गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते..!
अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला तर राधा शांत-चित्त होती..!
गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…
“कसे आहात ‘द्वारकाधीश’..? “
जी राधा त्याला कान्हा-कान्हा म्हणायची तिने ‘द्वारकाधीश’ असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला…
“राधे, मी आज देखील तुझा ‘कान्हा’च आहे..! तू तरी मला ‘द्वारकाधीश’ म्हणू नकोस गं ss..!
खूप दिवसांनी भेटतो आहोत.. एकमेकांशी सुख-दुःखाच्या गप्पा मारू… एवढ्या धावपळीत मला जेव्हां जेव्हां तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती.. * राधा म्हणाली.. “खरं सांगू..? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही..! कारण, तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही..! आणि माझ्या नजरेत तूच होतास.. फक्त तू..! त्यामुळे माझ्या अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही..!
प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू..? “
श्रीकृष्ण ऐकतच राहिला..
राधा म्हणाली..
“तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे..! गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणालाही कधीच भेटला नाहीस..! तू खूप मोठा झालास.. तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली..!
पण ह्या प्रगतीमध्ये तुझी अधोगती किती झाली..! यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरु झाले.. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी थेट द्वारकेस जावून पोहोचलास..!
एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरवसा ठेवलास.. पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला तू विसरलास..!
कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस..!
‘कान्हा’ आणि ‘द्वारकाधीश’ ह्यांत काय फरक आहे सांगू…?
तू ‘कान्हा’ असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास.. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं..!
प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे..!
‘युद्धात’ जीव घेतला जातो..!
आणि..
‘प्रेमात’ जीव ओवाळून टाकला जातो..!
कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही..!
तू तर ‘त्रैलोक्याचा स्वामी’ आहेस.. महान अशी ‘भगवद्गीता’ तू जगाला सांगितलीस..! पण तू स्वतः काय निर्णय घेतलास..?
तू राजा होतास.. प्रजेचा पालक होतास आणि तुझेच सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस..?
तू स्वतः अर्जुनासारख्या ‘महारथी’चा सारथी बनलास, अर्जुनाचा ‘मार्गदर्शक’ झालास.. त्याच अर्जुनाने तुझेच सैन्य तुझ्याच नजरेसमोर मारून टाकले..?
कृष्णा, अरे तुझे सैन्य तुझीच प्रजा होती ना..? आणि प्रजा तर स्वतःच्या मुलांप्रमाणे असते..! तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास..!
इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा..? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ.. तुझी ‘द्वारकाधीश’ वाली प्रतिमा शोध..!
नाही सापडणार तुला शोधूनही..!
जिथे जाशील तिथे.. घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन..!
होय कान्हा, मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आज देखील पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते..! समाज गीतेला पूज्य मानतो..! पण भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारका-नरेश श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या ‘कान्हा’वर ठेवतो..!
गीतेमध्ये राधेचा तर दुरून देखील उल्लेख नाही..! पण आजही लोक गीतेचा – तुझ्या महान भगवद्गीतेचा – समारोप करताना ‘राधे-कृष्ण राधे-कृष्ण’ असाच जप करतात..!
हीच ती खऱ्या प्रेमाची खरी ताकद..!
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मनाच्या वाड्यात गडबड झाली” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची पंचायत भरली… आली आली ग आठवण बाई… आली ग आठवण बाई…
कोपऱ्यात बसलेले एक जुने दुःख उठले… डोळे चोळीत म्हणाले… अहो, आमचे काय ठरले? आम्ही अजून मनातच राहायचे का?
तेवढ्यात आनंदराव दारातून आत आले… हातात हास्याचे गाठोडे… खांद्यावर समाधानाचे उपरणे…
आनंदराव म्हणाले… काय रे, अजून हीच मंडळी? अजून हीच दुःखे? अजून हाच बाजार? दहा वर्षांपूर्वीचा अपमान… पंधरा वर्षांपूर्वीचा राग… वीस वर्षांपूर्वीचे अपयश… अहो, एवढा जुना माल अजून गोदामात ठेवला आहे?
तेवढ्यात एक दुःख फुगून म्हणाले… आम्ही खास आहोत… आम्ही भावनिक आहोत…
आनंदराव हसले… म्हणाले, भावनिक नाही रे बाबा… तुम्ही आता निर्माल्य झाला आहात… कालची फुले आज निर्माल्य होतात… मग कालची दुःखे आज ताजी कशी?
प्रश्न बरोबर होता… दुःखे गप्प बसली…
एवढ्यात श्रद्धाबाई पुढे आल्या… त्यांनी देवाच्या चरणी फुलांची परडी ठेवली… म्हणाल्या… ही फुले माझी होती… आता त्याची झाली…
मग दुःखांचे काय?
तीही त्याचीच…
देवा… हे राग तुझे… हे अपयश तुझे… ही चिंता तुझी… आता तूच सांभाळ…
हे ऐकताच मनाच्या वाड्यात कुजबुज सुरू झाली… अहो… आपण तर दुःखांना कायमस्वरूपी भाडेकरू ठेवले होते… आता त्यांना नोटीस मिळाली वाटते…
तेवढ्यात भारूड सुरू झाले…
य
मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची उचलबांगडी झाली… आली आली ग आनंद बाई… आली ग आनंद बाई…
☆ “आसक्ती आणि प्रेम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆
☆
आसक्ती (Attachment) आणि प्रेम (Love) हे वरवर पाहता सारखे वाटतात, पण त्यांचे स्वरूप खूप वेगळे असते.
आसक्ती म्हणजे काय?
आसक्तीमध्ये “मला तू हवा/हवी आहेस” हा भाव असतो.
त्यात अपेक्षा, मालकीभाव आणि भीती असते.
समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही तर दुःख, राग किंवा असुरक्षितता निर्माण होते.
आसक्ती स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला धरून ठेवते.
उदा.: “तू माझ्याशीच बोलले पाहिजेस, माझ्याशिवाय कुठे जाऊ नकोस” — हा आसक्तीचा भाव आहे.
प्रेम म्हणजे काय?
प्रेमामध्ये “तू आनंदी राहा” हा भाव असतो.
त्यात स्वातंत्र्य, स्वीकार आणि समर्पण असते.
प्रेम देण्यात आनंद असतो; बदल्यात काही मिळावे अशी अपेक्षा नसते.
प्रेम दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करते.
उदा.: “तू जिथे असशील तिथे आनंदी राहा, तुझे भले होवो” — हा प्रेमाचा भाव आहे.
योगवासिष्ठाच्या दृष्टीने आसक्ती मनाला बांधून ठेवते, तर प्रेम मनाला विस्तार देते. आसक्तीत संकुचित “मी आणि माझे” असते; प्रेमात सर्वांना सामावून घेणारी विशालता असते.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात:
“प्रेम तुमचा स्वभाव आहे, आणि आसक्ती हे प्रेमाचे विकृत रूप आहे.”
जेव्हा प्रेमात भीती, अपेक्षा, मत्सर, मालकीभाव मिसळतो तेव्हा ते आसक्ती बनते. आणि जेव्हा प्रेम शुद्ध, निरपेक्ष आणि व्यापक होते तेव्हा ते मुक्तीचा मार्ग बनते.
थोडक्यात:
आसक्ती म्हणते: “तू माझा/माझी आहेस.”
प्रेम म्हणते: “मी तुझा/तुझी आहे.”
आसक्ती बांधते.प्रेम मुक्त करते.
आसक्तीत आई म्हणते, “मुलाने माझेच ऐकले पाहिजे. माझ्याशिवाय त्याने कोणताही निर्णय घेऊ नये. तो दूर गेला तर मी जगू शकणार नाही.”
येथे मुलाच्या भल्यापेक्षा “माझे” हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे चिंता, भीती आणि दुःख निर्माण होते.
प्रेमात आई म्हणते, “माझ्या मुलाने प्रगती करावी, आनंदी राहावे. त्याला जिथे चांगल्या संधी मिळतील तिथे जावे.”
मुलगा दूर गेला तरी तिच्या मनात त्याच्याविषयी शुभेच्छा आणि प्रेमच असते!
* * * *
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ “मी आणि माझं शांत, समाधानी मन” – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
रेल्वे गाडी हळूहळू स्टेशन सोडत होती.
खिडकीतून थंडगार वारा येत होता. समोरच्या बर्थवर माझी नजर गेली. एक हसरा चेहरा. वय साधारण ६५ च्या आसपास. एकटीच प्रवास करत होती. पाठीवर एक छोटी बॅग. मनालीची सोलो ट्रिप.
मी सहज विचारलं, “काकू, एकट्याच?
भीती नाही वाटत?”
त्या मनापासून हसल्या. अशा हसल्या, की जणू अनेक वर्षांचे ओझे त्या हसण्यात विरघळून गेले.
त्या म्हणाल्या, “बाळा, भीती तेव्हा वाटायची, जेव्हा सगळे सोबत होते. आता एकटी आहे, म्हणून खऱ्या अर्थाने मोकळी आहे.”
गप्पांच्या ओघात त्यांनी मला
एक सुंदर जीवनधडा दिला…
त्या म्हणाल्या, “मी साठीनंतर जगायला शिकले. जेव्हा मी काही गोष्टी सोडून दिल्या…”
१. नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडला. “पूर्वी नवरा, मुलं, पैसा — सगळं आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करायचे. आता वाळूसारखं वाहू देते. मन खूप हलकं वाटतं.”
२. लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडलं. “मुलाने फोन केला तर आनंद, नाही केला तरी ठीक. मी त्याला जन्म दिला आहे, त्याच्यावर मालकी हक्क नाही.”
३. लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडला. “पन्नास वर्षे नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केला. तो तसाच राहिला. मग मी स्वतःला बदललं… आणि आयुष्यात शांतता आली.”
४. प्रत्येकाला खूश ठेवण्याची धडपड सोडली. “सून, नातेवाईक, समाज सगळ्यांना खूश करताना स्वतःलाच विसरून गेले होते. आता स्वतःशी प्रामाणिक राहते.”
५. प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दोष देणं सोडलं. “भाजीत मीठ कमी-जास्त झालं, तर दिवसन्-दिवस मनाला लावून घ्यायचे. आता म्हणते – मी माणूस आहे, देव नाही.”
६. प्रत्येक परिणामाची चिंता करणं सोडलं. “रेल्वे वेळेवर येईल की उशिरा, हे माझ्या हातात नाही. मग काळजी कशाला? चहा पिते आणि निसर्गाचा आनंद घेते.”
७. भविष्याच्या भीतीने वर्तमान जगणं सोडलं. “उद्या गुडघे दुखतील म्हणून आज डोंगर चढायचा नाही? आज ताकद आहे, तर आजचा दिवस जगते.”
८. आपल्या हातात नसलेल्या गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं सोडलं. “कोण काय बोलेल, राजकारणात काय होईल, शेजारी काय म्हणतील, हे सगळं सोडलं. आता रक्तदाबही सामान्य राहतो.”
आता काय करते?
“स्वतःची काळजी घेते. स्वतःशी संवाद साधते. लोक काय बोलतात ते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते.”
खिडकीबाहेर पाहत त्या म्हणाल्या..
“पाणी कोणत्या दिशेने वाहील हे माझ्या हातात नसतं बाळा… पण वादळातही माझी नाव डगमगू नये म्हणून वल्हं कसं चालवायचं,हे माझ्या हातात असतं.”
सुख आणि समाधान मॉलमध्ये मिळत नाही.
समाधान त्या उशीत असतं, जिथे कोणतीही तक्रार न करता शांत झोप लागते.
समाधान त्या पावलांत असतं, जी कोणत्याही भीतीशिवाय एकटी चालायला शिकतात.
मनाली स्टेशन जवळ आलं.
त्या उतरता उतरता म्हणाल्या..
“तरुणपणी मी जगाशी नाती जोडत राहिले… आता या उतारवयात स्वतःशी नातं जोडते आहे.”
म्हणूनच मी हसते… कारण आता माझ्यावर कोणतंही ओझं नाही. आता फक्त मी आहे… आणि माझं शांत, समाधानी मन.”
जीवनाचा खरा आनंद इतरांना बदलण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आणि स्वीकारण्यात आहे.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुदाम्यासोबत बोलता बोलता श्रीकृष्ण कधी त्याचे पाय दाबू लागले, हे सुदाम्याला कळलंच नाही. सुदामा तर झोपून गेला होता, पण कृष्ण स्वतःच्या विचारांत मग्न होऊन त्याचे पाय दाबत दाबत बालपणाच्या आठवणी बोलत होते. इतक्यात रुक्मिणीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.
कृष्ण दचकले. आधी त्यांनी रुक्मिणीकडे पाहिले, मग सुदाम्याकडे, आणि परिस्थिती समजताच तेथून उठून आपल्या कक्षात आले.
कृष्णांची अशी अवस्था पाहून रुक्मिणी म्हणाल्या, “स्वामी, आज तुमचं वर्तन फारच अद्भुत वाटत आहे.
तुम्ही.. जे, या जगातील सर्वात मोठे सम्राट जरी द्वारकेत आले तरीही जरा सुद्धा प्रभावित होत नाही, ते आपल्या मित्राच्या आगमनाच्या बातमीने इतके भावूक झालात की जेवण सोडून उघड्या पायाने त्याला घ्यायला धावत गेलात.
तुम्ही, ज्यांना कोणतंही दुःख, कष्ट किंवा आव्हान कधी रडवू शकले नाही, अगदी गोकुळ सोडताना माई यशोदांच्या डोळ्यातले अश्रू पाहूनही तुम्ही रडला नाहीत, ते तुम्ही तुमच्या मित्राचे जीर्ण- शीर्ण आणि जखमांनी भरलेले पाय पाहून इतके भावुक झालात की तुमच्या अश्रूंनीच त्याचे पाय धुतले.
कूटनीती, राजकारण आणि ज्ञानाचे शिखर असलेले तुम्ही, तुमच्या मित्राला पाहून इतके तल्लीन झालात की विचार न करता त्याला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती आणि समृद्धी देण्याचा निर्णय घेतलात. “
कृष्ण त्याच आनंदी अवस्थेत म्हणाले, “तो माझा बालपणीचा ‘मित्र’ आहे, रुक्मिणी. “
“पण बालपणी गुरुमातेनं तुम्हा दोघांना वाटून खायला दिलेले हरभरे त्याने तुमच्यापासून लपवून खाल्ले होते ना? मग अशा मित्रासाठी एवढी भावना का? ” सत्यभामेनेही आपली उत्सुकता व्यक्त केली.
कृष्ण हसत म्हणाले, “सुदाम्याने असं कार्य केलं आहे, सत्यभामे, की संपूर्ण सृष्टीने त्याचे आभार मानले पाहिजेत. त्याने ते हरभरे भुकेमुळे नाही खाल्ले, तर यासाठी खाल्ले की त्याला नको होतं की त्याचा मित्र कृष्ण दारिद्र्य पाहो.
त्याला माहिती होतं की ते हरभरे आश्रमात चोरांनी सोडून दिले होते, आणि ते एका ब्राह्मण स्त्रीच्या घरातून चोरले गेले होते. त्याला हेही ठाऊक होतं की त्या ब्राह्मण स्त्रीनं शाप दिला होता की जो कोणी ते हरभरे खाईल, तो आयुष्यभर दरिद्री राहील.
सुदाम्याने ते हरभरे माझ्यापासून लपवून खाल्ले, जेणेकरून मी सुखी राहीन. तो मला ईश्वराचा अंश मानत होता, म्हणून त्याने ते खाल्ले, कारण त्याला वाटलं की जर ईश्वरच दरिद्री झाला, तर संपूर्ण सृष्टीच दरिद्री होईल. सुदाम्याने संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी स्वतः दरिद्री होणं स्वीकारलं. “
“इतका मोठा त्याग? ”असं रुक्मिणीच्या तोंडून आपोआपच निघालं.
“माझा मित्र ब्राह्मण आहे, रुक्मिणी, आणि ब्राह्मण ज्ञानी व त्यागी असतात. त्यांच्या हृदयात जनकल्याणाची भावना ओसंडून भरलेली असते. काही अपवाद वगळता ब्राह्मण असेच असतात.
आता तुम्हीच सांगा, अशा मित्रासाठी हृदयात प्रेम निर्माण होणार नाही तर काय होणार, प्रिये? गोकुळ सोडताना मी म्हणून रडलो नाही, कारण मी रडलो असतो तर माझ्या माईने प्राण सोडले असते. पण माझ्या मित्राचे असे पाय पाहून, त्यातील जखमा पाहून माझं हृदय भरून आलं, रुक्मिणी.
त्याच्या पायांवरील या जखमा आणि आयुष्यातील ही अवस्था फक्त यासाठी झाली की तो आपल्या या मित्राचं भलं इच्छित होता.
रुक्मिणी, कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही या कृष्णाचं इतकं भलं कधीच इच्छिलं नाही. लोक माझ्याकडून स्वतःचं भलं व्हावं अशी अपेक्षा ठेवतात. पण सुदाम्यासारखे मित्रच असे असतात, जे आपल्या मित्राच्या सुखासाठी स्वेच्छेने दारिद्र्य आणि कष्ट स्वीकारतात.
असे मित्र फार दुर्मिळ असतात, आणि कळत नाही, कोणत्या पुण्यांमुळे मिळतात. आता अशा मित्राला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती दिली तरी ती कमीच पडेल,” कृष्ण भावुक आवाजात म्हणाले.
इथे कक्षात सर्व राण्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, आणि तिथे कक्षाबाहेर उभ्या सुदामा यांच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जून महिन्याचा तिसरा रविवार ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगळता जगाच्या इतर भागात जागतिक पितृ दिन म्हणून साजरा करतात. भारतीय संस्कृतीत माता व पिता हे दोन्ही तत्त्व संसारात जोडीनेच उल्लेखिले जातात. माता पित्याचे कष्ट व संस्कारच कुटुंबाला यश, कीर्तीच्या वाटा दाखवत असते. आपल्या देशात पुरुषसत्ताक, पितृसत्ताक पद्धती असली तरी मातृत्व भावनेचे जेवढे कौतुक झाले आहे तसे कौतुक बाप भावनेच्या वाट्याला आलेले नाही. कुटुंबाचा कणा म्हणून बापच केंद्रस्थानी असतो. कुटुंबाच्या उभारणीसाठी झिजणा-या, झुंजणा-या पित्याचा सन्मान म्हणून आजचा दिवस पितृ दिन म्हणून साजरा करतात.
पितृत्वाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची किनार जरी आजच्या दिवसाला असली तरी हा दिवस साजरा करण्याच्या इतिहासाला भयानक दुःखद घटनेची किनार आहे. ती दुर्घटना आहे पश्चिम वर्जीनिया देशातील फेअरमोंट शहरातील. 6 डिसेंबर 1907 रोजी मोनोंगाह येथील खाणीत काम करताना तब्बल 210 कामगारांचा मृत्यू झाला होता. मृत्यूदेवतेने एकाचवेळी शेकड्याने मानवी देह कवेत घेतले होते. मरण पावलेल्या कामगारांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. नियतीच्या एकाच विपरित फटक्याने कित्येक संसार उघडे पडले होते, मुलंबाळं अनाथ केली होती. या दुर्घटनेतील पित्यांची आठवण म्हणून श्रीमती ग्रेस गोल्डन क्लेटन या माऊलीने 5 जुलै 1908 रोजी पिता दिनाचे आयोजन केले होते. पुढील वर्षीपासून दरवर्षी पितृ दिन साजरा होऊ लागला, तो आजतागायत कायम आहे.
घराचे मांगल्य आई असते तर बाप हा घराचे अस्तित्व असतो. पुराण कथेतील पिता ते आजही मुलांबाळांसाठी झगडणारा पिता पाहिला की एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पित्याची वेशभूषा, पेहराव बदलला असेल पण पितृत्व भावनेची जबाबदारी, काळजी आजही तशीच आहे. गतिमान आधुनिक जीवन काळात आणखी एक ठळक बदल आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे पूर्वीचा कडक, कठीण बाप आता पहिल्या पावसात भिजलेल्या मातीच्या ढेकळावानी मऊ झाला आहे. पूर्वीच्या काळी मुलं आडदांडपणा करू लागली की त्यांना वडिलांना नाव सांगण्याची धमकी मिळायची. मुलगा त्या धमकीने गप्पगार पडायचा. आताचा मुलगा उलट पिता येण्याची वाट पाहत असतो. धोतर, पांढरा लांब बाह्यांचा
गुडघ्यापर्यंतचा सदरा (नेहरु शर्ट), डोक्याला फेटा किंवा टोपी हा आपल्याकडील पारंपारिक पोषाख; पण आता धोतराची जागा पँटने घेतली, शर्ट शॉर्ट झाले व डोक्यावरील कापडी झाकण जवळपास कालबाह्य झाले आहे. बाप नावाचा पोषाख बदलला पण बाप नावाचे काळीज नाही बदलले.
प्रसिध्द कवी इंद्रजीत भालेरावांची ‘माझा बाप’ नावाची कविता प्रत्येकाला आपल्याच बापाची जीवनकहाणी वाटते तर दोन तीन वर्षाखाली प्रदर्शित झालेल्या ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ चित्रपट तर स्वतःसोबतच घडल्यासारखा वाटतो.
संसारवेल विस्कटून जाऊ नये म्हणून पित्याला अनेक भूमिका साकाराव्या लागतात. लेकरांसाठी बाप असलेला व्यक्ती पत्नीचा पती असतो, आईवडीलांचा मुलगा असतो, रक्तसंबंधाने व मानसिक भावभावनांच्या वेगवेगळ्या नात्याने तो इतरांशीही बांधलेला असतोच. व्यवसाय व नोकरीच्या निमित्तानं तो कर्मयोगी असतो. पैसा हे विनिमयाचे साधन झाल्यापासून व पैसा हाच समाज व्यवस्थेत केंद्रस्थानी आल्यापासून बाप नावाचं नातं निभावणा-या व्यक्तीची फरफट झाली आहे. आर्थिक समस्यांना सामोरे जाताना घराच्या बाहेर अनेक कडू-गोड, अवमानाच्या प्रसंगांना बापास तोंड द्यावे लागते. चिमणा- चिमणीचा सुरेख संसार चालवताना चिमणा नावाचा घरधनी सतत घरट्याच्या सुरक्षेच्या विचारात असतो.
लेकरांचं संगोपन ही आता सहज प्रक्रिया राहिली नाही. ती आता शास्त्रीय कला बनली आहे. पाळण्यात बाळ असतानाच त्याच्या पाळण्याबाहेरच्या जगाचे नियोजन पाळण्याभोवतीच करण्याचा आज जमाना आला आहे. बाळाच्या लहानपणी त्याला पित्याच्या पाठीवरून घरातल्या घरात मानवी घोडेस्वारी करायला खूप आवडतं. घोडा घोडा खेळातून मूल पाठीवरून उतरले तरी बापाचं घोडेपण थांबत नाही. ते सतत धावतं असतं. बाप नावाच्या व्यक्तीस त्याच्या लहानपणी न मिळालेल्या बाबी तो स्वत:च्या लेकराच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न करत असतो. स्वजीवनात आलेले भयंकर कष्ट लेकराच्या भोवताली फिरू नयेत म्हणून तो राखण करत असतो. उत्तम वस्त्र, चांगले शिक्षण, सुदृढ आरोग्य याविषयी आजचा बाप तडजोड करत नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे पण कुवतीतील सर्वोच्च देण्याचा प्रयत्न प्रत्येक पिता करत असतो.
मुलीचे शिक्षण, मुलीचे लग्न याबाबतीत तर आजचा पिता कमालीचा सजग आहे. घरात जन्माला आलेल्या चिमणीचे लाडाकौतुकात संगोपन करायचे व हीच चिमणी, दुस-याच्या अंगणाची तुळस म्हणून पाठवायचे कर्म पित्यालाच करायचे असते. हुंदका दाबून, अश्रूंचा बांध रोखून व दुःखाचे आवंढे गिळून पिता आपले कर्तव्य पार पाडत असतो. घराबाहेचा संघर्ष बाप एकट्याच्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करत असतो.
महाभारतातल्या अर्जूनासमोर आप्त स्वकीयच शत्रू म्हणून उभे होते. रणांगणी गोंधळलेल्या अर्जुनाला कृष्णाने उपदेश केला व अर्जुन त्यातून तरला. आजचा प्रत्येक पिता अर्जुन आहे. शत्रू इथे दिसत नाही; पण लढणं मात्र टळत नाही. रोजच तो कुरूक्षेत्रावर उभा आहे. बापाच्या पायी मोडलेला काटा व भळभळ वाहत जाणारं रक्त धरतीत मुरतं, तेव्हाही ते लेकरासाठीच हिरवीगर्द स्वप्न पाहत असतं. वारंवार छाटलेल्या झाडांना योग्यवेळी पुन्हा पालवी फुटते; तसं बाप तत्त्व कितीही वेळा छाटलं गेलं, तरी ते अंकुरणं सोडत नाही. बिजातून अंकुर व अंकुरातून रोपटे व रोपट्यातून झाड तयार होत असताना मूळ बीज नष्ट होत असते. बीजाच्या त्यागावरच वृक्षाचं रुजणं अवलंबून आहे. बिजाप्रमाणेच स्वइच्छा त्यागण्यातच बाप मूल्याचे फलित आहे.
बदलत्या काळासोबत आजचा पिता खरोखरच खूप प्रेमळ बनला आहे. काळजीवाहू झाला आहे. काडी काडी जमा करुन पक्षी जसं घरटं निर्माण करतात, तसं पित्यालाही घरटं असतं. स्वतः झिजत झिजत खंगत खंगत, झुंजार आयुष्य जगणाऱ्या, लेकरांच्या चिमुकल्या गोड मिठीत विसावून सुख शोधणा-या सर्व विशाल हृदयी बाप पित्यांना पितृदिनी वंदन करतो.
☆
लेखक : कचरु चांभारे
प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी
कोथरूड – पुणे, मो.९५९५५५७९०८
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ चांगला नवरा मिळत नाही…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
लग्न करायला चांगला नवरा मिळत नाही, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात ?
आजकाल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं – “लग्नासाठी चांगला मुलगा मिळत नाही हो. ” हे वाक्य ऐकलं की माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न उभा राहतो – मग बॉयफ्रेंड कसे मिळतात?
कारण कॉलेजपासून ऑफिसपर्यंत, बसस्टॉपपासून सोशल मीडियापर्यंत, मित्र शोधण्याची प्रक्रिया अगदी वेगाने चालू असते. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते, इंस्टाग्रामवर लाईक्सची देवाणघेवाण होते, व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि काही दिवसांत फक्त मित्र हा शब्द स्पेशल फ्रेंड पर्यंत पोहोचतो. तेव्हा कुणी उंची मोजत नाही, पगाराची स्लिप मागत नाही, बँक बॅलन्स तपासत नाही किंवा स्वतःचं घर आहे का? याची चौकशी करत नाही. पण ज्या क्षणी लग्नाचा विषय निघतो, तेव्हा अचानक सगळे निकष जागे होतात.
मुलगा उंच हवा, पगार मोठा हवा, स्वतःचं घर हवं, चारचाकी हवी, सवयी चांगल्या हव्यात, व्यसन नसावं, सासू-सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बॉयफ्रेंडसाठी मन चालतं आणि नवऱ्यासाठी गणित!
दुसरीकडे मुलांचंही काही वेगळं नसतं. प्रेमात असताना ते म्हणतात, “तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून आणीन. ” पण लग्नाची वेळ आली की प्रश्न बदलतात. घर किती मोठं आहे, नोकरी काय आहे, अपेक्षा काय आहेत, हे सगळं महत्त्वाचं वाटू लागतं. प्रेमात भावना असतात, पण लग्नात जबाबदाऱ्या असतात.
बॉयफ्रेंड निवडताना अनेकदा वर्तमान पाहिलं जातं, तर नवरा निवडताना भविष्य पाहिलं जातं. म्हणूनच प्रेमासाठी योग्य वाटणारी व्यक्ती आयुष्यभराच्या सहजीवनासाठी योग्य वाटेलच असं नाही.
आजची खरी समस्या ‘चांगला नवरा मिळत नाही’ ही नसून ‘परिपूर्ण नवरा शोधण्याचा अट्टाहास’ ही आहे. कारण परिपूर्ण माणूस या जगात कुठेच नाही. प्रत्येकामध्ये काही गुण असतात, काही उणिवा असतात. संसार हा गुणांच्या प्रदर्शनावर चालत नाही, तर उणिवांच्या स्वीकारावर चालतो.
कधीकधी जे लोक म्हणतात की चांगले मुलगे मिळत नाहीत, त्यांनी स्वतःलाही एक प्रश्न विचारायला हवा मी ज्या गुणांचा नवरा शोधते, ते गुण माझ्यात कितपत आहेत? आणि मुलांनीही स्वतःला विचारायला हवं मी ज्या मुलीची अपेक्षा करतो, तिच्या अपेक्षांना मी पात्र आहे का? कारण नातं हे खरेदी-विक्रीचा व्यवहार नसतो. तो दोन माणसांनी एकमेकांच्या सुख-दुःखात उभं राहण्याचा करार असतो.
आजच्या काळात एक विचित्र गोष्ट दिसते. बॉयफ्रेंड शोधताना आपण हसणारा चेहरा पाहतो, पण नवरा शोधताना बँक बॅलन्स पाहतो. प्रेमात स्वभावापेक्षा आकर्षण महत्त्वाचं वाटतं, तर लग्नात माणसापेक्षा त्याची परिस्थिती. मग नंतर तक्रार केली जाते की चांगले लोक मिळत नाहीत. खरं तर चांगले लोक आजही आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
ज्याच्याकडे महागडी गाडी नाही, पण मन मोठं आहे, तो अनेकदा दुर्लक्षित राहतो. ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, पण जबाबदारीची जाणीव आहे, त्याला संधी मिळत नाही. आणि मग वर्षानुवर्षे ‘योग्य व्यक्ती’ शोधण्याचा प्रवास सुरूच राहतो.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं. बॉयफ्रेंड मिळवणं सोपं असतं, कारण तिथे स्वप्नं विकली जातात. नवरा मिळवणं कठीण वाटतं, कारण तिथे आयुष्य जगायचं असतं. स्वप्नांमध्ये चुका चालतात, पण संसारात वास्तव स्वीकारावं लागतं. म्हणून चांगला नवरा शोधण्यापेक्षा चांगला माणूस ओळखायला शिका. कारण सुखी संसार चेहऱ्याने, पगाराने किंवा गाडीने टिकत नाही; तो विश्वास, स्वभाव, समजूतदारपणा आणि परस्पर आदराने टिकतो.
आणि म्हणूनच प्रश्न “चांगला नवरा कुठे मिळेल?” हा नसून, “चांगला माणूस ओळखण्याची आपली नजर किती चांगली आहे?” हा असायला हवा. हाच प्रश्न समजला, तर कदाचित अनेकांची नवरा शोधण्याची समस्या आपोआप सुटेल.
*
लेखक:अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
☆ रात्रभर जागणारी पिढी आणि… गप्प होत चाललेले पालक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆
☆
रात्रीचे एक दोन वाजलेले असतात. घरातले सगळे दिवे बंद असतात. फक्त एका खोलीतून थोडासा अंधुकस लाइट बाहेर पडत असतो. आईला मध्येच जाग आलेली असते. ती उठते, पाणी पिते आणि सहज मुलाच्या किंवा मुलीच्या खोलीत डोकावून पाहते. हातात मोबाईल असतो. कानात इयरफोन. स्क्रीनवर काहीतरी सुरू असतं. वेळेचं भान हरवलेलं असतं.
“अजून झोपला नाहीस?”आईचा प्रश्न. “हो ना… पाच मिनिटांत झोपतो. ”हे पाच मिनिटं मग एक तास होतात. दोन तास होतात. आणि शेवटी रात्र संपते.
हे दृश्य आज अनेक घरांमध्ये रोज घडतं आहे.
सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत झोप. उठल्यावर चहा हातात आणि पुन्हा मोबाईल. शरीर जागं झालेलं असतं, पण दिवसाची लय हरवलेली असते.
रात्रभर जागणं, सकाळी उशिरा उठणं, दिवसाची सुरुवातच दुपारच्या सुमारास होणं आणि मग पुन्हा रात्री उशिरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप किंवा स्क्रीनसमोर बसणं हे अनेक मुलांचं रूटीन बनलं आहे.
काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, जीवनशैली बदलली आहे. हे सगळं मान्य आहे. पण माणसाच्या शरीराच्या गरजा बदललेल्या नाहीत. शरीराला विश्रांती हवीच असते. मनाला शांत झोप हवीच असते. डोळ्यांना अंधार हवा असतो. मेंदूला पुनरुज्जीवनासाठी वेळ हवा असतो.
पण आजची पिढी जणू स्वतःच्या शरीराशीच स्पर्धा करत आहे.
आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे वेगळंच जग होतं. रात्री गच्चीवर झोपायचं. तारांकडे पाहत गप्पा मारायच्या. सकाळी सूर्य उगवण्याआधीच जाग यायची. पक्ष्यांचा आवाज याने दिवस सुरू व्हायचा. अंगात उत्साह असायचा. दिवसभर खेळणं, वाचन, भटकंती, गप्पा यात वेळ जायचा.
आज अनेक मुलांना सूर्योदय पाहण्याची सवयच राहिलेली नाही. पहाट म्हणजे काय, सकाळची प्रसन्नता म्हणजे काय, पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे काय, याचा अनुभवच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
आणि याचं दुःख फक्त जुन्या आठवणींचं नाही. त्याचा संबंध त्यांच्या आरोग्याशी, मानसिक स्थितीशी आणि भविष्यातील जीवनशैलीशी आहे. पण आजची पिढी जणू रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र मानू लागली आहे.
पालक म्हणून आम्ही हे सगळं पाहत असतो. सुरुवातीला आम्ही सांगतो. खूप प्रेमाने सांगतो. नंतर समजावतो. पुन्हा पुन्हा सांगतो. कधी रागावतो. कधी विनवणी करतो. पण आजकाल मुलांकडेही प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं.
“आम्हाला माहिती आहे. ”
“तुम्ही काळजी करू नका. ”
“सगळेच असं करतात. ”
“आमच्या जनरेशनचं लाइफ वेगळं आहे. ”
ही उत्तरं ऐकताना पालक शांत होतात. पण त्यांचं मन मात्र शांत नसतं. कारण अनुभवाने त्यांना माहीत असतं की शरीरावर अन्याय केला की त्याची किंमत कधीतरी मोजावी लागते.
वीस-पंचवीस वर्षांच्या वयात काही परिणाम जाणवत नाहीत. पण सततची अपुरी झोप, अस्थिर दिनचर्या, शारीरिक हालचालींचा अभाव, स्क्रीनचा अतिरेक आणि मानसिक ताण याची छोटी छोटी बीजं नकळत पेरली जात असतात.
उद्या त्याच बीजांचं झाड उभं राहतं. चिडचिड वाढते. एकाग्रता कमी होते. उत्साह हरवतो. नात्यांमध्ये संवाद कमी होतो. आत्मविश्वास डळमळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनातील साध्या साध्या गोष्टींमधला आनंद हरवायला लागतो.
पण पालकांना सर्वात जास्त वेदना या परिणामांची नसते.
त्यांना वेदना असते ती आपल्या मुलांपर्यंत पोहोचता न येण्याची.
प्रत्येक पिढीला वाटतं की पालक आपल्याला समजून घेत नाहीत. पण सत्य हे आहे की आई-बाबा मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत असतात.
लहानपणी मुलांच्या रडण्याचा अर्थ समजून घेतात. शाळेतल्या भीतीचा अर्थ समजून घेतात. पहिल्या अपयशाचं दुःख समजून घेतात. पहिल्या प्रेमाची चाहूलही ओळखतात. मुलं काही बोलली नाहीत तरी त्यांच्या चेहऱ्यावरून मनातील गोष्ट वाचतात.
मग एक वेळ अशी येते की तीच मुलं मोठी होतात आणि म्हणतात,
“तुम्हाला काहीच समजत नाही. ”हे वाक्य पालकांच्या मनाला सर्वाधिक जखम करतं. कारण त्यांना माहिती असतं की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांना समजून घेण्यात घालवलं आहे.
आई-बाबा मुलांच्या आयुष्यातील शत्रू नसतात.
ते त्यांच्या स्वप्नांचे खरे साक्षीदार असतात. त्यांच्या यशासाठी प्रार्थना करणारे पहिले लोक असतात. त्यांच्या अपयशाने आतून तुटणारेही तेच असतात.
मुलं आजारी पडली की रात्रभर जागणारे तेच.
मुलांना यश मिळालं की स्वतःपेक्षा जास्त आनंदी होणारे तेच.
मग ते रात्रभर जागू नकोस असं सांगतात, तेव्हा त्यामागे नियंत्रण ठेवण्याची इच्छा नसते.
त्यामागे प्रेम असतं.
काळजी असते.
अनुभव असतो.
आणि एक निःस्वार्थ भीती असते
“आपल्या मुलाला काही त्रास होऊ नये. ”
पण सतत समजावूनही जेव्हा काही बदल होत नाही, तेव्हा पालक हळूहळू गप्प होऊ लागतात.
मुलांना वाटतं की आता त्यांना काही फरक पडत नाही.
पण खरं तर त्यांना खूप फरक पडत असतो.
फक्त त्यांना कळून चुकलेलं असतं की आता शब्दांची ताकद संपली आहे.
आता अनुभवच शिकवणार आहे.
हे गप्प होणं म्हणजे हार नाही.
तो एक प्रकारचा दुःखी स्वीकार असतो.
ज्यादिवशी पालक बोलणं कमी करतात, त्यादिवशी त्यांच्या मनातली काळजी संपलेली नसते.
उलट ती आणखी वाढलेली असते.
कारण आई-वडील असणं ही अशी अवस्था आहे की मुलं पन्नास वर्षांची झाली तरी त्यांची काळजी संपत नाही.
त्यांच्या वयाबरोबर काळजीचं स्वरूप बदलतं, पण काळजी कधीच संपत नाही.
म्हणूनच आजच्या मुलांना एक विनंती आहे.
आई-बाबांचं प्रत्येक म्हणणं मान्य करा असं नाही.
प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत व्हा असंही नाही.
स्वतःचे विचार ठेवा.
स्वतःचे निर्णय घ्या.
स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगा.
पण कधीतरी त्यांच्या बोलण्यात दडलेलं प्रेम ऐकण्याचा प्रयत्न करा.
कारण आयुष्यात अशी एक वेळ येते, जेव्हा आई-बाबांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींचा अर्थ अचानक समजू लागतो.
आणि मग मनात एकच खंत राहते—
“हे तेव्हा समजलं असतं तर किती बरं झालं असतं. ”
आजही अनेक घरांमध्ये एखादी आई रात्री उठून मुलाच्या खोलीत डोकावते.
एखादा बाबा सकाळी उशिरापर्यंत झोपलेल्या मुलाकडे पाहून न बोलता निघून जातो.
ते काही बोलत नाहीत.
रागावत नाहीत.
वाद घालत नाहीत.
पण त्यांच्या मनात एक नि:शब्द प्रार्थना सतत सुरू असते,
“देवा, आमच्या मुलांना चांगलं आरोग्य दे. योग्य समज दे. त्यांना सुखी ठेव. आणि जे आम्ही शब्दांत सांगू शकलो नाही, ते त्यांना आयुष्य वेळेवर शिकवो. ”
कारण जगातलं सर्वात निःस्वार्थ प्रेम कोणतं असेल, तर ते पालकांचं.
ते कधी उपदेशाच्या रूपात दिसतं.
कधी काळजीच्या रूपात.
कधी भांडणाच्या रूपात.
आणि कधी पूर्णपणे गप्प झालेल्या शब्दांमधूनही ते तितक्याच ताकदीने व्यक्त होत राहतं. त्यांची ही काळजीच त्यांच्या प्रेमाची सर्वात खरी भाषा असते.
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈