मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘परशुराम : न्यायाचा कठोर पण आवश्यक निनाद’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘परशुराम : न्यायाचा कठोर पण आवश्यक निनाद’ ☆ श्री दिवाकर बुरसे

परशुराम हे हिंदू परंपरेतील एक अत्यंत गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व आहे—योद्धा आणि ऋषी, क्रोध आणि तपश्चर्या, शक्ती आणि ज्ञान यांचा अद्वितीय संगम. भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणून त्यांची भूमिका धर्माचे रक्षण करणे ही होती.

परशुरामांविषयी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे त्यांचा “क्षत्रिय संहार”.

हा सर्व क्षत्रियांवर केलेला आंधळा हल्ला नव्हता, तर अन्यायी आणि धर्मभ्रष्ट सत्ताधाऱ्यांविरुद्धचा कठोर हस्तक्षेप होता. त्यांचा क्रोध हा वैयक्तिक सूड नसून, सामाजिक संतुलन पुनर्स्थापित करण्याचे साधन होता.

श्रीरामासोबतचा त्यांचा प्रसंग हा अहंकाराचा संघर्ष नसून, एका युगातून दुसऱ्या युगात होणाऱ्या परिवर्तनाचे प्रतीक आहे. तसेच, कर्णाला दिलेला शाप हा सत्य आणि अनुशासन यांवरील त्यांच्या अढळ भूमिकेचे द्योतक आहे—जरी तो आधुनिक दृष्टिकोनातून कठोर वाटला तरी.

परशुराम हे केवळ योद्धे नव्हते; ते भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांचे गुरु होते. त्यांनी युद्धकलेसोबतच नैतिकता, कर्तव्य आणि संयम यांचेही शिक्षण दिले. प्रचंड शक्ती असूनही त्यांनी वैराग्याचा मार्ग स्वीकारला—हीच त्यांची खरी महानता.

त्यांची प्रतिमा केवळ “क्रोधी योद्धा” अशी पाहणे अपूर्ण आहे. ते धर्मसंरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कठोर निर्णयांचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो—

खरी शक्ती ही केवळ सामर्थ्यात नसून, ती शहाणपण, अनुशासन आणि न्याय यांच्या संतुलनात असते.

जय परशुराम जय जय परशुराम ॥

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३७ आणि ३८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३७ आणि ३८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३७ – – 

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |

उडी घालितो संकटी स्वामी तैसा |

हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३७|

अर्थ :  चक्रवाक पक्षांना ज्याप्रमाणे सूर्य अंधारापासून मुक्ती देतो किंवा दिशा दाखवतो त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच परमेश्वर सुद्धा भक्ताच्या संकटात त्वरित धावून जातो आणि त्याची संकटातून मुक्तता करतो. हरीभक्तीचा महिमा पावलो पावली ऐकू येतो. त्याची निशाणी गर्जते आहे. दासाभिमानी असलेला राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(मार्तंड – सूर्य, निशाण – एक रणवाद्य/डंका, घाव – त्या वाद्यावरील प्रहार)

विवेचन :  भगवंत आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करण्यासाठी कशाप्रकारे धावून जातो हे सांगण्यासाठी समर्थ आपल्याला या श्लोकात चक्रवाक पक्षाचे उदाहरण देतात.

चक्रवाक पक्षातील नर आणि मादी एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु अंधारामध्ये या पक्षांची एकमेकांपासून ताटातूट होते. अंधारात त्यांना काहीही दिसत नाही. फक्त ते एकमेकांना साद घालतात. त्यांचा आर्त आवाज फक्त एकमेकांना ऐकू येतो. सूर्योदयाची ते वाट पाहत असतात. एकदा का सूर्योदय झाला की त्यांना दिसू लागते आणि विरहाच्या दुःखातून त्यांची मुक्ती होते. अशा रीतीने चक्रवाक पक्षी आणि सूर्य एकमेकांवर अवलंबून असतात.

या चक्रवाक पक्षांसाठी सूर्य ज्याप्रमाणे विरहातून मुक्तीचे कारण ठरतो, त्याप्रमाणेच भगवंत देखील आपल्या भक्तांसाठी धावून जातो आणि त्यांची संकटातून मुक्तता करतो. आपल्या संकटात जर भगवंत धावून यावा असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्याच्या भक्तीची ओढ लागली पाहिजे. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याची अनन्यभवाने भक्ती करायला हवी म्हणजे तो संकटप्रसंगी धावून आपली त्यातून सुटका करतो.

श्रीहरी हा भक्तवत्सल आहे. जसे भक्ताला भगवंताशिवाय होत नाही तसेच श्रीहरीला देखील आपल्या भक्ताची काळजी केल्याशिवाय चैन पडत नाही. जेव्हा भक्त एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा परमेश्वर त्याच्यासाठी स्वतःहून चार पावले पुढे येतो. हरिभक्तीचा महिमा फार मोठा आहे आणि हा महिमा आपल्याला पावलोपावली म्हणजे सर्वत्र ऐकू येतो. त्याची निशाणी म्हणजे त्याचा डंका सर्वत्र वाजतो आहे. वेद, शास्त्र, पुराणे देखील त्याचीच महती गात आहेत.

ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षातील नर आणि मादी हे दोन जीव एकमेकांसाठी आसुसलेले असतात. त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत म्हणजे जीव आणि शिव. जीव शिवापासून म्हणजे आपल्या मूळ रूपापासून दूर गेला आहे. भगवंताची भेट म्हणजे जीवाचे शिवाशी मिलन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती. ईश्वराला मनापासून आवाहन केले तर तो आपल्या हाकेला धावून येतो. ईश्वर म्हणजे या विश्वातील सूक्ष्म आणि सर्वव्यापी अदृश्य शक्ती. ही शक्ती आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असते. फक्त आपले आवाहन तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरी तळमळ हवी. २७ व्या श्लोकापासून तर या ३७ व्या श्लोकापर्यंतच्या एकूण अकरा श्लोकांमध्ये परमेश्वर आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही ही गोष्ट समर्थ आपल्या मनावर ठसवतात.

स्वसंवाद : 

१) चक्रवाक पक्षाला जशी सूर्याची ओढ असते तशी माझ्या मनात परमेश्वराची आर्त ओढ कधी निर्माण झाली आहे का ?

२) “जीवाचे शिवाशी मिलन” हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात हे ध्येय मला दिसते का ?

३) हरिभक्तीचा डंका सर्वत्र वाजतो आहे. मला तो खरंच ऐकू येतो का की सांसारिक गोंगाटात तो माझ्यापर्यंत पोहोचतच नाही ?

– – – – 

श्लोक क्र. ३८ – – 

मना प्रार्थना तुजला एक आहे|

रघुराज थक्कित होऊनि पाहे |

अवज्ञा कदाही येदर्थी न कीजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३८|

अर्थ :  या श्लोकात समर्थ मनाला प्रार्थना करतात की राघवाला एकवार तू थक्क होऊन पहा (म्हणजेच त्याला समजून आणि जाणून घे). मनाने तू कायम भगवंताजवळच वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अवमान म्हणजे अवज्ञा कधीही करू नकोस.

(थक्कित – आश्चर्ययुक्त/अद्भुत, येदर्थी – या बाबतीत)

विवेचन :  आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. या श्लोकात मात्र ते मनाला प्रार्थना करतात की हे मना परमेश्वराकडे तू थक्क होऊन पहा. समर्थांचे हे सांगणे सुरुवातीला आपल्याला थोडे विचित्र वाटते. पण त्यात खूप गहन अर्थ भरलेला आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण थक्क किंवा आश्चर्यचकित होऊन केव्हा पाहतो तर ज्यावेळी त्या गोष्टीचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. आपल्या समजण्याच्या पलीकडे ती गोष्ट असते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे एखादी अद्भुत गोष्ट म्हणून पाहतो.

ज्यावेळी पहिल्यांदा वाफेवरचे पहिले रेल्वे इंजिन धावले आणि त्याच्या सहाय्याने रेल्वे धावली, त्यावेळी लोकांनी थक्क होऊन तिच्याकडे पाहिले. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अद्भुत होती. बैल, घोडे किंवा ओढणारे कोणीही नसताना ही गाडी कशी चालते याचे कोडे सर्वसामान्यांना पडले होते. पण जेव्हा ही गोष्ट त्यांना नित्याची झाली आणि त्यामागील कार्यकारण भाव समजला तेव्हा तिचे आश्चर्य त्यांना वाटेनासे झाले. हळूहळू ते तंत्रज्ञान आपण जाणून घेतले, त्याचा अभ्यास केला. त्यात पुढे प्रगती झाली. विजेवर, डिझेलवर धावणाऱ्या रेल्वे इंजिनांची निर्मिती झाली. त्यासाठी त्या तंत्रज्ञानाच्या सानिध्यात आपल्याला जावे लागते.

तशीच ईश्वराने निर्मिलेली ही सृष्टी अद्भुत आहे. चंद्र, सूर्य, तारांगणे, मेघमाला, निरनिराळे प्राणी, पक्षी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव पाहिले की थक्क व्हायला होते. या गोष्टी एकदा काळजीपूर्वक पाहिल्या की त्याच्या मागील कार्यकारण भाव जाणून घेता येईल. एखादे तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल तर ज्याने ते निर्माण केले आहे त्याच्याजवळ जाऊन आपल्याला ते शिकावे लागते. या सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे. तिचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी भगवंताला शरण जावे लागेल.

शरण जाणे म्हणजेच भगवंताच्या जवळ जाणे. त्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपल्याला त्याच्याजवळ वस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच भगवंताच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि या चराचरात तो कसा भरून राहिला आहे त्याचेही ज्ञान होईल. आपले कल्याण कशात आहे हे देखील समजेल आणि मग आपोआपच आपली वाटचाल व्यवहारातून अध्यात्माकडे आणि अध्यात्माकडून मोक्षाकड अशी सुरू होईल. समर्थांचे हे सांगणे आपल्या हिताचे आहे. म्हणूनच ते म्हणतात की याची कधीही अवज्ञा करू नकोस.

स्वसंवाद :

१) मी कधी या सृष्टीकडे खऱ्या अर्थाने थक्क होऊन, आश्चर्याने पाहिले आहे का? की सर्व काही गृहीत धरून जगतो आहे?

२) माझे मन खरोखरच “राघवी वस्ती” करते आहे का, की ते अजूनही बाह्य जगातच भटकत आहे?

३) समर्थांची ही विनंती मी मनापासून स्वीकारली आहे का, की अजूनही दुर्लक्षच करत आहे? (क्रमशः

– क्रमशः श्लोक ३७ आणि ३८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेवटी मराठी म्हणजे… – लेखिका: केतकी कुलकर्णी ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शेवटी मराठी म्हणजे… – लेखिका: केतकी कुलकर्णी ☆ अंजली दिलीप गोखले

मऊ भात, मेतकूट आणि साजूक तूप!

लिंबाचं लोणचं, पोह्याचा पापड, ताकातला डांगर, वरण-फळं, आणि मोदकांच्या उरलेल्या उकडीच्या केलेल्या — फक्त शेवटच्या पंगतीत मिळणाऱ्या त्या तिखट, चमचमीत निवागऱ्या!

डब्यात दिलेली पोळीची गुंडाळी, गुळतूप पोळी, लोणी-साखर पोळी, आणि नावडती भाजी असली की आज्जीनं कालवून दिलेलं केळ्याचं शिकरण!

बाहेरगावी फिरून, थकून-भागून घरी पोहोचल्यावर, रात्री जेवायला “काहीही नको” असं वाटत असताना आईच्या आग्रहास्तव खाल्लेला पहिल्या वाफेचा वरणभात… आणि पहिला घास घेताच डोळे मिटून दिसलेलं ते सुख!

शेवटी मराठी म्हणजे…

ठकठक, चंपक, चंदामामा आणि चिंटू-मिनीच्या गमतीजमती!

दिवाळी अंकासाठी वर्षभर पाहिलेली वाट आणि हाती येताच झालेला तो इवल्याशा हृदयात न मावणारा आनंद…

दुपारच्या वेळी ऐकलेल्या “छान छान गोष्टी”च्या कॅसेट्स आणि चेटकिणीची गोष्ट येताच घाबरून बंद करून टाकलेला तो टेप रेकॉर्डर!

शेवटी मराठी म्हणजे…

व. पु. काळे, शिरीष कणेकर आणि सुहास शिरवळकर!

एका बैठकीत वाचलेले स्वामी, श्रीमान योगी, राधेय आणि अशा कितीतरी कादंबऱ्या… एखाद्या लेखकाचे शब्द आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात ही अनुभवलेली किमया!

शेवटी मराठी म्हणजे…

अशी ही बनवा बनवीचं केलेलं पारायण आणि “ओम फट्ट स्वाहा” म्हणताच तोंडपाठ असलेला “ओम भगानी भगोदरी…” हा तात्या विंचूचा चित्रविचित्र मंत्र!

शेवटी मराठी म्हणजे…

नववी-दहावीत असताना ऐकलेले चितळे मास्तर आणि अंतू बर्वा.

कोणीतरी पोट दुखेपर्यंत हसवता हसवता चटकन रडवूही शकतो याचा झालेला तो साक्षात्कार.

त्या वल्लीला “पु. ल. दैवत” असं का म्हणतात याची पदोपदी झालेली ती जाणीव!

शेवटी मराठी म्हणजे…

आभाळमाया, वादळवाट आणि अवंतिका!

रात्री शाळेचं दप्तर भरत असताना आणि आई उद्याची भाजी निवडत असताना, बाबांनी हळूच रिमोट घेऊन लावलेल्या साडेनऊच्या “आजच्या ठळक बातम्या”!

टिपरे परिवारासोबत मोठं होताना, हल्लीच आलेला ‘दशावतार’ पाहून दिलीप प्रभावळकरांबद्दल वाटलेलं ते भलतंच अप्रूप, आश्चर्य आणि आदर!

शेवटी मराठी म्हणजे…

बालभारती!

बहिणाबाई, बोरकर, कुसुमाग्रज, ग्रेस, शांताबाई शेळके यांच्या अजूनही चालीसह लक्षात असलेल्या कविता.

बाईंनी तोंडपाठ करून घेतलेली “श्रावणमासी हर्ष मानसी” गर्दीत कुठूनतरी कानावर पडताच — आपलं कोणी तरी ओळखीचं आहे इथे, हा मिळालेला एक दिलासा!

शेवटी मराठी म्हणजे…

लोकसत्ताची रविवारची पुरवणी!

चतुरंग मधले प्रवीण दवणे आणि गौतम राजाध्यक्षांचे लेख, आणि दुपारच्या वेळी सोडवत बसलेले भलेमोठे शब्दकोडे!

शेवटी मराठी म्हणजे…

नाट्यदैवतांना वंदन करून तिसरी घंटा वाजताच उघडलेला तो पडदा… आणि त्यानंतर तीन तास शब्दांत न मांडता येणारा तो जादुई अनुभव!

“सुयोग प्रस्तुत, विजय केंकरे दिग्दर्शित, दोन अंकी नाटक” — हे शब्द कानावर पडताच आता आपल्याला कमाल काहीतरी बघायला मिळणार ही खात्री… आणि पोटात न मावणारा तो आनंद!

शेवटी मराठी म्हणजे…

लतादीदी, आशाताई, बाबूजी यांची अजरामर गाणी आणि मराठी शब्दांना लाभलेलं ते एक सुरेल असं वरदान!

मराठी रसिकांना एक साधा-सोपा कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम हाऊसफुल कसा होऊ शकतो हे दाखवून देणारे सलील आणि संदीप दादा!

शेवटी मराठी म्हणजे…

सकाळी उठताच सवयीने तोंडी येणारं “कराग्रे वसते लक्ष्मी…”

संध्याकाळी शुभंकरोती झाल्यावर आजोबांसोबत झोपाळ्यावर बसून ऐकलेली ती रामरक्षा आणि आज्जीनं लावलेला तो अंगारा!

शेवटी मराठी म्हणजे…

“माझी शाळा”, “माझा आवडता प्राणी”, “मला पंख असते तर!” यावर लिहिलेले ते मजेशीर निबंध!

“निबंध” शब्द ऐकताच कित्येक वर्षांत मराठी लिहिलंच नाही ही झालेली बोचरी जाणीव…

मराठी “टाईप” करता करता ती मुळाक्षरं स्वतःच्या अक्षरात कशी दिसतात याचा पडत चाललेला विसर… आणि वाटलेली थोडीशी ती लाज…

 

लेखिका: केतकी कुलकर्णी

प्रस्तुती: अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ८ – ढिंचणीया -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ८ – ढिंचणीया – ☆ विभावरी कुलकर्णी

काही दिवसापूर्वी एका जुन्या घरात जाण्याचा योग आला. त्या घरातील वयस्कर व्यक्तीने खूप जुन्या वस्तू एका पत्र्याच्या पेटीत ठेवल्या होत्या. त्यात एक लाकडी वस्तू सापडली. ती काय असेल? हे काहीच समजेना. मग त्या गावात जरा वयस्कर, जाणकार व्यक्तींकडे चौकशी करताना काही माहिती मिळाली. तर या वस्तूचे नाव होते, ढिंचणीया किंवा गुडघवणी या वरूनही काही संदर्भ लागेना. पण जरा सखोल चौकशी करता, या बहुउपयोगी वस्तूची काही माहिती मिळाली.

‘ढिंचणीया’ हे प्राचीन भारतीय संस्कृतीतील, विशेषतः मराठा आणि राजस्थानी दरबारी परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण साधन आहे. हे मुख्यत्वे गुडघा किंवा कोपर टेकण्यासाठी वापरले जात असे.

​शिष्टाचार म्हणून जुन्या काळी राजदरबारात किंवा मोठ्या व्यक्तींसमोर बसताना जमिनीवर गुडघे टेकून बसण्याची पद्धत होती. बराच वेळ या स्थितीत बसल्यामुळे गुडघ्यांना त्रास होऊ नये, म्हणून या ‘ढिंचणीया’चा आधार घेतला जात असे. हे केवळ एक साधन नसून ते वापरणाऱ्याच्या प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे. राजा-महाराजांचे ढिंचणीया हस्तिदंती, चांदीचे किंवा महागड्या लाकडावर नक्षीकाम केलेले असायचे.

याचे वेगवेगळे आकार असतात. त्या नुसार त्याचे उपयोग बदलतात.

​काहींचा वरचा भाग चंद्राकार असतो, ज्यावर गुडघा व्यवस्थित स्थिरावतो. खालचा भाग रुंद आणि जड असतो जेणेकरून ते हालू नये.

ढिंचणीयावर अतिशय सुंदर मणी काम आणि झालर लावलेली असे. अशा वस्तूंवर सहसा रेशमी कापड, मखमलीचे अस्तर किंवा बारीक धातूचे काम केलेले असते.

​हे महाराष्ट्रातील जुन्या घरांमध्ये वापरले जाणारे एक लहान आसन किंवा आधार आहे. याचा आकार डमरूसारखा किंवा पेला उलटा ठेवल्यासारखा असतो. पूर्वीच्या काळी जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवण करत किंवा इतर कामे करत, तेव्हा गुडघ्याला किंवा हाताला आधार देण्यासाठी याचा वापर केला जात असे.

​ ढिंचणीया विविध प्रकारात पाहायला मिळते.

​लाकडी व संखेडा प्रकार:

‘संखेडा’ शैलीतील ही गुजरातमधील एक प्रसिद्ध लाकडी कोरीवकाम आणि रंगकाम करण्याची कला आहे, ज्यामध्ये गडद लाल, मरून आणि सोनेरी रंगांचा वापर करून सुंदर नक्षीकाम केले जाते.

पितळी सजावट: लाकडी ढिंचणीयावर पितळी फुले लावून त्याला अधिक आकर्षक बनवलेले असते. हे विशेषतः श्रीमंत किंवा सरंजामी थाटाच्या घरांमध्ये पाहायला मिळत असे.

हे साधारणपणे ४ ते ६ इंच उंचीचे असतात, जेणेकरून बसलेल्या स्थितीत हाताचा कोपर किंवा गुडघा त्यावर टेकवता येईल. त्या मुळे गुडघ्या वरचा ताण कमी होतो. मांडी लॉक व्हायला मदत होते, ज्या मुळे दीर्घकाळ ताठ बसता येत असे. या मुळे रक्ताभिसरण सुरळीत रहाते. आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. काशाचे ढिंचण आरोग्यासाठी चांगले असते.

यावर नक्षीकाम, छिद्रे असतात. त्या मुळे हवा खेळती रहाते. आणि घाम येत नाही.

काही लाकडी ढिंचण बुद्धीळातील प्याद्याच्या आकाराचे असायचे. त्याने शरीराच्या काही भागावर मसाज करण्यासाठी वापर केला जायचा. काहीवर जप करताना कोपर टेकवला जात असे. त्यामुळे हाताला रग लागत नसे.

हे केवळ उपयोगाची वस्तू नसून घराच्या सौंदर्यात भर घालणारे एक शोभेचे साधनही मानले जात असे.

​आजच्या काळात या वस्तू केवळ संग्रहालयात किंवा जुन्या घराण्यांच्या वारशात पाहायला मिळतात. पण कोणाच्या घरात असेल तर त्याची काळजी घेऊन शोभेच्या वस्तूंची नक्कीच शोभा वाढवेल.

सफाई आणि निगा राखण्यासाठी काही गोष्टी कराव्यात.

​धुळीपासून संरक्षण करण्यासाठी यावर बारीक मणी आणि धागे असल्याने ओल्या कापडाचा वापर टाळावा. मऊ ब्रशने (उदा. पेंट ब्रश) हळुवारपणे धूळ झटकून घ्यावी.

​पाण्याचा वापर टाळावा. जर यामध्ये लाकूड किंवा पुठ्ठा असेल, तर पाणी लागल्याने ते फुगू शकते किंवा मणी सुटू शकतात.

​धातूची चकाकी टिकवण्यासाठी जर त्यावर चांदीचे किंवा पितळेचे मणी असतील, तर त्यांना हलक्या हाताने कोरड्या सुती कापडाने पुसावे. कोणत्याही प्रकारचे तीव्र केमिकल वापरू नका.

या वस्तूचा वापर केवळ प्रदर्शनासाठी म्हणून करावा. हवेतील ओलाव्यापासून वाचवण्यासाठी काचेच्या कपाटात (Showcase) ठेवणे सर्वोत्तम ठरेल.

अशाच काही पूर्वी उपयुक्त पण आता काळाच्या ओघात हरवलेल्या व दुर्मिळ वस्तूंची माहिती घेऊ या.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्याचा त्याचा नरसिंह आणि… ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ ज्याचा त्याचा नरसिंह आणि☆ तृप्ती कुलकर्णी

ज्याचा त्याचा नरसिंह आणि – – – 

– – – ज्याचा त्याचा हिरण्यकश्यपू !

नरसिंह म्हटलं की सगळ्यात प्रथम डोळ्यापुढे येते ती अत्यंत नम्रपणे हात जोडून लीन आणि कृतज्ञ भावनेने उभी असलेली भक्त प्रल्हादाची मूर्ती. आणि त्यानंतर मग आठवायला लागते ती भक्त प्रल्हाद, हिरणकश्यपू, आणि नरसिंह यांची सुप्रसिद्ध गोष्ट. लहानपणापासून अनेकदा गोष्टी रुपात वाचलेली, कधी प्रवचनात ऐकलेली ही गोष्ट मनावर इतकी बिंबली गेली आहे की नुसतं नरसिंह म्हणलं तरी संपूर्ण गोष्ट पटकन आठवते. लहानपणापासूनच आजही या गोष्टीचा माझ्या मनावर असलेला प्रभाव किंवा पगडा हा तसाच आहे. फक्त याच्यामध्ये केवळ शब्दशः भाव न पाहता, त्याच्या चमत्काराकडे न पाहता त्या घटनेची व्यक्तिगत जीवनाशी कशी सांगड घालता येईल असा विचार मनात सुरू झाला. एखाद्या परंपरागत गोष्टीचे किंवा कथेचे, प्रसंगाचे, नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांमधले संदर्भ हे जसेच्या तसे राहतातच असे नाही. तर ते त्या त्या काळाप्रमाणे प्रवाही होत राहतात किंबहुना रहायला हवेत तरच ती श्रद्धा किंवा तो भाव हा टिकून राहू शकतो.

आतापर्यंत वेगवेगळ्या उदाहरणांमधून परमेश्वराचं अस्तित्व हे चराचरात व्यापलेलं आहे, अणूरेणूत आहे असे आपण अनेकदा ऐकलेलं आहे. त्यामुळे खांबामधून नरसिंह प्रगट होणं ही गोष्ट आपल्याला चमत्कारी वाटली तरी त्याचा सद्यस्थितीत काय महत्त्व असेल. हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली यामध्ये खांबच का? असा प्रश्न मनात निर्माण झाला. केवळ भक्त प्रल्हादाने ‘होय इथेही आहे’ असे सांगितले म्हणून की या खांबाचं काही वेगळं महत्त्व असावं. हा विचार करताना जाणवलं की खांब ही गोष्ट म्हणजे कुठल्याही इमारतीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. खांबाच्या जोरावर संपूर्ण इमारत व्यवस्थितरित्या तोलली जाते. तिला एक सौंदर्य प्राप्त होतं. खांब जितके अधिक तितकी ती वास्तू बळकट मानली जाते. त्यामुळे हा खांब हा फक्त एक वास्तू मधला घटक नसून तो त्याला सौंदर्य देणारा, आधार देणारा असा त्याचा कणाच मानला गेला पाहिजे. आता इथे हा खांब जर प्रतिकात्मकरित्या मानायचं झाला तर तो श्रद्धेचा खांब म्हणता येईल.

मानवी जीवनामध्ये श्रद्धेशिवाय कोणत्याच गोष्टी साध्य होत नाही. इथे श्रद्धा हा शब्द फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक अर्थाने न घेता तो एक वेगळा आणि व्यापक स्वरूपात घ्यायला हवा. तो म्हणजे श्रद्धा ही प्रत्येक कृतीमध्ये असते. अमुक एक प्रकारची घटना घडेल असं मानून वर्षानुवर्षे प्रयोग करत राहणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मनातसुद्धा आपल्या प्रयोगाबद्दल सश्रद्ध भावच असतो. अन्यथा यातून यश मिळेल किंवा नाही याची खात्री नसताना वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीवर चित्त केंद्रित करून प्रयोग करण्यात कुणालाही काय स्वारस्य वाटलं असतं. श्रद्धाच असते की जी परिणाम काय होईल याचा विचार न करता तुम्हाला आतून सतत कार्यरत ठेवते. त्यामुळे तिला कुठल्याही एका दृष्टीतून बघणं म्हणजे तिच्यावर आणि पर्यायाने स्वतःवरही अन्याय केल्यासारखं आहे.

तर हा श्रद्धा रुपी खांब भक्त प्रल्हादाचा डळमळीत करणं हा हिरण्यकश्यपूचा मुख्य उद्देश होता. म्हणून त्याने त्या श्रद्धेच्या खांबालाच लाथ मारून तो पाडण्याचा, नाहीसं करण्याचा प्रयत्न केला. पण इथे प्रल्हाद इतका अढळ, अचल होता की त्याच्या श्रद्धेनेच परमेश्वराला किंवा त्या ईश्वरी शक्तीला आवाहन केलं आणि ती साक्षात प्रगट झाली. म्हणजे इथे महत्त्वाची गोष्ट काय तर श्रद्धा ही इतकी दृढ हवी, ठाम हवी की एखाद्या गोष्टीच्या प्रत्यक्षात असण्यानसण्याने ती नाहीशी व्हायला नको. आणि जेव्हा अशी श्रद्धा अढळ असते तेव्हा आपल्याला त्यातून अपेक्षित ते ध्येय गाठता येतं, साध्य साधलं जातं. माझ्यासाठी गोष्टीतलं हे सार फार महत्त्वाचं आहे.

गोष्टीमध्ये भक्त प्रल्हाद असो वा हिरण्यकश्यपू या दोन्हीही फक्त व्यक्तिरेखा असल्या तरी केवळ त्यादृष्टीने न पाहता त्या स्वतंत्र वृत्ती म्हणून पहिल्या तर जाणवतं की यांचा झगडा अनंत काळापासून चालू आहे. आणि या दोन्ही वृत्तींचा अंश प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना आहे. त्यामुळे आपल्या एखाद्या सत्कार्यात काही अडचणी निर्माण झाल्या आणि आपण त्या अडचणींचाच विचार करून निराशेच्या गर्तेत चुकीच्या दिशेने जाऊ लागलो, तर समजावं आपल्या मधला हिरण्यकश्यपू जागा झाला आहे. आणि त्याला नाहीसा करण्यासाठी चांगल्या सकारात्मक विचारांशी, श्रद्धेची, कृतज्ञतेची भावना मनात निर्माण करणे गरजेचे आहे. जी भावना प्रल्हादाच्या मनात होती आणि त्यामुळेच तो आपल्या संकटावर मात करू शकला. माझ्यासाठी चमत्कार याचा अर्थ मोठ्या प्रमाणावरती घडून येणार परिवर्तन. जे दीर्घकाळ टिकतं. प्रल्हादाच्या जीवनावरच्या संकटाच्या समयी त्याच्या या दृढ भावनेने प्रत्यक्षात तो घडला आणि त्याचा जीव वाचला. पण असा हा चमत्कार एकाएकी घडलेला नसून तो त्याच्या अढळ, अविचल आणि निरंतर असणाऱ्या श्रद्धेमुळे घडला आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे नरसिंहांनी येऊन संकटाचा नाश करावा असं जर मनापासून वाटत असेल तर भक्त प्रल्हाद होण्याला पर्याय नाही. ते होता यावं हीच इच्छा!

© तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३५ 

असे हो जया अंतरी भाव जैसा|

वसे हो तयार अंतरी देव तैसा |

अनन्यास रक्षीतसे चापपाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३५|

अर्थ :  आपल्या मनात परमेश्वराबद्दलचा जसा भाव असेल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या अंतरामध्ये वसतो म्हणजे त्याचे अस्तित्व जाणवते. अनन्यभावाने परमेश्वराला जो शरण जातो त्याचे रक्षण हा धनुर्धारी राम नक्कीच करतो. आपल्या भक्तांची तो कधीही उपेक्षा करत नाही.

(अनन्य – एकनिष्ठ, चापपाणी – हाती धनुष्य धारण केलेला /भगवंत.)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ देव आपल्या भक्तांचे रक्षण करतो असे आपल्याला सांगतात. या श्लोकात ते आपल्याला परमेश्वर कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते सांगतात. परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो. परंतु त्याच्याबद्दलची आपली जाणीव किती तीव्र आहे यावर आपल्याला त्याची होणारी अनुभूती ठरते. भगवंताविषयीची भावना जर आपल्या अंतःकरणात तीव्र असेल तर तो प्रकट होण्यास वेळ लागत नाही.

या श्लोकात ‘भाव ‘ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसा भाव तसा देव किंवा देव भावाचा भुकेला असे आपण म्हणतो. कोणी भक्त स्वतःला परमेश्वराचा दास म्हणून घेतात समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणून घेत असत. ही दास्यभक्ती. काही भक्त परमेश्वराला आपला पती समजून त्याची पत्नी भावाने आराधना करतात अशा प्रकारच्या भक्तीला मधुरा भक्ती असे म्हटले जाते. काही भक्त परमेश्वराला आपली आई मानून त्याची भक्ती करतात. ही वात्सल्य भक्ती. तर काही परमेश्वराला आपला मित्र किंवा सखा मानून त्याची भक्ती करतात. ही झाली सख्ख्य भक्ती. असे भक्तीचे म्हणजेच भावाचे विविध प्रकार आहेत. आपली भक्ती ज्या प्रकारची असेल तशा स्वरूपात परमेश्वर आपल्याला दर्शन देतो. त्या अनादी अनंत आणि निर्गुण निराकाराला कोणत्याही रूपात प्रकट होण्यासाठी अडचण नाही.

शेगावीचे महान संत श्री गजानन महाराज यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिले होते. कोणाला त्यांनी समर्थ रामदासांच्या रूपात दर्शन दिले तर कोणाला विठ्ठलाच्या रूपात. परमेश्वराने सुद्धा आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे विविध रूपात दर्शन दिले आहे. अर्जुनाला तर त्याने विश्वरूप दर्शन सुद्धा घडवले. अडचण परमेश्वराकडून नाही. अडचण आपल्याकडून असते. आपल्या मनामध्ये तेवढा समर्पण भाव नसतो.

परमेश्वर कोणाचे रक्षण करतो या प्रश्नाचे उत्तर समर्थ श्लोकातील तिसऱ्या ओळीत देतात. ते म्हणतात, ” अनन्यास रक्षीतसे चापपाणी. ” अनन्य म्हणजे कोण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एका परमेश्वराशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही, आश्रय नाही अशा प्रकारची भावना ज्याच्या मनामध्ये असते तो अनन्य भक्त ! अशा भक्तांचे तो धनुर्धारी राम रक्षण करतो.

आपली भक्ती ही सकाम भक्ती असते. आपण देवाची भक्ती केली म्हणजे देवाने आपले रक्षण करावे, आपल्याला सुख, समाधान, यश आणि ऐश्वर्य प्रदान करावे अशी आपली इच्छा असते. अर्थात त्यात फार काही चुकीचे आहे अशातला भाग नाही. परमेश्वर आपल्या संकटात जर धावून आला नाही तर आपली त्याच्यावरील श्रद्धा डळमळीत होते. मी एवढे देवाचे करतो परंतु काही उपयोग होत नाही असे आपण म्हणतो. परंतु याला परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती म्हणता येणार नाही. मला इतर गोष्टी नाही मिळाल्यात तरी चालतील. मला फक्त परमेश्वर हवा आहे, त्याचे दर्शन हवे आहे अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये तीव्रतेने निर्माण होईल तेव्हाच परमेश्वराचे दर्शन आपल्याला घडू शकेल. श्रीकृष्णाचा भक्त सुदामा आणि त्याची पत्नी श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. त्यांच्यावर प्रपंचामध्ये अनेक संकटे आली, प्रचंड दारिद्र्य पाचवीला पुजले होते. मुलांना प्रसंगी उपाशी झोपावे लागत होते. परंतु परमेश्वरावरील त्यांची श्रद्धा कधीच डळमळीत झाली नाही. आपल्याला जे काही अन्न प्राप्त झाले असेल त्याच्यातीलच काही भाग बाजूला काढून ते परमेश्वराला अर्पण करत असत. आणि मगच स्वतः भोजन करीत. ही झाली अनन्यभक्ती. परमेश्वराने भलेही त्यांची परीक्षा पाहिली असेल परंतु अशा अनन्यभक्तांचे परमेश्वराने रक्षण केले आहे.

स्वसंवाद (नवीन) : 

१) माझी भक्ती कोणत्या प्रकारची आहे – दास्य, सख्य, वात्सल्य की मधुरा ? माझा नैसर्गिक भाव कोणता हे मी ओळखले आहे का ?

२) “जसा भाव तसा देव. ” माझ्या मनात परमेश्वराविषयी खरोखर कोणता भाव आहे ? दृढ श्रद्धा की केवळ भीती ?

३) सुदाम्याने दारिद्र्यातही आधी परमेश्वराचा वाटा काढला. तसा माझ्या जीवनात मी परमेश्वराला आधी प्राधान्य देतो का ?

४) “अनन्य” म्हणजे एकच आधार. माझ्या संकटात परमेश्वर हाच माझा खरा आधार आहे असे मला मनापासून वाटते का ? (क्रमशः)

– – – – – 

श्लोक क्र. ३६

सदा सर्वदा देव सन्निध आहे |

कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे|

सुखानंद आनंद कैवल्यदानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३६|

अर्थ : परमेश्वर कायम आपल्याजवळच आहे. फक्त तो आपली परीक्षा आणि धैर्य पाहतो. सुख, आनंद आणि कैवल्य यांचा तो दाता आहे. असा हा परमेश्वर आपल्या भक्तांचा अभिमानी असून त्यांच्याकडे तो कधीही दुर्लक्ष करत नाही.

(सन्निध – समीप/जवळ, अल्प धारिष्ट – परीक्षा/कसोटी, कैवल्य – मोक्ष.)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ परमेश्वर आपल्या कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते आपल्याला सांगतात. तर या श्लोकात हा परमेश्वर कोठे आहे, त्याचा वास कोठे आहे हे ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे म्हणजे जवळच आहे. व्यवहारामध्ये आपण सन्निध या शब्दाचा अर्थ जवळ किंवा समी र असा घेतो परंतु अध्यात्मामध्ये सन्निध म्हणजे अंतर्यामी. त्या परमेश्वराला शोधायला दूर कुठेही जावे लागत नाही. त्याचा वास आपल्या अंतर्यामीच असतो. आणि तिथे तो सदा सर्वदा म्हणजे कायमस्वरूपी असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वर आणि आपण वेगळे नाहीच आहोत.

असे जर आहे तर मग आपल्याला त्याचे अस्तित्व का जाणवत नाही ? आपली देहबुद्धी एवढी प्रबळ असते की त्यामुळे हा देह म्हणजे मी नाही आणि आपल्या अंतरात्म्यात त्याचा वास आहे हे आपल्याला जाणवतच नाही. सकाळी उठल्यानंतर आपण ” कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्” हा श्लोक म्हणतो त्याचा अर्थ हाच आहे. आपल्या अंतर्यामी परमेश्वर वसतो आहे.

आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही परंतु साधकांना मात्र पदोपदी त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. आपण आपले मूळ स्वरूप विसरल्यामुळे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. परंतु तुकाराम महाराजांसारखे संत ईश्वर चिंतनातच रममाण झालेले असल्यामुळे त्यांना स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसते. परमेश्वर कायम आपल्याबरोबरच आहे याची जाणीव त्यांना होत असते. म्हणूनच ते म्हणतात, ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती |चालविशी हाती धरुनिया ||

परंतु परमेश्वराची अशी कृपा होण्याआधी तो आपली परीक्षा पाहतो. ही परीक्षा पाहण्यामागे आपल्या भक्ताला मानसिक दृष्ट्या खंबीर करावे, आपल्या कृपेसाठी पात्र करावे अशीच सध्या भगवंताची इच्छा असते. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते. पण कधी कधी त्याचे धरलेले बोट सोडून देते. एखादेवेळी तो पडेल हे तिला माहिती असते. परंतु त्याला स्वतःला चालता यावे, तो स्वावलंबी व्हावा म्हणून ती हे करत असते. अनेक संतांनी सुद्धा आपल्या अनुयायांना अनुग्रह देण्यापूर्वी त्यांची परीक्षा पाहिली आहे. आपल्या कृपेसाठी आपला शिष्य पात्र आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच गुरु त्याच्यावर कृपा करतात. प्रत्यक्ष जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी आपल्याला नाना प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पण ज्याला पुढे जायचे आहे तो अशा प्रकारच्या परीक्षांना, संकटांना न डगमगता सामोरा जातो.

तसेच भगवंताच्या एकनिष्ठ भक्ताचे आहे. “देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो” अशी त्याची वृत्ती असते. खरा भक्त संकटप्रसंगी डगमगत नाही. परमेश्वरावरील त्याची श्रद्धा अविचल असते. परमेश्वराचा भक्त असलेल्या छोट्या प्रल्हादावर अनंत संकटे येतात. परंतु तरीदखील परमेश्वरावरील त्याची श्रद्धा ढळत नाही. मागील श्लोकात समर्थ आपल्याला जी अनन्यभक्ती सांगतात ती हीच !

अशी आपली त्याच्यावर संपूर्ण निष्ठा असली आणि त्याने घेतलेल्या परीक्षेत एकदा का आपण उत्तीर्ण झालो की मग त्याच्या कृपेचे जणू भांडारच खुले होते ! अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने अशी भक्ताची अवस्था होते. सुख, समाधान, आनंद आणि कैवल्य म्हणजे मोक्षमार्गाचा दाता असलेला परमेश्वर आपल्याला या सर्व गोष्टी सहजच प्रदान करतो.

स्वसंवाद : 

१) “परमेश्वर अंतर्यामी आहे” हे मी जाणतो पण माझ्या दैनंदिन जीवनात मला त्याची प्रत्यक्ष जाणीव होते का ?

२) आईने बोट सोडले तरी ती दूर नसते. माझ्या संकटकाळात परमेश्वराबद्दल अशी भावना माझी असते का ?

३) परमेश्वर परीक्षा पाहतो हे मान्य आहे. माझ्या आयुष्यातील समस्यांकडे मी त्या दृष्टीने पाहतो का ?

४) “अनंत हस्ते” देणारा भगवंत आहे. मग मी त्याच्याकडे क्षुल्लक गोष्टींचीच मागणी करत राहतो का ? 

– क्रमशः श्लोक ३५ आणि ३६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५. ☆ प्रा.भारती जोगी ☆

(चित्र पुढील माहितीनुसार काल्पनिक.)

निसर्गाने रौद्र रूप धारण केलेले… भयंकर पाऊस सुरू… कालिंदी नदीला महापूर आलेला… आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीत अर्ध्या रात्री एक तरूण पती माहेरी गेलेल्या पत्नीच्या आठवणीत विरहदग्ध, मिलनातूर, विकल मनाने वेड्यासारखा थेट पोचतो पत्नीच्या माहेरी, तिच्या पुढ्यात… सामोरा!! नदी पार करतांना काष्ट समजून एका मानवी शवाचा आधार घेत, भिंतीवर चढण्यासाठी दोर समजून सापाला धरून… बेभान अवस्थेत!! 

पत्नी चकीत होते… पण दुसऱ्याच क्षणी सत्य कळल्यावर, तिला आपल्या रूप आणि यौवनाचा धिक्कार करावासा वाटला. आणि तिच्या तोंडून उद्विग्न उद्गार बाहेर पडले…

लाज न लागत आपको, दौरे आहे साथ, 

धिक धिक ऐसे प्रेम को, कहा कहौ मैं नाथ !! 

आणि असा धिक्कार करत तिनं पुढे त्याला ही उन्मादावस्थेतून जागं केलं…

अस्थि चर्ममय देह, यांमे ऐसी प्रीती

जो होती रघुनाथ मंह, होती न तो भवभीती!! 

आपल्या पतीला हे असे खडे बोल सुनावणारी ही सुंदर रूप यौवना, युवती होती… रत्नावली!!! 

आणि तो युवक, तिचा पती होता… तुलसीदास उर्फ रामबोला!!! 

रत्नावली… सौंदर्य आणि बुद्धी दोन्हीं लेऊन आलेली एक धर्मपरायण युवती ! जी लावण्यम् अंतर्मन: ही होती. म्हणूनच तिने दाखवून दिले की, भारत देशातील नारी; तिने ठरवलं तर आपल्या पतीला युवावस्थेच्या उन्माद क्षणांमधून ईश्वर भक्तीकडे उन्मुख करण्यास सक्षम असते.

रत्नावली चे हे शब्द तुलसीदास ने ऐकले आणि त्याच्या मनावरील उन्माद, मोह, भ्रांती या सगळ्याचा पडदा दूर झाला. पूर्वजन्मीचे संस्कार प्रदिप्त झाले. आणि आता डोळ्यांसमोर श्रीरामाचे मंगलकारी शुभ रूप, संपूर्ण सौंदर्यासहीत दृग्गोचर झाले. आणि तो निघाला विरक्ती च्या वाटेवर, संन्यस्त वृत्ती ने, प्रभु रामचंद्र च्या कृपादृष्टी च्या लाभासाठी! 

रत्नावली जिने दाखवून दिलं की, प्रेम जेव्हा ईश्वरा प्रती नेणारे असते तेव्हा ते एक गहन परिवर्तन, एक उच्चतम आव्हान स्वीकारायला तयार असते. आणि म्हणूनच समर्पित जीवन स्वीकारायला ही तयार असते.

रत्नावली ने एक चैतन्य तुलसीदास च्या मनात चेतविले. त्याच्या चेतनेला जागवलं… आणि तुलसीदास ला ही… या… समिधेच्या शब्दस्पर्शातलं स्फुल्लिंग जाणवलं! त्याला कळलं… हाच तो क्षण! हीच ती वेळ!!! काम कडून राम कडे जाणाऱ्या भक्ती मार्गावरील जीवनयात्रा सुरू करण्याची!! तुलसीदास पुन्हा वळून न पाहण्यासाठी, निघून गेला त्या वाटेला! एक गृहस्थ, संन्यासी झाला.

त्याच्या हातून रामचरितमानस या महान ग्रंथाचं, आणि अशाच अनेक ग्रंथांचे सृजन झालं. घरा-घरात राम भजन निनादलं! तुलसीदास संत तुलसीदास पदाला पोहोचला.

पण… या सगळ्यात सगळ्यांनाच विसर पडला त्या पहिलं चैतन्य स्फुल्लिंग चेतवणा-या समिधेचा! रत्नावली ख-या अर्थाने गुरू ठरली तुलसीदास ला योग्य मार्गदर्शन करणारी, त्याला राम भेटवणारा योग्य मार्ग दाखवणारी! किती महान स्त्री म्हणावी ती… जिच्या हृदयात अगाध भक्ती भाव तर होताच, पण पतीवर ही प्रगाढ प्रेम होतं! म्हणूनच तर तिच्या दिव्य दृष्टीला आपल्या पतीचं दिव्यत्व जाणवलं ना! 

हे विसरून कसं चालेल की…

रत्ना नसती तर तुलसीदास सारखं रत्न झालंच नसतं, आणि तुलसीदासला ही राम रतन धन प्राप्त झालंच नसतं! 

रत्नावली ने दाखवून दिलं की, खरं प्रेम तेच, जे ईश्वरा जवळ घेऊन जाते. 

रत्नावली चं एकाकी जीवन स्विकारण्याचं पेललेलं आव्हान उपेक्षून नाहीच ना चालणार!! 

शेवटी तीसुद्धा एक स्त्री च होती. तिला ही वाटलंच असेल ना, की पतीने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधून जीवन आपल्याबरोबर व्यतीत करावे!! तो असा कायमचा त्यागून निघून जाईल, हा तिच्या साठी धक्काच होता. एक आव्हान तिने पेरलं पतीच्या मनात, तर एक आव्हान तिच्या ही वाट्याला आलंच पेलण्यासाठी! एकाकी जीवन, आजीवन जगण्याचं! 

मग रत्नावली ने आपलं एकटेपणाचं दु:ख, ती बोचणारी सल, ती विरह व्याकुळ, झुरणा-या मनाची विकल अवस्था तिने… अनेक, असंख्य दोह्यांत, झरझर वाहणा-या अश्रूंच्या साक्षीने प्रतिबिंबित केली. वियोगाचं दु:ख स्पष्ट दिसतं त्यांत!! इतकंच नाही तर, रत्नावली च्या ज्ञानाचं, विद्वत्तेचे ही प्रतिबिंब दिसतं त्यात! तिचे दोहे, त्यांची भाषा आणि त्यांतील भाव हे दोन्ही उच्च कोटीचे आहेत. काही ठिकाणी तर तुलसीदास पेक्षाही उत्कृष्ट आहे, सरस आहे ती! पण तिची ही काव्यप्रतिभा उपेक्षितच राहिली. मुळात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीरपणे, ठामपणे उभी राहणा-या स्त्री चा त्याग, समर्पण, एकाकीपण, तिचं मोठेपण… नेहमीच अलक्षित, उपेक्षित, दुर्लक्षित राहतं! 

तीच उपेक्षा रत्नावली च्या ही वाट्याला आली.

पण हे विसरून चालणार नाही की…

रत्नावली ने पतीला धिक्कारले नसते तर रामबोलागोस्वामी तुलसीदास कसा बरं झाला असता?? 

 पतीच्या मनात रामभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारी, चैतन्य जागवणारी, तेजोमयी समिधा च ना ही रत्नावली!! 

रत्ना अगर ना होती तो तुलसी जैसा रतन नहीं होता!

– लेख क्र. ५.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

 सहजच मनातल शब्दात – जेष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे

ज्येष्ठत्व म्हणजे वय वर्ष ६० च्या नंतरचा काळ. आजकाल लाईफस्पॅन वाढले आहे. त्यामुळे हा काळ पण चांगला लांबलचक असू शकतो. फक्त थोडा वेगळा, म्हणजे आतापर्यंत व्यतीत केलेल्या काळा पेक्षा वेगळा.

श्रेष्ठत्व म्हणजे आपले काम /नोकरी, पद, हुद्दा यात वरच्या पायरीवर असणे.

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे ही वाटचाल येथे याचा अर्थ, माझ्या मते त्यांच्या विचारांचा दर्जा, त्यांची वागणूक, त्यांचे एकंदर सोशल लाईफ, घरच्यांशी संबंध, तडजोड, समाजात त्यांचे वावरणे, समाजाप्रती त्यांची जबाबदारी मुख्यतः रिटायर्ड लाईफस्टाईल. कसे जगतात? या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.

या सर्व गोष्टी ज्येष्ठांच्या श्रेष्ठत्वाचे मोजमाप करणारे पॅरामीटर्स आहेत.

वयाच्या साधारण पंचविसाव्या वर्षांपासून नोकरी करणारा माणूस किंवा स्त्री जेंव्हा वयाच्या अठ्ठावन किंवा साठाव्या वर्षी रिटायर्ड होते, तेंव्हा एक वेगळेच जग त्यांच्या समोर असत.

आता पर्यंत नोकरी, पगार, मानसन्मान, बिझी लाईफ, एक ठराविक दिनचर्या अचानक एक दिवस सर्व बंद होणार, ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत खरी असली तरी पचायला जड असते. दिवसभर बाहेर राहण्याची सवय असल्याने, पूर्ण वेळ घरी राहणे जमत नाही. अचानक मिळालेला रिकामा वेळ कसा काढायचा? हा प्रश्न सोडविणे सोपं काम नाही. Post retirement manage करायला शिकावेच लागेल. दुसरा पर्यायही नाही.

या post retired management वरच तुमचे श्रेष्ठत्व अवलंबून असते.

एव्हाना घरातील चित्र ही बदलेले असते. घरात सून आलेली असते, मुल आपापल्या कामात बिझी असतात. खरं तर History Repeat होतं असते. दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या ला आपलेच घर नव्याने दिसते. घरातील सकाळ ते संध्याकाळ पर्यंत घडणाऱ्या घटनांना तो प्रथमच दररोज बघत असतो. घरातील अगदी सामान्य घडणाऱ्या गोष्टी बघून घरातील प्रमुख व्यक्तीला म्हणजे मला आता दुय्यम स्थान मिळतय की काय? अशी शंका मनात येऊ शकते.

बाबा! तुम्हाला घरातच रहाचंय ना, मग घाई करू नका. थांबा जरा.

अहो! तुम्ही नंतर जा ना आंघोळीला.

जरा थोड्या वेळ थांबा. मुलांचे डबे झाले की देते चहा तुम्हाला.

अशी अगदी साधी वाक्यं जरी कानावर पडली तर ती मनाला लागतात.

आता नोकरी नाही ना मला, तर मला कोणी विचारत नाहीये, आता माझी या घरात किंमत राहिली नाही. आधी असं कधी कोणी काही म्हंटल नाही. हा एक निगेटिव्ह विचार तुमची मानसिक शांतता घालवू शकतो. विचारांची दिशा बदलू शकतो

असे विचार म्हणजे तुमची श्रेष्ठत्वाकडे वाटचाल नाही तर खडूस म्हातारा कॅटेगरीत आपली मेंबरशीप नोंदविण्याची तयारी तुम्ही स्वतः च करत आहात एवढं नक्की. आणि त्याबरोबरच पूढच्या संभावित कठीण दिवसांच्या दस्तावेजां वर तुम्ही स्वतः च सही करत आहात. हे लक्षात असू द्यावे.

जेष्ठत्वाबरोबर श्रेष्ठत्व सांभाळणे तेवढं सोपं काम नाही.

एका स्त्रीला हा काळ तेवढा कठीण नसतो कारण नोकरी करत असतानाही ती होम फ्रंट वर काम करत होतीच. फक्त सूनेबरोबर जमायला हवं. माझ्या पेक्षा लहान छान, हुषार, शिकलेली मुलगी माझी स्पर्धक नाही तर माझ्या बरोबर या घराची जबाबदारी घेणारी आहे. माझ्या मुलाची यापुढे मला काळजी करायची गरज नाही. आम्ही दोघी म्हणजे नवीन आणि जून्या चे combination आहे. मी पारंपरिक तर ती नवीन आधुनिक. मस्त मजा करू आम्ही. दोघी मिळून छान घर सांभाळू.

हा एक विचार सहजच तुमचा दर्जा वाढवेल.

बरे असो,

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ व्यवहाराचा होता, जेष्ठत्वाचा काळ भावनांचा, नात्यांचा असतो. डोळ्यापुढे काहीही goal नसताना दिवस घालविण्यासाठी पुन्हा एकदा काही तरी नवीन करण्याचा, वेळेचे, कामाचे नियोजन करण्याची आवश्यकता असते..

I am retired from work not from Fun.

हे लक्षात ठेवून Rethink, Rebuild, Redesign करून पूढची जीवनशैली Reset करायची वेळ असते.

तुम्ही आपल्या नोकरीत किती ही हुषार, उच्च पदावर असला तरी ही post retirement management ची परीक्षा वेगळीच आहे, याचा सिलेबसही वेगळाच. यात Ego, Maths या विषयात नापास झाले तरच distinction मिळते. येथे व्यवहार नाही दृष्टीकोन महत्वाचा असतो.

आता घरचा प्रमुख असला तरी नवीन पीढी ला बरोबर समजून त्यांच्या बरोबर चालायची जबाबदारी असते. आता कधी सारथी, कधी senior advisor ची भूमिका करायची असते.

मी म्हणेन तेच, तसंच, मी बोलणार तुम्ही ऐका, I know everything असा हेकेखोर पणा जेवढा कंट्रोल मध्ये ठेवता येईल तेवढंच जीवन सुखकर होत. घरातील आणि घराच्या बाहेरही.

 तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी हा approach असावा.

लग्नानंतर नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर तुम्ही दोघे किती तरी वर्ष आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यातच बिझी होता. आपल्या अर्धांगिनी बरोबर quality time spend करण्याचे दिवस पुन्हा एकदा अनुभवायचे आहेत. सहजीवन पार्ट II पण मजेतच जगायचा आहे ना.

ते जाऊ दे

तुम्ही स्वतः तरी या आधी मनसोक्त स्ट्रेस फ्री आयुष्य जगला आहात का? वर्षानुवर्षे घड्याळाच्या काट्या कडे बघत दिवस काढले. किती तरी चांगले कार्यक्रम ऑफिस मध्ये महत्वाचे काम आहे म्हणून अटेंड केले नाही.. आजारी असतानाही महत्वाची मिटिंग आहे म्हणून ऑफिसात गेला आहात.

रिटायर्ड झाल्यावर घरचे वातावरण तर ऑफिस पेक्षा नक्कीच चांगले स्ट्रेसफ्री असणार आहे. येथे तुमचे स्पर्धक नाही तर तुमची आपली माणसं आहेत. येथे तुमचे पाय ओढणारे कोणी नसेल.

आज जेंव्हा ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जायची तयारी करायची आहे, तेंव्हा या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मग काय ते ठरवा. बिनधास्त जगण्याचा हा काळ आहे.

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जाताना खूप काही मोठे मेहनतीचे काम करायची गरज नाही. भारी वजन वगैरे उचलावे लागत नाही. शारीरिक कसरत नाही, पण मानसिक कसरत करायची गरज मात्र असते.. फक्त थोडासा वेगळा विचार करायची गरज आहे. सवयीत थोडे बदल करायची गरज आहे.

विचारांचे मॅनेजमेंट जमले तर, retired आयुष्याचे मॅनेजमेंट जमलेच म्हणून समजा.

थोडक्यात काय ज्येष्ठत्वात पाऊल टाकले की एक वेगळीच नियमावली तयार करायची असते. आता खडूस म्हातारा की graceful आजोबा कोणत्या संघात प्रवेश घ्यायचा हे स्वतः च ठरवायचे असते.

या नियमावली वरच तुमचं श्रेष्ठत्व अवलंबून असते. अशी नियमावली आयुष्यात बऱ्याच टप्प्यावर करावीच लागते. नोकरी लागल्यावर, घरी बाळाचा जन्म झाल्यावर.

मी असाच आहे. असं म्हणून चालणार नाही.

Growing old is mandatory but getting old is optional.

अगदी म्हाताऱ्या माणसारखं वागायची काहीच गरज नाही. म्हातारपण graceful पण नक्कीच असू शकत. आपले छंद जोपासण्याची हीच तर ती वेळ आहे.

स्वतः वर थोडे नियंत्रण ही ठेवावे लागते. आजपर्यंत घरची कामं केली नाही, पण आता वेळ आहे तर केली तर काय हरकत आहे.? तुमच्या मुळे कोणाला हातभार लागत असेल, मदत होत असेल तर काय हरकत आहे.?

भाजी चिरणे, कपडे मशीन मध्ये लावणे, सर्वांसाठी चहा करणे, नातवांना गोष्टी सांगणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना खेळायला बाहेर घेऊन जाणे.

म्हणतात ना

धुन बदलके तो देखो,

या सर्व कामांचा आनंद वेगळाच आहे.

मोठेपणा गाजवायचा नसतो तो वागण्यात दाखवायचा असतो.

तुमचा मुलगा सून तुमचे प्रतिस्पर्धी नाही. त्यांच्या भानगडीत जास्त पडू नये. सारखं टोकू नये. त्यांच्या खर्चावर लक्ष देऊ नका. नवीन जनरेशन आपल्या पेक्षा हुषार आहे, ते आपलं मॅनेज करतील पढे लिखे बुद्धु. असं कोणी म्हणायला नको असेल तर आपल्या पैशाचे व्यवस्थापनही व्यवस्थित करायला हवच. नटसम्राट चे उदाहरण मात्र लक्षात असू द्यावे.

नवीन जगात वावरताना रोजच्या नवनवीन होणार्या frauds बद्दल जागरूक रहाव लागेल.

घराबाहेरील जगाशी पण वागताना पुन्हा लक्षपूर्वक माईंडसेट तयार करावा लागेल.

तेथे तर वेगवेगळ्या लोकांशी संबंध येणार आहे. बोलण्यापेक्षा ऐकण्याचे काम केले तर समोरच्या व्यक्तीला समजणे सोपे होते. समजदार व्यक्ती खूप ज्ञानी आणि मुर्ख व्यक्ती समोर शांत बसतो. भाजीवाला, रिक्षा चालकांनी हुज्जत घालण्यापेक्षा त्याला चार पैसे जास्त दिले तर हरकत नाही. कोणाचे काही चांगलं दिसलं तर कौतुक करायची सवय लावावी. त्यांना तर आनंद होतोच, आपल्याला पण चांगलं वाटतं.

लोकांना माझी गरज आहे की नाही माहीत नाही पण मला लोकांची गरज आहे.

हा एक विचार मनात ठेवला तर सर्वांबरोबर सहज जमत.

जेष्ठ नागरिक संघ, वाचक मंच, आपल्या आवडीनुसार यांचे सदस्यत्व घेतले तर आपोआपच चार लोकांशी ओळख होते, तुम्हाला पण तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण करायची संधी मिळते. यासर्व गोष्टींमध्ये स्वतः पूढाकार घ्यावा लागतो.

एकंदरीत वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठत्व तर आपोआपच मिळत, श्रेष्ठत्व मिळवायला स्वतः चे प्रयत्न करावे लागतात. मानसिक स्वास्थ्यासाठी पण हे गरजेचे असते.

म्हणतात ना,

संसार को बदलने की कोशिश मत करो, स्वयं को बदलो.

रस्त्यावर दगड असले तर आपण रस्त्यावर कार्पेट नाही टाकत, पायात चपला घालतो.

तुमच्या आयुष्यात आनंदी राहण्याची जबाबदारी तुमची स्वतः ची आहे. आपल्या आयुष्याची किल्ली दुसऱ्याच्या हातात कधीच देऊ नये.

आपल्या मनात, सवयीत, वागणुकीत असे विचार ठेवले तर सहजच

हे आजोबा आपले ज्येष्ठत्व छान सांभाळतात. मी पण म्हातारा झालो की असंच वागणार. असे comments नक्की मिळतील.

You will set an example for others.

सिर्फ सूरज के निकलनेसेही सवेरा नहीं होता।

विचारों के बदलनेसे भी नया दिन / नया दौर शुरू होता है।

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आशाताई.. गेलात…! – भाग – २ ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

आशाताई.. गेलात…! – भाग – २ ☆ शीला पतकी 

आशाबाईंचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या सामान्य जीवन जगणं पसंत करायच्या स्वयंपाकाची विलक्षण आवड.. लोकांना करून घालायची हौस बाजारात फिरून भाजीपाला आणण्याची हौस.. मला मंगला खाडीलकर यानी एकदा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या..

” एकदा आशा बाईंनी मला घरी बोलावलं मार्केटमध्ये जाऊन आम्ही भाजी घेऊन आलो अगदी भरपूर दोन पिशव्या भरून त्यांचे भाजीवाले ठरलेले. त्यांच्याशी उत्तम संवाद तोही त्यांच्या पातळीवर येऊन जणू काय त्या मैत्रिणी असाव्यात त्यानंतर घरी आल्यावर त्यांनी छान गरम भाकरी केली. ती टम्म फुगलेली भाकरी माझ्या पानात घालत त्या म्हणाल्या जेव त्याच्यावर लोण्याचा गोळा घातला आणि गरम भाकरी भाजी मला खाऊ घातली. ” असं अनेकांना आपल्या हातन करून खाऊ घालण्यात त्यांना खूप धन्यता वाटायची कारण त्यांच्यात एक छान गृहिणी लपलेली होती.

आपल्याला फक्त आवाजाची जादू असणारी आशा दिसते पण तसं नाही एक छान छोटी बहीण आपल्या अपंग असलेल्या भावावर नितांत प्रेम करणारी छोटी मुलगी हृदयनाथला सतत कडेवर घेऊन हिंडत असे ही आठवण खुद्द मंगेशकरांनी सांगितली ते म्हणाले, “आशा कधी कामाला मागे पडत नव्हती आम्ही आमच्या आजोळी आजीच्या घरी जायचं तेव्हा सगळ्यांचं टोपलं भर धुणं घेऊन आणि मला कडेवर घेऊन ती नदीवर जायची सगळ धुणं स्वच्छ धुऊन ती पाटी डोक्यावर घेऊन मला कडेवर घेऊन ती घरी येत असे आणि आजीला म्हणायची आजी मला खूप भूक लागली काहीतरी खायला दे त्यावर आजी त्यांना म्हणायची सारखं काय खायला लागतं ग तुला जा त्या डब्यात भाकरी आहेत तेल तिखट मसाला आहे घे आणि खा आणि तेल तिखट मसाला भाकरी हे जेवण अतिशय गोडीन त्या जेवत असत. ते म्हणाले तिने फार कष्ट काढले आहेत खूप संघर्ष केला आहे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तीने आपल्यावर घेतली आणि ती निभावली तिने खूप कष्ट केले आहेत”… हे सांगताना हृदयनाथांचा स्वर हळवा झाला होता हृदय नाथांना अखंड कडेवर सांभाळून घेणारी त्यांची बहीण आज गेली… सामान्य बाईचे दुःख भोगणारी वेदना सहन करणारी नवऱ्याच्या हिंसक वृत्तीला तोंड देणारी आणि त्यातून गरिबीत आपली मुले एका खोलीत राहून मोठी करणारी आशा पुढे महाराणी सारखी राहिली.

नकला करण्याचा एक विशेष गुण त्यांच्याकडे होता त्यामुळे बाबूजी आपल्याला कसे शिकवत असतात याची तर उत्तम नक्कल करायच्या ह्या गुणामुळे त्यांचे निरीक्षण खूप चांगले होते त्यामुळे पार्श्वगायनात आपलं गाणं कोणाच्या तोंडी जाणार आहे हे लक्षात घेऊन त्या गात असत हेलन बिंदू या कॅबिरे नृत्य करणाऱ्या अनेकांसाठी त्यांचा आवाज वरदान ठरला… त्यामुळे पिया तू अब तो आजा यासारखे गाणे आज आपण विसरू शकत नाही. लहान मुलांची ही गाणी त्यातही आशाताईंचा आवाज फिट होता. खतूबा ह्या गाण्यांमध्ये त्यांनी काढलेले वेगवेगळे आवाज हे गायन कलेच्या पलीकडचे होतेहे गाणे अलीबाबा चालीस चोर या चित्रपटातले असून पंचमदा त्यांच्या अनेक प्रयोगापैकी एक आहे गाण्याची सुरुवात अशी अरेबियन वगैरे हवी होती तेव्हा त्यांनी अरबी लोक लोकनृत्य करताना कसे ओरडतात ते पाहून त्या गाण्याची सुरुवात कशी केली… ते काही कवीने लिहिलेलं नव्हतं किंवा संगीतकाराने पण सांगितलेलं नव्हतं… तो त्यांचा स्वतःचा शोध होता. कवीचे शब्द आपल्या गाण्यातून लोकापर्यंत पोहोचवून त्याला न्याय देणं हे तर त्यांनी केलंच आहे पण शब्दशिवाय नुसत्या हमिंग वरती गाण म्हणलय देवानंद आणि नूतन सोबत चे एक गीत त्यामध्ये देवानंदला शब्द आहेत पण नूतन गाते ते हमिंग वर आहे ते पूर्ण शब्दाशिवाय च गाणं संवादाविना बोलू असे झाले आहे. इतकी ताकत त्यांच्या स्वरात आहे. बाबूजीं बरोबर गायलेली असंख्य मराठी गीत आपल्या मनात आणि घरात गोडवा भरून गेलेले आहेत. काल शेलार यानी शेवटची केलेली क्लिप त्यामध्ये त्या म्हणतात. ” मला हे दत्तगुरु दिसले “ह्या गाण्याचा कडव त्यांनी गायलं आहे मला वाटतं खरंच त्यांच्या परमेश्वर दिसत असावा नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं सगळं मिळालं पैसा अडका ऐश्वर्य प्रसिद्धी.. सगळं मिळवलं आता काही इच्छा नाही आता तृप्त आहे आता फक्त निघायचे… चार दिवसापूर्वी गाडगीळांशी बोलताना त्या म्हणाल्या माझ्या काही मुलाखत रेकॉर्ड केले असल्यास तर पाठव मला ऐकायचे आहेत आणि लवकर पाठव माझ्याकडे वेळ नाही बस एवढंच संभाषण झालं… मला वाटतं त्यांचा मृत्यू त्यांना समजला होता किंबहुना त्यांचं जगून झालं होतं. त्याना लक्षात आलंय असावे आणि म्हणून त्यांनी मनोमन परमेश्वराला हाक मारली असेल… जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे… अशा माणसांना आपण कधी थकले आहोत असं समजत नाही कारण ती आपल्याला हवी असतात आणि आपण त्यांना कधी विचारले नाही की बाबा रे खरच तू थकला आहेस का? का असं होतं हे माहित नाही पण होतं माथ्यावरती एकटीने पेललेलं संघर्षाचे, दुःखाचं ओझं वागवत ही बाई अत्यंत आनंदाने जीवन जगत आली. तिने आपल्या मुलांना एकच सांगितलं होतं गरीबीत जन्माला आलो तरी गरीबीत मरायचं नाही कारण गरिबीच्या यातना त्यानी भोगल्या होत्या त्या वेळा पाहिल्या होत्या, तो संघर्ष लढला होता, अशा एका संघर्षमय जीवनाचा काल अकस्मिक शेवट झाला. कोणाकडून फारशी सेवा न करून घेता अगदी सहजपणे त्या आपल्यातून निघून गेल्या पण त्यांची हजारो गाणी संपूर्ण विश्वामध्ये गाजली आहेत ती चिरंजीव आहेत त्यातून त्या आपल्याला रोज भेटणारच आहेत

अंतिम क्षणाला ब्रम्हा विष्णू महेश या सृजनकर्त्यापालनकर्त्या आणि विनाशकर्या परमेश्वराचा गोड स्वरात धावा करून त्यांच्याबरोबर सहज निघून गेल्या.. त्यांचा अंश होण्यासाठी! .. कदाचित लताबाई त्यांना तिथे भेटल्या असतील लताबाई त्यानी तेथे स्वागत केलं असेल. “अशा ये आलीस खूप दमलीस ग.. ” असं म्हणून त्यानी तीला मिठीत घेतल असेल दोन्ही बहिणींचे हे अपूर्व मिलन स्वर्गस्थ देवतांनी पाहून त्यांच्यावर नक्कीच पुष्पवृष्टी केली असेल. आशाबाई अजून काही वेळाने तुमचं पार्थिव शरीर पंचतत्वात विलीन होईल. पण तुमचा पंचतत्त्वात मिसळलेला ध्वनी, गोड आवाज, कधीही संपणार नाही तुमच्या प्रार्थना शाळेतील मुल गातील प्रेमी युगुल तुमचे प्रेम गीत गातील आया तुमची अंगाई गातील रसिका तरुण तुमचे कॅबरे ऐकतील कुणीतरी एखादी सलज्ज तरुणी तुमचं निगाहे मिलाने को जी चाहता है मनापासून गाईल आणि आपल्या प्रेमाकडे सलज्य नजरेने चोरून पाहिल केव्हा तरी पहाटे फसवून रात गेली आभाळा चांदण्याचे उसवून रात गेली हे सगळं तुम्ही अजरामर करून गेलात… आशाताई तुमच्या जीवन संघर्षाला तुमच्या मेहनतीला संकटना तोंड देऊन ताठ मानेने उभा राहणाऱ्या वृत्तीला तुमच्या गोड फिरत असलेल्या गळ्याला आणि भूतकाळ न विसरता सामान्य माणसासारखे आयुष्य जगणाऱ्या सामान्य माणसाची कदर करणाऱ्या तुमच्यासारख्या थोर कलावंताला साष्टांग दंडवत! तुमचा फक्त देह गेलाय जो आम्ही तुम्हाला समोरून कधी बघितलं नव्हतं आमच्यासाठी तुम्ही आहातच. काया नाही तरी नादा ने आहात.. तुमचा आवाज त्या आवाजातली फिरत शब्दांचा टोकदारपणा सारसार आमच्या कानात घुमत राहणार आहे लते बरोबर आशा नावाच विश्वाला पडलेले एक स्वप्न आज चांदण्यात विरून गेल. पृथ्वीवर पडणारा प्रकाश अधिक प्रखरं करून गेलं.!

आशाताई भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

– समाप्त – 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अर्थपूर्ण शब्दांजली… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ अर्थपूर्ण शब्दांजली ☆ संगीता कुलकर्णी ☆

*स्वरांची जादू, भावनांची भाषा आणि आयुष्याच्या प्रत्येक छटेचा अर्थ आपल्या गाण्यांतून सांगणाऱ्या आशा भोसले यांना ही अर्थपूर्ण शब्दांजली*…

भारतीय संगीतविश्वातील अजरामर स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना लेखरूपी श्रद्धांजली अर्पण करताना शब्द अपुरे पडतात कारण त्यांचा आवाज म्हणजेच भावना, जीवन आणि संगीताचा अखंड प्रवाह होय… त्यांच्या असंख्य गाण्यांतून त्यांनी प्रत्येक श्रोत्याच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

आशा ताईंचा आवाज हा केवळ गाण्यांचा नाही तर तो काळाचा साक्षीदार आहे… आशाताईंचा आवाज म्हणजे भावनांचा अथांग सागर… आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करणारा अनुभव… “राधा ही बावरी” मधील निरागस प्रेम, “माझे माहेर पंढरी” मधील भक्तीभाव, आणि “चुरा लिया है तुमने” मधील खट्याळ रोमँटिकता “पिया तू अब तो आजा” मधील त्यांचा खट्याळ आणि चैतन्यशील अंदाज, “दिल चीज़ क्या है” मधील नजाकत… स्वतःला अर्पण करण्यातील सौंदर्य आणि “इन आंखों की मस्ती” मधील भावपूर्ण गूढता तर “दम मारो दम” मधून बंडखोर तरुणाईचा आवाज बनल्या… “झुमका गिरा रे” मधील खट्याळपणा आणि “ये मेरा दिल” मधील आत्मविश्वास या प्रत्येक गाण्यांतून त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या रूपांत साकारलं… स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांच्या आवाजात एक विलक्षण लवचिकता होती जी कोणत्याही संगीत शैलीला सहजपणे कवेत घेत असे… प्रत्येक गाण्यातून त्यांनी जीवनातील विविध छटा जिवंत केल्या… वेगवेगळ्या भावनांना स्वर दिला.. त्यांचा स्वर कधी कोमल झुळूक बनून मनाला स्पर्श करतो तर कधी उत्साहाची लाट बनून अंगात जोश भरतो… प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या गायकीची वेगळी ओळख निर्माण केली…

मराठी संगीतातही त्यांचे योगदान तितकेच मोलाचे आहे. “चांदणे शिंपीत जाशी” सारख्या गाण्यांतून त्यांनी कोमल भावनांना सुरेल स्पर्श दिला. त्यांच्या आवाजातली गोडी, सहजता आणि भावस्पर्शीपणा यामुळे ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांनी केवळ गाणी गायली नाहीत तर प्रत्येक शब्दाला आणि भावनेला आत्मा दिला.. त्यांच्या गाण्यांमधूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते सहज, बहुगुणी आणि सदैव ताजेतवाने…

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी विविध भाषांमध्ये गायली… हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची मोहिनी पसरवली… मराठी, हिंदी, गझल, पॉप—कोणतीही शैली असो आशाताई प्रत्येक ठिकाणी सहजपणे रुळल्या. त्यांच्या आवाजातली लवचिकता आणि भावनांची खोली यामुळेच त्यांची गाणी काळाच्या पलीकडे गेली.

संगीतकार आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. या जोडीने भारतीय संगीताला एक नवीन दिशा दिली, जिथे पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचाही सुंदर संगम दिसून येतो.

आशाताईंची गाणी म्हणजे केवळ सूर नाहीत तर ती आपल्या आयुष्याच्या आठवणींशी जोडलेली भावना आहेत… कधी आनंदाचे क्षण, कधी विरहाचे दिवस, तर कधी स्वतःला शोधण्याचा प्रवास म्हणूनच त्या केवळ गायिका नाहीत तर आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत… त्यांच्या प्रत्येक गीतात एक कथा आहे एक अनुभव आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.

आशा भोसले यांचा आवाज हा काळाच्या पलीकडे जाणारा आहे. त्यांनी प्रत्येक पिढीला काही ना काही दिलं आहे कधी प्रेमाची गोडी, कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाचा उत्साह. त्यांच्या गाण्यांतून जीवनाच्या प्रत्येक भावनेला स्वर मिळाला आहे… आशाताईंची गाणी म्हणजे केवळ सुरावट नव्हे तर जीवनाचा आरसा आहेत… आशाताईंचा आवाज आपल्याला शिकवतो की आयुष्य एकसुरी नसते ते अनेक रंगांनी भरलेले असते. कधी हसू, कधी अश्रू, कधी प्रेम तर कधी एकांत.. या सगळ्यांना त्यांनी आपल्या गाण्यांतून स्वर दिला.

आज त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचा प्रत्येक स्वर अजूनही हवेत दरवळतो आहे… त्यांचा आवाज प्रत्येक सुरातून, प्रत्येक गाण्यातून आपल्याशी संवाद साधत राहील. त्यांच्या गाण्यांतूनच त्या सदैव जिवंत राहतील… मनात, आठवणीत, आणि प्रत्येक सुरांत… जीवनाला सुंदर बनवणारा एक मधुर स्वर बनून…

आज त्यांना अभिवादन करताना त्यांच्या गाण्यांतूनच त्यांची आठवण जिवंत ठेवणं हीच खरी आदरांजली ठरेल कारण त्यांचा आवाज कधीच थांबणार नाही तो प्रत्येक सुरात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक हृदयात सदैव घुमत राहील.

आशा भोसले या केवळ एक गायिका नाहीत तर त्या एक भावना आहेत…

संगीताच्या इतिहासात सदैव जिवंत राहणारी एक अमर स्वरकन्या…

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares