श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ बॉम्बस अवे! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
सफेद सागरातल्या अंधा-या रात्रींमधले पराक्रम!
हम ही हम हैं तो क्या हम हैं…तुम ही तुम हो तो क्या तुम हो…
१९७१च्या भारत-पाक युद्धाचे चित्रण असलेल्या आणि १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या हिंदी चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि जाकी श्रॉफ यांच्यामध्ये शेवटी एक संवाद आहे… हम ही हम हैं तो क्या हम हैं…तुम ही तुम हो तो क्या तुम हो! हे दोघेही पायदळ श्रेष्ठ की वायुदळ श्रेष्ठ याची चर्चा करताना एका निष्कर्षांपर्यंत पोहोचलेले दाखवलेत…दोहोंचेही अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे!
अजूनही भारतीय जनमानसात सैन्य म्हणजे पायदळ हे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे आजवरच्या युद्धचित्रपटांमध्ये अधिक चित्रीकरण पायदलाचे झालेले आढळते. वायूदलाचा क्रमांक दुसरा तर नौसेना तिस-या क्रमांकावर येते!
पण खरं तर ही तिन्ही दले म्हणजे आपले त्रिनेत्र आहेत. आधुनिक युद्धात तर Air Supremacy अर्थात ज्याच्या ताब्यात आकाश…त्याचे वर्चस्व अशी स्थिती आहे. नुकतेच पार पडलेले ऑपरेशन सिंदूर, त्या आधी पाकिस्तानातल्या बालाकोटवर आपण केलेले हवाई हल्ले हे याला साक्षी आहेत. जगभरातले देश हवाई सामर्थ्य वाढवण्याच्या सतत प्रयत्नांत असतात, त्याला काही अर्थ आहेच!
कारगिल युद्ध हे जगातल्या सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. पाकिस्तानची तयारी एवढी प्रचंड होती की केवळ पायदळ त्यांना पराभूत करण्यासाठी पुरेसे नव्हते. भारतीय वायूसेनेला या युद्धात प्रत्यक्ष सहभागी होण्यात काही कारणांनी अंमळ उशीरच लागला…कारण तोवर युद्धाची निश्चित स्थितीच आपल्या सैन्याच्या लक्षात आलेली नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे याची खात्री होताच भारताने आपला हा तिसरा नेत्र उघडला…आणि ऑपरेशन सफेद सागर हाती घेतले. हा सागर जमिनीवरील नव्हता…आभाळात तरंगणा-या पांढ-या ढगांच्या वरून उडणा-या हवाई ‘जहाजां’नी केलेल्या पराक्रमांनी भरलेला आणि भारलेला होता.
सोळा ते अठरा हजार मीटर्सची उंची. त्यामुळे हवा विरळ. त्यामुळे विमानांच्या सामर्थ्यावर निश्चित मर्यादा. त्यात प्रचंड उंचीची टोकदार हिमशिखरे. त्यांतून वाट काढीत वेगाने जाणे यासाठी अत्युच्च दर्जाचे वैमानिक कौशल्य आवश्यक. पाकिस्तानी नियमित सैन्य अतिरेक्यांच्या वेशात कारगिलच्या शिखरांवरील बंकर्स, कपा-यांमध्ये दडून बसलेले. शिखरांवर खालून चढून जावे तर वर मोक्याच्या जागी बसलेला शत्रू भारतीय सैनिकांना सहजी टिपत होता. खालून तोफा डागाव्यात तर उंच शिखरे, द-या, कपारी असल्याने आरंभी अचूक तोफ-बॉम्बवर्षाव करणे महाकठीण होते. पाकिस्तानी सैन्याला रसद पुरवणा-या व्यवस्था तर भारतीय तोफांच्या मा-याच्या आणखीनच पलीकडे होत्या. अशा स्थितीत वायुदल हाच आशेचा एक मोठा किरण होता…आणि पाकिस्तान अधिकृत सैन्य या युद्धात सहभागी नसल्याने त्यांची वायुसेनाही युद्धात सहभागी होऊ शकत नव्हती…कारण ते तर म्हणत होते की कारगिल मध्ये पाकिस्तानी सैन्य नव्हे तर काश्मिरी मुजाहिदीन, अतिरेकी शिरलेले आहेत.
आंतरराष्ट्रीय करारांमुळे भारतीय वायुदल भारत-पाक वायूहद्द ओलांडून पलीकडे जाणारही नव्हती! अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आणि मुख्यत: तशा short noticeवर आपल्या वायूवीरांनी ७६३१ उड्डाणे केली! यांत आरंभीच्या हेलिकॉफ्टर्स उड्डाणांचाही समावेश होता. कारगिलमध्ये घुसलेले अतिरेकी, पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे ‘आका’ यांच्यातील संपर्कसूत्रे नेस्तनाबुत केली…आणि मुख्य म्हणजे सीमारेषा न ओलांडता त्यांचे मनोधैर्य रसातळाला नेऊन ठेवले!
या मोहिमेत आरंभी भारतीय वायुसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागले…घुसखोरांकडे विमानविरोधी आधुनिक ‘स्टिंगर’ मिसाईल्स होती..आणि ती त्यांना डागता येत होती. त्यामुळे अगदी सुरुवातीलाच आपण अनेक मोहारे गमावले…स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा आणि राजीव पुंडीर, फ्लाईट लेफ्टनंट सुब्रमनियम मुहीलान, सार्जंट राजकिशोर साहू, फ्लाईट सार्जंट पी.व्ही.एन.आर.प्रसाद यांचा समावेश होता. यांतील आहुजा साहेबांना पाकिस्तानी सैन्याने हालहाल करून मारल्याचे बोलले जाते. फ्लाईट लेफ्टनंट के.नचिकेत हे तर त्यांचे विमान पाकिस्तानी हद्दीत पडल्याने शत्रूच्या तावडीत सापडले होते…मात्र भारताच्या राजनैतिक दबावामुळे त्यांची सुखरूप सुटका होऊ शकली!
त्यावेळी भारतीय वायूदलाच्या ताफ्यात असलेली विमानेच या युद्धात वापरणे भाग होते. परंतू त्या विषम हवामानात आणि पर्वतीय परिसरात आणि रात्रीही बॉम्बफेक करू शकतील अशा क्षमतांची विमाने उपलब्ध होतीच किंवा त्यांचा तिथे प्रभावी वापर करता येईलच असे नव्हते. यासाठी अपारंपारिक नीती, जुने तंत्रज्ञान नव्या क्लृप्त्या वापरून कामात आणणे आवश्यक होते…आणि आपल्या वैमानिकांनी, तंत्रज्ञ वीरांनी ते करूनही दाखवले!
भारतीय वायुसेनेच्या १७व्या स्क्वाड्रन (Golden Arrows) चे विंग कमांडर बी.एस. अर्थात बिरेंद्रसिंग धनोआ ऊर्फ ‘टोनी’ (जे पुढे एअर चीफ मार्शल झाले! ) फ्लाईंग ऑफिसर आर.एस. अर्थात राजपाल सिंग धालीवाल ऊर्फ ‘धाली’ (जे पुढे विंग कमांडर झाले) यांची कामगिरी लक्षणीय ठरली…अर्थात त्यांच्या जोडीला असंख्य वायूवीर होतेच…जमिनीवर काम करणारे तंत्रज्ञ, संशोधकही होतेच. निश्चित केलेल्या लक्ष्यावर अचूक बॉम्ब फेकताना ते बॉम्ब्स लक्ष्याच्या दिशेने निघालेले असताना वैमानिकांनी केलेल्या बॉम्ब्स अवे…अर्थात बॉम्ब्स निघाले…या घोषणा जमिनीवर नियंत्रण कक्षात बसलेल्या अधिका-यांच्या, कर्मचा-यांच्या, पर्वतांवर आडोशाला बसून वायूदलाच्या अचूक मा-याची वाट पहात असलेल्या सैनिकांच्या अंगावर शहारे उमटवून जात!
पायदल सैनिकांनी प्रचंड संख्येने बलिदाने दिली…त्यांना वायुदलाची मोलाची साथ लाभली…म्हणून कारगिल ‘विजय’ साकारला. भारतीय वायूदलाच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेणारी टेलीविजन मालिका ऑपरेशन सफेद सागर नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली गेली आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीमध्ये रस असणा-या सर्वांनीच ती जरूर पहावी..खरे तर यावर स्वतंत्र चित्रपट यायला पाहिजे होता!
तांत्रिक भाषा, ज्ञान कमी अवगत असणा-या माझ्यासारख्या प्रेक्षकांना या मालिकेत उल्लेख केल्या गेलेल्या विमानविद्येतील शास्त्रीय, तांत्रिक बाबी कदाचित लवकर लक्षात येणार नाहीत. पण आपल्या जांबाज fighter pilots तरुणांचे, तंत्रज्ञ मंडळीचे शौर्य, कौशल्य निश्चितच दिसेल…समजेल, हे निश्चित. यानिमित्ताने आपल्याला भारतीय वायूदलाच्या सामर्थ्याची खात्रीही पटेल. आहुजा साहेबांच्या आणि इतर हुतात्मा वायूसैनिकांच्या शौर्याचा परिचयही होईल.
ऑपरेशन सफेद सागर नावाच्या या OTT मालिकेत अभिनेते सिद्धार्थ यांनी अहुजा साहेब, जिम्मी शेरगिल यांनी धनोआ आहेब, आदिल हुसेन यांनी एअर मार्शल विनोद पटनी साहेब यांच्या भूमिका जोरदार निभावल्या असून दिया मिर्झा आणि इतर कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. निर्माते कुशल श्रीवास्तव, अभिजित सिंग परमार आणि दिग्दर्शक ओनी सेन यांचे तसेच लेखक, संगीतकार, संवादलेखक यांचे आभार…त्यांच्यामुळे ही शौर्य गाथा पडद्यावर साकारली गेली…आणि भारतीय वायूसेनेचेही योगदान प्रकर्षाने अधोरेखित होऊ शकले.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



