मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ || शत्रुघ्न || – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ || शत्रुघ्न || – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

संपूर्ण रामायणात शत्रुघ्न हा कधीच जास्त वर्णिला गेला नाही, तो दुर्लक्षितच राहिला…

रामरक्षेत व एकंदरीत रामकथे मध्ये शत्रुघ्नचा उल्लेख फार कमी आहे. शत्रुघ्नाच्या जीवनाचे चिंतन केले तर आपला अहंकार विसर्जित होईल.  अनेकांना असे वाटते की, रामायणामधे शत्रुघ्नाने नेमके काय केले. रामकथे मध्ये जसे रामासोबत लक्ष्मणाचे नाव चिकटले, तसे भरतासोबत शत्रुघ्नाचे नाव चिकटले असे नाही. राम, लक्ष्मण, भरत यांच्यापाठोपाठ येणारे शेपटी सारखे नाव म्हणजे शत्रुघ्न नाही. रामकथेतही त्याचा फार जास्त उल्लेख नाही.

कधी कधी एखाद्या समारंभाचे फोटो बघताना माझ्या लक्षात येते की ज्याने काहीच कामे केली नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत. यांनी फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले. त्या वेळी माझे मन त्या लोकांचा शोध घेत असते, ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही. ते फक्त कामच करीत राहिले.

म्हणून शत्रुघ्नच्या कार्याकडे आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे. कल्पना करा की, दोघे भाऊ वनात आहेत. श्री भरत नंदिग्रामात आहेत. चौदा वर्षपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे. ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे. राजनीतिशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतिशास्त्रामधे राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजक हे आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते. राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा, ज्या दिवशी राजा नाही. अयोध्येला चौदा वर्षे राजा नाही. पादुकांची सेवा करीत श्रीभरत नंदिग्रामात बसलेले आहेत. दोघे भाऊ वनात आहेत. वडील स्वर्गाला गेले. मग अयोध्येचे राज्य चौदा वर्षे कोणी सांभाळले? ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते. काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचल्यास एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते ते लक्षात येईल.

शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते. घरामध्ये असलेल्या सहा महिलांना सांभाळायचे आहे. प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न आहे. कौसल्यामाता रात्रंदिवस अश्रूपात करते आहे. कैकयीमाता अंत:करणातून दग्ध होती. तिला आता आपल्या कर्माचा पश्चात्ताप होतो आहे. ऊर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नाही. मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदिग्रामात आहे. पण ती तिथे जाऊन पतीला भेटू शकत नाही. थोडा या परिस्थितीचा विचार करा. पण चौदा वर्षे इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही.

शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे. अयोध्येचे संपूर्ण राज्य आणि सेना त्याने चौदा वर्ष सांभाळली. आणि एवढे करूनही चौदा वर्षांनंतर रामचंद्र परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वांत पुढे नाही. पुढे गुरुदेव वसिष्ठ जातात. नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत जातो. भगवान राम परत आल्यानंतर सारे जण राम-भरत-भेटीचे वर्णन करतात. पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही.

ही मंडळी फोटोकरता नाहीतच. पण ते फोटोत दिसत नाहीत, म्हणून त्यांनी काही काम केल नाही असे म्हणणे कृतघ्नपणा आहे.

एखादे उत्तम देवालय उभे असते. लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात. भिंतीकडे पाहतात. सुंदर कलाकुसर पाहतात. पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडांवर उभे असते त्या दगडांकडे कोणाचे लक्ष जात नाही. हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीचं निघत नाही. फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ, तर ते मंदिर किती वेळ उभे राहील? इतके सुंदर मंदिर उभे आहे, कारण पायातले दगड स्वत:ला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत.

म्हणून मला तर नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो.

त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे. कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले. आपल्या व्रताचे पालन करताना १४ वर्षात सिंहासनावर बसण्याचा क्षूद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधीही शिवला नाही. वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे. नंदिग्रामात राहूनसुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे आहे. पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंत:करणाने संन्यासी राहणे हे फार कठीण आहे. आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही.

जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करावे. त्या पायाखालच्या दगडाला आठवावे. म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते कळेल.

मी सगळी कामे व्यवस्थितपणे पूर्ण करीन. पण मला काहीही नको. आपल्याला हे जमेल का? *

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ जीवनाचा प्रवास… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

हा असं वागला, तो तसं वागला,

कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो, याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.

 या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत, हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोणी कसंही वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.

 आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली, तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.

जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे, असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.

आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.

 ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, त्याला अजूनही नोकरी नाही.

 कृतज्ञ रहा.

 *

ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत, पण यश मिळाले नाही.

 कृतज्ञ रहा.

 *

तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे, जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.

 कृतज्ञ रहा.

 *

ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे.

 कृतज्ञ रहा.

 *

तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.

 कृतज्ञ रहा.

  

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
3

मराठी साहित्य – विविधा ☆ विहंगावलोकन… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ विहंगावलोकन…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

विहंगावलोकन, विहंग + अवलोकन अशी फोड असणारा हा तसा समजायला सोपा शब्द. विहंग करणारे ते पक्षी. पक्षी विहंग करतात, म्हणजे आकाशात उंच उंच जातात. उंच विहार करु शकतात. तेथून ते खाली जमिनीवर लक्ष ठेऊ शकतात. थोडक्यात, विहंगावलोकन म्हणजे उंचीवरून केलेलं अवलोकन, निरीक्षण. घार, गरुड, गिधाडे असे काही पक्षी, इतर पक्ष्यांच्या तुलनेत जास्त उंचावरुन उडतात. यातील घार आपल्याला जास्त परिचीत आहे. दोनशे ते पाचशे फूट उंचीवरून उडणारी घार, जमिनीवरील भक्ष्य शोधते, तसेच आपल्या पिल्लांवरही नजर ठेवून असते. तिची नजर खूपच तीक्ष्ण असते. घारीची नजर हा वाक्प्रचारही आपण वापरतो.

विहंगावलोकन म्हणजे कोणत्याही बाबीकडे, प्रकरणाकडे, घटनेकडे, सूक्ष्म, अतिसूक्ष्म नजरेने पाहणे. या क्रियेत अतिशय बारीक सारीक मुद्दे विचारात घेतले जातात. हे काम नक्कीच सोपं नसतं. क्लिष्ट असतं. ज्या गोष्टीचा असा अभ्यास करायचा आहे, त्या गोष्टीची सखोल माहिती असणं आवश्यक असतं. त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असणं गरजेचं असतं. मुळात त्या गोष्टीकडं एकाच अंगानं न बघता अनेक कोनातून बघावं लागतं. त्या गोष्टीचा सर्वांगानं अभ्यास करावा लागतो. असा सर्वंकष विचार आपण कधीतरीच करतो. बऱ्याच वेळा तो करतच नाही. पण आपल्या आवडीच्या गोष्टीकडं मात्र आपण सर्वांकष नजरेने बघू शकतो.

एखादं ऑफिसचं काम, अभ्यास, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन असा सर्वंकष विचार करून केला जातो तेव्हा ते किती उत्कृष्ट होतं ना! आपण कधी असा विचार केला आहे का; आपल्या कृतीचं, विचारांचं किंवा आपण केलेल्या एखाद्या कामाचं असं विहंगावलोकन करणं गरजेचं आहे? बहुतेक वेळा आपण तसा विचार करत नाही. कधी कधी आपण उगाचच आपलं मत मांडून रिकामे होतो. घडलेल्या गोष्टीविषयी मत मांडणं फारच सोपं असतं. परंतु साधक-बाधक दृष्टीने विचार करून बोलणं फार कठीण! एखाद्या वेळेस अशी आपणच आपली उलट तपासणी केली तर! आपणच आपल्या कृतीचं कामाचं मनात आलेल्या विचारांचं किंवा बोलून दाखवलेल्या वाक्याचं असं विहंगावलोकन केलं तर? यामुळे आपली शिकण्याची क्षमता वाढेल. स्वजागरूकता निर्माण होईल. भोवतालच्या परिस्थितीचा योग्य अंदाज येईल.

काम झाल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारावेत. हे बरोबर झाले आहे का? योग्य आहे का? याचा काय परिणाम होईल? आणखी कोणत्या पद्धतीनं आपल्याला ते करता येईल? थोडक्यात, स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. त्यामुळे आपण कुठं आहोत? काय करायचं आहे? कसं करायचं आहे? याचा आढावा घेता येणं शक्य होईल. कोणत्याही विषयावर प्रभुत्व मिळवायला हा विचार, हे प्रश्न नक्कीच मदत करतील. त्यामुळे अघटीत गोष्टी टाळता येतील, हो ना? अनिश्चितता टाळायलाही, भीती कमी करायलाही असं परीक्षण उपयोगी पडेल. आत्मबल वाढेल. प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढेल. आपल्या भावनिक कक्षा रुंदावतील आणि मानसिक आरोग्य ही सुधारेल. ही गोष्ट खूप कठीण नक्कीच नाही. का, कशासाठी, कधी, कसे, केव्हा किंवा आणखी कोणते पर्याय? असे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे. आपलंच निरीक्षण करायचं. उत्तर शोधायचं. हं, दुसऱ्याकडे बोट दाखवणं सोपं असतं. त्यापेक्षा आपण आपल्याकडेच बोट दाखवू. आपल्या मनातून आपल्यातल्या ‘मी’ ला थोडं बाहेर काढू आणि ‘मी’ ला बाहेरून तपासून बघू. आपणच आपली उन्नती करून घेऊ. हेच तर आहे विहंगावलोकन.

सोप्पं वाटलं तरी हे तसं अवघड आहे. कारण हे एक प्रकारचं आत्मपरीक्षण आहे. स्वतःला तपासणं आहे. स्वतःतील उणीव शोधणे आहे आणि अशी उणीव शोधायला फारसं आपल्याला आवडत नाही. जरी उणीव लक्षात आली, तरी स्वीकारून बदल करायला त्याहूनही कठीण. पण हे साधायला पाहिजे. स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःला उन्नत करण्यासाठी ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. हे घडेल तेव्हा आपण जास्त समाजाभिमुख होऊ. तसेच आपणच आपल्याला शिकवून शहाणं करू.

 

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ थ्रिलर… भाग – २ ☆ तृप्ती देव ☆

(तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं, “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना? एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द! _

इथून पुढे  

त्यानंतर मी विचार केला की, झोपेत असताना उशी तोंडावर दाबून गुदमरवून मारावं. यात रक्ताचा थेंबही सांडणार नाही आणि काही वायाही जाणार नाही. मी लिहिलं, “तो सावलीसारखा बेडजवळ गेला आणि त्याने सुती उशी त्या पात्राच्या तोंडावर जोरात दाबली… ” पण लगेच माझ्या मनात विचार आला, “अरेरे! ती उशी आणि त्याचं कव्हर तर अगदी नवीन आहे. माणूस वाचण्यासाठी हातपाय मारेल, तडफडेल, त्याने ते कव्हर फाटून जाईल किंवा खराब होईल. नको नको, उशी नको. ” उशीचा प्लॅनही फ्लॉप झाला. शेवटी मी ठरवलं की आपण स्वतः काही करायला नको, निसर्गावर किंवा नशिबावर सोडून देऊ. ‘अपघात’ दाखवू या. मी लिहिलं, “खुन्याने रात्रीच्या अंधारात त्याच्या कारचे ब्रेक निकामी केले. दुसऱ्या दिवशी तो कार घेऊन घाटातून जात असताना… ” पण लगेच माझ्या मनात पाझर फुटला, “अरे, पण घाटात गाडी चालवताना कारमध्ये त्याच्यासोबत त्याची बायको लहान मुलं किंवा एखादा निरपराध मित्र असेल तर? एकाच्या पापात बाकीच्या निष्पाप जीवांचा बळी का? कार दरीत कोसळली तर संपूर्ण कुटुंब संपून जाईल. ” माझ्या संवेदनशील मनाने कारचे ब्रेक पुन्हा जागेवर दुरुस्त केले. कथा पुन्हा शून्यावर आली!

दोन दिवस झाले होते. माझ्या वहीत खाडाखोड करून फक्त चार ओळ्या उरल्या होत्या, पण माझ्या डोक्यात मात्र चाळीस जिवंत माणसं इकडून तिकडे फिरत होती. मला रात्री झोपेतही तेच विचार यायचे. दोन दिवस सतत विचार करून माझं डोकं जाम झालं होतं. शेवटी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला, जी साहित्याची जाणकार होती. मी तिला माझी अडचण सांगितली, “अगं, तूच सांग, तुझ्या कथेत मर्डर कसा करतात ग लोक? मला जमतच नाहीये. ” ती फोनवर शांतपणे म्हणाली, “वेडी आहेस का तू? अगं, तो खून खराखुरा नसतो. ती फक्त एक काल्पनिक कथा असते. पात्रं काल्पनिक असतात. ” मी हताश होऊन म्हणाले, “मला माहिती आहे गं ते काल्पनिक असतं. पण जेव्हा मी लिहायला घेते, तेव्हा माझं मन त्या पात्रांना जिवंत समजतं. मला वाटतं मी खरोखरच कोणाचा तरी जीव घेतेय. ” माझं हे भाबडेपण ऐकून ती फोनवर पोट धरून हसायला लागली.

त्या रात्री मन हलकं करण्यासाठी मी टीव्ही चालू केला. एका वाहिनीवर गुन्हेगारीवर आधारित मालिका सुरू होती. त्यात एका माणसाने क्षणात खिशातून बंदूक काढली आणि समोरच्यावर गोळी झाडली. समोरचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला. मी दचकून रिमोटने टीव्ही लगेच बंद केला. मनात एकच प्रश्न आला, “हे पडद्यावर किंवा पुस्तकात इतकं सहज कसं दाखवतात? माणसाचा जीव घेणं इतकं सोपं असतं का? ” दुसऱ्या दिवशी सकाळी मी वर्तमानपत्र उघडलं. पहिल्याच पानावर मोठी बातमी होती, “जमिनीच्या किरकोळ वादातून सख्या भावाने केला भावाचा खून. ” पान उलटलं, तर दुसऱ्या पानावर बातमी होती, “मोबाईल गेमवरून झालेल्या भांडणातून मित्राने मित्राचा जीव घेतला. ” मी काही क्षण स्तब्ध झाले. वर्तमानपत्र हातातून गळून पडलं. कालपर्यंत ज्या विषयावर मी घरात विनोद करत होते, पती आणि मुलासोबत हसत होते, ते वास्तव किती भयानक, क्रूर आणि वेदनादायी आहे याची मला जाणीव झाली. समाजात माणसाच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे? किती सहजतेने हत्या आणि मर्डर होते.. मी तर माझ्या पायाखाली मुंगी पण मारू शकणार नाही.

आणि धडा धड दररोज मर्डर होतात आहे.

मी पुन्हा माझ्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि वही उघडली. या क्षणी माझ्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. मी ठरवलं, मी मर्डर मिस्ट्री लिहिणारच नाही. माझ्याकडून कोणाचा खून होणार नाही— अगदी कागदावरसुद्धा नाही! त्याऐवजी, मी पेन उचललं आणि एका वेगळ्याच कथेला सुरुवात केली. मी एका अशा लेखिकेची कथा लिहायला घेतली, जिला स्पर्धेसाठी मर्डर मिस्ट्री लिहायची असते, पण अत्यंत संवेदनशील मनामुळे हजार प्रयत्न करूनही तिच्याकडून कथेत कोणाचा खून होत नाही. ती कशी पात्रांना वाचवत राहते, याची ती एक हलकीफुलकी पण अंतर्मुख करणारी कथा होती.

स्पर्धेचा दिवस आला, मी माझी ती ‘वेगळी’ कथा पाठवून दिली. काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे माझ्या कथेला पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळाला नाही. कारण कथेच्या मुख्य अटीनुसार त्यात ‘मर्डर’ किंवा ‘रहस्य’ नव्हतंच. पण निकालपत्राच्या शेवटी परीक्षकांनी माझ्या कथेबद्दल विशेष नोंद म्हणून एक ओळ लिहिली होती. ती ओळ वाचून माझे डोळे भरून आले. तिथे लिहिलं होतं, “ही कथा कोणत्याही गुन्ह्याची किंवा रक्ताची नाही; तर ही एका अत्यंत संवेदनशील आणि जिवंत मनाची कथा आहे. लेखिकेचे विचार कौतुकास्पद आहेत. ” तो कागद हातात धरून मी बराच वेळ शांत बसून राहिले. तो पुरस्कारापेक्षाही मोठा सन्मान होता.

संध्याकाळी चहा पिताना नवरा हसत हसत म्हणाला, “चल काही हरकत नाही. यंदा नंबर नाही आला तर काय झालं? पुढच्या वर्षी नक्कीच प्रेमकथेची किंवा कौटुंबिक विषयावरची स्पर्धा असेल. तेव्हा बघू. ” मी चहाचा घोट घेतला आणि हसून म्हणाले, “हो… ते माझ्याकडून नक्कीच होईल. त्यात मी अव्वल येईन. ” त्याने डोळे मिचकावत पुन्हा विचारलं, “आणि मर्डर मिस्ट्री? ” मीही तितक्याच आत्मविश्वासाने आणि हसून उत्तर दिलं, “माझ्याकडून कागदावरसुद्धा मर्डर होत नाही आणि प्रत्यक्ष आयुष्यात तर प्रश्नच उद्भवत नाही! “

त्या दिवशी मला जगण्याचं आणि लेखनाचं एक खूप मोठं सत्य कळलं होतं. लेखक तो मोठा नाही, जो आपल्या लेखणीच्या बळावर सहज एखादं पात्र मारून टाकतो आणि क्रूरता निर्माण करतो. खरा लेखक तर तो असतो, ज्याच्या मनात आणि लेखणीत पात्रांना जिवंत ठेवण्याची ताकद असते, जे पात्र वाचकांच्या मनात घर करून राहतं. काही लोकांच्या हातात शस्त्र असतं, तर काही लोकांच्या हातात पेन असतं. शस्त्र माणसाचा जीव घेऊ शकतं, समाजात भीती पसरवू शकतं. पण एक पेन… ते माणसाची मेलेली मनं आणि संवेदना जिवंत ठेवू शकतं. आणि कदाचित म्हणूनच, मला सार्थ अभिमान आहे की आजपर्यंत माझ्याकडून कागदावर का होईना, पण एकही “मर्डर” झाला नाही आणि माझी लेखणी नेहमीच माणुसकी जपणारी राहिली!

धन्यवाद 

– समाप्त – 

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९५ आणि ९६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९५ आणि ९६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९५ – – – 

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।

तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।

शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।

मुखे बोलता ख्याति झाली पुराणी ।।९५।।

अर्थ : दुराचारी असलेल्या अजामेळाने अंतकाळी आपल्या नारायण पुत्राचे नाव घेतले. त्या मुलाचे सतत नाम घेतल्याने त्याला मुक्ती मिळाली. एका गणिकेने ‘ राम राम ‘ हे आपल्या पोपटाचे नाम सतत घेतल्याने तिचा देखील उद्धार झाला. आपल्या अंतकाळी भगवंताचे नाम घेणाऱ्या व्यक्तींच्या या कथा पुराणात प्रसिद्ध झाल्या.

(शुक – पोपट, कुंटणी – गणिका/वेश्या)

विवेचन : भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ या श्लोकात पुराणातील दोन वेगळी उदाहरणे आपल्या देतात. अजामेळ ब्राह्मणाची कथा भागवतात आली आहे. अजामेळ हा दुराचारी होता. आपल्या आयुष्यात त्याने कधी भगवंताचे नाम घेतले नाही. आपला अंतकाळ जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला आपल्या लाडक्या नारायण या पुत्राची आठवण होऊन तो त्याच्या नावाचा जप करू लागला. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्याला मुक्ती दिली अशी कथा आहे. दुसरी कथा आहे पिंगला या गणिकेची. तिने देखील आपल्या संपूर्ण आयुष्यात परमेश्वराची भक्ती केली नाही. परमेश्वराबद्दल तिला एक प्रकारचा तिरस्कार होता असे म्हटले तरी चालेल. त्याच भावनेतून तिने आपल्या आवडत्या पोपटाचे नाव ‘राम ‘ असे ठेवले. अजाणतेपणी का होईना पण त्यानिमित्ताने ती रामनाम घेत गेली. त्यामुळे तिचा उद्धार झाला. खरी गोष्ट अशी आहे या सगळ्यांना मृत्यूसमयी आपल्या चुकीचा पश्चाताप होऊन त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यातूनच त्यांचा उद्धार झाला.

तर्कशास्त्राच्या कसोटीवर या कथा आजच्या काळात टिकणाऱ्या नाहीत. नास्तिक आणि बुद्धिवादी लोक तर या पुराणातील भाकडकथा आहेत म्हणून सहज उडवून लावतील. पण समर्थांच्या काळात या कथा प्रचलित होत्या. लोकांनी परमेश्वराचे नाम कोणत्याही प्रकारे का होईना पण घ्यावे आणि त्यांना रामनामाचे महत्व पटावे एवढाच समर्थांचा या कथा सांगण्यामागील उद्देश असावा. आपणही तो उद्देश लक्षात घेऊ या. आपल्यासाठी त्या कथांपेक्षा समर्थांचा संदेश महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण धान्य निवडताना आपण फोलपट टाकून देऊन सार आपल्याकडे ठेवतो त्याप्रमाणे बाकी निरुपयोगी फोलपट टाकून सार तेवढे ग्रहण करू या. रामनाम हेच सार आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

स्वसंवाद ::

१. पुराणातील कथांमधील चमत्कारिक गोष्टींवर तर्क लढवत बसण्यापेक्षा, त्यामागे संतांनी दिलेला ‘नामस्मरणाचा’ मूळ संदेश (सार) मी स्वीकारू शकतो का?

२. “अजाणतेपणी किंवा मुलाच्या ओढीने घेतलेले नाम जर अजामेळाला तारू शकते, ” तर मग मी जाणीवपूर्वक आणि मनापासून नाम घेतले तर माझ्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडू शकेल?

३. संसाराच्या वेगवेगळ्या विवंचनेत अडकलेला असतानाही, मी माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा व्यवहारात भगवंताच्या नामाचे अधिष्ठान ठेवतो का?

४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, “रामनाम हेच अंतिम सार आहे” हे स्वीकारून मी मनातील निरर्थक शंकांचे ‘फोलपट’ टाकून द्यायला तयार आहे का?

=====

श्लोक क्र. ९६ – – – 

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।

जपे रामनामावळी नित्यकाळी ।

पिता पापरूपी तया देखवेना ।

जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।।९६।।

अर्थ : भगवंताचा महान भक्त असलेला प्रल्हाद याचा जन्म दैत्यकुळात झाला. परंतु तो नित्य भगवंताच्या नामाचा जप करीत असे. अत्यंत पापी असलेला त्याचा पिता हिरण्यकश्यपू याला ते पाहवेना. त्याने आपल्या आयुष्यात कधीही नामस्मरण केले नाही.

विवेचन : 

भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ आपल्याला प्रत्येक श्लोकात वेगवेगळी उदाहरणे देत आहेत. एखाद्या कुशल शिक्षकाने ज्याप्रमाणे विविध उदाहरणे देऊन आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावे तसे समर्थ आपल्याला सांगत आहेत. या अर्थाने समर्थ हे लोकशिक्षक आहेत. जन उद्धाराची तळमळ त्यांना आहे. ‘बुडते हे जन न देखवे डोळा ‘ या भावनेतून ते आपल्याला रामनामाचे महत्व सांगत आहेत.

प्रल्हाद हा विष्णूचा महान भक्त होता. पण त्याचा जन्म एका दैत्यकुळात झाला होता. दैत्यकुळातील मंडळी म्हणजे साधारणपणे भगवंताला विरोध करणारी किंवा त्याला आपला शत्रू मानणारी होती. अशा प्रतिकूल ठिकाणी प्रल्हादाचा जन्म झाला. पण भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादाला गर्भातूनच मिळाले होते. त्याची आई कयाधू ही गर्भारपणी महर्षी नारदांच्या आश्रमात राहिली होती. तिथेच भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादावर झाले.

प्रल्हादाला आपल्या घरातील परिस्थिती भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी अनुकूल नव्हती. पण भगवंताचा खरा भक्त होण्यासाठी जे गुण लागतात, त्या गुणांनी तो परिपूर्ण होता. त्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड येत असे. ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्राचा नित्य जप तो करीत असे. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रल्हाद नारायणाचे म्हणजे विष्णूचे नाम जपत होता. पण वरील श्लोकात समर्थांनी ‘ जपे रामनामावळी ‘ असे म्हटले आहे. नारायण असो की राम, तो सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला दाखवून देतात. त्यामुळे आपण देखील भगवंताच्या नामात भेदभाव करणे योग्य नाही.

परमेश्वराला आपला शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूला अर्थातच हे आवडणे शक्य नव्हते. हिरण्यकश्यपू हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शंकरांकडून असा वर मागून घेतला होता की ज्या वरामुळे त्याला सहजासहजी कोणी मारू शकत नव्हते. त्यामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. आणखीनच उन्मत्त झाला. प्रजेवर आणि भगवंताच्या भक्तांवर जुलूम करू लागला. पण आपला स्वतःचाच मुलगा आपले ऐकत नाही असे पाहिल्यावर त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. पण प्रल्हादाची भगवंतावर अविचल श्रद्धा होती. भगवंताने हर प्रकारे त्याचे सर्व संकटातून रक्षण केले. हिरण्यकश्यपू पापी असला तरी प्रल्हादासारखे भगवंतावर अविचल निष्ठा असणारे पुत्ररत्न त्याच्या उदरी जन्मले हे त्याचे केवढे भाग्य! त्यामुळेच आपल्या अंत्यसमयी हिरण्यकश्यपूला नरसिंहरूपाने भगवंताचे दर्शन झाले आणि त्याला मुक्ती मिळाली.

प्रल्हादाचा जन्म जरी दैत्यकुळात झाला तरी इच्छा असली तरी विपरीत परिस्थितीत देखील भगवंताचे नाम घेऊन तरून जाता येते हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. आपणही प्रल्हादाप्रमाणे भगवंताचे नाम घेऊन या भवसागरातुन तरून आपला उद्धार करून घेऊ शकतो. तो आपल्याला सर्व संकटातून सोडवेल.

स्वसंवाद ::

१. माझ्या सभोवतालची परिस्थिती किंवा घरचे वातावरण परमार्थ साधण्यासाठी अनुकूल नाही, असे रडत न बसता मी प्रल्हादासारखा ‘अविचल’ राहून नामस्मरण करू शकतो का?

२. राम, कृष्ण, विष्णू किंवा शिव यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझ्या मनाची ऊर्जा वाया घालवतो आहे, की सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हे सत्य स्वीकारतो?

३. हिरण्यकश्यपूप्रमाणे मीही उन्मत्त होऊन माझ्या जवळच्या माणसांवर किंवा सत्प्रवृत्तींवर अन्याय तर करत नाहीये ना?

– क्रमशः श्लोक ९५ आणि ९६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापन…” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापन…” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

आयुष्याच्या एका वळणावर खूपच तीव्रतेने हे जाणवतं की आपला वेळ आणि ऊर्जा महत्वाची आणि मुख्य म्हणजे मर्यादित आहे. त्यामुळे अनावश्यक वादा-वादी, बिनमहत्त्वाची संभाषणे, आपल्या आयुष्यात ज्यांचं फार महत्त्व कधीही नव्हतं अशा केवळ जुन्या म्हणून जोपासलेल्या ओळखी, नाती, माणसं ह्यांच्यावर आपला वेळ आणि ऊर्जा खर्चणं हे नकोसंच नव्हे तर क्रिमिनल वाटायला लागतं.

खरं तर ही उपरती यायला वयाच्या पस्तिशीतच सुरुवात झालेली असते, पण हे स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल करायला अजून काही काळ जावा लागतो, आणि ते तसं कबूल केल्यानंतरही आहे हे असं आहे ह्याचा कुठलाही अपराध भाव न ठेवता स्वीकार करायला आणि मुख्य म्हणजे कोणाचीही भीड मुर्वत न बाळगता त्याप्रमाणे वागायला अजून काही महिने/वर्षे जावी लागतात.

ही जाणीव अचानक येत नाही. ती एखाद्या नदीसारखी आपल्या मनाच्या दरीत हळूहळू आपला मार्ग कोरत जाते. इंटरनेटवरच्या एखाद्या निरर्थक भांडणानंतर जाणवणारा मानसिक थकवा, अर्धा तास स्क्रोल केल्यानंतर जाणवणारं रिकामपण, एखाद्या जुजबी ओळखीच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून झाल्यावर आतून जाणवणारा कंटाळा, ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर होणारी चिडचिड, आणि त्या चिडचिडीची त्याच क्षणी जाणवणारी व्यर्थता, हे सगळे खरं तर लहान लहान इशारे असतात. आपण ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित करतो, कारण नात्यांना जपणं, माणसं सांभाळणं, आपला मुद्दा कसंही करून लोकांना पटवून देणं हे सगळंच आपल्या रक्तात भिनलेलं असतं. पण एक दिवस असा येतो की शरीर आणि मन दोन्ही एकाच वेळी स्पष्ट सांगतात की आता बास झालं. हा दिवस एका नव्या स्पष्ट, टोकदार जाणिवेच्या कोंभासारखा असतो, जो आपल्या मनाची जमीन फाडून जन्म घेत असतो.

इथून पुढचा प्रवास सोपा नसतो, पण तो खरा असतो. सुरुवातीला अपराधीपणाची एक सावली सतत मागे मागे येत राहते. जमणार नसलेल्या कोणाच्यातरी कसल्यातरी कामाच्या विनंतीला स्पष्टपणे नाही म्हटलं की मन स्वतःलाच कुरतडत राहतं. कधी मनात नसूनसुद्धा जुन्या सवयीने वाद घातले जातात, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे माहिती असताना देखील. नुसत्याच जुन्या ओळखीच्या म्हणून मंद आचेवर ठेवलेल्या नात्याचा बर्नर आपण ऑफ करतो तेव्हा कुठल्यातरी कोपऱ्यातून जुन्या संस्कारांचा आवाज कानात घुमतो. पण नंतर हळूहळू लक्षात येतं की हा अपराधभाव आपला स्वतःचा नाही, तो आपल्याकडे भरपूर वेळ आहे ह्या भ्रामक जाणिवेतून जन्मलेला आहे. एकदा ते समजलं की मग त्या विचारांच्या विळख्यातून स्वतःला बाहेर काढणं सहज शक्य होतं.

आपल्या वेळेकडे आणि ऊर्जेकडे पैशासारखं बघायला शिकावं लागतं. जसं आपण महिन्याचं बजेट आखतो, तसंच आपल्या दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं, वर्षाचं भावनिक बजेट आखता यायला हवं. कोणत्या व्यक्तींसोबत घालवलेला वेळ आपल्याला नवी ऊर्जा देतो आणि कोणाबरोबर घालवलेला वेळ आपल्याला ड्रेन करतो, हे एकदा स्पष्ट कळायला लागलं की निवड करणं सोपं होतं.

दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला शिकणं. हा एकच छोटा शब्द, नुसता उच्चारायला सोपा वाटणारा, पण अंगी बाणवायला सर्वात कठीण. एखाद्या आमंत्रणाला, एखाद्या मागणीला, एखाद्या संभाषणाला नाही म्हणताना खरंतर कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. तरीही आपण मोघम बोलतो, एखादी गोष्ट मनातून करायची नसली तरी, ‘हो, बघू, जमलं तर करतो/करते’, असं काहीतरी बोलून आपण वेळ मारून नेतो. पुढच्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढतात आणि नंतर नाही म्हणणं अधिकच कठीण होऊन बसतं. त्यापेक्षा आधीच जे जमणार नाही/जमलं तरी करावंसं वाटत नाही त्याला स्पष्टपणे नकार द्यायला शिकलं पाहिजे.

तिसरी गोष्ट, जुन्या ओळखींकडे, जुन्या नात्यांकडे कृतज्ञतेने बघावं, पण केवळ जुन्या ओळखी आहेत म्हणून त्या टिकवण्याची सक्ती स्वतःवर लादू नये. एकतर्फी सक्ती तर स्वतःवर कधीच करू नये. एखादं नातं भूतकाळात कधीतरी महत्त्वाचं होतं म्हणून ते आताही तितकंच महत्त्वाचं असलं पाहिजे हा काही नियम नाही. काही नाती द्यायचं ते देऊन आयुष्याच्या प्रवाहाबरोबर पुढे जातात. त्यांना तिथेच समंजसपणे निरोप देणं हा त्या नात्याचा अपमान नसतो, ती त्या नात्याचा दिलेली योग्य तिलांजली असते.

चौथी गोष्ट, तुमचं समाज माध्यमांवरचं किंवा व्यावसायिक जीवनातलं वर्तुळ कितीही विस्तृत असो. आपल्या भोवतीचं खऱ्या आयुष्यातल्या मोलाच्या माणसांचं वर्तुळ नेहमी लहान आणि निवडकच ठेवावं. ज्यांच्याशी बोलल्यावर मन हलकं होतं, ज्यांच्यासमोर मुखवटा घालावा लागत नाही, तुम्ही जसे आहेत तसे तुम्हाला स्वीकारणारी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच असतात, आणि तितकीच पुरेशी असतात. पण ती नाती मात्र जपली-जोपासली गेलीच पाहिजेत. आपल्या भोवती पाच हजार लोकांची गर्दी जमवणं हे यश नाही, रात्री तीन वाजता देखील एका हाकेवर धावून येतील अशी पाच माणसं आयुष्यात असणं हे यश आहे.

पाचवी गोष्ट, रोजच्या दिवसात थोडा वेळ केवळ स्वतःसाठी राखून ठेवणं. पहाटेची शांत वेळ, एक कप चहा, थोडं वाचन, थोडं चालणं, ध्यान, थोडा व्यायाम, संगीत, नृत्य, एखादी हस्तकला, ह्यातलं काहीही करा पण तो वेळ इतर कोणाशीही वाटून घेण्याची गरज नाही. हा केवळ स्वतःसाठी राखून ठेवलेला वेळ आपल्याला उरलेल्या दिवसासाठी स्थिर ठेवतो. ह्या एकांतात सोबतीला कुठलाही मोबाईल, कुठलीही स्क्रीन नसावी, कारण खरं एकटेपण आणि स्क्रीनसमोरचं एकटेपण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिलं आपल्याला भरभरून देतं, दुसरं आपल्याला रितं करतं.

सहावी गोष्ट, आपल्या शरीराचं ऐकायला शिकावं. झोप पुरेशी झाली नाही की मन कमकुवत होतं आणि मग नकोसे संवाद, नकोसे विचार आपल्यावर सहज स्वार होतात. वेळेवर घेतलेलं, साधं, सकस, घरी बनवलेलं जेवण, पुरेशी झोप, रोजचा थोडा, पण नियमित व्यायाम, स्वतःसाठी शिल्लक ठेवलेला थोडा वेळ, ह्या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टीच भावनिक स्पष्टतेचा पायाच असतात. शरीर थकलेलं असताना मनाने घेतलेले निर्णयही बहुधा चुकीचेच ठरतात, म्हणून आधी शरीराला विश्रांती द्यावी, मग मनाला निर्णय घेऊ द्यावा.

सातवी गोष्ट, सणासुदीला, कौटुंबिक प्रसंगांना उपस्थित राहायचं की नाही हे ठरवताना जिथं मनापासून जावंसं वाटतं तिथे जावं, भरपूर वेळ तिथे घालवावा. जिथे केवळ कर्तव्य म्हणून जावं लागतं तिथेही जरूर जावं, पण आवश्यक तितकं अंतरही ठेवावं. असं करणं म्हणजे परंपरेचा अनादर नाही, तर स्वतःच्या मर्यादांचा आदर आहे.

आठवी आणि कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट, हे सगळं करताना स्वतःला दोष न देणं. आपला वेळ आणि ऊर्जा ह्यांना प्राथमिकता देणं हा स्वार्थ नाही. अनावश्यक बोजा खाली ठेवून जे हात आपण रिकामे केले, ते नंतर खऱ्या अर्थाने आपल्याला महत्त्वाच्या असणाऱ्या कामांसाठी, माणसांसाठी, ध्येयपूर्तीसाठी मोकळे राहतात. जुन्या झाडाची वाळत आलेली, निरुपयोगी फांदी छाटली की तिथेच नवीन अंकुर फुटतात. झाड अधिक जोमाने वाढतं, तसंच आपलं आयुष्यही ह्या छाटणीनंतर अधिक सशक्त होतं. एकदा हे सत्य उमगलं की पुढचा रस्ता आधीपेक्षा जास्त उजळ, जास्त हलका आणि जास्त आपला वाटायला लागतो.

लेखिका:शेफाली वैद्य

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – विविधा ☆ कालाय तस्मै नम: ☆ प्रतिमा रवींद्र कुलकर्णी ☆

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

? विविधा ?

☆ कालाय तस्मै नम: प्रतिमा रवींद्र कुलकर्णी 

श्रावणसरी येतात,  चिंब भिजवतात

आठवणींची पानं हलकेच उलगडतात

नऊवारीचे ओचे सावरत आजी म्हणायची उठता उठता…

“चला बाई श्रावण आला,

कामाला लागायला हवं आता.

गेजवस्त्रं करायला हवीत,  फुलवाती भिजवायला हव्या.

गव्हले करुन ठेवीन म्हणते,  खारका सुपा-या आणायला हव्या.”

व्रतं वैकल्यं ती करायची,  नैवेद्य-कहाणीला आम्ही आधाशी. फराळोत्सव होई आमचा

ती बिचारी खरीच उपाशी.

श्रावण सारा मजेत जाई गोडधोड खाताना

नागपंचमी,  मंगळागौरी खेळून जागवताना

जागरणाच्या त्या दंग्याने वाडा दणाणून जाई

खेळायला कशाला आमंत्रण?  गल्लीच सामील होई.

काय कटकट आहे?  असं कुणी कुणाला म्हणत नसे.

जागरण कुणाकडेही असो,  कार्य घरचंच वाटत असे.

घरमालकांची पडवी नि शेजा-यांच्या खोल्या

हक्कानेच पाहुण्यांसाठी जात वापरल्या.

घर भले भाड्याचं असो,  वाडा आपलाच असायचा

कुणाच्याही मनात कधी आप-परभाव नसायचा.

दिवस बदलले.

नेमेचि येणारा श्रावण आताही येतो.

विकतची वस्त्रं-वाती, शेवया नि लाडू घेऊन येतो.

व्रतं कसली जुनीपानी?  उपवासाने पित्त वाढतं!

टीव्ही बघत रोजच जागरण! याहून जादा कुठे झेपतं?

मंगळागौरी नि नागपंचमी खेळायला शरीर काटक हवं!

वाढता बोजा शरीराचा वाकता तरी यायला हवं?

निसरफुगडी खेळताना घसरुन पडायला व्हायचं!

कणा असेल ताठ तर ना काटवटकणा खेळायच?

नको बाई, त्यापेक्षा मंगळागौरीच्या खेळग्रुपला बोलवूया

आरामात बसून सा-याजणी मनसोक्त एंजॉय करूया.

घरं मोठी असली तरी नाचानाच कोण करेल?

हॉल भाड्याने घेऊ तेच सोयीचं ठरेल!

किती बदललं पहा सारं

नव्या युगाचं न्यारं वारं

मुलींच्या सोयीने आधी मंगळवार ठरायचा

आता हॉल कधी मिळेल तोच नक्की करायचा.

नशीब अजून तरी मंगळागौर शनिवारी पुजली जात नाही.

रविवारच्या सुट्टीला जोडून अलिकडे घेतली जात नाही.

 

© प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थ्रिलर… भाग – १ ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ थ्रिलर… भाग – १ ☆ तृप्ती देव ☆

“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाईलच्या स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित संदेश वाचून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

… चहाचा गरम कप तसाच हातात धरून मी तो संदेश एकामागून एक दोन-तीनदा वाचला. चेहऱ्यावरचं हसू ओसंडून वाहत होतं आणि कित्येक दिवसांची माझी कठोर मेहनत आज फळाला आली असं मला वाटत होतं. मी मनातून खूप सुखावले,  पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही,  कारण पुढच्याच मिनिटाला कमिटीकडून दुसरा एक सविस्तर मेसेज आला. त्या नव्या संदेशात पुढची अट आणि नियम लिहिले होते. त्यात लिहिलं होतं,  “यंदाच्या अंतिम फेरीचा मुख्य विषय – मर्डर मिस्ट्री म्हणजेच क्राइम थ्रिलर. कथेमध्ये खून,  संशय,  गुंतागुंतीचा तपास,  रहस्य,  थरार आणि एक अनपेक्षित शेवट असणे अनिवार्य आहे.”

तो मेसेज वाचून मी जागच्या जागी अक्षरशः थिजून गेले. हातातील चहाचा कप थरथरला आणि टेबलवर वाजत स्थिरावला. अंगावर एक सरसरून काटा आला आणि कपाळावर आठ्या पडल्या. “काय झालं गं?  एवढी का गोठली आहेस सकाळी सकाळी? “

स्वयंपाकघरातून पोहे बनवत असलेल्या नवऱ्याने माझा पडलेला आणि गंभीर चेहरा पाहून विचारलं. मी काही न बोलता फक्त मोबाईल त्याच्या हातात दिला. त्याने तो मेसेज शांतपणे वाचला आणि तो घरात घुमणारा मोठा हसू हसला. “अरे वा! बस,  आता तुझं काम झालं तर! तू तर रोज नवनवीन विषयांवर सुंदर कथा लिहीत असतेस. हा विषय तर खूपच मस्त आणि थ्रिलिंग आहे. लिही की एखादी कडक थ्रिलर,  तुला नक्की जमेल! ” तो म्हणाला.

मी त्याच्याकडे अत्यंत रागाने आणि असहाय्यतेने पाहिलं. “अरे,  तुला थट्टा वाटतेय का?  माझ्या आजवरच्या कथा आठव जरा. माझ्या कथेत दोन पात्रांमध्ये साधं कडाक्याचं भांडण झालं,  तरी शेवटी मी दोघांची मनं वळवून त्यांची प्रेमाने समेट घडवून आणते. इथे सरळ जिवंत माणूस मारायचा आहे! रक्त,  चाकू,  खून… हे सगळं माझ्या संवेदनशील मनाला कसं पटणार आणि माझ्याकडून कसं होणार? ” माझं हे बोलणं ऐकून तो अजूनच जोरात हसायला लागला. तितक्यात आमचा कॉलेजला जाणारा मुलगा बेडरूममधून बाहेर आला आणि हसत म्हणाला,  “बाबा,  बरोबर आहे तिचं. आईच्या कथेतला खुनी आधी पीडित माणसाला प्रेमाने चहा पाजेल,  मग त्याची मनधरणी करेल,  ‘मला माफ कर’ म्हणून डोळ्यात पाणी आणेल आणि शेवटी दोघे गळ्यात गळे घालून पक्के मित्र होतील! ” सगळं घर माझ्यावर हसत होतं. त्या हसण्याने घरातलं वातावरण हलकं झालं असलं,  तरी माझी मात्र धाकधूक वाढली होती. मी अत्यंत गंभीर झाले होते,  कारण प्रश्न माझ्या लेखणीच्या प्रतिष्ठेचा होता.

दुपारी घरची सगळी कामं आटोपली. घरात शांतता पसरली होती. मी अभ्यासाच्या टेबलावर माझी आवडती वही आणि पेन घेऊन बसले. वहीच्या कोऱ्या पानाच्या अगदी मध्यभागी मी मोठ्या आणि ठळक अक्षरात शीर्षक लिहिलं,  “मर्डर मिस्ट्री.” थोडं थांबून,  खूप विचार करून मी कथेचं पहिलं वाक्य लिहिलं,  “मध्यरात्रीचे बारा वाजले होते. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि भयानक शांतता पसरली होती. काळ्या कपड्यांमधील एक संशयास्पद माणूस हातात धारदार चाकू घेऊन बंगल्याच्या मागच्या दरवाजाने आत शिरला…” मी ते वाक्य लिहिलं आणि स्वतःच दोनदा वाचलं. ते वाचताच माझ्या आतल्या संवेदनशील मनाने लगेच मान डोलवली आणि आतून आवाज आला,  “धारदार चाकू?  अगं,  एवढा धारदार कशाला?  चुकून जास्त लागलं तर?  चाकू थोडा बोथट ठेव.” मी कपाळावर हात मारला,  पण मनाचं ऐकून मी ‘धारदार’ हा शब्द खोडला आणि तिथे ‘बोथट’ असं लिहिलं.

मी पुढे लिहायला सुरुवात केली,  “त्याने खोलीत झोपलेल्या माणसावर बोथट चाकूने जोरात वार केला…” पुन्हा माझं मन मध्येच ओरडलं,  “जोरात नको गं बाई! खूप रक्त येईल आणि त्याला खूप वेदना होतील. त्यापेक्षा हलकासा वार कर.” मी ‘जोरात’ पुसलं आणि ‘हलकासा’ केलं. आता वाक्य झालं,  “त्याने हलकासा वार केला.” पण क्षणभर विचार केल्यावर मलाच हसू आलं. हलकासा वार करून काय उपयोग?  त्याने माणूस कसा मरेल?  त्याला तर फक्त किरकोळ खरचटलं असेल. मग मर्डर कसा होणार?  मी चिडून ते पूर्ण वाक्यच पुसून टाकलं. यावेळी मी चाकूच बाजूला ठेवला. मनात विचार केला की मारामारी दाखवू. मी लिहिलं,  “त्याने मागून येऊन त्या माणसाला जोरात ढकललं…” लगेच मनातून दुसरी शंका उपस्थित झाली,  “अरे,  पण तो खाली पडल्यावर तिथे फरशी असेल आणि डोक्याला लागलं तर?  खाली एखादी मऊ गादी किंवा सोफा असेल तर किती छान होईल! ” मी कथेतील त्या पडणाऱ्या पात्राच्या खाली सुरक्षित गादी ठेवली. पुन्हा सगळं पुसलं. असा करत करत अर्धा तास उलटून गेला होता. कागदावर शब्दांची खाडाखोड झाली होती,  पण माझ्या कथेतला तो बिचारा माणूस अजून जिवंतच होता आणि खुनीसुद्धा दारात उभा राहून थकला होता.

इतक्यात नवरा खोलीत डोकावला आणि खोचकपणे म्हणाला,  “काय लेखिकाबाई,  झाला का मर्डर?  की पोलीस तपास सुरू झाला? ” मी वैतागून पेन खाली ठेवलं आणि म्हणाले,  “नाही रे… अजून खुनी दारातच उभा आहे. आत यायला तयार नाही.” तो हसत म्हणाला,  “अशी दारात उभी ठेवून त्याची काय खातीरदारी करतेस?  आत पाठव त्याला लवकर आणि उरकून टाक.” मी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिलं,  “अरे,  तो आत गेला तर घरातले लोक त्याला चहा-पाणी विचारतील. मग चहा द्यावा लागेल. चहा दिला की मर्डर कॅन्सल होईल आणि दोघे गप्पा मारत बसतील! ” तो डोक्याला हात लावून हसत हसत निघून गेला. मी हार मानणार नव्हते. यावेळी मी हिंसेचा मार्ग सोडायचा ठरवला. रक्तपात नको,  म्हणून मी ‘विषाचा’ पर्याय निवडला. मी नवीन पानावर लिहायला घेतलं,  “खुन्याने स्वयंपाकघरात जाऊन दुधाच्या कपात अत्यंत जहाल विष मिसळलं…” तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं,  “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना?  एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द!

– क्रमशः भाग पहिला 

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुलाबभाई… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

अल्प परिचय

‘मन अंकुरे अंकुरे’ या नावाचा ललित लेख संग्रह ज्ञानपथ पब्लिकेशन्स अमरावती द्वारा प्रकाशित.

साहित्य संमेलनांमधून कथाकथन, कविता वाचन केलेले आहे.

वृत्तपत्रामधून सातत्याने विविध विषयांवर लिखाण.

? मनमंजुषेतून ?

☆ गुलाबभाई… ☆ डॉ. नेहा भटकर

त्याच ‍झालं असं,  की परवा स्वयंपाकघरातील काळी नॉनस्टीक भांडी आरोग्यास किती व कशी बाधक आहेत वा नाहीत याबद्दलच लेखन वाचनात आलं. तसंही अलीकडे सर्वत्र केवळ स्टीलची भांडी अन्न शिजवण्यासाठी वापरावीत असा प्रचार होतोयं पण गैरसोय अशी होते की,  स्टील उष्णतेचा चांगला वाहक नसल्याने,  भांड्याला सर्वत्र सारखा जाळ लागत नाही त्यामुळे पदार्थ लगेच करपतो. हे सगळं मनाशी घोळत असतानांच मला दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडी गुलाबभाई घरी येऊन सर्व स्वयंपाकघरातील शिजवण्याची,  खाण्याची वा अन्न काढून ठेवण्याची सगळी पितळी भांडी; उष्णतेची उत्तम वाहक असलेली,  कल्हई करून अगदी चांदीसारखी चकचकीत करून द्यायचे,  जेणेकरून कुठलाही पदार्थ कळकून त्याची बाधा होऊ नये आणि आम्ही कसे निर्धास्त व्हायचो हे आठवलं

कंदील भडकतोयं, गुलाबभाई. पावसाळ्याच्या तोंडी भाड्यांना कल्हई करायचीयं, गुलाबभाई. तेल संपलेल्या डब्यांची झाकणं कापून घ्यायचीयं व त्यापासून वापरायला सोयीचे डबे बनवायचेतं तर गुलाबभाई. बादलीला वाळा बसवायचायं,  कुठल्या गळक्या जुनाट गुंड वा कळशीला डाग द्यायचायं,  गुलाबभाई. धान्याचा हंगाम जवळ आलायं धान्य साठवायच्या कणग्या ठिकठाक करून घ्यायच्यायं तर गुलाबभाई. उन्हाळ्यात गावच्या कुंभारवाड्यातून नुकत्याच आणलेल्या नव्या कोऱ्या मातीच्या माठासाठी अडणी करायची तरी गुलाबभाई. तर एकंदरीत कुठलंही तांबा पितळ, लोखंडी वा टपरी पत्र्यांचं आणि कल्हई वगैरे कामं करायचं तर अशा कित्येक कामांसाठी आमची भिस्त केवळ गुलाबभाईवरच. अशा प्रकारची कामे करणारा आसपासच्या खेड्यांसकट एकमेव माणूस गुलाबभाई. आज ही असली कामे कुणी करवून घेत नाहीत. त्याची गरजही नाही किंवा ती कालबाह्य झालेली आहेत. आजच्या वापरा आणि फेका वा युज अँड थ्रो जमान्यात,  वर्षानुवर्षे एकच,  वारंवार भडकणारा कंदील पुन्हा पुन्हा दुरुस्त करून वापरणाऱ्या लोकांचं जग कालौघात केव्हाच मागे पडलेलं. कंदीलाच्या धुरकट काचेतून पडणाऱ्या अंधुक उजेडासारखं हळूहळू धुसर होऊन पडद्याआड दिसेनासं झालयं व आज बहुतेकांसाठी तितकंच ते अनोळखीचही आहे. आजची पन्नाशीच्या पलीकडची,  खेडेगावांशी बऱ्यापैकी परिचीत असलेली पिढी, कोणे एकेकाळी त्या जगाचा भाग होती. जसजसा काळ सरकत गेला तसतशा लहानपणीच्या दुनियेतील अगदी रोज भेटणाऱ्या खुणा एक एक करून दिसेनाशा होताहेत. तो निसर्गाचा नियमच आहे; त्याचे काय विशेष. कालपरत्वे स्थित्यंतरे ही घडणारच. गतकाळात भेटलेली कितीतरी माणसे,  घडलेल्या घटना,  विस्मृतीत गडप होतात. पण कधी कधी,  कुणास ठाऊक कशी,  अत्यंत साधी वाटणारी माणसं किंवा तेव्हा तितक्याशा महत्वाच्या नसणाऱ्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना,  कुठेतरी मनाच्या पार आतल्या कप्प्यात जपलेल्या असतात,  इतक्या की त्यांना पाठीशी घालत आपण कितीतरी काळ पुढे चालत आलेलो आहोत याचाही विसर पडतो, इतक्या त्या ताज्या असतात.अगदी कसं सगळं परवाच भेटल्या वा घडल्या सारखं लख्ख. त्यापैकीच एक भांड्यांना कल्हई करुन चकचकीत करणारे गुलाबभाई. 

सहा फुटाच्या जवळपास उंची आणि सडपातळ शरीरयष्टी,  कुठलेही भाव नसलेला उभट चेहरा, कुणी काय सांगतोय हे त्यांचे डोळेच ऐकायचे किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. पांढरा ढगळ पायजमा शर्ट व डोईवर कायम काळी साधी टोपी. टोपी न घातलेले गुलाबभाई मी बघितले नाहीत. भ्रमण वा स्थिर यापैकी कुठलीही दूरध्वनी सुविधा हाताशी नव्हती व तसल्या सोयीची पुसटशीही कल्पना त्याकाळी गावामध्ये कोणाच्याही मनीमानसी असण्याचे काही कारणही नव्हते. गावात कोणालाही काही सांगायचे झाल्यास प्रत्यक्ष भेटणे हीच पद्धत. यामुळे घरात गुलाबभाईसाठी कुठलेही काम निघाले असेल तर गुलाबभाईंच्या थेट घरीच थडकावे लागे आणि हमखास ती कामगिरी घरात लहान असल्याने माझ्याकडेच यायची. हो घरीच,  त्याकाळी घर आणि व्यवसाय हे दोन्ही बहुतेक एकाच ठिकाणी असायचे किंवा कारागीर,  ज्यांचे कोणाचे काम असेल त्यांच्या,  घरी जाऊन ते काम करून द्यायचे. आजच्यासारखे वेगळे वर्कशॉप किंवा वेगळे दुकान अशी पद्धत नव्हतीच. गुलाबभाईंचे स्वतःचे घर नव्हते. ते राहायचे गावाला अगदी लागून असलेल्या शेतामधील डॉ. अशोक यांच्या वाड्याच्या परिसरात, दर्शनी भागातील डाव्या कोपऱ्यातील ओसरीत. अर्थातच तोच त्यांचा निवारा आणि वर्कशॉपही. त्यांचे छोटेसे कुटुंब मीयॉं,  बिबी आणि दोन मुली अत्यंत उद्यमशील असा हम दो और हमारे दो असा चौकोनी संसार. वाड्याच्या समोरच्या भागात गुलाबभाई तर मागच्या बाजूला आणखी एक का दोन कुटुंब राहायला असल्याचे आठवतं. पण एकुणच सर्व गावाचा संबंध यायचा तो गुलाबभाईंशी आणि आजारी पडल्यास डॉक्टरांशी.

डॉक्टरांच्या शेतामध्ये अगदी कुंपणाला लागून,  गुलाबभाईंच्या ओसरीच्या जरा डाव्या बाजूला मोठाल्या चिंचेच्या झाडांची रांग होती. वाऱ्याच्या झुळुकेसरशी डुलणारे चिंचांचे झुपके मनाला नेहमी खुणावत असत. शेताच्या कुंपणापलीकडील एका कार्यालयामध्ये शिपाई असणाऱ्या सदाभाऊंचा मात्र आमच्या चिंचा गोळा करण्याला कडाडून विरोध असे. अर्थात त्याला कारणही तसंच असायचं म्हणा. आम्हा शाळकऱ्यांचा घोळका चिंचेखाली एकदाचा जमला की इतका गोंधळ नि गोगांट करायचा की बाजूच्या कार्यालयीन कामात अडथळा यायचा पण आम्ही आपले सदाभाऊंच्या नावाने सदा बोटं मोडायचो. अशावेळी आम्ही गुलाबभाईच्या मुलींना हाक मारायचो आणि त्या आम्हाला चिंचेखालची चार-दोन बोटूकं अगदी सहज द्यायच्या आणि आमची बोळवण करायच्या. चिंचेच्या झाडांची रांग जेव्हा माकडांनी गजबजायची तेव्हा झाडावरची माकडं आणि आम्ही खालची माकडं यांच्यात करार होऊन गुलाबभाई आणि सदाभाऊ यांची चांगलीच कोंडी करत असू. माकडांच्या गोंधळात आमचाही गोंधळ मिसळून जायचा. तेव्हा माकडं गावात बाराही महिने मुक्कामाला नसायची. काही दिवसांची ही पाहुणी माकडं आमची फार आवडती होती.

वाड्यात शिरण्यासाठी,  पहिले तर वाड्याच्या भल्या मोठ्या लोखंडी पत्र्याच्या फाटकाशी झुंजाव लागायचं. फाटक ढकलून आत मध्ये पाऊल पडल्याशिवाय वाड्याचा आतला परिसर काही दृष्टीपथात यायचा नाही कारण फाटक एकसंघ पत्र्याचं. त्याला मध्ये कुठलीही खिडकी वा फट नसल्याने फाटकाशी उभे राहून आत मधील कोणाला बाहेरून आवाज देणे अशक्यच म्हणून लहान मुलांसाठी ती झुंजच,  पण अनिवार्य. त्यातल्या त्यात सोयीचा भाग म्हणजे फाटकाला वर किंवा खाली कडीकोंडा लागलेला नसायचा फक्त ते ढकलायचे अन् त्याचा कर्र… असा होणारा आवाज कानात घेऊन आतील ऐसपैस पटांगणात शिरायचे. फाटकाचं कर्र…एकदाच बंद झाल्यावरही जर का करकर,  खडखड, ठकठक असे आवाज जर आपल्या डावीककडून येत असतील तर गुलाबभाई घरीच आहेत अन्यथा ते कुठे गावामध्ये कोणाकडे काहीशा असल्याच कामासाठी गेलेले असावेत हा अंदाज फाटकातच यायचा. गुलाबभाईंशी संवाद साधने म्हणजे अत्यंत जिकिरीचं काम. त्यांची कामानिमीत्त चाललेली ठोकपिट आणि भरीत भर गुलाबभाई दोन्ही कानाने ठार बहिरे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी गत व्हायची. मी फक्त त्यांना एवढं सांगून घराकडे येत असे,  ते म्हणजे तुम्हाला काही कामासाठी आईने बोलावले आहे आणि बहुतेक हा संवाद हातवारे जास्त आणि शब्द कमी असाच व्हायचा. यावर गुलाबभाई फक्त मानेने होकार द्यायचे.

गुलाबभाईंचे कामातील कसब व सफाईदारपणा आणि माझ्या आईच्या संसारोपयोगी नवनवीन कल्पनांच्या समन्वयाची परिणीती व्हायची ती नाविन्यपूर्ण घरगुती वापरातील सुलभ उपकरणांच्या निर्मितीमध्ये. चिळ्या कंदीलांमध्ये रॉकेल भरायच्या डब्याला तोटी लावून घेऊन काम अधिक सोपे करणे तर कधी दिवालगिरीच्या वातीच्या पुंगळी भवती खबरदारी म्हणून आधीच आणखी एक जास्तीची पुंगळी बसवून घेऊन तिच्या कधी काळी भडकाण्यावर उपाय करावा. कित्येकदा बनवलेले झाकण बाहेरून नीट बसत नाही तर अशावेळी ते आत मधून बसवावे म्हणजे अधिक नीट बसेल का, असले प्रयोग करायला कधी गुलाबभाई थकत नसतं. घरोघरी दिवाळीच्या आधी होणाऱ्या वार्षिक साफसफाईच्या वेळी तर कित्येक अडगळीतल्या सामानांची दुरुस्ती करावी आणि त्यांना उपयोगात आणावे अशा विचाराने आणि इतर अनेक नियमित वापरातल्या सामानाच्या दुरुस्तीचा चेव बऱ्याच जणांना यायचा.त्यामुळे या सुमारास गुलाबभाईंच्या घराबाहेर बराच मोठा वैविध्यपूर्ण मोडक्या वा नादुरुस्त वस्तूंचे ढीग,  किंवा ढीगभर काम त्यांना पडायचे. अशावेळी ते सारखे लगबगीत, प्रत्येकाची डेडलाईन सांभाळायचे. “हा हा दिवाली के पहेलेही बना दूंगा” असं पुटपुटल्यागत बोलायचे पण त्यांचा कामाचा झपाटा आणि ठोकपिटीचा आवाज त्या काळात फार वाढायचा.

कुणाच्याही कधी अध्यात मध्यात नसणारे, आपलं काम भलं आणि आपण भले या नियमाने चालणारे. सदैव कामाचीच भाषा बोलणारे व आवाजाचा एकच पोत ठाऊक असलेले. भोवतालच्या जगाला त्यांच्या व्यक्त्तीमत्वाचा केवळ गुलाबभाई डागवाला वा कल्हईवाला एवढा एकच पदर ठाऊक असलेले,  कामात अत्यंत प्रामाणिक आणि तितकेच हरहुन्नरी. कधीही कुठली तक्रार नसणारे, माणुसकीचा वसा घेतलेले. कधीही कामा पलीकडे न बोलणारे, आजूबाजूच्याच काय तर कधी स्वत:बाबतही व्यक्त न होणारे गुलाबभाई; आज मात्र मला फार गूढ वाटतात.

┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बॉम्बस अवे! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ बॉम्बस अवे! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सफेद सागरातल्या अंधा-या रात्रींमधले पराक्रम!

हम ही हम हैं तो क्या हम हैं…तुम ही तुम हो तो क्या तुम हो… 

१९७१च्या भारत-पाक युद्धाचे चित्रण असलेल्या आणि १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या हिंदी चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि जाकी श्रॉफ यांच्यामध्ये शेवटी एक संवाद आहे… हम ही हम हैं तो क्या हम हैं…तुम ही तुम हो तो क्या तुम हो! हे दोघेही पायदळ श्रेष्ठ की वायुदळ श्रेष्ठ याची चर्चा करताना एका निष्कर्षांपर्यंत पोहोचलेले दाखवलेत…दोहोंचेही अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे!

अजूनही भारतीय जनमानसात सैन्य म्हणजे पायदळ हे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे आजवरच्या युद्धचित्रपटांमध्ये अधिक चित्रीकरण पायदलाचे झालेले आढळते. वायूदलाचा क्रमांक दुसरा तर नौसेना तिस-या क्रमांकावर येते!

पण खरं तर ही तिन्ही दले म्हणजे आपले त्रिनेत्र आहेत. आधुनिक युद्धात तर Air Supremacy अर्थात ज्याच्या ताब्यात आकाश…त्याचे वर्चस्व अशी स्थिती आहे. नुकतेच पार पडलेले ऑपरेशन सिंदूर, त्या आधी पाकिस्तानातल्या बालाकोटवर आपण केलेले हवाई हल्ले हे याला साक्षी आहेत. जगभरातले देश हवाई सामर्थ्य वाढवण्याच्या सतत प्रयत्नांत असतात, त्याला काही अर्थ आहेच!

कारगिल युद्ध हे जगातल्या सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. पाकिस्तानची तयारी एवढी प्रचंड होती की केवळ पायदळ त्यांना पराभूत करण्यासाठी पुरेसे नव्हते. भारतीय वायूसेनेला या युद्धात प्रत्यक्ष सहभागी होण्यात काही कारणांनी अंमळ उशीरच लागला…कारण तोवर युद्धाची निश्चित स्थितीच आपल्या सैन्याच्या लक्षात आलेली नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे याची खात्री होताच भारताने आपला हा तिसरा नेत्र उघडला…आणि ऑपरेशन सफेद सागर हाती घेतले. हा सागर जमिनीवरील नव्हता…आभाळात तरंगणा-या पांढ-या ढगांच्या वरून उडणा-या हवाई ‘जहाजां’नी केलेल्या पराक्रमांनी भरलेला आणि भारलेला होता. 

सोळा ते अठरा हजार मीटर्सची उंची. त्यामुळे हवा विरळ. त्यामुळे विमानांच्या सामर्थ्यावर निश्चित मर्यादा. त्यात प्रचंड उंचीची टोकदार हिमशिखरे. त्यांतून वाट काढीत वेगाने जाणे यासाठी अत्युच्च दर्जाचे वैमानिक कौशल्य आवश्यक. पाकिस्तानी नियमित सैन्य अतिरेक्यांच्या वेशात कारगिलच्या शिखरांवरील बंकर्स, कपा-यांमध्ये दडून बसलेले. शिखरांवर खालून चढून जावे तर वर मोक्याच्या जागी बसलेला शत्रू भारतीय सैनिकांना सहजी टिपत होता. खालून तोफा डागाव्यात तर उंच शिखरे, द-या, कपारी असल्याने आरंभी अचूक तोफ-बॉम्बवर्षाव करणे महाकठीण होते. पाकिस्तानी सैन्याला रसद पुरवणा-या व्यवस्था तर भारतीय तोफांच्या मा-याच्या आणखीनच पलीकडे होत्या. अशा स्थितीत वायुदल हाच आशेचा एक मोठा किरण होता…आणि पाकिस्तान अधिकृत सैन्य या युद्धात सहभागी नसल्याने त्यांची वायुसेनाही युद्धात सहभागी होऊ शकत नव्हती…कारण ते तर म्हणत होते की कारगिल मध्ये पाकिस्तानी सैन्य नव्हे तर काश्मिरी मुजाहिदीन, अतिरेकी शिरलेले आहेत. 

आंतरराष्ट्रीय करारांमुळे भारतीय वायुदल भारत-पाक वायूहद्द ओलांडून पलीकडे जाणारही नव्हती! अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आणि मुख्यत: तशा short noticeवर आपल्या वायूवीरांनी ७६३१ उड्डाणे केली! यांत आरंभीच्या हेलिकॉफ्टर्स उड्डाणांचाही समावेश होता. कारगिलमध्ये घुसलेले अतिरेकी, पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे ‘आका’ यांच्यातील संपर्कसूत्रे नेस्तनाबुत केली…आणि मुख्य म्हणजे सीमारेषा न ओलांडता त्यांचे मनोधैर्य रसातळाला नेऊन ठेवले!

या मोहिमेत आरंभी भारतीय वायुसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागले…घुसखोरांकडे विमानविरोधी आधुनिक ‘स्टिंगर’ मिसाईल्स होती..आणि ती त्यांना डागता येत होती. त्यामुळे अगदी सुरुवातीलाच आपण अनेक मोहारे गमावले…स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा आणि राजीव पुंडीर,  फ्लाईट लेफ्टनंट सुब्रमनियम मुहीलान,  सार्जंट राजकिशोर साहू, फ्लाईट सार्जंट पी.व्ही.एन.आर.प्रसाद यांचा समावेश होता. यांतील आहुजा साहेबांना पाकिस्तानी सैन्याने हालहाल करून मारल्याचे बोलले जाते. फ्लाईट लेफ्टनंट के.नचिकेत हे तर त्यांचे विमान पाकिस्तानी हद्दीत पडल्याने शत्रूच्या तावडीत सापडले होते…मात्र भारताच्या राजनैतिक दबावामुळे त्यांची सुखरूप सुटका होऊ शकली!

त्यावेळी भारतीय वायूदलाच्या ताफ्यात असलेली विमानेच या युद्धात वापरणे भाग होते. परंतू त्या विषम हवामानात आणि पर्वतीय परिसरात आणि रात्रीही बॉम्बफेक करू शकतील अशा क्षमतांची विमाने उपलब्ध होतीच किंवा त्यांचा तिथे प्रभावी वापर करता येईलच असे नव्हते. यासाठी अपारंपारिक नीती,  जुने तंत्रज्ञान नव्या क्लृप्त्या वापरून कामात आणणे आवश्यक होते…आणि आपल्या वैमानिकांनी, तंत्रज्ञ वीरांनी ते करूनही दाखवले!

भारतीय वायुसेनेच्या १७व्या स्क्वाड्रन (Golden Arrows) चे विंग कमांडर बी.एस. अर्थात बिरेंद्रसिंग धनोआ ऊर्फ ‘टोनी’ (जे पुढे एअर चीफ मार्शल झाले! ) फ्लाईंग ऑफिसर आर.एस. अर्थात राजपाल सिंग धालीवाल ऊर्फ ‘धाली’ (जे पुढे विंग कमांडर झाले) यांची कामगिरी लक्षणीय ठरली…अर्थात त्यांच्या जोडीला असंख्य वायूवीर होतेच…जमिनीवर काम करणारे तंत्रज्ञ, संशोधकही होतेच. निश्चित केलेल्या लक्ष्यावर अचूक बॉम्ब फेकताना ते बॉम्ब्स लक्ष्याच्या दिशेने निघालेले असताना वैमानिकांनी केलेल्या बॉम्ब्स अवे…अर्थात बॉम्ब्स निघाले…या घोषणा जमिनीवर नियंत्रण कक्षात बसलेल्या अधिका-यांच्या, कर्मचा-यांच्या, पर्वतांवर आडोशाला बसून वायूदलाच्या अचूक मा-याची वाट पहात असलेल्या सैनिकांच्या अंगावर शहारे उमटवून जात!

पायदल सैनिकांनी प्रचंड संख्येने बलिदाने दिली…त्यांना वायुदलाची मोलाची साथ लाभली…म्हणून कारगिल ‘विजय’ साकारला. भारतीय वायूदलाच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेणारी टेलीविजन मालिका ऑपरेशन सफेद सागर नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली गेली आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीमध्ये रस असणा-या सर्वांनीच ती जरूर पहावी..खरे तर यावर स्वतंत्र चित्रपट यायला पाहिजे होता!

तांत्रिक भाषा, ज्ञान कमी अवगत असणा-या माझ्यासारख्या प्रेक्षकांना या मालिकेत उल्लेख केल्या गेलेल्या विमानविद्येतील शास्त्रीय, तांत्रिक बाबी कदाचित लवकर लक्षात येणार नाहीत. पण आपल्या जांबाज fighter pilots तरुणांचे,  तंत्रज्ञ मंडळीचे शौर्य, कौशल्य निश्चितच दिसेल…समजेल,  हे निश्चित. यानिमित्ताने आपल्याला भारतीय वायूदलाच्या सामर्थ्याची खात्रीही पटेल. आहुजा साहेबांच्या आणि इतर हुतात्मा वायूसैनिकांच्या शौर्याचा परिचयही होईल. 

ऑपरेशन सफेद सागर नावाच्या या OTT मालिकेत अभिनेते सिद्धार्थ यांनी अहुजा साहेब,  जिम्मी शेरगिल यांनी धनोआ आहेब, आदिल हुसेन यांनी एअर मार्शल विनोद पटनी साहेब यांच्या भूमिका जोरदार निभावल्या असून दिया मिर्झा आणि इतर कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. निर्माते कुशल श्रीवास्तव, अभिजित सिंग परमार आणि दिग्दर्शक ओनी सेन यांचे तसेच लेखक, संगीतकार, संवादलेखक यांचे आभार…त्यांच्यामुळे ही शौर्य गाथा पडद्यावर साकारली गेली…आणि भारतीय वायूसेनेचेही योगदान प्रकर्षाने अधोरेखित होऊ शकले. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares