मराठी साहित्य – विविधा ☆ यंत्र आणि मानव… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

यंत्र आणि मानव☆ सौ शालिनी जोशी

यंत्र हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यंत्रामुळेच आपले जीवन सहज, सुलभ, कमी कष्टाचे व आनंददायी झाले आहे. आपण कोणतेही नवीन यंत्र घेतो, तेव्हा त्याची पूजा करून त्याचे स्वागत करतो. यात आनंद असतो. पण ज्यावेळी जुन्या, कार्यक्षमता संपलेल्या यंत्राला निरोप द्यायची वेळ येते, तेव्हाही आपले मन तेवढेच हळवे होते. इतके दिवस त्या यंत्राने केलेल्या मदतीच्या ऋणाची भावना त्यात असते.

मिग २१ विमानांच्या निरोपाची बातमी वाचली. आपल्या संरक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग असलेले, सहा दशके हवाई दलात सेवा दिलेली ही विमाने चंदीगड हवाई दलावर समारंभपूर्वक निवृत्त झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अखेरच्या उड्डाणाचे वैमानिक हवाई दलप्रमुख एअरचिफ मार्शल अमरप्रीतसिंग हे सहभागी झाले होते. निरोप देताना सर्व वायूवीरांचे मन दाटून आले. सर्वच सैनिकांची भिस्त शेवटी यंत्रावर असते. त्यामुळे यंत्राशी त्यांचे भावनिक नाते निर्माण होते. प्रत्येक यंत्राला त्याच्या स्वरूपा नुसार एक प्रथा, परंपरा, विशिष्ट कार्य संस्कृती प्राप्त झालेली असते. त्याचा अंगीकार वीर सैनिक करतात. त्याचे त्यांना सवय होते. व्यवहारातही हाच आपला अनुभव असतो.

विहित कालावधी पलीकडे माणूसही जगत नाही. तेथे यंत्राचे काय? हीच गोष्ट इतर सर्व क्षेत्रातील यंत्रांच्या बाबतीत घडत असते. जुने जाणे ही नवनिर्मितीला प्रेरणा ठरते. जुने मागे पडून, नवीन तयार होणारी यंत्रे जास्त सुधारित, उपयुक्त व वापरायला सोपी असतात.

अश्मयुगात माणसाकडे काहीच नव्हते. मग आपल्या संरक्षणासाठी व इतर कामासाठी माणसाला साधनांची गरज भासू लागली. त्यावेळी संरक्षणासाठी टोकदार दगड वापरत. त्यात सुधारणा होत भाले, बरच्या, तलवारी, बंदुका,——- रणगाडे अशी प्रणाली निर्माण होत गेली. पदार्थ कुटण्यासाठी घेतलेल्या दोन दगडातून——- जाती, गिरण्या, मिक्सर अशी यंत्रे निर्माण झाली. सर्वच क्षेत्रात अशी प्रगती झाली आणि होत आहे. शेतकऱ्यांसाठी खुरपे, कुदळ, नांगर—- ट्रॅक्टर आले. लिहिण्यासाठी बोरु, टाक, पेन— लॅपटॉप, स्मार्टफोन ने तीही गरज संपली. बैलगाड्या—- विमाने अशी  वाहने बदलली. सर्वच क्षेत्रातील साधनात विविधता आली .आणि ही सारी यंत्रेच.

खरंतर आपली संस्कृती निसर्गाशी निगडित, त्यावर अवलंबून. म्हणून पशु,पक्षी, चंद्रासारखे ग्रह, सूर्यासारखे तारे, समुद्र,भूमी यांना आपण सणात मान देतो. देवतारूप देऊन त्यांची पूजा करतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तीच गोष्ट यंत्रांची. यंत्रे आपण निर्माण केली. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुलभ, सोपे, कमी कष्टाचे आनंददायी व सुखकर झाले. त्याची आठवण ठेवून, नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीला यंत्र पूजा केली जाते. यंत्राची स्वच्छता करून त्याची पूजा करणे म्हणजे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. त्या जड यंत्रातही आपण देव पहातो. झेंडूच्या फुलांनी त्याची सजावट करतो. मोठ्या कारखान्यापासून घरगुती स्वरूपापर्यंत हे पूजा होते. मात्र मध्य युगात लढायांचे प्रमाण वाढले. त्यामुळे यंत्र पूजा ही शस्त्रपूजा झाली. आणि त्याला खंडेनवमी म्हणून लागले. कारण खड्ग म्हणजे तलवार, त्याचे खंडे झाले. अशीही आपली संस्कृती गुढ आहे.उदार आहे.निसर्गा सकट सर्व उपयोगी वस्तूंची  काळजी घेऊन माणसाने सुखाने जगावे हा हेतू.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माती भिडली आभाळा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ माती भिडली आभाळा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘गारंबीचा बापू ‘ या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे.

‘अजब सोहळा, माती भिडली आभाळा… ‘

रवींद्र साठे यांनी असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे. पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली? आपण कधी गेलो का तिथे? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं.

मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न.

थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या.

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥

जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरु राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला.

मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला (पैस) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत.

पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.

शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे ।

सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥

अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या.

तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी उगीच नाही

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा

असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता, तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे.

पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह. भ. प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे.

पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे.

समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहुचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे.

तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रेवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – २ – रेडियो -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – २ – रेडिओ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

“नमस्कार श्रोतेहो… हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. सकाळचे पाच वाजून सत्तावन्न मिनिटे आणि बारा सेकंद झाले आहेत. आपल्या आजच्या सभेला सुरुवात करु या मंगलध्वनीने…

आणि मग तो मंगलध्वनी सुरु व्हायचा. अगदी लहानपणी पासून दिवसाची सुरूवात अशीच होते. आणि दर पाच मिनिटांनी बदलणारे कार्यक्रम वेळ सांगतात. सकाळच्या घाईत घड्याळ बघावे लागत नाही. ते काम रेडिओ ऐकला की आपोआप होते. शिवाय ते कार्यक्रम ज्ञानात भर घालतात हा खूप मोठा आणि महत्वाचा फायदा! आजही मला लहानपणी निवेदन करणारे निवेदक व त्यांचे निवेदन आठवते. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या द्यायला आल्या की शाळा कॉलेजला निघायची योग्य वेळ झाली हे लक्षात यायचे. आणि त्या बातम्या संपल्या की उशीर झाला असे समजायचे.

सकाळी सकाळी रेडिओ लावायची जुनी सवय बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या करते. आज गाणे ऐकले शब्द शब्द जपून ठेव एकीकडे काम चालू होते. आणि इतके अर्थपूर्ण गाणे ऐकत असताना माझ्या मनात कसे विचार येतात याचे हसू आले. आणि जपून ठेवलेल्या वस्तू आठवायला लागल्या. आणि कुठे कुठे जीव अडकतो याची गंमत वाटली.

परवा सहज कपाट आवरताना जरा पिवळसर पडलेली कॅरीबॅग सापडली. उघडून बघितले तर रेडिओचे लायसन सापडले. आता असे वाटेल हा काय प्रकार आहे? पण पूर्वी (मी लहान असताना) रेडिओ साठी परवाना आवश्यक होता. एका वर्षा साठी १/२ रुपये पोस्टात भरून त्या पुस्तकावर तिकीट लावून आणावे लागायचे. आणि घरात टेबल सारखे मोठे रेडिओ असायचे तो नीट ऐकण्यासाठी ३/४ फूट लांबीची व २/३ इंचाची तांब्याची जाळी असलेली पट्टी घरात लावावी लागायची. आणि छोटा रेडिओ (ट्रांझिस्टर) सायकलच्या हॅण्डलला लावून लोक ऐटीत फिरायचे. आणि ज्याच्याकडे लायसन नसेल तो लपवून ट्रांझिस्टर नेत असे.

हे सर्वच रेडिओ मात्र नवनवीन कपडे घालायचे.

त्यात गृहिणीची कलाकुसर व दृष्टी याची जणू परीक्षा व्हायची. काही जणी तर त्यावर स्वहस्ते भरतकाम करायच्या आणि कौतुक मिळवायच्या.

आमच्या कडे मोठ्ठा रेडिओ होता. लांबून बघितले तर पुस्तकांचे कपाट वाटावे असा होता. मी कायम त्याच्या बटणावर पाय ठेवून वर चढून दूध प्यायला बसायची. मग जेवायला बसायची. ही बाल सवय त्याचा उपयोग कळायला लागल्यावर सुटली.

विशेष म्हणजे या रेडिओचे सर्वत्र दर्शन होते. शेतात, मळ्यात, चौकात, पारावर, बागेत कुठेही सूर ऐकू येतात. मधल्या काही काळात असे भय वाटत होते की सगळ्या आधुनिक साधनांच्या गदारोळात आपला रेडिओ लुप्त होईल का? पण रेडिओने आपले स्थान कायम ठेवले आहे. स्वरूप बदलले आहे. सुटसुटीत झाले आहे. पूर्वीच्या अडचणी (रेडिओ वापरातील) आता नाहीत. त्याने प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये स्थान मिळवले आहे. आणि पेन सारखे छोटे स्वरूपही धारण केले आहे. आणि आता ऐकू येणारी स्टेशन्स सुद्धा वाढली आहेत.

काही वर्षांपूर्वी प्रसारित होणारे कार्यक्रम आधुनिक स्वरूप धारण करून पुन्हा प्रसारित होऊ लागले आहेत.

या रेडिओच्या अनंत आठवणी बऱ्याच जणांच्या मनात जागृत असतील.

रेडिओवर एक जाहिरात लागते. एक सखी दुसरीला विचारते, “कुटं ग शिकलिस एवढं ग्यान? ” लगेच दुसरी उत्तरते, “आपल्या रेडिओनं श्यानं केलंय की, तू बी ऐकत जा. ” हे ऐकून अगदी पटले. खरेच जे नियमित रेडिओ ऐकतात त्यांचे मन विविध माहिती, ज्ञान, आरोग्य, गृहिणींना मार्गदर्शन, मनोरंजन, यांनी भरून जाते. आणि या साठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. शिवाय डोळेही बिघडत नाहीत.

या रेडिओची सुरुवात भारतात १९२३ साली झाली. पण ती खाजगी कंपनी होती. आणि ती दिवाळखोरीत निघाली. नंतर १९३६ मध्ये ही कंपनी सरकारने ताब्यात घेतली आणि ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण केले.

प्रासंगिक कार्यक्रम सादर करणे. हे तर रेडिओचे खास वैशिष्ट्य आहे.

रेडिओवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर लिहायचे म्हंटले तर एक वेगळाच लेख होईल.

आज जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने भारतातील रेडिओ विषयी काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय खूप मोठा आहे. जे माझ्या सारखे रेडिओ प्रेमी आहेत त्यांना नक्कीच असे वाटते, हा रेडिओ अजरामर होवो. या मनापासून शुभेच्छा!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठीच बोलू कौतुके… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ मराठीच बोलू कौतुके ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

!! माझा मराठाची बोलू कौतुके |

  परि अमृतातेही पैजा जिंके !!

                                – संत ज्ञानेश्वर

भाषा ही कोणत्याही मानवी सामाजिक जीवनाचा आधार आहे. ते परस्पर संवादाचे जसे प्रभावी माध्यम आहे तसेच ते ज्ञानसंचय, ज्ञानप्रदानाचे ही महत्त्वाचे माध्यम आहे. संस्कृती, इतिहास, आचार-विचाराचे महत्त्वाचे साधन म्हणून भाषेकडे पाहिले जाते. मराठी हि महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्राची ती मातृभाषा आहे..

मराठी भाषेला साधारणतः लिखित साहित्याचा बाराशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्रात आणि जगात पंधरा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. प्राचीन कालखंडापासून अतिशय दर्जेदार साहित्याची निर्मिती मराठी भाषेतून झालेली आहे. ज्ञानेश्वर-लीळाचरित्र, तुकारामांची गाथा, नामदेवांची-अभंगवाणी, बखर, पोवाडे ही प्राचीन मराठी भाषेची खरी ओळख असून त्यांची ख्याती सातासामुद्रांपलीकडे पोहोचली असून यांचा अनेक भाषांत अनुवादही झाला आहे. आधुनिक युगात निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक व ललित गद्य तसेच दलित, ग्रामीण, स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्यातून देशभर आणि जगभर मराठीची स्वतंत्र अशी  ओळख निर्माण झाली आहे.

समाजातील दिन-दलित, वंचित, उपेक्षित घटकांच्या मनोव्यथेचा पहिला हुंकार मराठी साहित्यातूनच उमटला. अभिजनांच्या साहित्य जाणिवांपेक्षा बहुजनांच्या जीवन वेदनेला स्थान देणारे मराठी साहित्यच आहे.

शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे साधन असूच शकत नाही म्हणूनच महाराष्ट्रात उच्चशिक्षण मराठी भाषेतून

दिले जावे…. मराठी भाषेत अकराव्या शतकापासून संतानी सातत्याने ज्ञानाची क्रांती केली आहे. मराठीतील लोकवाङ्मय व लोकसंस्कृतीच्या खुणा मराठीतून विविधतेने नटलेल्या दिसतात… अनेक श्रेष्ठ संत मंडळींनी आपल्या बोलीतून मराठी भाषेला सजविले, फुलविले व मोठे केले.. विसाव्या  एकविसाव्या शतकातील अनेक थोर लेखक,कवींनी आपल्या

शब्दसामर्थ्यामधून मराठी भाषा समृध्द केली पण हीच आपली मातृभाषा कुठेतरी मागे पडते आहे हे विधान सर्वत्र ऐकायला मिळते आणि ह्या मागे एक आर्त कळकळ असते ती आपल्या मातृभाषेवरील प्रेमाची, आस्थेची… मुळात भाषा कशासाठी तर संवाद साधण्यासाठी, भावना, विचार मांडण्यासाठी, ते जतन  करून ठेवण्यासाठी, विकासासाठी… आणि मग जेव्हा हीच भाषा मागे पडते तेव्हा फक्त भाषा नाही तर एक संपूर्ण मानव समुह , एक संस्कृती मागे पडते.

जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषा नवनव्या आव्हानांना सामोरी जाऊन, कधी त्यात सामावून तर कधी सामर्थ्याने अनेक क्षेत्रात प्रभावीपणे पदार्पण करताना दिसते आहे. या भाषिक संक्रमणाच्या युगातही मराठीने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कला, संस्कृती, क्रीडा, न्यायालयीन व वैधक कामकाज, गणित, विज्ञान, उपयोजीत मराठी, संगणक, वृतपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल इत्यादी अनेक क्षेत्रांत मराठी भाषा आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.  नव्या क्षेत्राची परिभाषा मराठीने आत्मसात केली आहे. या पुढेही मराठी भाषेला नव्या नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सजग रहावे लागणार आहे हे नक्की..

!!लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !!

खरंच हे दिवस महाराष्ट्रात आहेत का? मातृभाषा आहे म्हणून मराठीचं कौतुक आहेच. पण बऱ्याचदा असं होतं की मुलं मराठी कुटुंबातून आलेली असली तरी त्यांच्यावर इंग्रजीचा प्रभाव जास्त असतो. अगदी उलट परिस्थिती जेव्हा इतर भाषिक लोक एकत्र येतात तेव्हा असते. तेव्हा खंत वाटते की आपलं आपल्या मातीशी असलेलं नातं तुटतंय का? महाराष्ट्राच्या मातीशी असलेले घट्ट ऋणानुबंध टिकवून ठेवणारी आपली मातृभाषा आहे. जिचा गोडवा अवीट आहे जिने राष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कारविजेते लेखक-कवी घडवले जिने बॉलीवूडकरांनाही भुरळ घातली ती भाषा बोलण्यात कमीपणा वाटण्याचं काही कारणच नाही. दुसऱ्याची वाट न पाहता स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे असे मनापासून नमूद करीन.. तसंच कॉलेजच्या मराठी वाङ्मयमंडळांची ही व्याप्ती वाढली पाहिजे तरच जास्तीत जास्त मराठी साहित्य जनमानसांत पोहोचेल व मराठी केवळ कागदापूर्तीच मर्यादित न राहता सगळ्यांच्या मनामनात राहील. मातृभाषेमधून जे संस्कार मनावर, बुद्धीवर होतात ते कुठेतरी आत्म्यात रुजत असावेत.. मातृभाषेत विचारांची जडणघडण झाली तर माणूस प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागतो आणि हळूहळू सगळ्या समाजाचीच

विचारसरणी बदलते. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगणे हा संकुचितपणा असा विचार करणारे आम्ही भाषेच्या डबक्यातच अस्तित्व असणारे बेडूक नसून एका विचारी आणि सर्वसमावेशक राज्याचे नागरीक आहोत हे सांगायला नकोच.

आमच्या मराठीची पीछेहाट होण्यामागे दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून आम्हीच आहोत. आम्हीच मराठी बोलायला टाळायला लागलो. अश्याने बाकीच्या भाषा बोकाळल्या आणि आम्ही त्यांचा उदो उदो करत रहिलो.

अहो या मराठीने तिचं गाऱ्हाणं सांगावं तरी कोणाला ? झोपेचं सोंग घेतलेल्यांना की खरंच या विषयाचं गांभीर्यच न उमगणा-यांना ? मराठीचं बोलण कळेल तरी का या इंग्रजाळलेल्या मराठी फकिरांना ?

मराठीच मराठी राहिली नहिये. तिची कक्षा रुंदावी, तिची प्रगती व्हावी असं तिलाही वाटत असणारचं ना ? पण मग काय कुठलीही भेसळ सहन करावी का तिने ? मराठीचं शुद्धीकरण करायला प्रत्येक पिढीत सावरकर जन्माला येतीलच असं नाही ना..! सावरकरांनी मराठीला इंग्रजी राजवटीत वाचवलं, सावरलं आणि पुन्हा उभं केलं. मराठीत कित्येक शब्द सावरकरांनी रुजू केले. पण ते इंग्रजीतून अथवा इतर प्रांतीय भाषांमधून नाही तर तिचं मूळ जिच्यात होतं अशा संस्कृतमधून..

किती श्रीमंत ही मराठी.. ज्ञानदेव तुकोबारायांसारखे संत मराठीच्या छायेत वाढले. तर या मराठीच्या अंगाखांद्यावर माडगुळकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट, भा.रा तांबे, आरती प्रभू अश्या अनेक महान कवींची कविता खेळली, बागडली. व. श्री. ना. पेंडसे, पु. काळे, जी. ए. कुलकर्णी, शं. ना. नवरे, अशा कित्येक कथाकारांच्या गोष्टीचं कथेत रुपांतर झालं. भारुड, जात्यावरच्या ओव्या, गोंधळ असे गेय साहित्य प्रकार, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा असे ग्रंथ या मराठीने प्रत्येक मराठी

मनापर्यंत पोहोचवले. हे साहित्य पुढल्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कुठपर्यंत झेपेल हे कोणास ठाऊक?.. . कारण हे समजायला मराठी गाभा लागतो. आणि हे साहित्य श्रुती, स्मृती या माध्यमांमधून जर पुढे गेलं नाही तर हे सगळं कुठेतरी लुप्त होण्याची फार दाट शक्यता आहे .. मनाला लागलेली एक रूखरूख..

कुठलीही भाषा शिकायला फारसा काळ  लागत नाही. त्या भाषेत प्रभुत्व मिळविण्याची इच्छा असेल तरीही नाही… त्यासाठी मुलांना इंग्रजी शाळांमध्येच शिकविण्याचा आग्रह का ? या सगळ्या अट्टाहासात मुलांचा आत्मविश्वास तर बळी पडत नाहीये ना?  न्यूनगंड तर निर्माण होत नाहीये ना ? असा विचार या पालकांनी वेळीच केलेला बरा.

मराठीच्या उत्कर्षासाठी झगडणं हा आमचा मराठी धर्म. महाराष्ट्रात मराठी बोलून जर समोरच्याला कळत नसेल तर आम्ही मराठी सोडण्याची नाही तर समोरच्याने मराठी शिकण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या मराठी माणसाचं ठाम मत आहे. यातून मराठीचं अस्तित्व टिकून राहील आणि त्या निमित्ताने एक नवीन भाषा शिकण्याचं भाग्यही शिकविणा-याला  लाभेल असे मला वाटते..सध्या इंग्रजी आणि हिंदी ची लाट आहे. पण जेंव्हा प्रयत्नांती मराठीच पारडं जड होईल ना  तेव्हा हेच इंग्रजाळलेले मराठी पुन्हा मराठीच्या लाटेत निर्विकारपणे का होईना सामील होतील अशी आशा मनी आहे.

 

 ©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझी भाषा… माझा समज…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माझी भाषा… माझा समज…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

नुकत्याच झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने बरेच काही चांगले, विनोदी वाचायला मिळाले. आणि मराठी भाषेवरच्या प्रेमाच्या लाटेने थोडी उसळी घेतली… 

आणि बोलतांना मराठीत असलेले, लपलेले, लपवलेले, आणि गैरसमज करून घेतलेले अर्थ व त्यामुळे होणारी गंमत लक्षात आली.

घरात बोलत असतानांच साध वाक्य, तुम्ही चहा आधी घेणार, कि भांडी घासून झाल्यावर. आता सांगा यात चहा घेणार… म्हणजे मिळणार का आपल्या हाताने घेणार… आदर आणि स्वावलंबन दोन्ही अर्थ यात काठोकाठ भरलेले आहेत. कदाचित हे अर्थ जितके काठोकाठ भरलेेेले आहेत तेवढा चहा पण कपात भरलेला नसतो. त्यातही आपण थोडी कपात करतो. या बरोबरच भांडी कोण घासणार… याचा उल्लेख नसला तरी बरोबर समजत. पण वाक्यात गंमत आहे.

असंच दुसरं वाक्य. काही कळलं का. आता यात विचारणा, प्रश्न, आणि असलेल्या बुध्दी बद्दल शंका… सगळ्या भावना यात आहेत. मग ते वाक्य आपल्यासाठी असेल, किंवा आपण म्हंटल असेल. पण प्रसंग, परिस्थिती, शब्दावर दिलेला जोर, आणि अर्थातच चेहर्‍यावर असणारा भाव यामुळे काय म्हणायचं ते लक्षात येतच. याच धर्तीवर असणारं आणखीन एक वाक्य, काही गरज नाही. यात राग आणि सौजन्य दोन्ही आहे. पण हे वाक्य सौं. च असेल, तर सौजन्य असेलच असही नाही. परिस्थितीनुसार याचा अर्थ आपण आपला लावायचा असतो. जमेल का हे पण याच अर्थाने ऐकायला येणारं वाक्य. यात क्षमतेवर विश्वास जाणवतच नाही. काहीवेळा काळजी, तर काहिवेळा उपरोध जाणवतो.

लक्ष कुठे आहे तुमचं हे तर लक्ष्यवेधी वाक्य आहे. यात आपण काय सांगतो या कडे लक्ष नाही. किंंवा ज्याची गरज आहे ते सोडून नेमकं कशाच निरीक्षण चाललं आहे हे लक्षात आणून दिल जातं. यावेळी लक्ष आणि लक्ष्य दोन्ही विचलित झालेलं लक्षात येत.

तुम्ही काय देणार यात अपेक्षा, कौतुक, आनंद, आश्चर्य याच बरोबर अपेक्षित असलेल काहि मिळणार नाही याची जवळपास खात्रीच असते. फक्त वेेळ, व शब्दांच्या सुरावरुन यात काय आहे ते समजून घ्याव लागतं.

एखादं काम पूर्ण केल्यावर आपण सहज म्हणतो, झालं. यात काम पूर्ण केल्याचा आनंद किंवा समाधान असतं. पण हे काम मी करु का… अशी विचारणा आपणहून केली, आणि त्यावर झालं… अस उत्तर आल, तर मात्र त्या झालं याचा अर्थ आपल्याला वेगळा सांगावा लागतच नाही. यात आनंद किंवा समाधान सापडणारच नाही. जाणवेल ती फक्त निराशा… 

आपण मराठीत बोलत असलो तरी काही इंग्रजी शब्द आपण आपलेच म्हणून सर्रास वापरतो. कदाचित एकदा आपलं म्हंटल की दूर लोटायच नाही हा मराठी बाणा यात असेल. किस हा शब्द मराठीत आणि इंग्रजीत लिहितांना वेगळा आणि अर्थही वेगळा असला तरी, व आपण बोलतांना किस याचा मराठी अर्थच घेतला तरी वाक्य कस ऐकतो त्यावरून ऐकतांना गंमत वाटते.

आज दोन्ही वेळेस ऊपवास आहे. मग… किस सकाळी करु कि रात्री चालेल… अस विचारल तर… गंमत वाटणारच. आणि समजा ऊत्तर दिल… सकाळीच कर. रात्रीच रात्री बघू… तर… किंवा एखाद्या गोष्टीबद्दल नको तितकी चर्चा सुरु असेल तरी म्हणतो, बास आता… किती किस पाडायचा… 

बोलीभाषा मराठीच असली तरी पुणं, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, मराठवाडा, नाशिक, खान्देश इथली वेगळी आहे. आमच्याकडे काहि लोकांना ळ चा उच्चार ड असा करायची सवय आहे. लिहीतांना ळ लिहीला तरी उच्चार ड असा करतात. यात काही चूक आहे अस वाटत नाही. आमच्या वर्गात नेमाडे, भोळे, काळे अशी आडनांव असणारे होते. या सगळ्यांनाच एक जण बोलवत होता. पण तो म्हणाला नेमाडे, भोडे, काडे. सगडेच्या सगडे संध्याकाडी या. समजल तरी ऐकतांना गंमत वाटायची. एक म्हण आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. आता हिच म्हण याने म्हंटली तर ती उथड पाण्याला खडखडाट फार अस म्हणेल. खळखळाट आणि खडखडाट किती विरुद्ध अर्थ आहे. पण हिच गंमत आहे.

अशा खूप गोष्टी असतील. पण भाषेत प्रेम, ओलावा, गंमत आहे कारण ती माझी आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी मराठी — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

🌸 विविधा 🌸

☆ माझी मराठी — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(मराठी भाषा गौरव दिनानिमित्त)

माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट मराठी माझी मातृभाषा आहे आणि तिचं संवर्धन, विकास, विस्तार ही माझीदेखील जबाबदारी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी त्यासाठी नक्कीच कायम प्रयत्नशील  राहीन.

‘माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजा जिंके।..

सुमारे आठशे वर्षांपूर्वी, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठी भाषेबद्दलचा अभिमान, प्रेम आणि मराठी शब्दांच्या सामर्थ्यावरील  विश्वास,  व्यक्त केला आहे. खरंच अवीट गोडी असलेली अशी ही आपली मराठी भाषा! या भाषेचं वैभव वाढवलं ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, जनाबाई इ. महान संतांच्या वाङ्मयानी. या त्यांच्या साहित्याने  रसिकमनांचं केवळ मनोरंजन न करता, अखिल विश्वाच्या कल्याणाचा विशाल दृष्टिकोन त्यांना दिला. तेही कोणताच भेदभाव न करता! हे आमच्या मराठी भाषेचं सामर्थ्य आणि परंपराआहे. आणि ती साहित्य परंपरा आजतागायत चालू ठेवली ती, श्री.महादेवशास्त्री जोशी, ना. सी. फडके, वि. वा.शिरवाडकर, बालकवी , इंदिरा संत, शांताबाई शेळके, पु. ल. देशपांडे अशा आमच्या शेकडो प्रतिभावंत लेखक, कवी आणि नाटककारांनी!

   पण आज आमच्या भाषेचं वैभव जणू लुप्त झालं आहे. इंग्रजी भाषेचा पगडा आमच्या समाजमनावर इतका जबरदस्त आहे की त्यापुढे आपली मातृभाषा मराठी किती समृद्ध आहे, याचा विसर पडू लागला आहे. अटीतटीच्या या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी, इंग्रजी भाषेत शिक्षण घेणं हाच एकमेव उपाय आहे, अशी बहुजन मराठी समाजाची समजूत झाली आहे.  किंबहुना आपला पाल्य कोणत्या इंग्रजी शाळेत शिकतो, हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. 

 महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, अशी मराठी वृत्तपत्रे  आवर्जून मराठी बाणा जपताना दिसतात.  तेवढाच आशेचा किरण!अन्यथा आज महाराष्ट्रात मराठीची उपेक्षा होताना दिसत आहे.पण भारतातील इतर राज्यांत आणि परदेशात वास्तव्य करून असलेली मंडळी मात्र विविध उपक्रमांद्वारे, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

 मराठी या आपल्या मातृभाषेचा विसर पडणे याचा दूरगामी परिणाम म्हणजे मराठी संस्कृतीही नामशेष होणे! हा विघातक परिणाम टाळायचा असेल तर मराठी भाषेच्या संवर्धन आणि वृद्धीसाठी, जाणीवपूर्वक आणि परिणामकारक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. या हेतूनेच  १४ ते २८ जानेवारीपर्यंत,  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, महाराष्ट्र शासनातर्फे, २७ फेब्रुवारी, हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. इथल्या सर्व शाळांमध्येही मराठी हा सक्तीचा विषय केला आहे. सार्वजनिक  ठिकाणी असलेले नामफलक आणि सूचनाफलक हे ठळक मराठी भाषेतच असावे, यासाठी नियम लागू केले आहेत.

महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असल्याने, महाराष्ट्रातील सर्व व्यवहार हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजेत. तसा आपलाच आग्रह असला पाहिजे पण आम्ही भलतेच सहिष्णू! घरातून बाहेर पडल्यावर रिक्षावाल्याला ‘ ऑटो ‘ म्हणून पुकारतो आणि ‘ स्टेशन जाना है’ असं सांगतो. आमच्या भाषेला आम्हीच मान देत नाही तर इतरांची काय कथा? आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठीत बोलण्याची, समाजमाध्यमांवर लिहिण्याची सवय केली, तर इथे आलेल्या अन्य भाषिकांना ती भाषा शिकावीच लागेल. कारण त्याशिवाय त्यांना इथे व्यवहार करणं, स्थापित होणं, अशक्य होईल.

भ्रमणध्वनी आणि आंतरजालाच्या वाढत्या वापरामुळे वाचनसंस्कृती लयाला चालली आहे. त्यासाठी बालकांना, तरूणवर्गाला आकर्षित करेल, असं उत्कृष्ट,  नवीन आणि जुनं साहित्य ,  हे ‘ई-बुक’ च्या स्वरूपात, उपलब्ध करून दिले पाहिजे. ग्रंथालयांची संख्या वाढली पाहिजे आणि आहेत त्या ग्रंथालयांची स्थिती सुधारली पाहिजे. मराठी भाषेतील लिखाणाला, डबघाईला आलेल्या प्रकाशन व्यवसायाला सरकारकडून अनुदान  आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे.  मराठीच्या उपभाषा असलेल्या कोंकणी, मालवणी, अहिराणी या भाषांतील साहित्य,मराठीच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं पाहिजे.

एकूण काय तर मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी प्रचंड राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची  आवश्यकता आहे. आघाडीचे मराठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांनीदेखील यासाठी आपला वाटा उचलला पाहिजे. 

मग नक्कीच.. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ९ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ९ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगांतून कळलेले संत तुकाराम(२)

आजच्या लेखातही अभंगातून कळलेल्या संत तुकाराम महाराजांविषयी

आपण बोलणार आहोत.

 बोलावा विठ्ठल/ पहावा विठ्ठल/

 करावा विठ्ठल/ जीवे भावे//

 येणे सोसे मन/ झाले हाव भरी/

 परती माघारी/ येत नाही//

 बंधनापासूनी/ उकलल्या गाठी/

 देता आली मिठी/ सावकाश//

 तुका म्हणे देह/ भरीला विठ्ठले/

 काम क्रोधे केले/ घर रिते//

 विदुषी किशोरीताई अमोणकर यांनी हा अभंग त्यांच्या गोड गळ्यातून गाऊन अतिशय प्रसिद्ध करून ठेवला आहे.

 या अभंगातून आपल्याला स्पष्ट दिसून येते की तुकाराम महाराजांची भक्ती आता सगुणाकडून निर्गुणाकडे जात चालली आहे. विठ्ठलाची भक्ती करत असताना या ठिकाणी त्यांची देहबुद्धी नाहीशी झालेली आहे. म्हणून ते म्हणतात, ” मी ब्रह्म आहे या भावनेच्या अवस्थेत माझा जन्म झाला. माझे सगळे नवस पूर्ण झाले व सर्व आशा नाहीशी झाली. मी आत्मा आहे या अनुभवाने बलवान झालो. “

 मी ची मज व्यालो/ पोटा आपुलिया आलो/

 आता पुरले नवस/ निरसोनी गेली आस/

 दोन्हीकडे पाहे/ तुका आहे तैसा आहे//

 काही जाणो नये /पांडुरंगाविण/

पावीजेल सीण/ संदेहाने//

 भलतिया नावे/ आळविला पिता/

 तरी तो गात्रा धणी/ हरी कथा//

 तुका म्हणे उपजे / विल्हाळआवडी/

 करावा तो घडी/ घडी लाहो//

एका पांडुरंगा व्यतिरिक्त कसलाच विचार करू नये. कोणत्याही कारणाने कळवळ्याने मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते. हरी कथेने सर्वांगांचे समाधान होते. एक हरीकथाच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते.

अशाप्रकारे तुकारामांची अवस्था हरीमय झाली आहे.

म्हणून पुढे ते म्हणतात,

 दास झालो हरिदासाचा/*बुद्धी काया मने वाचा/

 तेथे प्रेमाचा सुकाळ/टाळ मृदुंग कल्लोळ//*

नासे दुष्ट बुद्धी सकळ/समाधी हरिकीर्तनी//

ऐकता हरी कथा/भक्ती लागे त्या अभक्ता//

 देखोनी कीर्तनाचा रंग/ कैसा उभा पांडुरंग//

 हे सुख ब्रह्मादीका/ नाही नाही म्हणे तुका//

हरी प्रेमाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी महाराजांनी बऱ्याच ठिकाणी रूपकात्मक अभंग रचना केली आहे.

 या ठिकाणी ते म्हणतात…

 रवीचा प्रकाश/ तोचि निशी घडे नाश/

 झाल्या बहुवस तरी/ त्या काय दीपिका//

बंधमोक्षाचे वर्णन करताना महाराज रात्र आणि दिवस याची उपमा देतात. सूर्यप्रकाश आला की रात्र नाहीशी होते. अनेक दीप लावून रात्र संपत नाही. त्याप्रमाणेच सर्वोत्तम असा श्रीहरी तो माझ्या जीवात राहिला तरच त्याची सर्व रहस्य मला कळतील. ते दुसरा दृष्टांत देतात.

सवे असता धनी/ आड ये न सके कोणी/

नलगे विनवणी/ पृथकाची करावी//

प्रत्यक्ष मालकच आपल्याबरोबर असला तर वाटेत कोणाची विनवणी करावी लागत नाही, तसेच आपल्याजवळ श्रीहरीचे प्रेम असले तर आपल्या मार्गात काहीच अडथळे येत नाहीत.

म्हणजेच जन्म मरणाच्या बंधनातून आपण सहज मुक्त होतो.

या ठिकाणी तुकारामांना भक्ती सुखाबरोबर ब्रह्मसुख भेटले आहे.

 नाम घेता मन निवे/ जीवे अमृतची स्त्रवे/

 होताती बरवे /ऐसे शकुन लाभाचे//

 मन रंगले रंगले/ तुझ्या चरणी स्थिरावले/

 केलीया विठ्ठले/ ऐसी कृपा जाणावी//

 *सुख भेटता आले सुखा/ निध सापडला मुखा/

 तुका म्हणे लेखा/ आता नाही आनंदा//

 सर्वत्र अवर्णनीय असा आनंद आहे.

 जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत/

 त्यांचे पायी चित्तठेवीन मी//

 जयासी विठ्ठल आवडे लोचनी/

 त्याचे पायवणी स्वीकारीन//

 विठ्ठलाची जीही दिला सर्व भावा/

 त्यांच्या पायी जीव ठेवीन मी//

 तुका म्हणे रज होईन चरणींचा/

 म्हणावी ती त्यांच्या हरीचे दास//

तुकाराम भक्तिमार्गाला लागले आहेत, आता ते मायामोहातून बाहेर पडले आहेत, परंतु आपण संसार बंधनात अडकलो याचे त्यांना दुःख आहे. ते दुःख आपल्या अभंगातून व्यक्त करतात

 पंचभूतांचे सापडलो संदी/

 घातलीसे बंदी अहंकारे//

 आपल्या आपण बांधविला गळा/

 नेणेची निराळा असताही//

 कासया हा सत्य मानीला संसार/

 काहे केले चार माझे माझे//

 का नाही शरण गेलो नारायणा/

 का नाही वासना आवरिली//

 किंचित सुखाचा धरीला अभिळास/

 तेणे बहु नास केला पुढे//

 तुका म्हणे आता देह देऊ बळी/

 करुनी सांडू होळी संचिताची//

तुकारामांनी आपले सर्वस्व पांडुरंग चरणी वाहिले आहे आणि ते देवाच्या विविध कथांचा संदर्भ घेऊन विठ्ठलाला आळवीत आहेत.

 फिरविले देऊळ जगामाजी ख्याती/

 नामदेवा हाती दूध प्याला//

(नामदेवाने आपल्या भक्ती द्वारा विठ्ठलाचे देऊळ फिरवून प्रवेशद्वार आपल्यासमोर आणले अशी कथा आहे.)

 भरियेली हुंडी नरसी मेहत्याची/

 *धनाजी चाट्याची सेते पेरी//

 मिराबाई साठी प्याला विषाचा/

 लाख्याकोला त्याचा ढोल पिटी//

 

 कबीराचे मागी विणू लागे शेले/

 मूल उठविले कुंभाराचे//*

 या सर्व संतांची कामे पांडुरंग स्वतः करत होता

 त्याचप्रमाणे तुकारामांकडेही देवाने लक्ष द्यावे

 म्हणून ते विनवणी करतात…

 आता तुम्ही दया करा पंढरीराया/

 तुका विनवी पाया वेळोवेळा//

विठ्ठल भेटीची तुकाराम महाराजांना किती तळमळ लागून राहिली होती हे आतापर्यंत अनेक अभंगातून आपण पाहिले. आता पुढील काही अभंगातून त्यांची व विठ्ठलाची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनाची अवस्था पाहण्यासारखी आहे.

 बहुता दिसांची आजी झाली भेटी/

 झाली होती तुटी काळ गती//

 येथे सावकाश घेईन ते धणी/

 गेली अडचणी उगवोनी//

 बहु दुःख दिले होते घरी कामे/

 वाढला हा श्रमे श्रम होता//

 बहु दिसत होता सांडीला मारग/

 क्लेशाचा त्या त्याग आजी जाला//

 बहु होती केली सोंग संपादणी/

 लौकीकापासूनी निर्गमले//

 तुका म्हणे येथे झाले अवसान/

 परमानंदी मन विसावले//

 पुष्कळ काळपर्यंत देवाच्या पायांचा वियोग झाला होता, आज सुदैवाने त्याची भेट झाली. आता सर्व अडचणी दूर होऊन, विठ्ठलाच्या पायाचे ध्यानसुख तृप्त होईपर्यंत घेईन. अनेक वैश्विक इच्छांनी मी दुःखी झालो होतो, त्यामुळे श्रम फार वाढले होते, ते आज संपले. प्रपंचात राहून अनेक सोंगे करावी लागली, आता सर्व लौकिक गोष्टींशी असलेला माझा संबंध संपला. मन मोकळे झाले. शेवटी सर्व व्यवहाराचे पर्यवसान एका परम आनंदात होऊन त्या ठिॅ

थौतकाणी माझे मन विश्राम पावले आहे. एक समाधानाची रेषा त्यांच्या मुद्रेवर या ठिकाणी दिसून येते.

 क्रमशः… ९  

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- पुढं जे काही घडलं ते सगळं आपसूकच घडत जावं तसंच आणि कधी कल्पनाही केली नव्हती असं एक अनपेक्षित वळण येताच मी थबकलो. इथं वळायचं की आहे त्याच मार्गाने पुढं जायचं या माझ्या क्षणकाळाच्या द्विधा मन:स्थितीत ‘तो’ स्वतःशीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी… माझ्याजवळ! कारण पुढे जे घडत गेलं ते प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं असंच सगळं..!! )

स्वेच्छानिवृत्ती घ्यायचा माझा अट्टाहास नव्हता, पण आयुष्यात क्वचितच येणारी एकमेव संधी या दृष्टीने मी त्याकडे पहात होतो. या योजनेच्या अतिरिक्त आर्थिक मोहात न पडता, मिळू शकणारे ते लाभ माझ्या सर्व जबाबदाऱ्या विनासायास पार पडण्यासाठी पुरेसे आहेत कां याचाच विचार करणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे होते. सलिल आणि आरतीने जेव्हा नि:शंकपणे संमती दर्शवली त्यानंतर माझ्या विचारांना या दिशेने चालना मिळाली आणि मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक असल्याने मी हे कितपत फायदेशीर ठरेल हे पहायला सुरूवात केली.

या योजनेतील वरवर जाणवणारे मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येकाच्या शिल्लक राहिलेल्या नोकरीच्या मुदतीच्या अर्ध्या कालावधीचा पूर्ण पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता. या हिशोबाने माझ्या उर्वरित नऊ वर्षांच्या कार्यकाळाच्या निम्म्या म्हणजे साडेचार वर्षांच्या पगाराची रक्कम अतिरिक्त लाभ म्हणून मला मिळणार होती. त्या रकमेचे मासिक व्याज माझ्या त्यावेळेच्या पगारापेक्षा थोडे जास्तच येत होते. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार केला तर मला ते सोयीचे आणि पुरून उरणारेच होते. शिवाय माझे घरापासून लांब, एकटा राहिल्याने होणारे अतिरिक्त सर्व खर्च जे दरमहा माझ्या पगाराच्या निम्म्या रकमेइतके होते ते वाचणार होते. शिवाय नोकरीतल्या जबाबदाऱ्यांची कायम मनात असणारी व्यवधानं आणि दडपणं नाहिशी होणार होती आणि त्यासाठी द्यावा लागणारा रोजचा दहा- बारा तासांचा वेळ हा माझ्यासाठी पूर्ण मला हवा तसा व्यतित करण्यासाठी मोकळा मिळणार होता जे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं होतं!

असे सगळेच घटक निदान माझ्यापुरते तरी सर्वार्थाने सोयीचे होते तसेच फायद्याचेही! नकारात्मक म्हणता येईल अशी एकच गोष्ट होती ती म्हणजे बॅंकांमधे पूर्वी पेन्शन योजना आस्तित्त्वात नव्हती. तरीही सुरुवातीपासूनच आपला जॉब पेन्शनेबल नाही हे गृहित धरूनच मी माझे आर्थिक नियोजन केलेले होते. त्यानंतर १९९६ मधे सर्वप्रथम पेन्शन योजना बँकांसाठी लागू करण्यात आली होती. ती ऐच्छिक होती. त्यामुळे ती स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय अर्थातच खुला होता. आणि त्या वेळच्या हिशोबानुसार पेन्शन पर्याय न स्विकारता बऱ्याच जणांनी आणि मीही पीएफ् चा पर्यायच स्वीकारला होता. अर्थात पेन्शन नसणे हा योग्य अशा आर्थिक नियोजनामुळे माझ्यासाठी तरी तसा गौण मुद्दा होता. अर्थात स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर उच्चाधिकार पदांवरील बऱ्याच जागा रिक्त होणार असल्याने मागे राहिलेल्यांसाठी पुढच्या प्रमोशनच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होणार होत्या हे खरे, पण त्यामुळे वाढणाऱ्या अधिकारांबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि मला हव्यास नसणाऱ्या अॅमिनीटीज् भरपूर पण टॅक्सेशनचा विचार करता मिळणारे आर्थिक लाभ मात्र तुलनेने अतिशय नगण्य ही वस्तुस्थिती होती.

अर्थात इतर बऱ्याच जणांना या ना त्या कारणाने या योजनेचा फायदा घेता येणार नव्हता त्यामुळे त्याचे शल्य मनात घेऊनच उर्वरित काळ इच्छा नसूनही त्यांना शेवटपर्यंत नोकरी करणं क्रमप्राप्त होतं!

अशा रीतीने या सर्व बाबींचा विचार करून नोकरी चालू ठेवणे अधिक तोट्याचे आणि गैरसोयीचे होते याची खात्री झाल्यानंतर मी

स्वेच्छानिवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करायचे निश्चित केले. घरी आई, आरती आणि सलिल यांना यासंदर्भातल्या सर्व हिशोबांची आणि माझ्या नियोजनाची सविस्तर कल्पना देऊन त्यांचे समाधान झाल्यानंतर माझा अर्ज तयार केला. तरीही तो सबमिट करण्यापूर्वी वखरे साहेबांना माझ्या निर्णयाची पूर्वकल्पना देणे मला आवश्यक वाटले. मी माझा अर्ज सोबत घेऊन साहेबांच्या केबिनमधे गेलो पण त्यामुळे माझ्या या संकल्पात अडसर निर्माण होऊ पहातोय याची मला कल्पना कुठं होती?

मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी मला बसायची खूण केली. मी त्यांचं बोलणं संपायची वाट पहात बसलो खरा पण फोन महत्त्वाचा होता हे वखरे साहेबांच्या अदबीने बोलण्यावरून आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरून माझ्या लक्षात आले. आपण नंतर यावे असा विचार करून मी खुर्ची मागे सरकवून उठलो तेवढ्यांत त्यांनी बसायची खूण केली. पुढे कांही मिनिटातच फोनवरचं बोलणं संपलं तसं रिसिव्हर ठेवून ते क्षणभर शांत बसून राहिले आणि मग माझ्याकडे पहात सहज विचारल्यासारखं म्हणाले,

“फोन कुणाचा होता सांगा बरं…? “

“सेंट्रल ऑफिस? “

“एम्. डी. हिमसेल्फ वाॅज आॅन द लाईन… ” पाण्याचा ग्लास हातात घेत त्यांनी सांगितलं.

“कां? .. कांही प्राॅब्लेम..? “

“आपल्या ऑफिसपुरता तरी काही प्रश्न नसणाराय हे नशीब माझं. ” ते कांहीसे रिलॅक्स होत म्हणाले.

“म्हणजे? ” मला कांही अंदाजच येईना.

” आपल्याला डिपॉझिट, ॲडव्हान्सेस, रिकव्हरी.. अशी डोईजड टार्गेट्स दिली जातात ना नेहमी? आताही त्यांनी एक वेगळंच टार्गेट दिलंय. आश्चर्य म्हणजे ते ‘निगेटीव्ह टार्गेट’ आहे. पण ठीक आहे. फार टेन्शन घ्यावं असं कांही नाहीय. “

“निगेटिव्ह टार्गेट? म्हणजे? “

ते हसले.

“नुकत्याच आलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेच्या सर्क्युलरच्या संबंधातलं टार्गेट.. “

“म्हणजे? “

अतिरिक्त स्टाफची संख्या कमी करण्यासाठी ही योजना तयार केलेली असली तरी त्यामागे अनप्राॅडक्टीव्ह स्टाफसंख्या कमी करण्याचा प्रमुख उद्देश आहे. तरीही कायदेशीर आक्षेप घेतले जाऊ नयेत म्हणूनच केवळ ती सरसकट सर्वांसाठी खुली ठेवली गेलीय हे मला माहित होतं पण..

” पण यासंदर्भातलं ‘निगेटिव्ह टार्गेट’ म्हणजे काय ते नाही समजलं.. ” मी साहेबांना माझी शंका विचारली.

” त्या संदर्भातच सगळं फोनवर ऐकवून झालंय” ते हसत म्हणाले, ” त्याचं काय आहे, नुकत्याच झालेल्या एक्झिक्युटिव्ह प्रमोशन प्रोसेसमधले रिसेण्ट प्रमोटीज् आहेत ना तुमच्यासारखे ते बॅंकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अॅसेटस् आहेत. त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यापासून परावृत्त करण्याची सूचना एम्. डी. नी आम्हा सर्व झोनल हेडस् ना दिलीय. त्यापैकी कुणीही ही स्वेच्छानिवृत्ती स्विकारू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. या अर्थाने आपल्या झोनसाठी मला दिलं गेलेलं हे ‘निगेटिव्ह टार्गेट’च ना? “

वखरे साहेबांचं बोलणं त्यांच्या नकळत माझ्या निर्णयात मोठ्ठा अडसर निर्माण करणारं होतं. माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायलाच मी आलेलो असताना नेमका त्यातच हा अडसर निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तो अर्ज आत्ताच देणं मला योग्य वाटेना. न द्यावा तर मी इथे कां आलो होतो हा प्रश्न निर्माण होणार होताच. मनातली ही अनिश्चितता मनात तशीच घेऊन मी जायला उठलो..

“अरे, बसा ना, बोला, तुम्ही कां आला होतात? ” वखरे साहेबांनी विचारलंच.

आता मात्र खरं कारण सांगणं मला अवघड वाटेना….

” मी स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं ठरवलंय. ते सांगायलाच मी आलो होतो. ” मी मोकळेपणानं सांगून टाकलं.

ते अविश्वासाने पहातंच राहिले.

” तुम्ही आणि स्वेच्छानिवृत्ती? चेष्टा करताय कां माझी? ” त्यांचा आवाज थोडा चढल्या सारखा वाटला.

“नाही सर. खरंच सांगतोय. ” मी म्हंटलं, आणि सोबत आणलेला माझा अर्ज मी त्यांच्यासमोर ठेवला.

त्यांनी तो हातात घेऊन त्यावरून झरझर नजर फिरवताना त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मला अस्वस्थ करीत राहिले. तो अर्ज घडी घालून मला परत देत ते म्हणाले,

” हा सध्या तुमच्या जवळच राहू दे. यू प्लीज गिव्ह सेकंड थाॅट टू युवर डिसिजन. आपण यावर सविस्तर बोलू नंतर. मग ठरवू काय करायचं ते. ” ते शांत पण ठाम स्वरात म्हणाले.

त्यांचं म्हणणं मला स्विकारता येईना न् डावलताही.

” ठीक आहे. आपण बोलू नंतर ” असं म्हणत त्यांनी पुढे केलेला तो अर्ज मुकाट्याने परत घेऊन मी केबिनमधून बाहेर आलो.

जे सुरळीत पार पडणार हे मी गृहितच धरलं होतं ते गृहितच असं चुकीचं ठरलं होतं. त्यामुळं जे सहजसाध्य वाटत होतं तेच अप्राप्य ठरत असल्याचं लक्षात येताच माझी चलबिचल सुरू झाली. जे घडेल ते आपल्या हिताचंच असेल हा विश्वास मनात असूनही आपल्या हक्काचं कांहीतरी नाकारलं जातं असल्याची रूखरूख माझं मन अस्वस्थ करीत राहिली.

आता यातून अखेर काय निष्पन्न होणार हे नेहमीप्रमाणे अखेर ‘तो’च तर ठरवणार होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओ. टी. पी.” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओ. टी. पी.” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

मी झोपेत होतो का… हो झोपेतच होतो. अचानक मला एक प्रकाशमान गोलाकार भाग समोर दिसायला लागला. हे काय आहे… काय असेल… हा विचार करत होतो.

तेवढ्यात आवाज आला… वत्सा… घाबरु नकोस… मीच आहे. आता सध्या आईमुळे मीपण काही धार्मिक सिरीयल सुरु असतांना मोबाईल हातात घेत टि. व्ही. समोर बसतो. त्यामुळे वत्सा, आचार्य, शिष्य, नामस्मरण असे शब्द कानावर येतात त्यामुळे त्यांची थोडी सवय झाली आहे. नाहीतर मी झोपेत त्या आवाजाला घाबरण्याऐवजी वत्सा या शब्दालाच घाबरलो असतो.

जागा असतो तर कदाचित मोबाईल हातात घेऊन गुगलवर वत्सा याचा अर्थ पण शोधला असता. पण वत्सा लिहीतांना त ला स जोडायचा, का स ला त हा प्रश्न कदाचित पडला असता. आणि शाळेत शिकलेले स ला ते स ला ना ते हे व्याकरण याचा काहि संबंध आहे का हे आठवावे लागले असते.

व्याकरणात हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. पण झोपेत द्वितीय, विभक्ती, आणि प्रत्यय याचा संबंध नव्हता, कारण मी प्रथम किंंवा प्रथमच भक्तीचा प्रत्यय घेत होतो. पण वत्सा मीच आहे यात मी म्हणजे नक्की कोण हे काही समजलंच नाही.

मोबाईलच एक बर असतं, त्याला ट्रू काॅलर लावल की कोण बोलतय हे समजत. पण नुसत्या आवाजाने मी ओळखणं मला कठीण गेलं. किंवा आवाजावरून मी कोणालाही ओळखेन असा असणारा मी पणा गळून पडला. कारण हल्ली मी आवाजावरून दुधवाला, भंगारवाला, भाजीवाला अशा काही लोकांना ओळखायला लागलो होतो. पण हा आवाज नवीन होता.

अरे तु ज्याची आराधना करतोस तोच मी… तुला भेटायला आलो आहे…

अरे देवा… काही कळलं नाही तर जागेपणात जी त्रासीक प्रतिक्रिया असते, तीच झोपेतही उमटली…

बरोबर तोच… तोच मी देव…

त्याला अरे देवा हेच समजलं असेल. त्रासीक आवाज लक्षात आला नसावा.

तोच मी देव अस म्हंटल्यावर आता माझे वरचे शब्द तेच होते, फक्त वापर वेगळ्या पध्दतीने. आणि ऊत्साहात… अरे… देवा… वा… वा… पण तुझा चेहराच दिसत नाही. तो दिसू दे…

तु नामस्मरण करतांना जे नांव घेतो तेच नांव घे. तोच तुझा ओ. टि. पी. आहे. ते अगदी मोबाईल सारखच आहे… पैसे देतांना जसं तू ओ. टि. पी. ने कन्फर्मेशन देतोस तसच माझं नांव घे. ते नांव म्हणजे ओ. टि. पी. घेतल्यावर माझा चेहरा काय संपूर्ण मीच दिसायला लागेल.

आता देवाला काय सांगणार… मोबाईल वर पैसे देतांना दोन बँक असल्यातरी आधी बँक सिलेक्ट करावी लागते मग ओ. टि. पी. येतो. इथेही ओ. टि. पी. म्हणून देव नावच घ्यायला सांगतोय. पण… कोणत्या देवाचं नांव घेऊ…

रविवारी सूर्यनारायण, सोमवारी महादेव शंकर, मंगळवारी गणपती बाप्पा, गुरुवारी दत्तात्रेय, शुक्रवारी कोणत्या देवीचं नांव घ्याव हा प्रश्न असतो, पण मी आठवेल किंवा जमेल त्या देवीच नांव घेत हा प्रश्न तात्पुरता माझ्यासाठी सोडवतो. शनिवारी हनुमान यांच नांव घेतो.

शनिवारी शनीचं नांव टाळतो. कारण खोडी काढणं याचही नांव घेणं असा अर्थ निघतो. त्या अर्थाने शनी देेवाने पाहिले तर ऊगाचच शनी मागे लागेल हि भिती.

बर्‍याचदा तर सकाळ, संध्याकाळ आणि जमल्यास दुपार, व ठराविक दिवस यांना ठरवून वेगवेगळ्या देवांची नांव घेतो. आता ओ. टि. पी. म्हणून कोणाचं नांव घेऊ. कारण चेहराच दिसत नाही…

हो, बरोब्बर वरच्या वारात बुधवार नाही. हा वार मी मुद्दाम मोकळा सोडला आहे. त्याला काही कारण आहे. पण ते सांगायचं नाही.

बर मी सगळ्यावारी वेगवगळ्या देवाचं नांव घेतो. त्यांचा चेहरा लक्षात आहे. पण आवाजाच काय? देव आपला आवाज ऐकत नाही असं आपण सहज म्हणतो. पण आपला प्रयत्न त्याने आपलं ऐकावं याचसाठी असतो. आपण कधी मनापासून त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केल्याचं आठवतच नाही. मग ओळखणार कसा त्याचा आवाज…

बरं त्याची नांव तरी किती… सूर्य, रवी, शंकर, महादेव, गणपती, वक्रतुंड, दत्तात्रेय, श्रीपाद, अंबाबाई, दुर्गा, पवनसूत, हनुमान, विष्णुला तर सहस्त्र नांव आहेत. बरं ओ. टि. पी. टाकायचा म्हणजे तोच टाकावा लागेल, चुकवून चालणार नाही. ही मानसिकता.

आता झोपेत का असेना पण देवाच्या मिळणार्‍या दर्शनाला आपण मुकणार याची खंत. काय करावं हाच विचार.

तेवढ्यात देवच म्हणाला, तुझ्या ओ. टि. पी. ची वेळ संपली आहे. मला जावं लागेल कारण अजूनही काही लोकांना असेच ओ. टि. पी. द्यायचे आहेत. पण तु निराश होऊ नकोस. कारण…

एखाद्या गोष्टीचं मुल्य ठरल्यावर ते द्यायचं सध्या तुझ्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. वेगवेगळे पे तुझ्याकडे आहेत. शिवाय चेक, रोख रक्कम, क्रेडिट कार्ड असेही पर्याय आहेत. रोख रकमेत दहा, पन्नास, शंभर, पाचशे अशा वेगवेगळ्या दर्शनी मुल्यांच चलन तुझ्याकडे आहे. हे फक्त सोयीस्कर व्यवहारासाठीचे मार्ग आहेत. पण मुल्य एकच असतं.

तु वारानुसार भक्ती करत असलास तरी सगळी एकाच ठिकाणी येऊन मिळते. वार कदाचित आमच्या किंवा तुमच्या सोयीने झाले किंवा केले असतील. पण तुमची भक्ती आणि श्रध्दा यात फरक जाणवत नाही. सगळ्या वारी आमच्याबद्दल असलेला तुमच्या मनातला भाव तेवढाच आणि सारखाच असतो. त्यात ऊजवं डावं जाणवत नाही. ऊलट ज्या देवाला जे आवडेल, भावेल, रुचेल ते सर्वतोपरी करण्याचा आणि देण्याचा तुमचा ऊत्साह आणि प्रयत्न दांडगा असतो. मग यात उपवास घडला, त्रास झाला तरी चालतो. आणखीन काय पाहिजे. हिच भक्ती म्हणजे मूल्य आहे. जे तु वेगवेगळ्या पध्दतीने देण्याचा प्रयत्न करतोस. पण प्रामाणिकपणा तेवढाच असतो.

मी तुला भेटायला यायचं ठरवलं होत, तसा आलो आणि भेटलो. जाता जाता एकच सांगतो तुम्हाला हल्ली मोबाईलमुळे मराठी पण इंग्रजी शब्दांच्या सहाय्याने लिहायची सवय झाली आहे.

मी म्हणालो तो ओ. टि. पी. काहिसा तसाच आहे. ओळख Olakh तुझा Tuza परमेश्वर Parameshwar. OTP.

मनात देव कोणताही असला तरी भाव एकच असतो. आणि तो तुच नाही, तर तुझ्या सारख्या अनेकांनी ओळखला आहे. कोणाचही आणि कोणतही नांव घेतलं तरी चालतं हेच लक्षात ठेव. ज्याच नांव घेशील तोच ओ. टि. पी. परत संभ्रमात पडू नकोस. चला येतो मी. अनेक आशिर्वाद. असं म्हणत तो प्रकाश देणारा गोलाकार भाग लुप्त झाला.

पण जाता जाता अनेक ओ. टि. पी. त्याचा अर्थ आणि भक्तीभाव यासह देऊन, समजवून गेला.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शंभर रुपये आणि चांदीची वाटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

🔅 विविधा 🔅

☆ शंभर रुपये आणि चांदीची वाटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

जगामध्ये काही चांगली माणसं आहेत म्हणून हे जग चाललेलं आहे. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. किंवा खरोखर अनुभवतो सुद्धा. डॉ. सुजित भरत पाटील यांचा “ते शंभर रुपये “हा लेख वाचला आणि अगदी तसाच काहीसा प्रसंग मी अनुभवला तो मला आता लिहावासा वाटतो. प्रसंग अगदी असाच माणसा माणसातला फरक जाणून देणारा. 27 आणि 28 जानेवारी 2026 या दोन दिवशी आमच्या गावाकडची देवीची यात्रा होती. 28 जानेवारीला देवीचा प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. जेवण झाल्यामुळे घरी जायची गडबड नव्हती. समोर लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल लागलेले होते. मी सुद्धा नातीसाठी काहीतरी घ्याव म्हणून खेळण्यांच्या स्टॉल कडे गेले. खूपच लहान मुलांची खेळणी होती. त्यामुळे दुसरी मध्ये शिकणाऱ्या माझ्या नातीसाठी मी एक मोठा बॉल घेतला. माझी पहिलीच भवानी असल्यामुळे त्याच्याकडे मला परत द्यायला सुट्टे पैसे नव्हते. माझ्याकडे त्यावेळी दोनशे रुपये होते. त्यातली शंभर रुपयाची नोट मी त्याला दिली आणि पन्नास रुपये परत मिळण्याची वाट बघत होते. त्यावेळी मी उरलेले शंभर रुपये रुमालाच्या अगदी वरच्या कोपऱ्यात ठेवले होते.

“थोडं थांबा मॅडम पैसे देतो “असे म्हटल्यामुळे मी आणखीन खेळणी बघू लागले. खाली वाकून खेळणं घ्यायचं. बघायचं कसं आहे आणि परत जागेवर ठेवून दुसर खेळण घ्यायच. असं मी बऱ्याच वेळा केले. त्यानंतर त्याने माझे पन्नास रुपये दिले आणि मी आमच्या घरच्या स्त्रियांबरोबर घरी आले. कुलूप उघडेपर्यंत मी कट्ट्यावर बसले आणि सगळे पैसे एकत्र ठेवायचे म्हणून रुमाल उघडला. तर त्यात शंभर रुपये नव्हते. माझ्या लक्षात आले की बहुतेक खेळण्यांच्या तिथे पडले असावेत. मी आमच्या घरी आलेल्या एका पाहुणीला घेऊन पुन्हा खेळण्यांच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. पैसे मी नीट ठेवले नाहीत. माझ्या निष्काळजी पणामुळे ते पडले याचा दुःख माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. तिथे जाऊन मी खेळणी उलटी पालटी करून बघू लागले. तो खेळणी वाला म्हणाला, “मॅडम काय पाहिजे “मी म्हणाले “मघाशी माझे शंभर रुपये बहुतेक इथे पडले आहेत. “स्टॉल वाला 30 -32 वर्षाचा तरुण मुलगा होता. तो हसऱ्या चेहऱ्याने मला म्हणाला, “हो हो आहेत माझ्याकडे पैसे. मला सापडले ते. ” हे ऐकल्यानंतर मला खूप हायस वाटलं. आणि माझ्या लक्षात आलं की तो माझी ही रिएक्शन टिपण्यासाठी माझ्याकडे एक टक बघत होता आणि अतिशय गोड हसत होता. “थँक गॉड “मी म्हणाले. थँक्स असे मी त्याला दोन-तीन वेळा म्हणाले. तो म्हणाला, “मॅडम असू दे हो. दिवसभर कष्ट करून जे पैसे मिळतात त्यात आम्ही समाधानी आहे. आम्हाला दुसऱ्यांचे पैसे कशाला हवेत. घरी गेल्यानंतर शांत झोप येते हे महत्त्वाच आहे. पण मॅडम पैसे नीट सांभाळून ठेवत जावा बरं का. ” मी त्याला हो हो म्हटले आणि तिथून निघाले. मला राहून राहून वाटत होते की जगात काही चांगली माणसं आहेत म्हणून जग चालते. असा प्रामाणिकपणा खूप दुर्मिळ असतो. त्याचबरोबर मलाही पैसे नीट जपून ठेवायला हवेत याची जाणीव झाली. एक मोठा अनुभव येऊनही माझ्याकडून पुन्हा पुन्हा चुका होतात याचे कधीकधी मला आश्चर्य वाटते. या प्रसंगा बरोबरच सहा महिन्यापूर्वी श्रावणामध्ये घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळला. माझ्याकडे भिशी होती. श्रावण महिना आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणींना जेवणाचे आमंत्रण दिले. आणायसे श्रावण महिना आहे तर सवाष्णी घालूयात असा विचार केला होता. मैत्रिणी बरोबर सव्वा बारा वाजता घरी आल्या. पण हे सगळं करायच्या नादात माझी पूजा राहिली होती. पण आता एवढ्या सगळ्या गोंधळात शांतपणे पूजा होणार नाही म्हणून मी या सगळ्या गेल्या की पूजा करू आणि नंतर जेवण करू असा विचार केला. मी पूजेची चांदीची भांडी धुतलेली तिथेच किचनमध्ये ठेवली होती. माझ्या सुनबाई सर्विसला गेल्यामुळे दोघी चौघीं मैत्रिणींचा मदतीसाठी म्हणून वावर किचन मध्ये होता. त्यांच्या नजरेला ती भांडी पडलेली होती. सगळ्या सवाष्णींना जेवण दिले. एक छोटासा गेम ही घेतला आणि नंतर त्या सगळ्या घरी गेल्या. मी पूजा करण्यासाठी ताम्हण हातात घेतले तेव्हा माझ्या लक्षात आले की त्यातली चांदीची वाटी गायब झाली आहे. वाटी बऱ्यापैकी मध्यम आकाराची होती. मला प्रचंड धक्का बसला. मी सगळीकडे शोधाशोध केली. पण वाटी काही सापडली नाही. मी देवाची पूजा नीट करू शकले नाही. तसेच मी जेवनही नीट करू शकले नाही. माझा मैत्रिणींवरचा विश्वासच उडून गेला. मी खूप अस्वस्थ झाले. आमच्या यांना काही सांगण्याची सोय नव्हती. काय करावे काही सुचत नव्हते. कोणी बरं घेतली असेल याचा विचार करून करून डोके भनभानून गेले. प्रत्येक मैत्रिणीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. आणि त्यांना वाचायचा मी प्रयत्न करत होते. तरीही मला काही अंदाज येत नव्हता. मी आल्यानंतर माझ्या सुनबाईंना सांगितले. तिने सगळी भांडी व वाट्या चेक केल्या. तरीही वाटी सापडली नाही. कोणाला कसे विचारावे काही समजेना. शेवटी मुलाला मी ही गोष्ट सांगितली आणि दोघांनाही सांगितलं की मला आत्ता जाऊन सगळ्यांना जाब विचारता येईल पण वाटी तर एकीनेच घेतली आहे. मी घेतली आहे म्हणून कोणीही सांगणार नाही. आणि इतर सगळ्यांना वाटणार की मी त्यांच्यावर संशय घेतला. मैत्रीमध्ये एवढ्या वर्षांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार म्हणून मी ही गोष्ट आमच्या तिघांमध्ये ठेवली. अजूनही राहून राहून वाटते की एवढ्या चांगल्या घरातल्या स्त्रिया सुद्धा अशा असू शकतात अशा वागू शकतात. आमची कामवाली सुद्धा खूप प्रामाणिक आहे. तिने कधी कशाला हात लावलेला नव्हता. उलट कधी पॅन्टच्या खिशात पैसे सापडले तर तिने आणून दिले होते. पण एखादी मैत्रीण अशी वागते याचा अजूनही भरोसा वाटत नाही. उलट मैत्रिणींनी सांगायला हवे होते की तू ही सगळी भांडी देवघरात नेऊन ठेव. यांना अस करून झोप कशी काय लागत असेल. एका व्यक्तीबरोबर या विषयी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना याचे काही वाटत नाही. उलट मी कशी चालाखी केली आणि मला फायदा झाला याची फुशारकी ते घरात मारत असतील. आज चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. केव्हाही आता चांदीचा विषय आला की मला ती डोळ्यासमोर चांदीची वाटी दिसते. आणि मैत्रिणी दिसतात. आणि तो खेळण्यांचा स्टॉल वाला दिसतो.

© सौ. जयश्री अनिल पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares