मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ति सूत्रे ७० – – 

तन्मया : ||७०||

 अर्थ : भक्त भगवंतमय झालेले असतात.

विवेचन: विभक्त नाही तो भक्त अशी भक्ताची व्याख्या केली जाते. इथे तन्मय असा उल्लेख आहे. साधना पूर्णत्वास गेली की भक्त आणि भगवंत यांच्यात काही भेद रहात नाही. अशा साधकाचे वर्णन भगवंत गीतेत करतात.

*”नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय|*

*झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले||”*

(गीताई ०४. १०)

संताना ना कोणापासून भय असते, तर कोणासाठी त्यांच्या मनात क्रोध असतो. त्यांच्या मनात फक्त त्या भगवंताबद्दल निरतिशय प्रेम असते. जणू भगवंतच त्यांच्या ह्रदयात विराजमान असतो. आपल्याला हनुमानाची गोष्ट ठाऊक आहे. वेळ आल्यावर हनुमानाने आपली छाती विदीर्ण करून राम आपल्या हृदयात असल्याचे दाखवून दिले होते. अशी सर्व मंडळी ही सामान्य साधकांसाठी भक्तीचे आदर्श आहेत, प्रमाण आहेत.

प्रभू श्रीरामाला हनुमंताला बक्षिस देण्याकरता एकही गोष्ट योग्य वाटली नाही. शेवटी त्याने हनुमंताला आलिंगन दिले आणि त्याचे कौतुक पुढील शब्दांत केले आहे.

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।”

संत तुकाराम महाराज म्हणतात की साधना करता करता अशी वेळ आली की मला आता विठ्ठल माझा सोयरा वाटू लागला आहे. सोयरा अर्थात अगदी जवळचा.

ते एका अभंगात म्हणतात,

*”विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥२॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥३॥ सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥४॥” तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥५॥”*

(अभंग क्रमांक 497, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

 जय जय रघुवीर समर्थ

—–

भक्ति सूत्रे क्र. ७१ – 

*”मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः सनाथा चेयं भूर्भवति ||७१||”*

अर्थसिद्ध भक्ताच्या माता, पिता व पूर्वजांना आनंद होतो. देव देवता आनंदाने नृत्य करतात आणि पृथ्वीला रक्षणकर्ता मिळून ती सनाथ होते.  

विवेचनदैनंदिन व्यवहारात एखादा मनुष्य जर श्रीमंत झाला, मोठा उद्योगपती झाला तर त्याचे कूळ तर उद्धरतेच, तसेच त्याच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत असतो.

परमार्थातील अंतिम पायरी म्हणजे भक्त आणि भगवंताचे एकरूप होणे. असे पूर्णत्व प्राप्त करणारे तसे मोजकेच असतात, पण ते असतात यात काही शंका नाही. भारतमातेच्या अशी अनेक नररत्ने जन्मास आली की ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतील आणि ही परंपरा अखंड राहील यात शंका असण्याचे कारण नाही.

एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखाद्या जडजीवाला नरदेह प्राप्त होतो, तेव्हा भगवंताला सर्वात जास्त आनंद होतो कारण त्याला वाटते की आता मी याला नरदेह दिला आहे, तर आता हा साधना करून माझी (अर्थात भगवंताची) प्राप्ती करून घेईल, पण प्रत्यक्षात मात्र लाखो करोडो मध्ये एखादा जीव देवत्वापर्यंत पोचतो. मग ज्याप्रमाणे ऑलिंपिक पदक मिळविल्यावर ज्याप्रमाणे त्या देशातील सर्वांना आपल्या घरी दसऱ्याच्या दिवशी दिवाळी आल्यासारखे वाटतेज तसे साधकाच्या नातेवाईकांना, घरच्या लोकांना, पितरांना नव्हे तर देवदेवतांना ही तितकाच उत्कट आनंद होतो असे नारद मुनी आपल्याला सांगत आहेत.

अशा साधकाचे वर्णन संत तुकाराम महाराज आपल्या पुढील अभंगात करतात… 

*”निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥ नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥२॥ त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्‍या कारणां पुरता विधि ॥३॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसी ॥४॥”*

साधकाच्या अंतरात देवत्व प्रगट झाले की तो सिद्ध होतो. देहाने मनुष्य दिसत असला तरी तो भगवंत झालेला असतो. बाहेरून त्या संताचा व्यवहार कदाचित अतिसामान्य असेल, पण अंतरात मात्र त्याचे अनुसंधान पक्के असते.

त्याच्या नजरेत सर्वजण समान असतात. ते अवतरण करतात, ते आपल्या सारख्या सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी. पूज्य ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की दोन रुपयाचे तिकीट काढले की गोंदवले येथे सगुण ब्रह्म पाहायला मिळायचे. अशा संतांमुळे पृथ्वीवरील पाप नष्ट होते, पृथ्वी सनाथ होते.

जय जय रघुवीर समर्थ

—–

भक्ति सूत्रे क्र. ७२, ७३ – – 

 *”नास्ति तेषु जाति विद्यारूपकुलधनक्रियादि भेदः ॥७२॥”*

*”यतस्तदीय: ||७३||”*

अर्थश्रेष्ठ भक्तांमध्ये जातपात, विद्या (शिक्षण), रूप, कुळ, पैसा, करत असलेले काम इत्यादींवर आधारलेले भेद नसतात, कारण ते भगवतांचे एकनिष्ठ भक्त असतात.  

विवेचनही दोन्ही एकमेकांस साधारण पुरक आहेत म्हणून त्यांचे विवेचन एकत्र करीत आहे.  

भक्ति करणे म्हणजे भगवंतावर अकारण प्रेम करणे हे आपण पाहिले आहे. दैनंदिन व्यवहार करताना मनुष्याला कधी जाणता तर कधी अजाणता मनुष्याला विविध प्रकारचे भेद पाळावे लागतात, अन्यथा त्याला व्यवहार करता येत नाही. उदा. वाहन कोणतेही असले तरी त्या वाहनाला ठेवण्यासाठी वाहनतळच उचित ठरते. वाहन महागडे आहे म्हणून कोणी त्याला झोपण्याच्या खोलीत नेऊन ठेवत नाही, अर्थात ते उचितही नसते.

संत अर्थात पूर्णत्व पावलेला भक्त हा स्वतः देव झालेला असतो. संत कधीही कोणामध्ये भेद पाळत नाहीत, भेद मानीत नाहीत.  

आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले एक गीत आहे. — – 

*”टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं*

*देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥*

*दरबारी आले रंक आणि राव*

*सारे एकरूप नाही भेदभाव*

*गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग||||”*

 या स्थितीला संत पोहचलेले असतात. कोणत्याही संताच्या स्थानी जावं, तिथे आपल्याला मुक्त प्रवेश मिळेल.

संतत्व प्राप्त केलेला मनुष्य व्यवहारातील भेद लक्षात घेऊन त्या त्या माणसांशी, त्या त्या प्राण्यांशी त्या त्या परीने वर्तन करतात.

श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात अशी अनेक उदा. आहेत. त्यातील एक दोन मी इथे सांगतो. एकदा चोरी करायला आलेल्या चोरांना श्रीमहाराजांनी पकडले. त्यांना पोलिसात न देता, पुन्हा चोरी करणार नाही या अटीवर त्यांना अनुग्रह देऊन कृपांकित केले. एका मनुष्य त्यांच्यावर विष प्रयोग करण्यासाठी आला होता. आपल्याला मारायला आलेल्या मनुष्याला सुद्धा श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याची तयारी केली होती. पण तो मनुष्य घाबरून पळून गेला. तेव्हा श्रीमहाराज म्हणून गेले, की त्याने चांगली संधी सोडली आणि स्वतःचे नुकसान करून घेतले. इतके दयासिंधुत्व संतच दाखवू शकतात. कारण स्वतः परमात्मा त्यांच्या अंतर्यामी कायम स्थित असतो.

प्रकृतीचे स्वतःचे असे विधिविधान आहे. त्यानुसार घटना घडत असतात. अमुक वेळेस पाऊस पडणार किंवा ऊन पडणार हे प्रकृतीच्या अधीन आहे. अनेक सामान्य माणसांना प्रश्न पडतो की संत अवतार घेतात, तर लोकांचे दुःख, दैन्य दूर का करीत नाहीत? या प्रश्नांची अनेक उत्तरे आजपर्यंत आपण पाहिली असतील, पण पुढील उत्तर मला अधिक उचित वाटते.

एकदा श्री रमण महर्षी यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही आपल्या शक्तीचा इतरांच्यापी कल्याणासाठी उपयोग का करीत नाही? तर त्यावेळी रमण म्हणाले की आम्ही दोन कुठे आहोत, आम्ही एकच आहोत. अर्थात मीच परमात्मा आहे आणि मीच सर्व काही करीत आहे. त्यामुळे अनेक वेळा अनेक लोकांचा गोंधळ होऊ शकतो.

साधक जेव्हा सिद्ध होतो, तो गुरू स्वरूप होऊन जातो. तो जगदाकार होऊन जातो. एकदा श्रीमहाराजांना एका भक्ताने विचारले की आमच्या अनेक प्रश्नांचे तुम्ही इतक्या त्वरेने कसे उत्तर देऊ शकता? त्यावर श्रीमहाराज म्हणाले की मला तुमचा प्रश्न आधीच कळलेला असतो. जेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो

तेव्हाच तो मला कळतो आणि जेव्हा तुम्ही येऊन मला प्रश्न विचारता, तोपर्यंत उत्तर शोधायला मला अवधी मिळतो. मग मी त्याचे उत्तर देऊ शकतो. अर्थात श्रीमहाराज आपल्या मनात उपस्थित असतात, नव्हे ते कायम आपल्या मनात असतात, असे म्हणता येईल. भगवंताची एक उपाधी मन अशीच आहे, नाही का?

*”जेथे नाम, तेथे माझा प्राण | ही सांभाळावी खुण ||”*

– – श्री गोंदवलेकर महाराज

भक्तीच्या पहिल्या पायरीवर भक्त देवाला म्हणत असतो की *तस्य एव अहम्*.

अर्थात त्याचे रूप, गुणवर्णन ऐकले आहे, पण प्रत्यक्षात तो कसा आहे हे माहित नाही. पण तो मला आवडतो.

भक्तीच्या दुसऱ्या पायरीवर भक्त देवाला म्हणतो की *तव एव अहम्*.

अर्थात भक्त भगवंताच्या सान्निध्यात असतो. भगवंत भक्ताच्या सोबतीला असतो. *”जेथे जातो तेथे तू माझा सांगाती”* अशी भक्ताची खात्री असते.

भक्तीच्या तिसऱ्या पायरीवर भक्त आणि देव एकच होत असतात. *”मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानची* अशी स्थिती असते. देव आणि भक्त एकमेकाला म्हणतात, *त्वम् एव अहम्*. ही तदियतेची स्थिती म्हणता येईल.

यापुढील स्थितीमध्ये भक्त देवाला म्हणतो भक्तीचे सुख भोगण्यासाठी मला भक्तच राहू दे नि तू भगवंत रहा.  

संत तुकाराम महाराज या स्थितीचे वर्णन पुढील प्रमाणे करतात.

*”नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव | मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥ दावी रूप मज गोपिका-रमणा | ठेवीन चरणावरी माथा ॥२॥ पाहोनि श्रीमुख देईन आळिंगन | जिवे लिंबलोण उतरीन ॥३॥ पुसता सांगेन हितगुज मात | बैसोनि एकांत सुख गोष्टी || || तुका म्हणे यासी न लावी उशीर | माझे अभ्यंकर जाणोनीया ॥५॥”*

संदर्भ : अभंग क्रमांक २२७८, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था

 जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७०, ७१, ७२, ७३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तू तिमिरातून तेजाकडे नेणारी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “तू तिमिरातून तेजाकडे नेणारी!” ☆ श्री संभाजी बबन गायके

“आता एक खोटं लपवण्यासाठी आणखी एक खोटं बोलणार आहेस का? ” आईच्या या निर्वाणीच्या वाक्यावर साहेब नि:शब्द झाले!

त्यांनी सैन्य प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचल्या पोहोचल्या तेथील अधिका-यांना अगदी खरं खरं सांगण्याचा निश्चय केला. आणि आईचा आशीर्वाद घेऊन ते रवाना झाले!

सैन्य प्रशिक्षण आणि त्यातून अधिका-यांचं विशेष प्रशिक्षण हे शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांचा कस पाहणारे असते. मिळू शकणा-या मोजक्या सुट्यांच्या दिवसांची हे धडधाकट, राकट लोक लहान मुलांसारखी वाट पहात असतात. आणि घरी आल्यावर अक्षरश: आपल्या आईच्या पदराखाली झोपतात… कारण हीच अशी एक जागा आहे जिथं सारं काही माफ असतं!

“मातोश्री अत्यवस्थ… त्वरीत या! ” अशी तार प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचली आणि अभ्यासात गुंतलेल्या जंटलमन कडेटला त्वरीत कळवण्यात आले… जाण्या-येण्याचे दिवस गृहीत धरून तातडीची सुट्टी मंजूर करण्यात आली. कडेटची प्रवासाची व्यवस्था झाली!

अत्यंत काळजीच्या मन:स्थितीत साहेब गावात पोहोचले तर सनईचे सूर कानी पडले… साहेबांच्या जिवलग मित्राचं लग्न होतं. या फौजी साहेबाने लग्नात आवर्जून उपस्थित राहावं, असं त्या मित्राला वाटणं स्वाभाविकच होतं! पण या कारणांसाठी प्रशिक्षणातून सुट्टी मिळणं अशक्य होतं. त्या मित्रांनी मग एक वेगळी युक्ती केली. त्यांनी साहेबांना तार धाडली… ”मातोश्री अत्यवस्थ… त्वरीत या! ” 

त्यावेळी मोबाईल, टेलिफोन इत्यादी संपर्क साधने फारशी सहज उपलब्ध नसल्याने काही चौकशी करणे अशक्य होते. साहेबांनी घाई-घाईत घर गाठले होते. मित्रांचा उद्देश ठीक होता… पण त्यांनी योजलेला उपाय कोणत्याही शिस्तीत अजिबात बसणारा नव्हता! साहेबांच्या मातोश्रींना मात्र हा प्रकार अजिबात रुचला नव्हता.

तरुण वय. साहेबांनी मित्राच्या लग्नाचा स्वागत समारंभ अगदी समरसून अनुभवला. गेल्या कित्येक वर्षांत न भेटलेले यार-दोस्त… दिवस कसे निघून गेले लक्षात नाही आलं. प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचण्यास एक पूर्ण दिवस उशीर होणार होता!

अतिशय कष्टात दिवस काढलेल्या त्या माऊलीच्या जीवनाचा पाया होता… सत्य… खरं… जे आहे ते! साहेब लहान असताना आई त्यांना म्हणायची… ”पुढे चांगले दिवस पहायचे असतील आयुष्यात, तर आता कठीण परिश्रमांन पर्याय नाही! अन्यथा तुझी जी क्षमता आहे, त्या क्षमतेला तू केवळ आळसामुळे न्याय दिला नाहीस… असं होईल!” 

कोणत्याही ग्रंथातील लांबलचक उपदेशांपेक्षा आईच्या हृदयातून आलेले हे शब्द या मुलाच्या काळजात घर करून बसले… आणि मग त्याने मागे वळून पाहिले नाही. शालेय जीवनापासून ते पदवीपर्यंत, आय. एम. ए. ची प्रवेश परीक्षा आणि एस. एस. बी. ची मुलाखत… हे सर्व टप्पे केवळ मेहनतीच्या जोरावर यशस्वीरीत्या पार पडले!

प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचताच लष्करी शिस्तीनुसार चौकशी झाली… पण साहेबांनी परिणामांची चिंता न करता चूक कबूल केली.. आणि जी शिक्षा दिली गेली ती निमूटपणे भोगली! ज्या प्लाटून कमांडर साहेबांपुढे या साहेबांनी आपला थेट कबुलीजबाब दिला होता, त्या कमांडर साहेबांनी पुढील कारकीर्दीत या साहेबांना त्यांच्याच लष्करी युनिटमध्ये नेमणूक दिली… त्यांना असा प्रामाणिक सैन्याधिकारी त्यांच्या हाताखाली हवा होताच!

मध्ये पस्तीस वर्षे उलटून गेली. हा प्रशिक्षणार्थी अधिकारी पुढे आपल्या सचोटी, मेहनत आणि शौर्य या गुणांच्या जोरावर भारतीय सैन्यात उत्तमोत्तम पदांवर काम करीत गेला. सैनिकी कर्तव्याच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल पाच वेळा त्यांची नेमणूक झाली. या पाचही वेळा त्यांनी आपला नेतृत्वगुणांचा ठसा उमटवला. स्पष्ट, थेट आणि खरे बोलणे हा स्वभाव झाल्याने कारकीर्द अत्यंत यशस्वी म्हणावी अशी झाली. सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल अशा पदाकाम्नी सन्मान झाला. आणि आता उद्या सेवेतील अखेरचा दिवस येऊन ठेपला अशी परिस्थिती निर्माण झाली.

अंबाला येथील लष्करी केंदावर मेजर जनरल रंजन महाजन, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल यांना निरोप देण्याची तयारी सुरु होती. साहेबांनी चालकाला त्यांचे वाहन काढायला सांगितले आणि ते थेट दिल्लीच्या दिशेने निघाले. सुमारे तीन-साडेतीन तासांच्या प्रवासात त्यांना आईने आजवर दिलेल्या संस्कारांचे स्मरण होत होते. देशाप्रती निष्ठा, दयाभाव, संवेदनशीलता, संकटसमयी धीरोदात्त राहण्याचे सामर्थ्य आणि आत्मविश्वास! हे गुण मुलांमध्ये जन्मत:च नसतात… ते पेरावे लागतात… त्याला खतपाणी घालावे लागते… स्वत: तसं वागून दाखवावं लागतं… तेंव्हा तिन्ही लोकी झेंडा फडकवणारी मुलं तयार होतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी… ती जगाचा असा उद्धार करू शकते. भारतीय सैन्यातील अशा अनेक मातांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे!

साहेब पूर्ण लष्करी गणवेशात होते. घराचा दरवाजा कुणीतरी उघडला… आईसाहेबांना दाराशी कोण आलं आहे ते समजलं नाही! साहेबांनी खास रुबाबदार पद्धतीने पावलं टाकली… आणि आईसाहेबांना कडक मानवंदना दिली! मातोश्रींनी सुद्धा थरथरत्या हातांनी मोठा साहेब झालेल्या लेकाला सल्यूट केला… आणि पुढच्या क्षणी त्याला मिठी मारली… त्याच्या गालाचे हळूवार चुंबन घेतले. यावेळी दोघा मायलेकांचे चेहरे हे जगातल्या सर्वाधिक आनंदी माणसांचे चेहरे होते!

माणूस आईसाठी सदैव लहानच असतो. आई नावाची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही.

गेल्या वर्षी ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाजन साहेबांचे मातृछत्र हरपले! माझ्या आयुष्याला खरा अर्थ माझ्या आईमुळे प्राप्त झाला, असे महाजन साहेब मोठ्या अभिमानाने सांगतात 

(मेजर जनरल रंजन महाजन (सेवानिवृत्त) यांनी जम्मू-काश्मीर मध्ये दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांच्या तेथील अनुभवावर आधारीत Kashmir in the life of fire… हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाचे मराठी, हिंदी भाषांतर व्हायला पाहिजे. माझाही प्रयत्न राहील. २०२३ मध्ये सेवानिवृत्त होण्याच्या एक दिवस आधी घरी जाऊन आपल्या आईला मानवंदना देतानाचा महाजन साहेबांचा विडीओ लाखो लोकांनी पाहिला! आपल्यापैकी काही वाचकांनी हा विडीओ कदाचित पाहिला नसेल म्हणून हा लेख. दिवंगत मातोश्री यांचे नाव खूप शोधले पण कुठे उल्लेख दिसला नाही. असो… आईचे नाव… आईच! ) 

जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक पुस्तक दिन…  – लेखक : संजय थोरात ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? इंद्रधनुष्य ?

☆ जागतिक पुस्तक दिन…  – लेखक : संजय थोरात ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली 

दरवर्षी २३ एप्रिलला शंभरहून अधिक देशात साजरा होणाऱ्या जागतिक पुस्तक दिनाचे २०२२ रौप्य महोत्सवी वर्ष होते.

औपचारिक दृष्ट्या २०२२ हे रौप्य महोत्सवी वर्ष असले तरी १९२३ पासून पुस्तक दिन ही कल्पना राबवली जाते.२०२६ या वर्षी मोरोक्को ची राजधानी बरात हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे

२३ एप्रिल १९२३ ला स्पेनमध्ये मिगुएल सर्वेंटीस च्या स्मृतीसाठी पहिल्यांदा पुस्तक दिन साजरा करण्यात आला. इंग्लंड मध्ये मार्च महिन्यातील पहिल्या गुरुवारी हा दिवस साजरा होतो. ३८ नाटके लिहणारा विल्यम शेक्सपियर याचा जन्म व मृत्यू दिवस २३ एप्रिल आहे. इंका गार्सिलोसा, सर्व्हेंटीस, विल्यम वर्डस्वर्थ ब्लादिमिर नाबोकाव यांचा ही स्मृतीदिन २३ एप्रिल आहे. युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) म्हणजे मराठीत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना यांनी १९९५ ला २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन व कॉपी राईट दिन म्हणून मान्य केला. १९९५ ला युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या सर्व साधारण सभेत वाचन आवड व लेखक सन्मान करण्यासाठी या दिवसाला मान्यता देण्यात आली. वाचनाची आवड, लेखक व पुस्तकांचा सन्मान ही संकल्पना आहे. वाचन, लेखन, प्रकाशन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. भारत सरकारने २३ एप्रिल २००१ पासून हा जागतिक पुस्तक दिन साजरा करायला सुरवात केली. विनामूल्य पुस्तक वितरण, स्पर्धा, पुरस्कार अशा कार्यक्रमांद्वारे वाचनाविषयी आवड व जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.

दरवर्षी जागतिक पातळीवर पुस्तकांची राजधानी निवडली जाते. आतापर्यंत शारजा, माद्रिद, मट्रीयल अमस्टरडम, क्रोनकी, बँकाक, अथेन्स, व्रोक्ला, बोगोटा, बैरूत, इंचिऑन, येरेवान आदि शहरे पुस्तक राजधानी म्हणून निवडण्यात आली. २००३ ला आपले नवी दिल्ली हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. पुस्तकाच्या राजधानीत वर्षभर पुस्तक स्वामित्व हक्क, वाचन, पुरस्कार असे कार्यक्रम होतात. मेक्सिकोतील गुडलजरा हे शहर पुस्तकाची राजधानी म्हणून घोषित झाले होते कोरोना काळात ऑनलाईन कार्यक्रम झाले.

युनेस्को मार्फत पुस्तक राजधानी प्रमाणेच दरवर्षी वाचकांसाठी संदेश, theme, संकल्पना दिली जाते. 2024 ला, you are a reader तुम्ही वाचक आहात ही मुलांसाठी संकल्पना होती.२००३ ला दिल्ली पुस्तकाची राजधानी असताना, ‘ जीवनाचा दोस्त – पुस्तक ‘ असा संदेश होता. आतापर्यंत वाचन म्हणजे थंड हवा, एक पुस्तक द्या, आनंदाचे तास, जीवनाचा मित्र, वाचन एक अखंड यात्रा, अभ्यास, कायमस्वरुपी साक्षरता जीवन बदलते, वाचन हाच उपाय, भाषेचं आंतरराष्ट्रीय वर्षे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विकास, प्रकाशन, मानवाधिकार, संस्कृती संपर्क, पुस्तक निर्मितीचा इतिहास – लिहण्यापासून डिजीटल पर्यंत, पुस्तके आणि अनुवाद, वाचन ही बौद्धिक संपदेची सुरक्षा, पुस्तक वाचा, हुशार व्हा, जग वाचा, वाचन माझा अधिकार, कथा share करा, पुस्तक : जगाची खिडकी अशा संकल्पना व संदेशावर काम करण्यात आले.

 

❀꧁꧂❀┉

लेखक : संजय थोरात

प्रस्तुती : हर्षल सुरेश भानुशाली

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असा असतो जीवन-संघर्ष…  – लेखक : डॉ. राजेंद्र भारुड  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ असा असतो जीवन-संघर्ष…  – लेखक : डॉ. राजेंद्र भारुड  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त मा. राजेंन्द्र भारुड यांचा जीवन संघर्ष… ) 

मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर 

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.

मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.

पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.

त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.

पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.

एम. बी. बी. एस. च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम. बी. बी. एस. ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.

घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.

माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.

आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?

छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता.

पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.

वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो.

आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?

जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.

लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : डॉ. राजेंद्र भारुड

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

वर्डस्वर्थ म्हणतात बालक हा माणसाचा पिता आहे. त्यांचा मुलांच्या निरागसतेवर, प्रामाणिकपणावर, बेफिकीर स्वभावावर व शुद्ध हृदयावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे टागोर सुद्धा निरागस, निष्कपट बालकांमध्ये रमतात. लहान मुले पाहताना त्यांच्यात त्यांना निसर्ग दिसतो, परमेश्वर अनुभवता येतो.

टागोरांना वाटतं, लहान मुले व निसर्ग आपल्याला खूप कांही शिकवित असतात. टागोरांच्या आठव्या कवितेमध्ये ते एका राजघराण्यातील मुलाबद्दल लिहितात. मौल्यवान वस्त्रांमुळे व अलंकारांमुळे त्या मुलाला खेळतांना मोकळेपणा मिळत नाही. त्यामुळे तो उदास होऊन बसतो. मुलांसाठी खेळ, मित्र त्या मौल्यवान वस्रांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. पण हे मोठ्या माणसांना कळत नाही. त्यांना आपलं समाजातील स्थान, त्या स्थानाचा आब राखणं जास्त महत्वाचं वाटतं. कवी त्या मुलाच्या आईला सांगतात की या तुमच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांमध्ये लहानांना जखडू नका. मातीत खेळल्यामुळे मुले निरोगी राहतात. सर्व थरांतील मुलांबरोबर खेळल्यामुळे त्यांना सामाजिक भानही येतं. टागोरांना वाटतं की हे मानवी जीवन जत्रेसारखं आहे. बरंच काही वाईट आहे, दुष्टपणा आहे, गलिच्छपणा आहे, पण बरंच काही आनंद देणारं, चैतन्य देणारं, जगण्याची इच्छा बळावणारंही आहे. जसं जत्रेतून जावं असं कधीच वाटत नाही तसंच हे जीवन देखिल आपल्याला बांधून ठेवतं, आसक्ती निर्माण करतं. लहान मुलं मात्र ह्या लोभ, मोह, स्वार्थ यापासून कोसो दूर असतात.

आजच्या साठाव्या कवितेत देखिल टागोर लहान मुलांच्या विश्वावर भाष्य करतात. हे विश्व म्हणजे एक सागर आहे. ते म्हणतात लहान मुलं निरागसपणे काठावर वाळूत खेळतात. पाण्यात कागदाच्या नावा सोडतात. शिंपल्यांशी खेळतात. वाळूत घर बांधतात. आणि निसर्गाकडून घेतलेलं सगळं निसर्गावरच उधळून देतात. त्यांना ना तिथल्या मोत्यांचा, ना तिथल्या माशांचा हव्यास आहे. लाटा क्रुद्ध होतात तेव्हा त्यांची भीती इतरांना, मोठ्यांना आहे पण लहान मुलांना ती भीती पण नाही. लाटा लहान मुलांसारख्या असतात, त्या कितीही क्रुद्ध झाल्या तरी किनाऱ्यावर येईपर्यंत शांत होतात आणि जणू त्या मुलांसाठी मृदु स्वरांत अंगाई गातात.

टागोरांनी गीतांजलीत लहान मुलांशी संबंधित अशा मोजक्याच ३/४ कविता समाविष्ट केल्या आहेत. त्यातून ते अधोरेखित करतात की, मुलांचे विश्व आणि मोठ्यांचे विश्व खूप वेगळे असते. मोठ्यांना मोह असतो, भय असते. जे मुलांना स्वभावतःच अजिबात नसते. या कवितांमधून ते लहान मूल आणि प्रौढ माणसं यांच्यातल्या विरोधी वृत्ती प्रकर्षाने दाखवतात.

—–

☆ गीत: ५८ ☆

LET all the strains of joy mingle in my last song ⎯ the joy that makes the earth flow over in the riotous excess of the grass, the joy that sets the twin brothers, life and death, dancing over the wide world, the joy that sweeps in with the tempest, shaking and 

waking all life with laughter, the joy that sits still with its tears on the open red lotus of 

pain, and the joy that throws everything it has upon the dust, and knows not a word.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५८ ☆

*

आनंदाचे स्वर अखेरच्या

गीतात माझ्या पाझरावे

अवखळ या हरिततृणावर

धरणीने त्या उधळावे

*

जन्ममरणाच्या यमलासी

विश्वात त्याने नाचवावे

कमळाच्या अश्रुत बसोनि

ओघळणे थांबवावे

*

आनंदाने त्या आनंदाला

मृत्तिकेसम उधळावे

या गीतातून तुला अखेरी

मी आनंदा अर्पावे

*

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ५९ ☆

YES, I know, this is nothing but thy love, O beloved of my heart ⎯ this golden light that 

dances upon the leaves, these idle clouds sailing across the sky, this passing breeze leaving its coolness upon my forehead.

The morning light has flooded my eyes ⎯ this is thy message to my heart. Thy face is 

bent from above, thy eyes look down on my eyes, and my heart has touched thy feet.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ५९ ☆

*

प्रकाश किरण सोनेरी

हिरवाई वरी नृत्य करी

*

जलद आक्रमिती नभा

शिरी घेऊनि अमृतकुंभा

*

तृप्तता होतसे जीवाची

मंद झुळूक येता वाऱ्याची

*

भरभरुनि मज देशी सारे

प्रेम यालाच म्हणती ना रे!

*

प्रभात किरणे घेऊन येती

तव संदेशा, मला सुखविती

*

आज सहज मी पाही तुला

ओणवुनि तू निरखिता मला

*

नजरानजर झाली आपुली

शतजन्मांची ओळख पटली

*

आणि त्याच अद्भुत क्षणी

सर्वस्व वाहिले तुझिया चरणी

 *

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६० ☆

ON the seashore of endless worlds children meet. The infinite sky is motionless overhead and the restless water is boisterous. On the seashore of endless worlds the children meet with shouts and dances.

They build their houses with sand and they play with empty shells. With withered leaves they weave their boats and smilingly float them on the vast deep. Children have their play on the seashore of worlds.

They know not how to swim, they know not how to cast nets. Pearl fishers dive for pearls, merchants sail in their ships, while children gather pebbles and scatter them again. They seek not for hidden treasures, they know not how to cast nets.

The sea surges up with laughter and pale gleams the smile of the sea beach. Deathdealing waves sing meaningless ballads to the children, even like a mother while rocking her baby’s cradle. The sea plays with children, and pale gleams the smile of the sea beach.

On the seashore of endless worlds children meet. Tempest roams in the pathless sky,

ships get wrecked in the trackless water, death is abroad and children play. On the 

seashore of endless worlds is the great meeting of children.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६० ☆

*

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥धृ॥

*

खाली बंडखोर सागर, वर अविचल आकाश

निरागस कोवळी मने, रचिती आनंदाची रास

वाळूचे घर, त्यावर सुंदर शिंपल्याची नक्षी

वाळल्या पानांच्या बोटी, लाटांच्या वक्षी

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥१॥

*

वाळूत रेघोट्या, किड्यांमागे धावती

आत तांडव लाटांचे, किनारी मुले खेळती

रंगीत खडे गोळा करता, आनंद बाल जीवाला

सारी दौलत गोळा केली, उधळती सागराला

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥२॥

*

मच्छीमार माशांसाठी, तर कप्तान व्यापारासाठी,

कुणा खजिन्याचा मोह, उडी पाण्यात मोत्यांसाठी

ना कसब पोहण्याचं, ना खजिन्याची आस

ना जाळं विणण्याची कला, खेळ चाले झकास

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥३॥

*

वाटाहीन नभ अन् वादळ घुमे दिशाहीन

उध्वस्त बोटी, मृत्यूचे तांडव, पाणी मार्गहीन

लाटांचं हास्य क्रूर, शांत हास्य काठात

अंगाईचा झोका हले, क्रुद्ध लाटांच्या गीतात

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥४॥

*

– क्रमशः भाग २० 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जेव्हा ‘मी’ विरघळतो… ☆ अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ जेव्हा ‘मी’ विरघळतो… ☆ अपर्णा परांजपे

एका शांत आश्रमात एक साधक राहत होता. त्याने अनेक वर्षे तप, जप, ध्यान केलं होतं. आता सर्वजण त्याला “योगीजी” म्हणून ओळखू लागले होते.

एके दिवशी तो आपल्या गुरूकडे गेला—

“गुरुदेव, मला योग प्राप्त झाला आहे. आता मला पुढे काय करायचं? ”

गुरु हसले, पण काही बोलले नाहीत.

काही दिवसांनी तो पुन्हा आला—

“गुरुदेव, मला आता ज्ञानही झालं आहे. शास्त्रांचा अर्थ कळतो, आत्मा कळतो. ”

गुरु पुन्हा शांतच राहिले.

काळ गेला…

एक दिवस तो अत्यंत भावुक अवस्थेत आला— “गुरुदेव, आता माझ्या हृदयात अपार प्रेम आहे. मला वाटतं, मी प्रेमात पूर्ण झालो आहे. ”

यावेळी गुरु त्याच्याकडे प्रेमाने पाहून म्हणाल, “तू अजूनही ‘मी’ मध्येच आहेस. ”

साधक थोडा चकित झाला—

“गुरुदेव, मी इतकी साधना केली, तरी ‘मी’ कसा राहिला? ”

गुरु शांतपणे म्हणाले— “तू म्हणतोस— मी योगी आहे, मी ज्ञानी आहे, मी प्रेमी आहे.

जोपर्यंत ‘मी’ बोलतो आहे, तोपर्यंत तू त्या अवस्थांचा भोग घेतो आहेस, त्यात अडकलेला आहेस. ”

हे ऐकून साधकाच्या मनात काहीतरी हललं…पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे खोल पाहिलं. त्या रात्री तो एकटाच बसला.

ना जप, ना ध्यान… फक्त शांत साक्षीभाव.

हळूहळू त्याला जाणवलं—

योग, ज्ञान, प्रेम… हे सगळं येतं आणि जातं पण “मी” जो म्हणतो आहे, तोच खरा अडथळा आहे.

अचानक त्याच्या आत काहीतरी विरघळलं…

जणू “मी” हा शब्दच नाहीसा झाला.

फक्त शांतता उरली…

निर्विचार, निरहंकार, नितळ अस्तित्व.

दुसऱ्या दिवशी तो गुरूकडे गेला…

पण यावेळी तो काही बोललाच नाही.

गुरु त्याच्याकडे पाहून हसले—

“आता तुला कळलं…

जिथे ‘मी’ नाही, तिथेच खरा योग, ज्ञान आणि प्रेम आहे. ”

योग प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण योगी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण योगाचे भोगीच आहोत.

आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण ज्ञानी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण ज्ञानाचे भोगीच आहोत.

तसेच प्रेम प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण प्रेमी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण प्रेमाचे भोगीच आहोत.

आणि बंधूंनो, जो प्रेमाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘कामाचा’ भोगी होऊ शकतो.

जो ज्ञानाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘अज्ञानाचा’ भोगी होऊ शकतो.

आणि जो योगाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘भोगाचा’ भोगी होऊ शकतो.

आपली बुध्दी ही खऱ्या ज्ञानापर्यत पोहोचण्यातील खरा अडथळा आहे! हे जाणवणं म्हणजे खरी स्वयंजागृती! ज्याला मी समजतो तो मी मर्यादित आहे व आज बुध्दीचा विलय झाल्यावर उरला तो‌खरा मी आहे जो अनंत आहे अमर्याद आहे असीम आहे, अमर्याद आहे.

कुठे होता तो? आतच होता पण झाकोळला होता मर्यादित मी ने च! इतर कशाचाही अडथळा नव्हता असे समजल्यावर दोषारोप थांबतात व कृतज्ञताच प्रगट होते जी आतून, हृदयातून, सहजतेने प्रकट होते.

 “मीपण विरघळे(वृत्त: आर्या)

मीपण धरुनी अंतरी, म्हणे मी योगी ज्ञानी

भावांच्या या लहरींमध्ये, अडकला जीव अभिमानी ॥

ज्ञानदीप उजळता, उरला तरी सूक्ष्म अहंभाव ।

प्रेमाच्या त्या सागरात, उठती मीपणाचे ठाव ॥

शांत बसुनी पाहता, विरती सारे भाव हळूच ।

उरे न काही म्हणण्यास, साक्षी निखळ तोच ॥

जिथे नाही मीपणा, तिथेच सत्य फुले सहज ।

योग-ज्ञान-प्रेम एक, तेथेच परम तेज ॥

 

“‘मी’ हा सूक्ष्म धागा सुटेपर्यंत, साधना पूर्ण होत नाही;

तो विरघळला की सर्व एकरूप होतं.”

जोपर्यंत ‘मी’ आहे, तोपर्यंत साधना आहे;

जिथे ‘मी’ विरघळतो, तिथेच सत्य प्रकट होतं.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके

लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू.

(भारतीय सैन्याच्या The Army Medical Corpsचा स्थापना दिन ३ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला! त्यानिमित्ताने विशेष लेख)

जेंव्हा दोन देश एकमेकांचे शत्रू म्हणून समोरासमोर उभे ठाकतात… तेंव्हा केवळ दोन सैन्यदलं लढत नाहीत… तर दोन व्यवस्था, दोन मनोवृत्ती युद्धभूमीत दोन हात करीत असतात… आणि जिंकते तेच सैन्य ज्याच्यातील प्रत्येक घटक देशप्रेमाने ओतप्रोत भरून गेलेला असतो… आणि हिंदुस्तान असाच एक देश आहे!

आपल्यासाठी तळहातांवर प्राण घेऊन लढणा-या सैनिकांच्या पाठीशी अनेक यंत्रणा कार्यरत असतात… त्यात अगदी रणभूमीवर स्वत:चे प्राण संकटात टाकून उभे असतात ते डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंटस… हे जणू स्टेथोस्कोपधारी सैनिकच!

वर्ष १९९९. १९८९ मध्ये पुण्याच्या The Armed Forces Medical College मधून एम. बी. बी. एस. चे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशाच्या विविध सीमांवर intern म्हणून अनुभव घेतल्या नंतर लखनौ येथील Officers’ Training College मध्ये the Medical Officers’ Basic Course हा एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधीत लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. या प्रशिक्षणात पी. टी. , संचलन, लष्करी कायदे, लष्करी जीवनपद्धती, शस्त्र चालवणे इत्यादी सर्व शिकावे लागते… एखाद्या सैनिकासारखे. कारण सेनेत फिल्ड हॉस्पिटल्स अर्थात प्रत्यक्ष युद्धभूमीवर तात्पुरत्या उभारल्या गेलेल्या रुग्णालयांमध्ये तैनात डॉक्टर्स सैनिकांच्या सदैव जवळपास असतात… हे परिपूर्ण सैनिकी डॉक्टर्स असतात!

१९९९ वर्ष सुरु होते. लेफ्टनंट डॉक्टर अरूप यांना काश्मिरात कारगिल भागातल्या एका छोट्या गावात स्थित असलेल्या एका सैनिकी फिल्ड हॉस्पिटलमध्ये रुजू होण्याचा आदेश प्राप्त झाला होता. इथले सर्जन काही महिन्यांच्या रजेवर जात होते, त्यांच्या जागी अनुभवी सर्जनची आवश्यकता होती. डॉक्टरसाहेब सर्जरीमध्ये तज्ज्ञ होते… या छोट्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कर्तृत्वाला कितीसा वाव मिळेल?  अशी त्यांना शंका होती. ते रुजू झाले मात्र कंटाळून गेले. तिथे अन्य काही डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंस होतेच, पण सर्जन असे ते एकमेवच होते. शिवाय इथं आधुनिक असं फारसं काही नव्हतं. आपले इतर सहाध्यायी शहरांमध्ये, अत्याधुनिक रुग्णालयांच्या सुसज्ज शस्त्रक्रियागृहांत सर्जरी करीत असतील आणि इथं आपण या दुर्गम भागात आपले सर्जरीमधले कौशल्य सराव नसल्याने गमावून बसू की काय असं डॉक्टर बसू यांना वाटणं स्वाभाविकच होतं! शिवाय काश्मीर पुस्तकातील वर्णनात अगदी सुंदर, छान, आल्हाददायक असले तरी सीमेवर प्रचंड थंडी असते, रस्ते धोकादायक आणि वातावरण तसे नीरस… शिवाय अतिरेक्यांचा धोका तर चोवीस तास!

काहीही कितीही कारणे सांगितली तरी भारताच्या डोळ्यांत माती उधळीत पाकिस्तान भारताच्या सीमेत अगदी खोलवर घुसून बसला आहे, हे संरक्षण यंत्रणेच्या लवकर लक्षात आलं नाही! आणि याची किंमत जीवाच्या आकडेवारीच्या संख्येत सांगायची झाल्यास ५२७ मृत आणि १३६३ जायबंदी एवढी प्रचंड आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान मोठे असणार यात शंका नाही!

पाकिस्तानने ताब्यात घेतलेली सैन्यठिकाणे, सैन्यचौक्या परत मिळवायला सैनिकांना उंच पर्वत चढत जायला लागले… आणि पाकिस्तानी सैन्य नेम धरून गोळीबार करायला मोकळे होते… मोक्याच्या जागी सज्ज होते!

लेफ्ट. डॉक्टर बसूंच्या रुग्णालयात आता थंडी-तापाचे रुग्ण येत नव्हते… तर शरीरात गोळ्या घुसलेले, रक्तबंबाळ आणि मृत्यूच्या मुखात जाण्याच्या बेतात असलेले रुग्ण येऊ लागले! सुरुवातीला रोज रात्री दोन, चार नंतर नंतर तीस-चाळीस. पंधरा-वीस खाटांचे ते रुग्णालय. गोळीच्या जखमा म्हणजे शस्त्रक्रिया अत्यावश्यक. उपलब्ध यंत्रसामग्री आवश्यकतेच्या मानाने तोकडी!

सैनिक दिवसा उजेडी पहाड चढत होते, लढत होते… जखमी होत होते! त्यांना दिवसाउजेडी खाली आणणे म्हणजे खाली आणणा-या लोकांच्या जीवाला मोठा धोका. कारण पाकिस्तानी गोळीबार दिवसा तर अगदीच अचूक होणार! मग आपल्या सैन्याच्या बहुतांश मोहिमा रात्रीच्या अंधाराचा आडोसा घेत सुरु झाल्या. आता जखमी सैनिक रात्रीच्या वेळीच रुग्णालयात आणले जाऊ लागले. सैनिक रात्री जखमी झाला, आणि त्याला खाली रुग्णालयात हलवताना दिवस उजाडला की रात्रीचा अंधार पडेपर्यंत काहीही हालचाल करता येणे शक्य नसे… कारण तेच… पाकिस्तानी गोळीबार!

डॉक्टर साहेब आणि त्यांचे सहकारी संपूर्ण रात्र या जखमी सैनिकांवर उपचार करण्यात घालवीत… संख्या वाढत चालली होती म्हणजे… युद्धात आपली अजून सरशी होत नव्हती! प्रत्यक्ष समोरासमोर लढण्यापूर्वीच आपले सैनिक शत्रूने लपून केलेल्या हल्ल्यात जायबंदी होऊन खाली परतत होते… सैनिक मनातून हताश होते आरंभी! भारतीय वायुसेना युद्धात उतरली आणि भारतीय सैनिक वेगाने पुढे जाऊ लागले… पण युद्धभूमी अजूनही शत्रूवरच मेहरबान होती!

२९ मे, १९९९. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा साहेबांचा देह अशाच एका रात्री रुग्णालयात आणण्यात आला! आहुजा साहेबांना पाकिस्तान्यांनी अनन्वित छळ करून मारले होते… उत्तरीय तपासणीत सारं स्पष्ट होतं! … युद्ध पुढं सुरूच होतं… रात्री जखमी सैनिक रुग्णालयात आणले जात होते… डॉक्टर आणि इतर सेवेकरी अपु-या साधनांच्या सहाय्याने पूर्ण प्रयत्न करून त्यांना अत्यावश्यक उपचार देत होते… आणि त्यांना हेलिकॉप्टरमधून पुढे उपचारार्थ नेले जात होते… प्राणांतिक जखमांवर आरंभीच्या Golden Hour मध्ये उपचार मिळणे गरजेचे असते… ते डॉक्टर बसू आणि त्यांचे सहकारी महत्प्रयासाने देत होते.

डॉक्टर साहेब जखमी सैनिकांशी संवादही साधत होते. त्यांनी सांगितलेले अनुभव वहीत टिपूनही ठेवत होते… अशा अनेक गोष्टी ज्या कुठेही नोंदवल्या गेलेल्या नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी राहिलेले सैनिक, केवळ बर्फ चघळत जिवंत राहून सातव्या, आठव्या दिवशी रूग्णालयापर्यंत पोहोचू शकलेले सैनिक, युद्धातील प्रचंड संहार पाहून मानसिक संतुलन गमावलेले सैनिक… प्रत्येकाची कहाणी वेगळी!

इथल्या रुग्णालयात सर्जरी करण्याची संधी मिळणार नाही म्हणून निराश झालेले डॉक्टर बसू आता रोज चार, पाच सर्जरी करीत होते… मात्र यात त्यांना आनंद नव्हता… तरुण सैनिक असे घायाळ झालेले त्यांना पाहवत नव्हते…! पण काळजावर दगड ठेवीत तहान-भूक विसरून काम सुरु होते!

रुग्णांना रुग्णालयात हलवण्यासाठी तयार केलेल्या Helipad पर्यंत शत्रूचे तोफगोळे येऊन आदळत होते… त्याही स्थितीत पायलट उड्डाणे करीत होते! डॉक्टर्स रुग्णावर उपचार करीत आहेत आणि त्यांच्या पासून केवळ काही मीटर्सवर गोळा आदळतो आहे… अशीही स्थिती होत होती… रुग्नालां सोडून पळून दूर जाताही येत नव्हतं. सैनिक म्हणत होते… ”डॉक्टर साहेब, आमच्यावर गोळा पडला आणि आम्ही जखमी झालो तर आमचा जीव वाचवायला इथं तुम्हीच आहात… तुमच्यावर गोळा पडला आणि तुम्हीच जखमी झालात तर आमचं कसं होईल? ” सैनिकांचं बरोबर होतं… पण त्याला काही इलाज नव्हता. रुग्णालयाच्या छतावर तोफगोळ्यांचे तुकडे आदळत असताना डॉक्टर बसू आणि सहकारी डॉक्टर्स सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या मोठ्या कौशल्याने बाहेर काढीत त्यांच्या जखमा शिवत होते… त्यांना मृत्यूमुखातून बाहेर आणीत होते. यांपैकी काही तर पुन्हा लढायला निघूनही गेले… this is Indian Army!

९ जून, १९९९. कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदार सैनिकांचे मृतदेह रुग्णालयात आणले गेले… उत्तरीय तपासणीसाठी! नृशंस शब्दाला जर समानार्थी शब्द द्यायचा झाल्यास या हुतात्म्यांचे देह दाखवावेत अशी परिस्थिती! हे देह पाहून, त्यांच्यावरच्या जखमा पाहून रुग्णालयात जखमी होऊन पडलेले जातिवंत सैनिक म्हणत होते… ”आम्हांला लवकर बरे करा… आम्हांला परत लढायला धाडा… आता आम्ही शत्रूच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय परतणार नाही! ” पेटून उठलेल्या सैनिकांनी पुढे इतिहास घडवला. भारतीय वाघांनी अंगावर आलेल्या कोल्हया-कुत्र्यांच्या नखांचे ओरखडे सहन करीत त्यांची नरडी फोडली!

वाघ रक्तबंबाळ झाले, काही कामी आले… पण सरशी झाली ती वाघांचीच. ज्याला लोक सशस्त्र संघर्ष म्हणतात ते युद्ध त्यात लढलेल्या सैनिकांसाठी महायुद्धच होतं… अत्यंत विपरीत परिस्थितीत लढावं लागणं म्हणजे महायुद्धच. यात कामी आलेले सैनिक कोवळ्या वयातले, तरणेबांड होते… शेकडो मातांनी त्यांचे एकुलते एक मुलगे गमावले. वीरपत्नी सुद्धा संख्येने भरपूर झाल्या… फार मोठी किंमत म्हणजे हीच! ज्यांची मुले, ज्यांची सौभाग्ये गमावली गेली… त्यांच्यासाठी जग बुडाले!

ऑपरेशन विजय त्यावेळेपुरते संपले! डॉक्टर साहेबांची सर्जिकल ऑपरेशन्ससुद्धा संपली तात्पुरती. ३०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या त्या ५६ दिवसांत. वरिष्ठ डॉक्टर्स लोकांनी डॉक्टर बसू यांचे नामकरण केले… The Kargil Surgeon! यातील दोन सैनिकांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत… कारण त्यांच्या जखमाच जीवघेण्या होत्या… आणि दिवसा त्यांना रुग्णालयात आणता आले नव्हते… उशीर झाला होता!

हे सारे अनुभव लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू यांनी पुढे शब्दबद्ध केलेत… The Kargil War Surgeon’s Testimony हे या पुस्तकाचे शीर्षक असून ते मी विकत घेतले आहे. याचे भाषांतर करायला मिळाले तर भारी होईल. असो.

या पुस्तकात आकडेवारी, लष्करी व्यूहरचना यात नाहीत… यात अनेक प्रश्न आहेत… ज्याची उत्तरे कुणाकडेही नसतील! पण देश युद्ध कुणाच्या रक्ताच्या बलिदानाने जिंकतो हे मात्र समजू शकते. रणांगणात आपल्या देशाचा ध्वज रोवल्याशिवाय आपण युद्ध जिंकले आहे असे होत नाही… आणि हे करणारा पायदळाचा साधा सैनिकच असतो! असं डॉक्टर बसू म्हणतात!

प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैनिकांच्या मागे सावलीसारखे राहून, प्रसंगी जीवाचे बलिदान देत भारतीय सैन्याचे वैद्यकीय कर्मचारी एक प्रकारचे युद्धच लढत असतात, हे खरेच. Army Medical Corps च्या स्थापनादिनाचे औचित्य साधून त्या सर्वांना अभिवादन करूयात. महाराष्ट्राच्या कन्या लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर साहेबा यांनी या दलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांनी तर कारगिल युद्धात प्रत्यक्ष पहाडांवर जाऊन जखमी सैनिकांचे जीव वाचवले आहेत… स्वत: शत्रूवर गोळ्या झाडलेल्या आहेत. भारतीय सैन्यात अशा मराठी सैनिक-धन्वंतरींची संख्याही मोठी आहे!

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

गौतम बुद्ध यांची पत्नी – यशोधरा.

अबला जीवन हाय! तेरी यही कहानी,

आंचल में है दूध और आंखोंमें पानी! 

हे उद्गार आहेत… हिंदी कविवर्य मैथिलीशरण गुप्त यांच्या एका प्रसिद्ध रचनेतील!

एक रात्र… शाक्य गणराज्याच्या राजपुत्र सिद्धार्थ ची पत्नी *यशोधरा* सुशील, सौंदर्यवती, जिच्या प्रसव वेदना अजुनही ताज्या च आहेत मनात… एक दिवसाचा नवजात पुत्र राहुल मातेच्या कुशीत आश्वस्त होऊन गाढ झोपलेला… यशोधरा ही क्लांत पण पुत्र जन्माच्या आनंदात,

पुढील आयुष्याच्या स्वप्नात शांत, निश्चिंत मनाने झोपलेली! आणि… अशावेळी अघटित घडते… तीन प्रसंग 

जरा, मृत्यू आणि व्याधी बघून व्यथित झालेला सिद्धार्थ, जीवनाचं सत्य शोधायला… पत्नी यशोधरा, पुत्र राहुल, राजसी ऐश्वर्य, आणि परिवार या सगळ्याचा त्याग करून… दूर निघून जातो. सुंदर पत्नी, नवजात पुत्र यांचा मोह ही त्याला थांबवू शकत नाही. नंतर त्याला कठोर तपश्चर्येनंतर ज्ञानप्राप्ती होते, तो *गौतम बुद्ध* होतो. त्याची कथा इतिहासात, आणि आध्यात्मिक इतिहासात नोंदली गेली. पण… *यशोधरेचं* काय?  जिला तो न भेटताच, तिचा साधा निरोप ही न घेता… निर्मोही बनून, तिला मागे नवजात पुत्रासह सोडून गेला??  

त्याच्या मागे यशोधरा आणि राहुल कसे राहिले?  त्यांचं काय झालं?  याची कुठेच नोंद नाही. सिद्धार्थ च्या तपात तिचंही… एक पत्नी, एक सून, एक माता म्हणून योगदान उपेक्षितच राहिलं ना!

यशोधरा फक्त सिद्धार्थ ने सोडून दिलेली पत्नी नाहीच मुळी!! तिचेही अधोरेखित करावेत असे किती तरी पैलू आहेतच की!!

यशोधरा… मौनातल्या दृढतेची आणि धीरोदात्त, खंबीर, निग्रही आणि एका सच्च्या क्षत्राणीची कहाणी… म्हणजे यशोधरा!! सिद्धार्थ ची पत्नी… येवढीच तिची ओळख पुरेशी नाहीच! तिला बुद्धाच्या छायेतून, सावलीतून बाहेर काढून बघितलं तर लक्षात येते ती तिच्या परिपक्वतेची, समंजसपणाची आणि एका आदर्श पत्नी आणि मातेच्या आदर्शाची उंची, खोली आणि व्याप्ती!! आपल्या पतीला राजकुमार ते बुद्ध या परिवर्तित रूपात, संयमाने, धीराने, स्थिर चित्त होऊन बघणं सोपं नाही ना एका पत्नी साठी??  पण हे परिवर्तन तिनं पेललं समर्थ पणे! तिने तिचं विरहाचं दु:ख, तिच्या अनावर भावनांचा आवेग… आक्रोशात नाही व्यक्त होऊ दिला.

तिने अत्यंत शांत आणि समजदार भूमिकेतून, सिद्धार्थ ने स्वीकारलेल्या मार्गाकडे बघितलं… आणि तिच्या लक्षात आलं की, सिद्धार्थचा हा मार्ग त्या दोघांना त्यागणं यापेक्षा त्या दोघांपेक्षा ही काहीतरी, मोठं, महान, महत्त्वाचं असं मिळवणं यासाठी होता.

आणि बस्स्… त्याच क्षणी यशोधराने ही भगवी वस्त्रे परिधान करून, राजसी वस्त्रालंकार त्यागून.. दिवसातून एकदाच भोजन करण्यास सुरुवात केली… तिने ही पत्नी धर्म पालन करंत, पतीच्या तपात स्वतः च्या तपाच्या समिधा अर्पण करंत, त्याला मौन साथ देत जणू पाठबळंच दिलं. त्याच्या बुद्ध होण्याच्या मार्गात ती आक्रोशाची, ऊलाहनेची धोंड न होता… त्याच्या आध्यात्म प्रवासातील खरी *अर्धांगिनी* होत… *सहधर्मचारिणी* सिद्ध झाली… सिद्धार्थ ची सिद्धा झाली! योग्याची योगिनी झाली. त्याग आणि प्रेम दोन्ही ही हातात हात घालून चालू शकतात, हे सिद्ध केलं यशोधरेने!

पती असा न सांगता सोडून गेला… उरात न मावणारं, उर फुटून बाहेर येणारं दु:ख होतंच की… पण यशोधरेने समजावलं स्वतःला…

 अब कठोर हो वज्रादपि ओ कुसुमादपि सुकुमारी,

 आर्य पुत्र दे चुके परीक्षा, अब है मेरी बारी!!

आणि दाखवून दिलं की… खरं प्रेम स्वार्थाचा पलीकडचं असतं! खरा वारसा तोच… जो आत्म्याला शांती आणि मोक्षा कडे घेऊन जाईल. तिला पती ने दिलेला हा वारसा कळला, पटला ही… आणि तिने तोच वारसा मग पुत्र राहुल यालाही देऊन त्यालाही भिक्षू/ भिख्खू बनण्याच्या वाटेवर चालण्याचं सामर्थ्य त्याच्या पावलांत देत, चालायला शिकवलं.

यशोधरेला फक्त एकच सल मनात बोचला की, पती तिला न सांगता गेला. तिचा स्वाभिमान दुखावला! एक पत्नी ची वेदना उरी दाटली की… पतीचा तिच्यावर येवढा ही विश्वास नव्हता की ती एक क्षत्राणी आहे… जी आपल्या पतीला औक्षण करून, मंगल तिलक लावून, त्याच्या यशाची कामना करते आणि अभिमानाने त्याला निरोप देते! पण सिद्धार्थ ने तिला आणि राहुल ला आपल्या मार्गातील बाधा मानले. ती तिच्या सखी जवळ हेच म्हणंत राहिली…

सखी वे मुझसे कहकर जाते, कह, तो क्या वे मुझे अपने पथ की बाधा पाते? 

त्याने तिला ओळखलंच नाही… याचं मात्र तिला दु:ख खूप च झालं. स्वाभिमान दुखावला तिचा. पण तरीही तिने नंतर बुद्धांकडूनच पुत्राला ही बौद्ध धर्माची दिक्षा देवविली आणि स्वतः ही घेतली. अरहंत पदापर्यंत ही जाऊन पोहोचली. भद्रकात्यायनी या नावाने ही ओळखली जाते.

अशी ही अलक्षित… पण… स्त्री जातीला महिमा आणि गरिमा मंडित करणारी… परित्यक्ता नाहीच… तर… तपस्विनी, त्यागमयी, तेजोमयी शलाका… जी चैतन्य युक्त, चेतलेलीच ठेवू यात.

– लेख क्र. ३ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी जग… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी जग… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

एकेकाळी भारतात औषध म्हणूनही उपलब्ध नसलेला मानसिक आजार नावाचा रोग आता जवळजवळ प्रत्येकाच्या पाचवीला पुजल्याप्रमाणे डोके वर काढू लागला आहे. याला जबाबदार कोण?  अमेरिका, इंग्लंड की अन्य कोणी?  बघा, विचार करा?  

याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत असे आपल्या लक्षात येईल.

  • आधुनिक जीवनपद्धती,
  • विभक्त कुटुंब व्यवस्था,
  • हातात खेळणारा पैसा,
  • मी कसा आहे हे दिसण्यापेक्षा मी कसा असायला हवा हे दाखवण्याची अहमहिका आणि त्यातून स्वतःच निर्माण केलेली अनावश्यक स्पर्धा,
  • नकार पचविण्याची कमी होत चाललेली क्षमता,
  • मुलांना फुलझाडांसारखे न वाढवता फुलांसारखे जपणे,
  • सनातन वैदिक परंपरांबद्दल अनादर… ,
  • सामाजिक माध्यमांचा अति आणि गैरवापर, स्वतःची क्षमता न पाहता स्वतःकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा
  • वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी नसणे.
  • व्यायामाचा अभाव
  • आधुनिक तंत्रज्ञानामुळे शाररिक हालचालींवर आलेली मर्यादा.

अनावश्यक आणि चमचमीत अन्नपदार्थ

  • अमली पदार्थांचे सेवन
  • वेदना शामक गोळ्यांचा अतिवापर
  • स्टेटस जपण्याची स्पर्धा

यात आपण आणखी काही मुद्दे जोडू शकाल…

मागील दहा वर्षांचा अभ्यास केला तर हृदयरोग आणि हृदयाला झटका येऊन गेला आहे अशा लोकांचे प्रमाण वाढत आहे. यात प्रामुख्याने ४५ ते ६० या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे. आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात कोणाला तरी हृदय विकार असेल किंवा कधीतरी झटका येऊन गेल्याचे आपल्याला स्मरत असेल. त्यावेळी त्यांची झालेली मानसिक, शाररिक, भावनिक आणि आर्थिक घालमेल आणि ओढाताण आपण पाहिली असेल…

मानसिक आरोग्य उत्तम असणे ही निरामय जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.

आपण समस्या पाहिली, आता यावर उपाय पाहूया.

  1. स्वतः का प्रश्न विचारा. आपल्याकडे सुख, समाधान, शांती आहे का?
  2. मेंदू सशक्त हवा त्यासाठी मन आरोग्य महत्वाचे.
  3. शांत मन, चिडचिड नको, मानसिक आरोग्य यासाठी आनंदी रहावे
  4. छोट्या गोष्टीत आनंद शोधा.
  5. सुखाच्या मागे धावल्याने आजचे सुख गमावताय.
  6. प्रेमाच्या माणसांबरोबर वेळ घालवा.
  7. काळजीत वेळ घालवू नका.
  8. छंद जोपासा.
  9. मन मोकळे करा, नंतर करु असे नको.
  10. पक्षांचे (BIRDS’) आवाज आनंदी करते.
  11. सकाळी फिरायला जा.
  12. योग, प्राणायाम व ध्यान.
  13. हसतमुख रहा/ Be Cheerful 
  14. मेंदूचे दोन्ही भाग वापरा कलागुण यात येते. LEFT side of BRAIN is for ROUTINE ACTIVITIES & RIGHT SIDE of BRAIN is for CREATIVE ACTIVITIES. Make more use of Right side of brain.
  15. मन मोकळे करा, मनांत काही ठेऊ नका.
  16. *आध्यात्मिक विकास व्हावा ही काळाची गरज* यासाठी म्हातारपणाची वाट बघू नका.
  17. शांत झोप ही हेल्दी मनाची पायरी.
  18. आत्मपरीक्षण/ Think on your DAILY ACTIVITIES. Is there any room for improvement? मोबाईल ऊठल्या ऊठल्या नको. मोबाईल मेंदू दुषीत करतो.
  19. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्लोक म्हणा, किंवा Utube वर लावा. त्यामुळे मेंदूत चांगल्या लहरी तयार होतील.
  20. नकारार्थी विचार मेंदूला दूषित करतो.
  21. सकारात्मक विचार रुजवा Negative विचार दूर करा.
  22. कंटाळा हा शब्दच नको. सतत स्वत:ला कार्यमग्न ठेवा.
  23. दैवी गुण रुजवणे आवश्यक. असुरी गुण नको.
  24. मनाचे श्लोक आत्मसात करा. , रोज किमान १० श्लोक म्हणा.
  25. श्रध्दा व ऊपासना महत्वाची.
  26. रोज तुमचा आरसा (मनाचा) स्वच्छ ठेवा. Stay away from Negativity.
  27. चांगले वाचन करा. मन प्रसन्न राहील.
  28. मेंदूचा वापर सतत असावा.
  29. रोज किमान चार ओळी लिहीत जा. दिसा माजि काही लिहीत जावे…
  30. मागण्या कमी ठेवा. मन आनंदी राहील.
  31. रोजच्या रोज वेळेचे नियोजन करा
  32. एकावेळी एकच काम लक्षपूर्वक करा याने मेंदूतील झिज कमी होईल.
  33. वर्तमानात जगा. भूतकाळाचा व भविष्यकाळाचा विचार नको.
  34. अनुभवातून शिकणे हवे. पण त्याचा बाऊ नको.
  35. वाईट विचारांना तिलांजली व चांगल्या विचारांना चालना.
  36. चढउतार (IN LIFE) पचवणेची क्षमता वाढवा.
  37. मी काही चूकीचे करतोय का? स्वत:ला विचारा. मनाचे ऐका.
  38. पैशांच्या मागे नको. झोप उडेल व मन दुःख:ी होणार. पैसा आवश्यक असेल तेवढाच हवा. (MONEY: साध्य नसून साधन).
  39. SHREESUKTA पठण व आत्मसात करा. KNOW THE REAL MEANING OF “LAKSHMI”.
  40. TRY TO BE A MAN OF VALUE NOT JUST A MAN OF SUCCESS.
  41. चांगली मुल्ये आनंदी करतात.
  42. श्रेयसाची वाट धरा. PREYAS will give you a short pleasure.
  43. रागावर नियंत्रण. मेंदूचे रसायन बदल. ANGER causes Mental as well as Physical imbalance.
  44. खरं बोलणे पालन. खोटे बोलणे मुळे ऊपयुक्त रसायनांत बदल.
  45. संस्कार जतन, चूक काय व बरोबर काय याकडे लक्ष हवे. सोंग नको. मनाला विचारणा करा.
  46. नात्यांचा आदर करा. एकी ठेवा. एकीतच बळ आहे. बंधनातच आनंद असतो.
  47. ध्यानधारणा करा व मेंदूला आराम द्या. PRANAYAM, YOGA & MEDITATION play an important role in keeping your brain cells healthy by producing dopamine like chemicals.
  48. आईवडिलांवर प्रेम करा व आदर करा.
  49. भावनांचा दिखावा नको. फसवू नका.
  50. नातेसंबंध दृढ करा. आपल्या आवडत्या लोकांबरोबरच रहा नावडत्यांना दुर ठेवा. Nurture Relationships.
  51. परस्परावर विश्वास ठेवा.
  52. लोकांचे आवडते बना.
  53. सॉरी म्हणायला शिका.
  54. जबाबदाऱ्या जाणा.
  55. गैरसमज टाळा. “आपणच बरोबर” हे नको. दुसऱ्याचे म्हणणे ऐका. आत्मपरीक्षण करा.
  56. विवेकाने वागायला शिका.
  57. माणूस बनायला शिका प्राणी नको.
  58. बुध्दीचे मनावर नियंत्रण हवे.
  59. मेधा, मती, प्रज्ञा, ऋता हे आचरण.
  60. चांगला दृष्टीकोन हवा.
  61. *व्यक्त व्हा…! *
  62. *मन आनंदी तर हृद्य आनंदी…! *
  63. सत्संगती

देवावर विश्वास ठेवा, आजपर्यंत ज्याने सांभाळले तो पुढेही सांभाळेल हा विश्वास मनाला उभारी देईल…!

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु. ॥

मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥

 – जगद्गुरु श्रीतुकाराम महाराज

सर्वांनी आपापले मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला प्रयत्नांना प्रभू श्रीरामांनी सहाय्य करावे अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करीत आहे.

विशेष आभार :- या लेखास नाशिक येथील जगप्रसिध्द न्युरोलोजिस्ट डॉ. महेश करंदीकर यांच्या एका भाषणाचे सहाय्य झाले आहे.

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २९ आणि ३० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २९ आणि ३० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २९ – – 

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |

बळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे |

पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं|

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|२९|

अर्थ : आपल्या भक्तांचे रक्षण करणारा हे त्या राघवाचे वचन पदोपदी गाजत आहे म्हणजेच त्याचा जयघोष सर्वत्र ऐकू येतो. त्याच्या भक्तांच्या शत्रूवर (त्यांच्या डोक्यावर) तो जोराने आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करतो. प्रभू रामचंद्रांनी (आणि श्रीकृष्णांनी सुद्धा) आपल्या नागरिकांना आपल्या सोबत (त्यांच्या रक्षणासाठी)विमानात बसवून नेले. असा हा परमेश्वर (राम) तुझी कधीही उपेक्षा करणार नाही.

(ब्रीद – प्रतिज्ञा, रिपु – शत्रू, कांबी – धनुष्याची कांबीट/कामठा, पुरी – नगरी)

विवेचन: मागील श्लोकात समर्थांनी धनुष्य धारण (कोदंडधारी) केलेला राम आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ कसा सज्ज आहे हे सांगितले. या श्लोकामध्ये भक्तांचे रक्षण करणे हे परमेश्वराचे ब्रीदच आहे हे समर्थ परत ठामपणे आपल्या मनावर बिंबवतात.

सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी भगवंत अवतार धारण करतात. जगामध्ये सामान्य माणसे, संत महंत आणि परमेश्वराचे कार्य करण्यासाठी अवतार धारण केलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. सामान्य माणूस आपल्या चांगल्या कर्माच्या सहाय्याने स्वउद्धार करून घेऊ शकतो. संत महंत आपल्या आयुष्यामध्ये धर्माची प्रतिष्ठापना करणे आणि समाजातील भक्ती किंवा सात्विकता वाढवणे असे कार्य करीत असतात. ते लोकांना ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात. परंतु दृष्टांचे निर्दालन करणे त्यांना शक्य होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा – – 

 जे खळांची व्यंकटी सांडो |

तया सत्कर्मी रती वाढो ||

– – असे म्हटले आहे. म्हणजे दुष्टांचे दुष्टत्व किंवा वाईट भावना नष्ट होवोत आणि सत्कर्म करण्याकडे त्यांची आवड वाढो.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् |

धर्मसंस्थापनार्थामि युगे युगे || 

– – हे भगवंताने आपल्या भक्तांना गीतेत दिलेले वचन आहे. जे लोक परमेश्वराची भक्ती करीत नाहीत अशा लोकांना सुद्धा तो कधी शासन करत नाही. तो तर अजातशत्रू आहे. पण पण जर कोणी त्याच्या भक्ताला त्रास देत असेल तर ते मात्र तो सहन करू शकत नाही आणि त्याच्या रक्षणासाठी धावून येतो. परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तो अवतार घेतो.

जेव्हा पृथ्वीवर अनाचार माजला होता आणि राक्षसांनी सदाचारी लोकांना आणि भगवंताची भक्ती करणाऱ्या लोकांना त्रास देणे सुरू केले, तेव्हा देवीने देखील अनेक अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला. श्रीराम आणि श्रीकृष्णांनी देखील अशा अनेक दुराचारी लोकांचा नाश केला.

परमेश्वर आपल्या भक्ताचे रक्षण कसे करतो यासाठी समर्थ एक उदाहरण देतात. ते म्हणतात, ” आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी म्हणजेच त्यांच्या उद्धारासाठी, मोक्षासाठी श्रीरामांनी अयोध्यानगरीतील नागरिकांना आपल्या सोबत विमानात बसवून नेले होते. श्रीकृष्णांनी देखील शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपल्या नगरीतील लोकांना नवीन द्वारकापूरीत नेले होते. असा हा भगवंत भक्तवत्सल आणि सज्जनांचे रक्षण करणारा आहे. एकदा का आपण त्याचे भक्त झालो की आपली सगळी काळजी तोच वाहतो आणि सर्व प्रकारच्या दुःखांमध्ये तोच आपला आधार होतो. आपले रक्षण करतो.

समर्थ म्हणतात भक्तांचे रक्षण करणे हे त्याचे ब्रीदच (कर्तव्य)आहे. आणि भक्तांचे रक्षण करण्याबद्दलचा त्याचा महिमा पदोपदी म्हणजे सर्वत्र गाजतो आहे. राम अत्यंत उदार आहे. आपले भक्त त्याला प्रिय आहेत. त्यांच्यात तो भेदभाव करत नाही. हा माझा तो तुझा असे त्याच्याजवळ नसते. तो कोणाचीच उपेक्षा करत नाही. आपल्या भक्तांना तो मोक्ष मार्गावर नेण्यासाठी सहाय्य करतो. तेव्हा आपल्या रक्षणासाठी आणि उद्धारासाठी अशा रामाला शरण जावे हेच खरे !

स्वसंवाद :: 

१) मी परमेश्वराची खरोखरच मनापासून भक्ती करतो का ?

२) संकटसमयी मला ‘तो माझ्या पाठीशी आहे’ ही भावना कितपत बळ देते? 

३) मी सज्जनांच्या बाजूने उभा राहतो का, की परिस्थितीनुसार भूमिका बदलतो? 

४ “भगवंत भक्तांची उपेक्षा करत नाही” या विचारावर माझा किती दृढ विश्वास आहे ? 

– – – 

श्लोक क्र. ३० – – – 

समर्थाचिया सेवका वक्र पाहे |

असा सर्व भूमंडळी कोण आहे

जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३०|

अर्थ :  एकदा का आपण भगवंताचे सेवक झालो की आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही, (अगदी कळीकाळाची देखील नाही.) अशा या समर्थाची म्हणजेच भगवंताची स्तुती तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ करीत असतात. असा हा भगवंत आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.

विवेचन“नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”या श्लोकांच्या मालिकेतील हा अतिशय सुंदर श्लोक आहे. या ठिकाणी समर्थ आपल्याला भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी घेतात हे पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. मात्र त्यासाठी समर्थाचा म्हणजे भगवंताचा सेवक आपण झाले पाहिजे.

सेवक म्हणजे नोकर असे समजायचे का ? या दोन शब्दातील अर्थांमध्ये फरक आहे. सेवक म्हणजे अशी व्यक्ती की जी निरपेक्ष भावाने सेवा करते आणि नोकर म्हणजे जो पगाराच्या अपेक्षेने काम करतो. भगवंताची अशी निरपेक्ष भावाने सेवा करणारा सेवक आपल्याला व्हायचे आहे. ही अपेक्षा या ठिकाणी आहे. यासाठी आपण श्रीरामांचा निस्सीम भक्त हनुमान याचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवूया.

हनुमंत रामाचा सेवक आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय तो त्याच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपल्या धन्यावर म्हणजे मालकावर ज्याची प्रचंड निष्ठा आहे. असा सेवक म्हणजे हनुमंतराय !मग साहजिकच अशा सेवकावर मालकाचे देखील प्रेम असणारच ! 

सीतेच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर श्रीराम हनुमंताला विचारतात की बोल तुझी काय इच्छा आहे ? तेव्हा हनुमंत फक्त त्याची भक्ती मागतात. श्रीराम त्याला उराशी धरतात. आपला लहान बंधू म्हणून आलिंगन देतात केवढे हे प्रेम ! मारुतीरायांची केवढी ही निरपेक्ष सेवा !

समर्थांचा (भगवंताचा) जो भक्त असतो तो देखील त्यांच्या कृपेने समर्थच होतो. त्यामुळे त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत नसते. त्याच्यावर संकटे येत नाहीत असे नाही. पण जीवनातील दुःखांना, संकटांना तो धैर्याने सामोरा जातो. हा देह माझा नाहीच. तो भगवंताचा आहे अशी त्याची धारणा झालेली असते. त्याच्या सेवेसाठीच त्याचा उपयोग तो करत असतो. म्हणून देहाला दुःख झाले तरी तो विचलित होत नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे… अशी त्याची वृत्ती होते.

सेवक व्हावे तर अशा व्यक्तीचे व्हावे जो आपली कधीही उपेक्षा करीत नाही. व्यवहारात चाकरी भलेही कोणाची करा. परंतु सेवक मात्र त्या भगवंताचे व्हा. कसा आहे हा भगवंत ? ज्याचा सेवक आपल्याला व्हायचे आहे ? हा भगवंत असा आहे की त्याच्या सामर्थ्याचे, पराक्रमाचे वर्णन तिन्ही लोक करतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या तिन्ही लोकांत त्याच्या पराक्रमाचा डंका वाजतो आणि सगळेच त्याचे गुणगान गातात.

एकदा का आपण त्याचे सेवक झालो की तो आपली कधीही उपेक्षा करत नाही. सेवक म्हणजे भगवंताचा भक्त ! खरा भक्त भगवंताकडून काही हवे म्हणून भक्ती करीत नाही. तर मला भगवंत हवा आहे, त्याच्याशिवाय दुसरे काही नको अशा समर्पण भावनेने त्याची भक्ती असते. भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त ! असा सेवक, असा भक्त जो असतो, त्याची सुखदुःखे, काळजी, चिंता आपोआप कमी होत जातात. म्हणजे त्याला त्याची पर्वा नसते. भगवंत त्याची काळजी वाहतो. भगवंताच्या नामात तो रंगून गेलेला असतो. अशा या भगवंताकडे भक्ताकडे भगवंत देखील लक्ष ठेवून असतो. तो त्याची उपेक्षा करीत नाही. त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जातो. भगवंत आपल्याला सांभाळतो अशी ज्याची खात्री असते तो निर्भयपणे जीवन जगू शकतो. लोकांनी स्तुती केली किंवा निंदा केली तरी त्याला काही फरक पडत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांपासून असा भक्त कोसो दूर असतो. आपल्या कर्तव्यात रत असताना त्याची आठवण ठेवावी. कर्तेपण आपल्याकडे न घेता राम कर्ता आहे, तोच हे करून घेतो आहे ही भावना ठेवावी.

स्वसंवाद :: 

१) मी भगवंताचा “सेवक” आहे की केवळ “अपेक्षा करणारा भक्त”? 

२) माझ्या भक्तीत निरपेक्षता आहे का, की काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे? 

३) मी माझ्या चिंता खरोखरच परमेश्वरावर सोपवतो का, की फक्त शब्दांत बोलतो? 

– क्रमशः श्लोक २९ आणि ३०. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares