मराठी साहित्य – विविधा ☆ सामाजिक माध्यमं: साद- प्रतिसाद! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

सामाजिक माध्यमं: साद- प्रतिसाद! ☆ श्री नागेश शेवाळकर

सामाजिक माध्यमातील फेसबुक नंतर व्हाट्सअप समूह हा सर्वांचाच आवडता प्रकार आहे. व्हाट्सअपचा वापर करणारे, त्यावर व्यक्त होणारे लाखो रसिक असतील परंतु प्रकाशित होणाऱ्या पोस्टवर प्रतिसाद देणारे वाचक फार कमी आहेत.

व्हाट्सअप समूहाचे काही प्रकार अस्तित्वात आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे सर्व सदस्यांना स्वतःचे मत व्यक्त करता येणारा समूह. यात काही उपप्रकार आहेत. अनेक समूहावर सुप्रभात ते शुभरात्री असे अभिवादनाचे प्रकार, विशेष दिनी किंवा विशिष्ट कामगिरीसाठी अभिनंदन, शुभेच्छा तर दुःखदायक घटनांसाठी त्या प्रकारचे संदेश पाठविण्याची मोकळीक या समूहात असते. तसेच काही समूहांवर लेख, प्रतिसाद यांची मांदियाळी असते. काही समूहांमध्ये कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा, संवेदना यांना बंदी असते. अशा समूहांवर फक्त लेख, पुस्तक परिचय अशा गोष्टींना परवानगी असते परंतु अनेकदा नियमावलीत नसणाऱ्या गोष्टींचाही भडिमार होत असतो. समूह प्रमुखांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, प्रसंगी दिलेली ताकीद याकडे कानाडोळा करून समूहाच्या नियमावलीत नसणाऱ्या गोष्टी सररास पोस्ट केल्या जातात त्यामुळे समूह प्रमुख काही सदस्यांना समूहाच्या बाहेर करतात. शेवटचा उपाय म्हणून समूह ‘ओन्ली फॉर ॲडमीन’ केल्या जातो. त्यामुळे सर्व सदस्यांच्या साद-प्रतिसादाला वाव नसतो.

अनेक समूह यापेक्षा स्वतःचे वेगळेपण राखून असतात. अशा ठिकाणी कादंबरी, कथा, पुस्तक परिचय, कविता, चारोळ्या असे साहित्य पोस्ट केल्या जाते. काही समूहांवर केवळ पुस्तक परिचय करून देण्याची संधी असते. यामुळे नवीन, जुन्या पुस्तकांचा परिचय होतो. गाजलेल्या पुस्तकांची माहिती मिळते.

अशा विशिष्ट समूहांवर इतर गोष्टी कटाक्षाने टाळल्या जातात. विविध साहित्य प्रकाराचे लेखन वाचायला मिळते, त्या लेखनास प्रतिसाद देण्याची संधी असते. अनेक लेखक -वाचक प्रकाशित साहित्यावर साधकबाधक चर्चा करतात, त्या मंथनातून अक्षर-अमृताचे घट समोर येतात. ज्यातून उपयुक्त माहिती मिळते, ज्ञानात भर पडते. विविध समूहांवर सातत्याने लेखन करणारे अनेक लेखक आहेत. त्यांच्या लेखनावर मिळणारा प्रतिसाद कुठे नगण्य असतो तर कुठे भरभरून मिळतो. जे लेखक इतर लेखकांच्या पोस्टवर स्वतःचं मत, अभिप्राय देतात त्यांना त्यांच्या लेखनावर चांगला प्रतिसाद मिळतो. जे लेखक स्वतः भरपूर पोस्ट टाकतात परंतु इतरांच्या लेखनावर व्यक्त होत नाहीत त्यांना अल्प प्रतिसाद मिळतो. असा अल्प प्रतिसाद मिळणाऱ्या लेखकांचे असे मत होते की, त्यांच्या लेखनावर जाणूनबुजून अल्प प्रतिसाद मिळतो तर इतर लेखकांना त्यांच्या लेखनावर उदंड प्रतिसाद मिळतो. हा प्रकार म्हणजे ‘पेराल तसे उगवेल’ असा असतो. टाळी एका हाताने वाजत नाही किंवा ‘एक हात से दीजिए, दूसरे हाथ से लीजिए।’ असा प्रकार असतो. त्यामुळे मला भरभरून प्रतिसाद मिळावा असे वाटत असेल तर मीही इतरांना तसाच प्रतिसाद दिला पाहिजे. काही लेखक-वाचक यांना जो लेखन प्रकार आवडतो त्यावर ते निश्चितपणे व्यक्त होतात. जसे ज्यांना विनोद आवडतो, जे स्वतः विनोदी लेखन करतात ते विनोदी लेखनावर व्यक्त होतात. कुणाला कविता, कुणाला चारोळ्या आवडतात ते त्या प्रकारच्या साहित्यावर व्यक्त होतात.

व्यक्त होण्याचे प्रकार म्हणजे अंगठा दाखवणे, विविध प्रकारच्या इमोजी पाठवणे ह्या गोष्टी खूप जण वापरतात. आजकाल रेडिमेड संदेश टाकण्याचे छंदही वाढताहेत. परंतु स्वतःच्या शब्दांमध्ये दिलेल्या प्रतिसादामध्ये एकप्रकारची आपुलकी असते, जवळीक निर्माण होते. त्यामुळे शाब्दिक प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते. अनेक सदस्य असतात, जे स्वतः काही पोस्ट टाकत नाहीत इतरांच्या पोस्टवर कधीच व्यक्त होत नाहीत. काही सदस्य आले, वाचले, पुढे ढकलले अर्थात इतरांच्या पोस्ट फॉरवर्ड करण्याचे काम इमानेइतबारे करतात.

बहुतांश व्हाट्सअप समूहांवर साधकबाधक चर्चा होतात, विनोदाच्या फुलझडी उडतात, समोरासमोर कधीही न भेटता ही मैत्रीचे बंध निर्माण होतात, काही समूह दरवर्षी समूहातील लेखकांसाठी दिवाळी अंक, ‌ई दिवाळी अंक प्रकाशित करतात. काही समूह दरवर्षी गेट टुगेदरचे आयोजन करतात इत्यादी चांगल्या बाबीही व्हॉट्सअपच्या माध्यमातून होतात. ही बाब महत्वाची आहे…

‘लिहा, वाचा, भरभरून प्रतिसाद द्या. साधकबाधक चर्चा करा. ‘ हा मुख्य मंत्र असायला हवा.

 ००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”ते चुकीचे नाहीत.. ते वेगळे आहेत..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ते चुकीचे नाहीत.. ते वेगळे आहेत.. ☆ संध्या बेडेकर ☆

काल ताईकडे भिशी होती. मी ताईच्या मदतीला नेहमीप्रमाणेच होते. ताई माझ्यापेक्षा पाच वर्ष मोठी. म्हणजे पंचाहत्तरीची.

तस आजकाल एकंदरीत एक गोष्ट लक्षात येते की overall बायकांचे. राहणीमान सुधारले आहे. व्यवस्थित राहणे त्यांच्या सवयीत उतरले आहे. छान अगदी मॉडर्न dresses पण घालतात. आपल्या मुली, सुनांना बघून त्यांच ड्रेसिंग सेन्स बदलला आहे. आज पंचाहत्तरीत असलेली स्त्री सुद्धा स्वतःला जेष्ठ समजते. म्हातारपणाची झलक जरी दिसत असली तरी ती स्वतः तस डिक्लेअर करत नाही. ही चांगली गोष्ट आहे. भिशी, वाचक मंच, जेष्ठ नागरिक संघ यांचे कार्यक्रम अटेंड करणे, आपल्या आवडीनुसार विविध कार्यक्रमात भाग घेणे. नाटक, सिनेमा, ट्रीप ला बिनधास्त जाण जमतय तिला. स्वतः ला एक्टिव ठेवणे जमतय तिला.

स्वतःवर पैसे खर्च करणे म्हणजे गुन्हा नव्हे, हे समजलय तिला. मी आनंदी राहण्याची जबाबदारी माझीच आहे. हेही ती समजून आहे.

आयुष्याची second inning खेळायची ही चांगली पद्धत आहे.

बायका एकत्र येणे, बसणे म्हणजे अनंत गप्पा. Alphabets जरी A to Z असले तरी गप्पांची RANGE त्या पार सहज जाते. कुठून गप्पा कूठ पर्यंत पोचतील ? याचा अनुमान कोणीच लावू शकत नाही. खरतर गप्पा थांबवाव्या लागतात.

अग बाई!! अंधार झालाय.

अरे! घरी सूनबाई यायची वेळ झालीय. घराची किल्ली तर माझ्याकडे आहे …

अस म्हणून काही जणी आता निघावच लागेल, म्हणून निघायची तयारी करतात. काही बिनधास्त अजिबात घाई नसलेल्या मैत्रीणी पण असतातच की. त्यांचे गप्पा सेशन चालूच असत.

बरे असो… मी मात्र बोलायचे काम कमी, पण ऐकायचे काम जास्त करत होते.

गृपमध्ये लक्ष देऊन ऐकायचे काम केले तर बर्‍याच गोष्टी समजतात.

मी नंतर ताईला म्हंटल… अग ताई ! काय ग ! किती त्या गप्पा. एखादया विषयाचा किती कीस पाडता तुम्ही. म्हणजे अगदी expert असल्यासारखे comments देतात या सर्व. कोणी कोणाच पान खाली पडू देत नाही.

आजच्या मुली, सूना… त्यांचे ड्रेसेस, त्याच्या सवयी, boy friends / girl friends, हाॅटेलिंग, स्वीगी, झोमॅटो, तो अंधाधुंध खर्च…

हा विषय तर खूपच रंगला. तसा हा जेष्ठांचा आवडता विषय आहेच म्हणा.

अग पण ताई ! त्या मीनाताई किती वेगळच बोलत होत्या. अग ! त्यांना नवीन जनरेशन च काहीच पटत नाही का ? नवीन जनरेशनवर फारच नाराज दिसत होत्या त्या.

त्या मेधा ताई आणि कल्पना काकूंची वादावादी बघून मला वाटल आता या दोघी भांडतात की काय ?

त्या सुमेधा ताई बर्यापैकी शांत होत्या. खरय प्रत्येक चर्चेत आपल मत दिलच पाहिजे. असा नियमही कुठे लिहिलेला नाहिये. जे बोलत होत्या, ते मात्र छान, पॉझिटिव्ह, पटण्यासारख बोलत होत्या.

 खूपदा विचार न करता, भावनांच्या आहारी जाऊन आपल मत मांडण्याच्या घाईत, दुसर्याच्या मताचा अपमान होण्याची शक्यता असते. थोडा विचार करून, वेळ घेऊन आपले मत मांडल्यास, situation सहज हाताळता येते. आपल्या भावनांना आपल्या ताब्यात ठेवण गरजेच असत. शब्दांची निवड आणि शब्दांच्या मांडणीकडे पण लक्ष देण आवश्यक असत. नाहीतर सहज डिस्कस करता करता मारामारीवर ते डिस्कशन जायचे.

ताई म्हणाली… अग !खरय.

एकाच situation वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतातच. वेगवेगळ्या प्रतिक्रियेबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. त्यात त्यांचा स्वभाव, सवयी, परिस्थिती यांचा पण प्रभाव पडतोच. त्यांच्या दृष्टीने

त्यांची प्रतिक्रिया अगदी बरोबरच असते.

त्यामुळे चूक अस कोणीच नसत.

खरतर प्रत्येक वेळेस, प्रत्येक गोष्टीवर, आपण आपल मत द्यायची काही गरजही नसते. कधी कधी तर स्पष्ट आणि खर बोलण लोकांना आवडतही नाही. काळ वेळ जागा आणि खासकरून विषय परिस्थिती बघून प्रतिक्रिया देण्यातच शहाणपण असत. आजकाल तसही लोक प्रतिसाद कमी आणि प्रतिक्रिया जास्त देतात.

प्रतिक्रिया देताना माझच बरोबर… असा अट्टाहास ही नसावा.

खरतर शांतपणे सर्वांच बोलण ऐकल तर, एकाच गोष्टीकडे बघायचे. वेगवेगळे दृष्टीकोन लक्षात येतात.

आपल्याला आयुष्यात येणारे अनुभव, आपल्या घरातील मोठ्या माणसांनी प्रत्त्येक घटनेवर दिलेली प्रतिक्रिया बघून आपला स्वभाव तयार होत असतो.

आपली आवड निवड याचाही आपल्या मत व्यक्त करण्यात वाटा असतोच.

जनरेशन गॅपमुळे जेष्ठ नागरिकांना काही विषय तर अजिबात पटत नाही. सध्याची जनरेशन तर एवढी फास्ट धावतेय की दररोजच नवनवीन गोष्टी ऐकू येतात / दिसतात.

पण काय करणार ?…

जमाने के साथ तो चलना पडेगाही । 

थोड adjust, थोड दुर्लक्ष करायला शिकावच लागेल. तरच आपल अन् त्यांच आयुष्य सुखकर होईल.

चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली तर तो विषय स्पष्ट होतो. एकमेकाच्या मताचा आदर करता आला पाहिजे.

 मी बरोबर आणि तू चूक.

 अस कधी म्हणता येत नाही.

प्रत्येक जण, त्याचे मत मांडतो.

ते चूक नसत, वेगळ असतं.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हवा आहे सकारात्मकतेचा एक daily dose ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ हवा आहे सकारात्मकतेचा एक daily dose ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

आपल्या सर्वांनाच सकारात्मकतेची तीव्र गरज असते – सोमवारी सकाळी जरा जास्तच.

वर्तमानपत्रे असतात, असंख्य वृत्तवाहिन्या आहेत पण TRP व circulation वाढवण्यासाठी अथवा त्यांच्या मालकांच्या आदेशानुसार आपल्याला serve केल्या जातात त्या फक्त खून, बलात्कार, दरोडे यांच्या बातम्या.

या नकारात्मकतेचा कळत नकळत cumulative पध्दतीने sub conscious level ला खूप परिणाम होत जातो, मनातल्या Negative विचारांचे प्रत्यक्ष अनुभवात आणि अनुभूतीत रूपांतर होत जातं, आपल्या मनातले नकारात्मक भाव अधिक दृढ होत जातात आणि एक कधीही न संपणारे नष्टचर्य सुरू रहाते.

या सर्व चक्रात वारकऱ्यांच्या ठायी असलेली श्रद्धा गमावून बसलो आहोत. महिनाभर घरदार सोडून, खरेतर घरदार विसरून, हा अडाणी अशिक्षित वारकरी आपला सर्व भार त्या विठुरायावर टाकतो आणि सुखेनैव मार्गक्रमण करू लागतो. त्या विठूमाऊलीच्या दर्शनाइतकंच त्याच्यासाठी ही वारीच्या पायपीटीची प्रक्रियाही तेवढीच लोभस, आनंददायी आणि फलदायी असते. आणि त्या प्रवासाच्या अंती जेव्हा त्या विठोबाचे दर्शन घडते तेव्हा पूर्ण श्रद्धेने तो माऊलीच्या चरणी मस्तक ठेवता होतो. आपण प्रयत्न करीत रहायचे, पांडुरंग करेल ते योग्यच करेल हा विश्वास, ही खात्री त्याच्या सर्व अडचणी, चिंता दूर करते. प्रयत्न करण्याचा पण श्रेय स्वतःकडे न घेता पांडुरंगाला देण्याचा हा त्याचा निष्काम कर्मयोग आपल्याला साधता येईल का ?

TV वरील सासू सुना, विवाहबाह्य संबंध, कपटीपणा चघळणाऱ्या मालिका न बघता सृजनशीलतेला चालना देणारे, ज्ञानात भर टाकणारे, challenge देणारे काही कार्यक्रम बघता येतील का ? National Geographic आहे, वेगवेगळे sports channel आहेत, अगदी मास्टरशेफ; खानाखजाना; खवय्ये आहेत, tours and travel चे channel आहेत, खूप पर्याय उपलब्ध आहेत.

Internet वर तर अशा positive बातम्यांचे भंडार आहे. Good news network आणि chicken soup for soul आपल्याला आंजारतात, गोंजारतात, या जगात फक्त आपणच दु:खी कष्टी नाही; लोकांनी आपल्याहूनही भीषण परिस्थितीला तोंड देत तिच्यावर मात केली आहे याची आपल्याला जाण करून देतात.

You Tube वरील TED talks – Technology, Entertainment, Design आपल्याला माहितीची आणि प्रेरणेची अनेकानेक नवी दालने उघडून देतात.

नियमित व्यायाम, meditation, प्राणायाम शरीराबरोबरच मनही ताब्यात ठेवते व सुदृढ ठेवते.

जे काही होते ते चांगल्यासाठीच ही खात्री मनाशी बाळगली की प्रयत्न करायला हुरूप येतो. आपणच निर्माण केलेल्या ध्येयांच्या मागे धावताना आपण त्या प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला विसरून गेलो आहोत आणि ते ध्येय साध्य होईपर्यंत नवीन target उभं राहिलं असतं त्यामुळे पहिला ध्येयप्राप्तीचा आनंदही आपण घेत नाही.

यातून आपण बाहेर पडण्याची गरज आहे. वारकऱ्यांसारखं त्या प्रवासाचाही आनंद घ्यायचा आहे, संकल्पपूर्तीचाही आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींतून चांगले, positive, शिकण्यासारखे काय आहे ते आत्मसात करू या. सकारात्मक दृष्टीकोन स्वत: ठेवू या, इतरांनाही देऊ या.

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १६ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १६ ☆ प्रा.भारती जोगी ☆

ईव्हा ईव्हॉन ऊर्फ सावित्रीबाई विक्रम खानोलकर 

जिनेव्हाचा समुद्रकिनारा… छात्र सैनिकांच्या गटा बरोबर विक्रम खानोलकर सुट्टी घालवायला आलेले. नियतीने काहीतरी योजले असावे, म्हणूनच स्वित्झर्लंड निवासी ईव्हा ईव्हॉन ची आणि विक्रम जीं ची भेट होते.

भारताचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती याचं प्रचंड आकर्षण असलेली ईव्हा, पहिल्याच भेटीत आणि दोघांत झालेल्या संवादामुळे विक्रम जीं च्या प्रेमात पडते. जणू काही हा भविष्यात घडणाऱ्या एका ऐतिहासिक प्रक्रियेच्या रूजवातीचा संकेतच होता.

ईव्हाचे वडील, जे समाजशास्त्राचे प्राध्यापक होते… त्यांना हे प्रेम मान्य नव्हते. पण तरीही ईव्हाने त्यांच्या मनाविरुद्ध तिच्या पेक्षा ८ वर्षांनी मोठ्या असलेल्या विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर ईव्हाने हिंदू धर्म स्वीकारला. तिचं विक्रम इतकंच प्रेम भारतीय संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान, हिंदू धर्मग्रंथ यांच्यावरही होतं.

ईव्हाने लग्नानंतर स्वतः चे नाव बदलून सावित्रीबाई करून घेतले, आणि भारतीयत्व स्वीकारले. हे नाव जणू काही एक प्रतीकात्मक संकेत होता… एक आपलेपणाची घोषणा होती… भारतभूमी आणि आत्मा यां प्रती, भविष्यातील केल्या जाणाऱ्या समर्पणाचं वचन होतं.

भारतीय आत्मा असलेली युरोपीय… असंच म्हणावं लागेल त्यांच्या विषयी. कारण लग्नानंतर नावानेच नाही तर कामाने ही हळूहळू भारतीय संस्कृती शी समरस होत एकरूप झाल्या सावित्रीबाई! त्यांना आत्म्याने ही भारतीय व्हायचे होते, म्हणूनच पतीवरील प्रेम, निष्ठा आणि त्यागाचा आदर्श असलेले नाव त्यांनी निवडले.

सावित्रीबाई या नावाने हा फक्त ईव्हा चाच पुनर्जन्म नव्हता तर… त्यांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जन्माची सुरूवात होती ती!!

साधी सुती साडी, कपाळावर मोठे कुंकू, आणि पायात कोल्हापुरी चपला… असा अस्सल भारतीय पेहराव असलेल्या सावित्रीबाई खरंच बाहेरूनच नाही तर आतून ही… अंतर्बाह्य भारतीय रंगात रंगून गेल्या. भारतीय संस्कृती चा सखोल अभ्यास करून, नालंदा विद्यापीठातून पदवी मिळवली.

इतकंच नाही तर हिंदू परंपरा आणि आदर्श यांच्या प्रेमात आकंठ बुडून, अगदी दुधात साखर विरघळावी तशा विरघळून एकरूप झाल्या. अवघा रंग एक झाला!!! 

त्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा अवगत केल्या. इतकंच नाही तर… भारतीय संगीत, नृत्य, चित्रकलेचा ही अभ्यास केला. नृत्याचा अभ्यास पं उदयशंकर यांना गुरू मानून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केला. अनेक पौराणिक कथा आणि त्याचा इतिहास याचा ही सखोल अभ्यास केला. यावरून लक्षात येतं ते त्याचं भारतीय संस्कृती वरचं प्रचंड प्रेम, आस्था आणि आकर्षण! यासाठी भारतीय संस्कृती शी जुळलेल्या प्रत्येकच गोष्टीशी अद्वैत साधण्यासाठी ही समिधा आपल्या ज्ञान लालसेच्या तृप्ती साठी, आपल्या अथक, अविरत मेहनतीत… अगदी अभिराम रूपात चैतन्य मयी राहून, चेतलेली राहिली. महाराष्ट्रातील संत हे पुस्तक आणि संस्कृत भाषेतील नावांचा एक शब्दकोश ही तयार केला त्यांनी.

त्या म्हणत… ” माझा जन्म चुकून युरोपात झालेला आहे. “

अशा या बहुमुखी प्रतिभा असलेल्या, बहुपेडी व्यक्तीवर, पारखी नजर पडली ती… मेजर जनरल हिरालाल अटल यांची! त्यांच्या समोर इंग्लंड मधील… ‘ व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च शौर्य पुरस्काराच्या तोडीचा पुरस्कार बनविण्याचे आव्हान होते. सावित्रीबाईंचा वेदांचा अभ्यास बघून त्यांनी त्यांची मदत घेण्याचे ठरविले आणि भारतातील सर्वोच्च शौर्याचा सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या परमवीरचक्र च्या पदकाची निर्मिती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

आणि बघता-बघता स्विस वंशाच्या सावित्रीबाई भारतीय इतिहासातील एका अविस्मरणीय प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग बनल्या.

 सावित्रीबाईंनी हे पदक बनविण्यासाठी पुराण कथांचा आधार घेतला.

वाईटावर चांगुलपणाचा विजय…

दुष्टांवर सुष्टांचा विजय… हे दाखविणारं प्रतीक म्हणून त्यांनी, इंद्राचे शस्त्र असलेल्या वज्राची प्रेरणा घेतली. कास्य धातूचं एक गोलाकार पदक बनवलं… आणि त्यावर… ऋषी दधिचींच्या आत्मबलिदानाचं, त्यागाचं सर्वोच्च उदाहरण वज्र प्रतिकात्मक रूपात घेतल. या वज्राच्या ४ प्रतिकृती, चार ही बाजूंना घेतल्या. मध्यभागी अशोकस्तंभ! पदकावर शिवरायांची भवानी तलवार ही आहे.

आत्मबलिदानाचं प्रतीक असलेलं वज्र जणू त्या शौर्य पदकाचा, परमवीरचक्राचा आत्मा बनलं आणि दधिचींची कथा सुद्धा प्रेरणा स्थानचा आत्मा झाली. असं म्हंटलं जातं की,…

“सावित्रीबाईंनी फक्त प्रतीक नाही बनवलं तर… एक नैतिक आव्हान केलं ब्रह्मांडाला. जिथे साहस, बलिदान हे ब्रह्मांडीय कर्तव्य आहे. या पदकात आध्यात्मिक प्रतिध्वनी सुद्धा ध्वनीत होतोय.

यानंतर सावित्रीबाईंनी… अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र, शौर्य चक्र,… अशा अनेक प्रमुख शौर्य पदकांची रचना केली.

 “सावित्रीबाईंनी केवळ पदकाचीच रचना नाही केली तर… भारताच्या प्राचीन त्याग आणि पराक्रमाच्या परंपरेला आधुनिक सैनिकांच्या छातीवर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांचे हे पदकावरचे डिझाइन म्हणजे… राष्ट्रभक्ती आणि कलेचा सर्वोच्च संगम आहे. “

स्वित्झर्लंड ची ईव्हा जेव्हा भारताची सावित्री झाली, तेव्हा तिने देशाच्या वीर पुत्रांना त्यांच्या शौर्याचा सर्वात मोठा बहुमान मिळवून दिला.

लष्करी वर्तुळात आणि इतिहास लेखनात सावित्रीबाईंचा उल्लेख एक *मराठमोळी विदुषी* असा केला जातो. ही विदुषी परमवीर चक्राच्या रूपात अमर झाली.

सावित्रीबाईंनी पती निधनानंतर रामकृष्ण मठात आपलं उर्वरित आयुष्य घालवल. शहिदांच्या कुटुंबियांना, निर्वासित झालेल्या कुटुंबांना मदत करत राहिल्या. वाहून घेतलं त्यांनी समाजकार्यात स्वतःला!! लष्करी रूग्णालयात जाऊन जखमी सैनिकांची शुश्रूषा ही करत असत त्या फावल्या वेळात. शेवटी सतत कार्यमग्न राहणारी, कर्तव्य निष्ठ, भारतीय संस्कृतीत तद्रूप झालेली ही… तेजस्वी समिधा… ही ज्ञान तपस्विनी… ही… कर्मयोगिनी २६ नोव्हेंबर १९९० या दिवशी… हळुवार… जणू… कृतकृत्य झाल्यासारखी… विझली. निमाली.!!

– लेख क्र. १६ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मरण – स्मरण ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मरण – स्मरण ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपली प्रिय व्यक्ती मृत्यूशय्येवर असाहाय्यपणे पडून असलेली पहावे लागणे हा आपल्या नशिबातला फार मोठा भोग म्हणावा लागेल! त्यात त्या व्यक्तीला असह्य वेदना होत असतील तर जवळच्या व्यक्तींना होणा-या मानसिक वेदना कल्पनातीत असतात. त्या व्यक्तीची या जगण्यातून मरणाने सुटका करावी, अशीच मनोमन प्रार्थना केली जाते, हे वास्तव आहे! 

अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जीवनाचा मोह सुटत नाही, हे नैसर्गिक आणि स्वाभाविकच आहे. याला फार मोजके लोक अपवाद असतील! जगण्याची नसली तरी शरीर श्वास घेणं स्वत:हून थांबवत नाही.

असाध्य व्याधी असलेली व्यक्ती तिच्या शेवटच्या क्षणांत कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसते. अनेकवेळा व्यक्ती दीर्घ किंवा कायमच्या बेशुद्धावस्थेत असते. काहीवेळा कधीही बरे न होण्याची स्थिती समोर नजरेला दिसत असते. ज्यांना शक्य आहे असे लोक या व्यक्तीला आधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करतात. प्रचलित वैद्यकीय कायद्यांनुसार व्यक्तीची जीवन रक्षक प्रणाली काढून टाकता येत नाही. उपचार थांबवायचे झाल्यासही एक कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. यातून अनेक प्रकारची आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि विशेषत: नैतिक गुंतागुंत निर्माण होते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा स्थितीत खूप कठीण काळ समोर उभा थकतो.

व्यक्ती फार काळ तग धरू शकणार नाही, हे सर्वांना ठाऊक असते. पण प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताही मार्ग उरत नाही. जीवन रक्षक प्रणाली अजूनही खूप खर्चिक आहेत. विविध शस्त्रक्रिया केल्यानंतरही विविध गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात नातेवाईकांची मोठी आर्थिक हानी सुद्धा होत राहतेच. रुग्ण घरी आणणे आणि त्याची सुश्रुषा करणे विविध कारणांनी जिकीरीचे होऊन बसले आहे. मुळात उपचार थांबवणे, रुग्णाला दुस-या रुग्णालयात किंवा पर्यायी व्यवस्थेत हलवणे इत्यादी निर्णय कुणी घ्यायचे यावर एकमत होत नाही… आणि तोवर रुग्ण जन्मा-मरणाच्या उंबरठ्यावर निष्कारण ताटकळत राहतो. आणि रुग्णाची मन:स्थिती समजण्याची काहीही सोय नसते… केवळ अंदाज लावावा लागतो. रुग्णाच्या अत्यंत जवळच्या अर्थात पती, पत्नी, मुलगा या नातलगांवर या गोष्टीचा प्रचंड मोठा ताण येतो. त्यांची स्वत:ची मानसिक कुचंबणा तर होत असतेच, शिवाय अपराधीपणाची भावनाही मूळ धरू शकते! 

यावर उपाय शोधणे ही परिस्थितीची निकड बनलेली असताना भारतात यासंबंधी कोणताही स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही. परंतू २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यानुसार व्यक्तीला स्वत:ला स्वत:वर होणारे उपचार स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे. याला कायदेशीर भाषेत लिविंग विल अशी संज्ञा आहे.

अत्यवस्थ रुग्णावर Ventilator अर्थात कृत्रिम किंवा यंत्राच्या साहाय्याने श्वासोच्छवास देणे, CPR (Cardiopulmonary Resuscitation) अर्थात विशिष्ट वैद्यकीय कृती, उपकरणाच्या साहाय्याने हृद्य कार्यान्वित करणे, नळीवाटे, शीरेतून पोषण पुरवणे, Dialysis अर्थात यंत्राच्या साहाय्याने रक्त शुद्धीकरण करणे इत्यादी प्रकारांनी प्राणरक्षक उपचार केले जातात. जे खर्चिक आहेतच, शिवाय रुग्णाला वेदनादायक आहेत, असे दिसून येते. अर्थात इतक्या वेदना होत असतानाही रुग्णाला जगायचे आहे की नाही, हे समजणे शक्य नसते! अगदी मरावेसे वाटण्याची अत्याधिक इच्छा असली तरी अखेरीस तसं व्हावं, अशी रुग्णाची इच्छा असेलच असंही निश्चित म्हणता येत नाही!… मरणाचा अनुभव हा पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष असला पाहिजे, असे वाटते. असो. या विषयाला विविध बाजू आहेत.

आपल्या अंतकाळी आपल्या जवळच्या नातलगांना कोणताही निर्णय घेण्यात अडचण येऊ नये, अशी कायदासंमत व्यवस्था आता अस्तित्वात आलेली असून प्रक्रिया सोपी आहे. आपण मानसिकदृष्ट्या निर्णय घेण्यास सक्षम असतानाच आता लिविंग विल अर्थात आपल्यावर शेवटी कसे उपचार व्हावेत किंवा होऊ नयेत, हे आपण ठरवू शकतो. महाराष्ट्र राज्य या कायद्याची अंमलबजावणी करू पाहणारे पहिले राज्य ठरले आहे. इच्छामरण या पेक्षा हा कायदा वेगळा आहे, अये विधिज्ञ लोकांनी स्पष्ट केले आहे.

थोडक्यात आपण जर अत्यवस्थ अवस्थेत गेलो, तर आपल्यावर कोणते उपचार करावेत किंवा करू नयेत याबाबत आपण आधीच कायदेशीर सूचना देऊन ठेवायच्या. आपण अशा अवस्थेत पोहोचेपर्यतच्या कालापर्यंत आपण या सूचना रद्दही करू शकतो, ही यातील महत्त्वाची तरतूद आहे! 

मी वर जे काही लिहिलं आहे, ते माझ्या समजूतीनुसार लिहिले आहे, आणि हा लेख म्हणजे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हे! परंतू विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने, व अनेक लोकांना याबाबत कल्पना नसण्याची शक्यता असल्याने मी आपलं समोर मांडलं आहे. तज्ज्ञ, विचारवंत, वैद्यकीय व्यावसायिक, कायदेतज्ज्ञ याबाबत आणखी माहितीप्रद लेखन करतीलच, अशी आशा आहे.

वेळेपूर्वीच प्रत्येकाने याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असं वाटतं! 

संदर्भांसाठी आजच्या दैनिक सकाळ, पुणे मधील एका बातमीचे छायाचित्र सोबत जोडले आहे. सर्वांना शुभेच्छा. जीवेत शरद: शतम!

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गादी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “गादी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काल शेजारच्यांनी चांगल्या तीन चार नवीन गाद्या करून रिक्षेने आणल्या. या गाद्यांवर त्यांचा मुलगा आनंदाने एखाद्या राजासारखा राजेशाहीथाटात बसला होता. आणि…

गादी या शब्दावर मी भाळलो आणि लोळलो सुध्दा. कशाकशाच्या संदर्भात हा शब्द वापरतो हा विचार आला… राजेशाही, किंवा घराणेशाही. धार्मिक, आध्यात्मिक, किंवा संत परंपरेची. झोपायची, आणि अगदी जुन्या गोष्टीत असणारी पानाची गादी. पण तरीही गादी म्हंटलकी डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात त्या दोन गाद्या. एक राजघराण्यातली, आणि दुसरी अर्थातच आपली नेहमीची झोपायची. पानाची गादी हा शब्द बहुतेक जुने लेखक आणि सिनेमा यांच्या बरोबरच ईतिहास जमा झाला. वरच्या पैकी पानाची गादी सोडली तर सगळ्या प्रकारच्या गादींना ईतिहास आहे. पानाच्या गादीचाही ईतिहास असला तर तो इतरांबरोबर आपलाही असेल. राजघराण्यातला गादीला अर्थातच घराण्याचा, आणि आपल्या गादीला (कदाचित) घोरण्याचा.

राजघराण्यातल्या गादीवर आदराने बसवलं जात. डोक्यावर छत्र असत आणि शेजारी हातातल्या भल्या मोठ्या पंखाने वारा घालायला कोणीतरी. (म्हणजे असंच पाहिलं किंवा दाखवलं आहे.) आणि आपण मात्र अंगावर पांघरूण घेतलं असेल तर ते ओढून, आणि प्रसंगी ओरडून उठवतो. लगेेच उठला नाही तर… वर फिरणारा आणि वारा घालणारा पंखा कधीकधी मुद्दाम बंद केला जातो. आदर आणि बसवणं हे राजघराण्यातल्या गादीबद्दल असतं. तर कोणत्याही प्रकारचा आदर न ठेवता गादीवरुन उठवणं हे आपल्या गादीबद्दल. राजगादीवर बसल्यावर वारा घातला जातो, तर गादीवरुन उठवण्यासाठी वारा बंद केला जातो.

राज गादीवर बसल्यावर जयजयकार किंवा स्तुतीसुमनं ऐकायला मिळत असावीत. आम्हाला किंवा आम्ही गादीवरून उठवतांना आवाज सुरुवातीला कदाचित गोड निघाला नाही तरी काढण्याचा प्रयत्न असतो, पण ठराविक वेळेनंतर तो आवाज गोड वाटणरच नाही याचीच काळजी घेतो. स्तुती आणि सुमनं याचा संबंध नसतो. असतो तो सुस्ती घालवण्याचा खटाटोप.

राजगादीवर बसल्यावर अनेक बाबतीत बरेच चांगले सल्ले दिले जातात. आपल्या गादीच्या बाबतीत ऊठा आता हाच सल्ला असतो. हल्ली मुलांना झोपा आता असा सल्लाही द्यावा लागतो, पण ऊठा आता हाच जवळचा वाटतो.

राजघराण्यातल्या गादीवर व्यक्ती बसली कि तीला, व्यक्ती आणि गादी दोघांना वजन प्राप्त होतं. किंमत असते. आपली गादी किती किलोची आहे यावरुन गादीचच वजन व सोबत किंमत सांगितली जाते. आपल्याला आणि वजनालाही किंमत नसते. राजघराण्यातली गादी ही त्याच व्यक्तीची आणि गादीच असते. आपली मात्र सिंगल, डबल, नुसत्याच कापसाची, किंवा ब्रँडेड असते. तर राजघराण्याच्या गादीला त्यांचाच आणि आपलाच असा ब्रॅड असतो.

काय लागतं या गादीसाठी… म्हंटल तर बरंच काही… नाहीतर काहीही नाही. गादी कोणती, कधी, कशासाठी मिळणार यावर अवलंबून असतं.

राजघराण्याच्या गादीला त्या घराण्यात एकतर जन्म घ्यावा लागतो, किंवा दत्तक तरी जावं लागत. कर्तुत्व (असेल तर…) नंतरसुध्दा सिध्द करता येत. (अपवाद असु शकतात. काही घराणी आहेत. जे आजही कर्तृत्वाच्या शोधात आहेत. पण तरीही गादीवर आहेत असं वाटतं.)

धार्मिक, आध्यात्मिक, संत परंपरेच्या ठिकाणच्या गादीवर बसायला पावित्र्य, संस्कार, बौध्दिक व वैचारिक बैठक व पात्रता लागते. कर्तुत्वासोबत वक्तृत्व असाव लागतं. वाचन, मनन, चिंतन लागत. संस्कृती माहीत असावी लागते व तीचा अभिमान असावा लागतो. रितीरिवाजाची जाण असावी लागते. आणि अंगी नम्रता आणावी लागते. आणि हे सगळं आलं की बोलणं चांगलच वाटतं, कारण अहंकार नसतो.

राजघराण्यात कधीकधी गादीवरचा माणूसच बदलतो. यासाठी दगाफटका पण होतो. आपल्या बाबतीत मात्र तस नसतं. आमच्या गादीला या सगळ्यांची गरज असेलच असं नाही. फक्त ती व्यवस्थित राहण्यासाठी अधूनमधून तीला कडक ऊन मात्र दाखवावं लागतं. आणि याचवेळी आम्ही गादीवरच फटके मारतो. यात कोणताही दगा नसतो. काहीवेळा तर गादीच बदलतो.

राजघराण्यातल्या गादीवर बसल्यावर ती व्यक्ती बसल्या गादीवरुन आपलं राज्य विस्तारण्याचा प्रयत्न करते. आमचा संसार विस्तारला की आम्हाला नवीन गादीचाच विचार करावा लागतो. आणि देह विस्तारला तर असलेल्या गादीवरच तो पसरावा लागतो. म्हणजे राज्य पसरवणं, आणि आपण पसरणं यासाठी गादी लागते हे महत्वाच.

गादीवर बसवण्याचा समारंभ व सोहळा असतो. मुहूर्त पण असतो. यात मंत्रोच्चार असतात. गादीवरुन उठवण्याचा सोहळा रोजच असतो, आणि मंत्रोच्चार नसले तरी उच्चार मात्र वरच्या स्वरात असतात. आणि मुहूर्त पाहणार आहे का अशी विचारणा असते.

राजगादीवर आल्यावर कारभार पहावा लागतो. आणि सगळे कारभार आटोपले की आम्ही गादीवर येतो. अगोदर घरातल्या गाद्या सकाळी गुंडाळून ठेवल्या जात होत्या. आता सिंगल, डबल बेड आल्यामुळे त्या चोवीस तास पसरलेल्याच असतात. आणि आमच्या सोयीच्या वेळेने आम्ही त्यावर पसरतो.

वरच्या सगळ्या गाद्या या द्रृश्य स्वरुपात असतात. पण याशिवाय न दिसणारी एक गादी आहे जी आमच्या चांगल्या वाईट सवयींबद्दल असते. या गादीला फार जूनी किंवा फारतर मागच्या पिढीची परंपरा असते. आणि त्याचा ऊल्लेख गादी चालवतोय असाच होतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अंश… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ अंश… ☆ राधिका भांडारकर ☆

आपुली आपण करी जो स्तुती। तो एक पढत मूर्ख।। 

– – असे संत रामदासांनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे स्वतःबद्दल, स्वतःच्या प्रतिमेबद्दल नेमके काय बोलावे, बोलावे की न बोलावे, या संभ्रमात मी आहेच.

स्वतःबद्दल खरे सांगणारी एकच वस्तू आहे. आणि ती म्हणजे आरसा. आरसा खोटे बोलत नाही. पण आरशातली प्रतिमा ही सुद्धा बाह्यरंगी असते ना? आरसा फार तर सांगेल, “तू गोरी नाहीस, तुझे डोळे जरा जास्तच मोठे आहेत, केस आता पांढरे होत चाललेत, रागावलेली दिसतेस, खूश दिसतेस. वगैरे वगैरे. पण अंतरंगातली वादळं, तत्वं आरसा कशी टिपणार? फार फार तर तुम्ही जसे आतून असता, त्याचा तुमच्या चेहऱ्यावर परिणाम होतो आणि तो परिणाम, आरशातली प्रतिमा टिपू शकेल असे तूर्तास म्हणूया.

तर स्वप्रतिमा… मी कोण? कशी आहे मी? अगदी “कोsहम” सारखाच हा प्रश्न आहे नाही का? 

आपण आणि आपली समाजातील प्रतिमा ही तंतोतंत जुळणारी असते का? हाही एक प्रश्न आहे. माझ्याबद्दल माझ्या भवतालचे स्नेही म्हणतात, कशी हसतमुख, बिनधास्त आहे, रोखठोक आहे, आत एक बाहेर एक असे मुळीच नाही, वातावरणात एक सहज चैतन्य आणते, एकेका वाक्याला सगळ्यांना हसवते, या वयात ही किती उत्साही आहे वगैरे वगैरे. या सर्व स्तुतिसुमनांनी माझी छाती नक्कीच फुलते. अंगावर मुठभर मासही चढते (लाक्षणिक अर्थाने—नाहीतर त्याची गरज काय?) अगदी हळुवार मोरपीस फिरते. पण जेव्हां मी माझ्या अंतरंगात हळूच बुडी मारते तेव्हां जाणवते— हसतमुख, बिनधास्त, विनोदी ही विशेषणे माझ्यासाठी खरंच योग्य आहेत का?

मला प्रचंड राग येतो. खूप चिडचिड होते माझी. समोरच्या माणसाचे चांगलेच लोणचे घालावे असेही वाटते. बिनधास्त तर मुळीच नाही. जी व्यक्ती काटेकोरपणे वेळ पाळण्यासाठी धडपडत असते ती बिनधास्त कशी असेल? आणि कसली रोखठोक बोलते? ” जाऊदे! याला बोलून काय उपयोग आहे? उगीच तोंडाची वाफ दवडा” या विचाराने मी कितीतरी वेळा गप्पच बसते. माझं विनोदी बोलणं हे ही माझ्या विसंगत मानसिकतेतून आलेलं असतं.

मनात ज्वाळा पेटलेल्या असतात.

मला खूप वेळा जाणवतं, आपल्याला वाटत असतं की आपण असं असावं, असं बनावं, म्हणजे मितभाषी, शांत, सोशिक, शालीन, नम्र वगैरे वगैरे. पण अशा असणाऱ्या लोकांबद्दलही मला नेमकं काय वाटतं तेही मी सांगू शकणार नाही. कधी कधी हीच माणसं मला अगदी पचाक आणि बावळटही वाटतात. मग मी त्यांच्यासारखं का असावं? थोडक्यात एका खिशात तलवार आणि दुसऱ्या खिशात बासरी अशी काहीतरी संमिश्र प्रतिमा आहे माझी, माझ्या मनातली. मी चांगली, मी वाईट, मी अशीही, मी तशीही पण “अशी मी अशी” मी नक्कीच नाही.

माझ्या एका प्रोफेसर मैत्रिणीबरोबर मी एक दिवस गाडीवरची पाणीपुरी खात होते. छान अटोपशीर ड्रेसेस वगैरे आम्ही घातले होते. मस्त मजेत होतो.

“भैय्या थोडा तेज बनाओ, ज्यादा मीठा नही मंगता “वगैरे बिनधास्त हिंदी बडवत होतो. खाता खाता प्रोफेसर मैत्रीण म्हणाली, ” अग! माझ्या एखाद्या स्टुडंटने असे मला पाहिले तर त्याचे माझ्याविषयी काय मत होईल?”

म्हणजे ती माझी मैत्रीण आणि प्राध्यापक या दोन प्रतिमांमध्ये चक्क विभागलेली होती. त्यावेळीही माझ्या मनात आले मग “मी कोण?” मीही बँकेत उच्चपदस्थ होते मग माझ्या मनात असा विचार का नाही आला?

माझ्या आईचे एक म्हणणे असायचे, नाटकाला जाताना साडीच नेसायची.

.. खरोखरच आपल्या प्रतिमा अशा घटकांमध्ये दुभंगलेल्या असतात. या मुद्द्याचा विचार करताना मी जेव्हा माझ्या खऱ्या प्रतिमेंशी येऊन थांबते किंवा मी माझ्या प्रतिमेला शोधत बसते तेव्हा एकच जाणवते, मूळात मी तशी खडूस, स्वान्तप्रिय, स्वतःशीच संवाद साधणारी, अत्यंत अनसोशल, मात्र निसर्गप्रेमी, गंभीर प्रवृत्तीची एक अत्यंत कंटाळवाणी व्यक्ती असावी. कोण जाणे मीच मला अजूनही सापडलेली नाही. खट्टी की मिठी? “मी कोण?”चा शोध अजूनही चालूच आहे. आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहणार.

पण त्यादिवशी गॅलरीत झोपाळ्यावर निवांत बसले होते. संध्याकाळ होत होती. मावळत्या सूर्याने आकाशात सुरेख रांगोळी काढली होती. नजरेसमोर उंचउंच इमारतीच होत्या. त्यातून दिसणारे आकाशाचे हे रंगीन तुकडे मी न्याहळत होते. माणसे आणि वाहनांची गर्दी बघत होते. एका यांत्रिक विश्वाची चाललेली धावपळ, दमछाक निरखत होते आणि या संपूर्ण भौतिक पार्श्वभूमीवर मला एका काहीशा दूरच्या रिकाम्या रस्त्याच्या वळणावर मस्त नारिंगी फुले अंगावर पांघरून ऐटीत उभा असलेला सुंदर “गुलमोहर” दिसला. आणि माझ्या अंतरंगात एक हलकासा तरंग उमटला.

“कोण मी”?… खरं तर याच विश्वाचा फक्त एक अंश मी..

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८५ आणि ८६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८५ आणि ८६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८५ – – – 

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।

जपू नेमिला नेम गौरीहराचा ।

स्वये नीववी तापसी चंद्रमौळी । 

तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ।।८५।।

अर्थ : योगेश्वरांचे विश्रांतीस्थान असलेले रामनाम जपा. प्रत्यक्ष गौरीहर म्हणजे शंकर देखील नित्यनेमाने आपला ठरलेला रामनामाचा जप पूर्ण करतात. या नामजपाने भगवान शंकरांना देखील शांती मिळते. असा हा श्रीराम अंतकाळी आपली सुटका करील.

विवेचन : रामनामाचे महत्व सांगताना समर्थ म्हणतात की रामनाम हे योग्यांचा विश्राम म्हणजे विश्रांती आहे. इथे समर्थांनी त्यासाठी ‘ योगेश्वर ‘ शब्द वापरला आहे. या शब्दाचे तीन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ जो समर्थांना अपेक्षित आहे तो म्हणजे योगेश्वर भगवान शंकर. आपण श्रीकृष्णाला देखील योगेश्वर म्हणतो. पांडुरंगशास्त्री आठवले तर आपल्या स्वाध्यायात श्रीकृष्णाला ‘ योगेश्वर भगवानच ‘ म्हणतात. हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ म्हणजे जे योगी साधक आहेत, तप करणारे आहेत ते. तेव्हा यातील कोणत्याही अर्थाने योगेश्वर शब्द घेतला तरी सर्व श्रेष्ठ पुरुष शेवटी रामनामाचाच आश्रय घेतात. रामनाम हे त्यांचे विश्रांतीस्थान आहे हेच यातून स्पष्ट होते.

श्रीकृष्ण देखील रामनामाचा जप करत असत असा पुराणात उल्लेख आहे. कलियुगात रामनाम हेच तारक आहे असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले होते. श्रीकृष्ण आणि श्रीराम दोघेही विष्णूचेच अवतार. त्यांच्यामध्ये भेद नाही. पण कलियुगात भक्तीचा सोपा मार्ग म्हणून श्रीकृष्णांनी रामनाम घेण्याचा उपदेश केला आहे. राम, कृष्ण आणि शंकर यांच्यातही भेद नाही. जसे भगवान शंकर रामनामाचा जप करीत असतात तसेच श्रीराम देखील भगवान शंकराचे पूजन करीत असतात. शंकराचार्यांनी याच अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन केले होते. परमेश्वर एकच आहे. आपण त्याचे जे कोणते नाम घेऊ, त्यावर आपली दृढ श्रद्धा हवी.

भगवान शंकरांसारखा योगिराणा देखील नित्यनेमाने श्रीरामांचे नामस्मरण करतो. आपल्या नामस्मरणाचा जो नेम आहे, त्यात खंड पडू देत नाही. तपस्वी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांचा दाह रामनामानेच शांत झाला. रामनाम हेच त्यांचे विश्रांतीचे ठिकाण आहे. तिथेच ते रमतात. आपणही या रामनामाचे नित्यनेमाने स्मरण करावे. रामनामाची जीवाला सवय असली तरच अंतकाळी आपल्या मुखात रामनाम येईल. रामनामामुळे आपली ऊर्जा ऊर्ध्वगामी होते. विकारांमुळे आपली ऊर्जा अधोगामी होते. आयुष्यात जाणीवपूर्वक जर नियमितपणे रामनाम घेतले तर अंतकाळी देखील मुखातून तेच बाहेर पडेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” रामनाम ही अंतकाळी आपल्या मुखातून बाहेर पडणारी शेवटची गोष्ट असली पाहिजे. ” असे नाम आपल्या मुखात अंतकाळी आले तर श्रीराम आपली या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद :: 

१. ज्याप्रमाणे श्रेष्ठ योगेश्वरांचे ‘रामनाम’ हे विश्रांतीस्थान आहे, तसे माझे मन संसाराच्या धावपळीतून थकल्यावर रामनामात विसावा शोधते का? 

२. वेगवेगळ्या देवांमध्ये किंवा पंथांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझे चित्त कलुषित करतो आहे, की सर्वांभूति एकच तत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो? 

३. माझ्या दैनंदिन जीवनातील विकारांमुळे माझी ऊर्जा ‘अधोगामी’ (खाली) जात आहे की नामस्मरणामुळे ती ‘ऊर्ध्वगामी’ (सकारात्मकतेकडे) प्रवास करत आहे? 

४. गोंदवलेकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “रामनाम ही अंतकाळी मुखातून निघणारी शेवटची गोष्ट असावी” यासाठी मी आजपासूनच नामस्मरणाचा ‘नित्यनेम’ आणि त्याची गोडी मनाला लावली आहे का?

== == == == == == == 

श्लोक क्र. ८६ – – – 

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।

सदानंद आनंद सेऊनि राहे ।

तयावीण तो सीण संदेहकारी ।

निजधाम हे नाम शोकापहारी ।।८६।।

अर्थ : विश्राम म्हणजे विश्रांती कुठे आहे तर ज्याच्या मुखात रामनाम आहे तेथेच ! ज्याच्या मुखी रामनाम आहे असा मनुष्य अखंड आनंदाचे सेवन करीत असतो. रामनामाशिवाय अन्य काही करणे म्हणजे व्यर्थ शिणवणे आणि संदेह उत्पन्न करणारे आहे. नाम हेच निजधाम असून ते सर्व शोक हरण करणारे आहे.

(सदानंद – अखंडित आनंद, सीण – शीण/कष्ट/ताप, संदेहकारी – संशय निर्माण करणारा, शोकोपहारी – शोक/दुःख हरण करणारा)

विवेचन :  रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की ज्याच्या मुखी हे रामनाम आहे त्याला त्या ठिकाणी शांती, समाधान आणि आनंद या गोष्टी प्राप्त होतात. विश्राम म्हणजे विश्रांती. विश्राम शब्दातही ‘ राम ‘ आहे. आपण आनंद मिळावा म्हणून किंवा विश्रांती मिळावी म्हणून आयुष्यभर केवढी खटपट करत असतो ! घर, पत्नी, मुलेबाळे ही सर्व आनंदाची ठिकाणे आहेत असे आम्ही सांसारिक मानतो. तिथेच विश्रांती मिळते असे समजतो. विश्रांतीसाठी काही लोक निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहतात. व्यावहारिक दृष्ट्या हे सर्व बरोबरच आहे. परंतु ज्याला अध्यात्मसाधना करायची आहे, अशा व्यक्तीने अंतर्मुख होऊन या बाह्य गोष्टींकडे दुर्लक्षच करणे श्रेयस्कर.

कोणत्याही प्रापंचिक माणसाचा संसाराचा अनुभव संपूर्णपणे सुखद आहे असे होत नाही. तो तिथे सुख शोधू पाहतो पण क्षणिक सुखाचे काही क्षण सोडले तर त्याला दुःख आणि विषादाचीच प्राप्ती होते. मात्र ज्याच्या मुखात रामनाम आहे किंवा भगवंताचे नाम आहे असा माणूस कितीही विपरीत परिस्थिती असली तरी विचलित होत नाही. त्याचा आनंद सुखाने वाढत नाही किंवा दुःखाने कमी होत नाही. म्हणून तर भगवंताच्या नामात असलेले संत एका अनोख्या मस्तीत राहताना आपल्याला आढळतात. त्यांच्या मुखावर तेज असते, ते अंतर्यामी असणाऱ्या आनंदामुळे विलसत असते. हा आनंद अखंडित असतो. ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग ‘ अशी संतांची अवस्था असते ती याचमुळे.

प्रापंचिक माणूस कधी कधी केवळ नामाने मला भगवंताची प्राप्ती खरंच होईल का अशी शंका घेतो. हा संशय वाढत गेला की नामस्मरणावरील त्याचा विश्वास कमी होऊ लागतो. तो पुन्हा विषयविकारात अडकतो. तिथे आनंद शोधू लागतो. पण त्याची ही खटपट व्यर्थ शिणवणारी असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

” नामपरते तत्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशील झणी । 

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनि श्रीहरी जपे सदा ।।”

गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” नामातच भगवंताचा वास आहे. ” म्हणून नाम हेच निजधाम आहे. आपल्याला स्वस्वरूप जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी नाम हेच साधन आहे. परमेश्वर वेदांनाही अगम्य आहे म्हणजे वेदही त्याला पूर्णपणे जाणू शकत नाहीत. तो आपल्या कल्पनेपलिकडे आहे. पण नामात त्याचा वास आहे. म्हणून आपण नाम घ्यावे. वैखरी, मध्यमा, पश्यन्ती आणि परा या वाणीच्या चार अवस्था आहेत. अखंड नामस्मरण करीत राहिल्याने एक वेळ अशी येते की आपले नाम परा वाणीपर्यंत पोहोचते. नामस्मरण अखंड सुरु राहते. देहाला सुखदुःखे जाणवत नाहीत. माणूस त्याच्यापलीकडे जातो. तो अखंड आनंदाचे सेवन करतो.

स्वसंवाद :: 

१. मी ज्या घर, कुटुंब किंवा निसर्गरम्य ठिकाणी ‘विश्रांती’ शोधत आहे, ती मला कायमची शांतता देऊ शकते का ?

२. “केवळ नामाने भगवंत मिळेल का?” अशा ‘संदेहकारी’ (संशयी) विचारांमुळे मी माझे नामस्मरण अर्धवट सोडून पुन्हा संसाराच्या चक्रात तर अडकत नाहीये ना ? 

३. माउलींनी हरिपाठात म्हटल्याप्रमाणे, “वाया आणिक पंथा जाशील झणी” हे ठाऊक असूनही माझे मन इतर निरर्थक मार्गांवर का भटकत असते ? 

४. माझे नामस्मरण केवळ वरवरच्या ‘वैखरी’ वाणीत सुरू आहे, की ते माझ्या अंतर्मनाचा ठाव घेऊन ‘परा’ वाणीपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील आहे?

– क्रमशः श्लोक श्लोक ८५  आणि ८६ 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका कोंकणी ब्राह्मणाची कहाणी.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एका कोंकणी ब्राह्मणाची कहाणी.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

 दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन

पहिल्या महायुद्धात बर्लिन शहरावर बॉम्ब टाकणाऱ्या कोकणी ब्राह्मणाची कहाणी 

पहिला भारतीय वैमानिक म्हणजे दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन.. यांचा जन्म १० जुलै १८८३ रोजी रत्नागिरी येथे झाला. ‘दत्तू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दत्तात्रयांचे शिक्षण पाचवी इयत्तेपर्यंतच झाले. परंतु त्यांच्या खोडकर व हट्टी स्वभावामुळे त्यांचे वडील लखूतात्या यांनी त्यांना घराबाहेर काढले. *

दत्तूचे नामकरण

दत्तू चालत कोल्हापूरला गेले आणि तिथून विनातिकीट मुंबईला पोहोचले. तिथे त्यांनी ‘मस्जिद बंदर’ येथे सहा महिने रेल्वे हमाल म्हणून काम केले. त्यानंतर ते माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये ‘वायरमन’ म्हणून रुजू झाले आणि पुढे ‘इंजिन ड्रायव्हर’ बनले. नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी आपले आडनाव बदलून ‘अँग्लो-इंडियन’ पद्धतीचे केले – ‘डी. लॅकमन पॅट’ (D. Lacman Pat) असे नामकरण केले. एके दिवशी अचानक, मुंबई बंदरात उभ्या असलेल्या ‘स्ट्रान्स फेल्स’ (Strance Fells) या जर्मन जहाजावर ते चढले आणि तपासणीच्या वेळी कोळशाच्या गोणीत लपून बसले. जहाज समुद्रात दूर गेल्यावर, त्यांनी जर्मन कॅप्टन हेन्रिक ज्योडेल यांची मनधरणी केली आणि वायरमन व इंजिन-देखभाल (maintenance) करण्याचे काम मिळवले. हेन्रिक त्यांना पासपोर्टशिवाय जर्मनीला घेऊन गेले आणि हॅम्बर्ग येथे त्यांना ‘मरीन इंजिनिअरिंग’चे प्रशिक्षण दिले. त्यानंतर दत्तू स्कॉटलंडला गेले आणि ‘ओशन किंग’ (Ocean King) या जहाजावर मरीन इंजिनिअर म्हणून रुजू झाले. 

मरीन इंजिनिअर ते पायलट

*१९११ मध्ये हे जहाज लिव्हरपूल आणि न्यूयॉर्क दरम्यान अनेकदा ये-जा करत असे. त्यांच्या इंजिनिअरिंगच्या कामावर खूश होऊन, १९१२ मध्ये त्यांना ‘तुकाराम’ या जहाजावर इंजिन बसवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले. १९१४ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा दत्तू ब्रिटनच्या ‘वॉर ऑफिस’मध्ये (युद्ध कार्यालयात) गेले आणि त्यांनी ‘अँब्युलन्स कोअर’मध्ये (रुग्णवाहिका पथकात) काम मिळवले. त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना ‘ससेक्स’ ब्रिगेडमध्ये ‘सैनिक’ म्हणून बढती देण्यात आली. तिथे त्यांना अत्याधुनिक शस्त्रे, बंदुका आणि तोफा चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष रणांगणावर लढण्यासाठी फ्रान्सला पाठवण्यात आले. पुढे त्यांची ‘रॉयल एअर फोर्स’मध्ये (हवाई दलात) निवड झाली. तिथे त्यांनी मालवाहू (कार्गो) आणि बॉम्बर विमाने चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि ते एक कुशल वैमानिक बनले. दाट धुक्याचा फायदा घेत दत्तू यांनी थेट बर्लिनवर बॉम्बफेक केली. शत्रूच्या ‘अँटी-एअरक्राफ्ट’ (विमानविरोधी) तोफांचा मारा चुकवत त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली आणि थेट ‘कैझर पॅलेस’वर बॉम्ब टाकले. बर्लिनवर बॉम्बफेक करणारे जगातील पहिले ‘बॉम्बर पायलट’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. किंग जॉर्ज पाचवे यांनी स्वतः दत्तू यांच्या कोटावर लष्करी सन्मान आणि शौर्यपदक लावून त्यांचा गौरव केला. त्यांना ‘स्वर्ड ऑफ मिलिटरी ऑनर’ (लष्करी सन्मानाची तलवार) देऊन सन्मानित करण्यात आले. *

पायलट दत्तूच्याआयुष्यातील भाग्यवान क्षण

*या समारंभानंतर, दत्तू यांनी इंग्लंडच्या राजाला सांगितले की त्यांचे खरे नाव दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन आहे आणि ‘डी. लॅकमन पट’ (D. Lacman Pat) हे अँग्लो-इंडियन नाव धारण करूनच ते सैन्यात दाखल झाले होते. हे ऐकून राजाने अतिशय आनंदाने आणि कौतुकाने उद्गार काढले – “आमच्या हवाई दलात एक मर्द मराठा तरुण!” आणि त्यांनी दत्तू यांच्यावर चुकीचे नाव धारण केल्याबद्दल (impersonation) कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. ही घटना २४ एप्रिल १९१९ रोजी घडली. त्यांची ‘लेफ्टनंट’ या पदावर पदोन्नती झाली आणि त्यांना दरमहा बाराशे रुपये इतका भरघोस पगार मिळू लागला! दत्तू उत्स्फूर्तपणे उद्गारले – “हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान क्षण आहे!”* 

१९२१ मध्ये भारतात परत

*१९२१ मध्ये मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरनी दत्तू यांना ‘शाही पाहुणे’ (Royal Guest) म्हणून आमंत्रित केले. दत्तू रत्नागिरीला परतले आणि त्यांनी अमरावतीच्या चंद्रताई शेवडे यांच्याशी विवाह केला. १९३० मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्या साहसी कामगिरीची माहिती २५ मार्च १९१९ रोजी ‘लंडन गॅझेट’मध्ये प्रकाशित झाली. लंडनची वर्तमानपत्रे आणि ‘ग्राफिक’ (Graphic) या नियतकालिकाने १३ मे १९१९ रोजी त्यांचे सविस्तर चरित्र प्रसिद्ध केले. प्रसिद्ध मराठी दैनिक ‘केसरी’नेही १३ मे १९१९ रोजी दत्तू यांच्या पराक्रमाचा सविस्तर वृत्तांत दिला. रत्नाकर शिवराम वाशीकर आणि अनंत लक्ष्मण मराठे यांनी लिहिलेले ‘इंडियाज फर्स्ट पायलट’ (India’s First Pilot) हे पुस्तक १८ ऑक्टोबर २००३ रोजी प्रकाशित झाले. दुसरे महायुद्ध (१९३९) – १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि लंडनहून आलेल्या आदेशानुसार, दत्तू यांच्यावर दिल्ली येथे ‘ऑल इंडिया मिलिटरी, नेव्हल अँड एअर फोर्स अकादमी’ (सर्व-भारतीय लष्करी, नौदल आणि हवाई दल अकादमी) स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दत्तू यांनी या अकादमीमध्ये अनेक भारतीयांना प्रशिक्षण दिले. *

कर्करोगामुळे निधन

*१८ ऑक्टोबर १९४३ रोजी कर्करोगामुळे दत्तू यांचे निधन झाले. त्यांची पत्नी आणि मुलगा नागपूर येथे स्थायिक झाले. त्यांचे नातू – प्रभाकर पटवर्धन हे मुंबईतील कांदिवली येथे आपला स्वतःचा अभियांत्रिकी व्यवसाय चालवत आहेत. जे. आर. डी. टाटा यांचा उल्लेख नेहमीच ‘भारताचे पहिले वैमानिक’ असा केला जातो. त्यांनी १९२७ मध्ये विमान चालवले होते; परंतु त्याआधीच, १९१४ मध्ये दत्तात्रय पटवर्धन यांनी ‘बॉम्बर पायलट’ (बॉम्बफेकी विमानाचे वैमानिक) म्हणून इतिहास घडवला होता. त्यामुळे, त्यांनाच ‘भारताचे पहिले वैमानिक’ म्हणून सन्मानित केले जाणे आवश्यक आहे. * 

समस्त मराठी जनांना ही अभिमानास्पद गोष्ट आहे. 

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कसे घडले हे ?…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “कसे घडले हे ?…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

भारताच्या संयुक्त कुटुंब प्रणालीला तोडण्याची कटकारस्थानं:

“कुटुंबं तुटली, की बाजार फुलतो” — हा केवळ एक विचार नाही, तर एक संपूर्ण नीती आहे.

आधुनिकतेकडे वाटचाल की लपवलेली गुलामी?

भारताची खरी ताकद काय होती?

मुघल आले, ब्रिटिश आले, अनेक परकीय आक्रमणकर्ते आले — पण एक गोष्ट अखंड राहिली — आपली संयुक्त कुटुंब प्रणाली.

हीच होती आपली खरी “Social Security”

ना पेन्शनची गरज, ना एकटेपणा, ना मानसिक आजारांचा कहर.

मग पाश्चिमात्य जगाला ही व्यवस्था का नकोशी वाटू लागली?

पश्चिमी देश म्हणजे वसाहतवादी — त्यांचा सर्वात मोठा धर्म म्हणजे बाजार.

पण भारतासारख्या देशात, जिथे लोक सुख-दुःख सामायिक करतात, कमी खर्च करतात, आणि सामूहिक विचार करतात— इथे त्यांचे उत्पादने विकली जाऊ शकत नव्हती.

मग एक हुशार योजना आखली गेली:

“कुटुंबं फोडा, माणसं एकटी करा, आणि प्रत्येकजण ग्राहक होईल. “

हा हल्ला कसा झाला?

माध्यमांनी संयुक्त कुटुंबांना दाखवलं:

* “भांडखोर”,

* “ओझं”,

* “प्रगतीला अडथळा”,

तर लहान कुटुंबं (nuclear families) दाखवली:

* “स्वातंत्र्य”,

* “आधुनिकता”,

* “स्वबळावर उभं राहिलेली”.

लक्षात ठेवा:किती TV मालिकांमध्ये सासू-सुनांच्या भांडणांचा शेवट “वेगळं होणं” हाच उपाय म्हणून दाखवला जातो?

 ग्राहकवाद (Consumerism): 

जेव्हा प्रत्येक जोडपं वेगळं राहायला लागलं:

* 1 कुटुंब = 4 घरे

* 1 TV = 4 TV

* 1 स्वयंपाकघर = 4 स्वयंपाकघरे

* 1 कार = 4 स्कूटर + 2 कार

बाजार तेजीत आला, पण समाज ढासळला.

या “सांघिक हल्ल्याचे” भारतात परिणाम काय झाले?

सामाजिक अधोगती:

* ज्येष्ठ मंडळी आता “ओझं”

* मुले एकटी (आणि स्क्रीनमध्ये हरवलेली)

* नातेवाईक “उपलब्धच नाहीत”

* संस्कारांचं स्थान आता “इन्फ्लुएन्सर्स” ने घेतलं आहे

मानसिक आरोग्याचा संकोच:

* पूर्वी आजी-आजोबांशी जे बोललं जातं, ते आता “काउंसलर” कडे जातं

* जेव्हा प्रेमातून एकटेपणा सुटायचा, तो आता उपचारांनी कमी करावा लागतो

 बाजाराचे फायदे:

* प्रत्येक समस्येसाठी एक प्रॉडक्ट

* प्रत्येक भावनेसाठी एक अ‍ॅप

* प्रत्येक सणासाठी “ऑनलाईन ऑर्डर”

“सबस्क्रिप्शनने संस्कारांची जागा घेतली आहे. “

 आजचा प्रश्न — आपण काय होत आहोत?

 “आधुनिकतेच्या” नादात आपण:

 * संयुक्त कुटुंबं म्हणालो “जुनाट”

* आईवडील झाले “अडथळे”

* कुटुंबं झाली “नको असलेली भावना”

* नातेसंबंध झाले “अनफॉलो”

 पण विचार केलाय का?

 * Amazonला फायदा होतो तेव्हा तुम्ही दिवाळीत एकटे खरेदी करता, कुटुंबासोबत बसत नाही.

* Zomato कमावतो तेव्हा तुम्ही आईच्या हातचं अन्न टाळता.

 * Netflix चालतो तेव्हा तुम्ही आजीच्या गोष्टी टाळता.

 

 उपाय: अजूनही वेळ गेलेली नाही

 संयुक्त कुटुंबं “ओझं” नाहीत, ती “मूल्यवान संपत्ती” आहेत.

* मुलांना ग्राहक म्हणून नव्हे, तर संस्कारित माणूस म्हणून वाढवा.

* ज्येष्ठांना घराबाहेर काढू नका — त्यांचा अनुभव Google पेक्षा श्रेष्ठ आहे.

* * सण “खरेदीसाठी” नव्हे, तर उत्सवासाठी साजरे करा.

अ‍ॅप्स नव्हे, प्रेम वाढवा— म्हणजे एकटेपणा आपोआप कमी होईल.

 

  निष्कर्ष:

 “पश्चिम जगाने व्यापारासाठी कुटुंबं फोडली, आणि आपण ‘आधुनिक’ होण्यासाठी आपली ओळख विकली. “

 आता थांबण्याची, विचार करण्याची आणि आपल्या संस्कारांकडे परतण्याची वेळ आली आहे — नाहीतर पुढची पिढी ‘संयुक्त कुटुंब’ म्हणजे काय, ते समजून घेण्यासाठी Google वापरेल.

 कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares