श्री जगदीश काबरे
विविधा
☆ “अहिंसक आंदोलनाचे आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील मोल…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
“दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल” हे गीत काव्यात्मक आणि राजकीय प्रतीक म्हणून महत्त्वाचे आहेच; मात्र त्यालाच फक्त स्वातंत्र्याचा इतिहास मानणे चुकीचे ठरेल. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला व्यापक आव्हान दिले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लाखो सामान्य लोकांनी तुरुंगवास, लाठीमार, आर्थिक नुकसान आणि सामाजिक दडपशाही सहन केली. हे आंदोलन केवळ चरखा फिरवण्याचे आंदोलन नव्हते. मिठाचा सत्याग्रह, परदेशी मालावर बहिष्कार, कर न भरणे, संप, निदर्शने आणि ब्रिटिश प्रशासनाशी असहकार या सर्वांचा त्यात समावेश होता. त्यामुळे गांधीवादी संघर्षाचे प्रतीक म्हणून चरख्याचा उल्लेख करणे आणि संपूर्ण स्वातंत्र्यलढा चरख्यापुरता मर्यादित करणे यात मोठा फरक आहे हे आपल्यासारख्या सुज्ञ माणसांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्याच वेळी, क्रांतिकारकांचे योगदान महात्मा गांधींनीही कधीच नाकारले नव्हते, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. सशस्त्र क्रांतिवीरांचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे प्रयत्न, १९४६ मधील रॉयल इंडियन नेव्ही उठाव आणि जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निर्माण झालेला संताप यांनाही इतिहासाच्या व्यापक चौकटीत स्थान द्यावे लागते.
पण येथे एक महत्त्वाची राजकीय घडामोड लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ब्रिटिशांना क्रांतिकारकांच्या सशस्त्र संघर्षामुळेच भारत सोडावा लागला, असे म्हणणे अतिसुलभीकरण करणे होय. क्रांतिकारकांनी ब्रिटिश साम्राज्याला नैतिक, राजकीय आणि सुरक्षाविषयक आव्हान दिले, हे तर खरेच. त्यांच्या बलिदानाने तरुणांमध्ये राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण केली, हेही खरे. परंतु त्याच काळात दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची आर्थिक व सामरिक परिस्थिती, भारतीय राजकीय जनमत, काँग्रेसचे व्यापक आंदोलन, मुस्लिम लीगचे राजकारण, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया आणि ब्रिटिश साम्राज्याच्या बदललेल्या जागतिक परिस्थिती या सर्व घटकांचा विचार करावा लागतो. याहून महत्त्वाचे म्हणजे, रक्तरंजित इतिहास आणि अहिंसक इतिहास ही परस्परविरोधी विभागणीच चुकीची आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा रक्तरंजितही होता आणि मोठ्या प्रमाणावर अहिंसकही होता. चौरी चौरा, जालियनवाला बाग, क्रांतिकारकांच्या फाशी, पोलिसांचा गोळीबार, तुरुंगातील अत्याचार आणि विविध उठाव हा त्याचा एक भाग आहे; तर सत्याग्रह, असहकार, बहिष्कार, उपोषणे, मोर्चे, जनआंदोलने आणि लाखो लोकांचा अहिंसक सहभाग हा दुसरा भाग आहे. एवंच एका प्रवाहाचे अस्तित्व मान्य करण्यासाठी दुसऱ्याला पुसून टाकण्याची गरज नाही. अन्यथा सेक्युलर विचारसरणी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यात फरक तो काय राहील?
म्हणूनच चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळाले नाही, हे वाक्य अर्धसत्य आहे. कारण चरखा ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करणारे शस्त्र नव्हता; तर तो आर्थिक स्वावलंबन, स्वदेशी आणि जनसहभागाचे प्रतीक होता. त्याचप्रमाणे भगतसिंगांची पिस्तूल किंवा आझाद हिंद सेनेची शस्त्रेही एकट्याने ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करू शकली नाहीत. स्वातंत्र्य मिळवून देणारी शक्ती म्हणजे अनेक दशकांच्या विविध प्रकारच्या प्रतिकाराचा एकत्रित ऐतिहासिक परिणाम होता. म्हणून ध्वजारोहणाच्या वेळी एखादे गांधीवादी गीत वाजवले म्हणजे क्रांतिकारकांचा अपमान होतो, असे सरळ समीकरण मांडणे हे आपल्या देशभक्तीच्या विचाराला संकुचित करते. त्याऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, सावरकर, टिळक, आझाद हिंद सेनेचे सैनिक, नौदल उठावातील सहभागी आणि असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, या सर्वांच्या योगदानाची वस्तुनिष्ठ जाणीव ठेवणे अधिक योग्य ठरेल.
खरा इतिहास कोणत्याही एका महापुरुषाच्या किंवा एका विचारधारेच्या मालकीचा नसतो. भारताचे स्वातंत्र्य हे एका व्यक्तीचे कर्तृत्व नव्हते आणि एका विचार पद्धतीचेही फलित नव्हते; ते विविध विचारांचे, विविध संघर्षपद्धतींचे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात भारतीयांच्या त्यागाचे संचित होते. म्हणून फक्त अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळाले, हे जसे अर्धसत्य आहे, तसेच फक्त सशस्त्र क्रांतीमुळे स्वातंत्र्य मिळाले, हेही अर्धसत्यच आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासाला खरा न्याय द्यायचा असेल तर चरख्याबरोबर क्रांतिकारकांचे रक्त, सत्याग्रहाबरोबर तुरुंगवास, जनआंदोलनांबरोबर सशस्त्र उठाव आणि राजकीय वाटाघाटींबरोबर साम्राज्याच्या अंतर्गत झालेला दबाव, या सर्व घटनांना योग्य ऐतिहासिक संदर्भात पहावे लागेल. असे केले तरच एकांगी विचार न करता स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगेल आणि समजेल.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




