मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खेळ क्षणांचा… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? कवितेचा उत्सव ?

खेळ क्षणांचा… डॉ. माधुरी जोशी 

पूर्व दिशेला दाट धुक्याची

चादर घट्ट पसरली

आषाढातील गर्द घनाची

 अंधुक अजून सावली

पहाट झाली हवा गारशी

नवीन ऋतुची चाहूल

धूसर पडदा फाडून आला

केशरी तेजोगोल

असा केशरी रंग आगळा

गोल देखणे बिंब

अद्भुतसा हा चित्रकार कुणी

त्याने निर्मिले रंग

काही क्षणांचा खेळ मंदसा

झरझर प्रकाश उजळे

सुखद कोवळे बिंब मिटले

केशर मग गडदले

सुंदर मोहक रंग अचानक

लखलखला तेजाने

आकाश आणि सृष्टी सारी

त्या तेजात नाहले

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राज कपूर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ राज कपूर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(राजकपूर जन्मदिनानिमित्त)

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||

*

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||१||

*

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||२||

*

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||३||

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ हृदयस्पर्शी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ क्षण सृजनाचा ☆

☆ हृदयस्पर्शी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

आपली प्रिय व्यक्ती सोडून गेल्यावर तिचे स्मरण म्हणजे आठवणींचा गोफ असतो. पण आठवणींचा मामलाही वाटतो तेवढा सरळ नाही. कोणत्या आठवणी मनात जोजवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे आपल्या हाती कुठे असतं? कारण काही आठवणी कितीही विसरू म्हटलं तरी कायमचा पिच्छा पुरवत राहतात. कधी कधी एखादी छोटी गोष्ट मोठ्यातल्या मोठ्या स्मृतींची शृंखला मनात चालू करते. या आठवणीतलं बरं काय, वाईट काय यांची निवड मेंदूतील न्यूरॉन्सच्या चाळण्याच करत असतात.

हृदयस्पर्शी –जगदीश काबरे

*

एक दिवस येईल, आपल्याला अलग करेल

मग कोणीही कुणावर रागावणार नाही.

*

एके दिवशी आपण वेगळे होऊ,

कुठे हरवून जाऊ कोणास ठाऊक?

*

तू मला लाखो वेळा हाक मारशील

पण मी काही परत येणार नाही.

*

जेव्हा तू रात्री झोपायला जाशील,

माझ्या आठवणीने तळमळशील.

*

कारण मी कधीही डोळे उघडणार नाही

तुझ्याशी गुजगोष्टी करू शकणार नाही.

*

जेव्हा तू तुझा फोन पाहत असशील

तेव्हा तुला माझा मेसेज दिसणार नाही.

*

शेवटी, रडून रडून तुझी आसवे सुकतील

असवाच्या प्रत्येक थेंबात मला शोधशील.

*

आठवाच्या सागरी जेव्हा जेव्हा तू बुडून जाशील

माझ्या प्रिया, माझ्यातच तू सामावलेला असशील.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हात धरू शकताय तोवर… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हात धरू शकताय तोवर… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

अजुन किती खोल बुडणार

या आभासी भुलभुलय्यात!

हात धरू शकताय तोवर

धरा हात अन या वास्तवात

*

भासच सारे आहेत तिथ

हाती काही लागणार नाही

भविष्य साकारायच्या वयात

आभासात गुंतण इष्ट नाही!

*

नुसत बघत बसू नका पोरांनो

वेळ आहे तोवर सावध व्हा!

एकमकांचा हात गुंफून सारे

हात धरा माझा बाहेर या!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आकाशाची गर्द निळाई… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

सुश्री प्राची जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ आकाशाची गर्द निळाई… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

निळ्याशार आकाशात माझ्या स्वप्नांचा कवडसा

हिरव्यागार धरतीवर अलगद आहे पहुडलेला

*

स्वप्नांची सोनेरी किनार तिचा जरतारीचा हा वेल

त्या वेलावर वसली आहे सुंदर फुलांची आरास

*

आराशीचा मनी माझ्या मी काठपदर विणला

चंदेरी काठपदरावर चमकतो सोनेरी जरीबुट्टा

*

त्यातील सजलेला बुट्टा दिमाखात आहे उभा

मिरवतो सुंदरतेचा वसा ठसला मनोमनी जसा

*

सुरेख वेल ही बुट्ट्यांची पसरली अशी धरतीवरी

जशी माझ्या स्वप्नांची नक्षी सजे पापणीवरी

*

बुट्ट्यांची साजिरी नक्षी हिरवीगार अन् मखमली

अशी पसरली धरतीवरी वाटे मज सुंदर गालीच्यापरी

*

सजलेल्या या गालीच्याची रंगबिरंगी अशी नक्षी

प्रत्येक फुलापानी दिसे मज स्वप्नांची माळ गुंफलेली

*

जशी या सोनेरी स्वप्नांची उतरली धरतीवर हिरवाई

तशी माझ्या नयनी दाटली आकाशाची गर्द निळाई…

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३१ व ३२☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३१ व ३२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ३१ व ३२

राजगृहभोजनादिषु तथैव दृष्टत्वात ॥ ३१ ॥

न तेन राजपरितोषः क्षुच्छांतिर्वा ॥ ३२ ॥

अर्थ : राजवाडा असो भोजन जो पर्यंत आपण त्याची अनुभूती घेत नाही, तोपर्यंत राजा असण्याचा आनंद आणि अन्नाची खरी चव कळू शकत नाही.

विवेचन 

ज्ञान हे भक्तीचे साधन आहे हे जे काही लोकांचे मत मागे सांगितले त्याचा प्रतिवाद करण्यासाठी व भक्ती ही स्वयं-फलरूपा आहे या आपल्या मताच्या पुष्टीसाठी नारदमुनी येथे दृष्टांत देतात. वरील दोन्ही सूत्रांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध असल्यामुळे त्याचा येथे एकत्रच विचार केला आहे.

या सूत्रात राजवाड्याचे उदाहरण दिलेले आहे. मनुष्य राजवाडा पाहायला गेला, त्याने संपूर्ण राजवाडा पाहिला, राजवाड्याची पूर्ण माहिती घेतली. त्याला राजवाड्याचा संपूर्ण इतिहास आणि भूगोल माहित झाला. इतके सर्व त्याने केले म्हणजे त्याने राजाची मर्जी संपादन केली असे होत नाही. राजाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याला वरील माहितीचा उपयोग होण्याची शक्यता आहे. पण राजाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याला राजाची सेवा करावी लागेल, पहा पटतंय का?

एक उदाहरण पाहू.

एका राज्यात एका मनुष्याने चोरी केली. शिपायांनी त्याला पकडले आणि कैदेत टाकले. यथावकाश त्याची राजापुढे सुनावणी झाली. राजाने त्याला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. कैदेत असताना त्याला राजाच्या बागेत काम दिले गेले. तो मनुष्य बागकाम करण्यात कुशल होता. त्याने आधी जो बगीचा होता, त्यात चांगली वाढ केली. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावली. त्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. एकदा राणी त्या बागेत विहार करण्यासाठी आली. तिला तेथील फुले फार भावली. तिने तेथील कामगाराची चौकशी केली. या चोराचे नाव सांगितले गेले. राणीने त्याचे बागकाम पाहून राजाकडे त्याच्यासाठी शिफारस केली. राणीच्या आग्रहामुळे राजाने त्याची शिक्षा माफ केली आणि त्याला त्या बागेचा प्रमुख माळी केले.

इथे आपल्या लक्षात येईल की नुसती माहिती घेऊन उपयोग होत नाही, पण सेवेने मात्र प्रचंड लाभ होऊ शकतो.

एखाद्याने पाकशाळेत प्रवेश घेतला. श्रीखंड कसे करायचं याची कृती त्याने तोंडपाठ केली. पण, जोपर्यंत तो ते श्रीखंड तयार करून चाखत नाही, तोपर्यंत त्याचा खरा फायदा शून्य.

भक्तीच्या ज्ञानाने किंवा ज्याची भक्ती करावयाची त्याच्या ज्ञानाने भक्तिसुखाची प्राप्ती होत नाही किंवा ती त्या ज्ञानावर अवलंबूनही नाही. भक्तीत ज्ञान असेल आणि असावे हे ठीक आहे पण ज्ञान झाल्याने किंवा ज्ञानाच्याद्वारे भक्तीची प्राप्ती होतेच असे नाही, म्हणून ज्ञान हे भक्तीचे साधन नाही. कारण भक्ती ही ‘स्वयंफलरूपा’ आहे. भक्तीच भक्तीचे साधन आहे. भक्ती केल्यानेच भक्तीप्रेमानंदाचा लाभ होतो. जे जे साध्य असते त्याचे साधन त्याच्यापेक्षा वेगळे असते असा सर्वसाधारण नियम असता भक्तीचे साधन भक्ती स्वतःच कशी असू शकेल अशी त्यावर शंका येईल. त्यावर श्रीनारदांचे उत्तर असे की ती परमप्रेमरूपा आहे आणि प्रेम हे अनुभवरूप आहे – म्हणजे अनुभवानेच कळणारे आहे, शब्दज्ञानाने नव्हे. कोणतेही सुख हा अनुभवाचाच विषय असतो, ज्ञानाचा नसतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

*”भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥ 

आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥

तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥”*

(अभंग क्रमांक १०९९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

सुखाची साधने कळल्याने सुख होत नाही तर सुखाचा अनुभव घेतल्याने सुख होते. राजवाडा पाहून त्यातील सुखाच्या अनेक साधनाचे ज्ञान होऊन त्यापासून राजाला जे सुख होते ते आपल्याला होईल काय? त्याचा अनुभव घेण्यानेच ते सुख आपणास कळेल. त्याचप्रमाणे भोजनाचेही आहे. जेवल्याशिवाय पोट भरत नाही. भक्ति केल्याशिवाय भक्ति कळत नाही.

इथे संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग पाहू.

प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥ १ ॥ 

*

कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ २ ॥

*

पोटामध्ये कोणे सांगितलें सर्पा । उपजत लपा ह्मणऊनि ॥ ३ ॥ 

*

बालों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥ ४ ॥ 

*

तुका ह्मणे बरें विचारावे मनीं । आणीक भल्यांनी पुसों नये ॥ ५ ॥

*

“जितकी भक्ति तितकी भक्तीची प्ती”

।।जय जय रघुवीर समर्थ।। 

.. – क्रमशः लेख क्र. ३१  

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नको जाऊस मंदिरात…” – कवी : श्री. रविंद्रनाथ टागोर मराठी भावानुवाद : स्व माधुरी काबरे माधुरी काबरे ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

📖 वाचताना वेचलेले 📖

स्व माधुरी काबरे

☆ “नको जाऊस मंदिरात…” – कवी : श्री. रविंद्रनाथ टागोर मराठी भावानुवाद : स्व माधुरी काबरे ☆ श्री जगदीश काबरे

नको जाऊस मंदिरात 

फुलं वाहण्यासाठी 

मूर्तीच्या चरणावर…

प्रेमपुष्पांचा गंध पसरून घे 

आधी आपल्या घरभर ।।१।।

*

नको जाऊस मंदिरात 

दिवा उजळण्यासाठी 

मूर्तीच्या गाभाऱ्यात…

आधी पापांचा अंधार दूर कर 

साकळलेला मनभर ।।२।।

*

नको जाऊस मंदिरात 

नतमस्तक होऊन 

करायला प्रार्थना…

आधी नम्रपणे वाग ना 

भोवतालच्या जगभर ।।३।।

*

नको जाऊस मंदिरात 

दगडी मूर्तीसमोर 

झुकण्यासाठी गुडघे टेकून…

आधी झुकून त्यांना वर काढ 

खितपत आहेत जे खोलवर ।।४।।

*

नको जाऊस मंदिरात 

पश्चात्तापाने पोळून 

मागण्यासाठी क्षमा…

आधी माफ कर त्यांना 

ठेवलेस ज्यांना लांबवर ।।५।

*

कवी : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (गीतांजली)

भावानुवाद : माधुरी काबरे

प्रस्तुती : जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “आनंद फक्त तुझाच…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “आनंद फक्त तुझाच ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

थांबावं वाटलं तर नक्की थांब

पुन्हा एकवार स्वतः ला सांग

चालता चालता असशील दमली

पण शर्यत अजून नाही संपली…

*

मना लागेल हळूवार चाहूल

जपून टाक तू एक एक पाऊल

प्रत्येक वळणावर जग देईल हूल

बांधत रहा तू सकारात्मकतेचा पूल…

*

दूर क्षितिजावर स्वप्न तुझे

वाट तुझी रोज पाहत असे

पावलांना तुझ्या बळ त्यांचे

तेवत ठेव मनी नंदादीप आशेचे…

*

पोहाचशील एक दिवस तिथे

खुणावत होते यश तुला जिथे

कोरून ठेव मनात त्याचा आलेख

आयुष्यभर सोबतीला असेल तोच एक…

*

स्वप्न तुझे मार्ग तुझाच

कष्ट तुझे प्रवास तुझाच

आस तुझी मुक्काम तुझाच

यश तुझे आनंद फक्त तुझाच…

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी शहिद… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ मी शहिद ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

सिमेवरती लढताना

नाही कुणास कळलो

तिरंग्याचे कफन ओढून

शहिद म्हणून ओळखलो

*

उरावर झेलल्या वारांची

विरमरणाने पुसली व्यथा

तिरंग्यात लपेटल्या देहाची

‘अमर रहें’ झाली गाथा

*

शौर्य आणि पराक्रमाचा

वर्दीस घातला कवळा

वर्दीतल्या मरणाचा तेंव्हा

झाला शहिद सोहळा

*

सुट्टीसाठी किती झंझटी !

लाख लाख लडतडी

तिरंग्यातून चाललो तेंव्हा

पटकन गेटवर जी. डी.

*

प्राणाची बाजी लावूनही

अर्थ नसतो जगण्याला

पण अमुल्य जाणे आमुचे

शहिद होऊन मरण्याला

*

मातीच्या ओढीने येत होतो

गाव मला तवा विसरभोळा

शहिद माझ्या होण्याचा

सन्माननीय हा मरण-सोहळा

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – जळो जैसा प्रेमरंग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – जळो जैसा प्रेमरंग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

जळो जैसा प्रेम रंग / जया भुलोनि पतंग //१//

सासूसाठीं रडे सून / भाव अंतरीचा भिन्न //२//

मैंदा मुखीचा कोवळा / भाव अंतरी नीराळा //३ //

तैसी वृंदावनकांती / उत्तम धरूं नये हाती //४//

बक ध्यान धरी / दावी सोंग मत्स्य मारी //५ //

तुका म्हणे सर्प डुले / तैसा कथे माजी खुले // ५ //

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

पतंग दिव्याच्या प्रकाशाने नटलेल्या लोभसवण्या ज्योतीच्या बाह्य स्वरूपावर भुलतो. प्रेमाने तिच्यावर झडप घालून मरून जातो. या प्रेमाला प्रेम कसे म्हणायचे. कायम जाच करणारी सासू मेली की सून हंबराडा फोडून रडताना दिसते. पण तिच्या रडण्याचा भाव खरा नसून भिन्न विचाराचा असतो. अतिशय मधूर आणि रसाळ वाणीत बोलणा-या कपटी माणसाच्या मनात कपटी कांगावाच भरलेला असतो. वृंदावन नावाचे वरून सुंदर दिसणारे फळ मनमोहक दिसते पण ते आतून कडवट व विषारी असते‌ त्याला आपण हातात सुध्दा धरू नये. जलाशयाच्या किंवा नदिच्या काठावर डोळे झाकून उभा असणारा बगळा पाहून तो जप तप ध्यान करतो आहे असे भासवतो पण तो तेथे मासे मारण्यासाठी उभा असतो. त्याच प्रमाणे हरीकथा किंवा किर्तन ऐकणारा नास्तिक माणूस पुंगी वाजताना ऐकून डुलणा-या सापासारखे सोंग करून दाखवत असतो. हे लक्षात घ्यावे आणि मगच तशा माणसाशी पुढील व्यवहार सावध होऊन करावेत.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares