मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ जीवनाचा प्रवास… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

हा असं वागला, तो तसं वागला,

कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो, याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.

 या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत, हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोणी कसंही वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.

 आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली, तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.

जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे, असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.

आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.

 ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, त्याला अजूनही नोकरी नाही.

 कृतज्ञ रहा.

 *

ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत, पण यश मिळाले नाही.

 कृतज्ञ रहा.

 *

तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे, जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.

 कृतज्ञ रहा.

 *

ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे.

 कृतज्ञ रहा.

 *

तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.

 कृतज्ञ रहा.

  

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
3

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापन…” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापन…” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

आयुष्याच्या एका वळणावर खूपच तीव्रतेने हे जाणवतं की आपला वेळ आणि ऊर्जा महत्वाची आणि मुख्य म्हणजे मर्यादित आहे. त्यामुळे अनावश्यक वादा-वादी, बिनमहत्त्वाची संभाषणे, आपल्या आयुष्यात ज्यांचं फार महत्त्व कधीही नव्हतं अशा केवळ जुन्या म्हणून जोपासलेल्या ओळखी, नाती, माणसं ह्यांच्यावर आपला वेळ आणि ऊर्जा खर्चणं हे नकोसंच नव्हे तर क्रिमिनल वाटायला लागतं.

खरं तर ही उपरती यायला वयाच्या पस्तिशीतच सुरुवात झालेली असते, पण हे स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल करायला अजून काही काळ जावा लागतो, आणि ते तसं कबूल केल्यानंतरही आहे हे असं आहे ह्याचा कुठलाही अपराध भाव न ठेवता स्वीकार करायला आणि मुख्य म्हणजे कोणाचीही भीड मुर्वत न बाळगता त्याप्रमाणे वागायला अजून काही महिने/वर्षे जावी लागतात.

ही जाणीव अचानक येत नाही. ती एखाद्या नदीसारखी आपल्या मनाच्या दरीत हळूहळू आपला मार्ग कोरत जाते. इंटरनेटवरच्या एखाद्या निरर्थक भांडणानंतर जाणवणारा मानसिक थकवा, अर्धा तास स्क्रोल केल्यानंतर जाणवणारं रिकामपण, एखाद्या जुजबी ओळखीच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून झाल्यावर आतून जाणवणारा कंटाळा, ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर होणारी चिडचिड, आणि त्या चिडचिडीची त्याच क्षणी जाणवणारी व्यर्थता, हे सगळे खरं तर लहान लहान इशारे असतात. आपण ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित करतो, कारण नात्यांना जपणं, माणसं सांभाळणं, आपला मुद्दा कसंही करून लोकांना पटवून देणं हे सगळंच आपल्या रक्तात भिनलेलं असतं. पण एक दिवस असा येतो की शरीर आणि मन दोन्ही एकाच वेळी स्पष्ट सांगतात की आता बास झालं. हा दिवस एका नव्या स्पष्ट, टोकदार जाणिवेच्या कोंभासारखा असतो, जो आपल्या मनाची जमीन फाडून जन्म घेत असतो.

इथून पुढचा प्रवास सोपा नसतो, पण तो खरा असतो. सुरुवातीला अपराधीपणाची एक सावली सतत मागे मागे येत राहते. जमणार नसलेल्या कोणाच्यातरी कसल्यातरी कामाच्या विनंतीला स्पष्टपणे नाही म्हटलं की मन स्वतःलाच कुरतडत राहतं. कधी मनात नसूनसुद्धा जुन्या सवयीने वाद घातले जातात, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे माहिती असताना देखील. नुसत्याच जुन्या ओळखीच्या म्हणून मंद आचेवर ठेवलेल्या नात्याचा बर्नर आपण ऑफ करतो तेव्हा कुठल्यातरी कोपऱ्यातून जुन्या संस्कारांचा आवाज कानात घुमतो. पण नंतर हळूहळू लक्षात येतं की हा अपराधभाव आपला स्वतःचा नाही, तो आपल्याकडे भरपूर वेळ आहे ह्या भ्रामक जाणिवेतून जन्मलेला आहे. एकदा ते समजलं की मग त्या विचारांच्या विळख्यातून स्वतःला बाहेर काढणं सहज शक्य होतं.

आपल्या वेळेकडे आणि ऊर्जेकडे पैशासारखं बघायला शिकावं लागतं. जसं आपण महिन्याचं बजेट आखतो, तसंच आपल्या दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं, वर्षाचं भावनिक बजेट आखता यायला हवं. कोणत्या व्यक्तींसोबत घालवलेला वेळ आपल्याला नवी ऊर्जा देतो आणि कोणाबरोबर घालवलेला वेळ आपल्याला ड्रेन करतो, हे एकदा स्पष्ट कळायला लागलं की निवड करणं सोपं होतं.

दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला शिकणं. हा एकच छोटा शब्द, नुसता उच्चारायला सोपा वाटणारा, पण अंगी बाणवायला सर्वात कठीण. एखाद्या आमंत्रणाला, एखाद्या मागणीला, एखाद्या संभाषणाला नाही म्हणताना खरंतर कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. तरीही आपण मोघम बोलतो, एखादी गोष्ट मनातून करायची नसली तरी, ‘हो, बघू, जमलं तर करतो/करते’, असं काहीतरी बोलून आपण वेळ मारून नेतो. पुढच्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढतात आणि नंतर नाही म्हणणं अधिकच कठीण होऊन बसतं. त्यापेक्षा आधीच जे जमणार नाही/जमलं तरी करावंसं वाटत नाही त्याला स्पष्टपणे नकार द्यायला शिकलं पाहिजे.

तिसरी गोष्ट, जुन्या ओळखींकडे, जुन्या नात्यांकडे कृतज्ञतेने बघावं, पण केवळ जुन्या ओळखी आहेत म्हणून त्या टिकवण्याची सक्ती स्वतःवर लादू नये. एकतर्फी सक्ती तर स्वतःवर कधीच करू नये. एखादं नातं भूतकाळात कधीतरी महत्त्वाचं होतं म्हणून ते आताही तितकंच महत्त्वाचं असलं पाहिजे हा काही नियम नाही. काही नाती द्यायचं ते देऊन आयुष्याच्या प्रवाहाबरोबर पुढे जातात. त्यांना तिथेच समंजसपणे निरोप देणं हा त्या नात्याचा अपमान नसतो, ती त्या नात्याचा दिलेली योग्य तिलांजली असते.

चौथी गोष्ट, तुमचं समाज माध्यमांवरचं किंवा व्यावसायिक जीवनातलं वर्तुळ कितीही विस्तृत असो. आपल्या भोवतीचं खऱ्या आयुष्यातल्या मोलाच्या माणसांचं वर्तुळ नेहमी लहान आणि निवडकच ठेवावं. ज्यांच्याशी बोलल्यावर मन हलकं होतं, ज्यांच्यासमोर मुखवटा घालावा लागत नाही, तुम्ही जसे आहेत तसे तुम्हाला स्वीकारणारी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच असतात, आणि तितकीच पुरेशी असतात. पण ती नाती मात्र जपली-जोपासली गेलीच पाहिजेत. आपल्या भोवती पाच हजार लोकांची गर्दी जमवणं हे यश नाही, रात्री तीन वाजता देखील एका हाकेवर धावून येतील अशी पाच माणसं आयुष्यात असणं हे यश आहे.

पाचवी गोष्ट, रोजच्या दिवसात थोडा वेळ केवळ स्वतःसाठी राखून ठेवणं. पहाटेची शांत वेळ, एक कप चहा, थोडं वाचन, थोडं चालणं, ध्यान, थोडा व्यायाम, संगीत, नृत्य, एखादी हस्तकला, ह्यातलं काहीही करा पण तो वेळ इतर कोणाशीही वाटून घेण्याची गरज नाही. हा केवळ स्वतःसाठी राखून ठेवलेला वेळ आपल्याला उरलेल्या दिवसासाठी स्थिर ठेवतो. ह्या एकांतात सोबतीला कुठलाही मोबाईल, कुठलीही स्क्रीन नसावी, कारण खरं एकटेपण आणि स्क्रीनसमोरचं एकटेपण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिलं आपल्याला भरभरून देतं, दुसरं आपल्याला रितं करतं.

सहावी गोष्ट, आपल्या शरीराचं ऐकायला शिकावं. झोप पुरेशी झाली नाही की मन कमकुवत होतं आणि मग नकोसे संवाद, नकोसे विचार आपल्यावर सहज स्वार होतात. वेळेवर घेतलेलं, साधं, सकस, घरी बनवलेलं जेवण, पुरेशी झोप, रोजचा थोडा, पण नियमित व्यायाम, स्वतःसाठी शिल्लक ठेवलेला थोडा वेळ, ह्या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टीच भावनिक स्पष्टतेचा पायाच असतात. शरीर थकलेलं असताना मनाने घेतलेले निर्णयही बहुधा चुकीचेच ठरतात, म्हणून आधी शरीराला विश्रांती द्यावी, मग मनाला निर्णय घेऊ द्यावा.

सातवी गोष्ट, सणासुदीला, कौटुंबिक प्रसंगांना उपस्थित राहायचं की नाही हे ठरवताना जिथं मनापासून जावंसं वाटतं तिथे जावं, भरपूर वेळ तिथे घालवावा. जिथे केवळ कर्तव्य म्हणून जावं लागतं तिथेही जरूर जावं, पण आवश्यक तितकं अंतरही ठेवावं. असं करणं म्हणजे परंपरेचा अनादर नाही, तर स्वतःच्या मर्यादांचा आदर आहे.

आठवी आणि कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट, हे सगळं करताना स्वतःला दोष न देणं. आपला वेळ आणि ऊर्जा ह्यांना प्राथमिकता देणं हा स्वार्थ नाही. अनावश्यक बोजा खाली ठेवून जे हात आपण रिकामे केले, ते नंतर खऱ्या अर्थाने आपल्याला महत्त्वाच्या असणाऱ्या कामांसाठी, माणसांसाठी, ध्येयपूर्तीसाठी मोकळे राहतात. जुन्या झाडाची वाळत आलेली, निरुपयोगी फांदी छाटली की तिथेच नवीन अंकुर फुटतात. झाड अधिक जोमाने वाढतं, तसंच आपलं आयुष्यही ह्या छाटणीनंतर अधिक सशक्त होतं. एकदा हे सत्य उमगलं की पुढचा रस्ता आधीपेक्षा जास्त उजळ, जास्त हलका आणि जास्त आपला वाटायला लागतो.

लेखिका:शेफाली वैद्य

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वयानुसार येणाऱ्या बदलांचा स्वीकार करा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “वयानुसार येणाऱ्या बदलांचा स्वीकार करा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

एका ६५ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले.

ऑपरेशन टेबलवर असताना तिला मृत्यूच्या अगदी जवळचा अनुभव (near-death experience) आला.

देवाला पाहून तिने विचारले: “माझी वेळ भरली आहे का?”

देव म्हणाला:

“नाही, तुला अजून ३३ वर्षे, २ महिने आणि ८ दिवस जगायचे आहे.”

सावरल्यानंतर, त्या महिलेने रुग्णालयातच राहून ‘फेस-लिफ्ट’, ‘लिपोसक्शन’, ‘ब्रेस्ट इम्प्लांट्स’ आणि ‘टमी टक’ (पोटाचा आकार सुधारण्याची शस्त्रक्रिया) करून घेण्याचा निर्णय घेतला.

तिने आपले केस रंगवून घेतले आणि दातही अधिक चमकदार करून घेतले!

आपल्याकडे जगण्यासाठी अजून खूप वेळ आहे, त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा, असे तिला वाटले.

तिची शेवटची शस्त्रक्रिया झाल्यावर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

घरी परतताना रस्ता ओलांडत असताना एका ॲम्ब्युलन्सच्या धडकेत तिचा मृत्यू झाला.

देवाच्या समोर पोहोचल्यावर तिने जाब विचारला:

“देवा, तू तर म्हणालास की मला अजून ३३ वर्षे जगायचे आहे? मग तू मला त्या ॲम्ब्युलन्सच्या मार्गातून का वाचवले नाहीस?”

देव उत्तरला:

“मी तुला ओळखलेच नाही…!”

म्हणून लक्षात ठेवा – वयानुसार येणाऱ्या बदलांचा आनंदाने स्वीकार करा (Grow old gracefully).

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शिक्षक नेहमी शिक्षकच असतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

 

? वाचताना वेचलेले ?

☆ “शिक्षक नेहमी शिक्षकच असतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

एक आदरणीय शाळामास्तर नुकतेच निवृत्त झाले होते.

ते आणि त्यांची पत्नी एका फ्लॅटमध्ये राहत होते.

 

दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी आपल्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला.

 

जाण्यापूर्वी मास्तरांनी मनात विचार केला

‘आपण नसताना जर चोर घरात शिरला,

तर तो कपाटं फोडून सगळीकडे पसारा करेल,

जरी घरात पैसे नसले तरी!’

 

मग घराची वाट लावू नये म्हणून

मास्तरांनी टेबलावर ₹1000 ठेवले

आणि त्यासोबत एक चिठ्ठी ठेवली.

 

“प्रिय अज्ञात चोर,

तुम्ही माझं घर फोडण्यासाठी घेतलेला त्रास आणि मेहनतीबद्दल अभिनंदन!

पण दुर्दैवाने मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे,

पेन्शनवरच जीवन जगतो.

म्हणून घरात काही मौल्यवान वस्तू नाहीत.

मला वाईट वाटतंय की तुमचा वेळ आणि श्रम वाया जाईल.

म्हणून तुमच्या प्रयत्नाचा सन्मान म्हणून

ही छोटीशी रक्कम स्वीकारा.

 

आणि तुमच्या ‘व्यवसायात’ (चोरीच्या)

तुम्हाला अजून यश मिळावे म्हणून काही सल्ले देत आहे. ‘

 

मास्तरांचा ‘सल्ला’ पुढीलप्रमाणे होता:

‘बाजूच्या सोसायटीत

८ व्या मजल्यावर – एक भ्रष्ट मंत्री राहतो

७ व्या मजल्यावर – एक बेईमान बिल्डर

६ व्या मजल्यावर – एक सहकारी बँकेचा अध्यक्ष

५ व्या मजल्यावर – एक मोठा उद्योगपती

४ थ्या मजल्यावर – एक नामांकित वकील

३ र्‍या मजल्यावर – एक भ्रष्ट राजकारणी

त्यांच्याकडे पैशाचे आणि सोन्याचे डोंगर आहेत.

तुमच्या ‘व्यवसायातील यशामुळे’ त्यांना काही फरक पडणार नाही!

कारण ते पोलिसांकडे तक्रारही करणार नाहीत!’

— 

दसऱ्यानंतर जेव्हा मास्तर घरी परतले,

तेव्हा टेबलावर एक मोठी पिशवी ठेवलेली होती.

त्यात होते ₹ 10 लाख रोख!

आणि त्यासोबत एक पत्र :

‘आदरणीय गुरुजी,

आपल्या मार्गदर्शन आणि शिकवण्याबद्दल मनःपूर्वक आभार!

मी तुमचा सल्ला मानला आणि माझं मिशन यशस्वी झालं!

हा थोडासा मोबदला गुरूदक्षिणा म्हणून ठेवत आहे.

आपले आशीर्वाद आणि ज्ञान

असेच पुढेही मिळत राहो…

आपला शिष्य – चोर ‘

मास्तरांनी पत्र वाचून मोठ्याने हसत म्हटलं —

“अरेच्चा…!

मी निवृत्त झालो असं वाटत होतं,

पण दिसतंय की माझं शिकवणं अजूनही सुरूच आहे!”

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थवा पक्ष्यांचा… – लेखक : डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ थवा पक्ष्यांचा… – लेखक : डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम

मानवी जीवनाचे वास्तव:

एके सकाळी एक मुलगा आपल्या आजोबांसोबत शेतात फिरायला गेला.

अचानक त्याच्या नजरेस आकाशात इंग्रजी व्ही (‘V’) आकारात उडणारा पक्ष्यांचा एक मोठा थवा दिसला.

मुलाने कुतूहलाने विचारले,

“आजोबा, हे पक्षी नेहमी थव्यानेच का उडतात? प्रत्येकाने आपापल्या मार्गाने उडालं तर चालणार नाही का? ”

आजोबा हसले.

ते म्हणाले,

“बाळा, निसर्ग कधीच विनाकारण काही करत नाही.”

ते पुढे म्हणाले,

“हे स्थलांतर करणारे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात.

ते जेव्हा ‘व्ही’ आकारात उडतात, तेव्हा सर्वात पुढचा पक्षी हवेला चिरत पुढे जातो. त्यामुळे त्याच्या मागच्या पक्ष्यांना कमी प्रतिकार सहन करावा लागतो आणि त्यांची ऊर्जा वाचते.

पण एक गोष्ट लक्षात घे…

पुढचा पक्षी कायम पुढे राहत नाही.

तो दमला की शांतपणे मागे जातो…

आणि दुसरा पक्षी त्याची जागा घेतो.

असं करत करत…

संपूर्ण थवा एकमेकांच्या बळावर हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतो.

 

मुलगा आश्चर्याने ऐकत होता.

 

तेवढ्यात एक पक्षी थव्यापासून थोडा दूर गेला.

क्षणभर तो स्वतंत्रपणे उडत राहिला.

पण लवकरच त्याला वार्‍याचा जास्त प्रतिकार जाणवू लागला.

त्याचा वेग कमी झाला…

दिशा डळमळू लागली…

आणि काही क्षणांतच तो पुन्हा थव्यात येऊन सामील झाला.

 

आजोबा हसून म्हणाले,

“बघितलंस? पंख त्याच्याकडे आधीही होते… पण? सोबत नव्हती.”

आपलं आयुष्यही असंच आहे.

आपल्यापैकी प्रत्येकाकडे स्वतःची क्षमता असते.

पण…

जीवनाचा लांब प्रवास फक्त क्षमतेवर पूर्ण होत नाही.

त्यासाठी साथ लागते…

विश्वास लागतो…

आधार लागतो…

आणि आपली माणसं लागतात.

कुटुंब…

मित्र…

समाज…

हे आपल्या आयुष्याचे ‘थवे’ आहेत.

जेव्हा आपण थव्यात असतो…

तेव्हा कधी आपण इतरांचा भार हलका करतो…

तर, कधी इतर आपल्या थकलेल्या पंखांना बळ देतात.

म्हणूनच…

समूहातील एखादी व्यक्ती काही दिवस दिसत नसेल…

तर तिची चौकशी करायला हवी.

कदाचित ती आयुष्याच्या वार्‍याशी एकटी झुंज देत असेल.

तिला दोष द्यायला नको…

तिला पुन्हा थव्यात घेऊन यायला हवे.

 

कारण, नैसर्गिक नियम हाच आहे—

की, पक्षी जसा एकटा तर उडू शकतो…

पण तोच थव्याने अधिक दूर, अधिक सुरक्षित आणि अधिक सक्षमपणे प्रवास करु शकतो.

 

माणसांचंही तसंच आहे.

एकट्याने यश मिळवता येईल…

पण आयुष्य जिंकण्यासाठी अखेर माणसं लागतात.

म्हणून…

कोणालाही मागे राहू द्यायला नको.

कोणाला हरवू द्यायला नको.

कारण…

जसे, एकत्र उडणारे पक्षी फक्त अंतर पार करत नाहीत…

तर ते एकमेकांना गंतव्यापर्यंत पोहोचवतात.

म्हणूनच…

जीवनाचं खरं सौंदर्य “मी” मध्ये नसतंच…

ते नेहमी “आपण” मध्येच असतं.

 लेखक : डॉ. शिरीष राजे

मानसशास्रतज्ज्ञ

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका रुपयाची किंमत!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “एका रुपयाची किंमत!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सुब्रोतो नावाचा, वीस वर्षाचा एक मुलगा होता, जो कलकत्त्यातील एका कॉलनीमध्ये राहात होता.

त्याचे वडील एक भट्टी चालवत असत, जिथे ते दूध तापवून त्यापासून खवा बनवण्याचे काम करत असत.

सुब्रोतो खरं तर एक चांगला मुलगा होता, परंतु त्याला अनावश्यक खर्च करण्याची एक वाईट सवय होती. तो नेहमीच वडिलांकडे पैसे मागत असे आणि ते खाण्यापिण्यामध्ये आणि सिनेमा बघण्यामध्ये खर्च करत असे.

एके दिवशी वडिलांनी सुब्रोतोला बोलावले आणि म्हणाले, “”हे बघ बाळा, आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे तुला आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. हे रोज उठून, तू माझ्याकडे पैसे मागतोस आणि ते इकडे तिकडे उडवतोस, ही चांगली गोष्ट नाही.”

“काय बाबा! कुठे मी तुमच्याकडे हजारों रुपये मागितले आहेत?फक्त काही रुपयांसाठी तुम्ही मला एवढे लेक्चर देत आहात? एवढेसे रुपये, तर मी कधी पण तुम्हाला परत करू शकतो.” सुब्रोतो जरा वैतागून म्हणणला.

सुब्रोतोचे बोलणे ऐकून वडील विचलित झाले, परंतु त्यांना कळून चुकले की, धाकदपटशाहीने ही गोष्ट त्याला समजणार नाही. म्हणून ते म्हणाले, “”ही तर खूप चांगली गोष्ट आहे… असे कर की, तू मला जास्त नाही, फक्त एक रुपया रोज आणून देत जा.”

सुब्रोतो हसला आणि जणू काही मी जिंकलो, या आविर्भावात तो तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुब्रोतो जेव्हा वडिलांकडे आला, तेव्हा त्याला बघताच वडील म्हणाले, “बाळा, आण माझा एक रुपया.”

त्यांचे बोलणे ऐकून सुब्रोतो जरा घाबरला, आणि लगेच आपल्या आजीकडून एक रुपया घेऊन आला.

“घ्या बाबा, मी घेऊन आलो तुमचा एक रुपया,” असे म्हणून त्याने ते नाणे वडिलांच्या हातात दिले.

वडिलांनी ते नाणे घेतले आणि भट्टीमध्ये फेकून दिले.

“हे काय, तुम्ही असे का केले?”” सुब्रोतोने वैतागून विचारले.

वडील म्हणाले, “तुला काय करायचे आहे? तुला फक्त एक रुपया देण्याशी मतलब असला पाहिजे. मग मी त्याचे काहीही करू शकतो.”

सुब्रोतोने पण जास्त वाद घातला नाही आणि तो तिथून गुपचूप निघून गेला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा वडिलांनी त्याच्याकडे एक रुपया मागितला, तेव्हा त्याने आपल्या आईकडून एक रुपया घेऊन त्यांना दिला… बरेच दिवसांपर्यंत हाच क्रम चालू राहिला. तो रोज कुणा मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून एक रुपया घेई, आणि वडिलांना देई आणि वडील ते नाणे भट्टीमध्ये फेकून देत.

नंतर एक दिवस असा आला की, ज्यावेळी प्रत्येक जणांनी त्याला पैसे देण्यासाठी नकार दिला. सुब्रोतोला काळजी वाटली, की आता तो वडिलांना एक रुपया कुठून आणून देणार.

संध्याकाळ होत आली होती, त्याला काही समजत नव्हते की आता काय करावे! एक रुपया, न देण्याची नामुष्की त्याला सहन होणारी नव्हती. त्यावेळीच त्याला रस्त्यावर एक वयस्कर मजूर दिसला, जो एका प्रवाशाला सायकल-रिक्षात बसवून घेऊन जात होता.

“ऐका दादा, काही वेळासाठी तुम्ही मला ही रिक्षा ओढू द्याल का? त्याच्या बदल्यात मी तुमच्याकडून फक्त एक रुपया घेईन,”सुब्रोतो रिक्षावाल्याला म्हणाला.

रिक्षावाला खूप थकून गेला होता, त्यामुळे तो लगेच तयार झाला.

सुब्रोतो रिक्षा ओढू लागला.हे काम त्याला वाटत होते, त्यापेक्षा खूप कठीण होते… थोडे अंतर ओढल्यानंतरच त्याच्या हाताला घट्टे पडले, आणि पाय पण दुखू लागले! कसेतरी त्याने आपले काम पूर्ण केले आणि त्याच्या मोबदल्यात जीवनात पहिल्यांदाच स्वतःहून एक रुपया कमविला.

आज मोठ्या गर्वाने तो वडिलांकडे गेला आणि त्यांच्या हातावर एक रुपया ठेवला. रोजच्याप्रमाणे वडिलांनी रुपया घेऊन तो भट्टीत फेकण्यासाठी हात उचलला.

“थांबा बाबा!”सुब्रोतो वडिलांचा हात धरत म्हणाला, “तुम्ही हा फेकू शकत नाही! ही माझ्या मेहनतीची कमाई आहे.”” आणि सुब्रोतोने त्यांना घडलेली पूर्ण गोष्ट सांगितली.

वडील पुढे झाले आणि आपल्या मुलाला त्यांनी घट्ट आलिंगन दिले.

“बघ बेटा! इतके दिवस मी नाणी आगीत फेकत होतो, परंतु एकदाही तू मला थांबवले नाहीस. परंतु, आज जेव्हा तू स्वतःच्या मेहनतीची कमाई आगीमध्ये पडताना बघितलीस,तर एकदम ओरडलास. अशा प्रकारे, जेव्हा तू माझ्या मेहनतीची कमाई नको त्या गोष्टींमध्ये उडवतोस, त्यावेळेस मला पण तेवढेच दुःख होते. मी पण उदास होतो… म्हणूनच पैशाची किंमत समजून घे.जरी ते तुझे असू देत किंवा दुसऱ्या कोणाचे, कधीही अनाठायी खर्च करून, त्यांना नष्ट करू नकोस!”

सुब्रोतोला वडिलांनी सांगितलेली गोष्ट समजली. त्याने लगेच वडिलांना वाकून नमस्कार केला आणि आपल्या चुकीच्या व्यवहाराबद्दल क्षमा मागितली. आज त्याला एका रुपयाची किंमत समजली होती आणि त्याने मनातल्या मनात संकल्प केला की, आता तो कधीही पैशाचा अपव्यय करणार नाही.

मित्रांनो, हे तर आपल्याला कळले एका रुपयाचे महत्त्व, परंतु प्रत्येक क्षणी आपल्याला जे निसर्गाकडून फुकटात मिळत‌ आहे, ज्याशिवाय आपण एक क्षणसुध्दा जिवंत राहू शकत नाही, तर आपण त्याची किंमत कधी चुकवू शकू का?

जर नाही, तर हे जीवन देणाऱ्याच्या प्रति, आपण प्रत्येक क्षणी कृतज्ञ होऊ शकतो का!

आपण आपल्याला मिळालेल्या संसाधनांचा उपयोग कसा करतो, ते आपलं चारित्र्य दर्शवत असते. आपली ही संसाधने आपलं अंतर्गत व्यक्तिमत्व आहे, जसे मन, बुद्धी, अहंकार… नंतर मग वेळ आणि बाहेरील संसाधने जसे संपत्ती, शक्ती इत्यादी. आपण त्यांचा उपयोग खऱ्या उद्देशासाठी सर्वोत्कृष्ट रीतीने केला पाहिजे.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

रस्ता – मार्ग

  • जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
  • जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

खरं – सत्

  • बोलणं खरं असतं
  • सत्यला सोबत पुरावा जोडावा लागतो.

घसरडं – निसरडं

  • पडून झालं की घसरडं.
  • सावरता येतं ते निसरडं.

अंधार – काळोख

  • विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
  • निसर्गात जाणवतो तो काळोख.

पडणं – धडपडणं

  • पडणं हे अनिवार्य.
  • धडपडणं हे कदाचित सावरणं.

पाहणं – बघणं

  • आपण स्वत:हून पाहतो.
  • दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

पळणं – धावणं

  • पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
  • ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

झाडं – वृक्ष

  • जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
  • जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.

खेळणं – बागडणं

  • जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
  • जे मुक्त असतं ते बागडणं.

ढग – मेघ

  • जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
  • जे नक्की बरसतात ते मेघ.

रिकामा – मोकळा

  • वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा.
  • आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.

निवांत – शांत

  • *कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
  • काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

आवाज – नाद

  • जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
  • जो घ॔टेचा होतो तो नाद.

झोका – हिंदोळ*

  • जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.
  • जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

स्मितं – हसणं

  • मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
  • जे लोकांसमोर दाखवावं लागतं ते हसणं.

अतिथी – पाहुणा

  • जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
  • जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

घोटाळा – भानगड

  • जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
  • जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

आभाळ- आकाश

  • भरून येत ते आभाळ
  • निरभ्र असत ते आकाश

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनाच्या नजरेने प्रेम” – लेखक : मधुकिशोर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मनाच्या नजरेने प्रेम” – लेखक : मधुकिशोर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं…

कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं..

कधीतरी तू किती सुरेख आहेस असं म्हणावं..

यासाठी किती किती आटापिटा करायचा..

 

एक कळलंय मला आताशा..

हे सगळं करणं व्यर्थ आहे..

या सगळ्यासाठी तुम्ही काहीही करायची

गरजच नसते..

 ज्यांचे तुमच्यावर खरेखुरे प्रेम आहे..

ते तुमचे लखलखीत अंतःकरण जाणतात..

तुम्हाला बदलायच्या भानगडीत ते पडत नाहीत.. ते तुम्हाला आहे तसे स्वीकारतात..

 

तुमच्या आत खोलखोल दडलेलं प्रेम त्यांना जाणवतं..

तुमचे चांगले गुण त्यांना समजतात..

त्यांच्या बरोबर राहून तुम्ही आनंदी बनता, खूश रहाता..

आजूबाजुची भौतिक परिस्थिती कशी आहे हे त्यांच्यासह असताना गौण ठरतं..

 

आपल्यातल्या काही त्रुटी असू द्याव्यात तशाच..

आपल्यावर मनाच्या नजरेने कोण प्रेम करतंय ते कळण्यासाठीच..

* * * *

लेखक- मधुकिशोर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मित्र…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “मित्र…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

मैत्री केली तर

 जात पाहू नका,

 आणि मदत केली तर

 ती बोलून

 दाखवू नका.

 कारण कोणत्याही

 बाटलीचा सील,

 आणि दोस्तांचा दिल

एकदा तोडला की,

 विषय संपला.

 मित्र गरज म्हणून

 नाही तर

 सवय म्हणून

 जोडा.

 कारण गरज

 संपते,

पण सवयी कधीच

 सुटत नाहीत.

 ‘मित्रनावाची ही दैवी

 देणगी जिवापाड

 जपून ठेवा,

 कारण,

 जीवनातील अर्धा

 गोडवा हा मित्रांमुळेच

असतो.

 कोणीतरी विचारले,

 मित्रांमध्ये एवढे

 काय विशेष

 नातेवाईकांपेक्षा?

 त्यांना सांगितले,

 मित्र हे फक्त

 मित्र असतात.

त्यात सख्खे, चुलत, मावस,

 सावत्र असं

 काही नसते.

 ते थेट मित्रच

 असतात.

 मैत्रीचे धागे

 हे कोळ्याच्या जाळ्या

 पेक्षाही बारीक असतात.

पण लोखंडाच्या तारेहूनही

 मजबूत असतात.

 तुटले तर श्वासानेही

 तुटतील,

 नाहीतर

 वज्राघातानेही

 तुटणार नाहीत.

 प्रत्येक दुखण्यावर

दवाखान्यात उपचार होतातच

 असे नाही,

 काही दुखणी

 कुटुंब आणि

 मित्र मंडळी

 यांच्याबरोबर

 हसण्या आणि

 खिदळण्यानेही

 बरी होतात.

 माणसाने कितीही प्रयत्न

 केले तरी

 अंधारात सावली

 म्हातारपणात

 ‘शरीरआणि

 आयुष्याच्या शेवटच्या

 काळात पैसा

कधीच साथ देत नाहीत,

 साथ देतात ते

 फक्त आपण

 जोडलेले

 जवळचे मित्र.

 मित्र बोलवित

 आहेत पण तुम्हाला

 जावेसे वाटत नसेल तर,

समजा की तुम्ही

 म्हातारे झालात.

 म्हातारपण येऊ

 न देणे आपल्या

 हातातच

 आहे ना?

 मित्रांसोबत रहा

 व आनंदात जीवनभर

जगत राहा.

 

 कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तसंच जाऊ नको..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तसंच जाऊ नको..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

आपले संस्कार, आपली संस्कृती.

घरी आलेल्या कुणालाही ‘तसंच’ पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना ही ‘तसंच’ जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता!

या ‘तसंच’मध्ये जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.

माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा” म्हणत ती हातावर दे.

आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर.

नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप हे सारं कसे अध्याहृतच होतं.

हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, कधीही श्रम दिसायचे नाहीत, आणि त्यांचं स्मितहास्य पण लोपायचं नाही… इतकं ते सारं अगदी सहज होतं! सहज होतं म्हणूनही ते सुंदरपण होतं!

पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही ‘तसंच’ निघायचं नाही. घरातल्या सर्व माणसांसाठीही एक उपनियम होताच!

सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको ग कॉलेजला! ” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायचीच.

मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पांतून आजीला हे कळलं असावं. आणि मग..

“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच, ” असं म्हणण्याचा अवकाश…

ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.

“त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला ‘तशीच’ सोडत नसते. बाकी तू तुझं बघ, ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना ‘तसंच’ जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.

आपण कुणाकडे जातानाही ‘तसंच’ जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास.. तोही तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्षं घे.. चिकू घे, असलं काही न काही त्या करायच्या.

हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या ‘तशीच’ जाऊ नको गं, म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे, पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. लहान आहे.. मोठी होईल तेव्हा कळेल, असं म्हणून सोडूनही द्यायच्या!

एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.

मला म्हणाली, “कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’ पाठवशील किंवा रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील.. तर आपल्या घरातलं काही जाणार नाही.. पण पत मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे, त्याने आपली पत सांभाळावी. ”

आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून ‘तसंच’ कुणी जात नाही. आणि आपणही ‘तसंच’ कुणाकडे जात नाही.

काय करणार..?

आजीचे नाते सांगणारी मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आपल्या आसपासच वावरत असतात ना.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares