मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 4 – राग मालकंस ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  4 – राग मालकंस ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

ती मध्यरात्रीची वेळ

सूर आले कानी

होते कोमल ग ध नी

मन माझे गेले मोहुनी…

क्षणांत भावना श्रृंगाराची

तसेच पवित्र भक्तिभावाची

हेच असे स्वरांचे ह्या वैशिष्ठ्य खास

प्रचलित तो राग मालकंस…

 

वरील माझ्या या काव्यपंक्तींवरून वाचकांच्या लक्षांत आले असेलच की आजच्या लेखांत आपण कोमल स्वराधिष्ठित मालकंस या रागाचे विवेचन करणार आहोत.

भैरवी थाटजन्य हा राग! किंबहुना भैरवी रागांतून रिषभ(रे) व पंचम(प) हे स्वर काढून टाकले की झाला मालकंस! म्हणजे सा ग(कोमल)म ध(कोमल)नि(कोमल) या पांचच स्वरांचा हा ओडव जातीचा राग! तरीसुद्धा गायन/वादनासाठी फार विस्तृत बरं का.

नि सा ग म ध नि सां असा याचा आरोह तर सां नि ध म, ग म ग सा असा थोड्या वक्र स्वरूपाचा अवरोह.

कोमल स्वरांमुळे अतिशय कर्ण मधूर पण त्याच बरोबर करूण रसाचा आविष्कार करणाराही.

ह्या रागांतील स्वररचना ही त्यांतील शुद्ध मध्यमाभोवती फिरत असते.त्यामुळे सहाजिकच मध्यम वादी आणि त्याच्याशी सुसंवाद साधणारा षडज हा संवादी स्वर मानला आहे. असे असले तरी गंधार व धैवतही सातत्याने वावरत असतातच. अतिशय भारदस्त असा हा राग सर्वच रसिकांचा आवडता नि लाडका आहे.

स्व. भारतरत्न भीमसेन जोशींनी अतिशय प्रचलित केलेली ‘रंग रलिया करत सौतन के संग’ ही बंदिश ऐकतांना नायिकेचा प्रियकर तिला सोडून सवती सोबत रात्र घालवितोह्या विचाराने श्रृंगारावाचून तळमळणारी आणि विरहाने व्याकूळ झालेली नायिका आपल्या डोळ्यासमोर उभी करण्याचे सामर्थ्य मालकंसच्या ह्या स्वरांत असल्याचे जाणवते. अर्थात पेश करणारा कलावंतही तितक्याच ताकदीचा असला पाहीजे हे निश्चित!

सौ. बकूळ पंडितांनी सहजसुलभतेने गाऊन अजरामर केलेले ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे पाणिग्रहण नाटकांतील पद न ऐकलेला रसिक विरळाच असेल. याच मालकंसांत निबद्ध केलेली कानडा राजा पंढरीचा किंवा बैजू बावरा या चित्रपटांतील ‘मन तरपत हरी दरसनको आज’ ही भक्तीगीते भक्तीरसांत भिजलेली आपण पहातो. श्री.अनूप जलोटा यांचे सर्वश्रृत भजन

‘क्षमा करो तुम मेरे प्रभूजी

अबतकके सारे अपराध

धो डालो तन की चादरको

लगे है उसमे जो भी दाग’ ।। यांत भक्ताची जी तळमळ आहे, जी क्षमायाचना आहे ती केवळ मालकंसच्या स्वरसाजामुळेच प्रभूपर्यंत पोहोचली असे वाटते.

छोटा गंधर्वांचे देवमाणूस नाटकांतील ‘सुखवित या संसारा’ या पदांतून दोन जिवांच्या प्रीतींतून मिळणारे समाधान हेच स्वर व्यक्त करतात तर रणदुंदुभी नाटकांतील’दिव्य स्वातंत्र्य रवी’ हे मातृभूमीचे प्रेम व्यक्त करणारे पद मालकंसातच गुंफलेले आपण ऐकतो.

एकूणच विशाल अंतःकरणाचा हा राग  श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज..न..रे..श..न..गॅ..प..  ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ विविधा ☆ ज..न..रे..श..न..गॅ..प.. ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆

थोड्या दिवसांपूर्वी माझ्या बहिणीशी गप्पा मारत होते, तेव्हा सहज विषय चालला होता, त्या ओघात ती म्हणाली “नवरा बायकोच्या वयात एक वर्षापेक्षा जास्त
अंतर नसावं. पाच-सहा वर्षे तर नाहीच. कारण मग विचार करण्याचा पद्धतीत जनरेशन गॅप राहतो “.

हल्ली हल्ली “जनरेशन गॅप “हा शब्दप्रयोग खूप कानांवर येतोय. म्हणजे ” दोन पिढ्यांमधलं अंतर. ” हा त्यांचा शब्दश: अर्थ होतो, पण व्यक्ती व्यक्तीप्रमाणे त्याचा अर्थ वेगळा असतो. म्हणजे देवाच्या बाबतीत आहे तसं, मानलं तर.  तो आहे ..च आणि तो वेगवेगळ्या रूपात आहे. तसेच.. काहीसे. काही वेगवेगळ्या वयोगटातील किंवा वेगवेगळा अनुभव घेतलेल्या काही लोकांचे म्हणणे ऐकून हे लक्षात येते.

वीस वर्षाची तरुणी : ” हो.. मला तर माझ्याहून पांच वर्ष लहान बहिणीच्यात आणि माझ्यात जनरेशन गॅप जाणवतो, ती माझ्या पेक्षा स्मार्टली ही टेक्नोलॉजी हाताळू शकते

85 वर्षांचे आजोबा : ” अंतर तर आहेच, आमची पिढी एकदम धीरगंभीर, ही पिढी म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि धूडगूस. सगळे आपले वरवरचे. कुठे ही खोलपणा नाही, की गांभीर्य नाहीच..”.

चाळीशीच्या बाई: ” हो..खरंच ही पिढी हुशार आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अजून माहित नाहीत. ह्यांना त्या कधीच शिकवायला लागल्या नाहीत…”
तर हे असे मतमतांतर ऐकायला मिळते.. हे तर ठीक.. पण प्रत्येकाच्या त्याबद्दलच्या भावना वेगवेगळ्या. कोणाला त्याचे कौतुक, तर कोणाला कुतूहल, कोणाला हेवा आणि काही जणांना तर भारी रागच आहे.

आता हेच पहा ना एक गृहस्थांचे म्हणणे असे की “पुढच्या पिढीचे कौतुक करावे तेवढे थोडेच, ही मुले एकदम ध्येयनिष्ठ आहेत॰  एकदा मनांत आणलं तर ते करणारच “. तर एका आजोबांना त्यांचे खूप कुतूहल. म्हणाले की ” मी तर माझ्या नातवाशी सतत संवाद करत असतो, नवीन यंत्रणा त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मला ह्या पिढीचा कधी कधी हेवाच वाटतो. ” एक जण जरा त्रासिक आवाजात म्हणाले “काही नाही हो… कुठलेही प्रयोजन नाही पुढच्या आयुष्याचे. मजूरा सारखं राबायचं आणि पैश्याची उधळपट्टी करायची.”

स्वतःचा अनुभव, वय, परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाचे पिढीतील अंतराविषयीचे म्हणणे असते.

मला असे वाटते की दोन पिढ्यांमधे काळाचे अंतर हे असणारच आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. आधीच्या पिढीने अंतर ठेवून न रहाता त्याचा स्वीकार करून पुढच्या पिढीशी एकरूप व्हावे. बाकी आधीच्या पिढीनेच पुढच्या पिढीवर संस्कार केलेले असतात आणि शिकवणही दिलेली असते. म्हणजेच त्यांचात असणारे गुण व दोषही काही प्रमाणात…या गोष्टी पिढीजात असणार नाही का?

© सौ. स्मिता माहुलीकर

अहमदाबाद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—६ ?

!! दिवाळी–नव्या जाणिवांची !!

यावर्षी करोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपण दिवाळीचा सण साधेपणाने पण मनापासून साजरा केला.आनंद घेतला.

मुळामध्ये या सणात धार्मिक अधिष्ठानाबरोबर आपल्या दैनंदिन व्यवहाराची सांगड घातलेली आहे.त्यामुळे लक्ष्मीची पूजा करायची तशीच गाय-वासराची करायची.निसर्गाचे जतन करायचे तसेच आपल्या नात्यांची जपणूक करायची.विजयाचा उत्सव साजरा करायचा तशीच प्रकाशाची उधळण करायची.

दरवर्षी आपण काही संकल्प करतो.काही गोष्टी परंपरा म्हणून,रूढी म्हणून करतो.पण यातल्या किती गोष्टी आपण मनापासून करतो ? किती संकल्प आपण पूर्ण करतो ? याचा ताळमेळ यानिमित्ताने घेतला पाहिजे.याच बरोबर आपल्या आयुष्याचा आढावा घेतला पाहिजे. मागच्या वर्षात किती नवीन नाती जोडली. याचबरोबर जुनी किती नाती दुरावली हेही समजून घेतले पाहिजे.म्हणजे त्याचा पुन्हा ताळमेळ घालणे सोपे होते.

आज बाजारात सर्व काही उपलब्ध आहे. फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे माणूस मिळत नाही. तेव्हा रुक्ष व्यवहारापायी, मानापमानाच्या गैरसमजुतींपायी जवळ असलेल्या आपल्या माणसांना का दूर करायचे ? प्रसंगी स्वतः कमीपणा घेऊन सुद्धा माणसे जपली पाहिजेत. मग त्यात नातलग, स्नेही, मित्र, शेजारी, सहकारी, कर्मचारी सगळे सगळे येतात.शेवटी आपण एकटे कधीच राहू शकत नाही.त्यामुळे ह्या माणसांची खरी गरज ही आपल्यालाच असते असा विचार दोन्ही बाजूंनी केला गेला तर, आपोआप सर्वच नाती जपली जातील आणि कुणालाही कधी एकाकीपण  जाणवणार नाही. तेव्हा सर्वांनीच आपली सगळीच नाती जपली पाहिजेत.

निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. पूजा-आरास यासाठी पानाफुलांची लूट करायची नाही.स्वच्छतेसाठी पाण्याची नासाडी करायची नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

या सणात दिवे पणत्या यांना खूप महत्त्व आहे.पूर्वी लाईट नव्हती तेव्हा दिवेच पेटवावे लागत. आज-काल लाईटने  अक्षरशः क्रांती केली आहे. लाईटच्या माळा,वेगवेगळे दिवे आपण लावतो.तरीही पणत्या का लावायच्या ? तर हेच या दीपोत्सवाचे सार आहे.दिवा हा चैतन्याची,मांगल्याची उधळण करतो.तेला-तुपाच्या दिव्यांनी तेज पसरते. विजेच्या दिव्यांनी डोळे दिपवणाऱ्या उजेडाचे प्रदर्शन होते. मुख्य फरक म्हणजे हा दिवा असंख्य दिवे पेटू शकतो.लाईटचा दिवा दुसरा एकही दिवा पेटवू शकत नाही आणि हेच या पेटत्या दिव्याचे वैशिष्ट्य आहे.

दिव्याने दिवा पेटविणे यामागे खूप मोठा अर्थ आहे. हा दिवा स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा देतो. आपण आनंदात जपताना इतरांनाही आनंद देणे, त्यांचे जीवन उजळणे हे खूप महत्त्वाचे असते.या दिपावलीतून हा संदेश घेऊन प्रत्येकाने इतरांना साहाय्य करणे, कटूता सोडून सर्वांशी प्रेमाने वागणे, भ्रष्टाचार, व्यसनं, शत्रुत्व यांना कटाक्षाने दूर ठेवणे, निसर्गाचे स्नेहाने जतन करणे यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बाहेर तर दिवे पेटवायचेच. पण आपल्या अंत:करणातला दिवा पेटला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, जाणिवा, संवेदना जागृत होतील आणि आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीसाठी आपण पुढे सरसावू. आपल्या जागृत मनाला इतरांच्या व्यथा वेदनांची जाणीव होईल.त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ याचा खरा अर्थ समजून सांगणारा ‘दृष्टीदाना’ चा संकल्प या वेळी करायला पाहिजे. आपल्या आयुष्याचा उत्तम तऱ्हेने उपभोग घेतल्यावर, आपल्या पश्चात दोन दृष्टिहीनांच्या नेत्रज्योती पाजळवणारा  हा संकल्प आहे. अशाच पद्धतीने अवयवदानाची संकल्पना सुद्धा आजकाल रुजायला लागलेली आहे.आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचे हे सुंदर मार्ग आहेत.

नवीन वर्ष म्हणजे तरी काय ? वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे निश्चय करायचे,नवीन ध्येय स्विकारायची आणि त्यांच्या पूर्ततेसाठी नव्या उत्साहाने जीवनाला नवा वेग द्यायचा. त्यामुळे आपले मन पुन्हा ताजेतवाने होते.

दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना चांगले होण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या त्याच वेळी चांगल्या गोष्टींची सर्वांकडून मनापासुन अपेक्षा करायला काय हरकत आहे ? शेवटी चांगले पेरले तर चांगलेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे.सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

दीपावली ही उजळून जाते

वाट नव्या वर्षाची

अशीच आपुल्या जीवनी यावी

लाट नव्या हर्षाची !!

शुभ दीपावली.  ?

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

फ्रेंडशिप, मैत्री किती छान कल्पना त्यादिवशी फ्रेंडशिप डे होता. सर्वजण एकमेकांना फ्रेंडशिप ब्याण बांधून आपल्या  मैत्रीची एकमेकांना आठवण करून देत होते. मी हे सगळं पहात होते. माझ्या मनात विचार आला. याप्रसंगावर चार ओळी तरी लिहाव्यात. म्हणून मी कागद पेन घेऊन बसले. आणि कविता लिहू लागले. तीच ही कविता.

फ्रेंडशिप

फ्रेंडशिप ही कल्पना आहे किती छान

एकच दिवस असतो मैत्रीचा मान

तीच असते या दिवसाची शान

रोजच्या जीवनात नसतं याच भान

पण आठवण होताच वाटतं किती छान

एकमेकांना होतात फोन

गर्दीने भरतात गावांचे कोन

गप्पांच्या फडात रहात नाही वेळेचं भान

आठवणीचे गोफ विणले जातात छान

एकमेकांना बांधतात फ्रेंडशीपचे बँण

सगळेच असतात एकमेकांचे फँन

जीवनाच्या फेऱ्यात होतात अनेक प्लॉन

केव्हातरी होतात छोटी छोटी भांडण

मनमोकळ बोलण्याचं हेच असतं ठाणं

कारण ह्यात नसतं कोणतच बंधन

आठवणीने मनं होतात म्लान

भेटल्यावर होतात परत भेटण्याचे ल्पॉन

भेट न झाल्यामुळे होतं रुदन

विचारांचे होते मंथन

मनांचं होतं मिलन

अन् भावनांचं होतं प्रज्वलन

शंकाचं होतं शमन

संकटकाळी होतं जीवाचं रान

असच असतं मैत्रीचं अतुट बंधन

मैत्रीचं महत्त्व अन् किर्ती महान

त्यावर होतं कवनांच गान

त्यानं भरतं पेपराचं पान

वातावरण ही होतं खूप छान

खरच फ्रेंडशीप ही कल्पना फारच महान

बघा कशी वाटते.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दसऱ्याला टीव्हीवर अनेक ठिकाणचा ‘ रावण- दहन’ सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतांना पाहिला आणि अचानक मनात विचारांची गर्दी झाली. ‘रावण वध’ हे सुष्ट वृत्तीने दुष्ट वृत्तीवर विजय मिळवल्याचे ठळक उदाहरण  असे वर्षानुवर्षे मानले जाते. रावण राक्षसी वृत्तीचा होता- स्वतःच्या बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून त्याने सीतेला पळवले- आणि म्हणून  रामाने युद्ध करून त्याचा वध केला …. एवढेच वर्षानुवर्षे लक्षात ठेवले गेले आहे. पण या  दोन घटनांच्या मधल्या सत्याकडे मात्र कुणीच लक्ष दिले नाही याचे आश्चर्य, आज समाजात घडणाऱ्या घटना पहाता प्रकर्षाने वाटते. आज इतर बातम्यांइतक्याच आवर्जून येणाऱ्या बातम्या असतात त्या स्त्रियांचे अपहरण, बलात्कार, शारीरिक- मानसिक छल …यांच्या, ज्यामध्ये कामवासना – पूर्ती हाच उद्देश बहुतांशी असलेला दिसतो. सामूहिक बलात्कार हा त्याहूनही भयानक प्रकार. मग कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून तिला मारूनच टाकायचे हेही तितकेच सहजसोपे वाटते. एखाद्या मुलीने आपल्याला नकार दिला तर, तिचा जो चेहेरा आवडत असतो तोच एसिड टाकून विद्रूप करणे, तिला आयुष्यातून उठवणे हाही भावनांच्या – विचारांच्या विद्रूपतेचा कळसच. असे असंख्य अत्याचार अनेक प्रकारे सतत होतच असतात. पण बरेचदा लोकलज्जेखातर आणि भीतीने ती त्याचारित स्त्रीच ते समाजापासून लपवून ठेवते हे तिच्याइतकेच पूर्ण समाजाचेही दुर्दैव आहे. अशा-काही घटना व्हाट्यावर येतातही. त्यांचा बभ्रा होतो. कोर्टकचेऱ्याही होतात. आरोपींना शिक्षाही ठोठावली जाते …… पण शिक्षेची अंमलबजावणी? …. ती जास्तीत जास्त लांबणीवर कशी पडेल , माफी मागण्याचे नाटक करून ती रद्दच कशी करता येईल, याचेच जोरदार प्रयत्न सुरू होतात, ज्यात समाजाचे प्रतिनिधीसुद्धा स्वतःचे ‘वजन’ वापरतांना दिसतात. हे पाहून कुणाही संवेदनशील असणाऱ्याचा तात्पुरता संताप होतोच. पण नंतर ती अत्याचारित स्त्री बाजूलाच रहाते, आणि खमंग चर्चा रंगत रहातात त्या फक्त खटल्याच्या……..

हे सगळे चित्रच अतिशय विकृत आहे.. आणि ते पहातांना खरोखरच प्रश्न पडतो की रावणाने सीतेला पळवण्याची मोठीच चूक केली होती, पण आत्ताची परिस्थिती पाहता तो इतका गंभीर गुन्हा म्हणता येईल का, की आज इतकी युगे लोटल्यानंतरही त्याचे आवर्जून प्रतीकात्मक दहन करावे ? समाजाने याचा नक्कीच विचार करायला हवा. आणि तो का ? या प्रश्नाला समर्पक अशी बरीच उत्तरे आहेत ……….

बहिणीच्या अपमानाचा बदला घेणे एव्हढाच तेव्हा रावणाचा हेतू होता, जो भावनेच्या भरात घाईघाईने पूर्ण करण्याची घोडचूक त्याने केली होती. पण सीतेवर कुठलाही अत्याचार करण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता, हे नंतरच्या त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येते. तो तिला कुठल्याही अज्ञातस्थळी घेऊन गेला नाही. त्याने तिला पहिल्यापासूनच अतिशय आदराने वागवले. इतक्या आदराने, की जो आदर आजही स्त्रीला सामान्यपणे दिला जात नाही.  अशोकवनासारख्या निसर्गरम्य जागी त्याने तिची रहाण्याची व्यवस्था केली. तिच्यासाठी आवर्जून स्त्री – सेविकांचीच नेमणूक केली. तिला उत्तम भोजन मिळण्याची व्यवस्था केली. तिथे तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. त्या काळात स्त्रीने परक्या घरी राहणे पाप मानले जायचे. हा नियम आणि स्वतःची चूक लक्षात घेऊन, केवळ माणुसकी म्हणून सीतेशी औपचारिक लग्न  करण्याची तयारीही त्याने दाखवली होती. आत्तासारखा एसिड फेकून , बलात्कार करून सूड घेण्याचा विचार त्याच्या मनात येणेही अशक्य होते हे यावरून नक्कीच सिद्ध होते. रामाने युद्धाआधी पूजा करायचे ठरवले, आणि ती सांगायला , ‘ व्युत्पन्न ब्राह्मण‘ म्हणून रावणालाच बोलावले. आणि रामाचा मान राखत रावणही गेला. असे सगळे घडणे आज अशक्याच्याही पलीकडचे आहे. विशेष म्हणजे मरण्यापूर्वी त्याने रामाची माफी मागितली. आता हा सगळा रावणाचा ‘शुद्ध मूर्खपणा‘ समजला जाईल. पण त्याच्या मनाची शुद्धता, मोठेपणा याचा विचारही कुणी करणार नाही,  जो सगळ्यांनीच करणे  फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आवर्जून असे म्हणावेसे वाटते की रावण- दहन करणे कायमचे थांबवून, आता प्रत्येकानेच स्वतःच्या मनातल्या राक्षसी वृत्तीचे , दुष्ट आणि घातक विचारांचे आणि दुष्ट वासनांचे जाणीवपूर्वक वेळोवेळी दहन करत राहण्याची फार जास्त गरज आहे. आणि  त्यासाठी  ” दसरा” उजाडण्याची गरजच नाही. कारण अशी प्रत्येक वेळ सोने वाटण्यासारखीच असेल………

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा–भाऊबीज ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—५ ?

!! बलिप्रतिपदा–भाऊबीज !!

शुभ दीपावली ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नवीन वर्ष कसे ? तर महापराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाने होणारी कालगणना आजपासून सुरू होते. आजपासून हे विक्रम संवत्सर सुरू होते.शालिवाहन शकानुसार चैत्री पाडवा हा वर्षारंभ मानला जातो.तर बलिप्रतिपदेपासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते.दिवाळी पाडव्याला व्यापारी वही पूजनाची प्रथा महत्त्वाची असते.

या दिवशी सर्व वर्षातील व्यापाराचा आढावा घ्यायचा असतो.याच पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा ही आढावा घेतला पाहिजे.जुन्या वर्षातल्या राहिलेल्या गोष्टी,नवीन वर्षात करायच्या गोष्टी यासाठीचे नियोजन, जुने राग-द्वेष,  भांडणं विसरून पुन्हा नव्याने स्नेहबंध जुळवणे, श्रद्धा उत्साह वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

बलिराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. विरोचन पुत्र बली धर्मप्रिय, लोकप्रिय राजा होता. श्री विष्णूंनी त्याच्यासाठी वामन अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. हा बलिराजा उदार होता. त्याच्या गुणांचे स्मरण आपल्याला वाईट माणसातही असणारे चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते.

कनक आणि कांता यामुळे माणूस असूर बनतो.म्हणूनच श्रीविष्णूंनी या दोघांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आगेमागे जोडून तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार लक्ष्मीपूजनाला कनक म्हणजे लक्ष्मीला पूजण्याची पूज्य दृष्टी; तर भाऊबीजेला समस्त स्त्री वर्गाकडे आई किंवा बहिणीच्या मायेने पाहण्याची दृष्टी देणारे दोन दिवस येतात.थोडक्यात म्हणजे अज्ञान, मोह, लालसा, सत्ता यांच्या अंधारातून ज्ञान,श्रद्धा,सद्भावना यांच्या प्रकाशात जाण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.

आजचा दिवस हा संकल्पासाठी एकदम शुभ  आहे. हा पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आजपासून करावी असे संकेत आहेत. हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपणारा आहे.

याच्या दुसऱ्या दिवशी येते भाऊबीज.बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला  ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. यमराजाची बहिण यमुनाने या दिवशी आपल्या घरी त्याची पूजा केली, त्याला ओवाळले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. ती म्हणाली, “दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस.” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून दरवर्षी  भाऊबीज साजरी होते

एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते  निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते.सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची,तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला बहिणीची आठवण येते.

या नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे,मावस भावंडं कोणतीही असोत हे नाते मनापासून जपावे हेच हा दिवस सांगतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राशी – फटाके – (दिवाळी मनोरंजन) ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ राशी – फटाके – (दिवाळी मनोरंजन) ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत रात्री १० नंतर फटाके उडवण्यास बंदी यावर आम्ही एक सर्वे घेतला ज्यात वेगवेळ्या राशींच्या लोकांची मते जाणून घेतली.  राशी प्रमाणे उत्तरे साधारण अशी मिळाली *)

मेष: काय वाट्टेल ते होऊ दे रात्री  १० नंतरच फोडणार फटाके. ?

वृषभ: व्यवस्थित आवरून तयार व्हायला तसंही दरवर्षी ८ वाजतात च म्हणा ?

मिथुन: रात्री ८ ते १० इथे आणि सकाळी  ८ ते १० अमेरिकेतील वेळेप्रमाणे  इथेच फटाके फोडू ?

कर्क: दिवाळीत चंद्र नसताना आकाश दिवा, पणत्या यांचा प्रकाश हीच दिवाळी. लक्ष्मी पुजनाला मात्र मी फुलबाजी लावणारच. ?

सिंह: खरे बॉम्ब फोडणारे मस्त परदेशात एन्जॉय करतायत आणि शिक्षा कुणाला ?

रात्री १० नंतर फुसके फटाके फोडणारी लोकं….. ?

कन्या : किती ते प्रदूषण सध्या होतंय ना. दिवाळी अंक पण महागलेत. ८ ते १० रोज कुणा कुणा कडे जायचंय. यंदा फटाके खरेदी होईल असं वाटत नाही??‍♀

तुळ:  दिवाळीत रोज पाऊस पडावा. फक्त रात्री ८ ते १० पाऊस न पडावा ☔ म्हणजे फक्त त्याचवेळेत फटाके उडवावे लागतील आणि निर्णयाचा सन्मान होईल ⚖

वृश्चिक : अगरबत्तीला खालच्या बाजूल ला एका बाॅम्बची वात गुंडाळून असे असंख्य टाईम बाॅम्ब  रात्री १० नंतर मोक्याच्या जागी ठेऊन येईन ?

धनू  : नाही त्याच्या गल्लीत रात्री १२ वा बाण सोडला तर नावाचा/ नावाची  धन्नू नाही ?

मकर: रोज रात्री १० नंतर न उडलेले फटाके गोळा करायचे. तेच दुस-या दिवशी ८ ते १० या वेळेत उडवायचे ?

कुंभ : दिवाळीच्या आधी काहीतरी करुन हा निर्णय स्थगित कसा करता येईल हे पहायला पाहिजे.?

मीन: मार्केट एवढे पडले असताना ‘आय मिन’ काही गरज आहे का फटाके उठवण्याची? त्यापेक्षा ‘लक्ष्मी मित्तल’ चे शेअर्स घेऊन आत्तापासून मुंबई -गोवा सागरी प्रवासाची तयारी करु आणि फटाक्यांच्या आवाजाची कॅसेट विकत घेऊ.?

??????✨?

? (राशीतज्ञ) अमोल

* काल्पनिक

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 5 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –5 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

जेव्हा माझ्या घरी आई-बाबांना समजले की मी आता काहीच पाहू शकणार नाही, अर्थातच काही करू शकणार नाही, काय बरं वाटलं असेल त्यांना?आता ही चा काहीही उपयोग नाही, अ सा जर त्यांनी विचार केला असता,  तर माझ्यासाठी ते किती अवघड होतं. पण त्यांनी मला इतकं समजून घेतलं, इतकं तयार केलं म्हणूनच आज मी आनंदाने  वावरू शकते.

घरामध्ये मी सारखी आईच्या या मागे मागे असायची. किचन मध्ये काहीतरी लुडबुड करायची. आईला सारखं लक्ष ठेवायला लागायचं. एके दिवशी आईनं काय केलं, फुलाची परडी माझ्याकडे घेऊन आली आणि त्यात ली लाल फुलं उजवीकडे आणि पिवळी फुलं डावीकडे अशी ठेवली. माझा हात हातात घेऊन ते मला दाखवलं अर्थात स्पर्शज्ञानान मी

पाहिलं. सुई मध्ये दोरा ओवून दिला आणि एकदा उजवीकडच  एक फुल आणि एकदा डावीकडचा एक फूल अस ओवायला शिकवलं आणि झाला कि छान हार तयार. आईचा हा प्रयोग यशस्वी झाला. अर्थात हिला जमलं तर जमू दे कंपल्शन

केलं नाही. मलाही तो नाद लागला आणि  आमच्या देवाला रोज रंगीत फुलांचा मिळायला लागला. भाजी निवडायला हीआईनं मला शिकवलं. किसणीवर खोबरे किसायच,  गाजर किसायचं हेही मी शिकले. माझी आई जर त्यावेळी टी पं गाळत बसली असती तर आजची मी तुम्हाला दिसलेच नसते. घरातलं ट्रेनिंग मला आईने दिलं आणि बाहेर शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्वाचे धडे माझ्या बाबांनी गिरवून घेतले. खरंच या दोघांचा किती मोठा वाटा आहे माझ्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये !दोन्ही महत्वाचे होते. मी स्वयंपाक करू शकणार नव्हते पण आईला इतर कामात मदत करू शकले ‘अजूनही करते आहे.

मी साधारण सातवीत असताना टेप रेकॉर्डर, टेलिफोन आमच्या घरी आला.गाणी ऐकता ऐकता तो बंद कसा करायचा ते हात फिरवून मी बघायला लागले.माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी मला प्ले, स्टॉप, रेकॉर्ड या सगळ्या बटनां नी माझ्या बोटांनी ओळख करून दिली. रिवाइंडिंग कसं करायचं हेही शिकवलं. त्याचा मला पुढे खूपच उपयोग झाला. एम ए चा अभ्यास करताना मॅडम जे वाचून दाखवत ते मी टेप करून घेत होते. आणि मला पाहिजे तेव्हा ऐकू शकत होते. याच प्रमाणे नवीन आलेला फोन कुतुहलाने मी हात फिरवून ओळख करून घेत होते. माझ्या भावाने हाउ टू ऑपरेट हे मला शिकवलं. रिसिव्हर हातात दिला फोनवरील बटनांची एक ते नऊ आकड्यांची ओळख करून दिली. ते कसे दाबायचे तेही शिकवलं. 22 आकडा असेल तर दोन चे बटन दोनदा दाबायचे असे सांगितले. मी तशी करत गेले आणि आणि मला अपोआप फोन नंबर रही पाठ होत गेले. मुद्दाम पाठांतर असे करायला लागले नाही.

रेडिओ लावणे मला खूप सोप्प वाटलं. खूप आवडलं सुद्धा. काही वर्षांनी याच रेडियो मधून माझा आवाज मी ऐकू शकेन असे मला वाटले सुद्धा नव्हते. सांगली आकाशवाणी वरून ऊन आणि कोल्हापूर आकाशवाणीवरून माझी मुलाखत प्रसारित झाली आहे बर का !

अर्थात मला सगळेच येते असेही नाही. बाहेर जाताना कोणाच्यातरी मदतीशिवाय मी अजूनही जाऊ शकत नाही. पूर्वी मला बाबा म्हणायचे तुला पांढरी काठी घेऊन देऊया त्याची सवय कर म्हणजे तुला चालायला सोपे जाईल. पण पण त्यावेळी मी त्यांचे ऐकले नाही. तशी मी हट्टी होते.

रेग्युलर शाळेमध्ये जात असल्यामुळे आणि बाईंनी शिकवलेले सगळे समजत असल्यामुळे ब्रेल लिपी शिकण्याचे मला महत्त्व वाटले नाही. एकदोनदा मी प्रयत्न केला होता. पण तिथल्या वातावरणामुळे मला तिकोडी लागले नाही. मी ऐकून शिकायचे, लक्षात ठेवायचे, सांगायचे यामध्ये घोडदौड सुरू ठेवली.

आई सांगते लहानपणी माझं सुसाट काम होत. जीना सुद्धा सहज धडधडत उतरायची. बघणार यालाच भीती वाटायची इतरांनाच खूप काळजी वाटायची.

माझ्या स्वतःच्या वस्तू म्हणजे कंपास, पेन्सिल पेन रबरसगळं मी व्यवस्थित ठेवायची.मात्र माझ्या भावाला बहिणीला त्यांची एखादी वस्तू सापडेना झाली की खुशाल माझ्यातली काढून घ्यायची.मला समजल्यावर मी त्यांच्यावर खूप रागवाय ची. अर्थात ते थोडाच वेळ टिकायचं.

माझ्या काकूच्या आईने मला क्रोशाचे काम शिकवल. त्यांनी मला साखळी घालणे,  खांब घालणं शिकवलं होतं. त्याचा मी रुमाल ही के ला होता. अजून मी तो जपून ठेवला आहे. आत्तासुद्धा क्वचित मला क्रोशा चं मिळण्याचा मोह होतो. मी कधीतरी करते.

घरी कोणी आले तर त्यांना पाण्याचा तांब्या पेला नेऊन देते,  आईने तयार केलेला चहा ती कप बशी मी देते.सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटते.पण मी हे सगळं सरावाने   आणि आईला थोडीतरी माझी मदत व्हावी मुद्दाम शिकले आहे.

मागच्या वर्षी माझ्या बाबांना दवाखान्यात न्यायचे होते. त्यावेळी मी आधी फोन करून डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली होती. बाबांना रिक्षातून घेऊन गेले होते. सगळ्यांना त्याच्या इतकं आश्चर्य वाटलं की काही विचारू नका.

आवाजावरून मी लोकांना बरोबर ओळखण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये यशस्वी होते. मग काय विचारता भेटणारी व्यक्ती कौतुकच कौतुक करते. पण लक्षात ठेवणे हे मी मेंदुवर इतकं बिंबवलं आहे कि त्यामुळेच मी सगळं लक्षात ठेवू शकते.

आमच्या घरी वॉशिंग मशीन आणल्यानंतर मी तेसुद्धा शिकून घेतलं आणि सध्या तर मीच ते ऑपरेट करते. आईचं तेवढच एक मोठं काम कमी होतं ना !तेवढीच आईला मदत होते, तिला विश्रांती मिळू शकते याचा मला खूप आनंद होतो.

कॉलेजचा अभ्यास, वक्तृत्व स्पर्धा, गॅदरिंग, मैत्रिणी आणि आईने शिकवलेली घरातली काम हे सगळ करण्यामध्ये माझं बी. ए.वर्ष कसं संपलं समजले सुद्धा नाही.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ४) – भाग्यद बिभास २ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ४) – भाग्यद बिभास २ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

(कालच्या भागापासून पुढे चालू….)

पूर्वी उत्तर हिंदुस्थानी संगीतपद्धतीत थाटसंख्या बत्तीस होती. मात्र एकूणात ‘थाट’ ही संकल्पना मुख्यत्वे ‘थिअरॉटिकल’ असल्याने पं. विष्णु नारायण भातखंडेंनी ती जास्त सोपी करत थाटसंख्या दहावर आणली. आता वरती उल्लेखिलेले रागांचे थाट वेगवेगळे कसे हे पाहायचे तर पटकन दहा थाट म्हणजे कोणते स्वरसमूह आहेत हे पाहून घेऊ म्हणजे सगळेच सोपे होऊन जाईल. स्वर लिहीत असताना टायपिंगच्या मर्यादेमुळे प्रचलित नोटेशन सिस्टिम्सनुसार कोमल-तीव्र सुरांच्या खुणा करणे शक्य होत नाहीये. फक्त ह्या लेखापुरती सोय म्हणून असे करूया, ज्या स्वराभोवती कंस असेल तो कोमल व ‘म’च्या बाबतीत तीव्र समजावा. शुद्ध स्वरासाठी काहीच चिन्ह नाही.

१) बिलावल थाट – सा, रे, ग, म, प, ध, नि

२) खमाज थाट – सा, रे, ग, म, प, ध, (नि)

३) काफी थाट – सा, रे, (ग), म, प, ध, (नि)

४) आसावरी थाट – सा, रे, (ग), म, प, (ध), (नि)

५) भैरवी थाट – सा, (रे), (ग), म, प, (ध), (नि)

६) भैरव थाट – सा, (रे), ग, म, प, (ध), नि

७) कल्याण थाट – सा, रे, ग, (म), प, ध, नि

८) मारवा थाट – सा, (रे), ग, (म), प, ध, नि

९) पूर्वी थाट – सा, (रे), ग, (म), प, (ध), नि

१०) तोडी थाट – सा, (रे), (ग), (म), प, (ध), नि

वरचे दहा स्वरसमूह नीट पाहिले कि लक्षात येईल कि भूप हा कल्याण थाटामधील मधील म आणि नि हे दोन स्वर वगळून(वर्ज्य करून) तयार झाला आहे.

देशकार हा बिलावल थाटातील म आणि नि हे दोन स्वर वगळून तयार झाला आहे.

आता भूपाचा थाट कल्याणच का व देशकाराचा बिलावलच का(कल्याण का नाही) हे समजून घेण्यासाठी रागस्वरूपातील फरकाचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे.

बिभास हा राग भैरव थाटातील म आणि नि हे स्वर वगळून तयार झाला आहे आणि शुद्ध धैवताचा बिभास हा मारवा थाटातून म व नि हे स्वर वगळून तयार झाला आहे.

थोडक्यात ‘इनग्रेडियन्ट्स’च्या सेटमधील एखादा किंवा एकाहून जास्त पदार्थ बदलले तर तयार होणाऱ्या रेसिपीचा स्वादही त्यानुसार बदलेल. त्याचप्रकारे थाटानुसार(वापरल्या गेलेल्या स्वर-समूहानुसार) रागाची प्रकृती बदलत जाते.

गीतरामायणातील ‘चला राघवा चला’ हे गीतही ह्याच रागावर आधारित! ‘सांझ ढले गगन तले’आणि ‘नीलम के नभ छाई’ ही ‘उत्सव’ ह्या एकाच हिंदी चित्रपटातली दोन्ही गीतं रे व ध दोन्ही कोमल असणाऱ्या बिभासावर बेतलेली आहेत.  खरंतर, रागशास्त्रानुसार बिभास गाण्याची वेळ सकाळची आहे, परंतू ‘सांझ ढले’मधेही त्याचं असणं मनोहर वाटतं.

आणखी एक गोष्ट म्हणजे रे, ध कोमल असलेल्या बिभासाचेच आरोह-अवरोह असलेला ‘रेवा’ नावाचा राग हा संध्याकाळी गायला जातो. अगदी भूप-देशकाराप्रमाणेच वादी-संवादीमधे असलेला फरक व त्यानुसार बदललेले रागाचे चलन हाच फरक बिभास व रेवा ह्या दोन रागांमधे आहे. ‘बिभास’ चे वादी-संवादी अनुक्रमे ध आणि ग असून तो उत्तरांगप्रधान राग आहे. तर बरोबर सप्तकाच्या पूर्वांगातला ‘ग’ हा स्वर वादी असल्याने ‘रेवा’ हा पूर्वांगप्रधान राग आहे. बिभास भैरव थाटातला तर रेवा पूर्वी थाटातला!

मारवा थाटातल्या शुद्ध धैवताच्या बिभासाचा विचार करताना मला पटकन एक सुप्रसिद्ध नाट्यपद आठवालं संत कान्होपात्रा नाटकातलं ‘जोहार मायबाप जोहार’! ह्यातील पहिल्या व शेवटच्या दोन-दोन ओळी बिभासातल्या आणि मधल्या दोन ओळींमधे मात्र इतर स्वरांचा वापर झाला आहे. दुसरे एक पूर्वी रेडिओवर लागणारे सर्वांनीच ऐकले असेल असे भक्तिगीत ‘धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया’ ही शुद्ध धैवताच्या बिभासावर बेतलेलं आहे.

सहज नमूद करावेसे वाटले म्हणून लिहितेय, आणखी एक पूर्वी थाटातला बिभास सुद्धा आहे. त्याचे आरोह-अवरोह मात्र वरती आपण माहीत करून घेतलेल्या दोन्ही बिभासांहून पूर्ण वेगळे आहेत. मात्र तो अप्रचलितच म्हणायला हरकत नाही.

आता एक मजेदार गोष्ट पाहूया… ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे गीत भूपाची आठवण करून देतं तरीही पूर्ण भूपातलं नाही. कारण पहिल्या दोन्ही कडव्यांतल्या दुसऱ्या ओळीत पं. जितेंद्र अभिषेकींनी ओळीच्या शेवटी कोमल रिषभाचा खुबीने वापर केला आहे. त्यामुळे भूपात रमलेल्या श्रोत्यांना एक सुखद धक्का मिळतो. ह्या चमत्कृतीमुळे त्या ओळीसोबत शुद्ध धैवताच्या बिभासाच्या अंगाने विस्तार करता येतो आणि फक्त एकच स्वर बदलून परत तिसऱ्या ओळीत भूपावर येणे गाणाऱ्यालाही फार कठीण जात नाही. मात्र ही खुबीदार स्वरयोजना पं. अभिषेकीबुवांनी रागसंगीताच्या ज्ञानाच्या आधारेच केली असणार हे निश्चित आणि त्या ज्ञानामुळेच गाताना त्यात वेगळी ‘रंगत’ आणण्याची किमया ते साधू शकत होते! आज मुद्दाम तो अभंग ऐकून पाहावा आणि पहिल्या दोन कडव्यांच्या दुसऱ्या ओळीच्या शेवटी एकदम काही वेगळेपण ‘जाणवतंय’ का हे जरूर शोधावं! अशाचप्रकारे जाणीवपूर्वक कान देताना, संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नसेल तरीही आपल्याला रागांचे वेगळेपण ‘जाणवायला’ लागेल ह्यात शंका नाही!

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ल‌क्ष्मीपूजन  ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—४ ?

!! ल‌क्ष्मीपूजन  !!

ॐ  महालक्ष्मी च विद्महे

विष्णुपत्नीच धीमही

तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् !!

आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते‌. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते.  शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.

दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते.  मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.

घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक,  धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.

‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्‍याची भरभराट तर होतेच. पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको,  इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.

लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’,  स्वार्थात वापरतात ते वितरण , दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात, ‘लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.

लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.

एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवले लक्ष्मी शाश्‍वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना  खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares