मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ झारमुरी – – – – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ झारमुरी – – – – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

हा खाद्य पदार्थ बंगाल मध्ये सर्वांनाच माहीत होता. पण निवडणुकीमुळे देशातच काय पण परदेशात सुद्धा एकाएकी प्रकाश झोतात आला. विदर्भात मात्र हा पदार्थ सर्वांनाच माहीत आहे. येथे याला चकना म्हणतात. अरे विज्या चकना बनवला की नाही. सर्व मित्र येतीलच. विजुभाऊ फक्त चकनाच खातो. हा पदार्थ केंव्हाही बनवता येतो. पण काही मुहूर्तावर बनवायचं लागतो. पण आता मात्र झारमुडी खूपच लोकप्रिय होईल. जो खातो तो जिंकतो.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा… कोणताही ऋतू असो, भारतीय माणसाच्या आयुष्यात दोन गोष्टी कायम स्थिर असतात — चहा आणि त्याच्या सोबत काहीतरी खायला! आणि या “काहीतरी” मध्ये जर कोणी खरा राजा असेल तर तो म्हणजे झारमुरी आणि मुरमुरे चिवडा! बैठकीत तर पहिल्या क्रमांकावर असतो. समजदार को इशारा काफी है.

झारमुरी म्हणजे बंगालचा आत्मा आणि आपल्या गावाकडच्या मुरमुरे चिवड्याचा शहरात गेलेला चुलत भाऊ! फरक एवढाच की आपल्या इथला चिवडा शांत, साधा आणि घरगुती असतो; तर झारमुरी म्हणजे एकदम फिल्मी हिरो! कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, शेव, चटणी, मसाला… एवढे सगळे टाकून तो असा तयार होतो की वाटते आता हा थेट निवडणूक लढवेल!

पूर्वी गावात मुरमुरे चिवडा बनवणे म्हणजे एक कौटुंबिक सोहळा असायचा. आई मोठ्या परातीत मुरमुरे घेणार, त्यात फोडणीचा सुगंध पसरायचा. आपण बाजूला बसून “मी मदत करतो” म्हणायचो आणि मदतीपेक्षा खाणेच जास्त करायचो. आई म्हणायची, “अरे, पाहुणे येणार आहेत!” आणि आपण मनात म्हणायचो, “त्यांनी येण्याआधीच संपवूया!” 

त्या काळी चिवडा डब्यात भरून ठेवला जायचा. पण घरातील प्रत्येकाला त्या डब्याचे गुप्त ठिकाण माहिती असायचे. विशेषतः वडिलांना! रात्री सगळे झोपल्यावर स्वयंपाकघरात “टकटक… खुटखुट…” आवाज यायचा. आई विचारायची, “कोण आहे?” आतून आवाज यायचा, “मांजर असेल…” पण दुसऱ्या दिवशी डब्यातला चिवडा निम्मा कमी! ते मांजर दोन पायांचे असायचे हे सगळ्यांना माहिती असायचे.

झारमुरीवाल्यांची स्टाईल तर भारीच! हातात मोठा डबा, त्यात मुरमुरे आणि वर छोट्या छोट्या डब्यांत मसाले. तो ज्या वेगाने सगळे मिसळतो ते पाहून पहिले जिभेवर त्याचा परिणाम दिसतो. आणि शेवटी तो कागदाचा कोन करून झारमुरी देतो. त्या कोनातली झारमुरी खाताना अर्धी तोंडात आणि अर्धी शर्टावर पडते. पण तरीही आनंद असा मिळतो जणू काही पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवत आहोत.

मुरमुरे चिवड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो “हलका” असतो. त्यामुळे माणूस स्वतःला फसवत राहतो. “अरे, हे काय… हलकेच आहे!” असे म्हणता म्हणता अर्धा किलो संपतो.

रेल्वे प्रवासात तर मुरमुरे चिवडा हा राष्ट्रीय खाद्यपदार्थ वाटतो. एकाने पाकीट उघडले की पूर्ण डब्यात सुगंध पसरतो. समोरचा माणूस लगेच पुस्तकातून वर बघतो. बाजूचा प्रवासी नकळत जवळ सरकतो. आणि दोन मिनिटांत “थोडे घ्या ना…” पासून मैत्री सुरू होते.

आजकाल मोठमोठ्या कंपन्यांनी झारमुरी आणि चिवड्याला आकर्षक पॅकेटमध्ये बंद केले आहे. त्यावर इंग्रजीत मोठे नाव लिहिलेले असते — “Spicy Puffed Rice Mix” पण आत उघडल्यावर चार शेंगदाणे, दोन कढीपत्ते आणि बाकी हवा! त्यापेक्षा आपल्या घरचा चिवडा म्हणजे प्रेम, आठवणी आणि पोटभर आनंद!

खरं सांगायचं तर मुरमुरे चिवडा हा फक्त खाऊ नाही. तो बालपण आहे, प्रवास आहे, गप्पा आहेत, आणि “थोडे अजून घेऊ का?” या मोहाचा अखंड इतिहास आहे! 

काल बंडोपंत खूप घाईत दिसले विचारले तर म्हणाले संध्याकाळी सुमी ला पहायला येणार आहे तू पण ये. मनात विचार आला बरे झाले बरेच दिवसात कांदेपोहे खायला मिळतील. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. सुमी आता कांदेपोहे घेऊन येईल असे वाटले तर सुमी झारमुरी घेऊन आली. ती खाल्ल्यावर पोराने पटकन मुलगी पसंत आहे असे सांगितले. एवढा इन्स्टंट इफेक्ट पहिल्यांदाच पाहिला. आता कांदेपोहे कार्यक्रम न होता झारमोरी कार्यक्रम होईल. शेवटी काय तर झारमुडी बनवताना ममता पाहिजे.

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वापरलेलं…” – लेखिका : सोनाली कुलकर्णी ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वापरलेलं…” – लेखिका : सोनाली कुलकर्णी ☆ शोभा जोशी

पाचवी ते दहावीपर्यंत मी आमच्या कॉलनीतल्या एक वर्ष पुढे असलेल्या – अनिरुद्ध परांजपेची पुस्तकं वापरली. या कारणासाठी तरी मला त्याच्यासारखे पैकीच्या पैकी मार्क मिळावेत, असं मला वाटायचं.

मध्ये एकदा माझी एक छोटी मैत्रीण पावसात भिजली. माझं घर जवळच होतं म्हणून माझ्याकडे आली. ‘‘ओले कपडे बदल आधी’’- असं म्हटल्यावर माझ्या कपड्याच्या कपाटात खुडबुड करत बराच वेळ रमली. मग एक टॉप कप्प्यातून ओढत आरशात स्वत:ला हसून वगैरे न्याहाळत म्हणाली, ‘‘हा घालून जाऊ?’’ मी म्हटलं, ‘‘हो हो अवश्य. आणि परत आणून देण्याच्या फंदात पडू नकोस. मला जरा लहान होतो तो आता. ’’ त्याच भरात मी कपाटातून अजून चार-पाच गोष्टी काढल्या आणि जाताना तिच्याकडे सुपूर्द करत म्हणाले, ‘‘बघ ही जीन्स आणि बाकीचे टॉप पण येतील तुला कदाचित. ’’ माझी कॉलेज गोइंग मैत्रीण खूशच झाली. दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा फोन आला. ‘‘अगं, काय मस्त कपडे आहेत सगळे. छोटीचे किती लाड करतेस!’’ माझ्यापण तोंडावर मोठ्ठं हसू पसरलं.

किती साधी गोष्ट आहे ही. कुणीच गैरसमज करून घेतला नव्हता. क्वचित कधी छोटीला ते कपडे घालताना माझी आठवण आली असेल बास.

ह्याच्या विरुद्ध मध्ये जे ऐकायला मिळालं, ते इतकं विचित्र होतं. आमच्या एका फॅमिली फ्रेंड कुटुंबाकडे गेले होते. काकूंना माझं बाळ बघायचं होतं. बरं नसल्यामुळे त्यांना हिंडता फिरता येत नाही आता. त्यांच्या सुनेनी पाठवलेला एक सुंदर अंगरखा कावेरीला घालून घेऊन गेले होते. काकूंना म्हटलं, ‘‘हे बघा.. आठवतंय का तुम्हाला? तुमच्या नातीचा फ्रॉक आहे हा. ’’ ते लक्षात आल्यावर काकूंच्या डोळ्यातून घळाघळा पाणीच यायला लागलं. उदास उदास होत त्या म्हणाल्या, ‘‘सूनबाईंना सांगू नकोस हं. तिच्या नकळत दिल्या होत्या या सगळ्या गोष्टी मी तुला. तिनी फेकून देण्यासाठी काढल्या होत्या बाजूला. किती विचित्र झालीए तुमची पिढी. प्रत्येक गोष्टीत तुमचे आक्षेप, शंका, प्रश्नांची सरबत्ती. आम्ही कितीतरी गोष्टी ऐकलेल्या, पाहिलेल्या, चालत आलेल्या- म्हणून करत आलो. त्यामागच्या भावनांची गोडी जगताना कळत गेली. पण तुम्हाला आधी सगळ्याची कारणमीमांसा करायची असते आणि आमचं म्हणणं उडवून लावायचं असतं. ’’

गप्पांच्या ओघात कळत गेलं. त्यांच्या कुणा नातेवाईकांकडून आलेलं बाळलेणं पाहिल्यावर काकूंच्या सुनेचा पारा चढला होता. ती काकूंना घालून पाडून बोलली. ‘‘कुणाची तरी वापरलेली झबली आणि दुपटी. मी नाही माझ्या बाळाच्या अंगाला लागू देणार. इट्स सो अनहायजिनिक. आम्हाला नाही भिकेचे डोहाळे लागले. आम्ही स्वत: खूप कष्ट करून भरपूर पैसे कमावतो. जगातली कुठलीही महागातली महाग गोष्ट आम्ही आमच्या बाळाला घेऊ शकतो. हे सेकण्ड हॅण्ड गिफ्ट तुम्ही त्या नातेवाईकांना परत करा. ’’ हे ऐकल्यावर काकू अवाक झाल्या होत्या म्हणे. मुद्दा तुमच्याकडे किती पैसे आहेत हा नाहीच्चे मुळी. एका बाळानी वापरलेल्या गोष्टी दुसऱ्या बाळाकडे मऊ होऊन जातात. बाळाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा घेऊन जातात. अगदी इम्युनिटीसुद्धा वाढवतात. शेअरिंग, देवाणघेवाण, एका आईनी दुसरीला दिलेला धीर, उमेद, नव्या आईच्या कष्टांसाठी, नवलाईसाठी वाटणारी सहानुभूती – अशा शब्दात न मांडलेल्या कितीतरी गोष्टी- प्रेम आणि दिलासा व्यक्त करतात.

खरंच अलीकडे लोकांकडे पैसे जास्त की वेळ कमी झालाय कळत नाही. पण हो, सुबत्ता खूप आलीए आणि पेशन्स कमी झालाय एवढं मात्र नक्की. दुसऱ्याचं काऽऽही नको असतं लोकांना. पूर्वी लहान होतोय म्हणून कुणी ड्रेस वगैरे दिला तर किती अप्रूप वाटायचं. आत्याकडे राहायला गेल्यावर गंमत म्हणून तिच्या जुन्या चपला घालून बसण्याचा आनंद वेगळाच असायचा. कित्ती वेळा मोठय़ा बहिणी / वहिन्यांच्या कपड्यांना धावदोऱ्यांनी टीप घालून लहान करून घालायचो आम्ही. माझ्या अरंगेत्रमला वृषाली वहिनीची लग्नातली चिंतामणी रंगाची साडी नेसले होते मी. हाफसारी करून. माझ्या दूरदर्शनवरच्या आणि एकूण आयुष्यातल्याही पहिल्या शूटिंगला प्रिया वहिनीची हिरवी साडी आणि टीप घातलेलं ब्लाऊज! अजूनही कधी तो सतारवादनाचा कार्यक्रम लागला आणि

माझं निवेदन सुरू झालं की, प्रिया वहिनीची आठवण येते. आईच्या कितीतरी ब्लाऊजना तर टिपा घालून काढून भोकं पाडली होती मी चक्क. नाटक, एकांकिका, कविता वाचन- प्रत्येक कार्यक्रमाला हक्काची वॉर्डरोब कर्टसी म्हणजे आईच! बाकी फोटोशूट इ. कार्यक्रमांना मोठय़ा बहिणींचे कपडे चाचरत मागण्यात आणि मिळाल्यावर हरखून जाण्यात काय मजा होती!माझी आई आणि सिंधूमावशी वर्षांतून एकदा भेटल्या की, एखाद् वेळी साड्या एक्स्चेंज करायच्या. वापरण्यात ताजेपणा यायचा. आणि आठवणीनी मूड आनंदी व्हायचा. माझ्या आईच्या वडिलांनी- आईच्या पहिल्या बाळंतपणात- संदीपसाठी म्हणून करून घेतलेल्या पाळण्यात पुढे शंभर-सव्वाशे तरी बाळं झोपली, त्यांच्या आयांनी हलका झोका घालत अंगाई म्हटली. त्यांना पाळणा पोचवण्यासाठी, त्यासोबत काहीतरी खाऊ देण्यासाठी आईनी केलेली लगबग किंवा बाबांनी पाळणा स्कूटरला सुतळीनी बांधून बाळाच्या घरी तो नीट पोचवण्यासाठी केलेली धडपड आठवली तरी मला हेलावून जायला होतं. किती गोड संदर्भ जुडत जातात एखाद्या वस्तूला.

हल्ली सगळेजण अळूच्या पानांसारखे निर्लेप व्हायचा प्रयत्न करतायत. निरुपद्रवी असण्यासाठी स्वत:ला मिटून घेतायत. नकोच ती कटकट कुणाकडून काही घेण्याची- आणि मग आठवणीनं परत करण्याची- या नादात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या- ‘आनंदाचं, चांगलं ते’ वृद्धिंगत करण्याच्या साखळीला खंड पडत चाललाय. प्रत्येकानं बाजारात मिळत असलेल्या सगळ्या गोष्टी घ्यायचं ठरवलं- तर मग काय. चंगळवाद पोसणारे मार्केटिंगवाले अजून अजून यशस्वी होत राहतील. आपल्यालाही मग घरातल्या भारंभार वस्तूंप्रमाणे प्रदर्शनात मांडल्यासारखं जगायची सवय होईल. छे! झटकून टाकू या हा अवघडलेपणा. एखादी गोष्ट स्वीकारण्याची ग्रेस शिकू या. एखाद्याचा आनंद द्विगुणित करणं फुकट साध्य होतं. त्याला पैसे नाही लागत. ते करू या- आणि मग कुणाकडे किती पैसे आहेत, त्या पैशात आपण काय काय खरेदी करू शकतो याच्या बाता मारू या!

लेखिका: सोनाली कुलकर्णी

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मुले जबाबदारी घ्यायला का टाळतात?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “मुले जबाबदारी घ्यायला का टाळतात?☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची वैयक्तिक निवड नसून ती कुटुंब, परंपरा, प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यतेशी घट्ट जोडलेली संस्था आहे. म्हणूनच “मला लग्न करायचं आहे की नाही, कधी करायचं आहे, कुणाशी करायचं आहे” हे प्रश्न वैयक्तिक असले तरी त्यांची उत्तरं अनेकदा व्यक्तीपेक्षा कुटुंब आणि समाज ठरवतात. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली आहे की अत्यंत उच्चशिक्षित, परदेशात काम करणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणसुद्धा विवाहासारख्या निर्णयात पूर्ण स्वायत्तता घेत नाहीत. यामागे केवळ परंपरेचा दबाव नाही, तर भावनिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचे घटकही गुंतलेले आहेत. भारतीय कुटुंबव्यवस्थेची रचना ही सामूहिक आहे. म्हणजेच व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित, सन्मान आणि एकात्मता यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी लग्नाचा निर्णय घेताना “माझं आयुष्य” यापेक्षा “आपल्या घरचं काय? ” हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सांगड अशी धारणा असल्याने, निर्णय प्रक्रियेत पालकांचा हस्तक्षेप ‘हक्काचा’ मानला जातो. अशा वातावरणात स्वतंत्र निर्णय घेणे हे बंडखोरीसारखे वाटू शकते. परिणामी, मुलं स्वतःहून लग्न ठरवण्याऐवजी कुटुंबाच्या मान्यतेची वाट पाहतात किंवा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवतात.

यात आर्थिक मानसशास्त्राचाही मोठा वाटा आहे. लग्न हा भारतीय संदर्भात केवळ सोहळा नसून तो एक मोठा आर्थिक प्रकल्प असतो. हॉल, जेवण, कपडे, दागिने, पाहुणचार, या सर्वांचा खर्च प्रचंड असतो. परंपरेने हा खर्च पालकांनी उचलायचा असतो, आणि अनेक वेळा तो “प्रतिष्ठेचा प्रश्न” बनतो. त्यामुळे मुलगा-मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी “हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे” ही धारणा कायम राहते. स्वतःच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलणे म्हणजे केवळ पैसे देणे नाही, तर त्या खर्चामागील सामाजिक अपेक्षा, नातेवाईकांचे समाधान, प्रतिष्ठेचे गणित यांची जबाबदारी घेणे होय—आणि ही जबाबदारी घेण्यास अनेक जण मानसिकदृष्ट्या तयार नसतात. याशिवाय भावनिक अवलंबित्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय समाजात मुलांना लहानपणापासूनच तुमच्यासाठी आम्ही आहोत अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा पालकांच्या अनुभवावर अवलंबून राहण्याची सवय लागते. लग्नासारख्या मोठ्या निर्णयात चूक झाली तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील, ही भीतीही असते. म्हणूनच आई-वडिलांनी ठरवलेलं सुरक्षित अशी मानसिकता तयार होते. हे केवळ भीतीचे परिणाम नसून, एक प्रकारची सामाजिक कंडिशनिंग आहे.

सामाजिक दबाव आणि प्रतिष्ठेचे राजकारणही या प्रश्नात महत्त्वाचे आहे. “लोक काय म्हणतील? ” हा भारतीय मानसिकतेचा केंद्रबिंदू आहे. जर मुलगा किंवा मुलगी स्वतः लग्न ठरवते, विशेषतः आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय, तर कुटुंबावर टीका होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक वेळा पालक स्वतः पुढाकार घेतात आणि मुलांनाही तसेच करण्यास भाग पाडतात. परिणामी, व्यक्तीची स्वायत्तता दुय्यम ठरते आणि सामाजिक मान्यता प्राथमिक ठरते. मुलं स्वतःहून लग्न का ठरवत नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे निर्णयक्षमता विकसित न होणे. आपल्या शिक्षणपद्धतीत करिअर, स्पर्धा, नोकरी यावर भर दिला जातो; पण जीवननिर्णय, नातेसंबंध, भावनिक परिपक्वता याबाबत मार्गदर्शन कमी असते. त्यामुळे एखादी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असली तरी वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्यात ती गोंधळलेली असू शकते. यामुळे कुटुंब ठरवेल हा सोपा मार्ग निवडला जातो.

ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, तर मानसिक स्वातंत्र्य आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे. जेव्हा व्यक्ती “माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेईन आणि त्याचे परिणामही मी स्वीकारेन” अशी भूमिका घेते, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो. काही शहरी भागात, विशेषतः नव्या पिढीत, हा बदल दिसू लागला आहे—लव्ह मॅरेज, साधे विवाह, कोर्ट मॅरेज, स्वतः खर्च उचलणे यासारख्या प्रवृत्ती वाढत आहेत. पण हा बदल अजूनही मर्यादित आहे, कारण परंपरा आणि सामाजिक अपेक्षा अजूनही मजबूत आहेत. शेवटी, हा प्रश्न मुलं जबाबदारी का घेत नाहीत, इतकाच नाही तर समाज त्यांना तसे करू देतो का, हाही आहे. जोपर्यंत कुटुंब आणि समाज व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत मुलं पूर्ण स्वायत्ततेने लग्न ठरवतील आणि पार पाडतील अशी अपेक्षा वास्तववादी ठरणार नाही. ज्या प्रमाणात व्यक्ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारेल आणि कुटुंब त्या स्वातंत्र्याला मान्यता देईल, त्या प्रमाणात भारतीय विवाहसंस्थेची मानसिकता बदलत जाईल, अशी आपण आशा करूया.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आयुष्याची extra किल्ली नकोच..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयुष्याची extra किल्ली नकोच.. ☆ संध्या बेडेकर ☆

“आपल्या घराची एक ‘ extra’ किल्ली नेहमी शेजारी असावी. हे नक्की. पण आपल्या आयुष्याची किल्ली मात्र स्वतः कडेच ठेवावी. ”

आज मी खूप उत्साहात आहे. काय कारण असावं माहीत नाही. पण आज भरपूर ऊर्जा आहे. मला छान वाटतय. खूप काम करावसं वाटतंय. मन गुणगुणतय. आजच्या या उत्साहपूर्ण दिवसांचा चांगला उपयोग करून घ्यायचा हे मी लगेच ठरवलं. आजकाल असे दिवस दररोज उगवत नाहीत. म्हणून मी सगळ्यात आधी मस्त चमचमीत जेवणाचा बेत ठरविला. घर अगदी चकाचक करायचे ठरविले. एकानंतर एकेक काम आठवतं गेली व आज जास्तीत जास्त काम करायची हे लगेच ठरविले. कामे केंव्हा, कशी करायची याची रूपरेषा मनात ठरवून टाकली. आता एवढ्या कामांची लिस्ट समोर म्हंटल्यावर कामाची स्पीड वाढवायलाच हवी. हे सर्व ठरवत असताना च मधे दोन मिनिटे काढून वॉशिंग मशीन लावली. म्हणजे आजची सकाळ वेगळीच उगवली.

बहुतेक माझी झोप चांगली झाली होती. स्वप्न पण छान पडलं होतं. पावसाळी मन प्रसन्न करणारी हवा होती. त्यातच रेडिओ वर पहिलंच मस्त आवडीचे गाण ऐकलं.

” मस्ती भरा है समा,

 हम तुम हैं दोनो यहां.

 आंखो में आ जा, दिल में समा जा,

 झूमें ज़मीं आसमां । “

वाढत्या उत्साहात भर पडली. तसे मागच्या पंधरा वर्षांपासून आम्ही दोघेच असतो पण “Today it’s different. ”

कारण काहीही असू दे. लगेच हा दिवस cash करायचाच. असं मी ठरवलं.

सर्व अगदी मजेत सुरू होत. हळदीचे डाग पडतात व कपडे खराब होतात, असा रोजचा विचार आज बाजूला सारून, रोजपेक्षा वेगळा ड्रेस घातला. मनात म्हंटल पडले डाग तर पडू देत.

” बहुत कपड़े हैं अपने पास । ”

मन लावून एकेक पदार्थ लक्ष देऊन केला. पाहुण्यांसाठी जपून ठेवलेली क्रोकरी उत्साहाने काढणार, तेवढ्यात फोन वाजला, लगेचच घेतला. एका मैत्रिणीचा होता.

वेळ आहे का ग.???

असं म्हणून आमच्या गप्पा नेहमी प्रमाणेच सुरू झाल्या. मी उत्साहात होतेच. लगेच आजचा माझा बेत मी तिला सांगितला.

खीर, पूरी, बटाटा भाजी, चटनी, कोशिंबीर भजी, मसालेभात, मसाला ताक (मठठा) वगैरे वगैरे.

बाप रे!! आज काय विशेष ग?? तिने विचारले.

कोणाचा वाढदिवस की काय??

काही नाही ग सहजच.. सणवार, वाढदिवस वगैरे काहीच नाही. मी म्हंटल. असच काहीतरी वेगळं करावं म्हणून करतेय. सर्व झालंय, फक्त मसालेभात तेवढा राहिलाय. येतेस का जेवायला?? मी सहज विचारलं.

लगेच ती म्हणाली, अग! तुला कंटाळा नाही येत का?? मला तर आता एवढा कंटाळा आला आहे. रोज रोज, तेच ते, तोच तोच, आपल्या हातच जेवून स्वयंपाक करून करून मी थकलेय.. मी तर आता जेमतेम जेवढी गरज असेल तेवढंच काम करते व बाकी जास्तीची कामे तर अजिबात करतच नाही. कोणी येत जात नाही. त्यामुळे तर अजून काही करत नाही. कंटाळा तर रोजच येतो.

अग! तू आणि मी एकाच वयाच्या ना, मग तुलाही आता कामाचा कंटाळा येतच असणार नाही का?? बघ बाई, खूप करायला जाऊ नको, नाही तर उद्या कंबर दुखायची.

झालं, एवढं पूरे होत. मलाही ते पटले. मनाने सहजच पलटी मारली. उत्साही मनाने कुलांटी मारली. अचानक घड्याळ उलटे सुरू झाले. आता विचारांची दिशाच बदलली. म्हणजे. ‘ Follow Me ‘ सारख तिच्या मागे माझे मन चालू लागले.

मलाही थकल्या सारखे वाटू लागले. कुठे तरी ‘कंटाळा ‘ शब्द डोक्यात छान बसला. व आपला असरही दाखवू लागला.

आता मनात नवीन विचार येऊ लागले. मसालेभात राहू दे का?? बाकी एवढं सर्व आहेच ना. म्हणजे नाही केलं तरी चालेल. एवढं पचलही पाहिजे ना. आजकाल जास्त जेवले की त्रासही होतो. ‘कंटाळा’ शब्दाला साजेसे व स्वतःला सोईस्करपणे पटणारे विचार मनात येऊ लागले. स्वतः शी च बोलणे होत होते.

गॅस बंद करून थोड्या वेळ शांत बसले.

एकदम विचारात बदल कसा काय झाला?? संगतीचा असर का? तरी संगत दुरुनच होती. फक्त फोनवर. तरी एवढा प्रभाव कोणाच्या तरी बोलण्याचा होऊ शकतो का?? मग माझ्या उत्साहपूर्ण दिवसाचे काय?? सर्व मुसळ केरात??

एकदम दिवस कंटाळवाणा वाटू लागला. थकल्या सारखे वाटू लागले. क्रोकरी वगैरे नकोच, राहू दे. उगीच फूटली तर सेट खराब व्हायचा.

म्हणजे तिच्या म्हणण्याने माझी नकारघंटा सुरू झाली. एकदम विचारांची दिशाच बदलली.

माझी अवस्था मलाच कळत नव्हती. मनात कुठेतरी तरी अस्वस्थता जाणवू लागली. मी हा असा विचार करणे योग्य आहे का??

म्हणतात ना,  “संगतीचा असर पडतो. ”

हो बरोबर आहे. ती पण तर माझ्या संगतीत तेवढ्याच वेळ होती ना, मग तिला मी प्रभावित का करू शकले नाही.????

तिचा कंटाळवाणा दिवस उत्साहात मी का बदलू शकले नाही.???? मी पण सांगू शकले असते ना,

अग! नाही, असं अजिबात नाही. वयाप्रमाणे थकवा येतो कधी कधी. नाही असं नाही. पण आजचा दिवस खुप छान उगवला आहे. म्हंटल आनंद घेऊया आज. कधी कधी काही तरी वेगळं असावं ना. आपल्यालाही छान वाटत असे प्रसंग स्वतः च निर्माण करायचे असतात. कशाला वाट बघायची वाढदिवसाची किंवा सणाची. आणि जेवढं पचेल तेवढच खायचं. अग! छान वाटत. स्वतः चीच पाठ थोपटावीशी वाटते. आनंदी दिवसाची वाट बघण्यापेक्षा हातात असलेला क्षण/ दिवस आनंदात कसा घालवता येईल यांचा विचार करावा.

माझ्या अशा बोलण्याने तिच्यात कदाचित बदल झाला असता. बरे असो,

माझ्या आनंदाची किल्ली मी तिला दिली आहे का?? घराची एक extra किल्ली शेजारी नेहमी द्यावी. हे बरोबर आहे पण आपल्या आयुष्याची किल्ली जर दुसऱ्या च्या हातात दिली तर बंदर च्या खेळाप्रमाणे तो डंबरू वाजवणार आणि आपण नाचायचं का?? आपले निर्णय ते घेणार का?

लगेच सर्व मरगळ झटकली. सर्व कंटाळा डिलीट केला. व पुर्वीच्या उत्साह मोड मधे आले. आरशात बघीतल. स्वतः चेच कौतुक केले मनात म्हंटल,

” अभी तो मैं जवान हूं ” ।

व लगेच उत्साहाने कामाला लागले. क्रोकरी काढली. टेबल सजवले. बगीच्यातून गुलाबाची फूल फ्लॉवर पॉट मधे सजवली. प्लेट मधे सर्व वाढले. छान गाणी लावली. फोटो काढला. काही लोकांचा कंटाळा जाऊन उत्साह यावा या उद्देशाने फेस बुक वर फोटो पोस्ट केला.

रोज पेक्षा दोन घास जास्त खाल्ले.

थोड्याच वेळात उत्साही फेस बुक प्रेमी active लोकांचे comments ही आलेच.

  •  व्वा काकू मस्तच
  • Wow!! so tempting
  • Great, , Kaku You Rock
  • मी पण उद्या नक्की करते
  • Enjoy Kaku n Kaka

वाचून छान वाटल. मेहनतीचे चीज झाले, अस वाटल.

मी स्वतः लाच धन्यवाद दिला. छान स्वयंपाक केला, हे कारण तर होतच. पण दुसरं म्हणजे नवीन सूत्र ” Follow yourself ” हे पाळल्या बद्दल.

कोणी काय बोलावे?? काय सांगावे?? यावर आपलं नियंत्रण नसते. पण त्यांचे किती ऐकायचे?? किती नाही?? यावर आपल्याला नियंत्रण नक्की ठेवता येते.

तरीही संगत महत्वाचीच. माझी आई नेहमी म्हणत असे, तुम्ही ज्या प्रकारच्या व्यक्तिंच्या सहवासात राहाता, त्या सर्वांचे एव्हरेज व्यक्तिमत्त्व तुमच घडत जातं. नकळत त्यांचे विचार तुम्हाला पटत जातात.

लोक निंदा करतात तर मी दुःखी होते.  लोक स्तुती करतात तर आनंद होतो.  म्हणजे माझ्या सुख दुःखाचे बटन दुसऱ्यांच्या हातात आहे का?? बटन आपल्या हातात असावे. स्वतःला जे पटेल तेच करावे.

आत्मविश्वास.. हीच आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे

“Say Or Do what you feel. It is not being rude. It is called being real. ”

आयुष्य माझ आहे ते मी माझ्या मनाप्रमाणे जगणार.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मूड! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ मूड! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आता माझा मूड नाही! “

हे वाक्य अखिल मानवजात आपापल्या मातृभाषेत किमान दिवसातून एकदा किंवा सकाळी उठल्यापासून काहीच मनासारखं होतं नसेल तर अनेकदा वदत असावी!

एवढंच कशाला, ज्या लहानग्यांना या शब्दाचा अर्थ तर सोडाच, स्पेलिंग पण येत नसेल अशी चिमुरडी मुलंसुद्धा हा शब्द, अर्थात आपल्या पप्पा, मम्मीचे ऐकून आजकाल उच्चारत असतात, आता बोला!

प्रत्येक शब्दाचे एक उगम स्थान असते, तसे या मूड शब्दाचे पण असावे, पण ते सांगण्याच्या मूड मधे मी नाही, असं मी म्हणणार नाही, कारण ते मला खरंच ठाऊक नाही! आणि यात कमीपणा असण्याचे सुद्धा काही कारण नाही, असं आपलं मला माझा मूड चांगला असला तरी वाटतय! या माझ्या अशा वाटण्याला वाचकांचा मूड चांगला नसेल तर बाधा येण्याचा संभव नाकारता येत नाही बरं का मंडळी! तर अशा या मूड शब्दाच्या उत्पत्तीवर भाषा शास्त्रातले जाणकारच त्यांचा मूड असेल तर, अधिक प्रकाश टाकतील या बद्दल मला शंका नाही!

माझ्या मनांत कायम एक प्रश्न माझा मूड चांगला असला की या संदर्भात उभा राहतो. तो असा, की हा मूड शब्द प्रचारात येण्याआधी आपण सगळेच त्यासाठी कोणता पर्यायी शब्द आपापल्या मातृभाषेत वापरत होतो? या माझ्या प्रश्नावर सुद्धा वर म्हटल्या प्रमाणे पुन्हा भाषाशास्त्रातले जाणकारच एकदा त्यांचा मूड नसला तरी प्रकाश टाकू शकतील याची बालंबाल खात्री मला आहे! आता तुम्ही म्हणाल प्रथम मी शंका नाही असं म्हटलं आणि आता बालंबाल खात्री आहे असं कोणत्या मूड मध्ये म्हणतो आहे? तर तुमच्या या मनांत उभ्या राहीलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला कुठल्याही मूडची आवश्यकता नाही बरं का मंडळी! तुमच्या मनांत असा प्रश्न तुमचा मूड चांगला नसल्याने जर का उभा राहिला असेल तर त्याचे उत्तर असं, की पहिल्या प्रश्नाचे उत्तर भाषातज्ञाना देता आल्यावर माझा हा दुसरा प्रश्न त्यांच्यासाठी, त्यांचा मूड कसाही असला तरी, किस झाडकी पत्तीच वाटणार! म्हणूनच मी खात्रीपूर्वक असा शब्द माझा मूड चांगला लागल्याने वापरला. असो!

ह्या मूड शब्दाला निदान आपल्या मराठी भाषेत तरी कोणता पर्यायी शब्द आहे, हे जर मला लवकरात लवकर कळले (हे परत भाषातज्ञाच्या मूडवर अवलंबून बरं का) तर मी त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि माझ्या कोणत्याही मूड मधे हे असिधाराव्रत पूर्ण करण्याचे मी ठरवले आहे. मग ते करत असतांना समोरच्या माणसाचा मूड काय आहे हे मी कधीच ध्यानात घेणार नाही, याची माझी मलाच खात्री आहे! कारण कितीही झालं तरी मूड हा शब्द आपल्या मातृभाषेतला नाही, हे आपण आपला मूड कसाही असला तरी मान्य करालच कराल! तो आपण सर्वांनीच कुठून आणि कसा उचलला, आपल्या समृद्ध अभिजात मराठी भाषेत आणला आणि आपल्या कुठल्याही मूड मध्ये तो वापरण्या इतका, आपण आपल्या नकळत कसा प्रचलित केला, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल! किंवा या मूड शब्दाचा आपल्या साहित्यात कुठल्या लेखक महाशयांनी, त्यांच्या कुठल्या मूड मध्ये प्रथम वापर केला, हा सुद्धा तुमच्या मूडला साजेसा नसला तरी, वरील संशोधनाचा उपप्रश्न ठरू शकतो यात दुमत असण्याचे कारण नाही आणि या अशा उपप्रश्नामुळे कुणाचा मूड बिघडेल असं मला अजिबात वाटत नाही.

माझ्या लिहिण्याच्या मूडमधे मी लिहीत गेलो आणि आपला मूड हे वाचत असतांना कसा होता आणि आता हे सगळे वाचून झाल्यावर कसा आहे, हे आपण मला, आपला मूड लागेल तेव्हा नक्कीच कळवाल, या आशादायक मूड मध्ये मी सध्या आहे, याची खात्री बाळगा!

आपल्या सर्वांचाच मूड (दुसरा पर्यायी शब्द कोणीतरी सांगे पर्यंत) काही ना काही कारणांनी कायमच चांगला राहो, हीच त्या विधात्याच्या चरणी (ज्याचा मूड कधीही बिघडत नाही असं काही भाविक म्हणतात) माझी मूडभरी प्रार्थना!

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शेवटचा दुर्दैवी अध्याय …’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शेवटचा दुर्दैवी अध्याय …’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

सुवर्णमहोत्सवी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या प्रभात कंपनीच्या संत तुकारामया चित्रपटाच्या गाथेचा शेवटचा अध्याय दुर्दैवीच म्हणायचा.

ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू आणि वास्तू जपण्यात आपण भारतीय किती संवेदनशील (! ) आहोत याच्या खुणा देशातील कानाकोपऱ्यात आढळून येतात.

– – व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्तम चित्रपट’ हे ‘संत तुकाराम’ चे मूळ प्रमाणपत्र बरीच वर्षे हरवलेले होते. कोणाकडून, कां, कसे, कधी, हे प्रश्न इथे असंबद्ध आणि अप्रासंगिकच समजा. आपल्याला वाटत असेल, होता तो केव्हाचा तरी जुन्या जमान्यातील एक सिनेमा! एवढे काय मनाला लावून घ्यायचे! मुळात ते हरवलेले अमूल्य कागद गवसले नसते तरी ‘अळी मिळी गुप चिळी’ म्हणत आम्ही स्वस्थ बसलो असतो.

पण तुकारामांची फरफट आजच्या जमान्यात देखील सुरु ठेवण्यात अग्रेसर असलेले आपण कर्मदरिद्री आहोत हे एका प्रसंगाने दाखवून दिले – – 

– – – १९३६ सालचे ते हरवलेले मूळ प्रमाणपत्र १९७४ साली तिरुवनंतपुरमच्या सनी जोसेफ नामक सिनेमॅटोग्राफरला पुण्यातील लॉ कॉलेजच्या कचराकुंडीत सापडले. बहुदा पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीच्या मूळ परिसरात १९६० साली भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था सुरु होणार असताना ‘आवाराची साफसफाई’ करतांना हे कागद कचराकुंडीत गेले असावेत.

– – – असो, जोसेफ यांनी ते मौल्यवान कागद २००२-२००४ च्या दरम्यान पुण्यातील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुरक्षितपणे जतन करण्यासाठी सुपूर्द केले.

मैत्रांनो, ही माहिती वाचल्यावर मला एक गोष्ट ध्यानात आली की ज्या व्यक्तीला ते कागद सापडले तो सिनेक्षेत्राशी जोडलेला होता म्हणून त्याने किमान त्यांची किंमत ओळखली, अन्यथा… अधिक काय बोलणे?

 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सुगंधययोग’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘सुगंधययोग’ ☆ श्री दिवाकर बुरसे

इंद्रियभोगातून आत्मबोधाकडे

 — सुगंधाच्या माध्यमातून जीवनसमृद्धी व* *अध्यात्माचा सेतू*

प्रास्ताविक:

भारतीय जीवनदृष्टीत सुगंध हा केवळ इंद्रियांचा विषय नाही. तो दृश्य नाही, स्पर्श्य नाही; तो आसमंतात, सर्वत्र व्यापून राहतो. तो स्मृती चाळवतो, मन शांत करतो, शरीरावर परिणाम घडवतो, व्यक्तीला प्रमुदित, उल्हसित करतो तर साधकाला अंतर्मुख करतो.

म्हणूनच भारतीय शास्त्रपरंपरेत सुगंधाला भोग आणि योग यांच्यातील सेतू मानले गेले आहे. गंध हा स्थैर्याचा, धारणा-शक्तीचा, पोषणाचा गुण आहे. जिथे सुगंध आहे, तिथे तृप्त जीवन आहे.

गंधशास्त्र : भौतिकतेपासून अध्यात्मापर्यंत

आज ‘परफ्यूम’ हा शब्द ऐकला की लक्झरी, उच्छृंखलता, स्वैरता, सौंदर्य, आकर्षण यांची आठवण होते. परंतु भारतीय गंधशास्त्रात सुगंधाचा उद्देश केवळ आकर्षण नव्हता; तो आरोग्य, मनःशांती, सामाजिक प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती यांचा एकत्रित विचार करत होता.

रामायणात अयोध्येचे वर्णन येते. त्यात ‘ नगरातील पुष्पवाटिका सुगंधाने भरलेल्या आहेत ‘ असा आवर्जून उल्लेख केलाय महर्षींनी. इथे राज्याची समृद्धी सुगंधाने व्यक्त होते. समृद्ध समाज सुगंधलोलुप असतो. गृहस्थाने ऋतुमानानुसार सुगंध धारण करावा असे शास्त्र सांगते. हे भारतीय समृद्ध संस्कृतीचे सूक्ष्म संकेत आहेत.

गंगाधरकृत ‘ गंधसार ‘

सर्व गंधांचे सार

या गंधपरंपरेचे शास्त्रबद्ध रूप म्हणजे _’गंधसार’. _ ‘गंगाधरा’ने रचलेला हा ग्रंथ सुगंधनिर्मिती, इत्र, धूप, सुगंधी तेल, अंगराग, अंगलेप, सौंदर्यप्रसाधने आणि औषधी गंध यांचे तंत्रशुद्ध विवेचन करतो. “सर्व गंधांचे सार” हे नाव केवळ काव्यमय वर्णन नाही; ते ग्रंथाच्या आशयाचे नेमके वर्णन आहे.

हा ग्रंथ केवळ शृंगार, भक्ती, पूजेसाठी नाही, तर तो

वैद्यांसाठी,

राज सभांसाठी,

जनसम्मेलनांसाठी,

उत्सव – महोत्सवांसाठी,

शोभायात्रांसाठी

व्यापाऱ्यांसाठी, आणि

 साधकांसाठीही आहे.

श्लोकबद्ध विज्ञान आणि सौंदर्य

गंधसार श्लोकबद्ध ग्रंथ आहे. परंतु हे काव्य अलंकारासाठी नाही; ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय, त्यातील गंधशास्त्रसिद्धांत स्मरणसुलभ व्हावेत म्हणून. हे सूत्ररूपात मांडलेले ज्ञान – विज्ञान आहे.

सुगंधीं पुष्टिवर्धनम ।

गंध मनाला प्रसन्नता देतो आणि शरीराला पुष्टी देतो. गंधसार हीच भूमिका स्वीकारतो.

 

सुगंधांचे वर्गीकरण : द्रव्य आणि गुण

गंधसारमध्ये सुगंधांचे वर्गीकरण पुष्पगंध, काष्ठगंध, मूलगंध, फलगंध आणि प्राणिज गंध असे केले आहे. हे वर्गीकरण केवळ भौतिक नाही; ते गुणात्मकही आहे.

चंदनाचा गंध शीत, प्रसन्न, सत्त्ववर्धक आहे.

अगरुचा गंध उष्ण, स्थिर, वातशामक आहे.

कस्तुरी प्राणिज असूनही चेतनाशील आणि शक्तिवर्धक आहे.

म्हणूनच गंध हा द्रव्य आणि गुण यांच्यातील दुवा ठरतो.

 

कामसूत्रातील गंधयुक्ती : सुगंधाला लाभलेली सांस्कृतिक प्रतिष्ठा

भारतीय परंपरेत सुगंधनिर्मिती ही केवळ गृहकला नव्हती; ती एक प्रतिष्ठित विद्या मानली जात होती. वात्स्यायनाने आपल्या ‘कामसूत्र’ ग्रंथात सांगितलेल्या चौसष्ट कलांपैकी ‘गंधयुक्ती’ ही एक महत्त्वाची कला आहे. गंधयुक्ती म्हणजे सुगंधांची निर्मिती, त्यांचे योग्य संयोग, संवर्धन आणि उपयोग यांचे शास्त्र. ही कला केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर सामाजिक प्रतिष्ठा, व्यक्तिमत्त्व विकास, प्रणय, आरोग्य आणि मानसिक प्रसन्नता यांसाठी आवश्यक मानली गेली होती.

वात्स्यायन सांगतो की सुसंस्कृत नागर व्यक्तीने सुगंधांची जाण ठेवली पाहिजे. ऋतूनुसार, प्रसंगानुसार आणि व्यक्तीनुसार योग्य गंधांची निवड हीच गंधयुक्तीची खरी कसोटी. यावरून स्पष्ट होते की सुगंधनिर्मिती ही त्या काळी स्त्री-पुरुष दोघांसाठीही एक सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण आणि प्रतिष्ठेची कला होती.

पुढे गंधसारसारखे ग्रंथ हीच परंपरा अधिक शास्त्रबद्ध, आयुर्वेदाधिष्ठित आणि तांत्रिक पातळीवर विकसित करतात. त्यामुळे कामसूत्रातील गंधयुक्ती आणि गंधसारातील गंधशास्त्र हे एका अखंड सांस्कृतिक परंपरेचे दोन टप्पे ठरतात.

 

गंधयुक्ती : रसायन नव्हे, संस्कार

गंधसारमधील भावना, पाचन, वेधन, संयोग, धूपन या प्रक्रिया पाहिल्या की लक्षात येते, येथे केवळ मिश्रण नाही, तर संस्कार आहे.

आयुर्वेदानुसार –

संस्कार म्हणजे गुणांचे रूपांतर. 

गंधयुक्ती म्हणजे द्रव्याला नवा गुण देणे. जड पदार्थाला सूक्ष्म आणि परिणामक्षम बनवणे.

 

सौंदर्य आणि समृद्धी

गंधसारमध्ये वर्णन केलेले अंगलेप, विलेपने, सुगंधी तेले, उटणी इ. केवळ सौंदर्यासाठी नाहीत तर आरोग्यासाठी आहेत. तसेच ही द्रव्ये सामाजिक प्रतिष्ठा, आकर्षण आणि समृद्धीची द्योतके आहेत.

प्राचीन राजसभा सुगंधाने ओळखल्या जात. निमंत्रितांचे स्वागत अत्तर लावून व सुगंधी जल शिंपडून केले जायचे. जसे राजशिष्टाचारात सुगंधांचे महत्व तसेच सार्वजनिक सभा संम्मेलनात, उत्सवकार्यात.

व्यापारात विविध रत्ने, चांदी, सोने या धातूंप्रमाणे सुगंधी द्रव्ये, इत्र, केशर, कसुरी इ. या मौल्यवान वस्तू मानल्या जात. त्याच्या विक्रीतून व्यापा-याला उत्तम प्राप्ती होत असे. त्यामुळे सुगंध हा अर्थकारणाचाही भाग होता.

 

आयुर्वेद आणि गंधसार : शरीर–मन–आत्मा

शरीर आणि मन यांचे स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. 

गंधसार या आरोग्याला सुगंधाच्या माध्यमातून साधतो. वात-पित्त-कफ दोषांनुसार गंध निवडणे ही पूर्णतः आयुर्वेदिक संकल्पना आहे.

वातासाठी — उष्ण, स्थिर गंध

पित्तासाठी — शीत, मधुर गंध

कफासाठी — तीक्ष्ण, उष्ण गंध

 

गंधचिकित्सा : नासिकेतून मनापर्यंत

नाक हे जसे श्वासाचे तसेच मनाचेही द्वार आहे, ही कल्पना भारतीय शास्त्रांना ज्ञात होती. योगशास्त्र म्हणते-

नासिकाग्रभागी मन एकाग्र करावे.

नाकातून प्रवेश करून सुगंध थेट मनावर परिणाम करतो. म्हणूनच गंधसारमध्ये अनिद्रा, चिंता, उदासीनता यांवर गंधोपचार सांगितले आहेत. आधुनिक Aromatherapy याच परंपरेचा आधुनिक अवतार आहे.

 

त्रिगुण आणि सुगंध

सत्त्व, रज, तम हे त्रिगुण

गंध हे मनोगुण बदलू शकतात.

सत्त्ववर्धक — चंदन, कमळ

रजशामक — अगरु

तमोनाशक — कर्पूर, धूप

साधनेत वापरला जाणारा धूप हा केवळ वातावरण सुगंधी करत नाही; तो मन शुद्ध करतो, ध्यानास सहाय्य करतो.

 

अध्यात्म आणि सुगंध

पूजेत देवाला नाना परिमल द्रव्ये अर्पण करावीत. _“यत्र गन्धः तत्र देवता: । जिथे सुगंध आहे, तिथे देवता वास करतात. _

सुगंध सूक्ष्म आहे. तो अहंकार तोडतो, मन प्रसन्न करतो, वातावरण पवित्र करतो. म्हणूनच धूप, अगरबत्ती, चंदन यांचा उपयोग पूजेत, साधनेत अनिवार्य मानला जातो.

 

भोगातून योगाकडे

गंधसारची सर्वात मोठी देणगी म्हणजे तो भोग आणि योग यांना परस्परांच्या विरोधात उभे करत नाही. सुगंध सौंदर्य देतो, आरोग्य देतो, व्यापार घडवतो आणि त्याच वेळी मन शुद्ध करून अध्यात्माकडे नेतो.

 

उपसंहार : सुगंध — एक सूक्ष्म साधना

आयुर्वेद तत्त्वज्ञान देतो.

गंधसार त्या तत्त्वांना अनुभव देतो.

सुगंध ही केवळ लक्झरी नाही; ती संस्कृती आहे.

तो केवळ भोग नाही; ती साधना आहे.

गंधसार हा ग्रंथ वाचकाला भान देतो की, जीवन समृद्ध हवे असेल, तर ते सुगंधी असले पाहिजे! 

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रेण्टल फॅमिली… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रेण्टल फॅमिली… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

काल ‘Rental Family’नावाचा चित्रपट पाहिला.

वरवर पाहताना ही गोष्ट अशा एका व्यवसायाची वाटते जिथे तुम्ही पैसे देऊन वडील, आई, किंवा जोडीदार ‘भाड्याने’ घेऊ शकता. पण जसजशी कथा पुढे सरकते, तसतसं जाणवते की हे केवळ पैशांचे व्यवहार नाहीत, तर ते आपल्या समाजातील ‘एकाकीपणाचं’ एक भयाण वास्तव आहे.

त्या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे माझ्या काळजाला भिडले.

त्यातला एक प्रसंग म्हणजे, एका माणसाला तो मेल्यावर त्याच्या फ्युनरलला इतर माणसं कशी त्याची आठवण काढत रडतायत, हे फिलींग अनुभवायचं असतं. त्यासाठी तो ही सर्विस घेतो.

खरंतर त्या व्यक्तीला माहीत असतं की ही समोरची माणसं फक्त ‘अभिनय’ करत आहेत, तरीही त्यांच्याकडून मिळणाऱ्या दोन शब्दांच्या मायेसाठी तो लाखो रुपये खर्च करायला तयार असतो.

आणि त्यांच्या त्या शब्दांनी त्याला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते.

हा चित्रपट पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे माणसाला अन्नाइतकीच भावनिक ओलाव्याचीही भूक असते.

‘Rental Family’‌ मध्ये आपण पाहतो की, लोक केवळ संवाद हवा म्हणून पैसे मोजतात. पण जेव्हा आपलं हेच नातं नैसर्गिक आणि भावनिकदृष्ट्या घट्ट असतं, तेव्हा ते आपल्याला केवळ आनंदच नाही, तर ‘गगनभरारी’ घेण्याचं बळ देतं.

जेव्हा आपल्याला माहीत असतं की, “जर मी गोते खात पडलो, तर मला सावरणारे हात आहेत,” तेव्हा आपण आयुष्यात मोठे निर्णय घ्यायला घाबरत नाही.

हे नात्यातील डीप इमोशनल कनेक्शन आपलं ‘सिक्युरिटी नेट’ बनतं.

या चित्रपटातून मला पुन्हा एकदा जाणवलं की, हजार दिखाऊ नात्यांपेक्षा आपल्या आयुष्यात ती ‘एक’ व्यक्ती महत्त्वाची असते, जिच्याकडे आपण आपलं मन मोकळं करू शकतो आणि असं सिक्युरिटी नेट असलेलं नातं निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या रिलेशनशिप स्किलवर काम करणं अत्यावश्यक आहे.

खरी नाती आपल्यासाठी आरसा बनतात . ती आपल्या चांगल्या गुणांचे कौतुक करतात आणि त्याचबरोबर आपल्या चुकांचीही जाणीव करून देतात.

Love relationship is an opportunity to take ownership of our shadow parts.

जेव्हा आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून स्वतःकडे पाहतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि एक चांगली व्यक्ती बनण्याची प्रेरणा देते.

संशोधन सांगतं की, ज्यांची कौटुंबिक आणि सामाजिक नाती घट्ट आहेत, त्यांची निर्णयक्षमता अधिक चांगली असते.

‘रेण्टल फॅमिली’ मधला तो एकाकीपणा माणसाला आतून पोखरतो, पण याउलट, खरी माया माणसाला ऊर्जा देते.

भावनिक आधार = कमी ताणतणाव

कमी ताणतणाव = कामात जास्त एकाग्रता

एकाग्रता = हमखास यश

अनेकदा माणसं करिअरच्या मागे धावताना जवळच्या नात्यांना ‘टेकन फॉर ग्रांटेड’ धरतात.

पण लक्षात ठेवा, नोकरी/बिझनेस रिलेशनशिप फक्त त्यांच्या ग्रोथसाठी आपल्या सोबत असतात.

आपण आजारी पडल्यावर, खरोखरच भावनिक ओलाव्याचीही गरज असते. तेव्हा बिझनेस रिलेशनशिप कामी येत नाहीत.

एखादा मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळालेल्या तुमच्या यशाचा आनंद साजरा करायला प्रेमाची व्यक्ती सोबत कोणी नसेल, तर त्या यशाला काहीच अर्थ उरत नाही.

पैशाने आपण ‘माणसं’ गोळा करू शकतो, पण ‘माया’ नाही. आणि प्रगतीसाठी माणसांच्या गर्दीपेक्षा मायेची ऊब जास्त कामाला येते.

म्हणूनच आजपासून एक गोष्ट करायला सुरुवात करा.

नोकरी /व्यवसायाच्या ‘रेण्टल’ जगात सतत राहण्यापेक्षा, आपल्या खऱ्या जवळच्या माणसांशी दिवसातून एकदा तरी मनमोकळं बोला.

तुम्हाला सायलेंटली सपोर्ट करणाऱ्या व तुमच्या यशात ज्यांचा वाटा आहे, त्यांना “तुझ्यामुळे मी इथवर पोहोचलो,” असं सांगायला विसरू नका.

लक्षात घ्या, कधीकधी जवळच्या व्यक्तीला फक्त तुमचं ऐकून घेणं हवं असतं, तुमचा वेळ हवा असतो आणि ही गोष्ट कोणत्याही महागड्या भेटीपेक्षा त्यांच्यासाठी मौल्यवान असते.

चला तर मग, आपण आपली नाती इतकी घट्ट करूया की आपल्याला कोणत्याही ‘रेण्टल’ आधाराची गरज पडणार नाही. कारण जेव्हा मनं जोडलेली असतात, तेव्हाच आयुष्याची खऱ्या अर्थाने वाढ होते!

तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रगतीत तुमच्या जवळच्या व्यक्तीचा भावनिक पाठिंबा किती मोलाचा ठरला?

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ९ – रक्तचंदन बाहुली -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ९ – रक्तचंदन बाहुली – ☆ विभावरी कुलकर्णी

काही दिवसापूर्वी रस्त्याने चालत असताना, एक मुलगी लंगडत चालताना दिसली. तिला विचारले असता, पाय मुरगळला आहे आणि डॉ. कडे जात आहे असे समजले. मग मला आठवले आमच्या लहानपणी असे काही दुखणे झाले की, आजी घरीच एक लेप लावायची. आणि त्यातील औषधे मी प्रथमोपचार म्हणून जपली आहेत. आणि त्याचा वापरही चालू असतो. तर आता त्यातील एक महत्वाची वस्तू म्हणजे रक्तचंदन बाहुली. मला आठवते माझ्याकडे खेळण्यातील अशीच लाकडी बाहुली ठकी होती. आणि तिच्याशी खेळण्यात खूप मजा वाटायची. किती दिवस मला या दोन्हीतला फरक कळत नव्हता. आणि आजीने ही रक्तचंदनाची बाहुली उगाळली, की माझ्या बाहुलीचे पाय सहाणेवर घासून झीजवले म्हणून मी रडत असे. मग आजी मला दोन्ही बाहुल्या दाखवून तुझी ठकी सुखरूप आहे. हे समजावत असे. मला वाटते बऱ्याच जणांना ही औषधी बाहुली परिचित नसेल.

‘रक्तचंदनाची बाहुली’ म्हणजे विसरला गेलेला आजीच्या बटव्यातील ‘घरगुती डॉक्टर’!

​आजच्या काळात छोटी जखम झाली किंवा मुकामार लागला की आपण लगेच मलम किंवा पेनकिलरकडे वळतो. पण ६-७ दशकांपूर्वी प्रत्येक घरात एक हक्काचा ‘वैद्य’ असायचा, तो म्हणजे ‘रक्तचंदनाची बाहुली’. माझ्या घरी ही बाहुली माझ्या पणजीच्या काळापासून, म्हणजे तब्बल १२० वर्षांपासून जपलेली आहे!

​हे रक्तचंदन म्हणजे नक्की काय? तर ​याचे शास्त्रीय नाव ‘टेरोकार्पस सॅन्टलिनस’ (Pterocarpus santalinus) असे आहे. हे केवळ दक्षिण भारतात मुख्यतः आंध्र प्रदेशातील शेषचलम डोंगररांगात आढळणारे दुर्मिळ झाड आहे.  

पांढरे चंदन सुवासिक असते, पण रक्तचंदनाला अजिबात सुगंध नसतो.

हे लाकूड इतके वजनदार आणि घन असते की पाण्याचा तांब्या भरून त्यात लाकूड टाकले तर ते बुडते. जे लाकूड पाण्यात बुडते, तेच अस्सल रक्तचंदन!

रक्तचंदनाच्या बाहुलीचे औषधी उपयोग अनेक आहेत. ​रक्तचंदन हे आयुर्वेदानुसार ‘शीत’ (थंड) आणि ‘दाहशामक’ गुणांचे असते. याचे उपयोगही अनेक आहेत.

खेळताना किंवा कामाच्या वेळी पडल्यामुळे शरीरावर सूज येते आणि त्वचा लाल होते. अशा वेळी ही बाहुली सहाणेवर पाणी टाकून उगाळावी. त्याचा जाडसर लेप सुजेवर लावल्यास वेदना कमी होतात.

जुन्या सांधेदुखीवर किंवा हाडात ठणका असल्यास, रक्तचंदनाचा लेप लावून तो वाळू द्यावा. लेप वाळताना तो त्वचा ओढून धरतो, ज्यामुळे आतील सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जुनी जाणती माणसे त्याला ओढा घालणे म्हणायची.

रक्तचंदन त्वचेसाठी उत्तम असते. चेहऱ्यावरील मुरुमे (Pimples), काळे डाग किंवा उन्हामुळे होणारी जळजळ यावर याचा पातळ लेप लावल्यास त्वचा उजळते आणि थंडावा मिळतो.

जखमेतून रक्त येत असल्यास किंवा जखम भरून येत नसल्यास, पूर्वी याचे चूर्ण वापरले जात असे. यात नैसर्गिक ‘अँटी-सेप्टिक’ गुणधर्म असतात.

​केवळ लेप लावून उपयोग होत नाही, तर त्यामागे एक जुनी पद्धत आहे. त्याच पद्धतीने ती बाहुली उगाळावी लागते. दगडी सहाणेवर थोडे पाणी घेऊन बाहुली गोलाकार फिरवून लेप तयार करायचा असतो. सुजेच्या जागी जाड थर लावायचा. लेप पूर्णपणे वाळल्यावर त्यावर सोसवेल इतक्या गरम मिठाच्या पुरचुंडीने शेक द्यायचा. या उष्णतेमुळे चंदनाचे औषधी गुणधर्म त्वचेच्या आतपर्यंत पोहोचतात.

या लाकडाला मुद्दाम बाहुलीचा आकारच दिलेला असतो.

​हे लाकूड खूप कडक असते. ते उगाळताना हाताची पकड निसटू नये आणि व्यवस्थित दाब देता यावा, या उद्देशाने जुन्या कारागिरांनी या लाकडाला ‘बाहुली’चा (मानवी आकृती) आकार दिला.

​हा केवळ एक लाकडाचा तुकडा नाही, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आरोग्याचा अनमोल ठेवा आहे. आज ही बाहुली दुर्मिळ होत चालली आहे, पण तिचे महत्त्व आजही तितकेच आहे. पूर्वी लग्नात मुलीला आठवणीने ही बाहुली दिली जायची. तिला साडी नेसवून सजवून दिली जायची. जणू काही, तुला आता घरातील लोकांची काळजी घ्यायची आहे, हे सुचवायचे असावे. आणि ती मुलगी सुद्धा अशा माहेरच्या वस्तूंची जपणूक करत असे. आणि वेळेवर त्याचा वापर करत असे.

​तुमच्याकडे आहे का अशी जुनी बाहुली?

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काय बनायचं.. गाढव? की घोडा? – लेखक : श्री नाना पाटेकर☆ संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ काय बनायचं.. गाढव? की घोडा? – लेखक : श्री नाना पाटेकर☆ संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली.. आणि आता..

नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

 

.. परीक्षेत १००% पाहिजेत..

.. कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे.

.. त्यानंतर Dance क्लास attend करायचा.

.. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे!!

.. मग drawing competition असते.

.. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.

 

–– Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.

–– एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.

— आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.

 

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी.. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत… जरा शुद्धीवर आली की “what is square of 12? ” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

 

मुलांना एक प्रश्न विचारला होता — ” तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात? “

तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात….. ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही… पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही… School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.

.. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर 

लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले.. आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात

 शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात.

.. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

 

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात.

लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात.

ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग…

vitamins, DHA, minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात.

… वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium, proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली – – आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन!!

 

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते.

संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही.

मित्र फक्त WhatsApp, face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते… ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात.

… ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते, त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.

… ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण-तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली.

… एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते.

कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती…

.. आता मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.

 

– – अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.

 – – guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.

लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत.

 

… काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय… पण त्यात देशाचं नाही.. भांडवलदारांच हित साधला जातंय.

… पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील…

 

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? … असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात.

– – “निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत.

– – जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका.. प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल.. ह्याची सतत तपासणी होते.

 दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत.

अनावश्यक विषय शिकवत नाहीत.

– – चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

– – प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

 

शिक्षण काय असतं? – – 

रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा… 

टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता.

.. तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय… गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती.

सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- 

“ या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का? ” 

टागोर म्हणाले—

“चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची.

ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “

 

… टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात.

.. आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात!

– – मग एक रेस सुरु होते..

… आणि जगायचं राहून जातं!!

लेखक : श्री नाना पाटेकर 

संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares