☆ शतजन्म शोधिताना या नाट्यगीता चे रसग्रहण ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆
(सावरकर पुण्यतिथी दि.२६ फेब्रुवारी निमित्त…)
संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सुवर्णाक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे सावरकरांनी, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेली अजरामर नाट्यकृती “ संन्यस्त खड्ग ! “ १८ सप्टेंबर १९३१ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आता शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे याची!
या नाट्यकृतीतल्या… वैश्विक अनुभूती आणि एका वेगळ्याच विरहानुभूतीचा स्पर्श लाभलेल्या, भैरवी रागातल्या अवीट आणि अमीट सुरांची झालर असलेल्या एका नाट्य पदाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरंतर सावरकरांच्या भावना, कल्पना आणि विचारांचं… उदात्त, उन्नत आकाश दोन बोटांच्या चिमटीत धरणं, सामावणं शक्यच नाही. पण तरीही हे शिवधनुष्य… काही क्षणांपुरतं का असेना… पेलून बघणार आहे…
नाट्यपद…
शत जन्म शोधितांना। शत आर्ति व्यर्थ झाल्या।
शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या |
*
तेव्हा पडे प्रियासी| क्षण एक आज गांठी |
सुख साधना युगांची| सिद्धीस अंती गाठी।
*
हा हाय जो न जाई| मिठी घालू मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी |
हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाशी संबंधित आहे. बुद्धांच्या सांगण्यावरुन ‘शाक्य’ सेनापती विक्रमसिंह आणि शाक्य जनता, शस्त्र त्याग करून संन्यास घेतात. काही काळ जातो. दरम्यान विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचना नावाच्या युवतीशी प्रेमविवाह करतो. लग्नाला वर्ष उलटल्यानंतर वल्लभ आणि सुलोचना यांच्या मिलनाचा / भेटीचा योग येतो. आणि… तो बहुप्रतिक्षित मधुर मिलनाचा क्षण येतो… पण हाय रे दैव!
त्याचवेळी, कोसल देशाचा राजा… विद्युतगर्भ याने आक्रमण केल्याची वार्ता येते आणि शाक्य राष्ट्राला वाचवण्यासाठी, वल्लभालाही पाचारण केले जाते. कपिलवस्तुचा पाडाव टळावा म्हणून संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. वल्लभही मग संन्यास धर्माचा संन्यास घेत… युद्धात उतरतो. म्हणून नाटकाचं नाव.. “संन्यस्त खड्ग!!”
मिलनाच्या क्षणीच झालेली ताटातूट, त्यामुळे सुलोचनेच्या मनाची झालेली अवस्था, विरह वेदनेचे, हतोत्साहित, विकल, असहाय असे मनोभाव… सगळ्याच… विभाव, अनुभाव आणि संचारी भावांसह, रस निष्पत्ती पर्यंत पोहोचविणारं हे नाट्यपद!!
सुलोचना आपल्या प्रिय सखीला… नलिनीला, वल्लभाच्या ऐनवेळी असं निघून जाण्याने, तिच्या मनात उठलेलं भावनांचं वादळ, विचारांचा कल्लोळ… कथन करते आहे…. ते शब्दांकन म्हणजे हे पद!
सुलोचना अगतिक होते आणि म्हणते… असा पती लाभावा म्हणून मी शत जन्म शोधत राहिले गं! त्यासाठी मी शत-शत/अगणित, आरती केल्या. परमेश्वराच्या आळवण्या केल्या. तो भेटावा म्हणून शतजन्म वाट पाहिली. पण सखी, बघ ना, काय झालं…
‘शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या! ‘
… या ओळींमध्ये शब्द.. शत सूर्य मालिका…. सावरकरांचं विश्वाच्या भव्यतेचं आकर्षण आणि विराटतेची ओढ व्यक्त झाली आहे. उत्तुंग कल्पना शक्ती, आशयातील भावोत्कटता जाणवते आहे. त्यातूनच सुलोचनेची मनोवस्था डोळ्यासमोर येते. ‘ दीपावली विझाल्या ‘ यातला विझाल्या हा अगदी अनवट असा शब्द प्रयोग…. तिच्या मनातले, मिलनोत्सुक आशेचे… शत-शत दीप विझले.. हे सूचित करतो… अगदी प्रत्यक्षानुभूतीच दिलीयं!
पुढील ओळीत सुलोचना म्हणतीये…
‘ तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गांठी!
सुख साधना युगाची, सिद्धीस अंति गाठी!‘
… या ओळी म्हणजे… यमक आणि श्लेष या दोन्ही अलंकाराच्या गाठभेटीचा उत्तुंग आणि उत्कट क्षण!!
प्रिय मिलनाचा, शत जन्म वाट पाहिलेला क्षण, आज गांठी आला, गाठला एकदाचा, प्राप्त झाला, मिळाला…. असं वाटतंय! आणि मनात एकच विचार येतोयं की… शतजन्माच्या माझ्या साधनेने, सिध्दी गाठली. साधना आणि सिद्धीची गाठ पडली!! प्रिय आराधना, तपस्या, साधना सफल झाली.
गाठी या शब्दांत, यमक आणि श्लेष या भाषालंकारांचा उपयोग करून… या पदातल्या, सुलोचनेच्या भावनांची अगदी… ये हृदयीचे, ते हृदयी…. म्हणजे प्रेक्षक वृंद हृदयी… गाठी घातली अंती… हीच भावना येते.
शेवटच्या दोन ओळी तर… कल्पनेची उत्तुंगता, आशयघनता, शब्दकळा, आणि भावनोत्कटता या सगळ्याचाच परिपूर्ण, परिपक्व, परिणाम म्हणावा !
सुलोचना सांगतीये… अगदी सजीव, सगुण, साकार दर्शन… त्या एका कृतीची साक्षात्कारी अनुभूती देत की…
हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी
क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी!!
… सखी, बघ ना, तो मधुर मिलनाचा क्षण आला… मी उठून माझ्या वल्लभाला मिठी घालायला गेले… आणि… आणि, निमिषार्धात्.. तो क्षण.. क्षणात निसटून गेला गं माझ्या हातून.. अगदी काही कळायच्या आत!… किती ही वैश्विक अनुभूती! आध्यात्मिक किनार लाभलेली! कुठेतरी याच ओळी आठवतात… ‘ पाया पडू गेले तव, पाऊलचि ना दिसे!!! ‘
विरहाची काळ हा प्रदीर्घ भासतो, मात्र मिलनाचा काळ अत्यल्प भासतो.. असंही सुचवलयं ! ‘ क्षण तो क्षणात गेला…. ’ या सावरकरांच्या ओळीचं खरं मोल जाणून, भाषाप्रभू पु. ल. म्हणतात… ‘ या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल द्यायला हवं. ‘
हा खरा गौरव आहे त्या… ओळी सुचलेल्या क्षणांचा, सुलोचनेच्या हातून निसटलेल्या त्या हुरहुर लागलेल्या क्षणांचा !
या पदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे… हे मिलनाच्या आधीचं नाही तर नंतरचं विरह गीत आहे. हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहुर लागते. भैरवी रागातल्या सुरांची झालर असलेलं हे नाट्यपद… ‘आर्ति व्यर्थ झाल्या’ मधली आर्तता आणि ‘ क्षण तो क्षणात गेला ’ मधली क्षणभंगुरता स्पष्ट करतं… प्रेक्षकांच्या हाती मात्र खूप काही, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावून गेलं… असंच म्हणावसं वाटतं.
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ९ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
अभंगांतून कळलेले संत तुकाराम(२)
आजच्या लेखातही अभंगातून कळलेल्या संत तुकाराम महाराजांविषयी
आपण बोलणार आहोत.
बोलावा विठ्ठल/ पहावा विठ्ठल/
करावा विठ्ठल/ जीवे भावे//
येणे सोसे मन/ झाले हाव भरी/
परती माघारी/ येत नाही//
बंधनापासूनी/ उकलल्या गाठी/
देता आली मिठी/ सावकाश//
तुका म्हणे देह/ भरीला विठ्ठले/
काम क्रोधे केले/ घर रिते//
विदुषी किशोरीताई अमोणकर यांनी हा अभंग त्यांच्या गोड गळ्यातून गाऊन अतिशय प्रसिद्ध करून ठेवला आहे.
या अभंगातून आपल्याला स्पष्ट दिसून येते की तुकाराम महाराजांची भक्ती आता सगुणाकडून निर्गुणाकडे जात चालली आहे. विठ्ठलाची भक्ती करत असताना या ठिकाणी त्यांची देहबुद्धी नाहीशी झालेली आहे. म्हणून ते म्हणतात, ” मी ब्रह्म आहे या भावनेच्या अवस्थेत माझा जन्म झाला. माझे सगळे नवस पूर्ण झाले व सर्व आशा नाहीशी झाली. मी आत्मा आहे या अनुभवाने बलवान झालो. “
मी ची मज व्यालो/ पोटा आपुलिया आलो/
आता पुरले नवस/ निरसोनी गेली आस/
दोन्हीकडे पाहे/ तुका आहे तैसा आहे//
काही जाणो नये /पांडुरंगाविण/
पावीजेल सीण/ संदेहाने//
भलतिया नावे/ आळविला पिता/
तरी तो गात्रा धणी/ हरी कथा//
तुका म्हणे उपजे / विल्हाळआवडी/
करावा तो घडी/ घडी लाहो//
एका पांडुरंगा व्यतिरिक्त कसलाच विचार करू नये. कोणत्याही कारणाने कळवळ्याने मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते. हरी कथेने सर्वांगांचे समाधान होते. एक हरीकथाच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते.
अशाप्रकारे तुकारामांची अवस्था हरीमय झाली आहे.
म्हणून पुढे ते म्हणतात,
दास झालो हरिदासाचा/*बुद्धी काया मने वाचा/
तेथे प्रेमाचा सुकाळ/टाळ मृदुंग कल्लोळ//*
नासे दुष्ट बुद्धी सकळ/समाधी हरिकीर्तनी//
ऐकता हरी कथा/भक्ती लागे त्या अभक्ता//
देखोनी कीर्तनाचा रंग/ कैसा उभा पांडुरंग//
हे सुख ब्रह्मादीका/ नाही नाही म्हणे तुका//
हरी प्रेमाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी महाराजांनी बऱ्याच ठिकाणी रूपकात्मक अभंग रचना केली आहे.
या ठिकाणी ते म्हणतात…
रवीचा प्रकाश/ तोचि निशी घडे नाश/
झाल्या बहुवस तरी/ त्या काय दीपिका//
बंधमोक्षाचे वर्णन करताना महाराज रात्र आणि दिवस याची उपमा देतात. सूर्यप्रकाश आला की रात्र नाहीशी होते. अनेक दीप लावून रात्र संपत नाही. त्याप्रमाणेच सर्वोत्तम असा श्रीहरी तो माझ्या जीवात राहिला तरच त्याची सर्व रहस्य मला कळतील. ते दुसरा दृष्टांत देतात.
सवे असता धनी/ आड ये न सके कोणी/
नलगे विनवणी/ पृथकाची करावी//
प्रत्यक्ष मालकच आपल्याबरोबर असला तर वाटेत कोणाची विनवणी करावी लागत नाही, तसेच आपल्याजवळ श्रीहरीचे प्रेम असले तर आपल्या मार्गात काहीच अडथळे येत नाहीत.
म्हणजेच जन्म मरणाच्या बंधनातून आपण सहज मुक्त होतो.
या ठिकाणी तुकारामांना भक्ती सुखाबरोबर ब्रह्मसुख भेटले आहे.
नाम घेता मन निवे/ जीवे अमृतची स्त्रवे/
होताती बरवे /ऐसे शकुन लाभाचे//
मन रंगले रंगले/ तुझ्या चरणी स्थिरावले/
केलीया विठ्ठले/ ऐसी कृपा जाणावी//
*सुख भेटता आले सुखा/ निध सापडला मुखा/
तुका म्हणे लेखा/ आता नाही आनंदा//
सर्वत्र अवर्णनीय असा आनंद आहे.
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत/
त्यांचे पायी चित्तठेवीन मी//
जयासी विठ्ठल आवडे लोचनी/
त्याचे पायवणी स्वीकारीन//
विठ्ठलाची जीही दिला सर्व भावा/
त्यांच्या पायी जीव ठेवीन मी//
तुका म्हणे रज होईन चरणींचा/
म्हणावी ती त्यांच्या हरीचे दास//
तुकाराम भक्तिमार्गाला लागले आहेत, आता ते मायामोहातून बाहेर पडले आहेत, परंतु आपण संसार बंधनात अडकलो याचे त्यांना दुःख आहे. ते दुःख आपल्या अभंगातून व्यक्त करतात
पंचभूतांचे सापडलो संदी/
घातलीसे बंदी अहंकारे//
आपल्या आपण बांधविला गळा/
नेणेची निराळा असताही//
कासया हा सत्य मानीला संसार/
काहे केले चार माझे माझे//
का नाही शरण गेलो नारायणा/
का नाही वासना आवरिली//
किंचित सुखाचा धरीला अभिळास/
तेणे बहु नास केला पुढे//
तुका म्हणे आता देह देऊ बळी/
करुनी सांडू होळी संचिताची//
तुकारामांनी आपले सर्वस्व पांडुरंग चरणी वाहिले आहे आणि ते देवाच्या विविध कथांचा संदर्भ घेऊन विठ्ठलाला आळवीत आहेत.
फिरविले देऊळ जगामाजी ख्याती/
नामदेवा हाती दूध प्याला//
(नामदेवाने आपल्या भक्ती द्वारा विठ्ठलाचे देऊळ फिरवून प्रवेशद्वार आपल्यासमोर आणले अशी कथा आहे.)
भरियेली हुंडी नरसी मेहत्याची/
*धनाजी चाट्याची सेते पेरी//
मिराबाई साठी प्याला विषाचा/
लाख्याकोला त्याचा ढोल पिटी//
कबीराचे मागी विणू लागे शेले/
मूल उठविले कुंभाराचे//*
या सर्व संतांची कामे पांडुरंग स्वतः करत होता
त्याचप्रमाणे तुकारामांकडेही देवाने लक्ष द्यावे
म्हणून ते विनवणी करतात…
आता तुम्ही दया करा पंढरीराया/
तुका विनवी पाया वेळोवेळा//
विठ्ठल भेटीची तुकाराम महाराजांना किती तळमळ लागून राहिली होती हे आतापर्यंत अनेक अभंगातून आपण पाहिले. आता पुढील काही अभंगातून त्यांची व विठ्ठलाची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनाची अवस्था पाहण्यासारखी आहे.
बहुता दिसांची आजी झाली भेटी/
झाली होती तुटी काळ गती//
येथे सावकाश घेईन ते धणी/
गेली अडचणी उगवोनी//
बहु दुःख दिले होते घरी कामे/
वाढला हा श्रमे श्रम होता//
बहु दिसत होता सांडीला मारग/
क्लेशाचा त्या त्याग आजी जाला//
बहु होती केली सोंग संपादणी/
लौकीकापासूनी निर्गमले//
तुका म्हणे येथे झाले अवसान/
परमानंदी मन विसावले//
पुष्कळ काळपर्यंत देवाच्या पायांचा वियोग झाला होता, आज सुदैवाने त्याची भेट झाली. आता सर्व अडचणी दूर होऊन, विठ्ठलाच्या पायाचे ध्यानसुख तृप्त होईपर्यंत घेईन. अनेक वैश्विक इच्छांनी मी दुःखी झालो होतो, त्यामुळे श्रम फार वाढले होते, ते आज संपले. प्रपंचात राहून अनेक सोंगे करावी लागली, आता सर्व लौकिक गोष्टींशी असलेला माझा संबंध संपला. मन मोकळे झाले. शेवटी सर्व व्यवहाराचे पर्यवसान एका परम आनंदात होऊन त्या ठिॅ
थौतकाणी माझे मन विश्राम पावले आहे. एक समाधानाची रेषा त्यांच्या मुद्रेवर या ठिकाणी दिसून येते.
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ४७
यो विविक्तस्थानं सेवते, यो लोकबन्धमुन्मूलयति, निस्त्रैगुण्यो भवति, योगक्षेमं त्यजति ॥ ४७ ॥
अर्थ : जो एकांतवासाचे सेवन करतो, लौकिक संबंधांमुळे निर्माण झालेली बन्धने तोडून टाकतो, जो तीन गुणांनी रहित होतो आणि जो योग व क्षेमाचाही त्याग करतो, तो माया तरून जातो.
विवेचन : साधनाचा विचार करीत असता त्याचे अंतरग व बहिरंग असे प्रकार संभवतात हे पूर्वी सांगितलेच आहे. अंतरंगसाधनांना बहिरंग-साधनाची आवश्यकता असते. संगत्याग हे साधन मागील सूत्रात सांगितले आहे ते सिद्ध होण्याकरिता या सूत्रात ‘विविक्त स्थानं सेवते’ म्हणजे निर्जन एकांतवासाचा आश्रय करतो असे सांगितले आहे. याचा उल्लेख गीतेमध्ये आढळतो.
“कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठीत जावा काळ । जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥”
(दास. १९. ०८. २९)
अनेक लोकांना एकांत शब्द सोडून देऊ, एकटं राहण्याचीही भीती वाटते. या भीतीमागील एक कारण हे असू शकते की त्यांना आपण एकटेच आहोत या *भीती*ची भीती वाटतं असते. एकांत हा शब्दाबद्दल एक गैरसमज आहे. एकटे रहाणे म्हणजे एकांत. मनुष्य एकटा राहतो. दिसायला तो एकांतात दिसतो, पण स्वतःच्या मनात तो मनोराज्य रचत असतो. याला खरा एकांत म्हणता येत नाही आणि अशा एकांताचा त्या मनुष्याला काहीही लाभ होत नाही. उलट असे करून स्वतः च स्वतःची फसवणूक करून घेत असतो.
एकांताची समर्पक व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. “एकाचाही अंत म्हणजे एकांत. “
संत तुकाराम महाराजांच्या चरित्रात याचे वर्णन आहे. ते भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन एकांताचा अनुभव घेत असतं. ते स्वतःला इतके विसरून जात की जंगलातील पक्षी एखादे झाड समजून त्यांच्या अंगावर खांद्यावर खेळत असतं, बागडत असतं. तेथील लता, वेली त्यांची सोयरी झाली होती.
“वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।। तेणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।।२।।”
साधकाने कोणतेही साधन करावा, चिंतन करावे, ध्यान, भजन असो, मन एकाग्र झाल्या शिवाय त्यात गती प्राप्त होत नाही. अनादिकालीन संस्कारामुळे साधकाचे मन चंचल असते हे प्रसिद्ध आहे. त्याला निश्चळ बनवण्याकरिता काही साधने करावी लागतात.
साधकाच्या चित्तक्षोभाची बाह्य कारणेही दूर होणे आवश्यक आहे. ती विघ्ने म्हणजे स्वजन-परजनांकडून होणारा संसर्ग. तो अनेक प्रकारचा असू शकतो. तो गावातल्या त्या गजबजाटात राहून दूर करता येत नाही, सर्वावर नियंत्रण कसे ठेवता येईल? याकरिता तो संसर्ग टाळणेच अवश्य आहे. या दृष्टीने विविक्त स्थान म्हणजे एकांतवासाचा आश्रय त्या साधकाला घ्यावा लागतो.
(अभंग क्रमांक ३१९५, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
सूत्राच्या पुढील भागात ‘या लोकबन्धमुन्मूलयति‘ असे नारद म्हणतात.
श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की परमार्थाला आपल्या घरापासून सुरुवात करावी. मंदिरातील मूर्तीत राम आहे आणि माझ्या घरातील माणसांमध्ये तो नाही असे कसे होऊ शकेल? पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा यापेक्षाही साधक-भक्ताला लोकेषणा बाधक असते. लोकानी स्तुती करावयास आरंभ केला की तीच प्रिय वाटावयास लागते. पण स्तुतीबरोबर हळूहळू निंदाही होण्याला सुरुवात होते, ज्याला स्तुतीने सुख वाटते त्याला निंदा ऐकून दुःख झाल्याशिवाय राहत नाही. हाच लोकबन्ध होय. श्री जगन्नाथ कुंटे यांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे. निंदा गोड वाटू लागली म्हणजे साधक पक्का झाला. जोपर्यंत साधकाला स्तुती गोड वाटते, तोपर्यंत तो भगवंतापासून खूप दूर आहे असे समजायला हरकत नाही.
पतितपावना देवराया ॥१॥
संसार करितां म्हणती हा दोषी ।
टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु. ॥
आचार करितां म्हणती हा पसारा ।
न करितां नरा निंदिताती ॥२॥
*
संतसंग करितां म्हणती हा उपदेशी ।
येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥
*
धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा ।
समर्थासि ताठा करिताती ॥४॥
*
बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ ।
न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥
*
भेटिसि नवजातां म्हणती हा निष्ठुर ।
येतां जातां घर बुडविलें ॥६॥
*
लग्न करूं जातां म्हणती हा मातला ।
न करितां जाला नपुंसक ॥७॥
*
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ ।
पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥
*
लोक जैसा लोक धरितां धरवे ना ।
अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥
*
तुका म्हणे आतां ऐकावें वचन ।
त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥
संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सर्वाना सांगतात की, जनाचा त्याग करून त्यांचा संसर्ग स्वकीय, परकीय, शिष्य, भक्त म्हणविणारे असोत का विरोधी असोत टाळून भक्ती करा.
निस्त्रैगुण्यो भवति’
“प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व_रजस_तम|
ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती||”
(गीताई १४. ०५)
सत्त्वगुण सुखसंग व ज्ञानसंगाच्याद्वारा बांधतो, रजोगुण हा आसक्ती काम याच्या द्वारे बांधतो. तमोगुण पूर्ण अज्ञान, मोह, प्रमाद, आलस्य, निद्रा इत्यादिकांच्या द्वारे जीवास बांधतो. जसा मासा हा आमिषाच्या आशेने स्वतःच्या प्राणघातक अशा गळाला अडकतो तसाच क्षेत्रज्ञ जीव या गुणाच्या जाळ्यात अडकतो. गुण म्हणजेच सर्व संसार आहे. कारण सचेतन-अचेतन सर्व सृष्टीही गुणात्मकचआहे, असेच श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले आहे. भक्ताला गुणातीत बनावयाचे असते. त्याला तीन गुणांहून अतीत अशा निर्गुण भक्तियोगाचा आश्रय करावयाचा असतो. तसेच त्रिगुण आले की ते आपला एक प्रकारचा अहंकारही घेऊन येतात. तोही भक्तिमार्गाला प्रतिबंधक आहे म्हणून नारद ‘निस्त्रैगुण्यो भवति’ असे म्हणतात.
योग क्षेम त्यजति
संसारामध्ये बहुतेक जीवाना आपल्या निर्वाहाची चिंता लागलेली असते. जीवनावश्यक पदार्थ अनेक असतात, ते मिळतील का व प्राप्त झालेले टिकतील का ही जीवनाची एक महान समस्या आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती व्हावी व प्राप्त आणि अनुकूल वस्तूचा नाश न व्हावा, त्या आपल्या म्हणून आपणाजवळ अखंड राहाव्या या भावनेला योगक्षेम म्हणतात. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग व प्राप्ताचे रक्षण हा क्षेम असा योगक्षेम शब्दाचा सामान्य अर्थ आहे. या योग-क्षेमाच्याच विवंचनेत बहुतेक माणसे गढून गेलेली आहेत. तसेच अप्राप्त पदार्थाच्या प्राप्तीला काही मर्यादा घालता येत नाहीत, व ते प्राप्त होण्याकरिता सतत प्रयत्नशील राहावे लागते. नाना प्रकारची शुभाशुभ कर्मे करीत रहावे लागते आणि प्राप्ताच्या संरक्षणाकरिताही थोडे श्रम करावे लागत नाहीत. एखादा साधकदेखील या योग-क्षेमाच्या चिंतेने ग्रस्त होणे शक्य आहे. पण ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्या साधकाने आपल्या देहभरण – पोषणाची म्हणजेच लौकिक योग-क्षेमाची चिंता ठेवू नये. कारण देहाचे भरण – पोषण झाले तरी तेवढ्याने सर्व पुरुषार्थप्राप्ती झाली असे नाही. त्या भरण-पोषणातूनही पुन्हा अनेक विकार निर्माण होऊन ते जीवन अशांत बनवीत असतात.
भगवतांचे वचन आहे.
“अनन्य भावें चिंतूनि भजती भक्त जे मज| सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी||”
(गीताई ०९. २२)
मनुष्याला मिळणाऱ्या भौतिक गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाची भूक आपसूक कमी होते. ज्याने जीभ जिंकली, त्याने अर्धा परमार्थ जिंकला असे म्हणतात.
– – संत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग पुरेसा बोलका आहे.
साळंकृत कन्यादान ।
पृथ्वी दानाच्या समान ॥१॥
परि तें न कळे या मूढा ।
येईल कळों भोग पुढां ॥ध्रु. ॥
आचरतां कर्म ।
भरे पोट राहे धर्म ॥२॥
सत्या देव साहे ।
ऐसें करूनियां पाहें ॥३॥
अन्न मान धन ।
हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥
तुका म्हणे सोसे ।
दुःख आतां पुढें नासे ॥५॥
पुढील सूत्रात आपण आणखी दोन गोष्टींचा कसा त्याग करायचा हे पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ