मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कर्मफळ आणि नियती….☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ कर्मफळ आणि नियती…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

 हजारो गाई जरी असल्या तरी वासरू बरोबर आपल्या मातेकडेच पोहोचते, तशीच पूर्वकर्मे कर्त्याला अचूक शोधून भोग भोगायला लावतात. आपल्या डोळ्यासमोर घडणार्‍या घटना अवलोकन केल्या तर लक्षात येते की कर्मे फळताना नियती फार काटेकोर आणि कठोर असते. ती राजा म्हणत नाही की लहान मूल म्हणत नाही. अपघातात चिमण्या जीवांचे हातपाय तुटतात तर बॉम्बस्फोटात  मोठमोठ्या देशाच्या पंतप्रधानांचे मुंडके धडापासून वेगळे होते. काटेकोर संरक्षणात असलेल्या नेत्याच्या छातीत धाडधाड गोळ्या शिरतात तर दूधपित्या तान्ह्या मुलापासून आईलाच दूर नेऊन मृत्यु त्यांची ताटातूट करतो. सतीसावित्रींचा छळ, श्रीरामांचा वनवास, परमहंसांचा कॅन्सर, गुलाबराव महाराजांचे अंधत्व, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मीराबाई यांना समाजाने दिलेला त्रास, ही सारी कर्मफलांची बोलकी उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर झालेली कर्णाची अवहेलना, देवमाता असून पोटची सात अर्भके गमवावी लागलेली देवकी आणि आचार्य पद लाभूनही, सबंध आयुष्य कष्टात काढल्यावर मृत्युसमयीसुद्धा कंटकशय्येवर भोग भोगावे लागलेले भीष्म, या सर्वांना भगवंतानी त्यांच्या भोगाची कारणे सविस्तर सांगितली, तेव्हा कर्मफळे किती अटळ असतात त्याची प्रचिती आली.  मृत्यू राजा-रंक, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा काहीही भेद करीत नाही. बुद्धिबळाच्या पटावर जरी राजा, वजीर असला तरी खेळ संपल्यावर डब्यात भरताना प्यादी खाली आणि राजेसाहेब सन्मानाने वर असे कोणी भरीत नाही तर सर्वांना एकत्र कोंबले जाते.  हे सारे लक्षात घेऊन प्राण हे देहाला वश आहेत तोपर्यंत सत्कर्में , भगवंतस्मरण,  नामस्मरण ,दानपुण्य केलं पाहिजे, कारण देहपतनानंतर प्राणप्रिय पत्नी दरवाजा पर्यंत , नातेवाईक स्मशानापर्यंत आणि देह चितेपर्यंत सोबत करतात. बरोबर येतात ती कर्में,पुण्य, भगवंत नामाचे गाठोडे—-

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऋतु गाभुळताना.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ऋतू गाभुळताना.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆ 

ऋतु गाभुळताना…

झोपता झोपता दुरदर्शन बातमी देतं..मान्सून एक जुनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार..

मार्च,एप्रिल..२४तासएसी,कुलर,पंख्यालाआचवलेलं शरीर..पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ चादर बेडशीट, साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं…समजावं तेंव्हा ऋतु गाभुळतोय.

ऐटीत झाडावरुन मोहीत करणारे.बहावा,पलाश,गुलमोहर…वार्‍याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात.झाडावरचं कै-यांचं गोकुळ रिकामं होउन गेलेलं असतं,एखादा झाडावरच पिकलेला आंबा,खाली पडून केशर कोयसांडतो.जांभुळ,करवंदाचा काळा,जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो…तेंव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

आईआजीची लोणच्या,

साखरंब्याची घाई,कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग,गच्ची  गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तूआडोश्याच्या जागी हलवायची बाबा आजोबांची गडबड…समजावं ऋतु गाभुळतोय.

 ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो..साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते.उरलेल्या पापडकुर्डया आता हवाबंद डब्यात जाउन बसतात,डाळपन्हं,आईस्क्रीम, सरबतं,सवयीची होत जातात.माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.तेंव्हा खुशाल समजावं

ऋतु गाभुळतोय.

दुर्वास ऋषी च्या अविर्भावात आग ओकरणारा रवी..काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो,मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता…असाच दमुन जातो.भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो.गच्ची,दोरीवरच्या कपडे,गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..तेंव्हा खुशाल समजावं..ऋतु गाभुळतोय.

निरभ्र वाटणारं आकाश क्षणात आभाळ होऊन जातं,उनसावलीच्या खेळात चराचर सावळं होतं ,वीज,गडगडाटानं.. रसपोळीनं सुस्तावलेली दुपार..धावपळीची होते.

झाडांवरच्या पक्षांची किलबिल.. किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..उफाळत्या जमीनीत नांगर फिरु लागतात.

 मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात,मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात.. खुशाल समजावं तेंव्हा..ऋतु गाभुळतोय.

उंबर्‍यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देहमनाने आपण ही आतुरतो….तेंव्हा अगदी खुशाल समजावं…ऋतु गाभुळतोय……

 –  अनामिक 

संग्राहिका –  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ A for  appreciation… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ A for  appreciation… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

‘A’ for Appreciation (अर्थात प्रशंसेचा प्रयत्न) 🤗

नुकत्याच एका मैत्रिणीच्या आजारी सासूला भेटून आले. दोघींचीही तक्रार एकच…” एव्हढं केलं मी हिचं , पण दोन शब्दांचं  कौतुक नाही. ” वास्तविक त्या मैत्रिणीने सासूच्या भरवशावर उत्तम नोकरी करत आपली मुले वाढवली… सासूला देखील ठाऊक आहेच की आपल्या लेकी जेव्हढ्या मायेने करत नाहीत, सून करते… अगदी प्रेमानं … …

गरज आहे ती आवर्जून बोलून दाखवायची.

नेहमी एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की आपण स्त्रिया सर्वाधिक कद्रू कश्यात असतो तर प्रशंसेत..

कोणत्याही वयाच्या , कितीही शिकलेल्या ,नोकरी करणाऱ्या , व्यावसायिक वा गृहिणी असो…. 

दुसऱ्या स्त्रीची तारीफ चटकन मनापासून करताच येत नाही.अत्यंत कोत्या मनाने, क्षुद्र मनोभूमिकेने आपण सतत एकमेकींना स्पर्धक समजत राहतो… जणू तिची रेषा मोठी झाली की माझी लहान होणार आहे. हे वाढता वाढता एव्हढे वाढते की आपल्याला काही सुंदर आगळे दिसणेच बंद होते. 

छान तयार होऊन भिशीला स्वागत करणाऱ्या मैत्रिणीकडच्या फर्निचरची धूळ आपल्याला दिसते.  तर घर लक्ख आवरणाऱ्या सखीचा गबाळा अवतार आपल्या डोळ्यात सलतो. डाएट- जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या मैत्रिणीला आपण नटवी म्हणतो, तर सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला आपण काकूबाई म्हणतो. खरंतर समस्या बरेचदा हीच असते की, आपण काही म्हणतच नाही.

एकीच्या मुलाला दहावीला 93% मिळाले… इतरांची प्रतिक्रिया– “मिळणार नाही तर काय? हिने दुसरं केलंच काय वर्षभर … मुलाची दहावी म्ह्णून भिशी सुध्दा बंद केलीन.”

दुसरीच्या मुलीला 65% मिळाले.  प्रतिक्रिया– “जरा लक्ष नाही दिलं हिने.  सदा घराबाहेर..”

गम्मत आहे ना ! अहो सोपं आहे. दोघींकडेही जा. मनापासून अभिनंदन करा … आईचे कौतुक करा।  काय लागतं हो याला … हां , मन मात्र जरासं मोठं लागतं. 

.. माझ्या या मतावर तडकून एक जेष्ठ मैत्रिण म्हणाली.. ” मला नाही बाई येत असं लगेच चांगलं म्हणता… जेव्हा फारच उत्तम performance असेल तेव्हाच मी छान म्हणते.” 

“का ग तू ऑस्करची ज्युरी आहेस ?” 😆

क्षणभंगुर आयुष्य साधं सोपं असावं .. कशाला हव्यात या पट्ट्या आणि मोजमापं… 

स्त्री स्त्रीची शत्रू असते की नाही माहित नाही . पण ही तारीफ न करण्याची वृत्ती मात्र स्त्रीची फार मोठी शत्रू आहे. एखादीच्या उत्साहाला, चैतन्याला, एव्हढेच काय पहाडासारख्या कर्तृत्वाला ही नामोहरम करते. 👊🏻

 प्रशंसा म्हणजे लांगुलचालन किंवा चमचेगिरी निश्चित नाही … ती उत्स्फूर्तपणे हृदयातून व्यक्त होते .. काही स्त्रियांना दिसेल त्या मैत्रिणीला ” काय बारीक झालीस ग ! ” असे म्हणायची सवय असते. … ही प्रशंसा नव्हे… 😆

एखादीच्या कर्तृत्वाची .. गुणांची .. संघर्षाची दखल घ्यायला काय हरकत आहे? दूध पाण्यातूनही वेगळं करतो तो राजहंस … आणि सडलेलं कुजलेलं खातो तो गिधाड. स्वतःला विचारा एकदा काय व्हायला आवडेल?

आयुष्याच्या एकाच पटावर राहत असलो तरी आपण प्रतिस्पर्धी खचितच नाही . लक्षात घ्या… एखादीचे घर मस्त सुरेख नटवले म्हटले, की आपले कचराडेपो होत नाही. “छान वळण लावलेस ग मुलांना”  असे दुसरीला  म्हटले की आपली मुले काही उनाड होत नाहीत. एखादी झक्कास स्वयंपाक करते म्हणून मी काही  कांदू होत नाही किंवा एखादी स्मार्ट  म्हणून मी गबाळी असे होणे नाही. 

प्रशंसेचे दोन शब्द मोठा चमत्कार करतात… आंतरिक प्रेरणा , जगण्याची नवी उमेद, चैतन्य देऊन जातात. प्रशंसेच्या दोन शब्दांची भूक दुसऱ्या कशाने भागत नाही. बघा एकदा करून ही जादू… त्यापेक्षा कित्येक पट positive energy तुमच्याकडे rebound होऊन येईल.. शंकाच नाही.

आपण स्त्री आहोत ..निसर्गाची सर्वश्रेष्ठ कलाकृती… जी स्वतःमधील सारे ओज तेज सगुणात साकारते अपत्यजन्माने.

वाणीवाटेही हाच सृजनाचा साक्षात्कार होऊ देत. 

A = appreciation– हळूहळू सवय होऊ द्यात… आयुष्य सुरेख होइल…  तुमच्या एकटीचं नाही,  तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीचं. 👍🏻

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  रिकाम्या खुर्चीचं रहस्य… समीर थिटे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ रिकाम्या खुर्चीचं रहस्य… समीर थिटे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

…एकदा एक तरुण मुलगी एका संतमहात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटाल का?”

का नाही…? नक्कीच येईन मी…” करुणासागर असलेले संत उद्गारले.

त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.

“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.

“नाही…नाही…तसं नाहीये.” वृद्ध व्यक्ती उद्गारली.

त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”

संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू लागली, “खरं सांगायचं तर, या क्षणापर्यंत, मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढेही उघड केलेलं नाही…अगदी माझ्या लाडक्या मुलीलाही ते ठाऊक नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, संपूर्ण आयुष्यभर, प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ कटाक्षानं पाळूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजला नाही.”

“परंतु चारएक वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला असता, त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वरालाच सांगू शकतो. त्या मित्रानं मला सांगितलं की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथे प्रत्यक्ष परमेश्वरच स्थानापन्न झालेला आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रत्येक प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतो. माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळू लागलो तसा तसा तो मला अधिकच आवडू लागला.”

“त्यानंतर आता रोज दोन तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतो. मात्र, माझा हा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षताही घेत असतो, कारण जर एका रिकाम्या खुर्चीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं तिनं पाहिलं तर तिचा गैरसमज होईल की आजारामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय.”

त्या वृद्ध व्यक्तीचे हे शब्द ऐकून संतमहात्मे हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, “तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्याभोळ्या भक्तीमधे खंड पडू देऊ नका.”

पाच दिवसांनी, त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करुन तिने त्यांना सांगितलं, “त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला…पण काल सकाळी ते देवाघरी गेले.”

“त्या दिवशी मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. यापूर्वी कधीही न दिसलेल्या एक प्रकारच्या आत्मिक आनंदानं आणि शांततेनं त्यांचा चेहरा न्हाऊन गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. संध्याकाळी मी जेंव्हा घरी परतले, तेंव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले – गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणतीही हालचाल करता येत नव्हती ते माझे बाबा पलंगात उठून बसलेले होते, परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्चीवर होतं…जणूकाही त्यांनी कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबांनी खुर्चीवर डोकं का बरं ठेवलेलं होतं याचं कृपया उत्तर मला द्याल का?”

त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्युची वार्ता ऐकून संतमहात्मा ढसाढसा रडू लागले आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करु लागले, “हे प्रभू! जेंव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना तेंव्हा मीदेखील या मुलीच्या बाबांसारखाच निरोप घ्यावा एवढी कृपा माझ्यावर करा.”

प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेऊन जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी ‘तो’ सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवा. असं ज्याला जमलं त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं अशक्य नाहीच आणि मानवीजन्माची हीच तर इतिकर्तव्यता आहे.

अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं ।

देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिं अचन्चलं ॥

हिंदू धर्मात असलेली ही प्रार्थना अत्यंत गहन आहे.

या प्रार्थनेद्वारे भक्तानं प्रभूकडे तीन इच्छा मागितल्या आहेतः-

१. कोणत्याही शारीरिक वेदनांविना मृत्यु

२. प्राथमिक आवश्यकतांची पूर्तता होईल असं साधं आयुष्य (महाल माड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया)

३. आणि कोणत्याही प्रसंगी डगमगणार नाही अशी प्रभूचरणांवर अढळ श्रद्धा

(एका इंग्रजी कथेचा स्वैरानुवाद – समीर अनिल थिटे)

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 13 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 13 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

[२०]

कमळ उमललं, तेव्हा

माझं मन वाऱ्यावर नव्हतं

त्याच्या उमलण्याची जाणीवच

मला तेव्हा नव्हती

माझी परडी रिकामी होती,

 माझं दुर्लक्ष झालं होतं

 

आता स्वप्नातून जागा झाल्यावर

दु: खाणं सावट माझ्यावर पसरलं.

दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा

मधुर सुगंध मला जाणवू लागला.

 

पूर्णत्वाचा ध्यास घेऊन

वसंताचा अस्पष्ट, आतुर गंध

माझ्या काळजात ठेवून गेला

 

तो गंध माझ्या इतका जवळ होता,

त्याचा परिपूर्ण गोडवा

माझ्या ह्रदयात उमलला होता.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ || देहोपनिषद सिद्ध झाले…. || पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ || देहोपनिषद सिद्ध झाले…. || पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज 7 मे.. विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा स्मृतिदिन! ..मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातील काही हृदयस्पर्शी आठवणी….

हिरवीकंच साडी, हिरवागार परीटघडीचा ब्लाऊज, मनाचा ठाव घेणारी नजर, ताठ बांधा, छोटासा गोंडस अंबाडा आणि त्यावर हौसेनं माळलेला घमघमीत मोगरीचा गजरा! अहाहा! काय तेजस्वी ते रूप आणि ओजस्वी ती वाणी! आणि तेही वयाच्या ८६व्या वर्षी! या रूपाला पाहण्यास आणि ही लख्ख वाणी ऐकण्यास पार्ल्यातील ‘दीनानाथ नाट्यगृह’ त्यादिवशी चोखंदळ साहित्यिक, संगीतज्ञ आणि रसिकांनी खचाखच ओसंडून वाहात होतं. प्रसंग होता – माझ्या पहिल्यावहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हा कॅसेटचा प्रकाशन सोहळा – या ज्ञानदेवीच्या शुभहस्ते! ही ज्ञानदेवी म्हणजे दुर्गादेवीचा आणि शांतादेवीचा सुरेख संगम! ती स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ होती! तिच्या येण्यानंच प्रत्येकाच्या मनात उत्साह, आनंद, कुतूहल आणि उत्सुकता भरून वाहात होती! गझल सम्राट जगजीत सिंह यांनाही तिच्या शेजारी बसण्याचं, मोठं अप्रूप वाटत होतं. 

२६ मे, १९९६ हा तो दिवस!  याच दिवशी सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘जागविला सुखांत एकांत’ हा ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटमधील प्रत्येक गाण्याचं, समर्पक रसग्रहण करणारा लेख लिहून, दुर्गाबाईंनी अनेकांना धक्काच दिला होता! प्रकाशनाच्या वेळी त्यांच्यावर झालेल्या गुलाब पाकळ्यांच्या वर्षावानं, बाई आधीच मोहरून गेलेल्या! त्या बोलल्याही अप्रतिम! आणि पूर्व वयात विरघळून जाऊन चक्क ‘केदार’ रागातली बंदिशही  लाजवाब गायल्या! कुठचाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता! दुर्गाबाई म्हणजे अर्वाचीन काळातली गार्गी – मैत्रेयीच! त्या केवळ साहित्य विदुषीच नव्हे तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्य सेनानीपासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! ज्या क्षेत्रात हात घातला, त्याचं सोनं केलं त्यांनी!

एकदा, बहीण कमला सोहोनींबरोबर त्या एक इंग्रजी चित्रपट पाहत होत्या. त्यातील नायिका, आपण नेहमी घालतो, त्यापेक्षा वेगळया पद्धतीने टाके घालून, स्वेटर विणत होती. हे बारकाईनं निरीक्षण करून, त्यांनी एका व्यक्तीचा एक स्वेटर एका दिवसात तयार होतो, हे स्वतः विणून सिद्ध केलं.. वयाच्या नव्वदीलाही त्यांची कुशाग्र बुद्धी तोंडात बोटंच घालायला लावी! या वयातही नवनवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा त्यांचा ध्यास पाहून आश्चर्य वाटे! त्यांच्या ९०व्या वाढदिवसाला, त्यांनी मला भेट दिलेला, त्यांचा आवडता, निवृत्तीनाथांचा एक अभंग मी गायले. त्यावेळी बरीच जाणकार मंडळी तिथं होती. गाणं संपल्यावर, दुर्गा आज्जींनी या ‘नातीचा’ पापा घेतला आणि हातही हातात घेतला. माझे ‘थंडगार’ हात पाहून त्या गोड हसल्या आणि पट्कन म्हणाल्या, – “Cold from outside, Warm from inside… !” 

बाईंनी अनेकांना घडवलं. प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं. त्या अनेक भाग्यवंतांपैकी मीही एक आहे!

काही वर्षांपूर्वीची गोष्ट… मी इतरांच्या चालीत नवीन बसवलेल्या काही कविता, बाईंसमोर नेहमीप्रमाणं म्हणून दाखवायला गिरगांवात त्यांच्या घरी गेले त्यावेळी त्या म्हणाल्या, “अगं पद्मजा, फार बरं झालं तू आलीस. आज नवलच घडलं! आज शाकंभरी पौर्णिमा. पहाटे, चंद्रबिंब अस्त होताना, माझ्या वडिलांनी, त्यांच्या स्मृतिदिनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि ‘देहोपनिषद’ माझ्या पुढ्यात आले, ते असे…

|| देहोपनिषद ||

‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||

भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे ||२||

अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले ||३||

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||

मरणा, तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||

पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||

सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले… ||७||

पुढे त्या म्हणाल्या, “आजवरच्या माझ्या कविता, मलाच न आवडल्यानं मी फाडून, जाळून फेकून दिल्या. ही माझी मला आवडलेली एकमेव कविता! याला तू चाल लाव, आणि उद्या माझी दूरदर्शनवर मुलाखत आहे, त्यात तू ते गा!” 

मी प्रथम ते ‘देहोपनिषद’ वाचूनच भांबावले. परंतु दुर्गाआज्जीला नाही म्हणण्याची माझी प्राज्ञाच नसल्यामुळे मी आजवर, कधीही न केलेला संगीत दिग्दर्शनाचा प्रयत्न, परमेश्वरी कृपेनं सफल झाला. त्यांनीच संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी’ अंतर्ज्योत पेटवली!

दुसर्‍या दिवशी दुर्गाबाईंनी दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ माझी कविता सुंदर गाणार आहे,” असं म्हणून माझं मोठ्या मनानं कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मात्र मला आत्मविश्वास आला आणि मी जवळजवळ दीडशेहून अधिक कवितांना, अभंगांना धडाधड चाली लावत गेले. केवढी भव्य आणि सुंदर दृष्टी दिली मला दुर्गाबाईंनी!!

एकदा सुप्रसिद्ध कवयित्री वंदना विटणकरांना (त्यांच्या लहानपणी) ‘पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर’ यांच्या विषयी लेख लिहिण्यासाठी कुठेही माहिती मिळेना. तेव्हा दुर्गाबाईंना त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या भव्य ग्रंथालयात गाठलं आणि दुर्गाबाईंनी तात्काळ त्यांना अहल्याबाईंचे पन्नास एक संदर्भ पूर्ण माहितीसकट दिले. शिवाय, “ग्रंथालयाच्या एका कोपर्‍यात ‘होळकरांची बखर’ बांधून ठेवलीय, ती मुद्दाम वाच.” असंही सांगितलं. हे सर्व सांगण्यात कुठेही गर्वाचा, उपकाराचा लवलेशही नव्हता. उलट, कुणीही न निवडणारा, वेगळा आणि उत्तम विषय घेतल्याबद्दल छोट्या वंदनेचं अभिनंदन आणि कौतुकही केलं. शिवाय दुपारच्या उन्हातान्हातनं आलेल्या या मुलीला प्रेमानं, आपल्या डब्यातली रुचकर चटणी आणि थालीपीठ खाऊ घातलं! त्याची चव वंदनाबाईंच्या जिभेवर अखेरपर्यंत होती. 

दुर्गाबाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्त्वचिंतनाचंही! तत्त्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळं बाईंचं त्यांच्यावर मनस्वी प्रेम! याच थोरोवर इंदिरा गांधींनी केलेली कविता वाचून बाईंनी इंदिरेच्या आतील ‘कलावंताला’ सलाम केला आणि इंदिरा गांधींमुळे  आणीबाणीत भोगाव्या लागणार्‍या हालअपेष्टा विसरून, त्यांच्या अक्षम्य चुकाही माफ करून टाकल्या. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन दुर्गाबाईंचं! हाच प्रांजळपणा त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनातही दिसतो, म्हणून त्यांचं लेखन हे बुद्धीला आणि अंतःकरणाला थेट भिडणारं वाटतं. ते वाचताना त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं.

त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी कधीच विसरणार नाही. एक म्हणजे – ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ आणि म्हणूनच मला वाटतं, इतक्या विविध विषयांवर त्या प्रभुत्व मिळवू शकल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ‘कुठलंही काम करताना, त्यात जीव ओतून केल्यास ते  १०० टक्के यशस्वी होतं, त्यात उत्स्फूर्ता आणि उत्कटता मात्र हवी!’ 

७ मे, २००२… दुर्गाबाई निवर्तल्याची बातमी ऐकली आणि काळजात चर्र झालं. त्यांच्या घरी जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या सुनेनं – चारुताईनं मला ‘देहोपनिषद’ म्हणायला सुचवलं. शेवटी त्यांच्या पार्थिवाशेजारी बसून, माझ्या या आज्जीच्या डोक्यावरून कुरवाळत कुरवाळत मी ‘देहोपनिषद’ गायले. त्याक्षणी ती नेहमीसारखीच प्रसन्न आणि तेजस्वी दिसली. जणू काही डोळे मिटून तिला आवडणारं देहोपनिषद, ती अत्यंत आनंदानं ऐकत होती.. 

‘देहोपनिषद सिद्ध झाले..’ हीच भावना तिच्या चेहर्‍यावर विलसत होती…

लेखिका – पद्मजा फेणाणी जोगळेकर

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुलपाखरू.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ फुलपाखरू.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆ 

दुकानात असताना वैशालीचा फोन वाजला. आईंचा कॉल संध्याकाळी 7:30 ला कसा काय आला या विचारातच तिने फोन कानाला लावला.

“हॅलो वैशाली! खूप कामात आहेस का ग?”

“नाही आई! बोला न?”

“अग पियुने वरच्या रूममध्ये खूप गोंधळ घातलाय! कोणाशीतरी फोनवर जोरजोरात बोलत होती… रडत होती. मग वरच्या रूममधून वस्तू फेकल्याचे आवाज आले म्हणून मी वर गेले तर माझ्या अंगावर ओरडली.. ‘पहिली खाली जा तू.. अजिबात वर येऊ नकोस.’ आणि आता दरवाजा लॉक करून बसलीये. नक्की काय झालंय ते कळत नाही ग!”  वैशालीच्या सासूबाईंनी चिंतीत स्वरात पण एका दमात सांगितलं.

“बरं बरं, मी येते. तुम्ही आणि पप्पा अजिबात काळजी करू नका आणि कुणीच वरती जाऊ नका. स्वराला ही जाऊन देऊ नका वरती.”

“येशील न लवकर.”

“निघालेच.१५-२० मिनिटात येतेच.”

घरापासून जवळच वैशालीचं कपड्यांचं छोटंसं बुटीक होतं. तिचे मिस्टर कामावरून येताना दुकानातून तिला घेऊनच घरी येत. प्रियांका आणि स्वरा तिच्या दोन मुली. पियू नववीत तर स्वरा सहावीत.

संदीपला कॉल करून हाताखालच्या माणसांवर दुकान टाकून ती रिक्षात बसली. बंगल्याच्या जवळ येताच स्वरा धावत बाहेर आली. “ताईने खोलीची वाट लावलीये बहुतेक.” ती बोलली. स्वराच्या चेहेऱ्यावर वरती नक्की काय घडलंय याची उत्सुकता होती तर आजी आजोबांचे चेहेरे पडलेले होते.

“ओके. नो प्रॉब्लेम. मी बघते नं काय झालंय ते..” वैशालीने तिच्या मागून वरती चढणाऱ्या स्वराला थांबवत म्हंटले. “तुम्ही सर्वजण मस्त tv बघा. मी आलेच.”

“पियू…!” दरवाज्यावर टकटक करत वैशालीने हाक दिली. “दरवाजा उघडतेस न बाळा?”

दरवाज्याचं लॉक उघडल्याचा आवाज येताच वैशाली दरवाजा ढकलून आत गेली. खोलीत वादळ आलं होतं. टेबलावरची पुस्तकं, नोटस् जमिनीवर आल्या होत्या. पलंगावरच्या उशांनीही जमिनीवर उड्या मारल्या होत्या आणि चक्रीवादळ पलंगावर हुंदके देत पडलं होतं.

“काय झालं माझ्या सोनूला?” तिने खोलीत शिरत विचारलं. पियुने अजूनच डोकं उशीत खुपसले. “तू नीट उठून बसलीस तरच आपल्याला बोलता येईल नं राणी.” पियूच्या बाजूला बसत वैशाली बोलली.

हुंदके देतच ती उठून बसली. हुशार, गोरीपान, दिसायला ही गोड असणारी पियु आता मात्र रडूनरडून लाललाल झाली होती. “He left me. He said आता आपलं breakup झालंय” रडतरडत पियु बोलली.

“म्हणजे?” बसलेला आश्चर्याचा धक्का लपवत वैशाली बोलली. “मला काही कळेल अस नीट बोलशील का तू?”

“मम्मा.. थोड्या वेळापूर्वी राजने मला कॉल केला होता. तो मला बोलला की यापुढे I am not your boyfriend.  आपलं ब्रेकअप झालय.”

“अगं, पण राज तुझा फक्त friend होता नं?”

“Friend होता, पण 4 months पासून boyfriend होता.” पियुने रडक्या आवाजात उत्तर दिलं. “मम्मा, मी आता school ला कशी जाऊ. सर्वजण हसतील मला… चिडवतील.. मी स्कूलमध्ये कोणासोबत बोलू? मी काय करू मम्मा?” वैशालीच्या मांडीत पडत हुंदके देत देत ती बोलली.

चौदा वर्षाच्या मुलीला पडलेले गहन प्रश्न ऐकून हसावं, रडावं की चिडावं हेच वैशालीला कळत नव्हतं. मनात विचारांचं चक्र चालू झाले. हे काय वय आहे का पियुचं boyfriend असण्याचं. हिच्या वयाची मी असताना घरात असं काही बोलले असते तर घरातल्यानी माझं काय केलं असतं देवास ठाऊक. हिला चांगलं दमात घ्यावं असं वाटतंय.. पण याक्षणी तिच्यावर रागावले तर ही परत कधीही कोणतीही गोष्ट मला विश्वासात घेऊन सांगणार नाही.

‘आजपर्यंतचे सर्वच प्रश्न आपण समजुतीने, संवाद साधूनच सोडवलेत आणि म्हणूनच विश्वासाने पियुने ही गोष्ट माझ्याशी share केली. मग हा प्रश्नही शांतपणेच हाताळला पाहिजे.’ क्षणार्धात वैशालीच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले.

तिने पियुकडे बघितले. तिच्या केसांमधून हात फिरवत थोडा विचार करून ती बोलली.. “पियू तुला माहीतच आहे पप्पांचं आणि माझं lovemarriage आहे. पप्पा नोकरीला लागले तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी विचारलं.. मी घरी सांगितलं आणि दोन्ही घरच्या संमतीने आमचं लग्न झाले. त्यामुळे boyfriend वगैरे या गोष्टीबद्दल मला थोडं कमीच कळते. मला काही शंका आहेत, तू समजावून सांगशील का मला काही गोष्टी.”

“हो. विचार की.”

“मग पहिलं मला सांग, boyfriend आणि bestfriend मधला फरक काय?”

“अगं bestfriend म्हणजे फक्त मित्र, आणि बॉयफ्रेंड म्हणजे…  love. आपण त्याच्यासोबत सतत राहतो. Lunch time, free periods, school मधला जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्यासोबतच घालवतो. आणि न मम्…

 –  अनामिक 

संग्राहिका –  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विहीर – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ विहीर – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

परसदारी विहीरीवर 

दर रात्री दिवा ठेवताना

अजूनही  हात थरथरतो….

 

विहिरीतून छिन्न आठवणी

बाहेर सांडतात….

काही ठळक तर काही अगदी  पुसट….

 

निथळतं लाल आलवण 

अन् भुंडा  हात..

मनावर  अधोरेखित झालेला

बघ्यांचा खोल निःश्वास……..

 

एक परकरी  काया

घुसमटलेला श्वास

हातात चिंधीची बाहुली

भिजून तट्ट  फुगलेली…..

 

कमुआत्याचं लग्न मोडलं,

त्याच्या दुस-याच दिवशी

विहिरीवर घुमलेला आवाज “धप्प”…….

 

दादा परागंदा  झाल्यावर

खुळावलेल्या वहिनीचं

तासन्  तास विहीरीवर बसणं

अन् कधीतरी खोल झेपावणं…..

 

एक अतिक्षीण आक्रोश ही ऐकू येतो…

खोल गर्भातून  आल्यासारखा….

अज्ञात भ्रूणाचा…..

त्याचं  नातं चौघीपैकी कोणाशी?

आई, आजी मूग  गिळतात….

 

“ही विहीर  बुजवत कां  नाही ?”

आईला  विचारलं,

तर विहीरीच्या काठावर आपला 

खडबडीत हात फिरवत म्हणाली,

“बाईला  विहीर  लागतेच  गं”

— अनामिका

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 12 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 12 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

 [१९]

 जर तू अबोला धरलास,

 तर तूझे मूकपण मनात साठवून,

 तेच मी सोसत राहीन, गप्प बसेन,

 तारकांप्रमाणे सतत पहारा करेन

 आणि सहनशीलपणे

 नतमस्तक होणाऱ्या निशेप्रमाणे स्तब्ध राहीन

 

 निश्चितच पुन्हा उजाडेल,

 अंधार नाहीसा होईल,

 आकाशातून वाहणाऱ्या सोनेरी किरणांतून

 तुझी साद ऐकू येईल

 

तुझ्या गीतांचे शब्द

माझ्या घरट्यातील पक्ष्यांच्या पंखावर

झुलू लागतील

आणि माझ्या रानफुलाबरोबरच

 तुझ्या गीतांची धून उमलत राहील.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्यात जन्म घ्यायचाय ?…. ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यात जन्म घ्यायचाय ? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मुळात पुण्यात जन्म घ्यायलाच पुण्य लागतं…

पहिल्या उष्टावणात पु ना गाडगीळांकडून घेतलेली अंगठी चितळ्यांच्या श्रीखंडात बुडवून बाळाला चाटवली की त्या 

बाळाच्या पुणेकर होण्यास सुरुवात होते..

कोवळे नाजूक दात आले की काका हलवाईंकडची आंबा बर्फी किंवा काजू कतली खाल्ली की मग हा पुणेकर 

कोणाचेही दात घशात घालू शकतो…

शालेय जीवनात कयानीचा केक खाल्ला नाही तर पुणे महानगरपालिका पालकांना दंड करते म्हणे… 

वैशाली, रुपाली, वाडेश्वर मध्ये एकदा तरी खाल्लं नसेल असा माणूस यौवनाची पायरी घसरून एकदम म्हातारा झाला असंच समजावं… 

उगा कोल्हापुरातील २-३ आणि नाशकातील २-३ मिसळींचं कौतुक ऐकवणाऱ्याला प्रत्येक चौकात नव्या चवीची मिसळ खिलवणारा खरा पुणेकर … 

आमची गणेशोत्सवाची लांबणारी मिरवणूक दिसते..  पण  मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी खरं कळतं ते पुणे, पुणेरी आणि पुणेरीपण….  अख्खी पुण्यनगरी दृष्ट लागेल अशी सजलेली असते…

मराठी संस्कृती आणि नाविन्याची कास धरायची वृत्ती जपली असेल तर ती फक्त आणि फक्त पुण्यानेच…

बाकी पुणेकरांपेक्षा १ ते ४ बंदचा त्रास पुणेतरांनाच जास्त होतो.. पण बहुदा  तो त्या वेळेमुळे नाही, तर आपलं 

शहर पुण्यासारखं नाही यामुळेच ….. 

बहुत काय लिहिणे ?

 ता. क.

*जन्म नुसता पुण्यात असून चालत नाही. तर तो कसबा , शनिवार, रविवार, सोमवार,  बुधवार, गुरुवार, शुक्रवार, 

रास्ता पेठ, नाना, गणेश, नारायण ,सदाशिव ह्या पेठांमधील असला तरच सोन्याहून पिवळं ….

 

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares