श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘गुरुपौर्णिमा’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आषाढ पौणिमा, म्हणजे – गुरुपौर्णिमा

त्या निमित्त ही अक्षर गुरुवंदना !

“श्री गुरवे नमः”

आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…

प्रास्ताविक

आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या गुरुंचे/गुरुतत्वाचे पुण्यस्मरण करण्याचा, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करून गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा दिवस.

गुरु कोण?

आपल्याला जो  शिकवतो, ज्ञान देतो तो आपला गुरु. गुरु देहधारी असू शकतो किंवा विदेही असू शकतो. येवढेच काय पण गुरु मानवेतर प्राणी, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, वस्तू, धातू काहीही असू शकतो. साक्षात श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केले होते हे सर्वश्रुत आहे. न्यूटनला झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाने ज्ञान दिले. ते फळ त्याचा गुरु म्हणता येईल. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

माणूस जन्मापासून मरेपर्यंतच्या आपल्या जीवनयात्रेत पदोपदी, क्षणोक्षणी, कळत नकळत काही तरी शिकत असतो, ज्ञान मिळवत असतो. तो ते ज्ञान कुणाकडूनही घेत असतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते की जो आपल्याला काही शिकवतो तो गुरुच. गुरु हे एक तत्व आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

सद्गुरु कोण?

समर्थ म्हणतात, जाणावे आपणासी आपण, या म्हणती ज्ञान (Absolute knowledge) या शुद्ध ज्ञानाव्यतिरिक्त मिळालेली सगळी केवळ माहिती (Information). असे शुद्ध, विमलज्ञान (Absolute knowledge) देणारा तो ‘सद्गुरु’. सद्वस्तु दाखवि तो सद्गुरु अशी सद्गुरु या शब्दाची सोपी व्याख्या समर्थांनीच केली आहे.

अध्यात्मक्षेत्रात  सद्गुरुला सर्वोच्च मानले आहे. सद्गुरु म्हणजे ब्रह्मा, सद्गुरु म्हणजे विष्णू, सद्गुरु म्हणजेच महेश्वर. सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. ज्याने हे चर-अचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ व्यापले आहे, असे ब्रह्मपद दाखविणाऱा सद्गुरु. जो चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे असा सद्गुरु. सद्गुरु हाच वेदांत, सद्गुरु हाच सिद्धांत आणि सद्गुरु हाच धादांत!

भारतीय अध्यात्म परंपरेत सद्गुरु हाच एकमेव मोक्षदाता आहे असे मानतात. सद्गुरुची महती सांगताना कबीरजी महाराज आपल्या एका दोह्यात म्हणतात,

गुरु गोविंत दोऊ खडे, काके लागू पाय

बलिहारी गुरु आपने, गोविंद दिये बताय।

साक्षात ईश्वर आणि सद्गुरु दोघेही समोर उभे ठाकले तर प्रथम सद्गुरुचे पाय धरावे नंतर गोविंदाचे. कारण सद्गुरुमुळे तर गोविंद लाभले आहेत! येवढे सद्गुरूचे महत्व आहे.

माणसाला सायुज्यमुक्तिदाता  सद्गुरु केवळ त्याच्या  पूर्वपुण्याईमुळेच मिळू शकतो. पण सध्याच्या काळात अशा योग्यतेचा सद्गुरु लाभणे कठीणच आहे.

परब्रह्म प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती सद्गुरुविनाही होऊ शकते असे मानणारे थोर तत्वचिंतक जे. कृष्णमूर्तींसारखे काही मान्यवर आहेत त्यांचाही इथे उल्लेख करायला हवा.

सद्यस्थिति – गुरुहाट

सध्या अध्यात्म हा व्यवसाय, व्यापार होऊन बसलाय! समाजकारण,  राजकारण, नेतेगिरी, भाईगिरी, तशी अध्यात्मगिरी झालीय. देशाविदेशात अनेक गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु, गुरुमाँ, बुवा, बाबा, बापू, श्री, श्री श्री, श्री श्री श्री आपापले मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, तख्ते, डेरे, दमदमे, दरबार,आखाडे उघडून बसले आहेत. तिथून जगभर पसरलेल्या भक्तांना सामुदायिक दीक्षा, मंत्रदीक्षा, अनुग्रह, शक्तिपात दीक्षा, आँनलाईन दीक्षा आणि अनुग्रह घाऊक प्रमाणात दिले जातात. काहींना एकांतदीक्षा, अंगसंगदीक्षाही देण्याची व्यवस्था असते. हे मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, दरबार इ. सर्व सुखसोयींनी युक्त असतात. मठाधिपती गुरु राजाश्वैर्य भोगत असतात. गुरुदेवांना स्वतःची झेड प्लस सुरक्षा असते. गुरुदेवांभोवती भक्त-भक्तिणींचे गराडे पडलेले दिसतात. गुरुदेवांच्या चरणी भक्त आपल्या निष्ठा, श्रद्धा, भक्तीबरोबर धनकोष व खिसेही रिकामे करतात. गुरु शेकडो हजारो कोटींचे स्वामी होतात पण भक्त बिचारे मात्र नंतर काही दिवसात  पस्तावतातही! याला अपवाद असू शकतील पण तरीही सामान्यांनी या पासून दूर रहावे हेच हिताचे. असो.

ग्रंथ हेच गुरु.

म्हणून मला वाटते की सध्याच्या विज्ञान युगात या गुरु, बुवा, बापूंच्या नादी न लागता माणसाने ग्रंथ हेच गुरु आणि त्यांचे वाचन हीच उपासना मानावी.

वाचनाला पर्याय नाही. विविध समाजमाध्यमे, आंतरजाल, गुगल, विकिपिडिया हे ही सध्याचे शक्तिशाली गुरुच आहेत. सूज्ञाने त्यांच्या भजनी लागून आपला उद्धार आपणच करावा.

ग्रंथमहात्म्य

‘ग्रंथदासा’च्या शब्दातच ऐका ग्रंथमहात्म्य

या साऱ्यांची (ग्रंथकारांची) कैक चिंतने। शिक्षणे, शिकवणे, निरीक्षणे। सिद्धांत, मते, अनुमाने। आपापल्या शास्त्राविषयी।।१२।।

त्यांचेच हे उपकार। लिहिले ग्रंथसंभार। ज्ञानाचे भरले भांडार। ग्रंथगर्भी।।१३।।

हे थोरांच्या अनुभवांचे बोल। साधके अभ्यासावे सखोल। जाणून विद्यार्जनाचे मोल। जन्म सार्थकी लावावा।।१४।।

ग्रंथ ज्ञानमार्गीचे वारू। ग्रंथ दवडिती अज्ञान तिमिरू। की भवसागराचे तारू। पैल लाविती।।१५।।

ग्रंथ हेचि गुरु। ग्रंथ परम उपकारू।त्यांना माझा नमस्कारू।अत्यादरे।।१६।।

ग्रंथांविषयी अनादरू। करिता हानि अपरंपारू।हे सत्य मनी धरू। स्वहिताकारणे।।१७।।

नाना विषयांचे नाना ग्रंथ। नाना भाषेतील नाना ग्रंथ। नाना कला शास्त्रांचे अद्भुत ग्रंथ। टीका, कोष, उपदेश।।१८।।

सकळ ग्रंथांविषयी आदरू। धरून मनी अपारू।धुंडाळावे ग्रंथांतरू। नित्य नेमे।।१९।।

नाना ग्रंथ वाचावे। सार शोधून घ्यावे। असार ते त्यजावे। हे विहित क्रिया।।२०।।

(ग्रंथदासविरचित ‘ग्रंथसंग्रह निगराणी प्रकरण’)

वाचन हीच उपासना. वाचनाचे महत्व आणि लाभ ग्रंथदास आपल्या ‘वाचनक्रिया निरूपण प्रकरणा’त लिहितो….

वाचन, चिंतन, मनन। मंथन आणि निधिध्यासन। हेचि साधकाचे लक्षण। यास उपाय नाही।।३६।।

जयास वाटे थोर व्हावे। त्याने अखंड वाचावे।वाचता वाचता जाड व्हावे।  गगनासारिखे।।३७।।

आता ऐका वाचनाचे लाभ। गळती बुद्धीचे मळभ। मार्ग सापडे सुलभ।ज्ञान मंदिराचा।।३८।।

वाचने संशय फिटती। वाचने आशंका आटती।वाचने क्षितिजे रुंदावती। जाणिवांची।।३९।।

वाचने विषय समजती। वाचने रहस्ये उकलती।  वाचने धोके टळती। अधोगतीचे ।।४०।।

वाचने लौकीक वाढे। वाचने लोकसंग्रह घडे। संतसमागम घडे। लाभे व्युत्पन्नता।।४१।।

वाचने कळे सभ्यता। अंगी येई विनम्रता। वाचने लोकप्रीयता। वाढीस लागे।।४२।।

ऐसे सारेच लाभते। भक्ती-ज्ञान-वैराग्य चढते।सार-असार कळो येते। चित्ता ये प्रसन्नता ।।४३।।

वाचने प्रज्ञा वाढे। वाचने अज्ञान झडे। वाचने वाचती वेढे। जन्म मृत्यूचे।।४४।।

वाचाल तरी वाचाल। नाही तर मराल। न करावा अन्य सवाल। या ऊपरी।।४५।।

(“ग्रंथदास”विरचित “वाचनक्रीया निरूपण प्रकरण”)

समारोप

आम्हाला ज्यांनी जन्मभर शिकवले, समजावले, शहाणे केले त्या सर्वांविषयी आपण कृतज्ञ असायला हवे. ज्या वेळी मातेच्या उदरातून आपण या जगात आलो त्यावेळी होतो केवळ एक जिवंत त्वचा-अस्थि-मांसाचा पिंड! त्यावेळी आपल्याला अस्तित्व प्राप्त झाले होते खरे, पण व्यक्तिमत्व प्राप्त व्हायचे होते. त्या व्यक्तिमत्वहीन अस्थित्वचामांसपिंडावर जन्मल्या क्षणापासून पुढे क्षणोक्षणी कोणी ना कोणी काही ना काही संस्कार केले आणि त्या पिंडाला आकार देत राहिले. आज आपण जे आहोत, आपले जे व्यक्तिमत्व घडले आहे, जे जगाला दिसते आहे त्यामागे अनंत अज्ञात हात आहेत. ते हात या साऱ्या  ज्ञात अज्ञात गुरुंचे आहेत.

त्यात सर्वाधिक वाटा आहे असंख्य ग्रंथांचा आणि ग्रंथकर्त्यांचा. तेही सगळेच आपले गुरु आहेत हे नाकारता येत नाही. अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरुंचे, ग्रंथकर्त्यांचे ऋण मान्य करून त्यांचे आभार मानणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी त्या सर्व गुरुजनांना आणि त्या मागील महद्गुरुतत्वाला माझा साष्टांग दंडवत! तस्मै श्री गुरवे नमः!!

🙏🏻🙏🏻🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted