुद्राच्या लाटांमधून! निसर्गाची कोमलता आणि लहान बाळाची कोमलता यात काही नातं असलं पाहिजे असं टागोरांना वाटतं.

त्यांना असेही कांहीं प्रश्न पडतात की लहान मुलाच्या पापणीत नीज कुठून येत असेल? किंवा झोपेत बाळ कां हसत असेल? बाळाच्या अंगाची मऊ, लुसलुशीत, टवटवी कशी निर्माण होत असेल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे टागोरांना निसर्गात सापडतात. याबाबतीत तर त्यांच्या कल्पना भन्नाट आहेत. आपण अशा कल्पना करूच शकणार नाही.

रानात, काजव्याच्या प्रकाशात, लाजाळूच्या दोन कळ्या डुलत असतात; तिथून नीज येते आणि बाळाची पापणी चुंबून जाते.

तसंच शरदामध्ये चंद्राचे किरण पावसाळी मेघांना स्पर्श करतात आणि त्यामुळे दंव पडतं. या दंवाच्या वर्षावामध्ये उषा नहाते. त्यावेळी तिला स्वप्न पडतं. त्या स्वप्नात बाळाचं झोपेतलं हास्य जन्म घेतं. आणि मग उषा काय करते, ते हास्य अलगद बाळाच्या गालावर ठेवते.

मऊ लुसलुशी मात्र त्यांच्या मते आईच्या तारुण्यात, तिच्या हृदयातल्या हळुवार प्रेमातूनच निर्माण होते आणि ती बाळाला गर्भातच मिळते. आहेत ना कधी न ऐकलेल्या कल्पना!

टागोरांचं मन किती संवेदनशील असेल की, त्यांना इतक्या नाजूक हळुवार कल्पना सुचाव्यात!

अशा निसर्गाची स्तुती करणं, भक्ती करणं, त्याच्यात एकरूप होऊन जाणं, हे सुद्धा सृजनाच्या निर्मिती मागचं अध्यात्मच आहे. यातून एक जाणवतं ना की, परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणिव होण्यासाठी कुठल्याही अध्यात्मिक अनुभवाची गरज नाही फक्त या लहान मुलांमध्ये समरस झालात की तुम्हाला त्यांच्यातच देव दिसतो, निसर्ग दिसतो. आणि आपण त्या निर्मात्यासमोर नतमस्तक होतो.

—–

गीत : ६१

THE sleep that flits on baby’s eyes does anybody know from where it comes? Yes,

there is a rumour that it has its dwelling where, in the fairy village among shadows of the 

forest dimly lit with glow-worms, there hang two timid buds of enchantment. From there it comes to kiss baby’s eyes.

The smile that flickers on baby’s lips when he sleeps does anybody know where it was born? Yes, there is a rumour that a young pale beam of a crescent moon touched the edge of a vanishing autumn cloud, and there the smile was first born in the dream of 

a dew-washed morning the smile that flickers on baby’s lips when he sleeps.

The sweet, soft freshness that blooms on baby’s limbs does anybody know where it was hidden so long? Yes, when the mother was a young girl it lay pervading her heart in 

tender and silent mystery of love the sweet, soft freshness that has bloomed on 

baby’s limbs.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६१

*

तान्हुल्याच्या पापणीत नीज,

कुठून येते बाई?

*

रानाच्या सावली, परीच्या त्या देशी,

लुकलूकणाऱ्या काजव्या प्रकाशी,

लाजाळूच्या दोन कळ्या डुलती गं

नीज येई तेथून चुंबाया पापणी गं॥

*

ओठांवर हसू, झोपेत पिल्लूच्या,

कुठून येते बाई?

*

शारदी मेघा, रश्मी चंद्राची स्पर्शी

उषाही नाहते, त्या दहिवर वर्षी

झोपेतले हास्य, जन्मे स्वप्नी तिच्या

अलगद ठेवी, ते गाली सानुल्याच्या॥

*

गात्रात बाळाच्या, मऊलुस टवटवी, कुठून येते बाई?

*

मखमाली तारुण्या, प्रवेशते आई

हळुवार प्रीती, गात्रे भारून जाई

तीच मिळे बाळा, गर्भात असता

धन्य होते आई, रूप देखणे पाहता॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

——

गीत : ६२

WHEN I bring to you coloured toys, my child, I understand why there is such a play of colours on clouds, on water, and why flowers are painted in tints when I give coloured 

toys to you, my child.

When I sing to make you dance I truly know why there is music in leaves, and why waves send their chorus of voices to the heart of the listening earth when I sing to make you dance.

When I bring sweet things to your greedy hands I know why there is honey in the cup of 

the flower and why fruits are secretly filled with sweet juice when I bring sweet things to your greedy hands.

When I kiss your face to make you smile, my darling, I surely understand what the 

pleasure is that streams from the sky in morning light, and what delight that is which the 

summer breeze brings to my body when I kiss you to make you smile.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६२

*

नभांत रंगबावरे इंद्रधनू कां?

फुलांत इतुक्या रंगछटा कां?

*

रंगीत खेळणी तुजसाठी आणतो,

तेंव्हा कळते!

*

पर्णांची सळसळ गीत गात कां?

लाटांची गाज धरणी ऐकत कां?

*

मम गीतावर तव नृत्य पाहतो,

तेंव्हा कळते!

*

मधुघट भरले पुष्पहृदी कां?

फळात मधुरस भरे कोण कां?

*

गोड खाऊ तुजसाठी आणतो,

तेंव्हा कळते!

*

प्रभात किरणे सुखवित जग कां?

वातझुळुक शांतवित तनमन कां?

*

तव भाल चुंबितो अन् तू हसतो,

तेंव्हा कळते!

*

निसर्ग निर्मिता जे सुख हरीला

तेच लाडक्या मिळते मजला!

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

गीत : ६३

THOU hast made me known to friends whom I knew not. Thou hast given me seats in 

homes not my own. Thou hast brought the distant near and made a brother of the stranger.

I am uneasy at heart when I have to leave my accustomed shelter; I forget that there abides the old in the new, and that there also thou abidest.

Through birth and death, in this world or in others, wherever thou leadest me it is thou, the same, the one companion of my endless life who ever linkest my heart with bonds of joy to the unfamiliar.

When one knows thee, then alien there is none, then no door is shut. Oh, grant me my prayer that I may never lose the bliss of the touch of the one in the play of the many.

—–

मराठी भावानुवाद : गीत:६३

*

अपरिचित जागी जन्मा घालिसी 

अनोळखींना भाऊ बनविसी

*

बेचैन मन हे तिथेच गुंती

सोडूनि जाता नाती गोती

*

नव्यात जुनेही सारे वसते

अस्तित्व तुझे सोबत असते

*

अनंत जन्म साथ तू देशी

अन् प्रेमबंध तू नवे निर्मिशी

*

जे तुला जाणती, परके नसती

त्यांच्यासाठी सारी दारे खुलती

*

एकच वर दे, जाईन जेथे

अनेकात तू एकचि तेथे

*

– क्रमशः भाग २१..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भगवान बुद्ध : ज्ञान, करुणा आणि मध्यममार्गाचा तेजस्वी दीप… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

✦ भगवान बुद्ध : ज्ञान, करुणा आणि मध्यममार्गाचा तेजस्वी दीप… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

(भगवान बुद्ध जयंती विशेष)

प्रस्तावना

उद्या १ मे २०२६, शुक्रवार — वैशाख पौर्णिमा. हा दिवस केवळ चंद्राच्या पूर्णतेचा नाही, तर मानवजातीच्या अंतःकरणात प्रकटलेल्या अपूर्व प्रकाशाचा आहे. याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले, अशी श्रद्धा जगभरच्या बौद्ध परंपरेत रूजलेली आहे . म्हणूनच बुद्ध पौर्णिमा ही करुणा, प्रज्ञा आणि निर्वैरतेचा पवित्र उत्सव मानली जाते.

लुंबिनीचा दिव्य जन्म

इ. स. पू. ५६३ मध्ये नेपाळमधील लुंबिनी वनात क्षत्रिय शाक्य वंशात सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला. राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी जन्मलेल्या या बालकाच्या ठायी पुढे जगाला जागृत करणारा बुद्ध पुरुष दडलेला होता. राजसुख, वैभव, सौंदर्य आणि स्नेह यांच्या कुशीत वाढलेला हा राजपुत्र जन्मतःच विलक्षण तेजस्वी होता.

दुःखदर्शनाची जागृती

संसाराच्या राजमार्गावरून फिरताना सिद्धार्थांच्या दृष्टीस चार दृश्ये पडली — जर्जर वृद्ध, रोगाने गांजलेला मनुष्य, मृतदेह आणि संन्यासी. त्या चार दृश्यांनी त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. सुखाच्या मोहर्‍यांआड दडलेले दुःख प्रथमच स्पष्ट झाले. राजवैभवाचा त्याग करून वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला; हाच त्यांचा महाभिनिष्क्रमणाचा क्षण.

साधनेचा पथ आणि बुद्धत्व

कठोर तपश्चर्या, उपवास, मौन आणि ध्यान यांच्या वणव्यातून त्यांनी सत्याचा शोध घेतला. पण अतिरेकी काया-क्लेशाने मुक्ती मिळत नाही, हे उमगल्यावर त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. बोधगया येथे निरंजना नदीकाठी पिंपळाच्या छायेत ध्यानस्थ होत त्यांनी अंतःप्रकाशाचा अनुभव घेतला आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. त्या क्षणी मानवी वेदनेचा अर्थही उलगडला आणि तिच्या निरासाचा मार्गही दिसला.

धम्मचक्राचा पहिला सूर्य

ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी सारनाथ येथे पाच भिक्षूंना पहिले प्रवचन दिले. तो केवळ उपदेश नव्हता; तो धम्मचक्राचा पहिला फिरता प्रकाश होता. त्या प्रवचनातून संसार, दुःख, कारण, निरोध आणि मार्ग यांचा उलगडा झाला. पुढे बुद्धांचा सारा धम्मप्रवास चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाभोवती फुलत गेला.

बुद्धांचे करुणामय व्यक्तिमत्त्व

बुद्धांचे व्यक्तिमत्त्व केवळ प्रभावी नव्हते, तर अंतर्मनाला शांती देणारे होते. त्यांची मुद्रा स्थिर, त्यांची वाणी गंभीर, त्यांचे नेत्र करुणेने ओथंबलेले आणि त्यांचा सहवास मनात नवी प्रसन्नता निर्माण करणारा होता. ते जिथे जात, तिथे भय निवळे, अहंकार मावळे आणि मनात प्रशांत तेज उमटे. त्यांच्यातील सौंदर्य हे देहाचे नसून चेतनेचे होते; म्हणूनच त्यांचा प्रभाव काळाच्या पलीकडे पोहोचला.

धम्माचा गाभा

बुद्धांचा संदेश अत्यंत साधा, पण अत्यंत गहिरा होता — दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचा निरोध शक्य आहे, आणि त्या निरोधाचा मार्गही आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी — या सर्वांतून त्यांच्या धम्माची उंची आणि शिस्त प्रकट होते.

संघ, परिषदा आणि परंपरा

बुद्धधर्माचा पाया संघशिस्तीवर उभा होता. प्रवेश, आचरण, उपसंपदा, पवज्जा, पत्तिमोक्ख, पवारणा आणि गणतंत्रात्मक संघव्यवस्था यांमधून हा धम्म अधिक संघटित, अधिक शिस्तबद्ध होत गेला. बुद्धांच्या महानिर्वाणानंतर धम्मपरिषदांनी त्यांच्या शिकवणीचे संकलन केले. पुढे हीनयान, महायान आणि वज्रयान हे प्रवाह निर्माण झाले; त्रिरत्न — बुद्ध, धम्म, संघ — हीच श्रद्धेची अमूल्य त्रयी राहिली.

महानिर्वाणाचा क्षण

कुशीनगर येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी शिष्यमंडळींना धम्मावर दृढ राहण्याचा उपदेश दिला. त्यांच्या निधनातही विलक्षण शांतता होती; जणू एक दीपक विझला नाही, तर अधिक व्यापक प्रकाशात विलीन झाला.

अमर वारसा

बुद्धांनी दिलेला संदेश आजही मानवतेला नवा मार्ग दाखवतो. क्रोध, लोभ, मोह, द्वेष यांच्या धुक्यात अडलेल्या जगाला त्यांचे जीवन चिरंतन दिशा देत राहते. त्यांनी सांगितलेला मध्यम मार्ग, करुणेची भाषा आणि अंतःशुद्धीचा आग्रह — हेच त्यांच्या जीवनाचे खरे वैभव आहे. बुद्ध पौर्णिमा म्हणजे त्या दिव्य जीवनाचा, त्या करुणामय दृष्टिचा आणि त्या जागृत प्रकाशाचा उत्सव.

बुद्धं सरणं गच्छामि।
धम्मं सरणं गच्छामि।
संघं सरणं गच्छामि।

🙏🙏🙏

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे क्र. ७४ आणि ७५ – –

वादो नावलम्ब्य: ||७४||”

बाहुल्यावकाशादनियतत्वाच्च||७५||

अर्थ : भक्ताने वादाचा आश्रय घेऊ नये कारण वादामध्ये मतभिन्नतेला भरपूर वाव असतो आणि केवळ तर्कावर आधारलेले कोणतेही मत अथवा विधान अंतिम सत्य नसते. (म्हणून भक्ताने वादापासून दूर रहावे)

विवेचनजगाच्या प्रारंभापासून सांगणारे व ऐकणारे कोट्यावधी होऊन गेले आहेत, पण वाद विवाद काही मिटले नाहीत. पण ज्या वादांत संशयाचे ढग व वादाची वादळे एकामागे एक अशी असंख्य उठत असतात ते वाद निव्वळ दंभ वाढवितात. म्हणून भक्ताने त्यांच्या मागे न लागता सत्संगातील संवादसुख तेवढे घेत जावे.

सर्व संत सांगतात की वाद टाळावा. जर सर्वांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर वाद होण्याची परिस्थिती निर्माण होणारच नाही याकडे लक्ष द्यावे. “व्यक्ती तितक्या प्रकृती” तसेच “जितकी मने तितके विचार” हे सूत्र ध्यानी ठेवून तसे वागायला शिकावे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या तिथल्या तिथे सोडून द्याव्या, तसेच पूर्व घटना आठवून त्याचा शोक करू नये. साधना करताना वाद विवाद टाळून सद्गुरुंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून साधन करीत राहावे, योग्यवेळी सद्गुरू खात्रीने कृपा करतात, हा विश्वास बाळगावा.

आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी छोटेसे देवघर, देव्हारा किंवा एखादया देवाची प्रतिमा तरी नक्की असते. आपण रोज देवाची यथामती पूजा देखिल करतो. आपल्या घरात आपण कसे राहतो? कसे वागतो? आपल्या कुटुंबातील सर्वांशी आपले सबंध कसे असतात? हे सर्व पाहून देवाला आपल्या घरात राहावेसे वाटेल का? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. खरंतर, आपल्या घरात देव राहतो असे वाटण्यापेक्षा आपण देवाच्या घरात (मंदिरात) राहतो असे वाटले पाहिजे आणि आपण तसे वागले पाहिजे. हाच खरा सत्संग होईल.

आपल्याशी संवाद साधल्यामुळे समोरची व्यक्ती अंशत: तरी समृद्ध व्हावी.  किमान तसा आपला प्रयत्न असावा, असे झाले नाही तर आपण आपण निव्वळ वाचाळवीर ठरू. “बोले तैसा चाले…. ” असा आपला प्रयत्न असावा. नेमके आणि मोजके बोलणे हे सुसंवांद होण्यास उपयुक्त ठरते, नाही का? आपण तसे वागण्याचा प्रयत्न करू.

“तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दं।

वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः॥

वादे वादे जायते तत्त्वबोधः।

बोधे बोधे भासते चन्द्रचूडः॥”

“मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥”

(दा. ११. ०२. २५)

दैनंदिन व्यवहार करताना अनेक विचारांची माणसे भेटतात. कधी एका विचाराच्या माणसांची चलती असते तर कधी दुसऱ्या… लोकं जातात पण विचार तिथेच रहातात. अर्थात दोन विचारांमधील वाद तसेच राहतात. अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा अनेक वाद (विचार) आहेत. द्वैत-अद्वैत हा तर प्रमुख वाद आहे. त्यानंतर शैव वैष्णव हा सुद्धा एक वाद आहे…. साधकाने या वादात फसू नये असे श्रीसमर्थ आपल्याला सांगतात. कुठे वाद घालायचा आणि तो कुठे थांबवायचा ह्याचे तारतम्य कळले नाही, तर संवाद न होता तो फक्त वाद होतो आणि वादातून काहीही निष्पन्न होत नाही, असे इतिहास सांगतो. अध्यात्म क्षेत्रात तरी मनुष्याने वादविवादाच्या भानगडीत न पडता सद्गुरू आज्ञेचे पालन करावे. एक गुरू आणि एक नाम, एक प्रमाण ग्रंथ इतक्या भांडवलावर मनुष्य आत्मारामाची प्राप्ती करून घेऊ शकतो.

संत्संग आपल्याला देवाकडे काय मागावे हे शिकवितो. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला मागतो आणि दुर्योधन श्रीकृष्णाचे सैन्य. आपल्याला नवीन काही शिकायचे असेल तर आपली पाटी कोरी हवी. आपण आपला अभिमान घेऊन देवाकडे गेलो तर देव सांगेल ते कधीच आपल्याला पटणार नाही. संवाद होणारच नाही मग हाती काय लागणार? म्हणून देवळात जाताना पायातील चप्पल आणि डोक्यावरील टोपी काढून जावे असे आपल्याला शिकविले जाते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

टीप : अधिक अभ्यास करायचा असल्यास मनाच्या खालील श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.

वरील दोन्ही सूत्रांचे सुलभीकरण करून आपल्यापुढे मांडण्याचे कार्य समर्थ रामदास स्वामींनी केले असल्याचे आपल्या लक्षात येईल. मनाच्या श्लोकांत ते म्हणतात,

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥

*
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।

जनीं वादसंवाद सूखे करावा॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥

*

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।

विवेके अहंभाव यातें जिणावें॥

अहंतागुणे वाद नाना विकारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥

*

हिताकारणे बोलणे सत्य आहे।

हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

*

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।

परी वादवेवाद तैसाचि ठेला॥

उठे संशयो वाद हा दंभधारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

*

– – – – –   

भक्ति सूत्रे क्र. ७६ – – – 

भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधककर्माण्यपि करणीयानि||७६||

अर्थ : भक्तीविषयक शास्त्राचे मनन करावे आणि भक्तीला सहाय्यभूत होणारी कर्मे करावी.

विवेचन :

“विठ्ठल मात्रा जेणे घ्यावी | तेणे पथ्ये सांभाळावी” असे संत वचन आहे. भक्ति करताना मनुष्याने अधिकाधिक शुद्ध होण्याची अनिवार्यता असते. शुद्ध म्हणजे किती शुद्ध? तर जगात सर्वात शुद्ध आणि पवित्र कोण असेल तर तो एकमात्र भगवंत. त्याच्या इतके शुद्ध होण्यासाठी देहधारी साधकाची देहबुद्धी क्षीण होणे आवश्यक असते. एकदा सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराज यांनी आपल्या पट्टशिष्याला अर्थात ब्रम्हानंद बुवांना प्रश्न विचारला की तू तर विद्वान आहेस. वेद, वेदांत यांत पारंगत आहेस. मी कसा तुझा गुरू झालो? आणि नंतर स्वतःच म्हणाले की कदाचित तुझ्यापेक्षा मी कणभर जास्त देहाला विसरलो असेन….! कथेतील भावार्थ इतकाच की देहबुद्धि क्षीण नव्हे, तर पूर्णपणे नष्ट होणे ही साधकाच्या भक्तीचे प्रमाण मानता येईल.

आता ही देहबुद्धि समूळ नष्ट होण्यासाठी आवश्यक त्या आणि तितक्याच शास्त्रांचा किंवा ग्रंथांचा अभ्यास साधकाने करावा. अन्यथा साधक साधक न रहाता शास्त्री होतो आणि पुन्हा कर्मठपणाचा दोष त्याच्या अंगी निर्माण होऊन तो पथभ्रष्ट होऊ शकतो.

श्रीमहाराज म्हणायचे की फार वाचू नये. जितके वाचावे तितके साधकाने आधी आचरणात आणावे, अन्यथा मी इतके इतके ग्रंथ वाचले, इतक्या शास्त्रांचा अभ्यास केला याचा वृथा अभिमान बळावू शकतो.

भक्ति शास्त्र म्हणून समजून घेण्यासाठी एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करण्यास हरकत नाही. आजपर्यंत अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या अनुभवातून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्या सर्वांचे ग्रंथ अभ्यास करायचा म्हटले तर अनेक जन्म घ्यावे लागतील आणि मूळ हेतू मात्र विसरला जाईल. यावर सर्व संतांनी एक उपाय सांगितला. एक गुरू, एक ग्रंथ आणि एक नाम. या तिघांच्या सहाय्याने मनुष्य भगवतांची प्राप्ती करून घेऊ शकतो.

साधकाने आपले प्रत्येक कर्म अशा पद्धतीने करावे की जेणेकरून त्यातून भक्तीची वाढ होईल.

भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील आपल्याला झेपेल अशी व्याख्या प्रमाण मानावी. मला भावलेल्या दोन व्याख्या इथे देत आहे.

१. “जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।” (ज्ञाने. 10. 18)

२. प्रपंचात जेवढी आसक्ती | तेवढी भगवंतावर प्रीती || याचे नाव भक्ति”

साधकाने आपल्याला भावणारा ग्रंथ निवडावा आणि त्याचा साक्षेपाने अभ्यास करावा, त्यावर चिंतन, मनन करावे, म्हणजे त्याला पुढील मार्ग आपसूक दिसू लागेल.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७४, ७५, ७६..

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पन्नाचा हिरा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पन्नाचा हिरा!” ☆ श्री संभाजी बबन गायके

रक्त उपलब्ध होत नाही तोवर शस्त्रक्रिया करणे अशक्य होतं. आज तिसरा दिवस. नऊ वर्षांच्या संतोषची प्रकृती आता अत्यंत नाजूक अवस्थेत पोहोचली होती.

संतोष पटेल चे वडील बांधकाम कारागीर तर आई शेतमजूर. मोठ्या बहिणीच्या लग्नात आई-वडिलांनी जमा केलेली पुंजी खर्ची पडलेली. छोट्या संतोषच्या शारीरिक तक्रारींकडे लक्ष द्यायला पोट भरण्याच्या लढाईत गुंतलेल्या वडिलांना फुरसत नव्हती. ते लोकांची घरं उभारून देत, पण स्वत:ला एक साधं छप्पर मिळवू शकलेले नव्हते निम्मं आयुष्य संपलं तरी. बांधकाम नसेल तेंव्हा विहिरी खोदून देण्याचं जोखमीचं काम करावं लागायचं…. अनेकदा विहिरी ढासळत, पण सुदैवाने डोक्यावर दगड नाही पडला. हात-पाय तर किती तरी वेळा जायबंदी झाले त्याची गणना नाही. आई शेतमजुरी करायची. आणि या दोघांनी मिळून जरा बरी कमाई केली की घरात तांदूळ यायचा. अन्यथा पुढचे दिवस गव्हाची भरड, आणि ती संपली की ज्वारीच्या कण्या… यावर गुजराण करावी! मजुरी आणि अर्धा एकर कोरडवाहू जमीन यापेक्षा जास्त नाही देऊ शकत!

संतोष अभ्यासात हुशार होता, पण आळस करी. मग आई त्याला झाडाला बांधून चोप देई… म्हणे…. या गरीबीतून बाहेर पडायचे असेल तर एकच मार्ग आहे…. शिक्षणाचा!

पोरगं आठवीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिलं आलं तेंव्हा आई-वडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९२% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तरीही पुढील शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न होताच. मग बांधकामावर विटा वाहणे आणि अशी अन्य कामे करून संतोष थोडाफार हातभार लावत होताच.

पुढे इंजीनियरींगसाठी भोपाळमध्ये आल्यावर भाजीवाल्याने मोफत दिलेल्या भाजीवर दिवस काढले. कुणीतरी मार्केटिंग मध्ये खूप पैसे आहेत, असे सांगितल्यावर तिकडे मोर्चा वळवला… आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. यावर आईने अशी काही खरडपट्टी काढली की विचारता सोय नाही! त्या माऊलीने गरिबीशी पैंज लावली होती….. मी नाही जिंकू शकले…. माझा मुलगा जिंकून दाखवेल तुझ्या विरोधातली लढाई!

— आईच्या शब्दांनी पुन्हा मार्गावर आणले खरे पण नोकरी काही मिळेना. वडील म्हणाले… घरी येऊन जनावरं सांभाळ, शेतात लक्ष घाल. बांधकामे तर मिळतात मला अजूनही…. मदतीला आलास तर चांगला रोजगार मिळेल!

गाव गाठलं. योगायोगानं वन विभागात रखवालदाराची तात्पुरती नोकरी मिळाली….. आणि तिथे अभ्यासाला वाव होता. जंगलातली शांतता आणि साहेब लोकांच्या निवासस्थानाबाहेरच्या दिव्यांचा प्रकाश…. मार्ग सापडला. मध्य प्रदेश पब्लिक सर्विस कमिशनची (MPPSC) ची परीक्षा दिली… एकट्याने अभ्यास करून. केवळ चार गुणांनी पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला… आणि मग आणखी नेट लावत, पंधरा महिन्यांनी झालेल्या त्याच परीक्षेत राज्यात २२ वा क्रमांक पटकावत DEPUTY SUPERINTENDENT OF POLICE पदाला गवसणी घातली! पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्या दिवसापासून दाढी न करण्याची शपथ घेतली होती….. पंधरा महिने वाढलेली दाढी लाल दिव्याच्या गाडीत बसण्याआधी काढली…. जिद्दच होती तशी.

लग्न केलं ते पारंपारिक पद्धतीने. नव्या नवरीची वरात सायकल रिक्षातून काढली होती. एका डी. एस. पी. अधिका-याचे असे लग्न लोकांनी पहिल्यांदाच पाहिले असावे.

आपण सोसलेल्या गरिबीच्या झळा इतरांना बसू नयेत यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले. विविध माध्यमांमधून नवोदित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शनासाठी साहाय्य मिळवून द्यायला सुरुवात केली. सोशल मिडीयाचा अत्यंत प्रभावी वापर करीत संवाद वाढवत नेला. आज हजारो विद्यार्थी संतोष कुमार पटेल यांच्याशी जोडले गेलेले दिसतात! पडत्या काळात मदतीचा हात दिलेल्या लोकांना शोधून त्यांचे हात हातात घेऊन धन्यवाद देणारा हा अधिकारी… याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत!

नऊ वर्षांचा संतोष…. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, शहरात जायला पैसा नाही… मग गावातल्या झाडपाल्यावाल्या बाबांच्या आश्रयाला जाणे आलेच. शरीराच्या वरवरच्या जखमांवर झाडपाला उपयुक्त असतो, हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा मोठ्या व्याधीने शरीर ग्रासले की मृत्यू ठरलेला. संतोष असाच मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यावर कुणाकडून तरी उधार उसनवारी करीत त्याला मोठ्या रुग्णालयात आणले होते. शस्त्रक्रिया करायची ठरले.. पण रक्त द्यावे लागणार होते. १९९९ चा तो काळ. त्यावेळी त्या भागात रक्तदान करणे म्हणजे स्वत:ला कमजोर करून घेणे, असा समज होता. त्यामुळे रक्तदान करायला कुणी सहजासहजी तयार होत नसे. संतोषची शस्त्रक्रिया त्यामुळेच वेळेमध्ये होऊ शकली नाही. एक एक दिवस उलटत होता!

संतोष दाखल असलेला WARD तिस-या मजल्यावर होता. संतोषचे वडील सुपारी चघळत असत. असेच चिंतागती बसलेले असताना त्यांनी तोंडातील सुपारी वरून खाली टाकली…. ते नेमके खाली असलेल्या एका सफाई कर्मचा-याने पाहिले. मोठ्या तिरीमिरीतच तो कर्मचारी संतोषच्या वडिलांची खबर घेण्यास वर आला…. त्याने तोंडाचा पट्टा सोडलाच होता… पण संतोषचे वडील शांत उभे राहून दिलगिरी व्यक्त करीत होते. डोळ्यांत आसवे होती. त्या सहृदय कर्मचा-यास वाईट वाटले. त्याने परिस्थिती समजावून घेतली आणि “मी देतो रक्त! ” म्हणून रक्तदान करायला तो तयार झाला…. काहीही अपेक्षा न ठेवता. योगायोगाने त्याचा रक्तगट जुळला आणि संतोषचा जीव बचावला! सख्खे खानदान उपयोगात आले नाही पण हे खूनदान (रक्तदान) करायला अनोळखी माणूस आला…. संतू मास्टर त्याचे नाव! परिस्थितीने दोन गरीब कुटुंबांना रक्ताच्या नात्यात बांधले ते कायमचे.

संतोष पटेल साहेबांचे वडील अधून मधून संतू मास्टर यांच्या घरी जाऊन येत असत. नंतर त्यांचा संपर्क कमी झाला असावा. कारण दोघांची राहण्याची ठिकाणे दूर दूर होती. दिवस पुढे निघून गेले. मोठ्या होत गेलेल्या संतोषकुमार पटेल साहेबांना हे रक्ताचे काका आठवणीत होते. जीवनाच्या धकाधकीत काही गोष्टी मागे पडतात.

पुढे सतना स्टेशनमध्ये साहेबांचे काही काम निघाले आणि त्यांना लहानपणीची ती रक्तदानाची कथा आठवली. त्यांनी त्या रक्तदात्याचे घर शोधण्याचे ठरवले. तीन तास शोधाशोध केल्यावर एका अत्यंत गरीब वस्तीत संतू मास्टर रहात असत…. असे समजले. दोनच महिन्यांपूर्वी एका शाळेत सफाई करताना त्यांना सर्पदंश झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला होता!

डी. एस. पी. साहेब साध्या वेशात आपल्या सहकारी कर्मचा-यांसह संतू मास्टर यांच्या घरी पोहोचले. त्यांचा मुलगा मजुरीसाठी बाहेरगावी गेलेला आहे. संतू यांच्या दोन मुली आणि थोरल्या मुलीच्या दोन लहानग्या मुलीसुद्धा होत्या घरात. मोठ्या मुलीच्या चेह-यावरून साहेबांनी तीच संतू मास्टर यांची मुलगी हे ताडले. तिच्या पायांना स्पर्श केला… हातावर काही पैसे ठेवले… आशीर्वाद मागितला. म्हणाले…. ‘ मी तुमचा भाऊच आहे…. तुमच्या वडिलांची भेट नाही होऊ शकली. पण त्यांचेच रक्त माझ्या शरीरात वाहते आहे. आयुष्यात काहीही गरज पडली तर तुम्हांला आणखी एक भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. ‘.. असं म्हणत साहेबांनी त्या लहानग्या मुलींच्याही पायांना स्पर्श करीत आशीर्वाद घेतले! संतू मास्टर यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नात कन्यादानाची जबाबदारी सुद्धा घेतली!

मागे एकदा बालाघाट दौ-यावर असताना त्यांनी एका वृद्धाश्रमाला भेट दिली होती. साहेबांच्या पत्नीचा वाढदिवस त्यांनी त्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरवले होते. तेथील पूरन सिंग ठाकूर नावाच्या एका वृद्धाने पटेल साहेबांना खास पोलिसी पद्धतीने SALUTE केल्यावर पटेल साहेबांनी त्या वृद्धाची चौकशी केली. तर ते साहाय्यक फौजदार निघाले. पत्नीच्या निधनानंतर विमनस्क अवस्थेत त्यांनी घरदार सोडले, लहान मुलाला सोडून ते भटकत हिंडू लागले होते… व्यसने, आजार आणि मानसिक विकार यांनी ग्रासले गेल्याने त्यांना स्वत:बद्दल फार काही सांगता येत नव्हते… आणि त्यांनी घरदार सोडून चाळीस वर्षे उलटून गेली होती. पटेल साहेबांनी त्यांच्या पद्धतीने संवाद साधत तीन गोष्टी जाणून घेतल्या… त्या साहेबांच्या गावाची साधारण माहिती… आणि ते नोकरीत असताना फुटबॉल खेळत असत. या एवढ्या माहितीवरून पटेल साहेबांनी एक रील प्रसारित केला, त्यांच्या पोलिस खात्यातील मित्रांच्या मदतीने पूरन सिंग यांच्या मुलाचा शोध घेतला…. आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले! अशा अनेक कहाण्या आहेत… या प्रामाणिक आणि माणुसकीची जाण असलेल्या पोलिस अधिका-याच्या!

वर्दीला मान आहे, सन्मान आहे आणि भीतीयुक्त आदरही. या पदावर पोहोचणारे कुठून तिथे पोहोचलेले असतात ते कुणास ठाऊक? पण जे आपली पाळेमुळे विसरून जातात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? अनेकजण तर मागे वळून पहात नाहीत. पण संतोष कुमार पटेल, D. S. P. पोलिस विभाग, मध्यप्रदेश यांच्यासारखेही हिरे असतात. पन्ना जिल्ह्यात जन्मलेला हा हिरा म्हणूनच अधिक चमकदार भासतो.

गांव का डीएसपी नावाने श्री. संतोष कुमार पटेल एक फेसबुक पेज चालवतात. याद्वारे विविध विषयांवर विडीओज बनवतात आणि प्रसारित करतात. तरुणांना मार्गदर्शन, समुपदेशन करतात!

— — सकारात्मक गोष्टीही घडत असतात समाजात… त्या आपल्या दृष्टीस पडाव्यात म्हणून ही कहाणी सांगितली. तुम्हांलाही असे काही ठाऊक असल्यास लिहा.

जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares