मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वन रुपी इडली ट्रस्ट” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “वन रुपी इडली ट्रस्ट” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

कोणीच घेत नव्हतं. वर्ष २०२६. एका रुपयात चॉकलेटही मिळत नाही—आणि इडली? लोक त्यांना वेडा समजून हसत होते.

माझं नाव अरविंद. मी एका Infosys सारख्या आयटी कंपनीत काम करतो. रात्रीची शिफ्ट संपवून घरी जात होतो. एसी गाडी, चांगली नोकरी… पण भूक लागली होती. स्टेशनवरील स्टॉलवर इडली ₹५० ला मिळत होती.

त्या आजोबांकडे लक्ष गेलं. टोपलीत साधारण १०० इडल्या. एकही ग्राहक नाही. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं.

मी खाली उतरलो.

“आजोबा, एक रुपयाला इडली? तोटा होत नाही का?”

ते हसले.

“बाळा, हा तोटा नाही. हा नफा आहे. ”

“कसा आजोबा? तांदूळ, गॅस, सगळ्याचे भाव वाढले. एक इडली किमान ₹५ ला पडते. तुम्ही ₹१ ला विकता?”

ते टोपली बंद करून म्हणाले,

“एक गोष्ट सांगतो. ”

“१९७५ साल. मी २५ वर्षांचा. रेल्वेत हमाल होतो. महिन्याला ₹१०० पगार. एक दिवस जोरदार पाऊस. काम नाही. पैसे नाहीत. सलग ३ दिवस उपाशी. स्टेशनच्या बाकावर बेशुद्ध पडलो. ”

“तेव्हा एक बाई आली—ती प्लॅटफॉर्मवर इडली विकायची. एक रुपयाला. तिने मला उचललं, पाणी शिंपडलं, ४ इडल्या खायला दिल्या. पैसे विचारले नाहीत. ”

“मी रडलो… म्हणालो, माझ्याकडे पैसे नाहीत. ती म्हणाली— ‘बाळा, मीही एकदा अशीच उपाशी होते. कुणीतरी मला खायला दिलं. म्हणून मी व्रत घेतलं—मरेपर्यंत एक रुपयाला इडली विकणार, जेणेकरून भुकेल्याला अन्न मिळेल. तूही मोठा झालास की एखाद्या भुकेल्याला खाऊ घाल. ’”

आजोबांनी डोळे पुसले.

“ती १९९५ मध्ये गेली. शेवटच्या क्षणी माझा हात धरून विचारलं—‘वचन पाळशील ना?’ मी हो म्हटलं. ”

“त्यानंतर मी रेल्वेचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. चांगले पैसे कमावले. तीन घरे. दोन मुलं. दोघेही United States मध्ये. पण १९९५ पासून आजपर्यंत—दररोज पहाटे ३ वाजता—१०० इडल्या. एक रुपया. याच स्टेशनवर. ३० वर्षे. ”

माझ्या अंगावर काटा आला.

“आजोबा… रोज ₹४०० तोटा. महिन्याला ₹१२, ०००. वर्षाला ₹१. ५ लाख. ३० वर्षांत ₹४५ लाख!”

ते शांतपणे म्हणाले,

“पैशाने पाहिलं तर तोटा. मनाने पाहिलं तर नफा. ३० वर्षांत किती लोकांना खाऊ घातलं असेल? १० लाख इडल्या. १० लाख पोटं. १० लाख आशीर्वाद. त्याची किंमत किती कोटी?”

इतक्यात एक १२ वर्षांचा मुलगा धावत आला. फाटका शर्ट.

“आजोबा… इडली… ३ दिवसांपासून काही खाल्लं नाही. आई हॉस्पिटलमध्ये. पैसे नाहीत. ”

आजोबांनी ४ इडल्या पानात ठेवल्या, चटणी घातली.

“हळूहळू खा बाळा. ”

तो मुलगा खात होता… आणि रडत होता.

“उद्या पैसे देतो…”

“नको. तू मोठा झाल्यावर एखाद्या भुकेल्याला खाऊ घाल. तेवढंच पुरे. तीच किंमत. ”

तो मुलगा त्यांच्या पाया पडला.

“वचन देतो आजोबा. मीही एक रुपयाला इडली विकेन. ”

मी ₹१००० ची नोट काढली.

“आजोबा, कृपया… सगळ्या इडल्या मी घेतो. ”

ते हसले.

“या एका माणसासाठी नाहीत. भुकेल्यांसाठी आहेत. तुला भूक असेल तर एक इडली घे. एक रुपया ठेव. ते पुरे. ”

मी ₹१ ठेवलं. एक इडली घेतली. आयुष्यात खाल्लेली सर्वात चविष्ट इडली होती. डोळ्यांत पाणी आलं.

मी विचारलं,

“तुमच्या मुलांना काही वाटत नाही? पैसे वाया जातात असं?”

त्यांनी फोन काढला. व्हिडिओ कॉल. मुलगा अमेरिकेत.

“अप्पा, इडल्या विकल्या? तब्येत कशी? डॉक्टर काय म्हणाले?”

“ठीक आहे. आज एक तरुण भेटला. गोष्ट ऐकली. ”

त्यांचा मुलगा माझ्याकडे पाहून हसला.

“सर, धन्यवाद. कृपया माझ्या वडिलांची काळजी घ्या. आम्ही दर महिन्याला ₹५०, ००० पाठवतो—इडल्यांसाठी. त्यांची इच्छा म्हणजे आमचं भाग्य. त्यांचं व्रत म्हणजे आमचं व्रत. ”

आजोबा म्हणाले,

“पाहिलंस? माझी मुलंही वचन पाळत आहेत. मी गेल्यावरही ही टोपली थांबणार नाही. एक रुपयाची इडली थांबणार नाही. ”

आज २०२६ आहे. ते आजोबा आता हयात नाहीत. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. जाण्यापूर्वी त्यांनी माझा हात धरून सांगितलं—

“बाळा, टोपली सांभाळ. वचन पाळ. ”

आता दररोज पहाटे ३ वाजता, त्याच बाकावर, Chennai Central railway station मध्ये मी बसतो. टोपलीभर इडल्या. एक रुपया.

मी नोकरी सोडली नाही. पण रोज २ तास… इडल्यांसाठी देतो.

माझ्या कंपनीत २०० कर्मचारी आहेत. प्रत्येक जण महिन्याला ₹१०० देतो.

“वन रुपी इडली ट्रस्ट. ”

तो १२ वर्षांचा मुलगा—गणेश—आता बारावीत शिकतो. संध्याकाळी येतो आणि मदत करतो.

“अण्णा, मीही वचन घेतलं आहे. मोठा झाल्यावर मीही हेच करणार. ”

मित्रांनो, पैसा कमावणं मोठेपण नाही. पैशाचा उपयोग करून पुण्य कमावणं हे खऱ्या अर्थाने मोठेपण आहे.

घरात मुलं असतील तर एक छोटा डबा ठेवा.

“₹१ ची पेटी. ”

दररोज ₹१ टाकायला सांगा. महिन्याला ₹३० होतील. त्या पैशातून एखाद्या भुकेल्याला जेवण द्या.

कारण तुमच्यासाठी ₹३० कदाचित किरकोळ खर्च असेल…

पण कोणासाठी तरी ते ३० दिवसांच्या अन्नासारखं असू शकतं.

एक संकल्प करा — किमान एका भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या.

पैसा जाईल… पण पुण्य राहील.

टोपली रिकामी होईल… पण मन भरून जाईल.

 

लेखक : अज्ञात 

संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जनगणनेच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धोका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

डाॅ.धनंजय देशपांडे

? विविधा ?

☆ “जनगणनेच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धोका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

आता देशात जनगणना “एप्रिल 2026 पासून टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे” महाराष्ट्रात घरांची यादी 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार आहे. जनगणना ही देशासाठी महत्त्वाची आहे, पण तुमची सुरक्षितता त्याहूनही जास्त. महत्वाची आहे. कारण जनगणनेच्या नावाखाली सायबर भामटेही तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून तुमची सगळी माहिती काढून घेऊन / प्रसंगी बोलण्यात गुंतवून तुमच्याच कडून ओटीपी घेऊन लुटलेही जाण्याची शक्यता आहे म्हणूनच तातडीने मी (डॉ. धनंजय देशपांडे तुमचा सायबर सुरक्षा दोस्त) सर्वाना सावध करण्यासाठी व काय काळजी घ्यायची ते सांगण्यासाठी या पोस्टमधून संवाद साधतोय.

जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकृत व्यक्तीला कसे ओळखावे, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

खऱ्या जनगणना अधिकाऱ्याची ओळख कशी पटवाल?

🛑 अधिकृत ओळखपत्र

प्रत्येक प्रगणकाकडे केंद्र सरकार किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेले अधिकृत ओळखपत्र असते. त्यावर त्या व्यक्तीचे नाव, पद, फोटो आणि संबंधित विभागाचा शिक्का असतो. ते आधी नीट तपासा.

नुसतं ID कार्ड दाखवलं म्हणजे खरा अधिकारी असतोच असं नाही. स्कॅमर पण नकली कार्ड छापून आणतात. तर अस्सल कार्ड ते आहे का ? यासाठी खालील 5 स्टेप्स लक्षात ठेवा.

 ID कार्डवर काय-काय तपासाल

अस्सल ID कार्डवर सरकारी शिक्का/होलोग्राम म्हणजेच Registrar General & Census Commissioner, India – ORGI चा लोगो त्यावर असतो. नकली कार्डवर लोगोची प्रिंट धूसर असते.

QR Code/बारकोड : 2026-27 ची जनगणना डिजिटल आहे. खऱ्या कार्डवर QR कोड असतो. तो स्कॅन केला की अधिकाऱ्याची माहिती अधिकृत साईटवर दिसते. प्रत्येक अधिकाऱ्याला विशिष्ट एरिया दिलेला असतो.

“तुमचा ब्लॉक नंबर कोणता?” विचारा. तो घाबरला किंवा टाळाटाळ केली तर तो संशयास्पद. आहे असं समजून त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवा.

तसेच कार्डवर जिल्हाधिकारी/तहसीलदारची अशा स्थानिक अधिकाऱ्याची सही-शिक्का असतो. तो आहे का पहा.

  1. फोनवरून लगेच क्रॉस-व्हेरिफिकेशन करा

हा सगळ्यात खात्रीशीर उपाय आहे: त्याला सांगा “1 मिनिट थांबा, मी तहसील ऑफिसला फोन करतो”. असं म्हणत जनगणनेसाठी टोल-फ्री हेल्पलाईन 14444 आहे किंवा राज्याच्या सेन्सस हेल्पलाईनवर फोन करा.

स्थानिक पर्यायसुद्धा असून ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, किंवा पोलीस स्टेशन 112 वर फोन करून “या नावाचा प्रगणक आमच्या एरियात नेमला आहे का?” विचारा. त्यांच्याकडे यादी असते. खरा अधिकारी थांबेल. फ्रॉडस्टर पळून जाईल. सिम्पल आयडिया !! 🤣 

  1. गणवेश आणि साहित्य बघा

खरे प्रगणक सहसा:सोबत टॅब/मोबाईल घेऊन येतात ज्यावर CENSUS 2026 अँप असतं. निळ्या रंगाची बॅग/फोल्डर असते ज्यावर “भारताची जनगणना 2026-27” छापलेलं असतं. ते एकटे-दुकटे येत नाहीत. एक सुपरवायझर व हाताखाली 6-7 प्रगणक असतात. तो एरियात फिरत असतो.

फक्त कागद आणि पेन घेऊन कुणी आला, तर लगेच सावध व्हा. त्याला कोणतीही माहिती देऊ नका.

  1. काय विचारतो ते ऐका

खोटे अधिकारी (सायबर भामटे) बऱ्याचदा माहिती विचारताना घाई करतात आणि घाबरवतात. “माहिती दिली नाही तर रेशन बंद होईल”, “दंड बसेल”. अस काहीतरी सांगून तुम्हाला पॅनिक करून नंतर हिप्नोटाईजसारखं करून त्यांना तुमच्याकडून हवी असलेली सगळी माहिती काढून घेतील. आणि नंतर ट्रॅपमध्ये अडकवतील. तेव्हा पॅनिक अजिबात होऊ नका.

आणि अधिकारी जर खरा असेल तर शांतपणे व ठराविक प्रश्नच विचारतो.

तो कधीही OTP, पैसे, बँक डिटेल्स, डेबीट क्रेडिट कार्ड डिटेल्स, पॅन नंबर, मागत नाही.

  1. शेजारी-पाजारी सोबत घ्या

जनगणनेसाठी आलोय असं कुणी म्हणत बेल वाजवली तर एकट्याने दार उघडू नका. सोसायटीच्या ग्रुपवर आधीच मेसेज टाका की “आज आमच्या लेनमध्ये जनगणनावाला आलाय”. म्हणजे सगळे शेजारी अलर्ट होतील. प्रसंगी तुमच्या शेजाऱ्याला सोबत घरी बोलवा. कारण चारपाच 4 लोकांसमोर फ्रॉड करायला सायबर भामटा घाबरतो.

🛑 नियुक्ती पत्र (Appointment Letter):

जर तुम्हाला संशय आला, तर तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या नियुक्ती पत्राची मागणी करू शकता. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना लेखी आदेश दिलेले असतात.

🛑 काय विचारले जाते आणि काय नाही?

सर्वात महत्त्वाचा फरक इथेच आहे.

काय विचारतात : कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय, घरातील सुविधा (पाणी, वीज इ.).

काय कधीच विचारत नाहीत : अधिकृत अधिकारी तुम्हाला कधीही तुमचा OTP, बँक खात्याचा तपशील, पिन नंबर, सीव्हीव्ही (CVV) किंवा डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती विचारणार नाहीत.

🛑 प्रश्न काय विचारणार हे ठरलेलं आहे

प्रगणक फक्त ठराविक 33 प्रश्न विचारतात – घराचा प्रकार, पिण्याचं पाणी, शौचालय, वीज, गॅस, TV, गाडी वगैरे. ते तुमच्या उत्पन्नाबद्दल, गुंतवणुकीबद्दल, कर्जाबद्दल सविस्तर विचारणार नाहीत. असले प्रश्न आले तर सावध व्हा.

 🛑 पैशांची मागणी नाही:

जनगणना ही पूर्णपणे सरकारी प्रक्रिया आहे. यासाठी येणारा अधिकारी तुमच्याकडे एका रुपयाचीही मागणी करत नाही. जर कोणी ‘फॉर्म फी’ किंवा ‘नोंदणी शुल्क’ मागत असेल, तर समजा तो स्कॅमर आहे.

 🛑 मोबाइल ॲप आणि तंत्रज्ञान:

आताची जनगणना डिजिटल पद्धतीने होत आहे. अधिकारी त्यांच्या फोनमध्ये किंवा टॅबमध्ये ‘Census App’ वापरतील. तरीही, ते तुमच्या फोनवर कोणतीही अनोळखी लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला सांगणार नाहीत, याची दक्षता घ्या.

 शेवटी नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या टिप्स

🔷 घराबाहेरच संवाद साधा : पूर्ण खात्री असल्याशिवाय अनोळखी व्यक्तीला घराच्या आत घेऊ नका.

🔷 स्थानिक प्रशासनाशी संपर्क : जर कोणी संशयास्पद वाटले, तर लगेच तुमच्या भागातील नगरसेवक, ग्रामपंचायत कार्यालय किंवा पोलीस स्टेशनला फोन करून शहानिशा करा.

🔷 सायबर हेल्पलाईन: जर कोणी जनगणनेच्या नावाखाली तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर त्वरित तक्रार करा.

 🛑 Self-Enumeration केलेला ID उपयोगी पडेल

तुम्ही https://se. census. gov. in वर स्वतः माहिती भरली असेल तर तुम्हाला 11-अंकी SE ID मिळते. घरी आलेल्या अधिकाऱ्याला फक्त तो ID द्यायचा आहे. त्याने परत सगळी माहिती विचारली नाही पाहिजे. त्याचा व तुमचाही वेळ वाचेल तसेच फसवणुकीची शक्यता झिरो होईल.

डॉ. डीडी क्लास : शेवटी इतकंच सांगतो… “माहिती द्या, पण सतर्क राहून! जनगणना ही देशासाठी महत्त्वाची आहे, पण तुमची सुरक्षितता त्याहूनही जास्त महत्वाची आहे” त्यामुळे सहकार्य करताना सावधपणे करा. आणि विशेष म्हणजे केवळ तुम्ही एकट्याने हे वाचून सावध होऊ नका 🤣

तर तुमच्या कुटुंबियांनाही हे पाठवा तसेच तुमच्या सोसायटी ग्रुपवर फॉरवर्ड करा ! 🙏

© डाॅ. धनंजय देशपांडे

Cyber Security Consultant

– 3 National Award winner

– 3 State Award winner

HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

😊

(लक्षात ठेवा: माहिती देणं कायद्याने बंधनकारक आहे, पण आधी ओळख पटवणं हा तुमचा अधिकार आहे)

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४३ आणि ४४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४३ आणि ४४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४३ – – – 

मना सज्जना एक जीवी धरावे|

जनी आपुले हीत तुवा करावे|

रघूनायकावीण बोलो नको हो |

सदा मानसी तो निजध्यास राहो|४३|

अर्थ : हे सज्जन मना, आपल्या जीवाशी एक खूणगाठ बांधून ठेव. जीवनामध्ये आपले तू कल्याण करून घे. एकदा भगवंताशिवाय अन्य गोष्टी बोलण्याचे सोडून दे. सदासर्वदा आपल्या मनाला त्याचाच ध्यास लागू दे.

विवेचन : आपले कल्याण व्हावे ही समर्थांची तळमळ मनाच्या श्लोकांमध्ये ठायी ठायी जाणवते. म्हणून पुनरुक्तीचा दोष पत्करून काही गोष्टी ते पुन्हा पुन्हा सांगतात. आपल्या मनाला उपदेश करताना ते म्हणतात, ” हे सज्जन मना, एक गोष्ट आपल्या जीवाशी निश्चित करून ठेव. तुला जर तुझे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुनायकाचा म्हणजे भगवंताचा ध्यास घे. त्याच्याशिवाय दुसरे काही बोलू नको. “

व्यवहारात आपल्या वाणीला म्हणजे बोलण्याला अतिशय महत्त्व असते. आपल्या बोलण्यावरून आपले व्यक्तिमत्व लोकांना समजते. म्हणून व्यवहारात लोकांशी आवश्यक तेवढे बोलावेच लागेल. व्यवहार सोडता येणार नाही. समर्थांनी देखील “आधी प्रपंच करावा नेटका” असे सांगितले आहे. पण जेव्हा व्यवहारातील बोलणे संपेल तेव्हा आपल्या मुखातून भगवंताचे नामच बाहेर पडले पाहिजे. असे नाम सातत्याने येण्यासाठी मनामध्ये त्याचा विचार हवा कारण जसा विचार, तसा उच्चार आणि तसा आचारही होतो.

हा झाला बाह्य आचार. एक वेळ मुखात भगवंताचे नाम येणे, भगवंताबद्दल बोलणे सहज जमू शकते. पण आपल्या अंतरंगात भगवंताचे अनुसंधान टिकवणे सोपे नाही. त्याच्यासाठी सतत जागेपणी जेवढे शक्य होईल तेवढे भगवंताचे नाव घेत राहण्याचा अभ्यास करायला हवा. इंग्रजी शब्दांचा वापर करून सांगायचे झाले तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन भगवंताच्या नामाचा ध्यास असायला हवा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात तुम्ही जागेपणी मनाला नाम घेण्याची सतत सवय लावून घ्या. एकदा हे साधले की मग तुमच्या झोपेत किंवा तुमच्या आजारपणात देखील आपोआप हे नाम घेतले जाईल.

हे विवेचन वाचत असताना आपल्याला असे वाटेल की हे म्हणजे फारच झाले व्यवहारात आपल्याला एवढे शक्य नाही. परंतु समर्थांचे हे सांगणे आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठीच आहे. आपण भगवंताचे नाम का घ्यायचे ?त्याची भक्ती का करायची ? तर आपण साधना मार्गावर चालणारे साधक आहोत. सुरुवातीलाच समर्थांनी आपल्याला “गमू पंथ अनंत या राघवाचा” असे सांगितले आहे. ही गोष्ट एकदा मान्य केली की मग समर्थांचा उपदेश सहज पचनी पडतो.

जसे रोग्याला डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळणे त्याच्या हिताचे असते, तसेच साधकाला देखील काही गोष्टींची पथ्ये असतात. ती त्याने सांभाळायला हवीत. तुकाराम महाराज म्हणतात, ” जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी. ” आपण साधक आहोत आणि परमेश्वराची प्राप्ती हे आपले साध्य आहे. हे जीवनध्येय एकदा ठरले की मग पुढील वाटचाल सोपी होते. परमेश्वराच्या नामात रममाण व्हायचे की लोकांमध्ये मिसळून आपला वेळ अन्य गोष्टींमध्ये व्यर्थ घालवायचा ? यातील कोणती गोष्ट निवडायची हे खऱ्या साधकाला सांगावे लागत नाही. आपल्या परमार्थाला हानिकारक होतील अशा गोष्टींपासून खरा साधक दूरच राहतो. “विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो… ” असे संत नामदेव म्हणतात. तसेच आपलेही झाले पाहिजे.

स्वसंवाद :: 

१) माझ्या दिवसातील किती वेळ भगवंताचे नाम किंवा विचार माझ्या मनात असतो – प्रामाणिकपणे सांगायचे तर किती टक्के ?

२) “जसा विचार, तसा उच्चार, तसा आचार” – माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का ?

३) साधकाला पथ्य असते – माझ्या परमार्थाला हानिकारक कोणती सवय मी अजून सोडलेली नाही ?

४) गोंदवलेकर महाराज म्हणतात जागेपणी नामाची सवय लावा – मी आज या क्षणापासून हे सुरू करण्यास तयार आहे का ?

– – – – 

श्लोक क्र. ४४ – – 

मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी |

कथा आदरे राघवाची करावी |

नसे राम ते धाम सोडोनी द्यावे |

सुखालागि आरण्य सेवीत जावे |४४|

अर्थ :  हे मना, समाजात वावरताना शक्यतो मौन धारण करावे. बोलायचेच झाले तर अत्यंत आदराने श्रीरामाचे गुणगान करावे. ज्या ठिकाणी श्रीरामाबद्दल म्हणजेच भगवंताबद्दल प्रेम नाही अशा ठिकाणी राहू नये. ते ठिकाण तत्काळ सोडून द्यावे. भगवंताच्या नामातील सुख प्राप्त करण्यासाठी खुशाल अरण्यात जाऊन राहावे.

विवेचन : मन म्हणजे विचार करणे. ज्याला मन आहे तो माणूस ! म्हणजेच जो विचार किंवा चिंतन करू शकतो तो माणूस होय. मौन हा शब्द देखील मन या धातूपासून तयार झाला आहे. केवळ न बोलणे म्हणजे मौन नव्हे तर ज्याच्या अंतरात भगवंताच्या नामाचे चिंतन सुरू आहे आणि अन्य काही बोलण्याची ज्याला आवश्यकता राहत नाही अशी गोष्ट म्हणजे मौन. अशी व्यक्ती केवळ भगवंताचे गुणगान करण्याकरताच बोलते. त्याचीच कथा सांगते.

मौनाचा हा अर्थ साधकांसाठी सांगितला आहे. अनेक लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी सोयीस्कर मौन धारण करतात. त्या अर्थाने मौन हा शब्द इथे अपेक्षित नाही. “मौनम् सर्वार्थ साधनं” असे एक प्रसिद्ध संस्कृत वचन आहे. मौनाने सर्व काही साध्य होते असा त्याचा अर्थ आहे. जे लोक मौन पाळतात आणि वायफळ बडबड करत नाहीत, अशांच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होते. आपण बोलून जे साध्य करू शकत नाही ते मौनाने साध्य होते. अशा वेळी मौन हेच शस्त्र आणि शास्त्र ठरते. सतत बडबड करणाऱ्या लोकांच्या बोलण्याला लोक फारशी किंमत देत नाहीत.

काही अपवादात्मक साधुसंत खरोखरच साधनेसाठी मौन धारण करतात. परंतु बरेचसे साधू मौन तर धारण करतात, परंतु त्यांच्याकडे कोणी आले आणि त्यांना काही विचारले तर ते हातवारे करून बोलतात किंवा आपले म्हणणे पाटीवर लिहून सांगतात. काही साधुसंतांनी मौनाच्या काळात ग्रंथ देखील लिहिल्याचे ऐकण्यात येते. असे मौन खऱ्या अर्थाने पूर्ण मौन म्हणता येणार नाही.

समर्थांनी जनी मौन्यमुद्रा धरावी असे म्हटले आहे. एक वेळ एकांतातील मौन सोपे आहे परंतु भोवती लोकांची गर्दी असताना सोपे नाही. विपश्यना शिबिरात तर खुणेने देखील बोलायचे नसते. अशा ठिकाणी माणसे दहा दिवस कसाबसा धीर धरतात. परंतु एकदा शिबिर संपले की दहा दिवसांची भर काढून घेतात.

जो खरा साधक असतो तो भगवंताच्या चिंतनात अंतर्बाह्य बुडालेला असतो. त्यामुळे त्याला इतर अनावश्यक बडबड करण्याची आवश्यकता भासत नाही. तो जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या वाणीने भगवंताच्या गुणांचे वर्णन करतो, भगवंताचे कीर्तन करतो.

जेथे त्याला सुखाने राहून भगवंताचे गुणगान करता येते असे ठिकाण म्हणजे त्याच्या दृष्टीने स्वर्ग. परंतु अशीही काही ठिकाणी असतात की जेथे भगवंताचे चिंतन नामस्मरण केलेले आवडत नाही. भगवंताला न मानणारी माणसे अशा ठिकाणी राहतात. अशा ठिकाणी खऱ्या भक्ताला राहणे कठीण होते. अशा ठिकाणी त्याचा आणि भगवंताचा देखील अवमान होतो. म्हणून ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो आहे, निंदा होते आहे असे दिसले तर ते ठिकाण तत्काळ सोडावे.

अशाप्रसंगी वनात जाऊन देखील राहण्यास हरकत नाही तेथे सुखाने भगवंताचे नाम घेता येते त्याच्या स्मरणात राहता येते संत तुकाराम महाराज म्हणतात, ” येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप, पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. ” साधकाला मग अशा एकांतातील सुख अनुभवता येते कुठलाही व्यत्यय न येता परमेश्वराचे नामस्मरण घडते. परमेश्वराच्या चिंतनासाठी अनेक संतांनी जनामध्ये राहणे सोडून वनामध्ये निवास केला त्याचे कारण हेच आहे.

सध्या काळ बदलला आहे. हल्ली समर्थांच्या सांगण्याप्रमाणे वनात जाऊन निवास करणे सर्वसामान्य माणसांसाठी सोपे नाही. हल्ली रोजच्या व्यवहारात शांतता मिळणे कठीण झाले आहे. तीर्थस्थानांना देखील बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. जिथे सुखाने भगवंत चिंतन करता येईल अशा जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी आरण्य सेवन याचा अर्थ एकांत सेवन असा घ्यायला हरकत नाही. ज्या ठिकाणी सुखाने आपल्याला हरीचे नाम घेता येईल असे ठिकाण म्हणजे अरण्यच असे म्हटले तर हरकत नाही.

स्वसंवाद :: 

१) माझ्या बोलण्यात किती वेळ भगवंताचे गुणगान असते आणि किती वेळ निरर्थक गोष्टी असतात ?

२) मला भगवंत चिंतनासाठी मौन आवश्यक आहे ही गोष्ट पटते का ?

३) ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो अशा ठिकाणी राहणे मला जड जाते का, की मी त्याशी तडजोड करतो ?

४) माझ्या दैनंदिन जीवनात “आरण्य” म्हणजे एकांताची जागा कोणती आहे आणि मी ती नियमितपणे वापरतो का ? 

– क्रमशः श्लोक ४३ आणि ४४. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कहाणी सिद्धीविनायक मंदिराची – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ कहाणी सिद्धीविनायक मंदिराची –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

अंबानीही रांगा लावतात ते सिद्धिविनायक मंदिर कुणी बांधलंय माहितीये_ इतिहास ऐकून रडू येईल!

आज कोट्यवधी भक्तांच्या पदरात सुख टाकणारं मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर… एका अशा मराठी माऊलीने बांधलंय, जिला स्वतःला कधीच आई होता आलं नाही! 

१९ नोव्हेंबर १८०१ रोजी दादर-प्रभादेवीत _देऊबाई पाटील आणि लक्ष्मण विठू पाटील या सधन आगरी-कोळी दांपत्याने स्वतःच्या पैशाने हे मंदिर बांधलं. देऊबाईंना स्वतःला मूलबाळ नव्हतं. वांझोटी म्हणून समाजाने दिलेले टोमणे त्यांनी निमूटपणे सहन केले. पण, जे दुःख माझ्या वाट्याला आलं, ते इथल्या इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, बाप्पाने प्रत्येकीची ओटी भरावी याच एका उदात्त हेतूने त्यांनी हे सिद्धिविनायकाचे मंदिर उभारले !

आज याच मंदिरात अंबानींपासून ते सुपरस्टार्सपर्यंत सगळेच अनवाणी पायाने रांगा लावतात. पण स्वतः मातृत्वाला पारख्या झालेल्या आणि कोट्यवधी लोकांना आशेचा किरण देणाऱ्या या मराठी माऊलीचा इतिहास मात्र कुठेतरी हरवलाय.

– – हा अंगावर काटा आणणारा इतिहास बाप्पाच्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचलाच पाहिजे !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ छान मैत्रीण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

सौ. वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छान मैत्रीण…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

फक्त एक छान मैत्रीण हवी.

 

पन्नाशी, साठ्ठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

अनुभवांच्या शिदोरीसकट बोल्डसुद्धा असते

 

कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती

सहज adjust करते.

मुलांबरोबर लहान होते,

मुलीचीही मैत्रीण होते.

 

संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते.

गाणी, गोष्टी, मूव्ही, नाटक हवे तेव्हा बघते.

 

पन्नाशी, साठ्ठीची स्त्री सर्वात स्मार्ट म्हणणे काही वावगं ठरणार नाही.

 

बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही.

लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही.

 

साडी आणि सासू आता discussion उरले नाही.

 

विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते.

 

अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते.

डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवते.

 

जगायचंच राहून गेलेलं ती आता जगत असते.

पन्नाशी, साठ्ठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

 

देवाला मी आज निवांत पाहीलं आणि लगेच एक फूल वाहिलं

 

देवाने हसून म्हटलं “मागा, काय जे मनात साठलं. “

 

“देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे “

 

“एक मिनिट, एक मिनिट… विचारलेच आहेस म्हणून मागतेय.

 

एक छानशी मैत्रीण दे.

हवे तर अजून एखादे फूल घे.

 

दिसायला छान नसली तरी चालेल.

पण बोलायला छान असायला हवी.

 

डोळे सुंदर नसले तरी चालेल,

पण नजरेतून बोलणारी हवी,

 

केस लांब नसले तरी चालेल,

पण सोबत लांब चालणारी हवी

 

माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल,

फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी.

 

यातलेही काही कमी असेल तरी चालेल,

फक्त एक छान मैत्रीण हवी.

 

.. मैत्रीण..

 

किती गोड असते हो आपल्या आयुष्यात एक मैत्रीण असणे,

कारण ती मैत्रीण नाही तर आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये आपल्या सोबत असणारी आणि देवाने आपल्याला आधाररुपी दिलेली एक मागणी असते.

ती मैत्रीण नसते, तर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते.

 

पन्नाशी, साठीच्या स्त्रियाचे अगदी नेटकं वर्णन, खरेच पन्नाशीनंतर स्त्रियांना पंख फुटल्याचे जाणवते आहे,

मैत्रिणीबद्दल खूपच छान लिहीले. वाचून अगदी मन भरुन आले.

मैत्रिणीची पण आपल्या आयुष्यात एक वेगळीच भूमिका असते. तिच्या सोबतीने कुठल्याही वयात आयुष्याचा स्वच्छंदपणे आस्वाद घेता येतो.

  

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # ई. एम. आय. च्या नावानं चांगभलं… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # ई. एम. आय. च्या नावानं चांगभलं… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

महिन्याचा पगार जेव्हा खात्यात जमा झाल्याचा मोबाईल वर मेसेज येतोना… तोच एकमेव क्षण असा असतो कि ओठांवर आनंदाच्या हास्याची एक कणी फुलवून जातो… आपल्या महिन्याभर केलेल्या कष्टाचं पैश्यात झालेलं चीज बघून… चला हे ही नसे थोडके.. बचेगें तो और भी लडेंगे चा उत्साह दुणावतो… सारी दुनिया मुठ्ठीमें बांधून घेतल्याचा फिल येतो… नि सारं काही पैश्यात मोजून विकत घेऊ शकतो याचा नाही म्हटला तरी थोडासा गर्वाचा फुगा फुगतोच… तिनशे साठच्या अंशात मान अशी तोऱ्यात फिरते नि डोळे सगळ्यावर निरखून पाहू लागतात. म्हणत असतात आहे कोणी माझ्यासारखा माईचा लाल ज्याच्या कतृत्वाची असेल का अशी कमाल… ऐश्वर्य पायाशी लोळणं घेणाऱ्या राजा सारखं, धनाढ्य गर्भश्रीमंतीचा बाज असण्यासारखं… आणि आणि ब्ला ब्ला… थोडक्यात काय तर मी मी म्हणजे कोण आहे… कोण आहे मी?…

… होय मी म्हणजे कोण आहे?.. समजले काय तुम्हाला?.. काही औटघटकेचा मन का राजा आणि आणि काही क्षणात त्याचा वाजून जातो बॅंडबाजा… बॅंकपासबुकावरची ती पगाराची जमा रक्कम हळूहळू आक्रसायला लागते… एकेक ठरलेले ई. एम. आय. चे हप्ते अजगरासारखे पगारातला आपला हिस्सा गिळंकृत करायला लागतात… होमलोन, कारलोन, मुलाचं एज्युकेशन लोन, टर्म इन्सुंरन्स, सोसायटी मेंटेनन्स… अन हजार वाटांचा खर्च पहिल्याच आठवड्यात पासबुक हलकं करून सोडतो… आणि उरलेले अठ्ठावीस एकोणतीस दिवस पुन्हा मानेवर गुलामीचे जोखड घेऊन जगायला लागतं… इथं जगणं होतं ते पैश्याचं सलाईन लावून आणि मरणं येतं ते सलाईन संपतं तेव्हा… जगण्याचं स्वातंत्र्य हरवलेले आपण आपलं आयुष्यचं ई. एम. आय. च्या नावावर कायमस्वरूपी भाड्याने देत असतो… सुखाची साधनं गोळा करण्याचा आटापिटा करून ती साधनं घरात येऊन तर पडतात त्यासाठी आपण खऱ्या सुखाचा ई. एम. आय. भरला गेला असल्याने त्यात सुख लाभले नाही म्हणून मग पुन्हा दुसऱ्या गोष्टी घरात आणण्यासाठी जीवाची तडफड चालू राहते… फिरून फिरून एकच अनुभव आपल्याला मिळत असतो… पण हट्टी मन थांबायला समजून घ्यायला तयार नसतचं.. आणि एक दिवस तो उगवतोच भाड्याने दिलेल्या आयुष्याचा भाडेकरारच संपुष्टात येतो तेव्हा आहे ते सगळंच जसं आहे तसंच टाकून जाणं भाग पडतं… इ. एम. आय. तटतात, पासबुकात किरकोळ शिल्लक असते गाडी ची चावी नि घराची किल्ली टेबलावर तशीच पडलेली, काही आधीच्या बचतीतले नाहक खर्चाला रबर बॅंड लावलेले पैसे वाऱ्याने फडफडत असतात.. सारं सारं काही सुखाच्या राशी ओतणारे पण सुखाचा आभास दाखवणारे… त्याच वेळेला हिशोबाचा पसाऱ्यात एक कप चहा मात्र अर्धा प्यालेल्या स्थितीत ताटकळत असतो, कधी कप रिकामा होईल याची वाट पाहत… कारण खरं सुख समाधान त्यातच दडलेलं आहे हेच त्याला सांगायच असतं… वेळ निघून गेलेली असते… पण इ. एम. आय. अमर असतो त्याला नित्य नव्याने एकेकाचं आयुष्य भाड्याने मिळणारं असतंच असतं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस प्रपंचात अडकलेल्या सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी गाथेत भरपूर अभंग लिहिले आहेत. सर्वसामान्य माणसांना ऐहिक जीवनाचा लोभ असतो, त्यातून त्यांना परावृत्त होणे फार अवघड आणि कष्टाचे असते. तुकाराम महाराज या संदर्भात आपल्यासारख्या सामान्यांना अत्यंत कळकळीने त्यांच्या वाणीत जागोजागी सांगत आहेत.

आहे ते सकळ कृष्णासी अर्पण/

* नकळता मन तुझे भावी*//

म्हणवुनी पाठी लागतील भुते/

येती गिवसीत पाच जणे//

ज्याचे त्या वंचले आठव न होता/

दंड न हा निमित्त कारणे//

 

तुका म्हणे काळे चेपीयला गळा/

मी मी वेळोवेळी करीतसे//

आपण प्रापंचिक लोक हे जाणतच नाही की जी काही कर्मे आहेत, आणि जे जे काही अस्तित्वात आहे ते एका कृष्णाच्या सत्तेने आहे. कर्ता-करविता तोच आहे. आपण अविवेकी, हे जाणत नाही आणि सर्व काही मी केले अशी मनात भावना धरतात. त्यामुळे “येती गिवसित पाच जणे”, म्हणजे आपला पंचमहाभूतांचा हा देह आपल्याला शोधत येतो. याचाच अर्थ आपण जन्म मरणाच्या चक्रातून फिरत राहतो, आपला पुनर्जन्म होतो. सर्व कर्मे हरीचीच असून ती त्याची त्याला अर्पण करण्याची आठवण न ठेवल्यामुळे आपल्याला जगण्याचा आणि मरणाचा दंड मिळतो. हा दंड भोगायचा नसेल त्याने प्रथमतः अहंकाराने मी मी करणे सोडून दिले पाहिजे. ज्यावेळी अशी अवस्था होईल त्याचवेळी लोभ, मोह, सर्व मायापाश यातून माणसाची कायम सुटका होईल.

ते सामान्य संसारी माणसाला सांगतात,

वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जीती/

जाणार त्या निश्चिती देव नाही//

भाडेकरी वाहे पाठीवरी भार/

अंतरीचे सार लाभ नाही//

देवपूजेवरी ठेवूनिया मन/

पाषाणा पाषाण पूजी लोभे//

तुका म्हणे फळ चिंतीती आदर/

लाघव हे चार शिंदळीचे//

फळाची इच्छा मनात ठेवून प्रपंचासाठी अर्थार्जन करणाऱ्या प्रापंचिकांविषयी तुकाराम महाराज वरील अभंगात सांगत आहेत. एखादा चरितार्थाचा व्यवसाय मिळवून जमीन, घर, द्रव्य, राज्य, प्राप्त करून घेणारे जे लोक असतात त्यांनी परमार्थात कितीही धडपड केली, तरी त्यांना परमेश्वर प्राप्ती होणे असंभवनीय आहे. ओझे वाहणारा भारवाहक त्याच्या हमालीचे पैसे घेईल, परंतु त्या ओझ्यातील सारभाग त्याला कसा मिळेल? काही एक प्राप्त करण्याची वासना मनात ठेवून जो देवपूजा करतो तो दगडाची पूजा करणारा दगडच म्हणावा लागेल. अनेक प्रकारचे उद्योग करून त्यापासून फलप्राप्ती इच्छिणारे जे लोक आहेत त्यांची सर्व धडपड म्हणजे तुकाराम महाराजांच्या मते गणिकेच्या शृंगाराप्रमाणे निंद्य आहे.

रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन तुकारामांची सामान्यांना परिस्थिती पटवून, समजावून देण्याची पद्धत खरोखरच आपल्या मनाचा ताबा घेऊन त्या दृष्टीने आपल्याला विचार करण्यास लावणारी आहे. आता हे दोन अभंग पहा…

 (1)

 माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक/

 आपणा सरिसे लोक नागविले//

 विषयी लंपट शिकवी कुविद्या/

 मनामागे नांद्या होऊनी फिरे//

 करुनी खाता पाक जिरे सुरण राई/

 करिता अतित्यायी दुःख पावे//

 औषध द्यावया चाळविले बाळ/

 दावूनिया या गुळ दृष्टी पुढे//

 तरावया आधी शोधा वेदवाणी/

 वांझट बोलणी वारा त्याची//

 तुका म्हणे जया पिंडाचे पाळण/

 न घडे नारायण भेट तया//

 

(2)

मृगजळ दिसे साचपणा ऐसे/

 खोटीयाचे पिसे ऊर फोडी//

 जाणूनी का करा आपुलिया घात/

 विचारा रे हित लवलाही//

 संचित सांगती बोळवण सवे/

 आचरण द्यावे फळ लेणे//

 तुका म्हणे रोखी स्मशान ते वरी/

 संबंध गोवरी आगीसवे//

आपल्या देहाचे पालनपोषण करण्यातच आयुष्य वेचणाऱ्या आणि दुसऱ्यांना उपदेश करून स्वतः पापे करणाऱ्या लोकांविषयी पहिल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की, हे धर्माचे स्तोम माजविणारे लोक माया आणि ब्रह्म एकच आहे असे म्हणतात आणि याच धारणेने स्वैर वागतात व अज्ञान्यांना फसवितात. ( या लोकांना महाराजांनी धर्मठक ही अगदी योग्य संज्ञा दिली आहे.) विषयासक्त मनुष्य दुसऱ्याला कुविद्या शिकवतो आणि स्वतः नंदीबैलाप्रमाणे मन मानेल तिकडे जातो. सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ली तरच पचन होते, अन्यथा कच्चे खाणाऱ्यांना दुःख भोगावे लागते. आजारी मुलाला कडू औषध देताना त्याची आई त्याला एवढे औषध घेतल्यावर गुळाचा खडा देण्याचे आमिष दाखवते. महाराज सांगतात की, हा भवसागर तरुन जाण्यासाठी त्याचा नीट विचार करून, ज्ञान संपादन करून ( सुरणासारखा शिजवून आणि स्वर्गरूपी गुळाचा खडा महत्त्वाचा न मानता त्याग रुपी औषध घ्यावे) हेच आयुष्याचे सार आहे. माया आणि ब्रह्म एकच आहे असे समजून आणि देहाला सर्वस्व मानून त्याचे चोचले पुरविणाऱ्यांना नारायणाचे दर्शन कधीही होणार नाही.

दुसऱ्याही अभंगात मृगजळापाठी धावणाऱ्या हरिणाचे उदाहरण देऊन तुकाराम महाराज सामान्यांना हीच गोष्ट अधिक पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे मृगजळ हरिणांना खरे वाटते आणि ऊर फुटेपर्यंत मोठ्या आशेने हरणे तेथे धाव घेतात, त्याचप्रमाणे देहादिक प्रपंच खोटा आहे हे जाणूनही स्वतःचा घात करतात. स्वहित कशात आहे याचा विचार करीत नाहीत. जे आपले संचित कर्म आहे ते आपल्या बरोबर या जन्मातून त्या जन्मात येत राहते आणि पूर्वकर्माप्रमाणे ते भोगावे लागते. प्रपंचात्मक माणसाचा देह स्मशानात जातो, तेथे तो अग्नीमध्ये मिसळतो. ( अग्नीशी त्याचे लग्न लागते.) याचाच अर्थ असा की, त्याचा जन्म ईश्वर साधना न करता फुकट जातो.

संसारी लोकांबद्दल महाराज काय म्हणतात ते आपण या अभंगात पाहू.

काय एकाच जाले ते का नाही ठावे/

काय आहे सांगावे का म्हूण//

देखतील डोळा ऐकतील कानी/

 बोलिले पुराणी तेही ठावे/

काय हे शरीर साच की जाणार/

सकळ विचार जाणती हा/

का हे कळो नये आपुले आपणा/

बाळत्व तारुण्य वृद्धदशा//

का हे आवडले प्रिया पुत्र धन/

काय काम कोण कोणा आले//

का हे जन्म वाया घातले उत्तम/

काहे राम राम न म्हणती//

काय भूली यांसी पडली जाणता/

देखती मरता आणिकांसी//

काय करीती हे बांधिलिया काळे/

तुका म्हणे बळे वज्रपाशी//

महाराजांना वाटते की, संसाराच्या संगतीने यांची ही काय दुर्दशा, अवस्था झाली आहे. यांना काय काय म्हणून सांगावे? प्रपंच संगतीने जीवाची किती दैना होते हे ते पाहतात, ऐकतात आणि पुराणातही सांगितलेले त्यांना माहित आहे. हे शरीर खरे आहे की नाशीवंत आहे याचे ज्ञान त्यांना आहे. कारण त्यांनी सर्व ऐकले आहे. आपल्या देहाला बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्था अटळ आहेत हे माहीत असूनही त्यांना कळत कसे नाही? बायको, मुले, पैसा याविषयी इतकी प्रीती का असावी? ही माणसे कधी कुणाच्या उपयोगी पडू शकतात का? हे लोक त्यांना मिळालेला उत्तम नरजन्म वाया घालवीत आहेत. रामनामाचे चिंतन का करीत नाहीत? कित्येक लोक मरतात हे पाहिल्यावर आपल्यालाही मरायचे आहे हे जाणूनही लोकहो तुम्ही या वरपांगी देहाला का भुलता? काळाने त्याच्या बलिष्ठ वज्रपाषाने यांना बांधल्यावर हे काय करतील? गीतेमध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, व दोष यांचे जाणीवपूर्वक दर्शन करणे हे ज्ञानाचे लक्षण सांगितले आहे. संसारातील दुःखांची सतत जाणीव ठेवून हरी भजन करावे हेच महाराज आपल्यासारख्या मायाजालात फसलेल्या सामान्य जनतेला सांगत आहेत.

पुढील भागात याच संबंधी गाथेतील आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.

क्रमशः… २१ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस

 संसाराची आसक्ती गेल्याशिवाय तुम्ही आम्ही सर्वच माणसे या ऐहिक मोह पाशातून मुक्त होणे कदापि शक्य नाही म्हणून अशा संसारासक्त माणसांना तुकाराम महाराज या अभंगात काय सांगतात ते पाहू.

 का रे माझी पोरे म्हणशील ढोरे/

 मायबाप खरे काय एक//

 का रे गेले म्हणून मी करीसी तळमळ/

 मिथ्याची कोल्हाळ गेलियाचा//

 का रे माझे माझे म्हणशील गोत/

 न सोडविती दूत यमाहाती//

 का रे मी बळिया म्हणविसी ऐसा/

 सरणापाशी कैसा उचलविसी//

 तुका म्हणे न धरी भरवसा काही/

 वेगी शरण जाई पांडुरंगा//

महाराज म्हणतात की, बाबारे, तात्काळ तू पांडुरंगाला शरण जा. उगाच कशापाई ही माझी मुलं, ही माझी गुर ढोरं करत बसतोस? माझे आई- बाप, माझं गोत का करतोस? कोणी गेल्यावर विनाकारण का तळमळतोस? यमदुताच्या तावडीतून यांच्यापैकी कोणीही तुला सोडवण्यास येणार नाही हे लक्षात असू दे. स्वतःला मोठा बलाढ्य का समजतोस? जर इतका बलवान आहेस, तर मेल्यानंतर तुला सरणावर दुसऱ्याला का चढवावे लागते? एकच लक्षात ठेव की या विश्वात कायम टिकणारा, चिरंजीव असा कोणताच पदार्थ नाही. म्हणून तू फक्त एका पांडुरंगाला शरण जा. ते एकच शाश्वत सत्य आहे.

 जोडोनिया धन उत्तम वेव्हारे/

 उदास विचारे वेच करी//

 उत्तमची गती तो एक पावेल/

 उत्तम भोगेल जीवखाणी//

 पर उपकारी नेणे परनिंदा/

 परस्त्रिया सदा बहिणी माय//

 भूतदया गाई पशूंचे पाळण/

 तान्हेल्या जीवन वनामाजि//

 शांतीरुपे नव्हे कोणाचा वाईट/

 वाढवी महत्त्व वडिलांचे//

 तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ/

 परमपद बळ वैराग्याचे//

गृहस्थाश्रमी माणसाचे आचरण कसे असावे हे सांगणारा हा अभंग सर्वश्रुत व परिचित आहे. जन हो, प्रामाणिकपणे व्यवहार करून द्रव्य प्राप्त करावे, परंतु मनात त्याची आसक्ती नको. उदास विचारे, अलिप्त राहून ते द्रव्य खर्च करा. अशा व्यवहाराने तुम्हाला उत्तम गती मिळेल आणि तुम्ही चांगले भोग भोगाल. कुणाला लुबाडून, चोरी करून, डाका घालून सद्गती मिळणे कदापी शक्य नाही. जो परोपकार करतो, निंदा नालस्ती करत नाही, जो परस्त्रीला मातेसमान, भगिनी समान मानतो, जो सर्व भूत मात्रांवर प्रेम करतो, दया, सहानुभूती दाखवतो, त्यांचे पालन- पोषण करतो, यथाशक्ती वैराण मार्गात पाण्यासाठी विहिरी बांधतो, जो आपली वृत्ती शांत ठेवून कोणाशी दुष्ट वागत नाही, वरिष्ठांचा मान ठेवतो, त्याचा गृहस्थाश्रम आदर्श होय. मोक्षप्राप्तीला लागणारे वैराग्य ते हेच होय. केवळ जंगलात जाऊन एकांतवासात राहण्याने मोक्षप्राप्ती असंभव आहे.

 महाराज प्रापंचिकाला पुढे सांगतात,

 आयुष्य मोजावया बैसला मापारी/

 तू का रे वेव्हारी संसाराच्या//

अरे भल्या माणसा, तो काळ तुझ्या आयुष्याचे माप घेत आहे आणि तू इथे संसारात रममाण झाला आहेस?

 नेईल ओढोनी ठाऊक नसता/

 न राहे दुश्चित्ता हरिविण//

तो काळ तुला कधी ओढून नेईल ते तुला कळणारही नाही, म्हणून आतापासूनच तू हरीचिंतन करत रहा. तुझे चित्त विचलित होऊन देऊ नकोस.

 कठीण हे दुःख यम जाचतील/

 कोण सोडविल तया ठाई//

तू केलेल्या पापांची यमराज तुला शिक्षा देईल, तेव्हा यातून तुला सोडवायला कोण येईल?

 राहतील दूरी सज्जन सोयरी/

 आठवी श्रीहरी लवलाही//

त्यावेळी सखे सोयरे, नातलग, मित्र मंडळी सर्वजण तुझ्यापासून दूर राहतील. तेव्हा तू सतत श्रीहरीचे स्मरण करत रहा, त्या एका हरीला शरण जा.

 तुका म्हणे किती करसी लंडायी/

 होईल भंडाई पुढे थोर//

तुकाराम महाराज म्हणत आहेत, ” अरे, इतका गर्व आणि मस्ती बरी नव्हे, असे केल्याने शेवटी तुझी मोठी दैना होईल.

संसारी माणूस, गृहस्थ सर्वसाधारणपणे कसा असतो त्याचे वर्णन आपल्याला या खालील अभंगात पहावयास मिळते.

 जरी आले राज्य मोळविक्या हाती/

 तरी तो मागुता वेवसायी//

 तृष्णेची मजूरे नेणती विसावा/

 वाढे हाव हावा काम कामी//

 वैभवाची सुखे नातळता अंगा/

 चिंता करी भोगा विघ्न जाळी//

 तुका म्हणे वाहे मरणाचे भय/

 रक्षण उपाय करूनी असे//

एखाद्या मोळी विक्या माणसाला राज्यकारभार देऊन त्याला सिंहासनावर बसवले, तरी त्याच्या मनात मोळ्या विकण्याची आणि त्याचा धंदा करण्याची इच्छा निर्माण होणारच. संसारी माणसाचे ही तसेच आहे. मनुष्य देहाचा लाभ होऊनही आपल्या तृष्णेचा (लोभाचा) गुलाम होतो. अविश्रांत श्रम करतो आणि हावेने हाव, कामाने काम वाढत जातो. भरपूर वैभव असले तरी त्याला सुख लाभत नाही. कितीही उत्तम भोग अनुकूल असले तरी काही विघ्न तर नाही ना येणार या भीतीने त्याचे आयुष्य जळत राहते. जरी तो आपल्याला मरण नक्की येणार आहे हे जाणत असला तरी, आपला पैसा, सारे वैभव कसे टिकून राहील याचा अहोरात्र विचार करत राहतो.

अशा प्रकारे या मायाजालात अडकलेल्या प्रापंचिकाला त्यातून बाहेर काढण्यासाठी परमार्थाला कसे लागावे ते रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतील काही अभंगातून सुचवितात.

 ते म्हणतात,

 आवडी येते गुणे/

 कळो चिन्हे उमटती//

 पोटीचे ओटी उभे राहे/

 चित्त साहे मानसी//

 डोहोळीयाची भूक गर्भा/

 ताटी प्रभा प्रतिबिंबे//

 तुका म्हणे मागून घ्यावे/

 मना खावे वाटे ते//

दृष्टांत देऊन महाराज जन रीत सांगत आहेत. ते म्हणतात की, एखाद्या ठिकाणी चांगले गुण दिसले म्हणजे त्या माणसावर आपली प्रीती जडते. जी गोष्ट मनात असते तीच ओठा वाटे प्रगट होते, कारण मन चित्ताचे सहाय्य घेत असते. मातेला डोहाळे लागतात, ती सर्व भूक, तहान, आवड गर्भाची असते. त्याचीच भावना आईच्या ठिकाणी अन्नाच्या वासने प्रमाणे प्रतिबिंबित होते. जे भक्षण करताना मनाला आवडते तेच पुन्हा मागून खावेसे वाटते. तुकाराम महाराज आपल्या आवडी परमार्थाकडे कशा लावाव्या ते सुचवतात.

स्वतःबद्दल प्रापंचिकांना ते सांगतात,

” माझ्यावर अशी काही अमंगल वेळ ओढवली की नेमका कथेच्या वेळी मला शीण आला आणि मी दुःखी झालो. माझ्या पापामुळे मला दुष्ट लोकांचे दर्शन झाले. मी आता हे विठोबाच्या कानावर घालतो. जन्माला येऊन संसाराच्या मोहात मी कितीदा माझी फजिती करून घ्यावी? देवा, माझी उघड उघड फजिती जाणून लवकर या आणि मला मदत करा. या संसाराच्या वेढ्यात सापडलो आणि बायका मुलांची सेवा करण्यातच अडकलो. पण भक्तीच्या वाटेने पांडुरंगाची कृपा झाली, आणि त्याची भेट झाली. संसाराचे ओझे डोक्यावर होते, ते सोडविणारा कोण सद्गुरु भेटेल याची मला चिंता लागून राहिली होती. “

स्वतःच्या या अनुभवावरून सांसारिकास महाराज सांगतात,

 जा रे तुम्ही पंढरपुरा

 तो सोयरा दीनांचा//

 गुणदोष नाणी मना/

 करी आपणासारिखे//

 उभारोनी उभा कर/

 भवपार उतराया//

 तुका म्हणे तातड मोठी/

 जाली भेटी उदंड//

तुम्ही पंढरपूरला जा कारण तो परमेश्वर, पांडुरंग दीनांवर दया करणारा आहे दीनानाथ आहे. जे त्याला शरण जातील त्यांचे गुणदोष न बघता तो त्यांना आपल्या समान करतो. शरणागताना भवसागरातून उद्धारून नेण्याकरता तो आपले हात वर करून उभा आहे. दीन व आर्त लोकांना भेटण्याची त्याला मोठी उत्कंठा आहे. त्याच्या भेटीने आपले फार मोठे हित होते.

इतके अभंग वाचल्यानंतर आपण सारेच या भवसागरातील प्रवासी, सर्वसामान्य प्रापंचिक, परमार्थाच्या वाटेने चाललो तर आपल्यालाही पांडुरंग, माय- माऊली भेटेल आणि कृपा करेल यात शंका नाही.

क्रमशः… २२  

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”चौकटीबाहेरचा विचार..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चौकटीबाहेरचा विचार.. ☆ संध्या बेडेकर ☆

काही लोक ‘out of the box’ विचार करतात.

आज खूप दिवसांनी देशपांडे आजी आजोबा भेटले. माझे आवडते आजी आजोबा आहेत ते. नेहमी उत्साहात असतात. अगदी ‘full of energy’. मागच्या वर्षीच पंचाहत्तरी झाली त्यांची. त्यांचे घर म्हणजे, आजी आजोबा, अजय, अनिता म्हणजे त्यांचा मुलगा सून व नातु अनय.

अजय अनिता दोघे ही नोकरी करणारे व अनय दुसरीत आहे. शाळेनंतर तो ‘डे केअर’ ला जातो. येताना अनिता त्याला बरोबर घेऊन येते. आजी आजोबांना दिवस भर बिझी ठेवायचा, अजिबात शांत बसत नाही अनय. म्हणूनच अजय अनिता ने त्याला ‘डे केअर’ मधे ठेवायला सुरुवात केली.

या घरची संध्याकाळ म्हणजे, अनिता ची धावपळ असते. स्वयंपाक, अनय चा अभ्यास, आजी आजोबांना वेळेवर जेवण देणे, त्यांचे औषधपाणी, अनयची दुसऱ्या दिवशीची तयारी, सकाळच्या डब्याची तयारी, त्यात येणारे जाणारे असतातच. आजी जेवढं जमेल त्यापेक्षा जास्त मदत करतातच. मुख्य म्हणजे दोघे ही जेष्ठ अजिबात घाई गडबड करत नाही. पण अनिता ची ओढताण बघून त्यांना वाईट वाटत. बायकांची नोकरी म्हणजे ‘double front’ वर काम करावे लागते. घर आणि ऑफिस. दोन्ही कामं सोप्पी नाहीत. अजय ही मदत करतो तिला. सकाळी मावशी येतातच. पण घरच्या बाईला लक्ष द्यावेच लागते.

आज शनिवार, अजय अनिता घरीच आहेत. आज आजी आजोबा कोणत्यातरी वेगळ्याच विचारात आहेत. आजोबा म्हणाले, “अजय !! आज तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुम्हाला वेळ मिळाला की बोलू आपण. “

अजय अनिता आपापली कामे पूर्ण करून येऊन बसले. आजोबा म्हणाले, “मी काय म्हणतो, ते शांतपणे ऐका. अरे!! आम्ही दोघे वृध्दाश्रमात रहायला जायचा विचार करत आहोत. ” आजोबा थेट विषयावरच आले.

एवढं ऐकलं, आणि अजय तर उठून चाललाच गेला. अनिता ढसाढसा रडू लागली. “आई!! माझी काही चूक झाली का ? मला माफ करा”. तिने आपल्या सासूबाईंचा हात हातात घेतला. तिला रडू आवरत नव्हते.

अजय पुन्हा आला. “काय झालं बाबा ? असं का म्हणाला तुम्ही ? काय चाललंय तुमच्या मनात ? हे असे विचार कसे आले तुमच्या मनात ? कोणी कान भरले का तुमचे ? एका नंतर एक प्रश्नांची झडीच लावली त्याने. त्याच्या डोळ्यात पण पाणी आले होते. आजी पण रडत होत्याच.

आजोबा मात्र शांत होते. अजयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, “अरे बाबा!! असं काही नाही. आम्ही दोघे खूप मजेत आहोत. खूप आनंदात व आरामात आहो. तुमचे रोजचे काम बघुन आम्हीच थकतो. सध्या तू आणि अनिता वेगळ्याच फेज मधुन जात आहात. करीयर पण बघायचं आहे. अनयकडे पण लक्ष द्यायचे आहे. आमची पण खूप कामं असतात. आम्हाला दिसतंय तुम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आणि आम्हाला आमचा वेळ कसा काढायचा??? हे कळत नाही. “

आजोबा पूढे म्हणाले, “अरे !! एखादे छानसे वृध्दाश्रम बघ. अगदी छान सोई असलेले. आम्ही तेथे राहू. आम्हाला पण मित्र मैत्रिणी भेटतील. अरे !! आजही तुमची जबाबदारी आहे आमच्यावर. तुमचा आनंद, तुमची तब्येतही महत्वाची आहे. आणि नवीन पिढी ला पण घडवायचे आहे ना. तेव्हा मी काय म्हणतो, ते लक्षात घे व विचार कर. आणि हो, लोक काय म्हणतील ? याचा विचार करायचा नाही. ते येतात का अनिता ला मदत करायला ? अनयला शिकवायला ?”

“बघू”, म्हणून‌अजय ऊठुन गेला. आज जेवताना डायनिंग टेबलावर सर्व शांत होते.

रविवारी सकाळी आजोबांनी अजयला चौकशी करायला सांगितले व स्वतः येऊन बसले. अजय ने नेटवर चेक करायला सुरुवात केली. ‘अजूनही विचार करा’ असं सारखं म्हणत होताच तो.

शेवटी एक वृद्धाश्रम मनाजोगे वाटले. तेथे जाऊन बघीतले. अजयने खूप चौकशी केली. नियम वाचले. खोली बघीतली. सोई बघीतल्या. डॉक्टर ची सोय आहे. मनोरंजन, जेवण हे सर्व बघून खात्री झाल्यावरच आजी आजोबा तेथे रहायला गेले. हे सर्व प्रत्येकासाठी खूप कठीण होते. पण आजोबांनी निर्णय घेतलाच होता.

आता प्रत्येक ‘weekend’ ला अजय अनिता अनयला घेऊन आजी आजोबांना भेटायला जातात. बरोबर दोघांची औषधं, फळं व इतर त्यांच्या आवडत्या वस्तू नेतात. चांगले दोन तास तेथे बसतात. चौघे बगिच्यात बसून खूप गप्पा मारतात. आता अनय ला एक नाही अनेक आजी – आजोबा मिळाले आहेत. आता सर्वांनाच अनयची सवय झाली आहे. अजय अनिता ही सर्वांना प्रेमाने भेटतात. विचारपूस करतात. आता सर्व weekend ची वाट बघतात. वृध्दाश्रमातील उत्साह वाढला आहे.

आज आजोबा गमतीत अजयला म्हणाले, “अरे !! एवढा वेळ तर आमच्याशी बोलायला, तुम्हाला घरी पण मिळायचा नाही. अरे !! आता वृध्दाश्रमात रहायला जाणे म्हणजे मुलं याना सांभाळत नाही असे राहिले नाही, असा अर्थ निघत नाही. नवीन पिढी, घरातले जेष्ठ, सर्वच महत्वाचे आहेत. काही निर्णय घेताना त्रास होतो. पण ते योग्य असतात. कधी कधी ‘out of box’ विचार करून बघावे. जमलं तर ठीक, नाहीतर आपलं घर आहेच ना. अजय रोज सकाळ संध्याकाळ फोन करतोच. “

आज अनयचा वाढदिवस सकाळी सर्व आजी आजोबांबरोबर झाला. आता संध्याकाळी मित्र मैत्रिणींबरोबर, म्हणुन आजी आजोबा परमीशन घेऊन घरी आले आहेत.

आजोबांचे हे bold decision ऐकुन त्यांच्या बद्दल माझा आदर वाढला आहे.

कधी कधी. “out of the box” विचार करून बघावा. त्याकरिता धाडस लागतं…

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र क्र. ८२, ८३, ८४. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ८२, ८३, ८४. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे ८२ – – 

गुणमाहात्म्यासक्ति रूपासक्ति पूजासक्ति स्मरणासक्ति दास्यासक्ति सख्यासक्ति वात्सल्यसक्ति कान्तासक्ति आत्मनिवेदनासक्ति तन्मयतासक्ति परमविरहासक्ति रूपाएकधा अपि एकादशधा भवति ॥८२॥”

अर्थ: भक्ती (प्रेमरूप भक्ति) एकच असूनही ती अकरा प्रकारे प्रकट होते. श्रीमहाराज एका ठिकाणी भक्ति बद्दल म्हणतात, “प्रपंचात जशी आसक्ति, तशी भगवंतावर प्रीती, त्या नाव भक्ति. “ प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असल्याने प्रत्येक व्यक्तीची आसक्ति कुठे असेल ते सांगणे कठीण आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याने आपापल्या आसक्तीचा विचार करून, त्या आसक्तीला भगवंताकडे वळविता आले की त्याचे अर्धे काम झाले असे म्हणता येईल. श्रीमहाराज म्हणायचे की भगवंताशी काहीतरी नाते जोडावे. त्याला भाऊ, बहीण, आई, बाबा, पुत्र किंवा अन्य कोणतेही. त्याचा भक्तिमार्गात खूप उपयोग होतो.

आसक्तीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  1. गुण माहात्म्यासक्ति :

भगवंताचे गुण, महिमा, दया, करुणा, सौंदर्य, सामर्थ्य इ. श्रवण करून, मनन करून त्याच्यावर प्रेम करणे. नारद मुनी आणि महर्षी व्यास यांची भक्ति वरील प्रकारात मोडते.

  1. रूपासक्ति :

भगवंताच्या सुंदर स्वरूपावर प्रेम करणे. त्याच्या मूर्तीचे, दर्शनाचे, सौंदर्याचे चिंतन करणे. गोकुळातील गोपींची भक्ति या प्रकारची आहे असे मानले जाते.

  1. पूजासक्ति :

भगवंताची सेवा, पूजा, आरती, अभिषेक, अलंकार इत्यादींमध्ये प्रेम वाटणे.

  1. स्मरणासक्ति :

सतत भगवंताचे नामस्मरण, गुणस्मरण, लीला चिंतन करणे हेच जीवनाचे ध्येय मानणे.

  1. दास्यासक्ति :

आपण भगवंताचे सेवक आहोत, ही भूमिका घेत त्याची सेवा करणे.

  1. सख्यासक्ति :

भगवंताशी मित्रभाव ठेवून त्याच्याशी मनमोकळा संवाद साधणे.

  1. वात्सल्यासक्ति :

भगवंताच्या लीलांचे बालरूप धरून त्याच्यावर आई-वडिलांसारखे प्रेम करणे.

  1. कान्तासक्ति :

भगवंतावर पतीप्रेमासारखे गाढ, उत्कट, अनन्य प्रेम करणे.

  1. आत्मनिवेदनासक्ति :

स्वतःचे सर्वस्व भगवंताला अर्पण करणे. “तूच सर्वकाही आहेस, मी नाहीच” असे मनोधारणे.

  1. तन्मयतासक्ति :

भगवंतात इतके एकरूप होणे की स्वतःचा विसर पडणे.

  1. परमविरहासक्ति :

भगवंताच्या वियोगाने अतीव तगमग, विरह, वेदना याचा अनुभव घेणे.

समर्थ रामदास भक्तीचे नऊ प्रकार सांगतात.

भक्ती एकच असते ते भगवंतावरचे प्रेम. पण “व्यक्ती तितक्या प्रकृती” या उक्तीप्रमाणे भक्तीचे अनंत प्रकार होऊ शकतात.

जशी भक्ताची भावना, तशी त्याची भक्तीची अभिव्यक्ती!”

जय जय रघुवीर समर्थ

– – – – 

भक्ति सूत्रे ८३ – – 

इत्येवं वदन्ति जनजल्पनिर्भयाः एकमताः कुमार व्यास शुक शाण्डिल्य गर्ग विष्णु कौण्डिण्य शेषोद्धवारुणि बलि हनुमद् विभीषणादयो भक्त्याचार्याः ॥ ८३॥”

अर्थ : सनत्कुमार, वेदव्यास, शुकदेव, शाण्डिल्य, गर्ग, विष्णु, कौण्डिन्य, शेष, उद्धव, अरुणि, बलि, हनुमत्, विभीषण आदि भक्तीचे आचार्य लोकांच्या निंदा स्तुतीची पर्वा न करता (भीती न बाळगता) एकमताने असेच सांगतात की भक्तीच श्रेष्ठ आहे.

विवेचन : भक्तीमार्ग हा एक प्राचीन, समन्वयपूर्ण आणि अनुभवाधारित भगवंत प्राप्तीचा मार्ग आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारद मुनींनी ही सूत्रे लिहिली आहेत, ती त्यांच्या अनुभूतीची आहेत. भक्तीची रचना त्यांनी केलेली नाही, त्या आधीच्या ऋषि आणि पूर्वसुरींनी भक्तिशास्त्राची रचना केली. आणि ती परंपरेने आपल्यापर्यंत आलेली आहे. हा मागील कालावधी एका अर्थाने अनंत असा आहे. या भक्तिमार्गाचे काही प्रमुख आचार्य आहेत, त्यांची नावे वरती दिलेली आहेत. आपण या सर्वांना भक्तिमार्गाचे प्रमुख “वारकरी” (वाहक, प्रचारक) म्हणू शकतो. भक्तीच्या या पवित्र मार्गावर चालताना लोकांच्या टीकेची भीती न बाळगता भगवंताच्या प्रेमाला प्राधान्य देत निष्ठेने भक्ती करणे हे जीवनाचे सार आहे.

ज्या प्रमुख वारकऱ्यांचा उल्लेख नारद महर्षींनी केला आहे, त्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात आपण समजून घेऊ.

सनत्कुमार:

महाविष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टि रचनेचा संकल्प केल्यावर प्रथम सनक, सनंदन, सनातन, सनातकुमार हे चार कुमार प्रकट झाले. हे नारद मुनींचे सद्गुरू. भक्तिशास्त्राच्या आचार्यांचे वर्णन करण्याआधी नारद महाराज आपल्या सद्गुरुंचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करीत आहेत.

व्यास :

महर्षी नारद हे कीर्तन कलेचे उद्गाते आहेत, तसे वेदव्यास हे प्रवचन कलेचे उद्गाते मानले जातात. जिथे कीर्तन केले जाते त्याला नारदाची गादी म्हटले जाते तर जिथे प्रवचन केले जाते त्याला व्यासपीठ असे संबोधले जाते. व्यास हे एक महान ऋषी. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलेज संपादन केले. त्यांनी महाभारतादि अनेक ग्रंथ लिहिले. पण इतके सारे लिहून त्यांना समाधान लाभले नाही. मग सद्गुरू नारद मुनींनी महर्षी व्यासांना भगवंताचे गुणवर्णन करणारे भागवत त्यांना लिहायला सांगितले. भागवत लिहिल्यावर त्यांना मनःशांती लाभली असे वर्णन आहे.

शुक :

व्या‍सांचे पुत्र, ते जन्मतःच वैराग्य संपन्न होते. श्रीमद्भागवताचे ते आद्य वक्ते मानले जातात. त्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितले.

शाण्डिल्य :

शाण्डिल्य ऋषींची भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. नारद मुनींनी त्यांचा उल्लेख 18व्या सूत्रात केला आहे.

गर्ग :

कृष्णाचे नामकरण करणारे ऋषी. यांनी सुद्धा भक्ति सूत्रे लिहिली होती, पण काळाच्या पोटात ती गडप झाली असे म्हणावे लागते.

विष्णु :

हे एक महान ऋषी होऊन गेले. त्यांची अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.

कौण्डिन्य :

धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्याचे प्रमुख कौडिन्य ऋषी होते असा उल्लेख आढळतो.

शेष :

क्षीरसागरात महाविष्णू शेषावर शयन करतात. लक्ष्मणाला शेषाचा अवतार मानले जाते.

उद्धव :

यादव कुळातील हा कृष्णाचा परमभक्त. गोपींनी त्याला भक्ति शिकवली.

आरुणि :

छादोंग्य उपनिषदात यांचा उल्लेख आहे.

बलि :

भक्त श्रेष्ठ प्रल्हाद यांचा मुलगा विरोचन यांचा हा मुलगा. हा महान भक्त होता. वामन अवतारात त्याला पाताळाचे राज्य भगवंताने त्याला देऊ केले.

हनुमान :

एका शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ते असे करता येईल… रामदास (हनुमान).

बिभीषण : रावणाचा भाऊ. महान भक्त. रामभक्तीने चिरंजीव पद प्राप्त केले.

– – या सर्व महान भक्तांच्या चरित्राचे स्मरण करून प्रत्येकाने या पवित्र अशा भक्तिमार्गावर अनुसरण करायचा प्रयत्न करावा.

जय जय रघुवीर समर्थ

– – – – – 

भक्ति सूत्रे ८४ – – 

य इदं नारदप्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिति श्रद्धत्ते स प्रेष्ठं लभते स प्रेष्ठं लभत इति ॥ ८४॥”

अर्थ : जो मनुष्य नारदांनी सांगितलेली ही शिवमय, कल्याणकारक शिकवण (भक्तिमार्ग) श्रद्धेने व विश्वासाने स्वीकारतो, तो सर्वोत्तम असलेल्या भगवंताची प्राप्ती करतो.

विवेचन : भक्ति करणे जरी शास्त्र असले तरी भक्ति करायला सांगणे, सुचवणे हा उपदेश नव्हे.

भक्ति हे गुह्य ज्ञान आहे. ते सुलभ साध्य आहे, पण सहजसाध्य नाही. इथे वाचकांचा घोळ होऊ शकतो. निसर्गात हवा आहे आणि ती सर्वांना सुलभ आणि सहज साध्य आहे. पण भक्तीच्या बाबतीत थोडा वेगळा विषय आहे. भक्ति करण्यासाठी कोणतीही अट नाही, पण ती करावी लागते, त्यासाठी काही अथवा किमान नीतीनियम पाळावे लागतात. तसे हवेच्या बाबतीत म्हणता येत नाही. प्रयत्न केले, सांगितलेले नीती नियम पाळले तर भक्तीची प्राप्ती सुलभतेने होऊ शकेल.

“जितकी भक्ति तितकी प्राप्ति” हे सूत्र आपण पाहिले आहे. नारद महाराज स्वतः ठामपणे सांगतात की, जो भक्तीच्या या मार्गावर श्रद्धा ठेवतो, तो “प्रेष्ठं”( सर्वोत्तम गोष्ट) ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो.

या जगात आपण नव्हतो, तेव्हा भगवंत होता. आज आपण आहोत, भगवंत आहे. उद्या कदाचित आपण नसू, पण भगवंत नक्कीच असेल. कारण न बदलणारा एकमेव भगवंत आहे. तो आपल्याच नव्हे तर चराचर सृष्टीच्या अंतर्यांमी तो स्थित आहे. त्याला जाणून घेणं हे मनुष्य जन्माचे खरे उद्दिष्ट आहे. आपल्याला नरदेह लाभला आहे तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. अन्यथा, आपण जन्ममरणाच्या चक्रात फसलेले आहोत, यातून बाहेर पडण्यासाठी भक्तिमार्गासारखा सुलभ मार्ग नाही.

महर्षी नारद ऋषींनी सामान्य मनुष्याचे दुःख दूर होण्यासाठी, नव्हे तर प्रत्येक मनुष्याला शाश्वत सुखाचा मार्ग मिळावा म्हणून ही परमप्रेमा भक्ति सांगितली आहे.

माझ्या सारख्या अल्पमती मंदबुद्धि असलेल्या मनुष्याने नारद भक्ति सूत्र विवेचनाचे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस केले ते माझ्या सद्गुरूंच्या आधाराने. हे विवेचन करण्यात जी काही त्रुटी राहिली असेल ती माझी आहे आणि जे काही चांगले असेल तो मात्र माझ्या श्रीमहाराजांचा कृपाप्रसाद आहे अशी माझी श्रद्धा आहे. आपण हा कृपा प्रसाद गोड मानून घ्यावा आणि भक्तीमार्ग आचरावा.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– – क्रमशः भक्तीसूत्रे – ८२, ८३, ८४. (समाप्त)

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares