मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

?मनमंजुषेतून ?

☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ढेबेवाडी! एक टुमदार लहानसं खेडं! त्या गावातील बस स्टॅण्ड जवळच एक लहानसं तळं होतं. पाऊस चांगला झाला तर ते थोडं तलावासारखं दिसे. एरवी वर्षभर  ते  डबकं असे. या तळ्याच्या काठावर मोठे मोठे खडक होते. जवळच एक वडाचं झाड होतं. पंचायतीच्या मदतीने झाडाभोवती एक पार बांधला होता.झाडाची सावली खडकांच्या काही भागांवर पडत असे.झाडाच्या चारी बाजूंनी पारंब्या लोंबत होत्या. सकाळी गावातल्या बायका धुणीभांडी करायला येत. संध्याकाळी पुरुष लोकांची बैठक असे पारावर.गावातल्या मुलांसाठी हे एक प्रकारचं जिमच होतं म्हणा ना!

आज ऊन्हाचा तडाखा काही वेगळाच होता. उन मी म्हणत होतं. झाडाचं एकही पान हलत नव्हतं. एस. टी स्टँड च्या पायऱ्यांवर बसलेला लंगडा भिकारी कुणीतरी दिलेला पावाचा कोरडाच तुकडा खात होता. खाऊन झाल्यावर त्यानं हात अंगातल्या घामानं भिजलेल्या कळकट्ट शर्टच्या बाहीला पुसला. त्याच हातानं त्यानं कपाळावरुन खाली ओघळलेला घामही पुसला. पावाचे कण त्याच्या घामानं चिकचिकलेल्या गालाला चिकटले.आता त्याला तहान लागली . शेजारी पायरीला टेकवून ऊभी केलेली काठी त्यानं उजव्या हातानं पकडली. लंगडत लंगडत काठी ओढत तो समोरच्या कोपऱ्यातल्या नळावर गेला.अशक्त , कृश, ऊजवा पाय वर करुन , काठी आधारासाठी काखेत धरून त्यानं तोटी फिरवली. किं. . ‌ . किं. . किं. . करत नळ उघडला.आपली हाताची ओंजळ तोल सावरत तोटीला लावली. ओणवा होऊन त्यानं तोंड ओंजळीपर्यंत नेलं. पाण्याचे काही थेंब त्याच्या हातावर सांडले. नळ भकास तोटी करून त्याच्या ओंजळीकडं कोरडाच बघत होता.आपलं तोंड ओंजळीला लावून ते थेंब तीर्था सारखे त्यानं चाटले. वडावरचे दोन कावळे कर्कश काकसूर लावत उडाले.धाडधाड आवाज करत दोनची एस. टी. स्टॅंडवर आली. त्या लाल डब्याच्या खिडकीच्या काचा खणखाण आवाज करत ओरडल्या. कंडक्टर धाडकन दार उघडून उतरला. त्यानं शिट्टी कर्कश्शवाणी वाजवून एस. टी. मागं घेतली. पुण्याच्या थांब्यावर आणून थांबवली. एस. टी च्या लाला पिवळ्या पत्र्यावर हातानं थाड थाड वाजवून ड्रायव्हरला ब्रेक लावायचा इशारा दिला.एस. टीनं मागच्या धुराड्यातून काळा गरम धूर सोडला. भस्स भस्स आवाज करत , श्वास टाकत तिचा वरखाली होणारा ऊर हळूहळू शांत झाला. ड्रायव्हरनं त्याच्या सीटवरून खाली ऊडी मारली.त्याच्या बाजूचं अर्धं दार खाडकन उघडून थाडकन बंद केलं. खिडकीची आधीच खिळखिळी झालेली , तुटलेली काच आपलं अस्तित्व दाखवत आवाज करत खुडमुडली.

आपले नाकावर नसलेले मास्क कानाच्या खुंटीवरून काढून दोघं चहाच्या टपरीकडं वळले.

एवढा वेळ बाकड्यावर वाट बघत बसलेले सरपंच, उपसरपंच, कोरोनाची पुण्यातली ताजी खबर ऐकायला पोट आणि पोटावरून घसरणारी पॅंट सावरत टपरी कडं पळाले. लगोलग चार-पाच जणांचं टोळकं तयार झालं. कोरोनच्या बातम्या रंजकतेनं सांगितल्या जाऊ लागल्या. स्टार माझा किंवा आजतक पेक्षा जास्त रंजक, भडक, अतिरंजित आणि धडकी भरवणाऱ्या होत्या.

गण्या, परशा आणि वासू थोडा वेळ ऐकत थांबले.

नंतर ते तळ्याकडं गेले. पाण्यात पाय सोडून ते खडकावर बसले.

त्यांच्या गावात अजूनही कोरोनाचं पाऊल पडलं नव्हतं. पण सायन्सच्या मोघे सरांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. या महामारीचं गांभीर्य त्यांना समजलं होतं. ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू, ऑक्सिजन गळती, हॉस्पिटलमध्ये सातत्यानं होरपळणारे पेशंटस्. बातम्या ऐकून आज त्यांचा सूर पारंब्या चा खेळ थांबला होता. पाण्यात भाकरी ऊठत नव्हत्या. लहान लहान पावलं स्थिर होती. पाण्यात हलवून लाटांचा आवाज सुध्दा करत नव्हती.

वासूचा चेहरा खूपच गंभीर झाला होता.

तो म्हणाला, “काहीतरी करायला पाहिजे गड्या.”

परशा, जा बर, आपल्या सगळ्या दोस्तांना बोलव इकडं”

परशानं ओळखलं, वासूच्या डोक्यात काही तरी शिजतय. तो पळालाच. पळता पळता तो हाका मारत होता. “ए गंम्प्या, ए, मन्या या रे तळ्यावर.”

“अरे एक राजा चल की. वाश्या बोलवतोय बघ.”

थोड्याच वेळात वडाखाली वानरसेना जमली. सावल्या लांब होईपर्यंत चर्चा सुरू होती. टोळक नंतर मोघे सरांच्या घराकड गेलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठची गाडी गावच्या वेशीवर च आडवली गेली. वासू, गण्या, परशा बरोबर त्यांचे बरेच शाळासोबती रस्ता अडवून ऊभे होते. ड्रायव्हरला गाडी थांबवावीच लागली. कंडक्टर खाली उतरला. वासू त्याच्याशी काही बोलला. गाडी तून एक एक पॅसेंजर खाली उतरु लागले. गण्या थर्मल गन घेऊन ऊभा होता. परशा  प्रवाशांनी मास्क नीट घातलाय ना हे बघू लागला.

वासू प्रत्येकाच्या बोटाला oxymeter लावून बघत होता. राजा तेवढ्यात भाषण ठोकून कोरोनाच्या सोवळ्याचे नियम सांगू लागला.काही मुलांनी गावात, स्टॅंडवर, जिथं जमेल तिथं कोरोनात घेण्याच्या काळजी घे, नियमांचे फलक लावले.आख्ख्या ढेबेवाडीचा नूरच बदलला.सरपंचांनी चावडीवर मुलांना सहकार्य करण्याचं फर्मान  सोडलं.आजही उन्हाळा तोच होता. रखरख तशीच होती. स्टॅंडवर एस. टी तशीच खडखडाट करत येत होती. पण एक सूज्ञ विचारांचा वारा गावात गारवा पसरवत होता. तळ्यातलं पाणी लहान लहान लाटांतून हसत होतं.

वडाखाली गाय शांत झोपली होती. वडाच्या झाडाची हिरवी सळसळ वाऱ्याबरोबर आनंद तरंग पसरवत होती.

 

सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत~महाराष्ट्राची लोककला – पोवाडा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 

? सूरसंगत ?

☆ सूर संगत~महाराष्ट्राची लोककला – पोवाडा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार म्हणजे पोवाडा.

पोवाड्यांत तीन प्रकारची कवने आढळतात

  1. देवतांच्या अद्भूत लीलांचे वर्णन,तीर्थक्षेत्रांचे महात्म्य. – >> हे गायक गोंधळी म्हणून ओळखले जातात.
  2. राजे,सरदार,धनिक यांचे पराक्रम,वैभव,कर्तुत्व इत्यादीचा गौरव आणि त्यांची शौर्य गाथा! ->> ह्या प्रकारातील गायक मंडळीना भाट म्हटले जाते.
  3. लढाई,दंगा,दरोडा,दुष्काळ,पूर आदि घटनांचे रसभरीत निवेदन. ->> ह्या प्रकारातील गायक शाहीर या संज्ञेत मोडतात.

पोवाड्याचे कार्य काही अंशी आजच्या वर्तमानपत्रासारखे होते. घडलेल्या घटनांवर शाहीर लगेचच कवने रचीत आणि पोवाड्याच्या स्वरूपात सादर करीत असत.

पोवाड्याची रचना द्दृष्य वाक्यांची प्रवाही व स्वैर पद्यात्मक असते.बोली भाषेतील जिवंतपणा,ओघ आणि लय ह्यामुळे ती प्रभावी होते.

रचना करतांना लघु गुरू मात्रा मोजल्या जात नाहीत मात्र एकेक चरण चार किंवा आठ मात्रांच्या आवर्तनात गायले जातात.

वीरश्रीयुक्त असा हा गायनाचा प्रकार असल्यामुळे गायकाचा आवाज एकदम खडा,उमदा,टीपेचा असला तरच रसनिष्पत्ती होऊन श्रोतृवृंदात एकप्रकारचा आवेश निर्माण होतो.हा प्रकार गद्य आणि पद्यमिश्रित असल्यामुळे उच्चरवातील संवाद व दमदार गायन हे पोवाड्याचे वैशिष्ठ्य आहे.

शिवाजी, महाराष्ट्राचा जाणता राजा, सर्वांना आदरणीय, त्यामुळे शिवछत्रपतींचे अनेक पोवाडे सतराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत लिहीले गेले. १६८९ साली शाहीर अज्ञानदासाने जिजाऊंच्या आदेशावरून “अफझलखानाचा वध” हा पोवाडा रचला आणि २००९ साली मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटासाठी अफझलखानाचा वध हा पोवाडा लिहिला गेला.

पोवाड्याची भाषा कशी जळजळीत,तडफदार आणि रांगडी असते त्याचा हा नमूना.

“उठला अफझलखान

जिता जागता सैतान

शिवबाला टाकतो चिरडून?

महाराजांची कीर्ति बेफाम

भल्याभल्यांना फुटला घाम

अशा वाघिणीचा तो छावा

गनिमाला कसा ठेचावा”

तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सिंहगड, धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेले पोवाडे उपलब्ध आहेत.

राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी तानाजीच्या पोवाड्याप्रारंभी जे नमन गायले आहे ते पहा~~

“ओम् नमो श्रीजगदंबे

नमन तुज अंबे

करून प्रारंभे

डफावर थाप तुणतुण्या तान

शाहीर हा महाराष्ट्राचा प्रान

शिवरायाचे गातो गुनगान”

ह्यावरून शाहीराची भूमिका आपल्याला समजते.

डफ,ढोलकी,संबळ,झांजा ही तालवाद्ये तसेच तुणतुणे,पूंगी,घांगळी ही तंतूवाद्ये पोवाडा गाताना साथीला घेतली जातात.

पठ्ठे बापूराव,रामजोशी,कवी अनंतफंदी,होनाजी बाळा,प्रभाकर आणि अगदी आधुनिक काळात अमरशेख,शाहीर साबळे,विठ्ठल उमप इत्यादी शाहीरांची नावे आपल्याला परिचित आहेतच.

पठ्ठे बापूरावांनी मुंबईवर पोवाडा लिहिला होता आणि संगीत सौदागर छोटा गंधर्व यांनी तो गायला होता.

वाचकांसाठी काही पंक्ति देत आहे.

“मुंबई नगरी बडी बाका

जशी रावणाची दुसरी लंका

मुंबई नगरी सदा तरनी

व्यापार चाले मनभरनी”

शाहीर विठ्ठल उमप हे आंबेडकरवादी होते.त्यांनी त्यांच्या रचनांतून अनेक सामाजिक व मानवतावादी प्रश्न मांडले. ‘खंडोबाचं लगीन’,’गाढवाचं लग्न’,’जांभूळ आख्यान’ हे त्यांचे कार्यक्रम फार लोकप्रिय झाले आहेत.

महाराष्ट्राची ही लोककला म्हणजे नुसतेच लोकरंजन नसून समाजप्रबोधनही आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 94 ☆ आत्मसाक्षात्कार – भाग -1 ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 94☆

☆ आत्मसाक्षात्कार – भाग -1 ☆ 

आम्ही कुलिनांच्या कन्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात अखिल भारतीय महिला दिनाच्या निमित्ताने साहित्यदीप संस्थेचं  कवयित्री  संमेलन होतं, सूत्रसंचालन कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी करत होती.. मृणालिनी प्रत्येक कवयित्री ची ओळख करून देताना ज्येष्ठ कवयित्रींच्या कवितेतील ओळींचा आधार घेऊन त्या कवयित्रीच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत होती.

मृणालिनीची निवेदनाची ही पद्धत खुपच छान  होती, ती कवितेविषयी न बोलता  कवयित्री विषयी बोलत होती…..माझ्या विषयी बोलताना  ती म्हणाली, प्रभा ताईंना पाहून मला पद्मा गोळेंच्या ओळी  आठवतात, “आम्ही कुलिनांच्या कन्या, चाफेकळ्या पानाआड…….”

मी सुखावले आणि आयुष्याचं  सिंहावलोकन करू लागले….

माझा जन्म सधन शेतकरी-बागाईतदार कुटुंबातला शहाण्णव कुळी मराठा घराणं, आजोबांची पंचक्रोशीत पत प्रतिष्ठा होती. वडील वर्षानुवर्षे गावचे पोलिस पाटील होते. खरंतर आम्ही नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या वडनेर या गावचे वतनदार पण आजोबांची बहिण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या पिंपरी -वाघाळे या गावातील सरदार पवार यांची पत्नी, सरदार पवार देवास(म.प्र.) येथे वास्तव्य करून होते पण पतिनिधनानंतर आजोबांची बहिण (आम्ही त्यांना मासाहेब म्हणत असू.) त्या त्यांच्या वतनाच्या जमीनी असलेल्या वाघाळे -पिंपरी या गावात आल्या, पवारांचे मामा म्हणून सगळे गाव आजोबांना मामा म्हणत असे. बहिणीच्या गावला आजोबांनी आपली कर्मभूमी मानली, तिथे स्वकष्टाने शेकडो एकर जमीन खरेदी करून तिथे फळांच्या बागा लावल्या. माझा जन्म झाला तो काळ खुप वैभवशाली, ऐश्वर्यसंपन्न काळ होता. आजोबांच्या तीन बहिणी देवास, बडोदा, सूरत येथे राजघराण्यातल्या सूना , माझ्या दोन आत्याही देवास व बडोदा येथील संस्थानिकांच्या घरातच नांदत होत्या.

जमीन जुमला, गाई म्हशी, घोडे, मोठा दगडीवाडा, नोकर चाकर अशा सरंजामशाही वातावरणातला माझा जन्म !त्या गावातला आमचा रूबाब काही वेगळाच होता….पण ते एक लहान  खेडेगाव असल्यामुळे चौथी पर्यंतच शाळा होती म्हणून आम्हा मुलांच्या शिक्षणासाठी माझी  आई माझ्या माँटेसरी पासून पुण्यात आम्हा सख्ख्या चुलत पाच भावंडांना घेऊन  बि-हाड करून राहिली होती.

आम्ही सुट्टीत गावाकडे जात असू, आमच्या वाड्याच्या शेजारी  एक गुजराती कुटुंब रहात होतं, त्यांचं किराणा मालाचं छोटसं दुकान होतं, त्या कुटुंबातल्या चंपा आणि शांतू या मुली वयाने माझ्या पेक्षा मोठ्या होत्या पण मी त्यांच्या घरी जात असे आणि त्या हंड्यावर हंडे घेऊन पाणी आणायला विहिरीवर जात त्याचं मला खुप कौतुक वाटत असे. त्या ओढ्यावर कपडे धुवायला चालल्या की मीही त्यांच्या बरोबर ओढ्यावर जाऊन पाण्यात खेळत असे, एकदा चंपा, शांतू बरोबर ओढ्यावर गेले असताना आमची मोलकरीण कमल मला बोलवायला आली, घरी आल्यावर आजीने समज दिली, “त्या चंपा शांतू बरोबर जात जाऊ नको, गावातले लोक नावं ठेवतील, मोठ्या घरची पोरगी ओढ्यावर हिंडती!”

मृणालिनी कानिटकर म्हटल्या प्रमाणेच, मी जन्माने कुलिनांच्या घरातली कन्या होते हे नक्की!

…….त्याचे फायदे तोटेही अनुभवले

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खरी श्रीमंती…भाग 1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?विविधा?

 ☆ खरी श्रीमंती…भाग 1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

खरी श्रीमंती म्हणजे मनाचे समाधान

श्रीमंतीचं दुसरं नाव म्हणजे समाधान होय.माझ्या मते ‘श्रीमंती’ ही फक्त बाह्यांगावरच अवलंबून नसून ती मनाच्या अंतरंगावर व मोठेपणावर जास्त अवलंबून आहे. घर,फर्निचर, भरपूर पैसा, इस्टेट, दागदागिने म्हणजे श्रीमंती का? आई-वडील, जेष्ठ मंडळींची हेडसाळ, भावंडामधे एकाच तोंड पुर्वेला तर दुसऱ्याचं पश्चिमेला अशी विरुद्ध परिस्थिती चालेल का? संस्कारहिन तरुण मंडळी चालतील का? घरात देवाची पूजा नाही,एकही सुंदर पुस्तक नाही. मग ते श्रीमंत कसे?या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सुज्ञ माणूस नकारार्थीच देईल हे निश्चित. याचा अर्थ श्रीमंती ही पैशांशी निगडीत नसून ती व्यक्तीच्या मनाशी निगडीत आहे. माणूस पैशांपेक्षा मनाने/विचाराने श्रीमंत हवा त्याचे जगणे सुसंस्कारित हवे. संस्कृतीचा सन्मान करणारे हवे. घाम व श्रम यांची पुजा करणारा माणूस खरा श्रीमंत असे माझे मत आहे.

षडरिपुंना थारा नसणाऱ्या मोठ्या मनाच्या माणसाचे आचरण शुद्ध असते. तेथे व्यसनांना थारा नसतो. माणसाच्या घरात व मनात पवित्र देवघर हवे. त्याचबरोबर सुसंस्कारासाठी ग्रंथ व त्या ग्रंथाचे सार जाणणारा माणूसही घरात हवा. नुकताच अर्थ प्राप्त असून उपयोग नाही तर तसे आचरणही हवे. श्रीमंतीचं दर्शन पवित्र वाटणे ती पाहून मनाला प्रसंनता वाटणे आवश्यक आहे. जिथे माणसामाणसातले संवाद हरवत चालले आहेत तेथे पैशांची श्रीमंती काय कामाची? आजच्या काळात समर्थपणे उत्तर द्यायला मनाच्या श्रीमंतीशिवाय दुसरा पर्याय नाही हेच खरे.

घरात रोज ताजी फुले/फळं असणं म्हणजे श्रीमंती. आज अवचित पाहुणा घरी आल्यावर त्याला मी पोटभर जेवू घालू शकलो आणि तो समाधानाने जेवला तर मी श्रीमंत होय. एखादी वस्तू, गोष्ट माझ्याकडे हवी त्यावेळी नक्की मिळणार हा विश्वास म्हणजे श्रीमंती. मदतीसाठी तेवढ्या विश्वसाने मित्राचा/नातेवाईकांचा फोन येणं याचाच अर्थ ती माझी श्रीमंती. कोण अडचणीत असेल तर त्याला आपली आठवण आली तर मी श्रीमंत.

भर उन्हात घराच्या अंगणात फुललेला गुलमोहोर/गार सावलीचा डेरेदार  व्रुक्ष दिसावा ही नजरेची श्रीमंती. एखाद्याच्या चांगल्या गुणांचे मनापासून कौतुक करणं, त्याला त्याची कला वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे ही उदार मनाची श्रीमंती. थंडीत अंगणभर बुचाची फुले पडावीत तर कधी प्राजक्ताच्या सड्याने अंगण व वातावरण भरून जावं ही खरी श्रीमंती.

होय मला अशीच श्रीमंती हवी.एखादी गोष्ट केल्यानंतर आठवण ठेवून एखाद्या विशिष्ठ व्यक्तिसाठी राखून ठेवणे व आठवणीने देणे ही वेगळीच श्रीमंती होय.एखादे सुंदर द्रुश्य किंवा भगवंताचे रुप पाहील्यावर त्याचे कवितेत, सुंदर शब्दात वर्णन करता येणे ही बुद्धिची श्रीमंती. यशाचा आनंद सर्वांनी एकत्र मिळून लुटणे हीसुद्धा श्रीमंतीचं. दुसऱ्याच्या आनंदात आपले दुःख बाजूला ठेवून विसरून त्यांचा आनंद द्विगुणित करणे ही श्रीमंती. दुःखी माणसाचे दुःख कमी करणे, श्रीमंताने गरीबांची गरीबी कमी करणे ही श्रीमंती. चांगल्या गोष्टींची योग्य पारख ही श्रीमंती.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

चक्रीवादळाच्या नावांचा रंजक इतिहास  – कॅटरिना, नर्गिस, नीलम, निलोफर अन् लैला… संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.

कॅटरिना, नर्गिस, निलोफर, लैला ही नावे आहेत चक्रीवादळाची. या चक्रीवादळांना अनेक मजेशीर नावे असून, त्यांचा इतिहासही रंजक आहे. किनारपट्टीवरच्या लोकांना वादळाचा धोका कळावा म्हणून अशी नावे देण्याचा ट्रेंड सुरू झाला. बंगालच्या उपसागरात येणार्‍या वादळाचे बारसे घालण्याचे काम पूर्वी आठ देश करीत असत; पण आता एकूण 14 देश करतात. आता आलेल्या  चक्रीवादळाला तोक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले आहे.

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील नावे ठरविण्याचा अधिकार भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या आठ देशांना जागतिक हवामान संघटनेने बहाल केला.  भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू अशी मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील नावे दिली, तर पाकिस्तानने नर्गिस, निलोफर, नीलम, लैला अशी अभिनेत्रींची नावे दिली. कॅटरिना हे नाव अमेरिकेने दिले आहे.

आठ देशांनी दिली 64 नावे ः  भारत : अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू. बांगलादेश : ओनिल, ओग्नी, निशा, गिरी, हेलन, चंपाला, ओखी, फनी. मालदीव : हिब्रू, गोनू, ऐला, कैला, मादी, रोनू, मेकुनू, हिक्का. म्यानमार : प्यार, येमयीन, फॅन, ठाणे, नौक, कँट, दाय, कायर, तोक्ते.ओमान : बाझ, सीदर, वर्ड, मृजन, हुडहुड, नाडा, लुबन, महा. पाकिस्तान : पुनूस, नर्गिस,  लैला, नीलम, निलोफर, वरध, तितली, बुलबुल. श्रीलंका : माला, रश्मी, बंडू, वियारू, अशोबा, मरूथा, गज, पवन. थायलंड : मुकदा, खाई-मूक, फेट, फायलीन, कोमेन, मोरा, फेथाई, आंफन  बंगालच्या उपसागरात गतवर्षी आलेल्या आंफन महाचक्रीवादळाला  थायलंड देशाने नाव दिले. 20 वर्षांतील हे सर्वात मोठे हे वादळ होते. जी वादळं प्रचंड नुकसान करून जातात, त्यांची नावे यादीतून कायमची काढली जातात. 2005 साली अमेरिकेतील न्यू एरोलिना प्रांतात आलेल्या ‘कॅटरिना’ वादळाने प्रचंड नुकसान केले, त्यामुळे ते नाव यादीतून काढले आहे. भारताने गती, तेज, मुरासू, आग, व्योम, जहर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, गुरूनी, अंबुद, जलाधी, वेग अशी 13 नवी नावे दिली आहेत.

तोक्ते म्हणजे सुरेल आवाजाचा सरडा..

यंदाच्या हंगामाची सुरुवात तोक्ते नावाच्या चक्रीवादळाने होत आहे. हे नाव म्यानमार देशाने दिले आहे. तेथे तोक्ते नावाचा सरडा सुरेल आवाज काढतो. त्यावरून हे नाव दिले आहे. या वादळाचा वेग ताशी 160 ते 175 कि. मी. राहू शकतो.

संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यमपत्नी… – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सुश्री संध्या पुरकर

? वाचताना वेचलेले ?

☆ यमपत्नी… – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सुश्री संध्या पुरकर ☆ 

आपण आजवर सर्व देवांच्या “सौं.” चे म्हणजे देवींच्या  बद्दल ऐकले आहेच पण यमाची यमी नेहमीच दुर्लक्षित राहिली. एक वर्षापासून जिचा नवरा अहोरात्र कामावर आहे अश्या या “यमपत्नी” चे मनोगत ऐकायला नको का..?

लेखिका : सौ. वर्षा विनायक पांडे, लक्ष्मीनगर, नागपूर

यमिणबाई म्हणाल्या यमाला आता कंटाळले बाई,

किती तुमचे टार्गेट्स, घरी येण्याची नाही तुम्हाला घाई..

 

तुम्हाला ऑर्डर देणारा तो भगवंत,

घरात स्वतः आहे निवांत..

 

बालाजी तिरुपतीत उभा,

मारुतीचा आतल्या आत नुसताच त्रागा..

 

विठ्ठल आहे रुक्मिणी संग,

होत नाही शंकराची समाधी भंग..

 

सरस्वतीच्या वीणेच्या शांत आहेत तारा,

लक्ष्मी शांततेने घालते विष्णूला वारा..

 

सगळे करतायत “वर्क फ्रोम होम”,

तुम्ही मात्र सतत “नॉट ऍट होम”..

 

सगळे कसे जोडी जोडीने बंद मंदिराच्या दारात,

तुम्ही आपले सतत पुढच्या “पिक-अप” च्या विचारात..

 

अश्या कश्या सगळ्या यंत्रणा माणुसकीला झाल्या फितूर,

तुम्ही दवाखान्याबाहेर एकेकाला उचलण्यास आतुर..

 

तुमच्या वागण्याचं बाई आजकाल मला काही कळत नाही,

तुमच्या कामाला नियम, पद्धत काही राहिलीय की नाही..

 

ऍम्बुलंस, विमान, गाड्या-घोड्या आणि अगदी ऑटोमधुनही घालताय तुम्ही राडा,

जाऊ द्या ना यमदेवा, बरा आहे ना आपला संयमी आणि संथ रेडा..

 

उचलाउचलीचे हे सत्र आता तुमचे पुरे झाले,

आपल्या सात पिढ्यांचेही टार्गेट आता पूर्ण झाले..

 

पुरे झाले काम आता आवरा तुम्ही स्वतःला,

पांढऱ्या चादरीच्या सोबत राहून काळा रंग ही मलूल झाला..

 

काय होता तुम्ही, केवढी होती तुमची शान,

पण अशा अतिरेकी वागण्याने घालवला तुम्ही तुमचा मान..

 

घरातले कर्ते हात उचलण्यात कोणता आहे पुरुषार्थ,

कोरोनाला उचलून दाखवा आणि सिद्ध करा तुमचे सामर्थ्य..

 

सिद्ध करा तुमचे सामर्थ्य …………….. ??

 

संग्राहक –  सुश्री संध्या पुरकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी  क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मीप्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

टर्की एअरलाइन्सने ऑस्ट्रिया इथे पोहोचलो. ऑस्ट्रियाहून बसप्रवास करून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे गेलो.  क्रोएशिया हा मध्य युरोपमधील एक छोटासा, सौंदर्यसंपन्न  देश आहे. झाग्रेब हे त्याच्या राजधानीचे शहर सावा नदीच्या काठी एका डोंगररांगांच्या पायथ्याशी वसले आहे.

रोमन काळापासून हे ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. गाईड बरोबर जुन्या शहराचा फेरफटका केला. एका मोठ्या चौकाच्या  सभोवताली असलेल्या आकर्षक दुकानांतून लोकांची खरेदी चालली होती. खाण्यापिण्याचा आनंद घेणाऱ्यांची गर्दी उसळली होती. पुढील चौकात झाग्रेब शहराचा तेरा चौरस मीटर लांब रुंद असलेला मिश्रधातूमध्ये बनविलेला नकाशा बघायला मिळाला. एका दगडी वेशीच्या कमानदार,उंच दरवाजातून आत गेल्यावर चौदाव्या शतकात बांधलेले सेंट मार्क चर्च दिसले. याचे उतरते छप्पर अतिशय देखणे आहे. छपरावर छोट्या छोट्या लाल व हिरवट टाईल्स चौकटीमध्ये बसविलेल्या आहेत. उजव्या बाजूला लाल-पांढऱ्या टाइल्सचे सोंगट्यांच्या पटासारखे डिझाईन आहे. यापुढे हिरवट रंगाच्या टाईल्स वर तीन सिंह  लाल टाइल्स मध्ये आहेत. चर्चच्या सभोवतालच्या उंच कोनाड्यात बारा धर्मगुरू दगडावर कोरलेले आहेत. हिरव्या सोनेरी रंगाच्या टाईल्सचा बेल टॉवर शोभिवंत दिसतो. एकोणिसाव्या शतकात इथे मोठा भूकंप झाला पण सुदैवाने बेल टॉवर अबाधित राहिले.

‘मार्शल टिटो स्क्वेअर’हा झाग्रेबमधील सर्वात मोठा चौक आहे.रुंद रस्ते, पुतळे, कारंजी, रेस्टॉरंटस्, मॉल्स रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या छोट्या बागा यामुळे हा चौक शोभिवंत दिसतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुकानातून क्रोशाचे विणकाम असलेल्या सुंदर लेस, रुमाल, ड्रेस नजाकतीने मांडले होते. तऱ्हेतऱ्हेचे टाय होते. गाईडने सांगितले की नेकटाय आणि फुटबॉल यांची सुरुवात क्रोएशियाने केली.

झाग्रेबपासून साधारण दोन तासांवर ‘प्लिटविक लेक्स नॅशनल पार्क’ आहे.  अनेक डोंगर, दर्‍या, नद्या, धबधबे, सरोवरे असलेला हा एक खूप मोठा नैसर्गिक विभाग आहे. २९५ चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेला प्लिटविक लेक्स परिसर फार प्राचीन काळापासून म्हणजे हिमयुगानंतर अस्तित्वात आला असे शास्त्रज्ञ म्हणतात. हा संपूर्ण विभाग चुनखडीच्या डोंगरांनी व्यापलेला आहे. या खडकांची सतत झीज होत असते. त्यामुळे डोंगर उतारावर अनेक घळी तयार झाल्या आहेत. त्यातून जलधारा कोसळत असतात. त्यांचे अनेक लहान-मोठे तलाव तयार झाले आहेत. निळ्या-हिरव्या रंगाचं गहिरं पाणी आणि त्यात तरंगणारी पांढऱ्या स्वच्छ कापसाच्या ढगांची प्रतिबिंबे मोहक दिसतात.

गाईड बरोबर जंगलातील थोडी पायवाट चालून एका छोट्या दोन डब्यांच्या रेल्वेत बसलो. दोन्ही बाजूंना बर्च, पाइन, ओक अशा सूचिपर्णी वृक्षांचे घनदाट जंगल होते. पाच मिनिटात गाडीतून उतरून परत चालायला सुरुवात केली. अनेक पायर्‍यांची चढ-उतर केली. छोट्या जंगलवाटेमधून ठिकठिकाणी निळ्या हिरव्या रंगांचे तलाव आणि त्यात अनेकांगांनी उड्या मारणारे असंख्य धबधबे यांचे नेत्रसुखद दर्शन होत होते. निसर्गाला अजिबात धक्का न लावता हे पायी चालण्याचे मार्ग तयार केले आहेत. वर्षानुवर्षे या चुनखडीच्या डोंगरांमधील कॅल्शिअम विरघळल्यामुळे ते सच्छिद्र झाले आहेत. या सातत्याने होणार्‍या प्रक्रियेमुळे या डोंगरातून येणारे झरे, धबधबे यांचा प्रवाह बदलत राहतो. वाहून गेलेल्या कॅल्शिअमचे पुन्हा लहान-मोठे दगड, बंधारे बनतात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा ओघ बदलत राहतो. मोठे धबधबे निर्माण होतात. इथल्या लहान-मोठ्या सोळा सरोवरांपैकी एका सरोवरातून यांत्रिक बोटीतून फेरफटका मारला. किनाऱ्याजवळील मातकट रंगाच्या पाण्यातून बोट निळसर हिरव्या नितळ पाण्यात शिरली. किनाऱ्यावरील उंच, हिरव्या वृक्षांची छाया त्यात हिंदकळू लागली. गार गार वाऱ्याने शिरशिरी भरली होती. चालून चालून पाय दमले होते पण डोळे आणि मन तृप्त झाले होते.

घनदाट सूचिपर्ण वृक्षराजी आणि अनेक प्रकारच्या ऑर्किड्सनी समृद्ध अशा इथल्या जंगल दऱ्यांमध्ये जैवसमृद्धी आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, विविध पक्षी, वटवाघळे, तपकिरी अस्वल आणि अन्य वन्य प्राणी यांच्या नैसर्गिक सहजीवनाचे अस्तित्व कसोशीने जपलेले आहे वृक्षांच्या जुन्या ओंडक्यांचा उपयोग करुन त्यापासून लाकडी बाके, कडेचे लाकडी कंपाउंड, उपहारगृहांचे लाकडी बांधकाम, पाय वाटेवरून घसरू नये म्हणून बसविलेल्या लाकडाच्या गोल  चकत्या सारं तिथल्या निसर्गाशी एकरूप होणारं आहे. ट्रेकिंग, सायकलिंग, केबल कार,बोट रोईंग अशा अनेक प्रकारांनी धाडसी तरुणाई इथल्या निसर्ग वैभवाचा मुक्त आनंद घेत होती. प्लिटविक लेक्स नॅशनल पार्कला युनेस्कोने १९७९ साली वर्ल्ड नॅचरल हेरिटेज…. जागतिक नैसर्गिक वारसा संपत्ती असा दर्जा दिला आहे .

क्रोएशियाला शास्त्रीय संशोधनाची महान परंपरा आहे. आज दैनंदिन व्यवहारात आपण अनेक गोष्टींचा सहजतेने वापर करतो त्यातील कितीतरी महत्त्वाचे शोध येथील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ( Nikola Tesla १८५६–१९४३) यांनी लावले आहेत. त्यांची प्रयोगशाळा व ऑफिस असलेली इमारत झाग्रेब इथे बघायला मिळाली.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीमध्ये डायरेक्ट करंटचा (DC ) शोध लावला त्याच वेळी निकोला टेस्ला यांनी अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक करंटचा (AC ) शोध लावला. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या  वापरामध्ये सुरक्षितता, सहज वहन व किमतीमध्ये बचत झाली. नुसते बटण दाबून इलेक्ट्रिकचे दिवे लावताना आपण निकोला टेस्ला यांची आठवण ठेवली पाहिजे. टीव्ही चॅनल्स बदलताना, एसी लावताना आपण रिमोट कंट्रोलचा वापर करतो त्याचे संशोधन निकोला टेस्ला यांचेच. फ्रीज, मिक्सर, वाशिंग मशीन, हेअर ड्रायर अशा अनेक वस्तू ज्यावर चालतात त्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध टेस्ला यांनीच लावला. रेडिओचा शोध प्रथम मार्कोनी यांच्या नावावर होता. पण हा शोध टेस्ला यांनीच प्रथम लावल्याचे सिद्ध होऊन १९४ ३ साली त्यांना या संशोधनाचे पेटंट देण्यात आले. थर्मास, गॅस लायटर हेही त्यांचेच संशोधन!

त्यांच्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक कारला टेस्ला असे नाव देण्यात आले आहे.

विसाव्या शतकापासून क्रोएशिया उद्योगधंदे, व्यापार, शैक्षणिक संस्था, दळणवळणाची साधने यांतही आघाडीवर राहिले आहे .मोठ्या पुलांची बांधणी, सस्पेन्शन ब्रिज, टर्बाइन्स, पॅरॅशूट जम्पिंग, आपण वापरत असलेले चष्मे हे संशोधन क्रोएशियातील शास्त्रज्ञांचे आहे. टीव्हीची सॅटॅलाइट डिश, असे अनेक महत्त्वाचे शोध लावले फाउंटन पेन चा शोध लावणारे पिकाला मास्टरयांच्या नावाची पेन फॅक्टरी अजूनही झाग्रेब मध्ये आहे .एमपी थ्री चा शोध इथलाच. क्रोएशियाच्या नवीन पिढीनेही हा वारसा पुढे नेला आहे. कार पार्किंग बाय टेक्स्ट मेसेज, सोलर पाॅवरवर चालणारा मोबाईल चार्जर बनविले आहेत. फेरारी, पोर्शे अशा कंपन्यांशी स्पर्धा करणारी इलेक्ट्रिक कार कंपनी झाग्रेब पासून जवळच आहे. केवळ 45 लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील संशोधन निश्चितच कौतुकास्पद आहे.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-२] ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले 

? विविधा ?

☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-२] ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

त्यामुळे जमिनीत खोलवर तळघरासारखी खोली खोदली जायची व त्यात हळदीच्या हळकुंडाचा साठा केला जायचा. अशा ठेवलेल्या हळकुंडांना कीड लागत नसे. आणि काढल्यावर वजनात त्याचा उतारा जास्त पडे. २००५ सालचे पुरात पेवात पाणी शिरले. त्याचे स्फोट बरेच दिवस होत होते. त्यामुळे बरीचशी पेवात फारशी हळद साठवली जात नसावी. पेवे नष्ट झाली. हळदीच्या वायदेबाजारही इतरस्त्र स्थलांतरीत झाली.

पूर्वीपासूनच पूराचा धोका आहे. या हरिपूर गावचे वैशिष्ट म्हणजे कितीही पूर आला तरी गावाच्या दोन्ही देशीच्या आत पाणी येत नाही. २००५ साली सगळीकडे पाणी आले होते. पण वेशीच्या आत पाणी नव्हते.आयर्विन पूल बांधताना बागेतील गणपतीच्या उंचीवरून तो बांधला गेला की त्या उंचीपर्यंत पूराचे पाणी पोहचू शकत नाही.

पूर्वी नदीकाठी खूप वाळू होती. वरून पहाता माणसे त्यात अंगठ्याएवढी दिसत. ही वाळू लोह मिश्रित होती. त्याकाळी ती दूरवर घराचे बांधकामाला, पुलाचे बांधकामाला वापरत असत.

अशा या कृष्णाकाठी संगीत शारदा नाटकाचे लिखाण, नाटककार कै.गो.ब. देवल यांनी केले. घाटाच्या पारावर बसून त्यांना या नाटकाच्या संहितेची कल्पना स्फूरली. त्याकाळी समाजात जरठ -कुमारी विवाह होत असत. अशा समाजातील अनिष्ट रूढींवर टीकात्मक असे नाटक त्यांनी लिहिले. त्याचा पहिला प्रयोग १८९८ साली झाला. त्या

प्रयोगाच्या शताब्दी वर्षात म्हणजे १९९८ रोजी संगीत शारदाचा प्रयोग त्यांचे स्मरणार्थ पुन्हा (घाटावर ) मंच उभारून जोमात केला गेला, ‘रोटरी क्लब हरिपूर या संस्थेच्या सदस्य महिलांनी कै. गो. ब. देवलांचे घर सजविले. घाटावर त्यांची स्मरणीका म्हणून शीलान्यास बसविण्यात आला. देवलांप्रमाणेच इथले काव्यविहारी, गद्रे हे काव्यासाठी प्रसिद्ध होते.

ते गद्रेच्या घरात माडीवर बसून काव्य लिहीत. त्यांच्या कविता पाठ्य पुस्तकात आम्हाला अभ्यासण्यास होत्या. अलिकडल्या पिढीतील कै. अशोकजी परांजपे हे ही प्रतिभावान लेखक इथल्या मातीतीलच होते.

अशा संपन्न हरिपूरात १९२० साली इथले वैद्य कै. गो. ग, परांजपे यांनी वाचनालयाची स्थापना केली. त्याचे उद्घाटन करण्यास कै. लोकमान्य टिळक हरिपूरात आले होते. आजतागायत हे वाचनालय हरिपूर ग्रामपंचायतीकडून मोफत वाचनालय म्हणून चालविले जाते. सद्य स्थितीत हे वाचनालय रोटरी समाजदल हरिपूर यांच्या महिला सदस्या कार्यान्वित करत आहेत. रोटरीच्या माध्यमातून गावातील कचरा उचलण्यासाठी गाड्या देण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन कचरा उचलला जातो. त्यामळे गावात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग नसतात.

इथला निसर्ग खरोखरच रम्य आहे. इथे प्राणवायू भरपूर प्रमाणात आहे. (oxygen zone ) त्यामुळे इथली हवा स्वच्छ, शुद्ध आहे.

नदीकाठामुळे इथे निरनिराळ्या पक्ष्यांचा वावर आहे. हरिपूरच्या घाटावर संध्याकाळी गेले असता, लाखो पोपट थव्यांनी आकाशात विहार करताना दिसतात. हे दृश्य विलोभनीय दिसते. मोरांचा ही इथे वास आहे.

माझे घराचे मागे नारळाची बाग आहे. एके दिवशी एक मोर इतक्या उंच झाडावर चढून बसला होता. आम्हाला अचंबाच वाटला. मोर काही उडणार पक्षी नाही. पण निरिक्षणानंतर रोज संध्याकाळी तो मोर, खालच्या झावळ्यातून हळूहळू एक एककरत वरच्या शेंड्यावर जाऊन झोपत असे. सकाळ होताच पुन्हा उतरून शेतात विहार करी. त्याचे लांडोरी सकट सगळे कुटुंबच इथे राहत होते.

आपण सांगलीच्या शास्त्री चौकातून हरिपूरच्या रस्त्याला लागलो की दूतर्फा चिंचेची मोठी मोठी झाडे फार काळापासून इथे आहेत. दरवर्षी त्या झाडांना विपूल चिंचा लगडतात. एप्रिल मे मध्ये चिंचा पिकल्यावर त्या ठेकेदार उतरवतात. चिंच हे फळ फलधारणा झाल्यापासून पूर्ण होण्यास १० ते ११ महिन्याचा कालावधी लागतो. हे मी इथल्या वास्तव्यात निरीक्षणातून पहात आहे. पक्कफळे काढल्यानंतर एप्रिल मे नंतर पानगळ होते. नवी पालवी फूटल्यावर लगेच काही दिवसात फुलोरा येतो. हळूहळू फलधारणा होऊन जुलै, ऑगस्ट मध्ये कोवळ्या चिंचा दिसू लागतात.

तुळशी विवाहापर्यंत पूर्ण चिंच कच्च्या स्वरूपात तयार होते. पुढे फळ पक्व होण्यास होळी नंतर सुरूवात होते. असे हे फळ दिर्घकाळी आहे. त्याकाळी एवढी झाडे मुद्दाम लावली असावीत. 

२००५ चे पूरात, आम्ही होडीतून ४ ऑगस्टला बाहेर पडलो. पाण्याचा जोर एवढा होता की होडी पाण्याबरोबर ढकलली जात होती.

आमच्या बरोबरच्या जिगरबाज माणसांनी कासरा चिंचेच्या झाडाला बांधत बांधत होडी गुळवणी मठापर्यंत नेली व तेथून उजवीकडे वळून कोल्हापूर रस्त्यावरील दैवज्ञभवनसमोर बाहेर काढली. म्हणजे त्यावेळी आम्हाला ३५ माणसांना दोन शेळ्या, एक कुत्रा, एक दीड महिन्याचे बाळ, एक ९० वर्षाच्या आजी, चिंचेच्या झाडांनीच वाचविले व मदत  केली. ज्यांनी लावली त्या राज्यकर्त्यांचे आभारच मानावे तेवढे कमी आहेत. सद्यस्थितीत हरिपूरचे रस्त्याकडच्या दुतर्फा शेतीचे, नागरिकरण होऊन अनेक वसाहती वसत आहेत. मागील भाग अंकलीपर्यंत खूप दाट शेतीच्या हिरवळीने नटलेलाच आहे. इथली वस्ती गावा पूरती मर्यादीत न राहता हरिपूर, सांगली रोडच्या दुतर्फा वाढते आहे. 

अलिकडे त्याबरोबरच काही नवीन मंदीरेही झाली आहेत. नदीकाठी वसलेले म्हादबा मंदीर, त्याचे अलिकडे लहानसे स्वामी समर्थ मंदीर त्याचे समोरील बाजूस आत गेल्यावर श्रीकृष्ण नीलयम मंदीर आहे.

गजानन कॉलनीचे आतील बाजूस गोंदवलेकर महाराजांचे ध्यान धारणा मंदीर वसलेले आहे. हरिपूर म्हणजे हरिचेच गाव सार्थ होते. इथे अध्यात्माचा सतत सर्वकडे आराधना, उपासना भक्ति,प्रवचन, किर्तन या सर्व कार्याची मांदियाळी आहे. रम्य निसर्गात चराचरातून भरून राहिलेला परमात्म्याचा इथे खरोखरच प्रत्यय येतो. भक्तांच्या दुःखी, संसारात गांजलेल्या मनाला इथे उभारी मिळते. पुन्हा प्रसन्न होऊन उमेदीने वाटचाल करण्याची! हरिपूर तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील काही वर्षात योग्य त-हेने विकसीत झाली तर हरिपूर गाव जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल.

(क्रमशः)

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

? जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ? श्री सुहास सोहोनी ?

(एक सांगीतिक कोडं! खाली दिलेल्या लेखात भारतीय संगीतामधील 37 रागांच्या नांवांची गुंफण केलेली आहे. लेख नीट लक्ष देऊन वाचा आणि ते राग  ओळखून दाखवा!!)

पूर्वी शिमगा, दसरा या सणांच्या दिवशी कोंकणात घरोघरी गोमू, बाल्ये, बहुरूपी, वासुदेव – हे लोक गाणी म्हणत यायचे. आताच्या काळात त्यांचं प्रमाण कमी कमी होत चाललेलंय्. त्यात जसे कोंकणातले स्थानिक लोक असायचे, तसे परराज्यातले लोक सुद्धा असायचे. मारवाडी, गुजरीतोड्ये, गौड प्रांतीय, तिरंगी, या समाजातले हे फिरस्ते लोक असायचे. हे सारे विविध भाषांतली लोकगीत म्हणायचे. तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ कुठे समजत होता? पण चाल ठेका धरायला लावायची. कोंकण, गोवा या प्रांतातल्या लोकांच्या रक्तातच संगीत भिनलेलं आहे! राजस्थानी फिरस्ते तर जौंधपुरी नाचही करून दाखवत असत. डोक्यावर भला मोठा, भुसा भरलेला पांढरा पक्षी घेऊन हंसाचा ध्वनी काढून दाखवणं, ही त्या पहाडी कलाकारांची खासियत होती. त्यांना तोडीस तोड म्हणून कुडाळ देसकार हिंडोल पक्ष्यांचा आवाज काढून मजा आणायचे. त्यातले काही दशावतारी नट देखील होते. ते नाटकांतली गाणी सुद्धा गायचे. ही नाट्यकला व तिचा मालवणी अविष्कार या गोष्टी परंपरेतून आलेल्या असत.  फाल्गुन सरल्यावर वसंताचं आगमन झालं की निसर्गात रंगीबेरंगी फुलांचं बहारदार प्रदर्शन भरायचं. अशा वेळी अंगावर पट्टे ओढलेले, काहीसे सुधारलेले, स्वतःला शंकराचे भक्त – भैरव वंशीय समजणारे, जंगलातले भिल्ल फुलांच्या माळा गळ्यात घालून यायचे आणि अडाण्यासारखे काही-बाही गायचे. काही वेळा बंगाली बैरागी जादूगार यायचे. ते स्वतःला दरबारी जादूगार मानायचे. कालीसह दुर्गामातेची पूजा करून ते जादूचे अघोरी प्रयोग करीत असत. एका कलिंगडाचे नुसत्या हातांनी क्षणार्धांत दोन तुकडे करून त्याच्या पोटातून बर्फाच्या गारा, मुलतानी मातीचे खडे, अशा वस्तू काढून जनांवर संमोहिनी घालीत असत. भीती वाटायची ते प्रयोग बघतांना. शहाणा माणूस पण वेडा व्हायचा. आणि हे सर्व चालू असतांना हातात डमरू आणि तोंडातून सतत ऱ्हाम्-ऱ्हीम्-ऱ्हुम् असं चालूच असे! कानडा प्रांतीय कलाकार प्राणी-पक्षी घेऊन यायचे. डमरूच्या ठेक्यावर बोकड, कुत्र्याचं पिल्लू, माकड, यांचे खेळ बघतांना हसून हसून पुरेवाट व्हायची! बोकडाचा नाच, माकडाच्या उड्या मस्तच! किती वेळ पाहिलं तरी समाधानच होत नसे. मग तो माकडवाला त्याच्या कानडी हिंदीत “अब बस हो गया जी! अब काफी हो गया जी” असं म्हणत पैसे गोळा करायला लागायचा. नंद म्हणजे उत्तर भारतीय गवळी समाजाचे लोक. हे गाई किंवा नंदीबैल घेऊन यायचे. ते श्रीकृष्णाची गाणी म्हणायचे. “लल्ला, बेडा कर दे पार, खोल दे बंद सरग के दार”. सोबत गोवंशीय वस्तू, म्हणजे गाईचं तूप, लोणी, घुंगुर, शिंगाना लावायचे गोंडे, अशा वस्तू (माल) सुद्धा ते विकायला घेऊन यायचे. काही वेळा पंजाबी सरदारजी खांद्याला हार्मोनियम लटकवून यायचे आणि नानकगुरूंची बिलावली भक्तीगीतं गायचे. कधी कधी नाथपंथीय अंगाला राख फासून यायचे व गोरखनाथांची कल्याणकारी हिंदी गाणी ऐकवायचे. अशी खूप खूप गाणी घरच्या घरी ऐकायला मिळाली त्या काळी!!

              ?????

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-१] ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? विविधा ?

☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-१] ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले हरिपूर, हे कृष्णा -वारणा नद्यांच्या काठी वसलेले गाव! सांगलीहून वहात आलेली कृष्णा, हरिपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या, डाव्या अंगाने, शेताच्या पल्याड हरिपूरकडे वहात जाते. या कृष्णाकाठी, सुपीक जमिनीने, समृद्ध झालेला हा परिसर, निर्सगाच्या हिरवाईने नटल्यामुळे, प्रसन्न आणि रम्य भासतो.

१७६८ मध्ये गोविंद हरि पटवर्धन यांनी आपल्या वडिलांचे स्मारकाकरिता सांगलीची सहाशे बिघे जमिन स्वतंत्र काढून हरिपूर हे गाव वसविले. ते गाव शंभर ब्राह्मणांना (अग्नहार) दिले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी हे गाव वसविण्यास अनुमती दिली. यानंतर हरिपूर हे क्षेत्र झाले. या टुमदार गावाची, त्यावेळी लोकसंख्या दोन हजार होती व सांगलीची लोकसंख्या मात्र एक हजार होती. त्यावेळी हरिपूर हे सांगलीपेक्षा मोठे होते.

हरिपूरची जमीन ब्राह्मणांना दान दिली होती, त्याबद्दल एक आख्यायिका आहे. ही जमीन दान दिल्यानंतरच्या काळात सांगलीकर राजे हरिपूरच्या वेशीवर पाय धुवत, हेतू असा की, दान दिलेल्या जमिनीतील माती सुध्दा, पावलासंगे परत येऊ नये. हरिपूरच्या संगमेश्वर देवालयातील घंटेवर कोण्या बाबाजी रामचंद्र गुरव याचा नामनिर्देश असून त्यावर शक १६२२ (इ.स.१७००) चा उल्लेख आहे.

हरिपूरच्या शेजारील सांगली त्यापुढील शतकात फारशी वाढलेली नव्हती. १८५० साली हरिपूर हे गाव बुधगावकर पटवर्धनांकडे गेले.  कृष्णा वारणा संगमावर, पुरातनकाळापासून असलेले गमेश्वर हे शिवाचं पवित्र स्थान, हरिपूरचे आराध्य दैवत आहे. प्रभु श्री रामचंद्र दंडकारण्यात जाताना इथे थांबले होते. त्यांनी वाळूचे लिंग स्थापन करून शिवप्रतिष्ठापना पूजे स्तव केली होती अशी कथा आहे.

कालांतराने काही गुराखी गाई चरण्यासाठी घेऊन येत. एक गाय रोज वेगळी चरत थोड्या लांब जाई. हे गुराख्याच्या लक्षात आल्यावर, तो गाईच्या मागे जाऊ लागला, तर ती गाय ठराविक स्थानी जाऊन आपल्या दूधाचा अभिषेक करीत असे. त्याने ही गोष्ट आपल्या राजापर्यंत पोहचवली. मग इथे तपासाअंती उकरून पाहिल्यावर वाळूचे शिवलिंग दृष्टोत्पत्तीस पडले, तेच हे संगमेश्वर देवालयातील स्थापित शिवलिंग होय. पुढे त्याकाळी तेथे देवालय उभं राहिले.

मिरजेला मार्कडेय नावाचा राक्षस होता .तो या लिंगाची भक्ती करीत असे. गुरूचरित्राच्या अध्यायात असं म्हटले आहे, मिरजेच्या मार्कडेय नामे संगमेश्वर पूजावा! संगमेश्वराची मूळ पिंड वालुकामय आहे. आताच्या स्थितीत या वालुकामय पिंडीवर दगडाचे लिंग करून नंतर बसविलेले आहे. यापिंडीवर पाण्याची धार धरली असता,बांबूंच्या कामटीने आतवर किती पाणी गेले हे बघत असत.

अशा या संगमेश्वराच्या पवित्र वाने पुनित झालेले हरिपुर गाव अध्यात्माचे अधिष्टान आहे. याच हरिपूरच्या वेशीतून आत प्रवेश केल्यावर कृष्णाचे मंदीर डाव्याबाजूस आहे. काव्यविहारी वासुदेव गद्रे, बुधगाव सरकारकडे होते. अक्काताई भट यांनी या कृष्ण देवालयाची स्थापना केली. पुढे ते गद्रे कुटुंबीयांचे मंदीर म्हणून नावारूपाला आले. इथे कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सव श्रावणात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भजन, किर्तन, गायन ह्यांची सातदिवस उपासना व भक्ती केली जाते. अष्टमीदिवशी रात्री  जन्मकाळाचे किर्तन होते. पारण्याचा नैवेद्य महाप्रसाद असतो. वर्षभर ह्या मंदिरात बरेच उपक्रम भक्ती व उपासना यावर आधारलेले चालतात. ग्रंथ वाचन पारायणे होतात. असे अध्यात्म्याचे अधिष्टान आणि परंपरा पुढील पिढीनेही अंगिकारलेली आहे.

संगमेश्वराचे मंदीराबाहेर, विष्णूमंदीर आहे. पुढे आल्यावर पंचायतन मंदीर आहे. तसेच वेशीच्या अलिकडे श्रीराममंदीर, विठ्ठलमंदीर आहे. हरिपूरच्या प्रवेशीचे बाहेरील बाजूस श्री हनुमान मंदीर आहे.

बागेतील गणपती हे गानकोकिळा लताबाई मंगेशकरांचे श्रध्दास्थान आहे. त्या सांगलीत आल्यावर इथे दर्शनास येतात. या देवालयाच्या स्थापनेची आख्यायिका अशी की, सांगलीच्या संस्थापिकाचे मूळ पटवर्धन घराणे कोकणातील कोतवड्याचे, जिथे दुर्वाचा रस प्राशन करून त्यांच्या पूर्वजातील कोणा एकाने उपासना केली. त्यांना दृष्टांत झाला. ‘तू चालत राहा, मागे वळून पहायचे नाही. तोवर मी तुझ्याबरोबरच असेन. मागे वळून पाहिलेस तर तेथेच माझी स्थापना कर!’ त्याप्रमाणे इथंवर आल्यावर मागे वळून पहाता देवाने इथे स्थापना कर असे सांगितल्याप्रमाणे नदीकाठी देव स्थापित झाला. सन १७६५ चे फाल्गून प्रतिपदा ते पंचमी या दिवसात प्रतिष्ठापना झाली असे ऐकिवात आहे.

या भक्तांची अखंड मांदियाळी आहे.संकष्टीस देवदर्शनास व रोजचेही दर्शन घेणारे भक्त आहेत. माघातील गणेश जन्म असतो. जन्मकाळ, महाप्रसाद सर्वच मोठ्या प्रमाणावर नवसाला पावणारा असा हा गणपती आहे.

श्रावण सोमवारची संगमेश्वराची जत्रा फार पुरातन काळापासून असते. माझ्या सासुबाई त्यांचे लहानपणी आणा, दोन आणे घेऊन चालत इथल्या जत्रेला जात असत. (साल साधारण १९२० ते १९२५ चे सुमारास) अशी आठवण आम्हाला सांगत असत. अजूनही इथली जत्रा मोठ्या प्रमाणावर साजरी होते. असंख्य भक्तगणांची पहाटे पासून रीघ लागलेली असते ती रात्री पर्यंत ! बाहेरील आवारात जत्रेत असतात तशी खेळणी, पुंग्या, कलाकुसरीची चित्रे आदींचे विक्रेते असतात. घाटाच्या बाजूस चक्र, मुलांसाठी चे करमणुकीची खेळणी यांची रेलचेल असते. अशी श्रावणातले सर्व सोमवारी जत्रा असते.

इथे घरोघर कार्तिक व्दादशीला तुळशीचं लग्न दारात रांगोळी, ऊसाचा मंडप घालून केले जाते. आपण त्यासुमारास फेरफटका मारला तर हे सुंदर दृश्य गावातील जवळ जवळ प्रत्येक घराच्या दारात शोभिवंत असं दिसून येते. शहरात अशी अंगणे पहायला मिळत नाहीत त्यामुळे इथे सर्व पहाण्यासारखेच असते. ही परंपरा खरोखरच सामान्य माणसांनी जपली आहे.

(क्रमशः)

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares