☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆
एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार—-
—–मकरंद करंदीकर
विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे 🙂 ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे.
☆ मी एक भूमिगत -भाग २ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती – श्रीमती सुधा भोगले ☆
(असा उपयोग बरेच ठिकाणी झाला व यश आले (च्या पुढे)?)
दि. ३१-१२-४२ रोजी मी भिवंडीत होतो. मात्र वर्तमानपत्रे मी फरारी झालो आहे असे सांगत होती. मी फरारी आहे असे जाहीर झाल्यानंतर सरकारने अगदी फोटो सहित माझी सर्व माहिती गोळा केली. व पोलिसांजवळ दिली. अखेर हुलकावण्या देता देता २२-१-१९४३ रोजी मला मुंबईत अटक झाली. मी भाई कोतवाल कटात आहे अशी बहुधा त्यांची खात्री झाली होती. मला ते त्या कटात गुंतवणार होते आणि म्हणूनच त्यांनी माझी भिती घेतली असावी. साळवी फौजदारानी अटकनाट्याचा सर्व खुलासा केला. एक फोटो दाखवला तो आमच्या चर्चा मंडळातला होता. माझे विद्यार्थी श्री सिकंदर अन्सारी यांनी फोटो काढला होता. त्यांच्याजवळून शाळेतल्या कोणी शिक्षकाने तो मागून घेतला आणि अवघ्या दहा रुपयात तो पोलिसांना देऊन टाकला. देशभरातील मोठ्या शहरात माझा तपासासाठी पोलिस गेले होते. बक्षीसही जाहीर झाले होते. श्री. होनावर यांना मला पकडल्याबद्दल बक्षीसाचे पैसे मिळाले. माझ्या नावावर पैसे जमा करतो म्हणाले. पण मी ती रक्कम गुप्त संघटनेकडे जमा करा असे सांगितले, ते त्यांनी मान्य केले. मी मात्र त्या प्रलोभनापासून अलिप्त राहिलो. विसापूर जेलमध्ये असताना माझी बहिण भेटायला आली. हे गाव अगदी आडवळणावर होते. वाहनाची सोय नव्हती. त्यामुळे भेटायला येणाऱ्यांना खूप त्रासाचे पडे. नियमानुसार भेटीची वेळ सायंकाळी चार ते पाच अशी होती. मला ऑफिसात बोलवण्यात आले. श्री नूलकर जेल सुपरिटेंडेंट होते. ते मला नियम सांगून नियमाप्रमाणे तुला तुझ्या बहिणीला भेटता येणार नाही असे म्हणाले. मी तत्वभ्रष्ट व्हावे असा ते प्रयत्न करीत असावेत. मी नियम मोडून भेटीला जाण्याचा स्पष्ट नकार दिला. शेवटी थोड्या वेळाने मला परत जेलर श्री निकोल्स यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली. माझी सुटका होत नव्हती, म्हणून माझी आई फार कष्टी होती. पण तरीही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून तत्वभ्रष्ट होण्याचा मोह मी निग्रहाने टाळला. माझ्या आईला सुटका न होण्याचे कारण कळावे म्हणून घरची मंडळी सचिवालयापर्यंत धडक मारून आली होती. सरकारने फार गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवले असे त्यांना सांगण्यात आले.’ माफी मागितली तरच विचार करू’,– माझ्या वडीलबंधूनीच त्यांना नकार दिला. ते म्हणाले,’इथे आम्हाला ही अट मान्य नाही, तिथे तो तर अजिबातच तयार होणार नाही!’ आईचे सांत्वन करण्यासाठी पूज्य सानेगुरुजी आमच्या घरी आले होते. त्यांचे उत्तम स्वागत झाले होते.. गहिंवरून ते माझ्या आईला म्हणाले होते, ‘तुमचे कसे सांत्वन करू? आम्ही सारे सुटलो, बाहेर आलो. तुमचा मुलगा मात्र इतके दिवस झाले तरी सुटत नाही!’ गुरुजींना खरे कारण माहीत असून सुद्धा ते कारण सांगू शकले नाहीत. 15 जानेवारी 1946 रोजी मी जेलमधून सुटलो. तब्बल साडेतीन वर्षानंतर मी मोकळी हवा चाखीत होतो. आमच्या स्वागतासाठी श्री. ग. प्र प्रधान आले होते. माझी सुटका झाल्यानंतर माझ्या आईला आणि सर्वांना आनंदाचे भरते येणे सहाजिकच होते. मी घरी आलो. घरच्या माणसांचा आनंद त्यांनी सत्यनारायणाची पूजा करून व्यक्त केला. गावातील वयोवृद्ध नागरिक, श्री. नानासाहेब जोग यांनी आमच्या घरी येऊन गळ्यात हार घालून माझा सत्कार केला. असाच सत्कार त्यांनी 1932 आली सुटून आलो तेव्हा ही केला होता. आणि माझा सामान्य माणसासारखा जीवनक्रम चालू झाला. भिवंडीतील उर्दू शाळेत त्यांनी मला नोकरीसाठी आग्रहाने परत बोलावले. मी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांत प्रिय शिक्षक होतो.
मी देशभक्त नव्हतो. सत्तेची किंवा पैशाची हाव कधीच नव्हती. संघटनेत काम करण्याची इच्छा होती. त्या माध्यमातून समाजात नैतिक मूल्यांची जोपासना करण्याची इच्छा होती. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मूल्याधिष्ठित जीवनावर कोणाची निष्ठाच दिसत नव्हती. आज स्वातंत्र्य मिळाले आणि उद्या लगेच निष्ठा नाहीशी झाली असे नव्हे. लोकशाही राबवता राबवता हळूहळू सत्ता आणि संपत्ती या रिंगणात आयुष्य फिरू लागले. माझ्यासारखे तत्व पाळणारे अनेक लोक होते. त्यांना खड्यासारखे बाहेर टाकून देण्यात आले. आमच्यासारख्यांची तत्त्वनिष्ठा नव्या राजकारणी लोकांना पेलण्यासारखी नव्हती. मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक नव्या राजकारणाने सामावून घेतले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. आम्ही सत्ता आणि संपत्तीच्या मोहात पडलो नसतो असे वाटत आहे. त्यामुळे असे म्हणायला, आम्हाला जागा मात्र नक्की आहे की ध्येयनिष्ठ दूर न करता त्यांना सामावून घेतले असते तर वेगळेच काही घडले असते.
‘भारत माता की जय!‘ भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!
समाप्त
प्रस्तुती श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मी एक भूमिगत -भाग १ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती – श्रीमती सुधा भोगले ☆
(माझे वडील कै. वासुदेव त्र्यंबक भावे. यांनी 1930 ते 1946 या कालावधीत स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या ‘ मी एक भूमिगत ‘ या पुस्तकातील काही लेखांचे उतारे आणि त्या मंतरलेल्या क्षणांचा मागोवा घेतला आहे. यामुळे स्वातंत्र्य संग्रामात अनेक अज्ञातांनी केलेल्या त्यागाची ओळख होईल. या छोटेखानी पुस्तकास कै. ग. प्र. प्रधान सर या साहित्यिक व विचारवंत मित्राची प्रस्तावना लाभलेली आहे.)
माझे नाव वासुदेव त्र्यंबक भावे. माझा जन्म ६ जून १९१५ चा. आमचे कुटुंब बऱ्याच पिढ्या भिवंडीत राहत होते. माझे मोठे बंधू श्री. बाबजी त्र्यंबक भावे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यामुळे घरात राष्ट्रीय वृत्ती आणि देशसेवेचे वळण होते. त्याच वळणात मी वाढलो व माझा देशसेवेचा पिंड तयार झाला. त्या अनुषंगाने एक निर्भीडपणा व शिस्तही अंगी आपोआपच बाणली गेली. भिवंडीत इंग्रजी शिक्षणाची किंवा अन्य प्रकारच्या शिक्षणाची सोय नव्हती. परिस्थिती मुळे राष्ट्रीय पाठशाळेत शिक्षणासाठी गेलो. माझ्या वरच्या देशसेवेच्या संस्कारांचे दृढीकरण या राष्ट्रीय शाळेत झाले. भिवंडी येथे 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात मला भाग घ्यायला मिळाला. 1931 साली गांधीजी गोलमेज परिषदेला जाऊन आल्यावर कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू झाली. तेव्हा आमची पाठशाळा सरकारी अवकृपेला बळी पडली. मी मात्र भिवंडीस परत आलो.
काही दिवसांनी मला नगर होऊन पत्र आले. माझे मित्र डॉक्टर गोविंद जोग व श्री. न. पू. जोशी यांचे ते पत्र होते. त्यांनी मला आग्रहपूर्वक नगरला परत बोलाविले होते. नगरला परत आल्यानंतर मी चळवळीचे काम सुरू केले. रोज सायंकाळी गांधी मैदानात मुलांना जमवू लागलो. सायंफेरी सुरु केली. बुलेटीन काढू लागलो. सत्याग्रह करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सभेची व्यवस्था ठेवू लागलो. नगर मधील बऱ्याच लोकांना सत्याग्रह केल्यावरून पकडण्यात आले होते. त्यामुळे 3 जून 1932 रोजी कोणी सत्याग्रहीच मिळेना. म्हणून उर्वरित काँग्रेसचा सर्वाधिकारी म्हणून गांधी मैदानात मीच सत्याग्रह केला. मला ताबडतोब पकडण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला सहा महिने सक्तमजुरी ही ठोठावण्यात आली. मी नगर पोलीस कस्टडीत होतो. तेथे रोज चक्कीचे काम करावे लागे. ७0 पाऊंड ज्वारी पीसावी लागे. तीन तासात ते काम पूर्ण करावे लागे. शेवटी शेवटी पोटातील आतडी गोळा होत व फार त्रास सहन करावा लागे. एवढ्या धान्यातून फक्त भुसा म्हणून साधारण अर्धा किलो काढावा लागे. सहा महिन्यांची शिक्षा संपल्यानंतर मी भिवंडीस परत आलो.
आता उपजीविकेसाठी काहीतरी करणे आवश्यक होते. भिवंडी येथील अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये माझ्याजवळ असलेल्या कांदिवली व अमरावती येथील शारीरिक शिक्षण परीक्षांच्या जोरावर मला व्यायाम शिक्षकाची नोकरी मिळाली. श्री. ग. बा नेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1939 मध्ये एक ‘अभिनव चर्चा मंडळ’ स्थापन झाले होते. व्यायाम शाळेत येणाऱ्या आम्हा सर्व तरूणांचा त्यात सहभाग होता. पुढे सर्वजणांनी ‘चले जाव’ लढ्यात भाग घेतला. 8 ऑगस्ट 1942 च्या ‘चले जाव’ ठरावाच्या गोवालिया टँक वरील ऐतिहासिक अधिवेशनाला आम्ही सारे गेलो होतो. अभिनव चर्चा मंडळातील आमचा एक ग्रुप फोटो, आम्हाला पकडण्यासाठी पोलिसांच्या उपयोगी पडला. चळवळीच्या कामाचे दोन भाग होते. एक म्हणजे बुलेटीन-प्रचारसभा यांच्याद्वारे सरकार विरोधी वातावरण तयार करणे. दुसरी म्हणजे शासन यंत्रणा कमकुवत करणे व ती बंद पाडणे. अनायसेच माझी श्री भाई कोतवालांशी गाठ पडली. एका फार मोठ्या योजनेच्या संदर्भात, मी श्री कोतवालांच्या छावणीवर गेलो होतो. टाटा पॉवर हाऊस व पाण्याचे नळ तोडण्याचा कार्यक्रम होता. कोतवालांच्या छावणीत बॉम्बसदृश्य पदार्थ करून त्याचा उपयोग कचेऱ्यात व विशेषतः रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्याची योजना होती. असा उपयोग बरेच ठिकाणी झाला व यश आले.
—-क्रमश:
प्रस्तुती श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“माझे साहित्य कोण वाचतात कितीजण वाचतात,हे कळत नसले तरी कुठेतरी माझे साहित्य जीवनाबद्दल कुतुहल जागृत करेल तेव्हढ्यासाठी तरी जगण्याची सूक्ष्मशी ईर्षा निर्माण करील अशी आडूनआडुन मला आशा वाटत असते.पण तेव्हढ्यासाठीच मी लिहीतो का?
नाही.
लिहीणे ही माझीच मानसिक गरज आहे. विधात्याने मी जन्माला येताना मला सर्जनाची (कमी —अधिक) शक्ती दिली आहे.ती शक्ती मला स्वस्थता देत नाही.मलाही ती स्वस्थता नको असते.ती स्वस्थता जेव्हां येईल तेव्हां माझ्या जगण्यातला अर्थ निघून गेलेला असेल.अशी मला भीती वाटत असते…..”
जयवंत दळवी (बाकी शिल्लक)
प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
एक सुंदर अनुभव. “मनातल्या घरात” (Self – Introspection)
आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ???
एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???
हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ??? कसे स्वागत होत ते ???
ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, “कोण आहे ???? काय पाहिजे ????” असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???
मी ही सांगितले, “मी स्व आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!”
आतून आवाज आला, ” बरं…. बरं…उघडतो दार !!!” दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, ” कां रे एवढा अंधार ???” तेव्हा तो म्हणाला, ” तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, ” माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, “हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील.”
मी ही जरा ऐटीतच म्हणालो, “ठीक आहे… ठीक आहे !!! लावतो दिवे” म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, “काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???”
तो पुन्हा म्हणाला, ” बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते.” मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले. आणि…फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, ” काय झालं ??? दार कां लावले ???” मी म्हंटले, ” कसले भयानक होते रे ते !!! ” तर तो पुन्हा हसत म्हणाला, ” तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!”
हुश्श…..अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, ” काय, काय झालं… ??? मी म्हंटले, “अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, ” तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.”
तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.
आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.
मी त्याला म्हंटले, “मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता.” तो म्हणाला, ” थोडं…थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा.”
थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो….तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता…मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय….आहा…..हा हा…स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.
मी म्हंटले, “काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???” तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, ” अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.” मग मी म्हणालो, ” जे आधी पाहिलं, ते काय होतं ???” तो पुन्हा हसत म्हणाला, ” त्या…त्या…तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत.”
क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.
बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.
मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.
संग्राहक – सुश्री मीनल केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈