एका व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतून एक प्रचंड हिरा विकत घेतला — अगदी अंड्याच्या पिवळ्या बलकाएवढा मोठा. पण त्याची निराशा झाली, कारण त्या हिऱ्यामध्ये आतून एक भेग होती.
एका कुशल ज्वेलरकडे जाऊन मार्गदर्शन मागितले त्याने. ज्वेलरने नीट निरीक्षण करून सांगितले:
“हा हिरा दोन परिपूर्ण रत्नांमध्ये विभाजित करता येईल, आणि दोन्हीची किंमत मूळ हिऱ्यापेक्षा जास्त असेल.
पण एक चुकीचा घाव बसला तर तो तुकड्यांत फुटेल आणि पूर्णपणे निरुपयोगी होईल. मी असा धोका घेणार नाही. ”
व्यापारी जगभर फिरला — अनेक देशांतील दागिनेकारांना तो हिरा दाखवला.
प्रत्येकाचं उत्तर एकच — धोका खूप मोठा.
शेवटी कोणीतरी त्याला अॅमस्टरडॅममधील एका वृद्ध ज्वेलरबद्दल सांगितले —
ज्याच्या हाताला सोनेरी स्पर्श असल्याची ख्याती होती.
तो त्याच दिवशी तेथे पोहोचला.
वृद्ध ज्वेलरने हिऱ्याकडे भिंगातून पाहिले आणि पुन्हा इशारा केला.
तेवढ्यात व्यापाऱ्याने मध्येच बोलत म्हटले:
“ही कथा मी अनेकदा ऐकली आहे.
आता मी तयार आहे. फक्त हे काम करून टाका. ”
ज्वेलरने मान हलवली, किंमत ठरवली, आणि मग शांतपणे शेजारी काम करणाऱ्या एका तरुण शिकाऊकडे वळला.
त्या मुलाने हिरा हातात घेतला, तळहातावर ठेवला, आणि एकच स्वच्छ, अचूक प्रहार केला.
हिरा सुंदरतेने दोन निर्दोष रत्नांमध्ये विभागला.
… त्याने वर बघितलेही नाही — फक्त ते रत्न परत गुरूकडे दिले.
आश्चर्यचकित व्यापाऱ्याने विचारलं:
“हा मुलगा तुमच्याकडे कित्येक वर्षे काम करत असेल? ”
वृद्ध ज्वेलर शांतपणे हसला:
“याचा कामाचा तिसरा दिवस आहे.
त्याला त्या हिऱ्याची खरी किंमत माहिती नाही…
म्हणूनच त्याचा हात थरथरला नाही. ”
—
✨ धडा:
कधी कधी आपण काहीतरी गमावण्याची जितकी जास्त भीती बाळगतो, तितकेच ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे, त्या करण्याची क्षमता आपल्यात कमी होते.
जीवनातील आव्हानांना तितकं जड समजू नका, त्यांना हलकं माना…
तेव्हाच तुमचा हात स्थिर राहील.
* * * *
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन☆ श्री विश्वास देशपांडे ☆
तेरा आणि चौदा ऑगस्ट हे (२०२४) दोन दिवस अत्यंत संस्मरणीय असे ठरले. सांगलीला काही कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त जाणे झाले. या दोन दिवसात सहकुटुंब देवदर्शनाचा लाभ घेता आला आणि खरोखरोच खूप प्रसन्न वाटले. या दोन दिवसात सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिर, नरसोबा वाडी, जयसिंगपूर येथील सिद्धिविनायकाचे मंदिर आणि चाफळ येथील श्री राम मंदिर यांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. पण आज मी प्रामुख्याने बोलणार आहे ते जयसिंगपूर येथील सिद्धिविनायक मंदिराबद्दल.
जयसिंगपूर येथील माझे मित्र श्री मदन बुरांडे मला अनेक दिवसांपासून घरी या म्हणून बोलावत होते. १४ ऑगस्टला तो योग अचानक आला. सांगलीपासून अवघ्या ११ किमी वर जयसिंगपूर आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वडील राजे जयसिंग यांचे नाव या गावाला देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हे गाव आहे. कोल्हापूरपासून जयसिंगपूर अवघ्या ३८ किमी अंतरावर आहे. शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते. हे शहर तंबाखू, गूळ, मिरची आदींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. दूध, दुधाचे पदार्थ या ठिकाणी उत्तम मिळतात. फळे, भाजीपाला यांचीही चांगली आवक आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हे शहर राज्याशी आणि देशाशी एस टी आणि रेल्वे सेवेने जोडले गेले आहे. विविध प्रकारचे शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक उत्तम शैक्षणिक संस्था या शहरात आहेत.
मदनजी यांच्याकडे जाण्यापूर्वी त्यांना फोन केला होता. मी, सौ. श्रद्धा आणि माझी कन्या चि. सौ सारिका असे आम्ही तिघेजण सकाळी लवकरच जयसिंगपूरला पोहोचलो. श्री मदनजी आणि सौ वहिनी आमची वाटच पाहत होते. पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्या दोघांनी आमचे मनापासून स्वागत आणि उत्तम असे आदरातिथ्य केले. नंतर श्री मदनजी म्हणाले ‘ इथून जवळच सिद्धिविनायकाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही ते पाहिल्याशिवाय जाऊ नका. ‘ त्यांच्या प्रेमळ सूचनेनुसार आम्ही सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचे ठरवले. आमच्यासोबत ते स्वतः मंदिर दाखवण्यासाठी आले. त्यांच्या घरापासून साधारण एक दीड किमी अंतरावर मौजे आगर, जयसिंगपूर येथे हे मंदिर आहे.
दुरूनच हे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. सिद्धिविनायक ट्रस्टने या मंदिराची निर्मिती केली आहे. दुरून ऑक्टोपसच्या आकाराचे दिसणारे पण कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेलं हे मंदिर खरोखरच आगळंवेगळं आहे. अशा प्रकारचं मंदिर महाराष्ट्रात तरी माझ्या पाहण्यात नाही. या मंदिराच्या बांधणीतील कल्पकता आणि बांधकामातील कौशल्य अप्रतिम आहे. आज कोणतीही वास्तू बांधताना साधारणपणे लोखंड आणि सिमेंट यांचा वापर केलेला आपल्याला आढळतो. त्याशिवाय कोणतेही बांधकाम पूर्ण होत नाही. पण हे मंदिर मात्र सिमेंट आणि स्टील यांच्या वापरापासून मुक्त आहे. दगड, विटा आणि चुना या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आहे. पण हे मंदिर एवढे सुंदर, कलात्मक आणि भक्कम आहे की त्याच्या बांधकामात सिमेंट आणि स्टीलचा वापर केलेला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. या मंदिराच्या निर्मितीत वापरली गेलेली वीट आपण वापरतो तशा सर्वसाधारण प्रकारची नाही. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथून ही मशीन कट वीट खास बनवून घेण्यात आली आहे. या विटेच्या वापरामुळे तसेच विशिष्ट प्रकारचा चुना आणि दगड यांचा वापर केलेला असल्याने हे मंदिर किमान पाचशे वर्षे टिकेल असा जाणकारांचा अंदाज आहे.
मंदिराच्या भोवताली रमणीय बाग आणि लॉन आहे. भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे. विशेष प्रसंगी रात्रीच्या वेळी मंदिरावर रोषणाई केली जाते, त्यावेळी तर मंदिर फारच नयनरम्य दिसते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सजवलेल्या एका भव्य अशा गजराजाची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला श्री सिद्धिविनायकाचे वाहन असलेल्या मूषकाची मोठी प्रतिमा आहे. त्याच्या हातात मोदक आहे. आपल्या मनातील इच्छा या मूषकाच्या उजव्या कानात सांगायची. ती इच्छा पूर्ण होतेच अशी भाविकांची श्रद्धा आहे.
श्री गणेशाला अग्रपूजेचा मान आहे. कोणत्याही पूजाविधीची सुरुवात श्री गणेशाच्या आराधनेशिवाय होत नाही. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी असून विघ्नहर्ता आहे. त्यामुळे सर्व दिशा मोकळ्या होतात. सर्व विघ्नांचा नाश होतो असे आपण मानतो. या आपल्या श्रद्धेला अनुसरूनच या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात अष्ट दिशांना प्रत्येकी एक अशा अष्टविनायकांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुंदर कमानी आहेत. त्या कमानींमध्ये असलेल्या आठ स्तंभांवर अष्टविनायक विराजमान झाले आहेत. या कमानी अत्यंत देखण्या आहेत. बाहेरच्या बाजूने लांबून या कमानींकडे पाहिले तर हत्तीच्या सोंडेचा भास होतो. मंदिराला प्रदक्षिणा करताना अनायासेच आपलं अष्टविनायकांचंही दर्शन पूर्ण होतं.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अष्टविनायकाच्या मूर्तीपुढे बाहेरच्या बाजूस हातात मोदक घेतलेला मूषक आहेच.
जेवढे मंदिराचे बाह्य स्वरूप देखणे आहे, तेवढेच अंतरंग देखील! मंदिराच्या २१ पायऱ्या चढून आपण आत गेलो की दृष्टीस पडते ती श्रींची एक अतिशय सुंदर पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडवलेली मूर्ती. ही मूर्ती पाहताच शांत, प्रसन्न वाटते. कमलदलात स्थानापन्न झालेली सुमारे ३० इंच उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती पाहताच आपण नतमस्तक होतो आणि हात आपोआप जोडले जातात. ही श्रींची मूर्ती पृथ्वीवर स्थानापन्न असून वरच्या बाजूला आकाशाचे प्रतीक म्हणून निळा रंग देण्यात आला आहे. केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अवघ्या विश्वात ईश्वर व्याप्त आहे हेच जणू ही रचना आणि रंगसंगती सूचित करते. त्याचप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि मोक्ष या संकल्पना देखील त्यातून सूचित होतात. मूर्तीच्या पाठीमागे १०८ टोकांची प्रभावळ सोनेरी रंगात असून त्यातील मधल्या बाजूस श्रीगणेशाचा आवडता लाल रंग देण्यात आला आहे. २८ डिसेंबर २०१२ या दिवसाच्या शुभमुहूर्तावर संत प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज (आचार्य श्री किशोरजी व्यास) यांच्या शुभहस्ते श्रींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
या मंदिराचे वैशिष्ट्य असे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे प्रवेशद्वारातून आत येऊन थेट मूर्तीवर अभिषेक करतात. प्रवेशद्वारावर असलेली भव्य दगडी कमान जणू त्या सूर्यकिरणांचे स्वागत करण्यासाठीच उभी आहे असे वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश पुराणातील आणि श्री गणेशाच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग शिल्पांकित केलेले आहेत.
या मंदिराचा आणखी एक विशेष असा आहे की नऊ या अंकाशी या मंदिराचे विलक्षण साधर्म्य आहे. हे मंदिर पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागली. ज्या दिवशी हे काम पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा झाली, तो दिवस होता २८/१२/२०१२. या तारखेतील सर्व अंकांची बेरीज केली असता ती सुद्धा नऊ येते हा विलक्षण योगायोग आहे. मंदिरातील मूर्तीचे वजन १०८ किलो आहे. मूर्तीभोवती १०८ टोकांची प्रभावळ आहे. मंदिरातील घंटेचे वजन १०८ किलो आहे. १०८ या संख्येतील अंकांची बेरीज ९ येते. श्रींची मुख्य मूर्ती आणि बाहेरील अष्टविनायक असे मिळून नऊ श्रींच्या मूर्तींचे दर्शन होते. त्याचप्रमाणे मूषकही नऊच आहेत.
नऊ या अंकाचं एवढं विलक्षण महत्व काय असावं असं वाटून मी त्यासंबंधीची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि मोठी मनोरंजक माहिती हाती आली. जशी रेडिओ लहरींची (तरंगांची) फ्रिक्वेन्सी असते, जिला आपण ‘ हर्ट्झ ‘ या एककात मोजतो, तशीच प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक वस्तूची फ्रिक्वेन्सी असते असे मानले जाते. प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या जन्मतारखेनुसार चार उच्च कंपन तरंग आणि चार निम्न कंपन तरंग असतात. अगदी त्याचप्रमाणे विश्वशक्तीचेही स्वतःचे विशिष्ट कंपन तरंग असतात आणि नऊ हा अंक विश्वशक्तीचा विशिष्ट कंपन तरंग अंक आहे असे मानले जाते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उच्च कंपन तरंगांसह विश्वशक्तीच्या संपर्कात येणे आवश्यक असते. हे जेव्हा घडते, तेव्हा विश्वशक्ती त्याच्या जीवनात यायला सुरुवात होते. अशा व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागतात.
विश्वातील प्रत्येक आकार नऊने बनलेला आहे. चक्र किंवा वर्तुळ ३६० अंशांचे असते. यातील अंकांची बेरीज ९ येते. तसेच एक तास म्हणजे ३६०० सेकंद. चौरस किंवा आयताकृतीतील कोनांची बेरीज ३६० येते. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० असते. पंचकोनातील एकूण कोनांची बेरीज ५४० येते. षटकोनांच्या कोनांची बेरीज ७२० येते. यातील कोणत्याही संख्येच्या अंकांची बेरीज केली असता ती नऊ येते. आईच्या पोटात नऊ महिने राहिल्यानंतर मनुष्याचा जन्म होतो. त्याचप्रमाणे नवग्रह, नवरत्ने, नवरात्री या सगळ्या गोष्टीत नऊचे महत्व आहे. यावरून हा निष्कर्ष काढता येतो की हे मंदिर नऊ या अंकाने वेगवेगळ्या प्रकारे विश्वशक्तीशी जोडले गेले आहे. आपणही या मंदिरात या विश्वशक्तीशी जोडले जातो. श्री गणेश ही बुद्धीची, विद्येची देवता आहेच. तो विघ्नहर्ताही आहे. अशा या सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन आम्हाला घेता आले याचा आनंद झाला. नरसोबा वाडी किंवा कोल्हापूरपासून हे ठिकाण जवळ असल्याने भाविकांनी एकदा तरी या मंदिराला जरूर भेट द्यावी.
शेजारची मुलगी विचारत आली आत्या देवाचे अवतार असतात का? मी म्हणाले हो… ” मग देवाचे जर अवतार असतात तर आई मला म्हणाली काय अवतार केलाय जरा आरशात बघ मी काय अवतार केला मग अवतार… म्हणजे नेमकं काय? परवा आजी म्हणाली… आम्ही लहानपणी विठोबाच्या देवळात अवतार बघायला जात असू.. मला खूप कन्फ्युजन आहे की नेमक अवतार म्हणजे काय? आणि मी थोडा मेकअप केला तो आईला आवडला नाही तर ती मला पटकन म्हणाली काय अवतार केलायस? ते जरा आरशात बघ…! त्यात फरक काय? .. मी तिला जवळ बसून घेतले आणि सांगितले बाळा मराठी मध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला अनुभवानेच समजून घ्यावे लागते देवाने अवतार घेतला… देव खाली अवतरले… किंवा काय अवतार केलास ग बाई…! अवतार बघायला जाऊया.. तुझ्या त्या अवतारात तू नाटकात छान दिसत होतीस…! इथे म्हणजे शेवटच्या वाक्यात अवतार म्हणजे गेट अप बाकीच्या सगळ्या अवतारांचा पण अर्थ पाहुयात..!
आपल्या धर्मामध्ये मुख्य देव तीन मानले जातात ब्रह्मा विष्णू आणि महेश… प्रत्येक देवाचे वेगवेगळे अवतार आहेत विष्णूचे दहा अवतार शिवाचे 11 अवतार मानले जातात याशिवाय आणखीन काही उप अवतार सुद्धा आहेत. आता हे जे मुख्य देव आहेत हे स्वर्गात आहेत मग लोकांच्या कल्याणाकरता त्यांना वेगवेगळे रूप घेऊन चांगला संदेश देण्यासाठी पृथ्वीवर यावे लागते त्यांचा तो जन्म जो असतो तो साधारण माणसांप्रमाणेच असतो आणि त्या जन्मामध्ये ते जे आपल्याला सांगून जातात त्यांच्या वागणूकीतून शिकवणीतून ते आपल्यापुढे काही आदर्श ठेवतात…! देवाने सुद्धा या निसर्गचक्राप्रमाणेच अवतार घेतले. देव एकदम मानवी रूपात आले नाहीत… विष्णूचा पहिला अवतार मत्स्य म्हणजे मासा कुर्म म्हणजे कासव वराह म्हणजे डुक्कर नरसिंह म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी मग वामन म्हणजे बुटका असलेला माणूस पराक्रमी असलेला परशुराम आदर्श ठेवणारा राम मग शांतता संदेश देणारा बुद्ध किंवा बलराम त्यानंतर कृष्ण आणि पुढे भविष्यात येणारा कल्की असे हे सगळे अवतार आहेत म्हणजे हे सगळे अवतार उत्क्रांतीला धरून आहेत तसेच शिवाचे पण अवतार आहेत शिवाचे अकरा अवतार वीरभद्र पिपलाद नंदी भैरव अश्वत्थामा शरभावतार गृहपती दुर्वास हनुमान ऋषभ आणि यतीनाथ
एका विशिष्ट महिन्यामध्ये पांडुरंगाला हे अवतार केले जातात त्याच्याभोवती तसे डेकोरेशन करतात म्हणजे त्या अवताराला साजेचा देखावा… तुझी आजी लहानपणी ते देखावे म्हणजे आमच्या लहानपणी ते देखावे पाहायला आम्हाला घेऊन जात असे. दहा दिवस असे दशावतार सादर करतात. कोकणामध्ये दशावताराचे नाटकही होते आणि देवाने अवतार घेतला म्हणजे देवाने जन्म घेतला. नाटकातलं तुझा अवतार अगदी बरोबर होता म्हणजे नाटकात तुझा गेटअप अगदी योग्य होता आणि तुझी आई तुला म्हणाली ना काय अवतार करून घेतला आहेस…? म्हणजे तू अतिशय चुकीच्या पद्धतीने नटली होतीस किंवा तुझा मेकअप केला होतास ते अजिबात चांगला दिसत नव्हतं ते म्हणजे तू आहेस त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळीच दिसत होतीस म्हणून तुझी आई तुला म्हणाली काय अवतार केलास तर अशीही अवताराची किमया!
आत्या मराठी खूप अवघड आहे ना? अगं तुम्हाला अवघड वाटणारच कारण तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकता व मराठीतल्या कुठल्याही शब्दाचा नेमका अर्थ तुम्हाला कळत नाही आणि सगळेच अर्थ शाळेत शिकून येत नसतात ते बोलीभाषेतून वापरून वापरून आपल्याला समजतात मराठी इतकी समृद्ध भाषा आहे त्याच्यामध्ये म्हणी वाक्प्रचार यांचाही समावेश आहे. थोडक्यात आपलं म्हणणं मांडण्यासाठी म्हणी वापरतात उदाहरणार्थ… नाव सोनू बाई हाती कथलाचा वाळा… म्हणजे नाव सोन्याची संबंधित आणि परिस्थिती इतकी गरीब की अत्यंत कमी दर्जाचा असलेला धातू म्हणजे कथिल त्याची बांगडी तिने हातात घातली आहे. इतकी परिस्थिती वाईट पण हे एवढं सगळं सांगत बसण्याच्या ऐवजी एका म्हणी मध्ये ते व्यक्त होते. अग मराठीमध्ये सुंदर काव्य आहे अभंगाच्या सुंदर रचना आहेत ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत तुम्हाला इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना या भाषेचे सौंदर्य किंवा त्याचा आस्वाद घेता येणार नाही हे तुमचे दुर्दैव आहे म्हणून मी तुझ्या आईला सांगत होते मराठी माध्यमात घाल आपल्या भाषेचे सौंदर्य कळाले पाहिजे. इंग्रजी जागतिक बोलीची भाषा आहे 26 अक्षरांची भाषा.. ती येतेच थोड्या प्रयत्नाने पण मराठी बोलल्याने सरावानेच येते अनुभवाने कळते कामाला हातभार लावावा म्हणजे मदत करावी हे अपसुक कळायला लागतं
“ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरीलीया रंगा”
किती सुंदर अर्थ आहे अभंगात की उस जरी वाकडा असला तरी रस गोडच असतो त्याच्या चवीत बदल होत नाही म्हणून वरवरच्या रंगाला कधीही भुलून जाऊ नका वरच्या रूपाला फसू नका असा संदेश देणारे महानकाव्य आपल्या मराठी भाषेत आहे…! जन्मभरीच्या श्वासाइतके मोजले हरिनाम बाई मी विकत घेतला शाम तुम्हाला इंग्रजी माध्यम वाल्यांना काय डोंबल कळणार यातलं म्हणजे ती बाई म्हणते.. ” की प्रत्येक श्वासाला मी परमेश्वराचे नामस्मरण केले आहे जणू काय मी ते नामस्मरणाचे पैसे मोजून परमेश्वराला विकत घेतला आहे तो माझ्याजवळच आहे “हे लिहिणारे माडगूळकर, सुरेश भट.. ” सरणावर जाताना इतकेच मजला कळले मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते”
“टाळ हाती धराया धजेना कुणी लावणी ने हजारो दिवाणे दिले” हे लिहिणारे श्री सुधाकर इनामदार संदीप खरे हे सर्व कवी अत्रे पु ल देशपांडे यांच्यासारखे प्रतिभावंत लेखक त्यांचे अनमोल साहित्य याचा आस्वाद तुम्हाला घेता येणार नाही. आणि हेच आमचे दुर्दैव आहे या सर्व साहित्यावर मराठी संस्कार आहे भारतीय परंपरेचा अभिमान सांगणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या धर्मातील गीते सारखे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात सांगणाऱ्या कथा आहेत रामायण आहे महाभारत आहे… अग तू तर मला परवा चक्क विचारलं हु वॉज राम अँड सीता अगं त्यादिवशी बेशुद्ध पडायची वेळ आली मला थोडंसं समजून घ्या बसा ऐका मराठी शिकून वाचा आम्ही मराठी माध्यमात असून इंग्रजी वाचतो की नाही मग तुम्हाला मराठी यायला काय हरकत आहे. आपल्या मातृभाषेवर प्रेम पाहिजे बाळा आणि ती इतकी समृद्ध असताना तर पाहिजेच पाहिजे असो तुला आता कळलं ना अवताराचा अर्थ? मग तुझ्या इतर मुलांना मित्रांना पण तो सांग म्हणजे तुझा अभ्यास होईल. ती म्हणाली, “आत्या किती माहिती कळाली मला मी नक्कीच माझ्या मित्रांना सांगेन… आय विल शेअर इट… मी कपाळावर हात मारून घेतला… म्हणाले, ” सांग बाई सांग तरी नाही तर शेअर तरी कर…! “
“देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण देवाची स्तुती / प्रशंसा करतो. मग आपल्या जवळच्या व्यक्तिबददल चार चांगले शब्द बोलायला उशीर का लावतो??? “•••
आज अजय अनिताला श्रीरंग जोशीकडे नाश्त्याला बोलविले होते. श्रीरंग व अजय एकाच कंपनीत काम करतात. दोघे चांगले मित्र आहेत. अनिता आणि श्रेया पण बऱ्याच वेळा भेटल्या होत्या, पण घरी येणजाण तसं तेवढं झालं नव्हतं. मैत्रीत एक पूढचे पाऊल घेऊन श्रीरंगने दोघांना घरी बोलविले आहे. ••• परिवारातील इतर सदस्यांशी ओळख वाढली तर मैत्री वाढते. असा उद्देश असावा. नातेवाईक असतातच. हम उम्र मित्र पण पाहिजेतच. मैत्रीत संकोच नसतो. आरामात बोलता येत. या वयातील काही प्रश्न मित्रांच्या संगतीत सहज सुटतात. काही सल्ले तर मित्रच छान देतात. ••••
म्हणतात ना, •••
“Deep conversations with right people are priceless. “•••
म्हणून मोजकेच पण जीवाभावाचे चांगले मित्र जपायचे असतात. •••
अजय, श्रीरंग दोघेही एकटेच. भाऊ बहिण नाही. म्हणूनही मित्र जास्त जवळचे आणि महत्वाचे. ••••
घरी येताच अनिताच्या लक्षात आलं, की••• श्रीरंग श्रेयाचे घर छान आहे. खूप काही महागडं सामान नसलं, तरी घर व्यवस्थित आहे. घराची सजावट बघता श्रेयाचा व्यवस्थित पणा, स्वच्छता, एकंदर तिची कलात्मकता लक्षात येते. नवीन आधुनिक विचारांनुसार घरातील ‘Vibes’ छान प्रसन्न positive आहेत. •••
” It seems she is a good home maker. ” •••
पंजाबी ड्रेस मध्ये श्रेया छान दिसत होती. दोघांनी अजय अनिताचे मनःपूर्वक स्वागत केले. ••••
Wow!! अरे व्वा!!! मस्तच!!! असं सहज कोणीही घर बघून म्हणेल. अनिताचे पण असेच ‘impression ‘ झाले. तिनेही हे सर्व म्हंटलेच. फक्त *मनातल्या मनात*. •••
नाश्ता पण छान होता. एक तर काळ वेळ, वयानुसार मेन्यू ठरविणे महत्वाचे असतेच. नंतर पदार्थांचे ‘Presentation ‘ सजावट हे ही महत्वाचे. त्यामुळे पदार्थांची value वाढते. ते जास्त ‘ tempting ‘ दिसतात, बघताच खावेसे वाटतात. बरे असो, ••••
आलू पराठे बरोबर दही, घरचे लोणी चटणी, सॉस तर होताच. बरोबर ढोकळा, सॅन्डविच, एका बाउल मध्ये फळ चिरून ठेवली होती. केशर घालून केलेला शीरा होता. नंतर कोल्ड कॉफी किंवा चहा कॉफी चे option होतेच. •••
एकंदर सर्व व्यवस्थित, systematic होत. पदार्थ छान चविष्ट झाले होते.. कुठेही गडबड गोंधळ नव्हता. अजय अगदी खुशीत होता. त्याने दादही दिली. श्रीरंग श्रेया दोघांचे’ coordination छान होते. •••
घरी परत आल्यावर अनिता आईंना सर्व सांगत होती. कौतुक ही करत होती. श्रेयाने दिलेलं गिफ्ट आईंना दाखवून म्हणाली, ••• आई!! श्रेया कडून खूप शिकण्यासारखे आहे. मला आवडली ती. •••
अजय हसला आणि म्हणाला, ••• अग!!! पण तेथे तू याबद्दल काहीच बोलली नाही. एकदाही एकाही गोष्टीची, पदार्थांचे कौतुक केले नाही. ••••
अनिता म्हणाली, ••• मला नाही करता येत तुझ्या सारख. •••
आई म्हणाल्या, ••• अग!! अनिता कौतुक करावे. आपल्या मनातले बोलून दाखवले नाही तर समोरच्या ला कसं कळेल??
अग!! आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पुजा, प्रशंसा, स्तुतीच तर करतो ना. मग एखाद्या व्यक्तिबददल चार चांगले शब्द बोलायला उशीर का करतो?? •••
फक्त ” प्रशंसा योग्य वेळी योग्य तेवढी करणे गरजेचे असते. “कौतुकाचे दोन शब्द आपल्यातील मैत्रीचे नातं घट्ट करतात. समोरच्या लाही प्रोत्साहन मिळत. त्यांचाही आत्मविश्वास वाढतो. ••••
” बोलायचे वरदान फक्त माणसालाच मिळाले आहे ना, मग बोलावं. ” ••••
अग!! तुला ही एक चांगली मैत्रीण मिळेल. तुम्ही सर्व एकाच वयाचे तर आहात. •••
इतक्यातच नवरात्रात आपल्या घरी भजन झाले. तू म्हंटलेल्या भजनाचे सर्वांनी कौतुक केले. तेंव्हा मला तर खूप आनंद झाला. माझी कॉलर वर झाली. तुलाही नक्कीच चांगल वाटले असेल. ••••
आई पूढे म्हणाल्या, •••• अग!! अनिता. दाद द्यावी. कधी बोलून कधी पाठीवर हात ठेवून. समोरच्या ला तर चांगल वाटतच, आपल्याला ही आनंद मिळतो. उगीच गैरसमज होत नाही. ••••
काही हरकत नाही. आज श्रेया ला फोन कर. धन्यवाद म्हण, तेंव्हा च थोडं कौतुकही कर. ••••
आपल्या स्वभावात थोडा सकारात्मक बदल करत रहावा. आपलंच व्यक्तिमत्त्व खुलत, बहरत. आपलं स्वतःचेच Standard वाढत. ••••
जिममध्ये शारीरिक आरोग्याची आपण काळजी घैतो, मानसिक आरोग्याची काळजी घेणं पण आवश्यक आहे. त्याकरिता आपले विचार, वागणं, संगत सर्वच महत्वाचे. त्याकरिता आपण काही सूत्र पाळावी. स्वतः चे काही नियम तयार करावेत. वेळोवेळी त्यात भर घालावी. •••
देवाने आपल्याला जे आयुष्य दिले आहे, त्याला हीऱ्यासारख चमकवायची पूढची जबाबदारी आपलीच असते. त्यासाठी साधा सरळ सोपा उपाय म्हणजे लहान सहान चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या. स्वतःचे परिक्षण करत रहायचे व बदलायच. ••••
अनिताला आईंचे म्हणणे पटले. •••
आई म्हणाल्या, ••••
“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा. कोणी तरी तुम्हालाच शोधत येईल.” •••
म्हणतात ना •••
खूबसूरती इस में नहीं है कि हम कैसे दिखते है, बल्की खूबसूरती इसमें हैं कि औरों के प्रति हम कैसा व्यवहार करतें हैं।••••
मेजर साहेबांनी हातातली रायफल खाली ठेवली… आणि ती वृद्धा आणि त्या तीन मुलींना आपले दोन्ही हात पसरवून एकत्र मिठीत घेतले… हिमालयाच्या कुशीत चार छोटी हिमशिखरे विसावली आहेत… असे ते दृश्य! या पाचही जणांच्या नेत्रांतून अश्रूंचा एक प्रवाह वाहू लागला… इथे शब्दांचे काहीही काम नव्हते. ती वृद्धा म्हणाली… ”बेटा! माझं उरलेलं सर्व आयुष्या तुला लाभो! आणि… हो… आमची ही कहाणी तू जगाला एक न एक दिवस जरूर सांग! ” मेजर साहेबांनी मानेनेच होकार दिला आणि साहेबांनी त्या चौघींना तिथून सुरक्षित पाठवण्याच्या सूचना त्यांच्या सहकारी सैनिकांना दिल्या… आणि डोळे पुसले! साहेबांच्या डोळ्यांची आणि आसवांची भेट या पूर्वी कधी झाली होती हे त्यांचे त्यांनाही स्मरत नव्हते. अगदी काहीच मिनिटांपूर्वी त्या सात नराधमांना यमसदनी धाडताना त्यांचे हात जराही थरथरले नव्हते! पण ती वृद्धा आणि तिच्यासोबतच्या त्या तीन असाहाय्य पिडीत कन्या पाहून साहेबांच्या पाषाणहृदयातून कारुण्याचा, ममतेचा एक निर्झर त्यांच्याही नकळत पाझरून गेला होता!
शत्रू एकदा निश्चित झाला की त्याला थंड डोक्याने संपवण्याचे प्रशिक्षण त्याला मिळालेले होते.. आणि ते त्याने नसानसांत भिनवून घेतले होते. त्यादिवशी त्याच्या नेतृत्वात एक-दोन नव्हे सात जण यमसदनी धाडले गेले होते… या कामात तो सर्वांच्या पुढे होता.
साधा सैनिक ते एन. एस. जी. कमांडो आणि पुढे लवकरच मेजर या पदापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अतिशय रोमांचक असाच आहे. केरळमधील एका लहानशा खेड्यातून एक सामान्य मनुष्य लष्करात भरती झाला… आणि त्याच्या पोटी आलेला हा निधड्या छातीचा पोरगा त्याच वाटेवर चालला… पण बापाच्या एक पाऊल पुढे!
जवान (लष्करी शिपाई) म्हणून कारकीर्द सुरु करून, शिक्षण पूर्ण करीत करीत, विविध परीक्षा देत देत साहेब अधिकारी बनले. National Security Guard (N. S. G.) मध्ये कमांडो बनणे हे आव्हानही त्यांनी पेलले. सल्ला देणारा देह कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा त्या देहाने जगाचा किती अनुभव प्राप्त केला आहे… यावर साहेब त्या देहाचा सल्ला प्रमाण मानत. एका चाळीस किलोमीटर्स धावण्यातच नव्हे तर अभ्यासक्रमाच्या सर्वच आघाड्यांवर साहेब क्रमांक एकवर होते. त्यादिवशी अडीचशे प्रशिक्षणार्थी जवानांचा जथा रात्रीच्या अंधारात चाळीस किलोमीटर्स धावण्याच्या स्पर्धेत धावण्यास सज्ज होता. साहेबांनी ही कामगिरी याआधीही पूर्ण करून दाखवली होतीच. या वेळी त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला नसता तरीही त्यांचा एकूणातला पहिला क्रमांक काही गमवला जाणार नव्हता. म्हणून त्यांनी अगदी शर्यत सुरु झाल्यावर काही मिनिटांतच शर्यतीत सोडून दिली. अडीचशे जवान पुढे निघून गेले. साहेबांच्या पेक्षा कनिष्ठ पदावर परंतू वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या एका सैनिकाने साहेबांशी संवाद साधला… आणि या पुढे निघून गेलेल्या जवानांपैकी एखादा तरी “तुम्ही चाळीस किलोमीटर्स शर्यत पूर्ण केली नाही… असं म्हणू शकेल असं म्हणत त्यांच्यातल्या कर्तृत्वाला आव्हानच दिले… शर्यत पूर्ण करणं म्हणजे काही फार कठीण बाब असते असं नाही… फक्त मागचा पाय पुढं टाकीत रहायचं… आणि शर्यत संपेपर्यंत हा क्रम थांबवायचा नाही! साहेबांनी या बोलण्यातलं मर्म जोखलं… आणि शारीरिक थकवा, वेदना यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत त्या रात्री ती चाळीस किलोमीटर्स धावण्याच्या शर्यतीची अंतिम रेषा प्रथम क्रमांकाने पार केली! पुढे देशभरात अनेक धाडसी कारवायांत भाग घेऊन पराक्रम गाजवला.
त्यांच्या लष्करी कारकीर्दीतला एक मोठा मैलाचा दगड म्हणजे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रीग्ज साहेबांचे A. D. C. अर्थात साहाय्यक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणे!
१९८०-९० हे दशक भारतातल्या पंजाब राज्यातल्या दहशतवादी घटनांनी अक्षरश: धडधडा जळत होते. सुमारे ८ हजार दहशतवादी आणि कित्येक हजार पोलिस, लष्करी जवान, अधिकारी आणि सामान्य नागरिकांचे यात बळी गेले!
मेजर साहेबांना यावेळी पंजाबात कर्तव्यावर धाडण्यात आलं. सकाळी सकाळी एक खबर मिळाली… एका फार्म हाउसवजा घरात सहा दहशतवादी आहेत… साहेबांनी आपले दल सज्ज केले आणि साहेब त्वरेने निघाले. प्रचंड मोठे शेत शिवार. पण पिकं काढून मोकळं केलेलं. मध्यभागी एक दोन-अडीच मजली इमारत. या इमारतीच्या आसपास मात्र बारा-पंधरा फुट उंचीचे पीक… बहुदा जनावरांना चारा मिळावा म्हणून केलेली सोय. पण याच शेतात आज काही मानवी जनावरं दबा धरून बसणार होती… हे कुणास ठाऊक होतं?
साहेब त्या फार्म हाऊसपासून सुमारे दीडशे मीटर्सवर पोहोचले… त्या इमारतीपासून वीस मीटर्स अंतरावर सी. आर. पी. एफ. च्या दोन जवानांचे मृतदेह पडलेले… एक जवान अजूनही जिवंत होता… जखमी अवस्थेत विव्हळत पडून होता. त्या फार्म हाऊस मधून गस्तीवर निघालेल्या या जवानांवर अचानक हल्ला चढवण्यात आलेला होता. इतर जवानांनी या इमारातीला लांबून वेढा दिलेला होता… परंतू आतून अतिशय मोठ्या प्रमाणावर अचूक आणि मोठ्या क्षमतेचा गोळीबार होत असल्याने पुढे जाता येत नव्हते… मात्र इमारतीमधील दहशतवाद्यांना तिथून बाहेरही पडता येत नव्हते. स्थानिक पोलिस, सी. आर. पी. एफ. यांच्या जोडीला आता एन. सी. जी. ला पाचारण करण्यात आलं होतं!
मेजर साहेबांनी त्या इमारतीपर्यंत थेट पुढे न जाता दोनशी मीटर्स दूरवरून वळसा घालून पोहोचण्याची योजना आखली… साहेब ज्या बाजूने इमारतीच्या जवळ जाणार होते… त्या बाजूला त्या इमारतीला खिडक्या नव्हत्या! साहेब आणि त्यांचे दल त्या इमारतीच्या अगदी भिंतीपर्यंत पोहोचले… पण कसं कुणास ठाऊक… त्या दहशतवाद्यांनी इमारतीवरून उद्या घेऊन त्या दाट शेतात आश्रय घेतला! साहेब त्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या खोल्यांत पोहोचले!
आत चूल पेटली होती… भात रटरटत होता… दूध उकळत होतं. चुलीपुढे बसलेल्या वृद्ध महिलेने आणि घरातल्या बाजांवर निपचित पडलेल्या तीन पोरींनी साहेबांच्या अशा आत घुसण्यावर काहीही प्रतिक्रिया नोंदवली नाही… जणू काही झालंच नाही… असा त्यांचा अविर्भाव होता! सैनिक इमारतीच्या छतावर गेले… तोच त्यांच्या दिशेने गोळीबार सुरु झाला… पण नेमक्या गोळ्या कुठून येत होत्या… हे कळायला काही मार्ग नव्हता… कारण उंच गवतामुळे दहशतवादीसुद्धा अंदाजेच गोळीबार करीत असावेत!
साहेबांनी मोक्याची जागा शोधली… त्या शेतातल्या सुमारे पाऊणशे मीटर्स अंतरावर त्यांना थोडासा धूर वर येताना दिसला… अर्थात दहशतवादी तिथ होते तर! साहेबांसोबत असलेल्या जवानांला त्याच्या हातात असलेले Rocket Launcher डागण्याजोगी स्थिती सापडत नव्हती. आहे त्या स्थितीत सरळ rocket डागले तर ते दीडशे मीटर्सवर गेल्यावरच फुटणार… म्हणजे जिथे हे दहशतवादी होते त्यांच्या पलीकडे जाऊन ते फुटणार होते… म्हणजे उपयोग फारसा होणार नव्हताच. अशा स्थितीत मेजर साहेबांनी स्वत: धोका पत्करला… rocket डागण्याचा अनुभव नसताना साहेबांनी launcher खांद्यावर घेतले… खांदा, पाय यांना दुखापत होण्याचा धोका होताच… साहेबांनी launcherचा कोन बदलला… ते सरळ न धरता आकाशाकडे काहीसे वर केले आणि डागले… गोळा थेट वर गेला… तिथून पुढे गेला… आणि बरोबर सुमारे पंचाहत्तर मीटर्सवर हवेत फुटला… खाली लपलेल्या दहशतवाद्यांवर आग कोसळली… काम फत्ते झाले होते! पण अजून धोका संपला नव्हता. ते दहशतवादी अधून मधून गोळीबार करीत होतेच!
यावर उपाय म्हणून साहेबांनी एक वाहन मागवून घेतले… वाहनावर आडोसा ठेवून त्याच्यामागून गोळीबार करीत त्या वाहनातून साहेब पुढे निघाले… त्या शेतातील पीक तुडवीत… चालकाला पुढचे काही दिसत नव्हते… साहेब गोळीबार करता करता चालकाला दिशा सांगत होते… अचानक चालकाला गोळी लागली… वाहन मागे घ्यावे लागले… दुसरा चालक घेतला… वाहन पुढे निघाले… पण आधी त्याच वाहनाने त्या रस्त्यावरील पीक आडवी केल्याने रस्ता साफ झाला होता… ते दहशतवादी आता नजरेच्या टप्प्यात आलेले होते… साहेबांनी आणि इतरांनी त्या सहा जणांच्या डोक्यात नेम धरून गोळ्या मारल्या…!
साहेब वाहनावरून खाली उडी मारून पुढे जाण्याच्या अगदी बेतात असताना त्यांच्यापेक्षा पदाने कनिष्ठ परंतू अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या सैनिकाने सांगितले… साहेब… रायफल लोड करूनच खाली उतरा… साहेबांनी ते मानले… आणि खरंच… त्या पिकाच्या दुस-या बाजूला हालचाल दिसली… सातवा दहशतवादी तिथे होता… जखमी परंतू गोळीबार करण्याच्या स्थितीत. साहेबांनी आणि इतरांनी मिळून त्याच्यावर शेकडो गोळ्या झाडल्या… आणि त्याच्या शरीराची चाळण केली… कामगिरी फत्ते झाली होती!
मेजर साहेबांना अशा कामगिरी काही नव्या नव्हत्या! त्यांनी शांतपणे त्या दहशतवाद्यांच्या देहांची पुढची व्यवस्था करण्याच्या कामाला सुरुवात केली… तेवढ्यात ती वृद्धा पुढे आली… म्हणाली… मला साहेबांना काही सांगायचे आहे! मेजर साहेब त्या वृद्धेवर आधीच रागावलेले होते… तिने फक्त सहाच दहशतवादी आहेत, असे सांगितल्याचा साहेबांचा समज होता… आणि प्रत्यक्षात सात निघाले होते! . पण सहा आकडा त्या वृद्धेने सांगितलेला नव्हता असे सहकारी अधिका-याने साहेबांना सांगितले. तिची वाट रोखून धरणा-या अधिका-याला जवळजवळ ढकलून ती वृद्धा पुढे आली… आणि मेजर साहेबांच्या पायांशी बसली.. त्यांचे पाय घट्ट धरून! आता साहेब थोडे नरमले… इतकी म्हातारी बाई… आपल्या पायाशी बसते! साहेबांनी तिला उभे केले… त्यावर ती वृद्धा म्हणाली… माझं फक्त एवढं ऐका.. साहेब! इतका वेळ मी माझ्या आणि माझ्या नाती असलेल्या या अभागी मुलींच्या जीवाच्या भीतीने काही बोललो नव्हतो… हे सात जण जगले असते… तर त्यांनी आमचे आणखी हाल केले असते, साहेब! या माझ्या तिन्ही नातींवर या सातही जणांनी रात्रभर पाशवी अत्याचार केले हो.. माझ्या नजरेसमोर! तुम्ही हे जगाला निश्चितच सांगा… या सात दहशतवाद्यांपैकी पाच जण आमच्याच रक्ताचे… आणि उरलेले दोघे पाकिस्तानी… आमच्या लोकांच्या वेशात आलेले राक्षस… होते! अतिरेकाचे हे भयावह रूप… आपल्याच माणसांच्या हातून आपल्याच माणसांचे बळी घेणारे! भारतात अराजक माजवण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो, भारातीयांना भडकावू शकतो हेच यातून सिद्ध झाले.. आजही हे सुरु आहे. मात्र भारतीय लष्कर समर्थपणे मुकाबला करते आहे.. आणि करीत राहील!
ती वृद्धा बोलत असताना त्या तिन्ही मुली पुढे आल्या… त्यातली एक तर केवळ अकरा-बारा वर्षांची. वृद्धेने त्या मुलीच्या गळ्यातला दुपट्टा बाजूला केला… गळ्यावर, चेह-यावर चावल्याच्या, ओरबाडल्याच्या असंख्य खुणा… कुत्तरओढ झालेली नुसती! पोरी भेदरून गेलेल्या हरिणी जणू… पशूंना अगतिकतेने शरण गेलेल्या… नव्हे जावं लागलेल्या!
मेजर पहाडासारखा कणखर माणूस… पण ते दृश्य पाहून त्याचे अंत:करण द्रवले… डोळे भरून आले… मेजर साहेबांनी त्या चौघींना हात पसरवून जवळ घेतले… एका आलिंगनात.. आणि आसवांना वाहण्याची अनुमती दिली काही क्षण! अतिरेक्यांच्या डोक्यात गोळ्या घालताना न थरथरलेले त्यांचे हात त्या लेकरांच्या माथ्यांवर फिरताना थरथरत होते!
या पहाडाचे नाव… मेजर ए. के. रवीन्द्रन… ऊर्फ मेजर रवी(निवृत्त). रवी साहेबांना दोनदा सेना मेडलने गौरवण्यात आले आहे. साहेबांनी जम्मू-काश्मीरमध्येही पराक्रम गाजवून पदक मिळवले आहे… अंदमान निकोबार मध्ये लष्करी गुप्तचार विभागात सेवाही केली आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान कै. राजीव गांधी यांच्या संशयित मारेक-यांना पकडण्याच्या मोहिमेचे ते प्रमुख होते. आपल्या पराक्रमाचे श्रेय सर्व सहकारी दलाचे आहे… असे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या सोबत लष्करी कारवाईत महत्वाची कामगिरी बजावलेल्या प्रत्येकाला सन्मान मिळवून देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. सध्या ते खाजगी सैन्य प्रशिक्षण केंद्र चालवतात… आणि त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारीत कीर्ती चक्र, कर्मयोद्धा इत्यादी चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. लष्कराची योग्य ती प्रतिमा जनमानसात रुजावी यासाठी ते चित्रपट निर्मात्यांना लष्करविषयक सल्ला देण्याचे कामही करत असतात!
मेजर रवीन्द्रन यांची फारशी माहिती मराठी वाचकांना नसावी. Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी मुलाखत बघायला मिळाली. केवळ एका असामान्य लष्करी अधिका-याची माहिती सामान्य मराठी वाचकांना व्हावी, या उद्देशाने, संबंधित podcast निर्मात्यांचा कॉपी राईट भंग होण्याचा गुन्हा हातून घडण्याची आणि कारवाई होण्याची शक्यता, असा धोका पत्करून मी हे लिहिले आहे. जय हिंद!
(अशी पतिव्रतेची कर्तव्ये सांगून तिच्यावर पुरुषाच्या बंधनात राहण्यासाठी दिलेली वचने याचे गारुड आहे.)
हे बदलायचे असेल तर, स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी देतांना वा घरातील कामे सांगण्यात करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे, असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना ‘तू बायल्या सारखा का वागतो? हातात बांगड्या भरल्या आहेस का? मुलीसारखा मळूमुळू काय रडतोस? ‘ अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे आहे असे समजुन एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास मुलामुलींसाठी पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल.
पण स्त्रीला उडण्यासाठी आकाश उपलब्ध करून दिलं गेलं तरी पक्षी म्हणून भरारी मारू देण्यापेक्षा पतंग बनवून त्याच्या दोऱ्या स्वत:च्या हातात ठेवण्याचा दुटप्पीपणा हे या पुरुषप्रधान समाजाचे वैशिष्ठ्यच जणू. असे पुरुष नेहमीच म्हणत असतात की, ’आमच्या घरात आम्ही स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आहे बरं का! ’ नमूद करण्याची गोष्ट म्हणजे फक्त पुरुष हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे घटक नसतात, तर या पुरुषप्रधान संस्कृतीला बळकट करणारा प्रत्येक घटक हा पुरुषप्रधानच असतो. म्हणूनच स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान वृत्तीच्या असू शकतात. स्त्रियांचा लढा, त्यांचे प्रश्न याकडे केवळ स्त्रीवादी दृष्टिकोनातून न पाहता मानवतावादी दृष्टीने पाहिले तरच शोषण थांबून खरी समानता प्रस्थापित होईल. आज मात्र कळप-समूह-समाज ही आजवरची कालसंक्रमणा विसरून उलट दिशेने भूक आणि वासना या आदिम प्रेरणेपर्यंत आपण प्रवास करतो आहोत, असे सद्यस्थितीवरून वाटते. बाहेरच्या रावणाची भीती घालून स्त्रीसाठी परंपरेच्या लक्ष्मण रेषा आखल्या गेल्या. मातृत्वाचे गोडवे व अन्नपूर्णेचे वरदान यांच्या अवाजवी महतीने तिला चूल व मूल यामध्येच आजन्म कैद केले. संसाराच्या गाभाऱ्यात एकदा प्रतिष्ठापना झाली की तिने आयुष्यभर देवपण ‘सोसायचं’ हा दंडकच झाला. तिची देवता म्हणून पूजा करण्याऐवजी, माणूस म्हणून आदर केला तर तिच्या अस्तित्वाला खरा अर्थ येईल.
आपल्याकडे आदर्श पुरुष व आदर्श स्त्री यांच्या संकल्पना अगदी विरोधाभास दाखवणाऱ्या आहेत. ज्या पुरुषाकडे नेतृत्व कौशल्य आहे, आत्मविश्वास, धडाडी आहे तो आदर्श पुरुष व स्त्री मात्र खाली मान घालून जगणारी, वडीलधाऱ्यांचे ऐकणारी, कुटुंबासाठी खपणारी ती आदर्श. मुळात ही संकल्पनाच स्त्री-पुरुष समानतेला सुरुंग लावणारी आहे. म्हणून समाजाच्या मानसिकतेत बदल होणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत समानता प्रत्यक्षात येणे अवघड आहे. समानता म्हणजे दोघांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करणे व निर्भेळ सहजीवन अनुभवणे. प्रत्येक स्त्री-पुरुषाने असे करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.
पण आजपर्यंत स्त्रीमध्ये लख्खपणे दुय्यमत्वाची जाणीव रुजवण्यासाठी पुरुषसत्ताक पद्धतीने तिच्यावर कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक संस्कार लहानपणापासून असे केले आहेत की, त्यात परावलंबीत्वाची भावना, असहाय्यतेची भावना वाटूच नये. शारीरिक सौंदर्य, कपड्याचे महत्त्व यातच त्या गुंतून राहाव्यात आणि शारीरिक क्षमतेकडे, तिच्या बौद्धिक विकासाकडे जाणूनबुजून तिला दुर्लक्ष करण्यास भाग पाडावे. तसेच तिला फक्त लैंगिक देहधर्मात जखडून ठेवावे. अशाप्रकारे संस्कृती नामक सोन्याच्या पिंजऱ्यात स्त्रीला जखडून ठेवले आहे. त्यामुळे स्त्री अबला नसूनही तिला अबला बनवले गेले आहे. पुरुषांमध्ये रुजवले जाणारे स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास हे गुण स्त्रीमध्ये संस्काराच्या रूपाने कधी रुजवले जात नाहीत. त्या उलट प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक करता आलाच पाहिजे. विणकाम, भरतकामात रस वाटलाच पाहिजे. मातृत्वाची ओढ तर अनिवार्यच आहे. त्यामुळे तिने घरकाम, स्वयंपाक, आलेगेले, नातेवाईक, सासू-सासरे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतीदेव यांची सेवा, त्याग, प्रेम या गोष्टी अंगी बाणवल्या पाहिजेत, असे संस्कार केले जातात.
स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक फरकांना, शारीरिक, मानसिक क्षमतांना चुकीच्या पद्धतीने मांडून त्यांच्या सामाजिक स्तरामध्ये पुरुषी वृत्तीने दरी निर्माण केली आहे, हे लक्षात घेऊन २१ व्या शतकातील शिक्षित तरुणींनो, आता तरी पुरुषी मानसिकतेचा हा कावा लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी तुम्ही जिद्दीने उभ्या राहाल काय? लग्न, परावलंबन, मातृत्व, मुलांचे संगोपन, स्वयंपाकपाणी आणि घरकाम या स्त्रियांच्या गुलामगिरीच्या बेड्या आहेत, हे कधीतरी तुमच्या लक्षात येईल काय? ही कामे फक्त स्त्रियांचीच आहेत असे कोणी ठरवले, हा प्रश्न तुमच्या मनात का येत नाही? तेव्हा स्वतःमधील आंतरिक शक्ती ओळखून आपल्या मुलांमध्ये, स्त्री ही एक व्यक्ती आहे, तिलाही पुरुषासारखे मन असते, तीही पुरुषाएवढीच हरप्रकारे सक्षम आहे, असा स्त्री-पुरुष समानतेचा संस्कार रुजवून भावी पिढीतील पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना बदलण्यास भाग पाडाल काय? तसे झाले तर पुरुषही लग्न हा मालकी हक्काचा संस्कार नसून सहजीवनाचा सत्कार आहे हे लक्षात घेऊ लागतील.
पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रेडियोवर सुरु होणाऱ्या, “मंगल प्रभात” या कार्यक्रमात, बिस्मिल्लाखान यांच्या शहनाईवादनानंतर, सहा वाजता दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून एक-एक मिनिटांचे, प्रथम हिंदी व नंतर इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होत असे. तसेच, संध्याकाळी सात वाजता,
“नमस्कार, आकाशवाणीच हे मुंबई केंद्र आहे! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत. आजच्या ठळक बातम्या… ”
वाचकहो, टीव्ही नामक इडियट बॉक्स आजच्या सारखा झोपडपट्टीपासून बंगल्या बंगल्यात आणि आता तर मोबाईलमधे सुद्धा घुसायच्या आधीची ही गोष्ट! त्या काळी या दोन “ऑथेँटिक बातमी पत्रावर” अवलंबून असणारी आमची पिढी, रेडियोवरची ही दोन बातमी पत्र ऐकत, ऐकत मोठी झाली. त्याकाळी रेडियो घरात असणं हे थोडं श्रीमंतीचच लक्षण मानलं जात होतं. सगळ्या मध्यमावर्गी्यांना त्याकाळी परवडण्यासारखी ती गोष्ट नव्हतीच मुळी. आमच्या चाळीच्या पंचेचाळीस बिऱ्हाडात जेमतेम दोन ते तीन “मरफीचे” रेडियो होते, यावरून त्याची कल्पना आपल्याला यावी! या रेडियोच्या बाबतीतल्या गमती जमती सांगण्यासाठी वेगळा लेख पुढे मागे लिहायचा माझा विचार आहे. आता आजचा लेखाचा विषय “बातमीचा समाचार” असल्यामुळे, माझ्या पुढील लेखाच्या विषयाची आगाऊ बातमी देणं, हे मी माझं कर्तव्य समजतो म्हणून ही ताजी बातमी आपल्याला दिली. असो!
माझं अर्ध्याहून अधिक आयुष्य हिंदमाता टॉकीजजवळच्या नायगावच्या ८ बिल्डिंगच्या अहमद सेलर चाळीच्या संकुलात गेलं. त्यावेळी आमच्या चाळीतलं चालत बोलत “वर्तमानपत्र” होतं ते जोशी काकूंच. जोशी काकूंची खोली जिन्याजवळ, त्यामुळे जिन्यावर नुसता पावलांचा आवाज यायचा अवकाश, काकू लगेच बाहेर येऊन आलेल्या गेलेल्याची त्याच्याशी ओळख असुदे अथवा नसूदे, सखोल चौकशी केल्याशिवाय सुटका करीत नसत! आणि मग दुपारी चाळीच महिला मंडळ आपापल्या घरचं धान्य निवडण्याच, भाजी निवडण्याचं काम किंवा शिवणकाम घेऊन चौकात एकत्र जमल्या की मग त्यांच्यासाठी जोशी काकूंच बातमीपत्र सुरु होई.
वाचकहो त्यावेळच्या जोशी काकूंच्या बातमीपत्रास ‘वावडी’ म्हणतात हे थोडं मोठं झाल्यावर मला कळायला लागलं. तसे
‘वावडी’ या शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत, जे संदर्भाप्रमाणे बदलतात. मुख्य अर्थ म्हणजे ‘खोटी बातमी’ किंवा अफवा, अवई, कंडी, हूल, वदंता इत्यादी इत्यादी. थोडक्यात कुठल्याही बातमीची खरी खोटी शहानिशा न करता, ती बातमी जगजाहीर करून स्वतः फुशारकी मारणे.
पुराण काळात राजाचा एखादा हुकूम अथवा फर्मान रयतेला (तेव्हा सामान्य लोकं रयत म्हणून ओळखले जायचे, त्यांची जनता नंतरच्या काळात झाली बरं कां! ) कळण्यासाठी वेगळी सोय होती. एक दवंडीवाला, त्याच्या ढोल वाजवणाऱ्या साथीदारासह गांवभर फिरून, तो राजाचा नवीन हुकूम अथवा फर्मान प्रत्येक गावच्या चावडीवर मोठ्याने वाचून दाखवत असे! त्या योगे तमाम जनतेला राजाच्या नवीन हुकुमाची माहिती होई. तसंच काही काही राजांनी त्याकाळी विशिष्ट पक्षांचा उपयोग, अतिदूर असलेल्या कोणासाठीतरी संदेश (बातमी) देण्यासाठी वापरल्याच आपल्या वाचनात आलं असेलच. आणि ते वाचलेलं आठवत नसेल तर, “कबुतर जां, जां, जां” हे गाणं आठवून बघा, म्हणजे मी काय म्हणतो ते लगेच लक्षात येईल! हल्ली सगळ्यांनाच स्पून फिडींग करायला लागतं, त्याला तुम्ही तरी कसे अवपाद असणार म्हणा! असो!
काही आफ्रीकन देशातले लोकं फार पूर्वी ड्रम सारखे वाद्य विशिष्ट तालात मोठयाने वाजवून एखादी बातमी पुढच्या गावात पोहचवत असत. नंतर त्याच काळात “रनर”ची परंपरा सुरु झाली. रनर म्हणजे गावातला एखादा सगळ्यात जलद धावणारा तरुण, स्वतः दुसऱ्या गावात जाऊन एखादी बातमी तिथल्या प्रमुखाला सांगत असे. मग त्या गावातला “रनर” तीच बातमी पुढच्या गावात पोहचवत असे!
मराठी वृतपत्रांचा उदय सर्वप्रथम मुंबईत झाला. मराठीतील पहिले वृतपत्र “दर्पण” या नावाने बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले. हे वृतपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते, जे जेमतेम ८ वर्ष चालून १८४० मधे बंद पडले. ही दोन्ही वृतपत्रे सुरु करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो, त्यामुळेच त्यांना ‘मराठी वृतपत्राचे जनक’ मानले जाते.
बातमी हा विषय असल्यामुळे “केसरी”, “नवाकाळ” आणि “मराठा” या एकेकाळी गजलेल्या तीन वर्तमानपत्रांविषयी लिहिल्या शिवाय हा लेख पूर्ण झाल्यासारखं निदान मला तरी वाटणार नाही. या पैकी “केसरी” हे वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी ४ जानेवारी १८८१ रोजी पुणे येथे सुरू केले होते, जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख मुखपत्र बनले, हे आपण जाणताच. हे वृत्तपत्र सुरवातीला विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने सुरू झाले आणि मराठी भाषेतून राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी वापरले गेले. “केसरी” संबधीचा बाकी इतिहास सर्वश्रुत आहेच.
मार्च १९२३ मध्ये खाडिलकरांनी स्वतःचे “नवकाळ” हे वृत्तपत्र सुरू केले, जे गांधींच्या कार्यक्रमाला पाठिंबा देत होते आणि त्यातील संपादकीय गांधींच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत होते.
आचार्य अत्रे यांनी “नवयुग” (साप्ताहिक) आणि “मराठा” (दैनिक) ही दोन प्रमुख वृत्तपत्रे सुरू केली होती, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच त्यांनी ‘जयहिंद’ आणि ‘तुकाराम’ ही वृत्तपत्रेही चालवली होती, पण ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली वृत्तपत्रे होती, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
हल्ली पूर्वी सारखी निर्भीड पत्रकारिता आणि त्या अनुषंगाने निष्पक्षपणे बातम्या देणं हे कधीच काळाच्या आड गेलं आहे. त्यामुळे सध्याच्या कुठल्याही वृतपत्रांबद्दल बोलायचं झालं तर त्या त्या वर्तमानपत्राचा “मालक, चालक” किंवा त्याची मालकी असलेली कंपनी यांच्या धोरणानुसार वर्तमानपत्र चालवलं जात, त्यातील बातम्या छापल्या जातात हे त्रिवार सत्य आपण सारेच जाणतो. आणि आता तर “पीत पत्रकारिता” हा नवीनच प्रकार उदयास आला आहे, त्या विषयी न बोललेच बरं!
आता वृत्तपत्राचा उल्लेख आलाच आहे, तर मी मागे वाचलेल्या एका इंग्रजी कादंबरीची आठवण झाली. स्वतः मालक, चालक, संपादक असलेला माणूस, “बातमी सम्राट” होण्यासाठी आणि आपल्या पेपरचा खप सगळ्यात जास्त होण्यासाठी कोणत्या थराला जातो, हे आयरविंग वल्लास या लेखकाने आपल्या “Almighty” (1982) या कादंबरीत कथन केले आहे. सध्याच्या पत्रकारितेतली “आपण सर्व प्रथम ही exclusive बातमी आमच्याच चॅनेलवर बघत आहात” अशी खरी, खोटी फुशारकी, त्याकाळी त्याने आपल्या वर्तवलेल्या त्याच्या कादंबरीच्या वेगळ्या अर्थाने जवळ जाणारी आहे, असं आता हल्लीचं पत्रकारितेच रूप बघता मला वाटायला लागलं आहे, म्हणून त्या कादंबरीचा उल्लेख केला इतकंच.
पुढे जसं जसा मानव प्रगत होतं गेला तसं तशी, संपर्काची नव-नवीन साधन त्याने आपल्या बुद्धीने विकसित केली. उदाहरणं द्यायच झालं तर पोस्ट कार्ड अथवा अंतर्देशीय पत्र, जी त्या काळी आपल्या स्वतःच्या ख्याली खुशालीची बातमी, अथवा एखादी दुःखद बातमी आपल्या दूरच्या नातेवाईकांना कळवण्यासाठी वापरात येऊ लागली. पण नंतर नंतर त्यातील उणीवा कळल्यावर आणि “तार” नामक बातमी पोचवण्याचा जलद उपाय उपलब्ध झाल्यावर(१८५०) पोस्ट कार्ड आणि अंतर्देशीय पत्र या दोघांचा वापर कमी कमी होत गेला. अर्थात या “तारेच्या” सुद्धा अनेक गमती जमती आपण या आधी ऐकल्याच असतील. त्यानंतर मग टेलिफोनचा शोध लागल्यावर जगाच्या एका कोपऱ्यातली बातमी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात क्षणार्धात पोहचू लागली!
नंतर “दूरदर्शनने” घरात प्रवेश केल्यावर त्यावरील त्या काळात असलेल्या “एकाच चॅनेलवर” वेगवेगळ्या बहारदार कार्यक्रमा बरोबरच दिल्या जाणाऱ्या बातम्या लोकं बघायला लागले आणि त्यावर खात्रीने विश्वास ठेवू लागले! बातम्या कशा द्याव्यात आणि कशा देवू नयेत याच आज सुद्धा उत्तम उदाहरण म्हणजे, दूरदर्शनच्या बातम्या आणि आजकाल इतर कुठल्याही पेव फुटलेल्या न्यूज चॅनेलवरील बातम्या! या बाबतीत जास्त न बोललेच बरं आणि आता तर काय मोबाईल नामक यंत्राने साऱ्या दुनियेतले सगळे लोकं अख्ख जगच आपापल्या खिशात घेऊनच वावरत असतात म्हणा नां! त्यामुळे जगाच्या एखाद्या टोकाला घडतं असणाऱ्या घटनेची बातमी आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला आसलो तरी बसल्या जागी नुसती ऐकूच नाही, तर प्रत्यक्ष पाहूही शकतो!
पण विज्ञानाच्या कुठल्याही शोधाला, एक चांगली आणि एक वाईट बाजू असतेच असते. जसं ऍटोमिक एनर्जीचा शोध लागल्यावर काहींनी त्या पासून सर्वनाश करणारा ऍटोम बॉम्ब बनवला तर काहींनी त्याचाच उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला! आता तर मोबाईलमध्ये वेगवेगळे ऍपस अल्लाउदिनच्या जादूच्या दिव्यासारखे शिरल्यावर, त्याच्या कडून चांगली काम करून घेणाऱ्या लोकांपेक्षा त्याच्या कडून वाईट कामच लोकं जास्त करून घेवू लागलेत हे खरंच दुर्दैवी आहे. आणि आता आणखी एक पाऊल पुढे पडल्यामुळे सध्याच्या AI नामक जादूगारमुळे काही जण स्वतःच एखादी बातमी क्रिएट करून ती पोस्ट करून मोकळे होतात! बरं अशी बातमी बघितल्या बघितल्या त्या बातमीची कुठलीच शहानिशा न करता ती बातमी काही लोकं आपापल्या मित्रांना पुढे पाठवून मोकळे होऊ लागलेत! असो, व्यक्ती तितक्या प्रकृती, दुसरं काय?
मंडळी, आपल्याला एखादी बातमी कुणाकडूनही, अगदी माझ्याकडून देखील कळली, तरी ती पुढे ढकलतांना कृपया त्याची शहानिशा करूनच पुढे ढकला, अशी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती!
मंडळी याच बरोबर माझं आजच “बातमीचा समाचार” हे बातमीपत्र संपलं! हे बातमीपत्र आपल्याला आवडल्यास कृपया आपण ते पुढे पाठवायला माझी हरकत असण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे ते आपण निर्धास्तपणे पुढे पाठवू शकता!
आपल्याला कळलेल्या कुठल्याही बातमीचा आपण योग्य समाचार घ्यावा अशी आपल्या पुन्हा एकदा विनंती करतो आणि आजच्या पुरती आपली रजा घेतो!
काकासाहेब चितळ्यांच्या चरित्रलेखनाच्या एका प्रोजेक्टवर काम करत असताना एक विलक्षण अनुभव आला… मुंबईला एका वृद्ध जोडप्याकडे मुलाखतीसाठी गेले होते. पंजाबी भाषा बोलणारं धट्टकटं सरदार कुटुंब. आजोबा होते वय वर्ष ८५ आणि आजी ८०. दोघेही तब्येतीने अगदी खणखणीत. मी येणार म्हणून आवर्जून खाण्यापिण्याची छान तयारी करुन ठेवली होती. खूप गप्पा-गोष्टी झाल्या, चर्चा झाली… मी त्यांना म्हटलं मी निघते आता… त्याचवेळी ते आजोबा त्यांच्या ६० वर्षांच्या मुलाला काही विचारत होते.. तो मुलगा त्यांना नाही म्हणाला असं मला जाणवलं..
मी निघताना माझ्या सवयीप्रमाणे त्या आजोबा-आजींना खाली वाकून नमस्कार केला… तर त्या आजोबांनी माझ्या हातात ५०० रुपये ठेवले… मी ते हातात घेत म्हटलं की, मैं आज इसे ना नही कहुंगी.. क्यों की यह आपका आशीर्वाद है…
आणि खरं सांगते त्या दिवशी अनेक वर्षांनी आपण लहान आहोत असा फिल आला… संसाराच्या रहाटगाडग्यात आणि विशेषत: वडील गेल्यानंतर जबाबदारीच्या ओझ्यानं जीव मेटाकुटीला आला होता… त्या दिवशी त्या आजोबांनी हातात पाचशेची नोट ठेवल्यावर एवढं नॉस्टॅल्जिक झाले.. माझ्या लहानपणी मोठ्या माणसांना नमस्कार केल्यावर ते हातात खाऊसाठी काहीतरी ठेवत असत.. त्या खाऊच्या पैशाच्या आशेनेही आम्ही लहान मुलं नमस्कार करत असू… हे सगळं आठवलं.. आता खरी गंमत पुढे आहे… मी त्या आजी-आजोबांकडून निघाले तर रात्रीचे ९ वाजले होते. पुण्यात परत येता येता रात्रीचे दीड वाजले… तोवर दर तासा तासाने ते आजी-आजोबा मला फोन करत होते… रात्री दीड वाजता मी पोहोचल्यावर जेव्हा त्यांना पोहोचल्याचा फोन केला तेव्हा ते झोपी गेलेत…काही नातं नाही.. पहिल्यांदाच भेट.. तरीही आपली सख्खी नातंच जणू काही पुण्यात रात्री पोहोचते आहे अशा काळजीने ते जागे होते… एका भावपूर्ण नमस्कारानं किती चित्र बदलवून टाकलं होतं… हा भाव मला पूर्वेची विशेषत: भारताची श्रीमंती वाटतो.. हा अनुभूतीचा विषय आहे… पश्चिम तर्कावर आधारीत आहे.. पूर्व भावावर…
ओशोंचं एक फार सुंदर वाक्य आहे.. ’’पुरूष तर्क से जीता है और स्त्री अनुभूति से.. और जब भी तर्क और अनुभूति में दौड़ होगी.. तर्क हार जायेगा अनुभूती जीत जायेगी”…
पार्थिव, संपत्ती, सत्ता आणि उपभोग संपल्यावर हा भावाचा प्रदेश सुरू होतो… इथे मी भाव हा शब्द वापरतेय… भावना नाही याची कृपया नोंद घ्यावी.
भारतातली ही नाती, या परंपरा, हे संस्कार हे मला भारतीय संस्कृतीचं फार लोभस आणि विलोभनीय वैशिष्ट्य वाटतं… जे एकमेवाद्वितीय आहे…
वडीलधारे असतील, गुरू असतील नमस्काराचा हा संस्कार आपण आग्रहाने जपला पाहीजे… जो आज लुप्त होताना दिसतो आहे… आमच्या लहानपणी कोणी मोठे आले तर नमस्कार करा हे सांगायची गरजच नसे… आजचे किती पालक आपल्या मुलांमध्ये जाणीवपूर्वक हा संस्कार जोपासताहेत… नमस्कार हा कृतज्ञतेचा संस्कार आहे, विनम्रतेचा संस्कार आहे… गुरूंना केलेला नमस्कार, आई-वडीलांना केलेला नमस्कार, सकाळी उठून भूमीला पादस्पर्शं क्षमस्व मे म्हणत केलेलं वंदन, नदयांची होणारी आरती, मध्यप्रदेशात तर वर्षातून एकदा नर्मदेला साडी नेसवून नमस्कार करण्याचा सोहळाच होतो..
हजारो आकाशगंगा, पृथ्वी, सूर्यमाला, हे अनंत कोटी ब्रह्मांड… जीवनाच्या अनन्वित शक्यता… तुम्ही शिकतच राहू शकता आणि केवळ विनम्रच होऊ शकता… अकड मुर्दे की पहचान है.. या झुकण्यातून, लीन होण्यातून सर्जनाच्या किती शक्यता उमलू शकतात…
एका पुरस्कार समारंभात इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी पुरस्कार स्वीकारताना रतन टाटांना खाली वाकून नमस्कार केल्याचं छायाचित्र सर्व वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालं होतं… त्यावेळी मूर्तींच्या या gestureची खूप वाहवा झाली होती…
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना प्रसिद्ध झालेली एक बातमी आठवतेय.. त्या बातमीचं शीर्षक होतं… Even the Prime minster has compelled to touch her feet.. दक्षिण भारतातल्या एक खेड्यातल्या अशिक्षित वृद्ध स्त्रीनं स्वत:च्या कल्पनेनच लाखो गरीब महिलांच्या बचत गटांचं जाळं उभं केलं होतं.. ते काम इतकं अतुलनीय होतं की पंतप्रधान वाजपेयींनी तीच्या कामाला सॅल्युट म्हणून तीला खाली वाकून नमस्कार केला…
भारतीय संस्कृतीचं हे निर्विवाद सौंदर्य आहे… माझे वडील मला सांगत ‘’बेटा एक नमस्कार तुमचं जीवन फार सुकर करू शकतो.. आपल्या हातून कुठली चूक झाली तर मोठ्या माणसांची मनापासून माफी मागायची आणि नमस्कार करायचा.. तुमची मोठी शिक्षा टळून जाईल याने’’… नमस्कार केल्यावर दिलेला आशीर्वाद हा संरक्षक कवचासारखं काम करतो हा माझा तरी विश्वास आहे…
भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नमस्काराचा संस्कार तुम्हाला सर्वत्र सारखा दिसेल… संस्कृतीचे हे कवडसे सर्वत्र सारखे चमकताना दिसतात… धर्म वेगवेगळे असतील.. भाषा वेगळ्या असतील.. पोशाख-पदार्थ वेगळे असतील.. पण संस्कृती एक आहे… धर्मापेक्षा संस्कृती मोठी आहे हा महत्वाचा विचार सुप्रसिद्ध शायर निदा फाज़ली यांनी मांडला होता. भारतात प्रत्येक राज्य हे स्वतंत्र राष्ट्र होऊ शकते हा विचार मांडणाऱ्यांनी हा संस्कृतीचा जोडणारा बांधून ठेवणारा दुवा लक्षात घेतलेला दिसत नाही… आईचं प्रेम, वडिलांचा दरारा, बहिणीची माया आणि भावाची जबाबदारी.. हे भारतात कुठेही जा सारखंच सापडेल…
भारतीय संस्कृतीत गुरूचं अपरंपार महत्व आहे. सोबतच नमस्काराचं… आपल्या मुलांना मोठ्या लोकांना जाणीवपूर्वक नमस्कार करायला लावायला हवा… या संस्काराचं वहन व्हायला हवं…
काल भारतीय महिला चमूने क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यातले विजयाच्या जल्लोष करणारे, खेळाडू मुली भावूक झालेले अनेक फोटो व्हायरल झाले. पण मला सर्वात जास्त आवडला तो कोच अमोल मुजुमदार यांना हरमनप्रीत कौर खाली वाकून नमस्कार करत होती. काय सुंदर जेश्चर होतं ते.
अमृता प्रीतम यांच्या शब्दात सांगायचं झालं तर…
माँओं की चेहरे की जगमगाहट,
बहनों की चुडियों की खनखनाहट,
प्रेयसी के दुपट्टे की सरसराहट
और समय की आहट
सभी जगह एक जैसी होती हैं…
लीन होऊयात.. नतमस्तक होऊयात…
लेखिका : वसुंधरा काशीकर
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “फक्त नऊ ओळीत महाभारताचे सार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
फक्त नऊ ओळींमध्ये महाभारताचे सार – –
*फक्त नऊ ओळींमध्ये महाभारताचे सार समजून घ्या, ज्यात पाच लाख श्लोक आहेत… *
तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल,
तुम्ही स्त्री असो वा पुरुष,
तुम्ही गरीब असो वा श्रीमंत,
तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात,
थोडक्यात…
*जर तुम्ही माणूस असाल तर खालील महाभारतातील मौल्यवान ९ मोती वाचा आणि समजून घ्या… *
१. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीचं ताबा ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यात असहाय्य व्हाल… *’कौरव’*
२. तुम्ही कितीही बलवान असलात तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचे सामर्थ्य, शस्त्रे, कौशल्ये आणि आशीर्वाद सर्व निरुपयोगी होतील… *’कर्ण’*
३. *तुमच्या मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील… *
*’अश्वत्थामा’*
४. अशी वचने कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावे लागेल… *’भीष्म पितामह’*
५. *संपत्ती, सत्ता, अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते… *’दुर्योधन’*
६. *सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका, म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे, कारण तो विनाशाकडे नेईल… *’धृतराष्ट्र’*
७. ज्ञानासोबत शहाणपण असेल तर तुमचा विजय नक्कीचं होईल… *’अर्जुन’*
८. फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही… *’शकुनी’*
९. *जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. * *’युधिष्ठिर’*
हा लेख सर्वांसाठी फायदेशीर आहे, म्हणून कृपया कोणत्याही बदलाशिवाय सामायिक करा.
*सर्वे भवन्तु सुखिनः*
*सर्वे सन्तु निरामयः*
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: सौ. शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈