☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
परमेश्वराशी संवाद
गाथेतील अभंगांचे वाचन करीत असताना पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज परमेश्वराशी अनेक वेळा अत्यंत जवळीकतेने आणि प्रेमादराने संवाद साधतात. आज आपण त्यांच्या अभंगांतून देवाशी घडलेला संवाद पाहूया.
अखंड नामस्मरण त्यांनी अंगीकारले आहेच. ते हरीला पुन्हा पुन्हा हेच सांगतात की
हरी तुझे नाम गाईन अखंड/
यावेळी पाखंड नेणे काही//
अंतरी विश्वास अखंड नामाचा/
काया मने वाचा हेची देही//
तुका म्हणे आता देई संत संग/
तुझे नामी रंग भरो मना//
हे देवा, माझ्या मुखात तुझेच नाव अखंड रहावे या व्यतिरिक्त मी दुसरी कोणतीच गोष्ट जाणत नाही. तुझ्या नामावरचा माझा विश्वास कायम रहावा, आणि काया, वाचा, मने करून माझ्या ओठी तुझ्या नावाशिवाय दुसरे काहीच नको. ईश्वरा जवळ ते संतांच्या संगतीची याचना करतात कारण संत हे ईश्वराचे रूप आहे.
प्रपंचात अडकलेल्या तुकाराम महाराजांची अवस्था दोलायमान झालेली आहे. ना धड प्रपंच ना परमार्थ अशा स्थितीत ते हरीलाच साद घालतात. त्याला सांगतात, हे मुरारी, माझे चित्त धनामध्ये गुंतले आहे, आणि ते मला दारोदार हिंडवीत आहे. हे मनाचे असे भरकटणे थांबतच नाही. पृथ्वीवर भटकू- नही समाधान काही मिळत नाही.
धना गुंतले चित्त माझे मुरारी/
मन घेऊन हिंडवी दारोदारी//
मन हिंडता न पुरे यासी काही/
७मही ठेंगणी परि ते तृप्त नाही//
पुढे ते देवाला सांगतात की त्यांची बुद्धी सुद्धा शांत दिसत नाही, कारण इंद्रिय विषयांच्या भोवऱ्यात ते सापडले आहेत. या अशा भरकटलेल्या चित्तामुळे माझ्या जिवाला शांती नाही. तेव्हा या दुष्ट आणि खोड्याळ मनापासून हे परमेश्वरा तू मला वेगळे कर.
पाहता न दिसे मज शुद्ध मती/
पुढे पडीलो इंद्रिया थोर घाती//
जीवा नास त्या संगती दंडबेडी/
हरी शीघ्र या दृष्ट संघाशी तोडी//
षड्रिपुंची तुकाराम महाराजांना फार भीती वाटते. ते देवाला विनवतात,
मोह पापिणी दुष्ट माया ममता/
काम क्रोध ही यातना थोर करी//
तुजवाचुनी सोडवी कोण हरी//
ही सर्व माया, ममता, मोह म्हणजे एखाद्या दुष्ट पापिणीसारखे आहेत. काम, क्रोध यामुळे मनाला फार यातना सहन कराव्या लागतात, त्यामुळे हे हरी तुझ्यापासून मी दूर जातो. ते पुढे देवाला सांगतात, निद्रा, दंभ, आळस, याची त्यांना भीती वाटते. म्हणून देवा या दुर्गुणांना माझ्या देहात थारा नसावा. मला फक्त तुझ्या एकट्याचीच हाव आहे.
निज देखता निज हे दुरी जाये/
निजा आळस दंभ या भीत आहे//
तया वस्ती नको देऊ देवा/
तुज वाचुनी नास्ती आणिक देवा//
करी घातपात भय लाज थोरी/
असे सत्य व्हाव बहु भक्ती दूरी//
नको मोकलू दीनबंधू अनाथा/
तुका विनवी ठेवूनी पायी माथा//
या ठिकाणी महाराजांनी देवाला दीनबंधू म्हणून संबोधले आहे. मोठ्या भावाप्रमाणे हा हरी दीनांचे, पीडितांचे रक्षण करतो. महाराजांच्या काळातही घातपात लबाडी होतीच. तर त्यापासून ते म्हणतात हे दीनबंधू तू मज अनाथाला वाचव. संशय, संकोची वृत्ती हे अवगुण फार घातक आहेत तेव्हा मला तू यापासून दूर ठेव. तुझ्या पायांवर माझी एवढी विनंती आहे.
प्रपंचातील तुकाराम महाराज स्वतःला अनाथ म्हणत आहेत, कारण एका परमेश्वराशिवाय त्यांना आजूबाजूला दुसरे कोणी दिसतच नाही.
पांडुरंगाच्या दर्शनाची उत्कट आस हा तर गाथेचा गाभा आहे. पांडुरंगाला ते माऊलीच म्हणतात. याही अभंगात त्यांची ही माऊलीच्या भेटीची उत्कटता दिसून येते. आईची आणि तिच्या अपत्याची काही कारणांमुळे ताटातूट झाली तर ते बालक सैरभैर होऊन मोठ्याने रडायला लागते, तशीच तुकाराम बुवांची अवस्था या त्यांच्या अभंगातून झालेली आपल्याला दिसते.
बोलोनिया दाऊ का तुम्ही नेणाजी देवा/
ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन//
पांगुळले मन काही नाठवे उपाय/
म्हणून पाय जीवी धरुनी राहिलो//
त्याग भोग दुःख काय सांगावे मांडावे/
ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशन का//
तुका म्हणे माता बाळ चुकलीया वनी/
न पवता जननी दुःख पावे विठ्ठले//
महाराज म्हणतात, ” हे देवा मला दर्शन द्या असे तुम्हाला वारंवार सांगण्याची आवश्यकता आहे का? तुम्हाला तर हे माहीतच आहे. तुम्ही मला जसे ठेवाल तसा मी राहीन. माझं मन अत्यंत दुर्बल झाल्यामुळे मी तुमच्या पायाशी आलो आहे, माझ्याकडे अन्य कोणताच उपाय नाही. मी कोणते भोग घ्यावे, कोणते दुःख सोसावे मला माहित नाही. रानामध्ये आई आणि मुलाची ताटातूट झाल्यासारखी माझी मनस्थिती झाली आहे.
विठ्ठलाच्या दारात जणू काही धरणे धरून बसल्यावर तुकाराम महाराजांना स्वतःतीलच दोष दिसतात आणि मग ते रागाने विठ्ठलाला म्हणतात,
जळो माझे कर्म वाया केली कटकट/
झाले तसे तंट नाही आले अनुभवा//
मी उगीचच तुमच्या दारात कटकट केली आग लागो माझ्या कर्माला. तुमची सत्कीर्ती मी जी ऐकली त्याचा मला अनुभव आला नाही.
आता पुढे धीर काय देऊ या मना/
ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे//
अहो नारायणा आता मी माझ्या मनाला कसा धीर देऊ ते तुम्हीच सांगा.
गुणवंत केलो दोष जाणयासाठी/
माझे माझे पोटी बळकट दूषण//
मला तुम्ही गुणवंत केलेत, पण मी परदोषच बघत बसलो. मी व माझे मानणे हा तर माझ्यातीलच दोष आहे.
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा/
बरवा हा लळा पाळीयेला शेवटी//
शेवटी महाराज म्हणतात, ” हे केशवा, दयाळा, तुम्ही माझे खूप लाड पुरवलेत, त्याची प्रचिती आली. माझे गुणदोष समजले, हे तुमचे माझ्यावर चांगले उपकार झाले. याचाच अर्थ जेव्हा महाराजांनी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिले तेव्हा त्यांना हे ज्ञान मिळाले.
असे देवाशी कधी भांडण, कधी रुसवा कधी गोडवा दर्शविणारे अनेक अभंग गाथेत सापडतात आणि त्यावरून तुकाराम आपल्याला समजतातच परंतु परमार्थाचीही. आपल्या सामान्यांना थोडी तरी ओळख होते.
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
भक्ति सूत्रे ६६ – –
“त्रिरूपभङ्गपूर्वमकम् नित्यदास्यनित्यकान्ताभजनात्मकं प्रेम कार्य प्रेमैव कार्यम् ||६६||”
अर्थ : त्रिपुटीचा भंग म्हणजे नाश अथवा लय करून सर्वकाळ भगवतांचा दास आहे अथवा त्याची कांता आहे असा भाव धारण करून त्याच्यावर प्रेम करावे, प्रेमच करावे.
विवेचन: साधन, साधक आणि साध्य अथवा भक्त, भक्ति आणि भगवंत अशी त्रिपुटी अथवा त्रिकुट मानले जातात. अध्यात्मात या तिन्हीची गरज असते. जेव्हा भगवतांची प्राप्ती होते तेव्हा ही त्रिपुटी संपुष्टात येत असते.
आपण नदीचे उदाहरण पाहू.
नदीचा उगम सागराला जाऊन मिळण्यासाठी होतो. यात नदी, नदीचे वाहणे आणि सागर मिळून त्रिकुट अथवा त्रिपुटी होते. यातील एक जरी नसेल तरी चालणार नाही. नदी सागराला जाऊन मिळाली की तिचे अस्तित्वच संपुष्टात येते, तिचे नदीपण शिल्कच उरत नाही…
भक्त भक्ति करतो, यथावकाश त्याला भगवंताची प्राप्ती होते, मग तो भक्त म्हणून सांगायला शिल्लकच उरत नाही. इथे आपल्याला प्रश्न पडेल की मग संत कसे काय आपल्याला उपदेश करतात. त्याला एकमेव उत्तर आहे. संत कमीपणा घेऊन आपल्यासाठी *”अवतरण”* करीत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याची अनुभूती आपण प्रत्येक संताच्या बाबतीत घेऊ शकतो.
हे सर्व लिहिणे सोपे आहे, प्रत्यक्षात आणणे महाकठीण.
त्यासाठी संपूर्ण शरणागत भाव अथवा हनुमंतासारखी दास्य भक्ति अंगिकारता आली पाहिजे.
साधकाने भगवंताला म्हटले पाहिजे की तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन… ! तुझे चरण मी काही झाले तरी सोडणार नाही. तुझ्या चरणावर डोके ठेवले आहे. आता तू तार अथवा मार. तू तारलेस किंवा मारलेस, तरी दोन्ही मध्ये माझेच कल्याण आहे. अशी दृढ श्रध्दा हवी. असे जमले की विषाचा प्याला पिताना भीती वाटतं नाही, छाटी उडाल्यावर मागचा पुढचा विचार न करता कल्याण गडाच्या तटावरून उडी मारू शकतो, कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले तरी भक्त प्रल्हादाला निश्चिंत रहात नाम घेता येते…
अशी अनेक उदा. आपल्याला सांगता येतील.
… बाळाची आई बाळावर अकारण प्रेम करते. ते बाळ दुध पिताना आईला लाथा मारते, तिच्या अंगावर शी करते, शू करते, रात्री अपरात्री जागरण करवते, तरी आई त्या बाळावर अपरंपार प्रेम करते…
… भक्त आपल्या भगवंतावर असाच प्रेम करतो, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होते.
संत तुकाराम महाराज या स्थितीचे खालील अभंगात वर्णन करतात.
“हाचि नेमआतां न फिरें माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥”
– – – – –
भक्ति सूत्रे ६७ – –
“भक्ता एकान्तिनो मुख्याः ||६७||”
अर्थ: भगवंतांची एकनिष्ठपणे भक्ति करणारे भक्त हे मुख्य भक्त होत.
विवेचन: प्रपंचात अनेक गोष्टी मनुष्याला सांभाळाव्या लागतात, याउलट परमार्थ मार्गात मात्र एका भगवंताला आपलेसे करून घ्यायचे असते. गणिती भाषेत बोलायचे झाल्यास अनेक गणिते सोडवण्यापेक्षा एक गणित सोडवणे त्यामानाने सोपे, नाही का?
अनेक वर्षे प्रपंच करून मनुष्याला किती समाधान मिळतं हा प्रश्नच सध्याच्या काळात गैरलागू झाल्यासारखा आहे, असे म्हटले तर नवल वाटू नये… !
समर्थ म्हणतात, ” प्रपंच अवघाचि नासका”
यासाठी प्रापंचिक मनुष्याने, साधकाने दिवसातील काही वेळ एकांतात व्यतित करायला हवा. अनेक लोकांना एकांतापेक्षा एकटेपणाची जास्त भीती वाटतं असते. एकांत म्हणजे एकाचाही अंत. अंतर्यांमी वसलेल्या आत्मारामामध्ये स्वतःचा अंत करणे म्हणजे एकांत सेवन करणे. दुसऱ्या बाजूने विचार करता, आपली आणि भगवंताची इच्छा एक करणे, अर्थात त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळणे. तो जसा ठेवील तसे आनंदाने राहणे म्हणजे एकांत म्हणता येईल.
ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जाते तसे साधकाने भक्तीत विरघळून जावे. एक अर्थात जो आपला अभिमान आहे, अहंकार आहे, मीपणा आहे तो सर्व त्याच्याचरणी वाहून टाकावा, संपूर्ण शरणागत होऊन भगवंताशी समरस होऊन जावे… ! सर्व संतांनी हे करून दाखवले आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
“लवण मेळविता जळे| काय उरले निराळे ||१|| समरस झालो `तूज माजी हरपलो ||२|| अग्निकर्पूराच्या मेळी| काय उरली काजळी ||३|| तुका म्हणे होती| तुझी माझी एक ज्योती||४||”
(संदर्भ : अभंग क्रमांक २३७९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
या गुणातीत भक्तीमध्ये व्यवहाराचा, स्वार्थाचा लवलेश नसतो. अशा भक्ताला फक्त भगवंताचे प्रेम हवे असते, आणि त्यासाठीच तो भगवंतावर जिवापाड प्रेम करीत असतो… ! मग, एखादी मीरा म्हणून जाते आणि ते अजरामर होते,
“मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा ना कोय||”
असा भक्त सर्वांना आवडतो, अर्थात देवालाही प्रिय होतो.
– – – –
भक्ति सूत्रे ६८, ६९ – – –
“कण्ठावरोधरोमञ्चाश्रुभिः परस्परं लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवीं च ||६८||”
अर्थ : प्रेमातिरेकामुळे कंठ दाटून येऊन शरीरावर रोमांच उभे राहिलेले असतांना आणि डोळ्यांतून अश्रू वहात असताना सिद्ध भक्त बाष्प गद्गद स्वरांनी एकमेकांशी संभाषण करताना उभय कुळे आणि पृथ्वी पावन करतात. इतकेच नव्हे तर असे भक्त (संत) तीर्थांना पावन करतात तसेच, ते जे बोलतात, त्याला वेदांत वाक्य म्हणून मान्यता मिळते.
विवेचन : भक्ति वाढत चालली की साधकाचे अष्ट सात्विक भाव जागृत होत असतात. आता अष्ट सात्विक भाव आपण पाहू.
अष्ट सात्विक भाव म्हणजे भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये स्वाभाविकपणे प्रकट होणारी आठ प्रकारची शरीरिक-मानसिक लक्षणं. हे भाव परम भक्तीच्या अवस्थेत देवाप्रती प्रेम व एकात्मतेमुळे आपोआप उमटतात. हे “सात्विक” (शुद्ध, निर्मळ) स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना सात्विक भाव असे म्हणतात.
अष्ट सात्विक भाव :
स्तंभ (स्तब्धता)
शरीर स्थिर होणे, न बोलणे, हालचाल थांबणे.
स्वेद (घाम येणे)
अनोख्या आनंदाने किंवा भावानं अंगाला घाम फुटणे.
रोमांच (रोमहर्ष)
अंगावर रोमांच उभे राहणे, थरथर सुटणे.
स्वरभंग (गेल्यावर आवाज अडखळणे)
बोलताना गहिवर येणे, आवाज तुटक होणे.
कंपन (थरथर)
शरीर थरथरणे, हातपाय हलणे.
वैवर्ण (रंग बदलणे)
चेहऱ्यावर लाली, पल्लव, पांडूपणा इ. रंग बदल.
अश्रू (डोळ्यांतून पाणी येणे)
आनंद, प्रेम, भक्तिभावाने डोळ्यांतून अश्रू येणे.
प्रलय (संमोहनासारखी अवस्था / शून्यभाव)
शरीर व मन पूर्णपणे विश्रांतीत जाणे, समाधिस्थ अवस्था.
साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर साधकाला या आठही भावांची अनुभूती येत असते. परंतु यामध्ये न गुंतता साधकाने आपली साधना, उपासना सुरू ठेवायला हवी.
जेव्हा अधिकार प्राप्त झालेले दोन भक्त भेटतात किंवा दोन संत भेटतात, तेव्हा त्यांच्यात एकतर मौनात चर्चा होते किंवा ते फक्त आपल्या गुरुबद्दल किंवा आपल्या भक्तीबद्दल चर्चा करीत असतात. तेव्हा त्यांचे अष्ट सात्विक भाव जागृत होऊ शकतात, किंवा काही वेळा झालेले अनेक साधकांनी पाहिले असेल. जिवंत साधकांच्या डोळ्यात पाणी आले यात नवल कदाचित नसेल, पण श्रीमहाराज (गोंदवलेकर महाराज) जेव्हा नैमिष्यरण्यात जायला निघाले तेव्हा थोरल्या रामाच्या डोळ्यांत पाणी आले. श्रीमहाराज त्याच्याजवळ गेले की त्याला विचारले की अरे, मी नैमिष्यरण्यात जातोय, ते तुला आवडले नाही का ? तसे असेल तर मी जाणार नाही… !
या सर्व गोष्टी परम प्रेमातूनच घडून येऊ शकतात. सर्व संतांनी भगवंतावर निरातिशय प्रेम करून त्याच्या सगुण विग्रहातून चैतन्य प्रकट करविले. चैतन्य सर्वत्र भरून राहिले असेल तर ते कोठूनही प्रगट होऊ शकते, फक्त ते प्रगट करण्याइतकी साधना, तप:श्चर्या आणि संपूर्ण शरणागती अत्यंत आवश्यक ठरते.
गंगेचे अवतरण झाले तेव्हा गंगा म्हणाली की पृथ्वीवर पापी लोकं राहतात, ते माझ्या पाण्यात स्नान करतील तेव्हा त्यांची पापे नष्ट होतील, यात बिल्कुल संदेह नाही, पण मी मैली होईन तेव्हा मला कोण शुद्ध करेल. तेव्हा भगवंताने तिला वचन दिले की संतमंडळी जेव्हा तुझ्या स्नान करतील तेव्हा त्याच्या अंतरंगी असलेल्या माझ्या अंशाने तू पुन्हा पुण्यसलीला होशील. आजपर्यंत हे वचन भगवंताने पाळले आहे.
अशा एकनिष्ठ भक्तांमुळे, संतांमुळे कुळ, मूळ आणि धरित्री पावन होत असते, नद्यांना तीर्थत्व प्राप्त होत असते… ! आणि संत जे बोलतात ते शास्त्र म्हणून मान्यता पावते. आदरणीय ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की मी पुस्तकातून जो वेदांत शिकलो तोच वेदांत श्रीमहाराज साध्या साध्या उदाहरणातून आणि स्व-आचरणातून जगाला सांगत आहेत. वेगळा वेदांत अभ्यासण्याची गरजच नाही. श्रींचे प्रत्येक वाक्य हे वेद वाक्य आहे, वेद वचन आहे.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
मागील भागात आपण मधुरा भक्ती विषयी थोडी माहिती घेतली. या भागात भक्तीच्या याच प्रकाराविषयी आणखी काही माहिती घेऊ.
स. रा. गाडगीळ यांच्या मते मानसशास्त्रीय पध्दतीने मधुरा भक्तीचा उलगडा करणे हे चुकीचे आहे. त्यांच्या मते तो पंथ जेथे उदयाला आला, तेथील विशिष्ट परिस्थितीत अगर परंपरेत त्याची मुळे पाहणे आवश्यक आहे. चैतन्यांनंतर बंगालमध्ये विकसित झालेला वैष्णव धर्म आणि वज्रयान बौध्द पंथातून विकसित झालेला सहजिया पंथ यांनी मधुरा भक्तीचा संप्रदाय विकसित केला, असे ते मानतात. स्त्री बनल्याशिवाय खरे प्रेमरहस्य आस्वादिता येणार नाही, अशी सहजिया पंथाची धारणा होती.
पुरूषभक्ताने स्त्रीवेष धारण करण्याच्या कृतीचे स्पष्टीकरण धर्मशास्त्राच्या इतिहासात शोधण्याचे प्रयत्नही झाले आहेत. प्रारंभी मातृप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच देवतांच्या पुजाऱ्याचे काम करीत असत. पुढे पुरूष पुजारी बनले परंतु पुजाऱ्याने स्त्री असले पाहिजे, या विचाराचा पगडा समाजमनावर असल्यामुळे पुरूष-पुजारी स्त्रीवेषातच वावरू लागले असावेत. आपल्याकडचे पोतराज वगैरे स्त्रीवेष धारण करतातच. अशा रीतीने पुरूषाने स्त्री बनण्याची कल्पना मातृप्रधान संस्कृतीमधून मधुरा भक्तीच्या संप्रदायात आली असावी, असे एक मत आहे.
जे. जी. फ्रेझर यांनी केलेल्या नोंदीनुसार पिलू बेटांमध्ये देवी आपला पुजारी म्हणून स्त्रीची निवड करण्याऐवजी पुरूषाची निवड करते. त्या पुजाऱ्याच्या अंगात येते आणि तो पुरूष मग स्त्रीसारखा वागू लागतो अशी समजूत आहे. अमेरिकेतील अनेक आदिम जमातींमध्ये असे पुजारी आढळतात. दृष्ट लागू नये म्हणून स्त्रीवेष धारण करण्याची पध्दतही काही ठिकाणी आढळते. याच हेतूने विवाहात वधूवरांनी एकमेकांचा वेष घालण्याची प्रथाही काही समाजांत आढळते.
चैतन्य महाप्रभू हे मधुरा भक्तीचे प्रमुख प्रवर्तक होते. त्यांच्यामुळेच बंगालमध्ये हा संप्रदाय रूढ झाला. आयुष्याच्या अखेरची अनेक वर्षे ते राधारूपातच वावरत होते.
रामकृष्ण परमहंसही काही काळ स्त्रीवेषात वावरले होते. वल्लभाचार्यांच्या पुष्टिमार्गानेही मधुरा भक्तीचा जोरदार पुरस्कार केला होता.
मधुरा भक्तीचा स्वीकार करणाऱ्या विविध भक्तांनी व सांप्रदायिकांनी ललित व ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. चैतन्य प्रभूंच्या रूपगोस्वामी, जीवगोस्वामी, सनातनगोस्वामी वगैरे शिष्यांनी मधुरा भक्तीचे एक तत्त्वज्ञान निर्माण केले. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य या भक्तीच्या पाच प्रकारांपैकी माधुर्यभक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी मानले. त्यांनी मधुर रसाचे एक साहित्यशास्त्रही मांडले. मधुररस हा तत्त्वत: भक्तीच्या स्वरूपाचा असला, तरी त्याच्यामधील प्रिया-प्रियकर नात्यामुळे त्याची वर्णने मात्र शृंगाररसा सारखी करण्यात आली आहेत.
गुलाबराव महाराजांचा (इ स १८८१-१९१५) अपवाद वगळता, मराठी भक्तीसंप्रदायात मधुरा भक्तीला फारसे स्थान मिळालेले नाही. गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेश्वरांची कन्या व कृष्णाची पत्नी मानत. तसेच स्त्रीवेष व मंगळसूत्रादि सौभाग्यचिन्हेही धारण करीत असत. अमरावती येथे त्यांच्या संप्रदायाचे ‘श्रीज्ञानेश्वर मधुरा द्वैत सांप्रदायिक मंडळ’ आहे.
भारतातील अन्य प्रांतांतूनही मधुरा भक्तीचा स्वीकार करणारे संत होऊन गेले आहेत. तमिळनाडूमधील नम्माळवार (६ वे शतक) हे त्यांपैकी एक होत. विदर्भातील देवनाथ हे कवी स्वत:ला प्रियकर व परमेश्वराला प्रेयसी मानत असत. भारतातील मूसाशाही सुहाग (१५ वे शतक) हे सूफी साधू परमेश्वराला पती मानत व स्वत: स्त्रीवेष धारण करीत असत. युरोपमधील ख्रिस्ती संतांनी परमेश्वराच्या मधुरा भक्तीचा अनुभव घेतल्याची वर्णने ही आढळतात. मुस्लिम स्त्री संत रबिया (इ स ७१७-८०१) ही परमेश्वराला पती मानून त्याची भक्ती करीत असे.
जन्मत: स्त्री असलेल्या भक्तांनी मधुरा भक्तीचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. संत मीराबाई या त्यापैकी प्रमुख होत. त्या स्वत:ला ललिता नावाच्या गोपीचा अवतार आणि कृष्णाला आपला पती मानत असत. आळवार संतांपैकी आंडाळ ही रंगनाथाला म्हणजेच कृष्णाला आपला पती मानत असे. तिने रंगनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेताच ती रंगनाथाशी एकरूप झाली, असे म्हणतात. दक्षिणेत अजूनही दरवर्षी तिचा व रंगनाथाचा विवाहदिन साजरा केला जातो.
याच प्रकारच्या भक्तिरसाचा अविष्कार आपल्याला ‘गीतांजली’ तील गीत क्र ५२, ५३, ५४, ५६, ५७, ५९, ७२, ७३, ७४, ८९, ९१, ९४, ९९, १०१, १०२ मध्ये कमी अधिक प्रमाणात पहायला मिळतो.
—–
☆ गीत : ५५ ☆
LANGUOR is upon your heart and the slumber is still on your eyes.
Has not the word come to you that the flower is reigning in splendour among thorns? Wake, oh awaken! Let not the time pass in vain!
At the end of the stony path, in the country of virgin solitude my friend is sitting all alone. Deceive him not. Wake, oh awaken!
What if the sky pants and trembles with the heat of the midday sun ⎯ what if the burning
sand spreads its mantle of thirst ⎯
Is there no joy in the deep of your heart? At every footfall of yours, will not the harp of
THUS it is that thy joy in me is so full. Thus it is that thou hast come down to me. O thou lord of all heavens, where would be thy love if I were not?
Thou hast taken me as thy partner of all this wealth. In my heart is the endless play of
thy delight. In my life thy will is ever taking shape.
And for this, thou who art the King of kings hast decked thyself in beauty to captivate my heart. And for this thy love loses itself in the love of thy lover, and there art thou seen in
LIGHT, my light, the world-filling light, the eye-kissing light, heart-sweetening light!
Ah, the light dances, my darling, at the centre of my life; the light strikes, my darling, the chords of my love; the sky opens, the wind runs wild, laughter passes over the earth.
The butterflies spread their sails on the sea of light. Lilies and jasmines surge up on the crest of the waves of light.
The light is shattered into gold on every cloud, my darling, and it scatters gems in
profusion.
Mirth spreads from leaf to leaf, my darling, and gladness without measure. The heaven’s river has drowned its banks and the flood of joy is abroad.