मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

वारकरी भिकारी नव्हेत… भिकारी वारकरी नव्हेत!

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥

हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु. ॥

हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥२॥

तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ॥३॥

माझे निगडी प्राधिकरण येथील मित्रस्नेही जयंत गोपीनाथ नित्सुरे यांच्या घरी दर महिन्याच्या एका विशिष्ट तिथीला एक वृद्ध वारकरी रात्रीच्या मुक्कामास येत असत. बाहेरच्या खोलीतील कोप-यात त्यांचा प्लास्टिकचा कागद अंथरून बसत. एक वेळच्या भुकेला पुरेल एवढेच अन्न घेत. आणि अंगावर एक धोतर पांघरून निजून जात. अगदी पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करून, धोतर वाळायला घालून नित्यनेमासाठी बसत. मुखाने हरीनाम घेत कपाळी गंध रेखीत. छोट्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत त्यांचा सारा सरंजाम असे. केवळ एक कप चहा घेत आणि त्यांच्या मार्गाला निघून जात. कधी घरातल्या गोष्टींत लक्ष नाही की मध्ये बोलणे नाही. दूर कुठल्याशा गावातून येत असत. जयंत यांच्या वडिलांपासून या वारकरी बाबांचा हा नेम कित्येक वर्षे सुरु होता……. आणि एका महिन्याच्या त्या तिथीला बाबा आले नाहीत….. आणि पुढेही कधी आले नाहीत! मग त्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली!

वारकरी वर्षातून चार वा-या करतात हे अनेकांना ठाऊक नसेल….. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी! आणि काही वारकरी दर महिना! होय. दर महिना! देहू-आळंदी ते पंढरपूर चालत जायला बारा दिवस. पंढरीत दशमीला पोहोचून एकादशीचे दर्शन आणि द्वादशीला भल्या सकाळी बारस सोडून त्र्ययोदशीला आळंदीकडे प्रस्थान….. असा हा क्रम असे. अर्थात हा अवघड मार्ग अनुसरणारी मंडळी मोजकीच असतात, यात नवल नाही!

या नेमाच्या वारक-यांची अर्थातच एकमेकांशी ओळख असे. एखादे द्वादशीस त्या नेहमी येणा-या वारक-यांपैकी कुणी अनुपस्थित असेल, तर उरलेले वारकरी त्याचे चंद्रभागा तीरावर पिंडदान करीत…………. कारण तो वारकरी वारीस न येण्याचे एकमेव कारण असू शकते ते म्हणजे त्याचा मृत्यू! आणि ज्या अर्थी तो वारकरी वारीस आलेला नाही त्याअर्थी त्याचा मृत्यूच झालेला असला पाहिजे….. अन्य कोणतेही कारण त्याला वारीळा येण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास असे. म्हणून त्याला श्रद्धांजली म्हणून त्याचे पिंडदान! हे अत्यंत अभावाने घडत असले, खरे वाटत नसले, अतिशयोक्तीचे वाटत असले तरी अशी वारकरी मंडळी या संप्रदायाने अनुभवलेली आहेत….. हे नाकारता यायचे नाही! वर उल्लेख केलेले वारकरी बाबा पुन्हा आले नाहीत याचा तोच अर्थ होता!

पूर्वी पायी प्रवास होई. कालांतराने झालेल्या सुविधा आणि वाढते वय यांमुळे काही वारकरी एस. टी. , रेल्वेनेही प्रवास करू लागले होते. याही काळात असे काही नेमाचे वारकरी निश्चित आहेत पण अर्थात संख्या कमी झालेली असेल, इतकंच!

काही लोकांनी संसारातून निवृत्त झाल्याने तर काहींनी त्यांच्या वैय्यक्तिक कारणांनी, धार्मिक श्रद्धेपोटी हा मार्ग स्वीकारलेला असू शकतो. काही जण घराण्याची परंपराही सुरु ठेवतात. असो.

पायी प्रवास, वाहनांचा प्रवास, वाटेतील अनुषंगिक खर्च यासाठी अनेक लोक स्वखुशीने या वारक-यांना आर्थिक साहाय्य करतात. आणि यांनीही केवळ गरजेपुरतेच अन्न, धन स्वीकारावे असे अपेक्षित असते. काही वारक-यांनी प्रत्येक गावातील विशिष्ट घरे नेमून घेतलेली असतात आणि हा क्रम वर्षानुवर्षे चालायचा पूर्वी. आता जमाना बदलला आहे!

वारकरी लोकांना जनता खुशीने दान देते याचा गैरफायदा घेणारेही पुढे निपजले. त्यामुळे कालांतराने वारकरी आणि भिकारी यांत फरक दिसेनासा झाला!

जगदगुरु संत श्री तुकोबारायांनी ‘होईन भिकारी’ हे अत्यंत वेगळ्या आणि अध्यात्मिक अर्थाने म्हटले आहे. अन्यथा त्यांच्या सारख्या मूळच्या श्रीमंतास असे लिहायची गरज पडली नसती.

हल्ली जवळजवळ सर्वच संतांच्या पालखी सोहळ्यासोबत चालणारा समाज संख्येने प्रचंड दिसून येतो. याची काही अध्यात्मिक कारणे असली तरीही सोहळ्यात केवळ पोटार्थी लोकांची, भिका-यांची संख्याही वाढलेली दिसते आहे. विशेषत: ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीमंत पालखी सोहळ्यासोबत शहरे जवळ आली की वारीत संख्या वाढते… त्यात काही टक्के भिकारी मंडळी असतात. कारण माऊलीच्या मार्गावर पुणे आणि अशीच काही सधन शहरे येतात. आणि येथील लोकही मोठ्या प्रमाणावर, अगदी चढाओढ लावून दान, अन्नदान करताना दिसतात. हाच सोहळा पुढे पुढे गेला की मधल्या मोकळ्या रस्त्यांवर वारीतील भिका-यांची संख्या रोडावते… कारण काही मिळण्याचे प्रमाण कमी होत असते. यामुळेच कुठे काही वाटप होत असेल तर ही भिकारी मंडळी खूप गोंधळ करतात, अधिकच्या वस्तू, अधिकचे अन्न पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे भिकारी चक्क वाहनांनी पुढील सधन गावांत जाऊन थांबतात!

वारीत सहभागी असलेल्या अधिकृत दिंड्या स्वयंपूर्ण असतात. संबंधित वारकरी आपसांत वर्गणी (ज्याला भिशी असं म्हणतात) जमा करतात, दानशूर लोकांकडून देणग्या, वस्तू मिळवतात आणि संपूर्ण खर्च भागवतात. बरीचशी कामे वारकरी कार्यकर्ते स्वत:च करीत असले तरी स्वयंपाक, वाहने आणि इतर काही व्यवस्थांसाठी मानधनावर लोक नेमावे लागतात. आणि हे लोकही केवळ पैशांसाठी नव्हे तर सेवा म्हणून हे कार्य स्वीकारताना दिसतात. स्वयंपाकासाठी लागाणारे सर्व साहित्य, पदार्थ वाहनांमध्ये सोबत घेत प्रवास सुरु असतो. वाटेतील दुपारच्या, रात्रीच्या भोजनासाठी प्रायोजक असतात… त्याला पंगत देणे असे संबोधले जाते!

पालखी रथामागे किंवा रथापुढे चालणा-या दिंड्यांना विशिष्ट क्रमांक दिलेले असतात. आणि ही शिस्त पाळावीच लागते. शेगावच्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा तर अत्यंत कडक शिस्तीसाठी सुप्रसिद्ध आहे. यात वेशभूषा आणि नित्यनेमाला खूप कटाक्षाने महत्त्व दिले जाते. स्वयंपूर्ण दिंडीतील वारक-यांना इतर कुणाकडून अन्न किंवा वस्तू घेण्याची गरज रहात नाही. अर्थात खेडोपाड्यातून येणा-या काही साध्या, छोट्या दिंड्या, ज्यांना आर्थिक पाठबळ कमी असते, अशा दिंडीतील वारकरी काहीवेळा भाविकांनी देऊ केलेले अन्न, वस्तू स्वीकारतात. पण ही याचना नव्हे!

कित्येक गावातील भाविक मंडळी दिंड्यामधील वारक-यांना अगदी आग्रहाने घरी नेऊन जेऊ घालतात. विशेषत: तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात हे प्रमाण मोठे आहे.

पूर्वी तुकोबारायांचा सोहळा कमी संख्येचा असे. मार्गही खडतर असे. त्यामुळे सोहळ्यात भिका-यांची संख्याही कमी असे. आता परिस्थिती बदलली आहे!

पालखी सोहळ्यासोबत विविध व्यवसाय करणारे हजारो लोक चालत असतात. ही मंडळी सुद्धा वारीतील दानाचा बराच लाभ घेताना दिसतात. सामान्य लोकांना बरेचदा केवळ वारीसाठी भक्तीभावाने चालणारी माणसे आणि व्यवसायानिमित्त, काही हेतू मनात ठेवून चालणारी माणसं यांतील फरक समजू शकत नाही! याला काही इलाज नाही. शेवटी माऊली, महाराज आणि सर्वच संत मंडळी पालखी सोहळ्यात सहभागी असणा-या कुणालाही रिक्तहस्त ठेवीत नाहीत, अशी श्रद्धा आहेच!

देशभरातल्या विविध धार्मिक यात्रा, कुंभमेळे यांत व्यावसायिक भिकारी नित्यनेमाने हजेरी लावत असतात, हेही खरेच आहे. पंढरीची वारीही त्याला अपवाद नाही! पण खरे वारकरी भिकारी नसतात आणि भिकारी वारकरी नसतात….. हे या निमित्ताने नमूद करावेसे वाटते!

सोहाळ्यात कुणीही उपाशी राहत नाही… मराठी भाविक मने त्यांना त्यांना उपाशी राहू देत नाहीत… या सर्वांना सोबत घेऊन ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि इतर असंख्य संत दरवर्षी पंढरीची वाट चालत असतात… हा सुखसोहळा स्वर्गी नाही! रामकृष्णहरी!

– लेख क्र. २ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ तारीख पे तारीख… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

तारीख पे तारीख… ☆ तृप्ती देव

तारीख पे तारीख…

आणि माझं भविष्य वेटिंगवर!

मी धनु राशीची आहे… आणि माझी एक मोठी चूक झाली. चुका तर नेहमी होतात माझ्याकडून.

एकदा काय झालं, उत्सुकतेपोटी धनु राशीचं एक पॉडकास्ट पाहायला गेले! पण त्या एका व्हिडिओने माझ्या मोबाईलच्या अल्गोरिदमला बहुतेक वाटलं असेल की, “ही बाई आता ग्रह-ताऱ्यांच्या भरवशावरच जगणार!”

तेव्हापासून मोबाईल उघडला की धनु राशी, युट्युब उघडलं की धनु राशी, फेसबुक उघडलं की धनु राशी आणि रील्स स्क्रोल केल्या की धनु राशी! अगदी वाटतं, माझ्या मोबाईलमध्ये गुगल नाही, तर थेट एखादा ज्योतिषीच राहायला आलाय!

गेले काही दिवस मला एक नवीनचं छंद लागलाय… सकाळी चहा हातात आणि मोबाईलमध्ये पॉडकास्ट! आणि प्रत्येक पॉडकास्टमध्ये एकच मोठी घोषणा… “धनु राशीवाल्यांनो, तयार राहा! तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे!” हे ऐकून मी पण अगदी उत्साहात मनात म्हटलं, “चला! अखेर ग्रहांना माझा पत्ता सापडला वाटतं!” 

पहिला ज्योतिषी म्हणाला, “१० तारखेपासून गुरूची कृपा सुरू होईल. ” मी १० तारखेपर्यंत कसातरी संयम ठेवला. १० तारीख आली… गुरू आला की नाही माहीत नाही, पण वीजबिल मात्र अगदी वेळेवर आलं!

मग दुसरा पॉडकास्ट समोर आला, तो म्हणाला— “२१ तारखेनंतर अडकलेले पैसे मिळतील. ” हे ऐकताच मी माझ्या देणेकऱ्यांचे नंबर पुन्हा व्यवस्थित सेव्ह केले. कोणी स्वतःहून पैसे देईल म्हणून मोबाईलकडे अगदी प्रेमाने पाहू लागले. २१ तारीख आली… पैसे काही आले नाहीत, उलट एका मैत्रिणीने मेसेज केला, “थोडे पैसे पाठवशील का? ” 

त्यानंतर आला तिसरा ज्योतिषी, तो म्हणाला— “या महिन्याच्या शेवटी तुमचं नाव होईल! ” मी मनात म्हटलं, “वा! आता पुरस्कार, मुलाखती, सत्कार सगळं काही! ” महिना संपला… नाव झालं खरं! पण शेजारच्या किराणा दुकानाच्या उधारीच्या वहीत सगळ्यात वर!

आता तर परिस्थिती अशी झाली आहे की, मी तारखांची वाट बघते आणि तारखा माझी मजा बघतात! ५ तारीख… १० तारीख… १५ तारीख… २१ तारीख… २८ तारीख… तारखा बदलतात, महिने बदलतात, व्हिडिओ बदलतात, ज्योतिषी बदलतात… पण माझं भविष्य मात्र सरकारी फाईलसारखं. पुढील आदेशापर्यंत प्रलंबित! ” 

खरं सांगायचं तर, या सगळ्या व्हिडिओंनी माझ्या मनात एक गोड लालसा आणि आशा निर्माण केली. मलाही माझे जुने अडकलेले पैसे परत हवे आहेत, मलाही माझं नाव कमवायचं आहे, माझ्या मनासारखं आयुष्य जगायचं आहे आणि मलाही एक दिवस अभिमानाने म्हणायचं आहे— “हो! आता माझा काळ बदललाय! “

आणि प्रत्येक पॉडकास्ट हेच स्वप्न पुन्हा पुन्हा रंगवतो— “बस ही तारीख… मग सगळं बदलेल! ” पण या सगळ्यातून आता मला एक मोलाची गोष्ट समजली आहे… गुरू ग्रह राशीत येण्यापेक्षा, आपण स्वतः कामाला लागणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण ग्रहांचा प्रवेश कधी होईल माहीत नाही, पण प्रयत्नांचा प्रवेश रोज करता येतो!

तरीसुद्धा… उद्या जर एखादा नवीन पॉडकास्ट म्हणाला, “धनु राशीवाल्यांनो, उद्यापासून तुमचा सुवर्णकाळ सुरू! ” तर काय करणार, मी पुन्हा तो व्हिडिओ पूर्ण बघणारच! कारण भारतीय माणूस आशेवर जगतो… आणि धनु राशीवाला? तो तर पुढच्या तारखेवर! ” आता परिस्थिती अशी आहे की, मी भविष्य ऐकण्यासाठी पॉडकास्ट लावते… आणि पॉडकास्टवाले माझं भविष्य ऐकूनच नवीन तारीख देतात! ” 

थोडक्यात सांगायचं तर, स्थिती सध्या अशी आहे : “गुरू येतोय… शनी जातोय… राहू फिरतोय… केतू वळतोय… तारखा धावतायत… फक्त माझे अडकलेले पैसे आणि माझे मोठे यश, बहुतेक अजून GPS शोधत आहेत! ” 

टीप: (या लिहिण्यामागे कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही, हा सहज माझ्या मनात आलेला एक विनोदी विचार आहे.) मी शास्त्राचा सन्मान करते.

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काळजी वाटते म्हणून” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “काळजी वाटते म्हणून…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळची नऊची वेळ, रस्त्यावर बऱ्यापैकी ट्राफिक होतं. अचानक “बुंगsssबुंग”असा मोठंठा आवाज आणि कर्कश हॉर्न वाजवत एक बाईकवाला  ओव्हरटेक करून वेगानं पुढे गेला. काही वेळातच धाड….. धाड असा आवाज झाला. गाडी घसरून तोच सुसाट बाइकवाला रस्त्यावर पडलेला. हातापायाला खरचटलेलं. सुदैवानं गंभीर दुखापत नव्हती पण मुका मार बराच लागलेला. बाईकवाला थरथर कापत होता. बघ्यांची गर्दी जमली. काही विचारपूस तर काही व्हिडिओ शूटिंग करत होते. तितक्यात पन्नाशीचे एक काका पाण्याची बाटली घेऊन आले. बाईकवाल्याला उठवून बसवलं. स्वतःच्या हातानं पाणी पाजलं. बिस्किटं खायला दिली. प्रेमानं, आपुलकीनं विचारपूस करत होते.

“बरं वाटतंय का? ”काका 

“हो”

“घाबरू नकोस. काही झालेलं नाही घरी फोन कर”

“नको. मी ओकेयं. ”

“माझं ऐक. कोणाला तरी बोलावून घे. एकटा जाऊ नकोस. ”

“नको. ममी टेंशन घेईल आणि पप्पांना कळलं तर…  ”हे ऐकल्यावर काकांनी खाडकन बाईकवाल्याच्या मुस्काडात मारली. सगळ्यांनाच धक्का बसला. बाईकवाला तर बधीर.

“ओ मारताय कशाला? ”संतापलेला बाईकवाला म्हणाला.

“अजून दोन देईन”

काकांनी पुन्हा मारायला हात उचलल्यावर बाईकवाला त्यांच्या अंगावर धावून गेला तेव्हा इतरांनी मधे पडत दोघांना शांत केल्यानं पुढचा अनर्थ टळला तरी बाईकवाला संतापानं धुमसत असताना  काका एकदम रडायला लागले.

“सॉरी!! माफ कर भावनेच्या भरात तुझ्यावर हात उचलला” काकांनी हात जोडले.

“तुम्ही हाफ मॅड ये का? ”बाईकवाला.

“फुल मॅड सुद्धा म्हणू शकतोस. माझी काळजी तुला कळणार नाही. घरी फोन कर म्हटल्यावर भीती वाटली पण जीव धोक्यात घालून गाडी चालवताना काही बरं वाईट झालं तर आईबापाची काय अवस्था होईल याचा कधी विचार केलायस का? केवळ आई-वडिलांची पुण्याई म्हणून आज वाचलास. ”बाईकवाला काहीच बोलला नाही.

“गाडी सावकाश चालव असं आईबाप सांगतात ती कटकट वाटते. माझ्या मुलगा सुद्धा तुझ्यासारखाच गाडी चालवायचा. हजारदा सांगितलं पण ऐकलं नाही. शेवटी अद्दल घडली.”

“काय झालं”

“गाडी स्लिप झाली. तीन महिने झाले. दोन्ही हात प्लास्टर मध्ये घेऊन घरात बसलाय. जीव वाचला पण परीक्षा बुडाली, वर्ष वाया गेलं. वेगाच्या नादात आयुष्याचं मातेरं करून घेतलं”काकांना खूप भरून आलं.

“आजकाल शायनिंगच्या नादात जोरात गाडी चालवण्याचं प्रमाण वाढलंय. गरज नसताना जीव धोक्यात घालतात. खूप भीती वाटते. कोणी जोरात गाडी चालवताना दिसलं की काळजात धस्स होतं. मुलगा डोळ्यासमोर येतो. कधी, काय होईल याचा भरवसा नाही. गाडी सावकाश चालव आणि हेल्मेट वापर. ”

काही क्षण शांततेत गेले.

“आजपासून नीट गाडी चालवेन. ममी-पप्पांची आणि तुमचीही शपथ. ” काकांचा हात हातात घेत बाईकवाला म्हणाला 

“अजून खूप आयुष्य आहे आणि रागवू नकोस. जे केलं ते फक्त काळजीपोटी… बाकी काही नाही. ” बाईकवाल्याच्या डोक्यावरून हात फिरवून काका निघून गेले.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. २ ☆ श्री सुधीर करंदीकर

कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – घटना परदेशामधील कोर्ट

बेरोजगारी, कामधंदा न मिळणे, हा प्रकार सगळ्याच देशांमध्ये कमीजास्त प्रमाणात असतोच. त्यामुळे कमीजास्त प्रमाणात चोऱ्यामाऱ्या होणे, हे पण ओघानी येतेच.

परदेशामधली एक घटना आहे – एका माणसाला दोन दिवस काहीही काम मिळाले नाही, त्यामुळे ते दोन दिवस त्यानी उपाशी राहून कसेबसे काढले. काहीतरी काम मिळेल आणि पोटाला काही खायला मिळेल या आशेवर तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी पण काम नाही आणि दोन दिवस पोटात अन्नाचा कण नाही, शेवटी अनावर होऊन त्यानी एका दुकानामधून ब्रेड चोरला आणि भूक थोडी शांत केली. दुकानदारानी त्याला पकडले आणि पोलीसांच्या हवाली केले.

कोर्टामधे केस उभी राहिली. उपस्थित मंडळी स्थानापन्न झाली. लिपिकानी केसची माहिती कोर्टाला वाचून दाखवली.

जज्ज : (आरोपी माणसाला) तू ब्रेडची चोरी केली, हे खरे आहे का? आणि केली असेल तर का केली? चोरी करणे हा गुन्हा आहे हे तुला माहित आहे ना?

माणसानी चोरी केल्याचे कबुल केले, चोरी करणे हा गुन्हा आहे, हे माहित असल्याचे पण कबुल केले, आणि चोरी का करावी लागली ते कारण पण त्यानी सांगितले.

त्याचे बोलणे ऐकून सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. हा गुन्हा या वेळेस आरोपीला माफ करावा, अशी एका वकिलानी कोर्टाला विनंती केली. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जज्ज साहेबांनी असा निर्णय जाहीर केला – – 

जज्ज : आरोपीनी चोरी का केली, याचे कारण जरी पटण्यासारखे असले आणि चोरी तशी किरकोळच असली, तरी, चोरी करणे हा कायद्याने गुन्हाच ठरतो. आणि चोरी करणाऱ्यांना शिक्षा ही असतेच. आणि शिक्षेचे प्रयोजन अशाकरिता असते, की, त्यानी पुन्हा चोरी करू नये. ही जी चोरी केली आहे, त्याकरता १० डॉलर दंड भरणे ही शिक्षा आरोपीला कोर्ट देत आहे.

सगळेच उपस्थित लोक चेहेऱ्यावर हळहळ व्यक्त करतात.

जज्ज : अजून निर्णयाचे काम संपलेले नाही. आरोपी हा दंड भरू शकत नाही, हे कोर्टाला पक्के समजते आहे. म्हणून आरोपीतर्फे १० डॉलर ही दंडाची रक्कम मी आरोपीच्या वतीने कोर्टाकडे भरत आहे. असे म्हणून जज्ज नी खिशामधून १० डॉलर ची नोट काढून बाजूला बसलेल्या लिपिकाकडे दिली.

सगळ्यांच्या चेहेऱ्यावर समाधान उमटले.

जज्ज :  निर्णयाचा पुढचा भाग –  आपल्या देशात पोट भरण्याकरता माणसाला काम मिळू शकत नाही, ह्याकरता आपण सगळेच जबाबदार आहोत आणि शिक्षेला पात्र आहोत. म्हणून कोर्ट इथे हजर असलेल्या सगळ्यांना १० डॉलर दंड करत आहे. सगळ्यांनी दंडाची रक्कम सरकारी लिपिकाकडे जमा करायची आहे आणि मगच बाहेर पडायचे आहे.

सगळ्यांनीच आनंदी चेहेऱ्यानी १० – १० डॉलर जमा केले. २ मिनिटात २०० डॉलर जमा झाले.

जज्ज :  हे २०० डॉलर मिस्टर क्ष (चोरी करणारी व्यक्ती) यांना कोर्ट देत आहे. त्यांनी छोटा मोठा उद्योग सुरु करावा आणि मेहेनत करून आपली रोजी रोटी कमवावी. इथे कोर्टाचे या केसचे कामकाज संपते आहे.

मिस्टर क्ष नी खाली मान वाकवून जज्ज साहेबांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

सगळेजण जज्ज साहेबांना धन्यवाद देत आणि त्यांचे कौतुक करत बाहेर पडले.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मेघदूत -आषाढस्य प्रथम दिवसे ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ मेघदूत -आषाढस्य प्रथम दिवसे ☆ शालिनी जोशी

संस्कृत काव्यात अजरामर झालेले, कालिदासाच्या उतुंग प्रतिभेतून निर्माण झालेले विरहगीत म्हणजे मेघदूत. नावावरूनच लक्षात येतो की येथे कवीने मेघालाच दूत बनवले आहे. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हेच खरे म्हणूनच समर्थ रामदास कवीना कवीश्वर म्हणजे ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ म्हणतात. काल्पनिक कथेवर आधारित हे काव्य अनेकांना भुरळ पाडणारे खंड काव्य झाले.

कालिदास एका सुशिक्षित शास्त्रनिपुण राजकन्येचा पती होता. अगदी साधाभोळा होता. तेव्हा पत्नीने त्याला ज्ञान प्राप्तीसाठी पाठवले. तो परत आल्यावर तिने विचारले, ‘अस्ति कश्चित् वाग् विशेष:? ’ आपल्या वाणीत काही विशेष आहे? तेव्हा बुद्धिमान कालिदासांनी प्रश्नाच्या प्रत्येक शब्दाने सुरुवात होणारे काव्य रचले. अस्ति- कुमार संभव, कश्चित्- मेघदूत आणि वाग् विशेष- रघुवंश. मेघदूत हे अस्तिने सुरुवात होणारे १११ ओव्यांचे अप्रतिम विरहगीत, ज्याच्या दुसऱ्या श्लोकातील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे आषाढ प्रतिपदा हा दिवस ‘कालिदास दिवस’ म्हणून ओळखला जातो. असा हा एकमेव कवी.

मेघदूत ही हेमामाली आणि विशालक्षी या यक्ष दांपत्याची कथा आहे. यक्ष हा कुबेराचा सेवक. अलका नगरी ही कुबेराची राजधानी. कुबेराला पूजेसाठी फुले आणून देणे हे यक्षाचे काम. पण एकदा यक्षाच्या हातून कळी तोडली जाते. या चुकीची शिक्षा म्हणून एक वर्ष त्याला पत्नी विरह सहन करावा लागतो. खरं तर कळी तुटणे ही आपल्यासाठी शुल्लक गोष्ट. पण पत्नी विरहाच्या शिक्षेतून, कळीला झाडापासून तोडण्यामुळे होणाऱ्या वेदना सांगायच्या आहेत. विरहाला विरहाची शिक्षा ही कालिदासाची प्रतिमा. ही शिक्षा भोगण्यासाठी तो रामगिरीवर फिरत होता.

 कश्चित् कांता विरह गुरूणा स्वाधीकारान् प्रमतः

 शापेनास्तंगतमहिमा वर्ष भोग्येषा भर्तु:

 यक्षश्चक्रे जनकतनयास्नान पुण्योदकेषु

 स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु १

कोणी एक यक्ष शापाने, जो सहन करण्यासाठी कठिण, एक वर्ष पत्नीपासून दूर जाण्यासाठी रामगिरीवरती झोपडी करून राहू लागला. तेथे वृक्षांची घनदाट सावली होती. जनककन्यासीतीने स्थान केल्याने जलाशयतील पाणी पवित्र झाले होते. पण शापाने यक्षाचे सर्व अधिकार नष्ट झाले. (रामगिरी म्हणजे नागपूर जवळचे सध्याचे रामटेक) अशा बाह्य सौंदर्याने अंतरंगातील वेदना कशा कमी होणार?

अशा दुःखाच्या प्रसंगी त्याला आकाशातील मेघाचा आधार वाटतो. मेघासारख्या निर्जीव घटकाला संदेशवाहक बनवण्याची कल्पना कालिदासाची. त्यातून रसपूर्ण, भावकाव्य मेघदूत तयार झाले. प्रेम वेड्या माणसाला चेतन अचेतन भेद कुठून असणार? . आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुम्

वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श

काळा मोठा ढग हत्तीप्रमाणे पर्वत शिखरावर धडका मारत होता. आलींगन देत होता. यावरून त्या ढगाच्या ताकदीची त्याला कल्पना आली. तो दूत म्हणून योग्य वाटला.

आषाढाची सुरुवात त्यामुळे ढग सजल आहे, दयाळू आहे. यक्षात इतक्यात पत्नीभेट शक्य नाही म्हणून त्याच्या जीवाची तगमग. तिला निरोप देऊन आधार देण्यासाठी तो ढग.

त्याला जाण्याचा मार्ग, वाटेत येणाऱ्या अडचणी, आपले घर या सर्वांचे व स्थानांचे मोठे रसभरीत वर्णन केले आहे. वाटेल तू काय कर हे ही सांगितले आहे. वेली वरच्या कोमेजलेल्या फुलासारखी माझी पत्नी, भाऊ होऊन तिला आधार दे. कमल तंत्तूची शिदोरी घेतलेले राजाहंस तुला सोबत करतील. पर्वत शिखरावरचे ताजे पाणी तू पिऊन तहान भागव. वेळूच्या वनात रेंगाळू नको. इंद्रधनुष्य, मोराचे नृत्य, अमृत गंध तुला सुखावेल. त्यात गुंतू नको. विदिशा, उज्जैनी, अवंती मार्गे कैलास, मानस, गंगादर्शन मग अलका नगरी. तेथे नगरीच्या कुरळ्या केसांवर मोत्याच्या माळेप्रमाणे शोभून दिसशील. असे वर्णन करणारे मेघदूत हे प्रेमकाव्य, विरहगीत त्याचबरोबर उपमा, रसिकता, विज्ञान, निसर्ग, पक्षी झाडे इत्यादी सर्व वर्णन सौंदर्याने परिपूर्ण आहे. मुळात पाच ओळींची कथा १११ श्लोकात रंगवली आहे.

यातून माणसाची निसर्गाबरोबरची जवळीक स्पष्ट होते. तोच मित्र, देव होतो. त्याच्याबरोबर सुखसंवाद होतो. कारण तो ‘अरेला कारे’ करत नाही. ज्ञानोबांच्या देवाच्या विरहात कावळा, सावरकरांना मातृभूच्या विरहात सागर, विवाहितेला माहेरच्या विरहात वारा साहाय्य होतो. त्यातून भावपूर्ण काव्यनिर्मिती होते. (पुण्यातील डॉक्टर भावे यांनी रामटेकहून निघून हेलिकॉप्टरने अलका नगरीपर्यंत प्रवास केला.) यावरून कालिदासाच्या अचूक भौगोलिक ज्ञानाची कल्पना येते. हे काव्य चौथ्या ते सहाव्या शतकातील असावे. धन्य तो कालिदास आणि मेघदूत!

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खंत… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ खंत☆  कल्याणी केळकर बापट

काही वेळा असं वाटतं आपण खूप भ्रमात जगतोय, जणू स्वप्नरंजनात रमलोय की काय असा प्रश्न मनाशी पडतो. आधी भारत पारतंत्र्यात होता. इंग्रजांचे जुलूम अराजकता त्यावेळच्या लोकांनी खूप सहन केली. अत्याचाराचा सामना केला आणि खूप स्वातंत्र्य सेनानींच्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळालं, अर्थातच खूप मोलाची माणसं पण गमवून त्याची खूप जबरी किंमत मोजली आपण सगळ्यांनी.

स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली. आपण स्वमर्जीने निवडून दिलेले आपले प्रतिनिधी सरकार बनवून सगळा कारभार बघायला लागले. देश चालवणे, सगळ्यांचे हित जोपासून निःपक्षपातीपणे सगळा देश चालवणे म्हणजे काही येरागबाल्याचे काम नव्हे. आपण समस्त डोळे झाकून ह्या सगळ्या प्रतिनिधींवर जबाबदारी टाकून निर्धास्त राहू लागलो. जे करतील ते आपल्या हिताचं, फायद्याचं असत ह्यावर डोळेझाकून विश्वास ठेवायला लागलो.

काही वेळी जनतेला असे अनुभव आलेत की त्या लोकप्रतिनिधींवरील विश्वास डळमळू लागला. ह्याचबरोबर जनता सुशिक्षित, सुजाण झाली, आपलं हित त्यांना कळायला लागलं, प्रगती कडे त्यांची पावलं वळायला लागली, विकासाकडे मन ओढ घेऊ लागलं. आणि हे सगळ साध्य करायचच ह्या निश्चयाने त्यांनी सत्ताबदल सुद्धा केला. आता मनासारखं सगळं झालं त्यामुळे आता प्रगती, विकास, अच्छे दिन मिळणारच ह्याची प्रत्येक नागरिकाला खात्रीच पटली.

काळ बदलला, दिवस पालटले, नवीन पिढी खूप खूप शिकू लागली, उद्योगधांना चालना मिळाली, पण मनात मात्र खूप सारे प्रश्न साचू लागले. उच्चशिक्षित प्रजा वाढू लागल्यावर निश्चितच समंजसपण, चांगली वृत्ती, मेहनतीच्या जोरावर इप्सित ध्येय गाठणे हे ओघानेच आले, पण विचार आला, खरंच असं दृश्य बघायला मिळतं का, निदान सरसकट बघता तरी हे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. खुप प्रगती झाल्याने खरंतर कुणालाच काहीच फुकट देण्याची देशाला गरज पडायला नको पण इकडे तर सगळेच उलटे मूठभर करदात्यांच्या जीवावर ढीगभर जनतेला वेगवेगळ्या स्वरूपात खिरापत वाटणे सुरूच. जेव्हा आपल्याकडील जनता घरी गाडी घोडी, बंगला असताना, स्वतः चांगली नोकरी करून बक्कळ पगार घेऊन वर “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत अनुदान घेताना जनतेची कीव करावी की ते अनुदान खोटेपणाने लाटणाऱ्या बहिणींची कीव करावी की अभ्यास न करता निव्वळ मतांसाठी ते सढळ हाताने देणाऱ्या त्या देशसेवक प्रतिनिधींची कीव करावी ते कळत नाही.

नुकतीच नीट परीक्षा नीट न घेण्याची शाई वाळते न वाळते तोच आज दुसऱ्या अजून एका शिक्षकांच्या परीक्षेची पेपर फुटीची बातमी कळली. खूप मेहनतीने खडतर परिस्थितीत परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना काय काय समस्यांना तोंड द्यावे लागत असेल ह्याची सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे तरीही अशा भोंगळकारभाराने, मूठभर अप्रामाणिक लोकांमुळे कठीण परिस्थिती उद्भवलीय आणि ते ही जनता जनार्दनाच्या खिशातूनच. कमी उत्पन्नाचे खोटे दाखले आणून सवलती घेणाऱ्यांची खरंच कीव येते, नुसते दरिद्री रेषेखालील हे लोक नसून हे कर्माने दरिद्री असतात. असं स्वतः चा वैयक्तिक फायदा करून घेऊन देशाचे कुठले हित साध्य होते हे एक न उलगडलेलं कोडंच.

अर्थात ही सगळी खंत कुठल्याही अमुक एका पक्षाविरुद्ध, अमुक एका व्यक्तीबद्दल नसून ही सगळी खालावलेल्या, पातळी सोडलेल्या मनःस्थिती विरुद्ध आहे हे कृपया सुजाण वाचकांनी लक्षात घ्यावे.

©  कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वागत सोलापुरी… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ स्वागत सोलापुरी☆ शीला पतकी 

स्वागत सोलापुरी – – 

 – – एक संवाद

 

पाच दिवस कोरड्या नळातून परवा पाणी आलं 

दुसऱ्या दिवशी त्यातूनच दुःख गळायला लागलं

 

अरेरे किती हाल.. आणि किती हा त्रास

पाण्यावाचून कसे राहता तेच बघायला आलोय खास

 

ये दुःखा मित्रा ये…

पण दार उघड असताना नळातून? अरे चोर सुद्धा खिडकीतून येतात आणि तू…?????

 

ते चक्क हसले…

मी म्हणलं ये बैस 

अरे पाहुणा आहे का मी…?

इथेच तर राहतो या गावात

 बंद गिरण्यांच्या उजाड आवारात 

कामगारांच्या चाळीत 

कष्टकऱ्यांच्या झोपडीत 

बिडी कामगार बाईच्या दारात 

आणि घरात सुद्धा 

 

अरे ती चक्क रांगोळी काढून स्वागत करते 

 इथल्या धुणे भांडेवाल्या चक्क सतसंगात बसतात 

त्यांच्या मांडीवरची पोर सुद्धा खुदकन हसतात 

कसल्या उन्हात मिरवणुकीत तरुण पोरं नाचतात

अन म्हातारे भक्ति भावाने भजन गातात

 

 सूर्य तापवून पोळवतो

 रस्त्याच्या खड्ड्यातून धूर निघतो.

 वीज सुद्धा मजेत लपंडाव खेळते

 

आता नळाच्या आत पाहिलं ना खपली सुद्धा नाही…

म्हणे खपली धरायला इथे सुखाचा ओलावा कुठेय?

मलाच आपलंसं करून म्हणतात आता दुरावा नाही…!

 

मी म्हणालो ऐक मित्रा

 ईथे कष्टकरी सुखात घोरतात

बेवडे अर्ध्या ग्लासात बुडतात

 

 बायकाना तर ठाऊकच आहे 

तुला पाचवीलाच पुजलंय 

इतक्या सहवासाने त्यांच तुझ्याशीच नातं जडलय…!

 

आमची बांधावरची माय तुला गाण्यात बांधते 

अन घरात दारिद्र्य असतानाही बाई तुला गाडग्यात रांधते 

 

बर सोड.. काय घेतोस सरबत का चहा?

 

शांतता…

दुःख म्हणालं, अरे काय माणसं आहात का काय रे तुम्ही?

अगदी खरं आहे मित्रा माणसंच आहोत आम्ही

 माणूस होण्याच्या रांगेत तुला सोलापूरकर जास्त दिसतील 

 

आम्ही दुःखात सुद्धा सुखाने हसतो 

 

घरी आलेल्या पाहुण्यासह जेवायला बसतो

आमच्या पानातला अर्ध त्याला देतो

 

निघताना निमंत्रण… या पुन्हा या घरी

कारण आम्ही अस्सल सोलापुरी

 

ते खाली मान घालून म्हणाले, येतो 

 

मी हसून…

ये बेsss हा पण नळातून नको

काळजी वाटते तुझीवाट चुकशील

उद्या पाण्याचा वार आहे

 येणाऱ्या पाण्याबरोबर गटारात जाशील

 

???????????

मित्रा

इथे पहिल पाच मिनिट येणार पाणी आम्ही गटारात सोडतो…!!!

 

(खूप जण आम्हाला विचारतात कसं काय करता पाच दिवसांनी एकदा पाणी? त्यांना वाटतं आम्ही या गोष्टीने फार दुःखी आहोत.

– – असल्या छोट्या छोट्या प्रश्नांना डगमगणारा सोलापूरकर नाही

तो दुःखाला सुद्धा कवेत घेऊन भेटतो मित्र म्हणून… आणि म्हणतो… ये बे…! ) 

 

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”माणुसकीचा धर्म आणि देवधर्म..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “माणुसकीचा धर्म आणि देवधर्म.. ☆ संध्या बेडेकर ☆

माणुसकीचा धर्म म्हणजेच देव धर्म का??

सध्या पुण्यात वारीमय वातावरण. किती वाट बघतो या दिवसांची. या भव्य दिव्य उत्सवाची. महाराष्ट्रातील एक पारंपरिक सोहळा. पंधरा दिवस चालणारा हा उत्सव. लोकांचे थवेच्या थवे पंढरपूर मार्गी चालताना दिसतात. पालखी प्रस्थान सोहळा बघण्यासारखा असतो. जागोजागी त्यांचे स्वागत, त्यांची व्यवस्था बघणारे सेवेकरी सज्ज असतात. ‘फूल नाही फूलाची पाकळी’ समजून, आपली सेवा म्हणून, लोक श्रध्दाभावाने साधारण जनमाणूस हे सर्व करतो. स्वतः ला धन्य समजतो. मी वारी करू शकत नाही. तेंव्हा जेवढं जमेल तेवढं करावे, अशा विचाराने मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा.  

पंढरपूर वारी म्हणजे अगदी भक्तिमय वातावरण. विठ्ठलाचा नामगजर, माऊली माऊली चा उदघोष आसमंतात दुमदुमतो. ही वेळ म्हणजे जणू काही वातावरणाचे शुध्दीकरणच चालू आहे असे वाटते. एक वेगळीच उर्जा अनुभवायला मिळते. बातम्या वर्तमानपत्रात अनेक माहिती, घटना ऐकून, प्रमूख पाहुण्यांचे विचार वाचून / ऐकून आपल्याही विचारांत परिवर्तन नकळत होते. नकळत हात जोडले जातात. थोड्या प्रमाणात का होईना घर गृहस्थीतून बाहेर पडून मनात वेगळे विचार येतात. वारी ला जाता आलं नाही म्हणून लोकांची तगमग बघून त्यांच्या श्रद्धेचा अंदाज येतो.

माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. देवाचे रोज मी अनेकदा आभारही मानते. मला खूप साग्रसंगीत पूजा करता येत नाही. म्हणजे अगदी साधी रामरक्षा म्हणताना सुद्धा माझे लक्ष इथे तिथे जाते. त्या पाच मिनिटांत पाचशे विचार मनात येतात. मला नेहमी वाटतं जर भक्तांची देवासमोर लाइन‌ लावली तर माझा नंबर कुठे लागेल बरं?? बहुतेक सगळ्यात शेवटचे स्थान मिळेल का मला??

मी वारी करू शकत नाही हे मला चांगले माहीत आहे. माझी शारीरिक शक्ती कमी झाली आहे. किंवा भक्तित तेवढी शक्ति नसावी. मला जमणार नाही असे मात्र वाटते. आपल्याला जेवढं शक्य आहे, आपल्या क्षमतेप्रमाणे देवधर्म करावा. असे मी खूपदा ऐकलंय. वाचलंय. मी माझ्या करिता हाच नियम पाळते.

माझ्या आजीचे एक वाक्य माझ्या मनावर बिंबलेले आहे, ते म्हणजे,  आजी म्हणायची,

“मी माणुसकी चा धर्म पाळते. ” तो धर्म मी लक्षपूर्वक, विचार पूर्वक पाळू शकते. माझ्या सहवासात येणाऱ्या लोकांशी चांगले वागायचे. जमेल तेवढी मदत करायची. हेच माझं आयुष्यातील ध्येय मी ठरवून टाकले आहे. मलाही आजीचे हे विचार, म्हणणे पटले.

खरच लक्ष देऊन बघीतल तर माझ्या आजूबाजूला खूप माऊली दिसतात. पंढरपूर ला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. पण माझ्या आजूबाजूला बऱ्याच माऊलींचे दर्शन मला रोज घडते. मला रोज दूधाचे पॅकेट घरपोच देणारा ‘अजिंक्य’, मला घर कामात मदत करणारी ‘साक्षी ‘, ‘मंदाताई ‘, माझ्या घरचा कचरा घ्यायला येणाऱ्या ‘मावशी ‘. रोज न चूकता आपले काम व्यवस्थित पार पाडतात. सर्वांनी कोरोनाच्या कळातही स्वतः चा जीव धोक्यात घालून आमची सेवा केली. मला या नेहमी म्हणायच्या “काकू स्वतः ला जपा. बाहेर निघू नका. काळजी घ्या. “

नाइलाजाने काम करायला घरा बाहेर निघणाऱ्या या माऊली, स्वतः रोज रिस्क घेऊन बाहेर पडतात, तरीही दुसऱ्यांचा विचार करतात. दुसऱ्यांची काळजी घेतात. देवाच्या रूपात असणाऱ्या या माऊलीचे मला रोज दर्शन होते. फक्त पंढरपूर वारी काळातच नाही तर नेहमीच या सर्व माऊली, माझे सख्खे शेजारी माझ्या आजूबाजूला आहेत. हे सर्व माझ्या extended family चेच मेंबर्स आहेत..

देवाला बघीतले नाही. पण देवाचे representative बरेच दिसतात. कोरोना काळात तर माणसातल्या देवाचे दर्शन झाले. जिव्हाळ्याचे ॠणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येतं नाही. माझे व यांचे पूर्व जन्मीचे काही तरी संबंध नक्कीच असावेत. आपणही नेहमी त्यांच्या समाधानाचा हिस्सा असावं. समस्याचां नाही. त्यांच्या बद्दल आदर असावा.

ही माझ्या’ contact ‘मधे असणारी सर्व मंडळी माझ्या ‘connection’ मधे पण आहे. जीवाभावाचे नाते आहे आमचे. माझा त्यांच्या शी संपर्क आहे, संवाद आहे. आम्ही एकमेकांना समजतो. जाणतो.

हा माणुसकीचा धर्म पाळला तर देवधर्म झाला का??

आपल्या आजूबाजूला समाधान, आनंदी वातावरण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा एक चांगला संसर्गजन्य रोग आहे जेवढा पसरेल तेवढा चांगला.

“We rise by lifting others “.

म्हणतात ना,

“मधूर संबंध ज्ञान और पैसे सेभी बड़ा होता है।जब ज्ञान और पैसा विफल हो जाता है, तब मधूर संबंध से स्थिति संभाली जा सकती हैं ।”

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. १ ☆ श्री सुधीर करंदीकर

 – – – घटना जंगलामधले कोर्ट.  

ही घटना एका जंगलामधली आणि सिंह या राजाच्या दरबारामधली आहे.

फार पूर्वी जेव्हा राजे आणि राजवटी हा प्रकार होता तेव्हा कोर्ट कचेरी हा प्रकार नव्हता. भांडण तंटे, तक्रारी या राज दरबारात राजासमोर पेश केल्या जायच्या, आणि निर्णय राजा देत असे. आणि तो अंतिम असे.

हळूहळू राजवटी संपल्या आणि लोकशाही अस्तित्वात आली. आणि या बदलामध्ये कोर्ट कचेऱ्यांचा जन्म झाला. आणि तक्रारी न्याय मिळवण्याकरता कोर्टात जायला लागल्या.

जंगलांमध्ये मात्र अजूनही राजे आणि राजवट हा प्रकार सुरू आहे. प्राण्यांचे पण आपापसात भांडण तंटे असतात, काही तक्रारी असतात, अशा सगळ्या गोष्टी राज दरबारात सिंह या राजापुढे पेश केल्या जातात. आणि सिंह राजाचा निर्णय अंतिम समजला जातो.

आता जंगला मधली एक घटना आणि निर्णय बघूया —

एका घनदाट आणि खूप दूरवर पसरलेल्या जंगलामधली ही घटना आहे. जंगलामध्ये सगळेच पशु – प्राणी – पक्षी खेळीमेळीनी रहात होते. सिंहाला जंगलामध्ये नेहेमीच राजाचा मान असतो. पशु – पक्षी – प्राणी यांच्यामधे कधी भांडण तंट्याचा प्रसंग उद्भवला, तर त्याचा न्याय निवाडा सिंहाच्या दरबारामध्ये होत असे.

एक दिवस जंगलामधे फेरफटका मारत असतांना एका वाघाची भेट गाढवाशी झाली. गाढव एका गवत असलेल्या मोकळ्या जागेवर पाय मोकळे करत हिंडत होते. एकमेकांना हाय – हॅलो – नमस्कार करून झाले. काय म्हणताय? तब्येत कशी आहे? पाऊस पाणी, अजून काय नवीन? वगैरे गप्पा झाल्या.

गाढव : मी मुद्दामच गवतावर फेऱ्या मारतो आहे. गवतावर पायताण न घालता चालल्यामुळे ब्लड प्रेशर चा त्रास होत नाही, असे जवळच्या गावात माणसे बोलतांना मागे ऐकले होते. तेव्हापासून मी रोजच फिरत असताना जिथे कुठे गवत दिसेल तिथे गवतावर छान फेऱ्या मारतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कायम १२०/८० असते. इथे छान गवत दिसले म्हणून गवतावर फेऱ्या मारतोय. इथे उन्ह पण छान आहे, त्यामुळे अनायसे डी व्हिटॅमिन पण मिळतंय.

वाघ : वा, छानच आहे 

गाढव : निळंशार गवत बघतांना डोळ्यांना पण छान वाटतंय. तुम्हाला पण छान वाटत असेल ना!

वाघ : छान नक्कीच वाटतंय, पण गाढवदादा गवताचा रंग निळा नसून हिरवा आहे.

गाढव : दादा, गवताचा रंग निळा आहे.

गवताचा रंग निळा आहे, का हिरवा आहे यावर दोघांची वादावादी सुरु झाली. आणि वाढत वाढत हमरा तुमरी वर गेली. कुणीच माघार घ्यायला तयार नव्हते.

बाजूने जाणारा कोल्हा हे सगळे बघत थांबला होता. कोल्ह्याने दोघांना हात करून शांत व्हायला सांगितले.

कोल्हा : अशी वादावादी करून दोघांमध्ये ताणतणाव निर्माण करण्यात आणि तुमचे मैत्री सबंध खराब करण्यात काही पॉईंट नाही. माझ्याबरोबर आपले राजे सिंह यांच्याकडे जाऊन त्यांनाच आपण विचारू, कि, गवताचा रंग निळा आहे का हिरवा आहे. ते जो निर्णय देतील तो दोघेही मान्य करा.

तिघेही सिंहाकडे गेले. सिंहानी सगळ्यां प्राण्यांची सभा बोलावली. सगळे प्राणी जमले.

सिंह (दोघांना उद्देशून) : तुम्ही दोघं तुमचे म्हणणे अगदी थोडक्यात सांगा…

वाघ : युवर ऑनर, गवताचा रंग हिरवा असतो असे माझे म्हणणे आहे.

गाढव : युवर ऑनर, मीवाघोबा दादांना सांगतोय कि गवताचा रंग निळा असतो, इथे पण सगळीकडे छान गवत उगवले आहे आणि निळ्या रंगाचे आहे. महाराज, आता आपणच निर्णय द्यावा.

सिंह : मी दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आहेत. गाढवाचे म्हणणे बरोबर आहे, असा मी निर्णय देत आहे. आणि वाघाला छोटी शिक्षा फर्मावत आहे.

सर्व प्राण्यांनी आपापल्या आवाजात टाळ्या वाजवून गाढवाचे कौतुक केले. सभा इथे संपली.

आपल्या बाजूनी निर्णय लागला हे ऐकून गाढव खुश झाले आणि मी बरोबर आहे, मी बरोबर आहे, असे म्हणत, हुंदडत तिथून आनंदात पसार झाले.

सगळे गेल्यानंतर ….

वाघ (सिंहाला) : महाराज गवत हिरवे असते, तरी तुम्ही मला खोटे का ठरवले? आणि मला शिक्षा का दिली?

सिंह : गवत हिरवे असते, हे मला पण माहित आहे. आणि आपल्या राज्यामधल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण एक लक्षात घे, राज्यामधल्या आम जनतेला खुश ठेवण्याकरता कधी कधी असे निर्णय राजाला घ्यावेच लागतात. गाढवासारख्या आम जनतेला नेहेमीच खुश ठेवावे लागते. थोडंसं चुचकारले कि ते खुश असतात, त्यांना अक्कल नसते हे तुला पण समजते.

वाघ : महाराज, तुमचे हे म्हणणे मला पूर्णपणे पटले. पण मग मला शिक्षा कशाकरता?

सिंह : वादविवाद हे नेहेमी आपल्या तोडीच्या व्यक्तीबरोबर करायचे असतात. हे तुला पटतंय कां?

वाघ : पटतंय कां म्हणजे काय, शंभर टक्के पटतंय. तुम्हीच मागे मला हे समजावून सांगितले होते.

सिंह : गाढवाची आणि तुझी आकलन शक्तीची लेव्हल एक आहे कां?

वाघ : महाराज, हा काय प्रश्न झाला कां? आपण त्यांना गाढव म्हणतो यातच उत्तर दडलेले आहे.

सिंह : तुला शिक्षा का केली हे तुला आता समजले असेलच. आता लक्षात ठेव, वादविवाद हे नेहेमी आपल्या तोडीच्या व्यक्तीबरोबर करायचे असतात.

वाघानी दोन मिनिटे कान धरून उभे राहण्याची शिक्षा पूर्ण केली, सिंहाला वाकून नमस्कार केला आणि उड्या मारत मारत आपला मार्ग धरला.

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

गीतांजलीतील मृत्यूची परिकल्पना…

गीतांजलीतील बहुसंख्य कवितांमध्ये मृत्यूचा उल्लेख या ना त्या प्रकारे आलेला दिसतो. याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर दोन शक्यता आढळतात.

पहिली शक्यता ही की, रविंद्रनाथांनी त्यांच्या तरुणपणीच, त्यांच्या अगदी जवळच्या, प्रिय व्यक्तींचे मृत्यू फार जवळून पाहिले किंवा अनुभवले म्हटलं तरी चालेल. ते फक्त १३ वर्षांचे असताना त्यांचं मातृछत्र हरपले. नंतर ते २२ वर्षांचे असताना त्यांची जिवलग मैत्रीण, त्यांचे प्रेरणास्थान असलेली, त्यांच्या साहित्याची प्रथम वाचक, श्रोता व टीकाकार असलेली त्यांची समवयस्क वहिनी, कादंबरी देवींचा अनपेक्षित व अनैसर्गिक मृत्यू रविंद्रनाथांना उध्वस्त करून गेला.

यानंतर तर काळाची वक्रदृष्टीच त्यांच्या कुटुंबावर पडली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची पत्नी मृणालिनी देवी ऐन तारुण्यात, पाच मुले मागे सोडून, १९०२ साली त्यांना एकटं करून गेल्या. या धक्क्यातून बाहेर येण्यापूर्वीच फक्त ९ महिन्यांच्या अंतरालानंतर, त्यांची मुलगी रेणुका टी बी च्या संसर्गामुळे अवघ्या १३ व्या वर्षी मृत्यू पावली. त्यानंतर एक वर्षाच्या आतच रविंद्रनाथांच्या वडिलांचा मृत्यू (१९०५) झाला. त्यांचा धाकटा मुलगा समींद्रनाथ ११ वर्षांचा असताना कॉलरा होऊन देवाघरी गेला (१९०७). पाठोपाठ सतीशचंद्र नावाचा त्यांचा तरूण, बुद्धिमान सहकारी, जो कलकत्त्यातील आपलं सगळं वैभव सोडून शांतिनिकेतनाच्या कार्यात रविंद्रनाथांना मदत करण्यासाठी आला होता तो अचानक वारला. अशा प्रकारे १९०२ ते १९०८ या सहा वर्षांत त्यांनी पाच जवळच्या व्यक्तींना गमावलं. यानंतर १९२३ साली बंधू सत्येंद्रनाथ व १९२५ ला बंधू ज्योतिरिंद्रनाथ स्वर्गवासी झाले.

रविंद्रनाथांना मृत्यूविषयी वाटणारा जिव्हाळा, जो त्यांच्या गीतांजलीतील कवितांमधून जाणवतो त्याचं दुसरं कारण असू शकतं, ते म्हणजे त्यांचा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास! या अभ्यासामुळे आत्मा अमर आहे व एक शरीर नष्ट झालं तरी दुसरं शरीर धारण करून तो पृथ्वीवर येतच असतो; या जन्ममृत्यूच्या चक्रावर त्यांचा दृढ विश्वास होता व म्हणूनच या चक्राचा उल्लेख अगदी पहिल्याच कविते पासून गीतांजलीत वारंवार आलेला दिसतो.

त्यांच्यातला कवी मृत्यूला कधी घाबरत नाही किंवा टाळण्याची इच्छाही व्यक्त करत नाही, उलट तो मृत्यूचं स्वागत करताना दिसतो.

ते म्हणतात, मृत्यूला का भ्यायचं? मरण म्हणजे दोन जन्मांमधली फक्त छोटीशी विश्रांतीच तर आहे.

आपण जन्म घेऊन जसे या जगात आलो, तसेच मृत्यू नंतर दुसऱ्या जगात प्रवेश करणार असतो. ते जग आपल्याला अनोळखी असतं म्हणून भीती वाटते म्हणावं तर जन्माआधी आपल्याला हे जग तरी कुठे माहीत होतं!

ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी आपण जन्मभर तळमळतो, मृत्यूनंतर त्याचा चिरंतन सहवास आपल्याला मिळू शकतो, त्याच्याशी एकरूप होण्याची संधी आपल्याला मिळू शकते. या मर्त्य जगातून त्याच्या अमर्त्य जगात आपल्याला प्रवेश मिळतो. या सगळ्याचा टागोरांना अतिशय आनंद होतो. पतीगृही निघालेल्या नव्या नवरी प्रमाणे त्यांना त्या अमर्त्य जगाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तिकडे जाण्याबद्दल आतुरता आहे.

तरूण वयातच मृत्यूच्या तांडवामुळे भावविश्वाच्या चिंध्या झाल्यानंतर, रविंद्रनाथांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली, पण मृत्यूच्या या अनुभवानेच त्यांना मृत्यू विषयी विचार करायला भाग पाडले असणार आणि मग त्यांचा मृत्यू कडे बघण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलला असावा. प्रियजनांच्या कायमच्या वियोगामुळं, त्यांचं लौकिक गोष्टीत गुंतलेलं मन मुक्त झालं आणि त्यांना पटलं की मृत्यूच्या चष्म्यातून जीवनाकडं बघायला हवं तरच जीवनाचं सत्य लक्षात

येईल.

—– 

☆ गीत : ९४ ☆

AT this time of my parting, wish me good luck, my friends! The sky is flushed with the 

dawn and my path lies beautiful.

Ask not what I have with me to take there. I start on my journey with empty hands and 

expectant heart.

I shall put on my wedding garland. Mine is not the red-brown dress of the traveller, and though there are dangers on the way I have no fear in my mind.

The evening star will come out when my voyage is done and the plaintive notes of the 

twilight melodies be struck up from the King’s gateway.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९४ ☆

घेऊनि तुमच्या शुभ कामना।

निरोप घेत मी जरी यातना॥

*

लाली उषेची गगन भूषवी।

वाटचाल ती रम्य भासवी॥

*

असती माझे रिक्तच हस्तक।

परी ठेविते नत मी मस्तक॥

*

मनी असे उत्सुकता भारी।

पतीदेवाच्या जाईन दारी॥

*

पाठवणीची साडी पिवळी।

हृदयी असे ती मूर्त सावळी॥

*

अज्ञाताचा प्रवास अवघड।

नसे भीती, करि तो सवघड॥

*

स्वागत करण्या तारे गगना।

सायं गीते गातील ललना॥

*

वेशीपासुनि मिरवित नेतील।

सासरी माझे कवतिक होईल॥

*

रूप सावळे पाहीन जेधवा।

विरुनि जाईन त्यांमधे तेधवा॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ९५ ☆

WAS not aware of the moment when I first crossed the threshold of this life.

What was the power that made me open out into this vast mystery like a bud in the 

forest at midnight!

When in the morning I looked upon the light I felt in a moment that I was no stranger in 

this world, that the inscrutable without name and form had taken me in its arms in the form of my own mother.

Even so, in death the same unknown will appear as ever known to me. And because I 

love this life, I know I shall love death as well.

The child cries out when from the right breast the mother takes it away, in the very next moment to find in the left one its consolation.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९५ ☆

कसे का अन् कधी

जगती पडले मम पाऊल कलंदर

 घनदाट अरण्यी

 माध्यान्ह रात्री

 जणू उमलते कलिका सुंदर

 शक्ती कोणती

 भक्ती कुणाची

 जी भासे मज गूढ निरंतर

 क्षणात कळले

 मज जाणवले

अनंग व्यापे मम मातेचे अंतर

 प्रिय मज जीवन

 हरीप्रीत साधून

तसाच कवळीन मृत्यू शुभंकर

 माता करविता

 दुग्धपान बालका

पयोधर ती बदले जेंव्हा तद्नंतर

 कांही क्षण त्या

 दुग्ध न मिळता

रडे मूढ ते, जीवन मिळते मृत्यू नंतर

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ९६ ☆

WHEN I go from hence let this be my parting word, that what I have seen is unsurpassable.

I have tasted of the hidden honey of this lotus that expands on the ocean of light, and 

thus am I blessed ⎯ let this be my parting word.

In this playhouse of infinite forms I have had my play and here have I caught sight of him that is formless.

My whole body and my limbs have thrilled with his touch who is beyond touch; and if the end comes here, let it come ⎯ let this be my parting word.

—- 

☆ मराठी भावानुवाद : गीत : ९६ ☆

चाललो मी चाललो

 अनंत यात्रेला॥

*

भोगिले मी भोगिले

 अत्युच्च सुखांना॥

*

चाखिला मी चाखिला

 मधु दैवी पुष्पांचा॥

*

अभिनित केली मी केली

 भूमिका त्याने दिलेली॥

*

पाहिले मी पाहिले

 रूप अरूपाचे॥

*

स्पर्शिले मी स्पर्शिले

 जे स्पर्शापार असे॥

*

रोमांचित झालो मी झालो

 अनुभूती घेतांना॥

*

त्यागिले मी त्यागिले

 मर्त्य जीवनाला॥

*

बोललो मी बोललो

 अंतिम बोलांना॥

*

चाललो मी चाललो

 अनंत यात्रेला॥

– क्रमशः भाग ३२..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares