मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला फक्त मज्जा करायचीये – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ मला फक्त मज्जा करायचीये – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

“मला फक्त मज्जा करायचीये”… विषय संपला.

“मज्जा केलीच पाहीजे” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या उरावर पांघरू लागलीयेत.

इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती “निकड” झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.

तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –

“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी… “

“पार्टी नाही? शी… “

“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक… “

तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला! ? फारच बोरिंग….

“तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं… “

“वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर… “

“डेटवर चाललायस? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad… “

“वीकेन्ड घरच्यांबरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी… “

यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.

तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच.

TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला.

न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं.

सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या.

“अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं? ” असं झालं.

जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं.

एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेन्ट्स” झाले.

मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.

तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.

कमवा; आणि उडवा.

तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho!!

भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.

विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही “वीड”, “ग्रास” हे शब्द येऊ लागलेत.

यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही.

या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. “मनाली ट्रान्स” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा!!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या!!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं.

चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.

मग मेलात तरी चालेल.

आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?

चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत”, “आमचं कित्ती मस्त चालू आहे”, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय”, *हे दुसऱ्याला दाखवणं*, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.

ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.

मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो.

तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.

मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.

गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.

त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग “तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही”, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.

हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.

जागे होऊया रे.

स्वत्व नको विकूया आपण.

दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत!!

उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.

आपण सूर्य निवडू या.


लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोकणातली गरिबी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कोकणातली गरिबी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

कोकणात पूर्वी गरिबी होती. आज हे वाक्य आपण सहज बोलून जातो. पण त्या गरिबीचा अर्थ फक्त घरात पैसे कमी होते एवढाच नव्हता. बाजारातून आज काय आणायचं, हा प्रश्न विचारण्याआधी, आज परसात काय आहे? हा प्रश्न विचारावा लागायचा. आणि कदाचित कोकणातल्या अनेक अप्रतिम पदार्थांचा जन्म याच प्रश्नातून झाला असावा.

परसात फणसाचं झाड होतं. फणस पिकेपर्यंत थांबायची गरज नव्हती. कच्चा फणस आला की भाजी. तो पिकला की गरे. गरे जास्त झाले की सांदणं. त्याची साठं. आणि सगळं संपल्यावर राहिलेल्या आठळ्याही कचऱ्यात नाहीत. त्या भाजून खायच्या. नाहीतर त्यांची भाजी.

एका फणसाच्या झाडाला कोकणी माणसाने बहुधा सांगूनच ठेवलं होतं – “तुझं काहीही वाया जाणार नाही! ”

आंब्याची गोष्ट तर आणखी मोठी. आंबा पिकण्याआधी कैरी. कैरीचं लोणचं. पन्हं. चटण्या. मग आंबा पिकला की रस. रस खाऊन झाला तरी गोष्ट संपत नाही. त्याची साठं. आंब्याचा शिरा.

आणि शेवटी राहिलेली बाठसुद्धा भाजून खायची.

पण या सगळ्यांचा खरा राजा—नारळ. कोकणाचा कल्पवृक्ष.

शहाळं असताना गोड पाणी आणि मऊ मलई. नारळ झाला की ओलं खोबरं. त्याचं दूध काढायचं. चटणीत घालायचं. भाजी-आमटीच्या वाटणात वापरायचं. मोदक, नारळीभात, करंज्या अशा कितीतरी पदार्थांत खोबरं. खोबरं सुकलं की सुकं खोबरं. त्यापासून तेल. पण नारळाचं मोठेपण स्वयंपाकघराच्या दाराशी संपत नव्हतं. करवंटीही कामाची.

आणि झावळी?

ती वाळली की तिच्या हिरांपासून झाडू. झावळ्यांचा उपयोग घर शाकारायला.

म्हणजे ज्या झाडाने ताटात चव दिली, त्याच झाडाने अंगण झाडायला झाडू दिला आणि डोक्यावर छप्परही दिलं!

त्याला कल्पवृक्ष म्हणणं ही केवळ काव्यात्मक उपमा नव्हती.

ती कोकणी माणसाने त्या झाडात शोधलेली पूर्ण उपयोगाची शक्यता होती.

परसात अळू उगवलं तर त्याचं फदफदं. तीच पानं बेसन-मसाला लावून गुंडाळली की अळूवड्या.

कोकम आलं—सरबत झालं. साल वाळवली की आमसूल.

चिंच आली— गर खाल्ला. आणि चिंचोकासुद्धा मुलांच्या जगात निरुपयोगी नव्हता.

म्हणजे त्या घरात कचरा कुठे संपतो आणि कच्चा माल कुठे सुरू होतो, याची सीमाच फार अस्पष्ट होती.

आज supermarket मध्ये गेल्यावर आपल्यासमोर शेकडो पर्याय असतात.

त्या काळात पर्याय कमी होते. पण कल्पकता जास्त होती.

आज आपला प्रश्न असतो— “आज काय खायचं? ”

तेव्हा प्रश्न बहुधा वेगळा असावा— “आज जे मिळालंय, त्यातून काय काय करता येईल? ”

दोन प्रश्न.

पण दोन अगदी वेगळ्या जीवनदृष्टी.

पहिल्या प्रश्नाला पैसा पर्याय देतो. दुसऱ्या प्रश्नाला कल्पकता.

कदाचित म्हणूनच कोकणी स्वयंपाकाची खरी श्रीमंती पदार्थांच्या संख्येत नव्हती. ती एका गोष्टीतून किती गोष्टी निर्माण करता येतात, यात होती.

फणस फक्त फळ नव्हता. आंबा फक्त आंबा नव्हता. कोकम फक्त सरबत नव्हतं. आणि नारळ तर कधीच फक्त नारळ नव्हता.

परसात जे उगवलं, त्याच्याशी त्या पिढीने जणू एक करारच केला होता— “तू जे देशील, त्यातून आम्ही काहीतरी चांगलं करू. ”

मला या वाक्यात फक्त पाककला दिसत नाही. एक संपूर्ण पिढी दिसते. कारण त्यांच्या आयुष्यातही त्यांना हवं ते सगळं मिळालं नाही.

हवा तितका पैसा नाही. हवी ती साधनं नाहीत. हव्या त्या संधी नाहीत. पण त्यांनी आयुष्याकडेही कदाचित आपल्या परसासारखंच पाहिलं.

जे उगवलं, त्याचा उपयोग केला. अभावाचं लोणचं घातलं. अडचणीचं सांदणं केलं. कष्टाचं सरबत केलं. आणि पुढच्या पिढीच्या ताटात शक्य तितकं चांगलं वाढलं.

आज आपल्या घरात पर्याय जास्त आहेत. फ्रिज भरलेले आहेत. बाजार एका फोनवर घरी येतो.

पण म्हणूनच कदाचित तो जुना प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे – समृद्धी म्हणजे आपल्या हातात किती गोष्टी आहेत हे,

की हातातल्या एका गोष्टीत किती शक्यता आपल्याला दिसतात हे?

कोकणातल्या त्या जुन्या परसांनी त्याचं उत्तर फार पूर्वी दिलं होतं.

त्यांच्याकडे फार काही नव्हतं. पण जे होतं, त्यातलं फारसं काही “फक्त एवढंच” नव्हतं. फणसात त्यांना अनेक पदार्थ दिसत होते. कैरीत पुढचा ऋतू दिसत होता. कोकमात वर्षभराची चव दिसत होती. नारळात तर अन्नापासून छपरापर्यंत एक संसार दिसत होता.

कदाचित म्हणूनच गरिबीने कोकणाला फक्त काटकसर शिकवली नाही. तिने एक वेगळीच श्रीमंती शिकवली.

निसर्गाने किती दिलं, यावर समृद्धी ठरत नाही. त्याने जे दिलं, त्यात आपल्याला किती शक्यता दिसल्या, यावर ती ठरते.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘अलक आणि अलका’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘अलक आणि अलका’ ☆ श्री दिवाकर बुरसे

स्पष्टिकरण:

अलकम्हणजे अति लघु कथा (Terribly Tiny Tale)

अलकाम्हणजे अति लघु काव्य (Terribly Tiny Poetry)

**

सध्या ‘अलक’ या नावाचा एक अति लघु कथा प्रकार मराठी भाषेत तुरळकपणे दिसू लागलाय खरा, पण या वाङमय प्रकाराला कोणाचीही, कुठलीही अधिकृत मान्यता नाही. रसिक वाचकांकडूनही त्याला फारशी दाद मिळाल्याचे पाहण्यात नाही.

‘अलक’ किंवा ‘अति लघु कथा’ हा एक गद्य कथाप्रकार आहे. यात थोडक्या शब्दात एखादी, घटना, प्रसंग, विचार कथारूपात सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. या कथेचा जीवच मुळी लहान असतो. अलक हा क्षुद्र कथाप्रकार सामान्यतः समाज माध्यमांवर आढळून येतो. तो अधिक जागा व्यापत नाही.

यात पुन्हा दोन उपप्रकार आहेत, सकारात्मक व नकारात्मक. सकारात्मक अलक मध्ये वाचकावर सकारात्मक परिणाम साधण्याचा प्रयत्न असतो तर, नकारात्मक अलकमधे त्याउलट प्रयत्न दिसतो.

सध्या काही नवे हौशी लेखक काही तरी ‘हटके’ करायचे म्हणून आवर्जून, प्रयत्नपूर्वक अलक लिहून विविध समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतात. आतपुढ म्हणजे ‘आले तसे पुढे ढकलले’ ही तर माध्यमांची संस्कृती. त्यामुळे ह्या अलक विविध समूहांवर फिरत असतात हे सत्य आहे.

मराठी कथा, लघुकथा, दीर्घकथा ह्या कथा प्रकारांना प्रदीर्घ, प्राचीन परंपरा आहेत. त्या सर्वश्रुत व सर्वपरिचित आहेत. त्यांना समाजानेही मानले आहे, स्विकारले आहे. थोडक्यात हे कथाप्रकार मराठी जनमानसात ‘सुप्रतिष्ठित’ झाले आहेत.

लघु आणि दीर्घ कथा

लघुकथा ही आकाराने, लांबीने लहान असली तरी ती एक पूर्ण कथा असते. दीर्घ कथा सुद्धा एक परिपू्र्ण कथा असून ती आकाराने काहीशी विस्तृत असते. त्यातील व्यक्तिमत्वे, प्रसंग, तपशील, कालमर्यादा इ. बाबतीत तिचा आवाका मोठा असतो.

सध्याच्या अलक

अलक हे कथेचे लघुकथेपेक्षाही अधिक लघुरूप असते असे गृहित धरले तरी ती एक पूर्ण कथा असावी येवढी अपेक्षा आहे. त्यातील कथानकात काही नाट्य, एखादी व्यथा, एखादा संदेश असे काहीतरी असायला हवे. प्रत्यक्षात मात्र पूर्ण कथानक सामावणारी, वरील सर्व किंवा काही लक्षणे असणारी अलक आजपर्यंत तरी माझ्या वाचनात आलेली नाही.

वाचनात आलेल्या तथाकथित अलक या पूर्ण कथा कधीच वाटल्या नाहीत. एखादे वाक्य, दोन-चार वाक्यात मांडलेला एखादा विचार, एखादा प्रसंग येवढाच त्यांचा जीव असतो. त्याला कथा असे म्हणताच येत नाही.

काही तरी नवीन करण्याच्या हेतूने काही उत्साही मंडळींनी अलिकडे हा उथळ कथाबंध हाताळायला सुरुवात केली आहे. पण त्यात चमकदार, विस्मयकारी कल्पना, हळुवार अनुभूती, एखादा कलापूर्ण प्रतिभाविष्कार आहे असे काहीही अजून तरी वाचनात आलेले नाही.

अलका – चारोळी

गेल्या तीन-चार दशकापूर्वी अस्तित्वात आलेला हा एक उथळ काव्यप्रकार असला तरी बऱ्यापैकी लोकप्रिय होत आहे. विशेषतः यात तत्कालिक राजकीय व्यंगे मांडलेली असल्याने, काही चिमटे, कोपरखळ्या, टपला, चपेटे असल्यामुळे त्या त्वरित दाद घेऊन जातात. याअति लघु काव्याला आपण ‘अलका’ म्हणूया. अशा चारोळीत अगदी लहान कथाबीज, विचारबीज असते. त्या अगदी अल्पजीवी असतात.

अलका – हायकू

‘हायकू’ हा तीन ओळींचा काव्यप्रकार म्हणून हा ही ‘अलका’. हा जपानी भाषेत लोकमान्य झाला असला तरी प्रयत्न करूनही मराठीत तो कधीच रुजला नाही. शिरीष पै यांनी या काव्यप्रकारात काही लेखन केले आहे पण त्यांच्याखेरीज इतर साहित्यिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. प्रतिभावान कवियत्री शांता शेळके यांनी काही जपानी हायकूंचा मराठीत अनुवाद करून त्याचे ‘पाण्यावरील पाकळ्या’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. पण असे काही तुरळक प्रयत्न सोडले तर हायकू मराठी मनाला आकर्षित करू शकले नाही हे वास्तव मान्य करावे लागेल.

अलका – सुभाषित

या पार्श्वभूमीवर संस्कृत वाङमयातील अत्यंत प्रभावी लोकप्रिय ‘सुभाषित’ ह्या लघुकाव्य – ‘अलका’ प्रकाराचा उल्लेख अटलनीय आहे.

जगातील भाषांमधील सर्वोत्कृष्ट भाषा ‘संस्कृत. ‘ त्यातील काव्य सर्वोत्तम आणि काव्यातही सर्वोत्कृष्ट प्रकार म्हणजे सुभाषित!

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण-भारती।

तस्माद्धि काव्यम् मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

सुभाषिताची व्याख्या

मिताक्षरं हितं सभ्यं वैश्विकं सार्वकालिकम् ।

सालंकृतं स्वयंपूर्णं सुबोधं तत् सुभाषितम् ।।

कमीतकमी शब्दयुक्त, हितकारक, सभेत शोभून दिसेल असे, विश्वात सर्वत्र आणि सर्वकाळी लागू पडणारे, अलंकार-युक्त, अर्थाने परिपूर्ण आणि हे सर्व असुनही जे समजण्यास सोपे असते, त्याला ‘सुभाषित’ असे म्हणतात.

अलका – शायरी

उर्दू भाषेतील ‘शेरोशायरी’ हा ही असाच एक अति लघु काव्यप्रकार- अलका विलक्षण लोकप्रिय आहे. अँड. भाऊसाहेब पाटणकरांनी सिद्ध केलेला, बोली भाषेत लिहिलेला ‘मराठी शायरी’ हा काव्यप्रकार विलक्षण प्रभावी, परिणामकारक आहे. त्याची भाऊसाहेबांनी दार्शनिक पद्धतीने केलेली व्याख्या अशी…

भावोन्मादोत्थित कल्पनाचमत्काराविष्कार विशेषः शायरी। कल्पना चमत्कृतित्वंतु विस्मय सहकृत सदभिव्यंजकत्वम्।

उत्कट भावनेतून निर्माण झालेल्या सद्भिव्यंजक अशा विस्मयकारक कल्पनेच्या अविष्काराचे एक तंत्र असा मी वरील व्याखेचा सामान्यतः अर्थ लावतो.

दुर्दैवाने भाऊसाहेबांच्या या मराठी शायरीचा वारसा पुढे चालवणारा कोणी शायर लाभल्याचे आढळात नाही. परिणामी पूर्णतः सप्रमाण, सप्रात्यक्षिक सिद्ध करून सुद्धा भाऊसाहेबांच्या पश्चात मराठी शायरी अंकुरली, फोफावली नाही. तिची परंपरा निर्माण झाली नाही.

वरील वाङमय प्रकारांचा विचार करता सध्याच्या ‘अलक’ अगदीच पुचाट, बेंगरूळ, रसहीन, अर्थहीन वाटतात.

ज्यांना ‘अलक’ हा कथाप्रकार सोईचा वाटतो, प्रभावी वाटतो, आवडतो त्यांनी लिहावे. वाचकांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे त्याचे रसग्रहण, मूल्यमापन करावे आणि ठरवावीत आपापली मते. अलकविषयी मी माझी ही व्यक्तिगत मते या निमित्ताने मांडतोय येवढेच.

🙏🏻🙏🏻🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कापणे – एक इव्हेंट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? मनमंजुषेतून ?

☆ कापणे – एक इव्हेंट! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्याकाळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल! मला आज बहात्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो, म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा!

आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच? “लिहिता हात” म्हणजे काय? तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे? ) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला ऐकून घेवू? काय बरोबर ना मंडळी?

हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी. आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या!

तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई. मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा. मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय! टोक काढतांना गाढवासारखं (? ) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं? बस अभ्यासाला! “

मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला तरी अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे!

मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे! हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल! आजकाल कशातच “राम” उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही? असो! कालाय तस्मै नमः!

तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” नामक आमच्या आठ चाळीच्या संकुलचा एकच नाभिक असलेल्या नाभिकपुढे पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे. आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.

केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे! या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा!

त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे. शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (? ) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई!

आज वयाच्या बहात्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” अनेक कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी. माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच होतं!

केस कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच! आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकलमधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.

त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो!

एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच. स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त!

हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात!

“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल! ” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल! म्हणून सोप्या चालू भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source! ” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे!

“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला! “

“टॅक्स! ” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात!

मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”रमा.. माझा आदर्श..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रमा.. माझा आदर्श.. ☆ संध्या बेडेकर ☆

Always Remember Life In Front Of You Is more Important Than Life Behind You.

मी आणि रमा दोघी बाल मैत्रिणी. अगदी शाळेपासून बरोबर. लग्नानंतरही दोघी एकाच शहरात. मी लहानपणी रडू बाई होते. रमा मला सांभाळायची. माझ्यासाठी भांडायची. मला समजावून सांगायची. तिच्या मुळे मी आपली लढाई लढायला शिकले. तिच्या संगतीत माझा आत्मविश्वास वाढला. लग्नानंतर ही आमची दोस्ती आधी पेक्षाही जास्त झाली.

आता तर सर्व मनमोकळेपणाने बोलायला एक भरवशाचे ठिकाण होते. वयाच्या वेगवेगळ्या फेजचे प्रश्नही वेगळेच असतात. त्या त्या प्रश्नांची उत्तर प्रत्येक जण आपापल्या परिस्थिती प्रमाणे, स्वभावानुसार घेत असतोच. बरोबर कोणी आधार देणारं असेल तर प्रवास थोडा सोपा होतो.

रमा नेहमी म्हणते,    

 अग! आपल्या आयुष्याची १००% जबाबदारी आपलीच असते. आपण कसं वागावं? हा आपला निर्णय असतो. लोकांनी ठरवायला आपले प्रश्न म्हणजे काही ग्राम पंचायतीचे मुद्दे नाहीत.

खूप कमी लोक असतात, जे आपल्याला समजतात.

रमा म्हणजे देवाने मला दिलेलं सुंदर, मुल्यवान उपहारच आहे, असं मी समजते.

असे आमचे एकमेकांच्या सहवासात वैवाहिक जीवन मजेत सुरू होते. आमच्या नवऱ्यांची पण दोस्ती झाली, त्यामुळे आमची चौकडी मजेत होती.

रमा तेथे क्षमा अस बरेच जण म्हणायचेही.

आजही मला ती सकाळ आठवते. रामाचा फोन आला. म्हणाली,    

अग! सेवासदन दवाखान्यात तुम्ही दोघे लवकर या. हे चक्कर येऊन खाली पडले. अजय ऑफिस मध्ये गेलाय.

आम्ही दोघं लगेचच पोहचलो. तोपर्यंत सर्व संपलेल होत. सिव्हीयर‌ हार्ट अटॅक. अचानक सर्व जग बदलल. वयाच्या पन्नाशीतच रमावर सर्व जबाबदारी आली. तिची शाळेची नोकरी, अजय नुकताच नोकरीला लागलेला. रमाच्या मुलीचे पल्लवी चे लग्न दोन वर्षांपूर्वीच झालेलं.

हळूहळू परिस्थितीला धैर्याने तोंड देत स्वतः लाच सांभाळत रमा पुन्हा उभी राहिली.

मागच्या वर्षी अजयचे लग्न झाले. अनिता घरात आली.

अजय अनिता, म्हणाले     

अग! आई तुला नोकरी सोडायची असेल तर तू सोड. अगदी मजेत रहा, नोकरीमुळे तुला तुझे छंद, enjoy करता येत नाहिये. रमा छान गाणं म्हणते. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेते. आपल्या मैत्रिणींचा गृप तयार करून त्यांना पण स्पर्धेसाठी तयार करते. हसतमुख मृदुभाषी रमा सर्वांना आवडते. नोकरी मुळे माझा वेळ छान जातो, म्हणून नोकरी पण करते.

पुन्हा एकदा आयुष्याची घडी व्यवस्थित बसली होती, म्हणण्यापेक्षा वैचारिक ताकदीने तिने आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला होता.

अनुजाचां जन्म झाला आणि घरात पुन्हा नव्याने उत्साह संचारला.

देवाने बहुतेक रमाची परीक्षा घ्यायचे ठरविलेच होते.

पुन्हा एकदा ती भयावह सकाळ होती. रमाचा फोन आला म्हणाली,    

अग! पल्लवी ला बरं नाहिये, म्हणून तिला दवाखान्यात भरती केलय. काय झालं? काय नाही? समजायच्या आत पल्लवीला देवाज्ञा झाली.

एका समस्येतून स्वतः ला सांभाळतच होती तर, दुसरी समस्या समोर उभी. पल्लवी ची दोन लहान मुलं, जावयी आणि अर्ध्यावर संसार सोडून पल्लवी गेली.

कधी कधी देवालाही प्रश्न विचारावेसे वाटतात. असं का? कशासाठी एवढी शिक्षा? एक साधारण जीवन जगणारा माणूस अशी एवढी मोठी कोणती चूक करतो? की ही अशी शिक्षा? ग्रहांचा एवढा प्रभाव, एवढी वक्रदृष्टी?? की ज्या दिवशी देवाने रमाची पत्रिका लिहायला घेतली, त्यादिवशी देवाचा मूड ठीक नव्हता.? की मागच्या जन्माचे भोग? हे तर आपल्या समजण्याच्या पलीकडचे प्रकरण आहे.

देवाचा हा हिशेब आजपर्यंत कोणालाच कळला नाही. त्याची आज्ञा मानन्या पलीकडे आपल्या समोर दुसरा काही पर्यायही नसतोच.

 Sometimes you have to accept the facts that certain things will never go back as they used to be.

 परिस्थिती माणसाचा स्वभाव बदलते. कधी माणूस हताश होऊन देवाला, आपल्या भाग्याला कोसतो, तर कधी आपण बघतो 

 Strong men don’t complaint. They adjust, adapt and conquer the situation.

रमा म्हणजे असच एक strong व्यक्तिमत्व.

ती नेहमी म्हणते,    

 Always Remember life in front of you is more important than the life behind you.

पुन्हा एकदा गाडी रूळावरून घसरली. अशा वेळेस प्रत्येक दिवशी एक नवीन परीक्षा असते. Head of the family म्हंटल्यावर तसं वागायची जबाबदारी पण असतेच.

प्रोब्लेम सगळ्यांनाच असतात फक्त त्या प्रोब्लेम मधून बाहेर पडायला भावना, वास्तविकता, समोर उभी असलेली परिस्थिती यांचे विश्लेषण करत दररोज या परिस्थितीत काय महत्वाचे आहे? याचा विचार करून भावनांवर कंट्रोल करता आला पाहिजे. हे तेवढं सोपं काम नाही. त्याकरिता आपल्या पेक्षा दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करावा लागतो.

. Strong people never accept the definition of life from others. They say,    

 It is my life. I will define it as per requirements of my family.

रमाने पुन्हा एकदा धैर्याने परिस्थिती ला तोंड दिलं. यावेळेस एक नाही दोन दोन परिवारांना सांभाळलं.

काळ कोणत्याही परिस्थितीवर औषध आहे. हे खरंय.

जसजसा काळ पुढे सरकत होता, पल्लवी ची मुलं मोठी झाली.

आज तर शिक्षण संपवून चांगल्या नोकरीत आहेत.

कोणतेही प्रोजेक्ट कसे successfully पूर्ण करावे? हे कोणीही रमा कडून शिकावे.

मधल्या काळात रमाच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच झलक मला दिसली.

अनुजाच्या जन्मानंतर, दुसऱ्या बाळासाठी इच्छा असूनही अजय अनिता दोघे दुविधेत होते.

घरात सर्वच नोकरी करणारे, मग नवीन छोट्या बाळाला कोण सांभाळेल?

यावर चर्चा होताना, रमाने सहजच निर्णय घेतला.

म्हणाली,     

अग! अनिता, मी सोडते ना नोकरी. आता माझी पेंशनेबल नोकरी झालीय. मी लक्ष देईन घराकडे, बाळाकडे. अनुजा ला एक बहिण/ भाऊ नक्की असू दे. अग! काळजी करू नका. मैं हून ना!

हा नोकरी सोडण्याचा निर्णय एवढा सोप्पा होता का? पण अगदी सहजपणे रमाने घेतला. रमा सारख्या लोकांचे विचार vision खूप क्लीअर असतात.

म्हणतात ना,

हम क्या करते इसका महत्व तो हैं ही । परंतु हम किस भाव से करते हैं? इसका महत्व अधिक हैं।

खरंय,

Family is not about blood, It is who is willing to hold your hand when you need to hold it.

आज आम्ही दोघीही सिनियर सिटीझन आहोत. आजही रमाच्या उत्साह बघण्यासारखा आहे. घर, जबाबदारी, त्याचबरोबर आपले छंद जोपासणे याचे गणित/ तालमेल जमत तिला.

मैत्रिणींचा खूप जमावडा नसला तरी चालतो. रमा सारखी एक मैत्रिण म्हणजे माझ्यासाठी लॉकर मध्ये ठेवण्यासारखा मुल्यवान ठेवा आहे.

आम्ही दोघी एकाच वयाच्या मैत्रिणी असलो, तरीही मला तिच्या बद्दल खूप आदर आहे.

Thank you Rama for being with me.

I always enjoy company of People who introduce you to new ways of thinking and new ways of seeing life. They are always very important for me.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वतःला पृथ्वीशी जोडणे… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ स्वतःला पृथ्वीशी जोडणे… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

स्वतःला पृथ्वीशी जोडणे, ज्याला आधुनिक भाषेत ‘अर्थिंग’ (Earthing) किंवा ‘ग्राउंडिंग’ (Grounding) असेही म्हणतात, हे केवळ आध्यात्मिक नसून वैज्ञानिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपल्या शरीरात सतत जैविक-विद्युत क्रिया (Bio-electrical activities) सुरू असतात. जेव्हा आपण पृथ्वीच्या थेट संपर्कात येतो, तेव्हा त्याचे आपल्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:– – – 

१. शरीरातील सूज (Inflammation) कमी करणे

आपल्या शरीरात चयापचय क्रियेमुळे ‘फ्री रॅडिकल्स’ तयार होतात, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. पृथ्वीवर मुक्त इलेक्ट्रॉन्सचा (Negative charge) अफाट साठा असतो. जेव्हा आपण अनवाणी पायाने जमिनीवर चालतो, तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि फ्री रॅडिकल्सना संतुलित करतात. यामुळे जुनाट आजार आणि सूज कमी होण्यास मदत होते.

२. तणाव आणि स्ट्रेस कमी करणे

पृथ्वीशी जोडले गेल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल (Cortisol) या स्ट्रेस हार्मोनची पातळी नियंत्रित राहते. यामुळे मानसिक शांतता मिळते, चिंता कमी होते आणि आपली मज्जासंस्था (Nervous System) शांत होते.

३. झोपेची गुणवत्ता सुधारणे

ग्राउंडिंगमुळे शरीराचे ‘सर्काडियन रिदम’ (Circadian Rhythm – जैविक घड्याळ) सुधारते. ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांना जमिनीच्या संपर्कात राहिल्यामुळे गाढ आणि चांगली झोप लागते.

४. रक्ताभिसरण सुधारणे

काही संशोधनानुसार, अर्थिंगमुळे रक्ताची चिकटपणा (Viscosity) कमी होतो. यामुळे रक्त पातळ राहण्यास आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

पृथ्वीशी कसे जोडून घ्यावे?

स्वतःला ग्राउंड करण्यासाठी तुम्ही खालील साध्या गोष्टी करू शकता:

 अनवाणी चालणे : गवत, माती किंवा वाळूवर किमान १५-२० मिनिटे अनवाणी चालावे.

 बागेत काम करणे : झाडांना पाणी देणे किंवा मातीशी संपर्क येईल अशी कामे करणे.

 नैसर्गिक पाण्यात पोहणे : समुद्र किंवा नदीच्या पाण्यात पोहणे हे ग्राउंडिंगचा एक उत्तम मार्ग आहे.

 पृथ्वी कडुन ऊर्जा मिळवणे हे मेडिटेशन करणे

आपल्याला पंचमहाभूतां कडून ऊर्जा मिळत असते. कारण आपणही निसर्गाचाच एक घटक आहोत.

आपण मदर अर्थ अर्थात पृथ्वी माता कडून ऊर्जा कशी मिळवायची हे बघणार आहोत.

– – सिमेंटचे रस्ते किंवा लाकडी फरशीवरून चालल्याने अर्थिंग होत नाही, कारण ते विद्युतरोधक असतात. नैसर्गिक माती किंवा गवत हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

थोडक्यात सांगायचे तर, आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. आधुनिक जीवनशैलीत आपण रबरी चपला आणि सिमेंटच्या घरांमध्ये अडकल्यामुळे हा संपर्क तुटला आहे. तो पुन्हा जोडणे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ‘नॅचरल हीलिंग’ (Natural Healing) सारखे काम करते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कोंडीबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “कोंडीबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉन्व्हेंट स्कूलच्या (Convent School) प्रिन्सिपलच्या केबिनबाहेर पालकांची रांग लागली होती. सगळे श्रीमंत, सुटाबुटातले पालक आपल्या मुलांच्या ॲडमिशनसाठी आले होते. एसी असूनही तिथे पालकांचा रुबाब आणि परफ्युमचा वास दरवळत होता…!

तेवढ्यात तिथे एक माणूस आला. ,

नाव त्याचं कोंडिबा‘…

कोंडिबाची अवस्था बघून ;सगळ्यांनी नाकाला रुमाल लावला…!

त्याचे कपडे… गटारातल्या काळ्या पाण्याने माखले होते. , अंगाला एक तीव्र आणि मळमळणारा 

घाणेरडा वास येत होता…! पायातले बूट फाटलेले होते आणि हातात… एक प्लास्टिकची पिशवी होती…!

तो पालिकेत गटार साफ करणारा‘… (Manual Scavenger) कामगार होता…!

तो केबिनच्या दारात उभा राहिला. तिथे उभ्या असलेल्या एका श्रीमंत पालकाने मिस्टर देशमुखांनी, शिपायाला ओरडून सांगितलं,

अहो, हे काय चाललंय…? या भिकाऱ्याला आत कसं येऊ देता…? किती घाण वास येतोय त्याचा… त्याला बाहेर हाकला, आमची मुलं इन्फेक्शनने आजारी पडतील. “

कोंडिबाने मान खाली घातली… , तो दरवाजाच्या बाहेरच कोपऱ्यात उभा राहिला…!

शिपाई त्याला म्हणाला,

ए कोंडिबा, तुला सांगितलंय ना, शाळा सुटल्यावर येत जा. आता साहेब मिटिंगमध्ये आहेत.

चल निघ. “

कोंडिबा काकुळतीने म्हणाला,

दादा, फक्त दोन मिनिटं… मला परत कामावर जायचंय… , आज शेवटची तारीख आहे फी भरण्याची. ,

जर आज पैसे भरले नाहीत, तर त्या पोरीचं वर्ष वाया जाईल…! “

हे ऐकून देशमुखांना हसू आलं.

काय रे…? तू गटार उपसणारा… तुझी पोरगी या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणार..? आरशात तोंड बघितलंस का…? सरकारी शाळेत टाक की… “

.. तिथे उभ्या असलेल्या इतर पालकांनीही कुत्सितपणे हसून त्याला अपमानित केलं…!

तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडम बाहेर आल्या… ,

त्यांनी कोंडिबाला पाहिलं आणि त्या रागात असतील असं सगळ्यांना वाटलं…

पण प्रिन्सिपल मॅडम धावत कोंडिबाच्या जवळ गेल्या. त्या घाणेरड्या कपड्यातल्या कोंडिबाला त्यांनी वाकून नमस्कार केला…!

सगळे पालक शॉक झाले.

मॅडम म्हणाल्या, “या कोंडिबा भाऊ… आत या. “

कोंडिबा लाजत म्हणाला,

नको मॅडम, आतली कार्पेट खराब होईल. मी इथेच बाहेरून पैसे देतो… “

त्याने आपल्या मळक्या पिशवीतून चुरगळलेल्या,

दमट झालेल्या १००-५० च्या नोटा आणि काही चिल्लर टेबलवर ओतली…!

मॅडम, हे घ्या १५ हजार रुपये, मोजून घ्या, त्या गौरीची फी आहे… “

मिस्टर देशमुखांना राहवलं नाही. ,

त्यांनी विचारलं, “मॅडम, हा गटार साफ करणारा… आणि याची मुलगी गौरी तुमच्या शाळेत शिकते..?

आणि तुम्ही याला इतका मान का देताय…? “

प्रिन्सिपल मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं. ,

त्या म्हणाल्या :

“मिस्टर देशमुख, तुम्हाला माहित आहे का की, हा माणूस कोण आहे…? ज्या गौरीची फी भरण्यासाठी हे आलेत, ती यांची सख्खी मुलगी नाहीये.. , ती एक अनाथ मुलगी आहे…! १० वर्षांपूर्वी कोंडिबाची स्वतःची मुलगी, ‘सखू’, डेंग्यूने वारली, कारण त्यांच्या वस्तीत गटार तुंबलं होतं आणि उपचाराला पैसे नव्हते…!

त्या दिवशी कोंडिबाने शपथ घेतली की, ‘आज पैशावाचून माझी पोरगी गेली, पण यापुढे माझ्या वस्तीतल्या कोणत्याही अनाथ मुलीचं शिक्षण पैशावाचून थांबणार नाही…! ” 

– – गेली १० वर्षे हा माणूस… रोज सकाळी ६ वाजता गटारात उतरतो…! तुमच्या-आमच्या घरातली घाण साफ करतो. , त्याबदल्यात त्याला जे तुटपुंजे पैसे मिळतात, त्यातले स्वतःला वडापाव खाण्यापुरते पैसे ठेवतो ;आणि बाकीचे सगळे पैसे साठवून… आपल्या शाळेतल्या ५० अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलतो…!

.. तुमच्या अंगाला महागडा परफ्युम आहे, पण तुमचे विचार संकुचित आहेत…! आणि याच्या अंगाला गटाराचा वास आहे, पण याचं मन चंदनापेक्षा सुगंधी आहे…! तुम्ही स्वतःच्या मुलासाठी फी भरता,

आणि हा माणूस दुसऱ्यांच्या मुलांसाठी आयुष्य गटारात घालवतोय. “

हे ऐकून तिथे स्मशानशांतता पसरली…

देशमुखांची मान शरमेने इतकी खाली गेली की, त्यांना कोंडिबाकडे बघायची हिंमत होत नव्हती..!

कोंडिबा फक्त हसला, हात जोडले आणि म्हणाला :

साहेब, वास पोटाला नसतो, वास कामाला नसतो.. वास फक्त माणसाच्या विचारांना असतो…!

माझी पोरं शिकली, तर ती गटारात नाही, मोठ्या खुर्चीवर बसतील, यातच मला स्वर्ग मिळतो..! “

त्या दिवशी त्या एसी ऑफिसमध्ये कोंडिबाचा तो घाणेरडा वाससगळ्यांना पवित्र वाटू लागला…! माणूस काय काम करतो…??? यावरून त्याची उंची मोजू नका, तो ते काम कोणत्या उद्देशाने करतो, हे महत्त्वाचं आहे…! समाजसेवा करण्यासाठी खिसा नाही, तर काळीज मोठं असावं लागतं…! कोणाच्या मळक्या कपड्यांना नावं ठेवण्याआधी, त्याच्या स्वच्छ मनाला ओळखायला शिका…!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कपडे वाळत घालताना…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “कपडे वाळत घालताना…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

कपडे वाळत घालणं…दिसायला किती साधं काम! रोजच्या जगण्यातलं, सहज केलं जाणारं. पण कधी बारकाईने पाहिलंय का—बाई कपडे कसे वाळत घालते, यावरून तिच्या स्वभावाचीही थोडीशी झलक दिसते.

कुणी कपडे एकसारखे ताणून, अगदी सरळ रेषेत वाळत घालते. कुठे सुरकुती नको, एक कपडा दुसऱ्यावर नको. रंगांचीही एक वेगळीच मांडणी असते. तिच्या जगण्यातही कदाचित प्रत्येक गोष्टीला एक जागा असते… प्रत्येक कामाला एक क्रम असतो. विस्कटलेपण तिला फारसं रुचत नसावं.

कुणी मात्र हातात येईल तो कपडा घेते आणि वाऱ्यावर सोपवून देते.“वाळला म्हणजे झालं!”तिच्यासाठी नीटनेटकेपणापेक्षा काम पूर्ण होणं महत्त्वाचं असतं. आयुष्याकडेही ती कदाचित तसंच पाहत असावी—सगळं मनासारखं, आखीव-रेखीव असण्याची गरज नाही; प्रवास पुढे सुरू राहिला पाहिजे.

कुणी कपडे वाळत घालताना आधी ऊन कुठे आहे, वारा कुठून येतोय, पाऊस येण्याची शक्यता आहे का, हे पाहते.तिच्या या छोट्याशा कृतीतही आयुष्याचा मोठा धडा असतो—परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे बदलत नाही; आपण परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यायचं असतं.

कुणी कपडे इतक्या जपून पसरते, जणू त्या प्रत्येक कपड्यात एखादी आठवण गुंडाळलेली असते. मुलाचा छोटासा शर्ट, नवऱ्याचा आवडता कुर्ता, स्वतःची एखादी साडी… कपडे तिच्यासाठी फक्त कपडे नसतात; त्यांना स्पर्श करताना तिच्या आयुष्यातले कितीतरी क्षण हाताला लागून जातात.

आणि काही स्त्रिया असतात…ज्या स्वतःचे कपडे शेवटी वाळत घालतात.

आधी मुलांचे, मग नवऱ्याचे, मग घरच्यांचे…सगळ्यांचे कपडे उन्हात व्यवस्थित पसरले की शेवटी स्वतःची एखादी साडी किंवा ओढणी त्या दोरीवर जागा शोधत असते.

कदाचित हीच तर तिच्या आयुष्याची गोष्ट असते—सगळ्यांसाठी जागा करून देताना स्वतःसाठी जागा थोडी उशिरा उरते.

कपडे वाळत घालताना कधी एखादा कपडा वाऱ्याने खाली पडतो. पुन्हा उचलावा लागतो. धूळ लागली असेल तर पुन्हा धुवावा लागतो.

आयुष्यही असंच नाही का?

कितीही जपून ठेवलेली नाती कधी वाऱ्याने हलतात…कितीही नीट आखलेले दिवस अचानक विस्कटतात…काही माणसं हातातून निसटून जातात…काही स्वप्नांना धूळ लागते…

पण आपण पुन्हा ते उचलतो. झटकतो. गरज पडली तर पुन्हा धुतो… आणि पुन्हा उन्हात टांगतो.

कारण जगणं थांबवता येत नाही.

कपडे वाळत घालताना आणखी एक गंमत असते. ओले कपडे जड असतात. पण तेच कपडे उन्हात काही वेळ राहिले की हलके होतात.

मनाचंही तसंच असावं कदाचित.

मनात साठवलेल्या काळज्या, दुःखं, अपेक्षा, नाराजी… सगळं ओलं असताना खूप जड वाटतं. पण ते थोडं वेळेच्या उन्हात, अनुभवाच्या वाऱ्यात आणि स्वीकाराच्या मोकळ्या आकाशाखाली ठेवलं की त्याचं ओझं कमी होत जातं.

म्हणूनच कदाचित कपडे वाळत घालणं ही फक्त घरकामाची कृती नसते.

ती एका स्त्रीची रोजची छोटीशी जीवनशाळा असते.

कपडे सरळ करताना ती कदाचित स्वतःलाही सावरत असते.सुरकुत्या काढताना आयुष्यातल्या सुरकुत्यांवरही हात फिरवत असते.वाऱ्यावर कपडे सोडताना काही गोष्टी नशिबावर सोडायला शिकत असते.आणि संध्याकाळी कोरडे कपडे गोळा करताना दिवसभरात स्वतःमध्ये साठलेलं काहीतरी पुन्हा घडी करून ठेवत असते.

म्हणून पुढच्या वेळी एखादी बाई कपडे वाळत घालताना दिसली, तर फक्त एवढंच पाहू नका की ती कपडे कसे टाकतेय…

कदाचित त्या कपड्यांच्या मांडणीत तिची शिस्त असेल,तिचा स्वभाव असेल,तिचं प्रेम असेल,तिचा थकवा असेल,तिची स्वप्नं असतील…

आणि सगळ्यात महत्त्वाचं—तिचं आयुष्याकडे पाहण्याचं एक शांत, अबोल तत्त्वज्ञान दडलेलं असेल.

कारण बाई कपडे फक्त वाळत घालत नसते…

ती रोजच्या रोज आपल्या आयुष्याची घडी घालत असते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ श्रावण आणि सण… ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

स्वाती विकास गाडेकर

? क्षण सृजनाचे ?

☆ ‘‘श्रावण आणि सण…’ ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

वरील कविता लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या सर्वांसाठीच असलेला बिकट करोना काळ मुख्यत्वे कारणीभूत आहे. त्या वेळी आलेला श्रावण महिना हा खूपच वेगळा, असुरक्षित आणि भीतीदायक होता.

लहानपणापासून जो आनंद श्रावण महिन्यात अनुभवला होता त्याची आठवण तेव्हा अगदी बेचैन करत होती. त्या बालपणीच्या आठवणींमुळेच ह्या कवितेचा जन्म झाला.

ही कविता लिहिणे म्हणजे थोडक्यात बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे आणि प्रत्यक्ष नाही परंतु कवितेच्या माध्यमातून स्वतः आणि आप्तजनांना ह्या पवित्र महिन्याचा अनुभव घडवणे हाच एक उद्देश्य होता.

 श्रावण अणि सण

आला श्रावण महिना..

सणासुदीने सजलेला!!

देवधर्म व्रतवैकल्याने भरलेला..

पुजाअर्चेने न्हाऊन निघालेला!!

 *

पहा उन्ह पावसाचा मेळ..

सोबत इंद्रधनुष्याचा खेळ!!

 *

सणांसोबत सोमवार शनिवार..

जिवतीची पूजा करा दर शुक्रवार!!

 *

तांदूळ, तीळ, मूग आणि जवस..

शिवामूठ वाहू सोमवारी शिवास!!

 *

आल्या सासुरवाशीणी माहेरी..

सण साजरे कराया आईच्या घरी!!

 *

हिंदोळा🎡 बांधला चिंचेच्या झाडाला..

माहेरवाशिणी लागती झुलायला!!

 *

माहेरची ती मजाच और..

सुवासिनी पूजिती मंगळागौर!!

 *

नागपंचमीचा 🐍सण आला..

चला रानी नागोबा पुजायाला!!

 *

नारळी पौर्णिमा🌕 आली ग बाई..

भावाला बांध राखी ग ताई!!

 *

कृष्णाष्टमीस उपवास धरावा..

गोपाळकाला साजरा करावा!!

 *

उपासतापास गोडधोड..

मुलाबाळांच्या रेलचेलीस नाही तोड!!

 *

मजा घेत श्रावण ⛈️सरींचे..

हितगुज ते गोड आठवणींचे!!

 *

असा श्रावण महिना मानाचा..

आनंद आणिक सुख देण्याघेण्याचा!!

 

© स्वाती विकास गाडेकर

ए१०२, गगनगिरी सोसायटी, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, ४००७०३ मो ९८३३७००५७१

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अहिंसक आंदोलनाचे आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील मोल…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “अहिंसक आंदोलनाचे आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील मोल…☆ श्री जगदीश काबरे ☆

“दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल” हे गीत काव्यात्मक आणि राजकीय प्रतीक म्हणून महत्त्वाचे आहेच; मात्र त्यालाच फक्त स्वातंत्र्याचा इतिहास मानणे चुकीचे ठरेल. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला व्यापक आव्हान दिले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लाखो सामान्य लोकांनी तुरुंगवास, लाठीमार, आर्थिक नुकसान आणि सामाजिक दडपशाही सहन केली. हे आंदोलन केवळ चरखा फिरवण्याचे आंदोलन नव्हते. मिठाचा सत्याग्रह, परदेशी मालावर बहिष्कार, कर न भरणे, संप, निदर्शने आणि ब्रिटिश प्रशासनाशी असहकार या सर्वांचा त्यात समावेश होता. त्यामुळे गांधीवादी संघर्षाचे प्रतीक म्हणून चरख्याचा उल्लेख करणे आणि संपूर्ण स्वातंत्र्यलढा चरख्यापुरता मर्यादित करणे यात मोठा फरक आहे हे आपल्यासारख्या सुज्ञ माणसांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्याच वेळी, क्रांतिकारकांचे योगदान महात्मा गांधींनीही कधीच नाकारले नव्हते, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. सशस्त्र क्रांतिवीरांचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे प्रयत्न, १९४६ मधील रॉयल इंडियन नेव्ही उठाव आणि जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निर्माण झालेला संताप यांनाही इतिहासाच्या व्यापक चौकटीत स्थान द्यावे लागते.

पण येथे एक महत्त्वाची राजकीय घडामोड लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ब्रिटिशांना क्रांतिकारकांच्या सशस्त्र संघर्षामुळेच भारत सोडावा लागला, असे म्हणणे अतिसुलभीकरण करणे होय. क्रांतिकारकांनी ब्रिटिश साम्राज्याला नैतिक, राजकीय आणि सुरक्षाविषयक आव्हान दिले, हे तर खरेच. त्यांच्या बलिदानाने तरुणांमध्ये राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण केली, हेही खरे. परंतु त्याच काळात दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची आर्थिक व सामरिक परिस्थिती, भारतीय राजकीय जनमत, काँग्रेसचे व्यापक आंदोलन, मुस्लिम लीगचे राजकारण, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया आणि ब्रिटिश साम्राज्याच्या बदललेल्या जागतिक परिस्थिती या सर्व घटकांचा विचार करावा लागतो. याहून महत्त्वाचे म्हणजे, रक्तरंजित इतिहास आणि अहिंसक इतिहास ही परस्परविरोधी विभागणीच चुकीची आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा रक्तरंजितही होता आणि मोठ्या प्रमाणावर अहिंसकही होता. चौरी चौरा, जालियनवाला बाग, क्रांतिकारकांच्या फाशी, पोलिसांचा गोळीबार, तुरुंगातील अत्याचार आणि विविध उठाव हा त्याचा एक भाग आहे; तर सत्याग्रह, असहकार, बहिष्कार, उपोषणे, मोर्चे, जनआंदोलने आणि लाखो लोकांचा अहिंसक सहभाग हा दुसरा भाग आहे. एवंच एका प्रवाहाचे अस्तित्व मान्य करण्यासाठी दुसऱ्याला पुसून टाकण्याची गरज नाही. अन्यथा सेक्युलर विचारसरणी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यात फरक तो काय राहील?

म्हणूनच चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळाले नाही, हे वाक्य अर्धसत्य आहे. कारण चरखा ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करणारे शस्त्र नव्हता; तर तो आर्थिक स्वावलंबन, स्वदेशी आणि जनसहभागाचे प्रतीक होता. त्याचप्रमाणे भगतसिंगांची पिस्तूल किंवा आझाद हिंद सेनेची शस्त्रेही एकट्याने ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करू शकली नाहीत. स्वातंत्र्य मिळवून देणारी शक्ती म्हणजे अनेक दशकांच्या विविध प्रकारच्या प्रतिकाराचा एकत्रित ऐतिहासिक परिणाम होता. म्हणून ध्वजारोहणाच्या वेळी एखादे गांधीवादी गीत वाजवले म्हणजे क्रांतिकारकांचा अपमान होतो, असे सरळ समीकरण मांडणे हे आपल्या देशभक्तीच्या विचाराला संकुचित करते. त्याऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, सावरकर, टिळक, आझाद हिंद सेनेचे सैनिक, नौदल उठावातील सहभागी आणि असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, या सर्वांच्या योगदानाची वस्तुनिष्ठ जाणीव ठेवणे अधिक योग्य ठरेल.

खरा इतिहास कोणत्याही एका महापुरुषाच्या किंवा एका विचारधारेच्या मालकीचा नसतो. भारताचे स्वातंत्र्य हे एका व्यक्तीचे कर्तृत्व नव्हते आणि एका विचार पद्धतीचेही फलित नव्हते; ते विविध विचारांचे, विविध संघर्षपद्धतींचे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात भारतीयांच्या त्यागाचे संचित होते. म्हणून फक्त अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळाले, हे जसे अर्धसत्य आहे, तसेच फक्त सशस्त्र क्रांतीमुळे स्वातंत्र्य मिळाले, हेही अर्धसत्यच आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासाला खरा न्याय द्यायचा असेल तर चरख्याबरोबर क्रांतिकारकांचे रक्त, सत्याग्रहाबरोबर तुरुंगवास, जनआंदोलनांबरोबर सशस्त्र उठाव आणि राजकीय वाटाघाटींबरोबर साम्राज्याच्या अंतर्गत झालेला दबाव, या सर्व घटनांना योग्य ऐतिहासिक संदर्भात पहावे लागेल. असे केले तरच एकांगी विचार न करता स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगेल आणि समजेल. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares