सौ शालिनी जोशी
विविधा
☆ यंत्र आणि मानव… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
यंत्र हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यंत्रामुळेच आपले जीवन सहज, सुलभ, कमी कष्टाचे व आनंददायी झाले आहे. आपण कोणतेही नवीन यंत्र घेतो, तेव्हा त्याची पूजा करून त्याचे स्वागत करतो. यात आनंद असतो. पण ज्यावेळी जुन्या, कार्यक्षमता संपलेल्या यंत्राला निरोप द्यायची वेळ येते, तेव्हाही आपले मन तेवढेच हळवे होते. इतके दिवस त्या यंत्राने केलेल्या मदतीच्या ऋणाची भावना त्यात असते.
मिग २१ विमानांच्या निरोपाची बातमी वाचली. आपल्या संरक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग असलेले, सहा दशके हवाई दलात सेवा दिलेली ही विमाने चंदीगड हवाई दलावर समारंभपूर्वक निवृत्त झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अखेरच्या उड्डाणाचे वैमानिक हवाई दलप्रमुख एअरचिफ मार्शल अमरप्रीतसिंग हे सहभागी झाले होते. निरोप देताना सर्व वायूवीरांचे मन दाटून आले. सर्वच सैनिकांची भिस्त शेवटी यंत्रावर असते. त्यामुळे यंत्राशी त्यांचे भावनिक नाते निर्माण होते. प्रत्येक यंत्राला त्याच्या स्वरूपा नुसार एक प्रथा, परंपरा, विशिष्ट कार्य संस्कृती प्राप्त झालेली असते. त्याचा अंगीकार वीर सैनिक करतात. त्याचे त्यांना सवय होते. व्यवहारातही हाच आपला अनुभव असतो.
विहित कालावधी पलीकडे माणूसही जगत नाही. तेथे यंत्राचे काय? हीच गोष्ट इतर सर्व क्षेत्रातील यंत्रांच्या बाबतीत घडत असते. जुने जाणे ही नवनिर्मितीला प्रेरणा ठरते. जुने मागे पडून, नवीन तयार होणारी यंत्रे जास्त सुधारित, उपयुक्त व वापरायला सोपी असतात.
अश्मयुगात माणसाकडे काहीच नव्हते. मग आपल्या संरक्षणासाठी व इतर कामासाठी माणसाला साधनांची गरज भासू लागली. त्यावेळी संरक्षणासाठी टोकदार दगड वापरत. त्यात सुधारणा होत भाले, बरच्या, तलवारी, बंदुका,——- रणगाडे अशी प्रणाली निर्माण होत गेली. पदार्थ कुटण्यासाठी घेतलेल्या दोन दगडातून——- जाती, गिरण्या, मिक्सर अशी यंत्रे निर्माण झाली. सर्वच क्षेत्रात अशी प्रगती झाली आणि होत आहे. शेतकऱ्यांसाठी खुरपे, कुदळ, नांगर—- ट्रॅक्टर आले. लिहिण्यासाठी बोरु, टाक, पेन— लॅपटॉप, स्मार्टफोन ने तीही गरज संपली. बैलगाड्या—- विमाने अशी वाहने बदलली. सर्वच क्षेत्रातील साधनात विविधता आली .आणि ही सारी यंत्रेच.
खरंतर आपली संस्कृती निसर्गाशी निगडित, त्यावर अवलंबून. म्हणून पशु,पक्षी, चंद्रासारखे ग्रह, सूर्यासारखे तारे, समुद्र,भूमी यांना आपण सणात मान देतो. देवतारूप देऊन त्यांची पूजा करतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तीच गोष्ट यंत्रांची. यंत्रे आपण निर्माण केली. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुलभ, सोपे, कमी कष्टाचे आनंददायी व सुखकर झाले. त्याची आठवण ठेवून, नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीला यंत्र पूजा केली जाते. यंत्राची स्वच्छता करून त्याची पूजा करणे म्हणजे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. त्या जड यंत्रातही आपण देव पहातो. झेंडूच्या फुलांनी त्याची सजावट करतो. मोठ्या कारखान्यापासून घरगुती स्वरूपापर्यंत हे पूजा होते. मात्र मध्य युगात लढायांचे प्रमाण वाढले. त्यामुळे यंत्र पूजा ही शस्त्रपूजा झाली. आणि त्याला खंडेनवमी म्हणून लागले. कारण खड्ग म्हणजे तलवार, त्याचे खंडे झाले. अशीही आपली संस्कृती गुढ आहे.उदार आहे.निसर्गा सकट सर्व उपयोगी वस्तूंची काळजी घेऊन माणसाने सुखाने जगावे हा हेतू.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈















