मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पहारा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पहारा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आंबोली घाटातून जाणारी लाल रंगाची ‘एसटी बस’ सर्वांनाच परिचयाची होती. या बसचे जुने ड्रायव्हर होते, ‘माधवराव’. गेली तीस वर्षे त्यांनी हा अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा घाट निर्धोकपणे पार केला होता. माधवराव अतिशय शांत आणि मितभाषी होते.

पण माधवरावांची एक विचित्र सवय होती, जिचा प्रवाशांना भयंकर कंटाळा यायचा. घाटाच्या अगदी मध्यभागी ‘काळभैरव वळण’ नावाचे एक अत्यंत धोकादायक आणि अंधारे वळण होते. तिथे आजूबाजूला काहीही नव्हते, फक्त शेकडो फूट खोल दरी होती. माधवराव रोज न चुकता स्वतःची एसटी बस त्या वळणावर ‘दोन मिनिटांसाठी’ थांबवायचे. ते एसटीतून खाली उतरायचे, दरीच्या कठड्याजवळ जाऊन त्या खोल अंधाऱ्या दरीत काहीतरी निरखून पाहायचे, आणि मग परत येऊन गाडी सुरू करायचे.

एके दिवशी या बसमधून रोहन नावाचा एक तरुण प्रवास करत होता. रोहनला स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर ‘व्हायरल’ व्हिडिओ टाकण्याचे भयंकर व्यसन होते. त्याला पुण्यात एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचे होते आणि बस आधीच लेट होती.

जेव्हा माधवरावांनी नेहमीप्रमाणे त्या निर्जन दरीजवळ गाडी थांबवली आणि ते खाली उतरले, तेव्हा रोहनच्या रागाचा स्फोट झाला. त्याने स्वतःचा मोबाईल काढला आणि माधवरावांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली.

“बघा मित्रांनो, हा म्हातारा ड्रायव्हर रोज या निर्जन दरीजवळ गाडी थांबवून प्रवाशांचा वेळ वाया घालवतोय. नक्कीच हा इथे काहीतरी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचे प्रकार करत असावा. अशा बेजबाबदार माणसांमुळेच एसटीचा बोजवारा उडालाय, ” असा स्वतःचा आवाज टाकून रोहनने तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करून टाकला.

व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. लोकांच्या संतापजनक कमेंट्स आल्या. एसटी महामंडळावर दबाव आला आणि अधिकाऱ्यांनी माधवरावांना बोलावून त्यांच्यावर ‘कामात हलगर्जीपणा’ केल्याचा ठपका ठेवून त्यांना नोकरीवरून निलंबित (Suspend) केले. त्यांचे पेन्शनही रोखण्यात आले. माधवरावांनी कुणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही, ते फक्त मान खाली घालून एसटी स्टँडवरून कायमचे निघून गेले. रोहनला मात्र स्वतःच्या ‘व्हायरल’ ताकदीचा भयंकर अहंकार आला होता.

या घटनेला दोन महिने उलटले. मुसळधार पावसाळ्याचे दिवस होते. रोहन स्वतःच्या नवीन कारने रात्री दोन वाजता त्याच आंबोली घाटातून एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला होता.

पावसाचा जोर भयंकर होता आणि समोरचे काहीच दिसत नव्हते. त्याच ‘काळभैरव वळणावर’ रोहनच्या गाडीचा ब्रेक स्लिप झाला. गाडीने कठडा तोडला आणि ती कार सपकन त्या शेकडो फूट खोल, अंधाऱ्या दरीत कोसळली.

गाडी झाडांमध्ये अडकून उलटी पडली होती. रोहन रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता. त्याच्या छातीत स्टिअरिंग घुसलं होतं. रात्रीचे अडीच वाजले होते, मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुख्य रस्त्यावरून त्याची गाडी दरीत पडलेली कुणालाही दिसण्याची सुतराम शक्यता नव्हती. “आपण आता मरणार, आपल्याला कुणीच वाचवू शकत नाही, ” या भीतीने रोहनच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्याचा श्वास कोंडत होता.

तेवढ्यात… त्या घनदाट अंधारात आणि पावसात दरीच्या वरून एका बॅटरीचा (Torch) प्रकाश त्याच्या गाडीवर पडला. कुणीतरी भिजत, चिखलातून घसरत एका जाड दोरीच्या साहाय्याने खाली दरीत उतरत होते.

तो माणूस गाडीजवळ आला. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, रक्ताने माखलेल्या रोहनला गाडीतून अत्यंत कष्टाने बाहेर ओढले. त्या म्हाताऱ्याने रोहनला स्वतःच्या पाठीवर घेतले आणि चिखलातून, दगडांमधून रक्ताळलेल्या अवस्थेत त्याला खेचत वर रस्त्यावर आणले. रोहन बेशुद्ध पडला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये रोहनला शुद्ध आली. त्याच्या बेडशेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर उभे होते.

“नशीबवान आहेस तू मित्रा. जर काल रात्री ‘माधवरावां’नी तुला दरीतून बाहेर काढलं नसतं, तर आज तुझा मृतदेहच सडला असता तिथे, ” इन्स्पेक्टर म्हणाले.

‘माधवराव? ‘ हे नाव ऐकताच रोहनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, “मा… माधवराव? ते एसटी ड्रायव्हर? पण ते रात्री अडीच वाजता त्या दरीजवळ काय करत होते? “

इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि जे सत्य सांगितले, ते ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच फाटली.

“तुला माहितीये, ते म्हातारे माधवराव रोज एसटी थांबवून त्या दरीत काय बघायचे? पंधरा वर्षांपूर्वी, माधवरावांची गरोदर मुलगी आणि जावई त्याच काळभैरव वळणावरून रात्री दरीत कोसळले होते. ते दोघेही सलग सहा तास त्या दरीत जिवंत होते, मदतीसाठी ओरडत होते… पण रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही गाडीने खाली दरीत डोकावून पाहिलं नाही. ते तडफडून तिथेच मेले. त्या दिवसापासून माधवरावांनी एक शपथ घेतली होती… की त्यांची एसटी जेव्हाही त्या वळणावरून जाईल, तेव्हा ते दोन मिनिटे थांबून दरीत नक्की डोकावून पाहतील, जेणेकरून आणखी कुणाचं बाळ तिथे तडफडून मरु नये. ते प्रवाशांचा वेळ वाया घालवत नव्हते रोहन… ते त्या दरीचा पहारा देत होते! “

रोहनच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. त्याला श्वास घेता येईना.

“तू व्हिडिओ व्हायरल करून त्यांची नोकरी खाल्लीस. त्यांची एसटीची ड्युटी गेली… पण त्या म्हाताऱ्याचा नियम मोडला नाही. नोकरी गेल्यापासून गेल्या दोन महिन्यांत ते म्हातारे रोज रात्री पावसात, स्वतःच्या गावातून पाच किलोमीटर अनवाणी चालत त्या दरीजवळ येतात आणि हातात बॅटरी घेऊन कुणी पडलंय का ते चेक करतात. काल रात्री ते तिथेच उभे होते, म्हणून तू वाचलास. तुला वाचवताना त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि ते बाहेरच्या वॉर्डमध्ये बेशुद्ध आहेत.”

रोहनच्या हातातील सलाईनची नळी निसटली. तो बेडवरून खाली फरशीवर गुडघ्यावर कोसळला.

ज्या म्हाताऱ्याला त्याने स्वतःच्या एका ‘व्हायरल’ व्हिडिओसाठी आणि अहंकारासाठी नोकरीवरून काढले होते, ज्याची त्याने संपूर्ण जगासमोर बदनामी केली होती… त्या देवासमान म्हाताऱ्याने स्वतःच्या मुलीचे दुःख विसरून, नोकरी गेल्यानंतरही भर पावसात दरीचा पहारा दिला होता, आणि त्याच म्हाताऱ्याने रोहनला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते! खोट्या प्रसिद्धीचा आणि सोशल मीडियाचा तो सगळा अहंकार आज त्या म्हाताऱ्याच्या रक्ताळलेल्या पायांसमोर कायमचा राख झाला होता. रोहन वेड्यासारखा दोन्ही हातांनी स्वतःचे तोंड दाबून ओक्साबोक्शी रडत होता. स्वतःच्याच नीचपणाची आणि माधवरावांच्या त्या हिमालयाएवढ्या निस्वार्थ त्यागाची जाणीव इतकी भयंकर होती की, तो तिथेच एका जिवंत प्रेतासारखा थिजून गेला.

आपल्याला जे सत्य ‘स्क्रीनवर’ दिसते, ते नेहमीच खरे नसते. एखाद्याच्या वागण्यामागची नेमकी वेदना समजून घेतल्याशिवाय त्याला जगासमोर गुन्हेगार ठरवू नका. खऱ्या आयुष्यात ‘व्हायरल’ होण्यापेक्षा ‘माणूस’ होणे जास्त गरजेचे असते, कारण जेव्हा सत्याची चपराक बसते, तेव्हा पश्चात्ताप करायला शब्दही अपुरे पडतात.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..

प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..

आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..

कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..

पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.

तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..

ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..

​माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.

हे जगणे सोपे नसते..

या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..

ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..

पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..

जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..

ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..

अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..

हे एक नितांत सुंदर सत्य आहे..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रफू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रफू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

गावातल्या जुन्या बाजारपेठेत एक छोटंसं दुकान होतं — ‘रफूवाला’.

दुकान इतकं छोटं की आत उभं राहिलं की बाहेरचं जग विसरून जावं.

भिंतीवर टांगलेले जुने कोट, फाटलेल्या शाली, झिजलेले स्वेटर्स… आणि टेबलावर एक छोटं भिंग.

 

दादाभाईचं काम एकच — रफू.

.. .. रफू म्हणजे फक्त सुई-दोऱ्याचं काम नाही.

रफू म्हणजे फाटलेलं इतकं जपून जोडणं की फट कुठे होती हेही दिसू नये.

.. .. पण हे काम सगळ्यांना जमत नाही.

कारण फक्त सुई-दोरा असला म्हणून रफू होत नाही.

त्यासाठी लागतात — वर्षांचा अनुभव, संयम, आणि कपड्याची भाषा समजणारे डोळे.

 

त्या दिवशी दादाभाईच्या दुकानात एक तरुण आला. हातात त्याने एक जुना स्वेटर धरला होता.

“भाई… हे रफू होईल का?”

भाईने भिंग लावून स्वेटर पाहिला. फट मोठी होती.

 

ते शांतपणे म्हणाले, “रफू होईल… पण वेळ लागेल.”

 तरुण थोडा चिडून म्हणाला, “इतका वेळ कशाला? दोन टाके मारले की झालं ना?”

 

भाई हलकंसं हसले.

“बाबा… दोन टाके मारणं म्हणजे शिवण.

पण रफू म्हणजे जखम लपवणं.”

 

 दुकानात एक वृद्ध माणूस बसलेला होता.

तो सगळं ऐकत होता. त्याने हळूच विचारलं ,

“भाई… कपड्याला रफू असतो…

पण नात्यांना असतो का?”

.. .. दुकानात क्षणभर शांतता पसरली.

 

त्या वृद्धाचं नाव होतं दत्ताभाऊ.

त्यांचा एक जिवलग मित्र होता — गणेश.

शाळेत एकत्र, कॉलेजात एकत्र, लग्नात एकमेकांच्या बाजूला.

लोक म्हणायचे,

“हे दोघे मित्र नाहीत…एका आत्म्याचे दोन भाग आहेत.”

 

पण आयुष्यात एक दिवस आला.

व्यवसायात पैसे आले.

पद, प्रतिष्ठा, सत्ता आली.

आणि त्याच्यासोबत आली —

.. .. अहंकाराची बारीक फट.

 

सुरुवातीला ती फट दिसलीच नाही. मग गैरसमज वाढले. एकमेकांवर शब्द झडले.

आणि एक दिवस…

.. .. नातं फाटलं.

 

दत्ताभाऊ हळू आवाजात म्हणाले,

“सुरुवातीला वाटलं… दोन फोन केले की सगळं ठीक होईल. पण अहंकाराचा दोरा खूप घट्ट असतो.”

 

वर्षं गेली.

.. दोघेही आपापल्या आयुष्यात मोठे झाले.

पण आत कुठेतरी एक जागा रिकामी राहिली.

 

भाई शांतपणे रफू करत होते.

ते म्हणाले,

“दत्ताभाऊ… कपडं फाटलं की लोक लगेच आणतात.

पण नातं फाटलं की लोक थांबतात.

अहंकार सुकू देतात… जखम खोल जाऊ देतात… .. आणि मग रफू करायला येतात तेव्हा…”

 

ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले,

“दोरा जुळत नाही… रंग जुळत नाही… आणि फट जास्त मोठी झालेली असते.”

 

दत्ताभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं.

 

ते म्हणाले, “भाई… मग उपाय काय?”

 

भाईने सुई हळूच ठेवली.

.. “उपाय एकच… रफू लवकर करायचा.”

“फट दिसली की लगेच बसायचं.

दोरा संयमाचा, सुई समजुतीची, आणि गाठ माफीची.”

.. .. स्वेटर तयार झाला. फट कुठे होती हे ओळखूही येत नव्हतं.

 

तरुण आश्चर्याने म्हणाला,

“भाई… खरंच दिसत नाही!”

 

दादाभाई म्हणाले,

“कारण मी फक्त टाके मारले नाहीत.

कपड्याच्या धाग्यांतूनच धागा काढून रफू केला.”

 

दत्ताभाऊ उठले. त्यांनी फोन काढला. खूप वर्षांनी एक नंबर डायल केला.

 

फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला…

“हॅलो…?”

दत्ताभाऊंचा आवाज थरथरला.

“ गण्या, आपल्या मैत्रीला थोडा रफू करायचा आहे. वेळ आहे का?”

 

त्या दिवशी दादाभाई दुकान बंद करताना हळूच पुटपुटले , “कपड्याचा रफू मी करू शकतो. पण नात्यांचा रफू माणसांनी स्वतः करायचा असतो…

कारण –

– – फाटायला एक क्षण लागतो, पण रफू करायला कधी कधी संपूर्ण आयुष्य लागतं.”

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

मुलगा काय करतो? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

लग्नाच्या ठरवून केलेल्या भेटीत, मुलगी पाहायला गेल्यावर एक प्रश्न जवळजवळ हमखास विचारला जातो: “मुलगा काय करतो?”

भुराचे कुटुंब त्याच्यासाठी मुलगी पाहायला गेले. चहा-नाश्ता आणि थोड्या गप्पा झाल्यावर, मुलीच्या वडिलांनी हळूच मुख्य विषय काढला: “तर, तुमचा मुलगा सध्या काय काम करतो?”

भुराच्या वडिलांनी चष्मा नीट केला, घसा खाकरला आणि अगदी कॉर्पोरेट स्टाईलमध्ये बोलायला सुरुवात केली: “पहा, आमचा भुरा सध्या एक agro-based Direct-to-Consumer स्टार्टअपचा Founder आणि Managing Director आहे. आम्ही organic health आणि wellness सेक्टरमध्ये काम करतो. ”

हे ऐकून मुलीचे वडील अर्धे प्रभावित झालेच. “वा! मग नेमकं तुमचं प्रॉडक्ट काय आहे?”

भुराचे वडील आत्मविश्वासाने पुढे म्हणाले: “आमच्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये high-protein roasted legumes आणि traditional caramelized sweets आहेत. आम्ही कच्चा माल थेट wholesale supply chain मधून घेतो, आणि मग तो आमच्या स्वतःच्या thermal processing unit मध्ये dry-roast करतो. आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आमचं packaging 100% eco-friendly आणि biodegradable आहे!”

हे सगळं ऐकून मुलीचं कुटुंब थक्क झालं. एखाद्या मोठ्या multinational कंपनीसारखं वाटत होतं!

मुलीच्या काकांना राहवलं नाही, त्यांनी विचारलं: “तुमच्या कंपनीचं मुख्य ऑफिस कुठे आहे? आणि किती कर्मचारी आहेत?”

अजिबात न घाबरता भुराचे वडील म्हणाले: “पहा, हा modern lean startup चा काळ आहे, त्यामुळे आम्ही दुकानाचं भाडं आणि वीज यांसारख्या अनावश्यक खर्चांना टाळतो. आमच्याकडे एक mobile retail outlet आहे, जो रोज traffic आणि लोकांच्या गर्दीनुसार जागा बदलतो. आणि सगळं काम माझा मुलगा एकटाच पाहतो — तो एक solopreneur आहे!”

आता मात्र मुलीचे वडील पूर्णपणे गोंधळले. ही इंग्रजी त्यांना काही समजेनाशी झाली. ते म्हणाले: “मला ही marketing language नीट समजली नाही. साध्या भाषेत सांगाल का, मुलगा नेमकं काय करतो?”

तेवढ्यात कोपऱ्यात बसलेला मुलाचा मित्र हळू आवाजात म्हणाला: “काका, याचा अर्थ असा आहे की आपला भाऊ हायवेवर गाडी लावून शेंगदाणे, भाजलेले हरभरे आणि रेवडी विकतो! तो कढईत वाळूत हरभरे भाजतो आणि वर्तमानपत्राच्या घड्या करून ग्राहकांना देतो — ज्याला हे लोक biodegradable packaging म्हणतायत!”

हे ऐकून मुलीच्या वडिलांच्या हातातील चहाचा कप पडायचीच वेळ आली!

म्हणून मित्रांनो, marketing शब्दांची जादू फार मोठी असते. तुमची presentation जोरदार असेल, तर शेंगदाण्याची गाडी सुद्धा corporate startup वाटू शकते!

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ माझा गाव चोरीला गेला… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझा गाव चोरीला गेला…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

कोकिळेची साद होती,

 कोंबड्याची बांग होती l

*

टाक्यावरच पाणी पिऊन,

 जनावरे पण तृप्त होती l

*

इरला होता, कांबळा होता,

 लट्यात पण उब होती l

*

नाचणी होती, वरी होती,

 भाकरीला पण चव होती l

*

पिटी होती, तेरा होता,

 डांगर पण लय होता l

*

जाता होता, घिरट होती,

 हिडका लावची कला होती l

*

बिवळा होता, मूडी होती,

 यट धरायची मजा होती l

*

परसा होता, उतव होता,

 शेणीसाठी खोप होती l

*

सूप होत, रवळी होती,

 बनवण्याची कला होती l

*

मडकी होती, वाळमांड होती,

 डोण्यात सुद्धा पेज होती l

*

गाई होत्या, म्हैशी होत्या,

 बुडकुल्यात दूध होता l

*

नांगर होता, जू होता,

 इरी – इरीची साद होती l

*

ढोरं होती, पोरं होती,

 पोरं पण निर्व्यसनी होती l

*

मासे होते, मटण होतं,

 कोक्याची पण माष्टा होती l

*

डोम्यां होता, खून होती,

 व्हाळात पण मासे होते l

*

कोयता गेला, आकडी गेली

 पाजळण्याची पायरी केली l

*

पाटा गेला, व्हायन गेला,

 मुसळाचा वसया गेला l

*

गरी गेली, डेकळे गेले,

 करंडात आता कांदे आले l

*

लाट गेली, कोळंब्या गेला,

 फापाळ्या वरची उडी गेली l

*

राख गेली, कोंडला गेला,

 कोंडल्यातले कुत्रे गेले l

*

घूड गेले, रवनी गेली,

 कवटाची पण पोळी गेली l

*

कवळा गेली, गोवरी गेली,

 काजू भाजायची मजा गेली l

*

असा माझा गाव होता,

 कोणी मेल्याने चोरून नेला l

*

असा माझा गाव होता,

 कोणी मेल्याने चोरून नेला l

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शब्दकळा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “शब्दकळा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

सूनबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या. मधेच म्हणाल्या “ अगबाई ! आज निरांजन नुसतंच कुरवाळलेलं दिसतंय ! “ बी. ए. मराठी असलेल्या सूनबाईंना वाक्याचा अर्थ कळायला अंमळ वेळच लागला ! अर्थ लागला तेव्हा हसू आणि राग या दोन्हीचं मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेह-यावर उमटला. सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फणकारा दाखवावा हे तिला कळेचना !

मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न – समृद्ध आहे. तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या, कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत ! ‘शर्करा अवगुंठीत’ शब्दांचा वापर लीलया होत असे.

आमचे एक परिचित होते. घर म्हणजे नांदतं गोकुळ ! मुलांच्या दंग्यानं अन् पसा-यानं तिथल्या आजी कावलेल्या असत. ‘ आवरलेलं घर ‘ हे दृष्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच ! कधी त्यांच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत. पसा-यात बुडालेल्या आजी सहज बोलून जात, “ कार्टी बसतील तिथे * ठेवतात ! “ हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं. आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही.

माझी एक धष्ट पुष्ट मैत्रीण कामावरुन येताना जिमला जाऊन येत असे. त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेले. तिच्याकडे सासूबाई आणि आजेसासूबाई अशा दोघीही होत्या. सासूबाई साधारण सत्तरीच्या. मैत्रिणीला यायला थोडा उशीर होणार होता. त्यामुळे सासूबाई भराभर कामं उरकत होत्या. मी आपलं सहज म्हटलं “ काकू, तुम्ही अजूनही फिट आहात अगदी !” लगेच आजी उद्गारल्या “ काय करणार बाई, तरण्या झाल्या बरण्या अन् म्हाता-या झाल्या हरण्या “ ! मी उगीच अंग चोरुन अन् सावरून बसले.

म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच. फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत !

वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुलाशी झालं, तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली “हडळीला नव्हता नवरा अन् झोटिंगाला नव्हती बायको ! आता जोडी छान जमली. “

आजोळी पूर्ण सुट्टी घालवल्यानंतर ( तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले टूर किंवा ट्रीप्स नसायच्या. कधी वडिलांच्या मूळ गावी, कधी आईच्या माहेरी मुक्काम. हाच बदल. ) जूनमधे शाळेत गेले. पहिला दिवस, मराठीच्या बाई वर्गात आल्या. गप्पा टप्पा सुरु झाल्या. मधेच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या “ वा ! गालांवर अगदी रुई फुललीय ! “ क्षणभर मी गोंधळले आणि मग अर्थ कळून रुईतच खुद्कन हसले होते.

अगदी शेलक्या शब्दांत उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत.

आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे, रंग काय चाटायचाय? “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पोसारखा पडलेला असतो “ असा होई. खरं तर वरची वाक्यं मन दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई. ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.

चांगलं पण बोललं जाई बरं का ! एखादी मुलगी सुदृढ असेल तर “ अहो, दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल. “ एखादीसाठी “इतकी रुपवान आहे की वाटेवरचा चोर सुद्धा उचलून नेईल” (म्हणजे काय म्हणायचे असेल? ) कोणी सुग्रण असेल तर “ अहो, पुरणपोळी विरघळते तोंडात, पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपत बसाल !”

आताच्या काळात एखादी स्त्री ‘ ब्युटीफुल, गॉर्जियस ‘ दिसत असेल. तेव्हा

 ‘ चारचौघींसारखी ‘, ‘ दहाजणीत उठून दिसेल अशी ‘, ‘ लाखात एक ‘ असे उल्लेख असत आणि त्यावरून रुपाचा अचूक अंदाज येई !

अर्थात पुरुषवर्गही यातून सुटत नसे. शेलकी विशेषणं त्यांच्यासाठीही असत. ‘आग्यावेताळ, जमदग्नीचा अवतार, दुर्वास मुनी, पिंपळावरचा मुंजा, पाप्याचं पितर, लुंग्या सुंग्या’ वगैरे वगैरे ! बरं शब्दकोषात याचे अर्थ शोधायची गरजच नव्हती. आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे. ‘ फाटका इसम ‘ मात्र मी बरेच दिवस शोधत होते ! ‘मदनाचा पुतळा ‘ बापकमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती. अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते. शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती.

गॉसिपिंग त्याही काळात होतंच. घरातल्या ज्येष्ठा व्हरांड्यात, ओट्यावर, अंगणातल्या बाजांवर निवडणं टिपण करत मस्त वेळ घालवत. “ हातपाय लुळे अन् जीभ चुरुचुरु वळे “ असं माझी आजी म्हणे. अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे !

ही अशी खमंग, लज्जतदार, मर्मभेदी, वर्मभेदी कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली होती. आता तर ती परोठे, ठेपले, पिझ्झा, बर्गरच्या संस्कृतीत विलीन झाली आहे. आंग्लाळलेल्या मराठीत तो ठसकाच नाही, ती मज्जा नाही ! पिढीगणिक भाषा बदलत जाते. ‘ती व्यक्ती’चा ‘तो व्यक्ती’ कधी झाला, समजलं तरी का ? आज प्रसिद्धीमाध्यमांवर जे मराठी बोललं जातं ते ब-याचदा अनाकलनीय असतं. “** पण नांदा“ ! भाषा जिवंत राहायलाच हवी ! सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ नाही का आपण आवडीनं खातो!तसंच, ही मराठीपण आपलीच आहे, नाही का ?

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनाच्या सवयी” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मनाच्या सवयी” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

Instant Gratification – संयम हरवलेल मन

काल एका देवळाच्या रांगेत दर्शनाला भाविक उभे होते, तेव्हा एक माणूस रांगेत पुढे उभारण्यासाठी व लगेच दर्शन घेण्यासाठी वाद घालत होता, हे पाहून हे लक्षात आले की आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात.

आज, आता, ताबडतोब!

 

जेवण हवं तर instant noodles.

मनोरंजन हवं तर ३० सेकंदाची reel.

खरेदी हवी तर one day delivery.

खेळ हवा आहे तर झटपट निकाल.

आणि यशही हवं ते overnight success!

 

थांबणं, वाट पाहणं, एखादी गोष्ट हळूहळू घडू देणं —

ही सवय जणू आपल्या सर्वांच्या आयुष्यातून हरवत चालली आहे.

 

मानसशास्त्रात यालाच म्हणतात Instant Gratification —

म्हणजे ताबडतोब सुख मिळवण्याची सवय.

 

रस्त्यावर सिग्नल लागतो. तीस सेकंदही झाले नसतात आणि मागून हॉर्न वाजायला सुरुवात होते. जणू त्या तीस सेकंदांवरच आयुष्याचं भविष्य ठरणार आहे.

 

इंटरनेट थोडं slow झालं की चिडचिड. फूड डिलिव्हरी दहा मिनिटं उशिरा आली की राग.

 

आजचं मन जणू एका विचित्र मोडमध्ये जगत आहे —

“आत्ता… लगेच… instant. ”

 

या सवयीचा परिणाम फक्त आपल्या वागण्यात दिसतो, पण तो आपल्या मेंदूतुन आणि मनातून तयार होतो.

 

जेव्हा आपल्याला लगेच आनंद मिळतो — मोबाईल notification, reel, likes, instant fast food — तेव्हा मेंदूमध्ये dopamine नावाचं रसायन वाढतं. हे dopamine मेंदूला सांगतं — “हे पुन्हा कर… यात मजा आहे. ” म्हणून आपण पुन्हा मोबाईल उघडतो, पुन्हा reels पाहतो, पुन्हा पटकन आनंद देणाऱ्या गोष्टी करतो.

हळूहळू मेंदूला सवय लागते जलद आनंदाची.

मग जे काम वेळ घेणारं आहे — अभ्यास, व्यायाम, नातं टिकवणं, करिअर घडवणं — त्यात मन टिकत नाही. कारण तिथे instant reward नसतो.

 

एका अर्थाने आजचा मेंदू जणू reel-training सारखा क्षणिक आनंदाचा गुलाम झाला आहे.

३० सेकंदात excitement.

 

पण आयुष्य reel नसतं…

तो full चित्रपट असतो.

आणि समजायला, जगायला, अनुभवायला

फक्त संयम लागतो.

मनशांतीचा उगमही संयमातून होतो.

अधीर मन धारदार असतं. टोचणारं, बोचणारं आणि मानसिक समाधानाचे तुकडे करणारं.

 

एका रोपट्याला झाड व्हायला वर्षं लागतात. पण आपण रोज मुळं उपटून पाहिलं — “वाढलं का? ” तर ते झाड कधीच वाढणार नाही.

 

पण आज आपण आयुष्याबरोबरही हेच करत आहोत.

 

थोडा संघर्ष आला की हार.

थोडं नातं कठीण झालं की दूर.

थोडा वेळ लागला की निराशा.

 

कारण मनाला संयमाची सवय उरलेली नाही.

 

खरं तर आयुष्यातील मोठ्या गोष्टी instant मिळत नाहीत. विश्वास तयार व्हायला वेळ लागतो. नातं मजबूत व्हायला वेळ लागतो. यश घडायला वर्षं लागतात.

 

आजच्या जगात वेग सगळ्यांकडे आहे. पण संयम फार थोड्यांकडे आहे. जग फास्ट झालंय, असं सर्वांना वाटतंय, पण पृथ्वी त्याच संयमी वेगाने फिरतेय. निसर्गचक्र तसेच आहे. माणसाने मोहाच्या पाठी गती बदलली आहे बस!

 

संयमी राहणं ही अचानक येणारी गोष्ट नाही; ती हळूहळू तयार होणारी सवय आहे. कधी कधी उतावळेपणा वाटला तर थोडा विराम घ्यायला शिका. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण शांत राहा. प्रक्रियेवर विश्वास ठेवा — कारण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो. मोबाईलपासून कधी कधी थोडं अंतर ठेवा — कारण instant आनंदाची सर्वात मोठी सवय आज मोबाईल लावतो.

 

कारण संयम म्हणजे फक्त थांबणं नाही…

तर योग्य वेळी गोष्टी होतील यावर विश्वास ठेवून थांबणं आहे.

 

संत होणं कदाचित कठीण असेल…

पण संयमाने शांत राहणं ही प्रत्येकाला शिकता येणारी कला आहे.

 

कारण आयुष्यात झाडावरील आनंदाची फुलं instant फुलत नाहीत तर ती

संयमानेच फुलतात आणि समाधान, आत्मशांतीचा सुगंध सर्वत्र वाटतात.

 

 लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘द बेस्ट शेफ…’ – लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘द बेस्ट शेफ…’ – लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

दुपारचे दोन वाजत आले होते. ऊन चांगलंच चढलं होतं. घरी परतायची घाई होती. मुलं शाळेतून आली असणार. त्यांचं जेवण, अभ्यास, आपली कामं, सगळंच वाट बघत असतं. तरीही या रस्त्यावर नेहमीप्रमाणे गाडीची गती मंदावतेच, पावलं जराशी रेंगाळतातच. कारण या रस्त्यावर आई रहाते. तिला दोन मिनिटं भेटून येऊ असा विचार मी करते.

कित्येकदा इथे जवळपास कामासाठी येऊन जाते, पण तिला सांगत नाही. सांगितलं, तर घरी का आली नाहीस, म्हणून ती रागावते. पण आपल्याला कायमच घाई असते. आज वाकडी वाट करून तिला भेटूच म्हणते.

ढळढळीत दुपारी मला दारात पाहून आई जरा चमकतेच.

काय ग अचानक? म्हणत लगेच हातात पाणी देते.

काही नाही गं… सहज आले, म्हणत आईच्या सोफ्यावर धपकन बसते. इथे धपकन बसायला फार मजा वाटते. मग तिच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येतो,

‘जेवलीस? ‘

मी नाही म्हणते, घरी जाऊन (आपणच बनवलेलं) जेवायचं असतं. जरा इकडचं तिकडचं बोलतो आम्ही.

परत जिव्हाळा प्रश्न रिटर्न्स, जेवतेस का? मी नको गं… म्हणत असतानाच, उशीर बघ किती झालाय, मुलं बघतील आज एक दिवस स्वतःचं, जेऊनच जा म्हणत, एकीकडे ती स्वयंपाकघरात शिरतेसुद्धा.

एकटीच असल्याने स्वतःपुरता सकाळचा स्वयंपाक करून तिने संपवलेला असतो. त्यामुळे माझ्यासाठी आता स्क्रॅचपासून सुरुवात करायची असते. तिला काम करावं लागतं, या गोष्टीचं मी स्वतः आई झाल्यापासून मला फार वाईट वाटतं. पण तसंही आईचं कायम ऐकावं, हे मी नाहीतरी आमच्या लेकीला बजावत असतेच. त्यामुळे मी तिचं निमूट ऐकते.

‘जरा वेळ टीव्ही बघ, मी करते काहीतरी’ म्हणत, साठी ओलांडलेली माझी आई, एकीकडे कांदा चिरायला घेते.

काही मदत करु का गं? या प्रश्नाचं उत्तर ‘ नको, बस नुसती ‘ असं येणार हे माहीत असलं, तरी मी उगाच तिला विचारते. कारण हे उत्तर ऐकायला मला आवडतं.

पाच मिनिटात स्वयंपाकघरातून कांदा फोडणीत घातल्याचा वास, कुकरच्या शिट्टीचे, भाकरी थापल्याचे आवाज येऊ लागतात. मला तिच्या हातची भाकरी प्रचंड आवडते, हे ती कधी म्हणजे कधीच विसरत नाही. माझ्यासाठी जगातला बेस्ट शेफ कामाला लागलेला असून सगळ्यात सुंदर अन्न बनत असतं.

दहाव्या मिनिटाला माझ्यासमोर तव्यावरची तांदळाची भाकरी, वाफाळतं पिठलं, घट्ट दह्यातली कांद्याची कोशिंबीर, जवसाची ताजी चटणी, भाजलेला पापड असलेलं सुग्रास ताट येतं.

पहिल्या घासाबरोबरच मी आनंदाचा कढ गिळते आणि मला जेवताना बघून आईची पुढच्या चार दिवसांची भूक भागते. पांढऱ्याशुभ्र भाकरीचे पदर व्यवस्थित सुटलेले, पिठल्याची कंसिस्टंसी परफेक्ट, कोशिंबीरीला घरचं दही, इतकं साधं आणि रुचकर जेवण आपण खूप दिवसात जेवलो नाहीये हे मला जाणवतं. आजकाल इतक्या हॉटेलांचे रिव्ह्यू वाचत असतो आपण, पण या जेवणाचा रिव्ह्यू लिहायला शब्द कमी पडतील. आणि तसंही, देव, बच्चन, पुलं, लताबाई आणि आईच्या हातचं जेवण यांचे रिव्ह्यू लिहू नयेत.

आज पुन्हा एकदा पटलं, पोट भरणारं जेवण सगळीकडे मिळतं, पण तृप्त करणारं जेवण फक्त आईकडे मिळतं!

 *

लेखिका: सुश्री  गौरी ब्रह्मे.

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिचे थांबणे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तिचे थांबणे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

असं म्हणतात की, वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही,

पण वेळेचं गणित साधणाऱ्या ‘ती’ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात.

उदाहरणार्थ : साध्या-साध्या गोष्टी.

पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद.

पण ‘ती’ तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही.

कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते, तरीही.

सगळी कामे आटोपल्यावरही, ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून वाया जाऊ नये म्हणून.

तशीच, जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत, ‘ती’ थांबते.शी-शू सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत ‘ती’ थांबते.मुलं लहान असो नाहीतर मोठी. परीक्षा, पालक-सभा, त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं. सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.

चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते. तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण, शेअर करण्यासाठी.

घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत, कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत ‘ती’ थांबते, जेवायची. सगळ्यांच्या पाठीशी ‘ती’ थांबते.

खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय. व्यवस्थित.

काय हरकत आहे हे मान्य करायला. तिच्या या, ‘थांबण्यात’ही एक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळेचं वेळ चांगली चालली आहे.

अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी ‘थांबून’ आहे. अगदी स्ट्रॉंग.

एकही दिवस स्वयंपाकघर बंद नाहीये, कंटाळा येतो, थकवाही. तरीही रोजच्या-रोज सगळी स्वच्छता, एक्स्ट्रा काळजी, कोणत्याही आजारपणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही, असं तिने मनाशी पक्क ठरवलंय.

म्हणूनच म्हटलं, तिच्या या थांबण्यातही एक ऊर्जा आहे. त्या उर्जेमुळेच ही अशी कठीण वेळही निघून जाईल.

प्रत्येक घरातील ‘तिला’ सादर नमन!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवं वळण… कवयित्री : सुचेता गोखले ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

नवं वळण… कवयित्री : सुचेता गोखले ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

स्त्री जन्माची गाथा गेली नव्या वळणावर

राजा राणी स्वार आता स्वतंत्र मार्गावर

 *

पूर्वीची ती लाजरी राणी गेली कुठे हरवून?

रुसल्या राणीची समजूत काढणारा

राजा, नाही येत दिसून.

 *

स्त्रीमुक्तीचे दिवस आले सोन्याचे

आता स्वयंपाघरात राज्य असते दोघांचे

 *

तिशीतील राजा राणी, परिपक्व त्यांची मते

करियरची घोडदौड सांभाळत करतात कामे फत्ते

 *

स्वयंपाक करायचा दोघांनी

बाळ सांभाळायचे दोघांनी

 *

तोलून तराजूत कामे सारी

म्हणतात मैत्री आमच्यात भारी

 *

तिने केली भाजी तर त्याने करावे वरण

त्याने आणले दळण तर तिने करावे तळण

 *

चिऊ-काऊच्या गोष्टी बरोबर मऊ मऊ भात

बाळ राजे चालतात धरून दोघांचा हात

 *

नवीन कुटुंबातून आजी आजोबा हरवले

बाळ राजे आई बाबा सोबत खेळण्या हट्टावले

 *

पिझ्झा आणि बर्गर आले, गेले मोदक आणि लाडू

आईची झाली मॉम आणि बाबाचे झाले डॅडू

 *

नको मोबाईल नको टीवी नका आता टोकू

बालगीतातून भेटतील त्यांचे दोस्त चिकू पिकू

 *

स्त्री म्हणजे वात्सल्याचा झरा

शिक्षणाच्या ज्योतीने उजळेल तो खरा

 *

दोघे आता समर्थ संसार रथ सांभाळण्या

पुढच्या पिढीस सर्वतोपरी सक्षम करण्या

 *

स्त्री शिकली की घर होते संस्कारीत

नवीन पिढी नक्कीच करेल भारताला विकसित

कवयित्री : सुचेता गोखले

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares