☆ पंचमहाभूतांचे महत्व आणि ऊर्जा… ☆ विभावरी कुलकर्णी ☆
भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये संपूर्ण सृष्टीची निर्मिती पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू आणि आकाश या पाच घटकांपासून झाली असल्याचे मानले जाते. या घटकांना पंचमहाभूते म्हणतात. आपल्या शरीराचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन या पंचमहाभूतांच्या ऊर्जेवरच अवलंबून असते.
या प्रत्येक तत्त्वाकडून ऊर्जा मिळवणे, त्याचे महत्त्व आणि आपल्या जीवनात होणारा उपयोग खालीलप्रमाणे आहे
१. पृथ्वी तत्व (Earth Element)
पृथ्वी तत्त्व आपल्याला स्थिरता, पोषण आणि शारीरिक रचना प्रदान करते.
महत्त्व: आपल्या शरीरातील हाडे, स्नायू आणि ऊती (tissues) हे पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात. या तत्त्वाच्या संतुलनामुळे शरीराला स्थिरता आणि मानसिक शांती मिळते.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
अनवाणी पायांनी जमिनीवर किंवा गवतावर चालणे (Grounding/Earthing).
मातीच्या संपर्कात राहणे (उदा. निसर्गोपचारात मड थेरपी किंवा मातीचे लेप).
नैसर्गिक आणि सेंद्रिय अन्नाचे सेवन करणे.
उपयोग: शारीरिक थकवा दूर होतो, शरीरातील अतिरिक्त नकारात्मक ऊर्जा जमिनीत विसर्जित होते आणि हाडे मजबूत होतात.
२. आप/जल तत्व (Water Element)
जल तत्त्व हे प्रवाहीपणा, शुद्धता आणि भावनांचे प्रतीक आहे. मानवी शरीरात सुमारे ७०% भाग पाण्याचा असतो.
महत्त्व: शरीरातील रक्ताभिसरण, पचनक्रिया आणि पेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी जल तत्त्वाची ऊर्जा आवश्यक असते.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
पुरेशा प्रमाणात शुद्ध पाण्याचे सेवन करणे.
नदी, समुद्र किंवा पाण्याच्या नैसर्गिक स्रोताजवळ वेळ घालवणे.
जलचिकित्सा (Hydrotherapy) म्हणजेच योग्य तापमानाच्या पाण्याने स्नान करणे.
उपयोग: शरीरातील विषारी द्रव्ये (toxins) बाहेर पडतात, त्वचा सतेज राहते आणि मानसिक ताण कमी होऊन मन शांत राहते.
३. तेज/अग्नी तत्व (Fire Element)
अग्नी तत्त्व हे ऊर्जा, परिवर्तन आणि पचनाचे मुख्य स्रोत आहे.
महत्त्व: शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करणे (जठराग्नी) हे या तत्त्वाचे कार्य आहे.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे (सूर्यस्नान).
नियमित व्यायाम आणि योगासने करून शरीरातील उष्णता संतुलित ठेवणे.
दीपप्रज्वलन किंवा अग्निहोत्रासारख्या पारंपरिक पद्धती.
उपयोग: शरीराची चयापचय क्रिया (metabolism) सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि नैराश्य दूर होऊन उत्साह जाणवतो.
४. वायू तत्व (Air Element)
वायू तत्त्व हे गती, प्राण आणि विचारांचे प्रतीक आहे.
महत्त्व: श्वसनाद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवणे आणि प्राणशक्तीचा प्रवाह चालू ठेवणे हे वायू तत्त्वाचे काम आहे.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
मोकळ्या आणि शुद्ध हवेत दीर्घ श्वास घेणे.
प्राणायाम (जसे की अनुलोम-विलोम, कपालभाती) नियमित करणे.
निसर्गरम्य ठिकाणी किंवा बागेत वेळ घालवणे.
उपयोग: फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारते आणि मन एकाग्र होण्यास मदत होते.
५. आकाश तत्व (Space/Ether Element)
आकाश तत्त्व हे विस्तार, पोकळी आणि सजगतेचे प्रतीक आहे. इतर सर्व तत्त्वांना सामावून घेण्यासाठी आकाशाची गरज असते.
महत्त्व: शरीरातील पोकळी (उदा. कान, नाक, अन्ननलिका आणि पेशींमधील अंतर) आकाश तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. मनाची शांतता आणि आंतरिक जाणीव या तत्त्वावर अवलंबून असते.
ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:
ध्यान (Meditation) आणि मौन पाळणे.
अधूनमधून उपवास (Fasting) करणे, ज्यामुळे शरीरातील अवयवांना विश्रांती मिळते आणि पोकळी निर्माण होते.
शांत ठिकाणी बसून अथांग आकाशाकडे पाहणे.
उपयोग: मेंदूचे कार्य सुधारते, सर्जनशीलता वाढते आणि आंतरिक शांती मिळते.
आरोग्यासाठी पंचमहाभूतांचे एकत्रित महत्त्व
आपले शरीर हे या पाच घटकांचेच एक लहान स्वरूप आहे. जेव्हा या घटकांमध्ये असंतुलन निर्माण होते, तेव्हाच आपल्याला आजार किंवा मानसिक तणाव जाणवतो.
निसर्गोपचार (Naturopathy) आणि योगसाधना याद्वारे आपण या पाचही तत्त्वांची ऊर्जा ग्रहण करून स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवू शकतो. निसर्गाच्या जितके जवळ आपण राहू, तितकीच ही ऊर्जा आपल्याला सहज आणि प्रभावीपणे प्राप्त होते.
या पंचमहाभूतांकडून ऊर्जा मिळवण्यासाठी वेगळी मेडिटेशन असतात.
☆ “वयानुसार येणाऱ्या बदलांचा स्वीकार करा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक☆
☆
एका ६५ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले.
ऑपरेशन टेबलवर असताना तिला मृत्यूच्या अगदी जवळचा अनुभव (near-death experience) आला.
देवाला पाहून तिने विचारले: “माझी वेळ भरली आहे का?”
देव म्हणाला:
“नाही, तुला अजून ३३ वर्षे, २ महिने आणि ८ दिवस जगायचे आहे.”
सावरल्यानंतर, त्या महिलेने रुग्णालयातच राहून ‘फेस-लिफ्ट’, ‘लिपोसक्शन’, ‘ब्रेस्ट इम्प्लांट्स’ आणि ‘टमी टक’ (पोटाचा आकार सुधारण्याची शस्त्रक्रिया) करून घेण्याचा निर्णय घेतला.
तिने आपले केस रंगवून घेतले आणि दातही अधिक चमकदार करून घेतले!
आपल्याकडे जगण्यासाठी अजून खूप वेळ आहे, त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा, असे तिला वाटले.
तिची शेवटची शस्त्रक्रिया झाल्यावर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
घरी परतताना रस्ता ओलांडत असताना एका ॲम्ब्युलन्सच्या धडकेत तिचा मृत्यू झाला.
देवाच्या समोर पोहोचल्यावर तिने जाब विचारला:
“देवा, तू तर म्हणालास की मला अजून ३३ वर्षे जगायचे आहे? मग तू मला त्या ॲम्ब्युलन्सच्या मार्गातून का वाचवले नाहीस?”
देव उत्तरला:
“मी तुला ओळखलेच नाही…!”
म्हणून लक्षात ठेवा – वयानुसार येणाऱ्या बदलांचा आनंदाने स्वीकार करा (Grow old gracefully).
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जीवनात संवाद साधणं ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.संवाद बरेचदा दोन्हीकडून व्हावा लागतो. महाभारतातील उदाहरण द्यायचे झाले तर अर्जुन फार भांबावलेल्या अवस्थेत होता. ऐन युद्धाच्या वेळी त्याने धनुष्य खाली ठेवले होते पण जेव्हा त्याने आपला प्रिय सखा श्रीकृष्णाशी संवाद साधला त्यावेळी त्याच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या व तो युद्धास तयार झाला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जी गीता सांगितली तो एक अजरामर संवादच आहे.
संवादाचे अनेक प्रकार आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. कधी हा संवाद उपदेशात्मक असतो, कधी मनातील घालमेल दूर करणारा असतो, कधी आनंदाच्या लहरी पसरवणारा असतो तर कधी क्लेशदायक सुद्धा असतो. त्याला आपण विसंवाद किंवा वाद असेही म्हणतो. संवाद अनेक जणांमध्ये, दोघांमध्ये किंवा कधी कधी तर स्वतःशीच होतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपणासी
संवाद अनेक प्रकारे साधता येतो कधी लिहून, कधी डोळ्यातून, कधी स्पर्शातून तर कधी मौनातून सुद्धा.पण वाणीने केलेला संवाद अधिक प्रभावी ठरतो.काही वेळा असे होते की नात्यातील, मैत्रीतील हा संवाद काही कारणास्तव किंवा गैरसमज झाल्याने तुटतो आणि मनाला प्रचंड वेदना होतात. समोर असणाऱ्या व्यक्तीसोबत न बोलता अबोला धरणे, संवाद न करणे हे फार क्लेशदायक होते. कधी ते नाते पतीपत्नीचे असते, पालक मुलांचे असते तर कधी भावंडांचे असते तर कधी समाजातील इतर व्यक्तींचे असते. यामुळे फार मनस्ताप होतो त्याचे परिणाम नंतर शरीरावर देखील होतात.अनेक रोग निर्माण होतात. तिथे एक अदृश्य भिंत नकळत उभी राहते.अहंकार वाढतो. मी कमीपणा घेऊन बोलणार नाही, ही वृत्ती वाढते. पण याच वेळी जर कमीपणा घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तेच नाते पुन्हा बळकट होऊ लागते. थोडक्यात सांगायचे तर आपण समाजात कुटुंबात, सुसंवाद साधण्याचा नेहमीच प्रयत्न केला तर निश्चितच ते नाते अधिक निकोप होऊन आपण निश्चितच सुखी, आनंदी होऊ.
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
या गाण्याप्रमाणे आपल्या मनाचे आकाश पारदर्शी व मोकळे राहिल यात शंकाच नाही.
☆ आमची प्रतिज्ञा :: भारत माझा देश आहे!☆ शीला पतकी☆
☆
सातवीचे पुस्तक नवीन आहे म्हणून मी ते चाळायला घेतलं. पहिल्या पानावर नेहमीप्रमाणे प्रतिज्ञा …
आणि मला त्या पुस्तकातून प्रतिज्ञा बाहेर जाताना दिसायला लागली प्रतिज्ञेतल्या पानावरचा एकेक शब्द नाहीसा व्हायला लागला… सगळे अक्षर पुसट झाली…मी विचारले अग चाललीस कुठे? माझया प्रश्नावर प्रतिज्ञा म्हणाली नुसतं कागदावर राहण्याचा कंटाळा आला ग मला… उगाच ते तोंड हलवून म्हणणं … तो विचार ना मनात माझ्या डोक्यात… मग उपयोग काय माझा…? मी म्हणाले, ” असं का म्हणतेस आम्ही फार निष्ठापूर्वक म्हणून घेतले मुलांकडून” “हो पण मुलांनी कुठे म्हटलं …त्याने ते फक्त पाठ केलं रोज म्हणून अगदी मारुती स्तोत्र रामरक्षा सारखं …अर्थ काहीच ठाऊक नाही पण पाठ मात्र चोख!”
मी म्हणाले, ” असं काय म्हणतेस ग? त्यावर ती म्हणाली, ” बैस येथे मी तुला समजून सांगते हे पहा पहिली ओळ आहे ..भारत माझा देश आहे… ही जाणीव किती जणांना असते? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी तुम्हाला वाटतं आपण भारत देशाचे आहोत त्याच्या अलीकडे एक आठवडाभर ही सुरुवात असते. मेरे देश की धरती वगैरे सारखी गाणी लागतात. शहीद, भगतसिंग, देशभक्त, क्रांती, बॉर्डर असले सिनेमे टीव्ही वरती चालू राहतात …आठवडाभरानंतर सगळं संपत…
सारे भारतीय माझे बांधव आहेत अग घरातले भाऊ-बहीण घरातली सदस्य एका चौकोनी खोकड्यात बघत असतात. पलीकडच्या घरात कोण राहतो याची माहिती तुम्हाला नाही .त्याच्या सुखदुःखाशी तुमचं देणंघेणं नाही तुमच्या उंबर्या पलीकडचं जग तुम्हाला माहित नाही… त्यांच्याशी संवाद नाही. पलीकडे उत्तर हिंदुस्तानी आला तर तुम्ही म्हणता तो आपला नाही …सारे भारतीय बांधव कुठले तुमचे…? प्रांतरचनेवर तुमचे भांडण… बर आता ही ओळ बघ… माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे! यातल अर्ध वाक्य बरोबर आहे परंपरा समृद्ध आहेतच पण त्या अधिक समृद्ध करण्याचं काम तुम्ही केलेलं नाही. काही परंपरा तर ओंगळवाण्या केल्यात त्या परंपरांचे आधुनिकीकरण करताना त्याचे इव्हेंट केलेत. ओवाळून करायचे वाढदिवस मेणबत्ती विझवून आणि केक कापून करताय तुम्ही …हे म्हणजे आधुनिकीकरण नाही …गणपती उत्सवात मिरवणुकीत हिडीस प्रकाराने नाचता नृत्य करता… परंपरावादी माणूस तुम्हाला आऊटडेटेड वाटतो… आणि मुख्य म्हणजे परंपरा पाळा ना. आपल्या देवळात जाण्यासाठी काही नियम असतील तर ते पाळले पाहिजेत तिथे एखाद्या बाईने तोकडी पॅन्ट आणि वर एखादा तोकडा शर्ट घालून जाणे योग्य नाही त्याच्यावर तुम्ही आंदोलन करता बायकांनी तर पुरुषी होण्याची स्पर्धाच चालवली आहे बायकांनी पुढे जरूर यावं …सगळं शिकावं… सगळ्या गोष्टीआत्मसात कराव्यात, प्राविण्य मिळवावं पण बाईपण सोडू नये… परमेश्वराने दिलेली देणगी आहे ती!…ममता सामंजस्य ऋजूता वात्सल्य आणि अफाट सहनशक्ती कारण ती सृजनाची शक्ती आहे पण तुम्हाला तसं वाटत नाही पुरुषांशी बरोबरी करण्यात आणि त्यांच्यापुढे जाण्यात धन्यता… त्यामुळे खरंच कोणी सुखी नाही…ना पुरुष ना स्त्री ना कुटुंब आणि खरं सांगू का कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे तो तोच संकुचित होत चालला गाव गाड्या पासून वाड्या आल्या.. वाड्यापासून वस्त्या झाल्या ..गल्ली बोळ …छोट घर मोठ कुटुंब… मोठ्या कुटुंबाचे रूपांतर विभक्त कुटुंबात झाले आणि आता बहुतेक एकल कुटुंब होतील…!
” त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन “असं म्हणणारे तुम्ही त्या परंपरा मोडीत तरी काढताय किंवा त्याच आधुनिकीकरण करण्याच्या नादात विद्रुप पद्धतीने त्या बदलत आहात या परंपरांचे पाईक होण्यासाठी तुम्हाला पाईक या शब्दाचा अर्थ शोधावा लागतो. निष्ठेने एखादी गोष्ट पुढे नेणारा त्यावर श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट चालू ठेवणारा वारकरी सांप्रदायातली वारी परंपरा,
ती प्रथा पुढे नेत आहेत 700 वर्षाहून अधिक काळ झाला पण त्यात सुद्धा इव्हेंट आलाच. वारी कव्हर करणारे चॅनल, वारीच्या रस्त्यावर जाहिरातीचे बोर्ड लावणारे जाहिरात दार आले वारीत हौसे नवशे गवशे सगळे आले पण मूळ गरीब बिचार्या वारकऱ्यांनी आपली परंपरा सोडली नाही .
आता पुढची ओळ बघ “मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन” जरा पोरं मोठी झाली की पालकांचा चुका करण्यात सॉरी चुका दाखवण्यात ते पटाईत झालेत तुम्हाला हे जमत नाही तुम्हाला हे येतच नाही ते तुमच्या वेळेच आता जुना झालं वगैरे वगैरे… आई वडिलांना वाकून नमस्कार करणारी पिढी संपली, आता गुडघ्याला नमस्कार करतात. गुरुजनांचा तर विचारच नको त्यांना थोबाडीत मारेपर्यंत मजल गेली आहे मुलांची आणि ही दृश्य तुमच्या चित्रपटातही दाखवले जातात मुलांना बळ मिळतं त्यांना वाटतं आपणही असं करावं कारण त्याला कोणती शिक्षा होताना दाखवत नाहीत त्याचा बाप आमदार असतो खासदार असतो पैसा फेकला की पेपर मिळतो ऍडमिशन मिळते डिग्री मिळते त्याला ठाऊक झाले कारण हे असले महापाप करणारे प्रजाजन आपल्या देशात आहेत आणि तरुण मुलांची डोके भडकवणारे परदेशात बसलेत. देशाचा सर्वोच्च मानबिंदू आपले पंतप्रधान त्यांना सुद्धा जगातल्या वाईटात वाईट असलेल्या शब्दाने शिव्या देण्याचे काम करणारी पिढी… त्यांना ही प्रतिज्ञा शाळेत शिकवली नसेल का? ते कोणत सौजन्य दाखवत होते? ते कोणाच्या वयाचा मान नाही कोणाच्या पदाच मान नाही नाही… जेंडर डिफरन्स तर तुम्हाला मान्य नाही ठीक आहे पण तो तुम्ही अमान्य करून उपयोग नाहीये निसर्गाने तो फरक बनवलेला आहे पोर शेवटी बाईलाच होणार आहे आणि आई पण तुमच्याकडेच येणार आहे…! सौजन्याने वागणे यात पहिल्यांदा सौजन्य म्हणजे काय शिकवावे लागेल अशी अवस्था आली आहे. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे कोणती निष्ठा कोणावर दाखवत आहे या देशात राहून दुसऱ्या देशावर निष्ठा आहे तुमची प्रतिज्ञा.. या देशांमध्ये खूप आराजक आहे ..राजकारण फार आहे …पैसे फार मिळत नाहीत… जगण्यासाठी संघर्ष आहे… हे लक्षात घेऊन आपल्या ज्ञानाचा विकास करायचा या उदात्त हेतूने अन्य राष्ट्रात पलायन करणारी पिढी या राष्ट्राच्या मातीला विसरत चाललीये आई बापाला विसरलेली आहे ते दुःखी जीव पैशाचा समृद्ध लाटेवर अगतिकतेने जगताना पाहिल की वाईट वाटतं. बासरी वाजून उंदीर पळून लावणाऱ्या जादूगारासारखी आपली पोर इतर देशात पळवून नेलीत आणि त्यांचे आईबाप त्यांच्या प्रेमाला पारखे झाले… माता पिता गुरुजन वडीलधारी मंडळी हे सर्व शब्द आता डिक्शनरीत राहतील.
माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे हे प्रतिज्ञाचे शेवटचे वाक्य बघ …!देशभक्त हे शब्द हद्दपार झाले पूर्वी पत्रं यायची लोकांना तर मागे दे.भ. असे ती सर्वात मोठी डिग्री होती दे. भ. म्हणजे देशभक्त अमुक तमुक आता अशी डिग्री माग असणारा कोणी दिसतो का तुला? …डिगऱ्या सगळ्या पुढे आणि माणसं राहिली माग ..!आतंकवादी, चुकीचे काम करणाऱ्या असंख्य लोकांना आपल्या घरात असरा देणारी माणसं, चुकीच्या मार्गाने पैसे कमावणारी माणसं, देशाचा कर बुडवणारी माणसं, फुकट्या सवलती उपटणारी माणसं,
कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारे राजकारणी, लोकांची जीवाची पर्वा न करता बिल्डिंग बांधणारे कंत्राटदार, निसर्गाचा ऱ्हास करून बांधकाम उभे करणारे ठेकेदार, नद्याचा नाला करून नद्याच गायब करणारे जादूगार यांनी ही प्रतिज्ञा म्हणली नसेल का ग? हे सगळं विसरायला लावणारे वरवरचे शिक्षण काय उपयोगाचं..? शिक्षण आणि शिस्त रक्तात भिनली पाहिजे… असेल खूप काही चांगले घडत असेल मी नाही म्हणत नाही …पण अलीकडे देशात घडणारे अनेक प्रसंग पाहून उद्विग्नता आली आहे हे मात्र खरे…!
.. प्रतिज्ञे झालं तुझं सांगून… प्रतिज्ञा आता माझं ऐक .. एवढी निराश होऊ नकोस. देशासाठी गोल्ड मेडल मिळाल्यानंतर डोळ्यात घळाघळा पाणी आणणाऱ्या भारतीय महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जिंकण्याचा जल्लोष मातीवर डोकं टेकवून रडण्यात करणारी हीच मुलं आहेत. नवनवीन शोध लावणारी काळ्या आईत राबवून क***** बे भरवशाची शेती करणारी तरुण पोरं आहेतच की …रस्त्यावर चहाची गाडी लावून चहा विकून आपला उदरनिर्वाह करणारी …अशी स्वतःच्या उद्योगाची निर्मिती करणारी तरुण पोरं आहेतच ना …अनाथ आश्रम स्वतःहून चालवणारे समाजसेवक आहेत …वृद्धाश्रम श्रद्धेने चालवणारे समाजसेवक आहेत… गरिबांच्या पोरांना शिक्षणाबरोबर संस्कार मिळावा म्हणून मोफत शिकवणी घेणारे मास्तर अजून आहेत …अन्नदान करणारे आहेत, देहदान करणारे आहेत, रक्तदानकरणारेआहेत, …दुर्जनांच्या रांगेत जसे आहेत तसेच सज्जनांच्या रांगेतही खूप जण उभे आहेत रस्त्यावरच्या लेकराला उचलून आणून आपलं लेकरू म्हणून सांभाळणारी पाळणाघर आहेत ती चालवणार्या आया आहेत…! काळ्या, शेंबड्या पोराचा मुका घेणारी आई जोपर्यंत या देशात आहे ना तोपर्यंत इथली कुटुंब संपणार नाहीत… माया संपणार नाही …आणि संस्कार ही संपणार नाहीत..! क्लास वाले कितीही उदंड होत देत ज्ञानदान करणाऱ्या आणि संस्कार देणाऱ्या मातृभाषेतल्या शाळा टिकणार आहेत …तर तू अशी तुझं पान सोडून जाऊ नकोस शपथ आहे तुला… तीही एका शिक्षकाची…! तू सोडून गेलीस ना तर ही पिढी घडवणाऱ्या आम्हा सगळ्यांचा विश्वास संपेल!…जा परत जा पुस्तकाच्या पहिल्या पानावर विराजमान हो..तू ही रक्तात भिनशील … लक्षात ठेव…
मी डोळे पुसले आणि प्रतिज्ञा पुन्हा पानावर होती मी तिचे मोठ्यांदा वाचन करू लागले .. .. ..
☆ साता समुद्रापल्याडही शिवरायांचा जयघोष!☆ श्री संभाजी बबन गायके☆
☆
वीर सैनिक नामदेवराव रामजी जाधव!
इटली देशातल्या त्या नदीकाठाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव काही नवं होतं, असं नाही! सुमारे तीन शतकांपूर्वी इटलीत जन्मलेल्या निकोलाव मानुची नावाच्या एका सैनिक, तोफखाना तज्ज्ञ, वैद्यक तज्ज्ञ, प्रवासी लेखक माणसाने राजांविषयी Storia do Mogor या ग्रंथात मध्ये भरभरून लिहून ठेवलं होतं..आणि त्या गोष्टी या नदीच्या कानावर आल्या होत्याच! फक्त तिने त्या तीन अक्षरी मंत्राचा गगनभेदी जयघोष मात्र कधी ऐकला नव्हता…तो प्रसंग आज प्रत्यक्षात आकाराला आलेला होता!
रक्तबंबाळ अवस्थेत एक आधुनिक मावळा देहातील सर्व शक्ती एकवटून घोष करीत होता…बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! आणि काही क्षणांतच नदीच्या पलीकडच्या दरीतून प्रतिध्वनीही उमटू लागले…जय! जय! जय! आणि मग घटकाभरात मराठ्यांनी रणक्षेत्र काबीज केलं…इतिहासाची पुनरावृत्ती करावी ती शिवरायांच्या मावळ्यांनीच!
इंग्रज माणसं हेरण्यात पटाईत. त्यांनी काही शतकांपूर्वी छत्रपती ‘सिवाजी’ महाराजांच्या गनिमी काव्याचे जिवंत ‘काव्य’ अनुभवले होतेच. महाराजांना आणि पुढे छत्रपती संभाजी महाराजांना देवाचे अकालीच बोलावणे आले म्हणून इंग्रज बचावले. इंग्रजांनी भारतात अधिकृत राज्य स्थापन केल्यावर स्थानिक तरुणांना हाताशी धरीत सैन्य भरती केली. पण बंडाची शक्यता गृहीत धरत त्यांनी मराठयांचे मोठे दल उभारण्यात आखडता हात घेतला होता…कारण त्यांनी मराठ्यांच्या समशेरींचे पाणी चांगलेच चाखले होते. पण कालांतराने ब्रिटीशांना मराठा गडी यशाचा धनी! ही गोष्ट उमगली!
सहा वर्षी सुरु असलेलं दुसरं जागतिक महायुद्ध संपुष्टात येण्याच्या सहा महिने आधीची ही घटना. दोस्तांच्या फौजांना जगभरात बरेच ठिकाणी मोठे यश मिळू लागलेले होते. पण त्यांच्या इटलीमधील मोहिमेत एक मोठा अडथळा होता. सेनियो नदीचे सुमारे सहाशे किलोमीटर्सचे खोरे, त्यापुढील प्रचंड मोठा पठारी भूभाग ताब्यात आला असता म्हणजे जर्मन फौजांना आणखी मागे रेटता आले असते. आणि अर्थातच जर्मन सैन्य दोस्तांच्या फौजांना ही नदी ओलांडू देत नव्हते. सुमारे ९० किलोमीटर्स लांबीची ही नदी. एके ठिकाणी या नदीचे पात्र सुमारे १५ फूट रुंद होते. पाणी फार नव्हे, केवळ चार-पाच फूटच खोल होते. मात्र दोन्ही काठभले मोठे म्हणजे ३५ फुट उंचीचे होते. नदी ओलांडून जायला हाच एक मार्ग होता…आणि अर्थात इथेच जर्मनीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. मुळात दोस्तांच्या फौजांचा मार्ग जर्मनांनी आणि इटलीतील उंच पर्वत, द-या यांनी एक वर्षभर रोखून धरला होता..एकदा इथे विजय मिळाला असता म्हणजे जर्मनीचा पराभव निश्चित झाला असता.
पण इथेच जर्मनांची ‘गोथिक लाईन’ आडवी उभी होती. ३२० किलोमीटर्स लांबीचा हा आडवा अडथळा…हजारो बंकर्स, मशीन गन्स पोस्ट्स आणि भूसुरुंग असलेली भक्कम भिंतच जणू. ही भिंत फोडूनच पलीकडे Po Valley म्हणजे पो नावाच्या नदीचे खोरे गाठता येईल…आणि नेमके हेच कठीण होते. जर्मनांची अतिशय कुशल, सुसज्ज parachute units इथेच तर तैनात होती!
दोस्तांच्या फौजेतील ८व्या ब्रिटीश आर्मीसमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले होते…पण त्यांच्या समवेत होती ५वी मराठा लाईट इन्फंट्री. डोंगर-द-यातील गनिमी कावा युद्धनीती रक्तात भिनलेले गडी! महाराष्ट्रापासून सहा हजार किलोमीटर्स अंतरावर अत्यंत कठीण परिस्थितीत, विपरीत हवामानात, प्रचंड थंडीत मराठे लढत असले तरी जिद्द मात्र तसूभर कमी नव्हती. ‘आम्हांला या युद्धात मदत करा, आम्ही तुम्हांला स्वायत्तता प्रदान करू’ असे म्हणत ब्रिटीशांनी भारतीय शूरांना साद घातली होती. त्यामुळे या युद्धात विजय झाला तर भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग अधिक सुकर होणार…ही आशा होतीच…शौर्याला यावेळी एक निश्चित ध्येय होते!
निकराचा प्रयत्न म्हणून ब्रिटीश फौजेची पहिली तुकडी या नदीपात्रातून पुढे निघाली…आणि तिच्यावर तीन मशीनगन्स पोजिशन्स वरून प्रचंड गोळीबार झाला…दोन सैनिक आणि त्या सैन्यतुकडीचे कंपनी कमांडर वगळता इतर सर्व ठार झाले…आणि जखमी झालेले हे दोन सैनिक आणि कंपनी कमांडर पाण्यात कोसळले!
या तुकडीच्या अगदी मागोमाग आणखी एक तुकडी नदी पार करणार होती…५वी मराठा लाईट इन्फंट्री…या तुकडीत ‘रनर’ म्हणून एक मराठा गडी तैनात होता. घोडा, वाहन किंवा प्रसंगी पळत जाऊन सैन्य-तुकड्यांना लष्करी निरोपांची त्वरीत देवाण-घेवाण करणे हे रनर चे मुख्य काम असते. ते शस्त्रशिक्षित तर असतातच. युद्धात या रनर वर शत्रूचे खास लक्ष असते!
१८ नोव्हेंबर, १९२१ ची गोष्ट. आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज-वीरगाव या खेड्यात गरीब शेतकरी श्री.रामजी जाधवांच्या पोटी नामदेव जन्माला आले. अतिशय बारीक चणीचे पण तत्कालीन अंगमेहनती शेतकरी कुटुंबांतील अनेक तरुणांसारखे प्रकृतीने काटक असलेले नामदेवराव जात्याच चपळ, शूर आणि धाडसी होते. इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकणारा एक विषारी सर्प नामदेवरावांनी स्वत: हिंमत करीत मारल्याचे सांगितले जाते!
पुढील काळात जाधव कुटुंबास आणि नामदेवरावांना विविध कारणांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. शेतकरी असल्याने शेतमजुरी करावी लागली. बाल नामदेवराव त्यावेळी लोकांची जित्राबं अर्थात जनावरं चारायला नेण्याचे काम करीत रानोमाळ भटकत असत. या दरम्यान गावाजवळ असलेल्या नदीचे विस्तीर्ण पात्र एका दमात पोहत पार करणे आणि त्याच वेगाने माघारी येणे, हा त्यांचा नेहमीचा छंद होता!
त्या काळात लष्करात नोकरीच्या संधी सर्वाधिक असत. किंबहुना दुष्काळग्रस्त भागांतील अनेक तरुणांना लष्करातील नोकरी हा मोठा आधार वाटू लागला यात नवल नाही. शिवाय अंगभूत शौर्य गाजवण्याची संधी दुस-या कुठल्याही नोकरीत नव्हतीच. त्यामुळे नामदेवरावांनी ब्रिटीश फौजेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १९२१ मध्ये जन्मलेल्या या तरुणाने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षीच म्हणजे साधारणपणे १९३९ मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यातल्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये शिपाई म्हणून पाऊल ठेवले…दुसरे महायुद्ध याच वेळी सुरु झालेले होते!
आणि एकेदिवशी नियतीने महाराष्ट्रातल्या एक खेड्यात जन्मलेल्या नामदेव रामजी जाधव नावाच्या तरुणाला दूर इटली देशात लढायला धाडले…एक इतिहास घडणार होता!
९ एप्रिल, १९४५. मेजर विंटर, मेजर क्राफर्ड, मेजर व्हान इनगेन, मेजर हावर्ड इत्यादी अधिकारी हिटलर विरोधातील मित्र सैन्यात आघाडीवर होते. त्यांच्या सोबत.३/१५ पंजाब, १ जयपूर या सैन्य तुकड्याही होत्या. यात ५वी मराठा लाईट इन्फंट्रीही होतीच…आणि त्यांच्यावर भयावह हल्ला चढवला गेला…!
आपल्या पुढची तुकडी नामोहरम झालेली पाहताच…रनर नामदेवराव जाधव हातातली tommy gun सरसावत पाण्यात उतरले…कमांडर साहेबांना खांद्यावर घेतले…पाण्यात तीन बाजूंनी गोळीबार सुरु होताच…नदीकाठच्या भरावामध्ये ठिकठीकाणी सुरुंगही पेरून ठेवलेले होते…त्यातून वाट काढीत नामदेवरावांनी कमांडर साहेबांना एका काठावर सुरक्षित आणले. तोवर जर्मन सैन्याला अंदाज आला होता. त्यांनी आणखी जोरदार गोळीबार सुरु केला…पण नामदेवराव माघारी आले…त्यांनी आणखी एका जखमी सैनिकाला खांद्यावर घेतले…त्याच धोकादायक मार्गावर पुढे जात त्यालाही आणि त्यानंतर दुस-याही सैनिकाला काठावर नेऊन ठेवले…तीन जीव वाचवले त्यांनी!
एवढ्यावर थांबून त्यांना मागे पळून येता आले असते…पण नामदेवराव त्या पाण्यात पुन्हा उतरले…नामदेवराव सैन्यात रनर चे काम करीत असले तरी त्यांना गन्स चालवण्याचे कौशल्य हस्तगत होतेच…त्यांनी tommy gun हातात पेलली आणि त्या मशीनगन्स पोझिशिन्सला आपले लक्ष्य केले…एक एक करीत त्यांनी तिन्ही मशीनगन शांत केल्या…तोवर त्यांच्या हाताला गोळ्या लागून प्रचंड जखमा झाल्या…त्यांची पर्वा न करता त्यांनी जवळचे हातगोळे शत्रू सैनिकांवर फेकले…खंदकात लपलेल्या जर्मन सैनिकांना एवढा प्रतिकार केला जातो आहे, याचे आश्चर्य वाटत राहिले. जवळचे हातगोळे संपल्यावर नामदेवराव वेगाने पोहत या किना-यावर माघारी आले…आपल्या तुकडीतील सैनिकांकडून हातगोळे मागून घेतले…आणि पुन्हा जर्मनांच्या मागावर गेले! जन्मगावी मोठे खोल नदीपात्र एका दमात पोहणा-या नामदेवरावांना ही पाच सहा फूट खोलीची आणि पस्तीस एक फूट रुंदीची नदी अगदी सोपी होती…सोपं नव्हतं ते जर्मनांच्या गोळीबारातून निसटून जाणे…समोर मृत्यू उभा असताना धैर्य टिकवून ठेवणे…शारीरिक वेदना विसरणे आणि सैन्यधर्माला जागणे.
काहीच क्षण आधी त्या नदीच्या अल्याडच्या आणि पल्याडच्याही काठांनी शौर्य, हिंमत, पराक्रम, जिद्द, शर्थ या शब्दांचे जिवंत अर्थ अनुभवले होते..नामदेवराव त्या मरणाच्या वर्षावात त्या नदीचा तो चढ चढून वर टेकाडावर उभे राहिले…आणि मग त्या नदी काठच्या एका उंचवट्यावरून एक गगनभेदी गर्जना ऐकू आली…बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय!…सेनियो नदीने पहिल्यांदा हा गजर ऐकला असावा…तीन अक्षरी मंत्र…ज्याच्या उच्चाराने दगडांनाही जीभा फुटाव्यात! या आवाजाच्या दिशेने जर्मनांनी मोर्टार म्हणजे छोटे विस्फोटक डागायला सुरुवात केली…पण नामदेवराव मागे हटले नाहीत…छत्रपतींचे नाव ऐकताच मराठ्यांच्या रक्तातील शौर्याला पुन्हा एकदा बळ मिळाले…आणि डोळ्यांत आग आणि हृदयात राग असलेल्या मराठा सैनिकांचा एक मोठा लोंढा त्या नदीपात्रातून पलीकडच्या तीराकडे निघाला…पात्रातले पाणी लाल झाले…पण ती लढाई जिंकली गेली!
नामदेवरावांनी जणू एका भक्कम किल्ल्यालाच भगदाड पाडले होते…त्यातून पुढे जात दोस्तांच्या सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला…दुसरे महायुद्ध जिंकण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला…१ सप्टेंबर, १९३९ सुरु झालेले रोजी हे महायुद्ध २ सप्टेंबर, १९४५ रोजी अधिकृतरीत्या संपले…जर्मनी आणि तिच्या मित्रराष्ट्रांचा पराभव झाला हे जाहीर करण्यात आले!
सेनियो नदीच्या आसपास असलेल्या अनेकांनी नामदेवरावांचा पराक्रम उघड्या डोळ्यांनी पाहिला, अनुभवला होता. ते दोन जखमी सैनिक आणि कंपनी कमांडर तर केवळ नामदेवरावांच्या हिंमतीच्या बळावरच जिवंत राहू शकले होते. ब्रिटीश सैन्याधिका-यांनी शिपाई नामदेवराव जाधव यांच्या पराक्रमाची नोंद घेतली…आणि इंग्लंडला धाडली होती!
विक्टोरिया क्रॉस…ब्रिटनच्या राणी विक्टोरिया यांनी २९ जानेवारी, १८५६ रोजी हा सन्मान सुरु केला…ब्रिटीश सैन्यातल्या कोणत्याही दर्जाच्या, कोणत्याही दलाच्या कोणत्याही सैनिकाला, अधिका-याला, सैन्यदलासाठी काम करणा-या नागरिकाला हा सन्मान विशेष समारंभात इंग्लंड येथील बकिंगहम राजवाड्यात प्रदान केला जातो…हा इंग्लंडचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार मानला जातो!
१५ जून, १९४५ रोजी सैन्य शिपाई नामदेवराव जाधव यांना ‘विक्टोरिया क्रॉस’ साठी राजपत्रित केले गेले आणि पुढे एका विशेष समारंभात किंग जॉर्ज (सहावे) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला! इटलीतून सैन्यकर्तव्य यशस्वीरीत्या पूर्ण करून नामदेवराव जाधव सुट्टीसाठी गावी आलेले असताना एक विशेष घटना घडल्याचे सांगण्यात येते…त्यावेळी भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. दुस-या महायुद्धात विजयी झाल्यास ब्रिटीश भारताला मर्यादित स्वातंत्र्य देणार असल्याचे जगजाहीर होते. यामुळेच कित्येक तरुण सैन्यात भरतीही झाले होते.
ब्रिटीश लोक त्यांच्यासाठी लढलेल्या, विशेषत: विक्टोरिया क्रॉस विजेत्या सैनिकांविषयी विशेष सन्मान दर्शवतात, असे दिसून येते. यामुळेच भारताचे तत्कालीन Voiceroy Lord Mountbatten रेल्वे प्रवासात असताना श्रीरामपूर स्टेशनवरून पुढे जाणार होते. त्यांनी नामदेवरावांना स्टेशनवर सन्मानाने बोलावून घेत त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जाधव यांना “काही हवे आहे का? ” असे विचारताच जाधव साहेबांनी “कबूल केल्याप्रमाणे भारताला लवकर स्वातंत्र्य द्या!” असे म्हटल्याचे बोलले जाते…यातून नामदेवरावांचे देशप्रेमच दिसून आले!
भारतात परतल्यावर शिपाई नामदेवरावांना ३ सप्टेंबार, १९४६ रोजी लान्स नाईक, १२ फेब्रुवारी, १९४७ रोजी लान्स हवालदार या पदांवर पदोन्नती देण्यात आली. स्वतंत्र भारतीय सैन्याने त्यांना २८ ऑगस्ट, १९५१ रोजी प्रभारी हवालदार आणि पुढे ५ जानेवारी, १९५६ रोजी हवालदार पदावर बढती देत त्यांच्या कामाचा गौरव केला. नायब सुबेदार या पदावर असताना नामदेवराव सेवानिवृत्त होऊन गावी परतले! त्यांनी कमावलेली पदके हीच त्यांच्याकडे असलेली मोठी दौलत म्हणावी लागेल…इटली स्टार पदक, युद्धसेवा पदक, वुंड मेडल(युद्धात जखमी होऊनही शौर्य गाजवल्याबद्दल दिले जाणारे पदक!) इंग्लंडच्या राणीच्या राज्यारोहणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे गौरवचिन्ह (१९५३…राणी विक्टोरिया यांच्या हस्ते प्रदान)…आणि भारतीय सैन्याचे PVSM परम विशिष्ट सेवा मेडल! एवढं सर्व मिळवूनही नामदेवराव जाधव साहेब साधे आयुष्य जगले, हे विशेष. त्यांच्या पत्नी द्रौपदाबाई यांनी त्यांच्या शौर्याच्या कथा आठवणींत जपून ठेवल्या. त्यांच्या एकुलत्या एका कन्येच्या तीन पैकी एका मुलाने भारतीय सैन्यात, मराठा रेजिमेंटमध्ये प्रवेश मिळवून वारसा पुढे नेला आहेच. इतर नातू नामदेवरावांच्या नावाने समाजसेवी संस्था चालवत त्यांच्या स्मृती जागवत असतात.
एका बाबतीत परदेशी नागरीकांना मानले पाहिजे…ते सैनिकांचा पूर्ण आणि कायम आदर ठेवतात! नामदेवराव जाधव साहेब २ ऑगस्ट, १९८४ रोजी हे जग सोडून निघून गेले. पण तोपर्यंत त्यांना दर दोन वर्षांनी इंग्लंड येथे होणा-या विशेष समारंभास आठवणीने बोलावले जायचे.
सेनिओ नदीच्या काठी San potito येथे ९ एप्रिल, २०१७ रोजी तिथल्या महापौरांच्या हस्ते नामदेवरावांचे स्मारक उभारले गेले आहे. लंडन येथील Constitution Hill येथील Memorial Gates येथे नामदेवरावांचे नाव कोरलेले आहे.
इकडे भारतात पुण्याजवळच्या औंध लष्करी प्रशिक्षण केंद्रात ३१ जानेवारी, २०१९ रोजी नामदेवरावांचा अर्धपुतळा स्थापित करण्यात आला आहे.
‘विक्टोरिया क्रॉस’ प्राप्त केलेल्या सैनिकांचे अत्याधुनिक record ब्रिटीशांनी जपून ठेवले आहे. त्यासाठी विशेष अधिका-याची नेमणूक केलेली असते.The Victoria Cross Association हे विक्टोरिया क्रॉस जिंकलेल्या जगभरातल्या सैनिकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून असते. काही वर्षांपूर्वी ब्रिटीश उच्चायुक्तालयात लष्करी सल्लागार पदावर कार्यरत असलेल्या ब्रिगेडीअर इयान रीस यांनी दिल्ली ते अहिल्यानगर असा खास प्रवास करीत नामदेवरावांच्या पत्नी श्रीमती द्रौपदाबाई यांची सदिच्छा भेट घेतली होती.
२ ऑगस्ट, २०२६ ही परमवीर नामदेवराव रामजी जाधव यांची ४२वी पुण्यतिथी.
.. .. नामदेवरावांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय!
(विक्टोरिया क्रॉस विजेत्या मराठा सैनिकांमध्ये नाईक यशवंतराव घाडगे यांचे नावही आदराने घेतले जाते. यशवंतरावांनी १० जुलै, १९४४ रोजी दुस-या महायुद्धात भीमपराक्रम करून दाखवला होता!)
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९३ आणि ९४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९३ – –
जगी पाहता देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्त्वता सार चिंता ।
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पा रे तुझे काय वेचें ।।९३।।
अर्थ :खरे पाहिले तर जगामध्ये परमेश्वर हा सर्वांचे भरणपोषण करणारा आहे असे दिसते. त्याला खरोखरच सर्वांची काळजी आहे. तेव्हा, हे मना, त्याचे फुकटचे नाम घेण्यासाठी तुला काही खर्च करावा लागतो का?
विवेचन :या जगात आपण जन्माला आलो आहोत, तेव्हा आपल्या उदरनिर्वाहाची काळजी परमेश्वराला असतेच. कोणत्याही जीवाला जन्माला घालण्यापूर्वी त्याच्या जगण्याची व्यवस्था तो करतो. मूल जन्माला येण्यापूर्वी आईच्या स्तनात दूध निर्माण होते. मूल थोडे मोठे होईपर्यंत मग त्याला बाहेरचे काही द्यावे लागत नाही. आई त्याचं सर्व प्रकारचं भरणपोषण करते. जशी त्याची शारीरिक भूक ती भागवते, तसेच आईच्या सहवासात बाळाचे मानसिक आणि भावनिक देखील भरणपोषण होते. पुढे मग ती आपल्याजवळ उपलब्ध असणारे अन्न त्याला भरवते. जशी आई, तशीच परमेश्वर ही आपली माउली आहे. तिला आपली चिंता असतेच. आपल्याभोवती असणारा निसर्ग आपल्याला फळे, फुले देतो. शेतातील अन्न आपले भरणपोषण करते. ते पिकवण्यासाठी लागणारी बुद्धीदेखील आपल्याला त्यानेच दिली आहे. आईप्रमाणेच निसर्ग सुद्धा आपल्याला मानसिक, भावनिकदृष्टया समृद्ध करीत असतो. निसर्गातील नदी, वृक्ष, समुद्र असा प्रत्येक घटक आपल्याला कसे वागावे याचा काही ना काही संदेश देत असतो.
पण परमेश्वराने जरी व्यवस्था केलेली असली तरी कोणतेही अन्न आपल्याला जागेवर बसून मिळत नाही. ते मिळवण्यासाठी हालचाल, कष्ट करावेच लागतात. ही धडपड हेच त्याच्या जगण्याचे बळ आहे. या धडपडीतूनच सजीवाला जगण्याचे ध्येय आणि जीवन जगण्यासाठीची ऊर्जा प्राप्त होत असते. पण होते काय की इतर प्राणी सोडले तर या जगण्याच्या शर्यतीत मनुष्य कमालीचा स्वार्थी बनतो. तो आपल्या गरजेपुरते न घेता इतरांच्या वाट्याचेही ओरबाडून घेतो. निसर्गालाही ओरबाडतो. त्यामुळे परमेश्वराने निर्माण केलेल्या या सुंदर जगात कोणाजवळ संपत्तीचा प्रचंड साठा केंद्रित होतो, तर कोणाला दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडते. ही विषमता मानवनिर्मित आहे. सध्या जगात सुरु असलेली युद्धे याच संपत्तीच्या आणि सत्तेच्या हव्यासापायी होताना दिसत आहेत.
या जगात आपण मोजू शकणार नाही इतके अगणित प्राणी आणि जीवजंतू आहेत. त्यांची जगण्याची व्यवस्था आपण करतो का? तो परमेश्वरच त्यांना जन्माला घालतो, तोच त्यांचे भरणपोषण करतो. इतके असूनही माणसाला आपल्या कर्तृत्वाचा किती अहंकार असतो! घरात एखादा कुटुंबप्रमुख एकटा कमावता असेल तर त्याला वाटते मी कमावतो म्हणून या सर्वांना बसून खायला मिळते. माझ्यामुळेच घर चालले आहे. आपण नोकरी करतो. जिथे काम करतो तो मालक किंवा ते व्यवस्थापन आपल्याला त्याबद्दल पगार देते. पण त्या मालकाला देखील देणारा कोणीतरी असतोच ना! थोडक्यात म्हणजे मालकाचा देखील कोणीतरी मालक आहेच. त्या मालकाला तुम्ही आम्ही का ओळखत नाही? हा मालक म्हणजे परमेश्वर. व्यापक अर्थाने तो सर्वांचे हित पाहणारा आहे.
नवऱ्याने एखादा दागिना घेतला तर बायकोला कोण आनंद होतो! ती मोठया कौतुकाने सगळ्यांना सांगत सुटते. आपल्या नवऱ्याची तारीफ करते. पण ज्या भगवंताने तो दागिना घालण्यासाठी तुला हे सुंदर शरीर दिले आहे, त्याची कधी आठवण येते? त्याची तारीफ तू करतेस का? म्हणूनच समर्थ म्हणतात की परमेश्वर जर सर्वांची काळजी घेतो, पालनपोषण करतो, तर त्याचे स्मरण आपण का करत नाही? जेवल्यानंतर आपण ‘ अन्नदाता सुखी भव ‘ असे म्हणून जेवण देणाऱ्याला धन्यवाद देतो. मग खरा अन्नदाता तर तो आहे. त्याला देतो का आपण धन्यवाद? त्याचे नाम घेण्यासाठी तर काही पैसे खर्चावे लागत नाहीत. ‘ कृतघ्नता ‘ हे सर्वात मोठे पाप आहे. अन्नदाता असणाऱ्या भगवंताबद्दल आपण कृतज्ञ राहून त्याचे नित्य स्मरण करायला हवे. त्यासाठी काही खर्च करावा लागतो का? तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. ते म्हणतात
का रे नाठविसी कृपाळू देवासी । पोसतो जनासी एकला तो ।
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ति । वाढवी श्री-पति सवें दोन्हीं ॥
*
फुटे तरुवर उष्ण-काळ-मासीं । जीवन तयांसी कोण घाली ।
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहें त्या अनंता आठवूनी ।
तुका म्हणे ज्याचे नांव विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करीं ॥
स्वसंवाद ::
१. “माझ्यामुळेच माझे घर आणि कुटुंब चालले आहे” अशा कुठल्या खोट्या अहंकाराच्या ओझ्याखाली मी वावरत आहे का?
२. रोज जेवताना ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणताना, चराचरातील अनंत जीवांचे विनासायास पालनपोषण करणाऱ्या त्या खऱ्या ‘विश्वंभराची’ मला आठवण होते का?
३. ज्या भगवंताने मला हे सुंदर शरीर, बुद्धी आणि जगण्याची साधने दिली, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विनामूल्य असणारे नाम घेताना माझे काय ‘वेचते’ (खर्च होते)?
४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळलेल्या झाडांनाही पालवी फुटणारे पाणी देणारा तो ‘अनंत’ जर माझी काळजी वाहण्यास समर्थ आहे, तर मी संसाराची व्यर्थ चिंता का करत बसलो आहे?
=====
श्लोक क्र. ९४ – –
तिन्ही लोक जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ।
जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ।।९४।।
अर्थ :भगवान शंकर जर कोपले आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला तर तिन्ही लोक जाळून भस्म करू शकतात.अशा महासामर्थ्यशाली भगवान शंकरांनी जेव्हा त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला, तेव्हा रामनामाचा आश्रय घेतल्यावरच तो शांत झाला. माता पार्वती देखील अत्यंत आदराने रामनाम जपते. म्हणून आपण देखील त्याच रामनामाचा आश्रय घ्यावा.
(तिन्ही लोक -स्वर्ग-मृत्यू-पाताळ, निवाला – शांत झाला, हरू – भगवान शंकर)
विवेचन : या ठिकाणी रामनामाचे महत्व स्पष्ट करण्यासाठी समर्थ पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यामागे आपल्या हिताची कळकळ आहे. एखाद्या अभ्यास न करणाऱ्या मुलाला आईवडील जसे एखाद्या अभ्यास करणाऱ्या मुलाचे उदाहरण पुन्हा पुन्हा देतात, तसेच हे आहे. भगवान शंकर देवांमध्ये श्रेष्ठ. म्हणून ते ‘ महादेव ‘ ब्रह्मदेव जगाची निर्मिती करतात, विष्णू जगाचे पालनपोषण करतात तर शंकर हे संहारकर्ते मानले जातात. त्यांच्या ठायी एवढे सामर्थ्य आहे की त्यांनी केवळ आपला तिसरा नेत्र उघडला तर क्रोधाने ते हे त्रिभुवन जाळून भस्म करून टाकू शकतात.
अशा सामर्थ्यशाली भगवान शंकरांनी जेव्हा अखिल प्राणिमात्रांच्या कल्याणाच्या हेतूने हलाहल विष प्राशन केले, तेव्हा त्यांच्या कंठाचा प्रचंड दाह होऊ लागला. शीतल चंद्र माथी धारण करून, पवित्र आणि शीतल अशा गंगेला शिरावर धारण केले. एवढे करून देखील त्यांचा दाह शमला नाही. पण अमोघ अशा रामनामामुळे त्यांचा दाह शांत झाला. एवढे सामर्थ्य रामनामाचे आहे. जी विश्वमाता आहे, जगज्जननी आहे अशी माता पार्वती देखील रामनामाचा जप करते. म्हणून आपणही तेच नाम घ्यायला हवे असे समर्थ आपल्याला उदाहरणासह पटवून देतात.
या श्लोकाचा अर्थ आपल्याला वेगळ्या प्रकारेही घेता येतो. आपण मानव म्हणजे गुणदोषांचे पुतळे असतो. क्रोध हा आपला एक प्रमुख शत्रू असतो. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी, नातेसंबंध भस्म करण्याची शक्ती असते. त्यासाठी रामनामाचा आश्रय घेणे हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. रामनामामुळे मन शांत होऊ लागते, क्रोध कमी होऊ लागतो. भगवंताचे नाम हे शांती आणि सौख्य प्रदान करणारे आहे. म्हणून तेच आदरपूर्वक घ्यावे.
स्वसंवाद ::
१. माझ्या मनात जेव्हा ‘क्रोधाचा’ (रागाचा) भडका उडतो, तेव्हा मी माझे विवेक आणि नातेसंबंधांचे ‘त्रिभुवन’ जाळून खाक करतो का? त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी काय करतो?
२. जर तिन्ही लोकांना कवेत घेणारे महादेव आणि अखिल विश्वाची माता असणारी पार्वती अत्यंत आदराने रामनाम जपतात, तर संसारी विवंचनेत अडकलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?
३. माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या चिंता आणि संतापाचा दाह शांत करण्यासाठी, मी कधी शांत चित्ताने रामनामरूपी शीतलता अनुभवली आहे का?
४. “म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता” हा समर्थांचा आग्रहाचा शब्द ऐकून, मी उद्याची वाट न बघता ‘आता’ या क्षणापासून नामस्मरण करायला तयार आहे का?
“आणि हे बघ पिंटू वर्गात दंगा मस्ती बिल्कुल करायची नाही… जे टिचर शिकवतात त्याकडे नीट लक्ष देऊन ऐकायचं.. आणि घरी आल्यावर शाळेत काय काय शिकवलं ते सगळं मला सांगायचं म्हणजे मला तशी तुझ्याकडून तयारी करून घेता येईल.. शिवाय टिचरांनी दिलेला होमवर्क लगेचच करून ठेवायचा… यामुळे आपला अभ्यास चांगला लक्षात राहतो. परीक्षेतही चांगले मार्क मिळतात… चांगले मार्क मिळाले कि टाॅप टेन मधले रॅकिंग येते… तुला पुढे मोठा झाल्यावर डॉक्टर व्हायचं ना? तेव्हा शहाण्या मुलासारखे वागायचं, छान अभ्यास करायचा बरं का? … टिचरांना नीट उत्तर द्यायची… त्यांचा आदर ठेवायचा… शाळेत तुला गुणवान विद्यार्थी म्हणून मेडल मिळायला हवं कि नको… आणि ते मिळालं कि आपले पप्पा तुला छान बायसिकल घेऊन देणार आहेत म्हणालेत परवा मला… आणि हे बघं शाळेत आपली वह्या पुस्तके हरवायची नाहीत… खराब तर मुळीच करायची नाहीत… त्या स्कूल बस मधून जाता येता कुणाशीही दंगामस्ती करायची नाही.. आपल्याला कुणी त्रास देत असेल तर त्या बस अटेंडनां लगेच सांगायचं.. म्हणजे त्या त्रास देणाऱ्याला चांगले रागवतील… कुठे पळापळी, धडपडून हातापायाला लावून घेऊ नकोस… जर असं काही झालं तर तुझी विनाकारण शाळा चुकेल नि त्या दिवसातला अभ्यासही बुडेल… पुन्हा तो भरून काढण्यासाठी तू एकदा का मागे राहिलास ना तर कायमच मागेच राहिलास म्हणून समज… मग टाॅप टेन च्या रेसमधून तुझा नंबर बाहेर गेला कि… तुझ्या करियरला धक्का बसेल… बघ बाबा पिंटू मी इतका वेळ तुला जे समजुतीने काॅन्सुलिंग केलयं ते सिरियली लक्षात येतंय ना तुझ्या… मग मी सांगितले तसं फाॅलो कर… जा आता बस यायची वेळ झालीय… वेळेत खाली नाही गेलास तर बस आणि चुकायची आणि पुन्हा मला रिक्षाचा भुर्दंड बसून तुला शाळेत सोडण्यासाठी माझा टाईम वेस्ट होईल… जा जा… “
“हो मम्मा तू सांगिलेलच मी नेहमी फाॅलो करतो… कालपासूनच तर शाळा सुरू झाली.. आणि पहिला दिवस उलटून चोवीस तास देखील झाले नाहीत… मम्मा एक विचारू तुला… इतका वेळ जे मला लेक्चर झोडत होतीस ते ऐकून असं वाटतंय तुच शाळेत माझ्या ऐवजी जावंस आणि मी घरी बसून फक्त आराम करावा… अरे चाललयं काय तुम्हा मोठ्या माणसांचं इकडे तू लेक्चर देतेस तिकडे शाळेत मॅडम डिसिप्लीनच्या नावाखाली आमची तासंनपट्टी करतात… आम्ही लहान आहोत हा काय आमचा गुन्हा तर झाला नाही ना… ते शाळेच्या वह्या पुस्तकांच्या भरमसाठ वजनाचे दफ्तर पाठीवरून नेण्यात जितका शारिरीक त्रास होत नाही ;त्यापेक्षा कितीतरी पट या तुमच्या Do’s & Don’t च्या सूचनांच्या भडीमाराने नि तुम्ही माझ्याकडून ठेवलेल्या अपेक्षेच्या ओझ्यानेच मी माझं बालपण गमावून बसलोय गं… आणि इतक्या सगळ्या सुचनाचं पालन करूनही तुमचं समाधान होईल का नाही याची शाश्वती नाही… जरा कुठे एका मार्काने जर माझी मेडिकलची ॲडमिशन चुकली तर.. तर इतकं वर्षे प्रामाणिकपणे कष्ट घेऊन केलेल्या अभ्यासाकडे क्षणात दुर्लक्ष करून माझ्या अंगी नसलेल्या अवगुणांचा मात्र जाहीर उद्धार कराल… जणू काही त्या एका मार्काने माझ्ं करियर हुकलं नसून माझं सगळचं आयुष्य विस्कटून गेलं… माझं नव्हे तुमचा अपेक्षाचा तारू उधळला गेल्यानं समाजातील पत कमी झाली नि पुढच्या जीवनातली एनकॅशमेंटही बुडाली… हा न पचवता येणारा धक्का तुमचं जगणं नको नको करेल… काय कमी केलं आम्ही तुझ्यासाठी… वगैरे वगैरे अपेक्षाभंगाचे ताशेरे माझ्यावर उर्वरित आयुष्यात मारत बसणार… तेव्हा मला असं वाटतं मी या शाळा काॅलेजच्या शिक्षणाच्या फंदात पडू नये… तसाही बाहेर बाजारात शिक्षणाचा बोजवारा का कमी उडतोय… आहे का तिथं विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काही काळजी… भरपूर प्रमाणात पैसा ओतला कि हि सगळी काळजी आपोआप दूर होते नि घरबसल्या काही न करता घरच्या भिंतीवर पदवी द्विपदवीधारक प्रमाणपत्र झळकत राहतं… शिवाय दारावर डॉ. अबक नावाची पाटी अख्ख्या जगाला सांगत सुटते… आमचा मुलगा मेडिकल मध्ये गोल्ड मेडिलिस्ट आहे म्हणून… पण खऱ्या अर्थाने ते मात्र नकली सोनं असतं… तेव्हा मम्मा मला काही घरातल्या नि शाळेतल्या सुचनांच पालन करणं जमणार नाही… आणि माझं बालपणही तुम्हा कोणालाच हिरावून घेऊ देणार नाही… मी जो आहे तसाच वागणार आणि वयाच्या वाढीनुसार माझ्यातला बदल घडत जाणार… हे मात्र नक्की… आणि जर का त्याहुन तुम्ही मला विरोध केलात तर मला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल… घटनेने दिलेले अधिकार व हक्कांची जाणीव मला देखील आहे.. आणि त्याची पायमल्ली जर कुणी करत असेल तर हमसे कोई बुरा नही होगा… सो समझने वाले को इशारा काफ़ी है… आजच्यासाठी इतकच़ पूरे.. जातो खाली स्कूलबसवाला हाॅर्न देतोय मी निघतो आता… “
(कविता, गद्य आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुनर्विचार) कविता : शब्दांच्या पलीकडचा स्पंदनानुभव.
कविता ही केवळ शब्दांची रचना नसते; ती शब्दांना लाभलेले स्पंदन असते. विचार गद्यही व्यक्त करू शकते, माहिती निबंधही देऊ शकतो; पण एखाद्या अनुभूतीला जेव्हा भाषेची लय, प्रतिमेचे सौंदर्य आणि भावनेचा नाद लाभतो, तेव्हा कविता जन्म घेते. म्हणूनच कविता वाचली जात नाही; ती अनुभवली जाते. तिचा अर्थ केवळ शब्दांत नसतो, तर शब्दांतील विरामांत, ध्वनीत आणि न बोलल्या गेलेल्या सूचकतेतही दडलेला असतो.
मानवी संस्कृतीच्या आरंभीपासून लय ही माणसाच्या जगण्याचा भाग राहिली आहे. अंगाईगीत, ओव्या, अभंग, भारूड, लोकगीते, भजन, आरत्या—या सर्वांचा पाया लयीत आहे. त्यामुळे भारतीय काव्यपरंपरेत छंदाला केवळ तांत्रिक नियम मानले गेले नाही; तो कवितेचा प्राण मानला गेला. छंदामुळे कविता बांधली जाते, असे नाही; छंदामुळे ती वाहते.
मात्र काळ बदलतो, अनुभव बदलतात, भाषेची संवेदना बदलते. प्रत्येक युगाला स्वतःची अभिव्यक्ती शोधावी लागते. या शोधातूनच मुक्तछंदाचा जन्म झाला. तो परंपरेचा निषेध नव्हता; तर परंपरेचा विस्तार होता. अभिव्यक्तीला अधिक व्यापक अवकाश देताना कवितेच्या अंतःस्वरूपाचे जतन करण्याचा तो प्रयत्न होता.
आजचा प्रश्न मुक्तछंदाच्या अस्तित्वाचा नाही; तर त्याच्या आकलनाचा आहे. मुक्तछंद आणि छंदमुक्त या दोन संकल्पना अनेकदा एकाच अर्थाने वापरल्या जातात. परिणामी कविता, गद्य आणि मुक्त अभिव्यक्ती यांतील सूक्ष्म भेद धूसर होऊ लागतो. हीच या लेखामागची प्रेरणा आहे.
मुक्तछंद आणि छंदमुक्त : गोंधळ नेमका कुठे?
“मुक्तछंद” या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. मुक्त आहे तो छंद; छंदापासून मुक्त झालेली कविता नव्हे.
छंदोबद्ध कवितेत वृत्त, मात्रा, यमक आणि लय यांचे ठरावीक नियम असतात. त्या चौकटीत राहून कवी आपली अनुभूती व्यक्त करतो. परंतु काही वेळा आशयाची व्यापकता किंवा भावनेची सूक्ष्मता अशी असते की, पारंपरिक चौकटीत ती पूर्णपणे व्यक्त करणे कठीण जाते. अशा वेळी कवी छंद मोडत नाही; तो त्याला आवश्यक तेवढीच लवचिकता देतो. त्या लवचिकतेतून मुक्तछंद आकाराला येतो.
म्हणून मुक्तछंद म्हणजे नियमभंग नव्हे; तो नियमांच्या आत्म्याशी प्रामाणिक राहून केलेला सर्जनशील विस्तार आहे. त्यात बाह्य छंदाची चौकट सैल झालेली असली, तरी अंतःलय जिवंत असते. शब्दांची निवड, विरामांची जागा, प्रतिमांचा क्रम, भावनेचा चढ-उतार आणि भाषेचा नाद यांमधून ही लय सतत जाणवत राहते.
याउलट छंदमुक्त या शब्दाचा अर्थ छंदाच्या सर्व बंधनांपासून मुक्त असा होतो. परंतु त्याचाही अर्थ शिस्तशून्यता असा होत नाही. कारण कविता कोणत्याही प्रकारची असो, तिच्या अभिव्यक्तीला एक अंतर्गत संघटन आवश्यक असते. भाषा, प्रतिमा, सूचकता आणि आशय यांचा सुसंवाद हरवला, तर ती रचना कविता न राहता गद्याचा तुकडा ठरते.
म्हणून मुक्तछंद आणि छंदमुक्त या संज्ञांमधील भेद केवळ शब्दांचा नाही; तो काव्यदृष्टीचा आहे.
मुक्ततेलाही असते एक अंतःलय
छंद म्हणजे केवळ मात्रा मोजण्याची पद्धत नव्हे; छंद म्हणजे लयीची शिस्त. ही शिस्त कधी बाह्य असते, तर कधी अंतर्मनात विलीन झालेली असते. मुक्तछंदाने बाह्य चौकट शिथिल केली; पण अंतःलयीचा त्याग कधीच केला नाही.
नदीचा प्रवाह मुक्त असतो; तरी त्याला दिशा असते. पक्षी स्वच्छंद उडतो; तरी त्याच्या उड्डाणात सहज क्रम असतो. झाडाची फांदी आपल्या इच्छेनुसार वाढते; पण तिची मुळे मातीत घट्ट रोवलेली असतात. मुक्तछंदाचेही तसेच आहे. त्याची मुक्तता ही बेबंदपणाची नव्हे, तर अंतःशिस्तीची अभिव्यक्ती आहे.
म्हणूनच मुक्तछंद लिहिणे हे सोपे नसते. उलट, बाह्य छंदाचा आधार नसल्यामुळे कवीवर अधिक जबाबदारी येते. शब्दांचा प्रत्येक स्पर्श, प्रत्येक विराम, प्रत्येक प्रतिमा आणि प्रत्येक ओळ ही स्वतःची लय घेऊन उभी राहिली पाहिजे. अन्यथा रचना माहिती देईल; पण कविता होणार नाही.
याच कारणामुळे मुक्तछंदाचा खरा छंद कागदावर दिसत नाही; तो संवेदनशील वाचकाच्या मनात ऐकू येतो.
मराठी मुक्तछंदाची परंपरा : साधनेतून आलेले स्वातंत्र्य
मराठीतील मुक्तछंद ही अचानक घडलेली घटना नाही. तो मराठी कवितेच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
कवी अनिल यांनी मुक्तछंदाला सैद्धांतिक आणि कलात्मक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कवितेत मुक्तता आहे; पण ती कधीही शिस्तभंगात परिवर्तित होत नाही. आशयाच्या आग्रहामुळे छंदाला दिलेली मोकळीक हीच त्यांच्या काव्यदृष्टीची ओळख ठरते.
बा. सी. मर्ढेकर यांनी आधुनिक जीवनातील विसंगती, यंत्रयुगाची धडधड आणि मानवी अस्तित्वाची अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी भाषेलाच नवे रूप दिले. त्यांनी केवळ छंद मोडला नाही; त्यांनी कवितेच्या अभिव्यक्तीची क्षितिजे विस्तारली.
विंदा करंदीकर यांच्या कवितेत विचार आणि लय यांचा अद्भुत मेळ आहे. इंदिरा संत यांच्या कवितेत अंतर्मुख भावविश्वाची नाजूक हालचाल आहे. कुसुमाग्रजांच्या मुक्तछंदात भाषेचे वैभव आणि चिंतनाची उंची आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेत श्रमिक जीवनाची धग आहे; पण ती घोषणेत रूपांतरित होत नाही, कारण तिच्यामागे काव्यात्मक संघटन आहे. ग्रेस यांच्या कवितेचा अर्थ कधी धूसर भासतो; पण तिची अंतःसंगीतमयता वाचकाला सतत गुंतवून ठेवते.
या सर्व कवींमध्ये शैली वेगवेगळी असली, तरी एक समान धागा दिसतो—त्यांनी मुक्तछंदाला स्वैरपणा मानले नाही. त्यांच्या कवितेत प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक निवडलेला आहे, प्रत्येक विराम अर्थवाही आहे आणि प्रत्येक प्रतिमा अनुभवातून जन्मलेली आहे.
म्हणूनच त्यांच्या कविता वाचताना त्या गद्य वाटत नाहीत. त्या वाचून संपतात; पण त्यांचा नाद मनात दीर्घकाळ घुमत राहातो.
गद्य आणि कविता : सीमारेषा कुठे आखायची?
मुक्तछंदावरील चर्चेत वारंवार एक प्रश्न समोर येतो—गद्य आणि कविता यांतील नेमका फरक काय?
या प्रश्नाचे एकच सूत्रबद्ध उत्तर देता येणार नाही; कारण कविता ही व्याख्येपेक्षा अनुभूतीचा विषय आहे. तरीही एवढे निश्चितपणे म्हणता येईल की, सुंदर आशय म्हणजे कविता नव्हे. तितकेच खरे म्हणजे सुंदर भाषा म्हणजेही कविता नव्हे. कविता तेव्हा घडते, जेव्हा आशय आणि अभिव्यक्ती यांचे विलक्षण रसायन तयार होते.
एखादा विचार निबंधात प्रभावी वाटू शकतो, एखादा अनुभव आत्मकथनात मन हेलावून टाकू शकतो, एखादे वर्णन ललित लेखात मंत्रमुग्ध करू शकते; पण त्यांना आपण कविता म्हणत नाही. कारण कवितेचे वेगळेपण तिच्या आशयात जितके असते, तितकेच तिच्या अभिव्यक्तीच्या स्वभावातही असते.
आज अनेकदा असे दिसते की, गद्य वाक्ये ओळीओळीने मांडली, विरामचिन्हांचा वापर केला, शब्दांचा क्रम बदलला आणि त्याला भावनिक स्पर्श दिला की कविता तयार झाली, असा समज वाढताना दिसतो. ही प्रवृत्ती चिंताजनक आहे. कारण ओळी मोडल्याने गद्याचे रूप बदलते; परंतु त्याचा स्वभाव बदलत नाही.
कवितेचा आत्मा तिच्या अंतर्गत ऊर्जेत असतो. शब्दांमध्ये स्पंदन निर्माण करण्याची, प्रतिमांना अर्थाच्या पलीकडे नेण्याची आणि वाचकाच्या मनात अनुभव पुन्हा जन्माला घालण्याची क्षमता तिच्यात असावी लागते. ही ऊर्जा नसली, तर रचना कितीही प्रामाणिक असली तरी ती कविता होत नाही.
माध्यमयुगातील कविता : संधी आणि आव्हान
आजच्या काळात कविता लिहिणे, प्रकाशित करणे आणि वाचकांपर्यंत पोहोचवणे पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झाले आहे. सामाजिक माध्यमांनी अभिव्यक्तीचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. ही साहित्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे. अनेक नवे कवी, नवे अनुभव, नवे भाषिक प्रदेश आणि नवे संवेदनविश्व यांमुळे मराठी कविता समृद्ध होत आहे.
परंतु या सहजतेने एक भ्रमही निर्माण केला आहे. लेखन सहज झाले म्हणजे कविता सहज घडते, असे मानले जाऊ लागले. मुक्तछंदाची निवड ही अनेकदा अभिव्यक्तीची अपरिहार्यता म्हणून न होता, सुलभतेचा पर्याय म्हणून होऊ लागली. त्यामुळे काही ठिकाणी कविता अनुभवाचे कलात्मक रूप न राहता अनुभवाचे निवेदन बनते.
हे चित्र संपूर्ण मुक्तछंदाचे नाही; पण या प्रवृत्तीची नोंद घेणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही साहित्यप्रकाराचा दर्जा त्याच्या संख्येने नव्हे, तर त्याच्या गुणवत्तेने ठरतो.
आजही अनेक तरुण कवी आशय, भाषा आणि रचनाशैली यांचे सुंदर संतुलन साधत मुक्तछंदात उल्लेखनीय कविता लिहित आहेत. त्यामुळे प्रश्न मुक्तछंदाचा नाही; तर त्याच्या निकषांचा आहे.
कविता : सहज उमलते, पण सहज घडत नाही
कविता अनेकदा एका क्षणात सुचते; पण ती एका क्षणात घडत नाही.
भावना हा कवितेचा आरंभ असतो; परंतु तिचे अंतिम रूप घडवते ती साधना. भाषेची जाण, परंपरेचे भान, शब्दांची निवड, प्रतिमांची समृद्धी, लयीची जाणीव आणि स्वतःच्या अनुभवाशी असलेली प्रामाणिकता—या साऱ्यांतून कविता आकार घेत असते.
ज्याप्रमाणे गायकाला रियाज, चित्रकाराला रेखाटन आणि शिल्पकाराला दगडाशी संवाद आवश्यक असतो, त्याचप्रमाणे कवीलाही भाषेशी अखंड मैत्री करावी लागते. चांगल्या कविता वाचल्याशिवाय चांगली कविता लिहिता येत नाही. परंपरा जाणल्याशिवाय नवे मार्ग सापडत नाहीत.
म्हणूनच मुक्तछंद हा नवशिक्याचा शॉर्टकट नसून परिपक्व अभिव्यक्तीचा मार्ग आहे.
रसिकाचीही एक जबाबदारी
साहित्याचा दर्जा केवळ लेखकावर अवलंबून नसतो; तो वाचकाच्या अभिरुचीवरही अवलंबून असतो.
क्षणिक दाद, टाळ्या किंवा सामाजिक माध्यमांवरील प्रतिसाद यापलीकडे जाऊन कविता समजून घेण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. एखादी कविता आपल्याला पुन्हा वाचावीशी वाटते का? तिची एखादी प्रतिमा मनात रेंगाळते का? तिच्या एखाद्या ओळीने आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडले का? असे प्रश्न रसिकाने स्वतःलाच विचारले पाहिजेत.
रसिक अधिक सजग झाला की कवीही अधिक जबाबदार होतो. तेव्हाच भाषेची आणि कवितेची अभिरुची समृद्ध होते.
शेवटचे काही शब्द…
मुक्तछंदावर बोलताना दोन टोकांच्या भूमिका अनेकदा समोर येतात. एकीकडे छंद म्हणजे जुने बंधन, तर दुसरीकडे मुक्तछंद म्हणजे कवितेचा ऱ्हास—अशा दोन्ही भूमिका वस्तुस्थितीचे पूर्ण चित्र दाखवत नाहीत.
छंदोबद्ध कविता आणि मुक्तछंद हे परस्परविरोधी प्रवाह नाहीत. ते एकाच काव्यपरंपरेची दोन रूपे आहेत. एका रूपात लय बाहेरून ऐकू येते; दुसऱ्या रूपात ती आतून जाणवते. एका ठिकाणी छंद स्पष्ट दिसतो; दुसऱ्या ठिकाणी तो शब्दांच्या नसानसांत मिसळलेला असतो.
म्हणून मुक्तछंदाला विरोध करण्याचे कारण नाही; परंतु त्याच्या नावाखाली छंदशून्यता, भाषिक बेफिकिरी आणि वर्णनात्मक गद्य यांना कवितेचा दर्जा देणेही योग्य नाही. मुक्तछंदाची खरी ओळख त्याच्या मुक्ततेत नसून त्याच्या अंतःलयीत आहे.
झाडाच्या फांद्या कितीही दूरवर पसरल्या, तरी त्यांची मुळे जमिनीत असतात. नदी कितीही वळणे घेत वाहिली, तरी तिचा प्रवाह हरवत नाही. आकाशात मुक्त विहरणाऱ्या पक्ष्यालाही दिशेचे भान असते. निसर्गाचा हा नियम कवितेलाही लागू होतो.
कविता ही केवळ शब्दांची मांडणी नाही; ती संवेदनांची शिस्त आहे. ती केवळ आशयाची अभिव्यक्ती नाही; ती भाषेचा आत्मानुभव आहे.
आजच्या प्रत्येक कवीने आणि प्रत्येक रसिकाने एवढेच स्मरावे—
मुक्तछंद म्हणजे छंदापासून मुक्त होणे नव्हे; तर छंदाला अंतःकरणात इतके सामावून घेणे की, तो दिसेनासा होईल; पण त्याचा नाद प्रत्येक शब्दातून ऐकू येत राहील. आणि कदाचित म्हणूनच…