मराठी साहित्य – विविधा ☆ “युद्ध, इतिहास, आणि मी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “युद्ध, इतिहास, आणि मी …” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

युध्द म्हंटल कि ते करण्यापूर्वी, आणि झाल्यावर त्याचा अभ्यास होतो, नाहीतर करावा लागतो. अगोदर युध्द करायचं का, कसं, कधी असा विचार करणारे अभ्यास करतात. आणि नंतर झालेलं युध्द का, कसं, किती दिवस झालं आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास विचारवंत करतात. पण विद्यार्थ्यांच तस नसतं. त्यांना मात्र दोघांनी केलेला अभ्यास अभ्यासावा लागतो. युध्दाचे चांगले वाईट परिणाम नंतर दिसतातच. पण वाईट परिणाम मात्र बर्‍याच काळापर्यंत चांगलेच दिसतात. चांगल दिसणं, आणि वाईट परिणाम चांगलेच दिसणं यातला फरक स्पष्ट होतो.

माझ्या जन्माअगोदर, नंतर, मला समजायला लागेपर्यंत नक्की किती युध्द झाली हे सांगता आलं नाही तरी शाळेत वरच्या वर्गात जात होतो तस छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या युध्दापासून दुसर्‍या महायुद्धाचा अभ्यास होता. जसजसं वरच्या वर्गात जात होतो तसतशी लुटुपूटूची लढाई घनघोर युध्दाच रुप धारण करायची. बर्‍याचदा यांच्या सनावळी, तह, आक्रमण, आपापसात ठरलेल्या काल्पनिक रेषा यांचा वास्तवाशी संबंध वाटलानाही तरीही युध्दपातळीवर अभ्यास केला होता.

निजामशहा, आदिलशहा, शाहिस्तेखान, अफझलखान यांच्या काळात घोडदळ, पायदळ, तलवार, भाला, दाणपट्टा, गनिमीकावा यांच्या सहाय्याने खेळलेलं युध्द, नंंतर विमानाने हिरोशिमा, नागासाकीवर केव्हा बाॅॅम्ब टाकून गेले ते लक्षातच आलं नाही.

पेशव्यांनी अटकेपार झेंडा फडकवला असेल, पण आम्ही इतिहासात पास झालो की आमचा झेंडा डौलायला लागायचा आणि वर्ष पार पडायचं.

या व्यतिरिक्त दोन युध्द, यांचा अभ्यास करावा लागला नाही तरी अभ्यासाइतकेच प्रश्न त्या बाबतीत विचारले जायचे. ही युध्द म्हणजे अर्थातच रामायण आणि महाभारत. रामायणात प्रभु श्रीराम व रावण यांच्यात, म्हणजे दोन वेगवेगळ्या राजांमधे युध्द झाल होतं. पण महाभारतात झालेलं युध्द मात्र नातेवाईकांमधलच होत. आणि इतिहासात कमी मार्क मिळाले की त्या कमी मिळालेल्या मार्कांवरुन घरात वाक् युध्द सुरु व्हायचं. म्हणजे इतिहासावरुनच घरात महाभारत घडायचं. थोडक्यात महाभारतातली आपसात लढाई करायची परंपरा कमी मिळणार्‍या मार्कांमुळे पुढे घरात सुरुच राहिली. युध्दात सामान्य जनता विनाकारण होरपळते तसंच यांच्या युध्दाचा आमचा अभ्यास कमी झाल्याने शाब्दिक चटके बसायचे. यानंतर धर्मयुद्ध, गृहयुध्द, वाक् युध्द, शीतयुद्ध असे युध्दाचे उपप्रकार असतात हे लक्षात आलं.

मावळ्यांंनी लढाईत झालेले वार अंगावर झेलले. आम्ही इतिहासामुळे झालेले वार पाठीवर झेलले. पाठीवर वार करणं भ्याडपणाच लक्षण समजल जात असेल, पण आमच्या बाबतीत सगळेच निधड्या छातीने सहसा पाठीवरच वार करायचे. आणि त्यात कोणालाही म्हणजे वार करणारा आणि झेलणारा यांना भ्याडपणा वाटालाच नाही. आता आपल्या पाठीवर वार होणार हे समजायचं. मावळ्यांकडे वार चुकवायला ढाल असेलही. पण आमची पाठ मात्र ढोल वाजवल्यासारखी बदडली जायची. थोडक्यात इतिहास शिकवला तेव्हा आम्ही कुंभकर्णासारखे झोपलो होतो. आणि जाग आली तेव्हा इतिहास घडून गेला होता, आणि मिळालेले मार्क आमचा अभ्यासाचा इतिहास सांगायला सिध्द होते.

रामायण, महाभारत यात वाली, सुग्रीव, अंगद, जांबुवंत, बिभीषण, द्रोणाचार्य, भिष्म, विदुर, शकुनी, युधिष्ठिर, दुर्योधन, दुश्यासन आणि इतर… यांच्या नावाचा गोंधळ व्हायचा. तर नंतर जर्मन, ईटली, पोलंड, रशिया, अमेरिका, जापान, चिन या देशांपैकी मित्र कोण आणि शत्रु कोण याच्यात गोंधळ व्हायचा. याच गोंधळामुळे आम्ही एक वेगळा इतिहास तयार करायचो आणि त्यावर परत मार मिळायचा.

युध्द म्हंटल की वैर हिच भावना लक्षात येते. पण आमचे सर म्हणायचे तुमच्या अभ्यासासाठी दुसरं महायुद्ध फक्त तोंडओळख आहे. युध्दाची तोंडओळख करायची काय गरज. नंतर काय आपसात चहापाण्याचा कार्यक्रम करायचा होता… पण ही तोंडओळखसुध्दा जुलूमाचा रामराम केल्यासारखी वाटायची. पण यातली दोस्तराष्ट्र ही संकल्पना जवळची वाटली. कारण असेच कमी मार्क मिळालेले आम्ही काहीजण एकत्र आलो, आणि नंतर एकमेकांचे दोस्त बनलो. आणि ही दोस्ती कायम राहिली. आजही गोलमेज परिषदेसारखं चर्चा करायला आम्ही टेबलवर एकत्र येतो. चर्चा वेगळ्या गोष्टींवर असली तरी त्यात शाळेचा इतिहास व सध्या सुरु असलेली युध्द हा विषय डोकावतोच.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

तुकारामांचा युक्तिवाद

दिवस रात्र विठू माऊलीचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांची त्यांच्या देवाचे कधी दर्शन घडते आणि माऊलीच्या चरणी त्यांना कधी आसरा मिळतो अशी मनाची अवस्था झाली असताना त्यांनी त्यांच्या काही अभंगांतून खूप छान युक्तिवाद मांडला आहे. आज आपण असे काही अभंग पाहूया.

 नवां नवसांची/ झालो तुम्हासी वाणीची//

 कोण तुझे नाम घेते/ देवा पिंडदान देते//

 कोण होते मागे पुढे/ दुजे बोलाया रोकडे//

 तुका म्हणे पांडुरंगा/ कोणा घेतोसी वोसंगा//

देवाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात,

” अहो देवा, आम्ही तुमची नवसासायासाने झालेली दुर्मिळ मुले आहोत. आमच्या वाचून तुमचे नाव घेणारे दुसरे कुणी आहेत का? आम्ही नसतो तर तुमचे पिंडदान कोण करणार? तुम्हाला परखड शब्दात जाब विचारणारे, रोखठोक बोलणारे आमच्या शिवाय दुसरे कोणीतरी आहे का? पांडुरंगा, आम्ही जर तुमची मुले नसतो तर तुम्ही कोणाला तुमच्या पदरात घेतले असते? “

आहे की नाही महाराजांचा हा मस्त युक्तिवाद? आम्ही तुमचे भक्त नसतो तर देवच जसा एकटा पडला असता, ही पांडुरंगाची मुले आहेत म्हणून त्यांना माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळण्याचा अधिकार आहे.

 आता हा दुसरा अभंग पहा.

 जेणे तुज जाले रूप आणि नाव/

 पतीत हे दैव तुझे आम्ही//

 नाही तरी तुज कोण हो पुसते/

 निराकारी तेथे एकाएकी//

 अंधारे ते दीपा आणियेली शोभा/

 माणिकाची प्रभा कोंदणाची//

 धन्वंतरी रोगे आणिला उजेडा/

 सुखी काय चाडा जाणावे त्या//

 अमृतासी मोल विषाचिया गुणे /

 पितळ तरी सोने उंच नीच//

 तुका म्हणे आम्ही असोनिया जाण /

 तुज देवपण आणियेले//

 रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन तुकाराम देवाला सांगतात, ” अरे देवा, आम्ही तुझे दास आहोत, भक्त आहोत म्हणून तुझी ओळख आहे. ” ते काय म्हणतात? आम्ही पतीत आहोत. आणि आमच्यासाठीच देवा तुम्ही हे रूप धारण केले आहे. म्हणून आम्ही पतीतच तुझे दैवत आहोत. आम्ही जर नसतो तर तुझ्या निराकार, निर्गुण स्थितीला कोणी मानले असते? जसे की, अंधार आहे म्हणून दिव्याच्या प्रकाशाची शोभा आहे. वैद्याला रोग्यामुळे प्रसिद्धी मिळते. जर सर्व लोक निरोगी असते तर वैद्याची गरजच काय? विषामुळे अमृताची गोडी आहे, आणि पितळ आहे म्हणून सोन्याला श्रेष्ठता प्राप्त झाली आहे. तसेच आम्ही पतीत आहोत, म्हणून तुझे हे सगुण सुंदर रूप आहे.

या अभंगातून तुकाराम महाराज एक प्रतिभावंत कवी होते असे आपल्याला दिसून येते. परमेश्वराला मनविण्याची ही मोठी चतुर बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच होती.

माणूस मायेच्या जंजाळात अडकून पडला आहे, जी माया अत्यंत नीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देव खरंतर फार चांगला होता, परंतु या मायेने त्याला सुद्धा बिघडवले आहे. या मायेच्या संगतीत राहून देव लोकांना फसवण्याचे अनेक प्रकारचे खरे खोटे चाळे शिकला आहे. या मायेमुळे याच्यावर जगाचे कर्ज झाले म्हणून लोक याच्या नावाने हाका मारतात. ईश्वरा जवळ कोणी काही मागितले की ही माया ज्याचे त्याला मिळू देत नाही, उलट ती मागणाऱ्याला भ्रम निर्माण करण्याकरता त्याच्या अंगावर धावते.

थोडक्यात काय तर मायेत गुरफटलेल्या माणसाने ईश्वरालाही सोडले नाही, त्यालाच मायेच्या पाशात अडकविले. या कारणाने आम्हा भक्त मंडळींना परमेश्वराची भेट होत नाही.

हा फार मोठा सिद्धांत तुकाराम महाराजांनी सामान्य जनतेला पोट- तिडकीने सांगितला आहे.

 बहु होता भला/ परी या मायेने नासीला//

 बहु शिकला रंग चाळे/ खरे खोटे इचे वेळे //

 नव्हते आळविते कोणी/ तिने केला जग ऋणी//

 ज्याचे त्यासी नेदी देऊ/ तुका म्हणे धावे खाऊ//

विठ्ठलाची भक्ती करीत असताना वेद पठण केलेल्या पंडितांना ते मुळीच मानत नाहीत. ते म्हणतात,

पंडित म्हणता थोर सुख/

परी तो पाहता अवघा मूर्ख//

काय करावे घोकिले/

वेदपाठ वाया गेले//

वेदी सांगितले न करी/

समब्रह्म नेणे दुराचारी//

हा वेदींचा अनुभव/

तुका देखे जीव शिव//

एखाद्याला कोणी पंडित म्हणून संबोधिले तर त्याला त्याच्या विद्वत्तेचा अभिमान वाटतो पण विचारांती तो मूर्खच असतो. कारण नुसत्या वेदांची घोकंपट्टी करून त्याचा अर्थ कळत नसेल तर तो कसला पंडित? मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने त्याचे वेदपठण व्यर्थच आहे. वेदात सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्वाने ब्रह्म विलसत असते, परंतु असा अनुभव येत नाही म्हणून असे पंडित हे खरंतर दुराचारीच. वेदातील मुख्य अनुभव म्हणजे जीव आणि शिव एकच असल्याचा अनुभव. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष असा अनुभव आला आहे. त्यांच्या दृष्टीने खरा पंडित असा असतो.

पंडित तोची एक भला/ नित्य भजे जो विठ्ठला//

अवघे समब्रम्ह पाहे/ सर्वांभूती विठ्ठल आहे//

रिता नाही कोणी ठाव/ सर्वांभूती वासुदेव//

तुका म्हणे तोचि दास/ त्या देखिला जाती दोष//

तुकाराम महाराज म्हणतात की जो खऱ्या खुऱ्या भावाने विठ्ठलाची नित्यनेमाने भक्ती करतो, तोच खरा पंडित, कारण तो विठ्ठलाला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वाने पाहतो. तो हे जाणतो की वासुदेव सर्वत्र व्यापून आहे. रिकामे असे कोणतेच ठिकाण नाही. असा मनुष्यच खरा विठ्ठलदास आहे, त्याच्या दर्शनाने सर्वदोष नाश पावतात.

संत तुकारामांचे जनतेला हेच आवाहन आहे की, जन हो, हातात टाळ घ्या, वीणा घ्या, त्यांना विठ्ठल स्वरूप माना आणि विठ्ठल नामाचा मुखाने सतत गजर करा.

क्रमशः… २९

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ३ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ३ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

उगवतीचे रंग- नात्यांचं महावस्त्र

महावस्त्राचे पदर – भाग तीन : ‘बाबा’ (सह्याद्रीची ढाल)

​आतापर्यंत नात्याच्या महावस्त्राचे दोन भाग आपण पाहिले. त्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा पदर होता ‘आई’. तिचा आपण ‘मायेची पैठणी’ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केला. आज या महावस्त्राचा दुसरा प्रमुख पदर पाहूया. हा पदर आहेत ‘बाबा’—घरातील आईनंतरचं दुसरं अत्यंत आदराचं दैवत!

​नात्यांचं महावस्त्र विणताना जसा एक धागा मायेच्या मुलायम आणि जरतारी रेशमाचा असतो, तसाच दुसरा अत्यंत महत्त्वाचा धागा हा त्या वस्त्राला बळकटपणा देणाऱ्या टणक सुताचा असतो. हे सुताचं बळकट आणि तितकंच सुरक्षित कोंदण म्हणजेच ‘बाबा’! आई जर या वस्त्राची देखणी सुवर्णमयी पैठणी असेल, तर बाबा या महावस्त्राला कवेत घेणारे आणि उन्हापावसापासून रक्षण करणारे आकाशाएवढे भक्कम छत्र असतात. कुटुंबासाठी ते स्वतः ‘सह्याद्रीची ढाल’ होतात.

​बाबा म्हणजे घराच्या या सुंदर इमारतीचा पायाचा भक्कम दगड असतात. पायाचा दगड जमिनीखाली गाडला गेलेला असतो, तो वरून कोणाला दिसत नाही आणि याची कोणी जाहीर स्तुतीही करत नाही; पण त्यावरच अख्ख्या घराचा डोलारा वर्षानुवर्षे सुरक्षित उभा असतो. कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, त्यांचे हट्ट आणि भविष्याची चिंता वाहत बाबा अहोरात्र झिजत असतात. स्वतःचे कपडे जुने झालेले असले, पादत्राणे झिजलेली असली, तरी मुलांच्या आनंदासाठी खिशातला शेवटचा रुपया आनंदाने रिकामा करताना कधीच बाबांच्या कपाळावर आठी उमटत नाही. मुलाला यश मिळालं की आई त्याला उराशी धरून रडते, पण बाबा मात्र घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा गच्चीवर जाऊन शांतपणे आनंदाश्रू पुसतात. जगासमोर ते नेहमी कणखरच राहतात, कारण त्यांना माहिती असतं की घरातील हा मुख्य कणा जर मोडला, तर अख्खं घर कोलमडून पडेल!

​’देणाऱ्याने देत जावे’ या अतिशय प्रसिद्ध कवितेत कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात:

​हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी,

सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी.

​या ओळींमध्ये थोडासा भावबदल करून मी असं म्हणेन:

​प्रेम देणाऱ्या आईकडून मायेची उबदार शाल घ्यावी,

घराचे आभाळ पेलणाऱ्या बाबांकडून सह्याद्रीची ढाल घ्यावी!

​आपल्याकडे आईची महती सर्वांनीच गायिली आहे, पण त्या मानाने बाबा हे नाते थोडे दुर्लक्षितच राहिले आहे. आजच्या गतिमान युगात कोणी कोणाला क्वचितच पत्र लिहितो. परंतु पूर्वी जेव्हा एकमेकांच्या भावना किंवा सुखदुःखे जाणून घेण्यासाठी पत्राशिवाय दुसरं माध्यम नव्हतं, तेव्हा बाहेरगावी असणारा मुलगा वडिलांना पत्र लिहिताना पत्राची सुरुवात ‘तीर्थरूप’ या शब्दाने करायचा. आपली संस्कृती वडिलांना केवढं सर्वोच्च स्थान देत होती, हेच यातून सिद्ध होतं. वडील हे ‘तीर्थरूप’ म्हणजे तीर्थासारखे पवित्र! त्यांचं छत्र जोपर्यंत शिरावर आहे, तोपर्यंत अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरजच उरत नाही. ‘आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी’ या सुंदर भावगीतात नेमका हाच विचार सांगितला आहे. आपल्याकडे केवळ एक दिवस ‘फादर्स डे’ साजरा करण्याची पद्धत नाही; आपली संस्कृती तर रोजच आई-वडिलांना आणि गुरूंना वंदन करायला शिकवते. “मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव” हाच आपल्या जगण्याचा पाया आहे.

​आईची कोमलता, प्रेम, माया आणि हळुवारपणा या गुणांच्या पार्श्वभूमीवर बाबांचे थोडेसे विरोधी वाटणारे व्यक्तिमत्व अधिक उठून दिसते. रामगणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज आपल्या कवितेत महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हणतात:

 ​राकट देशा, कणखर देशा, दगडांच्याही देशा,

 नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा!

​जसा हा महाराष्ट्र वरून राकट आणि कणखर असला, तरीातून नाजूक, कोमल आणि फुलांचा प्रदेश आहे; मला वाटतं बाबांचे व्यक्तिमत्त्वही हुबेहूब असंच असतं! ते वरून राकट आणि कणखर दिसतात, पण ते केवळ बाह्य रूप असतं. मनाने बाबा सुद्धा तितकेच हळवे असतात. आईचे अश्रू सहज दिसतात, बाबांचे दिसत नाहीत; एवढाच काय तो फरक! बाबा म्हणजे अगदी ‘नारळासारखे’. नारळ वरून पाहायला किती कठिण, खडबडीत आणि टणक असतो; पण त्याच्या आत डोकावून पाहिलं, तर तिथे मायेचं गोड पाणी आणि शुभ्र खोबरे साठलेलं असतं. भगवान शंकरांनी जगाला वाचवण्यासाठी हलाहल विष कंठात धारण केलं, पण बाबांनी प्रपंचात येणाऱ्या समस्यांचं आणि संकटांचं हलाहल चक्क स्वतः पिऊन टाकलं! त्या आगीची झळ त्यांनी कधीच आपल्या लेकरांना लागू दिली नाही. मुलीच्या पाठवणीच्या वेळी जगासमोर खंबीर राहणारा, पण पाठीमागे कोपऱ्यात जाऊन मुसमुसून डोळे पुसणारा पिता मी स्वतः अनुभवला आहे.

​वडिलांच्या स्वभावातील काही वेळा जाणवणारी कठोरता आणि शिस्त ही केवळ आणि केवळ आपल्या मुलांच्या उज्वल हितासाठीच असते. आई जर मुलाचा पहिला गुरू असेल, तर वडील मुलाला मोठे होईपर्यंत आणि जगाच्या बाजारात पाय रोवून उभे राहेपर्यंत मार्ग दाखवणारे खरे मार्गदर्शक असतात. जेव्हा लहान असलेला मुलगा आईचं बोट सोडून चालण्याइतका मोठा होतो, तेव्हा त्याला पुढचा खडतर मार्ग बाबांच्याच मार्गदर्शनाने दिसू लागतो. पावलापावलावर ते त्याची सोबत करतात. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” अशी त्यांची मूक भूमिका मुलाला आश्वस्त करणारी आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणारी असते. अपयशाच्या काळात पाठीवर मायेचा हात ठेवून ‘लढ’ म्हणणारे बाबाच असतात.

​’आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकात डॉ. नरेंद्र जाधव यांचे अशिक्षित वडील त्यांना जे मोलाचे मार्गदर्शन करतात, ते प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहे. ते म्हणतात, “तू काय बी कर, काय बी शिक; पण जे काय करशील त्याच्यात टॉपला जा! ” गायनाच्या क्षेत्रातील इतिहास ज्यांच्या नावाशिवाय कधीच पुढे जाऊ शकत नाही, अशा मंगेशकर भावंडांना आणि विशेषतः गानकोकिळा लता मंगेशकरांना स्वरांचे बाळकडू देऊन घडवणारे त्यांचे वडील मास्टर दीनानाथच होते!

​साहित्याच्या आणि सिनेमाच्या पडद्यावरही या नात्याची अथांगता नेहमीच अधोरेखित झाली आहे. ‘ शोले ‘ चित्रपटात जेव्हा तरुण मुलगा अकाली मृत्यू पावतो आणि तिथे त्याचे वृद्ध, अंध वडील (अभिनेते ए. के. हंगल) येतात, तेव्हाचा तो प्रसंग आणि त्यांचा संवाद काळीज चिरून टाकणारा आहे. ते अत्यंत कातर स्वरात म्हणतात—”जानते हो दुनिया का सबसे बडा दुःख क्या होता हैं? बाप के कंधे पर बेटे का जनाजा. ” काळीज विदीर्ण करून टाकणारे हे शब्द आहेत!

​’कुंवारा बाप’ चित्रपटात आपल्याला सापडलेल्या एका अनाथ मुलाला जीवापाड जपणारा मेहमूद आठवा….. त्या मुलाला पोलिओच्या आजारातून वाचवण्यासाठी तो जे रक्ताचं पाणी करतो, त्याचं वर्णन कोणत्या शब्दात करावं? तो प्रसंग पाहताना नकळत आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. अगदी त्रेतायुगात डोकावले, तर कैकयीला दिलेल्या वचनामुळे प्रभू रामाला जेव्हा वनवासात जावे लागते, तेव्हा पिता असलेल्या दशरथ राजाचा शोक हृदय पिळवटून टाकणारा आहे. हा कर्तव्यनिष्ठ पिता शेवटी केवळ पुत्रशोकातच आपले प्राण सोडतो.

​गीत रामायणात श्रीराम आणि लव-कुश यांच्या भेटीचा प्रसंग अत्यंत अद्भुत रीतीने वर्णन केला आहे. ‘कुश लव रामायण गाती’ हे गीत ऐकलं की डोळे भरून येतात. प्रभू श्रीरामांसमोर त्याचेच अपत्य त्याचे चरित्र गात असताना, गदिमांनी (ग. दि. माडगूळकर) शब्दांचा केवढा सुंदर चमत्कार साधला आहे:

“पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती! “

​आणि तेवढ्याच ताकदीने बाबूजींनी (सुधीर फडके) ते आपल्या सुरांनी अजरामर केले आहे. या शब्दांचा प्रत्यक्ष प्रभू रामावर काय परिणाम होतो? तर गदिमा पुढे लिहितात:

​सोडुनि आसन उठले राघव, उठुनि कवळिती अपुले शैशव

पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी जो उभया नच माहिती!

​पिता-पुत्रांच्या या भेटीला गदिमांनी ‘पुत्रभेटीचा महोत्सव’ असे अतिशय सुंदर शब्द वापरले आहेत. खरोखरच दिव्य आणि अलौकिक प्रतिभा! ज्या रामाच्या पराक्रमाला पाहून कळिकाळही थरारतो, असे कर्तव्यकठोर श्रीराम आपल्या राजासनावरून उठून चक्क त्या लहान बालकांना प्रेमाने उराशी धरतात; कारण त्यांच्यातही असतं पित्याचं प्रेमळ हृदय!  

​इतिहासाच्या पानापानांत डोकावून पाहिले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत माता जिजाऊंचे संस्कार जसे अनन्यसाधारण होते, तसेच वडील शहाजीराजांचे शौर्य, युद्धकौशल्य आणि ‘स्वराज्य’ स्थापनेची मूळ प्रेरणा ही वडिलांचीच देणगी होती. शहाजीराजांनी शिवरायांच्या पाठीवर ठेवलेला तो अदृश्य विश्वासाचा हातच होता, ज्याने एका नव्या युगाची पहाट निर्माण केली. कोणीतरी खूप सुंदर म्हटलं आहे:

​”आईकडे बोट धरून जगामध्ये कसं चालायचं हे शिकायचं असतं, पण रस्ता संपल्यावर पुढे स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, हे फक्त बाबांनीच शिकवलेलं असतं. “

​जीवनात संघर्ष करण्याची ताकद आणि वागताना हवा असणारा विवेक हा मुलाला वडिलांच्या प्रेरणेतूनच मिळत असतो.

​पण आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, वर्तमान परिस्थितीने बाबा या नात्यासमोरही अनेक नवी आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीच्या काळी वडिलांचा घरात एक वेगळा ‘दरारा’ असायचा. बाबा घरात आले की मुले शांत व्हायची, एका कोपऱ्यात जाऊन अभ्यासाला बसायची. तो काळ वेगळा होता आणि त्या काळाची शिस्त वेगळी होती. आज मात्र काळ बदलला आहे. आजचे बाबा हे केवळ शिस्त लावणारे ‘वडील’ उरलेले नाहीत, तर ते मुलांचे ‘सखे’ आणि ‘मित्र’ झाले आहेत. आजचा बाबा मुलांशी खेळतो, त्यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्या मनातले समजून घेतो; बाबांचे हे बदललेले रूप अत्यंत सुखद आणि स्वागतार्ह आहे.

​परंतु, या आधुनिक आणि धावपळीच्या युगात ‘करिअर’ आणि ‘पैशांच्या’ शर्यतीमुळे बाबांना कुटुंबासाठी हवा तेवढा वेळ देणे जिकिरीचे झाले आहे. अहोरात्र काम केल्यामुळे मुलांशी असणारा प्रत्यक्ष संवाद बऱ्याचदा मागे पडतो. आपण मुलांना महागड्या वस्तू, गॅजेट्स किंवा चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन देतो; पण त्यांना पैशांपेक्षा बाबांच्या ‘वेळेची’ आणि त्यांच्या ‘स्पर्शाची’ जास्त गरज असते, हे आजच्या पित्याला समजून घ्यावे लागेल. केवळ आर्थिक गरजा पूर्ण करणे म्हणजे पितृत्व नव्हे, तर मुलांच्या भावविश्वात प्रत्यक्ष उपस्थित राहणे, त्यांना नैतिक मूल्यांची जोड देणे ही आजची मोठी गरज आहे.

​ज्याप्रमाणे आई सुसंस्कारित असेल तर घर घडतं, तसेच बाबांचे घराकडे असणारे लक्ष, त्यांची संयमी वृत्ती आणि त्यांनी घेतलेले योग्य निर्णय यावर कुटुंबाचे संपूर्ण आरोग्य अवलंबून असते. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा पितृत्वाचा पदर जर बळकट आणि सुरक्षित राहिला, तरच येणारी पिढी कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करू शकेल. बाबा नावाच्या या आकाशाएवढ्या छत्राची सावली जपणे आणि त्यांच्या त्यागाची कृतज्ञतेने जाणीव ठेवणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे.

​थकलेल्या आणि वयस्कर झालेल्या बाबांसाठी ‘वृद्धाश्रम’ ही जागा म्हणजे शेवटचा पर्याय आहे असं मला वाटतं. घरातच त्यांना सर्वोच्च सन्मानाचे स्थान हवे. ‘नटसम्राट’ नाटक आपण सर्वांनीच पाहिले असेल; त्यातील गणपतराव उर्फ अप्पा बेलवलकर यांना आणि त्यांच्या पत्नीला वृद्धापकाळी मुलं सांभाळायला तयार होत नाहीत, तेव्हा त्यांची होणारी घालमेल काळीज हेलावून टाकते. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा ‘बागबान’ चित्रपटही याच विदारक वास्तवावर भाष्य करतो. अशी नाटकं किंवा चित्रपट पाहताना डोळ्यातून अश्रू ओघळल्याशिवाय राहत नाहीत. कोणीतरी फार सुंदर म्हटले आहे:

​”या वाळलेल्या पानांवर नेहमी जपून पाय ठेवा….. कारण, एकेकाळी याच पानांनी तुम्हाला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती! “

​आज त्या पानांना आपल्या प्रेमाच्या आणि आदराच्या सावलीची नितांत गरज आहे, हे आपण विसरता कामा नये.

© श्री विश्वास देशपांडे

३/७/२०२६

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी – ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मेघदूत -आषाढस्य प्रथम दिवसे ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ मेघदूत -आषाढस्य प्रथम दिवसे ☆ शालिनी जोशी

संस्कृत काव्यात अजरामर झालेले, कालिदासाच्या उतुंग प्रतिभेतून निर्माण झालेले विरहगीत म्हणजे मेघदूत. नावावरूनच लक्षात येतो की येथे कवीने मेघालाच दूत बनवले आहे. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हेच खरे म्हणूनच समर्थ रामदास कवीना कवीश्वर म्हणजे ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ म्हणतात. काल्पनिक कथेवर आधारित हे काव्य अनेकांना भुरळ पाडणारे खंड काव्य झाले.

कालिदास एका सुशिक्षित शास्त्रनिपुण राजकन्येचा पती होता. अगदी साधाभोळा होता. तेव्हा पत्नीने त्याला ज्ञान प्राप्तीसाठी पाठवले. तो परत आल्यावर तिने विचारले, ‘अस्ति कश्चित् वाग् विशेष:? ’ आपल्या वाणीत काही विशेष आहे? तेव्हा बुद्धिमान कालिदासांनी प्रश्नाच्या प्रत्येक शब्दाने सुरुवात होणारे काव्य रचले. अस्ति- कुमार संभव, कश्चित्- मेघदूत आणि वाग् विशेष- रघुवंश. मेघदूत हे अस्तिने सुरुवात होणारे १११ ओव्यांचे अप्रतिम विरहगीत, ज्याच्या दुसऱ्या श्लोकातील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे आषाढ प्रतिपदा हा दिवस ‘कालिदास दिवस’ म्हणून ओळखला जातो. असा हा एकमेव कवी.

मेघदूत ही हेमामाली आणि विशालक्षी या यक्ष दांपत्याची कथा आहे. यक्ष हा कुबेराचा सेवक. अलका नगरी ही कुबेराची राजधानी. कुबेराला पूजेसाठी फुले आणून देणे हे यक्षाचे काम. पण एकदा यक्षाच्या हातून कळी तोडली जाते. या चुकीची शिक्षा म्हणून एक वर्ष त्याला पत्नी विरह सहन करावा लागतो. खरं तर कळी तुटणे ही आपल्यासाठी शुल्लक गोष्ट. पण पत्नी विरहाच्या शिक्षेतून, कळीला झाडापासून तोडण्यामुळे होणाऱ्या वेदना सांगायच्या आहेत. विरहाला विरहाची शिक्षा ही कालिदासाची प्रतिमा. ही शिक्षा भोगण्यासाठी तो रामगिरीवर फिरत होता.

 कश्चित् कांता विरह गुरूणा स्वाधीकारान् प्रमतः

 शापेनास्तंगतमहिमा वर्ष भोग्येषा भर्तु:

 यक्षश्चक्रे जनकतनयास्नान पुण्योदकेषु

 स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु १

कोणी एक यक्ष शापाने, जो सहन करण्यासाठी कठिण, एक वर्ष पत्नीपासून दूर जाण्यासाठी रामगिरीवरती झोपडी करून राहू लागला. तेथे वृक्षांची घनदाट सावली होती. जनककन्यासीतीने स्थान केल्याने जलाशयतील पाणी पवित्र झाले होते. पण शापाने यक्षाचे सर्व अधिकार नष्ट झाले. (रामगिरी म्हणजे नागपूर जवळचे सध्याचे रामटेक) अशा बाह्य सौंदर्याने अंतरंगातील वेदना कशा कमी होणार?

अशा दुःखाच्या प्रसंगी त्याला आकाशातील मेघाचा आधार वाटतो. मेघासारख्या निर्जीव घटकाला संदेशवाहक बनवण्याची कल्पना कालिदासाची. त्यातून रसपूर्ण, भावकाव्य मेघदूत तयार झाले. प्रेम वेड्या माणसाला चेतन अचेतन भेद कुठून असणार? . आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुम्

वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श

काळा मोठा ढग हत्तीप्रमाणे पर्वत शिखरावर धडका मारत होता. आलींगन देत होता. यावरून त्या ढगाच्या ताकदीची त्याला कल्पना आली. तो दूत म्हणून योग्य वाटला.

आषाढाची सुरुवात त्यामुळे ढग सजल आहे, दयाळू आहे. यक्षात इतक्यात पत्नीभेट शक्य नाही म्हणून त्याच्या जीवाची तगमग. तिला निरोप देऊन आधार देण्यासाठी तो ढग.

त्याला जाण्याचा मार्ग, वाटेत येणाऱ्या अडचणी, आपले घर या सर्वांचे व स्थानांचे मोठे रसभरीत वर्णन केले आहे. वाटेल तू काय कर हे ही सांगितले आहे. वेली वरच्या कोमेजलेल्या फुलासारखी माझी पत्नी, भाऊ होऊन तिला आधार दे. कमल तंत्तूची शिदोरी घेतलेले राजाहंस तुला सोबत करतील. पर्वत शिखरावरचे ताजे पाणी तू पिऊन तहान भागव. वेळूच्या वनात रेंगाळू नको. इंद्रधनुष्य, मोराचे नृत्य, अमृत गंध तुला सुखावेल. त्यात गुंतू नको. विदिशा, उज्जैनी, अवंती मार्गे कैलास, मानस, गंगादर्शन मग अलका नगरी. तेथे नगरीच्या कुरळ्या केसांवर मोत्याच्या माळेप्रमाणे शोभून दिसशील. असे वर्णन करणारे मेघदूत हे प्रेमकाव्य, विरहगीत त्याचबरोबर उपमा, रसिकता, विज्ञान, निसर्ग, पक्षी झाडे इत्यादी सर्व वर्णन सौंदर्याने परिपूर्ण आहे. मुळात पाच ओळींची कथा १११ श्लोकात रंगवली आहे.

यातून माणसाची निसर्गाबरोबरची जवळीक स्पष्ट होते. तोच मित्र, देव होतो. त्याच्याबरोबर सुखसंवाद होतो. कारण तो ‘अरेला कारे’ करत नाही. ज्ञानोबांच्या देवाच्या विरहात कावळा, सावरकरांना मातृभूच्या विरहात सागर, विवाहितेला माहेरच्या विरहात वारा साहाय्य होतो. त्यातून भावपूर्ण काव्यनिर्मिती होते. (पुण्यातील डॉक्टर भावे यांनी रामटेकहून निघून हेलिकॉप्टरने अलका नगरीपर्यंत प्रवास केला.) यावरून कालिदासाच्या अचूक भौगोलिक ज्ञानाची कल्पना येते. हे काव्य चौथ्या ते सहाव्या शतकातील असावे. धन्य तो कालिदास आणि मेघदूत!

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खंत… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ खंत☆  कल्याणी केळकर बापट

काही वेळा असं वाटतं आपण खूप भ्रमात जगतोय, जणू स्वप्नरंजनात रमलोय की काय असा प्रश्न मनाशी पडतो. आधी भारत पारतंत्र्यात होता. इंग्रजांचे जुलूम अराजकता त्यावेळच्या लोकांनी खूप सहन केली. अत्याचाराचा सामना केला आणि खूप स्वातंत्र्य सेनानींच्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळालं, अर्थातच खूप मोलाची माणसं पण गमवून त्याची खूप जबरी किंमत मोजली आपण सगळ्यांनी.

स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली. आपण स्वमर्जीने निवडून दिलेले आपले प्रतिनिधी सरकार बनवून सगळा कारभार बघायला लागले. देश चालवणे, सगळ्यांचे हित जोपासून निःपक्षपातीपणे सगळा देश चालवणे म्हणजे काही येरागबाल्याचे काम नव्हे. आपण समस्त डोळे झाकून ह्या सगळ्या प्रतिनिधींवर जबाबदारी टाकून निर्धास्त राहू लागलो. जे करतील ते आपल्या हिताचं, फायद्याचं असत ह्यावर डोळेझाकून विश्वास ठेवायला लागलो.

काही वेळी जनतेला असे अनुभव आलेत की त्या लोकप्रतिनिधींवरील विश्वास डळमळू लागला. ह्याचबरोबर जनता सुशिक्षित, सुजाण झाली, आपलं हित त्यांना कळायला लागलं, प्रगती कडे त्यांची पावलं वळायला लागली, विकासाकडे मन ओढ घेऊ लागलं. आणि हे सगळ साध्य करायचच ह्या निश्चयाने त्यांनी सत्ताबदल सुद्धा केला. आता मनासारखं सगळं झालं त्यामुळे आता प्रगती, विकास, अच्छे दिन मिळणारच ह्याची प्रत्येक नागरिकाला खात्रीच पटली.

काळ बदलला, दिवस पालटले, नवीन पिढी खूप खूप शिकू लागली, उद्योगधांना चालना मिळाली, पण मनात मात्र खूप सारे प्रश्न साचू लागले. उच्चशिक्षित प्रजा वाढू लागल्यावर निश्चितच समंजसपण, चांगली वृत्ती, मेहनतीच्या जोरावर इप्सित ध्येय गाठणे हे ओघानेच आले, पण विचार आला, खरंच असं दृश्य बघायला मिळतं का, निदान सरसकट बघता तरी हे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. खुप प्रगती झाल्याने खरंतर कुणालाच काहीच फुकट देण्याची देशाला गरज पडायला नको पण इकडे तर सगळेच उलटे मूठभर करदात्यांच्या जीवावर ढीगभर जनतेला वेगवेगळ्या स्वरूपात खिरापत वाटणे सुरूच. जेव्हा आपल्याकडील जनता घरी गाडी घोडी, बंगला असताना, स्वतः चांगली नोकरी करून बक्कळ पगार घेऊन वर “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत अनुदान घेताना जनतेची कीव करावी की ते अनुदान खोटेपणाने लाटणाऱ्या बहिणींची कीव करावी की अभ्यास न करता निव्वळ मतांसाठी ते सढळ हाताने देणाऱ्या त्या देशसेवक प्रतिनिधींची कीव करावी ते कळत नाही.

नुकतीच नीट परीक्षा नीट न घेण्याची शाई वाळते न वाळते तोच आज दुसऱ्या अजून एका शिक्षकांच्या परीक्षेची पेपर फुटीची बातमी कळली. खूप मेहनतीने खडतर परिस्थितीत परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना काय काय समस्यांना तोंड द्यावे लागत असेल ह्याची सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे तरीही अशा भोंगळकारभाराने, मूठभर अप्रामाणिक लोकांमुळे कठीण परिस्थिती उद्भवलीय आणि ते ही जनता जनार्दनाच्या खिशातूनच. कमी उत्पन्नाचे खोटे दाखले आणून सवलती घेणाऱ्यांची खरंच कीव येते, नुसते दरिद्री रेषेखालील हे लोक नसून हे कर्माने दरिद्री असतात. असं स्वतः चा वैयक्तिक फायदा करून घेऊन देशाचे कुठले हित साध्य होते हे एक न उलगडलेलं कोडंच.

अर्थात ही सगळी खंत कुठल्याही अमुक एका पक्षाविरुद्ध, अमुक एका व्यक्तीबद्दल नसून ही सगळी खालावलेल्या, पातळी सोडलेल्या मनःस्थिती विरुद्ध आहे हे कृपया सुजाण वाचकांनी लक्षात घ्यावे.

©  कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘वादळांना दिशा नसते.. जहाजांना असावी लागते’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘वादळांना दिशा नसते.. जहाजांना असावी लागते’ ☆ श्री दिवाकर बुरसे

वादळांना दिशा नसते; जहाजांना असावी लागते

 मनाच्या सागरात ध्येयाचा दीपस्तंभ उभा राहिला की नकारात्मक विचारांचे धुके विरायला लागते.

 मानवी इतिहासातील प्रत्येक महान प्रवासाचा आरंभ एका दिशेपासून झाला आहे. “

 समुद्राला वादळांची भीती नसते.

वादळं त्याच्या स्वभावात असतात.

प्रत्येक वादळानंतर काही जहाजं किनाऱ्यावर पोहोचतात आणि काही समुद्रात हरवून जातात.

 भेद लाटांमध्ये नसतो.

जहाजांच्या डोळ्यांत असतो.

ज्यांच्या दृष्टीपुढे दीपस्तंभ असतो, ती जहाजं धुक्यातही मार्ग शोधतात.

ज्यांच्या दृष्टीपुढे निश्चित दिशा नसते, ती शांत पाण्यातही भरकटतात.

 मनाचंही असंच असतं.

भूतकाळाची खंत,

भविष्याची भीती,

 स्वतःबद्दलच संशय,

 “माझ्याकडून काही होणार नाही… “

“माझी वेळ निघून गेली… “

“लोक काय म्हणतील?”

 

हे असले विचार नवीन नाहीत. मानवजातीइतकेच पुराण आहेत.

पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे—ते रिक्त मनातच सर्वाधिक वाढतात.

रिकाम्या घरात प्रतिध्वनी अधिक ऐकू येतात.

रिकाम्या बंदरात वाऱ्यांचा ध्वनी मोठा वाटतो आणि रिकाम्या मनात शंका सत्यासारख्या वाटू लागतात !

 

 मानसशास्त्र सांगतं— मनाला जर अर्थपूर्ण दिशा मिळाली नाही, तर ते स्वतःच चिंता निर्माण करू लागतं.

 नकारात्मक विचारांचा सर्वात मोठा शत्रू सकारात्मक विचार नसतो, तो असतो—अर्थपूर्ण कृती.

संत तुकारामांचा अभंग आजही काळाच्या पल्याडून ऐकू येतो—”मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ”

ही ओळ आनंदाचा उपदेश नाही,

 ही ओळ दिशेचा उपदेश आहे –

 

प्रसन्न मन म्हणजे दुःख नसलेलं मन नव्हे; प्रसन्न मन म्हणजे दुःखापेक्षा मोठं ध्येय सापडलेलं मन !

 काळ्या पाण्याची शिक्षा.

समोर अथांग जलधी.

भोवती अभेद्य भिंती.

हाता – पायात निर्दय शृंखला.

जगाशी संबंध तुटलेला.

पण त्या अंधाऱ्या बंदिगृहातही एक गोष्ट जिवंत होती—स्वातंत्र्याचं ध्येय.

 

ज्यांनी सागराला स्वातंत्र्याची शपथ घेतली, त्यांना समुद्राच्या मधोमध उभारलेल्या कारागृहाने कसं रोखलं असतं?

 साखळदंडांनी केवळ हात जखडले, विचार नाही.

भिंतींनी शरीर अडवलं, क्षितिज नाही.

ज्यांच्या मनात ध्येयाचे स्थंडिल धगधगत असते त्यांना परिस्थिती हरवत नाही; ती केवळ त्यांची परीक्षा घेते.

 

एक राजपुत्र राजवाडा सोडून निघाला.

एका कृश वकिलाने ‘सूर्य कधीही न मावळणाऱ्या’ साम्राज्याच्या डोळ्यात डोळे घातले.

एका बहिष्कृत मुलाने शिक्षणाच्या बळावर इतिहासाला नवा अर्थ दिला.

एका मासेमाऱ्याच्या गावात वाढलेल्या मुलाने आकाशाला स्पर्श करण्याचं धाडस केलं.

 

इतिहासातली मोठी माणसं मोठ्या परिस्थितीत जन्माला आली म्हणून मोठी झाली नाहीत. ती मोठी झाली कारण त्यांच्याकडे स्वतःपेक्षा मोठं ध्येय होतं.

 ध्येय म्हणजे केवळ ‘करिअर’ नाही.

 ध्येय म्हणजे सकाळी उठण्याचं कारण, रात्री झोपण्यापूर्वीची शांतता.

ध्येय म्हणजे पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याचं मनोबल आणि उद्याच्या दिशेने टाकलेलं आजचं पाऊल.

ध्येय म्हणजे अंतिम गंतव्य नाही.

ध्येय म्हणजे प्रवासाला मिळालेला उत्तरतारा.

 तो वादळं थांबवत नाही, पण तो भरकटूही देत नाही.

 

नकारात्मक विचारांना हरवायचं असेल तर त्यांच्याशी झुंज देण्यात अर्थ नाही.

अंधाराशी भांडून का कधी प्रकाश निर्माण होतो ?

तिथे दिवाच लावावा लागतो !

 

 तुमचं ध्येय लिहून ठेवा.

त्याचे लघु लघु भाग करा.

प्रत्यही एक पाऊल टाका.

प्रत्येक भीतीला विचारा—”तू सत्य आहेस, की केवळ माझी कल्पना?”

 

मनाला जर काम दिलं नाही, तर ते झालेले व्रण मोजत बसतं.

मनाला दिशा दिली नाही, तर ते भीतीचे नकाशे काढत राहतं. मनाला ध्येय दिलं नाही, तर ते शंकांची शेती करू लागतं.

 

 समर्थ रामदासांच्या अश्वासक वचननांचा ध्वनी आजही कानी निनादतो —”केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे. ”

त्याच वेळी जीवन कुठेतरी हळूच गुणगुणत राहतं—”रुक जाना नहीं… “

 

जीवनात पराभव नसतात, असतात केवळ दोन प्रकारचे प्रवासी—एक ते, जे चक्रावून वादळांकडे पाहतात, आणि दुसरे ते, जे एकटक दीपस्तंभाकडे पाहतात.

 अखेर माणूस जगतो तो केवळ श्वासांवर नाही…

तो जगतो एखाद्या अपूर्ण स्वप्ना च्या पूर्ततेसाठी,

 एखाद्या अजून न गाठलेल्या क्षितिजासाठी,

 एखाद्या अजून न लिहिलेल्या इतिहासासाठी.

 

 ज्या दिवशी माणसाला स्वतःपेक्षा मोठं असं एखादं ध्येय सापडतं, त्या दिवशी त्याच्या आयुष्यातील सगळे प्रश्न सुटतात असं नाही,

वादळं थांबतात असं नाही,

धुकं विरत असही नाही,

 पण त्याला प्रश्नांपेक्षा मोठा मार्ग सापडतो !

 

अनेकदा—मार्ग सापडणं हे उत्तर सापडण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं.

 म्हणून मनात वादळ उठलं, तर वाऱ्यांना दोष देऊ नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा—”माझ्या समुद्रात दीपस्तंभ आहे का?” कारण…

वादळांना दिशा नसते, जहाजांना असावी लागते!

 वादळं येतील.

धुकं दाटेल.

लाटा आदळतील.

पण जर दीपस्तंभ जळत असेल,

तर जहाजं हरवत नाहीत.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संवादाचा अभाव” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “संवादाचा अभाव☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात आजही अनेक कुटुंबांमध्ये विवाहाचा अंतिम निर्णय पालकच घेतात. मुलगा किंवा मुलगी यांची संमती विचारली जाते; पण अनेकदा ती केवळ औपचारिकता ठरते. स्पष्ट नकार देण्याचे स्वातंत्र्य अनेक तरुण-तरुणींना प्रत्यक्षात मिळत नाही. आई-वडिलांचा शब्द अंतिम, घराण्याची प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल? किंवा इतके चांगले स्थळ शोधून आणले आहे, अशा दबावांमुळे अनेक तरुण-तरुणी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय स्वीकारतात. अशा वातावरणात मुक्त संवादाची जागा भीती, मौन आणि कधीकधी तर क्रूर कृत्य करण्यास भाग पाडतात. परिणाम सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरीशी संगनमत करून थंड डोक्याने केतन अगरवालचा लोहगडच्या दरीत ढकलून केलेला खून.

मुलांना स्वतःच्या भावना, मत किंवा नकार मोकळेपणाने व्यक्त करता येत नसतील, तर समस्या अधिक गुंतागुंतीची बनते. दडपलेला विरोध, मानसिक ताण, असहाय्यता किंवा संताप कधी कधी चुकीच्या आणि विनाशकारी मार्गाने बाहेर पडू शकतो. अर्थात, कोणत्याही गुन्ह्याचे समर्थन यामुळे होत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतीसाठी कायदेशीरदृष्ट्या जबाबदार असते. परंतु समाजशास्त्राचा उद्देश केवळ दोषी शोधणे नसून अशा घटना घडण्यामागील सामाजिक परिस्थिती समजून घेणे हा असतो.

पालकांनी मुलांच्या आयुष्याबाबत निर्णय घेताना त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. विवाह हा दोन कुटुंबांचा नव्हे, तर दोन व्यक्तींचा दीर्घकालीन सहजीवनाचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये स्पष्ट, निर्भय आणि प्रामाणिक संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. मुलाने किंवा मुलीने नाही म्हटले, तर त्या नकाराचा आदर करण्याची मानसिक तयारी पालकांमध्ये असली पाहिजे. नकार म्हणजे अवज्ञा नव्हे; तो व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे अशा घटना समाजासाठी इशारा असतात. त्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की, विवाहसंस्थेत संवादाला किती महत्त्व दिले जाते, मुलांच्या इच्छेला किती स्थान दिले जाते आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रिया किती लोकशाहीवादी आहे. संवाद, परस्पर सन्मान आणि स्वायत्तता यांचा अभाव असेल, तर त्याची किंमत कधी कधी संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागू शकते.

घटना घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच संवादाने प्रश्न सोडवला तर नंतर डोक्याला हात लावून बसायची पाळी येणार नाही, हे आपली कुटुंबव्यवस्था केव्हा समजून घेईल?

© श्री जगदीश काबरे

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… पंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथापंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

पंढरीचे वर्णन

भूतलावरील वैकुंठ, पंढरपूर या श्रीक्षेत्राचे वर्णन आणि महात्म्य सांगणाऱ्या गाथेतील अभंगांचे आपले विवेचन चालू आहे. आज आणखी काही अभंग पाहूया.

पंढरपूर कसे आहे, तेथे काय काय चालते याचे वर्णन करणारा हा एक फार सुंदर अभंग पहा.

जववरी नाही देखिली पंढरी/

वर्णीशील थोऱी वैकुंठीची//

मोक्ष सिद्धी तेथे हिंडे दारोदारी/

होऊनी कामारी दीनरूप//

वृंदावन सडे चौक रंगमाळा/

अभिनव सोहळा घरोघरी//

नामघोष कथा पुराण कीर्तनी/

ओवीया कांडणी पांडुरंग//

सर्व सुख असे तेथे सर्वकाळ/

ब्रह्म ते केवळ नांदतसे//

तुका म्हणे जे न साधे सायासे/

प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी//

तुकाराम महाराज भक्ताला सांगतात, ” जोपर्यंत तू पंढरपूर पाहिले नाहीस, तोपर्यंत तू वैकुंठाची थोरवी वर्णन करशील. या पंढरपुरात सिद्धी आणि मोक्ष सांगकामे(कामारी) होऊन दारोदार दीनपणे हिंडत असतात. अर्थात ज्याचे पाय पंढरपुरास लागतात, त्याला मोक्षप्राप्ती नक्की होते. इथे घरोघरी तुळशी वृंदावने आहेत, रस्ते झाडून जागोजागी सडासंमार्जन आणि रांगोळ्या घातलेल्या दिसतात. घरोघरी अभिनव सोहळे चालू आहेत. कथा, पुराणे, कीर्तने, नामघोष होत आहेत. दळण- कांडण करताना स्त्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या गात आहेत. या इथे सर्वकाळ सर्व सुखे असून मूर्तीमंत ब्रह्माचा वास आहे. मोठ्या कष्टाने जे प्राप्त होऊ शकत नाही, ते ब्रह्म या ठिकाणी प्रत्यक्ष विटेवर उभे आहे.

होय होय वारकरी/ पाहे पाहे रे पंढरी//

काय करावी साधने/ फळ अवघेची येणे//

अभिमान नुरे/ कोड अवघेची पुरे//

तुका म्हणे डोळा/ विठोबा बैसला सावळा//

पुढे महाराज भक्तांना सांगतात की, वारकऱ्यांनो पंढरीचे दर्शन घ्या. बाकीच्या साधनांची काही जरुरी नाही. सर्व फळ या पंढरपुरातच मिळते. अभिमान राहत नाही.

(या ठिकाणी अभिमानाचा अर्थ देहाभिमान असा आहे) सर्व मनोकामना पूर्ण होतात. डोळ्यामध्ये सावळ्या विठ्ठलाचे रूप भरून राहते, त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.

पंढरीसी जाये/ तो विसरे बाप माय//

अवघा होय पांडुरंग/ राहे धरुनिया अंग//

नलगे धन मान/ देह भावे उदासीन//

तुका म्हणे मळ/ नाशी तात्काळ ते स्थळ//

यासाठी वारकऱ्यांनो पंढरपुरी जा, तेथील पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर तुम्ही तुमचे मायबाप विसराल. याचाच अर्थ असा तुम्हाला प्रापंचिक आसक्ती राहणार नाही. तुम्ही स्वतःच पांडुरंग रुपी व्हाल आणि त्याच स्थितीत राहाल. कसलाच अभिमान न राहता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धनद्रव्य, मानसन्मान याची इच्छा तुमच्या ठिकाणी राहणार नाही, कारण देहाविषयी तुम्ही उदास व्हाल. पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरूपी मळाचा विनाश करणारे आहे.

पंढरीचा महिमा कसा अगाध आहे, याचे वर्णन तुकाराम महाराज या खालील अभंगात करतात.

पंढरीस दुःख न मिळे ओखदा/

प्रेम सुख सदा सर्वकाळ//

पंढरपुरात निरंतर पांडुरंगाचे प्रेम सुख असल्यामुळे दुःख औषधालाही (ओखदा) मिळत नाही.

पुंडलिके हाट भरियेली पेठ/

अवघे वैकुंठ आणियेले//

पंढरपुरीची पेठ भक्त पुंडलिकाने वसविली असल्यामुळे त्याने तेथे संपूर्ण वैकुंठ आणले आहे.

उदीमासी तुटी नाही कोणा हाणी/

घेउनिया धणी लाभ घेती//

या ठिकाणी व्यापार-उदीमात खोट कधीच येत नाही. नुकसान जराही नसून फायदाच फायदा आहे.

पुरले देशाशी भरले सिगेसी/

अवघी पंचक्रोशी दुमदुमित//

या पेठेत विठ्ठल हाच माल आहे. देशाला पुरेल एवढा माल शिगोशीग भरला आहे. पंढरीची पंचक्रोशी अशी या मालाने दुमदुमून गेली आहे.

तुका म्हणे संता लागलीसे धणी/

बैसले राहोनी पंढरीस//

सर्व संतांना येथे फार तृप्ती, समाधान लाभले आहे. कारण विठू माऊली त्यांना भेटली आहे, म्हणून ते पंढरीतच वास करून राहिले आहेत.

सुरवर येती तीर्थे नित्य काळ/

पेठ त्या निर्मळ चंद्रभागा//

साक्षभूत नव्हे सांगितली मात/

महिमा अत्यद्भूत वर्णवेना//

पंचक्रोशीमाजि रीघ नाही दोषा/

जळती आपैसा अघोर ते//

निर्विषय नर चतुर्भुज नारी/

अवघा घरोघरी ब्रह्मानंदू//

तुका म्हणे ज्यापे नाही पुण्यलेश/

जारे पंढरीस घेई कोटी//

चंद्रभागारुपी ही पेठ अतिशय शुद्ध आहे म्हणून इथे देवही येतात आणि सारी तीर्थेही येतात. ही गोष्ट नुसती ऐकीव नाही किंवा सांगोवांगी नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेली आहे असे तुकाराम सांगत आहेत. या पेठेचा अद्भुत महिमा वर्णन करण्यास शब्द नाहीत.

या पंचक्रोशी मध्ये कोणत्याही दोषांना प्रवेश नाही. संचितात जे काही मोठे दोष असतील ते येथे आपोआप गळून जातात. या ठिकाणी स्त्रिया- पुरुष चतुर्भुज निर्विषय देवाप्रमाणे विषयहीन आहेत. त्यांच्या काम- वासना जळून गेल्या आहेत. घरोघरी ब्रह्मानंद आहे. ज्यांच्यापाशी पुण्याचा लवलेश नाही, त्यांनी पंढरीस जाऊन लागेल तेवढे पुण्य प्राप्त करून घ्यावे.

या अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

अवघीच तीर्थे घडली एक वेळा/

चंद्रभागा डोळा देखिलिया//

अवघीच पापे गेली दिगंतरी/

वैकुंठ पंढरी देखिलिया//

अवघिया संता एक वेळा भेटी/

पुंडलिक दृष्टी देखिलिया//

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक/

विठ्ठलची एक देखिलिया//

ज्याने चंद्रभागेचे दर्शन घेतले, त्याला सकल तीर्थांचे स्नान घडले. एवढे हे दर्शन पुण्यकारक आहे. भूतलीचे हे वैकुंठ, पंढरपूर पाहिले असता सर्व पातके नाहीशी होतात, दिगंतरात जातात. एका पुंडलिकाचे दर्शन घेतले की सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ होतो आणि एका विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने आपण जन्माला आल्याचे सार्थक होते.

असा आहे हा पंढरीचा महिमा. चला तर मग पंढरीसी जाऊ /विठू माऊलीला/

डोळा भरू पाहू//

क्रमशः… २८

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग २ – ‘आई’ (मायेची पैठणी) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग २ – ‘आई’ (मायेची पैठणी) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नात्यांचं महावस्त्र – ‘आई’ (मायेची पैठणी)

​ज्याच्याशिवाय नात्यांचं हे महावस्त्र जन्मालाच येऊ शकत नाही, असा या वस्त्रातील एक अनोखा आणि सर्वात मौल्यवान पदर म्हणजे ‘आई’. नात्यांच्या या वस्त्रातील ती खरी सुवर्णमयी ‘पैठणी’ असते. विधात्याने अत्यंत कुशलतेने आणि निगुतीने घडवलेली! ज्यामुळे आपण या जगात येतो आणि आपल्याला आपली ओळख मिळते असे एक नाते म्हणजे आई. प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला, तेव्हा त्यालाही आईमुळेच सर्वश्रेष्ठ ओळख मिळाली. राम झाला कौसल्यानंदन, कृष्ण झाला देवकीनंदन. अंजनेय(हनुमंत)आणि राधेय(कर्ण) हे देखील आपल्या आईच्या नावामुळेच ओळखले गेले. ‘ आईची महती ‘ एवढी थोर की जगातल्या अनेक थोर साहित्यिकांनी तिच्यावर भरभरून लिहिले.

​’आई’ हा शब्द जरी उच्चारला, तरी डोळ्यांसमोर प्रेमाची अशी एक मूर्ती उभी राहते जी वैश्विक आहे. माणूस असो वा प्राणी, भारत असो की जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश; आईचे प्रेम सर्वत्र सारखेच असते. म्हणूनच मी आईला प्रेमाची वैश्विक मूर्ती म्हणतो. इतरांचं प्रेम भलेही ‘माया’ असेल, पण तिचं प्रेम म्हणजे ‘आभाळमाया’! आपल्या मुलांवर असलेली तिच्या प्रेमाची शाल केवळ ऊब देत नाही, तर एक अभेद्य कवच बनून आयुष्यभर त्यांचे रक्षण करते. “घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी… ” तशी आई शरीराने कुठेही असली, तरी तिचे चित्त मात्र सदैव आपल्या लेकरापाशीच असते.

​परमेश्वराने तिला पृथ्वीवर पाठवतानाच तिच्या काळजात ‘अखंड माया’ भरून पाठवली आहे. आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप. कोणीतरी खूप छान म्हटलं आहे की, परमेश्वराला सगळीकडे उपस्थित राहणे शक्य नाही म्हणून त्याने आईला पाठवले आहे. ती स्वतः उपाशी राहील, पण लेकराचं पोट भरल्याशिवाय तिचं पोट भरत नाही. तिची स्वतःची झोप होवो न होवो, आपल्या तान्हुल्याची झोप नीट व्हावी म्हणून तिची धडपड असते. “निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टी सारखी धरी” अशी तिची अवस्था असते. जी स्त्री जन्माला येते, अशी प्रत्येक स्त्री ‘बाई’ होते; पण तिचे बाईपण ‘आई’ झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यासाठी तिने मुलाला जन्म दिलाच पाहिजे अशी काही अट नसते, तिला फक्त ‘आई’ होता आलं पाहिजे, मायेचं पांघरूण घालता आलं पाहिजे. किंबहुना, आई होण्यासाठी स्त्री असण्याचीही अट नाही; ज्याच्या हृदयात सगळ्यांबद्दल प्रेम आणि कळवळा काठोकाठ भरला आहे, अशी कोणतीही व्यक्ती आई होऊ शकते.

​पंढरपूरला विटेवर उभा असलेला पांडुरंग सर्व भाविकांचे, वारकऱ्यांचे दैवत. हा सावळा विठ्ठल काही करत नाही, काही बोलत नाही, काही देत नाही आणि घेतही काही नाही. पण तो ‘विठू माउली’ झाला. का बरं? कारण तो सगळ्यांचं दुःख ऐकून घेतो, सगळ्यांना उराशी धरतो. त्याच्याजवळ कोणताच भेदभाव नाही. तो जरी बोलत नसला, तरी सगळ्यांना खात्री असते की “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असा आशीर्वाद प्रत्येकाला तो नक्कीच देतो.

​”ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती. “

जिच्यामुळे हे विश्व निर्माण झाले अशी माता पार्वती जगज्जननी झाली. आमचे संत देखील ‘माउली’ झाले. समाजाने ज्यांचा अपार छळ केला, तरीही ज्यांच्या मुखातून विश्वाच्या कल्याणासाठी ‘पसायदान’ नावाचे अमृत बाहेर पडले, ते संत ज्ञानेश्वर म्हणूनच ‘ज्ञानेश्वर माउली’ झाले. अहिल्याबाई होळकर लोकांसाठी समाजसेवेची अनेक कामे करून ‘लोकमाता’ झाल्या. अनाथ, निराधार मुलांवर मायेचे छत्र धरणाऱ्या सिंधूताई सपकाळ याच व्यापक मातृत्वाचे रूप झाल्या. ज्या आदीवासी, अशिक्षित स्त्रियांनी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन वृक्षांचे संरक्षण केले, त्या वृक्षमाता झाल्या. अशी मातेची अनेक रूपे.

​आपल्या मुलांवर प्रेम करते ती ‘आई’; सर्वांबद्दल प्रेमभाव जिच्या मनात असतो ती ‘माता’; आणि अखिल विश्वाला कवेत घेणारी अपार माया जिच्या काळजात असते, ती ‘माउली’!

​”न मातु: पर दैवतम” असे आपल्याकडे म्हटले जाते; म्हणजेच आईसारखे दुसरे दैवत नाही. इतर देवतांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते, नवस बोलावे लागतात. पण हे मातृत्व नावाचे दैवत असे आहे की, त्याला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही उपासना करावी लागत नाही. तिच्या पोटी केवळ जन्म घेतला, की ही देवता प्रसन्न होते आणि आयुष्यभर त्या बाळाची काळजी वाहते. प्रसूती वेदना काय असतात, ते फक्त माताच जाणे! पण जेव्हा ते नवजात अपत्य ती पहिल्यांदा आपल्या जवळ घेते, तेव्हा तिच्या त्या प्रसववेदनांचे शीतल चांदणे होऊन तिच्या मुखावर एक अद्भूत हास्य विलसते. तिच्या उरातील माया अमृत होऊन तिच्या स्तनातून बाळासाठी पाझरू लागते. तिच्या कुशीत जेव्हा तिचं बाळ असतं, तेव्हा ती जगातली सर्वात समृद्ध स्त्री असते. आयुष्याच्या विद्यापीठातली ‘आई’ नावाची सर्वोच्च पदवी निसर्गाने तिला बहाल केलेली असते.

​बाळ अजाणतं असतं, असहाय असतं, त्याला काहीच करता येत नाही तेव्हापासून आई त्याला सावरते. जेव्हा त्याच्या चिमुकल्या ओठांतून ‘आई’ हा पहिला शब्द उमटतो, तेव्हा तिच्या काळजाचा झालेला आनंद गगनात मावत नाही. याच एका शब्दासाठी ती नऊ महिने नऊ दिवस आसुसलेली असते. मग ती हळूहळू त्या सानुल्याला बोलायला शिकवते, पाऊल पाऊल टाकत चालायला शिकवते आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे करते. तीच त्याची पहिली शाळा आणि पहिला गुरू असते. या शाळेत कुठलीही फी नसते, उलट काळजी आणि प्रेम मात्र अपार असते.

​बाळ जसजसं मोठं होतं, तसतसं तिचं काळीज आनंदाने फुलत जातं. बाळाच्या पंखात ताकद येते आणि ते स्वतःचे आभाळ शोधायला उडू लागतं. पण कधी कधी, आकाशात उंच भरारी घेणाऱ्या या पाखराचे लक्ष जमिनीवर एकटीच बसलेल्या आपल्या वृद्ध आईकडे जात नाही. अशा वेळी ती केवळ दोन शब्दांच्या प्रेमासाठी आसुसलेली असते. आता तिच्या पंखातले बळ कमी झालेले असते. आता वेळ असते त्या मुलाची—परतफेड करण्याची. खरं तर, आईच्या ऋणातून मुक्त होणे किंवा त्याची परतफेड करणे जन्मांतरातही शक्य नाही, पण कृतज्ञतेने त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्कीच करता येतो.

​आई नावाच्या नात्याचा परिसस्पर्श ज्यांच्या आयुष्याला झाला, त्या आयुष्याचं सोनं झालं! कौसल्येने रामाला घडवलं, यशोदेने कृष्णाला, जिजाऊ मातेने छत्रपती शिवरायांना, भुवनेश्वरी देवींनी स्वामी विवेकानंदांना, आणि ‘श्यामच्या आई’ने साने गुरुजींना घडवले. असा हा मातृमहिमा अपार आहे.

​सखोल आणि योग्य मार्गदर्शन आणि अचूक निर्णयक्षमता यासारख्या गोष्टी म्हणजे आईच्या सल्ल्याचे वैशिष्ट्य! आईनं ज्यांना मार्गदर्शन केलं आणि आईचा सल्ला ज्यांनी शिरोधार्य मानला, त्यांनी जीवनामध्ये फार मोठे कार्य करून दाखवले आणि ते यशस्वी झाले. पांडवांनी आपल्या माता कुंतीचा सल्ला प्रत्येक वेळी शिरोधार्य मानला; त्याच वेळी त्यांचे बंधू असलेल्या कौरवांनी मात्र आपल्या आईचा (गांधारीचा) सल्ला नेहमीच धुडकावून लावला. या दोन्ही गोष्टींचे परिणाम काय झाले, याची साक्ष महाभारतात आपल्याला मिळते. पांडवांना सर्वत्र विजय मिळाला आणि कौरवांचा मात्र पराभव झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील माता जिजाऊंचा सल्ला प्रत्येक प्रसंगी शिरोधार्य मानला, म्हणूनच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले.

​आई या नात्याचे अनेक पदर आहेत. गुरूची पत्नी जेव्हा ‘गुरुमाता’ होते, तेव्हा ती आश्रमातील सर्व बटूंना स्वतःच्या मुलासारखे सांभाळते. वशिष्ठांच्या आश्रमात जेव्हा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा निघताना प्रभू रामचंद्रांनी गुरुमातेचे पाय धरून म्हटले, “तुम्ही आईच्या मायेने आम्हाला सांभाळले, कशाचीच उणीव भासू दिली नाही. आमच्या वागण्यात काही चुकले असेल, तर आईच्या मायेने आम्हाला क्षमा करा. ” खरोखरच धन्य ती गुरुमाता आणि धन्य ते संस्कारी भावंडे! रामायणाने अशी नाती कशी जपावीत याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. रामाला वनवासात पाठवले म्हणून जग कैकयीला दोष देत असताना, राम लक्ष्मणाला समजावतो, “आई कोणीही असो, ती सदैव आदरणीयच असते. मला वनात पाठवण्यामागे तिचा नक्कीच काहीतरी चांगला उद्देश असेल. माझ्या शिक्षणात काही उणीव राहिली असेल, ती पूर्ण करण्यासाठीच ही वनाची योजना असावी. ” ही उदात्तता आजच्या पिढीने शिकायला हवी.

​ज्याच्या डोक्यावर मातृछत्र छाया धरून असतं, त्याच्या भाग्याची थोरवी काय वर्णावी? प्रत्यक्ष परमेश्वराला देखील हे भाग्य लाभत नाही म्हणून तो सुद्धा मानवी अवतार धारण करून पृथ्वीवर येतो. ‘दिवार’ या चित्रपटातील एक संवाद मला आजही आठवतो. त्या चित्रपटात इन्स्पेक्टर असलेला शशी कपूर आणि चोराची भूमिका करणारा अमिताभ यांच्यातील संवाद फार लोकप्रिय झाला होता. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, “मेरे पास गाडी है, बंगला है, नोकर चाकर, पैसा है… तुम्हारे पास क्या है? ” तेव्हा शशी कपूरने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, “मेरे पास माँ है! ” आईची बरोबरी कशानेच होऊ शकणार नाही, कुबेराची संपत्ती देखील तिच्या तुलनेत फिकी आहे.

​पण आज आम्हाला केवळ या महापुरुषांची आणि त्यांच्या मातांची थोरवी सांगून भागणार नाही. असे सुपुत्र आजच्याही काळात घडावेत आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता धन्य व्हाव्यात, ही भारतभूमी धन्य व्हावी, ही काळाची गरज आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा; जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. ही सुसंस्कारी मूर्ती घडवण्याची पहिली आणि मुख्य जबाबदारी आईची असते. खाण तशी माती असे आपण म्हणतो. आई जर सुसंस्कारित आणि सुशिक्षित असेल तर तिची मुले सुद्धा तशीच होतील. अशा आया घरोघरी असतील तर सुसंस्कारित समाज निर्माण होईल.

​वर्तमानकाळातील मातांपुढे आजच्या युगाने खूप मोठी आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीची आई मुख्यतः ‘गृहिणी’ होती, त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ असायचा. आजच्या आईला मात्र नोकरी, करिअर आणि घर अशी दोन्ही आघाड्यांवर दुहेरी कसरत करावी लागते. कधी कधी यामुळे तिच्या मनात एक अनामिक ‘अपराधित्व’ (Guilt) डोकावते की, मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही. पण अशाही परिस्थितीत ती आपला पदर खोचून खंबीरपणे उभी आहे. ती केवळ मुलांचे संगोपन करत नाही, तर आपल्या कर्तृत्वाने मुलांसमोर स्वावलंबनाचा एक नवा आदर्श ठेवत आहे.

​तथापि, बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर आजच्या आईला काही जाणीवपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबा, काका-काकू असायचे, मुलांवर सहज संस्कार व्हायचे. आज बहुतेक घरात एकच मूल असते आणि ते एकलकोंडे होते. आजी-आजोबांच्या गोष्टींचे माध्यम आता बऱ्याच घरांतून नाहीसे झाले आहे. मुले पाळणाघर किंवा प्ले-ग्रुपमध्ये वाढतात, पण तिथे आवश्यक कौटुंबिक संस्कार मिळतीलच असे नाही; ही पोकळी आईलाच भरून काढावी लागेल.

​आजची मुले ‘डिजिटल’ युगातली आहेत. ती नुसते सांगून किंवा उपदेश ऐकून शिकत नाहीत; त्यांच्यासमोर स्वतःचा आदर्श ठेवावा लागतो. “सारखा मोबाईल पाहू नकोस, पुस्तक वाच, अभ्यास कर” असे ओरडून मुले ऐकणार नाहीत. आई-बाबांनी कामावरून आल्यावर स्वतः मोबाईल आणि टीव्ही बाजूला ठेवून हातात एखादे चांगले पुस्तक धरले, तर मुलेही त्याचे अनुकरण करतील. आईचा पदर आणि तिची अंगाई यातून जी भावनिक ऊब मुलाला मिळते, ती ‘यूट्यूब’वरील बालगीतांमधून कधीच मिळू शकत नाही, हे आजच्या मातेला समजून घ्यावे लागेल. सुट्टीच्या दिवशी पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा, घरातील छोटी-मोठी कामे करताना त्यांना सोबत घेतले, तर श्रमाची आणि जबाबदारीची सवय त्यांना आपोआप लागेल.

​नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा मातृत्वाचा पदर जर संस्कारांनी आणि ओलाव्याने संपन्न राहिला, तरच पुढची पिढी निकोप आणि सुदृढ होईल. आई नावाच्या या पैठणीची जरतारी चमक कधीच फिकी पडू न देणे, ही आजच्या प्रत्येक मुला-मुलीची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे.

(पुढील भाग दर रविवारी)

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निर्णयामागचं गुपीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? विविधा ?

निर्णयामागचं गुपीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

साधं, थोडसं गबाळं असणं हेच डी-मार्टचं हे खरं रूप आहे. हाच २. ८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

डी-मार्टमध्ये शिरलात की तुम्हाला असं वाटतंच वाटतं की हे दुकान किती ‘विस्कळीत आणि अस्ताव्यस्त’-थोडसं बॉइज होस्टेलच्या रुमसारखं आहे ? जमिनीवर पडलेले खोके, डोळ्यांना त्रास देणारे पांढरे शुभ्र ट्यूबलाईट्स आणि शून्य सजावट. एखाद्या गजबजलेल्या साध्या आठवडी बाजारासारखा भासणारा हा पसारा खरं तर गोंधळ नाही, तर तो एक अत्यंत अचूक असा ‘कॅल्क्युलेशन’चा भाग आहे. डी-मार्टचं हे साधं, किंबहुना थोडं विस्कळीत दिसणं ही त्यांची चूक नाही, तर तो या कंपनीने घेतलेला आजवरचा सर्वात मोठा व्यावसायिक निर्णय आहे.

**

यामागचं गणित समजून घेणं रंजक आहे. भारतात बहुतांश मोठे रिटेलर्स आपल्या कमाईतील १०० रुपयांमागे ३ ते ६ रुपये फक्त जागेच्या भाड्यापोटी जमीनदाराला देतात. डी-मार्टची वस्तुस्थिती अशी आहे की, ते त्यांच्या बहुतांश स्टोअर्सच्या जागा स्वतः विकत घेतात. यामुळे भाड्याचा अवाढव्य खर्च शून्यावर येतो. तिथे ना महागडा इंटिरिअर डिझायनर असतो, ना मूड लायटिंग. फक्त साधे रॅक्स आणि जमिनीवर ठेवलेले कार्टन्स.

**

इंटेरिअरवर खर्च न झालेला प्रत्येक रुपया हा फिरून ग्राहकाच्या खिशातच जातो. हे दुकान जेव्हा तुम्हाला ‘कुरूप’ किंवा ‘साधं’ वाटतं, तेव्हा तुमच्या मेंदूला एक सुप्त सिग्नल मिळतो – “इथे रोषणाईचा खर्च नाही, म्हणजे इथे वस्तू स्वस्तच मिळणार. “यालाच म्हणतात ते ‘लो-कॉस्ट’ ब्रँडिंग, जे महागड्या जाहिरातींपेक्षा जास्त प्रभावी ठरतं.

**

या ब्रँडिंगच्या मुळाशी आहेत डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी. दलाल स्ट्रीटवर त्यांना अनेक दशकांपासून ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ या नावाने ओळखलं जातं. एकच पांढरा शर्ट आणि पांढरी पँट, हाच त्यांचा कायमचा पेहराव. कोणताही भपका नाही, कोणताही दिखावा नाही. दमाणी यांनी केवळ दुकान डिझाइन केलं नाही, तर त्यांनी स्वतःच्या साधेपणाचा आरसा तिथे उभा केला आहे.

**

महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी डी-मार्ट म्हणजे केवळ दुकान नाही, तर ती एक सवय झाली आहे. जाणीवपूर्वक जपलेलं हे साधं रूप म्हणजे ब्रँडिंगचा अभाव नाही, तर तेच या ब्रँडचं सर्वात मोठं शक्तिस्थान आहे. एखादी गोष्ट ‘ब्रँडेड’ दिसण्यासाठी ती चकचकीतच असावी लागते, हा समज डी-मार्टने मोडीत काढला आहे.

**

३१ मार्च २०२६ रोजी डी-मार्टने भारतात ५०० स्टोअर्सचा टप्पा ओलांडला आणि आज या कंपनीचे बाजारमूल्य तब्बल २ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. कोणत्याही चकचकीत जाहिरातीशिवाय किंवा सेलिब्रिटी ब्रँड अँबेसेडरशिवाय गाठलेला हा आकडा कोणत्याही ब्रँड स्ट्रॅटेजिस्टला घाम फोडण्यासाठी पुरेसा आहे.

**

पुढच्या वेळी जेव्हा एखादं दुकान खूप साधं आणि विश्वासाला पात्र नाही असं वाटेल, तेव्हा पुन्हा एकदा विचार करा. ते खराब डिझाइन नसू शकतं, तर तो त्या ब्रँडने दिलेला सर्वात मोठा संदेश असू शकतो. सौंदर्यापेक्षा बचतीला महत्त्व देणारा असा दुसरा एखादा ब्रँड तुम्हाला आठवतोय का?

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares