मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इतके मला पुरे आहे… कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ इतके मला पुरे आहेकवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे,

डोळ्यांवर चष्मा आहे,

इतके मला पुरे आहे. ।।१।।

 *

निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे,

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरे आहे. ।।२।।

 *

जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत,

कानांना सुरांची जाण आहे,

इतके मला पुरे आहे. ।।३।।

 *

बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे,

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरे आहे. ।।४।।

 *

साधे, चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत,

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरे आहे. ।।५।।

 *

जवळचे मित्र आहेत,

मोबाईलवर संपर्कात आहेत,

कधीतरी भेटत असतात,

इतके मला पुरे आहे. ।।६।।

 *

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत,

दोन वेळचे दोन घास आहेत,

इतके मला पुरे आहे. ।।७।।

 *

देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे,

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरे आहे. ।।८।।

 *

याहून जास्त आपल्याला काय हवे आहे?

जगातील चांगले घेण्याचा,

आनंदी, आशावादी राहण्याचा,

विवेक हवा आहे!

इतके मला पुरे आहे. ।।९।।

 *

विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे,

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरे आहे. ।।१०।।

 *

शरीर माझे योग्य साथ देत आहे,

स्मृतीची मला साथ आहे,

मी कुणावरही आज अवलंबून नाही — ही देवाची कृपा आहे,

इतके मला पुरे आहे!

इतकेच मला पुरे आहे! ||११||

कवी – अज्ञात 

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गणपती होता टिळकांशी भांडत…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “गणपती होता टिळकांशी भांडत…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

काल रात्री गणपती बाप्पा

होता टिळकांशी भांडत,

आपल्या अडचणींची कैफियत

होता पोटतिडकीने मांडत ||

देवघरातून तू मला

बाहेर का आणलंस?

तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक

कशाला चार-चौघात मांडलंस?

 *

गायलास तू सुरुवातीला

ताल-सुरात आरत्या,

केलीस साधी फुलांची आरास

भोवती रंगीत बत्त्या.

 *

खूप मस्त छान असायचं

आनंद वाटायचा येण्यात,

सुख-शांती-समाधान मिळे

चैतन्य तुला देण्यात.

 *

दहा दिवस उत्सवाचे म्हणजे

असे, दिव्यत्वाची रंगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने

मंगलमयी वाटायचे,

प्रबोधक, उद्बोधक भाषणांनी

विचार उंची गाठायचे

 *

आत्ता सारखा हिडीसपणा

मुळीच नव्हता तेव्हा,

शांताबाईच्याच नावाचा

आता अखंड धावा.

 *

पीतांबर, शेला, मुकुट

हे माझे खरे रुप,

शर्ट, पँट, टोपी, पागोटे

धिंगाण्याला फक्त हुरूप.

 *

शाडूची माती… नैसर्गिक रंग

गायब आता झाले कुठे?

लायटिंग केलेल्या देखाव्याने

मला दरदरून घाम फुटे!

 *

श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा

गेला ना रे सांडत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

माणसां-माणसांनी एकत्र यावे

एकमेकांना समजुन घ्यावे,

देव-घेव विचारांची करतांना

सारे कसे एक व्हावे.

 *

जातीभेद नसावा…

बंधुभाव असावा,

सहिष्णुतेच्या विचारांनी

नवा गाव वसावा.

 *

मनातला विचार तुझ्या

खरंच होता मोठा,

पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच

बघ मिळालाय फाटा. ओळख

 *

पूर्वी विचारांबरोबर असायची

खाण्यापिण्याचीही रेलचेल,

आता मात्र देखाव्यांमागे

दडलेला असतो काळा खेळ.

 *

पूर्वी बदल म्हणून असायचे

पोहे-चिवडा-चहा-काॅफी…

साग्रसंगीत जेवणा सोबत

लाडू-मोदक-पेढे-बर्फी.

 *

आता, रात्री भरले जातात

पडद्यामागे, मद्याचे पेले

डी. जे. वर नाचत असतात

माजलेले दादांचे चेले.

 *

नको पडूस तू असल्या फंदात

तेव्हाच मी होतो सांगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होते, टिळकांशी भांडत ||

 *

कशासाठी उत्सव असा

सांग ना रे बांधलास?

देवघरातून गल्लोगल्ली

डाव माझा मांडलास!

 *

दहा दिवस कानठळ्यांनी

होतो मला आजार,

व्यवहारी दुनिया इथली,

इथे चालतो लाखोंचा बाजार.

 *

रितीरिवाज, आदर-सत्कार,

मांगल्याचा नाही पत्ता,

देवघरा ऐवजी माझा

रस्त्यावरती सजतो कट्टा.

 *

जुगार-दारु-सट्टा-मट्टा –

अनैतिकतेला येतो ऊत,

देवाऐवजी दैत्याचेच मग

मानेवरती चढते भूत.

 *

सामाजिक बाजू सोडून सुटतो

राजकारणालाच इथे पेव,

गौरी-गणपती सण म्हणजे –

गैरव्यवहाराची ठेव-रेव.

 *

नको रे बाबा, नको मला हा

मोठेपणाचा तुझा उत्सव,

मला आपले तू माझ्या जागी

परत एकदा नेऊन बसव.

 *

कर बाबा कर माझी सुटका

नको मला ह्यांची संगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

आपल्या अडचणींची कैफियत

होता पोटतिडकीने मांडत,

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रीकृष्ण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ श्रीकृष्ण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

कृष्ण खरंतर योगेश्वर होता.. शरीरातल्या सोळा सहस्त्र नाड्या त्याच्या ताब्यात होत्या.. जणू काय त्याच्या बायकाच.. लगेच आपण त्याला सोळा सहस्त्र बायका चिकटवल्या.. ज्ञान फक्त काहींच्याच पोतडीत राहिले.. उरलेले त्याला सोळा हजार स्त्रियांशी संग करणारा ठरवून मोकळे झाले.. मग त्याचे उदात्तीकरणही केले..

एखाद्याला ‘देव’ बनवण्याच्या प्रक्रियेत हे उदात्तीकरण फार आवश्यक असतं. त्याशिवाय माणसाचा देव होत नाही. ही प्रक्रिया शेवटी माणसाला दगड बनवून मंदिरात कोंडते..! आणि मग त्याने काय करायचं, काय खायचं, कसं वागायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं हे त्याचे भक्तगण ठरवतात. तो लाचार होतो. कारण त्याचा देव झालेला असतो. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते.

दुसऱ्याच्या पत्नीबरोबर रासलीला खेळणारा कृष्ण आणि आणि स्वतःच्या पत्नीला संशयावरून वनवासात पाठवणारा राम ही सोयीस्कर रूपे भारतीय पुरुषांनी मनात जपली. पण त्याच्या ज्या रुपाची आज समाजाला गरज आहे, त्याचा आपण खरंच विचार करतो का?

या माणसाने आपल्याला ‘गीता’ दिली.. जगभरातले विद्वान आज गीतेला एक सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान मानतात.. या माणसाने आपल्याला ‘कृष्णनीती’ दिली.. राजकारण कसे खेळावे, खेळवावे याचे धडे स्वत:च्या वागणुकीतून घालून दिले… कृष्णाचे व्यक्तिमत्व इतके बहुरंगी आणि बहुढंगी आहे की, त्याचे पैलू दाखवण्यासाठी हरिवंश, भागवत आणि महाभारत या ३ ग्रंथाची निर्मिती करावी लागली आणि त्यानंतरही कितीतरी ग्रंथ आणि पुस्तके… पाळणा, दूध, दही,

रासलीला या पलीकडचा कृष्ण गिरीश जखोटिया यांनी त्यांच्या “कृष्णनीती ” या पुस्तकात रंगवला आहे…

त्याने जपलेली मूल्ये कालातीत आहेत, असा-

१. तत्त्वज्ञानी, राजकारणी, मुत्सद्दी…

२. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या इंद्रपूजेलाही आव्हान देऊन निसर्गाची पूजा करणारा, त्याचे महत्त्व पटवून देणारा… रूढी आणि परंपरा न पाळणारा बंडखोर…

३. गवळी असूनही, आपल्या जातीची खंत न बाळगता लोकांना एकत्र करून त्यावेळच्या जुलमी राज्यसत्तेला उलथवणारा क्रांतिकारक…

५. द्वारकेला व्यापारी बाजारपेठ बनवणारा वेल्थ क्रिएटर…

६. स्थापत्य शास्रज्ञ(इंजिनिअर) आपल्या कलात्मक दृष्टीने द्वारका नगरी बनविणारा…

अशा अनेक रूपात यातील कृष्ण दिसतो…

गीतेची निर्मिती करणारा विप्र, पांडवांना विजय मिळवून देणारा क्षत्रिय, गोकुळात असताना दही दुधाचे योग्य वितरण करणारा, द्वारकेला बाजारपेठ बनवणारा वैश्य आणि गुराख्याच्या कामालाही प्रतिष्ठा मिळवून देणारा आणि त्यातही कमीपणा न मानता सर्वच समाजाचे स्वकर्तृत्वावर नेतृत्व करणारा शूद्र अशा सर्व वर्णात कृष्ण दिसतो आणि भावतो…

‘महाभारता’चा परिपक्व कृष्ण आपल्यासमोर येतो तो एक नेता, योध्दा, तत्त्वज्ञानी, राजकारणी आणि क्रांतिकारी म्हणून…

“कृष्णकिनारा” मधून तो भेटतो राधा, द्रौपदी आणि कुंतीचा सखा, मित्र, पाठीराखा म्हणून…

आणि जितकं मन, मेंदू, मस्तक जागे ठेवाल तितक्या रूपात तो मग भेटतच राहतो…

कृष्णाची ही रूपं समजून न घेता केवळ ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ला शरण जाऊन ज्या प्रथा, जशा आहेत तशा पाळणाऱ्या, जे समज जसे होते तसे निर्बुद्धपणे पुढे नेणाऱ्या सुशिक्षित (?) लोकांची चीड येते! निदान या गोष्टींचे भांडवल करतांना त्याची बुद्धिमत्ता, त्याची समज, त्याचा धोरणीपणा.. कलियुगात कसं वागावं याचा त्याने घालून दिलेला वस्तुपाठ तरी समजून घ्यायचा…

कृष्ण मस्तीत जगला.. कारण तो माणूस होता.. त्यामुळेच जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर यादव वंश संपला, तेव्हा तो काही करू शकला नाही आणि खंतावला.. माणसासारखे मरण आले त्याला..!

माणूस म्हणून त्याचे तेज, त्याचा लढाऊ बाणा त्याचे ‘योगेश्वर’ रूप.. म्हणजेच खरा ‘कृष्ण’… त्याला विविध पुस्तकांतून वाचणं म्हणजेच त्याची भक्ती. माणसाला माणूस म्हणून ज्यांना समजून घेता येत नाही किंवा घ्यायचंच नसतं त्यांना असे पोकळ भक्तीचे देखावे मांडावे लागतात…

ज्यांना समजून घेता येतं, त्यांच्यासाठी तर तो नेहमीच दीपस्तंभ…

कृष्णा… तू थोडा तरी समजलास, म्हणून आयुष्यातील कितीतरी चक्रव्यूहं भेदता आलीत…

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारपण: हे समजून घ्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ म्हातारपण: हे समजून घ्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

म्हातारपणात एकटे पडू नका आणि कोणावरही ओझे बनू नका. यासाठी या गोष्टी आतापासूनच नक्की समजून घ्या.

१ :- जमिनीच्या भानगडीत पडू नका.

फक्त “शेजाऱ्याला धडा शिकवण्यासाठी” आपले आयुष्य कोर्ट-कचऱ्यांच्या पायऱ्यांवर वाया घालवू नका. कदाचित खटला संपण्यापूर्वीच तुम्ही जग सोडून जाल. आणि जर लढून जमीन जिंकलीच, तर तिथे तुम्ही नाही—वकीलच राहतील.

२ :- जुन्या गाड्या ओझे बनू शकतात.

पाच लाखांचा फायदा होत आहे, असा विचार करून जुन्या गाड्या घरी आणू नका. जर गाडी रस्त्यापेक्षा जास्त वेळ गॅरेजमध्ये उभी राहत असेल, तर हृदयविकाराचा झटका गाडीला नाही—तुम्हाला येईल.

 ३ :- आपली संपत्ती हस्तांतरित करण्याची घाई करू नका.

आज जरी मुले ‘देवासारखी’ वाटत असली, तरी एकदा सर्व संपत्ती त्यांच्या नावावर केली, तर त्याच घरात तुम्ही ‘नकोशी वस्तू’ बनू शकता. मुले वाईट नसतात, पण जग निर्दयी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही आपल्या नावावर नक्की ठेवा.

४ :- आपली शेवटची बचत सुरक्षित ठेवा.

३० वर्षांच्या कमाईतून बनलेली पेन्शन मुलांच्या व्यवसायात गुंतवू नका. शेवटी औषधोपचारासाठी तुम्हाला त्याच मुलांसमोर हात पसरवावे लागतील.

५ :- मुलांच्या घरात चिकटून राहू नका.

फक्त ‘ती आपली मुले आहेत’ असे म्हणून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका. जास्त जवळिकीने तुमचे प्रेम त्यांच्यासाठी ओझे बनू शकते. स्वतःसाठी एक छोटीशी जागा बनवा आणि स्वतंत्र आयुष्य जगा.

६ :- तीर्थयात्रेसाठी मुलांची वाट पाहू नका.

‘जेव्हा त्यांना सुट्टी मिळेल तेव्हा ते मला नेतील’, असा विचार करून प्रतीक्षा करू नका. जेव्हा त्यांना वेळ मिळेल, तेव्हा कदाचित तुम्ही चालण्याच्याही स्थितीत नसाल. जोपर्यंत ताकद आहे, तुमच्या आवडत्या ठिकाणी जा—मग एकटेच का असेना.

७ :- आज जे खाण्याची इच्छा असेल, तेच खा.

तुमच्या जोडीदाराला (पती/पत्नीला) आजच त्यांच्या आवडीची गोष्ट खाऊ घाला. खाण्याची थाळी घेऊन स्मशानात रडत म्हणणे—“त्यांना हे खूप आवडायचे”—फक्त दिखावा आहे.

 ८ :- स्वतःसाठी आरामाची व्यवस्था करा.

मृत्यूच्या दिवसापर्यंत कामाचा डोंगर उपसत बसू नका. जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त धावतच राहिलात, तर शेवटी काहीही जिंकलेले नसेल. आपल्या शरीराला हवा असलेला आराम द्या.

९ :- झोपेपेक्षा मोठे कोणतेही औषध नाही.

अकारण येणारा निद्रानाश कमी करा आणि शांतपणे झोपा. जेव्हा तुम्ही आजारी पडाल, तेव्हा कोणीही तुमचे दुःख वाटून घेण्यासाठी येणार नाही—ते तुम्हाला एकट्यालाच सहन करावे लागेल.

 १० :- हे कधीही विसरू नका की तुम्ही एकटेच आला आहात.

ही अपेक्षा कमी करा की कोणीतरी तुमच्यासाठी सर्व काही करेल. एक दिवस तुमची सावलीही तुमची साथ सोडून जाईल. मृत्यूही एकटाच असतो—त्यामुळे एकटे राहणे आनंदाने शिका.

आनंद अशी कोणतीही गोष्ट नाही जी कोणी तुम्हाला देईल; आनंद अशी गोष्ट आहे जो तुम्हाला स्वतःच निर्माण करावा लागतो.

जेव्हा तुमचे पती/पत्नी निरोगी असतील, तेव्हा लहान-मोठे प्रत्येक काम स्वतः करायला शिकण्यात अजिबात संकोच करू नका.

तुम्ही जरी वसीयत (मृत्युपत्र) लिहिली असली, तरी ती बदलण्याचा संपूर्ण अधिकार तुमच्याकडे आहे—हे लक्षात ठेवा.

जर वारसदार तुम्हाला त्रास देत असतील किंवा परेशान करत असतील, तर लक्षात ठेवा—आज कायदा आणि जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी आहे.

रोज चालण्याची सवय ठेवा आणि जर जुने मित्र किंवा नातेवाईक असतील, तर त्यांच्याशी तुमच्या तरुणपणाच्या आठवणी नक्की शेयर करा.

नेहमी लक्षात ठेवा की एक दिवस जीवनाचा हिसाब पूर्ण होईल; त्या शेवटच्या दिवसासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा.

शेवटी, हे जाणून की तुम्ही काहीही सोबत नेणार नाही—सर्वांच्या सोबत प्रेम आणि मित्रत्वाने वागा, गरजवंतांना मदत करा आणि स्वतःला एक चांगला माणूस बनवा…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिमूटभर गोडी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

 

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिमूटभर गोडी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

“भाजीत चिमूटभर साखर घाल गं, म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते, ” स्वयंपाक करताना आजी म्हणायची. भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते.

मला नवल वाटतं, आजीवर्गाचं.

त्यांना बरोबर माहीत असायचं, कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते.

पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी, थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा.

कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी, “हो, हो. बरोबर आहे तुमचं, ” म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची.

चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो, असं म्हणायची.

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही, कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही.

सावकाशीने समजावून सांगायचे, ज्यावेळेस ते समजून घेईल. चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो, असं आईपण म्हणायची.

म्हणूनच त्यांचे संसार विनाकलह झाले.

कामवाल्या बाईबाबतही असंच. तिने कधी दांडी मारली, कधी उशिरा आली, तरी ती पण एक संसारी बाई आहे, आपल्यापेक्षा तिला आव्हानं असतात जास्त. मग अशा वेळेस “का गं आज उशीर झाला? बरी आहेस ना? काळजी घे गं बाई. चल. दोन घास खाऊन घे, ” म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील.

थोडी माणूसकी खूप मोठं काम करते.

थोडा विश्वास, थोडं प्रेम, थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात.

आजी नेहमी म्हणायची – आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण. एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं.

आताची सतत ‘अरे ला कारे’ करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत, असं वाटतं.

ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.

थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमूटभर आनंदाची नक्कीच भर घालू शकतो.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेवटचा बाक अजूनही राखीव आहे… –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शेवटचा बाक अजूनही राखीव आहे… –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: मिलिंद जांबोटकर

साधारण सत्तरच्या आसपासचे सहा जुने शाळकरी मित्र. कित्येक दशकांनी ते पुन्हा एकदा भेटले.

 

रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर वेटरने नम्रपणे विचारलं,

“साहेब, तुम्हाला शांत कोपऱ्यात टेबल हवंय का? ”

त्यांच्यापैकी एकजण हसला.

“नाही… शेवटचा बाक आहे का? ”

सगळेच खळखळून हसले.

 

पुढचे तीन तास…

 

तीन कंपन्यांचा मालक असलेला माणूस पुन्हा तोच गृहपाठ न करणारा मुलगा झाला.

 

प्रसिद्ध सर्जनला आठवण करून देण्यात आली की, शाळेत एकदा डबा चोरल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता.

 

निवृत्त कर्नलची चेष्टा करत एकजण म्हणाला,

“गणिताच्या सरांनी एखादा प्रश्न सोडवायला फळ्याकडे बोलावलं की हा कसा रडायचा, आठवतंय? ”

सगळ्यांनी पुन्हा हशा केला.

 

वर्गात नेहमी पहिला येणारा मित्र अचानक म्हणाला,

“तुम्हाला सांगू? अजूनही कधी कधी स्वप्न पडतं की मी बोर्डाच्या परीक्षेला उशिरा पोहोचलोय! ”

 

दुसरा लगेच म्हणाला,

“आणि मी अजूनही झोपेतून उठतो तेव्हा पहिला विचार असतो, ‘आपला गृहपाठ पूर्ण झाला होता का? ’ ”

 

हसता हसता त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

 

विनोद नवे होते म्हणून नाही…

 

तर आठवणी कधीच जुन्या झाल्या नव्हत्या म्हणून.

 

निघताना त्यांच्यापैकी एकजण थोडा वेळ शांत उभा राहिला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला,

“आज मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहीत आहे? ”

बाकीच्यांनी मान हलवली.

तो हसला.

 

“या तीन सुंदर तासांसाठी…

 

आपल्याकडे किती पैसा आहे, आपण कोणत्या गाडीतून आलो, कोणते आजार सोबत घेऊन फिरतोय किंवा डोक्यावर किती केस उरलेत… याची कुणालाच पर्वा नव्हती.

आपण फक्त सहा मुलं होतो…

आणि आपल्या हरवलेल्या बालपणातून आणखी एक दुपार चोरून आणली होती. ”

 

साठीनंतर…

 

तुम्हाला आणखी वाढदिवसांची गरज नाही.

तुम्हाला अशा आणखी काही दुपारी हव्यात.

ज्या दुपारी वय विसरता येतं.

पैसा, पद, आजार, जबाबदाऱ्या सगळं थोडावेळ बाजूला ठेवता येतं.

 

आणि पुन्हा एकदा…

शाळेच्या शेवटच्या बाकावर बसता येतं.

 

कारण सुरकुत्या चेहऱ्यावर येतात…

मैत्रीवर कधीच नाहीत.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माय आहे रेऽऽ ती…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “माय आहे रेऽऽ ती” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

जेव्हा मी पावसातून भिजत घरी आलो.

बाबा ओरडले, “अरे गाढवा, छत्री का नेली नाहीस? “

बहीण म्हणाली, “आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल. “

आजोबा ओरडले, “पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले? एव्हढं भिजत यायची काय गरज होती? “

पण… आई माझे केस पुसत म्हणाली, “मूर्ख आहे हा पाऊस! माझा मुलगा घरी येईपर्यंत याला थांबायला काय झालं होतं? “

बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. मी बाहेरुन आलेलो असतो. बाहेरच्या दाराच्या कोपऱ्यात भिजलेली छत्री ठेवतो आणि मागे वळतो. मधल्या दारात आई उभी असते, “उजव्या बाजूने पूर्ण भिजलायस. तिला उद्या घरी यायला सांग. मला भेटायचेय. “

मित्रांमधे खेळता खेळता उंबरठ्यावर बसलेल्या आपल्या आईला बघत तो दुडूदुडू धावत येतो आणि तिच्या कुशीत घुसतो.

“आई, तुझ्या पोटात येण्याआधी मी कुठे होतो गं? “

“तू ना.. कुठे बरं होतास? हां.. तू ना माझ्या स्वप्नात होतास. माझ्या डोळ्यात होतास. माझ्यातच माझ्यातला थेंब होतास. “

संध्याकाळची वेळ. गाडी चालवत घरी येतोय. समोर काचेवर पाऊस. बाहेर अंधार होत चाललाय. फोन वाजतो, “अरे कुठे आहेस? पाऊस पडतोय.. सावकाश ये.. लवकर ये.. मी वाट बघतेय. “

डोळ्यात निरांजनं घेऊन दारात वाट बघत उभी असलेली आई.

“गाढवा, अक्कल कधी येणारेय तुला? बाबा इथं मर मर मरतायत आणि तुला शिकवतायत, तर तू गणितात वीसपैकी दोन मार्क आणून मला न दाखवता पेपर फाडून टाकलास? तुला काय वाटलं, मला समजणार नाही? आयतं मिळतंय ना म्हणून हे सुचतेय. जा. स्टॅण्डवर जाऊन हमाली करून पाच रुपये कमवून आण. मग कळेल तुला कमावणं काय असतंय ते.

बाबा बोलत नाहीत म्हणून तुझी थेरं वाढलीत. पण आता नाही चालणारेय हे.

जोवर तू आपण होऊन बाबांना हे सांगत नाहीस तोवर तू उपाशी बसायचं.

काही मिळणार नाही तुला.

भूक लागली तर बाहेर जाऊन भीक मागून खा. पण घरातलं मी देणार नाही. “

रात्री न बोलता तसाच झोपलो. आई बाबा दोघंही बोलले नाहीत. दुसरे दिवशी सकाळी उठून बाबा ऑफिसला जायच्या वेळी धाडस करून त्यांना सांगितले. एक दणका पाठीत आणि एक गालावर बसला आणि न बोलता ते ताडताड निघून गेले.

आतून आई आली. पदराला हात पुसत होती. माझ्या रडक्या चेहऱ्याकडे बघत मला जवळ घेतले. केसातून हात फिरवत, “राजा, अभ्यास कर रे. अभ्यासाशिवाय काही खरं नाही रेऽऽ. अरे, बाबा एव्हढं कुणासाठी करतायत? आपल्यासाठी, तुझ्यासाठीच ना? मग, त्यांना बरं वाटायला तू अभ्यास करायला हवास. मार्क चांगले पाडायला हवेत. चल, आता रडणं बंद. आता अभ्यास करायचा आणि मार्क चांगले पाडायचे, हं. “

तोवर बाबा परत येतात, “जा, गाढवा. जा.. ते रडकं तोंड धुवून घे आणि जेवण कर. कालपासून ती पण उपाशीच आहे तुझ्यासाठी. “

पार्टीत बसलोय. वेळ झालाय. साडेबारा वाजलेत. पार्टी संपते. बाहेर येऊन मोबाईल बघतो. तेरा मिस कॉल्स. परत कॉल करायचं धाडस नसतं.

गाडी अंगणात आत घेतो. मधला लाईट सुरूच असतो. गाडीचा आवाज ऐकून दार उघडले जाते. पेंगुळल्या डोळ्यांनी, दिवसभराच्या शिणवट्याने थकलेली ती दारात. “अरे, किती फोन करायचे रे. काळजी वाटते. एक फोन घ्यायला काय होतंय रे. म्हातारं झाल्यावर कळेल तुम्हाला. चल, ये आता आत. आत कट्ट्यावर थंड ताक ठेवलेय ते पी आणि झोप. नंतर सकाळी ॲसिडिटी झाली म्हणून जेलुसिल खात बसशील… आणि आता हे जरा कमी कर. तूही पन्नाशी पार केलीयस आता. काळजी घे रे आता जरा स्वतःची. “

मुलाचं लग्न ठरलेलं. एक दिवस आईचा फोन, “येऊन जा. ” मी जातो. आई बाबा समोर बसवून घेतात आणि हातामधे एक पाकिट कोंबतात. मी उघडून बघतो. मुलाच्या नावाने अडीच लाखाचा चेक.

“आम्ही तुला काही दिले नाही. पण नातवाला देऊ शकतोय आज. हे त्याच्यासाठी. “

घराची थोडी दुरुस्ती करायचीय. पैसे असतात पण गंमत करायची म्हणून मी विचारतो, ” तुम्ही किती देणार? “

ताडकन् आई बोलते, “द्यायचं ते सगळं दिलेय. आता फक्त सईसाठीचे पाच लाख आहेत. ते मी मोडणार नाही. ते तिलाच तिचं लग्न ठरलं की देणार. इथे जे करायचेय ते तूच करायचेस. तुला एक पैसा देणार नाही. हां. पण कैरीचं लोणचं देणारेय. “

शनिवारी संध्याकाळी अंगणातल्या मारुतीसमोर भीमरुपी, रामरक्षा, करुणाष्टके म्हणून झाली की आम्हाला सगळ्यांना एकत्र बसवून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकत ‘ईडापिडा टळो’ म्हणत दृष्ट काढणारी.. आई.

अशी आई असल्यावर आपल्याला दृष्ट लावायची कुणाची टाप आहे.

आणि

म्हणूनच आईचा दिवस वर्षातला फक्त एकच नसतो, तर सगळं आयुष्यच तिचं असतं. रोजचा दिवस तिचाच.

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अनुभव की पदवी?…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “अनुभव की पदवी?…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

त्या पावसाळी रात्री कोट्यधीश उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ऑपरेशन थिएटरमध्ये जीवन-मरणाच्या सीमारेषेवर झुंज देत होती. बाहेर प्रसार माध्यमांच्या गाड्यांची रांग लागली होती, पण आत एका वृद्ध सुरक्षारक्षकाचे शब्द ऐकायला कुणाकडे वेळ नव्हता…

पुण्यातील नामांकित ‘आरोग्यम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या सातव्या मजल्यावर एकच गोंधळ उडाला होता.

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होते देशातील प्रसिद्ध उद्योगपती राघव देशमुख.

कोट्यवधींचे साम्राज्य उभे करणारा तो माणूस त्या रात्री पूर्णपणे हतबल दिसत होता.

आत त्याची २८ वर्षांची मुलगी अन्विता आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत होती.

अन्विता आठ महिन्यांची गर्भवती होती. अचानक तिला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले—

“बाळाची नाळ गळ्याभोवती अडकली आहे. आई आणि बाळ दोघांच्याही जिवाला धोका आहे. “

देशातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आले.

एक नाही…

दोन नाही…

पूर्ण नऊ तज्ज्ञ डॉक्टर!

पण प्रत्येक नवीन रिपोर्ट आधीपेक्षा अधिक चिंताजनक होता.

“ब्लड प्रेशर कमी होत आहे. “

“बाळाला ऑक्सिजन कमी मिळतोय. “

“आता जास्त वेळ थांबता येणार नाही. “

संपूर्ण टीम तणावाखाली होती.

त्याच वेळी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ६८ वर्षांचे सुरक्षारक्षक गणपत काका बसले होते.

पांढरी दाढी, वाकलेली पाठ आणि जुना चष्मा…

गेली १५ वर्षे ते रात्रीची ड्युटी करत होते.

सगळे त्यांना प्रेमाने “गणपतकाका” म्हणत.

पण फार थोड्या लोकांना माहिती होतं की सुरक्षा रक्षक होण्यापूर्वी ते कोकणातील एका गावात प्रसिद्ध वैद्य होते.

शरीरातील नसांचे ज्ञान, दाबबिंदू आणि पारंपरिक उपचारांची विद्या त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकली होती.

पण आधुनिक जगात त्यांच्याकडे ना पदवी होती, ना प्रमाणपत्र…

म्हणून लोक त्यांना फक्त एक साधा सुरक्षारक्षक समजत होते.

अचानक एका नर्सचे शब्द त्यांच्या कानावर पडले—

“बाळाची हृदयाची गती सतत कमी होत आहे! “

गणपतकाका सावध झाले.

काही वेळाने दुसरी नर्स म्हणाली—

“नाळ इतकी घट्ट अडकली आहे की बाळ खाली सरकत नाही. “

गणपतकाकांच्या डोळ्यांसमोर ३५ वर्षांपूर्वीची एक घटना चमकून गेली.

ते हळूहळू ऑपरेशन थिएटरकडे गेले.

दाराजवळ उभ्या डॉक्टरांना त्यांनी नम्रपणे सांगितले—

“मुलीला डाव्या कुशीवर ठेवू नका. “

डॉक्टर चकित झाले.

“काय म्हणताय तुम्ही? “

गणपत काका शांतपणे म्हणाले—

“ज्या बाजूने नाळ दाबली जातेय, त्या बाजूचा भार वाढतोय. तिला दुसऱ्या बाजूला वळवा. “

डॉक्टरांचा चेहरा लाल झाला.

“तुम्ही सुरक्षारक्षक आहात की सर्जन? “

आजूबाजूचे काही लोक हसू लागले.

गणपतकाका काहीच बोलले नाहीत.

ते शांतपणे मागे फिरले.

पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.

तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचे दार उघडले.

एक डॉक्टर धावत बाहेर आला.

“आता तातडीने निर्णय घ्यावा लागेल. आई किंवा बाळ… दोघांपैकी एकालाच वाचवता येईल. “

हे ऐकताच राघव देशमुख यांच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यांची पत्नी सुमन रडू लागली.

पहिल्यांदाच त्या श्रीमंत कुटुंबाला जाणवलं की काही लढाया पैशाने जिंकता येत नाहीत.

तेवढ्यात मागून एक शांत आवाज आला—

“दोघांनाही वाचवता येईल. “

सगळ्यांनी मागे वळून पाहिले.

ते गणपतकाका होते.

राघव चिडून म्हणाले—

“तुम्ही इथे काय करताय? “

गणपतकाका शांतपणे म्हणाले—

“बाळाला रस्ता नको आहे साहेब… त्याला श्वास हवा आहे. “

संपूर्ण कॉरिडॉर शांत झाला.

गणपत काका पुढे म्हणाले—

“माझं चुकलं तर मला लगेच बाहेर काढा. पण एकदा माझं ऐका. “

डॉक्टरांनी अनिच्छेने त्यांचा सल्ला मान्य केला.

अन्विताची स्थिती बदलण्यात आली.

सगळ्यांचे डोळे मॉनिटरवर खिळले होते.

एक सेकंद…

दोन सेकंद…

पाच सेकंद…

आणि अचानक बाळाची हृदयगती स्थिर होऊ लागली!

एक नर्स आनंदाने ओरडली—

“सर! हार्ट रेट वाढतोय! “

डॉक्टर अवाक झाले.

तासनतास न समजलेली गोष्ट एका वृद्ध सुरक्षारक्षकाने ओळखली होती.

त्यानंतर ऑपरेशन सुरू झाले.

दीड तासाच्या तणावानंतर ऑपरेशन थिएटरचे दार उघडले.

नर्सच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.

“अभिनंदन! आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. “

राघव देशमुख यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

काही वेळानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला—

“गणपतकाका कुठे आहेत? “

पण गणपतकाका शांतपणे आपल्या जागेवर परत गेले होते.

जणू काही घडलंच नव्हतं.

दुसऱ्या दिवशी अन्विताला सर्व घटना सांगण्यात आली.

तिने ताबडतोब म्हटले—

“मला त्यांना भेटायचं आहे. “

गणपतकाकांना बोलावण्यात आले.

ते आत येताच अन्विताने आपल्या नवजात बाळाला त्यांच्या हातात दिले.

गणपतकाकांच्या डोळ्यांत पाणी आले.

त्यांनी थरथरत्या हाताने बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला.

अन्विता म्हणाली—

“आज माझं बाळ श्वास घेतंय, ते तुमच्यामुळे. “

गणपत काका हसले.

“नाही ग बाळा, देवाने वाचवलं. मी तर फक्त निमित्त ठरलो. “

तेवढ्यात राघव देशमुख आत आले.

काही क्षण ते गणपतकाकांकडे पाहत राहिले.

आणि अचानक…

देशातील त्या मोठ्या उद्योगपतीने सर्वांसमोर वाकून गणपतकाकांचे पाय स्पर्श केले.

संपूर्ण खोली स्तब्ध झाली.

“मला माफ करा काका. काल मी तुम्हाला फक्त सुरक्षारक्षक समजलो. “

गणपत काकांनी त्यांना उठवत म्हटलं—

“बाळा, माणसाचं काम लहान-मोठं असू शकतं… पण त्याचा अनुभव कधीच लहान नसतो. “

हे शब्द प्रत्येकाच्या मनात घर करून गेले.

काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मोठा समारंभ आयोजित करण्यात आला.

राघव देशमुख यांनी घोषणा केली की ग्रामीण वैद्यकीय ज्ञान आणि पारंपरिक अनुभवांवर संशोधन करणारे नवीन केंद्र सुरू करण्यात येईल.

त्या केंद्राला नाव देण्यात आले—

‘गणपत प्रसाद मानव सेवा केंद्र’.

टाळ्यांच्या कडकडाटात गणपतकाकांना मंचावर बोलावण्यात आले.

त्यांनी माईक हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाले—

“आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. पदवी ज्ञानाचा पुरावा असू शकते, पण अनुभव हे ज्ञानाचं मूळ असतं. ज्या दिवशी आपण गरीब, वृद्ध किंवा साध्या दिसणाऱ्या माणसाला कमी लेखणं सोडू, त्या दिवशी समाज खऱ्या अर्थाने मोठा होईल. “

संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं.

समोर बसलेलं ते छोटंसं बाळ हसत होतं.

त्याला माहीत नव्हतं की त्याच्या जन्माने फक्त एका कुटुंबाचं नव्हे, तर अनेकांच्या विचारांचाही पुनर्जन्म घडवला होता… संदेश : कधीही एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यांवर, पदावर किंवा पैशांवरून ठरवू नका. अनेकदा सर्वात मोठं ज्ञान आणि अनुभव हे सर्वात साध्या दिसणाऱ्या माणसांकडे असतात.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जीवनाची खरी साधनं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीवनाची खरी साधनं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

स्वयंपाकघरातील नळ पुन्हा गळू लागला. वैतागून मी प्लंबरला बोलावलं.

काही वेळात एक मध्यमवयीन गृहस्थ आले. शांत, स्थिर… हातात एक जुनाट टूलकिट.

काम सुरू करताना त्यांनी एक पाना काढला. त्याचा दांडा चक्क तुटलेला होता!

“या साधनाने हे काय दुरुस्त करणार?” असा विचार माझ्या मनात आला.

पुढे गंजलेला पाइप कापण्यासाठी त्यांनी पिशवीतून एक छोटी करवत काढली—तिचाही अर्धा भाग गायब होता!

आता मला खात्रीच झाली—आपण चुकीच्या माणसाला बोलावलं आहे!

पण अवघ्या दहा मिनिटांत नळाची गळती बंद झाली. नळ स्वच्छ चमकत होता आणि एक थेंबही पाणी गळत नव्हतं.

मी त्यांना ₹२०० दिले. त्यांनी त्यातील निम्मे पैसे परत केले.

मी आश्चर्याने विचारलं,

“आजकाल कोण जास्त पैसे मिळाले तर परत करतो?”

ते हसले आणि म्हणाले,

“मॅडम, प्रत्येक कामाची एक योग्य किंमत असते. आज जास्त पैसे घेतले, तर उद्याही तितकेच जास्त मिळावेत अशी अपेक्षा निर्माण होते. ते मिळाले नाहीत की मन अस्वस्थ होतं. मला जे योग्य आहे तेवढंच घ्यायला आवडतं. त्यामुळे मन समाधानी राहतं.”

मी म्हणाले,

“निदान नवीन पाना आणि करवत तरी घ्या. तुमचं काम सोपं होईल.”

ते हसून म्हणाले,

“मॅडम, साधनं झिजण्यासाठीच असतात. ती जुनी, तुटकी किंवा गंजलेली झाली म्हणून त्यांची किंमत संपत नाही. ती आपलं काम करतच राहतात. माणसांचंही तसंच आहे. वय वाढलं, आयुष्यात काही खुणा उमटल्या म्हणून माणूस निरुपयोगी होत नाही.”

क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले,

“तुम्ही ऑफिसमध्ये लिहिता, तेव्हा पेन महाग आहे की साधं, याने काय फरक पडतो? लिहिण्याचं कौशल्य असेल तर कोणत्याही पेनने सुंदर लिहिता येतं. कौशल्य हातात असतं, साधनात नाही.”

मी निःशब्द उभी राहिले.

त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान विलक्षण होतं—असं समाधान जे पैशाने विकत घेता येत नाही.

एक विचार मनात ठेवण्यासारखा…

संपत्ती, सुखसोयी आणि अधिकाधिक मिळवण्याच्या धावपळीत आपण जीवनाची खरी साधनं विसरतो—

प्रामाणिकपणा, कष्ट, कृतज्ञता आणि समाधान.

ही चारही शाबूत असतील, तर साधनं जुनी असली तरी आयुष्याची अनेक कामं सुंदरपणे पार पडतात.

पण हीच साधनं हरवली, तर जगातील कितीही संपत्ती असली तरी मनातल्या गळतीची दुरुस्ती होत नाही.

* * * *

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ग्रुपमध्ये काय काय साध्य होते…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ग्रुपमध्ये काय काय साध्य होते…?…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

ग्रूपमध्ये आनंद असतो.

ग्रुपमध्ये उत्साह असतो.

ग्रुपमध्ये प्रोत्साहन मिळतं.

ग्रुपमध्ये जिव्हाळा असतो.

ग्रुपमध्ये एकमेकांची काळजी असते.

ग्रुपमध्ये सुसंवाद साधता येतो.

ग्रुपमध्ये सहकार्य मिळतं.

ग्रुपमध्ये शक्ती मिळते.

ग्रुपमध्ये दिलासा मिळतो.

ग्रुपमध्ये प्रबोधन होतं.

ग्रुपमध्ये आदर मिळतो.

ग्रुपमध्ये प्रेम मिळतं.

ग्रुपमध्ये आपुलकी असते.

ग्रुपमध्ये समन्वय असतो.

ग्रुपमध्ये सामंजस्य असते.

ग्रुपमध्ये मार्गदर्शन मिळतं.

ग्रुपमध्ये समुपदेशन होतं.

ग्रुपमध्ये सांत्वन केलं जातं.

ग्रुपमध्ये सामाजिकीकरण होतं.

ग्रुपमध्ये व्यक्तिमत्व विकास होतो.

ग्रुपमध्ये मनोबल वाढतं.

ग्रुपमध्ये वक्तृत्व विकसित होतं.

ग्रुपमध्ये आपलेपणाची भावना असते.

ग्रुपमध्ये बुद्धीची मशागत होते.

ग्रुपमध्ये अंतःकरण विशाल होतं.

ग्रुपमध्ये एकटेपणा दूर होतो.

ग्रुपमध्ये निराशा दूर होते.

ग्रुपमध्ये स्वयंविश्वास वाढतो.

ग्रुपमध्ये विचार प्रगल्भ होतात.

ग्रुपमध्ये भाषण व संभाषण सुधारते.

ग्रुपमध्ये मानसिक परिवर्तन घडून येतं.

ग्रुपमध्ये बौद्धिक विकास होतो.

ग्रुपमध्ये भावनिक विकास होतो.

ग्रुपमध्ये सकारात्मकता वाढते.

ग्रुपमध्ये संवेदनशीलता वाढते.

ग्रुपमध्ये कौशल्य विकसित होतं.

ग्रुपमध्ये संयम शिकता येतो.

ग्रुपमध्ये ज्ञानवृद्धी होते आणि प्रत्येकाच्या जीवनाला लयबद्धता येऊन शिस्त लागते.

ज्याला ग्रुपचे महत्त्व कळतं तो संघटित होऊन टिकून राहतो आणि कधीतरी व्यक्त होतोच..!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares