मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गुप्तदान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “गुप्तदान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

पुण्याजवळच्या एका खेड्यातल्या ‘ जिल्हा परिषद शाळेत’ आज मोठा कार्यक्रम होता. शाळेला १० संगणक (Computers) भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन ‘मिस्टर सुहास ओक’ आले होते.

सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता – “दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे.”

शाळेच्या पटांगणात कार्यक्रम सुरू झाला. सुहासराव मंचावर (Stage) मधल्या खुर्चीत बसले होते.

त्यांची नजर अचानक मंचाच्या खाली, एका कोपऱ्यात गेली.

तिथे एक ७५-८० वर्षांचे म्हातारे गृहस्थ जमिनीवर सतरंजीवर मुलांमध्ये बसले होते. त्यांचे कपडे अत्यंत साधे होते – एक विटकं धोतर, जुना सदरा आणि डोक्यावर एक मळके उपरणं. ते सारखे खोकत होते आणि त्यांच्या पायात एक जुनी चप्पल होती.

सुहासरावांना ते दृश्य खटकलं. त्यांना वाटलं, “हा भिकारी इथे काय करतोय? माझ्यासारखा एवढा मोठा माणूस आलाय आणि इथे मंचासमोर हे असं दृश्य?”

त्यांनी मुख्याध्यापकांना (Principal) खुणेने जवळ बोलावलं.

सुहासराव रागाने कुजबुजले, “सर, तो म्हातारा कोण आहे? त्याला तिथून उठवा. माझ्या फोटोच्या फ्रेममध्ये येतोय तो. ‘स्टँडर्ड’ खराब दिसतंय शाळेचं. भिकारी वाटतोय तो, त्याला गेटच्या बाहेर काढा आणि जेवण देऊन वाटेला लावा.”

मुख्याध्यापक थोडे ओशाळले. ते म्हणाले, “साहेब, ते… ते…”

सुहासरावांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. “अहो, कसले ‘ते’? सांगा शिपायाला. उचलून बाहेर काढा त्यांना.”

शिपाई गेला आणि त्याने त्या म्हाताऱ्याला (ज्यांचं नाव ‘तात्या’ होतं) हाताला धरून उठवलं.

“तात्या, चला उठा. साहेबांना त्रास होतोय. तुम्ही मागे जाऊन बसा किंवा बाहेर थांबा.”

तात्या काहीच बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. त्यांनी आपली काठी टेकवली आणि ते थरथरत्या पायांनी मंचाच्या मागच्या बाजूला, जिथे मुलांचे बूट ठेवले होते, तिथे जाऊन एका दगडावर बसले.

कार्यक्रम पार पडला. सुहासरावांनी १० कॉम्प्युटर दिले. खूप टाळ्या वाजल्या. हार-तुरे झाले.

शेवटी भाषणाची वेळ आली.

मुख्याध्यापक माईकवर आले. त्यांचा आवाज भरून आला होता.

ते म्हणाले:”आज सुहासरावांनी आपल्याला १० कॉम्प्युटर दिले, त्याबद्दल त्यांचे आभार.

पण आज मला एका अशा व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे, ज्याने या शाळेसाठी आपलं ‘सर्वस्व’ दिलं, पण कधी स्टेजवर येऊन हार स्वीकारला नाही.

सुहासराव, मगाशी ज्यांना तुम्ही ‘भिकारी’ समजून मंचासमोरून उठवलंत आणि बूट स्टँडजवळ बसवलंत ना…

ते ‘तात्या पाटील’ आहेत.

या शाळेची जी २ एकर जमीन आहे, ज्याची आजची किंमत ५ कोटी रुपये आहे… ती जमीन या तात्यांनी शाळेला ‘दान’ दिली आहे.

तात्यांकडे राहायला स्वतःचं पकं घर नाहीये, ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांची मुलं त्यांना सोडून गेली.

म्हातारपणी औषधाला पैसे नसतात, पण दरवर्षी आपल्या पेन्शनचे पैसे साठवून ते शाळेतल्या गरिबांच्या पोरांना गणवेश (Uniform) देतात.

साहेब, तुम्ही १० कॉम्प्युटर दिलेत, पण त्यासाठी १० फोटोग्राफर आणलेत.

या माणसाने ५ कोटींची जमीन दिली, पण आज स्वतःच्याच जागेवर बसण्यासाठी त्यांना तुमच्या परवानगीची गरज लागली.

खरा ‘श्रीमंत’ कोण, हे आज तुम्हीच ठरवा.”

सगळ्या सभामंडपात स्मशानशांतता पसरली.

सुहासरावांचा चेहरा पांढराफटक पडला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

ज्या माणसाला ते कपड्यावरून ‘भिकारी’ समजत होते, त्या माणसाची दानत सुहासरावांच्या संपत्तीपेक्षा हजार पटीने मोठी होती.

सुहासराव मंचावरून खाली उतरले. त्यांचे बाउन्सर, त्यांचे फोटोग्राफर सगळे बघत होते.

सुहासराव धावत त्या मंचाच्या मागे गेले.

तिथे तात्या एका दगडावर बसून, मुलांनी दिलेलं बिस्किट खात होते.

सुहासरावांनी आपले महागडे बूट तिथेच काढले आणि त्या मळक्या धोतर नेसलेल्या तात्यांच्या पायावर डोकं ठेवलं.

“मला माफ करा तात्या! मी पैशाने श्रीमंत झालो, पण मनाने खूप गरीब राहिलो. तुम्ही खरे ‘राजा’ आहात. मी तुमची लायकी काढली, पण खरी लायकी आज मला माझी समजली.”

तात्यांनी हसून सुहासरावांच्या पाठीवर हात फिरवला.

“अरे बाबा, त्यात काय झालं? देव देतो आणि देवच नेतो. आपण फक्त माध्यम असतो. तू दिलं, मी दिलं… हे महत्त्वाचं नाही. पोरांनी शिकणं महत्त्वाचं. उठ, कपडे खराब होतील तुझे.”

सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं.

आज त्यांना समजलं होतं की, श्रीमंती बँकेच्या बॅलन्समध्ये नसते, तर ती ‘देण्याच्या’ वृत्तीमध्ये असते.

त्या दिवशी सुहासरावांनी एकही फोटो काढला नाही. त्यांनी तात्यांचा हात धरला आणि त्यांना सन्मानाने मंचावर नेऊन आपल्या खुर्चीवर बसवलं.

कोणाच्या कपड्यावरून त्यांची लायकी ठरवू नका. साध्या राहणीमागे खूप मोठं आणि श्रीमंत मन असू शकतं. दान दिल्यावर त्याचा गाजावाजा करणं म्हणजे त्या दानाची किंमत कमी करण्यासारखं आहे. ‘गुप्तदान’ हेच श्रेष्ठ दान असते जेथे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला देखील कळलेलं नसतं.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गंमत… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ गंमत… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

माणसाचं मन जीवसृष्टीतल एक अजब रसायन आहे ते कधी कुणात एकजिनसी होऊन मिसळून एकरूप होऊन जाईल आणि कुणाशी बेइमानी करून कुणापासून कशासाठी फारकत घेऊन विभक्त होईल याचा काही नेम नाही. कारण ते चंचल अस्थिर, चपळ, चालाख आहे. याचा सर्वानी अनुभव घेतलेला असेलच. मना मुळेच मानवजातितील विवीधता, मतभिन्नता आवडीनिवडी, नितीमानता, आणि संतानी सांगितलेल्या शड्ररिपुंची देहावरची मजबूत पकड ठेवण्याच्या मनाच्या अफाट शक्तीचे धोरण सूक्ष्म निरीक्षणाने ध्यानात येते. मग माणूस आपल्यातला खरा माणूस शोधू लागतो. तो कोणाला किती सापडतो हे शोधणारालाच माहिती पडतं. पण ते सापडणं इतरांना सविस्तरपेणे सांगता येईल ही बाबही तशी अवघडच.

कारण जो तो मनाच्या या फाजील पणामुळेच आपल्याला राज समजून वागताना दिसतो राजासारखा पण जगतो चिंताग्रस्त माणसा सारखा. कारण त्याच मन त्याची कशी कधी फसगत करील हे त्यालाच माहीत नसतं. असलं हे लबाड, ढोंगी, आपमतलबी. निगरगटृठ, दिलदार, कपटी, रानटी, अडेलतट्टू, अशी बिरुदावली मिरवणार मन महा डांबीस असतं. ते ओढाळपणा करत माणसाला समाधनान निवांतपणे जगूच देत नाही. आणि स्वतःही मरत नाही. ते आपलं अधाशी बुभुक्षित स्वरूप एकवटून चिकाटीन जगतच रहातं. म्हणुनच माणसा‌ला देवाने दिलेला शाप म्हणजे मनच आहे असं वाटू लागतं. तो शाप तहहयात सोसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माणसा पुढं. याच्या कचाट्यातून सुटण्याची बुद्धी माणसाला फारफार उशीरा सुचते तेव्हा सुटण्याची वेळ निघून गेलेली असते. मग आपली हतबलता लपवत माणूस आपल्याला आल़ेला अनुभव आपलं तत्वज्ञान म्हणून दुसऱ्यांना आग्रहान सांगत बसतो. ते ऐकणाराही तेव्हा त्याचं आवर्तनातून जात असतो. हीच खरी तर गंमत आसते‌ जगण्यातली

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बोल्ले तो मराठी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ बोल्ले तो मराठी☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

जसविंदर… ऊर्फ जस्सी.

आमच्या चांडाळ चौकडीतला एक कोन.

खरं तर तो आमच्या गँगमधे कसा?

कोणालाही आश्चर्य वाटेल.

आम्ही तिघे.

म्हणजे मी, लल्या आणि सम्या… कौस्तुभ, ललित आणि सम्यक.

अनुक्रमे सदाशिव, नारायण आणि शनिवार. पुणे 30.

झोपण्यापुरते घरी असायचो.

बाकी स. प. महाविद्यालय किंवा त्यामागे तिलक.

आम्ही तिघेही एम. ए. मराठी करतोय.

खरं सांगायचं तर खाज म्हणून.

मराठी साहित्यविश्वाला,

आमच्या असण्यानं आणि नसण्यानं,

काहीही फरक पडणार नाहीये…

तरीही.

मी सो काॅल्ड पटकथा लेखक आहे.

दोन चार वेळकाढू, रोजच्या साबुछाप मालिकांच्या काही भागांचं लेखन केलंय.

नवीन कामाची धडपड चालूय.

असली रिकामी धडपड,

शिकतोय या नावाखाली, सहज खपून जाते.

लल्या एका नामवंत वृत्तपत्रात ऊमेदवारी करतोय.

बी. जे. झालंय.

त्याला शब्दप्रचूर असं काहीसं, जडजड स्तंभलेखन करायचंय.

एरवी नाईटशिफ्ट करतो.

राहिला सम्यक.

तो ऊत्तम निवेदक होणारेय म्हणे.

एका रेडिओ चॅनलवर पार्ट टाईम आर जे आहे.

थोडक्यात आमच्यापैकी कोणीही, वेल सेटल्ड नाही.

रिकामं घरी बसण्यापेक्षा काॅलेजदर्शन बरं.

आमचा अभ्यास.

हा एक अभ्यासाचा विषय.

अभ्यास फारसा करत नसलो तरी, वाचायचो भरपूर.

अत्रे सभागृहातलं एकही पुस्तकांचं प्रदर्शन चुकवायचो नाही.

आप्पा बळवंतचे वारकरी.

वाचनाची भूक वाढत चाललेली.

भरपूर वाचायचो.

अगदी तहानभूक विसरून.

माज करावा अशी एकच चीज, आमच्याकडे होती.

आमची शुद्ध, साजूक पुणेरी मराठी भाषा.

काय तिचा तो दिमाख.

तो लहेजा.

ते पावित्र्य.

ते भाषिक सौंदर्य.

ते अनुनासिक ऊच्चारण.

आम्ही तिघं बोलत बसलो की,

तमाम जन, तयांचे कान आम्हास बहाल करीत.

एखाद्या नऊवारीतल्या सुवासिनीने,

ईकडच्या स्वारीला, ” आम्ही नाही जा “

असे लटके बोल ऐकवावेत.

आणिक तो नरोत्तम, आनंदाने बेहोश व्हावा. ,

तस्सं.

तस्स मराठी असायचं आमचं.

जाम माज होता आम्हाला, आमच्या शुद्धतेचा.

किंबहुना खरं मराठी भाषासौंदर्य,

हे फक्त पुणे 30 या टापूतच टिकून राहिले आहे,

याविषयी आमच्या मनात किंतू नव्हता.

‘ आनी, पानी, करायलास, करतूस, काय बे… ‘

हे सगळं ऐकलं की आमचा पारा चढायचा.

बाहेरची लोकं, पुण्यात फार वाढलीयेत आजकाल.

त्यामुळे ईथल्या मराठीचा, घडी घडी विनयभंग होतोय, असं वाटायचं.

असल्या परभाषीक मंडळींपासून, आम्ही चार हात लांब असायचो.

थोडक्यात आम्ही शिष्टवर्गात गणले जात होतो.

हे असं होतं.

एकदा शुद्ध पुणेरी मराठीची भूतबाधा झाली की साला…

क्षमा असावी.

मेहुणा म्हणायला हवं खरं तर.

जाऊ दे.

एक दिवस असाच तिलकवर चहा ढोसत होतो.

आणि जस्सी भेटला.

त्यानं स्वतःहूनच ओळख करून दिली.

‘मी जसविंदरसिंग पंजाबी.

एम. ए. मराठी करतोय.

पुढं पीऐच. डी. पण करणार आहे.

संतसाहित्यावर.

नामदेवांवर. ‘

आम्ही ऊडालो.

एक तर शुद्ध, स्पष्ट भाषा.

अस्सल पुणेरी.

चितळ्यांच्या साजूक तुपातल्या, जिलबीहूनही साजूक.

एकदम वाटलं,

सुबोध भावे पंजाबी पगडी घालून, आला की काय?

‘ तु इतका शुद्ध मराठी कसा बोलू शकतोस? ‘

मी ओठांचा चंबू करून विचारलं.

‘ अरे त्यात काय?

आमची पुण्यातली चौथी पिढी आहे ही.

चिमण्या गणपतीपाशी आमचं पेंटस्चं दुकान आहे.

गेली चाळीस वर्ष.

मी काय, आमच्या घरी सगळे, ईतकंच अस्सल मराठी बोलतात. ‘

माझं तोंड चिमणीएवढं.

जस्सी कधी आमच्या गँगमधे सामील झाला, कळलंच नाही.

खरं तर आमच्यात खरा अभ्यास तोच करायचा.

एकदम सिनसियर.

प्रत्येक अॅक्टिव्हीटीत सक्रीय सहभाग.

मराठी साहित्य मंडळ, वक्तृत्व स्पर्धा सगळीकडे.

हे सगळं करून दुकानही सांभाळायचा.

परचेज, डिलीव्हरी, आॅर्डर, टेंडर…

यापैकी कशासाठी तरी टूरही करायचा.

नगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा ते पार नागपूरपर्यंत.

सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी ते पार गोव्यापर्यंत.

महिन्यातून दहा दिवस तरी जस्सी टूरवर असायचा.

दिवाळीची सुट्टी लागली.

जस्सी नागपूरला जाणार होता.

लल्या म्हणाला, आपणही जाऊ.

सम्याही तयार झाला.

तेवढंच महाराष्ट्र दर्शन.

जस्सीला विचारलं.

“मजा येईल.

एकट्याला जाम कंटाळा येतो.

ईन्डिका असते माझ्याकडे.

ड्रायव्हरही असतो. “

आठ दिवसाचा प्रोग्रॅम ठरला.

प्रत्येक ठिकाणी जस्सीचे सप्लायर.

अगदी घरगुती संबंध.

त्याच्याबरोबर आमचंही स्वागत व्हायचं.

हटकून घरी जेवायला बोलवलं जायचं.

मनापासून आग्रह व्हायचा.

नगरपासून सुरवात.

औरंगाबाद, जालना, मेहकर, बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर…

प्रत्येक ठिकाणी वेगळा मेनू.

अस्सल प्रादेशिक.

आमची माती, आमची माणसं.

आम्ही सगळे खुष.

आम्हाला जस्सीचं खूप कौतुक वाटलं.

इतक्या कमी वर्षात, खूप माणसं जोडली होती त्यानं.

नागपूरला पोचलो.

संत्रा बर्फी हादडली.

नागपुरी पोहा चाखला.

परत निघालो.

सहज विषय निघाला.

“जस्सी, तुला कसं जमतं हे सगळं? “

सम्यानं विचारलं.

जस्सीनं मोठ्ठा श्वास घेतला.

” खरं सांगू, मायमराठीमुळे.

पंजाबीईतकंच माझं मराठीवर, प्रेम आहे दोस्तांनो.

पण माझ्या मराठीला भिंती नाहीयेत तुमच्यासारख्या.

अरे दहा मैलावर भाषा बदलते.

नगरला मी नगरी बोलतो.

नागपुरला नागपूरी.

अकोल्याला जाऊन, काय बाप्पा म्हणतो.

सगळं शिकून घेतलंय मी.

भिंती आपोआप गळून पडतात.

माणसं जवळ येतात.

भाषा माणसं जवळ करणारी असावी.

लांब नेणारी नको.

शुद्धलेखनात नियम पाळायलाच हवेत.

पण बोलीभाषेचा अनादर नको.

तीही तितकीच जपायला हवी.

शुद्धतेच्या कसोट्या त्याला लावायला नकोत.

भले भाषेचा लहेजा वेगळा असेल, पोत वेगळा असेल..

पण शेवटी मराठीच आहे ती..

मुळामुठेच्या सीमा ओलांडा अन् बघा, काय बहार येते ती.

समोरच्यानं दोन शब्द ऊच्चारले की, गाव सांगू शकतो मी.

माझ्या धंद्याचं हेच गुपित आहे.

माणसं जोडायला तिथली बोली यायला हवी. “

आम्ही सुन्न.

ऊघडा डोळे.

बघा नीट.

ऊघडले.

सम्यानं त्याच्या रेडिओ चॅनलवर एक टाॅक शो ठेवला.

वेगवेगळ्या गावची, आता पुण्यात सेटल झालेली मंडळी बोलावली.

मराठीची वेगवेगळी रूपं ऐकवली.

बहारदार कार्यक्रम झाला.

पुणेरी मराठी माणसाळतेय, असं वाटायला लागलं

परवा असाच जस्सीच्या दुकानात बसलो होतो.

” काला रंग का दाखवून राहिला बे, मले पारवा हवे हाय ना ” समोरचा माणूस दुकानातल्या माणसाला सांगत होता.

माझी ट्यूब पेटली.

‘ तुम्ही जळगावचे का हो?

ऐकायला छान वाटते तुमची भाषा. ‘

तो ताजाताजा पुण्यात आलेला.

एकदम खुष झाला.

पिशवीतून केळ्याच्या वेफर्सचा पॅक काढला.

मला गिफ्ट केला.

तिखट वेफर्ससुद्धा..

गुलाबजामूनपेक्षा गोड लागले.

मायमराठी तुला सलाम!

 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुनियेतील सारे रंग तिच्याचमुळे…” – (अनुवादित) हिन्दी कवी : अज्ञात ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “दुनियेतील सारे रंग तिच्याचमुळे…” – (अनुवादित) हिन्दी कवी : अज्ञात ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्त्री नेच तर केली आहे ना तिच्या हातांनी, विविध रंगांची उधळण,

पहिल्यांदा फाल्गुनातच शिकली गुलाल उडवणं.

तिनं पहिल्यांदाच जेव्हा अंगण सजवलं रांगोळीने…

तेव्हाच बहुधा भकास, उदास धरती ला ; रंगांत रंगून जाणं,

आणि जगणं कळलं, आपलेसे केले ते रंग तिने.

 

 

तबकात गुलाल घेऊन निघते ना ती…

तेव्हा चेहरेच नाही रंगवत त्याने;

तर… नात्यांचा रंग पार उडालेल्या भिंती

रंगवून टाकते आपलेपणा च्या रंगात!!

 

 

प्रेमाच्या उबदार स्पर्शाची, लालिमा उमटते तिच्या गाली अन् मोहक हास्यात.

वसंताचं सोनसळी तेज आहे डोळ्यांत.

हरित स्वप्नांची शीतल छाया आहे तिच्या पदरात.

आणि मनाच्या गहिरेपणात आहे आकाशाची निळाई.

 

 

ती जेव्हा हळूच येऊन रंग लावते ना कुणाच्या गालाला… तर जणू म्हणते..

तुच तर आहेस ना रे… माझं ; आपलं माणूस! “

 

 

तिनंच तर उदास, एकाकी घरांचे सण-सोहळे बनविले, साजिरं केलं घरांना.

आपलं दु:ख लपवून, हसणं शिकवलं इतरांना.

 

 

घराच्या भिंती भले ही बनविल्या असतील पुरूषांनी…

पण… त्या भिंतींना घर बनवलं ते स्त्रीनेच!! घरातल्या चुलीच्या धगीत,

आपली स्वप्न वितळवून…

त्याच राखाडी रंगात परिवार रंगवला.

 

 

खरं सांगायचं ना तर…

स्त्री फक्त होळी नाही खेळत;तर…

आपलं सगळं जगणंच दुस-याच्या नावात रंगवून टाकते.

आणि येवढं करूनही काय येतं तिच्या वाट्याला??? … तर…

बस्स्… फिकुटलेला पांढरा रंग!!

कारण सत्य तर हेच आहे ना… की…

स्त्री ने सा-या जगात रंगांची उधळण केली, पखरण केली…

पण जगाने मात्र तिच्या जीवनातले सगळे रंग बळकावून तिला बेरंग केले…

(एका भावलेल्या आणि मनाला भिडलेल्या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद)

हिन्दी कवी : अज्ञात 

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक अस्वस्थ करणारे वास्तव…” –  लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे  ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक अस्वस्थ करणारे वास्तव” –  लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे  ☆ सुश्री प्रभा हर्षे

 एक अस्वस्थ करणारे वास्तव

 – – – डॉक्टरांचे अकाली मृत्यू आणि आधुनिक वैद्यकीय क्षेत्रापुढील यक्षप्रश्न…  

“डॉक्टर, तुम्ही तर आमचे प्राण वाचवले! ” असे म्हणत रुग्ण जेव्हा डॉक्टरांचे आभार मानतो, तेव्हा त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य असते. पण, दुर्दैवाने आज चित्र बदलत आहे. दुसऱ्याचे आयुष्य वाढवणारा, समाजाला आरोग्याचा मंत्र देणारा ‘आरोग्य रक्षक’च आज अकाली मृत्यूच्या जाळ्यात ओढला जात आहे. सध्या वैद्यकीय वर्तुळात एक अतिशय वेदनादायक घटना वारंवार घडताना दिसते—एखादा तरुण, तडफदार डॉक्टर, जो कालपर्यंत परिषदांमध्ये उत्साहाने सहभागी होत होता, हसत-खेळत होता, तो अचानक एका रात्रीत हे जग सोडून जातो. ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (Sudden Cardiac arrest) किंवा हृदयविकाराचा तीव्र झटका हे आज वैद्यकीय क्षेत्रातील मृत्यूंचे सर्वात मोठे कारण बनले आहे. ज्या वेगाने आपण आपले सहकारी आणि मित्र गमावत आहोत, ते पाहता आता यावर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर गंभीर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. धक्कादायक आकडेवारी व वास्तव: काय सांगते?

 समाजातील सामान्य व्यक्तीपेक्षा डॉक्टरांचे आयुष्य अधिक असावे, असा आपला एक समज असतो. कारण त्यांना रोगांचे ज्ञान असते. पण, संशोधनातून समोर आलेले सत्य अत्यंत धक्कादायक आहे.

 १) केरळमधील संशोधन: केरळमध्ये डॉक्टरांच्या मृत्यूदराचा तब्बल १० वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यातून असे सिद्ध झाले की, सामान्य जनतेच्या तुलनेत डॉक्टरांचे आयुष्य सरासरी १३ वर्षांनी कमी आहे.

२) आयएमए (IMA) पुणे अहवाल: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने सुमारे १५, ००० डॉक्टरांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्यांचा निष्कर्षही असाच भयावह होता—डॉक्टरांचे आयुष्य सर्वसामान्यांपेक्षा १० ते १५ वर्षांनी कमी होत चालले आहे. प्रश्न हा उरतो की, असे का घडतेय? रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल का लागत नाही?

डॉक्टरांचे आयुष्य कमी होण्यामागे केवळ एकच कारण नाही, तर तो अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम (Cumulative Effect) आहे.

डॉक्टरांच्या अकाली मृत्यूची ५ प्रमुख कारणे

१. निसर्गाच्या विरोधात काम – (Biological Clock Disruption) निसर्गाने मानवी शरीराचे एक घड्याळ (Circadian Rhythm) निश्चित केले आहे. दिवसा काम आणि रात्री विश्रांती हे त्याचे सूत्र आहे. मात्र, वैद्यकीय पेशात या सूत्राचा बळी जातो.

 * डॉक्टरांना आठवड्याला ५०, ६० किंवा अनेकदा ७० तासांपेक्षा जास्त काम करावे लागते.

 * प्रशिक्षण काळात आणि त्यानंतरही सलग २४-२४ तास ड्युटी करावी लागते.

 * रात्रपाळी (Night Shifts) आणि अपुरी झोप यामुळे शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) बिघडते. यामुळे शरीरात ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ तयार होतो, जे पुढे जाऊन मधुमेह आणि हृदयविकाराचे मूळ कारण बनते.

२. तणावाचा स्फोट (High Stress Levels)आज डॉक्टर केवळ रुग्ण तपासत नाहीत, तर ते एका प्रचंड मानसिक दबावाखाली असतात.

 * निर्णय घेण्याचा ताण: आपत्कालीन स्थितीत एका सेकंदात घेतलेला निर्णय रुग्णाचा जीव वाचवू शकतो किंवा गमावू शकतो. हा तणाव सतत मनावर असतो.

 * कायदेशीर आणि सामाजिक दबाव: “रुग्णाला काही झाले तर डॉक्टर जबाबदार, ” ही समाजाची मानसिकता आणि त्यातून उद्भवणारे कायदेशीर खटले (Consumer Protection Act) यामुळे डॉक्टर सतत दहशतीखाली असतात.

 * या तणावामुळे शरीरात अडरिणालीन(adrenalin) व कार्टीसोल (cortisol)ही हार्मोन्स शरीरात सतत वाढलेली राहतात. त्याचा हृदयावर प्रचंड ताण येतो व तो घातक असतो. आपत्कालीन परिस्थितीत असे होते पण जेव्हा तसे वारंवार होते, तेव्हा रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके खूप वाढून अनियमित आणि अनियंत्रित होतात(ventricular fibrilation) व अचानक हृदयाचे स्पंदन थांबते, आणि कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest)होतो, त्यामुळे मेंदूचा रक्त प्रवाह थांबतो व मृत्यू ओढवतो.

 वास्तव असे आहे की, डॉक्टर स्वतः सर्वात वाईट रुग्ण असतात.

 * छातीत दुखले तरी “अॅरसिडिटी असेल” म्हणून दुर्लक्ष करणे.

 * स्वतःची नियमित तपासणी (Check-up) टाळणे.

 * “मला काही होणार नाही, ” हा फाजील आत्मविश्वास बाळगणे.

 ३) बिघडलेली जीवनशैली आणि आहार – कामाच्या व्यापात डॉक्टरांच्या जेवणाच्या वेळा निश्चित नसतात.

 * दुपारचे जेवण संध्याकाळी आणि रात्रीचे जेवण मध्यरात्री घेणे.

 * ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर पटकन भूक भागवण्यासाठी वडापाव, समोसा किंवा जंक फूड खाणे.

 * व्यायामाचा पूर्ण अभाव.

 या दुर्लक्षामुळे जेव्हा आजार समजतो, तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. या सवयींमुळे ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ (Metabolic Syndrome) जडतो—ज्यात उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि लठ्ठपणा हे चारही शत्रू एकत्र येतात.

४) व्यसनाधीनता हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे की, काही प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रातही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. तणाव कमी करण्यासाठी (Stress Buster) म्हणून सुरू झालेले व्यसन शेवटी हृदयाचा घात करते.

५) आता वेळ आली आहे बदलाची! जर आपल्याला समाजाचे आरोग्य टिकवायचे असेल, तर आधी डॉक्टरांना जगावे लागेल. यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे:

 * नियमित ‘फिटनेस ऑडिट’: वयाच्या पस्तीशीनंतर किंवा चाळीशीनंतर प्रत्येक डॉक्टरने स्वतःची सखोल आरोग्य तपासणी (Cardiac Profile, TMT, Lipid Profile) वर्षातून एकदा करणे बंधनकारक करावे.

 * ‘नो’ म्हणायला शिका: कामाचा अतिरेक होत असेल तर त्याला नकार देण्याची हिंमत ठेवा. कामाचे तास मर्यादित करा आणि विश्रांतीला प्राधान्य द्या.

 * कुटुंबाला वेळ द्या: रुग्णालयाच्या बाहेरही एक जग आहे. आपले कुटुंब, मित्र आणि छंद यांच्यासाठी वेळ काढा. हा ‘क्वॉलिटी टाइम’ तुमचा मानसिक तणाव निम्म्याने कमी करतो.

 * व्यायाम हाच धर्म: दिवसातील किमान ४५ मिनिटे स्वतःच्या शरीरासाठी द्या. चालणे, योगासने किंवा ध्यानधारणा (Meditation) याला पर्याय नाही.

निष्कर्ष आयुष्य किती अनिश्चित आहे, हे आपण दररोज आपल्या रुग्णांच्या रूपाने पाहतो. तरीही आपण स्वतःला अमर समजण्याची चूक करतो.

आपण १०० वर्षांचे नियोजन करतो, घरांचे हप्ते भरतो, मुलांच्या भविष्याची चिंता करतो; पण पुढच्या क्षणी श्वास सुरू राहील की नाही, याची कुणालाच खबर नसते.

म्हणूनच, सर्व डॉक्टर मित्रांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना माझे कळकळीचे आवाहन आहे— दुसऱ्यांची हृदये सांभाळताना, स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकायला विसरू नका. डॉक्टर निरोगी राहिला, तरच समाज निरोगी राहील!

एका प्रसिद्ध शायरने म्हटले आहे:

 “आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं,

 सामान सौ बरस का है, पल की खबर नहीं… “

 

लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

टागोरांच्या कुटुंबात अनेक सुप्रसिद्ध चित्रकार होते. मात्र रविंद्रनाथांनी वयाच्या पन्नाशीनंतर चित्रं काढायला सुरवात केली. तरीही त्यांनी जवळ जवळ १५ वर्षांच्या कालावधीत अंदाजे २३०० कलाकृती निर्माण केल्या होत्या. त्यांचे कथासंग्रहदेखिल समर्पक चित्रांनी सजवलेले असत.

कलेच्या अभ्यासकांच्या मते टागोरांची चित्रं Art Nouveau या कलाप्रकारामुळे जगापर्यंत पोहोचली. Art Nouveau ही एक कला चळवळ होती. त्यात लोककलेचं मोठ्या प्रमाणात चित्रण असायचं.

१९३० मध्ये टागोरांची ३०० चित्रं असलेली प्रदर्शने युरोपात लंडन, पॅरिस व बर्लिन मधे भरवण्यात आली होती.

त्यांनी आपली अनेक चित्रं निरनिराळ्या कलासंग्रहालयांना भेट दिली होती. बर्लिनच्या नॅशनल गॅलरीला १०० एक पेंटिंग्ज त्यांनी भेट दिली होती. त्यातील अनेक पेंटिंग्स नंतर लंडनमधील संग्रहालयात गेली. जी पाच चित्रं बर्लिनच्या संग्रहालयात शिल्लक होती, त्यात पक्ष्यांची आणि माणसांची चित्रं होती, पैकी एक लाल रोबमध्ये असलेल्या मुलीचंही चित्र होतं. ही चित्रं त्यांनी शाई आणि पाण्याच्या रंगाने काढली होती. असं म्हणतात की नाझींनी ही चित्रं तिथून काढून टाकली. कांही लिलावात खाजगी संग्राहकांना दिली असावीत. कांही चित्रं टागोरांना परत पाठवली असावीत. शेवटी त्यांचं फक्त एकच चित्र बर्लिन येथील संग्रहालयात शिल्लक राहिलंय, हे मात्र खरं!

—– 

☆ गीत ४० ☆

THE rain has held back for days and days, my God, in my arid heart. The horizon is fiercely naked ⎯ not the thinnest cover of a soft cloud, not the vaguest hint of a distant cool shower.

Send thy angry storm, dark with death, if it is thy wish, and with lashes of lightning startle the sky from end to end.

But call back, my lord, call back this pervading silent heat, still and keen and cruel, burning the heart with dire despair.

Let the cloud of grace bend low from above like the tearful look of the mother on the day 

of the father’s wrath.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४० ☆

कोरड्या हृदयात माझ्या, थेंब एक ना पाण्याचा 

कितीक दिस झाले, मागमूस ना मेघाचा

*

दयाघना, थांबव ही उपेक्षा, या व्याकुळ मनाची

करूणेस मी पात्र नसेन तर, बरसात कर क्रोधाची

*

देवा, पाठव वादळ, जे दाविल तांडव मृत्यूचे

थरथरता हे नभमंडल, बसतील फटके विजेचे

*

क्रोधाग्नीने पेटून उठती, कधी कधी बाबा जसे

डबडबलेले डोळे दिसती, आईचे मग मला तसे

*
लवू देत ढग खाली, कृपा प्रसाद बरसणारे

असू देत ते क्रूर, भयानक काळजाला कापणारे

*

परत बोलाव, ती भयाण शांतता, मला घेरणारी

अन् उपेक्षेची धग, निराशेच्या गर्तेत लोटणारी


भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत ४१ ☆

WHERE dost thou stand behind them all, my lover, hiding thyself in the shadows? They push thee and pass thee by on the dusty road, taking thee for naught. I wait here weary hours spreading my offerings for thee, while passers by come and take my flowers, one by one, and my basket is nearly empty.

The morning time is past, and the noon. In the shade of evening my eyes are drowsy with sleep. Men going home glance at me and smile and fill me with shame. I sit like a beggar maid, drawing my skirt over my face, and when they ask me, what it is I want, I drop my eyes and answer them not.

Oh, how, indeed, could I tell them that for thee I wait, and that thou hast promised to come. How could I utter for shame that I keep for my dowry this poverty. Ah, I hug this pride in the secret of my heart.

I sit on the grass and gaze upon the sky and dream of the sudden splendour of thy coming ⎯ all the lights ablaze, golden pennons flying over thy car, and they at the roadside standing agape, when they see thee come down from thy seat to raise me from the dust, and set at thy side this ragged beggar girl a-tremble with shame and pride, like a creeper in a summer breeze.

But time glides on and still no sound of the wheels of thy chariot. Many a procession passes by with noise and shouts and glamour of glory. Is it only thou who wouldst stand in the shadow silent and behind them all? And only I who would wait and weep and wear out my heart in vain longing?

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत ४१. ☆

सावळ्या, उभी मी इथे युगानुयुगे

तू मात्र सावली होऊन, भक्तांच्या मागे

*

अनभिज्ञ ते, ढकलून जाताहेत तुला

माझ्या परडीतली फुले घेऊन, तुला वहायला

*

परडी झाली रिकामी, आता तरी ये माझ्यापाशी

तुझ्यासाठी पसरली ही दारिद्र्याची राशी

*

दिवस सरला, हसताहेत सारी मला

परतताना विचारतात ‘काय हवं तुला’

*

नजर खाली झुकवून ‘कांही नाही’ म्हणते

तुझी वचनं, माझं प्रेम, सारं काही लपवते

*

रात्री नभाकडे पहात, पहुडले होते गवतावर

आकाश उजळलं, तू होतास सुवर्णरथावर

*

अचानक उतरलास, मला उचललेस

तुझ्याजवळ बसवून, अनंताकडे नेलेस

*

सारी माणसं स्तब्ध होऊन पहात राहिली

जीर्ण वस्त्रातील ही भिकारीण, लज्जेने थरथरली

ग्रीष्मातल्या वाऱ्याच्या झुळुकेने जशी वेल सुखावली

*

पण दिवास्वप्नच ते… अचानक मी पुन्हा सत्यात

काळ पुढे सरकला, मी मात्र तिथेच त्या रस्त्यात

*

दिंड्या चालल्या, तुझा जयजयकार करत

तू अजून भक्तांच्या सावलीत, मी मात्र रडत

हृदयाच्या पायघड्या अंथरून, तुझी वाट बघत

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—— 

☆ गीत ४२ ☆

EARLY in the day it was whispered that we should sail in a boat, only thou and I, and never a soul in the world would know of this our pilgrimage to no country and to no end.

In that shoreless ocean, at thy silently listening smile my songs would swell in melodies, free as waves, free from all bondage of words.

Is the time not come yet? Are there works still to do? Lo, the evening has come down upon the shore and in the fading light the seabirds come flying to their nests.

Who knows when the chains will be off, and the boat, like the last glimmer of sunset, vanish into the night?

——

☆ मराठी भावानुवाद : गीत ४२ ☆


सकाळी हलकेच म्हणालास

अथांग सागर, दूरचा प्रवास

फक्त तू अन् मी

अनंताच्या वाटेवर

अन् सारे जग अनभिज्ञ…

*

शांत, संथ लाटातून

वाहणारे माझे गाणे

सुरेल धून होईल,

सागर लाटांसारखी

अन् शब्दबंधनातून मुक्त…

*

बघ, संध्याकाळ झाली

पक्षी घरट्याकडे निघाले

संथावलेली संध्या सुद्धा

निशेच्या कुशीत शिरली

अन् मी तुझ्या प्रतीक्षेत…

*

पण अजून ती वेळ

नाही कां रे आली?

कर्मबंधनातून मुक्ती

नाही कां रे मिळाली?

अन् हेच असावं विधिलिखित…

*

साखळ्या कधी सुटणार?

बोट कधी मुक्त होणार?

का अशीच लुप्त होईल

रात्रीच्या गर्द अंधारात?

अन् माझी आशा, सावळ्यात…

 क्रमशः भाग १४.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपली संस्कृती” – लेखिका: ज्योति निंबाळकर ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपली संस्कृती” – लेखिका: ज्योति निंबाळकर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे की चिंटूच्या समोर तुझी ती गावंढळ भाषा बोलू नकोस. उद्या त्याचा ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस ’, ‘बारा हाय न्हवं ’ किंवा ‘राम-राम’ म्हटलं ना, तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही, स्टेटस आणि क्लास बघतात! ”

समीरने आपल्या आई कावेरीवर चिडत म्हटलं. गावाहून आलेल्या कावेरीदेवी शुद्ध देशी बोली बोलत होत्या. मुलाच्या शब्दांनी त्या शांत झाल्या. त्यांनी पोटलीतून काढलेले लाडू परत आत ठेवले.

पोऱ्याला आपल्या हातचे लाडू खाऊ घालावेत, भरभरून आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती, पण मुलाच्या ‘स्टेटस’पुढे त्यांची माया दडपली गेली…

समीर आणि त्याची पत्नी रिया मागच्या महिनाभरापासून आरव (चिंटू) कडून पोपटासारखं पाठ करून घेत होते –

“Say Hello”, “Say Good Morning”, “My name is Aarav. ”

घराचं वातावरण एखाद्या मिलिट्री ट्रेनिंगसारखं झालं होतं. कावेरीदेवींना कडक सूचना होती – इंटरव्ह्यू होईपर्यंत आरवपासून दूर राहायचं!

 इंटरव्ह्यूचा दिवस :

शहरातील सर्वात प्रतिष्ठित शाळा. सगळीकडे इंग्रजीत संवाद. समीर-रिया तणावात.

प्रिन्सिपल मिस्टर डिसूझा यांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यू सुरू झाला.

आरवने रटलेली उत्तरे व्यवस्थित दिली. समीरच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.

अचानक प्रिन्सिपलने विचारलं,

“बेटा, घरी एखादा मोठा पाहुणा आला किंवा आजी-आजोबांना भेटलास तर काय करतोस? ”

समीरचं हृदय धडधडलं. हे तर शिकवलंच नव्हतं!

आरव शांतपणे खुर्चीवरून उतरला… प्रिन्सिपलकडे गेला… वाकून त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला—

“परनाम गुरुजी! राम-राम! ”

क्षणभर संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली…

प्रिन्सिपल जोरात हसले आणि आरवला मांडीवर बसवलं.

“मिस्टर समीर, ” ते म्हणाले,

“आज सकाळपासून पन्नास मुलं आली. सगळे रोबोटसारखे ‘हाय-हॅलो’ म्हणत होते. पण तुमच्या मुलाने जे केलं, ती आपली संस्कृती आहे. हे संस्कार पुस्तकात मिळत नाहीत. ”

आरव आनंदाने म्हणाला,

“माझी आजी शिकवते! ती म्हणते – विद्या विनय देते, आणि सर्वात मोठं शिक्षण म्हणजे नम्रता. ”

प्रिन्सिपल म्हणाले,

“भाषा संवादाचं साधन आहे, लाजेचं कारण नाही. तुमच्या आईंना माझा नमस्कार सांगा. तुमचा मुलगा त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे निवडला गेला आहे. ”

 घरी पोहोचताच समीर आईजवळ गेला. कावेरीदेवी तुळशीपाशी बसल्या होत्या.

समीर त्यांच्या चरणी नतमस्तक झाला.

“आई, मला माफ कर. झाड कितीही उंच झालं तरी मुळांपासून तुटलं तर सुकतंच. ”

त्या दिवशी समीरला उमगलं—

सूट-बूट आणि इंग्रजीने आपण ‘मॉडर्न’ होऊ शकतो, पण ‘माणूस’ संस्कारांनीच बनतो.

त्या संध्याकाळी समीर घरात येताना म्हणाला—

“राम-राम, आई. ”

कावेरीदेवींच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित कोणत्याही डिग्रीपेक्षा मौल्यवान होतं.

 कथासार:

आधुनिक होणं चुकीचं नाही, पण आपल्या मुलांना, भाषेला आणि वडीलधाऱ्यांना विसरणं ही सर्वात मोठी चूक आहे.

इंग्रजी एक भाषा आहे, कौशल्य आहे. पण मातृभाषा आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहेत.

 तुमच्यासाठी प्रश्न:

आजची पिढी इंग्रजीच्या मागे लागून आपल्या संस्कारांपासून दूर जात आहे, असं तुम्हाला वाटतं का?

घरात मातृभाषा बोलण्यावर भर द्यायला हवा का?  

* * * *

लेखिका : ज्योति निंबाळकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – विळखा ऑनलाइन गेम्सचा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

🔅 विविधा 🔅

☆ उगवतीचे रंग – विळखा ऑनलाइन गेम्सचा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवा एका मित्राच्या घरी गेलो. तो एकटाच होता. वहिनी दिसत नव्हत्या. त्याला म्हटलं, ” काय रे, वहिनी गावाला गेल्या आहेत का? ” तो म्हणाला, ” हो अरे, ती मयुरीकडे गेली आहे. आता तीन महिने तिकडेच राहणार. ” मयुरी म्हणजे माझ्या मित्राची मुलगी पुण्यात असते. आता तिचा मुलगा दहावीला आहे. मार्चमध्ये त्याची परीक्षा आहे. परंतु तो मुलगा अभ्यास करण्यापेक्षा मोबाईल जास्त पाहतो, सतत ऑनलाईन गेम्स खेळत असतो. मित्राच्या मुलीला आणि जावयाला असे वाटते की या सगळ्याचा परिणाम त्याच्या परीक्षेतील गुणवत्तेवर होऊ नये म्हणून त्यांनी त्याच्या आजीला दोन-तीन महिने बोलावून घेतले आहे. कारण ते दोघे नोकरी निमित्ताने बाहेर असतात. मग घरी त्याच्यावर लक्ष कोण ठेवणार? ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मुलांचे ऑनलाईन गेम्सच्या आहारी जाणे खरोखरच काळजी वाटावी इतके वाढले आहे.

अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि काही मोठी माणसे सुद्धा या व्हिडिओ गेम्स आणि ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेली आहेत. कुठेही गेले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो आणि कोणीतरी काहीतरी ऑनलाईन गेम किंवा व्हिडिओ गेम खेळताना दिसतो. सुरुवातीला करमणूक म्हणून काही वेळ त्यात घालवल्यानंतर त्याचे सवयीत कधी रुपांतर होते ते आपल्याला कळत नाही आणि मग त्याशिवाय जर राहवत नसले तर त्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाले असे समजायला हरकत नाही.

हल्ली आई वडील आपल्या कामात खूप व्यस्त असतात. त्यामुळे मुलांसाठी त्याला वेळ देता येत नाही. अशावेळी विरंगुळा म्हणून किंवा करमणूक म्हणून ते त्याच्या हातात मोबाईल देतात आणि मग त्याला हळूहळू व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाईन गेम्सचे व्यसन लागते. २०२३ च्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास सहा कोटी लोक ऑनलाईन गेम्स खेळतात. त्यातही लहान मुलांचे आणि तरुणांचे प्रमाण मोठे आहे.

हे आभासी जग एवढे आकर्षक आहे की त्यामुळे प्रत्यक्षातील आपल्यासमोर असलेल्या चांगल्या गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. या गेम्समधील ग्राफिक्स एवढे आकर्षक असतात की लहान मुलांबरोबरच मोठ्यांना देखील त्याचा मोह पडतो. एकदा खेळायला सुरुवात केली की पॉईंट्स वाढत जातात आणि त्याचे वेडच लागते. मग पुढील पायरी, त्याच्या पुढील पायरी असे करत करत मुले या अजगराच्या विळख्यात अडकत जातात. हा विळखा त्यांना इतका करकचून आवळतो की त्यातून बाहेर पडणे अशक्य होते. अशावेळी जर पालकांनी मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला तर मुलं चिडचिड करतात, प्रसंगी हिंसक बनतात आणि कधी कधी तर त्याच्या पुढची म्हणजे आत्महत्येची पायरी गाठण्यापर्यंत त्यांची मजल जाते. या खेळांचे व्यसन लागल्यामुळे मुले एकलकोंडी बनतात. घरात असलेल्या आई-वडिलांशी देखील बोलण्याची त्यांची इच्छा होत नाही. ते आपल्याच आभासी जगात रमलेले असतात. ही एक प्रकारची नशाच असते. यालाच डिजिटल ड्रग्स असेही म्हटले जाते. हेडफोन लावून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोलण्याची सोय पालकांशी बोलण्यापेक्षा त्यांना अधिक मजेशीर वाटते. कुटुंबातील सदस्यांपासून मुले अशा रीतीने लांब जातात.

काही ऑनलाईन गेम्स हे पेड असतात. अशावेळी मुले पालकांच्या ऑनलाइन कार्डाचे डिटेल्स वापरून हे गेम्स डाउनलोड करून घेतात. तसेच त्यात वेळोवेळी होणारी पैशाची मागणी देखील पुरवतात. हे गेम्स खेळत असताना बऱ्याच वेळा अनेक जाहिराती किंवा व्हिडिओ क्लिप्स पॉप अप होतात. अशा व्हिडिओ क्लिप मध्ये बऱ्याच वेळा संवेदनशील किंवा मुलांनी पाहू नये अशा प्रकारचा अडल्ट कंटेंट असतो. त्यामुळे मुलांच्या भावना नको त्या वयात उद्दीपित होतात, मुले भरकटतात आणि अभ्यासापासून दूर जातात.

या खेळामुळे मुलांचे आर्थिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रकारचे नुकसान होत असते. मोबाईलकडे सतत टक लावून बघत राहिल्यामुळे डोळ्यांचे विकार होतात, सतत एकाच जागी बसून राहिल्यामुळे आणि शारीरिक हालचालीचा अभाव असल्यामुळे लठ्ठपणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढते. या ऑनलाईन गेम्स चा अतिवापर मानसिक आरोग्य बिघडवणारा सुद्धा ठरतो. चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव, अभ्यासातील रुची कमी होणे आणि हिंसक प्रवृत्ती वाढणे यासारखे दुष्परिणाम होतात. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते तसेच संवेदनशील किंवा गोपनीय माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागल्यास ते त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते.

एक काळ असा होता की मुले ग्राउंडवर खेळण्यात रमून जात. निरनिराळे मैदानी खेळ खेळत. बऱ्याच वेळा पालकांना त्यांना ओढून आणावे लागत असे. पण आता मात्र ते व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाइन गेम्समध्ये एवढे अडकले आहेत की त्यातून त्यांना बाहेर काढणे आणि पुन्हा मैदानी खेळांकडे वळवणे कठीण झाले आहे.

याचा अर्थ मुलांनी ऑनलाईन गेम्स खेळूच नयेत असा नाही. पण त्यांना स्क्रीन टाईम ठरवून द्यावा. अनेक देशांमध्ये मुलांच्या मोबाईल वापरावर आणि इंटरनेटच्या वापरावर कठोर बंधने आहेत. अमेरिकेसारख्या देशात सहा ते बारा वयोगटातील मुलांना फक्त एक तास मोबाईलवरील गेम्स खेळण्याची तर सहा वर्षाखालील मुलांना फक्त अर्धा तास गेम्स खेळण्यासाठी परवानगी आहे.

या सगळ्यात पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांसाठी वेळ तर द्यायलाच हवा परंतु त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधायला हवा. ऑनलाइन फसवणूक कशी होऊ शकते आणि त्यातील धोके कोणकोणते आहेत याची माहिती त्यांना द्यायला हवी. आणि यदाकदाचित त्यांच्याकडून एखादी चूक झाली तरी त्यांना न रागावता त्यातून बाहेर कसे काढता येईल यासाठी डोके शांत ठेवून मार्गदर्शन करायला हवे.

शक्य झाल्यास त्यांना स्वतः मैदानावर घेऊन जावे. मुलांच्या गर्दीने जर मैदानी गजबजली तर रुग्णालयातील गर्दी कमी होईल हे लक्षात ठेवावे आणि त्यांना पटवून द्यावे. मैदानावरील खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक निकोप वाढ होते, त्यांची शक्ती वाढते, एकाग्रता वाढते, नेतृत्व गुणांचा विकास होतो हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. एकदा मुलांना त्याची आवड लागली की मग मुले स्वतःहूनच मैदानावर खेळायला पसंती देतील.

मुलांचा मोबाईल एकदम काढून घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने त्यांना त्याच्याशिवाय राहण्याची सवय लावा. त्याने तुमचे ऐकल्यानंतर त्याला छोटेसे बक्षीस द्या किंवा त्याचे कौतुक करा. जेवणाच्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या खोलीत मोबाईल घेऊन जाऊ देऊ नका. त्याचप्रमाणे मुलांना गाणी म्हणणे, चित्रे काढणे, वाचन करणे, बागकाम करणे यासारख्या गोष्टींची आवड लावता येईल. पण त्यासाठी पालकांना देखील स्वतःचे काम किंवा मोबाईल बाजूला ठेवून मुलांसाठी वेळ द्यावा लागेल. तरच भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फॅशनची हुडहुडी…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फॅशनची हुडहुडी” ☆ श्री सुधीर करंदीकर

गेल्या आठवड्यात प्रभात रोडला बायकोच्या दातांचं दाखवायला डेंटिस्टकडे जात होतो. सकाळचे ९ – ९. ३० वाजले असतील. थंडीचा महिना असल्यामुळे, चांगलीच थंडी होती. स्कुटरवर जायचं, म्हणून आम्ही स्कार्फ – स्वेटर अशा तयारीनीच निघालो होतो. संध्या रस्त्यावर ट्रॅफिक इतका फास्ट असतो, की, बाजूनी कोण जातोय, समोर कोण जातोय, हे बघताच येत नाही. आणि बायको मागे बसलेली असेल, तर, काही बघण्यासारखं असलं, तरी ते बघता येत नाही, किंवा मी काहीच बघत नाही, असंच दाखवावं लागतं. लॉ कॉलेज रोड ला लाल सिग्नल लागल्यामुळे ट्रॅफिक स्लो झाला.

माझ्या समोर एक मोटर सायकल होती. मागच्या सीटवर दोन्हीकडे पाय टाकून, साधारण ४ – ५ वर्षाची छोटी मुलगी बसली होती, आणि थंडीमुळे ती चक्क कुडकुडत होती. गाडी चालवणारी व्यक्ती बहुदा तिचे वडील असावेत. त्यांनी व्यवस्थित कोट घातला होता. कारण बाईक आणि थंडी, म्हणजे कोट पाहिजेच. कोटाची उब घेण्याकरता मागे बसलेली छोटी मुलगी त्यांना बिलगून बसायचा प्रयन्त करत होती. पण वडीलांच्या पोटाचा घेर बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे, तिला ते जमत नव्हते आणि त्यामुळे तिला उब घेता येत नव्हती. आपोआपच माझं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं. बघितलं, तर तिच्या अंगात फॅशनेबल असा अगदी पातळ कापडाचा फ्रॉक होता. मध्यंतरी स्लीव्ह लेस ची फॅशन होती, आणि आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे शोल्डरलेस ची फॅशन आहे. तसाच काहीसा शोल्डरलेस आणि नो बॅक चा तिचा फ्रॉक होता. थंडी असूनही पायात सलवार किंवा फुलपॅन्ट नव्हती, पाय उघडेच होते. पायात मात्र फ्रॉक ला मॅचिंग बूट आणि मोजे होते. साहजिकच नवल वाटलं, की, एवढ्या थंडीत असे कपडे का घातले असावेत! बिचारीला थंडीमुळे हुडहुडी भरली होती. एक उत्सुकता म्हणून, मी ही शंका मागे बसलेल्या बायकोला विचारली.

बायकोकडून स्टॅंडर्ड उत्तर आलं, “तिचे वडील आहेत ना बरोबर! तुम्ही समोर बघून आपली गाडी चालवा”.

कालचं आपण पेपरमध्ये वाचलं, अपघात टाळायचे असतील तर, “एका वेळेस एकच काम करा / गाडी चालवत असाल, तर इकडे तिकडे स्वैर पाहू नका / गाडी चालवत असाल, तर मोबाईल वर बोलू नका, आणि मोबाईलवर बोलत असाल, तर त्यावेळेस गाडी चालवू नका”.

आणि याउपर तुम्हाला बघायचच् असेल, तर इथे कोपऱ्या कोपऱ्या वर छोटी छोटी मंदिरे आहेत, ती बघा.

मी सवयीप्रमाणे “थँक यु” म्हणालो.

सिग्नल जवळ समोरची बाईक थांबली. मी पण बाजूलाच थांबलो. बाईकवर माणसाच्या समोर त्यांचा मुलगा बसला होता. तो मात्र कपड्यांमध्ये पूर्ण पॅक होता. फुल पॅन्ट, अंगात स्वेटर, डोक्यावर कॅप वगैरे. त्या माणसाला उपदेश करण्यात काहीच पॉईंट नव्हता. आणि, तसही म्हणतातच, की, सिनियर सिटीझन झाल्यानंतर कुणालाही उपदेश करू नये. एकतर उपदेश ऐकायला कुणाला वेळ नसतो, उपदेश ऐकण्याच्या कुणी मनस्थितीत नसतो, आणि तिसरं म्हणजे, देणाऱ्याचा उपदेश आऊटडेटेड पण असू शकतो. अगदीच राहवत नसेल, तर फक्त स्वतः ला उपदेश करावा, किंवा तो डायरीमध्ये लिहावा.

थियरी कितीही छान असली, तरी, “दिल है के मानता नही”, असे प्रत्येकाचेच होते. विचार केला, की, सेफ्टीबद्दल तरी त्यांना सांगायलाच पाहिजे. अनायसे त्यांची गाडी शेजारीच होती.

मी : दादा, मागे मुलीला नीट धरता येत नाही आहे, मधून मधून मागे लक्ष ठेवा.

त्यांनी हो – हो म्हणत मान माझ्याकडे वळवली. आणि लक्षात आलं, की, हा तर मित्राचा मुलगा! त्यानी पण मला ओळखलं आणि नमस्कार केला. माझ्यामधलं उपदेशाचं मशीन आपोआपच सुरु झालं.

मी : अरे, ती थंडीनी कुडकुडतेय. स्वेटर विसरला का आणायला? आणि पायात पण काही नाही.

मुलीचे वडील : काका, स्वेटर कसा विसरेन? बाबा पण मागे लागले होते, तिला स्वेटर घाल म्हणून. पण बायकांना पटलं पाहिजे ना! त्यांच्या फॅशन मध्ये स्वेटर बसत नाही. एका लग्नाला चाललोय. बायको पाहुण्यांबरोबर रिक्षानी येते आहे. लग्नात सगळे मुलीच्या ड्रेस चे कौतुक करतील, म्हणजेच बायकोच्या सिलेक्शन चं कौतुक होईल. ड्रेस कुठे घेतला? कधी घेतला? केवढ्याचा आहे? हीला खूपच गोड दिसतोय! तुझ्या साडीला अगदी मॅच होतोय, वगैरे, वगैरे.

खास लग्नाकरता कालच हा ड्रेस आणलाय. आणि तिथे बदलायला असेच अजून दोन ड्रेस बरोबर घेतले आहेत.

तेवढ्यात आसपासच्या गाड्या सुटायला लागल्या, त्यावरून समजले, की, लाल दिव्याची वेळ संपत आली आहे. ५ -६ सेकंद शिल्लक असले, तरी, लोक आजूबाजूचा अंदाज घेत, सुटतातच. आमचे अच्छा – बाय झाले. हिरवा दिवा लागला आणि आम्ही पण सुटलो. तो यंगस्टर च्या स्पीडनी निघाला आणि मी सिनियर सिटीझन च्या स्पीडनी निघालो.

 बायकोनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, मी रस्त्याच्या कोपऱ्यावर कुठे देऊळ दिसते कां? ते बघायला लागलो. आणि सिग्नल क्रॉस केल्यावर, लगेचच डावीकडे छोटे मंदीर दिसले.

 मी स्कुटर साईडला थांबवून, दोन मिनिटात येतो, असे बायकोला सांगून, मंदिराजवळ गेलो.

देवासमोर हात जोडून, “धन्यवाद, थँक्यू” असं म्हणालो.

देवाचे डोळे थोडे किलकिले झाल्यासारखे वाटले, आणि ऐकू आलं, “कशाबद्दल”?

मी : वर्षाच्या १२ महिन्यांमध्ये, तू ४ महिने उन्हाळा तयार केला, त्याबद्दल. आयांच्या फॅशन पायी छोट्या मुलींना वर्षांमधले तेवढे ४ महिने तरी थंडीची हुडहुडी भरत नाही.

देवानी डोळे पुन्हा किलकिले केले आणि ऐकू आले, “वेलकम”.

देवासमोर मी पुन्हा हात जोडले, आणि निघालो.

पेपरमध्ये वाचल्याप्रमाणे, ‘एका वेळेस एकच काम / गाडी चालवत असाल तर, इकडे तिकडे स्वैर पाहू नका / गाडी चालवत असाल, तर मोबाईल वर बोलू नका, आणि मोबाईलवर बोलत असाल, तर त्यावेळेस गाडी चालवू नका’, या मंत्रांची मी मनामधे उजळणी केली, आणि आता हे तंतोतंत पळायचेच, असे मनात ठरवून, मी गाडी सुरु केली.

तसं म्हटलं, तर स्त्रियांमध्ये फॅशन ची क्रेझ आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. पण तेव्हा रंगसंगती, कलाकुसर यावर भर असायचा. नंतर पाश्चिमात्यांची फॅशन सिनेमावाल्यांनी नट – नट्यांमध्ये आणली. पण ती बऱ्यापैकी सिनेमागृहात सीमित असायची. टीव्ही चा जमाना आला, घराघरात टीव्ही पोहोचला. जाहिराती वाढल्या, शोज वाढले, आणि फॅशन मधे अंग प्रदर्शनाचं विषारी बी, बेमालूमपणे, कसं आणि कुणी पेरलं, हे समजलंच नाही. टीव्ही मधली अंगप्रदर्शनाची फॅशन आता घराघरात अवतरली. आता अंगप्रदर्शन म्हणजेच फॅशन, हेच समीकरण झाले आहे. सध्या स्त्री सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामध्ये या आधुनिक फॅशन चा पण मोठा वाटा असणारच!

ग्लॅमर च्या दुनियेत अंगप्रदर्शन किती पुढे न्यायचं, हे प्रोड्युसर ठरवणार / ग्लॅमर आणि पैसा दिसत असला, तरी आपण अंगप्रदर्शन कुठे थांबवायचं, हे मॉडेल्स ठरवणार / आपण अनुकरणाची “री” कुठपर्यंत ओढायची, आपण कुठे डोळे बंद करायचे, हे मात्र आपल्याला ठरवायचे आहे, म्हणजेच, हा ज्याचा – त्याचा प्रश्न आहे.

पण एक मात्र नक्की – फॅशन मुळे हुडहुडी ही भरतेच – भरते!!

आयांची फॅशन – छोट्या मुलींना हुडहुडी, युवतींची फॅशन – पुरुष जातीला हुडहुडी (साधू – संतांना पण हुडहुडी भरल्याचं आपण वाचतोच), आणि स्त्रियांची फॅशन – नवऱ्यांना हुडहुडी, असंच म्हणावं लागेल!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विमानतळ…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “विमानतळ…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या राष्ट्र सेविका समितिच्या शाखेत खेळल्या जाणाऱ्या एका खेळाचे नाव आहे… ” विमानतळ” 

वेगळं वाटलं ना? सांगते कसा खेळला जातो ते..

सर्वांनी गोल करून उभ राहायचं. चारी कोपऱ्यात मातीतच गोल आखायचा. त्यांना चेन्नई, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशी नावं द्यायची. सर्वांनी घोषणा देत पळायचं.

“संघटन मे शक्ती है

शक्ती को बढाना है

हिंदुस्तान हमारा है “

जी खेळ घेणार असेल तिनी पाठ करून उभ रहायचं. काही वेळाने तिने शिट्टी वाजवली की ज्या विमान तळाजवळ तुम्ही उभ्या असाल… तिथे जाऊन उभ राहायचं. त्या उभ्या राहिल्या की नंतर खेळ घेणारीनी एका विमान तळाचं नाव घ्यायचं.

तिथे उभ्या असलेल्या सगळ्या जणी खेळातून बाद… कितीही नाही म्हटलं तरी पहिल्या फेरीत बाद झाल्यावर वाईट वाटतं..

परत दुसरा राउंड… सर्वजणी आऊट होईपर्यंत असा खेळ चालु ठेवायचा.

खेळाचे मर्म लक्षात आलं का?

– – सगळ्याजणी पळत होत्या. पण नेमकं ज्या विमानतळाचं नाव उच्चारलं त्या खेळातून बाद झाल्या.

आयुष्यात असंच अनपेक्षित पणे काहीही होऊ शकतं… त्याचा स्वीकार करायचा. सारखं गुडी गुडी, चांगलंच होईल का? तर नाही.. जगत असतानाही असे अचानक धक्के बसत असतात. त्यावेळी नाऊमेद व्हायचं नाही. असही घडतं.. ते पचवायची, त्याच्याशी सामना करायची… तुमची मानसिक तयारी असायला हवी..

हेच या खेळातून शिकवलं गेलं आहे. खेळातून बाद झालो हे सहजपणे घेत… बाहेर उभं राहून खेळणाऱ्यांना घोषणा देत प्रोत्साहन द्यायचे.

हा खेळ झाला की परत पुढचा खेळ खेळायला सुरुवात करायची…

दुसरा खेळ आहे अग्निकुंड..

यात गोल करून.. एकमेकींचे हात घट्ट धरून उभं राहायचं. मध्यभागी प्रतिकात्मक अग्निकुंड आहे. जोर लाऊन शेजारचीला त्यात ढकलायच. जिचा पाय उचलला जाईल.. जी गोलाच्या आत ढकलली जाईल.. ती या खेळातून बाहेर.. शेवटी दोघी राहिल्या की त्यांनी एकमेकींना ओढायचे… शेवटी त्यातली एक जण जिंकणार…

समोर संकट दिसतंय… कुणीतरी तुम्हाला त्यात ढकलतय.. त्या क्षणी तुम्ही सर्व शक्तीनिशी त्याला प्रतिकार करायचा. पाय घट्ट रोवून उभं राहायचं. अगदी ठामपणे…

एखादा मुद्दाम तुम्हाला त्रास देत असेल तर प्रतिकार हा केलाच पाहिजे.

अर्थात हे कोणीतरी शिकवलं तर हे जमेल. यष्टि प्रशिक्षणातून हेच तर समितित शिकवलं जातं. निरनिराळे व्यायाम प्रकार, खो खो, कबड्डी या सारखे खेळ घेतले जातात. शरीराला एक प्रकारची शिस्त लावली गेल्यामुळे शरीर कणखर बनते.

सध्या सोफ्यावर बसून मोबाईलवर तासन्तास खेळ खेळले जातात. त्यात जिंकलो, पॉईंट मिळाले तर ते कृत्रिम, आभासी असतात. प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग शून्य आहे.

शाखेत मैदानावरच्या मातीत खेळत असताना जोम, उत्साह, तरतरी, आत्मबल हे मिळत असते. त्यासाठीच तुम्ही राष्ट्र सेविका समितिच्या शाखेत या…

त्यासाठी कुठलीही फी नाही.. परीक्षा नाही.. इथे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागवले जाते.

नवीन ओळखी होतात. एकमेकांमध्ये आत्मीय भाव, स्नेह निर्माण होतो. इतर कुठेही शिकवले जात नाही… ते इथे शिकायला मिळते. देशभक्तीपर गीतं शिकवली जातात.

ती सर्वांबरोबर जोरकसपणे म्हणताना मनात उत्साह व चैतन्य येते.

” पुण्य भू: मातृभू हिंदू भूमी आपुली

स्वर्गतुल्य भासते आम्हास माय माऊली”

अशा आपल्या मायभूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी एक होऊया..

… आपण सध्याच्या जगात सजग.. सतर्क व्हायला हवे आहे.

… तर मग निश्चयाने उचला पाऊल…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares