मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: महाभारतातील अंबा ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

महाभारतातील अंबा ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

एक सूडाचा प्रवास महाभारतातील अंबेचे जीवन हा स्त्रीत्वाचा हुंकार आहे. दोन महापराक्रमी पुरुषांच्या अहंकारात तिच्या आयुष्याची माती झाली तिच्या जीवाची प्रचंड तगमग झाली आणि सूडा कडे प्रवास सुरू झाला.

खरंतर ती काशीराजाची प्रेमळ सुस्वरूप हुशार कन्या. तिला अंबिका आणि अंबालिका नावाच्या दोन बहिणी होत्या.तिघी  वयात येताच काशीराजाने त्यांचे स्वयंवर मांडले. त्यात भीष्म व त्यांचा सावत्रभाऊ विचित्रवीर्य यांना जुन्या वितुष्टामुळे आमंत्रण नव्हते. भीष्मांना खूप राग आला आणि ते स्वयंवर स्थळी आले. त्याच वेळी सौबल चा राजा शाल्व याला अंबेने माळ घातली. चिडलेल्या भीष्माने तिथे सर्व राज्यांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला आणि अंबा ,अंबालिका, आणि अंबिका या तिघींचे हरण करून, रथात घालून ते आपल्या नगरीत परत आले. व आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य यांच्याशी लग्न करण्यास सांगितले. साहसी अंबेने  स्पष्ट सांगितले मला शाल्वाशीच लग्न करायचे आहे मी त्याला तन-मन-धनाने वरले आहे. तिच्या इच्छेनुसार भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. तो म्हणाला ” भीष्माने तुझे हरण केले. परपुरुषाच्या स्पर्शाने तू भ्रष्ट, पतित झाली आहेस. तुझा कौमार्य भंग झाला आहे.” असहनीय उपेक्षा आणि प्रेम भंगाचे दारुण दुःख घेऊन ती भीष्मा कडे परत आली. “तुम्ही मला पळवून आणलेत, आता लग्न करा. ज्या स्त्रीचे हरण झाले त्या स्त्रीला वडिलांचे दरवाजे बंद असतात.” असे म्हणाली. भीष्म म्हणाले  “मी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे “. बाणेदार आंबा म्हणाली,” मला तेच हवे. तुमची प्रतिज्ञा  मोडण्यासाठीच मी आले आहे. प्रतिज्ञा मोडलेल्या व्यक्तीला जीवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतात तीच पीडा मला तुम्हाला द्यायची आहे.”भीष्माने नकार दिला. आणि सूडाने पेटलेल्या अंबेने त्यांना धमकी दिली,” तुमच्या मृत्युचे कारण मीच असेन.” आणि वैफल्यग्रस्त होऊन ती जंगलात भटकत राहिली. तिथे तिला परशुराम ऋषींचा शिष्य होत्रवाहण भेटला. त्यांनी सांगितले भीष्माला किंवा शाल्वाला योग्य धडा शिकवण्याचे काम माझे गुरु करतील. त्याच्याबरोबर ती परशुराम ऋषींकडे आली व त्यांना म्हणाली,” मला न्याय हवाय. केवळ स्पर्शाने कौमार्य बाधीत होते तर आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घेतलेल्या भीष्माने कोणत्या अधिकाराने मला स्पर्श केला? परपुरुषाबद्दल अनुराग ठेवणारी स्त्री सर्पिणी  प्रमाणे विषारी असते आणि ती पूर्ण कुटुंबाचा घात करते असे म्हणून त्याने मला परत पाठवले याचा अर्थ काय? परशुराम खरं तर तिची समजूत घालत होते पण तिचा युक्तिवाद त्यांना पटला. तिला मदत करण्यासाठी त्यांनी भीष्माला बोलावले पण भीष्म आले नाहीत. परशुराम ऋषी खूप संतापले आणि तेच भिष्मा वर चाल करून गेले. दोघेही तुल्यबळ योद्धे. तेवीस दिवस घनघोर युद्ध झाले. दोघांनी महाभयंकर अस्त्रांचा मारा सुरू केला. आता पृथ्वीचा विनाश होईल या भयाने नारदादी देवांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवले. परशुरामाने तिला सांगितले आता मी तुला न्याय देऊ शकत नाही पण माझे गुरु आणि आराध्यदैवत भगवान महादेव यांच्याकडे तू जा. ते नक्कीच योग्य मार्ग दाखवतील. अंबेने अरण्यात घोर तपश्चर्या सुरू केली. गंगामातेने स्वतः तिची खूप समजूत घातली. पण अंबे ने जिद्द सोडली नाही. शेवटी शंकर प्रसन्न झाले पण ते म्हणाले या जन्मी  त्यांचा मृत्यु करता येणार नाही. पुढच्या जन्मी तुझ्यामुळेच त्यांचा मृत्यू होईल. अंबेने स्वतःच लाकडी चिता रचून त्यात उडी घेतली व आत्मसमर्पण केले.

पुढच्या जन्मी शिखंडी च्या रूपाने तिने द्रुपद राजाच्या घरी जन्म घेतला. महाभारताचे घनघोर युद्ध सुरू झाले. शिखंडी अर्जुनाचा सारथी होता. 18 दिवस घनघोर युद्ध झाले. पितामह भीष्मांनी पांडवांच्या सैन्याची धूळधाण उडवली. शिखंडीच्या आड लपून अर्जुनाचा रथ त्यांच्या समोर आला. शिखंडी ला पाहून मी महिलेविरुद्ध शस्त्र उचलत नाही असे सांगून भीष्मांनी आपली शस्त्रे खाली ठेवली ती संधी साधून अर्जुनाने मर्मी  घाव घातला आणि भीष्म धारातीर्थी पडले.

महाभारतातील सर्वात दाहक मृत्यू होता. अशाप्रकारे अंबेने आपला पण पूर्ण केला. अपमान आणि विटंबना असह्य झालेली एक स्त्री एका  महानायकाच्या मृत्यूचे कारण बनली. जन्मजन्मांतरीच्या सूडाची  कहाणी तिथली संपली पण तुमच्या आमच्या मनात ती सदैव घोळ तच राहणार. तिचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा, मनपसंत पती निवडण्याच्या स्त्री अधिकाराचा लढा आणि अन्यायाविरुद्ध सर्वस्व झोकून दिलेला लढा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व ज न ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ व ज न ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“मंत्री साहेबांनी ट्रस्टिंवर वजन टाकलं, म्हणून कामाचा ठेका मिळाला !”

वजन ! किती साधा, सरळ, कुठल्याही काना, मात्रा, वेलांटीच स्वतः वजन न वाहणारा शब्द !  पण तो उच्चारतांना आपल्याला त्याच वजन जाणवतं !

आता कुणा व्यक्तीच्या शब्दाला समाजात किती वजन आहे, हे माझ्या मते त्या व्यक्तीच्या समाजात असलेल्या खऱ्या, खोट्या प्रतिष्ठवर अवलंबून असतं ! अर्थात त्या व्यक्तीच्या शब्दाला ते वजन प्राप्त होण्यासाठी, तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांनी, स्वतःच वजन खर्च करून त्यांना त्या पदावर बसवलेलं असतं, हे आपण नंतर विसरूनच जातो ! कारण आपलं एखाद सरकारी किंवा दुसरं कुठलंही काम मार्गी लावण्यासाठी, त्या स्वतः वजनदार असलेल्या नेत्याने आपल्या शब्दाचे वजन टाकून ते काम करावं, असं आपलं स्वतःच तोळामासा वजन त्याच्यावर खर्च करून त्याला विनवणी करायची पाळी नंतर आपल्यावरच येते ! असा माझ्या सारखा अनुभव आपण पण घेतला असेल, हे मी आपल्यावर माझ्या शब्दांच कुठलंही वजन न टाकता, तुम्ही कबूल कराल !

मंडळी सध्याचा जमानाच वजनाचा आलाय त्याला कोण काय करणार ! म्हणजे असं बघा, आपलं एखाद काम होण्यासाठी कुणाचा कधी वजनदार शब्द कामी नाही आला, तर आपल्या अर्जावर काहीतरी वजन ठेवल्याशिवाय तो मंजूरच होतं नाही ! या बाबतीत अशा प्रसंगातून गेलेले काही वजनदार “पेपरवेटच” जास्त वजन, सॉरी प्रकाश टाकू शकतील !

माझ्या पिढीच्या लहानपणी जवळ जवळ प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर, एक किंवा दोन वजनं करायची मशीन्स असायची. त्या मशीनवर उभं राहून त्यात एक रुपयाचे एक नाणे टाकले, की आपलं वजन दाखवणार एक तिकीट त्या मधून बाहेर येत असे ! त्या तिकिटाची एक खासियत अशी होती की त्याच्या एका बाजूला वजन करणाऱ्या माणसाचं वजन आणि मागच्या बाजूला त्याच त्या दिवसाचं भविष्य एका ओळीत लिहिलेलं असायचं ! ह्या दोन्ही छापील गोष्टी कधीच बरोबर नसायच्या हा भाग निराळा ! हल्लीच्या काळातील जगभरातल्या कुठल्याही कसीनोत दिसणाऱ्या स्लॉट मशीनचा, ही वजनाची मशिन्स म्हणजे बाल्यावस्था म्हणायला काहीच हरकत नाही ! कारण दोन्ही मशिन्स लोकांना हातोहात फसवून फक्त पैसे गिळंकृत करण्यासाठी बनली आहेत, हे मोठेपणी उमगते ! पण तो पर्यंत आपले खिश्याचे वजन बऱ्या पैकी कमी झालेलं असतं !

आधुनिक सायन्स नुसार प्रत्येकाच्या उंचीच्या प्रमाणात त्याचे किंवा तिचे, किती वजन असावे याच एक कोष्टक ठरलेलं आहे ! पण कुणाचं शारीरिक वजन किती असावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं माझं वजनान हलकं फुलकं मत आहे ! माझ्या या हलक्या फुलक्या मताशी माझे काही वजनदार मित्र मैत्रिणी नक्कीच सहमत होतील, यात मला तिळमात्र (कारण तीळ सुद्धा वजनाने हलके फुलके असतात) शंका नाही ! कारण कसं असतं नां, शेवटच्या ‘महायात्रेचा’ प्रसंग वगळता, शेवटी प्रत्येकाला स्वतःच वजन स्वतःच आयुष्यभर स्वतःच्या दोन पायावर वहायचं असतं ! त्यामुळे दुसऱ्याच्या वजनाचा त्रास आपल्याला जाणवायच तसं काही कारण नाही म्हणा ! पण हां, एखादी व्यक्ती जर का चुकून माकून, काही कारणाने आपल्या अंगावर पडली आणि ती जर का आपल्या पेक्षा वजनाने भरभक्कम असेल तर ? तर फार तर फार काय होईल, आपली किती हाडं मोडायची शिल्लक राहील्येत, हे आपल्याला फक्त कुठला तरी चांगला ऑर्थोपेडीक डॉक्टरच त्याची वजनदार फी घेवून सांगू शकेल इतकंच !

सध्याची पिढी खूपच हेल्थ कॉनशस झाल्याच आपण बघतो आहोत ! वजन कमी करण्यासाठी निरनिराळी डाएटस करणं, जिम जॉईन करणं, असे प्रकार ही तरुणाईतली मंडळी आजकाल करत असते ! त्यातील किती टक्के तरुण, तरुणी आपल्या वजन कमी करण्याच्या ध्येयापर्यंत पोचतात हा मला एक न पेलवणारा वजनदार प्रश्न ! कारण कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यात सातत्य आणि चिकाटी लागते ! पण या मंडळींपैकी काही आरंभशूरांमुळे, निरनिराळ्या जिम चालवणाऱ्या लोकांना आणि डाएटीशीयन लोकांना जरा बरे दिवस येवून त्यांची आर्थिक वजनं वाढल्याचे सध्या ऐकून आहे ! या बाबतीत एक मजेदार गोष्ट मला आठवते.  एका माणसाजवळ एक गाईचे वासरू होते. त्या वासराचा  काही कारणाने एकदा एक पाय मोडतो. त्यामुळे त्या वासराला नीट चालता येईनासे होतं. म्हणून तो माणूस त्या वासराला नेहमी कुठंही उचलून घेऊन जात असे. काही महिन्यांनी त्या वासराची गाय होते, तरी तो माणूस तिला उचलूनच नेत असे ! आता असं बघा, जर का कोणी त्या माणसाला एकदम गाय उचलायला सांगितली असती, तर ते त्याला शक्य झालं नसतं ! पण रोजच्या सरावामुळे तो पुढील काळात रोज गाय उचलू शकला, एवढं मात्र खरं ! समझने वालोंको……..! असो !

नुकत्याच ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका वैज्ञानिक संशोधना नुसार, मुंगी हा जगातला असा एकमेव कीटक आहे, जो वेळ पडल्यास स्वतःच्या वजनाच्या सुमारे ५० ते ५०० पट वजन उचलू शकतो, असं सिद्ध केले आहे ! बापरे, ऐकावे ते नवलंच म्हणायचं आणि आपलं शाब्दिक वजन सोडा, पण निदान शारीरिक वजन तरी आपल्या उंचीनुसार आधुनिक सायन्सच्या कोष्टकाच्या जवळ पास मेंटेन कसं ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे मंडळी ?

शेवटी, आपले सगळ्यांचे शाब्दिक वजन लोकांच्या कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामासाठी, नेहमीच कामी येवू दे, अशी मी माझ्या पूर्ण सत्तर किलोच्या शारीरिक वजनाने त्या ईश्वराच्या चरणी दोन्ही हात जोडून प्रार्थना करतो !

शुभं भवतु !

 

ता. क. – सर्वार्थाने वजनदार व्यक्ती काही “लाख डॉलर्स” खर्च करून, स्वतःचे वजन एखाद्या पिसासारखेच आहे असं अनुभवण्यासाठी, नुकत्याच रिचर्ड ब्रॉनसन यांनी चालू केलेल्या वर्जिन गॅलेकटीक या कंपनी तर्फे अवकाशात भ्रमण करून, तसा फिल घेवू शकतात बरं का !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ -पदर- ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

? मनमंजुषेतून ?

☆ पदर ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

रविवार होता त्या दिवशी, मी प्रथमच पाहिले होते त्यांना..

त्या घरात प्रवेश करीत होत्या..आबांसोबत विवेक व विलासदादांसोबत..

पहायला आल्या होत्या त्या आमच्या बिंबाला–अदबीनं सावरत होत्या त्या– 

डोईवरला तो आपला पदर..!

 

मग पसंती..शकुनाची देणी-घेणी..वाडःनिश्चय-विवाहाची बोलणी

संबंधित नातेवाईकांची यादी– मी पाहिलं डोळ्यांच्या कडेनं,

जराशा झटक्यानंच लगबगीनं ओढून घेतला होता—

माईंनी तेव्हाही आपला पदर..!

 

नंतर आमंत्रणं..लगीनघाई–मिरवल्या होत्या मनसोक्त

थोरल्या लेकाच्या लग्नात..ठसक्यात,सासूबाईंच्या तोर्‍यात..

आठवणीत राहिला झळाळणारा—

तो रुंद काठाचा जरतारी पदर..!

 

ढग्यांची बिंबा आता राधिका झाली–

राधिका राधिका म्हणून माईंच्या सावलीत वावरू लागली..

मग सासूरवाशीणीला जवळचा,आधाराचा वाटला होता तो

माईंचाच…मायेचा पदर..!

 

अमळनेरच्या भल्या मोठ्या घरात–घर कसलं हो–चिरेबंदी वाडाच तो..

माणसांचा रगाडा..होता दबदबा–होते नोकर-चाकर फार–कधी शेतकामाचा भार

कामे वाटून सांगतांना..सूचना-सल्ले देतांना–खोचलेला असायचा

कमरेला तो माईंचा पदर..!

 

मग कधी समारंभ–पूजा-अर्चा..लग्न सोहळे–प्रसंगोत्तर माई भेटत..

दरवेळी वयाची बेरीज होतांना दिसलेल्या–काहीशा पाठीत झुकत चाललेल्या..

पण माईंच्या डोक्यावर डौलात दिसायचा मात्र..

तो सोनेरी भरजरी पदर..!

 

माईंच्या घट्ट बांध्याला, मोहक हसर्‍या गौरवर्णी रुपाला..

खानदानी घरंदाज व्यक्तिमत्वात भर घालणारा साजेसाच होता,

नेहमीच त्यांच्या डोईवरला तो पदर..!

 

लेका-बाळांच्या,सुना-नातवंडांच्या अखंड स्मरणात राहील

तो हरवलेला……तरीही ममतेचा वात्सल्याचा जिव्हाळ्याचा

माईंचा तोच मायेचा ऊबदार पदर..!!!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? क्षण सृजनाचे ?

☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे ☆  

दोनेक महिन्यापूर्वी मोहोराने भारलेले सातिवनाचे (सप्तपर्णीचे) डेरेदार वृक्ष आता मुंडावळ्यागत लोम्बणाऱ्या शेंगानी लगडलेत.  फळेच्छुक इतरही वृक्षवल्ली आपापल्या तान्हूल्या फळांचे लाड करतांना दिसताहेत.  वने आणि मने दोन्ही प्रफूल्लीत करणारी हि निसर्ग किमया आपसूकच कवितेत उतरते ती अशी

 

सप्तपर्णी

 

शेंगाळले सातिवन

वने झाली आबादान

रायवनातून घुमे

काक – कोकीळ कुंजन

 

कानी घुमतो पारवा

अंगी झोंबतो गारवा

गार गार वाऱ्यातून

मंद सुगंध वहावा

 

फुले कोमेजून आता

फळे सानुली रांगती

जंगलाच्या राऊळात

गोड अंगाई झडती

 

कोण फळानी बहरे

कोणी  लगडे शेंगानी

निसर्गाचं जसं देणं

घेई धरती भरुनी

 

भारावून वेडे पक्षी

गाती सुरात कवने

रानी वनि जणू भरे

गितस्पर्धा आवर्तने

 

मात करुनी असंख्य

निसर्गाच्या कोपांवर

दिसा मासी सावरे

धरणीमायेचा पदर

 

उठा आतातरी गेली

गत वरसाची खंत

घेऊ भरारी नव्याने

आसमंत ये कवेत.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई

मो 9755096301 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी 

नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” —–

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा——जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो. 

त्याला आपलं म्हणावं,— त्याला सख्ख म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामा नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्ख्य  नसते पथ्य असते.

 

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते— फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का —-

“ या या फार बरं झालं !” 

 

माहूरवरून रेणुका मातेचा, किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा, किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ?’ या ‘ म्हणून !

मग आपण का जातो ?— कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकटमुक्तीची आशा वाटते —-म्हणून ! – हा ही एक प्रकारचा ” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? 

किंवा आपण नेलेले तो काय घेतो ? —काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

“ किती जाड  झालीस ?  कशी आहेस ? सुकलेला दिसतोस, काय झालं ? “ 

—-नाही म्हणत.

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?– पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास, म्हणजेच ” आपलेपणा !”

 

हा आपलेपणा काय असतो ?—–

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ— भेटल्यानंतर बोलण्याची ओढ –-

बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ—- आणि निरोप घेण्याआधीच— 

पुन्हा भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं,  त्याला आपलं म्हणावं– 

आणि चुलत, मावस असलं, तरी सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..

म्हणजे  ” आपलेपणा ! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात,  आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात— 

तो आपला असतो —  ” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा,

 

ज्याला दुसऱ्यासाठी “सख्ख” होता येतं, त्यालाच कुणीतरी सख्ख असतं. 

बाकी फक्त परिचितांची यादी असते —-

नको असलेल्या माणसांची गर्दी असते !—-

 

तुम्हीच सांगा—–

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?—-

ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ?—- 

 

आता एक काम करा —–

करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची—- 

झालं नं मनात धस्स—- 

व्हायला लागली ना छातीत धडधड —-

नको वाटतंय न यादी करायला —-

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी— 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं—- कोणी कितीही झिडकारलं तरी— 

कारण —–

राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही —-

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं —–

 

म्हणून फक्त प्रेम करा !!  फक्त प्रेम करा !!.

 

संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे

? विविधा ? 

☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं नं…!

एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं!

मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!

दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!

रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!

घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात!! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही  मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!

शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं! ?

प्रस्तुती – मानसी आपटे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत- भाग- दुसरा … बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग दुसरा… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(‘तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या कुबड्या घ्याव्या लागतात’.) — इथून पुढे —– 

वस्तू जागच्या जागी हव्यात, अंधारातही हात घातला तर ती वस्तू तिथेच सापडली पाहिजे ‘ हे  बरोबरच आहे. पण कधी कधी पसाराही हवासा वाटायला लागला आहे. नाही, खरंतर कधीतरी आळस करणंही ठीक आहे हे पटायला लागलंय. 

ज्यांच्यावर जिवापलीकडे प्रेम केलं, आपल्या गरजा बाजूला ठेऊन, स्वतः पलिकडे जाऊन ज्यांच्यासाठी केलं ती माणसं आपली आठवणही काढत नाहीत हे बघून पूर्वी त्रास व्हायचा. नंतर नंतर बाबांच्या ‘ करावं आणि रस्त्यावर ठेवावं. नाही तर घेणाऱ्याच्या डोळ्यातली लाचारी आपला अहंकार फुलवते ‘ या वाक्याचा अर्थ कळला. खरंच आपण आदर, सन्मानाच्या आधीन होत जातो, demanding होत जातो. मग तो नाही मिळाला की त्रास होतो. आता सत्पात्री दानाबरोबरच गुप्त दानाचा अर्थ आणि त्यातला निरपेक्ष आनंदही कळलाय. कारण मदत आपण दिलीये हे नकळता मदत मिळाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या डोळ्यात आपली मदत घ्यावी लागल्याची लाचारी दिसत नाही. 

मी सहसा कुठल्याही भौतिक सुखात अडकणारी नाही. सकाळीच काय कित्येक दिवस चहा कॉफी नाही मिळाली तरी माझं डोकं दुखत नाही. हौसेनी जमवलेल्या क्रोकरी सेटमधलं काही फुटलं तरी समोरच्याला लागलं नाही न हे मला कायमच महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. असं कितीतरी. 

पण तीन मोह मात्र अजून सुटता सुटत नाहियेत. भाजी, क्रोकरी आणि पुस्तकं हे माझे weak points. कपड़े, दागिन्यांच्या दुकानात न्या, सहसा फरक नाही पडत. पण साठी झाली तरीही एकटी असून भाजीचा, घरात जागा नसूनही क्रोकरीचा आणि हातात मोबाईल असला तरी पुस्तकांचा नाद काही सुटता सुटत नाहिये. तो तेवढा कसा सोडवावा हे कळत नाहीये, खरं तर सोडावासा वाटत नाहीये. कारण तो निरुपद्रवी आहे. असो. ते एक माझ्या माणूस असण्याचं, जिवंतपणाचं लक्षणच समजू या. थोडक्यात स्वतः पलिकडे जाऊन दुसऱ्याला प्लीज करण्याच्या अट्टाहासातला फोलपणा लक्षात आला आहे. 

वादातला निरर्थकपणा लक्षात आलाय. कलेतल्या स्वानंदधनाचा ठेवा सापडलाय. त्यामुळे लोकं ज्या वयात हातातून सगळं निसटतंय म्हणून खंतावतात, त्या वयात मी आनंदी आहे. 

हे सगळं अंगी बाणताना त्रास झाला, हो झालाच. पण आज मागे वळून बघताना समाधान वाटतंय. कारण त्यानी मला जसं निर्माण केलंय त्या माझ्या अस्तित्वाशी मी प्रामाणिक आहे.  एवढंच नव्हे तर तर वेळोवेळी त्यात चांगल्या गोष्टींची भर घालत स्वतःला समृध्द करत जगतेय. उठसूट त्याच्याकडे मागण्या, तक्रारी घेऊन जात नाही. पण त्याला ‘Thank you’ म्हणायला मात्र कधीच विसरत नाही. 

आता निवृत्ती घेतेय म्हणजे सगळ्यातून संन्यास घेणार का? तर तसं मुळीच नाहीये. उलट काही बंधनं शिथिल करून मजेत आयुष्य जगणार आहे . गेली कित्येक वर्षं बंद केलेलं socialization परत सुरू केलंच आहे, ते वाढवणार आहे . ( पण कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतः पलिकडे जाऊन मदत करणार नाही ). मग टपरीवर वडापाव खाणं असो की five star मधे जाणं असो, की आप्त इष्ट जमवून, गप्पा छाटत, midnight snacks, चहा कॉफी घेत रात्रभर धमाल करणं असो.

कोणी सांगितलं. याच्याशी बोलू नको, अमुक करू नको, तर म्हणेन, तू सांगितलंस म्हणून बोलीन किंवा नाही बोलणार; करीन किंवा नाही करणार असं काहीही होणार नाहीये. कारण दोन्ही प्रकारात मी कुठे असेन? तुलाच किंमत दिल्यासारखं होईल. मला वाटेल तिथपर्यंत बोलीन, करीन, मला वाटलं की थांबीन.

तसंच, कोणाचा गैरसमज झालाय असं दिसलं तर २-३ वेळा स्वतःहून बोलायचा प्रयत्न करीन. त्यानंतर ‘Leave it, Forget it’.  मी कोणाला emotional blackmail केलं नाही, आणि आता मीही होणार नाही. अपना फंडा तो भई ‘ Live, and Let Live ‘. ‘ Enjoy and let Enjoy ‘ वाला है —–

समाप्त.

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

“प” माणसाला खूप प्रिय आहे,आपण जीवनभर या “प” मागे धावत असतो

जे मिळते तेही या “प” पासून आणि जे मिळत नाही तेही या “प” पासून

              प    पति

              प    पत्नि

              प    पुत्र

              प    पुत्री

              प    परिवार

              प  प्रेम

              प   पैसा

              प   पद 

              प प्रतिष्ठा

              प प्रशंसा

              प प्यार

              प पार्टी

              प परीक्षा

              प पब्लिसिटी

           

ह्या “प” मागे लागून लागूनच आपण “प” पासून पाप करत राहतो

आणि मग आपले “प” पासून पतन होते…

आणि शेवटी शिल्लक राहते फक्त  “प” पासून पश्चात्ताप…

पापाच्या  “प” मागे लागण्यापेक्षा सर्वात चांगले आपण  “प” पासून परमेश्वर च्या मागे लागावे आणि  “प” पासून पुण्य कमवावे 

शेवटी  “प” पासून प्रणाम—–

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषेचे वैविध्य ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

? विविधा ? 

☆ भाषेचे वैविध्य ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ‘ बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी झाली’. हा प्रकार बेळगावात नवीन नाही. ‘ बेळगाव म्हणजे कानडी व मराठी वादाची पेटती भट्टी आहे ‘ असं पु. ल. नेहमी म्हणायचे. पण त्या बातमीमुळे भाषेविषयी काही लिहावे असे वाटले.

दर वीस मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. ही भाषा म्हणजे मूळ भाषा नसून ती बोलीभाषा असते. फरक बोलीभाषेत असतो.मूळ भाषा एकच असते. काही शब्द वेगळे असतात, काही ठिकाणी उच्चार, हेल यात फरक असतो. बेळगाव मधे मराठी भाषिक खूप आहेत.पण त्यांची मराठी आणि महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी यात खूपच अंतर आहे. बेळगावात बोलल्या जाणाऱ्या मराठीवर कन्नड भाषेचा खूप प्रभाव आहे.

मराठी भाषेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाते ती भाषा, त्यातले हेल, उच्चार वेगवेगळे जाणवतात. पुण्यामधे साधारणपणे शुद्ध मराठी पहिल्यापासूनच बोलली जाते. सातारा, कोल्हापूर भागात वेगळेच टोन ऐकू येतात.सोलापूरची बोलीभाषा तर खूपच वेगळी आहे. त्यावर कन्नड आणि तेलुगू दोन्ही भाषांची छाप आहे.

शहरात आणि खेडेगावात तीच मराठी भाषा किती वेगळी वाटते. खेडेगावात तर असे काही शब्द वापरले जातात ते शहरातील लोकांना माहीतही नसतात. धुळे, नाशिक इथली बोली औरंगाबाद, किंवा एकूणच मराठवाड्यातील बोलीभाषा यात खूपच फरक आहे. खानदेशच्या भाषेवर तिथल्या स्थानिक अहिराणी भाषेचा जास्त प्रभाव आहे. ही अहिराणी भाषा गुजराती व मराठी यांचे मिश्रण आहे असे म्हणतात.विदर्भातल्या मराठी भाषेचा वेगळाच बाज आहे. मुंबईत हल्ली जी मराठी बोलतात तिच्यात निम्मे हिंदी , इंग्रजी शब्द घुसडलेले ऐकू येतात. शुद्ध पुणेरी मराठी असा लौकिक आजवर मिरवणाऱ्या पुण्यातल्या मराठी भाषेतही अलिकडे हिंदी इंग्रजी  प्रचुर शब्द येतात.

काळानुसार तर भाषेत फारच बदल होतात. प्रत्येक संतांच्या काळात जी जी बोली भाषा होती तीच त्यांच्या साहित्यातून प्रतीत झाली आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात खूप जण स्थलांतरित होतात. त्यांची भाषा कालांतराने बरीच बदलते.तिथल्या भाषेचे संस्कार या भाषेवर होतात. त्यांच्या भाषेच्या टोनमधे आपली मूळ भाषा बोलली जाते. तिकडून पुन्हा ते जेव्हा मूळ स्थानी येतात तेव्हा हा वेगळेपणा जास्त जाणवतो.एखादे मराठी कुटुंब काही कारणाने बरीच वर्षे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इकडे राहिले तर ते परत महाराष्ट्रात येतात ते तिकडच्या भाषेचे मिश्रण घेऊनच!! ही स्वाभाविक होणारी प्रक्रिया आहे.

आम्ही काशी, गया, प्रयाग , अयोध्या यात्रेला गेलो होतो. काही मराठी पुरोहित वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते मराठी बोलतात. पण ते अस्खलित मराठी वाटत नाही.तर त्यांच्या बोलण्यात हिंदीचा प्रभाव आहे. त्यात चूक काहीच नाही. एके ठिकाणचे गुरूजी आमच्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येत होते. ते पिढ्यानपिढ्या तिकडे राहतात. त्यातही ते मराठी भाषा विसरलेले नाहीत ही खूप मोठी जमेची बाजू आहे. हे त्यांचेच श्रेय आहे.

परवा एका टीव्ही चॅनल विषयी काही वाचनात आले.ते आहे तामिळनाडूचे! नाव आहे ” दक्षिणी मराठी” . त्या चॅनल वर ते माहिती देतात की, १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी अळगिरी नायक या राजाकडून तंजावर जिंकून घेतले.  साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी  अनेक मराठी सरदार, त्यांची घराणी तंजावर येथे नेली.  हे लोक तिथेच स्थायिक झाले. ते मराठीच बोलत असत. पण काही काळानंतर त्या मराठीवर तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृत भाषेचा शिवाय दक्षिण भारतातील  मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ या सर्व भाषांचा प्रभाव पडत गेला. ती तंजावर मराठी  या नावाने प्रसिद्ध झाली.  तीच त्यांची बोली भाषा बनली.

हे लोक अजूनही गुढीपाडवा, संक्रांतीला तिळगूळ घ्या गोड बोला,  अंबाबाईचा गोंधळ हे सण मराठी पद्धतीने साजरे करतात म्हणे! ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने आता बरेच लोक महाराष्ट्र, गुजरात, उत्तरेकडची राज्ये ,दिल्ली दक्षिणेत इतरत्र, एवढेंच काय पण परदेशातही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडू येथे या लोकांची संख्या कमी झाली आहे. पण ते तंजावर मराठीच बोलतात. ही मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे.. या दक्षिणी मराठी चॅनेल च्या माध्यमातून त्यांचा आपल्या मूळ मातीशी संबंध टिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक मराठी लोक आमचे चॅनल पाहतात. तुम्ही आम्ही एकच आहोत हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

भारतात, किंबहुना जगातही अशा काही मराठीपासून उत्पन्न झालेल्या भाषा असतीलच. त्यांच्या विषयी समजले तर अजूनच आपल्या ज्ञानात भर पडेल.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विसर्जन…सुभाष अवचट ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ विसर्जन…सुभाष अवचट ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

कुठे, केव्हा, कसे थांबावे ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते. कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात, कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते. माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला. स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्टय़ तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘‘गडय़ा, जगण्याची आतून उमेद राहिली नाही.’’ विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले. पु. ल. देशपांडय़ांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते..’’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘‘सकाळी काही घाई नाही.’’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते. ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे- जसे त्यांचे वाङ्मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली ! आता पुढे भेट शक्य नाही.’’

‘‘परदेशी चाललाय का?’’ मी विचारले.

‘‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला.’’ ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवडय़ात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning  करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, ‘‘ माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत !’’ त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत. जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू, प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

‘समतया वसुवृष्टि विसर्जनै:’—–

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो.. हे विसर्जन !

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

लेखक : – सुभाष अवचट 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares