मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग पहिला ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग पहिला ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट! माझे लग्न ठरले आणि माझ्या आजीला नातीला लग्नानंतर दिल्लीला…इतके दूर पाठवावे लागणार या विचाराने रडूच कोसळले.

” जावयांना इकडे बदली करून घ्यायला सांग. तिकडची भाषा वेगळी.लोक वेगळे. त्यांचे रीतीरिवाज… सगळेच वेगळे. वेळ प्रसंगी मदतीची गरज वाटली तर ही बिचारी काय करणार?” तिने बाबांच्या मागे टुमणेच लावले .(तेव्हा आता सारखे घरोघरी फोन, हाता- हातात मोबाईल नव्हते.)

“अगं जावयांचा जॉब ट्रान्सफरेबल नाही.” बाबा आपल्या आईला समजावत होते,” आणि हल्ली या चिमण्या तर नवरोबाबरोबर सातासमुद्रापार पण मजेनं उडून जातात… तिथं दिल्लीची काय कथा? ना पासपोर्ट ना व्हिसा…ठरवलं की एक -दोन दिवसात येथे हजर!..”

माझ्यासाठी म्हणायचं झालं, तर जिने महाराष्ट्राची राजधानी, मुंबई पण पाहिली नव्हती तिला देशाच्या राजधानीत वास्तव्य करायला मिळणार होतं. इतर सगळ्या गोष्टींबरोबर हा एक प्लस पॉइंट पण होता…. अन् भाषेचं काय विशेष? मला एस. एस .सी. ला हिंदीत 75% मार्क मिळाले होते. (तेही त्या वेळच्या कडक मार्किंग सिस्टीममधे!) …मी टिळक विद्यापीठाच्या हिंदीच्या तीन परिक्षातही प्रथम श्रेणी मिळवली होती. आणि हां, हिंदी पिक्चर बघतोच की आपण. छान कळतात ते …मी भाषेच्या बाबतीत थोडी ओव्हर- कॉन्फिडन्टच होते. (तेव्हा महाराष्ट्रात टेलिव्हिजन पोहोचला नव्हता आणि शेंबड्या पोरालासुद्धा हल्ली जसे हिंदीत बोलता येते, तितपत  हिंदीही  कोणाला बोलता येत नसायचे.)

यथावकाश आम्ही दिल्लीला पोहोचलो. ( तिलक ब्रिज की मिंटो ब्रिज ?)  नक्की आठवत नाही, पण ट्रेन तिथे थांबली होती आणि गाडीतून घडलेल्या दिल्लीच्या पहिल्या दर्शनातच मी तिच्या प्रेमात पडले होते.

दुसऱ्या दिवशी घरमालकिणीचा छोटा मुलगा आमच्याकडे आला.  “ऑंटीजी कल आप दोनों के लिये हमारे घर में दावत है .” वह बडा खुश होकर बोल रहा था. “वह सब कुछ मम्मीजी आपको बतायेगीही. लेकिन अभी आप को मम्मीजी ने बुलाया है .थोडी देर के लिये ! अंकल आज घर पर नहीं है नं…”  मी ,उद्या आम्ही दोघं मिळून येऊ असे सांगून नकार देणार होते. पण तो इतक्या गोड आवाजात बोलत होता की मला नाही म्हणवलेच नाही. मिठाईचा एक पॅक घेऊन मी त्या छोट्या बरोबर त्यांच्या घरी गेले आणि त्याच्या आईच्या हातात तो देऊन मी वाकून त्यांना एका हाताने चरणस्पर्श केला.( हिंदी पिक्चर स्टाईल मधे!)

बसल्यावर सगळ्यात प्रथम माझं लक्ष त्यांच्या गळ्याकडं गेलं. ओह्, मंगळसूत्र नाही म्हणजे या विधवा असाव्यात. चार-पाच मुलं मुली मला निरखून पाहत होते.( त्यांना सहा मुली आणि दोन मुलगे आहेत, हे ह्यांनी सांगितल्यावर मला आश्चर्यच वाटलं होतं .पण कुटुंबनियोजनाचा दिल्लीत खूप धज्जा उडवला जातो हे मला नंतर कळले. ) त्यांना एवढयांचं पालन-पोषण एकटीनं करणं ही बाब मला खूप अवघड वाटली. पण घरमालकांची ओळख झाल्यावर मला कळलं की विवाहित स्त्रीनं मंगळसूत्र घालायची तिथे पद्धतच नाही.लग्नानंतर पायात जोडवी घालतात .

“बैठो आराम से ” माझ्या हातात पाण्याचा ग्लास देऊन  ऑंटीजी म्हणाल्या …नंतर हिंदीतून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आणि जमतील तशी उत्तर मी देऊ लागले.

” तुम्हारा पिहर कहा है?”… हा शब्द कधीच वाचनात आला नव्हता.” पिहर मिन्स ?” मी विचारती झाले .त्या सर्वांना माझ्या एकंदरीत सगळ्या बोलण्याचं हसू येत होतं आणि मी नर्वस होऊ लागले होते. “मतलब मायका…. मम्मी का घर.”    मी उत्तर देईपर्यंत पुढचा प्रश्न उपस्थित झाला.

” तुम्हारा दहेज का सामान कहाँ है?”

‘म्हणजे हुंडा’- मी मनात म्हणाले. आणि….हुंडाबंदीसाठी मोठी लेक्चरं झाडणार्‍या मला,  फर्राटेदार हिंदीतून आपलं म्हणणं पटवून देता आलं नसतं, याची जाणीव झाली.. म्हणून  मी प्रथम गप्पच राहिले. पण नंतर हसून मी प्रसंग सावरुन घेतला. मी मनसोक्त थापा मारल्या.

अजी वो सोफासेट, फ्रिज, और हेवी सामान नां? वो और बहूत सारा सामान मैं ससुराल छोड आई हूँ. बहुत दूर का मामला हैं ना इसलिये. सिर्फ थोडीसी ज्वेलरी लाई हूँ. चार -चार सेट दिये है मेरे मम्मी- पापाने. उधर अभी टीव्ही पहूँचा नही है, तो उसके पैसे भी दिये है उन्होंने.”– आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.

क्रमशः—-

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

तुकारामांनी म्हटलेली ही कळवळ्याची जाती, काही माणसे उपजतच घेऊन येतात. ते त्यांच्या सहजवृत्तीतूनच होते.

माझा भाचा आदित्य हा त्यातलेच एक उदाहरण. 

किती लहान होता तो. एक दिवस घरी आला आणि म्हणाला,” मला लवकर खायला दे, खूप भूक लागलीय. “

आई म्हणाली, ‘ डबा नाही का खाल्लास? ” तर काहीच बोलेना.

एवढ्यात शेजारचा  कुशल आला. ” म्हणाला काकू ,आज ना,डबा खायच्या सुट्टीत गंमतच झाली. आम्ही डबा खायला सुरवात करणार, इतक्यात बागेला पाणी देत असलेला माळ्याचा मुलगा चक्कर येऊन पडला आदित्य लगेच उठून गेला. तो मुलगा उपाशी होता,सकाळपासून. 

अहो,आदित्यने स्वतःचा डबाच देऊन टाकला त्याला. आम्ही नाही बाबा दिला.’

आदित्य तरी गप्पच होता.आदित्यला काकू रागावत नाहीत,हे बघून कुशल निघून गेला. 

स्वातीने त्याला पोटाशी धरले. ” आदित्य,खूप गुणी मुलगा आहेस रे. पण कसा निभाव लागेल बाबा तुझा या जगात…. ? “

आदित्यचे  छंदही जगावेगळेच होते. एक दिवस कचरा पेटीजवळ कुडकुडत असलेले कुत्र्याचे पिल्लू घेऊन आला. वर आईला म्हणाला,” आई रागावू नकोस ना. माझ्या वाटणीचे दूध आणि पोळी त्याला दे.” 

ते पिल्लू काय मग—घरचेच झाले. रोज आदित्यची रिक्षा आली की पळत पळत रिक्षामागे धावायचे. तो शाळेतून यायची वेळ झाली की असेल तिथून येऊन पायरीवर वाट बघत बसायचे. 

त्यांच्या घरातल्या कामवाल्या बाईला हा भांडी घासायला मदत करायचा. तिच्या मुलाला शिकवायचा. त्याचा अभ्यास घ्यायचा. अजूनही तो मुलगा– गणेश हे विसरला नाही. 

म्हणतो,” आदित्य दादामुळे मी शिकलो. नाहीतर बसलो असतो असाच, वाईट संगतीत. 

आदित्यदादामुळे मी  graduate झालो. किती वेळा गुपचूप माझी फी भरलीय त्यांनी—

माझी  मुलगी पण लहानपणी जगावेगळीच होती. सगळ्या जगाचा तिला कळवळा. तिचा आवाज अतिशय सुंदर म्हणून मी तिला गाण्याच्या क्लासलाही घातले होते शाळेतला गाण्याचा कोणताही कार्येक्रम श्रुतीशिवाय व्हायचाच नाही. एकदा शाळेतून गाण्याच्या बाईंचा निरोप आला, ” येऊन भेटा.”– मी गेले भेटायला. त्या म्हणाल्या,” श्रुती यावेळी भाग घेणार नाही म्हणते. असे का? ती असे कधी करत नाही.” 

घरी आल्यावर मी विचारले तर म्हणाली, “आई, बाईंनी, माझ्या पट्टमैत्रीण गौरीला गाण्यातून काढून टाकले. तिला किती वाईट वाटले असेल अग. मग तिच्याशिवाय मी कशी घेऊ भाग ?”

मी कपाळाला हात लावला–‘ देवा।कसे होणार या मुलीचे पुढे आयुष्यात.’

एकदा तर तिने कळस केला. 

गणितात हिला १00 पैकी १00 मार्क मिळाले. आणि तिची मैत्रीण कमी मार्क मिळाले म्हणून रडत होती. हिने बाईना सांगितले, ” बाई,माझ्यातले 10  मार्क द्या ना अनुजाला, म्हणजे तिचे मार्क वाढतील.” 

या असल्या स्वभावाची तर मला चिंताच वाटू लागली पुढे पुढे.

एकदा म्हणाली, ” तुम्ही दोघेही डॉक्टर आहात ना, मग माझ्या शाळेत शिबिर घ्या की. 

आमच्या शाळेतल्या गरीब शिपाई आणि शिपाईबाईना कोणीच तपासत  नाही. “

 आम्हाला तिचे इतके कौतुक वाटले. आम्ही तिच्या शाळेत खरोखरच फक्त सेवक वर्गासाठी शिबिर घेतले. मुख्याध्यापक बाईनी श्रुतीचे त्यासाठी मुद्दाम आभार मानले. पण ही शांत बसली होती. तिला ना गर्व, ना आपण फार काही केल्याचा अभिमान—-

आणि हे स्वभाव कायम राहतात. तीव्रता कमी जास्त होते,पण जात मात्र नाहीत. अर्थात ही माणसे इतकी सरळ असतात–सुदैवाने त्यांचे काही वाईटही होत नाही म्हणा. 

पण मग पुढे, लबाड जगात, माणसे ओळखायची कला यांना येत नाही. अनपेक्षित फटके बसले, की कळवळतात. पण धडे कुठे घेतात ?नाहीच। मूळ स्वभाव जात नाही.

यथावकाश श्रुतीचे लग्न झाले. अगदी लाखात एक नवरा मिळाला, आणि परदेशात निघूनही गेली एकदा भारतात सुट्टीवर आले होते दोघे. सहज बोलताना जावई म्हणाला, ” तुमची मुलगी वेगळीच आहे हो।” 

म्हटले ‘ बाप रे,आता काय ऐकावे लागतेय.’

म्हणाला, ” हिचा गेल्यागेल्या लगेचच वाढदिवस होता. तर मी विचारले पार्टीला कोणाकोणाला बोलवायचे ग .तर गप्पच बसली. मग म्हणाली,पार्टी बिर्टी नको. मला इथला अनाथ मुलांचा आश्रम दाखव. आपण त्या  मुलांच्यात सबंध दिवस घालवू. त्यांना खाऊ पुस्तके, गिफ्टस देऊ. 

चालेल ना तुला ? “

त्याला इतका अभिमान वाटला तिचा. तो दिवस त्यांनी अक्षरशः एन्जॉय केला त्या मुलांबरोबर. 

आता दरवर्षी ते त्या आश्रमातच आपला वाढदिवस साजरा करतात. 

नंतर  तिला मुलगा झाला. त्याला घेऊनही हे तिकडेच जाऊ लागले, आणि त्याचाही वाढदिवस तिथेच साजरा करू लागले. मुलानेही सही सही आईचा सहृदय स्वभाव उचललाय. तो वेडा तर स्कॉलरशिपचे मिळालेले पैसेही,कोण्या गरीब मुलाची फी भरून खर्च करून टाकतो.

‘ कुठून येते हे?’–मला खूप आश्चर्य वाटते. आता  माझा भाचा आदित्य मोठा झालाय. खूप छान नोकरी आहे त्याला बोटीवर. परवा आला होता तर अंध शाळेत गेला, आणि खूप मोठी रक्कम त्या मुलांना लॅपटॉप घेण्यासाठी देऊन आला.म्हणाला,” मला शक्य आहे म्हणून पैसे दिले

डोळे तर नाही ग देऊ शकत.” 

आमचे डोळे नुसते भरून आले. केवढे हे मोठे मन. 

आपल्या तुकोबा माउलींनी तर ही जात केव्हाच ओळखली होती हो. किती द्रष्टे असतील तुकोबा—-म्हणूनच म्हणून गेलेत —

ऐसी कळवळ्याची जाती

करी लाभावीण प्रीती.

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सिंधुसागर ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ सिंधुसागर ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कै. सिंधुताई सपकाळ

नवे वर्ष सुरु झाले आणि एका ध्यासपर्वाचा अस्त झाला. मन उदास झाले.नकळत एक पोरकी पोकळी मनात जाणवू लागली.

मृत्यु हे अंतीम सत्य आहे. राम गेले, कृष्ण गेले ,अनेक विभूतीअनंतात विलीन झाल्या..जणू पृथ्वीतलावरचे त्यांचे अवतार कार्य संपले आणि ते निघून गेले.

सिंधुताईंच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल.

“..यांनी त्यांचे जीवन अर्पिले हो….”नकळत हेच उद्गार ओठावाटे बाहेर पडतात.

सिंधुताईंचा अचेतन ,शांत देह पाहतांना ,क्षणभर वाटले,या डोहातून शब्द झंकारताहेत…

“देखना एक दिन वक्ख्त भी तेरा गुलाम होगा।

मंझीले उन्हीको मिलती है, जिनके सपनोमे जान होती है..।।

संघर्षमय जीवनात त्यांनी  चैतन्यमय स्वप्ने उराशी बाळगली…

त्यांचं बाळपण खडतर..यौवनात अवहेलना..

ऊपेक्षा ,लाथाडणं ,वणवण ,पायात काटे अन् डोक्यावर प्रखर उन हीच तिच्या जीवनाची खडबडीत वाट…पण ती चालली.निर्धाराने.धडाडीने.तिची जिद्द ,तिचा विश्वास,आणि धुक्यातली तिची स्वप्नं ,आणि नारीशक्ती हेच भांडवल.डोळ्यातून गळलेला एकेक अश्रु तिने जपून ठेवला .कारण त्या अश्रुंची तिला फुले करायची होती…त्या अश्रुंतूनच निर्माण झाले विचारांचे मोती..जे तिला मिळालं नाही त्या प्रेमाचे मोती तिने  उपेक्षित ,अत्याचारित,नाकारलेल्यांवर मनसोक्त उधळले…त्या अनाथांची ती माय झाली..

निराधारांची आधारस्तंभ बनली..

एक गर्भवती स्त्री गोठ्यात एका बालिकेला जन्म देते..दगडाने ठेचून तिची नाळ कापते..स्मशानातल्या चितेवर भाकरी भाजून स्वत:च्या दुग्धधारा  जपते अन् आतल्या आत धुमसते ,पेटते ..एका युद्धासाठी तयार होते.

तिचं सोसणं तिला संपवत नाही तर घडवतं.

बळ देतं ,ताकद देतं..न्याय कुणाकडे मागायचा..

आपणच आपल्या जन्माचा न्याय करायचा ,या प्रेरणेने तिची कूसच रुंदावते…

ती एकाचीच नव्हे तर हजारो मुलांची माय बनते..

त्यांच्यासाठी  शिक्षणाची मोट बांधते.स्वावलंबनाची कास धरते.तिच्या वक्षातला पान्हा मग सागर बनतो..प्रेमाचा सिंधुसागर…..

सागर आटत नाही…

आज देहाने सिंधु अस्तित्वात नाही..

पण या सागरातल्या एकेका थेंबात तिचे अस्तित्व आहे…

बुडे तो सूर्य ऊरे तो आभास..

ज्याला नाही ठाव ते तर आभाळ…

आणि या आभाळमायेपुढे सदैव नतमस्तक…

एक प्रेममय ,सुखमय,शांतीमय समभावी समाज

निर्माण करण्याच्या निर्धाराचं सुगंधी फुल सिंधुचरणी वाहून श्रद्धांजली अर्पित….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 6 ☆ श्री सुधीर गाडगीळ

श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 6 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

बर्मिगहॅमला मुलाखतींच्या राज्यात शिरण्यापूर्वी चंदू बोर्डे, नाना पाटेकर यांच्यासह क्रिकेटदेखील खेळलोय. त्या वेळी बॅटिंग करत होते श्रेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर. वयाचं- कर्तृत्वाचं अंतर असूनही सी. रामचंद्र गळ्यात हात टाकून, गाण्यांच्या जुन्या आठवणी जागवताना मजजवळ फोटो आहे. कन्नडभाषी सुधा मूर्ती स्वच्छ मराठीत कोल्हापुरात माझ्या गप्पाष्टकात सहभागी झाल्यात आणि पुण्यातल्या दर्शन हॉटेलमध्ये नारायण मूर्तीशी झालेल्या नमनाच्या भेटी त्यांनी खुलवून सांगितल्यात. विजय तेंडुलकरांशी गुन्हेगारी जगतावर बोलण्यात रमलोय.

आता माझ्या मुलाच्या वयाचे सारे स्टार्स आहेत. विश्वजीत कदम, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख असे राजकारणात आहेत. तर राहुल- महेश काळे, शौनकसारखे गायक गाजतायत. या नव्या पिढीसमवेतही माझे सूर जुळलेत. नुकतंच दुबईला महेश-राहुलशी गप्पा मारत, सुबोध भावेला आठवत आम्ही ‘पाडवा’ साजरा केला.

जाता जाता एक सांगतो मला अजिबात न आवडणाऱ्या माणसांची मुलाखत घ्यायची वेळ आली तरी मी टाळत नाही. कारण त्या निमित्ताने माझं ‘न’ आवडणं, हे गैरसमजावर आधारित आहे का, हे तपासता येतं आणि माझी चूक असेल तर माझीच मनातली ‘मतं’ पुसून टाकून, मैत्र वाढवता येतं. जॉर्ज फर्नाडिस ते बाबामहाराज सातारकर, सिंधुताई सपकाळ ते निर्मलाताई पुरंदरे, पु. भा. भावे ते अनिल अवचट अशा परस्पर टोकाच्या मतप्रणालींशी झालेला संवाद सांगणं म्हणजे स्वतंत्र ग्रंथच होईल. फक्त इथे नोंद घेतो. न नोंदता आलेले हजारभर !

एकच सांगतो, या साऱ्या माणसांशी बोलताना जमा झालेले ‘संदर्भ’ मुलाखतींच्या राज्यात उपयोगी पडलेत आणि संदर्भाची सतर्कता, बोलण्यातली अनौपचारिकता, मांडणीतली उत्स्फूर्तता यामुळे ‘माणसं’ मात्र जगभर जोडली गेली आहेत.’ बोलणं आणि माणसं जोडणं हा अदृश्य पाया ‘ हीच माझी सृष्टीआडची दृष्टी आहे. यातूनच निर्मिलेला एक नवा उद्योग सांगतो नि थांबतो. जगभर ‘आय. टी. कपल’ नोकरीनिमित्त गेली आहेत. मी कार्यक्रमाच्या निमित्तानं जगभरच्या या तरुण तंत्रज्ञांना भेटतो. त्यांचे महाराष्ट्रातले आई-वडील गाठतो. एक दिवस या आजी-आजोबांसमवेत गप्पा मारत त्यांची दैनंदिनी चित्रबद्ध करतो आणि हे सारे चित्रण त्यांच्या परदेशात स्थायिक झालेल्या नातवंडांकडे पाठवतो. या ‘पॅकेजिंग ग्रॅण्डपा’ मोहिमेत मी रमलोय. घरातलं कुणी अचानक गेलं तर ग्रुप फोटोमधला फोटो एन्लार्ज करून त्याला हार घातला जातो आणि ‘हारातलाच चेहरा खरा’ असं पुढच्या पिढय़ा समजतात. त्यामुळे चालते, बोलते, हसते, खेळते आजी-आजोबा असतानाच त्यांना कॅमेऱ्यात बोलकं करत पकडून ठेवा; ही सध्या माझी ‘संवाद मोहीम’ आहे. अर्काइव्हल सेन्स असलेल्यांना या चित्रबद्ध संवादाचं महत्त्व नक्की कळेल.

क्रमशः….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आदर्श ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आदर्श ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

एक जण भारतीय लोकशाहीला शिस्त लावणारा तडफदार माजी निवडणूक आयुक्त,  तर दुसरा कोकणरेल्वे, दिल्लीमेट्रो सारख्या चमत्काराचा निर्माता मेट्रो मॅन.– टी.एन.शेषन आणि ई.श्रीधरन— हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात टॉपचे अधिकारी तर होतेच, पण दोघांनीही आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था सुधारून दाखवली.

विशेष म्हणजे हे दोघेही अधिकारी अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून एका वर्गात होते, आणि पहिल्या नंबरसाठी त्यांच्यात तुफान स्पर्धा चालायची.

 ई.श्रीधरन यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या आठवणी सांगितल्या आहेत—–

 दोघेही मूळचे केरळचे. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल मिशन हायस्कूलमध्ये श्रीधरन यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश केला. शेषन आधीपासून त्याच शाळेत होते. वर्गात त्यांचा पहिला नंबर यायचा.

 श्रीधरन यांनी आल्याआल्या त्या वर्षी शेषन यांना मागे टाकले. तिथून या दोघांची स्पर्धा सुरु झाली.  शेषन उंचीला कमी असल्यामुळे वर्गात पहिल्या बेंचवर बसायचे, तर श्रीधरन उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. शेषन हे अतिशय अभ्यासू, कायम पुस्तकात बुडालेले असायचे. याउलट श्रीधरन फुटबॉल खेळायचे. इंग्रजीमध्ये मात्र टी.एन.शेषन यांच्या तोडीस तोड अख्ख्या शाळेत कोणी नव्हतं.

 बोर्डाच्या परीक्षेत शेषन यांनी श्रीधरन यांना १ मार्काने मागे टाकलं. १९४७ सालच्या ssc बोर्ड परीक्षेत शेषन ४५२ मार्क मिळवून पहिले आले, तर श्रीधरन यांना ४५१ मार्क मिळाले होते व त्यांचा दुसरा क्रमांक आला होता.

 मार्कांसाठी किती जरी स्पर्धा असली, तरी शेषन आणि श्रीधरन  चांगले दोस्त होते.

पुढे इंटरमीजीएटसाठीदेखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनी एकत्र ऍडमिशन घेतलं. दोघांनी एकत्र झपाटून अभ्यास केला. अख्ख्या मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते दोघेच होते.: पण टी.एन.शेषन यांना आपल्या भावाप्रमाणे आयएएस अधिकारी बनायचं होत.  यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही व मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. श्रीधरन यांनी मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.

पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस बनण्याचं  स्वप्न शेषन यांनी पूर्ण केलं. याच काळात श्रीधरन हे इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेस एक्झाम पास होऊन रेल्वेमध्ये भरती झाले. 

 योगायोग असा की दोघेही ट्रेनिंगच्या निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज, डेहराडून, येथे एकत्र आले. ते २ महिने शेषन व श्रीधरन सोबत राहिले. त्यानंतर मात्र दोघांचे रस्ते कायमसाठी वेगळे झाले. शेषन यांनी प्रशासकीय कारकीर्दीत एकामागून एक यश मिळवत भारताचे मुख्य कॅबिनेट सचिव बनण्यापर्यंत मजल मारली. हे भारतातील सर्वोच्च पद. १९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं.

 भारतात निवडणूक काळात आचारसंहिता कडकपणे राबवण्यास शेषन यांनी घालून दिलेली शिस्त कारणीभूत ठरली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना मॅगसेसे पुरस्कार देखील देण्यात आला. तर श्रीधरन यांनी कलकत्ता मेट्रो, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोची मेट्रो, लखनौ मेट्रो असे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले. विक्रमी वेळेत, सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत, श्रीधरन यांनी भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांना याबद्दल भारताचा सर्वोच्च ‘ पद्मविभूषण ‘ हा सन्मान देण्यात आला.

मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात. स्पर्धा असावी तर शेषन-श्रीधरन यांच्या प्रमाणे चांगले  काम करण्याची. देशाला ‘ नंबर वन ‘ करण्यासाठी या दोन दोस्तांनी जे प्रयत्न केले, त्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा हे नक्की.

 

संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆टे  स्ट  र ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? टे  स्ट  र ! ?

“अगं ऐकलंस का ?”

“का s s य आहे ?”

“चहा घेतलास का तू ?”

“मी तुमच्या सारखी सूर्यवंशी नाही, माझा चहा कधीच झालाय!”

“मग तुला तो आज जरा वेगळा…..”  “अजिबात लागला नाही, नेहमीसारखीच तर त्याची चव आहे.”

“अगं मला तो आज फारच बेचव लागतो आहे, म्हणून विचारलं.”

“हे बघा आज पासून मी केलेल्या कुठल्याही पदार्थाला नांव ठेवणं अजिबात बंद, कळलं ? जे पुढ्यात येईल ते नांव न ठेवता गपचूप खायचं आणि प्यायचं कळलं ?”

“म्हणजे काय, आता आज चहा पुचकावणी झालाय हे पण बोलायची चोरी ?”

“मी आत्ता काय कानडीत बोलले, कुठल्याही पदार्थात चहा पण येतो !”

“आणि मी तसं म्हटलं तर?”

“मी आमच्या हो. मे. सं. कडे तुमची तक्रार करीन हं !”

“आता हे हो मे सं का काय म्हणालीस, ते नक्की काय आहे ते सांगशील का जरा !”

” अहो दोन महिन्या पूर्वीच आम्ही आमचा ‘होम मेकर संघ’ स्थापन केलाय.”

“अगं पण तुमचं बायकांचं ऑलरेडी एक ‘अनाकलनिय महिला मंडळ’ आहे ना ? मग आता हा पुन्हा नवीन संघ कशाला ?”

“अहो उगाच आमच्या मंडळाचे नांव नका खराब करू ! त्याचे नांव ‘अनारकली महिला मंडळ’ आहे!”

“तेच  गं ते, तर ते एक मंडळ असतांना हा नवीन संघ कशाला काढलात ?”

“अहो, असं काय करता, त्या मंडळात नोकरी करणाऱ्या महिलां सुद्धा आहेत ! पण त्यांचे प्रश्न वेगळे आणि आमचे प्रश्न वेगळे.”

“ते कसे काय बुवा ?”

“असं बघा, आमच्या या नवीन होम मेकर संघात फक्त नोकरी न करणाऱ्या बायकांचा, ज्या फक्त ‘रांधा वाढा उष्टी काढा’ अशी माझ्यासारखी घरकामं करतात त्यांचाच समावेश आहे !”

“बरं, पण तुमचे प्रश्न वेगळे म्हणजे काय ?”

“म्हणजे हेच, स्वतःच्या नवऱ्याचे कशावरूनही टोमणे खाणे, आम्ही केलेल्या अन्नाला नांव ठेवून आमचा मानसिक छळ करणे, इत्यादी, इत्यादी !”

“यात कसला मानसिक छळ, मी फक्त चहा….”

“तेच ते, त्यामुळे आम्हां बायकांच्या मनाला किती वेदना होतात ते तुम्हाला कसं कळणार ?”

“काय गं, कुणाच्या डोक्यातून ही संघ काढायची कल्पना आली ?”

“अहो त्या दुसऱ्या मजल्यावरच्या लेले काकू आहेत ना, त्यांनी वकिलीची online परीक्षा दिली होती मागे.”

“बरं मग ?”

“तर अशाच आम्ही दुपारच्या गप्पा मारायला जमलो होतो, तेंव्हा त्यानी ही कल्पना मांडली आणि आम्ही तिथल्या तिथे होम मेकर संघ स्थापून मोकळ्या झालो.”

“बरं बरं ! पण या तुमच्या संघाकडे कुणा बायकोने, स्वतःच्या नवऱ्या विरुद्ध तक्रार केली तर, त्याचा न्याय निवडा कोण करत ?”

“आमच्या संघाच्या अध्यक्षिणबाई, मंथरा टाळकुटे !”

“अगं पण तिला तर तुम्ही सगळ्या बायका खाजगीत आग लावी, चुगलखोर असं म्हणता नां, मग ती कशी काय अध्यक्ष झाली संघाची ?”

“अहो तिचे मिस्टर पूर्वी ख्यातनाम जज होते, एवढं qualification तिला पुरलं अध्यक्ष व्हायला !”

“अस्स अस्स ! अग पण जज साहेब जाऊन तर बरीच वर्ष झाली नां ?”

“म्हणून काय झालं ? जज साहेब हयात असतांना मंथराबाईं बरोबर, त्यांनी न्याय निवडा केलेल्या कितीतरी केसेसेची चर्चा ते करत असत. त्या मुळे मंथराबाईंना अशा केसेस….”

“अशा केसेस म्हणजे ? अग आम्ही नवरे मंडळी काय चोरी, डाका, मारामाऱ्या करणारे वाटलो की काय तुम्हांला ?”

“तसं नाही पण….”

“अगं नुसतं चहा बेचव झालाय, आज आमटी पातळ झाल्ये हे स्वतःच्या बसायकोला बोलणं आणि चोरी, डाका, मारामाऱ्या यात काही फरक आहे का नाही ?”

“आहे नां, पण तुम्ही असं बोलल्यामुळे आमच्या मनाला किती यातना होतात, सगळी मेहनत पाण्यात गेली असं वाटतं त्याच काय ? मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ? म्हणून हा संघ स्थापन केलाय आम्ही.”

“काय गं, आत्ता पर्यंत कोणा कोणाला आणि कसली शिक्षा केल्ये तुमच्या अध्यक्षिण बाईंनी ?”

“अहो कालचीच गोष्ट, काल कर्वे काकूंची तक्रार आली होती त्यांच्या मिस्टरांबद्दल.”

“कसली तक्रार ?”

“अहो काल सकाळच्या जेवणात काकूंच्या हातून आमटीत मीठ जरा जास्त पडलं म्हणून…”

“करव्या तिला बोलला तर काय चुकलं त्याच ?”

“चुकलं म्हणजे, एवढ्याशा कारणावरून कर्वे काकांनी काकूंच्या माहेरचा उद्धार केला ! मग काकू पण लगेच तक्रार घेऊन गेल्या मंथराबाईंकडे आणि अध्यक्षिण बाईंनी त्यांना शिक्षा केली.”

“म्हणजे चूक करवीणीची आणि शिक्षा करव्याला का ?”

“अहो बोलून बोलून त्यांचा मानसिक छळ केल्या बद्दल.”

“काय शिक्षा फार्मावली अध्यक्षिणबाईंनी?”

“कर्वे काकांना काकूंनी रात्री उपाशी ठेवायचं.”

“अगं पण तो डायबेटीसचा पेशंट आहे, त्याला रात्री जेवल्यावर गोळी घ्यायची असते आणि तो रात्री जेवला नाही तर….”

“अहो म्हणूनच उदार होऊन आमच्या अध्यक्षिणबाईंनी, त्यांना रात्री दुधा बरोबर एक पोळी  खायची परवानगी दिली ! तशा प्रेमळ आहेत त्या !”

“कळलं कळलं! आता मला सांग ती मंथरा एकटीच राहते का कोणी….”

“अहो त्यांची नर्मदा नावाची मावशी आहे, ती असते त्यांच्या सोबतीला आणि तीच घरच सगळं काम करते.”

“स्वयंपाक पण ?”

“आता सगळं काम म्हटलं की त्याच्यात स्वयंपाकपण आलाच नां ?”

“मग मला सांग तुमच्या अध्यक्षिणबाईंनां शिक्षा कोण करणार ?”

“त्यांना कशाला शिक्षा ?”

“अगं ती कोण नर्मदा मावशी आहे, तिच्या हातून स्वयंपाक बिघडला, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती कजाग मंथरा, त्यांना बोलल्याशिवाय राहणार आहे का ?”

“अगं बाई खरच की ! हे कसं लक्षात आलं नाही आम्हां बायकांच्या ?”

“कसं लक्षात येणार ? पण यावर माझ्याकडे एक उपाय आहे.”

“काय?”

“आजपासून तू त्या मंथरेकडेच सकाळ संध्यकाळ जेवायला जात जा!”

“म्हणजे काय होईल ?”

“अगं म्हणजे एखाद दिवशी स्वयंपाक बिघडला तर ती मंथरा गुपचूप जेवते का नर्मदेचा उद्धार करते ते कळेल नां.”

“अहो पण असं बरं दिसणार नाही आणि समजा मी गेले त्यांच्याकडे रोज जेवायला तर तुमच्या जेवणाचं काय?”

“मी ठेवीन की बाई !”

“काय?”

“अगं स्वयंपाकाला आणि तिचा स्वयंपाक बिघडला तर तिला हक्काने सुनवीन पण आणि त्यावरून मला त्या करव्या सारखी शिक्षा पण नको भोगायला.”

“वारे वा, घरात एवढी अन्नपूर्णा असतांना स्वयंपाक करायला बाई कशाला? त्या पेक्षा मीच होमेसं चा राजीनामा देते म्हणजे प्रश्नच नाही !”

“अगं पण त्यामुळे तू बिघडवलेल्या अन्नाच्या चवीचा मूळ प्रश्न थोडाच सुटणार आहे.”

“हो, तेही खरंच. मग यावर तुम्हीच एखादा उपाय सांगा, म्हणजे झालं.”

“अगं साधा उपाय आहे आणि तो तू तुमच्या सगळ्या महिला मंडळाला सांगितलास तर तुमचा तो संघ आपोआप बरखास्त झालाच म्हणून समज.”

“काय सांगताय काय, मग लवकर सांगा बघू तो उपाय.”

“तुला माहित्ये, सगळ्या थ्री स्टार, फाईव्ह स्टार, सेवन स्टार हॉटेलात लाख, लाख पागर देऊन एक “टेस्टरची” पोस्ट असते आणि त्याच काम फक्त हॉटेलात लोकांनी जेवणाची ऑर्डर दिल्यावर त्या पदार्थाची चव त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आहे का नाही, हे चाखून बघणं.”

“पण त्याचा इथे काय….”

“अगं तेच सांगतोय नां, तू एखादा पदार्थ केलास तर तो वाढण्यापुर्वी चाखून बघायचा, म्हणजे मग….”

“त्यात काय कमिजास्त आहे ते कळेल आणि तो वाढण्यापूर्वीच खाणेबल किंवा पिणेबल करता येईल, असंच नां ?”

“अगदी बरोबर, मग आता जरा नवीन फक्कडसा चहा….”

“आत्ता आणते आणि हो आधी त्याची टेस्ट घेऊनच बरं का !”

असं बोलून माझ्या घरची न्युली अपॉइंटेड टेस्टर किचन मधे पळाली आणि मी मनाशी हसत हसत सुटकेचा निश्वास टाकला !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधुनिक सावित्री ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ आधुनिक सावित्री ☆ सौ राधिका भांडारकर ☆

अधुनिक म्हणजे नेमके काय?

जुन्या चालीरीतिंना डावलणे,परंपरा मोडणे,जे वर्षानुवर्षे चालत आले आहे त्याला विरोध दर्शविणे…काहीतरी वेगळं नवीन करणं म्हणजे अधुनिकता का?

खरं म्हणजे अधुनिकता याचा अर्थ कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणं…त्यातली भूमिका ,कारणं,आणि काळ याचा अभ्यास करुन बदलत्या काळाशी वातावरणाशी, जीवनपद्धतीशी त्याची सांगड घालून प्रथेचं उचीत नूतनीकरण करणं म्हणजे अधुनिकीकरण हा अर्थ मला अधिक पटतो…अधुनिकीकरण म्हणजे उच्चाटन नव्हे तर पुनर्बांधणी.

वटपौर्णिमा ह्या मुख्यत्वे स्रियांच्या सणाविषयी काही भाष्य करताना हा विचार महत्वाचा वाटला…

पारंपारिक पद्धतीची वटपौर्णिमा म्हणजे ,पत्नीने पतीला दीर्घायुष मिळावे,आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून केलेले व्रत!!मग ऊपास,वडाची पूजा ,वडाभोवती दोरा गुंडाळत मारलेल्या फेर्‍या..वगैरे वगैरे.. मग त्याच्याशी जोडलेली सत्यवान सावित्रीची कथा…

वास्तविक हिंदु संस्कृतीत कुठल्या ही सणाशी, व्रताशी कुठलीतरी  कथा ही असतेच…मात्र या कथांच्या माध्यमातून एक शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन असतो. ,तो समजून घेणं म्हणजे अधुनिकता..

आणि आजची स्त्री हा विचार करते.कारण ती शिक्षीत आहे.विचारक्षम आहे.परंपरेतला अंधश्रद्धेचा ,फोलपणाचा भाग ती डावलू शकते…

आजची स्त्रीवटपौर्णिमेच्या दिवशी भले उपास करणार नाही,विधीपूर्वक वडाची पूजा करणार नाही,सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करणार नाही ,पण या मागचं सौंदर्य आणि महत्व नक्की जपेल. तेही डोळसपणे…

वटवृक्षाच्या नैसर्गिक सुंदरतेचे ,उपयुक्ततेचं या सणाशी,

व्रताशी घनिष्ठ नातं आहे.पर्यावरणाचा महान संदेश यातून दिला आहे…हा वड सावली देतो,भरपूर प्राणवायु पुरवतो,पक्षी पांखरं पांथस्थ यांचा आधारवड आहे.

याची मुळं मातीची धूप होऊ देत नाही.आणि हे झाड दीर्घायुषी असतं..त्याची पूजा ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते..त्याचं जतन करण्याची शपथ घेणं असतं..आणि ही जागरुकता असणं ही काळाची गरज आहे…आजची स्त्री हे जाणते…वृक्षसंवर्धन ही हिंदु संस्कृतीत प्रत्येक सणाची मूळ संकल्पना आहे. आणि ती पाळणं म्हणजेच नवा विचार रुजवणं …

मग बाकीच्या बाबी या केवळ मौज,हौस,गंमत करमणुक साजरीकरण या सदरात कुठल्याही अंधश्रद्धेविना जाऊ शकतात…

आजही एखादी व्यक्ती जीवघेण्या आजारातून बरी झाली की आपण त्याच्या पत्नीविषयी चटकन् म्हणतो,”..खरंच सावित्री आहे ती..म्हणूनच तो मरणाशी झुंज जिंकला….”

इथे सावित्री ही प्रतिकात्मक असते.ती शक्ती असते.

सकारात्मकता असते.

आजच शेजारचा अमोल म्हणाला.,”गेले दहा दिवस सीमा क्चारंटाईन आहे .मी घर सांभाळू शकलो.नसेल तिच्याइतकं..पण मनापासून केलं.आज साबुदाण्याची खिचडी तिचा वटपौर्णीमेचा उपास म्हणून बनवलीही..

आणि काकु आज मीही उपास केला..कां विचारा..

तमाम सावित्र्यांना मी आज मानवंदना दिली…

स्त्री मधे नैसर्गिक त्याग,सहनशक्ती ,संयम हे गुण असतात.म्हणून व्रते ही स्त्रियांची मक्तेदारी..पण आज मी तिच्यावतीने हे व्रत करुन स्त्रीत्व काय असतं याचा यत्किंचीत अनुभव घेतला….””

अमोलचं हे वक्तव्य ऐकून वाटलं,हे अधुनिकत्व..

नव्या विचारधारेची  अर्थपूर्ण रुजवण हे संस्कृतीला दिलेलं डोळस वळण…

एक  सुसंस्कार……

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कै. सिंधुताई सपकाळ विशेष – माई….! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कै. सिंधुताई सपकाळ विशेष – माई….! ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

कै. सिंधुताई सपकाळ

माई…ए माई…उठ ना… अगं किती वाजले ?

तू इतका वेळ कधीच झोपून राहत नाहीस… एक हाक मारली तरी ‘ओ रे बेटा’ असं म्हणून सादेला प्रतिसाद देणारी तू…. ! इतक्या हाका मारून सुद्धा ओ का देत नाहीस… ?

आज अशी अचानक पणे शांत का झालीस ?

तू रागावली आहेस का माझ्यावर ?  खरं सांगू रागवायचा अधिकार आज माझा आहे, आम्हा सर्व लेकरांचा आहे…

सर्वांना असं उघड्यावर टाकून तू जाऊच कशी शकलीस ?

पुस्तकाची प्रस्तावना देताना, जे तू बोलत होतीस ते शेवटचं असणार आहे… हे मला काय माहित ?  नाहीतर तुला बोलण्यात गुंगवून ठेवलं असतं की गं माई…

त्यावेळी डोक्यावर ठेवलेला हात तू असा अचानक काढून घेणार आहेस… हे मला काय माहित ? नाहीतर तो हात मी तसाच गच्च धरून ठेवला असता की गं माई…

दरवेळी तुला भेटायला येताना, तुला आवडतात त्या साड्या मी घेऊन यायचो…. आता इथून पुढे या साड्या मी कोणाला देवू….? गेलीस…. पण जाताना या साड्यांचा भार माझ्या डोक्यावर ठेवून गेलीस की गं माई ….

साड्यांचे बॉक्स मी तुझ्यासमोर उघडताना हि तू अशी… हे बघ अशी…..खुर्चीवर बसलेली असायचीस आणि मी जमिनीवर….

एक एक बॉक्स उघडताना लहान मुलीच्या निरागसतेने, डोक्यावरचा पदर सावरत म्हणायचीस, ‘बेटा गुलबक्षी रंगाची आणली आहेस ना ?’

आज फिकट पडलेल्या या गुलबक्षी रंगाला मी काय उत्तर देऊ माई… सांग की… आज गप्प का ?

मी पुस्तक लिहितो आहे; असं तुझ्या कानावर घातल्यावर, हसत म्हणाली होतीस, फिरकी घेतली होतीस, ‘आता तुम्ही मोठे लेखक होणार बुवा… आम्हाला तुमच्याशी बोलायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आता बाबा तुमची’…

या पुढे म्हणाली होतीस, ‘पहिली प्रत कोणाला देणार आहेस…. ?’

हा काय प्रश्न झाला माई …. ? तुला उत्तर माहीत असून सुद्धा, माझ्या तोंडून तुला वदवून घ्यायचे होते ना …. ?

आता मला सांग…. मी पुस्तकाची पहिली प्रत, तुझ्या पायाशी ठेवायला कुठे येऊ…. ?

जळगावात एकदा एक खूप मोठा… मानाचा… “अविनाशी पुरस्कार” मला मिळाला होता…

तुला कुणी सांगितलं माहित नाही, परंतु मी जळगावात पोचल्याबरोबर तुझा फोन आला होता, ‘बेटा जळगावात रेल्वेस्टेशन समोर अमुक-अमुक झाडाखाली मी सुद्धा एकेकाळी भीक मागत होते,  तिथे तु आत्ता जा आणि तिथं भीक मागणाऱ्या या सर्व लोकांना काहीतरी गोड खाऊ घाल आणि त्यांच्यासाठी जे काही करता येणे तुला शक्य आहे ते सर्व… सर्व… सर्व… कर रे बेटा… बाळा…. माज्या सोन्या…  असं तू तळमळून सांगितलं होतंस…

तुझी ती तळमळ शब्दात मांडण्याची माझी अजून तरी औकात नाही….!

यानंतर मला जे जमलं होतं, ते मी या सर्व याचकांसाठी केलं होतं…. आणि त्याचा लेखी रिपोर्ट तुला फोटोसह दिला होता…. यावर हे सर्व पाहून “माझा वाघाचा बच्चा” असं म्हणून तू मला पोटाशी धरलं होतंस…. !

तुला आठवतं…. ? मी कधीच विसरणार नाही… !!!

अग मी वाघाचा बच्चा कधीच नव्हतो, मी बच्चा होतो “वाघिणीचा” गं …. !

माझ्यासारख्या अशा किती बच्च्याना मागं सोडून गेलीस गं वाघिणी …  ? आणि का… ???

एकदा एका व्यासपीठावर तुझं आणि माझं व्याख्यान ठेवलं होतं…. (माझी लायकी नसतानाही तुझ्या शेजारच्या खुर्चीत मी बसलो होतो)

तुझ्या भाषणात तू पदर पसरून, शेवटी लोकांना म्हणाली होतीस, ‘माझ्या लेकराला…. अभिजीतला पदरात घ्या हो मायबाप…’

तुझ्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन, समाजाने मला तर पदरात घेतलं ग माई, पण तुझा पदर हरवला…. तो कुठून आणू आता… ??? सांग की आज गप्प का ?

एकदा मोठ्या मनानं म्हणाली होतीस, ‘तू मला माई म्हणतोस, मी तुझी आई झाले…. पण खरं सांगू का ? भीक मागण्याच्या काळात मला तू भेटायला हवा होतास…. तुझी आई होण्यापेक्षा…. तुझी मुलगी होण्यात मला जास्त धन्यता वाटली असती रे बाळा…. !

माई तू शब्द दिला होतास….. सोहमच्या लग्नात मी येईन म्हणून….  !

मोडलास गं हा शब्द माई तू…. सोहमला काय सांगू मी आता…. ? मनीषा ला काय सांगू… ?

तू गेलीस हे समजण्याचं  सोहमचं वय नाही गं माई …. पण मी त्याला सांगितलं आहे, आजी परत येणार आहे….!

तो येडा तुझ्या येण्याची वाट बघतोय….

ए माई… ऐक ना…. सोहमच्या पोटी फिरून जन्माला येशील…. ???

ये की गं…. आयुष्यात मी तुझं सारं ऐकलं…. आता  तू माझं ऐक  ना…. ऐक  की… एकदा तरी….प्लीज….!

तुला माझी मुलगी व्हायचं होतं ना …. ?

सोहमच्या पोटी जन्माला ये…. तोपर्यंत वाट पाहिन मी तुझी….माई… !!!!

आज तुझ्या जाण्याने एक मात्र निश्चित जाणीव झाली…. देवाला सुद्धा आई हवी असते…. !!!

 

तुझे अभागी …

अभिजीत… मनीषा आणि सोहम

चित्र साभार – sindhutaisapakal.org

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 5 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 5 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

मुळात मुंबईचं राजकारण- सिनेमा- जाहिरातींचं विश्व मला जवळून अनुभवता आलं ते एका वेगळ्याच साप्ताहिकामुळे. आज बऱ्याच नव्या पत्रकारांना ते साप्ताहिक माहीतही नसेल. ते साप्ताहिक म्हणजे ‘तेजस्वी’. चौगुले आणि किर्लोस्कर या दोन उद्योगपतींनी निर्मिलेले. विविध दैनिकांतून ज्येष्ठ नामवंत पत्रकार (सुमारे चाळीस) या नव्या साप्ताहिकांत रुजू झालेले होते.

 किर्लोस्करांचे जनसंपर्क अधिकारी नारायण पुराणिक सूत्रधार संपादक होते. ‘इंडिया टुडे’ येण्यापूर्वीच तसं वृत्त- साप्ताहिक मराठीत आणण्याचा हा ‘तेजस्वी’ प्रयत्न होता. त्याचं ऑफिस पुण्यात मोदी बागेत होतं. मला आठवतंय, त्या वेळी राजकारणाची जाण असलेल्या वरुणराज भिडेला पुराणिकांकडे इंटरव्ह्य़ूला घेऊन मीच गेलो होतो. त्या ‘तेजस्वी’चा मुंबई मुख्य प्रतिनिधी म्हणून माझी त्या माझ्या उमेदवारी काळात नेमणूक झाली होती. माझी निवड होण्याचं कारण फक्त मी मुंबईत जायला तयार असणं एवढंच होतं. त्यावेळी मी उल्हास पवारांच्या जुन्या आमदार निवासातल्या रुम नं. ६०२ मध्ये बऱ्याचदा असायचो. मधू शेटय़े, गोगल मला त्या वेळी खूप मदत करत. पदच असं होतं की, वसंतराव नाईक, अंतुलेंसह सर्व राजकीय नेते, उद्योजक तर सहजतेनं भेटत. मला आठवतंय की, वडखळ नाकाप्रकरणी बॅ. ए.आर.अंतुले, रामभाऊ म्हाळगी, प्रमोद नवलकर, मृणाल गोरे यांच्या मुलाखती मी घेतल्या होत्या. १९७१-७२ सालातले सारे ‘तेजस्वी’चे अंक माझ्याकडे आहेत.

मुलाखतींच्या राज्यातही अनेक गमती घडल्या आहेत. मी आणि वरुण भिडे ‘अर्न अ‍ॅण्ड लर्न’ स्कीमखाली कॉलेजात शिकत असतानाच्या काळात रेस्टॉरंट नसलेल्या ‘श्रेयस’ हॉटेलात अटलबिहारी वाजपेयीसाहेबांबरोबर सहज गप्पा झाल्यात. तर राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक मुलाखती बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार यांच्याबरोबर झाल्या आहेत. २४ एप्रिल २०१२ षण्मुखानंद हॉलमध्ये दीदींच्या उपस्थितीत बाळासाहेब शेवटचे भेटले. ७, सफदरजंग रोड, दिल्ली या प्रमोद महाजनांच्या तत्कालीन निवासस्थानी सलग सात तास चित्रबद्ध केलेली महाजनांची मुलाखत शेवटची ठरेल, असं वाटलं नव्हतं. राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांनी आपलं पद- ग्लॅमर विसरून मुक्त गप्पा मारल्या आहेत.

यशवंतराव चव्हाणसाहेबांशी पुस्तकांवर त्यांच्या निवृत्ती काळात चतु:शृंगी पायथ्याशी बोललोय तर पृथ्वीराज बाबांशी अगदी अलीकडे सॅटर्डे क्लबमध्ये धावत्या गर्दीत बोललोय. हे दोन ‘चव्हाण’ आणि कन्नमवार सोडल्यास वसंतराव नाईक ते देवेन्द्र फडणवीस सर्व मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमारजी तर आमच्या कट्टय़ावरच्या गप्पाष्टकातही सहभागी झालेत.

नवी गाडी ‘मनोहर’ साप्ताहिकाच्या कचेरीत दाखवायला आलेला आणि बिनधास्त बोलणारा ‘नामदेव ढसाळ’ तर त्या काळात दोस्तच झाला होता. आळंदीच्या साहित्य संमेलनात अक्षरश: रस्त्यावरच्या धुळीत बसून, दया पवार मुक्तपणे जीवन कहाणी ऐकवताना मी एकटय़ाने अनुभवले आहेत. नितीन गडकरी- गोपीनाथ मुंडे यांनी खासगी विमान प्रवासातही स्टुडिओत बसल्याप्रमाणे सहज मुलाखती दिलेल्या आहेत.

क्रमशः….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: अंबिका आणि अंबालिका ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ अंबिका आणि अंबालिका  ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

अंबिका आणि अंबालिका

खरं तर आपल्याकडे स्त्रीमुक्तीचे वारे बऱ्याच दिवसांपासून वाहू लागले आहेत. पण अजुनही बऱ्याच स्त्रियांना खूप अन्याय सहन करावे लागत आहेत पण महाभारतातील स्त्रियांकडे पाहिले तर आपण किती सुखी आहोत असे वाटू लागते. अशा दोन स्त्रिया म्हणजे अंबिका आणि अंबालिका.

महाभारतात काशी नरेश इंद्रद्युम्न याची कथा आहे. त्याला तीन मुली. अंबा, अंबिका आणि अंबालिका. तिघीही सुस्वरूप आणि सद्गुणी होत्या. त्या उपवर होताच राजाने त्यांचे स्वयंवर मांडले. सर्व राजाना आमंत्रणे दिली पण भीष्म ब्रह्मचारी व त्याचा सावत्र भाऊ विचित्रवीर्य नावाप्रमाणेच दुबळा होता म्हणून त्या दोघांना आमंत्रण दिले नाही. भीष्माला खूप राग आला आणि तो अगंतुकपणे सभामंडपात दाखल झाला. तिथे सर्वांनी त्याची चेष्टा सुरू केली.” विना आमंत्रण का आला? , भिष्मप्रतिज्ञा  मोडली का? ब्रह्मचर्य सोडले वाटते.” भीष्माला खूप राग आला .त्याने आव्हान दिले मी सर्वांसमक्ष या तिघींना हस्तिनापूरला घेऊन जाणार आहे. सर्व राजांनी त्याच्यावर हल्ला केला. पण भीष्माने सर्वांना पराभूत करून या तिघींचे अपहरण केले व रथात घालून हस्तिनापूरला आणले. माता सत्यवती खुश झाली व तिने तिघींना सांगितले की तुम्ही माझा मुलगा विचित्रवीर्य याच्याशी विवाह करा. अंबे ने नकार दिला व ती शाल्व राजाकडे परत गेली. पण या दोघींना दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी निमूटपणे विचित्रविर्याशी विवाह केला. विचित्रविर्याचा अकाली मृत्यु झाला . सत्यवतीने  भीष्माला आग्रह केला की तू प्रतिज्ञा मोडून या दोघींशी विवाह कर आणि कुरूवंशाला वारस दे. त्याने सांगितले मी प्रतिज्ञा भंग करणार नाही पण माते तुझाच पुत्र आपला वंश पुढे चालवील. सत्यवतीला आपल्या पहिल्या मुलाची आठवण झाली आणि तिने व्यासांना आवाहन केले. मातेच्या आज्ञेनुसार व्यास नियोग पद्धतीने राज्याला वारस देण्यास तयार झाले. एखाद्या स्त्रीचा पती जेव्हा वंश निर्माण करण्यास असमर्थ असतो तेव्हा ती दुसऱ्या पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घेऊ शकते. पण होणाऱ्या पुत्रावर पतीचाच पिता म्हणून अधिकार राहतो याला नियोग पद्धती म्हणतात .सत्य वतीने अंबिकेला व्यासांकडे जाण्यास सांगितले. नाइलाजाने ती गेली पण व्यासांचे उग्र रूप पाहून घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. व्यासाने सत्यवतीला सांगितले तिला अत्यंत तेजस्वी पुत्र होईल पण तो आंधळा असणार आहे. आणि जन्मांध धृतराष्ट्राचा जन्म झाला. सत्य वतीने अंबालिकाला व्यासांकडे पाठवले. तिने डोळे उघडे ठेवले पण ती लाजेने पिवळी पडली. तिच्या पोटी पंडु रोगग्रस्त पांडू चा जन्म झाला. सत्यवती ने पुन्हा अंबिकेला डोळे उघडे ठेवून व्यासांकडे जा असे सांगितले. ती स्वतः जाण्यास धजावली नाही . तिने आपल्या रूपात  एका दासीला सजवले आणि व्यासांकडे पाठवले. व्यासांनी सत्यवतीला सांगितले हिला होणारा पुत्र वेद विद्या पारंगत आणि नीतिवान निपजेल. मातेला दिलेले वचन पूर्ण करून व्यास तपश्चर्येला निघून गेले.

अंबिका आंधळ्या पुत्राची आई बनली. अंबिका शब्दाचा अर्थ देवी पार्वती , दुर्गा असा आहे पण  असहाय अंबिका काही करू शकली नाही. राजमातेचा मान तिला मिळाला पण त्याचे अंधत्व तिला आयुष्यभर छळत राहिले. अंबालिका दुबळ्या पांडू कडे पाहून आयुष्यभर जळत राहिली. दासी पुत्र विदुर सर्वगुणसंपन्न असुनही व्यासांचा पुत्र म्हणून त्याला मान मिळाला नाही दासीपुत्र म्हणूनच सगळ्यांनी त्याची हेटाळणी केली आणि त्याची आई  आयुष्यभर खंतावत राहिली. आजची कुठलीच स्त्री हे सहन करणार नाही कारण आपल्याला शिकवले आहे,”मुकी बिचारी कुणीहका, अशी मेंढरे बनू नका.”

अंबिका आणि अंबालिका त्यांचा कुठलाही दोष नसताना मूक अश्रू ढाळत बसल्या त्याचे काय?

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares