सुश्री नीता कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ “तर कोणीच आऊट होणार नाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
राष्ट्रसेविका समितीच्या शाखेत गेले होते. त्या दिवशी भक्ती म्हणाली,
“आज नवीन खेळ खेळू. “
आम्ही खुश.. ऊत्सुकता. काय असेल बरं…
भक्ती म्हणाली,
” खेळ सोपा आहे सगळ्यांनी गोल फिरायचं. जी खेळ घेत असेल तिनी.. गणितातले शब्द आहेत… अर्धा, एक, दीड दोन… ते म्हणायचे. अर्धा म्हटलं तर थोडा गुडघा वाकवायचा आणि उभं राहायचं. एक म्हटलं तर नुसतं उभं राहायचं. दीड म्हणलं तर दोघींनी जोडी करायची. एकीनी थोडं वाकून उभं राहायचं.. की झाला दीड..
” सोप्पच आहे की… चला खेळूया” आम्ही म्हटलं. भक्ती म्हणाली,
” पण एक लक्षात ठेवा कोणीही आऊट होणार नाही याची दक्षता घ्यायची. त्यासाठी कसही गणित करा. “
खेळायला सुरुवात झाली. अर्धा, एक खेळून झाले. नंतर आला दीड… एक आणि अर्धा…
दोघी दोघींनी जोड्या केल्या.
एक जण एकटीच राहिली. तिला जोडीच नव्हती. क्षणभर इकडे तिकडे बघत उभी राहिली.
आता काय…… तेवढ्यात पटकन दोघींनी तिला आपल्या गटात घेतलं आणि तिघीही गुडघ्यावर खाली वाकल्या.
दीड चा हिशोब पूर्ण झाला..
अरे खरंच की…
यातलं खरं मर्म असं होतं की…
सर्वांना सामावून घेऊनच उद्दिष्ट साध्य करायचं आहे… त्यासाठी आम्ही ऍडजेस्टमेंट करायला तयार आहोत.
म्हणूनच त्या वाकल्या… उद्देश सफल झाला.
असा नीट विचार करून खेळलं की की पाव, अर्धा, पाऊण यांचा मेळ घातला तर कोणीच आऊट होणार नाही. शेवटपर्यंत सर्वांना एकत्र खेळता येईल. मजा आली… खेळ संपला घरी आले.
आजच्या खेळात भक्तीने सांगितले होते… कोणीही आऊट होणार नाही याची काळजी घ्या. याचाच अर्थ असा की एखादा मागे राहिला तर त्याला तुमच्यात सामाविष्ट करून घ्या..
त्याला बरोबर घेऊन पुढे चला…
नीट संयमानी सर्वांनी मिळून विचार केला की हे जमू शकते..
मार्ग निघू शकतो…
मग कोणी मागे राहणार नाही.
कितीही नाही म्हटले तरी साध्या खेळातही मागे राहणाऱ्याला थोडे दुःख होतेच. त्यालाही अजून खेळायचे असते. जीवनातही हे तत्वज्ञान उपयोगी आहे.
” एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ”
हेच तर या खेळाचे सूत्र असावे असे मला तरी वाटले.
आजच्या खेळाचा विचार करताना नातवाच्या पाचवीच्या स्कॉलरशिपच्या गणिताची आठवण झाली. लक्षात आलं परीक्षा झाली
.. रिझल्ट लागला.. संपलं असं नसतच.. परीक्षा ही आयुष्यभराचीच गोष्ट आहे. त्यातील एका गणिताचं साधं सोप्प उत्तर या खेळाने दिलेले आहे.
ते आपण प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे. त्यासाठी मला काय करता येईल.. याचा आपल्या मनाशी आढावा घेऊ या..
अजून थोडा विचार केला…
लक्षात आलं की समाजातही जे आर्थिक, सामाजिक कारणाने मागे आहेत त्यांच्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे.
” सबका साथ सबका विकास”
हे श्री मोदी साहेब सांगत आहेत. भारत प्रगतीपथावर चाललेला आहे.
आपण अर्धे कच्चे असलो तरी आपल्याला..
राष्ट्र सेविका समितीने तिच्यात सामावून घेतलेले आहे. शाखेत गेल्याने सकस विचार मनात रुजत आहेत. अशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.
त्यासाठी नियमित शाखेत जात राहू..
नविन संकल्पना शिकत राहू.
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





