मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माघारपण… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

अर्चना गादीकर निकारंगे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माघारपण… ☆ अर्चना गादीकर निकारंगे 

आज अस्मी खूप खूश होती. कारण पण काही साधेसुधे नव्हते. आज जवळ जवळ सात ते आठ महिन्यांनी तिचे आई बाबा आपल्या लाडक्या लेकीकडे राहायला येणार होते. हल्ली वयाच्यामुळे तिच्या आई वडीलांच्या दुखण्यांना सुरूवात झाली होती. ते काय कोणाच्या हातात नसते असे अस्मी त्यांची समजूत घालण्यासाठी म्हणत असे. आज खूप दिवसांनी ते लेकीकडे येणार होते. मागील २-३ दिवस अस्मीचे ते दोघे आल्यावर काय काय करायचे, काय काय बनवायचे ह्याचा विचार करण्यातच गेले होते. अस्मी त्यांची वाट पाहत होती. अव्दैत तिचा नवरा थोड्या वेळापूर्वी कामावर गेला होता.

काही वेळातच बंगल्याच्या पोर्चमध्ये गाडी थांबल्याचा आवाज आला. आले वाटत आई बाबा असे म्हणत चार -पाच वर्षांच्या मुलीप्रमाणे धावत ती बाहेर आली. आई वडिलांना पाहून ती आनंदीत झाली. सगळे घरात आले. दोघांना फ्रेश व्हायला सांगून ती किचनमध्ये गेली. बाबांना आवडतात म्हणून तिने सोयाबीनचे कटलेट व गोडाचे आप्पे स्वयंपाक करायला येणार्‍या शालिनीबाईंना हाताशी घेऊन बनविले होते.

उकाड्याचे दिवस असल्याने तिने आवर्जून कैरी साखरेचे केशर घालून पन्हे बनविले होते. सर्व पदार्थ ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवून ती ट्रे घेऊन हाँलमध्ये आली. आई बाबा फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसले होते. लेकीने आपण येणार म्हणून ठरविलेला बेत पाहून ते खूश झाले. एकेका पदार्थाचा आस्वाद घेताना दोघेही तिच्या पाककलेची स्तुती करत होते. आपली लेक केवढी समजूतदार आहे या विचाराने ते थोडे गहिवरले. त्यांनी केलेल्या कौतुकाने तिला पण जरा भरून आले. मध्येच तिने अव्दैतला कामावर फोन करुन आई बाबांच्या घरी पोहचल्याची बातमी दिली. पलिकडून त्याने पण त्यांच्या येण्याचा झालेला आनंद बोलण्यातून दाखविला होता. तो सी. ए. होता. तिथे जवळच त्याची स्वतःची फर्म होती. मी आज लवकर येतो असे सांगून त्याने फोन ठेवला. सांगितल्याप्रमाणे अव्दैत संध्याकाळी नेहमीपेक्षा खूपच लवकर आला. फ्रेश होऊन तो पप्पांशी गप्पा मारायला तयार झाला. त्यांच्या गप्पा रंगात आल्यावर अस्मीची आई लेकीला मदत करायला किचनमध्ये गेली. बाबा व अव्दैत ह्यांचे विचार एकमेकांशी सुसंगत होते. त्यामुळे ते दोघे तासनतास गप्पांमध्ये रंगून जात असत. लेकीकडे आल्यावर जावयाशी गप्पा मारणे हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम होता.

दुसर्‍या दिवशी कामावर जाताना संध्याकाळी लवकर येतो असे सांगून अव्दैत कामावर गेला. मी घरी येईपर्यंत संध्याकाळी तुम्ही तिघे निसर्ग तलावाच्या तिथे असलेल्या राधाकृष्णमध्ये जाऊन या, असे त्याने अस्मीला सांगितले. त्याला चांगलेच ठाऊक होते की तिथले दहीवडे हा बाबांचा विक पाॅइंट होता. अव्दैत घरी येईपर्यंत अस्मी व तिचे आई बाबा तिथे जाऊन आले.. अव्दैतने घरी येताना सर्वांसाठी नाटकाची तिकीटे आणली होती. नाटक पाहून झाल्यावर तिथे जवळच जेवण उरकून ते घरी परतले. बाबा व आई थोडे दमले होते तरी खूश दिसत होते. दुसर्‍या दिवशीच्या जेवणात अस्मीने शालिनीबाईंना सांगून चुलीवरच्या मटण व भाकरीचा बेत केला होता. त्यांच्याकडे किचनचा ताबा सोपवून अव्दैत बाहेर पडल्यावर अस्मी त्या दोघांना घेऊन त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडली. चांगले ३ ते ४ तास खरेदी करून ती दोघे मात्र दमली होती. पण खरेदी करण्याचा उत्साह त्यांना दमून देत नव्हता. घरी आल्यावर लेकीने केलेला जेवणाचा बेत पाहून दोघेही भारावून गेले. मनाची ती अवस्था बाजूला करून बाबांनी विचारले, ” अस्मी राणी! अजून काय काय करून खाऊ घालणार आहेस ह्या आई बाबाला? ” तिला आठवले की बाबा खूश झाले किंवा भावूक झाले की तिला नुसते अस्मी न म्हणता अस्मी राणी म्हणत असत.

लवकरच आई बाबांचा घरी जाण्याचा दिवस उजाडला. अव्दैत व अस्मीने मिळून त्या दोघांना आणखीन काही दिवस राहण्यासाठी खूप आग्रह केला. पण आई बाबांनी त्यांच्या आग्रहाला जास्त उचलून धरले नाही. त्यामुळे अस्मी थोडी नाराज झाली. अव्दैतने तिला समजावले. आपल्या खोलीत आई व बाबा आपल्या सामानाची बांधाबांध करू लागले. अस्मीला न सांगताच अव्दैतने आईसाठी उंची साडी तर बाबांसाठी एक सिल्कचा झब्बा आणला होता. दोघांच्या वयाला अनुरूप असे रंग त्याने त्यांच्यासाठी आणले होते. त्यांच्या खोलीत जाऊन त्याने त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांना दिल्या आणि म्हणाला, ” पाहून सांगा जरा तुम्हाला आवडल्या का? “अस्मी आणि अव्दैत त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागले. दोघांनाही खरेदी खूप आवडली. ” ह्याची काय गरज आहे? ” अस म्हणायला मात्र ते विसरले नाहीत.

पुढल्या दिवशी सकाळी लवकर उठून दोघांनी आपले आवरले व अस्मीने बनविलेली इडली सांबार खाऊन दोघांनी आपापल्या बॅगा गाडीत नेऊन ठेवल्या. अव्दैत आज कामावर जरा उशीराच निघणार होता. आई बाबांच्या येण्याने आनंदी झालेली अस्मी आज कावरीबावरी झाली होती. गाडीपाशी थांबून सगळे एकमेकांना निरोप देत होते. झटकन पुढे होऊन अव्दैतने आई बाबांसाठी गाडीचा दरवाजा उघडला. दोघे गाडीत बसल्यावर त्याने तो हळूच बंद केला. बाबांनी त्यांच्या बाजूची काच खाली करून अस्मीला म्हटले, ” चल आता आम्ही निघतो. तुमच्याकडे येऊन खूप छान वाटले. चार दिवस कसे पटकन निघून गेले ते खरच कळलेसुद्धा नाही. पोरी किती केलेस तू आमच्यासाठी या चार दिवसांत. आमच्या दोघांचे तू आईच्या मायेने माघारपणच केलेस. ” त्यांच्या ह्या बोलण्याने अस्मीच्या नकळत तिच्या डोळ्यांतील अश्रू चटकन तिच्या गालावर उतरले. त्यांचे बोलणे तिला नकळत मोठेपणा देऊन गेले होते. बाबांच्या नजरेतून तिचे अश्रू लपले गेले कारण नेमकी त्याचवेळेस त्यांनी गाडीच्या खिडकीची काच वरती केली होती.

अव्दैतचे सहजच बाजूला उभ्या असलेल्या अस्मीकडे लक्ष जाताच तिला विचारले, ” काय ग, रडतेस की काय? ” तेव्हा तिने तेवढ्याच सहजपणे त्याला सांगितले, ” काही नाही रे काहीतरी डोळ्यात गेल्यासारखे झाले त्यामुळे डोळ्यात पाणी आले इतकेच. ” अव्दैत काय समजायचे ते समजला.

© अर्चना गादीकर निकारंगे 

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाळवंटातील हिरवळ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ वाळवंटातील हिरवळ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ‘ रिसेप्शन ‘हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.

‘कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ‘ असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये काही ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्या कार्यक्रमासाठी नवीनच आणलेल्या! प्रत्येक डिशवर पेपर नॅपकीन असतो. मंडळी रांगेत उभे राहून आपल्या हाताने आपल्याला हवे ते पदार्थ घेत असतात.

वधू-वरांना किंवा सत्कारमूर्तींना स्टेजवर जाऊन भेटवस्तू द्यायची, शुभेच्छा द्यायच्या आणि यजमानांचा निरोप घेऊन मार्गस्थ व्हायचे असा साधारण हा प्रकार असतो. यजमान बिचारे मनापासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत असतात. आपण कार्यक्रमासाठी यावे आणि शुभेच्छा किंवा शुभाशीर्वाद द्यावेत असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य होतानाही दिसतो. परंतु अलीकडे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांची सहजता जाऊन आणि मूळ उद्देश बाजूला पडून औपचारिकता आलेली दिसते.

खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक जीवनातील एक सुंदर प्रसंग! यानिमित्ताने समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र येत असतात. प्रत्येक जण नेहमी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या भेटी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी जो वेळ आपल्याला द्यावा लागला असता तो वेळ वाचतो आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्याची संधी अनायासे उपलब्ध होते. परंतु किती जण या प्रसंगाचा असा लाभ घेतात?

अशा कार्यक्रमात आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण आपला हात उंचावून त्यांना अभिवादन करतो किंवा हाय हॅलो म्हणतो. चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा असते. फार तर ” काय? कसे आहात? खूप दिवसांनी भेटला ” या पलीकडे संभाषणाची गाडी पुढे जात नाही. असा औपचारिक संवाद होऊन जो तो आपापल्या उद्योगात (म्हणजे येथे जेवण्याच्या किंवा शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात) मग्न होऊन जातो.

अशा प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र आलेले असतात. परंतु आपण सर्वांशी संवाद साधत नाही. आपल्या ओळखीचे, आपल्या बरोबरीचे, आपल्या सामाजिक स्तराला शोभतील अशा प्रकारच्या व्यक्तींशीच आपण फार तर थोडे हितगुज करतो. या कार्यक्रमात असेही काही लोक आलेले असतात की ज्यांचा सामाजिक स्तर किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा कमी असते. अशा लोकांना आपल्याशी बोलावेसे वाटते परंतु अशावेळी आपली प्रतिष्ठा किंवा अहंकार आडवा येतो आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो काही लोक तर अशाप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. आयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरोखरच कार्यक्रमाची फक्त शोभा वाढवण्यासाठी येतो आणि एखाद्या शोभेच्या वस्तूसारखेच येतो आणि जातो.

पण खरं तर असे कार्यक्रम म्हणजे लोकांशी संबंध दृढ करण्याची मोठी संधी असते असे मला वाटते. आजच्या काळात जसे आपण अनेक गोष्टींचे रिन्यूअल करतो तसेच संबंधांचे देखील रिन्यूअल करण्याची ही संधी असते. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावी यासाठी हे कार्यक्रम अनायासे संधी उपलब्ध करून देतात. पण औपचारिकता, कृत्रिमता, अभिमान, अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना यासारख्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारची चांगली संधी अशा कार्यक्रमांमधून दवडतो.

पण अशाही प्रसंगात प्रेमाने विचारपूस करणारे, आस्थेने चौकशी करणारे काही लोक भेटतात. असे लोक मला वाळवंटातील हिरवळी सारखे वाटतात. त्यांच्याजवळ कृत्रिमता नसते. अभिमान किंवा अहंकार नसतो किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही नसतात. अशी माणसे प्रेमाचे किंवा शीतलतेचे गुलाबपाणी प्रत्येकाच्या अंगावर शिंपत असतात. अशी माझ्या ओळखीची काही माणसे आहेत. ती भेटली म्हणजे जवळ येऊन आवर्जून बोलणारच! कधी कधी त्यांच्या पिशवीत गुलाबपुष्पे किंवा चाफ्याची फुले असतात. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ही फुले देऊन आपुलकीच्या सुगंधाची देवाण-घेवाण करतात. काहीजण जवळ येऊन अकृत्रिम हस्तांदोलन करतात किंवा गळाभेट घेतात. यातूनही संबंध दृढ होतात अशा व्यक्तींबद्दलची आपुलकी, प्रेम वाढीस लागते. अशी माणसे संकटप्रसंगी धावून येतात, मदतीला नेहमीच तयार असतात. अशी माणसे म्हणजे समाजरूपी उपवनात फुललेली सुंदर फुलेच! वाळवंटात सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते आणि रखरखीत वातावरण असते. अशा वातावरणात कुठे अपवादाने हिरवळ दिसली की मन प्रसन्न होते. अशीच ही माणसे वाळवंटातील हिरवळ!

© विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे भारतातच घडू शकतं… – लेखिका : मृदुला बेळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ हे भारतातच घडू शकतं… – लेखिका : मृदुला बेळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे

मी इटलीमधल्या तुरीन इथे बौद्धिक संपदा कायद्यात एलएलएम करत होते, तेंव्हाची गोष्ट आहे, 2013 सालामधली. दिवसवसभराच्या लेक्चर्सने डोकं आंबून गेलं होतं, तेंव्हा एलिझा- आमची प्रोग्राम डिरेक्टर -वर्गात आली. ” माझ्याकडे इथं होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे काही फ्री पासेस आहेत, कुणाकुणाला यायचंय बोला पटकन”, ती म्हणाली. मी अज्जिबात वेळ न दवडता हात वर केला, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एलिझा आणि आम्ही चार पाच जण या चित्रपट महोत्सवाला निघालो. जाऊन पोचलो तर समजलं की तिथं आज जे चित्रपट दाखवले जाणार होते त्यात एक भारतीय चित्रपट होता. डायलन मोहन ग्रे या दिग्दर्शकाचा ‘फायर इन द ब्लड’ या नावाचा.

हा चित्रपट पाहून बाहेर पडले तेंव्हा मी आंतरबाह्य हादरलेले होते. या हादरण्याच्या आड दडलेलं होतं एक कौतुक आणि एक शरम. जगात केवळ औषधं परवडत नसल्याने झालेल्या करोडो गरीब आफ्रिकी लोकांच्या मृत्यूने मी हादरून गेले होते. त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सिप्ला या भारतीय कंपनीच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल एक भारतीय असूनही, आणि औषधनिर्माणशास्त्राची प्राध्यापिका असूनही मला काडीचीही माहिती नव्हती, याची मला प्रचंड लाज वाटली होती. पण त्याचवेळी कौतुक आणि आदराने मन भरून आलं होतं. हा आदर होता गरीब लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत धडपडत आलेल्या, त्यासाठी योग्य धोरण, कायदे ठरवत आलेल्या भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणाबद्दल, त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राह्यलेल्या भारतीय जनरिक औषध उद्योगाबद्दल, आणि त्यातल्या सिप्ला, डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी या सारख्या औषध कंपन्यांबाबत.

त्या दिवशी महोत्सवाहून परत आले ती या विषायाचं भूत मानगुटीवर बसवून घेऊन. याबद्दल खोलात जाऊन वाचल्याशिवाय आणि माहिती करून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नव्हती. सुदैवाने वाचण्यासारखं भरपूर काही उपलब्ध होतं. मुळात औषधनिर्माण आणि पेटंट हे दोन्ही माझ्या अभ्यासाचे विषय असल्याने वाचलेलं सगळं विनासायास समजत देखिल होतं. एक दिवस अचानक असं वाटायला लागलं की, ” अरे आपल्या देशातल्या वाईट गोष्टींना नावं ठेवण्यात आपण सगळे किती हिरिरीने पुढाकार घेतो. आपल्या देशातला भ्रष्टाचार, इथली रहदारी, अस्वच्छता, गरिबी याबद्दल आपण किती सतत तक्रार करतो, टीका करतो. मग आपल्या देशाने जगासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा धिंडोराही आपण त्याच उत्साहाने पिटायला हवा, नाही का? त्यात आपण मागे का? कुणी तरी करायलाच हवं हे काम”. हा विचार डोक्याच्या एका कप्प्यात सतत सतत फेर धरून नाचत होता.

दरम्यान मी तुरीनहून भारतात परत आले, माझ्या दिनक्रमात अडकले, तरी हा विषय पिच्छा सोडत नव्हता. ” कथा अकलेच्या कायद्याची” या बौद्धीक संपदेवरील माझ्या स्तंभाचं लोकसत्तेत लिखाण सुरू झालं. या स्तंभाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखावणारा तर होताच. एक दिवस ‘ फायर इन द ब्लड’ पाहून बसलेला धक्का, वाटलेली शरम आणि जाणवलेला अभिमान, सगळे जणू कट करून गोळा झाले, आणि माझ्याभोवती फेर धरून नाचत सांगू लागले, “तूच सांग की ही कहाणी जगाला- तूच लिही” आणि माझ्याही नकळत मी आफ्रिकेत ” औषध औषध” म्हणत प्राण सोडणाऱ्या लाखो करोडो आफ्रिकन माणसांना वचन देऊन बसले – ” हो मी लिहीन”.

आणि मग सुरू झाला एक वेडं करणारा प्रवास. मिळेल तिथून, मिळेल त्या स्वरूपात, मिळेल ते वाचायला सुरुवात झाली. एक दिवस सिप्लाचे सर्वेसर्वा युसुफ हमीद यांचा ईमेल अ‍ॅड्रेस कुठून तरी मिळाला. तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ते मुळीच उत्तर देणार नाहीत हे माहित असूनही ” मला तुमच्या कामावर असं असं पुस्तक लिहायचंय” असं कळवणारा ईमेल मी त्यांना धाडून मोकळी झाले. दुसऱ्याच दिवशी त्यांचं उत्तर आलं. पुढच्याच महिन्यात ते लंडनहून भारतात येणार होते आणि तेंव्हा मला भेटायला ये असं त्यांनी मला कळवलं होतं. मी हे वाचून प्रचंड खूश झाले आणि जोमाने कामाला लागले. आणखीन झपाट्याने वाचू लागले.

दरम्यानच्या काळात ते मुंबईत आले. माझं दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. दिलेल्या वेळेला त्याना फोन करूनही ते जर उचलू शकले नाहीत तर ते आठवणीने परत फोन करत आणि ” येस्स माय डिअर गर्ल… टेल मी व्हॉट आय कॅन डू फॉर यू” असं प्रेमाने बोलायला लागून मला आश्चर्यचकीत करत असत.

शेवटी त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या वेळेच्या बरीच आधी पोचून मी मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सिप्लाच्या जुन्या कार्यालयाकडे चालत निघाले तेंव्हा मनात प्रचंड उत्कंठा तर होतीच. पण मी प्रचंड बेचैन होते. डॉ युसुफ हमीद यांच्या सारखा केम्ब्रीज मधे शिकलेला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध माणूस… अब्जाधीश… सिप्ला या भल्या मोठ्ठ्या औषध कंपनीचा सर्वेसर्वा! तो माझ्यासारख्या एका किरकोळ प्राध्यापिकेला भेटायला तयार झाला होता. आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का या विचाराने माझ्या तळहाताला घाम फुटला होता… पाय लटपटत होते… छाती धडधडत होती. एकदाची शेवटच्या मजल्यावरच्या त्यांच्या भव्य कार्यालयात जाऊन पोचले. त्यांच्या कार्यालयात होते ते स्वत: आणि एमके हमीद- त्यांचे बंधू. लालसर गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर पण बोलण्यात अत्यंत मार्दव असलेले माझ्या आजोबांच्या वयाचे डॉ. युसुफ हमीद. त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वलय होतं… आणि त्यांच्यासमोर बसल्या बसल्या ते मला जाणवू लागलं. त्यानी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला हे का लिहावसं वाटतंय असं त्यानी आधी समजून घेतलं. मग मी किती पाण्यात आहे हे जोखण्यासाठी त्यानी मला माझं या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर मग मला म्हणाले, ” हं… आता विचार”. आणि मी त्यांची मुलाखत घेऊ लागले.

उत्तरं देताना प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लख्ख आठवत होती. किती तरी औषधांच्या रासायनिक संरचना ते समोरच्या वहीत झरझर काढत होते. मधनंच ” रोझी sssरोझीssss” अश्या मोठमोठ्याने हाका मारत आपल्या सेक्रेटरीला कुठला तरी शोधनिबंध, वृत्तपत्रातला एखादा लेख, एखादं पुस्तक आणायला लावत होते. जेवायची वेळ झाली. त्या दिवशी प्रत्यक्ष डॉ. युसुफ हमीद याच्या पंगतीला बसून जेवण्याचा मान माझ्या नशिबात होता. जेवणं आटपून कॉफी पीत पीत आमची मुलाखत परत सुरू झाली. त्या दिवशी संपली नाही म्हणून दुसऱ्या दिवशीही चालू राह्यली. बोलण्याच्या ओघात मी ज्या लोकांशी बोलायला हवं अश्या किती तरी लोकांची नावं ते मला सांगत होते आणि मी लिहून घेत होते. मुलाखत संपवून मी नाशिकला परत आले तेंव्हा मी खरोखर थक्क झाले होते. डॉ. हमीद यांच्या ज्ञानी, मृदू हुशार व्यक्तीमत्वाने दीपून गेले होते.

दोनच दिवसात त्यांच्याकडून एक खोकं भरून पुस्तकं, सीडीज, वृत्तपत्रीय लेख माझ्या घरी येऊन पोचले. त्यानंतर त्यानी सांगितलेल्या या लढ्यातल्या शिलेदारांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करण्याचा माझा उद्योग सुरू झाला. ही मंडळी जगभर पसरलेली होती.

मी राजहंसच्या दि. ग. माजगावकरांना पुस्तकाची कल्पना कानावर घातली आणि त्यांनीही पुस्तक करायला आनंदाने होकार दिला. देशोदेशी पसरलेल्या माझ्या कहाणीच्या नायकांचा शोध घेण्यात गुंतून गेले.

विशेष उल्लेख करीन तो न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आरोग्य विषयक लिखाण करणारे पत्रकार डोनाल्ड मॅकनील यांचा. डोनाल्डने मला आतोनात मदत केली. डॉ. हमीद यांचं काम सगळ्यात आधी जगाच्या नकाशावर जाहीरपणे आणलं ते डोनाल्डने- न्यू यॉर्क टाईम्समधे याबाबत लेख लिहून. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डोनाल्डने मला मोठमोठे ईमेल्स लिहिले, दुसऱ्याना फोनवर दिलेल्या मुलाखती मला पाठवल्या, स्वत: लिहिलेलं काही लिखाण पाठवलं… आणि इतर किमान पन्नास लोकांशी माझ्या ओळखी करून दिल्या. या सगळ्यांची मी आजन्म ऋणी राहीन.

तुरीनला असताना जी कहाणी ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते, हलले होते, ती कहाणी या सगळ्या मंडळींबरोबर जणू पुन्हा एकदा जगले. त्या कहाणीचा एक भाग झाले. या सगळ्यांशी बोलताना, या बद्दल लिहिताना अनेकदा फार भावनिक व्हायला झालं. ही कहाणी लिहिताना औषधनिर्माणशास्त्राची एक प्राध्यापक आणि आजन्म विद्यार्थिनी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी काय आहे याची लख्ख जाणीव मला झाली. ती जाणीव माझ्या विद्यार्थ्यांमधे यावी म्हणून मी फार विचारपूर्वक प्रयत्न करू लागले.

या विषयातली सगळी तांत्रिक माहिती लिहायची, पण ती सामान्य माणसाला समजली पाहिजे, त्यासाठी ती कादंबरीसारख्या फॉर्ममधे कशी लिहिता येईल, हे एक मोठंच आव्हान होतं.

सामान्य माणूस महाग औषधं घेत राहतो आणि पिळवटला जातो. हे थांबवण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यात फार उत्तम सुविधा आहेत. त्यावर जगभरातून, विशेषतः अमेरिका आणि युरोपातून प्रचंड टिका होते, भारतावर प्रचंड दबाव आणला जातो. पण आपलं सरकार बधत नाही. आमच्या जनतेचं आरोग्य तुमच्या पेटंटसपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ठणकावून सांगत राहते. रेडक्रॉस, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स सारख्या सेवाभावी संस्थांना गरीब देशात काम करण्यासाठी morning स्वस्त पण उत्तम दर्जाची औषधं भारत पुरवत राहतो. पण त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जाबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या देशांचाही सगळ्यात मोठा निर्यातदार बनतो. भारत हे कसं करू धजावतो हे जाणून घेण्यात इतर देशातल्या लोकांना प्रचंड रस असतो. आर्जेन्टिना, इंडोनेशियातले लोक जेंव्हा येऊन सांगतात की “सामान्य नागरिकांना औषधं स्वस्तात मिळावी म्हणून काय करायचं हे भारताने आम्हाला शिकवलंय आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतोय”, तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.

सगळ्या जगाची फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचा आपण एक लहान बिंदू इतका छोटा भाग आहोत या विचाराने फार कृतार्थ वाटतं! आणि म्हणूनच हे ऋण फेडण्यासाठी माझ्यासारख्या या बिंदूने केलेला एक छोटासा प्रयत्न, उचललेला एक खारीचा वाटा, म्हणजे #अशीही_एक_झुंज हे पुस्तक आहे. भारताबद्दल अभिमान वाटण्याचे आणखी एक कारण हे पुस्तक वाचकांना नक्की देईल याची मला नुसती आशा नव्हे तर खात्री वाटते!

लेखिका : मृदुला बेळे

प्रस्तुती : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अडगळीत गेलेले शब्द — ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अडगळीत गेलेले शब्द — ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की अडगळ हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.

.

पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.

.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.

.

माळा (आताच्या मराठीत अँटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.

.

तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.

.

‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.

.

घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.

.

पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात – ती पागोळी.

.

‘फडताळ’… फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.

.

जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.

.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला

‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल, वैल, निखारे हे शब्दही गेले.

.

स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले.

.

ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.

.

पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले.

.

देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी गायब.

.

‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

.

कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,

.

पण उत्तरवस्त्र पाभरी’ हरवून गेली.

.

सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.

.

सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.

.

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या – ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे – त्या गडप झाल्या.

.

सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

.

जेवण्याची पितळी, वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.

बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.

उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला चोप म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. हे पण अडगळीतील नावे आहेत…

.

लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात. भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच…


संकलक / लेखक : डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘देहावसान’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘देहावसान’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

प्रा. डॉ. लोपा मेहता, या मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्यांनी तेथील एनॅटॉमी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले.

७८ व्या वर्षी त्यांनी ‘लिव्हिंग विल‘ तयार केले. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे —

‘जेव्हा शरीर साथ देणे बंद करेल, आणि सुधारण्याची कोणतीही शक्यता उरणार नाही, तेव्हा माझ्यावर उपचार करू नयेत.

ना व्हेंटिलेटर, ना ट्यूब, ना रुग्णालयातील निरर्थक धावपळ.

माझा शेवटचा काळ शांततेत जावा — जिथे उपचारांच्या हट्टापेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य असेल.’

 

डॉ. लोपा यांनी केवळ हा दस्तऐवजच लिहिला नाही, तर मृत्यूविषयी एक संशोधन-पत्रही प्रकाशित केले. त्यात त्यांनी मृत्यू ही एक नैसर्गिक, निश्चित आणि जैविक प्रक्रिया आहे, असे स्पष्ट केले आहे.

त्यांचा मुद्दा असा की, आधुनिक वैद्यकशास्त्राने मृत्यूला स्वतंत्र संकल्पना म्हणून कधी पाहिलेच नाही. वैद्यकशास्त्राचा आग्रह असा राहिला, की मृत्यू नेहमी एखाद्या आजारामुळेच येतो, आणि जर आजारावर इलाज झाला, तर मृत्यू रोखता येतो.

पण शरीराचे विज्ञान त्याहून खूप खोल आहे.

 

त्यांचा युक्तिवाद असा आहे — शरीर हे अखंड चालणारे यंत्र नाही. ती एक मर्यादित प्रणाली आहे, ज्यात ठराविक जीवनशक्ती असते. ही ऊर्जा कुठल्यातरी टाकीमधून मिळत नाही, तर सूक्ष्म शरीरामार्फत मिळते.

हेच ते सूक्ष्म शरीर, ज्याचा अनुभव प्रत्येकाला येतो, पण जो दिसत नाही. मन, बुद्धी, स्मृती आणि चेतना — या सगळ्यांनी मिळून बनलेली ही प्रणाली आहे.

 

हे सूक्ष्म शरीर म्हणजे जीवनशक्तीचं प्रवेशद्वार आहे. ही ऊर्जा संपूर्ण देहात पसरते, आणि शरीर जिवंत ठेवते. हृदयाची धडधड, पचनक्रिया, विचार करण्याची क्षमता — हे सगळे तिच्या आधारावर चालते.

पण ही शक्ती अमर्याद नाही. प्रत्येक शरीरात तिचे एक ठराविक प्रमाण असते. जसे एखाद्या यंत्रात बसवलेली फिक्स्ड बॅटरी— ना वाढवता येते, ना कमी करता.

“जितकी चावी भरली रामाने, तितके चालेल खेळणे” — असा प्रकार.

 

डॉ. लोपा लिहितात, की जेव्हा शरीरातील ही ऊर्जा संपते, तेव्हा सूक्ष्म शरीर देहापासून वेगळे होते. तोच क्षण म्हणजे देह स्थिर होतो, आणि आपण म्हणतो, “प्राण गेले. ”

ही प्रक्रिया ना आजाराशी संबंधित असते, ना कुठल्या चुकांशी. ही शरीराची अंतर्गत लय आहे — जी गर्भातच सुरू होते, आणि पूर्ण होऊन मृत्यूला पोहोचते.

या ऊर्जेचा खर्च प्रत्येक क्षणी चालतो — प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव आपला जीवनावधी संपवतो. आणि जेव्हा संपूर्ण देहाचे “कोटे” पूर्ण होतात, तेव्हा शरीर शांत होते.

 

मृत्यूचा क्षण हा घड्याळाने मोजलेला नसतो. तो एक जीवनशास्त्रीय वेळ असतो — जो प्रत्येकासाठी वेगळा.

कुणाचे जीवन ३५ वर्षांत पूर्ण होते, तर कुणाचे ९० वर्षांत. पण दोघेही आपली पूर्ण वाटचाल करतात.

जर आपण त्याला पराभव किंवा जबरदस्ती मानले नाही, तर कुणीही अपुरे मरत नाही.

 

डॉ. लोपा यांच्या मते आधुनिक वैद्यकशास्त्र जेव्हा मृत्यू टाळण्याचा हट्ट धरते, तेव्हा केवळ रुग्णाचे शरीरच नाही तर संपूर्ण कुटुंब थकते.

ICU मधील महिनाभराची श्वासोच्छ्वासाची किंमत कधी कधी आयुष्यभराच्या बचतीला नेस्तनाबूत करते.

नातेवाईक म्हणत राहतात — “अजून आशा आहे, पण रुग्णाचा देह कधीच सांगून गेलेला असतो — “आता पुरे”.

 

म्हणूनच त्या लिहितात — जेव्हा माझी वेळ येईल, तेव्हा फक्त मला KEM रुग्णालयात घेऊन या. जिथे मला खात्री आहे, की अनावश्यक हस्तक्षेप होणार नाही. उपचारांच्या नावाखाली दूरगामी त्रास दिला जाणार नाही. माझ्या शरीराला रोखले जाणार नाही — त्याला जाऊ द्या”*.

 

पण प्रश्न हा आहे — आपण आपल्यासाठी असे काही ठरवले आहे का?

आपले कुटुंब त्या इच्छेचा मान ठेवेल का? आणि जे मान ठेवतील त्यांना समाजात मान मिळेल का?

आपल्या रुग्णालयांत अशा इच्छेचा सन्मान आहे का, की अजूनही प्रत्येक श्वासावर बिल होणार आणि प्रत्येक मृत्यूवर दोषारोप?

 

हे इतके सोपे नाही. तर्क आणि भावना यांचा समतोल साधणे कदाचित सर्वात कठीण काम आहे.

जर मृत्यूला आपण शांत, नियत आणि शरीराच्या अंतर्गत गतीतून आलेली प्रक्रिया म्हणून पाहायला शिकलो, तर कदाचित मृत्यूची भीती कमी होईल, आणि डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा जास्त वास्तववादी होतील.

 

माझ्या मते, मृत्यूशी लढणे थांबवायला हवे आणि त्याआधी जगण्यासाठी तयारी करायला हवी.

आणि जेव्हा तो क्षण येईल — तेव्हा शांतपणे, सन्मानाने त्याला सामोरे जावे.

 

बुद्धांच्या भाषेत — मृत्यू म्हणजे जीवनाच्या प्रवासातील पुढचा टप्पा आहे.

  

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ यंत्र आणि मानव… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

यंत्र आणि मानव☆ सौ शालिनी जोशी

यंत्र हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यंत्रामुळेच आपले जीवन सहज, सुलभ, कमी कष्टाचे व आनंददायी झाले आहे. आपण कोणतेही नवीन यंत्र घेतो, तेव्हा त्याची पूजा करून त्याचे स्वागत करतो. यात आनंद असतो. पण ज्यावेळी जुन्या, कार्यक्षमता संपलेल्या यंत्राला निरोप द्यायची वेळ येते, तेव्हाही आपले मन तेवढेच हळवे होते. इतके दिवस त्या यंत्राने केलेल्या मदतीच्या ऋणाची भावना त्यात असते.

मिग २१ विमानांच्या निरोपाची बातमी वाचली. आपल्या संरक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग असलेले, सहा दशके हवाई दलात सेवा दिलेली ही विमाने चंदीगड हवाई दलावर समारंभपूर्वक निवृत्त झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अखेरच्या उड्डाणाचे वैमानिक हवाई दलप्रमुख एअरचिफ मार्शल अमरप्रीतसिंग हे सहभागी झाले होते. निरोप देताना सर्व वायूवीरांचे मन दाटून आले. सर्वच सैनिकांची भिस्त शेवटी यंत्रावर असते. त्यामुळे यंत्राशी त्यांचे भावनिक नाते निर्माण होते. प्रत्येक यंत्राला त्याच्या स्वरूपा नुसार एक प्रथा, परंपरा, विशिष्ट कार्य संस्कृती प्राप्त झालेली असते. त्याचा अंगीकार वीर सैनिक करतात. त्याचे त्यांना सवय होते. व्यवहारातही हाच आपला अनुभव असतो.

विहित कालावधी पलीकडे माणूसही जगत नाही. तेथे यंत्राचे काय? हीच गोष्ट इतर सर्व क्षेत्रातील यंत्रांच्या बाबतीत घडत असते. जुने जाणे ही नवनिर्मितीला प्रेरणा ठरते. जुने मागे पडून, नवीन तयार होणारी यंत्रे जास्त सुधारित, उपयुक्त व वापरायला सोपी असतात.

अश्मयुगात माणसाकडे काहीच नव्हते. मग आपल्या संरक्षणासाठी व इतर कामासाठी माणसाला साधनांची गरज भासू लागली. त्यावेळी संरक्षणासाठी टोकदार दगड वापरत. त्यात सुधारणा होत भाले, बरच्या, तलवारी, बंदुका,——- रणगाडे अशी प्रणाली निर्माण होत गेली. पदार्थ कुटण्यासाठी घेतलेल्या दोन दगडातून——- जाती, गिरण्या, मिक्सर अशी यंत्रे निर्माण झाली. सर्वच क्षेत्रात अशी प्रगती झाली आणि होत आहे. शेतकऱ्यांसाठी खुरपे, कुदळ, नांगर—- ट्रॅक्टर आले. लिहिण्यासाठी बोरु, टाक, पेन— लॅपटॉप, स्मार्टफोन ने तीही गरज संपली. बैलगाड्या—- विमाने अशी  वाहने बदलली. सर्वच क्षेत्रातील साधनात विविधता आली .आणि ही सारी यंत्रेच.

खरंतर आपली संस्कृती निसर्गाशी निगडित, त्यावर अवलंबून. म्हणून पशु,पक्षी, चंद्रासारखे ग्रह, सूर्यासारखे तारे, समुद्र,भूमी यांना आपण सणात मान देतो. देवतारूप देऊन त्यांची पूजा करतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तीच गोष्ट यंत्रांची. यंत्रे आपण निर्माण केली. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुलभ, सोपे, कमी कष्टाचे आनंददायी व सुखकर झाले. त्याची आठवण ठेवून, नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीला यंत्र पूजा केली जाते. यंत्राची स्वच्छता करून त्याची पूजा करणे म्हणजे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. त्या जड यंत्रातही आपण देव पहातो. झेंडूच्या फुलांनी त्याची सजावट करतो. मोठ्या कारखान्यापासून घरगुती स्वरूपापर्यंत हे पूजा होते. मात्र मध्य युगात लढायांचे प्रमाण वाढले. त्यामुळे यंत्र पूजा ही शस्त्रपूजा झाली. आणि त्याला खंडेनवमी म्हणून लागले. कारण खड्ग म्हणजे तलवार, त्याचे खंडे झाले. अशीही आपली संस्कृती गुढ आहे.उदार आहे.निसर्गा सकट सर्व उपयोगी वस्तूंची  काळजी घेऊन माणसाने सुखाने जगावे हा हेतू.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

(“आपल्या धर्मात एक फार चांगली रीत आहे. अग्निसंस्कार झाल्यावर, म्हणजे मृताचा मस्तकभंग झाल्याचा ध्वनी ऐकल्यावर जेव्हा आप्तेष्ठ स्मशानातून निघून जाऊ लागतात, तेव्हा तिथं स्मशानात जमलेल्या आप्तेष्ठांमधे जो वयानं सर्वात जेष्ठ असेल अशा व्यक्तीनं, अग्निसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचं सर्वांसमक्ष अभिनंदन करावं. त्यानं केलेल्या या पुण्यकर्माचं कौतुक करावं म्हणजे इतरांनाही अशी सत्कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. ते ही आपल्या जिवलगांविषयी आदरभाव, कृतज्ञता बाळगून अशी कर्मं करण्यास उद्युक्त होतात. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि प्रथा पुढेही चालू रहातात.) 

इथून पुढे – – 

मला जवळ बोलावण्यामागे त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी बोलून दाखविला. म्हणाले, “इथं जमलेल्या समाजात मीच वयानं जेष्ठ दिसतो. माझं वय आता सत्त्याऐंशी आहे. म्हणून मलाच हे कर्तव्य करायला हवे. तुमच्या भावाचं अभिनंदन करायला हवं. मी त्यांच्याशी, इतर लोकांशी बोलू शकतो का? ” मी म्हणालो, ” अहो भाग्यम्! निश्चित बोलू शकता. यामुळे सर्वांना बरंच वाटेल. चार ज्ञानाच्या गोष्टी समजतील. ” 

“ज्ञानाविषयी म्हणशील तर ज्ञानदानही सत्पात्री करावं. गुरूनं शिष्य नीट पारखून, त्याची योग्यता तपासून मगच त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्ञान द्यावं. अशिष्याला ज्ञान देऊ नये. ‘अशिष्याय न देयम्’ असं शास्त्रवचनच आहे.

स्मशान हे ज्ञानदानासाठी सर्वात पवित्र स्थान आहे. स्मशानात अगदी एखाद्या चांडाळानं जरी ज्ञानयाचना केली तर गुरुनं त्याच्या अधिकाराचा, योग्यायोग्यतेचा कोणताही विचार न करता त्याला अवश्य ज्ञान द्यावं असंही शास्त्र सांगतं. इथं जमलेले तुम्ही तर सर्व ज्ञानाचे अधिकारी आहात. मी अवश्य बोलेन.

तुला व्यक्तिशः मात्र तत्वज्ञानाचं सार असणारा आचार्यांचा एक श्लोक सांगतो. जमेल तसं, वेळ मिळेल तेव्हा यावर चिंतन करीत रहा. कल्याणमस्तु! “

स्वामींनी स्मशानभूमीत मला सांगितलेला श्लोक आणि त्याचा अर्थ असा…

किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं

स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे।

चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने

किं तत्रामहतो भवान्परमकं ज्योतिस्तद्स्मि प्रभो।।

स्पष्टीकरण:- 

‘किं ज्योतिः तव? ‘- कोणता प्रकाश तुझ्या उपयोगाला येतो? दिवसा सूर्याचा ‘रात्रौ प्रदीपादिकं’ – दिव्यामुळं. (दिवा नसल्यास चंद्र, अग्नी इ. मुळं) ‘स्यादेव’- असूदे! पण ‘रविदीपदर्शनविधौ किं ज्योति? ‘ सूर्य, दिवा इ. च्या ज्ञानाचं साधन कोणतं? ‘आख्याहि हे’ ते मला सांग. ‘चक्षुः’ (हो महाराज) डोळे. ‘तस्य निमीलनादिसमये किं? ‘ हे डोळे झाकल्यावर कशानं ज्ञान होतं? ‘धीः’ म्हणजे बुद्धीनं. ‘धीयो दर्शने किं? ‘ आणि बुद्धीचं ज्ञान कशानं होतं? ‘तत्राहम्’ – (हे बुद्धीचं ज्ञान व्हायला) मीच कारणीभूत आहे. आचार्य पुढे म्हणतात, ‘अतो भवान् परमकं ज्योतिः’ म्हणून या सर्वांना (सूर्य, चंद्र, दिवा, बुद्धी, डोळे) प्रकाश देणारा तूच आहेस. तूच परंज्योती स्वयंप्रकाश आत्मा आहेस!

स्वामींचा प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकत होतो. आमच्या या चर्चेत अर्धा पाऊण तास गेला असेल. तेवढ्यात जळणाऱ्या चितेतून ‘फट्’ असा ध्वनी उमटला. दोन-तीन निखारे ढासळले. काही ठिणग्या, सूक्ष्म धूम्ररेखा आणि अग्निशिखा बाहेर पडल्या. हे पाहून स्वामीजी बोलायचं थांबले आणि म्हणाले, “आता खऱ्या अर्थानं देहातील पंचही प्राणांचं उत्क्रमण झालं आहे. पार्थिवही पंचत्वात विलीन झालं आहे. आता इथंच थांबूया. येवढं पुरे. चला, लोक निघून जातील. त्यापूर्वी त्यांच्याशी बोलू. “

मी सर्वांना एकत्र जमवून, दोन मिनिटं मौन पाळून, समुदायिक श्रद्धांजलि अर्पण करायची विनंती केली. मौन झाल्यानंतर स्वामींनी पुढे येवून जमलेल्या सर्वांसमक्ष दादाचं अभिनंदन केलं, आभार मानले आणि समाजाला दोन तात्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या.

ते म्हणाले, “सज्जनहो, हा मृत्युलोक आहे. इथं येणाऱ्या आपल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. जीवन क्षणभंगुर आहे हे स्मशानात आल्यावर कळतं आणि मनात वैराग्य उत्पन्न होतं. पण हे वैराग्य अल्पकाळ टिकणारं असतं. ‘मैथुन वैराग्य’, ‘प्रसूति वैराग्य’ आणि ‘स्मशान वैराग्य’ ही तिन्ही प्रकारची वैराग्यं अल्पजीवी असतात. ज्ञानप्राप्तीतून येणारं निर्भय वैराग्य चिरकाळ टिकतं आणि त्यातून माणूस अध्यात्माच्या वाटेवरून प्रवास करीत आपलं कल्याण साधतो. असो.

गेलेली व्यक्ती उत्तरायणात, महिन्याच्या शुक्लपक्षात, दिवसाच्या पूर्वार्धात गेल्यानं शास्त्रात सांगितल्या प्रमाणे ती निश्चितच प्रकाशमार्गानं उर्ध्वगतीला जाणार आहे. असा मृत्यु केवळ पुण्यवान माणसालाच प्राप्त होतो. शरीर नष्ट झालं तरी आत्मा अमर आहे हे आपण जाणता. तेव्हा शोक करू नये. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळत राहतील. ईश्वर सर्वांचे कल्याण करो. येवढं बोलून स्वामींनी आपलं अल्पसं पण प्रामाणिक, परिणामकारक प्रबोधनपर निवेदन संपविलं.

स्वामींचे आभार मानून, त्यांना वंदन करून मीही इतरांबरोबर स्मशानातून घरी जायला निघालो. नळावर जाऊन हातपाय धुतले आणि जाता जाता पुन्हा स्वमींकडे पाहिलं. स्वामी हात उंचाऊन सर्वांना निरोप देत तिथेच उभे होते. बाजूच्या काळोखात जळणारी चिता आणि तिच्या केशरी प्रकाशात कौपीनधारी स्वामींची मूर्ती उठून दिसत होती. त्यांचे तेजस्वी पण दयार्द्र डोळे विशेष चमकत होते!

काही दिवसात आमचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. जो तो आपापल्या उद्योग व्यवसायात व्यस्त झाला. अशी काही वर्षं गेली.

१९८५-८६ (नक्की वर्ष आठवत नाही) च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही कुटुंबियांनी चारधाम यात्रेला जायचं ठरवलं. प्रवासाचं नियोजन करताना कळलं की या यात्रेत उत्तरकाशी हे स्थान लागतं. मला एकदम मामाच्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानात भेटलेल्या स्वामी चिद्विलासानंदभारतींची आठवण झाली. ते उत्तरकाशीहून पुण्यात आले होते त्यावेळी. म्हणजे ते इथल्याच कुठल्यातरी मठात, आश्रमात असणार असा तर्क करून मी या यात्रेत त्यांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. त्यासाठी वेळ पडल्यास उत्तरकाशीत दोन दिवस वास्तव्य करायचं निश्चित केलं.

जेव्हा प्रत्यक्ष उत्तरकाशीत गेलो तेव्हा समजलं की इथं बरेच आश्रम आहेत. आपले स्वामीजी नक्की कुठल्या आश्रमात असतील हे कसं कळणार? त्यांच्या नावाखेरीज आपल्याला तर त्यांच्याविषयी अधिक काहीच माहित नाही. आपण त्यांना त्यांच्या नावाखेरीज अधिक काही विचारलंच नव्हतं. मग त्यांचा शोध घ्यावा कसा? कुणाला विचारावं? त्यांना कुठं शोधायचं? कसं शोधायचं?

मी ठरवलं आता प्रत्येक आश्रमात चौकशी करायची. कुठंतरी सापडतील की. निदान त्यांची काही तरी माहिती तर मिळेलच. हाँटेल मालकाच्या मदतीनं एका स्थानिकाला बरोबर घेऊन मी माझी ‘श्रीस्वामीशोधमोहीम’ सुरू केली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो आणि एकेका आश्रमाला भेट द्यायला सुरवात केली. दिवसाचा पूर्वार्ध अगदीच वाया गेला. उपलब्ध माहिती इतकी त्रोटक होती की त्या माहितीवरून अनोळखी परगावात केवळ टोपण नावावरून एखादी व्यक्ती मिळणं जवळ जवळ अशक्य होतं. मी निराश झालो. ‘आता थांबावं, उगाच कालापव्य नको’ असं मनात येऊ लागलं तोच रस्त्यानं समोरून दोन तरूण जटाधारी साधक येताना दिसले. माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

मी त्यांना हाटकलं, अभिवादन केलं आणि विचारलं, “स्वामिजी, मी महाराष्ट्रातून आलोय. मला इथं कुठल्यातरी मठात राहणारे स्वामी चिद्विलासानंदभारती यांना भेटायचं आहे. मला त्यांच्या मठाचं नाव माहित नाही पण ते इथंच उत्तरकाशीत वास्तव्याला असतात. पुण्यात त्यांचा आणि माझा परिचय झाला होता. त्याला आता पाच वर्षं झाली. आपण मला काही मार्गदर्शन करू शकाल का? ” 

पुण्याचा उल्लेख ऐकल्यावर त्यातला एक जण जरा चमकला आणि चटकन म्हणाला, “आप हमारे आश्रम चलिये। हमारे गुरुजी शायद कुछ बता सकेंगे उनके बारेमे। चलिये हमारे साथ। आश्रम यही, नजदीकही है।” 

आम्ही त्यांच्या मागून आश्रमात गेलो. त्यांनी आम्हाला आपल्या गुरुजींसमोर उभं केलं. मी गुरुजींना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद देत त्यांनी मला आसन ग्रहण करण्याची विनंती केली तसा मी जवळच्या दर्भासनावर बसलो.

गुरुजी मधुर वाणीनं म्हणाले, “कहियेजी, आप किसे ढूँड रहे है? आपको क्या चाहिये।” यावर मी त्यांना स्वामींविषयी माझ्याकडे होती तेवढी माहिती सांगून मला स्वामींच्या दर्शनाची तीव्र इच्छा असल्याचं सांगितलं. माझं सगळं म्हणणं शांतपणे, एकाग्रतेनं ऐकल्यावर गुरुजींनी एक दीर्घ उच्छ्वास सोडला केवळ, आणि गप्प बसले. मी आधीरतेनं म्हणालो, “क्या हुवा गुरुजी? मैने कुछ गलत तो नही कहाँ? ” त्यावर गुरुजींनी पुन्हा एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले, “नहीजी, आप बिलकुल उचित स्थानपर आए है, परंतु आनेका समय अनुचित चुना आपने। स्वामी चिद्विलासानंदभारतीजी यही रहते थे।”

“रहते थे? अर्थात्? अब यहाँ नही रहते? कही बाहर गये है? वो अब कहाँ हो सकते है? आप हमे कुछ बता सकते है? ताकि हम वही जाकर उनका दर्शन करेंगे।” मी आधीरतेनं एका श्वासातच प्रश्नावर प्रश्न विचारले. गुरुजींनी आकाशाकडं पाहिलं आणि विषण्णपणे उद्गारले, “ओंम् शांति, शांति शांतिः। वत्स, स्वामिजी तीन वर्ष पूर्व, वृद्धावस्थाके कारण समाधिस्थ हो गये।मृत्युसमय उनकी आयू पूरे नब्बे वर्षकी थी। उनका अंतिम संस्कार यही नदीके तटपर किया गया और उपर समाधि स्थापित की गयी।” 

ही दुःखद वार्ता ऐकून मला फार वाईट वाटलं. मी तसाच व्यथित मनानं आसनावर बसून राहिलो. डोळे नकळत पाझरू लागले!

भावनावेग मंदावल्यावर मी स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर गुरुजींनी जे सांगितलं ते ऐकून मी पुरेपूर हादरलो. गुरुजींनी सांगितलं की, “गेल्या वर्षी उत्तर काशीला भूकंप झाले, भूस्खलने झाली, नद्यांना महापूर आले. त्यात स्वामींजींची समाधी वाहून गेली. अक्षरशः ‘गंगार्पणमस्तु’ झाली. नदीचा आकार बदलला आणि काठचा भूगोलही बदलला. आता स्वामींच्या केवळ स्मृती विद्यमान आहेत! ‘

दहा मिनिटं कोणी काहीच बोललो नाही. नंतर मी उठलो. गुरुजींना वंदन केलं आणि आश्रमाबाहेर पडलो. दूर अंतरावरून संथपणे वाहणारी नदी दिसत होती. तिच्याकडे पाहताना मला वाल्मिकी रामायणातला श्लोक आठवला

यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महादधौ

समेत्यच व्यपेयातां तद्वत् भूतसमागमाः।l

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाहि गाठ।l

– समाप्त – 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १० ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. १० ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मनामनातील वेताळ ::: समारोप

विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकल्या असतील, वाचल्या असतील…

त्या गोष्टीतील वेताळ जसा त्या विक्रम राजास त्रास द्यायचा तसा त्रास सध्या अनेक प्रकारचे अनेक वेताळ अनेक प्रकारांनी आपल्याला त्रास देत आहेत… , छळत आहेत, नव्हे छळकपट करीत आहेत, असे आपल्या लक्षात येईल.

श्रीरामरक्षेमध्ये एक श्लोक आहे…

*”पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥”*

अर्थ: पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः – याची फोड पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः अशी आहे. पातालभूतलव्योमचारिण: – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः – कपटी, मायावी खोटे सोंग घेणारे (राक्षस)

रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे (पहिल्या ओळीत वर्णन केलेले) मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत.

या श्लोकाचा संदर्भ आपल्याला आज सुद्धा लागू होतो…

अनेक वेताळ आपले मायावी रूप घेऊन आपल्या मनावर अधिराज्य करीत आहेत. त्यातील मोजक्या वेताळांचे वर्णन करण्याचा प्रयत्न मी माझ्या काही लेखात केला आहे…

तरीही काही छद्मी वेताळ आपल्या मनात दडून बसलेले आहेत, त्यांचा उल्लेख जाताजाता करतो…

# अतिरेकी सर्वधर्मसमभाव

# सद्गुण विकृती

# अंधानुकरण

# कुपमंडुक वृत्ती

# मला काय त्याचे?

# चांगले आईबाप न होता लोकप्रिय पालक होण्याची चढाओढ

# विहीत स्वार्थ न पाहता वैयक्तिक स्वार्थाकडे धावण्याची वृत्ती

माझ्या अल्पमतीने हे वेताळ मांडण्याचा प्रयत्न मी केला. या वेताळांचा त्याग करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे…!

राजेश खन्ना यांच्या तोंडी आनंद चित्रपटात एक छान संवाद आहे. तो सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही…

*”बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं”*

आपल्याला जर खऱ्या अर्थाने जीवन जगायचे असेल तर मग वर उल्लेख केलेल्या आणि आपल्या मनात दडून बसलेल्या अनेक वेताळांचा आपल्याला त्याग करावा लागेल…

तसा प्रयत्न आपण खात्रीने कराल असा विश्वास वाटतो…

कोणतीही रेघ जर न खोडता छोटी करायची असेल तर त्या रेघेच्या बाजूला आणिक एक मोठी रेघ आखावी लागते…

ही रेघ विवेकाची असावी…

विवेक या शब्दाची व्याप्ती खूप विशाल आहे. आपण ती नीट समजून घ्यावी अशी प्रार्थना.

शुभेच्छा!!!

 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

*

रविंद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव असे कवी आहेत, ज्यांनी रचलेल्या दोन काव्यांना भारत व बांगलादेश या दोन राष्ट्रांनी आपले राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली आहे. परंतु का कोण जाणे, पण त्या काळातील तथाकथित विचारवंतांमध्ये टागोरांबद्दल गैरसमज फार होते व कदाचित ते जाणून बुजून पसरविलेही जात होते. कदाचित टागोर एका उच्चशिक्षित, सुखवस्तू, जमिनदार घरात जन्मले होते, त्यांचे बंधू ब्रिटिश सरकारमधे अंमलदार होते, त्यांच्या वडिलांची उच्च सरकारी अधिकाऱ्यांत उठबस होती म्हणून असेल. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून असेल.

सुरवातीच्या काळात ते सरकारवर फारशी जहाल टीका जाहीरपणे करत नसत. जे कांही म्हणायचं ते आपल्या लेखनातून, काव्यातून म्हणत. “जनगणमन अधिनायक जय हे” हे गीत टागोरांनी इंग्रज बादशहाच्या स्वागतासाठी लिहिलं होतं हा गैरसमज आजही कित्येकांच्या मनात आहे. पण त्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात लिहिलेल्या लेखांना तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. ब्रिटिश युवराज भारतात आले तेव्हा टागोरांनी म्हटलं होतं, “स्वतःच्या बळाचं प्रदर्शन करणाऱ्या राजाचं स्वागत करणं म्हणजे कैद्यांच्या पंगतीला मेजवानी म्हणण्यासारखं आहे. “

ब्रिटिश साम्राज्यशाहीने भारतीयांना स्वत्वहीन करून टाकले होतं व गोऱ्या कातड्याच्या लांगूलचालनात उच्चभ्रू समाज धन्यता मानत होता. यावर १८८४ साली, वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसच्या धुरिणांना उद्देशून लिहिलं होतं की, इंग्रजांपेक्षा स्वतःला हीन दीन समजून वागणारे लोक त्यांच्यापुढे हात जोडून “आम्हाला बरोबरीचा दर्जा द्या” अशी मागणी करणार आहेत काय? आम्ही स्वत:च्या हिमतीवर आपली, आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवू शकणार नाही काय? जे स्वतःचा मान स्वतः राखू शकत नाहीत, त्यांचा मान राखायला परके येणार आहेत काय? का आपण स्वभाषेत बोलत नाही? का स्वदेशी वस्त्रं वापरत नाही? का म्हणून आम्हीच आमच्या मनात स्वदेशाची घृणा बाळगतो? ” असा विचार करणारा व ते बोलणारा, लिहिणारा कवी ब्रिटिश राजासाठी स्वागतगीत लिहिल का?

रविंद्रनाथांनी उत्तम इंग्रजी येत असूनही, वयाच्या पन्नाशी पर्यंत फक्त बंगाली भाषेतून लिहिलं व बंगालीतूनच भाषणं केली. पण त्याचवेळी उत्तम इंग्रजी कविता, धर्मोपसानेचे संस्कृत मंत्र, संत तुकारामांचे अभंग इ, साहित्य आपल्या वंग बांधवांसाठी बंगालीत भाषांतरित केले.

जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतर त्यांनी आपला ‘सर’ हा किताब परत केला होता हे सर्वांना ठाऊक आहे पण वयाच्या ८०व्या वर्षी मृत्युशय्येवरून त्यांनी लिहिलेले (कृष्ण कृपलानींकडून लिहून घेतलेले), ब्रिटिश राजवटीला सणसणीत चपराक मारणारे त्यांचे अनावृत्त पत्र मात्र कुणाला फारसे ठाऊक नाही. दुर्दैवाने त्यानंतर दोनच महिन्यांनी ते वारले. पण या पत्रात त्यांनी “आधी भारतीयांचे शोषण थांबवा, त्यांना स्वतंत्र करा आणि मगच नाझींच्या विरुद्ध लढायला बोलवा” अशी जी मागणी केली होती त्याचाच स्फोट म. गांधींच्या ८ ऑगस्ट १९४२च्या ‘चले जाव’च्या भाषणात झालेला दिसला.

मनाला झोंबणाऱ्या भावनांना आपल्या गीतातून वाचा फोडणाऱ्या या महाकवीची “आमि भय करबोना” सारखी गीतं गात हजारो बंगाली तरूण वंगभंगाच्या चळवळीत पोलिसांच्या लाठ्या खात होते. “आमार शोनार बांगला” “ऍकला चलो रे” ही त्यांची सुप्रसिद्ध स्फूर्तीदायक गाणी याच चळवळीतली!

(संदर्भ – रविंद्रनाथ: तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

—– 

☆ गीत : ३७ ☆

I THOUGHT that my voyage had come to its end at the last limit of my power, ⎯ that the

path before me was closed, that provisions were exhausted and the time come to take 

shelter in a silent obscurity.

But I find that thy will knows no end in me. And when old words die out on the tongue,

new melodies break forth from the heart; and where the old tracks are lost, new country is revealed with its wonders.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत: ३७ ☆

*

वाट संपली, प्रवास थांबला

डळमळला विश्वास आतला

हीच वेळ कां चिरनिद्रेची?

*

तान थबकता ओठावरची

सरगम उसळे हृदयांतरीची 

असेल कशी ही खूण अंताची?

*

वाट हरवता वाटेवरची

निर्मिती होते नव विश्वाची

अंतच हा नां त्या अंताचा? सांग तूचि!

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत ३८ ☆

THAT I want thee, only thee ⎯ let my heart repeat without end. All desires that distract 

me, day and night, are false and empty to the core.

As the night keeps hidden in its gloom the petition for light, even thus in the depth of my unconsciousness rings the cry ⎯ I want thee, only thee.

As the storm still seeks its end in peace when it strikes against peace with all its might,

even thus my rebellion strikes against thy love and still its cry is ⎯ I want thee, only 

thee

—–  

☆ मराठी भावानुवाद : गीत ३८ ☆

*

रात्रीच्या गर्भात, प्रकाशाचा हव्यास

तशी माझ्या मनी, तुझीच रे आस

मला तू हवास, मला तू हवास॥

*

शांत हवा अंत, जसा वादळास

तुझी ओढ वेगे, माझ्या प्रेमास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

विचलित मन, करण्या प्रयास

वासनांचा दाह, कर्मांचा फास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

मिथ्या जग, आसक्ती कशास

चिरंतन माझ्या, मुखी हा ध्यास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत ३९ ☆

WHEN the heart is hard and parched up, come upon me with a shower of mercy.

When grace is lost from life, come with a burst of song.

When tumultuous work raises its din on all sides shutting me out from beyond, come to 

me, my lord of silence, with thy peace and rest.

When my beggarly heart sits crouched, shut up in a corner, break open the door, my king, and come with the ceremony of a king.

When desire blinds the mind with delusion and dust, thou holy one, thou wakeful, come 

with thy light and thy thunder.

—–

मराठी भावानुवाद : गीत ३९

*

मन माझे होता शुष्क अन् कठोर

वर्षाव दयेचा करी मजवरती

*

आनंदास होता पारखा या जीवनी

गीत रंगांची उधळण कर ती

*

जो तुज अंतरतो, कोलाहल दैनंदिनीचा

असह्य होता, दे शांती अन् विश्रांती 

*

दीन माझे मन, जखडले धरणीशी

तोड दार, दाखव सत्ता, हो अधिपती

*

वासनांचे जर उठेल मोहोळ 

ने प्रखर प्रकाशी, देण्यास जागृती

*

– क्रमशः भाग १३.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कँडी यांचा अदृश्य स्पर्श…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कँडी यांचा अदृश्य स्पर्श…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

मेजर जेम्स थॉमस कँडी 

कँडी यांचा अदृश्य स्पर्श – – 

*

मराठी भाषेत आपण किती सहज वापरतो – – 

स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह.. …

*

– – या विरामचिन्हांची शिस्तबद्ध सुरुवात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केली!

ते डेक्कन कॉलेज पुणे चे प्राचार्य सुद्धा होते..

त्यांचे नाव “मेजर जेम्स थॉमस कँडी” 

१८व्या-१९व्या शतकात मराठी लेखन सलग असायचे… 

दंड (|) आणि द्विदंड (||) एवढीच चिन्हे वापरली जात.

इंग्रजी भाषेच्या प्रभावानंतर पुढील चिन्हे मराठीत रूढ झाली :

स्वल्पविराम (,)अर्धविराम (;) पूर्णविराम (.) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) इत्यादी…

– – मात्र कँडी यांनी १८५० साली ‘विरामचिन्हांची परिभाषा’ ही पुस्तिका लिहून मराठी लेखनाला नवा श्वास दिला.

– – वाक्याचा अर्थ स्पष्ट व्हावा, वाचन सुलभ व्हावे, आणि लेखनाला शिस्त लाभावी, यासाठी त्यांनी नियम तयार केले.

आज आपण लिहितो त्या प्रत्येक वाक्यात कँडींचा अदृश्य स्पर्श आहे!

विरामचिन्हांची परिभाषा ही १६ पानी पुस्तिकाच त्यांनी लिहीली, मराठी इंग्लिश शब्दकोश निर्मीतीमधे

त्यांचे अमुल्य योगदान आहे 

२६ फेब्रुवारी रोजी त्यांचे १५० वे स्मृतिवर्ष असेल.

मराठी लेखन समृद्ध करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!!!

 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares