मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “‘बीज’ पेरून गेलेले तुकोबाराय!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘बीज’ पेरून गेलेले तुकोबाराय!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांनी या जगास ‘आमुचा राम राम घ्यावा’ म्हणत दिलेल्या निरोपाच्या दिवसाचे स्मरण म्हणजे ‘श्री तुकाराम महाराज बीज’! 

तुकोबारायांच्या संदर्भात ‘बीज’ म्हणजे द्वितीया तिथी. यावर्षी हा दिवस ५ मार्च, २०२६ आहे. महाराष्ट्र वाड्मय हे अभंग आहे. कारण ते केवळ शाब्दिक रचनेपुरते जुळवलेले शब्द नसून प्रत्यक्ष जीवनाच्या अनुभवातून उमटलेले उदगार आहेत. कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव श्री माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, जगदगुरू श्री संत तुकोबारायांचा गाथा, समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचा दासबोध, भक्त शिरोमणी श्री नामदेव रायांचा गाथा, किंवा संत श्री एकनाथ महाराजांचे भागवत… किंवा अगदी अलीकडचे श्री गजानन विजय यांसारखे ग्रंथ शोधू पाहता असे कळते की… प्रत्येक वाचनाच्या वेळी वाचकांस काही तरी नवीन गवसत जाते… म्हणूनच पारायणाचे महत्त्व आहे! वर्तमानपत्रासारखे एकदा वाचले आणि झाले असे नाही… हे तर आपले भविष्यपत्रच आहे. जीवनातील प्रत्येक क्षणासाठी या वाड्मयात काही न काही आहे… अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत! 

श्री तुकोबारायांनी रचलेल्या हजारो रचनांपैकी आता केवळ ४४०० उपलब्ध आहेत, असे दिसते. यातही काही क्षेपक (म्हणजे इतरांनी आपल्या रचना श्री तुकोबारायांच्या म्हणून प्रचारात आणलेल्या) आहेत, असे अभ्यासक सांगतात. जवळपास प्रत्येक अभंगात आपणांस एखादा तरी नवा शब्द, नवा विचार आढळून येईल! 

सहज गंमत म्हणून सांगतो, एका व्यक्तीला एका व्यक्तीने श्री ज्ञानेश्वरी वाचावयास दिली. ती व्यक्ती त्या दिवसाचे वाचन संपले की पुढील वेळेस कुठून सुरुवात करावी हे लक्षात येण्यासाठी ग्रंथात बुक मार्क (दोरा) ठेवत. परंतु त्यांचा नातू ते घरात नसताना तो बुक मार्क अनावधानाने आधीच्या पानांत ठेवी. हे गृहस्थ तिथून वाचनास सुरुवात करीत. असे सलग काही दिवस झाले! ते एकेदिवशी म्हणाले… ओव्या छान आहेत… पण ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तेच पुन्हा पुन्हा लिहिले आहे! असो.

हे वाड्मय चिंतन करण्यासाठी असल्याने सतत नजरेखालून घालणे श्रेयस्कर असते. कुणी कितीही विद्वान असले तरी त्यांना वक्तृत्वात या संतांनी लिहून ठेवलेल्या ओव्यांचा, अभंगांचा, पदांचा, समासांचा संदर्भ, दाखला द्यावाच लागतो. ‘तुका म्हणे’ हे शब्द तर जणू एखाद्या विचाराला दिलेला भक्कम पुरावाच जणू. माउलींच्या ओव्या, समर्थांचे समास ज्याला अर्थासह तोंडपाठ असतील, त्याच्या मुखातून प्रत्यक्ष सरस्वतीच प्रवाहित होत राहते! महाराष्ट्रात होऊन गेलेले सर्व वक्ते याच अमोघ भांडवलाच्या आधारे श्रीमंत होऊ शकले. आचार्य प्र. के. अत्रे यांचा श्री तुकोबारायांच्या अभंगांचा गाढा व्यासंग होता. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वाणीत माऊली विराजमान असत. भारतरत्न लतादीदी, भारतरत्न भीमसेनजी जोशी, वाड्मय- ‘पुरुषोत्तम’ पु. ल. देशपांडे यांनी संतांचे शब्द मनापासून जनापर्यंत पोहोचवले… ते केवळ या शब्दांत सामर्थ्य होते म्हणूनच.

ज्ञानोबारायांनी आईसारखे कोमल शब्द लिहावेत आणि तुकोबारायांनी वरपांगी कडक बापासारखे शब्दांचे प्रहार करावेत… पण या मायबापांची माया एकाच जातीची! तुकोबाराय हाती वाग्बाण अर्थात शब्दांचे बाण घेऊनच फिरत तर कधी काठी पण ते केवळ ज्ञानदीप लावू जगी या विचाराने! स्वत: घेत असलेला आनंद इतरांनीही घ्यावा यासाठी तुकोबाराय… तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू… नका चरफडू घ्या रे तुम्ही! असे ज्यावेळी म्हणतात त्यावेळी हा आनंद इतरांनी घ्यावा असे त्यांना किती प्रकर्षाने वाटते, हे दिसून येते.

ज्ञानदेव पाया आणि तुकोबाराय कळस असं संत बहिणाबाईंनी प्रतिकात्मक म्हणून ठेवलेलं असलं तरी पाया दुय्यम आणि कळस सर्वोत्तम असा त्याचा अर्थ नाही. एखाद्या नदीचा उगम आणि तिचा प्रत्यक्ष विस्तार हे एकमेकांपासून वेगवेगळे करता येत नाहीत, किंवा त्यांची क्रमवारी लावता येत नाही.

श्रीमद भगवद्गीता नावाची सोन्याची जाडजूड वीट, तिच्यापासून घडवलेले देखणे अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी… गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी! तसं श्री संत तुकोबारायांचा गाथा म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्री ज्ञानेश्वरी यांतील अर्थांचा परिपाक. आणि तुकोबाराय याचे सारे श्रेय माऊलींना देतात! तुका म्हणे नेणो युक्तीचिया खोली… म्हणोनि ठेविली पायी डोई! तुकोबाराय स्वत:ला ‘पामर’ म्हणवून घेतात ते माऊलींच्या तुलनेमध्ये… इतरांच्या नव्हे. इतरांसाठी ते तुकोबाराय… तुकाराम महाराजच होते आणि आहेत. तुकोबा आणि भगवान विष्णू हे एकच आहेत, असे रामेश्वर भट यांनी म्हणले आहे… आणि हे रामेश्वर भटांसारख्या अधिकारी पुरुषाने म्हणले आहे, हे ध्यानात घेण्यासारखे आहे! 

इंद्रायणी देहूतून पुढे येते आणि माऊलींचे चरण स्पर्शून पुढे जाते. तुकोबाराय देहूतून पुढे वहात आले… ज्ञानोबारायांच्या चरणाशी नतमस्तक झाले आणि पुढे स्वत: प्रवाह बनून पुढे जात राहिले. जसं आपण पत्रावळीचा गठ्ठा उचलताना एक हात खालच्या पत्रावळीला आणि दुसरा हात वरच्या पत्रावळीला लावतो, तसंच ज्ञानेश्वरी आणि गाथा या अक्षर वाड्मयाबाबत म्हणता येईल. याचा अर्थ या गठ्ठ्यातील कोणतीही पत्रावळ दुय्यम आहे, असे मात्र अजिबात नाही. या गठ्ठ्यात असलेली प्रत्येक पत्रावळ ही ज्ञानाच्या, भक्तीच्या पदार्थांना योग्य ती जागा देत अभ्यासक, भाविकांस तृप्त करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगते.

संत देहाने जगातून गेले आहेत… पण जाताना विचारांचा वारसा देऊन गेले आहेत! जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांना त्यांच्या ३७७व्या बीजोस्त्वानिमित्त वंदन. त्यांनी पेरलेल्या बीजातून भक्तीचा, सदसदविवेकबुद्धीचा मळा फुलला आहे… आणि हीच महाराष्ट्राची खरी दौलत आहे! राम कृष्ण हरी!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्त्री म्हणजे…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्त्री म्हणजे…” ☆ संध्या बेडेकर ☆

स्त्री म्हणजे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचे Perfect combination आहे.

“26 th August” महिला समानता दिवस. ” अमेरिकेत ‘1893 ‘ साली सुरू झालेला हा दिवस तेथील महिलांना voting rights मिळावे, याकरिता सुरू झाला होता 1920 साली 26 th August. ला हा अधिकार त्यांना मिळाला. ••••

हा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. या आधी स्त्री ला, पुरुषांच्या बरोबरीने समान आदर, हक्क मिळावे. ही स्त्रियांची मागणी होती. या विचाराला चालना मिळाली. जनजागृती ची सुरुवात झाली होती. कोणत्याही चळवळीची सुरुवात होणे, हा नेहमीच एक महत्वाचा Turning Point असतो. ••••

आजची स्त्री याच चळवळीचा परिणाम आहे. •••

महिला आणि पुरुषांची तुलना करणे ही गोष्ट मला खूप आवडतं नाही. पटतही नाही. सृष्टी ने स्त्री व पुरुष दोघांची शारिरीक व मानसिक रचना खूप विचारपूर्वक केली आहे. ते एकमेकांचे पूरक आहेत. ••• दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ••• दोघे एकमेकांचे आधार आहेत. •••दोघांचे जन्मजात गुण मिळुनच प्रकृतीची /सृष्टीची काळजी घेण्यात ते समर्थ आहेत. •• त्यांच्यात स्पर्धा नसावी. ती एक टीम आहे. अशा अर्थाने घ्यावे. ••••

स्त्री प्रकृतीची ची अलौकिक अदभुत सर्वोत्तम कलाकृती आहे. ती जगाची ओळख आहे. ती नसेल तर संपूर्ण जगात काळोख आहे. •••

स्त्री पुर्वीपासून अशीच आहे. आपण इतिहासातील तिच्या पराक्रमाच्या, सहनशीलतेच्या, त्यागाच्या, गाथा ऐकलेल्या आहेत. आज जेव्हा तिला अधिकार मिळाले. स्वतंत्रता मिळाली. तेव्हा सामान्य स्त्री सुध्दा चौखटीतुन बाहेर पडली. ती मोकळी झाली. व्यक्त होऊ लागली. काळा बरोबर धावणे तिला जमू लागले. तिची उपस्थिती समाजात जाणवू लागली. तिच्या गुणांचा प्रभाव समाजात दिसू लागला. व समाजात त्यामुळे झालेला बदलही दिसू लागला. •••

स्त्री म्हणजे ‘शस्त्र ‘आणि ‘शास्त्र ‘ दोन्ही च perfect combination आहे. शौर्य आणि संस्कृती जपणारी, दोन्हीत प्रविण. आपल्या परिवाराची काळजी घेणारी. जीव ओवाळून टाकणारी स्त्री. जेंव्हा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, मग ती प्रतिष्ठा नवऱ्याची असो, नाही तर देशाची असो, ती आपले शौर्य दाखविण्यात मागे पूढे बघत नाही. •••

आजच्या स्त्रीने प्रगतीची तलवार कंबरेला खोचली आहे. आज ती गल्ली पासून दिल्ली पर्यंत पोहोचली आहे. एक पाउल घरात तर एक अंतराळात ठेवले आहे. •• ••••मंत्री बनून देश चालवते •••. टीचर बनून अंधार घालवते. •••आज ती पूढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सज्ज आहे. •••

** अनवाणी ते कॅटवॉक ** 

प्रत्येक क्षेत्रात तिने आपली योग्यता वेळोवेळी दाखवून, ती समानतेची अधिकारी आहे. हे सिद्ध केले आहे. आता समानतेचा प्रश्न उरतच नाही. •••

स्त्री व पुरुष जेव्हा एकमेकांना आधार देतात. एकमेकांबरोबर खंबीर पणे उभे राहतात, तेंव्हा दोघांची शक्ती द्विगुणित होते. ••••

– – ही आजच्या स्त्रीची एक सशक्त बाजू झाली. पण दुर्दैवाने तिची दुसरी बाजूही आहे. ती तेवढी सशक्त नाही खरं तर नाजूक च आहे. ••••

आजही आपण

“बेटी बचाव बेटी पढाव “.

“स्त्री भ्रूण हत्या ” “acid attack'” “बलात्कार ” सारख्या बातम्या वर्तमानपत्रात वाचतो. शंभर दीडशे वर्षांपूर्वी चालू झालेली चळवळ आज ही चालू ठेवायला हवी आहे. अजून ही उद्देश्य पूर्ण झालेला नाही. •••

आजही ‘स्त्री स्वतंत्रता ‘व ‘स्त्री सुरक्षा ‘ हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेतच. •••••

ही विकृती, असे मनोरुग्ण आजही स्त्रीचा आदर मान ठेवण्यात असमर्थ आहेत.

” महिला समानता ” आता ही चळवळ घरोघरी चालू ठेवायला हवी आहे. पण आजही मुलगा झाला तर कणभर का होईना, जास्त आनंद होतोच. ही विचारधारा बदलायला हवी. स्त्रियांच्या संबंधित नियम, कानून, शिक्षा जास्त कडक व्हायला हवी.. •••

प्रत्त्येक वर्षी या दिवसांचे celebration म्हणजे आजच्या परिस्थितीची चाचणी करणे व त्यात सुधारणा करणे होय. ••••

ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ••••

© संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नो कम्प्लेंट डे!…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “नो कम्प्लेंट डे! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

नो कम्प्लेंट डे!

‘जीवनात काहीही तक्रार नाही’ दिवस

हल्ली खूप सारे ‘डे’ साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे.

कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी टिचर्स डे, कधी चॉकलेट डे, कधी फ्रेन्डशिप डे तर कधी वुमन्स डे…

वर्षभरातील जवळपास प्रत्येक दिवस कुठल्यातरी ‘डे’साठी फिक्स केलेला आहे.

खरं तर आपल्याकडे म्हणजे भारतात अशा प्रकारचे ‘डे’ साजरे करण्याची आवश्यकताच नाही. कारण फक्त त्या ‘डे’च्या दिवशीच नाही, तर संपूर्ण वर्षभर आपण त्या सर्व लोकांचा सन्मान करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे…

आपल्याकडे खरी गरज आहे ती स्ट्रेस फ्री डे, नो चिडचीड डे, अ‍ॅप्रीशिएशन डे आणि नो कम्प्लेंट डे सारखे ‘डे’ साजरे करण्याची…

आपण आयुष्य आनंदाने जगतच नाही. कायम कसली तरी कम्प्लेंट करीत असतो. आज काय चहात साखरच कमी होती, भाजीत मीठच जास्त होतं, गाडीत पेट्रोलच नव्हतं, तिथे पंखाच नव्हता, त्याने मला विचारलंच नाही, मला बसायला खुर्चीच नव्हती, त्याने मला निमंत्रणच दिलं नाही, प्यायला थंडगार पाणीच नाही, पायात घालायला चांगले पॉलीश केलेले शूज नाहीत, चांगले कपडेच नाहीत, माझ्याजवळ अ‍ॅपलचा मोबाईलच नाही आणि बरंच काही… नुसती कम्प्लेंट, कम्प्लेंट आणि कम्प्लेंट!

अरे आपण कधी खूश राहणार? जे आहे त्यात खूश राहता येऊ शकत नाही काय?

एखादे दिवशी चहात साखर कमी झाली, म्हणून एवढी चिडचिड करायची काही आवश्यकता नाही. झाली तर झाली कमी साखर, कुणी मुद्दामहून तर असं करीत नाही ना.

आपणच आपलं निरीक्षण करू या की, आपण किती गोष्टीवर उगीचच चिडचिड करतो. दिवसभरात किती कम्प्लेंटस करत राहतो आणि ठरवून टाकू की किमान एक दिवस तरी ‘नो कम्प्लेंट डे’ साजरा करु या.

खरं तर एरवी हे ‘डे’ वर्षातून एकदाच असतात. आपण मात्र नो कम्प्लेंट डे अगोदर महिन्यातून एकदा मग आठवड्यातून एकदा आणि सवय झाल्यावर मग रोजच्या रोज साजरा करू या. बघा मजा येईल.

पण

कृपया या मेसेज बद्दल कुणी कम्प्लेंट करू नये.

★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाई खानोलकर ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ सावित्रीबाई खानोलकर ☆ शालिनी जोशी

(८ मार्च —- ‌महिला दिनानिमित्त, परदेशी असून भारतासाठी कार्य करणाऱ्या महिलांची ओळख –)

(साभार – यूट्यूब चैनल >> IMC Business Official)

जन्मभूमी निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नसते. तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपली कर्मभूमी आपण निवडू शकतो आणि आपल्या कर्माचा ठसा तिथे उमटवूं शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच सावित्रीबाई खानोलकर.

सावित्रीबाई म्हणजे एखाद्या मराठमोळ्या स्त्रीचे नाव वाटते. पण त्यांचे मूळचे नाव ‘इव्हा युओन लिंडा’. असे होते. जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंड मध्ये झाला. आई रशियन व वडील हंगेरीचे होते. आई लहानपणीच वारली. वडील समाजशास्त्राचे प्राध्यापक तसेच ग्रंथपालही होते. त्यामुळे इव्हाना लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून भारत व भारताचा इतिहास कळला. भारताविषयी ओढ निर्माण झाली.

मेजर विक्रम खानोलकर हे भारतीय लष्कर अधिकारी मुळचे महाराष्ट्रातील सावंतवाडीचे रहिवासी होते. रॉयल मिलिटरी अकॅडमी, सॅंडहस्ट येथे त्यांचे शिक्षण झाले. तेव्हा ते स्विझर्लंडला गेले असताना त्यांची व इव्हा यांची भेट झाली. १६ वर्षाची इव्हा २७ वर्षांच्या भारतीय तरुणांच्या प्रेमात पडली. आई-वडिलांचा विरोध पत्करून १९३२साली, आपल्या निर्णयावर ठाम असलेली ही मुलगी, भारतात आली. त्यावेळी त्या अठरा वर्षाच्या होत्या. २९ वर्षांच्या मेजर विक्रम यांचे बरोबर त्यांनी लग्न केले. हिंदू धर्म स्वीकारला. इव्हाच्या सावित्रीबाई खानोलकर झाल्या.

त्या पूर्णपणे बदलल्या. भारतीय संस्कृतीचा त्यांनी पूर्णपणे अंगिकार केला. साडी, कुंकू, साध्या चपला, शाकाहारी जेवण यांचा स्वीकार केला. भारतीय भाषा, वेद, उपनिषदे, संस्कृत काव्य यांचा अभ्यास सुरू केला. पाटणा विद्यापीठात प्रवेश घेतला व पदवी मिळवली. रामकृष्ण मिशनचा भाग बनल्या. चित्रकला, संगीत व नृत्याची आवड होती. त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी उस्ताद पंडित उदयशंकर यांची शिष्या झाल्या. हे सर्व करून ‘सेंटस् ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘संस्कृत डिक्शनरी ऑफ नेम्स’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. ती खूप गाजली. हिंदी, मराठी, संस्कृत बोलू शकत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यात त्या समरसून गेल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लगेचच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. देशाच्या शुरानी बलिदान केलं. तेव्हा युद्धात प्राण्याची आहुती देणाऱ्या वीरांच्या सन्मानार्थ नवीन पदकांची रचना करण्याचे काम मेजर जनरल हिरालाल अटल यांच्याकडे आले. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंची निवड केली. सावित्रीबाईंनी हे आव्हान स्वीकारले. भारतीय संस्कृती आणि वेद पुराणांच्या अभ्यासाचा उपयोग केला. काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पदकांची रचना मे. ज. अटल यांच्याकडे त्यांनी पाठवली. सर्वाना ती पसंत पडली. हे बनवत असताना इंद्राचे शस्त्र वज्राची प्रेरणा मिळाली. महर्षी दधिचीनी वृत्रासुराला मारण्यासाठी लागणारे अमोघ शस्त्र (वज्र) बनविता यावे म्हणून त्यांचे शरीर त्यागले होते. त्यांच्या अस्थी पासून बनवलेले वज्र हे समर्पणाचे प्रतीक. म्हणून परमवीर चक्राच्या मध्यभागी भारताची राजमुद्रा आणि त्या भोवती इंद्राच्या वज्राची चार चिन्हे कोरलेली आहेत. हे गोलाकार चिन्ह ३. ५ सेंटीमीटर व्यासाचे कास्य धातूचे आहे. दुसऱ्या बाजूला हिंदी व इंग्रजी मध्ये परमवीर चक्र असे कोरले आहे. या दोन शब्दांच्या मध्ये कमळ आहे. सैनिकाची शक्ती आणि बलिदान राष्ट्राचे रक्षण कसे करेल याचं ते चिन्ह म्हणजे प्रतीक. त्याग आणि शक्तीचे हे प्रतीक, यातून युगानुयुगे चालत आलेल्या संस्कृतीचा धागा मजबूत केला.

पहिलं परमवीर चक्र पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या मेजर सोमनाथ शर्मा यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हे मेजर शर्मा सावित्रीबाई खानोलकर यांची कन्या कुमुदिनी हिचे दिर होते. परमवीर चक्रा प्रमाणेच अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, वीरचक्र, शौर्यचक्र अशा प्रमुख चक्रांची रचना सावित्रीबाईंनी केली. ही देशाला त्यांनी दिलेली देणगी. त्यामुळे भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल.

१९२९ मध्ये किंग्स कमिशन मध्ये जॉईन झालेल्या खानवीलकरानी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम केले. पाच ऑगस्ट १९४९ रोजी दिल्ली क्षेत्राचे जी ओ सी नंतर १९५२ मध्ये कलकत्ता पायदळ तुकडीचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. ते कठोर, शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखले जात. पत्नीसह ट्रेन ने कलकत्त्याला परतत असताना २९ ऑगस्ट १९९२ रोजी सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर मेजर जनरल पदावर त्यांना बढती देण्यात आली. त्याना दोन मुली व एक मुलगा होता.

विक्रम खानवीलकरांच्या मृत्यू नंतर सावित्रीबाईंनी पूर्णपणे अध्यात्माला समर्पित केले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि निर्वासितांसाठी त्यांनी भरपूर काम केले. १९९० मध्ये त्यांचे निधन झाले. अशी ही निसर्गाची आवड असणारी, स्वित्झर्लंडची कन्या पूर्ण भारतीय होऊन राहिली. आपल्या कार्याने अजरामर झाली.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ३ – कंदील -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ३ – कंदील – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

परवा रस्त्याने जाताना एक सुंदर सजावट दिसली. बाहेर ओळीने कंदील लावलेले होते. ते बघून मी एकदम बालपणात पोहोचले. माझे बालपण ज्या ठिकाणी गेले त्या गावात वीज नव्हती. त्यामुळे हे कंदीलच सर्वत्र उजेड करायचे. अगदी रस्त्याने जाताना सुद्धा रस्ता दिसण्यासाठी हातात कंदील असायचा. कारण बंदिस्त काच असल्याने त्याला वाऱ्यापासून संरक्षण मिळायचे. आणि उजेड पडायचा. घरात तर प्रत्येक खोलीत असा कंदील असायचा. आणि तो भिंतीवर खुंटीला अडकवला की सगळ्या घरात उजेड पडायचा. ज्याला अंगणात जायचे असेल त्याने तो वरच्या कडीला धरून आपल्या सोबत घेऊन जायचा. आणि आपल्या पुरता अंधार गायब व्हायचा. मला तर खूप मज्जा वाटायची. तो उजेडाचा गोल आपल्या बरोबर प्रवास करायचा. आणि लांबून येणाऱ्याला माणूस दिसायचाच नाही. फक्त उजेड आपल्या दिशेने येताना दिसायचा.

हा कंदील घेताना घरातून बजावून सांगितले जायचे, “प्रभाकर कंदीलच घ्या”. काच नीट बघून घ्या. काच ओगले यांची असेल तोच घ्या. त्यातही दोन, तीन रंग मिळायचे. हा कंदील मिळायचे पुण्यात दत्ताच्या देवळा जवळ दुकान होते. तेथूनच आणा असेही सांगितले जायचे. घरात कंदील आला की मोठेच कौतुक वाटायचे. त्याला हळदी कुंकू लावले जायचे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले जायचे. दुपार नंतर तो कंदील घेऊन त्यात चपटी वात घातली जायची. आणि रॉकेल भरायचे. त्याच्या काचेच्या खालची किल्ली वर खाली करुन ती वात रॉकेल मध्ये भिजली आहे का बघितले जायचे. मग त्यावर काच चढवली जायची.

आणि कडेचा स्टॅन्ड (आम्ही त्याला घोडा म्हणत होतो) वर खाली करुन मगच ही कंदील उजळण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची.

दुसऱ्या दिवसा पासून संध्याकाळी कंदीलची काच साफ करणे हे जोखमीचे पण आवडते काम रोज करावे लागे. आणि ती काच चमकवण्या साठी आमच्या लहान मुलांची स्पर्धा लागायची. त्या साठी विविध प्रयोग चालायचे. नुसत्या मऊ कपड्याने काच पुसणे. चुलीतली राख चाळून त्याने काच घासणे. मऊ कापडाने पुसणे. पाणी व साबण याने साफ करणे. पण त्यात हातातून निसटून पडून फुटण्याचा धोका असे. अशा काचा चकचकित केल्या की आम्ही शेजारी ठेवून कोणाची काच जास्त स्वच्छ झाली याचे निरीक्षण करत असू. विशेष म्हणजे तो उजळलेला कंदील चुकून पडला तरी आग लागत नसे.

याच्या उजेडात घरातली कामे व्हायचीच पण आमचे भविष्य पण उजळत होते. हा कंदील मध्ये ठेवून त्याच्या भोवती मी व माझ्या मैत्रिणी अभ्यास करत होतो. कारण दिवसभर शाळा आणि रात्री अभ्यास करावा लागायचा.

त्या कंदीलाचा वरचा भाग गरम व्हायचा. आणि त्याच्या उष्णतेने माझे माथ्यावरचे केस कायम जळायचे. पण बुद्धी मात्र उजळायची आणि अभ्यासाचा उजेड डोक्यात पडायचा.

मी असा कंदील खूप वर्षे जपून ठेवला होता. आणि लाईट गेल्यावर मेणबत्ती ऐवजी त्याचा वापर करत होते. तो बघून शेजाऱ्यांना खूप आश्चर्य वाटायचे. आणि मुलाला आकर्षण वाटायचे.

नंतर सगळीकडे विजेचे खांब उभे राहिले. घरात बल्बचा उजेड पडला आणि अत्यावश्यक कंदील माळ्यावर रवाना झाला. पण त्याच्या आठवणी मात्र अजून मनात आहेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य??” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

“तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य?? ☆ श्री संभाजी बबन गायके 

तुम्हीच ठरवा – योग्य की अयोग्य??

स्वामी सामर्थ्यावर विश्वास नाही काय?

समाज जीवनास संतांचा मोठा आधार वाटतो. मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी समर्थ म्हणतात तेंव्हा भक्तास आपण सामर्थ्यशाली आहोत अशी भावना निर्माण होते आणि त्या आत्मविश्वासाने तो संसारातील समस्यांना सामोरा जातो.

स्वतः नामस्मरण करणं आणि तसं इतरांना करायला उद्युक्त करणं ही गोष्ट पुण्यप्रद आहे, हे खरेच आहे. पण… श्री स्वामी समर्थ असं facebook post वरील comment section मध्ये type कर… म्हणजे तुझ्या समस्या दूर होतील, तुला अमुक इतक्या तासांत, दिवसांत धनलाभ होईल असं सांगणं हे कितपत योग्य आहे?

 Comment मध्ये type केल्याने नामस्मरण होत असेलही पण धनलाभ मात्र page निर्मात्यास होत असावा! कारण अशी कित्येक pages दिसू लागली आहेत. येनकेन प्रकारे लोकांना comments करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. जाहिरातीमध्ये लोकांच्या मनातील विविध भावनांना हात घातला जातो. त्यात भीती, आमिष, स्वामित्व, अभिमान इत्यादी भावनांना आवाहन करून वस्तू खपवली जाते… उदाहरणार्थ हम… वाले हैं! सारखी जाहिरात! असो.

लिहा comment मध्ये स्वामी समर्थ इत्यादी इत्यादी मार्गाने स्वामींशी संबंधित संस्थांना पैसे मिळत असतील तर ते एकवेळ ठीक आहे. पण अधिकृत संस्था हा मार्ग अवलंबत असतील, असं वाटत नाही!

यातील काही pages वाल्यांचा हेतू निव्वळ स्वामी नामाचा प्रसार करणे असा शुद्ध असूही शकतो आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे!

पंढरपूर मधील एका प्रसिद्ध मठात रामनाम लिहिलेले कागद जमा करून घेतले जात. काही लोक घरी वहीत नाम लिहित असतात. देवाचे, संतांचे नाव मुखातून उच्चारले जाणे महत्वाचे आहे. मनातल्या मनात नामस्मरण सुद्धा – – 

संतोषी मातेची पत्रे पाठवा, बालाजी आणि अनेक स्थानिक देवतांच्या नागांची कथा असलेली hand bills छापून वितरीत करणे इत्यादी प्रकार अजूनही प्रौढ लोकांच्या लक्षात असतील.

स्वामी अशक्य ते शक्य करतात असा विश्वास असल्यास भक्तांना कुठेही ऑनलाईन जाण्याची गरज पडणार नाही… त्यापेक्षा स्वामींच्या मंदिरात त्यांच्या दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहून नामस्मरण करीत दर्शनाची प्रतीक्षा करणे केंव्हाही श्रेयस्कर आहे, असे वाटते. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(असे आर्थिक गणित सोडवण्यासाठी महत्त्वाची आर्थिक आणि सामाजिक संकल्पना समजून घेण्याची आवश्यकता आहे. या संकल्पनेचे निम्नलिखित मुख्य पैलू स्त्रीच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचे आहेत असे माझे मत आहे.) 

इथून पुढे – – 

मूल्य निर्मिती- संपत्ती फक्त एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत नाही. उद्योग, नाविन्य आणि गुंतवणुकीतून नवीन संपत्ती निर्माण होते, ज्यामुळे सर्वांचे जीवनमान सुधारू शकते. स्त्रियांचा स्वयंरोजगार म्हणजेच तिला स्वयंसिद्धा बनवण्याचा प्रयत्न वर निर्देशित तात्पुरत्या योजनांपेक्षा कित्येक पटीने महिलांचे कल्याण साधणारा आहे. म्हणजेच कुणाची भूक भागवण्यासाठी त्या व्यक्तीला एका वक्तासाठी मास्यांचे कालवण न देता त्या व्यक्तीला मासे पकडण्याकरता प्रवृत्त करा वे ही खरी व्यावहारिक दानशूर वृत्ती.

मानसिकता- श्रीमंत लोक संधी शोधतात, तर गरीब लोक केवळ कमावण्याचे साधन शोधतात. स्त्रीची सकारात्मक मानसिकता आणि आर्थिक साक्षरता तिला आपसूकच स्वःत्व शोधायला मदत करील.

शिक्षण आणि कौशल्य- महिलांना असे भाकड भत्ते देऊन परावलंबी आणि लाचार बनवण्यापेक्षा योग्य ते शिक्षण, कौशल्य प्रदान करणे आणि तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वार्थाने मदत करून स्वावलंबी बनवणे ही कायमस्वरूपी भाऊबीज देणेच योग्य नाही कां?

संधींची समानता- श्रीमंत लोक त्यांच्या पैशाचा वापर करून अधिक गुंतवणूक करतात, ज्यामुळे संपत्ती वाढते. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांना सारखी संधी दिल्यास, संपत्ती निर्माण करणे शक्य आहे. इथे पैशांचे डोंगर उभारणे हा उद्देश नसून स्त्रीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे हाच उद्देश आहे. एक उद्यमी स्त्री अनेक स्त्रियांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवू शकते.

 थोडक्यात, संपत्ती वर्धमान करणे ही काळाची गरज आहे आणि संपूर्ण समाजाच्या खऱ्याखुऱ्या प्रगतीचे लक्षण आहे, कारण अमक्याच्या खिशातून निधी घेत (तो आपणच देतोय असे भासवत) तमक्याला कांही क्षणांकरता आभासी श्रीमंत बनवण्याची कला मते उकळण्यापलीकडे कांहीही साध्य न करता केवळ समस्या हस्तांतरित करण्याचे उथळ साधन आहे.

एकत्रितपणे, जमेल तसे आंगिक, कार्यिक आणि सामाजिक ‘दान’ देणे म्हणजे लिंग समानता निर्माण करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे आणि नागरिक गटाचे कर्तव्य आहे. आपल्या देशाची लोकसंख्या बघता सरकारी आणि गैरसरकारी यंत्रणा निश्चितच अपुऱ्या आहेत. एकच उदाहरण द्यायचे तर गरीब मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेणे, याला आपण खारीचा वाटा म्हणू या. पण दात्यांची संख्या असंख्य असेल तर हा स्त्री विकासाचा सेतू बांधणे शक्य आहे. मंडळी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या अवाढव्य लोकसंख्येबाबत सकारात्मक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन मांडला होता. ते म्हणत, “भारताची लोकसंख्या ही केवळ समस्या नसून ती एक शक्ती आणि संपत्ती देखील आहे. ” म्हणूनच आपल्या दात्यांचे संख्याबळ हीच आपली ताकद आहे. गरज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. आमच्या संकुलात ‘गूंज’ या संस्थेचे कार्यकर्ते वापरण्याजोगे जुने कपडे, भांडी, स्टेशनरी, पुस्तके इत्यादी सामान नेण्याकरिता ट्रक घेऊन येतात. दिवाळीच्या आधी या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि ट्रक काठोकाठ भरतो. गरजू व्यक्तींना या सामानाचे यथायोग्य वाटप केल्या जाते. हा अगदी लहानसा वाटणारा उपक्रम मुंबईतील कित्येक संकुलात राबवल्या जातो तेव्हा हा ज्ञानयज्ञ अतिव्यापक होतो.

रूढीवादी कल्पनांना छेद देत मुलीला मुलाइतकाच सकस आहार देणे, घरकामाची विभागणी करतांना किंवा आर्थिक पाठिंबा देतांना मुलांमध्ये लिंगभेद न करणे, मुलीचे लग्न ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच योग्य वयात करून देणे, या सारख्या गोष्टी स्वतःच्या कुटुंबापासून सुरु होतात. मुलगी सासरी गेल्यावर तिला योग्य ती वागणूक मिळाली नाही, हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी तिचा छळ होत असल्यास तिच्या माहेरच्यांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, यामुळे कित्येक हुंडाबळी टाळल्या जाऊ शकतील. आपल्या शेजारी किंवा जवळपासच्या कुटुंबात असे होत असेल तर “मला काय त्याचे? ” असा उपरा सवाल न करता समाजातील एक घटक या नात्याने या अन्यायाला वाचा फोडणे आपले कर्तव्य आहे.

एका मुद्द्याकडे आपले लक्ष वेधू इच्छिते. स्त्रियांची कार्यक्षेत्रे मर्यादित ठेवण्यात पारंपारिक दृष्टिकोन महत्वाची भूमिका बजावत आलेला आहे. मोजकी क्षेत्रे म्हणजे कार्यालयांतील किंवा हॉटेलातील रिसेप्शनिस्ट, दवाखान्यातील परिचारिका, विमानातील हवाईसुंदरी इत्यादी! मात्र आता ‘हे स्त्रियांचे, ते पुरुषांचे’ असा लिंगभेद नष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा कांही क्षेत्रांत स्त्रियांची अफाट गर्दी तर कांही क्षेत्रात पुरुषमंडळींची वानवा अशी परिस्थिती उद्भवू शकते. स्त्रीची कार्यक्षमता लक्षात घेता असा कुठलाच प्रांत नाही ज्यात ती आपला ठसा उमटवू शकत नाही, हे मर्यादित संख्येत कां होईना स्त्रियांनी दाखवून दिलेले आहे. यासाठी मुलींना मळलेल्या वाटा सोडून इतर क्षेत्रात शिक्षण घ्यावे लागेल. इथे ‘स्टेम’ (STEM- Science, Technology, Engineering, Maths) ही संकल्पना स्त्रियांना अफाट कार्यक्षेत्रे उपलब्ध करून देऊ शकते. ‘स्टेम’ मुख्यत्वेकरून अमेरिकेत २००० सालापासून अस्तित्वात आली, आपल्या देशात २०२० च्या “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या अंतर्गत या संकल्पनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या विषयी थोडक्यात सांगते.

या संकल्पनेचे निम्नलिखित घटक आहेत. कंसात संबंधित व्यवसायाची मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत.

  • विज्ञान आणि आरोग्यसेवा: नैसर्गिक जग समजून घेणे – (डेटा सायंटिस्ट, अनुवांशिक संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक.
  • तंत्रज्ञान: डिजिटल साधने आणि प्रणालींचा वापर- (सॉफ्टवेअर डेव्हलपर, एआय/मशीन लर्निंग इंजिनिअर, सायबरसुरक्षा विश्लेषक)
  • अभियांत्रिकी: डिझाइनिंग, बांधकाम आणि संबंधित समस्या सोडवणे- (एरोस्पेस, बायोमेडिकल, सिव्हिल आणि रोबोटिक्स अभियंता)
  • गणित आणि वित्त: डेटाचे विश्लेषण, संगणन आणि मॉडेलिंग- (अ‍ॅक्च्युअरी {विमा उतरवणा-या कंपनीकडे असलेला संख्याशास्त्रज्ञ}, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि आर्थिक विश्लेषक) 

कांही तज्ज्ञ मंडळी यांच्यासोबत कलाक्षेत्र देखील जोडून या संकल्पनेस STEAM (‘स्टीम’) असे संबोधतात. त्यात A म्हणजे आर्ट अर्थात अतिभव्य असे कलाक्षेत्र देखील समाविष्ट केले जाते. कलेचे प्रांगण अतिशय विस्तृत असून त्यात प्रामुख्याने सर्जनशीलतेस भरपूर वाव आहे. एआयच्या जगात या अभिनव सृजनाचे महत्व आपण सर्व जाणतो. किंबहुना अत्युच्य पातळीवरील सर्जन हेच मानवाचे मूल्याधारित अस्त्र आहे असे दिसते. म्हणून मला स्टेम ऐवजी स्टीम ही संकल्पना अधिक भावली. या अभिनव शैक्षणिक धोरणाचे महत्व जर समजून घ्यायचे असेल तर वर निर्देशित प्रमुख शाखांचे एकात्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. मंडळी, या योजनेतील आदर्शांनुसार अगदी केजीपासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत या संकल्पनेची व्याप्ती असायला हवी आणि त्यात प्रत्येक बालक आणि बालिकेला शिक्षणाचा समसमान अधिकार असावा. हा दृष्टिकोन केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रात्यक्षिके, समस्या निवारण आणि गंभीर विचार क्षमतेवर भर देतो. व्यावहारिक ज्ञान मिळवून देणारे हे शिक्षण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २१ व्या शतकातील व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध करून देईल अशी आशा आहे. यामुळे प्रत्येक व्यवसायात लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेच्या आधारावर मूल्यमापन होऊन स्त्रियांना आपसूकच प्रवेश घेता येईल.

नवीन कल्पनांवर काम आणि प्रयोग करण्याची संधी देणाऱ्या या पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांसाठी सक्षम बनवणे हा आहे. जेव्हा आपण कांही देतो, तेव्हा त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. स्त्री सक्षमीकरणाने निव्वळ तिचाच नव्हे तर सर्वांगाने राष्ट्राचा फायदा होणार आहे. “गिव्ह टू गेन” चा खरा आश्वासक संदेश हाच आहे. शिक्षित स्त्री ही एक सशक्त कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. यात चूल आणि मूलच्या पल्याड जाऊन ती जेथे पाऊल ठेवेल ते तिचे कार्यक्षेत्र असायला हवे. नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी तिची ऊर्जा कार्यान्वित व्हायला हवी. आधुनिक काळात विविध क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व वाढवणे आणि त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे हे लैंगिक समानता आणि शाश्वत प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या जगाचे रूपांतर करण्यासाठी आपल्याला जादूची गरज नाही. आपल्याला आवश्यक असलेली सर्व शक्ती आपण आधीच स्वतःमध्ये बाळगतो. “ 

 जे के रोलिंग

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मंडळी, हुताशनी पौर्णिमा. म्हणजेच होळी. परदेशात राहत असल्यापासून माझ्यासाठी या दिवसाचं महत्व फक्त पुरणपोळी खाण्याचा दिवस इतकंच आहे. कारण इथे काही मला होलिका दहन साजरे करता येत नाही आणि फारसे भारतीय नसल्याने रंगपंचमी सुद्धा साजरी होत नाही.

तर आज मी निगुतीने पुरण शिजवून साग्रसंगीत पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळी एका पोलिश मैत्रिणीला भेटायला जायचे होते. जाताना तिच्यासाठी म्हणून तीन – चार पुरणपोळ्या डब्यात घालून नेल्या. तिने पहिला घास खाताच मस्त म्हणून दाद दिली. मग कशापासून बनवल्या, कशा बनवल्या, आणि मग शेवटचा प्रश्न का बनवल्या? आज काय विशेष असे प्रश्न एकामागून एक सुरू झाले. तिला होळी(हिंदीमधली रंगांची “होली”) याबद्दल जुजबी माहिती होती. पण मग आपली होळी, होलिका दहन, रंगपंचमी या गोष्टी तिला सांगत असतानाच ती मला म्हणाली, तू माझी मस्करी तर करीत नाहीस. मी म्हणाले, नाही गं, असं का वाटलं पण तुला? तर तिने जे काही सांगितलं ते माझ्यासाठी पण अचंबित करणारं होतं. तुम्हाला ऐकायचंय? मग ऐका तर.

आपण आपल्या भारत देशात होळी, होलिका दहन किंवा रंगपंचमी म्हणून ज्या काही प्रथा साजऱ्या करतो त्या करणारा आपण भारत एकमेव देश नसून अनेक युरोपियन देशांमध्ये थोड्या फार फरकाने तशाच प्रथा साजऱ्या केल्या जातात. आपण जसे थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली की होळी पेटवतो तसेच हे देश त्यांच्या त्यांच्या हवामानानुसार थंडी संपून वसंताची चाहूल लागताच त्यांच्या त्यांच्या होळ्या पेटवून या प्रथा साजऱ्या करतात.

पोलंड मध्ये वसंत ऋतूचा पहिला दिवस आणि हिवाळ्याचा शेवटचा दिवस म्हणजेच २१ मार्च रोजी त्यांच्या पद्धतीची होळी साजरी केली जाते. ज्याला “तोपीयेन्ने माझान्ने” म्हणजेच “माझान्ना ला बुडवणे” असे म्हणतात. माझान्ना ही मृत्यू आणि हिवाळ्याची स्लाव्हिक देवी असून, तिचे प्रतिनिधित्व करणारा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्यापासून एक पुतळा बनवला जातो. त्याला स्त्रीचा वेश परिधान केला जातो, त्याची गावातून अंत्ययात्रा काढली जाते. नंतर सर्वजण मिळून त्यास पेटवून देतात आणि तो नदी, तलाव किंवा अन्य पाणवठ्यावर फेकून देतात. पोलिश लोकांच्या श्रद्धेनुसार हा विधी मृत्यूवरील विजय, हिवाळ्यातील काळोख्या दिवसांचा शेवट आणि निसर्गाच्या पुनर्जन्माचे प्रतीक आहे.

त्या नंतर काहीच दिवसात पोलंडमधील प्रमुख सण इस्टर येतो. ईस्टरच्या पवित्र सोमवारी पोलंडमध्ये “श्मीगुस डिंग्युस” नावाची प्रथा साजरी केली जाते जी आपल्या रंगपंचमीची आठवण करून देते. मात्र यात रंग न वापरता फक्त पाणी उडवून एकमेकांना भिजवले जाते. ईस्टरच्या काही दिवस आधी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी येतात. पाणी हे जीवनाचे प्रतीक मानले जात असल्याने, अश्या पद्धतीने पोलिश लोक हास्य आणि आनंदाच्या शिडकाव्याने (आणि भरपूर पाण्याने) वसंत ऋतूचे स्वागत करतात.

हे सगळं मैत्रिणीकडून ऐकल्यानंतर मी इतरही युरोपियन देशांमध्ये अशा काही परंपरा आहेत का याचा अभ्यास केला आणि मी थक्क झाले. त्यापैकी काही देशातील पद्धतींबद्दल मी तुम्हाला सांगते.

चेक रिपब्लिक: 

चेक रिपब्लिकमध्ये ३० एप्रिल रोजी ही होळीसदृश प्रथा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. या प्रथेचा मुख्य उद्देश हा वसंताचे स्वागत आणि हिवाळ्यातील चेटकीणी आणि अंधारातील दुष्ट आत्म्यांना पळवून लावणे हा आहे. चेक लोकांचं असं मानणं आहे की हिवाळा ऋतू हा चेटकिणींना (आणि इतर दुष्ट आत्म्यांना) शक्ती देतो आणि वसंत ऋतू सुरू होताच या चेटकीणी अस्वस्थ होतात आणि मग इतर दुष्ट आत्म्यांसोबत त्या मोठ्या पार्ट्या करतात ज्या थांबवाव्या लागतात.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की चेटकिणींची पार्टी थांबवायची कशी?

तर चेक लोक मोठ्या उद्यानात अथवा मोकळ्या मैदानात भल्यामोठ्या शेकोट्या पेटवतात आणि काड्या व पेंढ्यापासून बनवलेल्या एका चेटकीणीचा पुतळा त्या शेकोटीच्या टोकावर ठेवला जातो आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक म्हणून जाळला जातो.

आणि चेटकिणींना उष्णता आणि आगीचा तिटकारा असल्यामुळे त्या पुढील हिवाळ्यापर्यंत काढता पाय घेतात.

तसेच चेक लोक देखील पोलंडप्रमाणेच इस्टरच्या सोमवारी पाण्याची प्रथा साजरी करतात. मात्र येथे फक्त पुरुष त्यांच्या बायको अथवा प्रेयसीवर खेळकरपणे पाणी उडवतात. आणि त्यांना पाम झाडाच्या फांदीने हळुवार प्रतिकात्मक फटके मारतात. जे प्रजनन क्षमता, आरोग्य आणि तारुण्याचे प्रतीक आहे. ही परंपरा येत्या वर्षासाठी महिलांना सुंदर आणि निरोगी ठेवते असे मानले जाते.

जर्मनी: 

जर्मनीतील होळी ज्याला “वालपुरगिसनाख्त” असे म्हणतात, दरवर्षी ३० एप्रिलच्या रात्री सुरू होऊन १ मे रोजी संपणारा उत्सव आहे.

वालपुरगिस नाईट ही आठव्या शतकातील संत वालपुरगा हिच्यामुळे ओळखली जाते. ही संत वालपुरगाबाई ख्रिश्चन धर्माचा प्रसार, तसेच जादूटोण्याला दूर ठेवण्यात आणि विविध आजार बरे करण्याच्या तिच्या कथित गुणांसाठी ओळखली जाते. तिच्या निधनानंतर, जादूटोण्याला लांब ठेवण्यासाठी लोक तिची प्रार्थना करीत असत.

पूर्वीच्या काळी लोकांचा असा विश्वास होता की चेटकिणी आणि सैतान दरवर्षी ब्रोकेन पर्वतररांगातील हार्ज पर्वतांमध्ये वसंत ऋतूच्या स्वागतार्थ एकत्र येतात. तेथे ते नृत्य करतात आणि ख्रिश्चनांना हानी पोहोचवण्यासाठी कट रचतात.

म्हणून मग लोक डोंगराच्या कडेला मोठाली शेकोटी पेटवत आणि त्यात वाळलेल्या गवतापासून बनवलेल्या चेटकिणी सारख्या दिसणाऱ्या बाहुल्या फेकून देत. आणि चेटकिणींना घाबरवण्यासाठी मोठमोठाली भांडी वाजवून, कर्कश्श आवाजात गाणी म्हणून किंवा बोंब ठोकून शक्य तितका मोठा आवाज काढीत असत.

आजही ही वालपुर्गीस नाईट जर्मनीमध्ये हिवाळ्यातील दुष्ट अंधाऱ्या शक्तींना दूर ठेवण्यासाठी, मुख्यत्वे डोंगराळ प्रदेशात साजरी केली जाते.

स्लोवाकिया, हंगेरी: 

या देशातही जर्मनीप्रमाणेच ३० एप्रिल रोजी ही वालपुर्गीस नाईट साजरी केली जाते.

तसेच ईस्टरच्या पवित्र सोमवारी चेक रिपब्लिक सारखीच पाणीपंचमी खेळली जाते ज्यास “ओब्लिएवाचका” असे म्हटले जाते. मात्र यात शक्यतो बिनलग्नाच्या तरुण मुलींना तरुणांकडून थंडगार पाण्याने चिंब भिजवले जाते. असे करणे त्या मुलींसाठी चांगले आरोग्य, प्रजननशक्ती, आणि सौंदर्य घेऊन येते असे स्लोवाकियन लोक मानतात. आपल्याकडे देखील होळी अथवा रंगपंचमीला वृंदावनात गोप गोपिकांवर रंग उधळीत असत, नाही का?

स्कॅन्डिनेव्हिया:

कालांतराने जर्मनीमधून ही वालपुर्गीस नाईट ची प्रथा स्कॅन्डेनेव्हियन देशांमध्येही आली आणि आज या देशांतही मोठ्या प्रमाणावर ३० एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. स्वीडिश लोक एकत्र येऊन हिवाळ्यात वाळून पडलेल्या झाडाच्या फांद्या आणि वाळके गवत एकमेकांवर रचून खूप मोठ्या शेकोट्या पेटवतात, रात्रभर गाणी म्हणतात, शेकोटीत सॉसेजेस भाजून खातात आणि हिवाळ्यातील दुष्ट शक्तींना हाकलून लाऊन, वसंताचे जोरदार स्वागत करतात.

त्याचबरोबर २३ जून रोजी संध्याकाळी “संकथानसाफ्टेन” नावाचा एक होळीसारखाच सण नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंड मध्ये साजरा केला जातो. या दिवशी या देशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण, मोठ्या मोठ्या शेकोट्या पेटवल्या जातात. येथे अशी शेकोटी पेटवण्याची प्रथा पूर्व-ख्रिश्चन काळापासून आहे, जेव्हा लोक उन्हाळ्यातील दीर्घकाळ राहणाऱ्या सूर्याचा सन्मान करण्यासाठी ही प्रथा साजरी करीत असत. सूर्य म्हणजे जीवन, प्रजनन क्षमता आणि निसर्गाच्या शक्तीचे प्रतीक. तेव्हा अग्नीला प्रतीकात्मक आणि जादुई महत्त्व होते. अग्नी हा वाईट आत्म्यांना दूर करण्यासाठी, पिकांची भरभराट आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. स्कॅन्डेनेव्हियन लोकांचे असे म्हणणे होते की या विशिष्ट रात्री, चेटकिणी सक्रिय होतात आणि सैतानाला भेटण्यासाठी आणि वाईट कृत्य करण्यासाठी एकत्र येतात. शेकोटी पेटवणे हे या वाईट शक्तींना दूर ठेवण्याचा उपाय होता.

ग्रीस: 

ग्रीसमध्ये देखील वसंतादरम्यान ग्रीक पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्याला “बर्निंग ज्यूडा” असे नाव आहे. ज्युडा म्हणजेच यहूदी.

तर ही यहूदाला जाळण्याची प्रथा प्राचीन काळापासून ग्रीसमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. ग्रीक लोकांच्या मानण्यानुसार यहूदा हा येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक होता, ज्याने त्याचा विश्वासघात केला आणि त्याला क्रूसावर चढवले. ग्रीक इतिहासात, यहूदा विश्वासघात दर्शवितो आणि त्याचा पुतळा जाळण्याची प्रथा त्याच्या कृत्यांसाठी त्याला प्रतीकात्मक शिक्षा देण्याचा एक मार्ग आहे. आपण रावणदहन करतो साधारण काहीसं तसंच.

ईस्टरच्या पवित्र शनिवारी संध्याकाळी, गावातील रस्त्यांवरून एक मिरवणूक निघते, ज्यामध्ये यहूदाचा पुतळा घोड्यावरून नेण्यात येतो. नंतर हा पुतळा खांबावर टांगला जातो आणि त्याला आग लावली जाते. या मिरवणुकीदरम्यान लोक कर्कश्श आवाज काढतात. कधीकधी न आवडणाऱ्या राजकीय नेत्यांच्या नावाने बोंब सुद्धा ठोकतात. पुतळा जाळताच, फटाक्यांची आतषबाजी होते आणि लोक टाळ्यांच्या गजरात जल्लोष करतात. ही प्रथा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक गोष्टींचे स्वागत करण्याचा एक मार्ग आहे.

इटली:

इटालियन लोक मात्र त्यांची होळी एकदम स्टायलिश पद्धतीने साजरी करतात. विशेषतः इटलीमधील फ्लॉरेन्समध्ये हा उत्सव अगदी नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येतो. दरवर्षी इस्टरच्या पवित्र रविवारी अख्खे फ्लॉरेन्स शहर “स्कॉपियो डेल कॅरो”(“कार्टचा स्फोट”) नावाचा होळी सारखाच सण साजरा करण्यासाठी एकत्र जमते. या चमकदार देखाव्यामध्ये फटाक्यांनी भरलेली 30 फूट उंच अशी प्राचीन बैलगाडी असते.

ईस्टर प्रार्थने दरम्यान, कॅथेड्रलच्या आतून एक यांत्रिक कबुतर (ज्याला ‘कोलंबिना’ म्हणतात) बाहेरील बैलगाडीकडे तारेद्वारे सोडले जाते. हे कबुतर रॉकेट्सने भरलेले असते, आणि इटालियन लोक असे मानतात की ते पवित्र अग्नी घेऊन जाते. जेव्हा हे कबुतर गाडीवर आदळते तेव्हा गाडीत भरलेले फटाके जोरात फुटतात, ज्यामुळे एक नेत्रदीपक आतषबाजीचे प्रदर्शन होते.

इटालियन लोकांची अशीही श्रद्धा आहे की जर कबुतर यशस्वीरित्या गाडीवर आदळले आणि व्यवस्थित स्फोट होऊन आतिषबाजी झाली तर तो अतिशय शुभसंकेत मानला जातो, जो चांगले पीक, शांती आणि भरभराट घेऊन येतो.

स्वित्झर्लंड: 

येथील होळीसमान प्रथा थोडी मजेदार असते. त्याला “झेक्सएहलाऊतेन” असे नाव आहे. तो एप्रिल महिन्यातील तिसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. यामध्ये कापूस आणि लोकरीपासून एक मोठा बूग नावाचा स्नोमॅन बनवला जातो. आणि मोठ्या शेकोटीच्या टोकावर उभा करून तो बरोब्बर संध्याकाळी ६ च्या ठोक्याला जाळून टाकला जातो. हा स्नोमॅन हिवाळा आणि थंडीचे प्रतीक मानला जातो. आग लागल्यानंतर जितका लवकर हा स्नोमॅन पेट घेईल तितका उन्हाळा ऊबदार आणि सुखकर होईल असे मानतात. आणि हळू पेट घेणारा स्नोमॅन पावसाळी आणि गारठा असणारच उन्हाळा सूचित करतो.

आता बरोबर ६ च का? तर एरवी तिथे कामगार दररोज ५ वाजेपर्यंत काम करतात, पण एकदा डे लाईट सेव्हिंग सुरू झालं की ते रोज ६ वाजेपर्यंत काम करू लागतात.

तर मंडळी, आहे की नाही नवल? मला तर हे सगळं वाचून कुठेतरी प्रत्येक धर्मातील पाळेमुळे एकमेकांशी जोडलेली आहेत याचा पक्का विश्वास वाटतो. आपली होलिका राक्षसी असो, पोलंडची मार्झन्ना असो, हिवाळी चेटकीणी असोत, ज्युडा असो किंवा मग हिवाळ्याचे प्रतीक बूग स्नोमॅन असो, सगळ्यांचा उद्देश एकच, अंधाऱ्या कडाक्याच्या दिवसांवर मात करून, नवीन प्रकाशमय ऋतूची चाहूल माणसाला पुन्हा एकदा आयुष्य पूर्ण उत्साहाने जगण्यासाठी सज्ज करते, सकारात्मक ऊर्जा देते आणि पुन्हा एकदा निसर्ग नितांतसुंदर असण्याची प्रचिती आणते. हो की नाही?

तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या देशातील निराळी होळी माहित असल्यास मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं का.

लेखिका : अवनी दाते – पोलंडकर

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “परतफेड…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

परतफेड…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता. तेव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. जिवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकून त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीचं काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदलीमध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्रचंड आटापिटा करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.

दुसऱ्या दिवशी लवजम्यासहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गीमधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्याच्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकऱ्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देण्याकरता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थिकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.

त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत आला. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याकडे चौकशी केली की हा कोणत्या इयत्तेत शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं. त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.

त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंडच्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळलं की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे. त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षणदेखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.

ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता. आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणारे सर्व डॉक्टर, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसीमुळेच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.

बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धनिकाच्या त्याच मुलाचा जीव वाचवला होता. हा कुठेतरी प्रामाणिकपणाने, कृतज्ञ पणाने स्वतःच्या मुलाला वाचवल्याची परतफेड करण्याकरता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.

आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो.

तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल, तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, पेनिसिलीन.

म्हणून इतरांना मदत करा. नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी. आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातूनच नवीन काहीतरी निर्माण होत असते.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘रंग… नको बेरंग..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘रंग… नको बेरंग..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

होळी व धूलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा! 

या शुभेच्छा देताना ‘यंत्रदास’ आम्हाला सुरक्षिततेच्या काही सूचनाही आवर्जून देतो. सणाच्या रंगांचा बेरंग होऊ नये म्हणून या सूचनांचे पालन करावे आणि सणाचा आनंद लुटावा अशी त्याची आग्रहाची विनंती आहे.

‘श्री सुरक्षितताबोध’ या ग्रंथाच्या ‘बालक्रीडनसुरक्षिततानाम’ अध्याय ५.  श्लोक १२ ते १४ मधे यंत्रदास सांगतोय.

 *

आहा.  बाळके खेळतीं रंग होळी

जळीं लोळतीं (लावुनी भांग गोळी?)

फुगे फोडितीं.  फेकितीं रंग नाना

सिनेमानटासारखे छंद नाना ll१२ll

 *

किती रंग ते.  काय त्यांची झळाळीं!

तेलातले रंग.  ख्याती निराळी

निळे.  तांबडे.  पांढरे वा रुपेरी

जरा लागता… त्याहुनी मिर्चि बsरी! ll१३ll

 *

मना! ऐशिं होळी न केव्हाच खेळीं

(रहावे सुखे खाउनी फक्त पोळी!)

असे रंग ते भंगवीतीं शरीरा

तसा लागतो रे करावा खरारा ll१४ll

*

टीप:-

खरारा: घोड्याचे अंग स्वच्छ करण्याच्या क्रियेला ‘खरारा करणे’ म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणा-या बोथट दातेरी.  काटेरी पत्र्यालाही ‘खरारा’ म्हणतात.

यंत्रदास: ‘यंत्रदास’ या टोपण नावाने १९९३ साली ‘ श्रीसुरक्षिततोध ‘ नावाचा.  ‘सुरक्षितता’ (Safety ) या विषयावर मी लिहिलेला ग्रंथ पुण्याच्या ‘टेल्को’ – आताची ‘टाटा मोटर्स’ या कंपनीने प्रकाशित केला होता. ‘ सुरक्षिततेविषयी सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारा उत्कृष्ट ग्रंथ’ म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार देऊन या ग्रंथास सन्मानिले आहे.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares