मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

मे महिन्याचा दुसरा रविवार उजाडतो आणि अचानक संपूर्ण आभासी जग (Social Media) भावूक होतं. मोबाईलच्या स्क्रीनवर ‘Happy Mother’s Day’ चे स्टेटस झळकू लागतात. कुणी फुलांचा गुच्छ देतं, कुणी केक कापतं, तर कुणी आईसोबतचं एखादं जुनं कृष्णधवल छायाचित्र शेअर करतं. दिवस संपतो, त्या फोटोंवरचे ‘लाईक्स’ मोजून आपण सुखावून जातो आणि पुन्हा आपल्या दिनचर्येत व्यस्त होतो. पण या उत्सवाच्या झगमगाटात एक जळजळीत प्रश्न उभा राहतो — मदर्स डे म्हणजे कॅलेंडरने दिलेला केवळ २४ तासांचा तुकडा आहे, की तो आपल्या बोथट होत चाललेल्या संवेदनांना आरसा दाखवणारा एक क्षण?

भारतीय संस्कृतीने आपल्याला ‘मातृदेवो भव’ हा मंत्र दिला. तैत्तिरीय उपनिषदातील हा विचार केवळ भिंतीवर टांगण्यासाठी किंवा भाषणात वापरण्यासाठी नव्हता, तर ते एक मूलभूत जीवनमूल्य होतं. घराच्या देव्हाऱ्यात देव असतोच, पण एका बालकाच्या जगात देवाची पहिली सगुण प्रतिमा ही आईच्या रूपातच उभी राहते. देव निराकार असतो, पण आई साकार असते—स्पर्शात, शब्दात आणि नजरेत. मात्र, आज हेच ‘दैवत’ अनेक ठिकाणी वृद्धाश्रमांच्या उंबरठ्यावर का दिसते? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. आपण भक्तीचा उच्चार तर मोठमोठ्याने करतो, पण व्यवहारात मात्र स्वतःची ‘सोय’ बघतो. आईच्या अथांग कष्टांच्या पायावर आपल्या आयुष्याची देखणी इमारत उभी राहिली; पण तिच्या वार्धक्यात तिला पेलताना आपल्याला ‘जागा नाही’, ‘वेळ नाही’ किंवा ‘परिस्थिती नाही’ या सबबी आठवू लागतात. आईने मात्र आपल्याला वाढवताना कधीही ‘परिस्थिती’ची अट घातली नव्हती, हे आपण सोयीस्करपणे विसरतो.

आजच्या आधुनिक आणि तथाकथित प्रगत जगात काही जण केवळ बुद्धीची कसरत करत असं मांडतात की, “आपण आईच्या उदरातून आलो, म्हणून तिचा आपल्यावर मालकी हक्क नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि जन्म घेणं हा केवळ एक जैविक ‘इन्सिडन्ट’ (योगायोग) आहे.” तत्त्वज्ञान म्हणून हे ऐकायला आकर्षक वाटतं, कारण ते जबाबदारीतून मुक्त करतं. मान्य आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि नातं म्हणजे गुलामगिरी नव्हे. पण नातं हे केवळ जैविक नसतं, ते ‘ऋणाचं’ असतं. आणि ऋण म्हणजे ओझं नव्हे, तर ते कृतज्ञतेचं भान असतं. आपल्या पहिल्या भीतीला जिने कुशीत घेतलं, आपल्या पहिल्या पडण्यावर जिने मायेची फुंकर मारली आणि आपल्या पहिल्या यशात जिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, त्या नात्याला केवळ ‘योगायोग’ म्हणणं ही हृदयाशी केलेली प्रतारणा आहे. बुद्धीला ते पटू शकतं, पण हृदयाला ते कधीच शिवणार नाही.

आई ही कोणी परिपूर्ण ‘देवी’ नाही. ती एक हाडामांसाची माणूस आहे. तिलाही अपेक्षा असतात, तिच्याही मर्यादा असतात आणि तिच्याकडूनही चुका होऊ शकतात. म्हणूनच ती आपल्याला अधिक जवळची वाटते. आपण तिला देव्हाऱ्यात बसवतो आणि तिच्याकडून ‘त्याग’ आणि ‘सहनशक्ती’ची अपेक्षा करतो. पण तिला देव्हाऱ्यापेक्षा तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी दोन शब्द बोलायचे असतात. म्हणूनच मदर्स डे हा केवळ उत्सवाचा क्षण नसावा, तर तो आत्मपरीक्षणाचा क्षण असावा. आपण शेवटचं आईशी निवांत कधी बोललो? तिच्या आरोग्याची मनापासून विचारपूस कधी केली? तिला एखादं महागडं गिफ्ट देणं सोपं असतं, पण तिला आपला ‘वेळ’ देणं कठीण असतं. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट टाकणं सोपं असतं, पण तिच्या वाढत्या वयातील हट्टासमोर संयम बाळगणं कठीण असतं.

आईचा खरा सन्मान म्हणजे तिच्या वार्धक्यात तिच्या थरथरत्या हाताला आधार देणं. तिच्या एकटेपणाला आपली जिवंत उपस्थिती देणं आणि तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी तिला ‘ओझं’ नव्हे तर ‘आपलं’ असल्याची जाणीव करून देणं. ‘मातृदेवो भव’ हा मंत्र उच्चारण्यासाठी नसून तो जगण्यासाठी आहे. भावना व्यक्त करणं सोपं असतं, पण जबाबदारी उचलणं कठीण असतं. ही जबाबदारी म्हणजे केवळ आर्थिक तरतूद नव्हे, तर तिला आदराचं स्थान देणं होय.

कॅलेंडरवर ‘मदर्स डे’ दरवर्षी येईल आणि जाईल. पण आईचा वरदहस्त आपल्या डोक्यावर किती काळ राहील, याची कोणतीही शाश्वती नाही. फुले देण्यापेक्षा तिला मानसिक आधार द्या. पोस्ट टाकण्यापेक्षा तिच्या शेजारी बसून तिचं ऐकून घ्या. ज्या दिवशी घरातील आई खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी असेल, तो प्रत्येक दिवस ‘मदर्स डे’ ठरेल. कारण आईची सावली असेपर्यंतच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित असतं.

तिच्या सुरकुतलेल्या कपाळावर, तुझ्या सुखाचा इतिहास आहे,

तिच्या थरथरत्या हातांमध्येच, जीवनाचा विश्वास आहे…

 

तिची सोबत आहे तोवर  तिचं हसणं कमावून घे,

मदर्स डे च्या स्टेटस पेक्षा, तिचं मन कुरवाळून घे!

 

वेळ निघून गेल्यावर रडून, काहीच साध्य होणार नाही,

आई नावाचं विद्यापीठ, पुन्हा पुन्हा मिळणार नाही…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी आणि AI -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी आणि AI – ☆ विभावरी कुलकर्णी

माझे आत्ता पर्यंत जे व्यक्ती विशेष (थोडक्यात म्हणजे बावळटपणा किंवा मूर्खपणा) मी लिहिले आणि आपण वाचले त्यात अजून एक भर पडली. खूप दिवस AI नामक सर्वज्ञात असलेल्या जीन विषयी ऐकत होते. फारसा विश्वास नव्हताच! पण म्हंटले बरेच लोक प्रशंसा करत आहेत, तर बघावे हा जीन काय काय करतो? कारण नवीन नवीन शिकणे, विविध प्रयोग करणे हे जणू रक्तातच आहे.

आज एका वस्तूवर अडले. इमेज तर दिसली आणि उत्सुकता वाढली. म्हणून सर्वज्ञ AI कडे धाव घेतली, तर त्या वस्तुच्या फोटोत आणि याच्या उत्तरात काहीच साम्य नाही. शेवटी त्या विषयी योग्य माहिती घरातूनच मिळाली. म्हणजे आपण पूर्वेचा रस्ता विचारावा आणि AI ने आकर्षक पद्धतीने उत्तरेला नेऊन सोडावे. कालच एक वसंत कानेटकर लिखित एक प्रसिद्ध नाटक बघून आले. वाटलं AI ला कथानक विचारावे. तर मूळ विषय सोडून काहीही कथा येऊ लागल्या. पुन्हा शेवटी प्रश्न आहेच. मी अजून काही मदत करु शकतो का? दोन तास त्यात घालवले तरी इतक्या प्रसिद्ध नाटकाची कथा त्याने अजून सांगितलीच नाही. मग इतर गोष्टी लांबच!

मग या विषयी जे सध्याचे तंत्रज्ञान वापरतात म्हणजे आपलीच लेकरे, त्यांच्याशी चर्चा केली. तर असे कुठे विचारतात का? म्हणून त्यांनी वेड्यातच काढले. मग आमची चर्चा आणि मध्यंतरी काही वाचले होते ते आठवले.

AI विरुद्ध मानव (AI vs Human) हा सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातील सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने प्रगत होत असली तरी, मानवी बुद्धिमत्तेला तिचा पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

मानवी क्षमता सर्वश्रेष्ठ आहे. मुंबईतील ७७% प्रोफेशनल कामाचे मोठे निर्णय घेताना AI पेक्षा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतात.

AI ची उपयुक्तता: ७३% प्रोफेशनल AI चा वापर मसुदा तयार करण्यासाठी उपयुक्त मानतात, पूर्ण निर्णयासाठी नाही.

 AI मानवाची जागा घेणार नाही, तर मानवी क्षमतेत वाढ करेल. हे मानवी भावना आणि यंत्रांचे तर्कशास्त्र यांचे मिश्रण असेल.

एआयचे जनक जेफ्री हिंटन यांनीही एआयच्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे नोकऱ्या जाण्याची भीती आहे.

एआय चॅटबॉट्सचा चुकीच्या कामासाठी वापर (उदा. डीपफेक) समाजासाठी घातक ठरू शकतो.

योग्य नियोजन आणि मर्यादित वापर केल्यास AI मानवी जीवनासाठी वरदान ठरू शकते, परंतु मानवी विवेकबुद्धीला पर्याय नाही.

एआय आणि मानव यांच्यातील मुख्य फरक

मानव

माणूस सर्जनशील आहे.

उच्च कल्पना आणि भावनांवर आधारित निर्मिती करु शकतो. निर्णय क्षमता भावना, नैतिकता आणि अनुभव यावर आधारित असतात.

वेग व स्मृती मर्यादित असतात. संदर्भ हे नैसर्गिक समज व भावनांवर आधारित असतात.

AI

सर्वजनशीलता मर्यादित डेटा वर आधारित असते. वेग प्रचंड असतो. निर्णय क्षमता डेटा आणि अल्गोरिदमवर आधारित असते.

संदर्भ हे शिकवलेल्या माहितीवर आधारित असतात.

AI हे एक साधन आहे साध्य नाही.

आत्ता पर्यंत एवढेच समजले. अजून काही ज्ञानात भर पडेलंच! या कामी आपणही मदत कराल ना?

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उगीचच खरेदीचं प्रमाण वाढतंय!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “उगीचच खरेदीचं प्रमाण वाढतंय!!…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

रविवारची आळसावलेली, कंटाळवाणी संध्याकाळ,

“मी काय म्हणते”चहाचा कप हातात देत सौ म्हणाल्या.

“बोला!!”

“मॉलमध्ये जायचं का?”

“कशाला? काय घ्यायचयं”

“काहीच नाही. खूप दिवसात विंडो शॉपिंग केलं नाही म्हणून जरा…. ”

“आतापर्यंतचा अनुभव वेगळायं. तिथं गेल्यावर शॉपिंग होतचं. गरज नसलेल्या वस्तू घरात येतात. ”

“स्वस्त असतात आणि डिस्काउंट पण मिळतो म्हणून खरेदी होते. बचत कशी करावी हे तुम्हांला समजतच नाही. ”

“मला काय समजतं आणि काय नाही हा मुद्दाच नाहीये. ”

“एवढी गर्दी उगीच होते का?”

“गर्दीचं कौतुक सांगू नकोस. रस्ता खणत असताना ते बघायला सुद्धा गर्दी होते. ”

“उगीच लेक्चर नको. जायचं की नाही तेवढं बोला. काही घेत नाही फक्त फिरून येऊ. त्याला पैशे पडत नाही” सौंच्या आग्रहाला नाही म्हणता आलं नाही. स्वस्ताई साठी प्रसिद्ध (???)मॉलमध्ये पोचलो. तुफान गर्दी. लोक झपाटल्यासारखं खरेदी करत होते. ओसंडून वाहणारी ट्रॉली आणि मुलं यांना सांभाळत बायकोच्या पाठोपाठ फिरणाऱ्या नवऱ्यांच्या गर्दीत मीही सामील झालो. फक्त विंडो शॉपिंग. काही म्हणजे काहीच घ्यायचं नाही असा पक्का निर्धार होता त्याविषयी सौंना आठवण करून दिली तरीही तिनं ट्रॉली घेतली तेव्हा “खरेदी नाहीच” हा निर्धार ढासळायला सुरवात झाल्याची जाणीव झाली. हळूहळू एकेक गोष्टी ट्रॉलीमध्ये येत होत्या. तासा-दीड तासानं बिलिंग काउंटर पोचलो तेव्हा ट्रॉली गच्च भरलेली. वैतागून सौंकडे पाहिल्यावर उत्तर आलं “माझ्याकडं बघू नका. दोनचार वस्तु घरात लागत होत्या आणि नेमक्या त्या स्वस्त मिळाल्या म्हणून घेतल्या. तसंही इथं सारखं सारखं येणं होतं नाही आणि आत्ता लागणार नसल्या तरी नंतर उपयोगाला येतील. घर म्हटलं की काही ना काही चालूच असतं. मी स्वतःसाठी काहीच घेतलेलं नाहीये उलट तुम्हीच शेविंग क्रीम वगैरे घेतलं. अजून बिल दिलं नाहीये. तुम्ही म्हणत असाल तर सगळ्या वस्तु काढून ठेवते. उगीच वाद आणि मला बोल नको. ”साधारणत: बायकोनं असा पवित्रा घेतला की बहुतेक नवरेमंडळी जे करतात तेच मी केलं. निमूटपणे बिल देण्यासाठी रांगेत उभा राहिलो. तीन हजाराची खरेदी झालेली. हातात तीन पिशव्या घेऊन रिक्षाची वाट बघताना आळस पार नाहीसा झालेला.

“तुमचे साडे चारशे वाचवले” बिलाचा हिशोब केल्यावर ख़ुशीनं सौ म्हणाल्या.

“हंssssम” मुद्दाम एवढंच म्हणालो. जास्त काही बोललो तर… !!!!

 मध्यमाशांच्या पोळ्याला विनाकारण दगड मारायचा नसतो. कुठं अन काय प्रतिक्रिया द्यायची हे नवऱ्यांना अनुभवानं बरोब्बर कळतं.

एक मात्र नक्की की, उगीचच खरेदीचं प्रमाण मात्र वाढलयं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “२१ मे.. जागतिक चहा दिवस…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “२१ मे.. जागतिक चहा दिवस… ☆ संध्या बेडेकर ☆

चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो, तुमच्या आमच्या घरी सर्वांकडे दररोजच होतो, पण सारखा नसतो.. आम्हाला आमचाच आवडतो. तुम्हालाही तुमचाच आवडत असणार.

तुमच्या घरी येताना आम्ही आमच्या घरचा चहा पिऊनच येतो. वेळ नसला तर आल्यावर पितो. आमच्या घरचा चहा प्यायल्या शिवाय आम्हाला चैन पडत नाही. आपल्या घरचा कधीही मिळाला तरी चहा म्हणजे वाह! वाह!… च असतो.

तुमच्या घरच्या चहाला रंगच नसतो. दूध कमी असत. उकळवतच नाही. चहा पत्ती कोणती टाकता माहित नाही. ना रंग ना रूप, मग चव कशी येणार ? चहा कसा प्रमाणात दूध पाणी घेतल, त्यात साखर चहा पत्ती टाकली, आणि उकळी आल्यावर ती किती वेळ येऊ द्यावी, हे ठरवायच असत. नंतर तो मुरू दयावा लागतो. चहा म्हणजे या सर्वांच गणित असत.. ते समीकरण आपापल्या आवडीनुसार ठरवायच असत. एकदा का प्रमाण निश्चित केल की मग तस्सा म्हणजे अगदी तस्साच चहा रोज होतो.

 हे समीकरण म्हणजे या सर्वांच ratio-proportion जमल तरच चहा जमतो. त्यात आल्याची भर असली तर मग तो special कॅटेगरीत जातो. तशी त्याची डिमांड वाढते, थंडीच्या दिवसांत तर खास डिमांड असतेच. बरोबर किंमत ही वाढते.

चहा पिताना मस्त वाटल पाहिजे. सकाळचा चहा प्यायल्यावर उत्साह वाटला पाहिजे. , झोप गायब होऊन ताजेतवाने वाटल पाहिजे. दिवसाची सुरवात चांगली व्हायला चहाचे खूप महत्व आहे. म्हणून तो मोजून मापून, लक्ष देऊन केला तरच चांगला होतो. त्याचा सुवास दरवळला पाहिजे. चहा दयायची पण एक पद्धत असते. छान एकसारखे कप, लबालब भरलेले नसावे, ट्रे मध्ये चहा सांडलेला नसावा. बरोबर बिस्किट म्हणजे मज्जाच येते.

प्रत्येक घरी चहा किमान दिवसांतून दोनदा होतोच.

दररोज दोनदा चहा करायची सवय आहे. अनेक वर्ष म्हणजे साधारण पन्नास वर्ष तरी झाली असतील, तरी कधी कधी कसा काय बिघडतो ? माहीत नाही. तेच प्रमाण, तीच पद्धत तरी वेगळीच चव असते. बहुतेक दुधात पाण्याच प्रमाण जास्त असत, किंवा आल चांगल नसत.

काहीही म्हणा चहा म्हणजे एनर्जी डोज.

नवीन जगात चूलीवरचा चहा। कन्नू की चाय, अमृततुल्य चहा। तंदूर चहा, डिप डिप, कोल्ड टी, चरबी कमी करायला चहा…. वगैरे वगैरे किती तरी प्रकार आहेत.

काही प्रसंगी चहा देताना त्या कपाचा साईज बघीतल्यावर अंतर्मनातून आवाज येतो नकोच तो चहा. , अस मनापासून म्हणावस वाटत. म्हणजे आपल्या हातात कप आल्यावर, दुसर्याला म्हणजे अगदी शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तिला चहा देईपर्यंत आपला संपलेला असतो. ना धड चव कळते ना समाधान मिळत. बरे असो….

चहा जगात लोकप्रिय पेयांपैकी दुसर्या नंबर वर प्यायले जाणारे पेय आहे.

चिनी विद्वान *चेन एतिंयान* हे चहाचे पहिले प्रवर्तक आरंभकर्ता आहेत. कोणत्याही वयोगटातील चहा हे आवडते पेय आहे.

चहाला वेळ नसते, पण वेळेवर चहा मात्र असतो किवा लागतोच.

तसा रोजच चहा दिवस असतो. एक छान स्वस्त उत्साहवर्धक पेय म्हणजे चहा.

आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे चहा.

त्याच्या सन्मानार्थ साजरा करणारा दिवस म्हणून २१ मे हा जागतिक चहा दिवस.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!! – मंदोदरी” – लेख क्र. ८ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!! – मंदोदरी” – लेख क्र. ८. ☆ प्रा.भारती जोगी ☆

लंकेच्या रणभूमीवर ची ती काळ रात्र! नजर जाईल तिथे शवांचा खच पडलेला, रक्ताचे पाट वहाताहेत, आणि अशातच… चतुर्वेद, सहा उपनिषदे, आयुर्वेद यांचं संपूर्ण ज्ञान असलेला ज्ञानी, विश्रवा ऋषींचा आणि उच्च दानव कुळातील माता कैकसी चा पुत्र… दशानन… रावण… रक्तरंजित अवस्थेत, धराशायी होत मृत होऊन पडलेला. तिन्ही मुलं ही युद्धात मारली गेलेली.

पतीच्या आणि पुत्रांच्या मृत्युची वार्ता कानी येताच, जीवाच्या आकांताने, दु:खावेगाने वेडीपिशी होत धावत गेली रणभूमीवर! पतीच्या शवाजवळ बसली… शोकमग्न मंदोदरी च्या मुखातून शब्द बाहेर पडले…

राम विमुख अस हाल तुम्हारा,

रहा न को कुल रोवन हारा!

उठली दु:खावेगाने आणि आक्रंदन करीत विचारती झाली… ” कुठे आहे तो, ज्याने माझ्या पतीला मारलं?? “

तिला अंगुली निर्देशाने दाखविले आणि सांगितले गेलेल्या दिशेला ती गेली.

तिथे एका शीळेवर प्रभू श्रीरामचंद्र खाली मान घालून, दु:खी, उदास, हताश बसलेले. युद्धात झालेल्या जीव हानी ने किंकर्तव्यमूढ बसलेले. अचानक एक सावली दिसते पायाजवळ… लक्षात येते की कुणा स्त्री ची सावली आहे… लगेच उभे रहातात, वळून मोठ्या अदबीने म्हणतात, ” माते, प्रणाम ! कोण आहेस तू? “…….. मर्यादा पुरूषोत्तम राम तिच्या पुढ्यात, विनम्रपणे नतमस्तक झालेला… मंदोदरी ला परस्त्रीचे अपहरण करणा- या रावणाला हरविणा-याची खरी ताकद दिसली आणि कळली ही !! तिच्या पुढ्यात झुकून उभा होता… ब्रह्मा पुत्र, मांधाता ला आव्हान देणा-या, कुबेराला खाली आणणा-या, सा-या जगाला हरविणा-या रावणाला ठार मारणारा… श्रीराम!!! तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. मर्यादा पुरूषोत्तमाच्या या… स्त्री च्या सावलीचं ही भान ठेवणा-या, पर स्त्री मातेसमान मानणा-या या पुरूषोत्तमाच्या उंची पुढे तिला… परस्त्रीचं अपहरण करून आणणारा तिचा लंकापती दशानन अगदीच थिटा वाटला. ती वरमून परतली.

मंदोदरी…. नित्य स्मरणीय अशा पंचकन्यांपैकी एक! पण ही येवढीच तिची ओळख नाही. याच्या पलिकडे ही तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू, कंगोरे आहेत जे अलक्षित राहिले आहेत. रामायण म्हणजे… राम, सीता, लक्ष्मण, हनुमान… हेच डोळ्यासमोर येतात लगेच! पण यां व्यतिरिक्त ही अशी व्यक्ती चित्रे आहेत ज्यांच्या बद्दल फारशी माहिती नाही अधोरेखित झाली. त्यातीलच एक आहे… रावणाची पत्नी मंदोदरी!! 

 मंदोदरी… असुरांचा राजा मयासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या. पुराणात तिच्या जन्माविषयी वेग वेगळ्या कथा आहेत. तरीही मान्यतेनुसार ती मधुरा नावाची शापित अप्सरांचे, जी बेडकीरूपातून पूर्व रूपात आल्यावर मयासुर आणि हेमा तिला दत्तक घेतात.

…. सुंदरता, बुद्धीमत्ता, आणि नैतिकता याचा अद्वितीय संगम म्हणजे मंदोदरी! अतिशय धर्मपरायण!! रावणाशी विवाह होऊन लंकेला येते आणि सोन्याच्या लंकेची महाराणी बनते. वेद, शास्त्र, विविध कला संपन्न असलेली मंदोदरी, अगदी ख-या अर्थाने…

.. कार्येषु दासी, करणेषु मंत्री, भोजेषु माता, रूपेषु लक्ष्मी, शयनेषु रंभा, क्षमायेषु धरित्री!

अशी… षट्कर्मयुता कुलधर्म पत्नी होती. तिचा भविष्याचा ही अभ्यास होता. असं म्हणतात की ती रावणाशी बुद्धिबळाचा खेळ ही खेळत असे. बुद्धिबळाची सुरुवात तिनेच केली असं म्हंटलं जातं! 

अशा या बुद्धी मान आणि भविष्य जाणणा-या मंदोदरी ला जेव्हा रावणाने सीताहरण केल्याचे कळते तेव्हा तिला अतिशय क्लेष होतात. पर स्त्री, तीही विष्णू चा अवतार असलेल्या प्रभु रामचंद्रांची पत्नी सीता… हिच्या विषयी असा काम आणि मोह भाव जागृत होऊन तिचं हरण करणा-या रावणाला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे हे तिला लक्षात आले… रावणावर निरतिशय प्रेम आणि निष्ठा असलेल्या मंदोदरी ने त्याला वारंवार धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी समजावले, सल्ला दिला. तिने लंकेची नीती आणि रावणाची चेतना शक्ती बनून राहण्याची सतत धडपड केली.

सीतेला सन्मानाने श्रीरामाकडे परत पाठविण्यातच लंका आणि लंकाधिपतीचं भलं आहे हे ती पुन:पुन्हा समजावत राहिली, विनवत राहिली…..

 विनंती करी मंदोदरी|

वाया आणिली जानकी घरी|

 *

लाज झाली तिहीं लोकी||

 *

मज पाहता हे विवसी|

क्षय आणिला कुळासी||

 अभिलाषिता पर सती|

हे तो नव्हे राजनीती|

 ज्याते ध्यानी ध्याती योगी|

तो मज येतो भेटीलागी|

 तया रामासी विन्मुख होणे 

जळो जीणे लाजिरवाणे||

 – – संत नामदेव.

संत नामदेवांनी सुद्धा मंदोदरीच्या, रावणाला समजावण्याची, तिच्या पत्नी धर्माची, दखल घेतली आहे हे विशेष!! अधर्मात ही धर्म सांभाळण्याची पराकाष्ठा आणि निकराचे प्रयत्न करणा-या मंदोदरी चे पती प्रेम आणि विवेक ; रावणाच्या अहंकार आणि क्रोधापुढे हारलं!! 

तिला पतीची हार, रक्तरंजित शेवट दिसत होता, पण तरीही या पतीला प्रेरित करणा-या, पतीची चेतना बनलेल्या समिधेचं तेज, सामर्थ्य, चेतना निस्तेज झाली, स्फुल्लिंग मंदावलं पतीच्या क्रोधाहंकाराच्या धगधगत्या होमकुंडापुढे!! आणि तिच्या नशिबी आलं ते एकटेपण!! एकटीने जळत रहाणं!!

…. जळो जिणे हे लाजिरवाणे!!…. हाच सल, हाच चटका, हाच डाग उरी घेऊन ही समिधा जळत राहिली!! 

– लेख क्र. ८.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हरवलेला महिना आणि सापडलेलं संतुलन.. – लेखिका : तृष्णा (रानू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ हरवलेला महिना आणि सापडलेलं संतुलन.. – लेखिका : तृष्णा (रानू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

एकदा काय झालं…

आकाशात सूर्य आणि चंद्र यांच्यात एक शांत पण महत्वाची स्पर्धा चालू होती.

दोघेही आपापल्या मार्गाने जग चालवत होते…

सूर्य म्हणाला,

“मी ऋतू ठरवतो… उन्हाळा, पावसाळा, हिवाळा… माझ्यामुळेच पृथ्वीवर जीवनाचं चक्र चालतं. ”

चंद्र हसून म्हणाला,

“आणि मी वेळ मोजतो… अमावस्या, पौर्णिमा, सण, व्रत… लोकांच्या भावना माझ्याशी जोडलेल्या आहेत. ”

– – दोघंही बरोबर होते… पण एक समस्या हळूहळू वाढत होती.

गोंधळाची सुरुवात…

चंद्राच्या वर्षात 354 दिवस होते,

आणि सूर्याच्या वर्षात 365 दिवस.

– – दरवर्षी 11 दिवसांचा फरक वाढत गेला…

सुरुवातीला कोणी लक्ष दिलं नाही,

पण काही वर्षांनी लोकांना जाणवायला लागलं—

– – दिवाळी कधी उन्हाळ्यात येऊ लागली

– – होळीचा ऋतू बदलायला लागला

– – सण आणि ऋतू यांचा ताळमेळ बिघडायला लागला

– – – जगात एक अदृश्य गोंधळ निर्माण झाला…

एक नकोसा महिना– 

या गोंधळातून एक अतिरिक्त महिना निर्माण झाला…

पण त्याला कोणी स्वीकारायला तयार नव्हतं.

लोक म्हणाले—

“तू कोण? तुला नाव नाही… स्थान नाही… तुझ्यात कोणताही सण नाही…”

तो महिना एकटा पडला…

त्याला “मलमास” म्हणत दुर्लक्षित केलं जाऊ लागलं.

तो दु:खी झाला… आणि थेट देवांकडे गेला.

देवाची करुणा

– – तो महिना देवाकडे गेला आणि म्हणाला—

“माझं अस्तित्व का आहे… जर कोणी मला मानतच नाही?”

देव हसले… आणि म्हणाले—

“तू विशेष आहेस… कारण तू संतुलन आणतोस.

तुझ्यामुळेच वेळ पुन्हा योग्य मार्गावर येते. ”

आणि त्यांनी त्या महिन्याला आपलं नाव दिलं—

पुरुषोत्तम मास

त्या दिवसापासून…

जो महिना एकेकाळी नाकारला गेला होता,

तोच सर्वात पवित्र मानला जाऊ लागला.

विज्ञानाची गोष्ट

ही कथा आपल्याला भावना शिकवते…

पण त्यामागे एक अचूक विज्ञान आहे.

पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात फिरते

चंद्र पृथ्वीभोवती 354 दिवसात त्याचे 12 महिने पूर्ण करतो

– – दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो.. हा फरक साचत जातो…

.. आणि साधारण 2. 5 ते 3 वर्षांत तो एक पूर्ण महिना होतो

म्हणून—

– – हा “अधिक मास” calendar मध्ये जोडला जातो

.. आणि सण व ऋतू पुन्हा संतुलित होतात

धार्मिक महत्त्व

अधिक मास आपल्याला एक वेगळी शिकवण देतो—

– – जीवनात जे “extra” वाटतं… तेच कधी कधी सर्वात महत्त्वाचं असतं

– – हा महिना फक्त वेळेचा भाग नाही… तर *आत्मशुद्धीचा काळ* आहे

या काळात माणूस जाणीवपूर्वक थांबतो…

बाहेरच्या गडबडीपासून दूर जाऊन… स्वतःकडे वळतो…

– – जप आणि नामस्मरण केलं जातं —

भगवंताचं नाव घेताना मन हळूहळू स्थिर होतं

– – व्रत आणि उपवास पाळले जातात —

शरीरावर नियंत्रण ठेवताना मनही शिस्तीत येतं

– – दान आणि सेवा केली जाते —

कारण या काळात दिलेलं दान केवळ इतरांसाठी नसतं…

तर आपल्या मनालाही हलकं करतं

– – धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं —

जेणेकरून विचार अधिक स्वच्छ आणि सकारात्मक होतील

आणि म्हणूनच—

लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, मोठे शुभ समारंभ टाळले जातात

हा काळ “नवं काही सुरू करण्याचा” नसून…

आधी स्वतःला समजून घेण्याचा आणि घडवण्याचा असतो

कारण…

आयुष्याच्या या सतत चालणाऱ्या प्रवासात,

“अधिक मास” म्हणजे एक छोटासा विसावा असतो…

— — असा एक थांबा…

जिथे आपण धावणं थोडं थांबवतो,

पण थांबतो ते हरण्यासाठी नाही…

— — तर स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी…

नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी…

— — जेणेकरून पुढचा प्रवास

अधिक स्पष्ट… अधिक मजबूत… आणि अधिक सुंदर होईल…

एक वेगळी जाणीव…

कदाचित… आपल्या आयुष्यातला “अधिक मास” म्हणजेच तो काळ…

ज्याला आपण टाळतो…पण जो आपली स्वतःशी भेट घडवतो…

कधी कधी आयुष्यातही असा “अधिक मास” येतो…

सगळं थांबल्यासारखं वाटतं…

पण खरं तर… तोच काळ आपल्याला आतून घडवत असतो…

कुणीतरी खूप सुंदर म्हटलंय—

“Sometimes stopping is better to bounce back hard…”

आणि खरंच…

— — “कधी कधी थांबणं म्हणजे मागे पडणं नसतं…

थांबण्यातही एक वेगळी ताकद असते…

— — आणि ही थांबलेली पावलं हरवत नाहीत…

ती फक्त उंच भरारीसाठी तयारी करत असतात…”

शेवटची जाणीव

अधिक मास आपल्याला सांगतो—

— — — “जी गोष्ट सुरुवातीला नकोशी वाटते…

.. तीच कधी कधी जीवनात संतुलन आणणारी ठरते…”

लेखिका : तृष्णा (रानू)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भारतीय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भारतीय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

जपानमध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ राहणाऱ्या एका भारतीयाने एक गोष्ट पाहिली..

त्याचे जपानी मित्र अतिशय नम्र, सभ्य आणि मदत करणारे होते,

पण त्यातील एकानेही त्याला कधी घरी बोलावले नाही…

ना चहासाठी, ना साध्या भेटीसाठी.

 

तो भारतीय थोडा आश्चर्यचकित झाला आणि दुखावला गेला.

एके दिवशी त्याने आपल्या एका जपानी मित्राला विचारले,

“तुम्ही इतके चांगले, प्रेमळ आहात… तरीही मला का कधीच घरी बोलावत नाही?”

 

त्या जपानी मित्राने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं –

“आम्हाला भारतीय इतिहास शिकवला जातो… पण प्रेरणा म्हणून नाही,

तर सजगता म्हणून.”

 

तो भारतीय थक्क झाला..

“सजगता? भारतीय इतिहास सावधानतेसाठी शिकवला जातो? का?”

 

जपानी मित्र म्हणाला,

“सांग बरं, इंग्रज जेव्हा भारतात राज्य करत होते,

तेव्हा किती इंग्रज असतील?”

भारतीय म्हणाला, “कदाचित… दहा हजार?”

 

जपानीने गंभीर चेहऱ्याने मान हलवली,

आणि विचारलं — “आणि त्या वेळी भारतात किती भारतीय होते?”

“सुमारे ३० कोटी,” भारतीय म्हणाला.

 

जपानी शांतपणे म्हणाला —

“मग सांगा, अत्याचार कोणी केला?

भारतीयांवर चाबकाचे फटके कोणी मारले?

गोळ्या कोणी झाडल्या?”

 

तो पुढे म्हणाला —

“जेव्हा जनरल डायरने जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश दिला,

ट्रिगर कोणी दाबला?

इंग्रज सैनिकांनी?

नाही… ते भारतीय सैनिकच होते.”

 

“कोणत्याही भारतीयाने जनरल डायरकडे बंदूक का उगारली नाही?

एकाने पण का नाही?”

 

“तुम्ही ज्याला गुलामी म्हणता,

ती शरीराची नव्हती… ती आत्म्याची होती.”

 

भारतीय गप्प उभा राहिला, डोळ्यात पाणी.

 

जपानी मित्र पुढे म्हणाला —

“मध्य आशियातून आलेले मुगल किती होते? काही हजार?

आणि तरी त्यांनी शतकानुशतके राज्य केलं.

 

ते बलाच्या जोरावर नव्हे,

तर तुमच्याच लोकांच्या नम्रतेवर,

त्यांच्या विश्वासघातावर.”

 

“तुमच्याच लोकांनी धर्म बदलला,

तुमच्याच लोकांनी आपल्या बहिणींचं, मुलींचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं.

तुमच्याच लोकांनी तुमचे नायक इंग्रजांच्या हाती दिले.

 

चंद्रशेखर आझाद कुठे लपले आहेत हे इंग्रजांना कोणी सांगितलं?

भगतसिंहांना फाशी देणं इतकं सोपं होते का? पण तुमच्याच लोकांनी पाठ फिरवली”

 

 

“तुम्हाला बाहेरून शत्रूंची गरजच नाही.

तुमचे स्वतःचे लोकच सत्तेसाठी, पदासाठी,

थोड्याशा फायद्यासाठी तुम्हाला वारंवार धोका देतात.

म्हणूनच आम्ही भारतीयांपासून थोडं अंतर ठेवतो.”

 

“जेव्हा इंग्रज हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आले,

तेव्हा एकाही स्थानिकाने त्यांच्या सैन्यात प्रवेश केला नाही.

पण भारतात?

तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती झालात,

त्यांची सेवा केली,

त्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्याच लोकांना मारलं.”

 

“आणि आजही तुम्ही बदलले नाही.

थोडीशी मोफत वीज,

एक बाटली दारू,

एक चादर दिली की

तुमचं मत, तुमचा आत्मा,

सगळं विकत घेता येतं.”

 

तुमची निष्ठा देशाशी नाही,

तर तुमच्या पोटाशी आहे.”

“तुम्ही घोषणा देता, आंदोलन करता,

पण जेव्हा देशाला तुमच्या त्यागाची गरज असते,

तेव्हा तुम्ही कुठे असता?

 

तुमची पहिली निष्ठा अजूनही

तुमचे घर, कुटुंब आणि पैशाशी आहे —

देश आणि धर्म नंतर.”

 

इतकं बोलून तो जपानी शांतपणे निघून गेला,

आणि तो भारतीय तिथेच उभा राहिला —

डोळ्यांत लाज, मनात वेदना ठेऊन…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खाणं आणि पिणं ! ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🕺🤣 खाणं आणि पिणं ! 🤣😅  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

लेखाच शिर्षक वाचून खवय्ये आणि पिवय्ये (हा मी न पिता शोधलेला शब्द) हे दोघंही खूप खूष झाले असतील ! तशी या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांची आपल्याकडे कधीच कमतरता नव्हती आणि पुढील काळात यातील खवय्यांची संख्या जरी डाएटच्या नवं नवीन फ्याडामुळे कमी होतं गेली तरी पिवय्यांची संख्या पुढील काळात वाढतीच राहील, हे सांगायला कोणी कुठलंही पेय प्यायची गरज नाही ! कारण न पिणारा किंवा पिणारी ही जमात हल्ली जवळ जवळ नामशेष होत चालली आहे. त्याची कारणं वगैरेचा उहापोह करण्यासाठी आणि “पिणं” या एका शब्दावर लिहायचं झालं तर त्यासाठी एक वेगळा स्वतंत्र लेख लिहावा लागेल ! आणि तो सुद्धा “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, हे व्होडका आणि डिस्टील वॉटर इतकं पारदर्शक सत्य आहे ! वाचकहो आता नमनाला एवढं तुम्हाला “हाय” करून झाल्यावर, (झाला नसलात तरी) मूळ विषयाकडे माझी गाडी वळवतो.

आज मी हा जो “खाणं” शब्द घेतला आहे त्याचा आपल्या हातांशी आणि तोंडाशी काडीचा संबंध नाही. त्याच काय आहे नां मंडळी, आपली मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की आपल्या या “अभिजात मराठी भाषेत” (इतक्या वर्षांनी कां होईना, पण मिळाला बाबा एकदाचा अभिजात भाषेचा दर्जा आपल्या माय मराठीला !) असे अनेक शब्द आहेत, की त्यातील एकेका शब्दाचे अनेक अर्थ होतात हे आपण सुज्ञ वाचक असल्यामुळे जाणताच. त्यामुळे खाणं हा शब्द वाचल्या वाचल्या आपल्या डोळ्यासमोर नाष्ट्यापासून आपल्याला आपल्या जेवणात असलेले आपले आवडीचे काही पदार्थ येणं, हे आपण खऱ्या अर्थाने खवय्ये नसालत तरी, स्वाभाविकच आहे. त्याला तुमचा इलाज नाही, पण मी “खाणं” या शब्दाचे आपल्याला जे अर्थ सांगणार आहे, त्याचा वर म्हटल्याप्रमाणे खऱ्या खाण्याशी काडीचा, अगदी टूथपीकइतका सुद्धा संबंध नाही ! त्यामुळे आपण थोडा डोक्याला ताण दिलात आणि पुढील लेख, डोक्यातील आणि डोळ्यासमोर आलेले खाण्याचे पदार्थ आणि मनांतली भूक काढून टाकून वाचलात, तर मी काय म्हणतोय ते आपल्या सारख्या प्रगल्भ वाचकांना नक्कीच कळेल. लेख वाचून झाल्या नंतरच आपण आपल्या रसना देवीला आपले आवडीचे खरं खाणं खाऊन तृप्त करावे अशी नम्र विनंती ! असो !

तर मंडळी, लहानपणी आपण सगळेच घरीदारी, शाळेत दंगामस्ती करत मोठे झालो हे जवळजवळ सगळेच वाचक मान्य करतील. त्यामुळे माझ्या पिढीतील (सध्या वय फक्त ७२!) त्या वेळच्या मास्तरांच्या हातचा मार मी कधीच खाल्ला नाही, हे असं कुणी म्हणणं निदान मला तरी न पटणार आहे. अर्थात “त्याकाळी” मुलींनी आणि मुलांनी केलेली दंगामस्ती यात, “हल्लीची” हिंसक दंगल आणि एखादा खरोखरचा निषेध मूक मोर्चा इतकं अंतर होत, हे ही तितकंच खरं. पण आत्ताची मुला मुलींची दंगामस्ती एकमेकांवर सर्वच बाबतीत कुरघोडी करण्यापर्यंत गेली आहे, हे ही एक आजच वास्तव आहे, यात दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून आपले आई, वडील अथवा शिक्षक कितीही प्रेमळ असले आणि त्यांच्या हातचा मार आपण कधीच खाल्ला नसेल असं आपण गृहीत धरलं तरी, आपल्याला त्यावेळेस त्यांच्या हातांच्या ऐवजी कडक “शब्दांचा मार” नक्कीच खावा लागला असेल, हे आपण आत्ता तरी नक्कीच मान्य करायला हरकत नसावी !

कधी कधी आपण एकटेच आपल्या विचारांच्या तंद्रित बाहेर पडलेले असतो. डोक्यात काही ना काही विचारचक्र चालू असतं, काहीतरी टेन्शन असतं, कसली तरी समस्या भेडसावतं असते. बाहेर पडल्यावर फिरून आल्यावर जरा बरं वाटेल, या एकाच उद्देशाने आपण निरर्थकपणे निघालेलो असतो. अशावेळी आपल्या विचारांची तंद्री भंग करणारी आपल्या नावाची हाक आपल्या कानावर पडते. आपण हाक आलेल्या दिशेने चमकून बघतो तर आपल्याला एक ओळखीचा चेहरा दिसतो. त्याच नांव आठवायचा आपण प्रयत्न करतो पण तो पर्यंत तो जवळ येताच, आपण उसन हसून “काय कसा आहॆस?” असं विचारून वेळ मारून नेतो. नंतरचा पाऊण एक तास, आपल्याला ज्या विषयात अजिबात इंटरेस्ट नाही असे अनेक वेगवेगळे विषय काढून तो आपलं डोकं “खाण्यात” घालवतो आणि आपण सुद्धा न रागावता नाईलाजाने मधून मधून त्याच्या भाषणाला प्रतिसाद देत असतो ! त्याला जरा घाईत आहे असं सुचवून देखील, तो अट्टाहासाने आपल्या डोक्याबरोबर आपला (बहुमूल्य?) वेळ सुद्धा “खात” असतो !

Other side of the grass is always greener ! ही इंग्रजी म्हण, काही काही लोकांच्या बाबतीत अगदी बररोब्बर लागू पडते मंडळी ! म्हणजे कसं असतं नां, स्वतःकडे सगळं काही असलं तरी दुसऱ्याकडे असलेली आणि आपल्याकडे नसलेली एखादी वस्तू बघून, त्याच्यावर हे अल्पसंतुष्ट लोकं उगाचच “खार” खात असतात. पण त्यात त्यांचच नुकसान आहे हे कळण्याच्या पलीकडे त्यांची विचारांची उडी तो “खार” खाण्याच्या नादात पोहचतच नाही, त्याला आपण तरी काय करणार ? एखाद्याचा असा “खार” खाण्याचा स्वभाव बदलणं हे महाकर्म कठीण !

एखाद्या कलेत अथवा कुठल्याशा विषयात थोडी फार पारंगत असलेली व्यक्ती त्याला किंवा तिला ती कला कोणी सादर करायला सांगितली, तर काहीतरी कारण सांगून तो किंवा ती उगाच “भाव” खात असते ! अशावेळी आपण त्याला किंवा तिला कितीही आग्रह केला, तरी ती किंवा तो अजिबात बधत नाही म्हणजे नाहीच ! या मागे त्याच किंवा तिच अर्थकारण सुद्धा असू शकत असं मग अनेक माणसांना तसं नसलं तरी, वाटून जातं. या अर्थकारणावरून मला काही काही लोकांचं आजकाल बोकाळलेले दुसरच खाणं आठवलं. म्हणजे कसं आहे नां मंडळी, हल्ली काही काही लोकं कुठल्याही कामात “मेरा क्या?” असा सवाल करून, तर कधी कधी असा सवाल न करताच चक्क “पैसे खातात !” आणि अशी एखादी अती खादाड व्यक्ती जर चुकूनमाकून ACB च्या जाळ्यात अडकली तर त्याला बोल लावणारे लोकं, कारण कळेपर्यंत ऑफिसात “शेण खाल्लं” असेल असं बोलायला मोकळे ! मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याच तोंड कसं धरणार? काय बरोबर नां?

एखाद्या भांडणाचं पर्यवसान हातघाईवर येण्या आधी जेंव्हा फक्त तोंडापर्यंत मर्यादित असतं तेंव्हा, दोन्ही भांडणारे गट एकमेकांना यथेच्छ “शिव्या खायला” घालतात ! अशावेळी झालेला “अपमान खाता” येत नाही आणि त्यासोबत आलेला राग सुद्धा खायचा म्हटलं तरी कोणी खाऊ शकत नाही. पण त्याला पर्याय म्हणजे अशावेळी आलेला राग आणि झालेला अपमान हे दोन्ही “गिळायची” सोय आपल्या अभिजात मराठी भाषेत आहे ! काही काही लोकं त्यांना आलेला राग व्यक्त करण्यात पण कमी पडतात आणि मग नाईलाजाने स्वतःचेच “दात ओठ” खात बसतात ! ही अशा लोकांची हतबलता मानली तरी त्याला सुद्धा काही लोकं ऐन मोक्याच्या ठिकाणी त्यानं “कच खाल्ली” असं म्हणून मोकळे होतात, आता बोला !

काही काही लोकांच बरं असतं, म्हणजे ते लोकं कुठे बाहेर चालले आहेत आणि आपण जर त्यांना हटकून विचारलं की “कुठं पर्यंत?” तर ते लगेच उत्तर देतात “जरा हवा खाऊन किंवा ऊन खाऊन येतो!” आता या दोन्ही खाण्यामुळे त्यांच पोट नक्कीच भरणार नसतं, तरी हवा खाऊन किंवा ऊन खाऊन असे शब्द सहजपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडतात आणि त्या मागचा खरा अर्थ, विचारणारा सुद्धा लगेच जाणतो हीच आपल्या अभिजात मराठीची खरी खासियत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये ! काही लोकं बोलतांना सांभाषणातले अधले मधले “शब्दच खातात. ” जर का अशा माणसाचा तो ड्रॉबॅक संभाषण कर्त्याला ठाऊक असेल तर ठीक, नाहीतर एखाद्या नवख्या माणसाला तो नक्की काय बोलतोय हे कळण जरा अवघडच जातं मंडळी !

वाचकहो, लेखाच्या शीर्षकातल्या पहिल्या “खाणं” या शब्दाचा माझ्या बुद्धीप्रमाणे आणि मला माहित असलेल्या न खाण्याच्या प्रकारांच्या उल्लेखाने उहापोह करून झाल्यावर, आता दुसऱ्या “पिणं” या शब्दाकडे मी कधी येतोय, याची वाट अनेक पिय्यकड लोकं घसा सुखा करून वाट बघत असतील ! पण त्यांच्या पदरी आज तरी निराशा येणार आहे आणि त्याला माझा ईलाज नाही मंडळी ! म्हणजे मी या लेखाच्या सुरवातीलाच आपल्याला क्लिअर केलं होतं, की “पिणं” या शब्दावर लेख लिहायचा झाल्यास तो लिहिण्यासाठी एखाद्या “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, काय आठवतंय का ? आणि न खाणं खायचा हा लेख वाचायच्या नादात आपण जर ते विसरला असाल, तर आपल्याला मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. लेखाचा पहिला परिच्छेद पुन्हा एकदा नीट वाचा ! आता तरी पटली खात्री तुमची ? मग आता मला सांगा, “पिणं” या शब्दावर मी लेख लिहावा असं ज्याला वाटतंय, तो मला त्याच्या घरी (अगदी कुठेही!) एखाद्या संध्याकाळी “व्यवस्थित बसायला” कधी बोलावतोय ? काय म्हणता, माझा पत्ता माहित नाही. अहो मंडळी, असं काय करता, लेखाच्या खाली माझं पूर्ण नांव, पत्ता आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर पण दिला आहे. मग वाट कसली बघता ? पटकन तुमचा मोबाईल उचला आणि माझी तुमच्या बरोबरची अशी एखादी “व्यवस्थित संध्याकाळ” आजच बुक करा !

आपल्या फोनची वाट बघणारा

आपलाच,

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ज्योत से ज्योत जगाते चलो- – – ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “ज्योत से ज्योत जगाते चलो- – – ” ☆ डॉ. धनंजय देशपांडे

(एक सत्यकथा) 

… ज्योत से ज्योत जगाते चलो 

… भुखो को आनंद देते रहो 

जिथे मी काही सूचना केली तर ती आनंदाने स्वीकारली जाते, अशा सिंहगड रोडवरील माझ्या एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तयारीसाठी दोन दिवस आधी एक चक्कर टाकावी म्हणून गेलो होतो. मित्राने मांडव, केटरिंग, आसन व्यवस्था इत्यादी दाखवले. ते बाकी सर्व ओके होते.

तर मित्र म्हणाला, “काहीतरी हटके एखादी आयडिया दे न, की जी सर्वानाच आवडेल”

मी फक्त म्हणालो, “आपण अक्षतांमध्ये तांदूळ वापरणे टाळू. वऱ्हाडी मंडळीनी जरबेरा / शेवंती सारख्या फुलाच्या पाकळ्या उधळाव्यात… आणि लोकांना आपण तांदळाचे दाणे असलेली छोटी बॅग देऊ. दाराजवळ ठेवलेल्या बॉक्स मध्ये ती अक्षता बॅग जाताना त्यांनी सोडून जावी. ते तांदूळ नंतर आपण गरिबांना देवू. ” 

– – मित्रानी ते ऐकले. विशेषतः त्याच्या आईवडिलांनी त्याला आनंदाने होकार दिला.

आणि मग मित्राने लग्न सुरु होण्यापूर्वी माइकवरून तसे जाहीर केले.

सर्वांनी त्याचे स्वागत केले. आणि लग्न लागल्यावर आम्ही पाहिले तर त्या बॉक्स मध्ये तब्बल वीस किलो तांदूळ जमा झाला होता.

– – तोच सुमारे २० किलो तांदूळ नंतर मित्राच्या हाताने एका गरीबाच्या घरी गेला.

डीडी क्लास : मंडळीनो तुम्हाला वाटेल की २० किलो म्हणजे काही फार नाही !

पण तसेही ते २० किलो तांदूळ पायदळी जाणार होते, आणि नंतर कार्यालय सफाईवाल्याकडून कचऱ्यात !

ते टळले आणि ते तांदूळ एका घरात चार माणसाच्या पोटात किमान तीन महिन्यासाठी गेले. हे काय कमी आहे ?

अजून एक म्हणजे फक्त पुण्याचा विचार केला तरी एका सिझनला किमान एक हजार लग्न पुण्यात होतात असं गृहीत धरू. (जास्तच होतात पण मी किमान धरलेत) तर या पैकी किमान निम्म्या लोकांनी जरी हे मनावर घेतलं तरी पाचशे x वीस = दहा हजार किलो तांदूळ ! गरजू प्रत्येक घरी दहा किलो दिले गेले तरी एक हजार लोकांना दोन महिन्याचा तांदूळ मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद नवरा नवरीला अगदी मनापासून मिळतील. हे किती छान आहे !

हे एकट्या पुण्याचे बोलतोय आता कल्पना करा, राज्यातील प्रमुख शहरातील लग्ने धरली तर हीच तांदूळ किलोची संख्या कित्येक टनामध्ये जाईल हो !

जुन्या प्रथा त्या त्या काळात चांगल्याच होत्या कारण त्यात काहीतरी विज्ञान आणि संस्कृती होती. मात्र काळाप्रमाणे त्या प्रथा जर आपण थोड्या बदलून अंमलात आणल्या तर संस्कृती पण टिकेल आणि सामाजिक बांधिलकी देखील !!

आपण असे बरेच काही करू शकतो. ज्याची सुरुवात अगदी छोटीशी का होईना असू शकते. डेरेदार मोठा वृक्ष सुद्धा इवलुश्या बिजातूनच वाढतो न ?

काय म्हणता ? बरोबर न ? 

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४९ आणि ५० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४९ आणि ५० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४९ – – 

सदा बोलिल्यासारीखे चालताहे|

अनेकी सदा एक देवासी पाहे|

सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४९|

अर्थ :  जो बोलण्याप्रमाणे वागतो, परमेश्वराची जरी अनेक रूपे असली तरी तो एकच आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो, सगुण परमेश्वराची उपासना करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका असत नाही असा भक्त त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त असतो.

विवेचन : खऱ्या भक्ताची फार सुंदर लक्षणे समर्थांनी या ठिकाणी सांगितली आहेत. परमेश्वराचा प्रिय भक्त होणे ही सोपी गोष्ट नाही. जशी रोगातून बरे होण्यासाठी अनेक पथ्ये पाळावी लागतात, तशीच पथ्ये भक्ताला देखील पाळावी लागतात. आपले संत म्हणजे “बोले तैसा चाले” या तुकोबांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होत.

व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळा खोटे बोलत असतो. बऱ्याच व्यक्ती बोलतात एक आणि करतात दुसरे ! अशा व्यक्ती दुसऱ्याला उपदेश करण्यात आघाडीवर असतात. परंतु स्वतःवर वेळ आली की त्यांचे वागणे वेगळे असते. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घाला असे सांगणाऱ्या बऱ्याच व्यक्तींची मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसतात. लग्नप्रसंगी हुंडा घेऊ नये, अवास्तव खर्च करू नये अशी सांगणारी मंडळी त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वारेमाप खर्च करताना दिसतात. असे वागणे म्हणजे दुटप्पी वागणे होय.

संतांच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता असते. “काय उणे आम्हां विठोबाचे पायी… “असे तुकाराम महाराजांनी म्हटले. किंवा “सोने रूपे आम्हां मृत्तिकेसमान, ” असे जे त्यांनी म्हटले ती त्यांची अंतरंगातून आलेली निरपेक्ष वृत्ती होती. विरक्ती त्यांच्या रक्तात भिनली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांना सोने, नाणे, वस्त्र इत्यादी स्वरूपात नजराणा पाठवला तेव्हा त्यांनी तो नाकारला. छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदासांन आपले गुरु मानत. एकदा तर त्यांनी आपले राज्य समर्थांना चिठ्ठी लिहून झोळीत अर्पण केले होते. परंतु समर्थांनी ते त्यांना परत केले. अशी असते संतांची निरपेक्ष वृत्ती !

अशी भक्ती आणि विरक्ती अंगात भिनली पाहिजे. आपण सर्वसामान्य माणसे आहोत परंतु संतांनी दाखवलेल्या या मार्गावर वाटचाल तर करू शकतो ! माझ्या प्रपंचासाठी आवश्यक तेवढे धन मी मिळवीन. इतरांचे धन किंवा पैसा माझ्यासाठी मृत्तिकेसमान असेल. परस्त्रीकडे मी माता किंवा भगिनी म्हणून पाहीन या गोष्टी तर आपल्याला सहज करता येण्यासारख्या आहेत.

ज्याप्रमाणे आपल्या देशाबद्दल बोलताना आपण म्हणतो की आपल्या देशात अनेकतेत एकता आहे. त्याप्रमाणे परमेश्वराची विविध रूपे आणि विविध नावे असली तरी चैतन्यरूपी असलेला तो परमेश्वर एकच आहे. अनेक संतांनी हे सत्य एकमुखाने सांगितले आहे. गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की ज्याप्रमाणे विविध नद्या एकाच समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे विविध देवदेवतांना केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. पण आम्ही सामान्य माणसे हे समजून घेताना गोंधळ करतो. देवामध्ये कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव करत बसतो.

स्थुलाकडून सूक्ष्माकडे तशी सगुणाकडून निर्गुणाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. भगवंताचा श्रेष्ठ भक्त ही गोष्ट जाणून असतो. निर्गुण निराकाराप्रती त्याची श्रद्धा असते. परंतु तरी देखील सर्वसामान्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल विश्वास निर्माण व्हावा आणि त्यांचीही वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे व्हावी अशी त्याची इच्छा असते म्हणूनच तो सगुणाची देखील पूजा करतो. असे करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका किंवा कोणताही भ्रम असत नाही. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे हे तो जाणून असतो. असा भक्त भगवंताचा त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त होय.

स्वसंवाद :: 

१. माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता आहे का? मी इतरांना जे सांगतो ते स्वतः पाळतो का, याचा मी कधी प्रामाणिकपणे विचार केला आहे का?

२. परमेश्वराची विविध रूपे पाहताना माझ्या मनात श्रेष्ठ-कनिष्ठाचा भेद येतो का? “अनेकी एक” हे तत्त्व माझ्या उपासनेत उतरले आहे का?

३. संतांच्या निरपेक्ष वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून माझ्या दैनंदिन जीवनात मी एखादी तरी गोष्ट निरपेक्षपणे करतो का?

४. सगुण उपासना करताना माझ्या मनात शंका, भ्रम किंवा न्यूनगंड येतो का? माझी श्रद्धा अविचल आहे का?

५. “सर्वोत्तमाचा दास” होण्याच्या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे असे मला वाटते का?

– – – 

श्लोक क्र. ५० – – 

नसे अंतरी कामकारी विकारी |

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी|

निवाला मने लेश नाही तमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५०|

अर्थ : ज्याच्या मनामध्ये कामवासनेसारख्या निरनिराळ्या प्रकारच्या विकार उत्पन्न करणाऱ्या वासना उत्पन्न होत नाहीत, जो वृत्तीने विरक्त असून ब्रह्मचारी राहून तपस्या करतो, ज्याच्या मनात क्रोधाचा लवलेशही उरत नाही, ज्याचे मन अत्यंत शांत आणि क्रोधरहित होते, असा मनुष्य त्या सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

(कामकारी – कामवासना, विकारी – विकृती/अशांती निर्माण करणारा, उदासीन – तटस्थ/निर्विकार, निवाला – शांत/तृप्त, लेश – अंश, तम – अंधार /अज्ञान/ मोह/ अविचार)

विवेचन : मागील काही श्लोकांपासून समर्थ आपल्याला खऱ्या भक्ताची लक्षणे सांगत आहेत. एकेक श्लोक वाचून त्याचा अर्थ लक्षात घेतला की आपणही मानसिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने समृद्ध होत जातो. आपण जर साधक असू, तर आपण कसे असायला हवे हे यातून कळते.

कामवासना ही माणसाच्या मनातील इतर वासनांपेक्षाही अधिक बलवान असलेली वासना असते. ती अनेक विकार म्हणजेच विकृती उत्पन्न करते. जेव्हा कामवासनेवर माणसाचे नियंत्रण नसते, तेव्हा त्याची बुद्धी काम करत नाही. त्याचा विवेक हरवतो आणि मग नको त्या गोष्टी त्याच्या हातून घडतात. समाजात अनेक राजकारणी व्यक्ती, साधू, संत, बुवा, बाबांचे असे अधःपतन होताना आपण पाहतो.

भगवंताचा सच्चा भक्त मात्र कामवासनेला आपल्या मनाचा ताबा घेऊ देत नाही. वृत्तीने तो उदासीन असतो. या ठिकाणी उदासीन या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेऊया. सामान्यतः आपण असे समजतो की उदासीन म्हणजे उदास, कंटाळवाणा, ज्याला कशातच गोडी वाटत नाही अशी व्यक्ती. परंतु इथे समर्थांनी हा शब्द त्या अर्थाने वापरलेला नाही. उद् म्हणजे वरच्या दिशेने. लिफ्टला मराठी शब्द उद्वाहक असा आहे. या अर्थाने उदासीन म्हणजे वरची पातळी. सामान्य लोकांपेक्षा साधक एका वेगळ्या वरच्या पातळीवर स्थिर झालेला असतो. देहसुखाला महत्त्व न देता भगवंताच्या नामात तो स्थिर असतो. असा साधक म्हणजे उदासीन.

तो तापस असतो म्हणजे तपस्या करणारा. तपस्या करण्यासाठी आपल्याला कोणी ऋषीमुनी व्हावे लागेल असे नाही तर भगवंताच्या मार्गावर चालण्यासाठी एक प्रकारची साधना आणि त्यातील सातत्य आवश्यक असते. ही साधना म्हणजेच तपस्या असे म्हणता येईल.

‘ब्रह्मचारी’ या शब्दाचा अर्थ देखील या ठिकाणी आपण समजून घेऊ. व्यवहारात आपण ब्रह्मचारी म्हणजे लग्न न केलेला किंवा ब्रह्मचर्य पाळणारा असा अर्थ घेतो. जो विवेकाचा वापर करून आपल्या मनावर संयम ठेवतो आणि ब्रह्मचर्याचे पालन करतो अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे ब्रह्मचारी. मग ती लग्न झालेली असो किंवा नसो. संसारात राहून देखील ब्रह्मचर्याचे पालन करता येणे शक्य असते आणि खरा साधक त्याचे पालन करतोच. आरोग्य किंवा विद्या प्राप्त करण्यासाठी जसे ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक असते त्याप्रमाणेच साधना मार्गातही ब्रह्मचर्याचे अतिशय महत्त्व आहे.

तिसऱ्या ओळीत समर्थांनी साधकाचे आणखी एक लक्षण सांगितले आहे. ते म्हणजे त्याच्या मनात तमाचा म्हणजे मोह, अज्ञान आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाचा लवलेशही नसतो. काम आणि क्रोध हे बहुधा जोडीनेच आपल्या मनामध्ये वास करत असतात. काम आणि क्रोध या दोन्हींचा अतिरेक झाला की माणूस आपली विचारशक्ती आणि विवेक हरवून बसतो मग त्याच्या हातून नको त्या गोष्टी घडतात. साधनेच्या मार्गावर चालणाऱ्या आणि ज्यांनी बऱ्यापैकी त्यात प्रगती केली आहे अशा व्यक्तींना देखील काम आणि क्रोध यावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे त्यांचे अधःपतन झालेले दिसून येते. महर्षी विश्वामित्रांचे उदाहरण तर आपणा सर्वांना माहिती आहे.

खरा भक्त या सगळ्या वासना आणि विचारांवर नियंत्रण ठेवतो. त्याचे मन शांत आणि तृप्त असते. म्हणून आपण जे खरे संत किंवा साधक आहेत, त्यांच्याजवळ शांतीचा अनुभव घेतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता आणि तेज असते. ते त्यांच्या साधनेतून आणि मानसिक शांततेतून आलेले असते. संत तुकाराम म्हणतात…

शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥१॥

म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु. ॥

खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥

तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥३||

– – म्हणून काम, क्रोध आदी विकारांवर नियंत्रण असलेला, ब्रह्मचर्याचे पालन करणारा आणि साधना मार्गावर सातत्याने वाटचाल करणारा भक्त म्हणजे त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील उत्कृष्ट असा भक्त होय.

स्वसंवाद :: 

१) माझ्या मनावर कामवासना आणि क्रोध यांचे किती प्रमाणात नियंत्रण आहे – हे मी प्रामाणिकपणे तपासले आहे का ?

२) “उदासीन” म्हणजे वरच्या पातळीवर स्थिर राहणे – माझी साधना मला या पातळीकडे नेत आहे का की मी अजून सांसारिक गोष्टींमध्येच गुंतलेलो आहे ?

३) संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते – माझ्या दैनंदिन जीवनात मनावर संयम ठेवण्याचा माझा प्रयत्न किती प्रामाणिक आहे ?

– क्रमशः श्लोक ४९ आणि ५०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares