श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “युद्धाय कृतनिश्चय:!” ☆ श्री संभाजी बबन गायके

डिसेंबर, १९७१. कितीतरी महिन्यांपासून होणार होणार म्हणून गाजत असलेल्या भारत-पाक युद्धाचा बिगुल फुंकला गेला.

१९६८ मध्ये सैन्यात दाखल झाल्यावर त्यांना रेजिमेंट मिळाली ती दी डेक्कन हॉर्स. त्यांच्या मागच्या दोन तीन पिढ्या याच रेजिमेंटमधून लढल्या होत्या. ही रेजिमेंट यावेळीही युद्धक्षेत्राच्या अगदी समीप तैनात होती. नव्याने दाखल झालेले अधिका-यांचे बाहू तर फुरफुरत होते… युद्धात शौर्य गाजवायला मिळणार याचा आनंद होता! पण या तरुण लष्करी अधिका-याच्या या आनंदावर काहीसे विरजण पडले, असे म्हणावे लागेल.

नोव्हेंबर महिना होता. यांना महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर (आधीचे अहमदनगर) येथे स्थापन होणार असलेल्या लष्करी केंद्राच्या कर्तव्यावर धाडण्यात आले. मेजर आर. डी. लॉ साहेब प्रमुख होते. त्यांच्या सोबत कॅप्टन ए. के. भाटिया साहेब सेकंड-इन-कमांड होते. आपल्या कथानायकास इथे लेफ्टनंट म्हणून जबाबदारी देण्यात आली. काही दिवसांच्या रणगाडा विशेष प्रशिक्षणानंतर १३ नोव्हेंबर, १९७१ रोजी राजस्थान सीमेवर जाण्याचे आदेश मिळताच आपले नायक अत्यंत आनंदित झाले! जंगी निरोप समारंभ झाला… चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड हे लष्करी गीत वाजवण्यात येत होतं… त्यामुळे वातावरण एकदम रोमांचक बनले होते… आता युद्धावर जायला मिळणार याचा आनंद होताच… पण निरोप देण्यासाठी घरचे कुणी नव्हतं याचं काहीसं वैषम्य होतंच! मात्र दुसरे एक युवा अधिकारी किशोर बडबडे साहेब यांचे कुटुंबीय खास पुण्यावरून अहमदनगरला आले होते.. त्यांना निरोप द्यायला… जी त्यांची दुर्दैवाने शेवटची भेट ठरणार होती! पाचव्या दिवशी हे रणगाडा सैन्य जोधपूर-पोखरण येथे पोहोचले आणि त्यांना जैसलमेर येथे लोंगेवाला येथे युद्धात सहभागी होण्यासाठी पाठवले जायचे ठरले होते. तोवर युद्ध-सराव जोरात केला जात होता… रणगाडे तयार केले जात होते… आता फक्त आदेशाची प्रतीक्षा होती.

पण आपल्या कथानायकाच्या या युद्ध निश्चयात एक मोठीच समस्या आली… पोटाच्या विकाराने भयंकररीत्या डोके वर काढले. वैद्यकीय तपासणीअंती यांना जोधपूरच्या लष्करी रूग्णालयात भरती करावे लागले… अर्थात या शूर वीराची याला अजिबात तयारी नव्हती… पण वरिष्ठ अधिका-यांनी ठाम नकार दिला!

अगदी अनिच्छेनेच साहेबांनी हा आदेश स्वीकारला आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले… पण संपूर्ण लक्ष युद्धभूमीकडे लागून राहिलेले… आणि बातमी आली… पाकिस्तानी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले आहेत! लोंगेवालाजवळ जोरदार धुमश्चक्री सुरु आहे… आपले लोक युद्धात आहेत आणि मी असा इथे रुग्णालयात… हे काही मनाला पटेना.. साहेबांनी मनाशी ठरवले… रूग्णालयातील सर्वांची नजर चुकवून रुग्णाचा गणवेश काढला… लष्करी गणवेश चढवला… आणि रुग्णालयातून पळ काढला… कुणालाही न सांगता! रुग्ण बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच मोठा गहजब झाला… आणि संबंधित लष्करी अधिका-याने युद्धाच्या वातावरणात लष्कर सोडून पलायन केल्याचा समज झाला… तसा रिपोर्टही तयार झाला! हा मोठाच गुन्हा! ६ डिसेंबर, १९७१. साहेबांनी जोधपूर बाहेर पडणारा रस्ता धरला… एक तीन चाकी वाहन मिळाले… त्यात स्वारी स्वार झाली. पुढे बस आणि त्याहीपुढे जाऊन जैसलमेरकडे जाणारी रेल्वे धरली… त्यादिवशी दुपार झाली जैसलमेरमध्ये पोहोचायला. रेल्वे स्टेशनवर तैनात लष्करी अधिका-याने यांना एका आर्मी ट्रकमध्ये बसवून दिले… आणि ट्रक लोंगेवाला पोस्टवर पोहोचला. तिथे मोठा संघर्ष होऊन गेला होता. कितीतरी लष्करी वाहने, रणगाडे जळालेल्या अवस्थेत पडलेले होते. एक पाकिस्तानी रणगाडा अजूनही जळतच होता… हे साहेब त्या रणगाड्यापाशी उभे असताना त्यांना कॅप्टन अर्जुन सिंग साहेबांनी पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले… त्यांना सारी हकीकत सांगितल्यावर त्यांनी विचारले… तुमची तुकडी कुठे आहे? त्यावर या साहेबांकडे काहीच उत्तर नव्हते. युद्धाच्या धामधुमीत काही संपर्कही साधणे अवघड होते. जी. एस. बावा साहेबांनी यांना जैसलमेर वाळ्वंटात असलेल्या एका पाणी भरण्याच्या ठिकाणापर्यंत जाणार असलेल्या ट्रकमध्ये कॅप्टन ए. एस. क्लेर साहेबांसोबत बसवून दिले.. या ट्रक मध्ये एक बंदी पाकिस्तानी सैनिक होता.. त्याला घेऊन ट्रक निघाला होता! सीमेवर अगदी पुढे तैनात असलेल्या १२, इन्फंट्री डिविजनच्या हेडक्वार्टर मध्ये साहेब पोहोचले… तेथे मेजर जनरल आर. के. खंबाटा साहेब, ब्रिगेडीअर ई. एन. रामदोस साहेब होते.. त्यांना या युद्धासाठी रूग्णालयातून पळून आलेल्या सैनिक अधिका-याचे कौतुक वाटले. त्यांनी पुढे जाणार असलेल्या गोरखा रायफल्ससोबत जाण्याची व्यवस्था लावून दिली… पाकिस्तानचा आपण पकडलेला एक रणगाडा चालवत नेण्याची संधी मिळाली! ठरलेल्या जागी पोहोचल्यावर गोरखा रायफल्सच्या वरिष्ठ अधिका-यांनी या साहेबासोबत दोन जवान दिले आणि यांची स्क्वाड्रन शोधायला पाठवले. संध्याकाळ झाली होती… हे तिघे एका गन पोझिशनपर्यंत पोहोचताच तेथील सजग पहारेका-याने यांना अटक केली… पण ओळख पटवणारी कागदपत्रे होती म्हणून बचावले! तिथे कर्तव्यावर असलेल्या कॅप्टन एच. सी. हुडा साहेबांनी यांना ओळखले… त्यांचा यांच्या कुटुंबाशी परिचय होता! रात्री मुक्काम आणि सकाळी नास्ता झाल्यावर यांना पुढे जाण्याची परवानगी दिली… सकाळी काही वेळातच या साहेबांना त्यांच्या स्क्वाड्रनची पाच वाहने दिसली… अत्यानंद झाला! चुकलेलं वासरू कळपात परतलं होतं जणू. साहेबांनी एका रणगाड्याचा ताबा घेतला… आणि पुढे निघाले… आणि त्यांच्या ताफ्यावर पाकिस्तानी विमानांनी हल्ला चढवला… हा हल्ला परतवून लावण्यात आला! मेजर लॉ साहेबांनी वायरलेसवर मेसेज केलेला असताना त्यांना या साहेबांनी ‘रेडी’ असे उत्तर दिले… यांचा आवाज ऐकून तर साहेबांना धक्काच बसला… हा तर रुग्णालयात भरती होता… इथं कसा पोहोचला… साहेब म्हणाले एवढा हल्ला झाल्यावर मला भेट! तो हल्ला व्यवस्थित झाला… कारवाई उत्तम झाली! साहेबांसमोर हे साहेब उभे राहिले… साहेबांनी सर्व हकीकत जाणून घेतली… मिलिटरी हॉस्पिटलशी संपर्क साधला… आणि लेफ्टनंट वेद प्रकाश दहिया यांच्याविरोधात ‘लष्करातून पलायन’ केल्याचा आरोप मागे घेतला जाईल, अशी व्यवस्था केली… रूग्णालयातून डिस्चार्ज दिला गेल्याचे प्रमाणपत्र तयार करायला लावले… सांगितले… रुग्ण बरा होऊन लढाईमध्ये आलाय!

दहिया साहेबांनी पुढे कित्येक दिवस झालेल्या सर्व मोहिमांमध्ये पुढे राहून हिरीरीने भाग घेतला… रणगाडे घेऊन अगदी पाकिस्तानी भागांत खोलवर तब्बल ५४ किलोमीटर्सपर्यंत मुसंडी मारली. दरम्यान कुमाऊ बटालियनमध्ये कर्तव्यावर असलेल्या सख्ख्या भावाची कॅप्टन वाय. ई. एस. दहिया यांची भेट झाली… पुढे दोघा भावांनी मिळून पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्याच्या मोहिमेत एकत्रित भाग घेतला… कॅप्टन वाय. ई. एस. दहिया साहेबांना मेन्शन-इन-डिसपॅच ने गौरवण्यात आले.

जोधपूर येथील रुग्णालयातून पळ काढीत थेट युद्धभूमीवर पोहोचून भारत मातेच्या रक्षणार्थ प्राण पणाला लावणा-या दहिया साहेबांची कहाणी अतिशय रोमांचक आणि स्फूर्तीदायक आहे… या अशा बहादूर सैनिकांमुळेच देश सुरक्षित हातांत आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted