मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आगळा वेगळा Father’s Day” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आगळा वेगळा Father’s Day.. ☆ संध्या बेडेकर ☆

आज morning walk ला श्री साठे आले नाहीत. सर्वांचे एकमेकांना विचारून झाले. ज्येष्ठांचा हा दहा जणांचा गृप रोज बगीच्यात एकत्र होतो. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार व्यायाम करतात. walk करतात. सात ते आठ ही यांची व्यायामाची / walk ची ठरलेली वेळ आहे. त्यानंतर एक तास गप्पा गोष्टी.

वर्तमान पत्रातील बातम्या, आयुष्याचे अनुभव, किस्से या जेष्ठांजवळ भरपूर असतात. नवीन टेक्नॉलॉजी चे अर्धवट ज्ञान असते, शेअर्स चे चढ उतार, अनेक अनुभवांनी श्रीमंत असलेला हा वर्ग, कधी कधी तर बायकांच्या वरताण गप्पा मारण्यात पटाईत आहेत, असं वाटतं. सध्या तर Cricket World Cup च्या रोजच मॅचेस असतात, त्यावर चर्चा होते, खरंतर गप्पा थाबवाव्या लागतात.

 येथे त्यांना हळु बोला,

अहो! हे खूपदा सांगनू झाले तुमचे,

असं म्हणणार कोणी नसतं.

सांगता सांगता विसरल तरी चालतं. नाव आणि आडनाव तर बहुतेक आठवत नाहीच, तरी सर्व ऐकतात, दाद देतात.

नाईलाजाने साधारण नऊ वाजता सगळे जण आपापल्या घरी जातात. या पिढीची शिस्त मात्र वाखाणण्याजोगी आहे. सर्व रिटायर्ड पण वेळेवर येणार अन् वेळेवर जाणार.

संध्याकाळी पुन्हा बस स्टॉप वर एकत्र भेटतात, तास दोन तास गप्पा झाल्या की आपापल्या घरी जातात.

ही मंडळी काही लहान पणापासून चे मित्र वगैरे नाहीत. Retired झाल्यावर हळूहळू एकमेकांशी ओळख झाली आणि हा गृप वाढत गेला. आता तर भेटणे हा त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांपैकी एक आनंदाचा कार्यक्रम झाला आहे. रोज सकाळी उठल्यावर बगीच्यात जायचा त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो.

काही कारणास्तव कोणी येऊ शकलं नाही तर ते स्वतः आणि बाकीचे सुद्धा बैचेन होतात. विचारपूस करताना कुठेतरी काळजी चे सूर असतात. आपली काळजी करणारे कोणी आहेत, ही भावना शक्ति देते. निराशा दूर करते. जगण्याचा आनंद वाढवते.

यांना एक गोष्ट चांगली समजलेली आहे ती म्हणजे आयुष्य आनंदात जगायला, गप्पा मारायला मित्र लागतात.

 हमारे दुनिया में अकेलेपन की कोई जगह नहीं है। किसी को अपना हम बनालो

हा मंत्र त्यांना समजला आहे.

यातील प्रत्येकाचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळा आहे. कोणी खूप चांगल्या नोकरीतून अवकाश प्राप्त अधिकारी आहेत. तर काही सर्व साधारण नोकरी केलेले आहेत. काही आजही सहजीवन जगतायेत, तर काही आज आयुष्याच्या संध्याकाळी एकटे आहेत. कोणी एकटेच राहतात तर कोणी आपल्या मुलासूने बरोबर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या घरांतील वातावरण, समस्या, आधार, प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाची लढाई वेगळी आहे.

या गृपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः चां एकटेपणा घालवायला, active रहायला एक उत्तम मार्ग शोधला आहे. मधून मधून बाहेर जेवायला जातात. पार्टी करतात.

या गृपचे काही नियमही आहेत बरं का??

आपल्या घरातील गोष्टींची चर्चा येथे करायची नाही. औषध आजारपण याबद्दल ही बोलायचे नाही. मदत हवी असल्यास निःसंकोचपणे बिनधास्त मागायची. घरच्या चांगल्या गोष्टी, आनंददायी घटना सांगायच्या, बरोबर त्यादिवशी चां चहा पण सर्वांना द्यायचा.

थोडक्यात रडगाणे गायचे नाही. आनंद शोधायचा आणि साजरा करायचा. त्यामुळे चहाच्या टपरीवर हा गृप वारंवार दिसतो.

आज माझ्याकडून चहा यांची सर्वांना आता सवय झाली आहे.

आनंदी जगायची यांनी सवय लावून घेतली आहे.

बरोबर आहे,

म्हणतात ना,

आनंदी जगणे ही निवड असावी, अपेक्षा नाही. तुम्हाला तोपर्यंत कोणतीच गोष्ट आनंद देणारं नाही, जोपर्यंत तुम्ही त्याची निवड करणार नाही.

Sometimes you hv to remind yourself that life can even more beautiful even though the things are not moving in your own way.

आज Father’s Day

बहुतेकांची मुलं जवळ नाहीतच. बहुतेकांना मुलांचा

Happy Father’s Day 

असा मेसेज आला…

पण श्री साठे या मेसेज ची, फोन ची वाट बघत होते. जूने अल्बम बघत होते, डोळ्यांतून अश्रू घळघळ वाहात होते. आयुष्याचा सिनेमा Real storyडोळ्यासमोरून सरकत होती. श्री व सौ. साठे उदास होते. कधी कधी असं होतं, कितीही मनाला समजवा, पण चांगल्या तर नाहीच नाही, पण वाईट आठवणी मनाच्या कोपऱ्यातून आपलं अस्तित्व दाखवायला जराही वेळ लावत नाही.

आज श्री साठे मुलांच्या आठवणीने उदास होते.

मागच्या वर्षी श्री साठे आजारी पडले, दवाखान्यात भर्ती होते. सकाळी साताऱ्याहून तो आला आणि संध्याकाळी परत गेला. एक दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

एक फोन करण्याइतपत ही त्याला वेळ मिळत नाही का?? मग मेसेज चे तरी काय करायचे म्हणा??

श्री साठे म्हणाले,

अग!! आपण मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवतो का?? एखादं दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

सौ. साठे म्हणाल्या,

अहो!! असेल त्याला काही महत्वाचे काम. तुमची मित्रावळ आहे की आपल्याकडे, आधार द्यायला. सोबत आहे की त्यांची.

तेंव्हाच श्री कुलकर्णी श्री साठेंची विचारपूस करायला म्हणून घरी आले होते. दोघांच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या.

एकंदर दोघांच्या मनस्थितीचा अंदाज त्यांना आला.

ते तसेच परत फिरले. श्री कुलकर्णी स्वतः बरोबरच बोलत होते. विचार करत होते.

खरंच श्री व सौ साठे मनाने हळवे झाले आहेत. बायका छोट्या छोट्या गोष्टीं आठवून रडतात. मन हलकं करतात. परंतु आज श्री साठे रडतायेत, तर रडू द्यावे. मनात साचून ठेवण्यापेक्षा रडून मोकळ व्हावे.

का पुरूषांना रडायची बंदी आहे का?? त्यांना मन नसतं की भावना नसतात?? त्यांना दुःख होत नाही का?? त्यांनी भावना का दाबून ठेवायच्या?? दुःख एकत्र झालं आणि हा बांध अचानक फुटला, स्फोट झाला तर अनर्थ होईल.

भावनांचा बांध फुटण्याआधी त्याला out let देणे आवश्यक आहे.

काय करणार?? लहान पणापासून मुलांनी हेच ऐकलेल असतं ना.

अरे!! तू मुलगा आहेस ना तरी रडतो. मुलं रडत नाहीत.

हे चूकच आहे.

मनसोक्त हसावं, तसंच जेंव्हा रडावसं वाटतंय तेंव्हा मनसोक्त रडाव सुद्धा. रडून मन हलकं होतं. मनावरचं प्रेशर कमी होत. मनातील अडगळ, कचरा बाहेर पडणं आवश्यक आहे.

आपल्याच विचारात श्री कुलकर्णी घरी आले. त्यांना अस्वस्थ बघून सौ कुलकर्णी नी विचारले

काय झाले.?? तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात??

श्री कुलकर्णीचें बोलणे ऐकून सौ कुलकर्णी ना वाईट वाटले. त्या म्हणाल्या,

आज सर्वांना घरी बोलवा हो. बहुतेकांची मुले बाहेरच आहेत. आपण सर्व एकत्र बसून, गप्पा मारू. सर्वांनाच बरं वाटेल आपला अजय तरी आपल्या जवळ कुठे आहे??

 आज गृपवर श्री कुलकर्णी यांनी सर्वांना आमंत्रणाचा मेसेज पोस्ट केला.

आज माझ्याकडून वडापाव आणि चहा पार्टी.

सर्वांनी संध्याकाळी घरी यावे.

मी आणि आपण सर्वच चांगले बाबा होतो. आपली सांपत्तिक परिस्थिती, क्षमता, कुवतीनुसार आपण सर्वांनी आपापले परिवार छान सांभाळले. आज आपण सर्व आपल्या स्वतः चाच कौतुक समारंभ साजरा करूया. स्वतः चीच पाठ थोपटूया.

Father’s Dayसाजरा करूया.

आज श्री कुलकर्णींच्या घरी आगळावेगळा Father’s Day झाला. काहींच्या सौ. पण आल्या होत्या.

श्री व सौ साठेही आले होते. गप्पांत रंगले होते.

श्री व सौ कुलकर्णी यांचा उद्देश सफल झाला होता. खरंतर आजची पार्टी खास करून त्यांच्या साठीच होती.

बरोबर आहे,

 आज कोणीतरी आपल्या मुळे आनंदी आहे.

ही एक सर्वोत्तम feeling आहे.

 

When life gives you hundred reasons to break down and cry. Show life you have millions reasons to smile and laugh.

एकतर म्हातारपण म्हणजे वेगळीच फेज, त्यात शरीर नाजूक आणि मन हळव झालेलं असतं. त्यात भरपूर रिकामा वेळ हातात असतो. प्रत्येकाचे प्रश्न, समस्या, वेगवेगळे असतात. फक्त ते

स्वीकार करायची हिम्मत असावी/ ठेवावी, आणि त्याच परिस्थितीत सुधार करण्याची ईच्छा असली तर,

 life becomes easy and happy.

 

म्हणतात ना,

 

You can not find happiness with negative mindset. Start thinking positive and happiness will find you.

श्री व सौ कुलकर्णी सारखा एक तरी मित्र प्रत्येकाला नक्की असावा.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ खरा फादर्स डे!!! – लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित ☆

सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ खरा फादर्स डे!!! – लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

रोजप्रमाणेच सकाळ उजाडली होती. आज मला थोडी उशिराच जाग आली. मी निवांत चहाचा कप हातात घेतला आणि किचनमधून हॉलकडे आले.

आई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात सकाळच्या कामात गुंतली होती. बाबांचं आज ऑफिस उशिरा असल्यामुळे घरात एक वेगळाच निवांतपणा होता. मोबाईलवर मंद आवाजात भजन सुरू होतं आणि खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाने संपूर्ण हॉल उजळून निघाला होता.

तेवढ्यात आजोबांचा हलकासा हसण्याचा आवाज कानावर पडला.

मी सहज नजरेने समोर पाहिलं…

माझे बाबा खुर्चीवर बसलेल्या आजोबांचे केस अगदी हळुवारपणे विंचरून देत होते.

“बाबा, जरा स्थिर बसा ना… नाहीतर कंगवा अडकेल. “

– आजोबा लहान मुलासारखे हसले.

“अरे, आता या वयात माझे केस तरी कुठे उरलेत रे? “

– बाबांनीही हसत उत्तर दिलं,

“केस कमी झाले म्हणून काय झालं? आमच्या डोक्यावरचं छत्र अजूनही तुम्हीच आहात. “

– – – मी चहाचा कप हातातच धरून तिथेच थबकले.

त्या सकाळी मला घरात भजनाचा आवाज ऐकू येत होता, पण समोर दिसत होतं ते त्याहूनही मोठं स्तोत्र होतं—एका मुलाने आपल्या वृद्ध वडिलांवर केलेल्या निःशब्द प्रेमाचं.

थोड्याच वेळात बाबांनी आजोबांच्या हातावर औषध ठेवलं, पाण्याचा ग्लास पुढे केला आणि त्यांच्या आवडीचं भजन मोबाईलवर लावून दिलं.

“आज बरं वाटतंय ना, बाबा? “

– आजोबांनी फक्त मान हलवली.  त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं.

दुपारी डॉक्टरांकडे जायचं होतं. संध्याकाळी त्यांना आवडणारं धार्मिक पुस्तक आणायचं होतं. रात्री जेवणात मऊ आमटी आणि गरम भात करायचा होता.

हे सगळं बाबा इतक्या सहज करत होते, जणू ती जबाबदारी नव्हतीच… ती त्यांच्या प्रेमाची रोजची सवय होती.

मी आईला हळूच विचारलं,

“आई, बाबा आजोबांची एवढी मनापासून काळजी कशी घेतात गं? “

– आई पोळी लाटत लाटत शांतपणे म्हणाली,

“बाळा, ज्यांनी आयुष्यभर आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्यांचा हात उतारवयात सोडायचा नसतो. “

त्या एका वाक्याने माझ्या मनात अनेक चित्रं तरळली.

– – लहानपणी आजोबांनी बाबांना शाळेत सोडलं असेल…

सायकल शिकवली असेल…

पहिल्या पगारावर अभिमानाने त्यांच्या पाठीवर थाप मारली असेल…

आणि आज…

– – आज काळाने फक्त भूमिका बदलल्या होत्या.

आज बाबा त्यांच्या स्वतःच्या बाबांचे आधार झाले होते.

आजोबांना औषधाची वेळ आठवत नव्हती, पण बाबांना प्रत्येक गोळीची वेळ पाठ होती.

आजोबांना मोबाईल वापरता येत नव्हता, पण बाबा त्यांच्या आवडीची भजनं, प्रवचनं आणि जुन्या गाण्यांची यादी तयार करून ठेवत होते.

आजोबांना चालताना आधाराची गरज होती, आणि बाबा सावलीसारखे त्यांच्या प्रत्येक पावलासोबत चालत होते.

त्या क्षणी माझ्या मनात एक विचार अलगद उमलला…

– – आयुष्यातील सर्वात मोठा वारसा पैसा, जमीन किंवा दागिने नसतात; आपल्या वडिलांचा हात कधीच सुटू न देण्याची सवय हा सर्वात मोठा वारसा असतो. “मुलांसाठी वडील आणि वडिलांसाठी सावली होऊन जो जगतो, त्याच्या रूपानेच देव प्रत्येक घरात रोज वावरत असतो. “

त्या रात्री सहज मोबाईल हातात घेतला.

सोशल मीडियावर फादर्स डेच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता.

कोणी केक कापत होतं…

कोणी फोटो टाकत होतं…

कोणी महागड्या भेटवस्तू देत होतं…

… मी मोबाईल शांतपणे बाजूला ठेवला.

– – समोर बाबा आजोबांना प्रेमाने चादर पांघरून देत होते.

उशी नीट करत होते.

– दिवा बंद करण्याआधी त्यांनी हळूच विचारलं,

“बाबा, अजून काही हवंय का? “

आजोबा हसले. .. “नाही रे… तू आहेस ना, मग अजून काय हवं? “

– – त्या चार शब्दांनी माझ्या मनात फादर्स डेचा अर्थ कायमचा बदलून गेला.

त्या दिवशी मला समजलं…

… एक पिता होणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं नाही.

आपल्या वृद्ध होत चाललेल्या वडिलांचे पुन्हा वडील होणं, त्यांच्या हट्टांना समजून घेणं, औषधांची वेळ लक्षात ठेवणं, त्यांच्या एकटेपणात त्यांच्यासोबत शांत बसणं, त्यांच्या चालण्याचा आधार होणं आणि त्यांना कधीच ओझं वाटू न देणं… हेच पितृत्वाचं सर्वोच्च रूप आहे.

त्या रात्री मी स्वतःशी एक छोटासा निश्चय केला.

– – उद्या मी कोणाचा बाबा होईन की नाही, हे काळ ठरवेल.

पण माझे बाबा जेव्हा थकतील, तेव्हा त्यांच्या आयुष्यात मी नक्कीच त्यांचा आधार बनेन.

कारण वडिलांना दिलेला गुलाबाचा गुच्छ एक दिवस कोमेजतो…

महागडी भेटवस्तूही विसरली जाते…

पण उतारवयात त्यांच्या हातात दिलेला आपला हात आणि त्यांच्या डोळ्यांत दिलेला विश्वास आयुष्यभर ताजा राहतो.

– – मुलांसाठी बाबा होणं ही जबाबदारी आहे; पण आपल्या वडिलांसाठी पुन्हा बाबा होणं हा संस्कार आहे.

– – आणि जो माणूस एका हाताने आपल्या मुलांचं भविष्य घडवतो आणि दुसऱ्या हाताने आपल्या वृद्ध वडिलांना आधार देतो…

… त्याच्यासाठी फादर्स डे कॅलेंडरवरच्या एका तारखेचं नाव नसतं.

त्याच्या आयुष्यातला प्रत्येक दिवसच “खरा फादर्स डे” असतो.

┉❀꧁꧂❀┉

लेखिका : तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कोमल वाचा दे रे राम’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कोमल वाचा दे रे राम ’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आत्मसंस्कारातून राष्ट्रसंस्काराकडे समर्थांची गुणयाचना :

प्रस्तावना

प्रार्थनेचे स्वरूप आणि आशयव्याप्ती

समर्थ रामदासस्वामींची प्रस्तुत रचना ही पारंपरिक भक्तिपर प्रार्थनेच्या चौकटीत बसणारी असली, तरी तिचा आशय केवळ वैयक्तिक मोक्षाभिलाषेपुरता मर्यादित नाही. ही गुणयाचना आहे; आणि ती व्यक्तिमत्त्वविकास, लोकसंघटन आणि धर्मसंस्थापना यांचा सूचक आराखडा मांडते. प्रस्तुत लेखात या प्रार्थनेतील मागण्यांची तार्किक संगती, त्यांचे आध्यात्मिक व सामाजिक आशय, तसेच समर्थांच्या धर्म–राष्ट्रकार्याशी त्यांचे नाते यांचा विचार केला आहे.

वाणी आणि करणी : नैतिक अधिष्ठानाची संकल्पना

“कोमल वाचा” आणि “विमल करणी” या दोन संकल्पना समर्थांच्या नैतिक दृष्टिकोनाचा पाया दर्शवितात. वाणीतील कोमलता ही संवादक्षमतेचे, तर करणीतील विमलता ही आचरणशुद्धीचे प्रतीक आहे. संतपरंपरेत वाणीचे महत्त्व अधोरेखित झालेले असले, तरी समर्थ येथे वाणी–करणी सुसंगतीवर विशेष भर देतात.

यातून एक मूलभूत तत्त्व स्पष्ट होते : _नैतिक विश्वसनीयता हीच नेतृत्वाची पूर्वअट आहे_.

प्रसंगावधान आणि ‘धूर्त कळा’ : संताची व्यवहारदृष्टी

“प्रसंग ओळखी” आणि “धूर्त कळा” ही मागणी विशेष लक्षणीय आहे. संतस्वभाव आणि राजकीय व्यवहारदृष्टी यांचा समन्वय येथे दिसतो. ‘धूर्त’ हा शब्द येथे नकारात्मक अर्थाने नसून, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करून यथायोग्य कृती करण्याची चातुर्यदृष्टी दर्शवितो.

शिवकालीन अस्थैर्य, सामाजिक विघटन आणि परकीय सत्तेच्या पार्श्वभूमीवर धर्मसंरक्षणासाठी ही व्यवहारबुद्धी आवश्यक होती. समर्थांच्या दासबोधातील उपदेशांमध्येही ही व्यावहारिकता जागोजागी स्पष्ट दिसते.

हितकारकता, बहुजन मैत्री आणि लोकाभिमुख साधना

“हितकारक”, “जनसुखकारक” आणि “बहुजन मैत्री” या मागण्या समर्थांच्या सामाजिक जाणीवेचे द्योतक आहेत. साधना ही समाजविरहित नसून समाजाभिमुख असावी, ही त्यांची भूमिका होती.

समर्थांनी उभारलेली मारुती मंदिरे, मठसंस्था आणि व्यायामप्रणाली या धार्मिक संस्थांइतक्याच सामाजिक संघटनकेंद्रे होत्या. व्यक्तीची नैतिक व शारीरिक उभारणी ही राष्ट्रधर्माच्या पुन:स्थापनेसाठी आवश्यक असल्याचे समर्थ मानतात.

 विद्या, उदासीनता आणि नम्रतेचे तत्त्वज्ञान

“विद्या वैभव” आणि त्यासोबत “उदासीनता” यांची संयुक्त मागणी ही संतुलित दृष्टी दर्शवते. विद्या प्राप्त झाली तरी तिचा अहंकार नको; वैभव आले तरी आसक्ती नको.

“मागो नेणे दे” ही ओळ मानवी मर्यादेची जाणीव व्यक्त करते. ईश्वरनिष्ठा आणि नम्रता या समर्थांच्या आध्यात्मिकतेच्या मूलभूत अटी आहेत.

कला, शब्दसामर्थ्य आणि सावधता : जनजागृतीची साधने

संगीत, गायन, प्रबंध, कथा, शब्दमनोहरता, या सर्व मागण्या समर्थांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती साधली.

“सावधपणा” आणि “बहुत पाठांतर” या मागण्या आत्मशिस्त व अध्ययनशीलता दर्शवितात. समर्थांची साधना भावनावादी नसून अभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध आहे.

अभेद भक्ती ते ब्रह्मानुभव : साधनेची अंतर्मुख परिणती

प्रार्थनेच्या उत्तरार्धात मागण्या अधिक सूक्ष्म होत जातात. “अभेद भक्ती”, “आत्मनिवेदन”, “तद्रूपता”, “ब्रह्म अनुभव”.

येथे साधनेचा क्रम स्पष्ट दिसतो :

भक्ती आत्मसमर्पण अहंनिवृत्ती ब्रह्मानुभव.

“मजवीण तू मज दे” ही ओळ अद्वैतानुभूतीचे संकेत देते. ही व्यक्तिनिष्ठ अध्यात्मिकता असली, तरी तिचा परिणाम समाजाभिमुख कर्तृत्वात होतो.

गुणयाचनेतील तार्किक संगती

ही प्रार्थना विस्कळीत मागण्यांचा संच नाही. तिची अंतर्गत रचना क्रमबद्ध आहे :

नैतिकता व्यवहारदृष्टी सामाजभान वैराग्य सांस्कृतिक साधने भक्ती अद्वैतानुभव.

हा क्रम व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा सूचित करतो.

समर्थांचे धर्म–राष्ट्रकार्य : गुणांचे कार्यरूप

समर्थांनी प्रत्यक्ष कार्यातून या संपादित गुणांचे प्रकटीकरण केले. छ. शिवाजी महाराजांना दिलेले आध्यात्मिक अधिष्ठान, संघटनप्रवण उपदेश, ‘दासबोधा’तील व्यवहारमार्गदर्शन आणि ‘मनाचे श्लोकां’तील आत्मशिस्त — हे सर्व या गुणयाचनेचे कार्यरूप आहे.

त्यांच्या दृष्टीने धर्म म्हणजे केवळ उपासना नव्हे; तो समाजनियमन, नैतिकता आणि राष्ट्रस्वातंत्र्याचा मूल्याधार आहे.

समारोप:

समर्थ रामदासांची ही गुणयाचना ही संतपरंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ती वैयक्तिक मोक्षाभिलाषा आणि सामाजिक दायित्व यांचा समन्वय साधते.

“कोमल वाचा” पासून “मजवीण तू मज दे” पर्यंतचा प्रवास हा व्यक्तीच्या बाह्य शुद्धीपासून अंतर्मुख अद्वैतानुभवापर्यंत आणि तेथून समाजाभिमुख कर्तृत्वापर्यंत जाणारा आहे.

म्हणूनच ही प्रार्थना केवळ भक्तिसाहित्याचा भाग न राहता, राष्ट्रधर्माच्या तात्त्विक अधिष्ठानाचे विधान ठरते.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

(समर्थांनी रामाकडे केलेली गुणयाचना)

*

कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम ।

प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम ॥ १ ॥

*
हितकारक दे रे राम, जन सुख कारक दे रे राम ।

अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम ॥ २॥

*

विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम ।

मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम ॥ ३॥

*

तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम ।

संगित गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम॥ ४ ॥

*

धात माता दे रे राम, अनेक घाटी दे रे राम।

रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम ॥ ५॥

*

दस्तक टाळी मज दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम।

प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम ॥ ६ ॥

*

सावध पण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम।

दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम ॥ ७ ॥

*

पावन भिक्षा दे रे राम, दीनदयाळा दे रे राम।

अभेद भक्ती दे रे राम, आत्म निवेदन दे रे राम ॥ ८ ॥

*

तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम ।

सज्जन संगती दे रे राम, अलिप्त पण मज दे रे राम ॥ ९ ॥

*

ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम ।

मजविण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम॥ १० ॥

*

– – समर्थ रामदासस्वामी

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाण्याची expiry date! – – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ पाण्याची expiry date! – – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर

तुम्हाला पाण्याची मुदतीची तारीख माहित आहे का?

… काही लोक फक्त एक दिवसाचे पाणी फेकून देतात…

… काही जण आठवडाभर साठवलेले पाणी पितात…

… तरीही, हजारो वर्षे जमिनीखाली राहिलेले पाणी आपण सर्वात शुद्ध आणि सुरक्षित मानतो!

 

– – – – तर मग, पाण्याची खरी मुदतची तारीख काय आहे?

… जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर समजले, तर पाण्याबद्दलचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो.

बऱ्याचदा, आपण आपल्या सोयीनुसार आणि मानसिकतेनुसार पाण्याला एक “मुदतची तारीख” देतो. परंतु, प्रत्यक्षात अशा गृहितकांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. आपल्या सभोवतालच्या या मनोरंजक परिस्थितींचे निरीक्षण करा:

 

शहरांमध्ये.. जिथे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा दररोज होतो, तिथे लोक अनेकदा कालचे पाणी शिळे झाले आहे असे समजून फेकून देतात.

(त्यांच्या मते, मुदतची तारीख फक्त १ दिवसाची असते.)

 

ज्या भागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा होतो.. तेच पाणी दोन ते आठ दिवस कोणताही विचार न करता साठवले जाते आणि वापरले जाते.

(त्यांच्या मते, मुदत संपण्याची तारीख २ ते ८ दिवसांची असते.)

लग्नसमारंभात आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये.. पाण्याची नवीन बाटली उघडल्याबरोबर, आधी उघडलेली बाटली अनेकदा दुर्लक्षित केली जाते, सोडून दिली जाते किंवा फेकून दिली जाते.

(त्यांच्या मते, मुदत संपण्याची तारीख फक्त काही मिनिटे किंवा तासांची असते.)

 

पण सत्य वेगळेच आहे…

वाळवंटात, प्रवासादरम्यान, पाण्याचा पुढचा स्रोत मिळेपर्यंत पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आणि “ताजा” राहतो.

(मुदत संपण्याची तारीख: पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध होईपर्यंत.)

 

निसर्गात, धरणे आणि जलाशयांमध्ये साठवलेले पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत वापरले जाते आणि दुष्काळात ते दोन-तीन वर्षे समुदायांना पुरते.

(मुदत संपण्याची तारीख: अनेक वर्षे.)

 

बोअरवेल आणि जलस्तरांमध्ये – – आपण ५० ते ५०० फूट खोल पाण्यातून जे पाणी काढतो, ते शेकडो किंवा हजारो वर्षांपासून जमिनीखाली साठवलेले असू शकते. तरीही आपण त्याला पिण्याच्या पाण्याचा एक सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी स्रोत मानतो.

(मुदत: शेकडो किंवा हजारो वर्षे—कदाचित कधीच नाही.)

– – चिंतन करण्यासारखा एक विचार

वास्तविक पाहता, पाण्याला स्वतःची अशी कोणतीही मुदत नसते. त्याची उपयोगिता केवळ काळाच्या ओघावर नाही, तर त्याची स्वच्छता, साठवणुकीची परिस्थिती आणि उपलब्धता यावर अवलंबून असते.

जेव्हा पाणी मुबलक प्रमाणात असते, तेव्हा आपण त्याला ‘जुने’ किंवा ‘शिळे’ म्हणतो. जेव्हा टंचाई निर्माण होते, तेव्हा तेच पाणी अमृतासारखे मौल्यवान बनते.

म्हणून, आपण जबाबदारीने पाण्याचा वापर करूया आणि प्रत्येक थेंब जपून वापरूया. नाहीतर, पृथ्वीवरील पाणी संपण्यापूर्वीच, आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला तहानलेल्या अवस्थेत राहावे लागेल.

एक विनम्र विनंती

… हा केवळ एक संदेश नाही—हे आपल्या भविष्याचे रक्षण करण्याचे आवाहन आहे.

पाण्याच्या मूल्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी कृपया हा संदेश तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि समाजात शेअर करा.

… पाणी म्हणजे जीवन.

… पाणी असेल तरच आपल्यासाठी उद्या असेल.

निरोगी राहा. सुरक्षित राहा. पाणी वाचवा.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खाण्याचे शास्त्र…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “खाण्याचे शास्त्र…” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.

रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात.

उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही, तोपर्यंत ‘घ्या’ म्हणायला माझं काय जातं म्हणा!

तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे.

पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखानं नांदणार नाहीत.

जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो, तसा जिलबी आणि… छे!

जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.

खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं

जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात.

रागांप्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत.

सकाळी यमन बेचव वाटतो.

सकाळी थालीपीठही बेचव वाटतं.

मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मध्ये बसतं.

सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा.

बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं.

सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहोत, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत.

 

अधिकचं हे असं आहे.

लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात.

हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं.

शहाळ्याचं पाणी हापिसात बसून

पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत.

मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे.

आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे.

खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेत्ते होते.

उपासाचं खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. ‘उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. ‘

लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. ‘हरहर महादेव’ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे.

माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई.

सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा.

 सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे.

होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा.

दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते.

संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर ‘गोड गोड बोला’ म्हणतील लोक.

कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दूध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं.

गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या?

रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन् खडीसाखर…

सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे.

शुभ खाद्यान्न!

लेखक: पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मन म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “मन म्हणजे काय?☆ श्री जगदीश काबरे ☆

मनात आलं, मन जड झालं, मन उदास आहे, या वाक्प्रचारांनी आपली भाषा व्यापलेली आहे. कवींनी मनाला हृदयात बसवलं, प्रेमीजनांनी मनाची गाणी गायली, तत्त्वज्ञांनी मनाचे तत्त्व शोधण्याचा प्रयत्न केला. पण खरोखरच मन म्हणजे काय? ते कुठे असते? ते दिसते का? स्पर्श करता येते का? मोजता येते का? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञान, धर्म, आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांतून शतकानुशतके चालू आहे. साध्या भाषेत सांगायचे तर मन म्हणजे विचार, भावना, स्मृती, कल्पना, इच्छा आणि जाणीव यांचा एकत्रित अनुभव. पण हे अनुभव कुठून येतात? आधुनिक न्यूरोसायन्स सांगते की मनाचे मूळ स्थान म्हणजे मेंदू. आपला सुमारे दीड किलो वजनाचा, तीन पौंड इतका, राखाडी-पांढऱ्या रंगाचा, आक्रोडासारखा दिसणारा अवयव म्हणजे मेंदू. मन आणि मेंदू यांचे नाते समजावून घेणे हे आजच्या विज्ञानातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे.

प्राचीन काळी मन हृदयात असते असा व्यापक समज होता. प्राचीन इजिप्शियन लोक मृत व्यक्तीचे हृदय जपून ठेवत, पण मेंदू नाकातून काढून फेकून देत. कारण त्यांच्या मते हृदयच विचार करते, आत्मा हृदयात राहतो. अॅरिस्टॉटल या महान ग्रीक तत्त्वज्ञानेदेखील मन हृदयात आहे असे मानले. त्याच्या मते मेंदू हा फक्त रक्त थंड करण्याचे काम करतो! मराठी आणि हिंदी भाषेतही दिलसे सोचो, मनापासून काम करा, हृदयात कुछ कुछ होता है, असे शब्दप्रयोग याच सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहेत. भावनिक अनुभव छातीत, हृदयाजवळ जाणवतात, धडधड वाढते, श्वास जड होतो, त्यामुळे हा गैरसमज नैसर्गिकच होता. परंतु हिप्पोक्रेटस (इ. स. पू. ४०० च्या आसपास) आणि नंतर गॅलेन यांनी मेंदूचे महत्त्व ओळखले. मेंदूला दुखापत झाल्यावर माणसाचे वर्तन, विचार, स्मृती बदलतात असे निरीक्षणांती त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासून हळूहळू मेंदू-केंद्रित दृष्टिकोन विकसित होत गेला आणि आज न्यूरोसायन्सने हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे की मनाचे अस्तित्व मेंदूशी निगडित आहे.

मानवी मेंदूत सुमारे ८६ अब्ज न्यूरॉन्स असतात. प्रत्येक न्यूरॉन हजारो इतर न्यूरॉन्सशी जोडलेला असतो. म्हणजे मेंदूत एकूण सुमारे १०० खर्व सिनॅप्टिक कनेक्शन्स आहेत. हा आकडा इतका प्रचंड आहे की आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. या न्यूरॉन्सच्या जाळ्यातून विद्युत-रासायनिक संदेश सतत प्रवाहित होत असतात आणि त्यातूनच विचार, भावना, स्मृती, निर्णय हे सारे उत्पन्न होतात. मेंदूचे मुख्य भाग म्हणजे सेरेब्रम, सेरेबेलम आणि ब्रेन स्टेम. सेरेब्रमचा बाहेरचा थर म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्स, हाच भाग तर्कशक्ती, भाषा, नियोजन, आणि जटिल विचार निर्मितीसाठी जबाबदार आहे. सेरेब्रमला फ्रंटल, पॅरायटल, टेम्पोरल, आणि ऑक्सिपिटल असे चार लोब्स आहेत. प्रत्येकाची वेगळी कार्ये आहेत. फ्रंटल लोब निर्णय घेणे, व्यक्तिमत्त्व आणि भावनिक नियंत्रण यांसाठी; टेम्पोरल लोब स्मृती आणि भाषेसाठी; ऑक्सिपिटल लोब दृष्टीसाठी असे प्रत्येकाचे वेगळे कार्य आहे. लिम्बिक सिस्टिम हा मेंदूचा भाग भावनांशी विशेषतः निगडित आहे. यात अमिग्डाला भय आणि क्रोध यांचे केंद्र आहे आणि हिप्पोकॅम्पस स्मृती निर्माण करण्याचे केंद्र आहे.

मेंदू हा भौतिक अवयव आहे हे मान्य केले, तरी एक मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे जाणीव म्हणजे काय? मला ‘मी आहे’ असे जाणवते, मला रंग दिसतात, संगीत ऐकू येते, वेदना होतात, हे व्यक्तिनिष्ठ अनुभव मेंदूच्या न्यूरॉन्सच्या क्रियांमधून कसे उत्पन्न होतात? हे तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन्हींना पडलेले सर्वात कठीण कोडे आहे. तत्त्वज्ञ डेव्हिड चाल्मर्स यांनी याला “The Hard Problem of Consciousness” असे नाव दिले आहे. न्यूरॉन्स कसे काम करतात हे आता वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. पण या क्रियांमधून अनुभव कसा निर्माण होतो हे अजून पूर्णपणे आकळलेले नाही. भौतिक पदार्थातून व्यक्तिनिष्ठ अनुभव कसा उगम पावतो, याचे संपूर्ण वैज्ञानिक उत्तर अद्याप मिळालेले नाही. या प्रश्नावर मुख्यतः दोन भूमिका आहेत — द्वैतवाद आणि भौतिकवाद. रेने देकार्त यांनी मांडलेल्या द्वैतवादानुसार मन आणि शरीर या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यांच्या मते मन अभौतिक असते आणि मेंदूशी कसेतरी संपर्क साधते. आधुनिक विज्ञान मात्र प्रामुख्याने भौतिकवादी भूमिका घेते. मन हे मेंदूच्या क्रियांचे उत्पादन आहे. त्याला वेगळे अस्तित्व नाही.

आधुनिक न्यूरोसायन्सने मेंदूचा नकाशा काढून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकात मेंदू संशोधनात क्रांतिकारी प्रगती केली. FMRI (Functional Magnetic Resonance Imaging) या तंत्रज्ञानाने मेंदूचा आतील भाग जिवंत व्यक्तीमध्ये अभ्यासणे शक्य झाले. जेव्हा आपण विचार करतो, भावना अनुभवतो, निर्णय घेतो तेव्हा मेंदूच्या कोणत्या भागात रक्तप्रवाह वाढतो हे FMRI द्वारे दिसते. यावरून मेंदूच्या वेगवेगळ्या कार्यांचा नकाशा तयार झाला आहे.

मन म्हणजे केवळ विचार नाही, तर त्यात स्मृतींचा प्रचंड साठा असतो. ‘मला लहानपणी आजोबा सांगत असत… ‘ हे आठवणे म्हणजे काय? स्मृती कुठे असतात? न्यूरोसायन्सच्या मते स्मृती कोणत्या एका ठिकाणी साठवलेल्या नसतात. त्या मेंदूच्या विविध भागांतील न्यूरॉन्सच्या जाळ्यांमध्ये वितरित असतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा न्यूरॉन्समधील सिनॅप्सेस मजबूत होतात. याला ‘लॉन्गटर्म पोटेन्सीएशन’ म्हणतात. ही प्रक्रिया स्मृतीचा जैविक आधार आहे. हेन्री मोलायसन हे न्यूरोसायन्सच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध रुग्ण. त्यांच्या हिप्पोकॅम्पसची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते नवीन दीर्घकालीन स्मृती तयार करू शकेनासे झाले. प्रत्येक भेटीत ते डॉक्टरांना नव्याने भेटल्यासारखे वागत. पण जुन्या आठवणी शाबूत होत्या. कारण त्या इतर भागांत साठवलेल्या होत्या. यावरून हिप्पोकॅम्पस नव्या स्मृती तयार करण्यासाठी अपरिहार्य आहे हे सिद्ध झाले.

मला खूप राग आला आहे, मला प्रेम वाटते, मला भीती वाटते या भावना मेंदूत कुठे निर्माण होतात? लिम्बिक सिस्टिम, विशेषतः अमिग्डाला, भावनिक प्रतिक्रियांसाठी केंद्रीय भूमिका बजावते. धोका जाणवताच अमिग्डाला सेकंदाच्या आधी प्रतिक्रिया देते… लड किंवा पळ असा प्रतिसाद तात्काळ दिला जातो, हृदयाचे ठोके वाढतात, अॅड्रेनालिन वाढते. पण फ्रंटल कॉर्टेक्स या भावनांवर नियंत्रण ठेवतो. म्हणूनच माणूस भावनांच्या आहारी न जाता तर्काने विचार करू शकतो. हे इतर प्राण्यांपेक्षा मानवाचे वैशिष्ट्य आहे. फ्रंटल कॉर्टेक्स नुकसान झालेल्या व्यक्तींमध्ये भावनिक नियंत्रण बिघडते. फिनियस गेज या माणसाच्या प्रसिद्ध ऐतिहासिक प्रकरणात एका अपघातात लोखंडी सळई फ्रंटल लोबमधून आरपार गेली आणि त्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलले.

अँटोनियो दामासियो या न्यूरोशास्त्रज्ञाने ‘सोमॅंटिक मार्कर हैपोथेसिस’ची मांडणी करून सांगितले की आपले निर्णय केवळ तर्काने नव्हे, तर भावनांनी मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. फ्रंटल लोब खराब झालेले रुग्ण तर्काने बरोबर उत्तरे देतात, पण साध्या व्यावहारिक निर्णय घेण्यात अपयशी ठरतात. कारण त्यांचे भावनिक मार्गदर्शन बंद झालेले असते. ‘मी आहे’ हे जाणवणे म्हणजे चेतना. ही जाणीव कुठून येते? मेंदूचे कोणते भाग जागृत असताना आपल्याला जाणीव असते? झोपेत ती जाणीव का नसते? भूल दिल्यावर का नाहीशी होते? न्यूरोशास्त्रज्ञ क्रिस्टॉफ कॉख आणि जुलिओ टोनोनी यांनी इंटिग्रॅटेड इन्फॉर्मशन थेअरी मांडली. त्यानुसार चेतना म्हणजे माहितीचे एकात्मिक प्रक्रियाकरण होय. ते जितके जास्त एकात्मिक, तितकी जास्त चेतना. या सिद्धांतानुसार एक साध्या थर्मोस्टॅटला अतिशय कमी प्रमाणात चेतना असते, तर मानवी मेंदूला सर्वाधिक, हे त्यांनी सिद्ध केले. दुसरा महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे ग्लोबल वर्क्सस्पेस थेअरी. बर्नार्ड बार्स यांनी मांडलेला. यानुसार चेतना म्हणजे मेंदूतील ग्लोबल वर्कस्पेस जिथे विविध भागांतून माहिती एकत्र येते आणि उपलब्ध होते, जसे रंगमंचावर प्रकाशझोतात आलेला नट. जे विचार/संवेदना या वर्कस्पेसमध्ये येतात त्यांचीच आपल्याला जाणीव होते.

अलीकडे प्रेडिक्टिव्ह प्रोसेसिंग हा सिद्धांत लोकप्रिय होत आहे. हा सिद्धांत कार्ल फ्रिस्टन आणि अँडी क्लार्क यांच्या संशोधनावर आधारित आहे. यानुसार मेंदू हे भाकीत ओळखणारे मशीन आहे, तो सतत आपल्या अनुभवाचे भाकीत करत असतो आणि इंद्रियांकडून येणाऱ्या माहितीशी ते जुळवत असतो. जे जुळत नाही तेच आपल्याला जाणवते. म्हणजेच आपण जग जसे आहे तसे पाहत नाही तर मेंदूने बनवलेले अंदाजित जग पाहतो! फ्रॉइडने नेणिवेतील मनाची संकल्पना मांडली होती. आपल्या वर्तनावर आणि भावनांवर नेणिवेतील इच्छा आणि भीती प्रभाव टाकतात असे त्यांनी सांगितले. आधुनिक न्यूरोसायन्सने नेणिवेतील प्रक्रियांचे अस्तित्व वेगळ्या पद्धतीने सिद्ध केले आहे. मेंदूत बहुतांश माहितीचे प्रक्रियाकरण जाणीवेच्या बाहेर होते. आपण सायकल चालवतो, टायपिंग करतो, या क्रिया स्वयंचलितपणे होतात. त्यासाठी जाणीवेची गरज नसते. बेंजामीन लिबेट यांच्या प्रसिद्ध प्रयोगात असे दिसले की एखादी क्रिया करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय होण्याआधी मेंदूत त्याची विद्युत जोडणी सुरू होते.

एकेकाळी असे मानले जात होते की मेंदू एकदा पूर्ण विकसित झाला की बदलत नाही. पण आधुनिक संशोधनाने हा समज खोटा ठरवला आहे. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदू नवीन अनुभव, शिक्षण, आणि सरावाने स्वतःची रचना बदलू शकतो. लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हरांचा प्रसिद्ध अभ्यासात असे लक्षात आले की त्यांचा हिप्पोकॅम्पस सामान्य माणसांपेक्षा मोठा होता, कारण त्यांना लंडनच्या गुंतागुंतीच्या रस्त्यांची सखोल माहिती असते. ध्यानधारणा करणाऱ्यांच्या मेंदूत संरचनात्मक बदल दिसतात, त्यांचा फ्रंटल कॉर्टेक्स घट्ट होतो, अमिग्डालाची प्रतिक्रियाशीलता कमी होते. याचाच अर्थ मानसिक सराव मेंदूला शब्दशः बदलतो.

एक गमतीचा भाग म्हणजे मन समजण्याच्या प्रयत्नातून AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म झाला. मेंदूच्या न्यूरल नेटवर्कची नक्कल करून कृत्रिम न्यूरल नेटवर्क बनवण्यात आले. आज चॅटजीपीटी, क्लाऊड, जेमिनीसारखे AI मॉडेल्स भाषा समजतात, उत्तरे देतात, पण त्यांच्यात जाणीव असते का? ते खरोखर विचार करतात का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. जे काही निश्चित आहे ते म्हणजे आजचे AI मॉडेल्स मानवी मनाची प्रतिकृती नाहीत. मानवी मन केवळ माहितीवर प्रक्रिया करत नाही, तर त्याला शरीर आहे, भावना आहेत, जाणीव आहे, उत्क्रांतीचा इतिहास आहे. या सर्व गोष्टी मिळून मन बनते. मनाते शरीराचे अविभाज्य नाते असते. म्हणून मन फक्त मेंदूत नाही असेही काही संशोधक सुचवतात. देहाधारीत जाणीव या नव्या दृष्टिकोनानुसार विचार आणि अनुभव हे संपूर्ण शरीराशी निगडित असतात. आतड्याला दुसरा मेंदू म्हणतात. कारण त्यात ५०० मिलियन न्यूरॉन्स आहेत आणि ते सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रान्समीटर तयार करतात. आतड्याचे आणि मेंदूचे सतत संभाषण चालू असते.

मन म्हणजे काय याचे उत्तर विज्ञानाने अनेक पातळ्यांवर द्यायला सुरुवात केली आहे. न्यूरॉन्स, सिनॅप्स, न्यूरोट्रान्समीटर्स, मेंदूचे विविध भाग यांचे कार्य आता बऱ्याच अंशी समजले आहे. fMRI, EEG, ऑप्टोजेनेटिक्स, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने संशोधन वेगाने पुढे जात आहे.

पण ‘जाणीव’, ‘मी आहे’ हे अनुभवणे अजून पूर्णपणे उलगडलेले नाही. हे खरे रहस्य आहे. मेंदूतील विद्युत-रासायनिक प्रक्रियांमधून अनुभव कसा उत्पन्न होतो हे समजणे हे एकविसाव्या शतकाचे सर्वात मोठे वैज्ञानिक आव्हान आहे. मन हे हृदयात नाही हे आता निश्चित झाले आहे. ते मेंदूत आहे, पण मेंदूच्या एका कोपऱ्यात नव्हे, तर संपूर्ण मेंदूच्या आणि कदाचित संपूर्ण शरीराच्या गुंतागुंतीच्या क्रियांमध्ये विखुरलेले आहे. मन ही एक सतत बदलणारी, शिकणारी, जुळवून घेणारी प्रक्रिया आहे. आणि हीच प्रक्रिया समजणे म्हणजे स्वतःला समजणे. तरीही कवींनी मनाला जे गूढ दिले ते नाहीसे झालेले नाही. विज्ञानाने त्या गूढाची खोली आणखी वाढवली आहे. आपण मेंदू जितका समजतो तितका आपल्याला तो अधिक अद्भुत वाटतो. आणि म्हणूनच मनाचा शोध हा विज्ञानातील सर्वात रोमांचक प्रवास आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सवयी एडिट करण्याची वेळ – – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆ 

☆ सवयी एडिट करण्याची वेळ – – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  अंजली दिलीप गोखले ☆

खरे तर रोज सकाळी शेकडो, हजारो सुप्रभात संदेश आपल्या मोबाईलवर येत असतात.

बहुतेक संदेश वाचले जातात,

काही फक्त पाहिले जातात आणि

काही नकळत पुढे सरकून जातात. .

 

पण

आज एका मैत्रिणीने पाठवलेला एक छोटासा संदेश मनात घर करून गेला.

 

“Reached that age

where I don’t care

how I look in photos anymore…

 

I want to look good

in the X-rays, scans

and blood reports!”

 

पहिल्यांदा वाचला तेव्हा हसू आलं. अगदी मिश्किल वाटलं. पण काही क्षणांनी त्यामागचा अर्थ मनाला स्पर्शून गेला.

आणि मग विचारांची एक साखळीच सुरू झाली.

खरंच ना…

एक काळ असा होता की

फोटो काढण्यापूर्वी केस नीट आहेत का, चेहरा कसा दिसतोय, कोणता अँगल चांगला दिसेल,

कोणता फिल्टर वापरावा

याची काळजी असायची.

आजही वाटते म्हणा… पण पूर्वीसारखी नाही.

 

आता आयुष्य अशा टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे की

फोटोमध्ये आपण कसे दिसतो यापेक्षा

एक्स-रे, स्कॅन आणि ब्लड रिपोर्ट

मध्ये काय दिसतं, याची जास्त काळजी वाटते.

 

हे वयामुळे नाही, तर अनुभवामुळे घडतं.

 

एक काळ असा होता की फोटोवर किती लाईक्स आले, कोणती कमेंट आली याला महत्त्व होतं. पण

जसजसं आयुष्य शिकवत जातं, तसतसं लक्षात येतं की

खरी गुंतवणूक आपल्या आरोग्यात असते. .

कारण फोटोवरील सुरकुत्या लपवता येतात,

पण थकलेलं शरीर लपवता येत नाही.

आपण सगळेच रोजच्या धावपळीत इतके अडकून जातो की

स्वतःसाठी वेळ काढणं

पुढे ढकलत राहतो.

पाणी कमी पिणं, झोप अपुरी घेणं, वेळेवर न खाणं, व्यायाम टाळणं, मनातला ताण साठवत राहणं… आणि मग एक दिवस रिपोर्ट आपल्याला आरशापेक्षा जास्त प्रामाणिकपणे सत्य दाखवतो. .

 

मात्र त्यात घाबरण्यासारखं

काही नाही.

उलट ही एक जाग येण्याची घंटा असते. .

 

खरं तर निरोगी राहण्याचं गणित फार अवघड नाही—

थोडं जास्त पाणी,

थोडी जास्त हालचाल,

थोडी चांगली झोप,

थोडं कमी चिंतन,

आणि स्वतःवर थोडं अधिक प्रेम.

 

आजकाल माझी इच्छा एवढीच आहे

 

फोटोमध्ये मी परफेक्ट दिसले नाही तरी चालेल.

 

पण डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून,

सगळं व्यवस्थित आहे, ”

असं हसत सांगावं.

 

कारण शेवटी आयुष्य हे

फोटोमध्ये कसं दिसतं यावर नाही,

तर ते किती निरोगी, आनंदी

आणि मनापासून जगता येतं

यावर ठरतं. .

 

आणि हो…

 

आता फोटो एडिट करण्यापेक्षा सवयी एडिट करण्याची वेळ आली आहे! 

 

फोटोवर लाईक्स मिळणं आनंददायी असतं,

पण रिपोर्टवर डॉक्टरांनी

छान आहे! म्हणणं त्याहून सुंदर असतं.

मैत्र हो स्वतःची काळजी घ्या ; निरोगी रहा.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आज आकाशात एक काळा ढग दिसला… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ आज आकाशात एक काळा ढग दिसला ☆ संगीता कुलकर्णी ☆

आज सकाळी नेहमीप्रमाणे गॅलरीत उभी राहून मी आकाशाकडे पाहत होती… उन्हाळ्याची तीव्रता अजूनही वातावरणात जाणवत होती. सूर्याने आपले प्रखर तेज सर्वदूर पसरवले होते आणि निळ्याशार आकाश निरभ्र दिसत होते. झाडांची पाने निश्चल होती… पक्ष्यांचा किलबिलाटही मंदावला होता आणि धरती जणू एखाद्या दीर्घ प्रतीक्षेत मग्न होती… अशा शांत आणि स्थिर वातावरणात माझी नजर अचानक आकाशाच्या एका कोपऱ्याकडे वळली. तिथे एक काळा ढग दिसला.

तो ढग आकाराने फार मोठा नव्हता परंतु त्याच्या अस्तित्वाने संपूर्ण आकाशाचे स्वरूप बदलून गेले होते. अथांग निळाईच्या मध्यभागी तो एखाद्या कवीच्या अंतर्मनातील गूढ भावनेप्रमाणे तरंगत होता… त्याचा काळसर रंग आकाशाच्या शुभ्रतेशी एक सुंदर विरोधाभास निर्माण करीत होता. त्याच्या कडा सूर्यकिरणांनी उजळल्या होत्या त्यामुळे त्या ढगाभोवती एक प्रकारचे तेजस्वी वलय निर्माण झाले होते… तो ढग पाहताना असे वाटत होते की निसर्गाने आपल्या विशाल कॅनव्हासवर एक अर्थपूर्ण रेषा उमटवली आहे.

वाऱ्याची मंद झुळूक वाहू लागली आणि तो ढग संथ गतीने पुढे सरकू लागला. त्याच्या हालचालींमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता. तो कुठल्याही घाईत नव्हता जणू त्याला आपल्या प्रवासाचे उद्दिष्ट माहीत होते. त्या काळ्या ढगाकडे पाहताना माझ्या मनात अनेक विचार उमटू लागले… जीवनातही काही प्रसंग असेच अचानक समोर येतात.. ते सुरुवातीला काळ्या ढगांसारखे वाटतात परंतु त्यांच्याच आगमनातून नव्या शक्यता निर्माण होतात…

तो ढग पाहताच बालपणीच्या आठवणी मनात तरळू लागल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला आकाशात असेच काळे ढग जमले की आम्ही मित्र मैत्रीणी आनंदाने घराबाहेर पळत असू… पहिल्या सरीची आतुरतेने वाट पाहत असू… पावसाच्या पाण्यात कागदी होड्या सोडणे, चिखलात खेळणे आणि आईच्या हाकेकडे दुर्लक्ष करून भिजत राहणे हे सारे क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहिले. त्या एका ढगाने स्मृतींच्या दालनातील कितीतरी बंद दरवाजे उघडले होते.

काळा ढग हा केवळ पावसाचा सूचक नसतो तो आशेचा संदेशवाहक असतो. उन्हाने करपलेल्या धरतीला तो नवजीवनाची हमी देतो. शेतकऱ्याच्या डोळ्यांतील प्रतीक्षेला तो अर्थ देतो. कोरड्या विहिरी, तहानलेली झाडे आणि उष्णतेने व्याकूळ झालेली सृष्टी त्याच्या आगमनाने सुखावते. म्हणूनच त्या ढगाकडे पाहताना मला वाटले की निसर्गातील प्रत्येक गोष्ट माणसाला काहीतरी शिकवत असते. कठीण परिस्थिती कितीही दीर्घकाळ टिकली तरी तिचा अंत निश्चित असतो.

थोड्याच वेळात त्या ढगाने आकाशात आपला विस्तार वाढवला. त्याच्या सावलीने परिसरातील प्रकाश मऊ झाला. वातावरणात गारव्याची चाहूल लागली. झाडांच्या पानांत कुजबुज सुरू झाली. पक्षी अधिक चैतन्याने उडू लागले. जणू संपूर्ण निसर्ग त्या ढगाच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. त्यावेळी मला जाणवले की परिवर्तनाची सुरुवात अनेकदा अशाच सूक्ष्म संकेतांनी होत असते. एका छोट्याशा ढगातून मोठ्या वर्षावाची शक्यता दडलेली असते.

आज आकाशात दिसलेल्या त्या काळ्या ढगाने मला जीवनाचे एक सुंदर तत्त्व शिकवले. बाह्यतः काळोख वाटणाऱ्या गोष्टींच्या अंतरंगातही सृजनाची शक्ती दडलेली असते. काळा ढग दिसतो तेव्हा आपण पावसाची आशा करतो त्याचप्रमाणे संकटे आली की त्यातून उगवणाऱ्या नव्या संधींचीही अपेक्षा ठेवली पाहिजे कारण निसर्गाप्रमाणेच जीवनातही प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो… प्रत्येक प्रतीक्षेनंतर आनंद येतो आणि प्रत्येक काळ्या ढगानंतर जीवनदायी पाऊस बरसतो त्यामुळे आज दिसलेला तो एकमेव काळा ढग माझ्यासाठी केवळ निसर्गदृश्य नव्हता तर आशा, परिवर्तन आणि नवचैतन्य यांचे सुंदर प्रतीक होता…

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोपामिन ट्रॅप (The Dopamine Trap) भाग – २ – लेखक : डॉ. एन. जी. उकडगावकर ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ डोपामिन ट्रॅप (The Dopamine Trap) भाग – २ – लेखक : डॉ. एन. जी. उकडगावकर ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

(ज्या मेंदूला एकेकाळी शिकवायला आवडायचे, त्याला आता टाळ्यांचे व्यसन लागले होते.

श्रीमंत उद्योगपती त्याला निधी पुरवत होते, राजकारणी त्याचा प्रभाव शोधत होते आणि मीडिया त्याची पूजा करत होता.) 

इथून पुढे – – 

त्याला शिक्षणाचे नाही, तर शिक्षणातून निर्माण झालेल्या प्रसिद्धीचे व्यसन लागले होते.

एका सकाळी दोन्ही माणसांना एकाच आवाजाने जाग आली—दरवाजावर पडलेली जोरात थाप.

अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी (Enforcement Officers) विक्रमच्या महालात आणि समीरच्या कॉर्पोरेट मुख्यालयात एकाच वेळी प्रवेश केला.

टीव्ही चॅनेल्सवर ओरडून सांगितले जात होते, “मोठे छापे”, “काळा पैसा” आणि “फसवणुकीचे जाळे उघड. “

लपवलेले लॉकर्स समोर आले, रोख रकमेचे डोंगर दिसू लागले आणि सर्वत्र गुन्हेगारीची कागदपत्रे बाहेर आली.

रोहनने मऊ आवाजात विचारले, “त्यांना पकडले जाण्याची भीती वाटली नाही का?”

डॉ. देशमुख दुःखाने हसले.

“व्यसन भविष्यातील परिणामांचा विचार करण्याची क्षमता दाबून टाकते. जेव्हा डोपामिनची लालसा जुनी (Chronic) होते, तेव्हा मेंदू भविष्यातील परिणामांपेक्षा तात्कालिक बक्षिसाला जास्त महत्त्व देऊ लागतो. म्हणूनच व्यसनी लोक शेवटी करिअर, कुटुंबे, प्रतिष्ठा आणि काहीवेळा संपूर्ण देश उद्ध्वस्त करतात. “

काही महिन्यांनंतर विक्रम तुरुंगात एकटाच बसला होता. तिथे कोणतेही टीव्ही कॅमेरे नव्हते, राजकारणी नव्हते, अनुयायी नव्हते आणि हार नव्हते, फक्त शांतता होती.

तब्बल वर्षांनंतर त्याच्या मेंदूला ‘विथड्रॉल’चा (Withdrawal) सामना करावा लागत होता—सत्तेचा विथड्रॉल, प्रसिद्धीचा विथड्रॉल आणि विलासितेचा विथड्रॉल.

त्याच्या मनामध्ये जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या—त्याचे गरीब गाव, त्याच्या वडिलांचे बलिदान आणि त्याचे सुरुवातीचे आदर्श.

त्याच्या डोळ्यातून हळूहळू अश्रू वाहू लागले.

दुसऱ्या एका कैद्याने उपहासाने विचारले, “कलेक्टर साहेब, कुठे गेली तुमची सत्ता?”

विक्रमने खाली पाहिले.

एक भयानक सत्य त्याच्या मनात अचानक प्रकाशून गेले—त्याने सत्तेवर कधीच नियंत्रण ठेवले नव्हते, तर सत्तेनेच त्याला नियंत्रित केले होते.

बाहेरचा पाऊस थांबला होता. रोहन बराच वेळ शांत राहिला. शेवटी त्याने विचारले, “समाज हे व्यसन थांबवू शकतो का?”

डॉ. देशमुख हळूहळू एका मोठ्या लाकडी कपाटाकडे गेले आणि त्यांनी एक निळी फाईल काढली, ज्यावर शीर्षक होते:

ब्रेन जिम्नॅशियम प्रोजेक्ट (Brain Gymnasium Project)

रोहनने कुतूहलाने त्या फाईलकडे पाहिले.

“हे काय आहे?”

वृद्ध न्यूरोलॉजिस्ट हलकेच हसले.

“हे, ” ते मऊ स्वरात म्हणाले, “येणाऱ्या महामारीपासून मानवता स्वतःचे रक्षण करू शकणाऱ्या मोजक्या मार्गांपैकी एक असू शकते. “

ते पुन्हा खाली बसले आणि बोलू लागले.

“शताब्द्यांपासून आपण शरीरासाठी व्यायामशाळा (Gymnasiums) बांधल्या. आपण स्नायू मजबूत केले, स्टॅमिना वाढवला आणि शारीरिक सहनशक्ती विकसित केली, परंतु आपण लोभ, फेरफार (Manipulation), भावनिक आवेग, अहंकार आणि विनाशकारी लालसेविरुद्ध मेंदूला मजबूत करण्यासाठी कधीही यंत्रणा तयार केली नाही. “

रोहन शांतपणे ऐकत होता.

डॉ. देशमुखांनी फाईल उघडली. आत मेंदूचे नकाशे आणि आकृत्या होत्या.

“समस्या ही आहे, ” ते म्हणाले, “की मानवी संस्कृती बौद्धिकदृष्ट्या प्रगत झाली आहे, परंतु भावनिकदृष्ट्या अप्रशिक्षित राहिली आहे. आपण मुलांना स्पर्धा कशी करावी, कसे यशस्वी व्हावे, कसे कमवावे, परीक्षांवर कसे वर्चस्व गाजवावे आणि कसे प्रसिद्ध व्हावे हे शिकवतो, परंतु आपण त्यांना इच्छेवर नियंत्रण कसे ठेवावे, अपयश कसे सहन करावे, प्रलोभनांचा प्रतिकार कसा करावा, डोपामिन-प्रेरित आवेगांवर कसे नियंत्रण ठेवावे आणि यशानंतरही मानसिकदृष्ट्या स्थिर कसे राहावे हे कधीच शिकवत नाही. “

त्यांनी मेंदूच्या आकृतीकडे बोट दाखवले.

“प्रिफ्रंटल कॉर्टेक्स ही मेंदूची ‘नैतिक ब्रेक सिस्टीम’ आहे, तर लिंबिक रिवॉर्ड सर्किट्स हे ‘अ‍ॅक्सिलेटर’ आहेत. अनेक यशस्वी लोकांमध्ये अ‍ॅक्सिलेटर खूप शक्तिशाली होतो, तर ब्रेक सिस्टीम कमकुवत राहते आणि हा असमतोल धोकादायक व्यक्तिमत्त्वे निर्माण करतो. “

रोहनने शांतपणे विचारले, “आणि ‘ब्रेन जिम्नॅशियम’ हे दुरुस्त करते?”

“हो, ” डॉक्टरांनी उत्तर दिले. “तीच तर मूळ कल्पना आहे. “

ते हळूहळू पुढे सांगू लागले.

“जरा विचार कर, जर शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय अकादमी, राजकीय संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि अगदी कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्येही संरचित न्यूरोकोग्निटिव्ह (Neurocognitive) प्रशिक्षण सुरू केले—कोणतीही धार्मिक प्रवचने किंवा नैतिक पोलिसांसारखी जबरदस्ती नाही, तर पूर्णपणे वैज्ञानिक मेंदूचे प्रशिक्षण. “

रोहनचे डोळे कुतूहलाने बारीक झाले.

“कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण?”

डॉ. देशमुखांनी शांतपणे उत्तर दिले.

“‘ब्रेन जिम्नॅशियम’मध्ये आवेग-नियंत्रण व्यायाम (Impulse-control exercises), विलंबित समाधान प्रशिक्षण (Delayed gratification training), सजगता कन्डिशनिंग (Mindfulness conditioning), सहानुभूती वाढवणारे मॉड्यूल्स, नैतिक संघर्षाचे सिम्युलेशन, भावनिक लवचिकता व्यायाम, आत्म-जागरूकता देखरेख, डिजिटल व्यसन नियमन आणि वर्तनात्मक न्यूरोसायन्सद्वारे संज्ञानात्मक पुनर्रचना यांचा समावेश असेल. ध्येय साधे असेल—प्रलोभनाने मेंदूला हायजॅक करण्यापूर्वी मेंदूला मजबूत करणे. “

रोहन विचारमग्न झाला.

“म्हणजे ब्रेन जिम्नॅशियम लसीकरणासारखं (Vaccination) काम करेल?”

वृद्ध न्यूरोलॉजिस्ट हसले.

“अगदी बरोबर. प्रत्येक संसर्ग पूर्णपणे रोखता येत नाही, परंतु प्रतिकारशक्ती नक्कीच वाढवता येते. “

ते पुढे म्हणाले.

“जेव्हा वारंवार संज्ञानात्मक (Cognitive) प्रशिक्षण फ्रंटल लोब सर्किट्सना मजबूत करते, तेव्हा व्यक्तींमध्ये आवेगांवर उत्तम नियंत्रण, सुधारित भावनिक नियमन, सक्तीची लालसा कमी होणे, मजबूत नैतिक निर्णयक्षमता आणि सामाजिक फेरफारांविरुद्ध जास्त प्रतिकारशक्ती विकसित होते. न्यूरोप्लास्टिसिटी (Neuroplasticity) स्वतः या शक्यतांना पाठिंबा देते, कारण मेंदूला प्रशिक्षित केले जाऊ शकते. “

खोलीत शांतता पसरली होती.

आता फक्त घड्याळाचा टिक-टिक आवाज ऐकू येत होता.

डॉ. देशमुख आपल्या खुर्चीवर मागे टेकले.

“आजचा समाज अति-उद्दीपनाचा (Hyperstimulation) उत्सव साजरा करतो. सोशल मीडिया सतत डोपामिनचे इंजेक्शन देत असतो, न्यूज चॅनेल्स केवळ प्रसिद्धीला मोठे करतात, राजकीय व्यवस्था फेरफार करणाऱ्यांना बक्षीस देते, कॉर्पोरेट व्यवस्था आक्रमकतेला प्रोत्साहन देते आणि शैक्षणिक व्यवस्था भावनिक परिपक्वतेशिवाय केवळ कामगिरीला (Performance) महत्त्व देते. “

त्यांनी एक मोठा श्वास घेतला.

“आपण भावनिकदृष्ट्या कमकुवत नियंत्रण यंत्रणा असलेले, बौद्धिकदृष्ट्या शक्तिशाली मेंदू तयार करत आहोत. “

रोहनने हळूच टीव्ही स्क्रीनकडे पाहिले ज्यावर अजूनही भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या ठळक बातम्या फ्लॅश होत होत्या.

“तर मग या अटक झालेल्या घटना वेगवेगळ्या किंवा वेगळ्या स्वरूपाच्या नाहीत?”

“नाही, ” डॉक्टरांनी शांतपणे उत्तर दिले. “ही लक्षणे आहेत, एका अति-उद्दीपित संस्कृतीची (Overstimulated civilization) लक्षणे. “

त्यांनी आपली वही उघडली आणि तीन शब्द लिहिले:

पैसा, सत्ता, प्रसिद्धी.

त्यानंतर त्यांनी खाली लिहिले:

डोपामिन.

काही क्षणांनंतर त्यांनी आणखी एक ओळ जोडली:

ब्रेन जिम्नॅशियम — प्रलोभनाचे व्यसन बनण्यापूर्वी मेंदूला मजबूत करणे.

रोहन त्या वाक्याकडे शांतपणे पाहत राहिला.

वृद्ध न्यूरोलॉजिस्ट कमी आवाजात बोलले.

“संस्कृती हुशारीच्या अभावामुळे कोसळत नाही, तर हुशारी जेव्हा लालसेची गुलाम बनते तेव्हा कोसळते. “

त्यांनी वही हळूवारपणे बंद केली.

“आणि सर्वात धोकादायक व्यसने ती असतात, ” ते म्हणाले, “ज्यांचा समाज ते वाढत असताना कौतुक करत असतो. “

समाप्त –

लेखक : डॉ. एन जी उकडगावकर, न्यूरोलॉजिस्ट 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ २१ जून… “जागतिक संगीत दिन”… ☆ मंजुषा सुनीत मुळे  ☆

मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ २१ जून… “जागतिक संगीत दिन” ☆ मंजुषा सुनीत मुळे 

संगीत म्हणजे जगभरातल्या कुठल्याही संवेदनशील माणसाच्या आत्म्याला स्पर्श करणारी एक अमूर्त भावना… संगीत म्हणजे गायन-वादन-नृत्य यांचा जणू त्रिवेणी संगम.. हीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि संगीत व कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी ‘ जागतिक संगीत दिन ‘ साजरा केला जातो. आणि सगळ्या संगीतप्रेमींना स्वरमयी शुभेच्छा दिल्या जातात

‘जागतिक संगीत दिन‘ हा केवळ एक उत्सव नसून संगीताच्या वैश्विक भाषेला जागतिक पातळीवर दिला जाणारा सन्मान आहे. याचं कारण म्हणजे माणूस आणि संगीत यामधलं अतूट नातं. माणूस आनंदी असतो तेव्हा गातोच, पण दु:खी असतो तेव्हाही शांत हळवे सूर त्याचं मन शांत करू शकतात. संगीत कानांना तर आनंद देतंच पण त्याआधी ते सप्तसूर मनाला जणू साक्षात भिडतात. म्हणूनच मानवी जीवनात संगीताला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आणि म्हणूनच आता अनेक आजारांवरही ‘ म्युझिक थेरपी ‘ एक परिणामकारक उपाय म्हणून वापरली जाते.

या विशेष दिनामागचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर — — हा दिन साजरा करण्याची कल्पना सगळ्यात आधी फ्रान्समध्ये १९८१ साली मांडली गेली. आणि २१ जून १९८२ रोजी फ्रान्सचे तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री मॉरीस फ्ल्यूरेट यांच्या पुढाकाराने आणि जॅक लंग यांच्या सहकार्याने फ़्रान्समध्ये ‘फेटे द ला म्युझिक‘ (Fete de la Musique) हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ही संकल्पना त्या देशात तर खूपच लोकप्रिय झाली, आणि काहीच दिवसात ती आधी संपूर्ण युरोपमध्ये आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. या दिवशी जगभरातले संगीतप्रेमी अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करतात.. अनेक देशांमध्ये संगीताच्या विविध शैली उलगडून दाखवणारे कार्यक्रम आयोजित करून जणू संगीताच्या ‘विविधतेचा सन्मान’ केला जातो. आणि यामागचा उद्देश एकच.. संगीताच्या माध्यमातून प्रेम, शांतता, आणि एकात्मकतेचा संदेश पोहोचवणे. आजच्या डिजिटल युगात तर यासाठी वेगवेगळे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत.

संगीताचे कुठल्याही माणसाला वैयक्तिक पातळीवर होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे सांगायचे तर – –

.. मन शांत होतं.. चिंता आणि मानसिक ताण कमी होतो … मेंदूच्या कार्यक्षमतेला नकळत चालना मिळते ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते … रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते … आणि एक वेगळा उपयोग म्हणजे आनंद, दु:ख, प्रेम अशासारख्या भावना व्यक्त करण्यासाठी हे एक प्रभावी साधन असते.

भारतापुरतं बोलायचं तर “ अभिजात शास्त्रीय संगीत “ ही भारताने इतर संपूर्ण जगाला दिलेली एक सुंदर आणि अनमोल देणगी आहे यात दुमत होणे शक्यच नाही. त्याबरोबरच आपल्याकडे भावसंगीत, भक्तीसंगीत, नाट्यसंगीत, सिनेसंगीत अशा विविध प्रकारातून आणि अनेकविध वाद्यांच्या उत्तम आणि सुरील्या वादनातून, संगीत रसिकांपर्यंत सतत पोहोचत असते. त्यामुळे ज्याला ज्या प्रकारच्या संगीताने आनंद मिळत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य लाभत असेल ते संगीत त्याच्यासाठी सदैव उपलब्ध असते ही विशेष म्हणावी अशी समाधानाची गोष्ट आहे.

सा रे ग म प ध नी सां.. हे संगीतातले सात स्वर… कुठल्याही प्रकारच्या संगीतासाठी आवश्यक असणारे.. किंबहुना संगीताचा अविभाज्य भाग असणारे … वेगवेगळ्या भाव-भावनांचा आविष्कार करणारे..

पण त्याव्यतिरिक्त हे सात सूर माणसाला वेगळाच एक संदेश देत असतात असे कुठेतरी वाचनात आले, जो संदेश प्रत्येकाने आचरणात आणला तर आयुष्य आणखी समृद्धच होईल असे खात्रीने वाटले..

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल असा तो संदेश असा – – –

  • सा – सतत “सा”वध असावे,
  • रे – आपली वाणी, बोलणे “रे”शमा सारखे मृदु असावे,
  • ग- कुठल्याही गोष्टीचा “ग”र्व नसावा,
  • म- “म”धुर शब्द- सुरांनी परमेश्वराची आळवणी करावी.
  • प- आपली वृत्ती “प”रोपकारी असावी.
  • ध -सतत ईश्वरनामाची कास “ध”रावी.
  • नि -“नि”त्य हरीकथा श्रवण करावी
  • सा – “सा”धक बनून गुरूभजनी रंगून जावे.

“ संगीत “ या अतुल्य देणगीची मुक्त हस्ते उधळण करणाऱ्या संगीत क्षेत्रातल्या सर्व कलाकारांना आणि सर्व संगीत-प्रेमींना या जागतिक संगीत-दिनाच्या मनापासून सप्तरंगी शुभेच्छा.

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares