मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नाती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निलांबरातील मस्त चांदणे

गस्त घालते माझ्या भवती

साद घालती मिळून सारी

मनात रुजली सतेज नाती

 *

खुळ्या पावसा किती धावशी

भिरभिरणाऱ्या वा-यासंगे

स्वप्ना मधले स्पर्श सुखाचे

अजून सगळे आहेत जागे

 *

भल्या पहाटे निवांत वेळी

मंद झुळूक वाऱ्याची येते

आठवणींच्या कुरणा मधुनी

मला फिराया सोबत नेते

 *

प्रकाशदाता सूर्य उगवतो

अंधाराला विरळ कराया

किरण उबीचे झेलत जाता

पुलकित होते माझी काया

 *

चैतन्याचा साज लेवुनी

चराचराला हात जोडते

ध्यानमग्न मग होता होता

स्वर्ग सुखाला कवेत घेते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “आई…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “आई” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

ती होती तेव्हा नव्हता आठव रोजच किंवा कधीतरी

ती नाही आता म्हणूनही ना दु:ख रोज वा कधीतरी

*

मी नाही ऐकत शब्द कुठेही मनी दाटते श्रवण भावना

ती शब्दांच्या पलिकडून मजसी बोलत असते कधीतरी.

*

ती रुंजी घाले मनात अवचित व्यापुन टाकित भाव भावना

ती नाही याची जाणीव व्यापुन खिन्न होतसे कधीतरी

*

ती रागे भरते, चिडते, कुढते मज जाणिव देती सर्व भावना

मी देह हरवतो रडतो चिडतो भांडत बसतो कधीतरी

*

ती आहे ऐसे अजुन वाटण्याइतुकी मजला पुरे भावना

मी प्रेम जगावर करतो निर्जीवावरीही कधीतरी

*

दुःखीकष्टी त्रयस्थ कोणी त्याचेसाठी तीच तगमगे

मी आता गुंतुन बसतो त्या त्रयस्थांमधे कधीतरी

*

ती अशीच करतसे नेहमी नेहमी कुठेही गुंतुन बैसे

मी तिच्यात गुंतत असतो सावरतो मग मी कधीतरी.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बंधन ? की वरदान ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बंधन ? की वरदान ? ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

रोप फुलाचे 

जेंव्हा लावले

चालीरितीचे

बंधन आले !

*

फूल लागता

भ्रमर येतील

भिंतीचे बंधन

उभे राहीले !

*

बंधनात ते

वाढू लागता

कळ्था फुलांचे

घोस जन्मले !

*

त्याच क्षणाला

हिरव्या तरूला

तरूपणाचे 

वरदान लाभले !

*

तारुण्यसुलभ

भावनाच ती

ओलांडती मग

बंधन आपुले !

*

बंधन भिंतीवर

घोस फुलांचे

बंधनासही

सजवीत गेले !

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देऊन तर पहा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ देऊन तर पहा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

भविष्याचे चित्र रंगवा,

मात्र

वर्तमानात जगताना भूतकाळ विसरून जा,

आणि भविष्य उज्वल करण्याच्या नादात,

स्वतःला मात्र विसरून जाऊ नका.

कायम

मागत राहण्यापेक्षा कधीतरी

देऊन तर पहा…

 

मागण्याच्या लाचारी पेक्षा, दातृत्वाने मिळणारा आत्मानंद तर पहा…

 

जीवनातल्या आघाड्यावर हरल्यावर,

एकटं पश्चात्तापात जळण्यापेक्षा, मित्रांच्या खांद्यावर आपलं डोकं

ठेवून तर पहा…

 

मित्राच्या मायेच्या स्पर्शाने, मनातले वादळ कसे शांत होते ते तर पहा…

 

आपल्याला काय हवय?

पेक्षा कोणाला आपली गरज आहे का? हे तर पहा… विष्णूला तुळस प्रिय,

शिवाला बेलप्रिय आपल्याजवळ जे आहे ते देण्यापेक्षा त्याला काय हवे ते देण्यातच खरा आनंद आहे

देऊन तर पहा…

 

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८० – विदेशी मेवा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८० – विजय साहित्य ?

☆ विदेशी मेवा…!

आरोग्य दायी, फळ किवीचे

पहा खाऊनी, विदेशी मेवा

आंबट गोडी, स्वाद अनोखा

व्हिटॅमिनचा, पौष्टिक ठेवा..!

*

जाड सालीचे, तपकिरी‌ हे

पेशी पांढऱ्या, वाढविणारे

शक्ती वाढवी, पचन सुधारी

बद्ध कोष्ठता, घालवणारे…!

*

रक्त वाहिन्या, होती सक्षम

भिती घालवी, मधुमेहाची,

त्वचा निरोगी, किवी ठेवते

कमी कॅलरी, किवी फळाची..!

*

झोप चांगली, लागे सकला

फोड किवीची, पहा खाऊनी

हाडास देई, हे मजबूती

स्वाद किवीचा, पहा चाखूनी..!

*

चिनी देशाची, ही गूजबेरी

चिक्कू सारखे, जरी वाटले

काप करूनी, किंवा सोलून

फळ किवीचे, मनी दाटले…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आता असे वाटते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आता असे वाटते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

प्रेम केले की इबादत

विश्व सारे हरवून बसलो.

बरबाद झालो खेळात या

प्रलोभनाला पूर्ण फसलो.

शायरी केली बदनाम झालो

जिंदगी उद्वस्त झाली.

भान आले जाग आली

नशाच सारी उतरुन गेली.

आता असे वाटते तरीही

पुनःपुन्हा जन्मास यावे.

प्रमाद ते पुन्हा करावे

परतून गुन्हेगार व्हावे.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ६ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सगुण भक्ती

परमेश्वर चराचरात व्याप्त असून तो निर्गुण निराकार आहे असे म्हटले जाते, परंतु सर्वसामान्य माणसाला परमेश्वराच्या रूपात काहीतरी वस्तूची आवश्यकता असते. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे वेड लागलेला एक सर्वसामान्य प्रापंचिक माणूस. त्यामुळे त्यांची भक्ती सगुण भक्ती होती. त्यांचे परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणारे कितीतरी अभंग आपल्याला त्यांच्या गाथेत वाचावयास मिळतात.

सुंदरते ध्यान/ उभे विटेवरी/

 कर कटावरी/ ठेवोनिया//

 तुळशीहार गळा/ कासे पितांबर/

 आवडे निरंतर /हेचि ध्यान//

 मकर कुंडले /तळपती श्रवणी/

 कंठी कौस्तुभ मणी/ विराजित//

 तुका म्हणे माझे/ हेचि सर्व सुख/

 पाहिन श्रीमुख/आवडीने//

 या ओळी वाचल्या की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर विठोबाचे एक काल्पनिक रूप उभे राहते व आपोआपच हात जोडले जातात.

 सदा माझे डोळा/ जडो तुझी मूर्ती/

 रखुमाईच्या पती सोयरिया//

 गोड तुझे रूप/गोड तुझे नाम/

 देई मज प्रेम/ सर्वकाळ//

 विठू माऊलीये /हाचि वर देई/

 संचरोनी राही/ हृदयामाजि//

 तुका म्हणे काही/ न मागे आणिक/

 तुझे पायी सुख/सर्व आहे//

मनाची अशी अवस्था केवळ तुकारामांचीच नव्हे तर सर्व भक्तांची होते.

वेगवेगळ्या शब्दात महाराज विठ्ठलाचे वर्णन करतात.

 राजस सुकुमार /मदनाचा पुतळा/

 रवी शशीकळा/लोपलिया//

 कस्तुरी मळवट /चंदनाची उटी//

 रुळे माळकंठी/ वैजयंती/

 मुगुट कुंडले /श्रीमुख शोभले/

 सुखाचे ओतीले/ सकळही//

 कासे सोनसळा/ पांघरे पाटोळा/

 घननिळ सावळा/ बाईयानो//

 कर कटावरी / तुळशीच्या माळा/

 ऐसे रूप डोळा/ दावी हरी//

 *गरुड पारावरी/ उभा राहिलासी/७

 आठवी मानसी/ तेची रूप//

 झुरोनी पांझरा/ होऊ पाहे आता/

 येई पंढरीनाथा /भेटावया//

 तुका म्हणे माझी/ पुरवावी आस/

 विनंती उदास/ करू नये//

विठोबाची अशी मूर्ती तुकाराम महाराजांच्या कल्पनेत आहे आणि ते रूप पाहण्यासाठी ते अतिशय उतावीळ झाले आहेत. ते गोपींच्या भूमिकेतून आपल्याबरोबरच्या गोपींना (भक्तांना) श्रीकृष्णाच्या(विठ्ठलाच्या) रूपाचे वर्णन करतात. येथे मूळ गोपी म्हणजे त्यांचे मन

आणि सख्या म्हणजे इंद्रियांच्या प्रवृत्ती असे रूपक या वर्णनात आहे.

संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराचे कनवाळू रूप वर्णन केले आहे. जो खरा भक्त परमेश्वराची सेवा करतो, त्या भक्ताचा परमेश्वर कायम ऋणी असतो, भक्ताचे ऋण परमेश्वर सदा फेडतोच. कसे ते या खालील अभंगातून पहा.

भक्तऋणी देव/ बोलती पुराणे/

 निर्धार वचने/ साच करी//

 मागे काय जाणो/आईकिली वार्ता/

 कबीरासाते जाता/घड्या वाटी//

 माघारीया धन/ आणिले घरासी/

 मेघे केला त्यासी/ त्याग तेणे//

 नामदेवाचीया /घरासी आणिले/

 तेणे लुटीयेले/ द्विजा हाती//

 प्रत्यक्षासी काय /द्यावे हे प्रमाण/

 एकोबाचे ऋण /फेडियेले//

 बीज दळूनिया/ केली आराधना/

 लागे नारायणा/ परणे ते//

कबीराने जेव्हा ब्राह्मणाच्या रूपात वस्त्रासाठी भीक मागत असलेल्या माणसाला(देव) अर्धे वस्त्र दिले, तेव्हा देवाने कबीराच्या घरी जाऊन ऋण फेडले. नामदेवाने जेव्हा त्याच्या जवळची कापडे उघड्या दगडांवर पांघरली, तेव्हा त्याची किंमत देवाने त्याच्या घरी आणून दिली. एकनाथाचे कर्ज भगवंताने स्वतः फेडले.

या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वर निर्गुण, अव्यक्त असला तरी हातात चक्र, गदा घेऊन तो भक्तांना स्वतःच्या हृदयाशी ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करतो.

 अव्यक्त ते आकारले/ रूपा आले गुणवंत/

 तुका म्हणे पुरवी इच्छा/ जया तैसा विठ्ठल//

सगुणाची पूजा म्हणजे, सगुण रूप हे माध्यम आहे. त्या माध्यमाद्वारे भक्त परमेश्वराची पूजा, सेवा करू शकतो.

गाथेतील हा अभंग पहा.

 केला मातीचा पशुपती/

 परी मातीसी काय महती? //

 शिवपुजा सिवासी पावे/

 माती मातीमाजि सामावे//

 तैसे पूजिती आम्हासी संत/

 पूजा घेतो भगवंत//

 केला पाषाणाचा विष्णू/

 परि पाषाण नव्हे विष्णू//

 विष्णु पूजा विष्णूसी अर्पे/

 पाषाण राहे पाषाण रूपे//

 केली काशाची जगदंबा/

 परी कासे नवे अंबा//

 पूजा अंबेची अंबेला घेणे/

 कासे राहे कासेपणे//

तुकाराम संत आहेत. शास्त्र पंडित नव्हेत. म्हणून ते सगुण पूजा मानतात. ते प्रश्न विचारतात की जर अवघे विश्व ब्रह्मरूप आहे, मग प्रतिमेतही ब्रह्म असायलाच हवे. प्रतिमाही देवच आहे. ब्रह्मा वाचून रिक्त असे काहीच नाही, मग दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीत ब्रह्म कसे नसेल.

ते असेही म्हणतात की त्यांना परमेश्वराची खूप स्तुती करायची आहे, परंतु स्तुती करण्यास त्यांची वाणी कमी पडते. कारण परमेश्वराच्या स्वरूपाच्या एकेका केसावर  हजारो ब्रम्हांडाची घडामोड होत आहे.

 स्तुती करू तरी/ नवे ची या वेदा/

 तेथे माझा धंदा /कोणीकडे//

 परी हे वैखरी /गोडाली सुखे/

 रसना रसमुखे/ इच्छितसे//

परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणे अशक्यप्राय आहे. त्याची अनंत रुपे आहेत परंतु ज्याचा जसा भाव असेल तसे त्याच्या इच्छेनुरूप भगवंत सगुण रूप धारण करतो.

 तुज वर्णी ऐसा तुजविण नाही/

 दुजा कोणी तीही त्रिभुवनी//

 सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा/

 चिरल्या धडा जिंव्हा त्याच्या//

 अव्यक्ता अलक्षा अपारा आनंदा/

 निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा//

 रूप नाम घेसी आपल्या स्वइच्छा/*

 होसी भाव तैसा त्या कारणे//

 तुका म्हणे जरी दावीसी आपणा/

 तरीच नारायणा कळो येसी//

 तुकाराम महाराजांच्या परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीतून पांडुरंगाचे सगुण रूप त्यांच्यासमोर… साकार झाले आहे.

 क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४१ आणि ४२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४१ आणि ४२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ४१

तस्मिन्स्तज्जने भेदाभावात् ॥ ४१ ॥

अर्थ :भगवंत आणि त्याचे भक्त यामध्ये भेदाचा अभाव असतो. अर्थात भक्त आणि भगवंत वेगळे नसतात.

विवेचन:~ मागील सूत्रात महत्संग दुर्लभ अगम्य अमोघ आहे पण तो भगवत्कृपेने प्राप्त होतो असे सांगितले, तेव्हा भगवत्कृपा व महात्म्या पुरुषाच्या संगती प्राप्तीत कार्य-कारण भाव संबंध कसा अशी शंका कोणी घेईल, त्याचे उत्तर या सूत्रात दिले आहे. येथेही ‘तत्’ शब्दाचा प्रयोग केला आहे तो ‘भगवंत’ वाचक आहे. (म्हणून मागील सूत्रातील ‘तत्’ शब्दही भगवद्वाचकच घेणे योग्य आहे.) त्या भगवंताचा व तज्जन म्हणजे सर्वस्वी त्याचेच झालेले (असलेले) भक्तजन यांचा भेद नाही. शास्त्रामध्ये अन्योन्याभावास भेद म्हणतात. अन्योन्याभावास प्रतियोगि व अनुयोगी लागतात. म्हणजे ज्याचा अभाव तो प्रतियोगी व ज्याचे ठिकाणी अभाव तो अनुयोगी म्हटला जातो. उदाहरणार्थ घट हा पट नाही, या वाक्यात घट हा प्रतियोगी पट हा अनुयोगी आहे. म्हणजे घटाचा अभाव पटाचे ठिकाणी दाखविला जातो. जर पट हा घट नाही अशी वाक्ययोजना केली तर पट हा प्रतियोगी व घट हा अनुयोगी होईल.

दुधामध्ये लोणी असते, ताक घुसळले की त्यातून लोणी आपसूक वर येत असते. या सूत्रानुसार मनुष्याची अंतर्यामी भगवंत असतोच, मनाचा तळ आणि तळाशी असलेला मळ नष्ट झाला की मनांची शुद्धता होते. मग मनाच्या तळाशी असलेला भगवंत नकळत मनात प्रगट होत असतो.

इथे संत मुक्ताबाई यांचा एक अभंग आहे…..

ब्रह्मा दिसे उघडे जगामध्ये |

एकची तंतू नानापरी कपडे ||

धोतर आणि लुगडे || १ ||

*

एकची माती नानापरी भिंती

रांजण आणि सुगडे || २ ||

*

एकची सोने नानापरी दागिने|

लेणे बाळी आणि भूगडी || ३ ||

*

म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा

हरी आणि रोकडे || ४ ||

*

थोडक्यात वरील अभंगातून आपल्या लक्षात येईल की अनेक प्रकारे भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये असतोच असतो. तो योग्यवेळी प्रगट होतो. अर्थात भक्तांमध्ये भगवंत असतोच, योग्यवेळी तो प्रगट होऊ शकतो.

या सूत्रामध्ये भक्ताकरिता अथवा संत महात्म्याकरिता ‘तज्जन’ हा शब्द वापरला आहे. केवळ संत भक्त भाविक महात्मा या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. श्री नारदांनी अभिप्रेत अर्थ दाखविण्याकरिता ‘तज्जन’ शब्दाचा उपयोग केला असावा असे वाटते.

ही अवस्था प्राप्त होणे ही ‘तज्जन’ होणे आहे. अशा भक्ताचा व देवाचा भेद राहील कसा? उभयतांमध्ये असा तादात्म्य संबंध आहे म्हणूनच मागील सूत्रात सत्संग हा भगवत्कृपेने लाभतो असे नारद म्हणतात.

श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाहीत, तरीही त्याच्याकडे जावेसे वाटते. त्याच्याकडे जाऊन आंतरिक समाधान लाभते, त्याला संत म्हणता येईल. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,

“संत चरण रज लागता सहज, वासनेचे बिज जळूनी जाय । मग रामनाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढु लागे । कंठी प्रेम दाटे नयनी नीट लोटे । हृदयी प्रगटे रामनाम हृदयी प्रगटे रामनाम । तुका म्हणे साधन सुलभ गोगटे परी उपतिष्ठे रामनाम ॥”

जय जय रघुवीर समर्थ 

नारद भक्तिसूत्रे. ४२

तदेव साध्यताम् तदेव साध्याताम् ॥ ४२ ॥

अर्थ : तोच सत्संग साधावा. तोच सत्संग साधावा.

विवरण : मागील चौतिसाव्या सूत्रापासून भक्तिसाधनाचा विचार केला आहे. विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्‌गुणश्रवण, कीर्तन इ. साधने सांगितली. नंतर मुख्यत्वाने महत्कृपा हे साधन सांगितले व महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ आहे हेही स्पष्ट केले आणि भगवत्कृपेने सत्संग प्राप्त होतो, तत्त्वतः भगवान व संतमहात्मे यांच्यात भेद नाही. ज्याना भक्तीचा लाभ व्हावा असे वाटत असेल त्यानी महत्संगच साधावा असे आदराने द्विवार सांगितले आहे. याचे कारण मागे सांगितलेली विषयत्याग संगत्याग इ. साधने ही महत्संगाच्या द्वाराच सिद्ध होऊ शकतात. सत्संगच का साधावा? याची कारणे खाली दिली आहेत.

भक्ति सिद्ध होण्याकरिता आवश्यक असा विषयत्याग होण्याकरिता सत्संगतीच पाहिजे. साधकाला भगवंताचे दर्शन व्हावे असे वाटतं असते. त्यासाठी त्याच्या अंतरंगाची शुद्धता होणे अनिवार्य असते. त्यासाठी स्वतःचे दोष कळणे अत्यंत गरजेचे असते. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की गोंदवल्यात आला आहात, तर माझ्या रामाचे डोळे भरून दर्शन घ्या. त्याचे वैशिष्ट्य असे आहे की तो तुम्हाला तुमचे दोष सांगेल. आपले दोष आपल्याला कळणे ही परमार्थ मार्गातील महत्त्वाची पायरी. थोडक्यात सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की संत दर्शनाने आपले दोष आपल्याला कळून येतात. (दुसऱ्याने आपले दोष दाखविले तर मनुष्याला रुचत नाहीत…) श्री तुकाराम महाराज म्हणतात, “बैसता संताचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्त दृढ झाला ॥ १ ॥” 

संग म्हणजे आसक्ती. बाह्य विषयात दोषदर्शन होऊन कदाचित तात्कालिक त्याग झाला तरी अंतरातील विषयत्याग म्हणजे संग नष्ट होत नाही. ती आसक्ती नष्ट होण्याकरिताही सत्संगती उपयुक्त आहे.

तिसरे अव्यावृत भजन – जे भजन भोगासाठी होते ते अव्यावृत म्हणजे अखंड कधी होत नाही. अव्यावृत भजनाकरिता संतकृपेचीच आवश्यकता आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्मीकि याचे जे अखंड भजन होत होते भगवंतांच्या कृपेमुळेच. श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘कृपा केली संतजनी । माझी अलंकारिली वाणी । प्रीत हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥’ म्हणून जी साधने मागील सूत्रांतून सांगितली आहेत ती ती सर्व सत्संगतीने सिद्ध होतात. म्हणून ती सत्संगतीच साधण्याचा साधकाने प्रयत्न करावा. त्यायोगे वरील सर्व साधने व साध्य प्राप्तीही अनायासेच सिद्ध होईल.

इथे एकच सूत्र दोनदा सांगितले आहे. माउली आपल्या हरिपाठात सुद्धा हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा असे दोनदा सांगतात. इथे पहिले हरि हे साधन म्हणून आहे तर दुसरे हरि हे साध्य म्हणून आहे असे समजावे. साध्य व ती साधने महत्संगानेच सिद्ध होतात हे सिद्ध करण्याकरिता द्विरुक्ती असावी असे वाटते.

माऊली म्हणतात, तू सतत हरिचे नाम घे. त्याची गणना करू नकोस. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वसन करावे लागते. मग मनुष्य असे म्हणत नाही की आज मी फक्त पाचवेळाच श्वसन करेन, मला कंटाळा येतो, सारखे श्वसन करण्याचा. तद्वतच मनुष्याने सतत नामस्मरण करावे, हरिचे नाम घ्यावे असे माऊली आपल्याला सांगतात. नामयोगी असलेले माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात,

“नाम सदा बोलावे, गावे, भावे जनासी सांगावे”

मुखात नाम येणे किंवा नामस्मरण करावेसे वाटणे हेच मुळात मोठे पुण्य आहे. मानव देहधारी असलेला जीवच फक्त नाम घेऊ शकतो, बाकी इतर योनींतील जीवांना 

ही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे नाम घेण्यासाठीच जीवाला मनुष्य देह प्राप्त झाला आहेस असे सर्व संत सांगतात. मनुष्याने हे ध्यानात ठेवून अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करावा. हेच मोठे पुण्य.

नाम सतत घेतले पाहिजे. वेळ मिळाला की नाम घेतले पाहिजे. असे करता आले तर नामाशिवाय क्षण ही फुकट जाणार नाही. नामस्मरणाला वेळ मिळत नाही ही लंगडी सबब आहे. जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढ्या वेळात जरी रोज नामस्मरण केले तरी नामाच्या राशी पडतील. खरोखर आपण रोज किती वेळ फुकट घालवितो.

नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जड-जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो.

म्हणून मनुष्याने पापपुण्याच्या हिशेबात न गुंतता नाम घेणे जास्त हिताचे.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– – भक्ती सूत्र क्र. ४१ आणि ४२.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पारिजातक… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ पारिजातक सुश्री नीलांबरी शिर्के 

तुला भेटायला येताना वाटेत

प्राजक्ताच झाड भेटायच

आग्रहाने मला दोनचार फुल द्यायच

तीच फुले देऊन तुला

मी मुग्ध हसायची

प्राजक्ताची निर्मलता

तुझ्या वागण्या बोलण्यात असायची

फुल देणं नकळत घडत गेल

फुल घेता ,देता माझच

प्राजक्ताच झाड झाल

मिही लागले हळूहळू

पाना फुलांनी बहरायला

माझ्याला सुगंध लागला

वार्यावरती पसरायला

 

आता पारिजातक जातायेता

माझ्याकडे पहात मिस्किल हसतो

अभावितपणे माझ्याकडेच

दोन चार फुले मागत रहातो

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काटेकरांची मुलं…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “काटेकरांची मुलं…” ☆ सुश्री शीला पतकी 

बारा वाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव

घड्याळ त्याचे नाव//

 

काटेकरांचे वेडे तीन भाऊ होते गावभर फिरणारे

मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ

 

तोच मोठा होता चपळ पळ पळ सतत पळायचा

बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा

मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा

 

पण फिरून नाही हं दमायचे

रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा

बारा घरांचा त्यांना लागला होता लळा

 

यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ

आणि शिस्त म्हणजे शिस्त

पाळायलाच पाहिजे ना

साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त

 

सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा

रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा

आई-बाबांना यांचाच धाक

लोकलचतर चालते यांच्यावरच चाक

 

यांचा दर्जा कायम वरचा

भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही स्क्रीनवर

 

ग्रहावरही यांचीच हुकूमत

सूर्य ही उठतो वेळेवर

दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात

ग्रह तारे बिनदिक्कत

 

जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित

अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित

 

पण ठाऊक आहे का काय यांची गंमत

यांचे बाबा मागे बसूनपाहतअसतात जम्मत

बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा

 

धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप

तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप

 

मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं

एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं

 

आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप

काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares