मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अग्निरूपेण संस्थिता…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“अग्निरूपेण संस्थिता… ☆ श्री संभाजी बबन गायके 

भस्मासूराची राखरांगोळी करण्यासाठी हृदयात अग्निचा संचार व्हावा लागतो… आणि हा अग्नी प्रज्वलित व्हावा यासाठी मुखाने त्या अग्नीला आवाहन करावे लागते… मरणावर चालून जाताना एकाच वेळी हजारो मुखांतून ज्वाला माता की जय! असा जयकारा उच्चारला जातो… आणि उर्वरित कार्यभार अग्नी देवता तिच्या शिरावर घेते!

भारतीय सैन्यातील Gentlemen Warriors अर्थात सभ्य, सुसंस्कृत लढवय्ये अशी ख्याती असलेले डोग्रा सैनिक जेंव्हा सैनिकी कारवाईस निघतात, आनंदाचे क्षण साजरे करतात तेंव्हा त्यांची पहाडी गर्जना असते… ज्वाला माता की जय!

जळी, स्थळी, अग्नी आणि पाषाणी आपल्या देवता वास करतात! पाषाण कितीही कठीण असला तरी त्याच्यातून भावनांचा झरा प्रवाहित करण्याची मानवी मनांत शक्ती असते. आभाळातून बर्फ पडतो हे जरी खरं असलं तरी त्या बर्फाने मनातल्या शिवलिंगाचं दृश्य स्वरूप धारण केलं तर तो बर्फच शिवस्वरूप होऊन जातो! अग्नीचं तरी काय निराळं असतं… प्राणिसृष्टि सदैव सचेतन राखण्यासाठी जे चैतन्य आवश्यक असतं त्यासाठी अग्नीच कारणीभूत. अशावेळी या अग्नीची एक पुसटशी ज्वालासुद्धा देवता बनते!

अग्नी प्रज्वलित होण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते हे कुणीही नाकारणार नाही, पण या इंधनाचा स्रोत, त्याची निर्मिती कुणीतरी करत असेलच… आणि निर्मितीचे पितृत्व निसर्गाच्या भाळी स्पष्टपणे गोंदवलेलं दिसतं!

सुमारे हजार वर्षांपूर्वी देवभूमी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एका पर्वताच्या पायथ्याशी एकाच वेळी नऊ ज्वाला प्रकटल्या असं इतिहास सांगतो… आणि हे उघड्या डोळ्यांना दिसतं… आणि स्पर्शाला जाणवतं!

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि सामूहिक मानसशास्त्र यांच्यात मानवी मनाची शक्ती अजेय ठरते. एखाद्या घटनेचा अर्थ कसा लावायचा ते समूह ठरवतो… आणि त्याचा निर्णय शिरसावंद्य मानला पाहिजे, असा संकेत आहे!

भूगर्भातून वायू उत्सर्जित होत राहतो आणि त्याला अग्निचा स्पर्श घडल्यास त्यातून ज्योत उमलते हे साहजिकच. परंतु एवढ्या मोठ्या प्रदेशात, विशिष्ट ठिकाणी असं घडणं याला दैवी चमत्कार अशी संज्ञा प्राप्त होणंही काही आश्चर्याचं नाही.

मनातील भावनांच्या ज्योती मालवून टाकणं शक्य नसतं. भौतिक ज्योत फुंकून टाकता येते… पण इथं तर तेही शक्य झालेलं नाही आजवर. तरवारीच्या जोरावर तसं करूनही बघितलं गेलं… पण ज्योती आजही लवलवत आहेतच. भूगर्भ वायूतज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून पाहिले आहेत. किमान याक्षणापर्यंत तरी कुणाला स्रोत समजला नाही… ! असो.

मानवी बुद्धीच्या, आकलन शक्तीच्या पल्याड बरंच काही असतं. एखाद्या श्वानाला जो गंध जाणवतो तो विकसित मानवी घ्राणेंद्रिय टिपू शकत नाहीत… याचाच अर्थ आपल्याला मर्यादा आहेत आणि त्या मान्य करणे किंवा न करणे यावर सर्वसामान्य मानवी व्यवहाराचे काहीही अवलंबून नाही! यास्तव सामान्यत्वाचा छाप घेऊन जगणाऱ्यांनी चमत्कारांना नमस्कार करणे क्रमप्राप्तच असते.

जम्मू – काश्मीर, हिमाचल प्रदेश इत्यादी ठिकाणी डोग्रा नावाच्या समाजसमूहातून अत्यंत नीडर, कर्तव्यदक्ष, कणखर आणि त्याचवेळी सुसंस्कृत, सभ्य सैनिकही जन्म घेतात. त्यांच्या माध्यमातून भारत भूमीच्या पर्वतीय सीमा अभेद्य आहेत. या सैनिकांनी ज्वाला मातेला त्यांची रक्षक, पूज्य आणि स्मरणीय देवता मानली आहे. आणि याच भक्तीचा आधारे त्यांनी शक्तीची जोपासना केली आहे.

ज्वालामुखी, ज्वालाजी अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या या क्षेत्राचा जीर्णोद्धार, विकास डोग्रा सैनिक मोठ्या आस्थेने करत असतात, हे लक्षणीय आहे!

अखेरीस, भारतभूमी देवता मानली असता तिची अशी पूजा बांधणे सर्वथा वंदनीय मानले पाहिजे!

सैनिक आहेत म्हणून देश आहे… आणि हे सैनिक जिथे माथा टेकवतात.. ते ठिकाण आपल्यालाही पूजनीय असावे!

यानिमित्ताने कर्तव्यं अन्वात्मा अर्थात मृत्यूआधी कर्तव्य पूर्ण करण्यास प्राधान्य देणारे डोग्रा सैनिक आणि व्याघ्रावर आरूढ ज्वालामाता यांना नमस्कार.. जय हिंद… जय हिंद की सेना!

(धरमशाला/धर्मशाला येथे स्थापित war memorial पाहण्यासारखे आहे. त्याचे अनुकरण महाराष्ट्रात व्हावे!)

(लेखात व्यक्त केलेल्या भावना माझ्या वैयक्तिक आहेत. हिमाचल प्रवासातून..) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भिंती पलीकडचं नातं… लेखिका: जयश्री गोखले ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

श्री मंगेश जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भिंती पलीकडचं नातं… लेखिका: जयश्री गोखले ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

आमच्या लहानपणी भिंती फक्त घरांना विभागायच्या…

मनांना नाही…

या भिंतीवर टेकून कितीतरी गप्पा रंगायच्या…

 “आज काय भाजी केली?” पासून

 “मन खूप अस्वस्थ आहे गं…” पर्यंत…

एका घरात चूल पेटली की वास दुसऱ्या घरात जायचाच…

 एका घरात दुःख आलं की डोळे शेजाऱ्यांचेही पाणावायचे…

 आणि आनंद आला की सगळा वाडा हसायचा…

त्या काळी दारं बंद नव्हती…

 मनं उघडी होती…

आमच्या वाड्यात तर संध्याकाळ झाली की सगळ्या बायका अंगणात किंवा अशाच एखाद्या भिंतीवर टेकून उभ्या राहायच्या…

 कोणाच्या हातात निवडायची भाजी…

 कोणाच्या हातात विणकाम…

 तर कोणाच्या मांडीवर छोटं बाळ…

गप्पा रंगायच्या…

 हसणं यायचं…

 कधी एखादीच्या डोळ्यात पाणीही यायचं…

 पण ती एकटी कधीच नसायची…

“काळजी करू नको गं… सगळं ठीक होईल…”

 हे वाक्य त्या काळी औषधासारखं होतं…

एखाद्या घरात पाहुणे आले की भांडी शेजारातून यायची…

 सण आला की फराळ एका घरात बनून चार घरांत वाटला जायचा…

 आणि एखादी बाई आजारी पडली की तिच्या मुलांना दुसऱ्या घरात जेवायला बसवलं जायचं…

रक्ताची नाती नसली तरी माणुसकीची नाती खूप घट्ट होती…

आज आठवतं…

 आई कधी कधी शेजारच्या काकूशी भिंतीवरून तासन् तास बोलायची…

 विषय काही विशेष नसायचा…

 पण मन हलकं व्हायचं…

त्या काळी ‘मेंटल हेल्थ’ हा शब्द माहिती नव्हता…

 पण माणसं एकमेकांना ऐकून घ्यायची…

 म्हणून कदाचित मनं इतकी तुटत नव्हती…

आता सगळं बदललं…

मोठमोठे फ्लॅट आले…

 दरवाजांवर डिजिटल लॉक आले…

 पण माणसांच्या मनांवरही कुलूप पडलं…

आज शेजारी कोण राहतं हे माहिती नसतं…

 आणि माहिती असलं तरी संवाद फक्त

 “पार्सल आलंय…”

 किंवा

 “गाडी बाजूला घ्या…”

 इथपर्यंतच राहतो…

पूर्वी घरं छोटी होती…

 पण मनं मोठी होती…

आता घरं मोठी झाली…

 पण माणूस आतून एकटा होत चाललाय…

मोबाईलमध्ये हजारो contacts आहेत…

 सोशल मीडियावर शेकडो लोक जोडलेले आहेत…

 पण मनापासून विचारणारं —

 “काय गं… ठीक आहेस ना?”

 हे विचारणारं माणूस मात्र कमी झालंय…

 

 किती साधं आणि सुंदर होतं ना ते जगणं…

ना मोबाईल…

 ना स्टेटस…

 ना ‘ऑनलाईन’ असण्याची धडपड…

पण तरीही माणसं एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित होती…

 खऱ्या अर्थाने…

कधी कधी खरंच वाटतं…

 पुन्हा एकदा असं जुनं जगणं मिळावं…

 एखादं छोटंसं घर असावं…

 बाहेर अंगण असावं…

 आणि मध्ये अशीच एक भिंत…

जिथे आपण मन मोकळं करावं…

 हसावं…

 रडावं…

 आठवणी सांगाव्यात…

आणि समोरून कोणीतरी फक्त प्रेमाने विचारावं —

 “काय गं… ठीक आहेस ना?”

 ☆ ☆ ☆ ☆

लेखिका: जयश्री गोखले

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आयडियाची कल्पना…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयडियाची कल्पना…” ☆ श्री सुधीर करंदीकर

ऊन ‘मी’ म्हणतयं, अशा वेळेस आपण पण “मी” म्हणायचं 

ऊन मी म्हणतयं म्हणजे ऊन कमी व्हायला तयार नाही. अशा वेळेस आपण पण मी म्हणायचं, म्हणजे मी पण उन्हापासून बचावाकरता काहीतरी मार्ग काढीनच्..

यावर्षी उन्हाळा खूपच म्हणजे खूपच जास्त जाणवतो आहे. उन्हात फिरल्यामुळे बऱ्याच जणांना छोटे मोठे आजार होत आहेत, त्रास होत आहेत. ऑटो करून बाहेर पडलो तरी उन्हाच्या झळा लागतात आणि उन्हाचा त्रास हा होतोच होतो.

सर्व जाणकार आणि तज्ञ मंडळी सांगत आहेत की सध्या तरी 25 मे पर्यंत दुपारी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत घराबाहेर पडूच नका.

ज्यांचा व्यवसायच बाहेर फिरून काम करणे आहे त्यांना तर पर्यायच नाही, पण इतर मंडळी मात्र दुपारी बाहेर जाणे नक्कीच

टाळू शकते. ऑफिसच्या कामाकरता / क्लासेस करता ऑनलाइन पद्धत पण उपलब्ध आहे.

पुणे तिथे काय उणे या म्हणी प्रमाणे पुणेकरांना दुपारी बाहेर न पडणे वगैरे मान्य नसते.

कुणाचे लग्नाचे वाढदिवस, कुणाची ७५ री, कुणी परदेशातून आले म्हणून त्यांच्या स्वागताकरता पार्टी, रिडेव्हलपमेंट नंतर नवीन घर मिळाले त्याबद्दल वास्तुशांती कार्यक्रम, वगैरे वगैरे, असे कार्यक्रम अजूनही पुण्यामध्ये भरदुपारी हॉटेलमध्ये होत असतात.

कार्यक्रम आणि जेवणाची वेळ दुपारी एक वाजता असते. आणि बोलावलेली सगळीच मंडळी असे कार्यक्रम अटेंड करत असतात, कारण ऊन आहे या कारणाकरता नाही कसं म्हणणार, अशी सगळ्यांना अडचण असते.

आज सकाळीच एका मित्राला सहज गप्पा मारायला फोन केला होता.

मी : नमस्कार, काय चाललंय ? उन्हापासून काळजी घे. दुपारी बाहेर पडू नकोस.

मित्र : अरे मी कालपासून श्रेयस हॉटेलमध्ये काल आणि आज असे दोन दिवस राहायला आलोय

मी : अरे पुण्यात तुझं घर असून हॉटेलमध्ये, हा काय नवीन मूव्ह आहे

मित्र : अरे बायकोच्या मैत्रिणीच्या जावयाला मोठ्या पोस्ट वर प्रमोशन मिळालं आहे, त्यानिमित्त ओळखीचे आणि नातेवाईक यांना आज पार्टी आहे. डेक्कन वर याच श्रेयस हॉटेलमध्ये. दुपारी 12 ते 3 वेळ आहे.

मी : पण तू दोन दिवस हॉटेलमध्ये का आहेस 

मित्र : सगळीच तज्ञ मंडळी सांगत आहेत की मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत दुपारी घराबाहेर पडू नका. मी बायकोला सुचवले की मैत्रिणीला कार्यक्रम थोडा पुढे ढकलायला सांग, म्हणजे उन्हाचा कोणाला त्रास होणार नाही. कारण अशा कार्यक्रमाकरता मुहूर्त बघणे वगैरे असा प्रकार नसणार.

बायको म्हणाली, तुम्ही म्हणताय ते कारण कोणालाही पटणार नाही. अशा विचारांना पुण्यामध्ये निगेटिव्ह अटीट्युड असे म्हणतात.

तुम्हाला ते समजणार नाही, तुम्ही येणार नसाल तर तसं सांगा, मी एकटी जाईन.

आपण बायकोला काही सुचवणं आणि ते लॉजिकल असलं तरी बायकोला ते पटणं, असं कधीच होत नसतं. (बहुतेकांचा असाच अनुभव असणार).

त्यामुळे मीच विचार केला की आपणच काहीतरी सोपा पर्याय काढावा.

मी : तुझं म्हणणं आणि तुझा अनुभव अगदी बरोबर आहे, कार्यक्रमाचं काय ठरवलं शेवटी

मित्र : आमच्या घरापासून दुपारी साडेअकरा वाजता रिक्षेने डेक्कन ला जायचं, आणि कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कडक उन्हात अडीच वाजता पुन्हा रिक्षाने घरी यायचं, म्हणजे ऊन्हाला – ‘आ बैल मुझे मार’ असे सांगण्यासारखेच आहे.

रिक्षेमध्ये प्रवास करताना उन्हाच्या झळा लागतात, आणि कार्यक्रम हॉटेलमध्ये म्हणजे तिथे एसी असतो. म्हणजे आधी झळा आणि नंतर लगेच गारवा, म्हणजे तब्येतीचे आणखीन बारा.

काय मार्ग काढावा !, काय मार्ग काढावा!, असा विचार करत मी खिडकीतून बाहेर ऊन्हाकडे बघितलं आणि मला मार्ग सापडला.

हॉटेल श्रेयस मध्ये मी दोन दिवसां करता खोली बुक केली. काल संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर आम्ही दोघेजण श्रेयस मधे आलो.

काल रात्रीचं जेवण इथेच घेतलं, आज सकाळचा नाश्ता पण इथे झाला. त्यामुळे रोजच्या खाण्यात आणि चवीमध्ये पण अनायसेच छान बदल मिळाला.

आजचा कार्यक्रम याच हॉटेलमधल्या हॉलमधे आहे. आमची खोली दुसऱ्या मजल्यावर आहे. दुपारी रूम मधून खाली हॉलमध्ये कार्यक्रमाला जाऊ, जेवण आणि गप्पा टप्पा आटोपल्या, की वरती पुन्हा खोलीमध्ये येऊन आराम करू. अजूनही कोणी ओळखीच्यांना उन्हात घरी जायचं नसेल, तर त्यांना पण खोलीवर घेऊन येऊ.

संध्याकाळी हॉटेल मधून चेक आउट करू आणि रिक्षा करून घरी जाऊ.

माझ्या या प्लॅनिंगमुळे उन्हालाही बरं वाटेल, की आपल्यामुळे यांना त्रास झाला नाही. आणि आपल्याला पण उन्हाचा त्रास नाही, ज्यांच्याकडे कार्यक्रम ते पण खुश, आणि बायको पण खुश

मी : तुझी आयडिया एकदमच जबरदस्त आहे. इथूनच तुला सलाम करतो.

ऊन कमी झालं की जून महिन्यात ठरवून एकदा भेटीचा कार्यक्रम करू, मित्रांना पण बोलवू, भरपूर गप्पा टप्पा करू, मस्त मजा येईल.

बाय-बाय झाले आणि फोन संपला.

(आपल्या मित्रमंडळींना लेख फॉरवर्ड केला तरी छानच. म्हणजे सगळेच उन्हापासून काळजी घेतील आणि इतरांची काळजी करतील.)

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एक अवलिया अस्सल कलावंत !” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “एक अवलिया अस्सल कलावंत !” ☆ डॉ. धनंजय देशपांडे

जगदीश खेबुडकर

जगदीश खेबुडकर यांच्याशी माझी चांगली मैत्री होती मी कलाकार डिरेक्टरी सन २००० मध्ये सुरु केली ज्यात सर्व कलाकाराचे नाव पत्ते असायचे… त्यात पहिली प्रस्तावना त्यांनी लिहून पाठवली होती.

तर पत्रकारिता करत होतो तेव्हा एका मुलाखतीत मला त्यांनी एक गुपित सांगितलं आणि मी ते छापलं 

ज्यावर नंतर त्यांच्यावर कौतुकाची जणू सुनामी आली 

झालं असं की.. ‘अष्टविनायक’ नावाचा मराठी सिनेमा येत होता. त्यात सर्व आठ गणपतीच्या गावाचे आणि त्यांचे वैशिष्ट्य वर्णन करणारे गाणे लिहून हवे होते जे खेबूडकरांनी लिहून दिले 

“अष्टविनायका तुझा महिमा कसा”.. हे ते गाणे 

आणि कहर म्हणजे तुम्ही आता पुन्हा ते गाणे नीट ऐका ज्यात आठही गणेश मंदिराचे व परिसराचे यथार्थ वर्णन केले आहे 

मात्र खेबुडकर म्हणाले,

“ अहो पत्रकार महाशय… मी यापैकी एकही देवळाला भेट दिलेली नाही !”

यावर मी उडालो होतो. विचारलं की “ मग कस काय परफेक्ट वर्णन ? “

तर मिश्किल हसत म्हणाले “ मी प्राचीन ग्रंथ पण वाचत असतो “

खरा किस्सा त्यानंतरचा आहे. हे गाणं एका रात्रीत तयार झालं आहे.

त्याचं झालं असं खेबुडकर जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा एका ठराविक बिल्डिंग मध्ये उतरायचे.

खेबुडकर मुंबईत आलेत हे कळल्यावर निर्माते शरद पिळगावकर यांनी ताबडतोब खेबुडकर यांना गाठलं आणि गाडीत घालून घरी आणलं आणि म्हणाले की “ अष्टविनायकावर तुम्हाला गाणं लिहायचं आहे. ” 

खेबुडकर म्हणाले की “ऑलरेडी याच्या आधी शांताराम नांदगावकर आणि शांताबाई शेळके यांनी लिहिलेली आहेत गाणी अष्टविनायकावर… ”

तर पिळगावकर म्हणाले “ते बाजूला ठेवा. मला तुमच्याकडून हवं आहे. ” 

– – आणि विशेष म्हणजे तोपर्यंत खेबुडकर हे लावणी लिहिण्यासाठी फेमस झाले होते तरी पण पिळगावकरांनी त्यांच्याकडून लिहून घेण्याचा हट्ट धरला आणि त्यांना घरातल्या रूममध्ये बंद केलं.. गाणं पूर्ण केल्याशिवाय उठायचं नाही असं सांगून!

खेबुडकर यांनी चंग बांधला आणि सलग एकटाकी असं म्हणतात तसं गाणं लिहून काढलं.

– – – आठ कडव्याचं गाणं. रेकॉर्डिंग सुमारे 13 मिनिटाचं… एवढं मोठं गाणं तोपर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभादेवी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालं त्यावेळेला अचानक पिळगावकर म्हणाले खेबुडकर यांना की “गाणं पण तुम्हीच गायचं आहे. “

(खेबूडकर यांचा खडा आवाज सर्वांना माहीत होता.) मात्र तोपर्यंत बाकी दोन गायक आलेले होते.. अनुराधा पौडवाल वगैरे. म्हणून खेबुडकर म्हणाले “ त्यांना गाऊ द्या. शेवटचं एक कडवं फारतर मी गाईन”

.. आणि सातव कडवं खेबुडकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि त्या गाण्याने नंतर रेकॉर्ड ब्रेक केलं. आजही ते गाणं गणेशोत्सवाच्या काळात वाजत असतं.

असा हा सगळा महिमा अष्टविनायकाचा … खेबुडकरांचा … आणि त्यांच्या कौशल्याचा !!

असे होते कविराज ते..

साक्षात दंडवत त्यांना !

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संतवाणी म्हणजे नेमकं काय ?? ” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “संतवाणी म्हणजे नेमकं काय ?? ” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेला हा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग आहे.

ते सांगतात—पुण्यातील मंडईत संतवाणीचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचा अभंग झाला होता. पेटी, तबला आवरले जात होते, कलाकार उठू लागले होते. भीमसेन जोशीही शांतपणे उभे राहून स्टेजवरून उतरण्याच्या तयारीत होते. सभागृहात “कार्यक्रम संपला” अशीच भावना होती.

तेवढ्यात, प्रेक्षकांमधून एक हमाल पुढे आला. साधा, घामेजलेला, काम करून आलेला. हात जोडून, थोड्या संकोचाने तो म्हणाला—

“जोशीबुवा… ‘तीर्थ विठ्ठल’ म्हणाल का?”

क्षणभर सगळे थांबले. कार्यक्रम संपलाच होता. साथीदारांनी वाद्यं आवरली होती. अशा वेळी अभंग म्हणणं म्हणजे पुन्हा सगळं उलगडणं. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.

पण भीमसेन जोशी थांबले.

त्या हमालाकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आग्रह नव्हता, हट्ट नव्हता—फक्त भक्ती होती. जोशीबुवांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून म्हटलं,

“अहो, पेटी-तबला काढू नका… तीर्थ विठ्ठल म्हणूया. ”

… सगळे स्तब्ध झाले.

पुन्हा पेटी उघडली गेली. तबल्यावर हात बसला. आणि मग भीमसेन जोशींनी

“ तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…” सुरू केलं.

सुधीर गाडगीळ सांगतात— ‘ तो अभंग मैफिलीचा फाके एक भाग नव्हता.. तर तो करुणेचा, माणुसकीचा आणि भक्तीचा उद्गार होता. आवाजात विलक्षण आर्तता होती. जणू त्या हमालाच्या आयुष्याचं ओझं त्या स्वरांत उतरलं होतं. हमाल रडत उभा होता. प्रेक्षक नुसते ऐकत नव्हते— तर ते अनुभवत होते.

… अभंग संपल्यावर टाळ्या नव्हत्या. फक्त गहिरं मौन होतं.

गाडगीळ शेवटी म्हणतात—

“त्या दिवशी कळलं, भीमसेन जोशी हे मोठे गायक होतेच; पण त्याहून मोठं होतं त्यांचं मन. कार्यक्रम संपला होता, पण भक्ती संपलेली नव्हती—आणि जोशीबुवांनी ती ओळखली. ”

हा प्रसंग ‘ संतवाणी म्हणजे नेमकं काय ’ हे कायमचं समजावून जातो.

संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिंग्रोबा.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ शिंग्रोबा.. – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

शिंग्रोबा

शिंग्रोबा धनगर कोण होते? त्यांचं नाव मिसिंग लिंकला देण्याची मागणी का होतेय? वाचून अभिमान वाटेल – – – 

एक असा माणूस ज्यानं खऱ्या अर्थानं मुंबई-पुण्याला जोडलं. एक असा माणूस ज्यानं बक्षीसात मरण मागितलं. एक असा माणूस ज्यानं इंग्रजी जुलमी राजवटीला शर्मेनं मान खाली घालायला भाग पाडलं…

अर्थातच ते व्यक्ती होते शिंग्रोबा धनगर… मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.

मुंबई-पुणे मार्गाचे खरे शिल्पकार

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या आणि आडवाटांची खडान् खडा माहिती असणारा हा माणूस! आज ‘मिसिंग लिंक’ लोकांसाठी खुला झाला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या बोगद्याकडे पाहिलं जातंय, पण हा मार्ग शोधण्याचं खरं श्रेय जातं ते शिंग्रोबा धनगर यांना! ते कसं? यासाठी आपल्याला इतिहासाची पानं जरा चाळावी लागतील…..

शिंग्रोबा कोण होते? त्यांनी मुंबई-पुणे मार्गाचा शोध कसा लावला? आणि बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांची हत्या का केली? – – 

साल होतं १८५०. भारतमातेच्या अंगावर पारतंत्र्याच्या बेड्या होत्या. इंग्रज आपल्या देशाला अक्षरशः ओरबाडत होते. देशातलं धन, धान्य, मसाले आणि प्रत्येक मौल्यवान वस्तू लंडनला पाठवण्यासाठी त्यांना गरज होती ती वेगवान कनेक्टिव्हिटीची. याच गरजेपोटी १६ एप्रिल १८५३ रोजी देशात पहिली रेल्वे धावली- बोरीबंदर ते ठाणे..

… पण इंग्रजांचं खरं टार्गेट होतं ते थेट पुणे गाठणं. मात्र, मुंबई आणि पुण्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा होता, आसमानाशी स्पर्धा करणारा राकट सह्याद्री. या सह्याद्रीच्या दुर्गम कडेकपाऱ्यांतून रेल्वेचा मार्ग काढायचा कसा? हे इंग्रजांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आणि कोडं होतं. अनेक समित्या नेमल्या गेल्या. कित्येक गोरे तज्ज्ञ आले, डोकं खाजवून परतले. पण सह्याद्रीनं कुणालाही वाट दिली नाही. इंग्रज अधिकारी जंग जंग पछाडत होते, पण डोंगरवाटा काही सापडत नव्हत्या.

शिंग्रोबा धनगर आणि इंग्रजांची भेट – – 

त्या काळात बोरघाटाच्या कुशीत एक धनगर वस्ती होती आणि तिथे राहायचे शिंग्रोबा धनगर. शिंग्रोबा म्हणजे सह्याद्रीचा श्वास! मेंढरं चारणाऱ्या या माणसाला सह्याद्रीचा प्रत्येक खडक, प्रत्येक दरी आणि प्रत्येक आडवाट तोंडपाठ होती. इंग्रजांची ही रोजची पळापळ शिंग्रोबा लांबून बघत होते.

शिंग्रोबांनी ‘राजमार्ग’ दाखवला

‘रोज गोरी माणसं येतात, डोंगर मोजतात आणि हताश होऊन परत जातात, ‘ हे शिंग्रोबांच्या कुतूहलाचा विषय ठरला. शेवटी राहवलं नाही आणि शिंग्रोबांनी विचारलं- “काय हरवलंय का तुमचं? काय शोधताय एवढं?” हताश झालेल्या इंग्रजांनी त्यांना आपली अडचण सांगितली “आम्हाला मुंबई-पुण्याला जोडणारा रेल्वेचा मार्ग हवाय… ” हे सांगताना त्या गोऱ्या अधिकाऱ्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की या डोंगराच्या राजाकडे त्याचं उत्तर दडलंय. शिंग्रोबा हसले आणि म्हणाले- “चला माझ्या मागं, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. “

शिंग्रोबांच्या बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले

काही वेळातच शिंग्रोबांनी इंग्रजांना तो मार्ग दाखवला, जो आज जगासाठी अभियांत्रिकीचा चमत्कार आहे! एका धनगराच्या अनुभवापुढे सातासमुद्रापारची विद्या थकली होती. शिंग्रोबांच्या अफाट बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले. सह्याद्रीचं जे कोडं भल्याभल्या इंजिनिअर्सना सुटलं नव्हतं, ते एका सामान्य धनगरानं एका क्षणात सोडवलं.

स्वाभिमान आणि बलिदानाची गोष्ट – – 

कमालीचे खूश झालेले गोरे अधिकारी शिंग्रोबांना म्हणाले- “माग काय मागायचं तुला? पैसा, जमीन की जहागिरी?” ती वेळ अशी होती की शिंग्रोबांनी सोन्याची वीट जरी मागितली असती, तरी इंग्रजांनी त्यांच्या पायाशी ठेवली असती. पण शिंग्रोबांचा पिंड हा स्वार्थाचा नव्हता, स्वाभिमानाचा होता. आपल्या मातीला ओरबाडणारे, आपल्याच भावंडांवर अत्याचार करणारे हे परकीय इंग्रज शिंग्रोबांनाही बोचत होते.

शिंग्रोबा शांतपणे म्हणाले “साहेब, द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या!” हे शब्द म्हणजे साक्षात ठिणगी होती. एका मेंढपाळाने सातासमुद्रापारच्या सत्तेला जाब विचारणं, हे इंग्रजांच्या अहंकाराला लागलेलं शिसं होतं. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. ज्या माणसाने त्यांना मार्ग दाखवला, ज्याच्यामुळे त्यांचा रेल्वेचा रस्ता सोपा झाला, त्या शिंग्रोबांवर कृतघ्न इंग्रजांनी गोळ्या झाडल्या. सह्याद्रीच्या कुशीत शिंग्रोबांचं रक्त सांडलं, पण त्या बलिदानाने हा घाट अमर झाला.

शिंग्रोबांचे स्मारक : मिसिंग लिंकला नाव देण्याची मागणी – – 

शिंग्रोबांनी जिथे प्राणाची आहुती दिली, तिथेच आज त्यांचं एक छोटंसं श्रद्धेचं देऊळ उभं आहे. आजही जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरच्या बोरघाटात प्रवासी या वाटाड्या हुतात्म्यापुढे नतमस्तक होऊन त्याचं दर्शन घेतात. आज मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचा ‘मिसिंग लिंक’ लोकांसाठी खुला झालाय. त्याला शिंग्रोबांचं नाव द्यावं*, अशी मागणी जोर धरतेय. सरकार काय निर्णय घेईल तो घेईल, पण शिंग्रोबांमुळे आज मुंबई उर्वरित महाराष्ट्राशी जोडली गेली, हे त्रिकालबाधित सत्य आहे.

अपरिचित पण अलौकिक व्यक्तिमत्त्व शिंग्रोबा.

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुट्ट्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सुट्ट्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

चेन्नईतील एका शाळेने आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होत आहे.

याचे कारण इतकेच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येते की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत? अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिला आहे, जो प्रत्येक पालकाने वाचला पाहिजे.

त्यांनी लिहिले आहे –

गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडते, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पुढील दोन महिने त्यांच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत, जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल.

– मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका, असे सांगा.

– जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल.

– त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या.

– तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा.

– आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा.

– त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.

– कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका.

– किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

– मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा.

– तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होऊ द्या, त्यांना घाण होऊ द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.

– त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या.

– त्यांच्यासाठी काही लोकगीते वाजवा.

– तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा.

– तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे.

– त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, एरेटेड पेये आणि बेकरी उत्पादने जसे पफ आणि तळलेले पदार्थ जसे समोसे देणे टाळा.

– तुमच्या मुलांच्या डोळ्यांत पहा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत, ते नवीन उंचीवर असतील.

पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुले खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या, ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टींपासून दूर आहेत, ज्यामुळे आपण स्वतः आनंदी आहोत..

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उत्तर वाहिनी परिक्रमा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “उत्तर वाहिनी परिक्रमा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

एखादी गोष्टी का करायची? या प्रश्नाचे उत्तर ती गोष्ट करायची हेच असतं. मग ही गोष्टी आपण आपली करायची, कोणीतरी विचारलं म्हणून, सोबत मिळते म्हणून, भावना, श्रध्दा, नवीन अनुभव, गंमत, स्वार्थ आणि सोबत परमार्थ अशा अनेक गोष्टींची सांगड या उत्तरात असते. नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करायची का? याचं उत्तर वरच्या सगळ्या गोष्टींचा एकत्र घेतलेला निर्णय होता. माझ्या बाबतीत निर्णय माझा नसतोच, तर याला बरोबर घ्यायचं का हाच निर्णय समोरच्याला घ्यावा लागतो. आणि असाच निर्णय मागच्या दोन तीन ट्रिपचा माझ्याबद्दल त्यांना अनुभव असूनसुध्दा त्यांनी घेतला होता. आता मला बरोबर का घेतलं याचं उत्तर, आणि उत्तर वाहिनी परिक्रमा मला सोबत घेत, कशी व्यवस्थित पार पाडायची याचं उत्तर त्यांना द्यायचं होत. त्यामुळेच उत्तर वाहिनी परिक्रमा करायची का? हा प्रश्न माझ्या बाबतीत निकाली निघाला होता. मला सोबत घेणं आणि सोबत परत आणण हिच इतरांच्या बाबतीत परिक्रमा असते.

तर नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करायचं ठरलं. मराठी चैत्र महिन्यात हि परिक्रमा सुरु होते, आणि फक्त महिनाभरच असते. गुजरात येथील तिलकवाडा इथून वासुदेव कुटीर आश्रमात संकल्प करून यात्रा सुरु करावी अस ठरलं. साधारणपणे तिथूनच सुरु करतात. गरुडेश्वरजवळील रामपुरा ते तिलकवाडा या भागात नर्मदा उत्तरेकडे वाहते, म्हणून उत्तर वाहिनी परिक्रमा. उत्तरवाहिनी भागात परिक्रमा करणे अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक मानले जाते. साधारण एकवीस किलोमीटर इतका परिक्रमा मार्ग आहे.

खरतर मला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तेव्हाच मी सोडून सगळ्यांनी संकल्प केला होता. आणि यांनी संकल्प केल्यामुळे माझा झाला होता. पण तो माझ्या बाबतीत होता. धार्मिक बाबतीत हा संकल्प तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमात केला. आमचा मुक्काम गरुडेश्वर या ठिकाणी होता. आणि तिलकवाडा इथून वासुदेव कुटीर आश्रम येथून सकाळी पाच वाजता परिक्रमा सुरु करायची म्हंटल तर आम्हाला पहाटे तीन साडेतीन वाजता गरुडेश्वर सोडणे आवश्यक होते. आम्ही तसे जमवले सुध्दा. यासाठी रात्री दोन वाजताच सगळे उठले होते. हो सगळे, कारण आम्ही जवळपास पंधरा, सोळा जणं होतो. आणि सोळा लोकं इतक्या सकाळी सर्व आटोपून तयार होणं हाच एक सोहळा असतो. पण आम्ही तो पार पाडला.

ठरल्याप्रमाणे वासुदेव कुटीर आश्रमात संकल्प करून बरोबर पाच सव्वा पाचला नर्मदे हर च्या गजरात परिक्रमा सुरु केली. याच मंदिराच्या बाजूला एक हनुमान मंदिरपण आहे. हा मारुतीराया रामदास स्वामींंनी स्थापन केलेल्या पैकी एक आहे. पहाटे पाचच्या अगोदर विधीवत संकल्प सांगायला आश्रमात गुरुजी होते. त्यांच्याशी बोलतांना समजले परिक्रमेला जाणाऱ्या भक्तांना संकल्प सांगण्यासाठी रात्रभर ते आश्रमातच होते. म्हणजे आम्ही झोप घेऊन परिक्रमा करायला निघालो तेव्हा ते निद्राधीन होण्यासाठी निघणार होते.

सुरुवातीचा काही रस्ता गावातूनच होता. परिक्रमा मार्ग असे फलक जागोजागी आढळले. पण आगोदर हीच परिक्रमा केलेले दोन चार जणं आमच्यात असल्याने ते आमचे विदाऊट इंटरनेट लाईव्ह गुगल मॅप होते. पहाटे सुध्दा आमच्या पुढे आणि मागेही बरेच चालणारे दिसले.

गावातला रस्ता संपल्यानंतर शेतातून जाणारा कच्चा असलातरी चांगला रस्ता होता. पहाटेची वेळ, थंड वातावरण, आजूबाजूला केळीची शेती, आजुबाजूला रस्त्यावर दिसेल इतका प्रकाश टाकणारे लाईट होते. जे लाईट प्रखर प्रकाश देत होते. शिवाय रस्त्यावर सेवाभावाने चहा देणारे बरेच तसच पैसे घेऊन खाद्यपदार्थ चहा, बिस्किट, चाॅकलेट, थंड पेय विकणारेही बरेच होते. आम्ही सेेवाभावी मंडळींनी दिलेला चहा घेऊनच निघालो होतो. व सकाळची साडेपाच सहाची वेळ असल्याने थंड पेय विकत घेण्याचा आमचा प्रतिसाद पण थंडच होता.

पुढे एका शंकराच्या मंदिरात परत चहा, खायला काही, शिवाय थंडगार नाही पण गार असणारं ताक अस मुबलक प्रमाणात आग्रह करुन घ्या म्हणणारे होते. इथे थंड ताकाचा आस्वाद घेत पुढे सरकलो. ताक काय, लस्सीच होती. आणि… माझ्यासारख्याला अवघड वाटणारा एक सिमेंटचा जिना आला. मला उतरायला थोड अवघडच गेलं, पण सोबतची मंडळी, त्यांनी दोन्ही हाताला धरून दिलेला आधार, यामुळे तो जिना उतरण्यात यशस्वी झालो आणि पुढे पाय टाकायला सुरुवात केली. मनात म्हंटल जीना इसीका नाम है। यात जगणं म्हणजे जीना, आणि सिमेंटचा जिना यांचा संगम होता.

हा जिना उतरून आता आमची वाटचाल नर्मदेच्या बाजूने, आणि तिच्या साक्षीने सुरु झाली. आता बरोबर चालणारे आम्ही मागेपुढे व्हायला लागलो होतो. माझा स्पीड कमी पडत होता, कोणाला तरी माझ्या सोबत सतत रहाव लागत होत. मला बसण्याऊठण्याचा त्रास असल्याने जमेल तस, जमेल तिथे, जमेल तेवढावेळ बुड टेकवत मी परिक्रमेत माझं बुड टिकून राहिल याची काळजी घेत होतो. तर पुढे गेलेले काही माझी वाट पाहण्यात आपलं बुड टेकवून घेत होते.

नर्मदा नदी आणि मगर यांच एक अतूट नातं आहे. नर्मदेच वाहन मगर आहे, आणि अशी परिक्रमा करतांना मगर दिसली तर परिक्रमा पावते अस कोणीतरी म्हणालं. मग काय? आमची नजर पाण्यात कुठे मगर दिसते का? यावरच. एरवी मगर म्हंटली कि बुडबुडे येणारा मी आज पाण्यावर बुडबुडे दिसले तरी त्यात मगर शोधायचा प्रयत्न करायला लागलो. मगर वो मगर नजर आयीच नही.

आता किती अंतर झालं असेल, अजून किती अंतर चालायचं आहे? जमेल का आपल्याला? या विचारात असतानाच या किनाऱ्यावरुन त्या किनाऱ्यावर माणसांना घेऊन जाणाऱ्या बोटी जवळच दिसायला लागल्या. मग काय? माझ्या बोटी बोटीत परत एक ऊर्जा निर्माण झाली. आणि पावलं थोडी भराभर पडायला लागली. पण तरीही ती इतरांपेक्षा सावकाश आणि मागेच होती.

पण हा उत्साह जेवढ्या लवकर आला तेवढ्याच लवकर मावळला. खरतर आता सुर्य वरवर सरकायला सुरुवात झाली होती. पण माझा मावळत चालला होता. कारण बोटीपर्यंत जायला नर्मदेच्या कोरड्या पात्रातून चालत जावं लागणार होत. आणि पात्रातले ते गोटे वरवर दिसायला चांगले वाटत असले तरी त्या नर्मदेच्या गोट्यांवरुन पायी लवकर चालणं वाटलं तितकं सोप्प नव्हत. त्याचा त्रास व्हायला लागला होता. पण यामुळेच नर्मदेतला गोटा असं म्हणण्याच्या मागे नक्की काय भावना असतात हे समजलं. (थोडक्यात परिक्रमा अगदीच वाया गेली नाही. काहितरी शिकायला मिळालं… आणि मनातच नर्मदे हर… असा जयघोष केला.)

कसतरी करत एकदाच बोटीपर्यंत पोहोचलो, पण बसण्यापूर्वीच ती भरली आणि या गोट्याला किनार्‍यावर ठेवून मार्गस्थ झाली. प्रकरण येवढ्यावरच थांबल नाही. तिथे शेजारी शेजारी थोड्या अंतरावर चार पाच बोटी लावण्याची सोय होती. पण दुसरी बोट शेवटच्या जागेवर लागली. त्या बोटीत बसण्यासाठी ठराविक वेळत तेवढ अंतर परत गोट्यांवरुन कसरत करत जाणं मला कठीण होत. मग या जागेवर येणाऱ्या बोटीतच बसायच असा निर्णय मी घेतल्याने माला बोटीत चढवण्यासाठी थांबलेल्यांना पण तिथेच थांबाव लागलं. बाकी सगळे बोटीवर चढत होते, आणि मला चढवायचं होत. पण बोट भराभर येत होत्या. पाचसात मिनीटंच वाट पहावी लागली. मला बोटीत चढवण्याचा आणि उतरवण्याचा कार्यक्रम झाला. मी येईपर्यंत माझ्या पत्नीसह काही मंडळी पलिकडे माझी वाट पहात ऊन्हात थांबले होते. त्यांना परिक्रमेचा पुढचा प्रवास सुरु करता येत नव्हता.

पलिकडच्या तिरावर उतरलो, परिक्रमा अर्धी झाल्याच समाधान वाटलं, पण ते क्षणिक ठरलं. कारण पुढचा प्रवास सुरु करायलाच चांगल्या पंधरा वीस पायर्‍या चढायच्या होत्या. किंवा रस्त्याने गेलोतर रस्ता चांगलाच चढ असणारा होता. परत एकदा ऊत्साह मावळला.

पण याठिकाणी जिथून परिक्रमा सुरु केली तिथे परत जाण्यासाठी रिक्षा मिळू शकते असं समजलं. मग सगळा जोर पायर्‍या चढण्याचं सोडून रिक्षा मिळाली तर परत फिरण्यावर लावला. यात माझ्या पत्नीलाही माझ्या सोबत परत फिरण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या निर्णयामुळे परिक्रमा पूर्ण करण्याच्या तिच्या विचारावर (नर्मदेच) पाणी फिरलं.

थोडक्यात परिक्रमा पूर्ण करायची या वासुदेव कुटीर इथे झालेल्या विचारातून आम्ही फुटीर झालो. आणि मिळेल त्या रिक्षाने परत वासुदेव कुटीर गाठायचं ठरवलं. आणि परिक्रमा पूर्ण करु शकलो नाही. पण राहिलेल्या सगळ्यांनी परिक्रमा पूर्ण केली…

असो, हा पण एक अनुभव घेतला. यातही अजून काही चांगल्या काही मनाला न पटणार्‍या गोष्टी आहेत. पण कुटीर ते फुटीर, आणि फुटीर ते कुटीर हाच प्रवास मोठ्ठा झाल्याने चांगल्या व मनाला न पटणार्‍या गोष्टी परत सवडीने पाहू…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी मुक्तेश्वरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? मनमंजुषेतून ?

माझी मुक्तेश्वरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

वैशाख वद्य दशमी, शके १९४८..

 संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी.. त्यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण… !

 

मुक्ताई,

अनेक आशिर्वाद.

खरंतर माझी स्थिती त्या चांगदेवांसारखीच झाली आहे… ! मायना काय लिहावा, याबद्दल मी थोडा गोंधळलो आहे… ! कारण, तू फक्त वयाने लहान, आणि ज्ञानाने मात्र मोठी… आणि मी फक्त वयाने मोठा… !

तू म्हणशील लोकं तुला ‘माऊली’ म्हणतात… !

पण खरं सांगू यात माझे असे काय आहे… ?

गीता भगवंताने सांगितली म्हणजे यात माझे काही नाही… !

माझ्या सद्गुरूंनी, आपल्या निवृत्तीदादांनी माझ्याकडून ती लिहून घेतली… !

दादाचे आपण आजपर्यंत ऐकतोच, मग यात माझे ‘कर्तृत्व’ ते काय.. ?

आईबाबा गेल्यावर लहान असूनही तूच आम्हाला आधार दिलास… !

‘… …… …… ‘

हा असे का बोलत आहे ? असा तुला प्रश्न पडला असेल ना ? अग आज तुझी पुण्यतिथी!! म्हणून तुझ्याबद्दल चार शब्द सांगावे, असे निवृत्तीदादाने मला सांगितले… !.

अग, मला मांडे भाजून दिलेस ना ?

… तेव्हा तू माझी ‘आई’ झालीस… !

मला ‘ताटी ‘उघडायला लावलीस..

तेव्हा तू माझी समजूत काढणारी ‘ताई’ झालीस… !

हे दोन प्रसंग सर्वांना माहीत आहेतच… !

पण असे अनेक प्रसंग… !

मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही मुली, प्रसंग आला की लगेच मोठ्या कशा होता… ?

मला तुझा खूप आदर वाटतो, मोठा आधार वाटतो आणि कौतुकही वाटतं… !

आपण चार भावंड! सर्वात शेवटी तुझं नाव घेतलं जातं… पण तूच सर्वश्रेष्ठ आहेस असे मला नेहमी वाटतं आले आहे… !

… कारण आजही या जगात ‘मातृत्व’भावच सर्वश्रेष्ठ आहे..

सदगुरुकृपेने लोकं मला ‘माऊली’ म्हणतात. पण आईनंतर तूच माझी ‘माऊली’ झालेली आहेस, त्यामुळे तूच सर्वश्रेष्ठ आहेस… !

मला तुझा अभिमान वाटतो… !

.. माझी मुक्तेश्वरी!!

तुझं कौतुक कदाचित केलंल तुला आवडणार नाही, पण आज तरी मला माझ्या लाडक्या मुक्तेचं मन भरेस्तोवर कौतुक करू दे… !

– – मुक्ते!! आज सामान्य जनांना नुसतं ‘मुक्त’ करून चालणार नाही तर आपला ‘नरेंद्र’ (स्वामी विवेकानंद) म्हणतो तसे लोकांनी गोरगरिबांची सेवा करायला हवी… !

आपल्या ‘भारतमाते’ला आज त्याचीच गरज आहे असे मला वाटते.

तू आदिशक्तीचा अवतार आहेस, मुक्त होण्यासाठी सर्वजण तुझ्याच चरणी येतील, तेव्हा तू हे सर्वांना सांग, सांगशील न… ?

चल मुक्ते, थांबतो… !

तुझ्याशी बोलून आज मला खूप आनंद झाला… !

तुझा,

ज्ञानादादा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २४ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

मागच्या भागात आपण रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथांविषयी थोडी माहिती घेतली. रविंद्रनाथांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक म्हणजे देवेंद्रनाथ! त्यांनी बंगालचं सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक विश्व समृद्ध केलं. त्यांच्याविषयी आणखी माहिती आज घेऊया.

ब्राह्मोसमाजाचे अनुयायी देवेंद्रनाथांचा उल्लेख महर्षी देवेंद्रनाथ असा करीत. तत्त्वबोधिनी पत्रिका ह्या ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिकाद्वारे बंगाली गद्याच्या वाटचालीस गती देऊन त्यांनी मोठाच हातभार लावला. भारदस्त वैचारिक गद्यलेखनाची परंपरा बंगालीत ह्या पत्रिकेने सुरू झाली. ऋग्वेदाच्या बंगाली अनुवादास प्रथम देवेंद्रनाथांनीच हात घातला. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत प्रथम त्यांनीच लिहिले. ‘स्वरचित जीवनचरित’ हे त्यांचे आत्मचरित्र फारच मनोरंजक आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्राचे पुढे त्यांची मुले, सत्येंद्रनाथ आणि इंदिरा देवी ह्या दोघांनी ‘देवेंद्रनाथ ठाकूरेर स्वरचित जीवनचरित’ नावाने इंग्रजीत भाषांतरही केले.

देवेंद्रनाथांच्या मुलांनी देखिल विविध विषयात आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवली. द्विजेंद्रनाथ कवि, दार्शनिक और गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. सत्येंद्रनाथ पहले भारतीय ICS अधिकारी बनले. ज्योतिरिंद्रनाथ नाटककार, संगीतकार व संपादक झाले. रवींद्रनाथांनी नोबेल पुरस्कार मिळवून जागतिक किर्ती प्राप्त केली. त्यांची कन्या स्वर्णकुमारी देवी देखिल प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार व संपादक होत्या.

देवेंद्रनाथांच्या नातवंडांपैकी अनेकजण लेखक, चित्रकार, संगीतकार, संपादक, राजकारणी वा समाजकारणी आहेत.

देवेंद्रनाथांच्या अंतःकरणात वास्तव्य करणारा साहित्यिकच द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांचा साहित्यगुरू होय. देवेद्रनाथांमधील खरा साहित्यिक त्यांच्या स्वतःच्या आनुषंगिक लेखनात व्यक्त झालेला नसून, तो त्यांनी आप्तेष्टांना व स्नेह्यासोबत्यांना अनौपचारिकपणे लिहिलेल्या पत्रांमधून आणि त्यांच्या आत्मचरित्रातून व्यक्त झाला आहे. अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या बरोबरीने देवेंद्रनाथही, स्वतःच्या नकळत नव्या बंगाली गद्याची जडणघडण करीत होते. त्यांची ही गद्यशैली त्यांच्या मुलांनी, विशेषतः द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांनी उचलली व खूपच विकसित केली.

सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती. शिक्षणप्रसार व लोककल्याणकारी कार्यात देवेंद्रनाथांनी आपले सर्व जीवन वेचले. सर्वतत्त्वदीपिका सभा, तत्त्वबोधिनी सभा, हिंदू हितार्थी विद्यालय, समाजोन्नतिविधायिनी सुहृदसमिती इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि त्यांद्वारे धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक जागृती केली. हिंदू महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीवर असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.

बोलपूर येथील ब्रह्मचर्याश्रम देवेंद्रनाथांनीच स्थापन केला होता. रवींद्रनाथांनी पुढे त्याचे रूपांतर जगप्रसिद्ध ‘शांतिनिकेतन’मध्ये व नंतर ‘विश्वभारती’मध्ये केले.

देवेंद्रनाथांचा मृत्यू वयाच्या ८८ व्या वर्षी १९ जानेवारी १९०५ रोजी त्यांच्या राहत्या घरी झाला.

—–

☆ गीत : ७० ☆

IS it beyond thee to be glad with the gladness of this rhythm? To be tossed and lost and broken in the whirl of this fearful joy? 

All things rush on, they stop not, they look not behind, no power can hold them back, they rush on.

Keeping steps with that restless, rapid music, seasons come dancing and pass away ⎯colours, tunes, and perfumes pour in endless cascades in the abounding joy that scatters and gives up and dies every moment.

——

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७० ☆

किती चंचल अन् द्रुत ते संगीत

तरी, पदन्यास करीत त्या लयीत 

येती अन् जाती ऋतु सारे

*

रंग, गंध, अन् संगीत, सुरांचा

वर्षाव निरंतर करी तू सुखाचा

आनंदाचे भय परी मनी दाटते रे

*

क्षणात सारे विखरून जाते 

क्षणात सारे निसटून जाते

क्षणात सारे भंगून जाते

*

येथे तर सारे सतत धावती

मागे वळूनही कधी न पाहती

या रोखणे कुणा हाती असे का ?

*

घे तू ही आनंद, हा क्षणभराचा

घे तसा भावगंध, तरल संगीताचा

त्यात हरवून, विरून जाशील का?

*

असेल फक्त तुझाच हा क्षण

करून घे श्वासांचे औक्षण

तुज कुवत एवढी नसेच का?

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ७१ ☆

THAT I should make much of myself and turn it on all sides, thus casting coloured shadows on thy radiance ⎯ such is thy maya.

Thou settest a barrier in thine own being and then callest thy severed self in myriad notes. This thy self-separation has taken body in me

The poignant song is echoed through all the sky in many-coloured tears and smiles, alarms and hopes; waves rise up and sink again, dreams break and form. In me is thy own defeat of self.

This screen that thou hast raised is painted with innumerable figures with the brush of the night and the day. Behind it thy seat is woven in wondrous mysteries of curves,

casting away all barren lines of straightness.

The great pageant of thee and me has overspread the sky. With the tune of thee and me all the air is vibrant, and all ages pass with the hiding and seeking of thee and me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७१ ☆

तुझ्या तेजावर राया

माझी रंगीत छाया 

अशी तुझी माया 

देवा, अशी तुझी माया॥

*

स्वरलहरीतून अनंत

तुझी रूपे दिगंत

दाविसी मला पामरा

देवा, दाविसी मला पामरा॥

 *

गीते तुझी रसभरीत

निनादती गगनात 

भारती या विश्वाला

देवा, भारती या विश्वाला॥

 *

रंग अनेक शोकाचे

गंध अनेक हर्षाचे

तुझीच ही किमया 

देवा, तुझीच ही किमया॥

*

आशेच्या किरणांची

भीतीच्या डोहांची

भूल तूच पाडसी

देवा, भूल तूच पाडसी॥

*

ओहोटी अन् भरती

स्वप्ने काचेची फुटती

पुन्हा स्वप्ने तूच दाविसी

देवा, तूच स्वप्ने दाविसी॥

*

तुझ्या या चकव्यात

जरी मी नच फसत

हार तुझीच होते

देवा, तुझी हार होते॥

*

दिनरातीच्या कुंचल्याने

नाट्याचा पडदा बहु रंगांने

चितारसि, तूच रंगविसी 

देवा, तूच रे रंगविसी॥

*

त्या पडद्याच्या पार विराजे

आसन अगम्य रेषांचे तुझे

तसेच जीवन गुंतागुंतीचे

देवा, जीवन गुंतागुंतीचे॥

*

तू मला यात गुंतवावे

मी परंतु नच फसावे

मम सुरांनी गगन भेदावे

देवा, गगन सुरांनी भेदावे॥

*

खेळ चाले युगे युगे तरी

डाव मजवरी येता परी

नच सापडसी मला

देवा, नच सापडसी मला॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

——

☆ गीत ७२ ☆

HE it is, the innermost one, who awakens my being with his deep hidden touches.

He it is who puts his enchantment upon these eyes and joyfully plays on the chords of my heart in varied cadence of pleasure and pain.

He it is who weaves the web of this maya in evanescent hues of gold and silver, blue and green, and lets peep out through the folds his feet, at whose touch I forget myself.

Days come and ages pass, and it is ever he who moves my heart in many a name, in many a guise, in many a rapture of joy and of sorrow.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७२ ☆

हाच तो !

जो अंतर्यामी वसतो

दिव्य स्पर्शाने जागृत करतो

 

हाच तो !

मम नयनां मोहवितो

मम हृदीची तार छेडितो

सुख दुःखाची लय साधतो

 

हाच तो !

जो मायाजाल विणतो

सतत बदलत्या रंगी रंगवितो

सोनेरी, चंदेरी अन् कितीतरी तो

 

हाच तो !

युगायुगांची वाट दावितो

अनंत रूपे मम हृदयी भेटतो

ब्रम्हानंदी सुखदुःखाच्या असतो

 

हाच तो!

ज्याचे चरण पाहतो

अन् मी मजला हरवून बसतो

हाच तो अन् हाच तो!! 

*

– क्रमशः भाग २४..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares