मराठी साहित्य – विविधा ☆ २१ जून… “जागतिक संगीत दिन”… ☆ मंजुषा सुनीत मुळे  ☆

मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ २१ जून… “जागतिक संगीत दिन” ☆ मंजुषा सुनीत मुळे 

संगीत म्हणजे जगभरातल्या कुठल्याही संवेदनशील माणसाच्या आत्म्याला स्पर्श करणारी एक अमूर्त भावना… संगीत म्हणजे गायन-वादन-नृत्य यांचा जणू त्रिवेणी संगम.. हीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि संगीत व कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी ‘ जागतिक संगीत दिन ‘ साजरा केला जातो. आणि सगळ्या संगीतप्रेमींना स्वरमयी शुभेच्छा दिल्या जातात

‘जागतिक संगीत दिन‘ हा केवळ एक उत्सव नसून संगीताच्या वैश्विक भाषेला जागतिक पातळीवर दिला जाणारा सन्मान आहे. याचं कारण म्हणजे माणूस आणि संगीत यामधलं अतूट नातं. माणूस आनंदी असतो तेव्हा गातोच, पण दु:खी असतो तेव्हाही शांत हळवे सूर त्याचं मन शांत करू शकतात. संगीत कानांना तर आनंद देतंच पण त्याआधी ते सप्तसूर मनाला जणू साक्षात भिडतात. म्हणूनच मानवी जीवनात संगीताला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आणि म्हणूनच आता अनेक आजारांवरही ‘ म्युझिक थेरपी ‘ एक परिणामकारक उपाय म्हणून वापरली जाते.

या विशेष दिनामागचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर — — हा दिन साजरा करण्याची कल्पना सगळ्यात आधी फ्रान्समध्ये १९८१ साली मांडली गेली. आणि २१ जून १९८२ रोजी फ्रान्सचे तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री मॉरीस फ्ल्यूरेट यांच्या पुढाकाराने आणि जॅक लंग यांच्या सहकार्याने फ़्रान्समध्ये ‘फेटे द ला म्युझिक‘ (Fete de la Musique) हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ही संकल्पना त्या देशात तर खूपच लोकप्रिय झाली, आणि काहीच दिवसात ती आधी संपूर्ण युरोपमध्ये आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. या दिवशी जगभरातले संगीतप्रेमी अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करतात.. अनेक देशांमध्ये संगीताच्या विविध शैली उलगडून दाखवणारे कार्यक्रम आयोजित करून जणू संगीताच्या ‘विविधतेचा सन्मान’ केला जातो. आणि यामागचा उद्देश एकच.. संगीताच्या माध्यमातून प्रेम, शांतता, आणि एकात्मकतेचा संदेश पोहोचवणे. आजच्या डिजिटल युगात तर यासाठी वेगवेगळे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत.

संगीताचे कुठल्याही माणसाला वैयक्तिक पातळीवर होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे सांगायचे तर – –

.. मन शांत होतं.. चिंता आणि मानसिक ताण कमी होतो … मेंदूच्या कार्यक्षमतेला नकळत चालना मिळते ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते … रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते … आणि एक वेगळा उपयोग म्हणजे आनंद, दु:ख, प्रेम अशासारख्या भावना व्यक्त करण्यासाठी हे एक प्रभावी साधन असते.

भारतापुरतं बोलायचं तर “ अभिजात शास्त्रीय संगीत “ ही भारताने इतर संपूर्ण जगाला दिलेली एक सुंदर आणि अनमोल देणगी आहे यात दुमत होणे शक्यच नाही. त्याबरोबरच आपल्याकडे भावसंगीत, भक्तीसंगीत, नाट्यसंगीत, सिनेसंगीत अशा विविध प्रकारातून आणि अनेकविध वाद्यांच्या उत्तम आणि सुरील्या वादनातून, संगीत रसिकांपर्यंत सतत पोहोचत असते. त्यामुळे ज्याला ज्या प्रकारच्या संगीताने आनंद मिळत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य लाभत असेल ते संगीत त्याच्यासाठी सदैव उपलब्ध असते ही विशेष म्हणावी अशी समाधानाची गोष्ट आहे.

सा रे ग म प ध नी सां.. हे संगीतातले सात स्वर… कुठल्याही प्रकारच्या संगीतासाठी आवश्यक असणारे.. किंबहुना संगीताचा अविभाज्य भाग असणारे … वेगवेगळ्या भाव-भावनांचा आविष्कार करणारे..

पण त्याव्यतिरिक्त हे सात सूर माणसाला वेगळाच एक संदेश देत असतात असे कुठेतरी वाचनात आले, जो संदेश प्रत्येकाने आचरणात आणला तर आयुष्य आणखी समृद्धच होईल असे खात्रीने वाटले..

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल असा तो संदेश असा – – –

  • सा – सतत “सा”वध असावे,
  • रे – आपली वाणी, बोलणे “रे”शमा सारखे मृदु असावे,
  • ग- कुठल्याही गोष्टीचा “ग”र्व नसावा,
  • म- “म”धुर शब्द- सुरांनी परमेश्वराची आळवणी करावी.
  • प- आपली वृत्ती “प”रोपकारी असावी.
  • ध -सतत ईश्वरनामाची कास “ध”रावी.
  • नि -“नि”त्य हरीकथा श्रवण करावी
  • सा – “सा”धक बनून गुरूभजनी रंगून जावे.

“ संगीत “ या अतुल्य देणगीची मुक्त हस्ते उधळण करणाऱ्या संगीत क्षेत्रातल्या सर्व कलाकारांना आणि सर्व संगीत-प्रेमींना या जागतिक संगीत-दिनाच्या मनापासून सप्तरंगी शुभेच्छा.

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विसाव्याचे क्षण… – सुरेखा चिखलकर ☆ रसग्रहण… श्री उदय माने ☆ प्रस्तुती – सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? काव्यानंद ?

☆ विसाव्याचे क्षण… – सुरेखा चिखलकर ☆ रसग्रहण… श्री उदय माने ☆ प्रस्तुती – सुरेखा चिखलकर ☆  

☆ विसाव्याचे क्षण… – सुरेखा चिखलकर ☆

आता मिळाले विसाव्याचे क्षण

आठवणी बनल्या सावल्या,

भावनेचा पसारा सावरून

परतीच्या मार्गावर चालल्या..

नात्यांची आता कुठेच

दुःखाला ओढ नाही,

कोरड्या आसवांना

वाहण्याची जोड नाही..

 *

काळजाच्या कपारीत

आठवांचे रोज झिरपणे,

वाट अंधारल्यावर

मौन आता विसरणे…

 *

धूसर पाऊलवाट जणू

न्याहाळते उरलेली वाट,

मनाच्या कातळावर

झिरपू लागतो काठ…

 *

विस्कटलेल्या पसाऱ्यांमध्ये

 वेचावे आता थोडे क्षण

आयुष्याचा सडा अंगणी

देह निर्माल्य राहो कण…

सुरेखा चिखलकर

8806913315

समीक्षण – ‘विसाव्याचे क्षण‘ – एक चिंतन

ही कविता आयुष्याच्या त्या वळणावर उभी आहे जिथे धावपळ थांबली आहे आणि आठवणींचा मागोवा घेण्याची वेळ आली आहे. कवयित्रीने ‘विसावा’ या संकल्पनेला केवळ विश्रांती म्हणून न पाहता, आयुष्यातील संघर्षांनंतरची एक ‘स्वस्थ स्थिती’ म्हणून मांडले आहे. ‘सावल्या बनलेल्या आठवणी’ हे रूपक अतिशय सुंदर आहे. ज्या आठवणींनी एकेकाळी दुखावले होते, त्या आता केवळ शांत सोबती बनल्या आहेत. कवितेची भाषा साधी, प्रवाही आणि मनात घर करणारी आहे. ​मानवी आयुष्यात आपण कितीतरी भावनांचे ओझे वाहतो. ते ओझे आता ‘परतीच्या मार्गावर’ कमी होत चालल्याचे कवयित्रीने मांडले आहे. ‘नात्यांची दुःखाला ओढ नाही’ ही ओळ खूप सखोल आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर अपेक्षा संपतात आणि त्यामुळे दुःखाची तीव्रताही कमी होते. ‘मौन विसरणे’ किंवा ‘मनाच्या कातळावर झिरपणे’ यांसारख्या प्रतिमा मानवी मनातील खोलवर असलेल्या शांततेचे दर्शन घडवतात.

कवयित्रीने दुःखाला कुरवाळण्याऐवजी, त्याला सावरून पुढे जाण्याची जी वृत्ती दाखवली आहे, ती खऱ्या अर्थाने ‘विसाव्या’ची प्रचिती देते.

‘विसाव्याचे क्षण’ ही कविता म्हणजे जीवनाचा एक परिपक्व आढावा आहे. धावपळीच्या या युगात, जिथे प्रत्येकजण काहीतर मिळवण्यासाठी धडपडत आहे, तिथे कवयित्रीने ‘काहीही न हवे असण्याची’ स्थिती किती शांत असू शकते, याचे सुंदर वर्णन केले आहे. ही कविता वाचकाला अंतर्मुख करते आणि आपल्याच आयुष्यातील ‘विसाव्याच्या क्षणांचा’ शोध घ्यायला प्रवृत्त करते.

​थोडक्यात सांगायचे तर ही कविता केवळ शब्दांची मांडणी नसून ती जगण्याचा एक शांत आणि समाधानी दृष्टिकोन देणारी एक कलाकृती आहे.

विस्कटलेल्या पसाऱ्यांमध्ये

वेचावे आता थोडे क्षण,

आयुष्याचा सडा अंगणी

देह निर्माल्य राहो कण..

​हे चरण कवितेचा गाभा आहे.

‘विस्कटलेला पसारा’ हे शब्द आपल्या आयुष्यातील सुख-दुःख, धावपळ, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि जुन्या आठवणींचे प्रतीक आहेत. या विस्कटलेल्या आयुष्यातून आता केवळ ‘क्षण’ वेचायचे आहेत, म्हणजेच आता कसलीही मोठी ध्येये न ठेवता, वर्तमानातील शांततेचा आनंद घ्यायचा आहे, असा अर्थ यातून निघतो. ‘देह निर्माल्य राहो कण’ ही ओळ अतिशय प्रभावी आहे. मंदिरात वाहिलेली फुले (निर्माल्य) जशी देवाला अर्पण झाल्यावर आपले अस्तित्व विसरतात, तशीच इच्छा कवयित्रीने व्यक्त केली आहे. आयुष्यभर कष्ट सोसलेला देह आता थकल्यानंतर, तो निसर्गाच्या किंवा ईश्वरी चरणी शांतपणे समर्पित व्हावा, ही त्यातील गांभीर्य आणि पावित्र्य दर्शवते.

आयुष्याच्या शेवटी ‘सडा अंगणी’ असावा, म्हणजे सर्व काही प्रसन्न आणि नीटनेटके असावे, ही ओळ मनातील विचारांची स्पष्टता दर्शवते. गोंधळ, कलह किंवा अपेक्षांचे ओझे आता उरलेले नाही. आता देहाचे कण कण जरी निसर्गाला परत द्यावे लागले, तरी त्यात एक प्रकारचे समाधान आणि तृप्ती आहे.

हे चरण आयुष्याच्या अंतिम सत्याचा अत्यंत हळुवारपणे स्वीकार करते. भीती न बाळगता, एक प्रकारचे ‘निर्लेप’ होऊन जीवनाच्या प्रवासाची सांगता करणे, हे या ओळींचे मुख्य सौंदर्य आहे.

​थोडक्यात हे अंतिम चरण कवितेला एका आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवते. “जे काही राहिले आहे, ते आता आनंदाने उपभोगावे आणि जाताना मागे फक्त सकारात्मकतेचा सुगंध सोडावा, ” हा संदेश या चरणातून मिळतो. हे शब्द केवळ मृत्यूचे वर्णन करत नाहीत, तर ते ‘जगावे कसे’ आणि ‘जावे कसे’, याचे एक सुंदर मार्गदर्शन करतात.

रसग्रहण – श्री उदय माने

काव्यानंद.. प्रस्तुती सुरेखा चिखलकर

8806913315

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन प्रवाह.. एकच स्पंदन..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ‘दोन प्रवाह.. एकच स्पंदन..☆ श्री दिवाकर बुरसे

रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरली होती.

आकाशात तारे डोळे मिचवावून एकमेकांना काहीतरी सांगत होते,

पण त्यांची भाषा अजूनही समजलेली नव्हती.

त्या शांततेत,

एक तरुण टेकडीवर बसला होता,

प्रश्नांनी भरलेला, उत्तरांच्या शोधात हरवलेला !

 

त्याने आकाशाकडे पाहिलं आणि विचारलं—

“हे सगळं नेमकं काय आहे?”

त्याच्या प्रश्नाला प्रतिसाद देत, कुठूनतरी दोन आवाज उमटले—

एक स्पष्ट, ठाम; दुसरा शांत, खोल.

 

“मी सांगतो, ” पहिला आवाज म्हणाला,

“मी विश्व उलगडतो —

कणांच्या नृत्यातून, ताऱ्यांच्या प्रवासातून.

मी तुला सांगतो—हे सगळं कसं घडतं।”

 

तरुणाने वळून पाहिलं—

त्याच्या समोर एक तेजस्वी व्यक्ती उभी होती,

डोळ्यांत जिज्ञासेची ज्योत.

“तू कोण?”

“मी— *विज्ञान*!”

 

इतक्यात दुसरा आवाज हळूच उमटला—

जणू वाऱ्याने मनाला स्पर्श केला

“आणि मी तुला सांगतो, ” तो म्हणाला,

“हे सगळं का आहे. ”

 

तरुणाने डोळे मिटले—

आणि त्याला एक शांत अस्तित्व जाणवलं,

अगदी स्वतःच्या आत आत.

 

“तू?”

“मी— अध्यात्म!”

 

क्षणभर तिघेही शांत बसले.

 

तारे वरून पाहत होते,

जणू या भेटीची साक्ष देत.

 

तरुण थोडा गोंधळला—

“तुम्ही दोघं वेगळं का बोलता?

एक ‘कसं’ सांगतो, दुसरा ‘का’…

मग खरं कोण?”

 

विज्ञान हसलं—

“मी तुला विश्वाचं चित्र दाखवतो,

पण त्या चित्राचा अर्थ…

तो कदाचित माझ्याही पलीकडे आहे. ”

 

अध्यात्म शांतपणे म्हणालं—

“मी तुला त्या अर्थाचा अनुभव देतो.

पण तो कसा घडतो—

हे मला शब्दात सांगता येत नाही. ”

 

तरुणाच्या मनात एक लहर उठली.

त्याने पुन्हा आकाशाकडे पाहिलं,

आणि मग..

 स्वतःच्या आत.

 

त्याला जाणवलं—

बाहेरचं विश्व आणि आतलं मन

एकमेकांपासून वेगळं नाहीत.

त्या क्षणी,

विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांकडे पाहून हसले !

 

“आपण विरोधक नाही, ” विज्ञान म्हणालं,

“आपण दोन दिशांनी चालणारे एकच प्रवासी आहोत।”

“हो, ” अध्यात्म म्हणालं,

“तू प्रकाश देतोस, मी शांतता.

पण प्रकाशाला अर्थ देणारी शांतता,

आणि शांततेला दिसणारा प्रकाश—

दोन्ही एकत्रच पूर्ण होतात।”

 

तरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली.

तो आता उत्तर शोधत नव्हता—

तो समजत होता.

त्याने डोळे मिटले,

आणि त्या क्षणी त्याला जाणवलं—

ना केवळ तारे दूर आहेत,

ना केवळ मन आत आहे;

दोन्ही एकाच स्पंदनाचे दोन स्वर आहेत !

 

रात्र अजूनही होती,

तारे अजूनही चमकत होते,

पण आता त्या तरुणासाठी

अंधार नव्हता—

कारण त्याने दोन प्रकाश शोधले होते—

एक बाहेर,

एक आत.

आणि त्या दोन्हींच्या संगमात

त्याला सापडलं—

एकच सत्य.

 

शेवट नाही…

कारण हा प्रवास थांबत नाही.

प्रश्न पुन्हा जन्म घेतात,

उत्तरं पुन्हा बदलतात.

पण आता भेद इतकाच—

तो एकटा नाही.

त्याच्यासोबत आहेत—

विज्ञानाचा प्रकाश

आणि अध्यात्माची शांतता !

आणि त्यांच्या मध्ये धडधडतंय—

एकच, अखंड स्पंदन !!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मृतदेह हा पहिला गुरू !!” ☆ गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मृतदेह हा पहिला गुरू !!” ☆ गौरी गाडेकर ☆

डॉक्टर होण्याच्या प्रवासातील पहिला गुरु हा ‘मृतदेह’ असतो! डोनर असतो! मृत्यूनंतरही ज्ञानदानाचा मार्ग त्या शरीराने स्वीकारलेला असतो म्हणून त्याचा आदर राखलाच पाहिजे. कुठल्यातरी विनोदी (?) कार्यक्रमात मेडिकल कॉलेजमधील डिसेक्शन टेबलवरील मृतदेहाबद्दल काहीतरी चर्चा झाली म्हणे… आपल्याला तिकडं जायचं नाही कारण मुळात ते शंभर टक्के खोटं आहे, तसं काही होत नसतं.

एमबीबीएसला असतानाचा पहिलाच दिवस आठवतोय. Anatomy… शरीररचना शास्त्राचा विषय. आयुष्यात पहिल्यांदा मृत्यू इतक्या जवळून बघण्यात आला. खरंतर जिथे मृतदेह, डोनर ठेवलेले असतात त्या डिसेक्शन हॉलमध्ये प्रवेश करण्याआधीच ते सगळं आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात करतात. Formalin या केमिकलचा उग्र वास नाकात शिरतो. त्याची तीव्रता इतकी असते की, डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागतं. शरीर जपून ठेवण्यासाठी याचा वापर करावा लागतो.

आमची १५० विद्यार्थ्यांची बॅच होती. प्रत्येकी १५ विद्यार्थ्यांमध्ये एक देह, एकेका टेबलवर ओळीत झोपवलेले होते. शरीरं कडक झालेली, त्वचा काळसर पडलेली… ते अनोळखी स्त्री पुरुष, Cadaver आमच्या अभ्यासासाठी होते. मध्यभागी ते शरीर आणि बाजूंनी सगळा तो घोळका. आयुष्यात पहिल्यांदाच ते दृश्य पाहिलं होतं… तो उग्र वास, डोळ्यात होणारी चरचर, येणारं पाणी. मनात भीती, घृणा, संकोच, अस्वस्थता, कुतूहल सगळ्याच भावना होत्या.

सरांनी पहिल्या दिवशी Cadaveric Oath वेळी सांगितलं होतं, समोर जो देह दिसतोय तो तुमच्या आयुष्यातील पहिला रुग्ण नसून पहिला शिक्षक आहे, त्यांचा आदर करा. शरीरदान हे मृत्यूनंतरही मानवसेवेचे सर्वोच्च दान असते. आपण जिवंत रुग्णांचा जितका आदर करतो तितकाच आदर आपण यांचा केला पाहिजे, कारण त्या व्यक्तीने मृत्यूनंतरही ज्ञानदानाचा मार्ग स्वीकारलेला असतो.

डोनरच्या बाजूला उभे राहून वास येतोय म्हणून नाकाला हात किंवा रुमाल लावणे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. तुम्ही मास्क लावू शकता पण हाताने नाक बंद करून घेणे वगैरे त्या मृतदेहाचा अपमान समजला जातो. तिथे थांबून थुंकणं, अर्वाच्य भाषेत बोलणं, विनोद करणं, शरीरावर विचित्र कमेंट करणं हा त्या डोनरच्या त्यागाचा अपमान असतो.

तो पहिल्या वर्षभराचा प्रवास फार सुंदर असतो. सुरुवातीला त्या देहाबद्दल घाण वाटते, भीती वाटते पण हळूहळू आपली आणि ‘त्यांची’ ओळख होऊ लागते. आपला टेबल, आपली ‘बॉडी’… एक नातं तयार होऊ लागतं. ते शरीर कोणाचंही असू शकतं. जिवंत असताना ते कदाचित नोकरदार असतील, रिटायर्ड असतील, शेतकरी असतील, सैनिक असतील, समाजसेवक असतील, शिक्षक असतील… एखाद्या मुलाची आई असेल! कदाचित लावारिस शरीर असेल! लावारिस असतानाही त्यांनी या रूपाने वारसा जपलेला असतो.

अभ्यास सुरू होतो. सुरुवातीला ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे तिथली त्वचा बाजूला केली जाते. एकेक अवयव शिकवला जातो. ही काही चार दिवस किंवा आठवड्याची गोष्ट नसते. तब्बल वर्षभर हळूहळू ही प्रक्रिया चालत राहते. शरीरातील एकेक स्नायू, नसा, धमन्या, हाडे, मज्जातंतू उघडून पाहिले जातात. त्यांची रचना शिकवली जाते. किडनी, लिव्हर, हृदय, मेंदू एकेक अवयव बाजूला काढून, अगदी हातात घेऊन शिकवले जातात. हे सुरू असताना कधीतरी एखाद्याच्या हृदयामध्ये स्टेंट सापडतो, एखाद्याच्या हाडांमध्ये बाहेरून बसवलेला रॉड सापडतो… आणि जाणीव होते की हेही कधीतरी आपल्यासारखेच जिवंत होते.

वर्ष संपतं, परीक्षा जवळ येऊ लागते तेव्हा त्या शरीरामध्ये हाडांशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. त्या शरीराची भेट आता कधीच होणार नसते. इतके दिवस सोबत राहिल्यामुळे त्या मृतदेहासोबत भावनिक बांध तयार झालेला असतो. ज्या व्यक्तीचं नाव कधीच समजणार नसतं, ज्या व्यक्तीला कोणताही पुरस्कार मिळणार नसतो, टाळ्या वाजणार नसतात, कुठे फोटो लागणार नसतो ती व्यक्ती कायमची मनात राहून जाते. एकही डॉक्टर आपल्या आयुष्यात आलेला पहिला मृतदेह, cadaver कधीच विसरत नाही.

हे सगळं लिहिण्याचं कारण काय तर…

त्या तथाकथित विनोदी कार्यक्रमातील विधानांनी वैयक्तिकरीत्या फार दुखावलं नाही. कारण सत्य काय आहे हे आम्हा डॉक्टर लोकांना माहीत आहे पण काळजी एका वेगळ्याच गोष्टीची वाटली… शरीर दानासारख्या पवित्र कार्याबद्दल समाजाच्या मनात संशय आणि नकारात्मकता निर्माण होण्याची. एखादी चांगली गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात पण एखादी चुकीची, वाईट गोष्ट दोन मिनिटाच्या व्हिडिओमुळे आजकाल सहज लोकांच्या मनात बसते.

काहीतरी मुर्ख बडबड करून प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात एका अतिशय पवित्र कार्याबद्दल नकारात्मकता निर्माण होत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. कोणत्याही डॉक्टरच्या ज्ञानामागे, कौशल्यमागे एका मौन निस्वार्थ शरीरदात्याचे… Silent Teacher चे योगदान असते.

वैद्यकीय शिक्षणासाठी स्वतःचे शरीर दान करणाऱ्या लोकांना आणि नातेवाईकांना एक डॉक्टर म्हणून माझं एक सांगणं आहे की, हे मृत्यूनंतरही मानवसेवेचे सर्वोच्च उदाहरण आहे. त्या शरीराबद्दल प्रत्येक डॉक्टर कृतज्ञ असेल, त्याचा सदैव मान ठेवला जाईल आणि त्याबद्दल संवेदनशील आणि आदर राखला जाईल!

काही शिक्षक वर्गात उभे राहून शिकवतात, काही शिक्षक पुस्तकांतून शिकवतात… तर काही शिक्षक मृत्यूनंतरही बोलतात… शांतपणे शिकवतात!

तो देह संपतो पण… आमच्या हाताच्या हालचालीत जिवंत राहतो, निदानाच्या रूपाने पुढे येतो, टाके मारताना सुईमध्ये तोच असतो, शस्त्रक्रियांमध्ये आमच्या आधी तिथे उभा राहतो… प्रत्येकवेळी ज्ञानाच्या रूपाने आम्हा सगळ्या डॉक्टरांच्या शरीरात शिक्षक म्हणून कायमचा राहतो. या शिक्षकाबद्दल नितांत आदर आणि सन्मान आहे.

लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”मनात आलं तर करून टाकावं..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मनात आलं तर करून टाकावं.. ☆ संध्या बेडेकर ☆

आमची नागपुरची ट्रीप ठरली. माझ्या दिरांकडे सोळा सोमवार चे उद्यापन चा मोठा कार्यक्रम होता. एवढ कठिण व्रत मी तर काही करू शकत नाही. कमीत कमी असा कार्यक्रम अटेंड करावा. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आपल्या जावेचे कौतुक, अभिनंदन म्हणून आम्ही जायचे ठरवल.

 खरंतर आमचे सर्व नातेवाईक या कार्यक्रमात भेटणार होतेच. तरी मनात आलं आपल्यापेक्षा जेष्ठ मंडळीला यावेळेस त्यांच्या घरी जाऊन भेटावे.. जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांचे आयुष्यातील किस्से ऐकावे. आपल्याच घराण्या बद्दल अनेक गोष्टी कळतील. मुख्य म्हणजे थोडा आनंद घ्यावा आणि द्यावाही. अनुभवाच्या शाळेत थोड शिकून याव.

आता आम्हीच senior citizen category त आलो आहोत, त्यामुळे काही बंधन वाढत्या वयामुळे तर काही सध्या च्या इकडच्या तिकडच्या बातम्या ऐकून मनात घर करून बसली आहेत. थोडी हिम्मत ही कमी झाली आहे. आणि नागपूरचे आमचे जेष्ठ तर Super Senior category तच आहेत. काही तर नव्वदी पार century च्या जवळपास.

यावेळेस भेटून याव, अस आमच बोलण झाल.

सहजच मी माझी मैत्रीण रमाला आमचा नागपुर प्रोग्राम सांगितला.

रमा म्हणाली

अरे व्वा ! छान. मनात आलंय न तर नक्की जाऊन या. अग! नंतर पश्चाताप व्हायला नको.

आज आमचे हे reservation करायच म्हणून सकाळी आठ वाजताच लॅपटाॅप घेऊन बसले. मला म्हणाले करू ना नक्की reservation ? काढू ना तिकिट

अग! नाहीतर केंसल करण्यात उगीचच पैसे वाया जातात.

सहज माझ्या मनात आल,

हा एप्रिल महिना, नागपुर ची गर्मी. आज तर गर्मीचा कहरच होता. आपण ठरवतो तर आहे, पण झेपणार आहे का आपल्याला ? तिथे जाऊन आजारी पडलो तर. तशी पुण्याची गर्मी पण काही कमी नाही पण इथे आपण घरातच असतो ना. सध्याकाळी छान थंड होत. जमेल का आपल्याला ? 

मी म्हंटल अहो ! थांबा जरा. आज राहू द्या. उद्या बघू.

यांची चिडचिड बडबड मला ऐकू येत होती. पण काय करू ? एक मन म्हणत होत हो तर लगेच दुसर मन अनेक कारण सांगून नागपूरला या सीझन मध्ये जाण कस चूक आहे, हे पटवून देत होत. दोघांच्या वादविवादात माझा गोंधळ उडाला होता.

मला निर्णय घेणे जमत नव्हत.

संध्याकाळी रमाकडे चैत्र गौरीचे हळदीकुंकू म्हणून तिच्या घरी गेले, तर तिने सहज विचारले काय ग ! झाले का reservation? 

मी म्हंटल नाही ग. अग! नागपूरची गर्मी बघून हिम्मत होत नाहिये.

हळंदी कुंकवाला आलेल्या बायकांनी तर हा विषय उचलूनच धरला. पुन्हा तसेच

 हो आणि नाही चे दोन पक्ष तयार झाले.

रमा म्हणाली,

अग! लोक राहतात ना तिथे. अग! AC taxi मिळते तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता, तिथे रात्री राहण शक्यअसल्यास रहा तिथे.

रमा आमच्याच बिल्डिंग मध्ये येवढ्यातच रहायला आलेली. Morning walk ला भेट होत गेली आणि आम्ही मैत्रीणी झालो.

रमा म्हणाली अग ! मी माझा अनुभव सांगते.

मी नागपूरला आणि माझा भाऊ वर्धा येथे. म्हणजे जवळच रहात होता.

रवी मला सारख म्हणायचा,

ताई ! ये ना. माझ नवीन घर, दवाखाना बघायला ये.

खरतर कोणत्याही शनिवार-रविवार मी सहज जाऊ शकले असते. पण या शनीवारी हे काम। तर पूढच्या रवीवारी ते काम, अस होत गेल, आणि माझ जाण झाल नाही.

अशाच एका शुक्रवारी फोन वाजला.

 रमेश म्हणाले ” आला तुझ्या भावाचा फोन. अग ! या शनिवार-रविवारी जाऊन ये. अग! काम काय होत राहतील.

आता फोनवरच तस सांग त्याला.

मी फोन घेतला आणि बोलणारच, तेवढ्यात वहीनीने रडत रडतच रवी गेल्याची बीतमी सांगितली.

म्हणाली, ताई तुमची खूप वाट बघत होते हो हे.

या वाक्याने तर मी पार कोलमडून पडले..

मला माझीच लाज वाटू लागली.

जी कारण सांगून मी एवढ्या जवळ असून गेले नाही, त्यातील एक तरी कारण वाजवी होत का ? खूप महत्वाच होत का ? ते काम नंतरही करता आल असत ना.

मी का नाही गेले? आजही राहून राहून हा विचार मला बधीर करतो.

म्हणतात ना,

Dead people receive more flowers than. Living ones, because

Regret is stronger than gratitude

आजपर्यंत मी स्वतःला माफ करू शकले नाही.

कितीही काम असू दे. अग! कितीही ऊन असू दे मी केलेली चूक कोणीच करू नये. नंतर फक्त पश्चाताप होतो.

 रमा बरोबरच बोलत होती. खूपदा वेळेवर निर्णय चूकतात आणि नंतर वाईट वाटत. गोष्ट काही खूप मोठी असते अस नाही. कधी कधी तर एखाद्या घरची आनंदाची बातमी असते तर कधी दुःखद असते. ऐकल्यानंतर मनात फोन करायचा विचार येतो. पण कधी कधी तर उगीच काहीही विशेष कारण नसताना राहून जातो. आणि मग आता तर ती गोष्ट जूनी झाली, या विचाराने राहून जातो.

याचा सरळ साधा उपाय म्हणजे 

मनात आल की लगेच करून टाकाव.

हाच आहे.

आज घरी आल्यावर विचारांची दिशाच बदलली. गर्मी असली तरी आपल्याला कशी आपली काळजी घेऊन नागपूर ट्रीप manage, , करता येईल या प्रश्नाची दहा उत्तर मिळाली.

सोचने से सूझता है, और ढुंढनेसे मिलता है। 

हेच बरोबर आहे. फक्त रमा सारखी मैत्रीण हवी जी विचारांची दिशा बदलू शकेल..

आम्ही नागपूर ट्रीप करून आलो. विशेष असा त्रास काही झाला नाही. आनंद, समाधान मात्र खूप मिळाल. आपल्याच घराण्यातल्या अनेक गोष्टी, सणवार पद्धती, पूर्वजांच्या अनेक गोष्टी कळल्या. मनापासून दिलेले भरपूर आशिर्वाद मिळाले.

लक्षात आल, अडचणी मनात असतात. अति विचार करून आपण त्यात भर घालतो.

म्हणतात ना

 Whether it”s a machine, house or relationship 

Maintenance is always easier, cheaper than repairing.

You need not have to regret later.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सचोटी आणि नि:स्पृहता म्हणजे..” – लेखक : संजीव ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सचोटी आणि नि:स्पृहता म्हणजे..” – लेखक : संजीव ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री, पुण्याचे पहिले आयुक्त सदाशिव गोविंद बर्वे उर्फ स_गो_बर्वे.

जन्म. २७ एप्रिल १९१४ सातारा जिल्ह्यातल्या तासगांव येथे.

स. गो. बर्वे यांचे वडील उपजिल्हाधिकारी आणि नंतर सांगली संस्थानाचे दिवाण होते. बर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे आणि नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते केम्ब्रिजला गेले आणि तेथून ट्रायपॉस म्हणजे बी ए, अर्थशास्त्र आणि आय. सी. एस. या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले.

१९३६ साली भारतात परत येउन अहमदाबाद इथं उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ध्वजारोहण केले. पुणे मनपा अस्तित्वात आल्यावर सुरुवातीची तीन वर्षे त्यांनी आयुक्त म्हणून काम पाहिले. आज ज्याच्याबद्दल फक्त हळहळ वाटते तो जंगली महाराज रस्ता याच काळातला! त्यांनी पुण्याभोवती रिंग रेल ची कल्पना मांडली पण राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पूर्ण झाली नाही.

पूर्ण झालेल्या योजनांमध्ये पर्वती आणि हडपसर औद्योगिक वसाहती, संभाजी, पेशवे, शाहू उद्याने, संभाजी पूल व धार्मिक स्थळे हलवून कांही रस्ते रुंद करणे इ. कामे झाली. १९५३ मध्ये पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते PWD चे सचिव झाले.

या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले. प्रशासकीय काम करत असताना राज्यसरकारच्या शासन सुधारणा समितीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी कॉंग्रेसवर सप्रमाण टीका केली. यशवंतराव चव्हाण यांनी ती टीका सकारात्मक रीतीने घेत त्यांना प्रोत्साहन दिले आणि सहकाऱ्यांना सुनावले.

बदल घडवण्यासाठी स्वतः राजकारणात जावं असं त्यांना वाटू लागलं होतं. सकारात्मक बदल घडवायचा असल्याने आणि सत्ताधारी मंडळी रोजच्या संपर्कात असल्याने त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसकडून निवडणूक लढवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिलां. पण सेवामुक्त होण्याआधीच १२ जुलैला पानशेतची दुर्दैवी घटना घडली. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मदत-पुनर्वसन कार्यासाठी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी समिती नेमली. पुराच्या दुसऱ्या दिवशीपासून अडीच महिने ते कार्यालयातच रहायला गेले, सोबत साताठ कर्मचारीही होते. पहिल्या चार दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाले. खडकवासल्याचा मुख्य स्त्रोत बंद झाला आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार हे दिसत होते. मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यात पूर्ण झाला. दोन आठवड्यात तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. १०० केंद्रात ३६, ००० नागरिकांना निवारा मिळाला. पूरस्थिती नियंत्रणात आणतानाच सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत प्रशंसनीय काम केले. त्यामुळे त्याचं हेच काम पुणेकरांच्या अधिक लक्षात राहिलं.

पुण्याच्या पुनर्वसनाची त्यांची कल्पना भव्य होती. एवीतेवी सर्व वाहून गेलंच आहे तर पुणं अधिक नियोजनबद्ध रीतीनं पुन्हा नव्यानं बनवावं असा त्यांचा आग्रह होता. दिल्ली आणि चंदीगडचे नियोजन त्यांच्यासमोर होते. सनदी अधिकारी फक्त सुचवू शकतात. शेवटी राजकारणी ठरवतील तसंच होतं. तत्कालीन परिस्थितीत लवकर होईल ते करायचं ठरलं – त्यामुळे पुणं काही फार बदललं नाही. पण जे काही थोडंफार नियोजन झालं ते लोकमान्यनगर – लाल बहादूर शास्त्री रस्ता आणि सहकारनगर इथं पुनर्वसनातून झालं.

यानंतर यशवंतरावांनी त्यांना थेट राजकारणात आणले. १९६२ च्या निवडणुकीत शिवाजीनगर – पुणे येथून ते आमदार झाले. आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुद्धा. पुढे वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हा स्तरावर MIDC स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. पुण्याजवळ १०, ००० एकर जमीन संपादन करून भोसरी MIDC सुरु झाली. त्यातून दीड लाख रोजगार तयार झाले. ठाण्याची वागळे इस्टेट आणि इतर अनेक औद्योगिक वसाहती, मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. या कामाची दखल घेत शास्त्रीजींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमले.

१९६७ मध्ये त्यांनी उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळचे विद्यमान खासदार व्ही के कृष्ण मेनन याना नाकारून कॉंग्रेसने बर्वे यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज मेनन यांनी अपक्ष लढायचे ठरवले. अपक्ष असूनही ते तुल्यबळ होते. पण अचानक शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर त्यांना पाठींबा दिला अन बर्वे खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात उद्योग खातं मिळालं असतं तर त्यांनी दूरगामी बदल घडवले असते हे निश्चित. बर्वे यांनी सहकार, भारताचे नियोजन आणि आर्थिक धोरण, आणि सुशासानावर इंग्रजीतून ग्रंथलेखन ही केले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक मनाचे, विद्वत्तेचा आदर करणारे नेता होते. बर्वे यांच्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाच वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळे त्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.

– – आत्ता दिल्लीत जे चाललंय ते पहातां पन्नास वर्षांआधी या सनदी अधिकाऱ्याने आधी सेवेत राहून आणि राजकारणात जाऊन केलेल्या कामाचं महत्व अजूनच ठळकपणे उठून दिसतं.

समाजासाठी काम करायचं तर प्रत्येकवेळी पैसाच लागतो असं नाही तर असलेले कायदे आणि तरतुदी व्यवस्थित वापरून बरीच चांगली कामं करता येऊ शकतात हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. अवघ्या ५३ वर्षांच्या आयुष्यात दूरदृष्टीने सार्वजनिक कामाचे डोंगर उभे करणारी माणसे कमीच दिसतात. कुठेही काम करताना सचोटी, निस्पृहता त्यांनी सोडली नाही. लक्ष्य गाठण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहिले. त्यामुळे अनेक उल्लेखनीय कामं उभी राहिली. स. गो. बर्वे यांचे ६ मार्च १९६७ रोजी निधन झाले.

लेखक : श्री संजीव  

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे 

मो  ९६५७७०९६४०

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोपामिन ट्रॅप (The Dopamine Trap) भाग – १ – लेखक : डॉ. एन. जी. उकडगावकर ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ डोपामिन ट्रॅप (The Dopamine Trap) भाग – १ – लेखक : डॉ. एन. जी. उकडगावकर ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

बाहेर पाऊस घराच्या काचेच्या भिंतींवर प्रचंड वेगाने आदळत होता. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर लाल अक्षरांमध्ये ठळक बातम्या झळकत होत्या:

“कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात जिल्हाधिकारी अटक. “

एका अंधुक प्रकाश असलेल्या अभ्यासिकेत, सेवानिवृत्त न्यूरोलॉजिस्ट (मेंदूविकार तज्ज्ञ) डॉ. अरविंद देशमुख यांनी शांतपणे टीव्ही बंद केला.

खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात त्यांचा नातू रोहन बसला होता, जो पत्रकारितेचा (Journalism) अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता.

“‘कॉन सेंट’ (भोंदू संत) च्या प्रकरणानंतर आता हे दुसरं, ” रोहन पुटपुटला. “आयएएस (IAS) अधिकारी, सोन्याच्या विटा, बेनामी संपत्ती, परदेशी बँक खाती. एवढी सुशिक्षित माणसं, एवढी हुशार डोकी. ही लोकं स्वतःला असं का उद्ध्वस्त करून घेतात?”

डॉ. देशमुखांनी आपले चष्मे हळूवारपणे काढले.

“कारण, ” ते शांत स्वरात म्हणाले, “पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी ही आजच्या काळातील सर्वात नवीन अंमली पदार्थ (ड्रग्स) आहेत. “

रोहन हलकासा हसला.

“ड्रग? तुमचा अर्थ लाक्षणिक अर्थाने आहे का?”

“नाही, ” डॉक्टरांनी उत्तर दिले. “जैविक दृष्ट्या (Biologically). “

वृद्ध न्यूरोलॉजिस्ट खिडकीकडे चालत गेले.

“दारू मेंदूला रासायनिकदृष्ट्या धुंद करते, पण सत्ता मेंदूला मज्जातंतूंच्या पातळीवर (Neurologically) धुंद करते. “

बाहेर विजेचा कडकडाट आणखी गडद झाला.

“बस, ” डॉक्टर म्हणाले. “मी तुला एक गोष्ट सांगतो. “

पंचवीस वर्षांपूर्वी, विक्रम पाटील नावाचा एक प्रामाणिक तरुण प्रशासकीय अधिकारी होता. तो एका गरीब शेतकरी कुटुंबातून आला होता. त्याच्या वडिलांनी त्याला शिकवण्यासाठी आपली जमीन गहाण ठेवली होती. जेव्हा त्याने नागरी सेवा (Civil Services) परीक्षा उत्तीर्ण केली, तेव्हा संपूर्ण गावाने उत्सव साजरा केला होता.

त्याच्या पहिल्या नियुक्तीदरम्यान, विक्रम अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि आदर्शवादी होता. तो लाच नाकारायचा, दुर्गम गावांचा दौरा करायचा, भ्रष्ट कंत्राटदारांना शिक्षा करायचा आणि सामान्य लोकांचा आदर मिळवायचा. एक संध्याकाळी त्याची पत्नी मीराने त्याला हळूवारपणे विचारले, “तुम्ही एवढं काम का करता?”

विक्रमने हसून उत्तर दिले, “मला ही व्यवस्था बदलायची आहे. “

त्या टप्प्यावर, त्याची महत्त्वाकांक्षा शुद्ध, निरोगी आणि आवश्यक होती.

एका राजकीय कार्यक्रमादरम्यान विक्रमची भेट मंत्री सूर्यकांत राव यांच्याशी झाली. मंत्र्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, “तू हुशार आहेस, पण या देशात फक्त हुशारीच्या जोरावर जगता येत नाही. “

त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या आलिशान गाड्यांकडे बोट दाखवले आणि विचारले, “तुला माहीत आहे का या गाड्या कशा आल्या?”

विक्रम गप्प राहिला.

मंत्री मिश्कीलपणे हसले आणि त्यांनी एकच शब्द उच्चारला.

“सत्ता. “

त्या रात्री विक्रमच्या मेंदूत काहीतरी बदलले; त्याची नैतिकता नाही, तर त्याची उत्सुकता जागृत झाली.

एका महिन्यानंतर एक बिल्डर गुपचूप विक्रमच्या कार्यालयात आला.

“सर, फक्त एक लहानसं काम आहे, फाईल क्लिअरन्स. “

विक्रमला राग आला.

बिल्डरने शांतपणे टेबलजवळ एक सूटकेस ठेवली.

त्या सूटकेसमध्ये पन्नास लाख रुपये होते.

विक्रमच्या हृदयाचे ठोके वाढले, त्याचे हात थंड पडले आणि काही क्षणांसाठी त्याचा मेंदू सुन्न झाला. त्याच्या मेंदूला नुकताच त्याचा पहिला प्रचंड ‘डोपामिन शॉक’ मिळाला होता. हा शॉक केवळ पैशांमुळे नव्हता, तर निषिद्ध बक्षीस, जोखीम, सत्ता आणि नियंत्रणाच्या भावनेमुळे होता.

जुगार, ड्रग्ज आणि थरार शोधताना जी आदिम चेतासंस्था (Primitive Neural Circuitry) सक्रिय होते, तीच यंत्रणा अचानक त्याच्यात उद्दीपित झाली.

सुरुवातीला त्याने ती सूटकेस दूर लोटली, पण त्या रात्री त्याला झोप आली नाही. त्याचा मेंदू वारंवार त्या सूटकेसचे चित्र डोळ्यांसमोर आणत होता. मेंदूला आधीच त्या आनंदाची पुनरावृत्ती हवी होती.

तीन महिन्यांनंतर त्याने पहिली लाच स्वीकारली.

त्याने स्वतःची लगेच अशी समजूत काढली की, सगळेच तर हे करतात; एवढ्या वर्षांच्या त्यागानंतर त्यालाही सुखाचा अधिकार आहे आणि हे फक्त तात्पुरते आहे.

मानवी मेंदूत एक अद्भुत संरक्षण यंत्रणा असते—ती नैतिक सबबी निर्माण करून स्वतःची प्रतिमा सुरक्षित ठेवते.

निर्णय आणि संयम नियंत्रित करणारा ‘प्रिफ्रंटल कॉर्टेक्स’ (Prefrontal Cortex) आता इच्छेसोबत तडजोड करू लागला होता.

लवकरच एका मेहरबानीचे रूपांतर अनेक मेहरबांन्यांमध्ये झाले, एक तडजोड रोजची सवय बनली आणि एक बेकायदेशीर व्यवहार नेहमीचा नियम बनला.

पैसा वाहू लागला. त्यानंतर राजकीय प्रभाव आला आणि पाठोपाठ प्रसारमाध्यमांचे (Media) लक्ष वेधले गेले.

न्यूज चॅनेल्स त्याला “डायनॅमिक कलेक्टर”, “जिल्ह्याचा सिंह” आणि “जनतेचा नायक” म्हणून संबोधू लागले.

वृत्तपत्रांमध्ये रोज त्याचे फोटो छापून येत होते, सोशल मीडियावर त्याचे गौरव केले जात होते आणि टेलिव्हिजन मुलाखतींमुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. जनतेच्या टाळ्या आणि व्हीआयपी (VIP) वागणूक एखाद्या वारंवार मिळणाऱ्या डोपामिनच्या इंजेक्शनसारखी काम करत होती.

हळूहळू त्याच्या मेंदूने सेवेसाठी काम करणे थांबवले आणि तो केवळ उद्दीपनासाठी (Stimulation) काम करू लागला. एखाद्या व्यसनाला जसा उच्च डोस लागतो, तशीच आता त्याला अधिक प्रसिद्धी, मोठा प्रभाव, जास्त मीडिया कव्हरेज, मंत्र्यांची जवळीक आणि उद्योगपतींवर नियंत्रण हवे होते.

घरी मीराला हा बदल जाणवला.

“तुम्ही बदलला आहात, ” ती एका रात्री हळूच म्हणाली.

“नाही, ” विक्रम चिडून म्हणाला. “माझा विकास झाला आहे (I’ve evolved). “

तो सर्वात धोकादायक टप्पा होता, कारण व्यसनी व्यक्ती कधीच आपले व्यसन मान्य करत नाही.

डॉ. देशमुखांनी काही वेळ थांबून रोहनकडे पाहिले.

“तुला माहीत आहे का मज्जासंस्थेच्या पातळीवर (Neurologically) काय घडतं?”

रोहन शांतपणे पुढे झुकला.

“बक्षीस देणारी यंत्रणा (Reward Circuit) मजबूत होते, तर नैतिक यंत्रणा (Moral Circuit) कमकुवत होते, ” डॉक्टर म्हणाले.

“जेव्हा अनैतिक मार्गांनी वारंवार बक्षिसे मिळतात, तेव्हा मेंदू स्वतःची पुनर्रचना (Rewire) करतो. डोपामिन प्रणाली मेंदूला तेच वर्तन चालू ठेवण्यास सांगत राहते. ‘अमिगडाला’ (Amygdala) भीती कमी करतो, प्रिफ्रंटल कॉर्टेक्स हळूहळू आपला संयम गमावतो आणि शेवटी सर्वात धोकादायक नशा तयार होते—अजेयतेची नशा (Intoxication of Invincibility). “

रोहनने हळूच व्यत्यय आणला.

“तुम्ही कोचिंग क्लासच्या संचालकांचाही उल्लेख केला होता ना?”

डॉ. देशमुखांनी होकारार्थी मान डोलवली.

“आणखी एक माणूस होता, समीर खन्ना. “

समीरची सुरुवात एक हुशार गणित शिक्षक म्हणून झाली होती, ज्याला गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याची मनापासून आवड होती. त्याच्या पहिल्या कोचिंग क्लासमध्ये तुटलेली बाके, गळके छप्पर आणि हाताने लिहिलेल्या नोट्स होत्या, तरीही विद्यार्थी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे.

त्यानंतर त्याचा एक विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षेत पहिला आला.

प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली, पालकांनी त्याच्या इन्स्टिट्यूटबाहेर रांगा लावल्या आणि पैशांचा पाऊस पडू लागला.

लवकरच शिक्षणाचा उद्योग झाला आणि उद्योगाचे रूपांतर एका ध्यासात (Obsession) झाले.

समीरने आलिशान गाड्या, खाजगी जेट विमाने खरेदी करण्यास सुरुवात केली आणि टीव्हीवर मोठ्या जाहिराती दिल्या. विकत घेतलेले रँकिंग आणि खोट्या यशाची आकडेवारी ही रोजची गोष्ट बनली.

विद्यार्थी आता मुले राहिली नव्हती, ती फक्त “रिझल्ट्स” (निकाल) बनली होती.

अपयशी ठरलेल्यांना लपवले जायचे, तर पहिल्या आलेल्यांची बाजारात उत्पादनांसारखी विक्री केली जायची.

ज्या मेंदूला एकेकाळी शिकवायला आवडायचे, त्याला आता टाळ्यांचे व्यसन लागले होते.

श्रीमंत उद्योगपती त्याला निधी पुरवत होते, राजकारणी त्याचा प्रभाव शोधत होते आणि मीडिया त्याची पूजा करत होता.

– क्रमशः भाग पहिला

***

लेखक : डॉ. एन जी उकडगावकर, न्यूरोलॉजिस्ट 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वेशीपर्यंत आलायस” – कवी – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “वेशीपर्यंत आलायस” – कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

वेशीपर्यंत आलायस…

आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस…

पटकन माप ओलांड आणि आत ये…

 कंजूसपणा करू नको….

दिल खोलके बरस…

येताना चोर पावलांनी नको,

 राजासारखा सनई चौघडे वाजवत ये…

 येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव…

तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल…

एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील…

ती तुला मनातल्या मनात एखादी कचकचीत शिवीही देईल,

 तरी पण तिथे थांब…

तिच्या शेतात सगळ्यात आधी जा…

आणि तिथल्या मातीत रुजून राहा…

 मग रानावनांत पड, रस्त्यारस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्या होऊन लगड…

नद्या भर, विहीरी भर, धरणाचे दरवाजे उघड…

 हंड्या घागरींतून बरस, गच्चीतल्या टाकीवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळांतूनही बरस…

धन-धान्यासाठी ये,

छत्र्या, रेनकोटच्या बिझनेससाठी ये, सगळी अर्थव्यवस्था बळकट करायला ये…

 

 पानाफुलांना सजव, गाईगुरांना भिजव, पक्षी-पाखरांना नाचव…

 आसुसलेल्या मनांना रिझव, सुकलेल्या ओठांनाही भिजव…

 सगळ्यांना पाणी दे,

प्रेमात पडलेल्यांना गाणी दे,

फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी दे…

 वाफाळलेल्या चहासाठी ये,

 गरमा-गरम भज्यांसाठी ये,

शेगडीवरच्या कणसासाठी ये…

तर्राट होऊन ये….

सैराट होऊन ये…

आणि सगऴीकडे झिंग झिगं झिंगाट करुन टाक………

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आणखी अंत नको रे पाहूस ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आणखी अंत नको रे पाहूस ? श्री आशिष  बिवलकर ☆

कोरडाठाक चाललास मृगा,

कुठं विसरलास रे पाऊस?

ओढ दिली आहे सरिंनी,

अंत नको रे बाबा पाहूस |

*

काळे काळे ढग दिसेना,

ना चातक देई ती वर्दी |

गंध सुटेना मातीला अजून,

आभाळात ढग करेना गर्दी |

*

सुकलेत नदी नाले पाणवठे,

ओलावते फक्त डोळ्यांची कडा |

दहा दिशा पाण्यासाठी वणवण,

रिताच राहिला कमरेवरचा घडा |

*

गुर ढोरं झालीत व्याकुळ,

कोरडा पडला धेनूचा पान्हा |

मागल्या वर्षी आलास लवकर,

यंदा काय झाला आमचा गुन्हा |

*

तहानलेली आहे काळी आई,

ठिपूस ना उरला तिच्या उदरात |

मनसोक्त बरस ना रे पावसा,

दान टाक वरुण देवा पदरात |

*

धोंडी धोंडी पाणी दे,

बेडका लगीन थाटात लावतो |

श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा,

देवा मागणं पावसाच रे मागतो |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # २८९ – सूरज नहीं दिया…१ ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – सूरज नहीं दिया…१ ।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २८८ ☆

☆ – सूरज नहीं दिया ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ✍

 गुड़ियों से खेल रही है

भावना‘,

मिट्टी खा रही है

कामना

और

धनुष साध रहा है हर्ष’–

इन्हें क्या मालूम

कि आज

कम हो गये हैं

मेरे जीवन के कितने वर्ष।

हाय! जिन्दगी कट रही है

किराये की छत में,

क्या दे पाऊँगा विरासत में?

अखबारों की कतरनें

बासी चिट्ठियाँ

और लाटरी की निर्जीव टिकिटें

भला 

किस काम आयेंगीं?

संभावना की फसलकी

पुरानी प्रतियाँ

इन्हें क्या दे पायेंगी?

सच तो ये है-

दुहरी जिन्दगी जीने वाले

मास्टर का

जीना मरना बराबर है,

ये मँहगाई

जीवित शव पर लगा हुआ करहै।

 क्रमशः अगले अंक में

स्व डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares