☆ इस ताण का क्या करे..?– लेखिका : योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆
☆
ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…
वेळेवर उठण्यापासुन वेळेवर झोपायचंय ह्याचाही ताण घेतो आणि एवढं करुन शेवटी झोप यायची तेव्हाच येते..
बहुतांश पब्लिक सोशल मिडिया मास्टर झाल्याने सगळ्यांना अति ज्ञान प्राप्त होतंय… त्यामुळे कुठलीही व्यक्ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या विषयांवर खाडखाड बोलू शकते…
त्यामुळे कधीकधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही आणि आपला ताण अजूनच वाढतो.
बारकाईने विचार करा…
साधं जेवणाचंच उदाहरण घ्या.. दहा वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावुन वरण- भात, भाजी, पोळी असं आनंदाने जेवायचो… कधी त्या अन्नाबद्दल आपण साशंक नव्हतो… पण आता…
या भाजीत हे व्हिटॅमिन..
पोळीत एवढ्या कॅलरी..
सॅलड पाहिजेच..
गोड नको रे बाबा…
हे तेल असं, ते तेल तसं…
१०००० पावलं चाललंच पाहिजे..
फलाणं आणि बिस्तानं…
अरे! दोन घास ताटात आलेत, ते खायचे नाहीत नीट आणि शंभर नाटकं…
शिस्तीत रहा… शिस्तीत खा.. आणि आनंदाने जगा… ही सूत्रं नाहीतच हल्ली…
प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचंय… तरुणच रहायचंय… तरुणच दिसायचंय… कशासाठी…?
तरुण मुलांना दिसू द्या की तरुण.. तुमचं तरुणपण झालंय ना जगून… आपण काय अश्वत्थामा आहोत का? पृथ्वीवरच कायम राहायला..
Accept the reality… and live your life happily.
‘मी एक अतिछोटी व्यक्ती आहे
जिला काहीही येत नाही.. काहीही दाखवायचंही नाही आणि सिद्ध तर मुळीच करायचं नाही.. ‘
असं रोज स्वतःला सांगितलं, तर आनंदी आयुष्य जगणं सोपं आहे.
फार ताण नका घेऊ… आपल्या असण्या- नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाहीये…
काही दिवसांपूर्वी मी असंंच खूप ज्ञानाचा विस्तार केला होता.. माझ्या… पण मग माझ्या लक्षात आलं की या ज्ञानाचा मला खुप जास्त ताण येतोय.
मग सगळं बंद केलं… बातम्या बघणं बंद केलं… सिनेमा आणि मालिका बघणं बंद केलं आणि आता खूप बरं वाटतंय..
आता सध्या आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करते… जुने सिनेमा बघणे… गाणी ऐकणे… आणि आवडेल ते काम करणे… हेच सूत्र आहे सध्या…
तुम्हाला एक गंमत सांगते..
नवीन वर्ष सुरू झालं तेव्हा.. भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ यायला लागले…
राहू खराब… केतू खराब… देशाचं भविष्य खराब… हे खराब ते खराब… ताण यायला लागला हो…
म्हटलं हे ऐकून, वर्षभर सोडा आपला आत्ताच निकाल लागायचा… कृष्णार्पण म्हटलं आणि दिलं सोडून…
पुण्याजवळच्या एका खेड्यातल्या ‘ जिल्हा परिषद शाळेत’ आज मोठा कार्यक्रम होता. शाळेला १० संगणक (Computers) भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन ‘मिस्टर सुहास ओक’ आले होते.
सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता – “दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे.”
शाळेच्या पटांगणात कार्यक्रम सुरू झाला. सुहासराव मंचावर (Stage) मधल्या खुर्चीत बसले होते.
त्यांची नजर अचानक मंचाच्या खाली, एका कोपऱ्यात गेली.
तिथे एक ७५-८० वर्षांचे म्हातारे गृहस्थ जमिनीवर सतरंजीवर मुलांमध्ये बसले होते. त्यांचे कपडे अत्यंत साधे होते – एक विटकं धोतर, जुना सदरा आणि डोक्यावर एक मळके उपरणं. ते सारखे खोकत होते आणि त्यांच्या पायात एक जुनी चप्पल होती.
सुहासरावांना ते दृश्य खटकलं. त्यांना वाटलं, “हा भिकारी इथे काय करतोय? माझ्यासारखा एवढा मोठा माणूस आलाय आणि इथे मंचासमोर हे असं दृश्य?”
त्यांनी मुख्याध्यापकांना (Principal) खुणेने जवळ बोलावलं.
सुहासराव रागाने कुजबुजले, “सर, तो म्हातारा कोण आहे? त्याला तिथून उठवा. माझ्या फोटोच्या फ्रेममध्ये येतोय तो. ‘स्टँडर्ड’ खराब दिसतंय शाळेचं. भिकारी वाटतोय तो, त्याला गेटच्या बाहेर काढा आणि जेवण देऊन वाटेला लावा.”
मुख्याध्यापक थोडे ओशाळले. ते म्हणाले, “साहेब, ते… ते…”
सुहासरावांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. “अहो, कसले ‘ते’? सांगा शिपायाला. उचलून बाहेर काढा त्यांना.”
शिपाई गेला आणि त्याने त्या म्हाताऱ्याला (ज्यांचं नाव ‘तात्या’ होतं) हाताला धरून उठवलं.
“तात्या, चला उठा. साहेबांना त्रास होतोय. तुम्ही मागे जाऊन बसा किंवा बाहेर थांबा.”
तात्या काहीच बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. त्यांनी आपली काठी टेकवली आणि ते थरथरत्या पायांनी मंचाच्या मागच्या बाजूला, जिथे मुलांचे बूट ठेवले होते, तिथे जाऊन एका दगडावर बसले.
कार्यक्रम पार पडला. सुहासरावांनी १० कॉम्प्युटर दिले. खूप टाळ्या वाजल्या. हार-तुरे झाले.
शेवटी भाषणाची वेळ आली.
मुख्याध्यापक माईकवर आले. त्यांचा आवाज भरून आला होता.
ते म्हणाले:”आज सुहासरावांनी आपल्याला १० कॉम्प्युटर दिले, त्याबद्दल त्यांचे आभार.
पण आज मला एका अशा व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे, ज्याने या शाळेसाठी आपलं ‘सर्वस्व’ दिलं, पण कधी स्टेजवर येऊन हार स्वीकारला नाही.
सुहासराव, मगाशी ज्यांना तुम्ही ‘भिकारी’ समजून मंचासमोरून उठवलंत आणि बूट स्टँडजवळ बसवलंत ना…
ते ‘तात्या पाटील’ आहेत.
या शाळेची जी २ एकर जमीन आहे, ज्याची आजची किंमत ५ कोटी रुपये आहे… ती जमीन या तात्यांनी शाळेला ‘दान’ दिली आहे.
तात्यांकडे राहायला स्वतःचं पकं घर नाहीये, ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांची मुलं त्यांना सोडून गेली.
म्हातारपणी औषधाला पैसे नसतात, पण दरवर्षी आपल्या पेन्शनचे पैसे साठवून ते शाळेतल्या गरिबांच्या पोरांना गणवेश (Uniform) देतात.
साहेब, तुम्ही १० कॉम्प्युटर दिलेत, पण त्यासाठी १० फोटोग्राफर आणलेत.
या माणसाने ५ कोटींची जमीन दिली, पण आज स्वतःच्याच जागेवर बसण्यासाठी त्यांना तुमच्या परवानगीची गरज लागली.
खरा ‘श्रीमंत’ कोण, हे आज तुम्हीच ठरवा.”
सगळ्या सभामंडपात स्मशानशांतता पसरली.
सुहासरावांचा चेहरा पांढराफटक पडला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
ज्या माणसाला ते कपड्यावरून ‘भिकारी’ समजत होते, त्या माणसाची दानत सुहासरावांच्या संपत्तीपेक्षा हजार पटीने मोठी होती.
सुहासराव मंचावरून खाली उतरले. त्यांचे बाउन्सर, त्यांचे फोटोग्राफर सगळे बघत होते.
सुहासराव धावत त्या मंचाच्या मागे गेले.
तिथे तात्या एका दगडावर बसून, मुलांनी दिलेलं बिस्किट खात होते.
सुहासरावांनी आपले महागडे बूट तिथेच काढले आणि त्या मळक्या धोतर नेसलेल्या तात्यांच्या पायावर डोकं ठेवलं.
“मला माफ करा तात्या! मी पैशाने श्रीमंत झालो, पण मनाने खूप गरीब राहिलो. तुम्ही खरे ‘राजा’ आहात. मी तुमची लायकी काढली, पण खरी लायकी आज मला माझी समजली.”
तात्यांनी हसून सुहासरावांच्या पाठीवर हात फिरवला.
“अरे बाबा, त्यात काय झालं? देव देतो आणि देवच नेतो. आपण फक्त माध्यम असतो. तू दिलं, मी दिलं… हे महत्त्वाचं नाही. पोरांनी शिकणं महत्त्वाचं. उठ, कपडे खराब होतील तुझे.”
सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं.
आज त्यांना समजलं होतं की, श्रीमंती बँकेच्या बॅलन्समध्ये नसते, तर ती ‘देण्याच्या’ वृत्तीमध्ये असते.
त्या दिवशी सुहासरावांनी एकही फोटो काढला नाही. त्यांनी तात्यांचा हात धरला आणि त्यांना सन्मानाने मंचावर नेऊन आपल्या खुर्चीवर बसवलं.
कोणाच्या कपड्यावरून त्यांची लायकी ठरवू नका. साध्या राहणीमागे खूप मोठं आणि श्रीमंत मन असू शकतं. दान दिल्यावर त्याचा गाजावाजा करणं म्हणजे त्या दानाची किंमत कमी करण्यासारखं आहे. ‘गुप्तदान’ हेच श्रेष्ठ दान असते जेथे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला देखील कळलेलं नसतं.
लेखक:अज्ञात
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे की चिंटूच्या समोर तुझी ती गावंढळ भाषा बोलू नकोस. उद्या त्याचा ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस ’, ‘बारा हाय न्हवं ’ किंवा ‘राम-राम’ म्हटलं ना, तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही, स्टेटस आणि क्लास बघतात! ”
समीरने आपल्या आई कावेरीवर चिडत म्हटलं. गावाहून आलेल्या कावेरीदेवी शुद्ध देशी बोली बोलत होत्या. मुलाच्या शब्दांनी त्या शांत झाल्या. त्यांनी पोटलीतून काढलेले लाडू परत आत ठेवले.
पोऱ्याला आपल्या हातचे लाडू खाऊ घालावेत, भरभरून आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती, पण मुलाच्या ‘स्टेटस’पुढे त्यांची माया दडपली गेली…
समीर आणि त्याची पत्नी रिया मागच्या महिनाभरापासून आरव (चिंटू) कडून पोपटासारखं पाठ करून घेत होते –
“Say Hello”, “Say Good Morning”, “My name is Aarav. ”
घराचं वातावरण एखाद्या मिलिट्री ट्रेनिंगसारखं झालं होतं. कावेरीदेवींना कडक सूचना होती – इंटरव्ह्यू होईपर्यंत आरवपासून दूर राहायचं!
इंटरव्ह्यूचा दिवस :
शहरातील सर्वात प्रतिष्ठित शाळा. सगळीकडे इंग्रजीत संवाद. समीर-रिया तणावात.
प्रिन्सिपल मिस्टर डिसूझा यांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यू सुरू झाला.
आरवने रटलेली उत्तरे व्यवस्थित दिली. समीरच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.
अचानक प्रिन्सिपलने विचारलं,
“बेटा, घरी एखादा मोठा पाहुणा आला किंवा आजी-आजोबांना भेटलास तर काय करतोस? ”
समीरचं हृदय धडधडलं. हे तर शिकवलंच नव्हतं!
आरव शांतपणे खुर्चीवरून उतरला… प्रिन्सिपलकडे गेला… वाकून त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला—
“परनाम गुरुजी! राम-राम! ”
क्षणभर संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली…
प्रिन्सिपल जोरात हसले आणि आरवला मांडीवर बसवलं.
“मिस्टर समीर, ” ते म्हणाले,
“आज सकाळपासून पन्नास मुलं आली. सगळे रोबोटसारखे ‘हाय-हॅलो’ म्हणत होते. पण तुमच्या मुलाने जे केलं, ती आपली संस्कृती आहे. हे संस्कार पुस्तकात मिळत नाहीत. ”
आरव आनंदाने म्हणाला,
“माझी आजी शिकवते! ती म्हणते – विद्या विनय देते, आणि सर्वात मोठं शिक्षण म्हणजे नम्रता. ”
प्रिन्सिपल म्हणाले,
“भाषा संवादाचं साधन आहे, लाजेचं कारण नाही. तुमच्या आईंना माझा नमस्कार सांगा. तुमचा मुलगा त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे निवडला गेला आहे. ”
घरी पोहोचताच समीर आईजवळ गेला. कावेरीदेवी तुळशीपाशी बसल्या होत्या.
समीर त्यांच्या चरणी नतमस्तक झाला.
“आई, मला माफ कर. झाड कितीही उंच झालं तरी मुळांपासून तुटलं तर सुकतंच. ”
त्या दिवशी समीरला उमगलं—
सूट-बूट आणि इंग्रजीने आपण ‘मॉडर्न’ होऊ शकतो, पण ‘माणूस’ संस्कारांनीच बनतो.
त्या संध्याकाळी समीर घरात येताना म्हणाला—
“राम-राम, आई. ”
कावेरीदेवींच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित कोणत्याही डिग्रीपेक्षा मौल्यवान होतं.
कथासार:
आधुनिक होणं चुकीचं नाही, पण आपल्या मुलांना, भाषेला आणि वडीलधाऱ्यांना विसरणं ही सर्वात मोठी चूक आहे.
इंग्रजी एक भाषा आहे, कौशल्य आहे. पण मातृभाषा आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहेत.
तुमच्यासाठी प्रश्न:
आजची पिढी इंग्रजीच्या मागे लागून आपल्या संस्कारांपासून दूर जात आहे, असं तुम्हाला वाटतं का?
घरात मातृभाषा बोलण्यावर भर द्यायला हवा का?
* * * *
लेखिका : ज्योति निंबाळकर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ “नो कम्प्लेंट डे!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
★★★
नो कम्प्लेंट डे!
‘जीवनात काहीही तक्रार नाही’ दिवस
हल्ली खूप सारे ‘डे’ साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे.
कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी टिचर्स डे, कधी चॉकलेट डे, कधी फ्रेन्डशिप डे तर कधी वुमन्स डे…
वर्षभरातील जवळपास प्रत्येक दिवस कुठल्यातरी ‘डे’साठी फिक्स केलेला आहे.
खरं तर आपल्याकडे म्हणजे भारतात अशा प्रकारचे ‘डे’ साजरे करण्याची आवश्यकताच नाही. कारण फक्त त्या ‘डे’च्या दिवशीच नाही, तर संपूर्ण वर्षभर आपण त्या सर्व लोकांचा सन्मान करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे…
आपल्याकडे खरी गरज आहे ती स्ट्रेस फ्री डे, नो चिडचीड डे, अॅप्रीशिएशन डे आणि नो कम्प्लेंट डे सारखे ‘डे’ साजरे करण्याची…
आपण आयुष्य आनंदाने जगतच नाही. कायम कसली तरी कम्प्लेंट करीत असतो. आज काय चहात साखरच कमी होती, भाजीत मीठच जास्त होतं, गाडीत पेट्रोलच नव्हतं, तिथे पंखाच नव्हता, त्याने मला विचारलंच नाही, मला बसायला खुर्चीच नव्हती, त्याने मला निमंत्रणच दिलं नाही, प्यायला थंडगार पाणीच नाही, पायात घालायला चांगले पॉलीश केलेले शूज नाहीत, चांगले कपडेच नाहीत, माझ्याजवळ अॅपलचा मोबाईलच नाही आणि बरंच काही… नुसती कम्प्लेंट, कम्प्लेंट आणि कम्प्लेंट!
अरे आपण कधी खूश राहणार? जे आहे त्यात खूश राहता येऊ शकत नाही काय?
एखादे दिवशी चहात साखर कमी झाली, म्हणून एवढी चिडचिड करायची काही आवश्यकता नाही. झाली तर झाली कमी साखर, कुणी मुद्दामहून तर असं करीत नाही ना.
आपणच आपलं निरीक्षण करू या की, आपण किती गोष्टीवर उगीचच चिडचिड करतो. दिवसभरात किती कम्प्लेंटस करत राहतो आणि ठरवून टाकू की किमान एक दिवस तरी ‘नो कम्प्लेंट डे’ साजरा करु या.
खरं तर एरवी हे ‘डे’ वर्षातून एकदाच असतात. आपण मात्र नो कम्प्लेंट डे अगोदर महिन्यातून एकदा मग आठवड्यातून एकदा आणि सवय झाल्यावर मग रोजच्या रोज साजरा करू या. बघा मजा येईल.
पण
कृपया या मेसेज बद्दल कुणी कम्प्लेंट करू नये.
★★★
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता. तेव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. जिवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकून त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीचं काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदलीमध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्रचंड आटापिटा करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.
दुसऱ्या दिवशी लवजम्यासहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गीमधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्याच्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकऱ्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देण्याकरता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थिकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.
त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत आला. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याकडे चौकशी केली की हा कोणत्या इयत्तेत शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं. त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.
त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंडच्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळलं की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे. त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षणदेखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.
ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता. आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणारे सर्व डॉक्टर, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसीमुळेच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.
बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धनिकाच्या त्याच मुलाचा जीव वाचवला होता. हा कुठेतरी प्रामाणिकपणाने, कृतज्ञ पणाने स्वतःच्या मुलाला वाचवल्याची परतफेड करण्याकरता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.
आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो.
तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल, तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, पेनिसिलीन.
म्हणून इतरांना मदत करा. नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी. आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातूनच नवीन काहीतरी निर्माण होत असते.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘मनातला कचरा…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
मनावरील ताण कमी करण्यासाठी उत्तम उपाय!
‘समीर’ (वय २८) हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. कामाचा प्रचंड ताण, डोक्यावर ३० लाखाचं गृहकर्ज आणि ऑफिसमधे बॉसचा जाच. समीर नेहमी चिडचिड करायचा. त्याच्या चेहऱ्यावर कधीच हास्य नसायचं. त्याला वाटायचं, “जगात फक्त मलाच दुःख आहे. “
तो रोज संध्याकाळी पार्कमध्ये जाऊन एका बाकड्यावर बसत असे. तिथेच समोरच्या बाकड्यावर एक ७०-७५ वर्षांचे आजोबा, ज्यांना सगळे ‘दामू काका’ म्हणायचे, बसलेले असायचे. दामू काका दिसायला एकदम साधे. पांढरा सदरा, डोक्यावर गांधी टोपी.
त्यांच्या हातात नेहमी एक ‘जाड काळ्या रंगाची डायरी’ आणि एक पेन असायचं.
ते कोणाशीच बोलायचे नाहीत. ते फक्त मान खाली घालून त्या डायरीत काहीतरी भरभर लिहीत असायचे. कधी कधी ते थांबायचे, आकाशाकडे बघून हसायचे आणि पुन्हा लिहायला लागायचे.
समीरला त्यांचा खूप राग यायचा. “काय म्हातारा आहे? घरात बसून देवाचं नाव घ्यायचं सोडून इथे येऊन काय कादंबरी लिहितोय? “
एक दिवस समीरचा बॉसशी खूप मोठा वाद झाला. समीरला रडू येत होतं. तो पार्कमध्ये आला आणि डोक्याला हात लावून बसला.
तेवढ्यात त्याला खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला.
दामू काका उभे होते.
काका शांतपणे म्हणाले, “बाळा, खूप ओझं झालंय का डोक्यावर? माझ्याकडे दे, मी हलकं करतो. “
समीर चिडला. “तुम्ही काय करणार? तुम्ही काय जादूगार आहात? जा. तुमचं काम करा. “
दामू काका हसले. त्यांनी आपली ती ‘काळी डायरी’ उघडली आणि पेन समीरच्या हातात दिलं.
“हे बघ, मी जादूगार नाही. मी फक्त एक ‘कचरा वेचणारा’ आहे.
लोक घरातला कचरा डस्टबिनमध्ये टाकतात, पण डोक्यातल्या कचऱ्याचं काय?
त्याचा वास येतो, तो सडतो आणि मग माणूस वेडा होतो.
माझं एकच काम आहे… लोकांच्या डोक्यातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे.
तुला ज्या गोष्टीचा त्रास होतोय, ज्याचा राग येतोय, ते सगळं या पानावर लिही. शिव्या दे, रड, ओरड… सगळं या कागदावर उतरव. “
समीरला काय वाटलं कुणास ठाऊक, त्याने पेन घेतलं आणि लिहायला सुरुवात केली.
बॉसचा राग, कर्जाचं टेन्शन, बायकोशी झालेला वाद, स्वतःचा अपयशीपणा…
समीर लिहीत गेला. १ पान, २ पानं… ४ पानं भरली.
लिहिता लिहिता समीरच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्याचा हात थरथरत होता.
पण जसं जसं तो लिहीत होता, तसं तसं त्याच्या छातीवरचं ओझं कमी होत होतं.
त्याला वाटलं, जणू कोणीतरी त्याच्या मनातला ‘विषारी वायू’ काढून घेतलाय.
लिहून झाल्यावर त्याने काकांकडे बघितलं.
काकांनी ती ४ पानं डायरीतून फाडली.
समीरला वाटलं ते वाचतील.
पण काकांनी खिशातून एक लायटर (Lighter) काढला.
आणि समीरच्या डोळ्यादेखत ती लिहिलेली ४ पानं… जाळून टाकली.
समीर ओरडला, “अहो! हे काय करताय? मी इतकं महत्त्वाचं लिहिलं होतं! “
दामू काका हसले आणि म्हणाले:
“बाळा, ते महत्त्वाचं नव्हतं, तो ‘कचरा’ होता.
एकदा कचरा घराबाहेर काढला की आपण तो जपून ठेवतो का? नाही ना?
मग मनातल्या वेदना कागदावर का जपून ठेवायच्या?
तू लिहिलंस… तुझं मन रिकामं झालं.
आणि मी जाळलं… म्हणजे त्या समस्या आता अस्तित्वातच नाहीत.
आता तू मोकळा आहेस. नवीन सुरुवात कर. “
समीरला त्या दिवशी खूप शांत झोप लागली.
त्यानंतर समीर रोज काकांकडे जायचा. काही ना काही लिहायचा आणि काका ते पान जाळून टाकायचे.
समीरच नाही, तर पार्कमधले अनेक लोक आता काकांकडे आपला ‘मानसिक कचरा’ टाकायला येत होते.
काका कोणाचंही गुपित वाचत नसत. ते फक्त जाळत असत.
सहा महिन्यांनंतर…
एक दिवस समीर पार्कमध्ये आला, पण दामू काकांचा बाकडा रिकामा होता.
दुसऱ्या दिवशीही ते आले नाहीत.
तिसऱ्या दिवशी समीरला समजलं की, रात्री झोपेतच दामू काकांचं निधन झालं.
समीर धावत काकांच्या घरी गेला.
तिथे काकांचा मुलगा सामान आवरत होता.
समीरने विचारलं, “त्यांची ती डायरी कुठे आहे? मला ती बघायची आहे. “
मुलाने कपाटातून ती ‘काळी जाड डायरी’ काढून समीरच्या हातात दिली.
समीरला वाटलं, यात काकांनी जगाचं रहस्य, काहीतरी मोठं ज्ञान लिहून ठेवलं असेल.
त्याने थरथरत्या हाताने डायरी उघडली.
पहिलं पान… कोरे (Blank).
संदुसरं पान… कोरे.
तिसरं… चौथं… शेवटचं पान…
संपूर्ण डायरी ‘कोरी’ होती.
त्या डायरीच्या शेवटच्या कव्हरवर काकांच्या अक्षरात फक्त एक ओळ लिहिलेली होती:
“माणसाने आठवणी ठेवाव्यात, पण जखमा नाही. मी माझं आयुष्य रोज जाळलं, म्हणूनच रोज नव्याने जगलो. “
समीरला समजलं की काका रोज संध्याकाळी डायरीत काय लिहीत होते?
ते काहीच लिहीत नव्हते.
ते फक्त दिवसभराच्या कटू आठवणी कागदावर उतरवून त्या जाळून टाकत होते.
त्यांनी कधीच दुःख ‘साठवून’ ठेवलं नाही, म्हणून ते ७५ व्या वर्षीही मुलासारखे हसत होते.
समीरने त्या दिवशी ती कोरी डायरी आपल्यासोबत घेतली.
लिहण्यासाठी नाही… तर हे आठवण्यासाठी की, “जगण्याचं पहिलं सूत्र म्हणजे विसरणे (Letting go). “
आपण मोबाईलची मेमरी फुल झाली की ‘क्लीन’ करतो, पण मनाची मेमरी कधीच क्लीन करत नाही. जुन्या भांडणांचं आणि अपमानाचं ओझं वाहून नेऊ नका.
रोजच्या रोज मनातला कचरा कागदावर उतरवा आणि जाळून टाका. ‘रिकामं मन हेच आनंदाचं घर असतं. ‘
*
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ रील आणि लाईक्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆
☆
‘स्नेहा’ (वय २८) ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Influencer) होती. तिचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्स होते.
#स्त्रीशक्ती
तिचं आयुष्य म्हणजे फक्त कॅमेरा, रिंग लाईट आणि फिल्टर होतं.
तिचा ६ वर्षांचा मुलगा, ‘आर्यन’, अनेकदा तिच्या व्हिडिओमध्ये दिसायचा. लोक कमेंट करायचे, “So cute! Best Mom-Son duo!”
पण कॅमेरा बंद झाला की स्नेहाचं रूप वेगळं असायचं.
त्या दिवशी रविवार होता.
स्नेहा बेडरूममध्ये मेकअप करून तयार झाली होती. तिला “मदर्स डे स्पेशल” (Mother’s Day Special) रील बनवायची होती.
थीम होती – ‘आईचं प्रेम: जगातील सर्वात सुरक्षित जागा.’
बाजूच्या हॉलमध्ये आर्यन खेळत होता. तो एकटाच होता, कारण बाबा बिजनेस ट्रिपवर गेले होते.
आर्यन धावत बेडरूममध्ये आला. त्याच्या हातात एक तुटलेलं खेळणं होतं.
“मम्मा… मम्मा… हे बघ ना. हे तुटलं. मला भीती वाटतेय, ते सोफ्याखाली गेलंय.”
स्नेहा रिंग लाईट सेट करत होती. ती चिडली.
“आर्यन! तुला कितीदा सांगितलंय मी शूट करतेय? मध्ये मध्ये नको येऊ.
जा बाहेर खेळ. मी १० मिनिटात येते.
मला मूड खराब नकोय माझा. गेट आऊट!”
तिने आर्यनला रागाने हॉलमध्ये ढकललं आणि बेडरूमचा दरवाजा आतून ‘लॉक’ केला. जेणेकरून आर्यनचा आवाज व्हिडिओमध्ये येऊ नये.
बिचारा आर्यन रडवेला झाला. तो हॉलमध्ये एकटाच खेळू लागला.
रेकॉर्डिंग सुरू झालं.
बेडरूममध्ये स्नेहा कॅमेरासमोर अतिशय भावूक होऊन ॲक्टिंग करत होती.
बॅकग्राउंडला एक इमोशनल गाणं वाजत होतं… “तुझसे नाराज नहीं जिंदगी…”
स्नेहा ओठांची हालचाल (Lip-sync) करत होती. डोळ्यातून खोटे अश्रू काढत होती.
कॅप्शन होतं: “माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते. तोच माझा श्वास आहे.”
ती १०-१५ मिनिटं त्या बंद खोलीत रील बनवण्यात मग्न होती. तिने ५-६ रिटेक (Retakes) घेतले.
बाहेर हॉलमध्ये काय चाललंय, याचा तिला थांगपत्ता नव्हता.
इकडे हॉलमध्ये, आर्यन खेळता खेळता ‘स्टोर रूम’ कडे गेला.
तिथे एक जुनी, मोठी ‘लाकडी पेटी’ (Antique Trunk) ठेवली होती, जी स्नेहाने ‘व्हिंटेज शूट’ साठी आणली होती.
त्या पेटीचं झाकण उघडं होतं.
आर्यनला लपाछपी खेळायची हुक्की आली. त्याला वाटलं, “मी यात लपतो, मम्मा आली की तिला ‘धप्पा’ करेन.”
तो त्या मोठ्या पेटीत उतरला.
तो आत बसला… आणि चुकून त्याचा हात झाकणाला लागला.
त्या जुन्या पेटीचं जड झाकण “धडाम!” करून खाली पडलं.
त्या पेटीला बाहेरून ‘ऑटो-लॉक’ (Self-locking latch) होतं. ते जुन्या पद्धतीचं होतं.
झाकण पडताच कडी अडकली. पेटी लॉक झाली.
आर्यन अंधारात घाबरला.
तो ओरडू लागला. “मम्मा! मम्मा! दार उघड! मी अडकलोय!”
तो पेटीवर हाताने बुक्क्या मारत होता. “धड… धड… धड…”
त्या पेटीत हवा जायला जागा नव्हती. ऑक्सिजन कमी होऊ लागला.
त्याचा श्वास गुदमरू लागला.
तो जीवाच्या आकांताने ओरडत होता… “मम्मा… वाचव… मम्मा…”
पण बेडरूममध्ये?
स्नेहाच्या कानात ‘एअरपॉड्स’ (Airpods) होते. ती गाण्यात मग्न होती.
आणि तसंही तिने दरवाजा साऊंडप्रूफ केला होता.
तिने आपलं ‘परफेक्ट रील’ बनवलं. ते एडिट केलं. फिल्टर लावला आणि ‘पोस्ट’ केलं.
काही मिनिटातच लाईक्सचा पाऊस पडू लागला.
“Wow Sneha! You are truly a great mother!” अशा हजारो कमेंट्स आल्या.
स्नेहा खुश झाली.
ती रुमबाहेर आली. “आर्यन? कुठेय माझा बाळ?”
हॉल शांत होता.
तिला वाटलं तो लपला असेल किंवा झोपला असेल.
तिने पूर्ण घर शोधलं. किचन, बाल्कनी, सोफ्याखाली.
आर्यन कुठेच नव्हता.
ती घाबरली. तिने सोसायटीच्या वॉचमनला फोन केला.
“माझा मुलगा खाली आलाय का?”
वॉचमन म्हणाला, “नाही मॅडम. कोणीच नाही आलं.”
स्नेहाची अवस्था वेड्यासारखी झाली.
ती रडत रडत पुन्हा घरात आली.
अचानक तिची नजर त्या ‘स्टोर रूम’ कडे गेली.
तिथे ती जुनी पेटी ठेवली होती.
ती पेटी तिला थोडी हलल्यासारखी वाटली नाही, पण तिला तिथे संशयास्पद शांतता जाणवली.
ती धावत गेली. तिने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला. ती लॉक होती.
तिच्या काळजात धस्स झालं.
तिने कसं तरी करून, स्क्रू ड्रायव्हरने ती कडी तोडली आणि झाकण उघडलं.
आणि…
स्नेहाने जी किंकाळी फोडली, ती पूर्ण इमारतीने ऐकली.
आत आर्यन पडला होता.
त्याचं शरीर निळं पडलं होतं.
त्याचे डोळे उघडे होते… आणि चेहऱ्यावर एक भयानक भीती होती.
तो मम्माला हाक मारत मारत गुदमरून गेला होता.
त्याच्या हाताची नखं पेटीच्या आतल्या बाजूला ओरबाडून तुटली होती.
स्नेहा त्याला हलवू लागली. “आर्यन! उठ ना बाळा! मम्मा आली बघ! उठ ना!”
ती त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली.
डॉक्टरांनी चेक केलं आणि मान हलवली.
“I am sorry. He is gone. मृत्यू होऊन किमान २० मिनिटं झाली आहेत. गुदमरून जीव गेलाय (Asphyxia).”
पोलिस आले. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.
स्नेहा आकांताने रडत होती. तिचं आयुष्य संपलं होतं.
पोलिस इन्स्पेक्टर ‘जाधव’ तपासासाठी घरी आले.
त्यांना शंका होती की नक्की त्यावेळी काय घडलं?
त्यांनी स्नेहाचा मोबाईल जप्त केला.
इन्स्पेक्टरने गॅलरी उघडली.
त्यात तो ‘शेवटचा व्हिडिओ’ (Raw Footage) होता, जो स्नेहाने एडिट करण्याआधी रेकॉर्ड केला होता.
या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं. फक्त स्नेहाची ॲक्टिंग आणि आजूबाजूचा आवाज (Ambient Sound) होता.
इन्स्पेक्टरने हेडफोन लावले आणि तो व्हिडिओ प्ले केला.
व्हिडिओमध्ये स्नेहा हसत होती, रडल्याचं नाटक करत होती.
पण…
व्हिडिओच्या बॅकग्राउंडला, अतिशय बारीक पण स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला होता.
“धड… धड… धड…” (पेटीवर मारल्याचा आवाज).
आणि एका लहान मुलाचा गुदमरलेला, क्षीण आवाज…
“मम्मा… मम्मा… वाचव… मम्मा…”
स्नेहा कॅमेरासमोर ॲक्टिंग करत होती, “माझ्या मुलासाठी मी जीव देऊ शकते…”
आणि त्याच क्षणी, बॅकग्राउंडला तिचा मुलगा खरोखर जीव देत होता.
तिच्या कॅमेऱ्याने त्याच्या मृत्यूचा आवाज रेकॉर्ड केला होता, जो तिने ‘एअरपॉड्स’ आणि ‘लाईक्स’ च्या नादात ऐकला नाही.
जेव्हा पोलिसांनी स्नेहाला तो ऑडिओ ऐकवला…
स्नेहाने स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतलं.
“मी मारलं! माझ्या रीलने त्याला मारलं!
मी जगाला दाखवायला ‘प्रेम’ करत होते, पण माझा बाळ शेजारच्या खोलीत मरत होता!”
आज स्नेहा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे.
ती कोणाशीच बोलत नाही.
ती फक्त भिंतीवर बोटं फिरवते, जणू काही ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतेय.
आणि अधून मधून ओरडते… “कट! कट! रिटेक घ्या! माझा आर्यन परत येईल!” पण आयुष्यात ‘रिटेक’ नसतात.
सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण इतके हरवलोय की, वास्तवातल्या आपल्या माणसांच्या हाका आपल्याला ऐकू येत नाहीत. मोबाईलचा स्क्रीन बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांकडे बघा. कारण ‘लाईक्स’ (Likes) लाख मिळतील, पण गेलेला ‘जीव’ पुन्हा मिळणार नाही. मुलांसाठी ‘परफेक्ट आई’ सोशल मीडियावर नाही, तर घरात बना.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रा. डॉ. लोपा मेहता, या मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्यांनी तेथील एनॅटॉमी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले.
७८ व्या वर्षी त्यांनी ‘लिव्हिंग विल‘ तयार केले. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे —
‘जेव्हा शरीर साथ देणे बंद करेल, आणि सुधारण्याची कोणतीही शक्यता उरणार नाही, तेव्हा माझ्यावर उपचार करू नयेत.
ना व्हेंटिलेटर, ना ट्यूब, ना रुग्णालयातील निरर्थक धावपळ.
माझा शेवटचा काळ शांततेत जावा — जिथे उपचारांच्या हट्टापेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य असेल.’
डॉ. लोपा यांनी केवळ हा दस्तऐवजच लिहिला नाही, तर मृत्यूविषयी एक संशोधन-पत्रही प्रकाशित केले. त्यात त्यांनी मृत्यू ही एक नैसर्गिक, निश्चित आणि जैविक प्रक्रिया आहे, असे स्पष्ट केले आहे.
त्यांचा मुद्दा असा की, आधुनिक वैद्यकशास्त्राने मृत्यूला स्वतंत्र संकल्पना म्हणून कधी पाहिलेच नाही. वैद्यकशास्त्राचा आग्रह असा राहिला, की मृत्यू नेहमी एखाद्या आजारामुळेच येतो, आणि जर आजारावर इलाज झाला, तर मृत्यू रोखता येतो.
पण शरीराचे विज्ञान त्याहून खूप खोल आहे.
त्यांचा युक्तिवाद असा आहे — शरीर हे अखंड चालणारे यंत्र नाही. ती एक मर्यादित प्रणाली आहे, ज्यात ठराविक जीवनशक्ती असते. ही ऊर्जा कुठल्यातरी टाकीमधून मिळत नाही, तर सूक्ष्म शरीरामार्फत मिळते.
हेच ते सूक्ष्म शरीर, ज्याचा अनुभव प्रत्येकाला येतो, पण जो दिसत नाही. मन, बुद्धी, स्मृती आणि चेतना — या सगळ्यांनी मिळून बनलेली ही प्रणाली आहे.
हे सूक्ष्म शरीर म्हणजे जीवनशक्तीचं प्रवेशद्वार आहे. ही ऊर्जा संपूर्ण देहात पसरते, आणि शरीर जिवंत ठेवते. हृदयाची धडधड, पचनक्रिया, विचार करण्याची क्षमता — हे सगळे तिच्या आधारावर चालते.
पण ही शक्ती अमर्याद नाही. प्रत्येक शरीरात तिचे एक ठराविक प्रमाण असते. जसे एखाद्या यंत्रात बसवलेली फिक्स्ड बॅटरी— ना वाढवता येते, ना कमी करता.
“जितकी चावी भरली रामाने, तितके चालेल खेळणे” — असा प्रकार.
डॉ. लोपा लिहितात, की जेव्हा शरीरातील ही ऊर्जा संपते, तेव्हा सूक्ष्म शरीर देहापासून वेगळे होते. तोच क्षण म्हणजे देह स्थिर होतो, आणि आपण म्हणतो, “प्राण गेले. ”
ही प्रक्रिया ना आजाराशी संबंधित असते, ना कुठल्या चुकांशी. ही शरीराची अंतर्गत लय आहे — जी गर्भातच सुरू होते, आणि पूर्ण होऊन मृत्यूला पोहोचते.
या ऊर्जेचा खर्च प्रत्येक क्षणी चालतो — प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव आपला जीवनावधी संपवतो. आणि जेव्हा संपूर्ण देहाचे “कोटे” पूर्ण होतात, तेव्हा शरीर शांत होते.
मृत्यूचा क्षण हा घड्याळाने मोजलेला नसतो. तो एक जीवनशास्त्रीय वेळ असतो — जो प्रत्येकासाठी वेगळा.
कुणाचे जीवन ३५ वर्षांत पूर्ण होते, तर कुणाचे ९० वर्षांत. पण दोघेही आपली पूर्ण वाटचाल करतात.
जर आपण त्याला पराभव किंवा जबरदस्ती मानले नाही, तर कुणीही अपुरे मरत नाही.
डॉ. लोपा यांच्या मते आधुनिक वैद्यकशास्त्र जेव्हा मृत्यू टाळण्याचा हट्ट धरते, तेव्हा केवळ रुग्णाचे शरीरच नाही तर संपूर्ण कुटुंब थकते.
ICU मधील महिनाभराची श्वासोच्छ्वासाची किंमत कधी कधी आयुष्यभराच्या बचतीला नेस्तनाबूत करते.
नातेवाईक म्हणत राहतात — “अजून आशा आहे, पण रुग्णाचा देह कधीच सांगून गेलेला असतो — “आता पुरे”.
म्हणूनच त्या लिहितात — जेव्हा माझी वेळ येईल, तेव्हा फक्त मला KEM रुग्णालयात घेऊन या. जिथे मला खात्री आहे, की अनावश्यक हस्तक्षेप होणार नाही. उपचारांच्या नावाखाली दूरगामी त्रास दिला जाणार नाही. माझ्या शरीराला रोखले जाणार नाही — त्याला जाऊ द्या”*.
पण प्रश्न हा आहे — आपण आपल्यासाठी असे काही ठरवले आहे का?
आपले कुटुंब त्या इच्छेचा मान ठेवेल का? आणि जे मान ठेवतील त्यांना समाजात मान मिळेल का?
आपल्या रुग्णालयांत अशा इच्छेचा सन्मान आहे का, की अजूनही प्रत्येक श्वासावर बिल होणार आणि प्रत्येक मृत्यूवर दोषारोप?
हे इतके सोपे नाही. तर्क आणि भावना यांचा समतोल साधणे कदाचित सर्वात कठीण काम आहे.
जर मृत्यूला आपण शांत, नियत आणि शरीराच्या अंतर्गत गतीतून आलेली प्रक्रिया म्हणून पाहायला शिकलो, तर कदाचित मृत्यूची भीती कमी होईल, आणि डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा जास्त वास्तववादी होतील.
माझ्या मते, मृत्यूशी लढणे थांबवायला हवे आणि त्याआधी जगण्यासाठी तयारी करायला हवी.
आणि जेव्हा तो क्षण येईल — तेव्हा शांतपणे, सन्मानाने त्याला सामोरे जावे.
बुद्धांच्या भाषेत — मृत्यू म्हणजे जीवनाच्या प्रवासातील पुढचा टप्पा आहे.
लेखक:अज्ञात
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈