मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ममतेचा फास… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ममतेचा फास… ☆ प्रा. भरत खैरकर 

आनंदवारा शिडात भरुनी

नावा निघाल्या पैलतिरी

अस्तित्वाचा शोध घेण्या

हिंदोळे मन लाटांवरी!

*

काजळ गर्द तमी

दिसता दीप दुरात

आशेची पैंजणे बनुनी

नाचती उरात!

*

भिरभिरणारी नजर शोधे

मायाळू थारा

कधी काळच्या दबलेल्या सुरांना

छेडतसे वारा

*

अधांतरी भवितव्याला

आधार किनारी वेस

दिगंतरीच्या पाखराला

ममतेचा फास!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याच्या संध्याकाळी मुलं आणि आपण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आयुष्याच्या संध्याकाळी मुलं आणि आपण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आयुष्याच्या संध्याकाळी

आपली मुले जेव्हा आपली काळजी घेतात, तेव्हा

खूप छान वाटतंय..

 

बालपणी ज्यांना चिऊकाऊचे घास भरवले,

आज ते मला, “आई, खाऊन बघ छान आहे, ” म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतंय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतंय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नोलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरून रस्ता ओलांडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलांडतात.

हातांची अदलाबदल कधी झाली, कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

“चालताना उड्या मारु नकोस रे. पडशील, ” असं म्हणणारी मी..

आणि आज, “आई, हळू पुढे खड्डा आहे, ” म्हणणारे ते.

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

“प्रयत्न करून बघ. शिकवलंय ना मी तुला, ” असे म्हणणारी मी आणि आज… “सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, ” असं सांगणारे ते….

किती गंमत वाटते आहे..

 

ज्यांच्याबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते “आई, हे गाणं ऐकलंस का! बीट्स आवडतील बघ तुला, ” असं म्हणतात, तेव्हा काय सांगू काय वाटतं….?

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनिकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या.

किती मस्त वाटतंय…

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी,

आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे, हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, “हे काय, बाबा अजून आले नाहीत? ” म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच. भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

 

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

खूप धन्य वाटतंय…

 

काहींच्या बाबतीत हे आता फोनवर आणि व्हॉट्सपवर होतंय. पण तेही छान वाटतंय…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गुलदाउदीस प्राची… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गुलदाउदीस प्राची… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अक्षरगणवृत्त : आनंदकंद – लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा) 

आली पहाट वेळी उमलून ताटव्याने 

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||ध्रु ||

*

मेघास धुंद वेळी आली नशा निराळी

दव सांडल्या फुलांना प्रेमे पहा न्यहाळी

वारा खट्याळ जातो छेडून फूल पाने

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||१||

*

रंगात नाहलेली दिसते पहा दिवाणी

कुंदन म्हणू हिला की सोनार राज राणी 

वर्षा न् शरदमाला किती शोभली नव्याने

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||२||

*

गेला वसंत आता पावस ऋतू सुखावे

शेवंतिच्या सुखाने देवालये खुलावे

ती चंद्रमा ती तारा, कुंदन दिसे रुपाने 

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||३||

*

निलिमेस माळताना कुंतल पुन्हा हसावे 

अन् शब्द फूल माझे कवनातुनी दिसावे 

स्वरसाज मी दिल्यावर गाईन कौतुकाने

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||४||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पानगळ… – कवी : श्री राहुल लाळे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

? “पानगळ”कवी : श्री राहुल लाळे ? ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

पानगळ जरी झाली

तरीही झाड परत बहरते…

*

फुलंफळं लुटली जाऊनही

खोडाला पुन्हा पालवी फुटते…

*

आपणही का नाही मग झाड व्हावं?

*

आप्तजनांची पानं गळता

हुंदके गिळून नवा बहर ल्यावा…

*

आशेची पालवी नेसावी

आठवणीतून नवस्वप्ने पहावी

*

छायेत आपल्या इतरांनाही सावली द्यावी

सारी दुनिया खुलवून टाकावी…

कवी : श्री राहुल लाळे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०१ ☆ मी आणि माझं अंतर्मन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०१ ?

☆ मी आणि माझं अंतर्मन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आयुष्य असतं एक उपवन,

जेव्हा करतो आपण,

 स्वतःचं अवलोकन,

 तेव्हा जाणवतं ,

स्वतःमधलं कमीपण!!

 

करावा व्यक्त होण्यासाठी

कुणाला फोन  —

सारेच जण अनभिज्ञ,

तुमच्या सुख दुःखाशी,

 

कुणालाच नसतं  घ्यायचं ऐकून,

फक्त ऐकवायचंच असतं !

 

 खूप एकटं वाटतं आपल्याला,

पण नसतं कुठेच—

सहसंवेदन !!!

 

 मग वाटायला लागतं,

आपलंच अंतर्मन,

एक स्वच्छ, बिलोरी दर्पण!

याहून काय वेगळं असतं,

जगण्यातलं जीवंतपण

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भक्ती – शक्ती… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ भक्ती – शक्ती ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(शिवराय आणि रामदास गुरु शिष्य जोडीवर आधारित कविता)

भक्ती शक्तीचा इतिहास सांगतो,

 महाराष्ट्र माझा !

सह्यगिरीच्या खोऱ्यात गर्जतो,

छत्रपती राजा !

पावनभूमी महाराष्ट्राची,

संत महंतांची !

जिथे जन्मली ज्ञानेश्वरी,

अन् गाथा तुकयाची!

दासबोध निर्मिती झाली,

सह्य गिरी कंदरी !

ज्ञान न् बोधाची शिदोरी,

जनास मिळाली खरी !

शिवरायांनी शौर्याने त्या,

गडकिल्ले घेतले !

हिंदूंचा राजा बनुनी ,

छत्रपती  जाहले !

 *

राज्य घातले झोळीमध्ये,

राजा शिवरायांने ,

आशीर्वादे समर्थ हाते,

शिवबास दिले गुरुने !

 *

रामदास – शिवराय जोडीची,

अपूर्व गाठ पडली!

आनंदवनभुवनी गुरु शिष्य,

समर्थ जोडी गाजली!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समर्थ रामदास, दासबोध आणि प्रपंच… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

समर्थ रामदास, दासबोध आणि प्रपंच☆ सौ शालिनी जोशी

जगाच्या कल्याणाचा विचार करणारे समर्थ रामदास. बारा वर्षे बालपणीची गेल्यावर, ’ विश्वाचि चिंता वाहणारा’ हा मुलगा, नारायण सूर्याजीपंत ठोसर घर सोडून नाशिक जवळ टाकळीला आला. बारा वर्षे साधना व तपश्चर्या केली. विविध विषयांच्या ग्रंथांचा अभ्यास केल्यावर बारा वर्षे भारत भ्रमण केले. लाखो लोकांचे जीवन जवळून पाहिले. त्यावेळची लोकांची कर्तव्याविषयीची, धर्माविषयीची उदासीनता, परकीय राजांची स्विकारलेली लाचारी, स्त्रियांची होणारी विटंबना पाहून त्यांचे मन कळवळले. मृतप्राय झालेल्या समाजाला आपल्या वाणीने आणि लेखणीने जागृत करण्यात त्यानी आपले आयुष्य पणाला लावले. त्यासाठी विपुल ग्रंथरचना केली. त्यातील श्रेष्ठ ग्रंथ दासबोध.

वीस दशक २०० समास आणि ७७५१ ओव्या असा हा ग्रंथराज दासबोध. इ. स.

१६८१ (शके १६०३) मध्ये सिद्ध झाला. ही रचना समर्थांनी शिवथरघळीत सुंदर मठातील मुक्कामात केली. कल्याणस्वामीनी लिखाणाचे काम केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही ग्रंथावरील टीका नसून स्वतंत्र ग्रंथ आहे. समर्थांच्या दिव्य प्रज्ञा प्रतिभेतून हा ग्रंथ उदयाला आला. स्वानुभव हाच ग्रंथाचा गाभा आहे. मूर्खलक्षणापासून राष्ट्रकारणापर्यंत ग्रंथाची व्याप्ती आहे. मंदबुद्धीपासून धुर्तांपर्यंत सर्वांसाठी हा ग्रंथ असल्याचे समर्थ आत्मविश्वासाने सांगतात. पहिल्याशिवाय दोष देऊ नये, असेही टीकाकाराना सुनावतात. समर्थांचा परखडपणा आणि आत्मविश्वास या ग्रंथात दिसून येतो. तो समाजाविषयीच्या कळवळ्यातून आहे. त्यामुळे वाचत असताना समर्थ आपल्या बरोबर आहेत अशी अनुभूती येते.

परमार्थ मार्गावरील पुरुषांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे स्त्री व प्रपंच. असा बऱ्याच साधू, संतांचा अभिप्राय होता. त्यांच्या साहित्यात त्यानुसार स्त्रियांची अवहेलना पाहायला मिळते. पण समर्थानी प्रपंच व परमार्थ दोघांना समान पातळीवर आणलं. प्रपंचाला विरोध केला नाही, तर प्रपंच करून परमार्थाचा मार्ग दाखवला. प्रपंच सोडून परमार्थ केला तर केवळ आत्मोन्नती होते. पण प्रपंच करून परमार्थ केला तर राष्ट्रन्नती होते. म्हणून ते म्हणतात,

प्रपंची जो सावधान l तोचि परमार्थ करील जाण l

प्रपंची जो अप्रमाण l तो परमार्थी खोटा ll दा. १२/१/९

व्यक्तिहित व समाजहित यांची सांगड त्यांनी घातली. सद्गुणाच्या आधारे प्रपंच संपन्न केल्यावर, प्रापंचिकाने कुटुंबकेंद्रीत न राहता परोपकाराच्या माध्यमातून समाजाची नाते जोडावे. समाजाचा घटक म्हणून जगावे. यासाठीच ते म्हणतात,

आधीं प्रपंच करावा l नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका l

येथें आळस करूं नका l विवेकी हो ll दा. १२/१/१

एकसंध समाजातून एकसंध राष्ट्र निर्माण होत असते. हे वैचारिक क्रांतीचे काम त्यांनी आपल्या शिष्यामार्फत केले. त्यासाठी महंतांची फळी उभी केली. मठ, मंदिरे स्थापन केली. समाजाला बलवान करण्याचे प्रयत्न केले. प्रपंच सुखी करण्याचा विवेक सांगताना ते म्हणतात,

लेकुरें उदंड झाली l तो ते लक्ष्मी निघोन गेली l

बापडी भिकेस लागली l काही खाया मिळेना ll दा. ३/४/१

समर्थांचा ४०० वर्षांपूर्वीचा हा विचार कुटुंब नियोजनाचे द्रष्टेपण दाखवणारा आहे. समर्थ स्वतः परमार्थी असले तरी सामान्य लोकांना शक्य नाही ते तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले नाही.

प्रपंच सांडून परमार्थ केला l तरी अन्न मिळेना खायला l

मग त्या करंट्याला l परमार्थ कैचा ll दा. १२/१/३

भुकेल्याला परमार्थाचा विचार मानवणारा नाही. तर

प्रपंची पाहिजे सुवर्ण l परमार्थी पंचीकर्ण l

असे त्यांनी स्पष्ट सांगितले. समर्थानी प्रपंचाला हीन न लेखता त्याचे महत्त्व विशद केले.

नाना वेश नाना आश्रम l सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम l

जेथे पावती विश्राम l त्रैलोकेवासी ll

कारण देव, ऋषी, मुनी, योगी, तपस्वी सर्वांचा मूळ आधार गृहस्थाश्रमाचा आहे. स्वधर्माचरण आणि भूतदया यांनी युक्त गृहस्थाश्रम उत्तमच. धनसंपादन आणि त्याचा उपयोग याला भगवंताचे स्मरण आणि नीतीचे पालन यांची बैठक हवी. याला ते सुकृताचा योग म्हणतात. यामुळे माणूस समर्थ आणि भाग्यवान होतो. अशाप्रकारे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुवर्णमध्य साधणारा समाज समर्थांना अपेक्षित होता.

संसार त्याग न करिता l प्रपंच उपाधी न सांडिता l

जनामध्ये सार्थकता l विचारेचि होये ll दा. ६/९/२४

प्रपंच अथवा परमार्थ lजाणता तोचि समर्थ l

नेणता जाणिजे वेर्थ l नि: कारण ll दा. ९/४/१९

दासबोध हा व्यापक व शाश्वत समाजहिताचा विचार मराठी भाषेत सांगणारा अलौकिक ग्रंथ आहे. ऐहिक व पारलौकिक उद्धार हा उदार हेतू यामागे आहे. प्रापंचिकांना नेटका प्रपंच, भाविकांना देव प्राप्ती, ज्ञानियांना ज्ञानप्राप्ती आणि योग्याना वैराग्य देणारा हा ग्रंथराज. समर्थांच्या अंतर्यामीचे आर्त पानोपानी प्रगट आहे. प्रत्येक समास हा स्वतंत्र विषय असून सुबोधप्रद आहे. कोणतेही पान उघडावे आणि वाचावे समाधानी व्हावे असा हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे केवळ भारतात (प. बंगाल, चेन्नई, हैदराबाद, मैसूर, अर्नाकुलम, लखनौ) व बांगलादेशातच नव्हे तर आशिया, युरोप, रशिया खंडातील अनेक देशात स्थापित करण्यात आले आहेत. उदाहरणादाखल कांही नावे बघू.

  1. गॉर्डन स्क्वेअर, लंडन, यू के
  2. फ्रेंडशिप पार्क, मॉस्को, रशिया
  3. कॅथलिक युनिव्हर्सिटी, ल्युवेन, बेल्जियम
  4. बॅलटनफर्ड, हंगेरी
  5. लोझान युनिव्हर्सिटी, स्वित्झर्लंड
  6. भारतीय दूतावास, बीजिंग, चीन
  7. सोल, द. कोरिया
  8. बोरोबदूर, माजेलिंग, योग्यकार्टा, जावा, इंडोनेशिया
  9. तुर्कमेनिस्तान
  10. डब्लिन, आयर्लंड
  11. स्लिगो, आयर्लंड
  12. मक्वारी विद्यापीठ, सिडनी, ऑस्ट्रेलिया
  13. कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया

—– 

☆ गीत : २८ ☆

OBSTINATE are the trammels, but my heart aches when I try to break them.

Freedom is all I want, but to hope for it I feel ashamed. I am certain that priceless wealth is in thee, and that thou art my best friend, but I have not the heart to sweep away the tinsel that fills my room.

The shroud that covers me is a shroud of dust and death; I hate it, yet hug it in love. My debts are large, my failures great, my shame secret and heavy; yet when I come to ask for my good, I quake in fear lest my prayer be granted.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत २८ ☆

*

बंधनांस झुगारता

वेदनेचा दाह उरी

मुक्तता हवी जरी 

न दिसे ती दूरवरी॥

*
अमूल्य धनदौलत तू

तूच प्राणसखा हरी

सभोवती झगमगाट

त्यागण्या न धीर परी॥

*
लौकिका कवटाळून

बसलो जरी नावडे

अप्रिय जे तेच प्रिय 

कल्पना ही आवडे॥

*

अपयशी पदोपदी

ऋणाईत असे जरी

पापांचे मम ओझे

भासतसे जड भारी॥

*

या सर्वांतून सुटका हो

जरी तुझी कृपा मिळो

प्रार्थित मी, परी मनी

वांछित ती नच मिळो॥

*

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

——

☆ गीत २९ ☆

HE whom I enclose with my name is weeping in this dungeon. I am ever busy building this wall all around; and as this wall goes up into the sky day by day I lose sight of my true being in its dark shadow.

I take pride in this great wall, and I plaster it with dust and sand lest a least hole should 

be left in this name; and for all the care I take I lose sight of my true being.

—–

मराठी भावानुवाद : गीत २९

*

माझ्या नावात जो अध्याहृत आहे

तो या कैदखान्यात रडतो आहे

मी त्या भोवती उंच भिंती बांधतो आहे

जसजशा या भिंती आकाशात घुसत आहेत

तो माझ्या नजरेपासून हटत आहे

मला या भिंतींचा अभिमान आहे 

मी त्यांना काळजीपूर्वक गिलावा करतो आहे

जेणेकरून त्याची खूणही राहणार नाही

हुश्श, आता त्या भिंतीच्या आतला तो…

माझा सद्सद्विवेक, माझ्या दृष्टिपथातही नसेल!!

 

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ३० ☆

I CAME out alone on my way to my tryst. But who is this that follows me in the silent dark?

I move aside to avoid his presence but I escape him not.

He makes the dust rise from the earth with his swagger; he adds his loud voice to every word that I utter.

He is my own little self, my lord, he knows no shame; but I am ashamed to come to thy door in his company.

—-

☆ मराठी भावानुवाद : गीत ३० ☆

*

तव भेटीस्तव आतुर झालो

संकेत स्थळी जाऊ लागलो॥

*

एकटाच मी जातो पुढती

सखे सोयरे मागे पडती॥

*

सतत परंतु कुणी मागे येई

त्यातून सुटका माझी न होई॥

*

तोऱ्यातच तो धुरळा उडवी

माझ्या शब्दा तीव्र बनवी॥

*

कळले मजला हे प्रभुराया

क्षमा करी मज पडतो पाया॥

*

माझ्यामधला अहंहे घडवी

लाज शरम ना त्याला अडवी॥

*

त्याच्या सोबत तुझिया दारी

येऊ न शकतो तव दरबारी॥

*

येईन तेंव्हा, देईन सोडूनि

अहंकार मम जेंव्हा त्यागुनि॥

*

– क्रमशः भाग १०.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणिक व्यथा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ गणिक व्यथा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

युगा-युगाची रे मी गणिका

कधी होईन मी कान्होपात्रा

सांग युगाच्या रे पांडुरंगा

कधी संपेल ही भोगयात्रा.

*

का ही काया केवळ भवाची

तुझ्या दयेला अपात्र मित्रा

भक्ताचा तू सखा जीवलग

कधी बदलशी नारी चित्रा.

*

का मी लालसा दासी अभागी

मी न जानकी सावित्री गोत्रा

छळ देहाचा सुख क्षण नरा

साक्षात दर्शन दे या नेत्रा.

*

रे बा कृष्णा-विष्णू तू विठ्ठला

संहार कलि भार नक्षत्रा

युगा-युगाची रे मी गणिका

कधी होईन मी कान्होपात्रा

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लागे हुरहुर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? लागे हुरहुर… ? श्री आशिष  बिवलकर ☆

कामाचा माणूस | गेला दूर दूर |

लागे हुरहुर | महाराष्ट्रा ||१||

*

शेवट पर्यंत | सोबत फाईल |

मृत्यूला स्माईल | व्यस्तपणे ||२||

*
यमराज घाले | वाटेमध्ये रेडा |

नेला कामवेडा | मर्द ऐसा ||३||

*

दादा माणसाची | एक्सिट अकाली |

काळजा रुतली | खोलवर ||४||

*

काळाने पडदा | अवेळी ओढला |

सामान्य रडला | निरोपाला ||५||

*

मंत्रालय सुनं | सुन्न बारामती |

अवघड किती | पचवाया ||६||

*

अनंताचा पुत्र | गेला अनंतास |

न बसे विश्वास | आम्हां जना ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares