(लेखन-प्रकाशन – गत 2022 से छंद लेखन, एकल प्रकाशन– कलम के नवांकुर, अनुग्रह नवप्रस्तारित छंद पर लेखन (मैजिक बुक ऑफ रिकॉर्ड), साझा संकलन – तकरीबन 10, द्वादश ज्योतिर्लिंग (लंदन बुक आफ रिकार्ड), अनेकता में एकता (एशिया बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड), छंदावली – (मैजिक बुक ऑफ रिकॉर्ड), महाकाल साहित्य सम्मान से सम्मानित। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता !! नटखट कान्हा !!)
उंबरठा… सीमारेषेसारखी एक स्पष्ट आणि तरीही ओढाळ रेष.. ही रेष ओलांडून बाहेर जातांनाही मनाला एक नि:शब्द ओढ लावते आणि ओलांडून आत येतांनाही ओढच लावते.. म्हणून ती ‘ओढाळ’… दोन्ही वेळा अशी ओढ लावणाऱ्या मनातल्या भावना जरी वेगळ्या असल्या तरी ओढ तीच असते.. म्हणूनच उंबरठा ही खरोखरच एक ओढाळ रेष…
आणि ही उंबरठ्याची ओढ फक्त माणसालाच असते असं नाही.. तर निसर्गालाही असतेच असते.. आणि ती माणसाने आदर्श घ्यावा अशीच असते..
आता सूर्याचंच उदाहरण घ्या ना! ‘ कधी एकदा रात्र संपते आणि मी तिच्या घराचा उंबरठा ओलांडतो याचीच फार घाई असते त्याला.. आणि मग ऊर्जेची उधळण करणारा सूर्य एकदाचा आकाशात आगमन करतो.. दिवसभर चालत रहातो. त्याच्याही वाटेत अडथळे असतातच की – – कधी राक्षसासारख्या काळ्याभोर ढगांचे.. कधी जणू त्याला चक्क अडवून धोधो कोसळणाऱ्या पावसाचे.. पण म्हणून तो वैतागत नाही.. थांबत नाही.. आणि चालत राहतो पुन्हा रात्रीच्याच उंबरठ्याच्या दिशेने.. पण असं परतत असतांना त्याला ना दु:ख असतं ना खंत, कारण असं परतणंही त्याने मनापासून स्वीकारलेलं असतं.. म्हणूनच तर भा. रा. तांब्यांसारखे संवेदनशील कवी त्या मावळत्या सूर्याला बघून म्हणतात.. ”अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा. ”. परततांनाही तितक्याच शांतपणे.. निर्लेपपणे तो जातो म्हणून त्याला ‘ समदर्शी ‘ अशी उपमा देतात… आणि म्हणूनच रात्रीचा.. पहाटेचा.. सकाळचा.. दुपारचा.. संध्याकाळचा असे सगळे उंबरठे तो रोज तितक्याच उत्साहाने आणि मनापासून पार करतो.
– – प्रत्येक माणूसही त्या सूर्यासारखाच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असे उंबरठे ओलांडत असतो. आपले काम संपल्यावर अगदी अलिप्तपणाने सहज मावळतीला जाणाऱ्या त्या सूर्याकडून माणसाने हा अलिप्तपणा शिकण्यासारखा. आपल्यालाही संध्यासमयी परतायचंच आहे याचं भान आपल्या कर्तृत्वाच्या धुंदीत रमताना ठेवायलाच हवं.
माणसाच्या आयुष्यात त्याला खुणावत असणाऱ्या उंबरठ्यांबद्दल बोलायचं तर – – –
पहिले बरेच उंबरे कुतुहलाने.. उत्सुकतेने.. उत्साहाने ओलांडण्याची जणू घाईच झालेली असते… आणि तो ओलांडून बाहेर गेल्यावर परत तोच उंबरठा ओलांडून आत येण्याचीही घाईच… पण हे सगळे उंबरठे असा परतून येण्याचा आनंद देतात तो शिशु अवस्थेत.. बाल्यावस्थेत.. कुमारवयात…आणि ‘ विद्यार्थी ‘ या भूमिकेत असेपर्यंत… स्वतःच स्वतःच्या सर्वांगीण क्षमतेची ओळख करून घेईपर्यंत…
… मग एकदा का हा तरुणपणाचा उंबरठा ओलांडत बाहेरच्या जगात पाऊल टाकलं की ती रम्य सुखद सकाळ त्या उंबरठ्याच्या आत सुखरूप.. आणि माणूस बाहेरच्या तापलेल्या आणि बहुशः रखरखीत अशा दुपारसारख्या व्यवहारी.. हिशोबी जगात पाऊल टाकतो. सुरुवातीला सगळं काही नवीन असल्याने उत्साह.. उमेद.. कुतूहल.. आणि स्वतः कमावत असल्याचा.. ‘ आता मी कुणावरही अवलंबून नाही ‘ याचा अभिमानमिश्रित आनंद असतो. मग हळूहळू चटके जाणवायला लागतात.. पण म्हणून आता लगेच परत फिरून येणं शक्य नसतं. ही आयुष्याची दुपार.. मग ज्या वाटेने चालायचं आहे ती वाट स्वतःला आवडणारी असो वा दुसरी वाट दिसत नाही म्हणून स्वीकारलेली असो… अटळ म्हणावी अशी … ही वाट म्हणजे शरीरावरचा आणि त्याहीपेक्षा मनावरचा ताण वाढवणारी.. बरेचदा दुसरा पर्याय नाही म्हणून आणि बरेचदा अहंकाराच्या पोटी … किंवा स्पर्धा जिंकण्याच्या इर्षेपोटी मग स्वतःच स्वतःच्या डोक्यावर घेतलेली ओझी पेलत नसतांनाही पाय ओढत चालायला भाग पाडणारी…
… पण उमेदीचं एकेक वर्ष संपत जातं आणि हळूहळू नकळत ही दुपार कलंडायला लागते.. पाय थकल्याची जाणीव व्हायला लागते.. शरीरावर त्याच्या खुणा दिसायला लागतात. आणि आता हे धावणं पुरे असं मनापासून वाटायला लागतं….
… आणि खुणावायला लागतो तो संध्याकाळचा उंबरठा. नकळत त्याची ओढ वाटायला लागते … आणि माणूस इतक्या वर्षांच्या कामाच्या रहाटगाडग्यातून एकदाचा बाहेर पडतो.. निवृत्त होतो.
… हा उंबरठा मात्र कितीही ओढ लावत असला.. आकर्षक वाटत असला.. तरी मनाला बुचकळ्यात टाकणारा. रोजची उरस्फोड आता संपणार हे माहित असूनही एकीकडे याचा आनंद आणि एकीकडे एक अनामिक हुरहूर अशी मनाची द्विधावस्था करणारा आणि अशावेळी माणसाची मजा बघायला जणू उत्सुक असणारा हा उंबरठा…
या उंबरठ्याशी पोहोचणं.. तो ओलांडणं.. ही गोष्ट आनंद आणि समाधान देणारी असते, की विनाकारण अस्वस्थ चिडचिड करायला लावणारी असते हे मात्र माणसागणिक बदलणारं गणित – – हे गणित काहीजण सहजपणाने सोडवून टाकतात.. आणि काहीजण मात्र स्वतःच ते इतकं किचकट करून टाकतात की आयुष्यच ओलांडून जायची वेळ आली तरी त्यांना हे गणित सोडवता येत नाही.
– – हा उंबरा ओलांडतांना आयुष्याचा रंगमंच फिरता आहे हे प्रकर्षाने जाणवतं… मंचही बदललेला आणि रंगही हळूहळू पण नक्कीच बदलायला लागलेले.. प्रत्येकाची भूमिकाही about turn केल्यासारखी बदललेली… म्हणजे माणसाची घरातली आधीची भूमिका बरीच वेगळी आणि ठळक होते.. आधीचा रंगमंच दृष्टीआड झालेला असतो… घरातले सदस्य त्यांच्याही नकळत त्याच माणसाला आता वेगळ्या भूमिकेसाठी गृहीत धरायला लागतात.. आणि इथेच आयुष्याची संध्याकाळ जराशी गडद होऊन स्पष्टपणे खुणावायला लागते.
– – अनेक महत्वाच्या गोष्टी मनाला समजावण्याची ही वेळ. कालपर्यंत मिळत असलेला मान.. आदर खुर्चीमुळे मिळालेला होता हे कटू सत्य पचवणं तसं जडच जात असतं. तारेवरची कसरत करण्याची सवय असलेले पाय आता ती कसरत संपल्यावर कुठे वळवावेत हा संभ्रम पडलेला असतो. घड्याळाची बांधिलकी संपल्याने बरं तर वाटत असतं.. पण आता इतका रिकामा वेळ हातात आहे त्याचं काय करायचं हे नेमकं ठरवणं सतत बुचकळ्यात टाकत असतं… सारंच कसं निवांत.. बऱ्याचदा हा ध्येय नसणारा निवांतपणा.. किंवा हे रिकामपण अस्वस्थता.. चिडचिड आणणारं असतं..
पण अशावेळी सगळ्या सृष्टीलाच खुणावणारे संध्येचे प्रसन्न शांत रंग आवर्जून बघायला हवेत.. समजून घ्यायला हवेत. या रंगांमध्ये कुठलीच दाहक छटा नसते हे एकदा लक्षात घेतले की अस्वस्थ मनही शांत व्हायला हवे.. अगदी प्रयत्नपूर्वक ते शांत ठेवणे जमायला हवे……
“श्यामरंगी रंगे जशी ही सृष्टी आतुरतेने..
तन मन मम जणू तीच आर्तता.. बहर तू होऊन ये … “
… असं जर आयुष्याच्या संध्येला विनवता आलं तर ही संध्याकाळही वेगळ्या आणि सौम्य असूनही फार सुखद अशा रंगांमध्ये नक्कीच आनंदी आणि बहारदार होऊ शकते यात शंकाच नाही … आणि अशावेळी मदतीला येतात ते … अनेक वर्षं मनात नाईलाजाने दडपून ठेवावे लागलेले आपले छंद.. नंतर बघू म्हणून मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेल्या कितीतरी आवडीनिवडी.. आयुष्यभर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला साथ देत आलेल्या आपल्या जोडीदाराची आणि आपणही नाईलाजाने नजरेआड केलेली कितीतरी स्वप्ने पूर्ण करण्याची मनात जपलेली आस – – – आयुष्याची संध्याकाळ मजेत आणि मनाजोगती साजरी करण्यासाठी अनेक वर्षं जतन करून ठेवलेले हे खजिने उघडले की दुपारी अभावितपणे अनुभवलेला आयुष्यातला व्यावहारिक कोरडेपणा.. रखरखीतपणा.. नकळत विस्मरणात जायला लागतो. आत्तापर्यंत इतरांबद्दल मनात सांभाळून ठेवलेली कटुता.. तेढ.. द्वेष.. वैर.. अशी मनात साठवलेली अडगळ अजिबातच गरजेची नाही हे मनापासून जाणवलं तर मग अशी अडगळ नकळत मनातून बाहेर टाकली जाते आणि मन लहान मुलांसारखं स्वच्छ आणि हलकं व्हायला लागतं. मित्रांबरोबर कट्ट्यावर मारल्या जाणाऱ्या एरवी फुटकळ वाटणाऱ्या गप्पाही मन ताजंतवानं ठेवायला पुरतात…एखादी लहानशी ट्रीपही मन टवटवीत करून टाकते. स्वतःचं आवडतं गाणं बेसूर म्हणतांनाही मनाला स्वच्छंदपणाचा आगळा आनंद देऊन जातं.. कारण आता फक्त स्वतःसाठी जगायचं आहे ही भावना मनात ठसवता येणं जमवता येतं.. आणि ही संधी आयुष्याच्या संध्येच्या उंबरठ्यावर मनापासून उभं राहिलं तरच मिळते … अनेक वर्षं कळतनकळत किंवा जाणीवपूर्वकही जपलेली ताठर मानसिकता बदलण्याची ही सुवर्णसंधी या उंबरठ्यावर पोहोचल्यावरच मिळते…हो.. पण कुणी सल्ले मागितले तरच द्यावेत ही शहाणी समज मात्र इथे यायला हवी. महत्वाचं म्हणजे कुटुंबासोबत रहातांना आवश्यक ती उदासीनता किंवा अलिप्तता अंगी बाळगता यायलाच हवी.
– – या संदर्भात माऊलींनी भावार्थ दीपिकेत ज्ञानी माणसाचे सुंदर समर्पक वर्णन केले आहे की –
असा माणूस “ गोरुवें बैसली । रुखातळीं । “ असं समजून वागतो.. याचा एक अर्थ असा की संसार हा झाडाखाली बसलेल्या गुरांप्रमाणे क्षणिक वाटसरूसारखा असतो.. झाड त्यांना सावली देते.. खाद्य देते.. पण स्वतः मात्र निरपेक्षपणाने अलिप्त रहाते.. सूज्ञ माणसाने हेच लक्षात घ्यावे आणि संसाराबद्दल.. विशेषतः आपल्या मुलाबाळांबद्दल त्या झाडासारखे अलिप्त रहाण्यास शिकावे.
– – या उंबऱ्याआडून डोकावणाऱ्या आणि चिंतेत पाडणाऱ्याही काही गोष्टी नक्कीच असतात.. जसे की नियमित उत्पन्न बंद होणे किंवा बरेच कमी होणे … इतकी वर्षं शांतपणे सहकार्य करणारे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कुरकुर करायला लागणे इ… पण या गोष्टी आधीपासून गृहीत धरून, त्यासाठी विचारपूर्वक आणि डोळसपणे योग्य ती तजवीज करण्याचा धोरणीपणा आधीच्या उंबरठ्यापासूनच दाखवण्याची दूरदृष्टी असणाऱ्यांना हे त्रास खूपच सुसह्य करणे अशक्य अजिबात नाही.
… या टप्प्यावर आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे स्वतःची वृत्ती आणि विचार जाणीवपूर्वक सकारात्मक ठेवणे.. सकारात्मकता हे फक्त आजारांवरचेच नाही तर इतर अनेक समस्यांवरचे एक अतिशय प्रभावी औषध आहे, ज्यामुळे भरकटणारे दु:खद आणि त्रासदायक विचार मनात टिकूच शकत नाहीत … आणि मग संध्याकाळचे जरा फिकुटलेले पण शांत.. सौम्य रंग मनापासून आवडायला लागतात.
– मग हे सगळे सखेसोबती आपणहून सोबत घेऊन संध्येच्या उंबरठ्यावर उभं असतांना समोर दिसेल तो फक्त एक आगळा ताजा आनंद.. अंतर्बाह्य शांतता … आणि आयुष्य सार्थकी लागल्याचे अनमोल समाधान…
☆ अनुभव… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
त्या पावसाळी रात्री कोट्याधीश उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ऑपरेशन थिएटरमध्ये जीवन-मरणाच्या सीमारेषेवर झुंज देत होती. बाहेर प्रसार माध्यमांच्या गाड्यांची रांग लागली होती, पण आत एका वृद्ध सुरक्षा रक्षकाचे शब्द ऐकायला कुणाकडे वेळ नव्हता…
पुण्यातील नामांकित “आरोग्यम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल”च्या सातव्या मजल्यावर एकच गोंधळ उडाला होता. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होते देशातील प्रसिद्ध उद्योगपती राघव देशमुख. कोट्यावधींचे साम्राज्य उभे करणारा तो माणूस त्या रात्री पूर्णपणे हतबल दिसत होता. आत त्याची २८ वर्षांची मुलगी अन्विता आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत होती.
अन्विता आठ महिन्यांची गर्भवती होती. अचानक तिला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले – “बाळाची नाळ गळ्याभोवती अडकली आहे. आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे. “
देशातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आले. एक नाही… दोन नाही… पूर्ण नऊ तज्ज्ञ डॉक्टर! पण प्रत्येक नवीन रिपोर्ट आधीपेक्षा अधिक चिंताजनक होता.
“ब्लड प्रेशर कमी होत आहे. “
“बाळाला ऑक्सिजन कमी मिळतोय. “
“आता जास्त वेळ थांबता येणार नाही. “
संपूर्ण टीम तणावाखाली होती. त्याच वेळी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ६८ वर्षांचे सुरक्षा रक्षक गणपत काका बसले होते.
पांढरी दाढी, वाकलेली पाठ आणि जुना चष्मा… गेली १५ वर्षे ते रात्रीची ड्युटी करत होते. सगळे त्यांना प्रेमाने “गणपत काका” म्हणत.
पण फार थोड्या लोकांना माहिती होतं की सुरक्षा रक्षक होण्यापूर्वी ते कोकणातील एका गावात प्रसिद्ध वैद्य होते. शरीरातील नसांचे ज्ञान, दाबबिंदू आणि पारंपरिक उपचारांची विद्या त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकली होती. पण आधुनिक जगात त्यांच्याकडे ना पदवी होती, ना प्रमाणपत्र… म्हणून लोक त्यांना फक्त एक साधा सुरक्षा रक्षक समजत होते.
अचानक एका नर्सचे शब्द त्यांच्या कानावर पडले- “बाळाची हृदयाची गती सतत कमी होत आहे! “
गणपत काका सावध झाले.
काही वेळाने दुसरी नर्स म्हणाली- “नाळ इतकी घट्ट अडकली आहे की बाळ खाली सरकत नाही. “
गणपत काकांच्या डोळ्यांसमोर ३५ वर्षांपूर्वीची एक घटना चमकून गेली. ते हळूहळू ऑपरेशन थिएटरकडे गेले. दाराजवळ उभ्या असलेल्या डॉक्टरांना त्यांनी नम्रपणे सांगितले – “मुलीला डाव्या कुशीवर ठेवू नका. “
डॉक्टर चकित झाले. “काय म्हणताय तुम्ही? “
गणपत काका शांतपणे म्हणाले – “ज्या बाजूने नाळ दाबली जातेय, त्या बाजूचा भार वाढतोय. तिला दुसऱ्या बाजूला वळवा. “
डॉक्टरांचा चेहरा लाल झाला. “तुम्ही सुरक्षा रक्षक आहात की सर्जन? “
आजूबाजूचे काही लोक हसू लागले. गणपत काका काहीच बोलले नाहीत. ते शांतपणे मागे फिरले. पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.
तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचे दार उघडले. एक डॉक्टर धावत बाहेर आला. “आता तातडीने निर्णय घ्यावा लागेल. आई किंवा बाळ… दोघांपैकी एकालाच वाचवता येईल. “
हे ऐकताच राघव देशमुख यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांची पत्नी सुमन रडू लागली. पहिल्यांदाच त्या श्रीमंत कुटुंबाला जाणवलं की काही लढाया पैशाने जिंकता येत नाहीत.
तेवढ्यात मागून एक शांत आवाज आला- “दोघांनाही वाचवता येईल. “
सगळ्यांनी मागे वळून पाहिले. ते गणपत काका होते.
राघव चिडून म्हणाले, “तुम्ही इथे काय करताय? “
गणपत काका शांतपणे म्हणाले, “बाळाला रस्ता नको आहे साहेब… त्याला श्वास हवा आहे. “
संपूर्ण कॉरिडॉर शांत झाला.
गणपत काका पुढे म्हणाले, “माझं चुकलं तर मला लगेच बाहेर काढा. पण एकदा माझं ऐका. “
डॉक्टरांनी अनिच्छेने त्यांचा सल्ला मान्य केला. अन्विताची स्थिती बदलण्यात आली. सगळ्यांचे डोळे मॉनिटरवर खिळले होते.
एक सेकंद…
दोन सेकंद…
पाच सेकंद…
आणि अचानक बाळाची हृदयगती स्थिर होऊ लागली! एक नर्स आनंदाने ओरडली – “सर! हार्ट रेट वाढतोय! “
डॉक्टर अवाक् झाले. तासन्तास न समजलेली गोष्ट एका वृद्ध सुरक्षा रक्षकाने ओळखली होती. त्यानंतर ऑपरेशन सुरू झाले. दीड तासाच्या तणावानंतर ऑपरेशन थिएटरचे दार उघडले.
नर्सच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
“अभिनंदन! आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. “
राघव देशमुख यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही वेळानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला – “गणपत काका कुठे आहेत? “
पण गणपत काका शांतपणे आपल्या जागेवर परत गेले होते. जणू काही घडलंच नव्हतं.
दुसऱ्या दिवशी अन्विताला सर्व घटना सांगण्यात आली. तिने ताबडतोब म्हटले, “मला त्यांना भेटायचं आहे. “
गणपत काकांना बोलावण्यात आले. ते आत येताच अन्विताने आपल्या नवजात बाळाला त्यांच्या हातात दिले. गणपत काकांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी थरथरत्या हाताने बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला.
अन्विता म्हणाली, “आज माझं बाळ श्वास घेतंय, ते तुमच्यामुळे. “
गणपत काका हसले. “नाही ग बाळा, देवाने वाचवलं. मी तर फक्त निमित्त ठरलो. “
तेवढ्यात राघव देशमुख आत आले. काही क्षण ते गणपत काकांकडे पाहत राहिले. आणि अचानक… देशातील त्या मोठ्या उद्योगपतीने सर्वांसमोर वाकून गणपत काकांचे पाय स्पर्श केले.
संपूर्ण खोली स्तब्ध झाली. “मला माफ करा काका. काल मी तुम्हाला फक्त सुरक्षा रक्षक समजलो. “
गणपत काकांनी त्यांना उठवत म्हटलं, “बाळा, माणसाचं काम लहान-मोठं असू शकतं… पण त्याचा अनुभव कधीच लहान नसतो. “
हे शब्द प्रत्येकाच्या मनात घर करून गेले.
काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मोठा समारंभ आयोजित करण्यात आला. राघव देशमुख यांनी घोषणा केली की ग्रामीण वैद्यकीय ज्ञान आणि पारंपरिक अनुभवांवर संशोधन करणारे नवीन केंद्र सुरू करण्यात येईल.
त्या केंद्राला नाव देण्यात आले- “गणपत प्रसाद मानव सेवा केंद्र” टाळ्यांच्या कडकडाटात गणपत काकांना मंचावर बोलावण्यात आले.
त्यांनी माईक हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाले—
“आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. पदवी ज्ञानाचा पुरावा असू शकते, पण अनुभव हे ज्ञानाचं मूळ असतं. ज्या दिवशी आपण गरीब, वृद्ध किंवा साध्या दिसणाऱ्या माणसाला कमी लेखणं सोडू, त्या दिवशी समाज खऱ्या अर्थाने मोठा होईल. “
संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं. समोर बसलेलं ते छोटंसं बाळ हसत होतं. त्याला माहीत नव्हतं की त्याच्या जन्माने फक्त एका कुटुंबाचं नव्हे, तर अनेकांच्या विचारांचाही पुनर्जन्म घडवला होता…
संदेश : कधीही एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यांवर, पदावर किंवा पैशांवरून ठरवू नका. अनेकदा सर्वात मोठं ज्ञान आणि अनुभव हे सर्वात साध्या दिसणाऱ्या माणसांकडे असतात.
– समाप्त –
लेखक : अनामिक
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पालक मित्रांनो, नमनाला पळीभरसुद्धा तेल न घालता थेट मुद्द्याचं बोलूया..
आपली मुलं कॉलेजमध्ये, कोचिंग क्लासेस मध्ये नेमकी कुणाच्या सहवासात असतात याची व्यवस्थित आणि खरी माहिती दोन्ही पालकांना (आई आणि वडील दोघांनाही) असणं नितांत आवश्यक आहे. दोघांपैकी एकाच कुणालातरी माहिती असणं पुरेसं नाही. दोन्ही पालकांची आपल्या मुलांविषयीची मतं, दृष्टिकोन वेगवेगळी असतात, त्यामुळं अर्थातच मुलांच्या कोणत्या वागण्यात कुणाला गैर वाटेल आणि कुणाला गैर वाटणार नाही याची काय खात्री?
आपली मुलं शिक्षण किंवा नोकरी निमित्तानं परगावी राहत असतील तर, ती नेमकी कुठं राहतात, कुणासोबत राहतात, त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, त्यांची नावे काय आहेत, हे मित्र मैत्रिणी काय काय करतात, त्यांचे पालक कुठे राहतात याची खरीखुरी माहिती पालकांना असायलाच हवी.
आपला मुलगा किंवा मुलगी फावल्या वेळात नेमकं काय करतात, सोशल मीडिया वर नेमकं काय करतात, कशी व्यक्त होतात, कुणाला फॉलो करतात, त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मते काय आहेत, स्वतःचे मत असण्याएवढी आणि ते चारचौघात किंवा सोशल मीडियावर व्यक्त करण्याएवढी परिपक्वता त्यांच्यात आली आहे का, याची खरी आणि पूर्ण माहिती दोन्ही पालकांना असायलाच हवी.
आपल्या मुलामुलींवर नेमका कुणाचा प्रभाव आहे? हा प्रभाव अचानक निर्माण झाला आहे का? अचानकच आपल्या मुलाचे किंवा मुलीचे विचार बदलले आहेत का? आपल्या मुलांची भाषा अचानकच विखारी झाली आहे का? आपली मुलं अचानकच जास्तीत जास्त वेळ नव्याने झालेल्या मित्र मैत्रिणींसोबत घालवायला लागली आहेत का? ती सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायला लागली आहेत का? त्यांच्याकडे आपल्या माहिती व्यतिरिक्त वेगळे सिम कार्ड, वेगळा लॅपटॉप किंवा वेगळे सोशल मीडिया अकाऊंट आहे का? याची खरी आणि पूर्ण माहिती दोन्ही पालकांना असायलाच हवी.
त्यातल्या त्यात आपली मुलं कलेची आवड, मीडियाची आवड, नाटकात काम करण्याची आवड, क्रिएटिव्ह रायटिंग ची आवड, मोठं मित्रमंडळ, सोशल मीडियावर भरपूर कनेक्शन्स, हजारो पेजेस फॉलो करत राहणं, सतत ऑनलाईन असणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा, ‘माय लाईफ माय रुल्स’ असा नियम सतत बोलून दाखवणं, कोणत्याही प्रश्नांची धड उत्तरं न देणं अशा वर्तन प्रकारातली असतील तर… पालक मित्रांनो, मुलांपेक्षा आपणच जास्त सावध व्हा.. कारण, या प्रकारच्या मुलांवरच कुणाचं तरी जास्त लक्ष असण्याची शक्यता आहे.
नाकासमोर सरळ चालणाऱ्या, आपल्या करिअरवर अत्यंत क्लिअर फोकस असणाऱ्या, जिवाचं रान करुन अभ्यास करणाऱ्या मुलांकडे कुणी बघणार नाही. कारण, त्यांचा बुद्धिभेद करणं फार कठीण असतं. आपल्या भावंडांच्या, नातेवाईकांच्या सहवासात रमणाऱ्या, सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होणाऱ्या, सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नसणाऱ्या मुलामुलींकडे कुणी बघणार नाही. पण कौटुंबिक मतभेदांमुळे त्रासलेल्या, पालकांशी न पटणाऱ्या, कष्ट, परिश्रम, अभ्यास यांवर विश्वास नसणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत वादाचे मुद्दे काढून भांडणाऱ्या, वाद घालणाऱ्या, कुठं काय बोलावं याचा अजिबात पाचपोच नसणाऱ्या मुलामुलींकडे मात्र आता विशेष लक्ष दिलं जाईल, अशी दाट शक्यता आहे. त्यांच्या याच वागण्याचं राजकीय भांडवल करण्याचे प्रयत्न होतील.
‘आम्हाला कुणी समजूनच घेत नाहीय’, असं आपली मुलं मुली सतत म्हणतात का? पालक म्हणून आपण जे वागतो, त्यातलं काहीच आपल्या मुलामुलींना पटत नाही का? आमच्यावर अन्याय होतोय असं आपली मुलंमुली सतत बोलत राहतात का? असं असेल तर हीच मुलं मुली भविष्यात रडारवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या मुलामुलींना त्यांच्या मनातलं सगळं ऐकून घेणारा कुणी गुड लिसनर हवाय का? आणि कुणी त्यांना “आम्हीच तुमचे गुड लिसनर आहोत” असं ठासून पटवण्याचा प्रयत्न करतंय का? जर असं असेल तर आपल्या मुलामुलींच्या याच अस्वस्थ, अशांत मनस्थितीचा गैरफायदा कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी करुन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०२६ मध्येच २०२९ च्या निवडणुकांविषयी पत्रकार प्रश्न विचारायला लागले आहेत. अनेक विचारवंत “देशाचे निर्णय संसदेत नाही तर रस्त्यांवर व्हायला हवेत” असं स्पष्ट म्हणत आहेत.
कुणीतरी इतक्यातच भारताला “मनहूस देश” म्हटलं आहे. देशाच्या पंतप्रधानांना मोकाट सुटलेला सांड म्हणून झालेलं सगळ्या देशानं पाहिलेलं ऐकलेलं आहे. त्यांना “घटिया प्रधानमंत्री” म्हणून झालेलं आहे. “त्यांना मूलबाळ, संसार नाही, त्यामुळं त्यांना तरुणांची मनं कळणार नाहीत” हेही बोलून झालं आहे. एकूण काय तर, तुमचं भवितव्य चांगलं नाही आणि त्याला कारण देशातला सत्ताधारी पक्ष आहे, असं तरुणांच्या मनांवर नव्हे तर, बुद्धीवर बिंबवण्याची सुरुवात झाली आहे. तरुण पिढीला रस्त्यांवर आणून सरकारवर दबाव टाकून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचे प्रयत्न मोठ्या ताकदीनं सुरु झाले आहेत.
आता पालकांना असं वाटेल की, यात आमचा आणि आमच्या मुलांचा काय संबंध? आम्हाला तर आमच्या मुलांबद्दल पूर्ण खात्री आहे, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण, इथेच तर पूर्ण सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आपल्या मुलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या फावल्या वेळेचा, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्यांच्या मतं व्यक्त करण्याच्या पद्धतीचा अन्य कुणीही गैरफायदा घेता कामा नये. त्यांना अन्य कुणीही वापरुन घेता कामा नये.
आपणच आपल्या मुलांशी चांगला, मनमोकळा सहज संवाद वाढवणं गरजेचं आहे. आपणच आपल्या मुलांचे गुड लिसनर व्हायला हवं. वात्रटपणा आणि वाह्यातपणा यांच्यात फरक असतो. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी मांडण्याची सुद्धा एक वेगळी योग्य पद्धत असते, हे मुलांना सांगायला, शिकवायला नको का?
देशातली कायदे व्यवस्था आपल्या मुलामुलींच्या पूर्ण परिचयाची नाही. सोशल मीडिया संदर्भातले कायदे मुलामुलींना अद्यापही ठाऊक नाहीत. हक्क आणि स्वातंत्र्याची घोषणाबाजी करणं फार सोपं आहे, पण कायद्याच्या चौकटीत न वागण्याचे फटके आपल्या मुलामुलींनी सोसावेत, इतकी त्यांची शारीरिक, मानसिक क्षमता आहे का? अगदी स्वच्छ सांगायचं तर – अजिबात नाही.
आपल्यापैकी बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमधल्या मुलामुलींना स्वतःचं बरं वाईट नीट कळतं का? स्पष्ट सांगायचं तर – नाही. मग “कुणीही यावं आणि टिकली लावून जावं” इतकं आपल्या मुलांचं आयुष्य वाऱ्यावर सुटलेलं आहे का? नाही ना..
आंदोलन करताना ब्रिटिशांची लाठी खाऊन हुतात्मा झालेल्या लाला लजपतराय यांचं नाव आजचे सो कॉल्ड जेन झी आंदोलक घेतही नाहीत आणि ह्यांचे तथाकथित नेते स्वतःसुद्धा अंगाला झळ बसवून घेत नाहीत. पण ह्यांच्या बोलण्याला भुललेल्या मुलामुलींना कायदा हातात घेतल्यामुळं पोलिसांचा प्रसाद खावा लागला आहे. दोन तीन तास एअर कंडिशनर नसेल तर उन्हानं चक्कर येऊन पडणारे लोक अख्खा देश बदलण्याची वल्गना करतात, तेव्हा त्यावर हसू सुद्धा येत नाही, फक्त कीव येते.
देश बदलण्यासाठी कुणीकुणी आयुष्यं झिजवली आहेत, हे आपल्या मुलांना माहिती तरी आहे का? त्यांना बाबू गेनू, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस ही मंडळी ठाऊक नाहीत. अमरेंद्रनाथ चटर्जी, अतुलकृष्ण घोष, भूपेंद्रनाथ दत्त, धनसिंग गुर्जर, राणी कित्तूर चन्नम्मा, मदनलाल धिंग्रा, राजा नाहर सिंह, सांगोली रायण्णा, वेलू नचियार, यातली किती नावं आपल्याला किंवा आपल्या मुलांना ठाऊक आहेत?
‘देश बदलण्यासाठी ऐंशी-नव्वद तास काम करायला हवं’ असं नारायण मूर्ती म्हणाले की, आपल्याला ते नको वाटतं. ‘पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलूया’ असं दिलीप कुलकर्णी म्हणाले की, आपल्याला ते नको वाटतं. व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला अक्षयकुमारने दिला की, आपल्याला ते नको वाटतं. वयाच्या ९३ व्या वर्षी सुद्धा एकदम खणखणीत प्रकृती असणारे, रोजच्या रोज दणकून व्यायाम करणारे मधुकर तळवलकर आपण आपल्या मुलांना दाखवतो का? रघुनाथ माशेलकरांनी देश बदलण्यासाठी पन्नास वर्षांहून जास्त काळ स्वतःला झोकून दिलं, त्यांची गाथा आपण आपल्या मुलांना सांगतो का? अमेरिकेनं स्वतःच्या नावावर करुन घेतलेलं हळदीचं पेटंट पुन्हा भारताकडे आणण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले, हे नव्या पिढीला आपण सांगतो का? पर्यावरणाच्या जतन, संवर्धनासाठी आजही रोज मातीत अक्षरशः घाम गाळणारे जुन्नरचे रमेश खरमाळे सरकारवर टीका करत बसण्यापेक्षा स्वतःपासून बदलाची सुरुवात करणं जास्त योग्य मानतात. त्यांचा आदर्श घ्यावा, असं आपण आपल्या मुलांना सांगतो का?
म्हणजे, देशात ज्या उत्तम गोष्टी घडतायत, त्यांची चर्चाच आपल्या घरात होत नाही. आपण आपल्या मुलांशी अशा विषयांवर बोलतच नाही. “आम्हाला वेळ नसतो आणि मुलांनाही वेळ नसतो” हे वाक्य आता पर्मनंटली डिलिट करुन टाका. आईवडील हे फक्त पैसे आणि सोयी पुरविण्यासाठीच असतात, हे तत्त्वज्ञान तद्दन बिनडोकपणाचं आहे.
पोलिसांचे फोन येणं, आपल्याला किंवा मुलांना पोलिस चौकीत बोलावलं जाणं आणि तिथं आपल्याला मुलांच्या अनेक दिव्य कृत्यांचे साक्षात्कार होणं, हे आपण निगेटिव्ह मार्कांनी नापास होण्याचं लक्षण असतं. मुलांकडे अक्षम्य दुर्लक्ष किंवा अज्ञान या कॅटेगरी मधून तात्काळ बाहेर पडा. आणि सकारात्मक गोष्टी आवर्जून शोधून काढा. त्याची चर्चा सुरु करा, वाढवा.
आपल्या मुलांच्या मनात नेमकं काय खदखदतंय याचा शोध घेणं, हे पालकांचंच मूळ काम आहे. आणि त्यांच्या पोटातली खदखद त्यांचीच आहे की कुणा दुसऱ्याचाच पोटशूळ ह्यांनी आपल्याला लावून घेतला आहे, याचाही शोध घ्यायला हवा. कुणाच्या तरी स्वार्थाची मळमळ आपल्या घरात कशासाठी हवी? त्यासाठी आपल्याला आपल्या देशानं आजवर काय काय दिलं, हेही पालकांनी आठवून पहावं. त्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी नक्की सापडतील. आणि त्याचबरोबर आणखीही एक आत्मपरीक्षण करावं – ‘मी इतकी वर्षं या देशात नांदतो आहे. मी माझ्या देशासाठी आजवर काय काय केलं? देशासाठी किती वेळ दिला? काय काय त्याग केला? देशासाठी किती झिजलो? ‘ देशासाठी वेळ, बुद्धी द्यायला हवी, हे मुलांना शिकवलं का?
देशाची सेवा करण्याचे, देशाला मोठं करण्याचे आणि देशातल्या त्रुटी सुधारण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. रतन टाटांचा मार्ग, रघुनाथ माशेलकरांचा मार्ग, सुधा मूर्तींचा मार्ग, आनंद देशपांडेंचा मार्ग, अशी कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत. यांच्यापैकी कुणीही गैरसमज, पूर्वग्रह यांचं माध्यम वापरलं नाही. तरुणांना उलटे सल्ले दिले नाहीत. सरकारी किंवा राष्ट्रीय साधन संपत्तीचा गैरवापर केला नाही आणि नुकसानही होऊ दिलं नाही, हे जास्त महत्त्वाचं आहे.
वेळ हातात असणं, हीच अनेकदा फार मोठी शक्ती असते. वेळ निघून गेली आणि नंतर योग्य-अयोग्यतेची जाणीव झाली तरी उपयोग नसतो. ११ वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी पेनाचं निब बदलण्यासाठी ज्या मुलाच्या खिशात २५ पैसे नव्हते, त्याच मुलानं ५०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करणारी कंपनी उभी केली, ते पद्मश्री अशोक खाडे आपल्या देशानं पाहिले आहेत आणि देशात आंतरराष्ट्रीय परिषद सुरु असताना, हजारो परदेशी उद्योजकांच्या कार्यक्रमात कपडे काढून धिंगाणा घालणारे तरुणही आपल्या देशानं पाहिले आहेत. जे आज आपल्या देशाच्या पंतप्रधानांना मोकाट सुटलेला सांड म्हणत आहेत, त्यांनी या तरुणांना कुठलीच विशेषणे लावली नाहीत, हेही आवर्जून लक्षात घ्यायला हवं.
आता पालकांसाठी अत्यंत कळीचा मुद्दा काय तर, आपण त्या कपडे काढून उघडा नागडा गोंधळ घालणाऱ्या तरुणांना विसरलो असू, पण कायदा त्यांना विसरत नाही. कोणत्याही समाज विघातक किंवा अयोग्य कृतीसाठी आपलं नाव रेकॉर्डला लागलं की, त्या नावाचा विसर कायद्याला आणि न्याय व्यवस्थेला काही केल्या पडत नाही. कायद्याची स्मरणशक्ती फार विलक्षण. त्यामुळं, आपल्या देशातल्या कायदे व्यवस्थेच्या क्षमतेची परीक्षा आपणही घेऊ नये आणि आपल्या मुलांनाही घेऊ देऊ नये. आपल्या मुलामुलींनी अजाणतेपणी काहीतरी करुन कायद्याच्या कात्रीत अडकण्यापेक्षा आपणच आपलं पालकत्व अपग्रेड करुन हा धोका टाळूया ना..!
“आई म्हणजे भेटीला आलेला देव असतो. तर पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट असते. ”
आज ताई कडे गेले होते. सध्या ताई कडे खूप आनंदी, उत्साही वातावरण आहे. गप्पांमध्ये कसा वेळ जातो कळतच नाही. तरी गप्पा संपतच नाही. म्हणून पुन्हा पुन्हा जायचे. असच सुरू आहे.
अजय चे लग्न ठरले आहे. त्यामुळे काम पण भरपूर आहेत व गप्पा पण. एकंदरीत सर्व आनंदात आहोत.
आज जेंव्हा मी पोचले, तेंव्हा भाऊजी जरा वेगळ्याच मूड मधे दिसले. मी जाऊन त्यांच्या मीटिंग मधे सामिल झाले. आपलंच घर आहे. म्हणून संकोच न करता मी बसले. सर्वांनी नेहमी प्रमाणेच माझ्या येण्याची दखल घेतली. भाऊजी म्हणाले,
अग!! अजय चे ‘Training ‘ सुरू आहे. पूढच्या महिन्यात त्याचे लग्न आहे ना. तेंव्हा त्याला काही गोष्टी सांगणे गरजेचे आहे, असे मला वाटले. आमचा अनुभव, आम्ही केलेल्या चूका, ज्या आम्हाला बऱ्याच उशिरा कळल्या. तेंव्हा त्याला, त्याच्या पूढच्या जबाबदारी करिता तयार करावे. म्हणून आम्ही बोलत बसलो होतो.
भाऊजी म्हणाले, अरे!! लग्न म्हणजे तुझे नवीन जबाबदारी चे काम सुरू होणार आहे. आपण नेहमी लग्न म्हणजे सासू, सून हीच मुख्य पात्रे आहेत असं समजतो. यांच्या बाबतीत बोलतो. पण माझ्या मते ज्या घरात सून येणार असते तेथे नवऱ्याचा (पुरुषांचा) रोल महत्वाचा असतो. जबाबदारीचा असतो. त्याचे ‘ Balanced ‘ वागणे, घराला जोडून ठेवते. एकीकडे आई वडील तर दुसरीकडे बायको. दोघे ही महत्वाचे. दोघांना सांभाळायचे असते.
आपणच तिला आपल्या घरी आणले आहे. दुसऱ्या घरातून आलेली ही मुलगी, आपल्या विश्वासावर आली आहे. आपले आई-वडील सोडून, दुसऱ्या घरात जाणे ही सोप्पी गोष्ट नाही. तेंव्हा तिला मानाने सांभाळणे. आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. आजपर्यंत तुम्ही दोघे जे भेटत होता, ती एक झलक आहे. ‘ just introduction ‘ आहे ते. जेंव्हा बरोबर राहू लागाल, तेंव्हा अनेक गोष्टी स्वभावाच्या, सवयीच्या तुझ्या लक्षात येतील. सर्व चांगलेच, तुला आवडणाऱ्या गोष्टी असतील, असं नक्कीच नसणार. पण हळूहळू त्यांची सवय होते. तसेच तिचे पण असणार आहे. तेंव्हा ‘patience ‘ हीच एक लग्न successful होण्यासाठी यशाची गुरुकिल्ली आहे. शांत राहणे शिकावे लागेल. , लगेच ‘reaction ‘ देणे, remark देणे, समजूत करून घेणे, चूकीचे आहे. ते टाळावे लागेल. एकमेकांना समजण्यात पूर्ण आयुष्य निघून जात. एकमेकांना सांभाळणे महत्वाचे आहे. लहान सहान वाद टाळणे. एकमेकांच्या चूकांकडे दुर्लक्ष करणे, अपेक्षा कमी ठेवणे. गरजेचे आहे. तिला ‘Protect ‘ करणे हे तुझे कर्तव्य आहे. तिने असेच वागावे, तसेच करावे. असे हट्ट चूकीचे आहेत. बाहेरच्यांसमोर तिचा मान ठेवायचा. तिच्या माहेरच्या लोकांचा अपमान, खिल्ली उडवणे वगैरे कधीच करायचे नाही. भांडण, वादविवादाचे कारण नेहमी अगदी शुल्लक असते.
ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू म्हणजे, आम्ही, आई-वडील, बहिण भाऊ. आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर असणार आहोत. तू आमच्या बरोबर जसं वागशील तसंच ती वागणार. काही सवयी सुरवातीपासून लावायच्या असतात. दिवसांतून एकदा तरी सर्वांनी एकत्र बसून जेवायचे. गप्पा मारायच्या. संवाद साधायचा. हळूहळू प्रेम वाढत. तिचा बरोबर आईचाही मान ठेवायचा. हळूहळू तिच्या वर जबाबदारी टाकायची. तूला समजत नाही. तुला येणार नाही, जमणार नाही. ही भाषा वापरायची नाही.
आमच लग्न झालं तेंव्हा आजी आणि तुझ्या आईचा वादविवाद कधी झाला नाही असं नाही. पण ती गोष्ट माझ्या पर्यंत आणायची नाही हे मी दोघींना सांगितले होते. मी त्या मधे कधी पडलो नाही. दोघींनी कधी अबोला धरायचा नाही. हे ही मी निक्षुन सांगितले होते.
घरच्या बायका नेहमी आनंदात असाव्यात. त्यांना मान मिळाला पाहिजे. त्यांची तुलना आपापसात किंवा अजून कोणाबरोबर कधी करायची नाही. प्रत्त्येक व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. घरच्या गोष्टी घरातच असाव्यात. दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकुन तस आपल्या घरात वागायचा प्रयत्न करायचा नाही. प्रत्त्येक घरची समीकरण वेगळी असतात.
माझ्या जवळ जे आहे ते उत्तम आहे. असं समजलं तर सर्व गोष्टी जमतात. घरात बायकांचे मत महत्वाचे असते. त्यांना ‘त्या ‘गोष्टी समजतात ‘ज्या ‘ कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही. घरचे वातावरण प्रसन्न ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याकरिता दोन पावलं मागे घ्यावी लागली, तर ती हार नसते. आपल्या माणसांसाठी गरज पडल्यास असे केले तर तुमचा मान वाढतो. कमी होत नाही.
बाकी पैशाचे व्यवहार, व्यवस्थापन या गोष्टींची, एकमेकांच्या सल्ल्याने सुरवातीपासून च काळजी घेतली, तर पूढील आयुष्यही मजेत जाते. हे सर्व तुम्ही तुमच्या हिशोबाने करावे. घरातील खर्चाचा हिशोब आई जवळ असल्यास, सवयीप्रमाणे ती उत्तम पार पाडेल याची खात्री आहे.
आम्ही दोघे काही चूका करणारच नाही असे नाही. जसजसे वय वाढत जाईल तसतसे ‘ चूकांचे प्रकार व प्रमाण ‘ दोन्ही वाढायची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा वेळोवेळी आम्हाला पण सांगत रहा.
सर्वांनी एकमेकांना धरून राहणे महत्वाचे. सर्वांमध्ये स्पष्ट संवाद असावा. आनंद घरातच असतो. लहान सहान गोष्टींत घ्यायचा असतो.
मला भाऊजींचे कौतुक वाटले. आयुष्याचे गणित किती सोप्या भाषेत समजावून सांगितले. काही गोष्टी आधीच बोलायच्या असतात. नंतर बोलून त्याचा उपयोग नसतो. प्रत्त्येक कामाची सुरवात कशी होते हे नेहमीच महत्वाचे असते. त्यावरच शेवट अवलंबून असतो.
मी हसून म्हंटले, “भाऊजी!! नवरा संस्कार केंद्र उघडा की तुम्ही. खूप चालेल. “
भाऊजी हसले व म्हणाले, आपलं कर्तव्य वेळेवर पार पाडणे, ही आपली जबाबदारी असते.
भाऊजी म्हणाले, अरे, अजय लक्षात ठेव,
“आई म्हणजे भेटीला आलेला देव असतो, तर पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट असते. “
म्हणतात ना,
“संबंध, प्रेम, ‘वर्षा ‘ जैसा नहीं होना चाहिए, जो बरस कर खत्म हो जाए।
बल्कि संबंध ‘शीतल हवा ‘ की तरह होना चाहिए, जो खामोश हो, परंतु सदैव आसपास हो ।”
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०३ आणि १०४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १०३ – – –
हरिकीर्तने प्रीती रामीं धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणी विसरावी ।
परद्रव्य आणिक कांता परावी ।
येदर्थी मना सांडि जीवीं करावी ।।१०३।।
अर्थ :श्रीरामाबद्दल प्रेमभाव ठेवून हरिकीर्तन आणि निरूपणात देहबुद्धीचा त्याग करून स्वतःला विसरून जावे. परद्रव्य आणि परस्त्री यांचा अगदी मनापासून त्याग करावा.
(हरिकीर्तन – भगवंताचे गुणगान, निरूपण – तात्विक चर्चा, येदर्थी – या कारणाने, सांडि जीवीं करावी –मनापासून त्याग करावा)
विवेचन :या श्लोकात साधकाने कसे वागावे त्याबद्दल समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण एक लक्षात घेतली पाहिजे की साधक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपण आहोत. आपण त्या मार्गावर वाटचाल करायचे ठरवली म्हणजे आपण साधकच झालो. आपण प्रापंचिक माणसे. आपली देहबुद्धी प्रबळ असते. ही देहबुद्धी कमी होऊन भगवंताकडे आपले चित्त लागावे यासाठी हरिकीर्तन आणि निरूपण यासारखा सहज उपाय दुसरा नाही. हरिकीर्तन करणे म्हणजे भगवंताच्या गुणांचे गुणगान करणे. त्याच्या गुणांचे जेव्हा आपण वर्णन करू तेव्हा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल.
दुसरी गोष्ट म्हणजे निरूपण. म्हणजे तर्काच्या, बुद्धीच्या साहाय्याने भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे. त्याच्या अवतारकार्याबद्दल, त्याने जो उपदेश केला आहे त्याबद्दल जाणून घेणे. भक्ती आणि ज्ञान इथे हातात हात घालून चालतात. हृदय आणि मेंदू एकत्र येतात. कोरडे ज्ञान उपयोगाचे नाही. भक्ती जेव्हा ज्ञानासहित केली जाते तेव्हा ती डोळस भक्ती असते. म्हणून समर्थ आपल्याला हरिकीर्तन आणि हरिकथा निरूपण असे दोन्ही करायला सांगतात.
भगवंत निर्गुण आणि सगुण असा दोन्ही आहे. भक्तीच्या शक्तीने तो निर्गुणातून सगुणात येतो. म्हणून साधकाला आधी त्याचे सगुण रूपात प्रेम निर्माण होणे आवश्यक असते. त्यातूनच मग पुढे निर्गुणाकडे जाता येते. सगुणाचे प्रेम निर्माण होण्यासाठी त्याच्या रूप गुणांचे गुणगान करता आले पाहिजे. भगवंताबद्दल तात्विक चर्चा करून त्याच्याबद्दल अधिक जाणून घेता आले पाहिजे. आणि यामध्ये दांभिकता नको. कोणतीही गोष्ट मनापासून असावी.
साधकासाठी आणखी दोन महत्वाच्या गोष्टी समर्थांनी या श्लोकात आपल्याला सांगितल्या आहेत. परद्रव्य आणि परस्त्री यांची अभिलाषा धरू नये. तसा विचार मनात देखील आणू नये. या दोन गोष्टी वरवर करायला सोप्या वाटल्या तरी आपल्या देहबुद्धीमुळे त्यावर नियंत्रण मिळवणे फार कठीण जाते. कनक आणि कांता या दोन गोष्टी माणसाला मोहात पडतात. त्यामुळे तो जर परमार्थ मार्गावर वाटचाल करीत असेल तर त्याचा परमार्थ निष्फळ ठरतो. कारण काम, वासना, द्रव्यलोभ या गोष्टी भगवंत प्राप्तीच्या आड येतात. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंत हवा असेल तर या गोष्टींचा त्याग करायला हवा. आपल्या संसारापुरते आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा परंतु दुसऱ्याच्या पैशावर डोळा नको. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे… ‘ त्याचप्रमाणे परस्त्री मातेसमान मानावी असं आपली संस्कृती सांगते. परमार्थात तर ही गोष्ट फार महत्वाची आहे.
तेव्हा देहबुद्धी कमी करण्यासाठी परमेश्वराच्या गुणगायनात आणि निरूपणात आपला वेळ व्यतीत करावा. ‘ सदाचार हा थोर सांडू नये तो.. जगी तोचि तो मानवी धन्य होतो ‘ हे समर्थांचे वचन लक्षात ठेवावे.
स्वसंवाद
१. मी माझी भक्ती केवळ ‘कोरडी’ किंवा भावनिक करतोय, की संतांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान आणि निरूपणाच्या साहाय्याने ती ‘डोळस’ करण्याचा प्रयत्न करतोय?
२. “एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत” हे लक्षात ठेवून, मी भगवंताची आस धरताना मनातल्या कनक आणि कांतेच्या (लोभ आणि वासनांच्या) तलवारी बाजूला ठेवायला तयार आहे का?
३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, माझा प्रपंच चालवण्यासाठी पैसा मिळवताना माझा व्यवहार ‘उत्तम आणि प्रामाणिक’ आहे का? मी नकळत परद्रव्याची अभिलाषा तर धरत नाहीये ना?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनातील ‘देहबुद्धी’ (अहंकार) कमी करण्यासाठी मी दिवसातील काही वेळ तरी हरिकीर्तनात किंवा चांगल्या तात्विक विचारांच्या निरूपणात घालवतो का?
– – – – – – –
श्लोक क्र. १०४ – – –
क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चीत दुश्चीत ते लाजवीते ।
मना कल्पना धीट सैराट धावे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ।।१०४।।
अर्थ : मनुष्य निरनिराळ्या प्रकारे बोलतो. परंतु बोलण्याप्रमाणे त्याचे स्वतःचेच वागणे नसल्याने त्याचे मनच त्याला आतून लाजवते. प्रत्यक्ष आचरण न करता ज्याचे मन नुसत्या स्वैर कल्पना करण्यात दंग असते अशा मनुष्याला परमेश्वर कसा प्रसन्न होईल?
(नानापरी – विविध प्रकारे, चीत – चित्त, दुश्चित – वाईट विचारांनी दूषित झालेले मन, सैराट – स्वैरपणे/बेलगाम, धीट – अनियंत्रित)
विवेचन : व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांचे बोलणे मोठे आकर्षक असते. आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्याचा प्रयत्न ते करीत असतात. परंतु ज्यावेळी त्यांच्या परीक्षेचा प्रसंग येतो, तेव्हा अशी माणसे उघडी पडतात. अशी माणसे लोकांना आपल्या बोलण्याने काही काळ प्रभावित करण्यात यशस्वी देखील होतात पण त्यांचे अंतर्मनच त्यांना सांगत असते की तू खोटे बोलतो आहेस, लोकांना फसवतो आहेस. अशा वेळी त्यांचीच त्यांना लाज वाटते. पण हा आतला आवाज ऐकून जे सावध होतात त्यांना प्रगतीची काहीतरी संधी नक्कीच असते. पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून जे आपले वागणे सुरूच ठेवतात, अशा व्यक्ती परमेश्वरापासून लांबच जातात. जे स्वतःशीच प्रामाणिक नाहीत, ते परमेश्वराला कसे प्रसन्न करून घेणार?
महाराष्ट्रातील एका कीर्तनकाराचे उदाहरण या बाबतीत सांगता येईल. त्यांच्या कीर्तनाला अक्षरश: हजारोंचा जनसमुदाय जमत होता. आपल्या कीर्तनात हे बुवा आपल्या मुलामुलींचे लग्न अत्यंत साधेपणाने करा. अवास्तव खर्च, थाटमाट या सगळ्या गोष्टींना फाटा द्या असे आवाहन करीत. आजची परिस्थिती पाहता सामाजिक बदलाच्या दृष्टीने त्यांची ही सूचना योग्यच होती. कारण सामान्य परिस्थितले अनेक लोक किंवा गरीब शेतकरी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून अडचणीत येतात. पण ज्यावेळी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी साखरपुड्यालाच एवढा प्रचंड खर्च आणि थाटमाट केला की त्यापुढे श्रीमंतांकडील लग्नही फिके पडावे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. ‘ म्हणून प्रत्यक्ष आचरणाला अतिशय महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ यांच्यासारखे आमचे अनेक संत जसे बोलले तसेच वागले. म्हणूनच ते अवघ्या जगासाठी वंदनीय ठरले.
त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, ‘ नसत्या कल्पना करू नये. ‘ बऱ्याच वेळा माणूस भूतभविष्याचा विचार करून नको त्या कल्पना करत बसतो. बऱ्याच वेळा या कल्पना मोहाच्या वा विषयांच्या संदर्भात असतात. कल्पनेचा अश्व चौखूर दौडत असतो. कल्पनांना देखील काही एक महत्व निश्चितच आहे. पण त्या वास्तवतेवर आधारित असाव्यात. त्यांच्या साहाय्याने सत्याचा शोध घेण्यात मदत व्हावी. अशा त्या असल्या तर जीवनात अत्यंत उपयोगी ठरतात. पण कोणताही वास्तविक आधार नसताना सैराट म्हणजे सैरावैरा धावणारे मन नको त्या कल्पना करते. त्यातून माणूस नको त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होतो. अशा गोष्टींचा सुद्धा संसारात ताप होतो. परमार्थात तर अशा कल्पनांना थारा नाही. समर्थ आधीच्या एका श्लोकात म्हणतात, “जनीं बोलण्यासारिखे चाल बापा। मना कल्पना सोडी संसारतापा॥
म्हणूनच माणसाने बोलण्यासारखे वागावे. आपल्याच वागण्याने आपल्याला लाज उत्पन्न होईल असे कर्म करू नये. चित्त दूषित करणाऱ्या अशा गोष्टींपेक्षा आपले चित्त ईश्वराकडे लावावे.
स्वसंवाद :
१. मी समाजमाध्यमांवर किंवा चार लोकांमध्ये जे मोठे आणि आदर्श विचार मांडतो, माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रसंग आल्यावर मी स्वतः खरोखरच त्याप्रमाणे आचरण करतो का?
२. “बोले तैसा चाले” या तुकाराम महाराजांच्या सूत्राचा आदर राखताना, माझे अंतर्मन कधी माझ्याच एखाद्या ढोंगी वागण्यामुळे मला आतून ‘लाजवते’ का?
३. भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील चिंता यांमुळे माझे मन ‘सैराट’ (बेलगाम) धावत असताना, मी त्याला विवेकाने आवर घालून वास्तवतेच्या भूमीवर आणतो का?
४. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी बाह्य देखावा किंवा कोरडी बडबड करण्यापेक्षा, मी माझे चित्त ‘दुश्चींत’ (दूषित) होण्यापासून वाचवून देवाकडे लावायला तयार आहे का?
☆ “शंकरबाबांची माधुकरी…” – लेखक : एम. बी. वाघ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
– – गरजू विद्यार्थ्यांसाठी एक वरदान…
पुण्यातील गांजवे चौक येथील छत्रपती संभाजी महाराज शाळेत गेल्या दीड वर्षापासून “शंकर बाबांची माधुकरी” हा अतिशय सुंदर आणि सेवाभावी उपक्रम सुरू आहे. रोज शेकडो गरजू विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.
मी स्वतः जवळपास एक वर्षापासून रोज येथे जेवायला जात आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ ऐकलेला नाही, तर अगदी जवळून अनुभवलेला आहे.
दररोज सोमवार ते शनिवार, दुपारी १२ ते २ या वेळेत येथे जेवण दिले जाते. कोणताही सण असो, विशेष दिवस असो किंवा काहीही प्रसंग असो—सेवेचा हा उपक्रम नियमितपणे सुरू असतो. दररोज साधारण १००० ते १२०० मुले येथे जेवण करतात.
येथील जेवणाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते अगदी पोटभर आणि मनापासून दिले जाते. मंगळवार आणि गुरुवारी खिचडीसोबत गोड पदार्थ दिले जातात—कधी लापशी, कधी शिरा, कधी बुंदी, तर कधी नारळी भात. शनिवारी खिचडीसोबत रस्सा-भाजी असते. साधे असले तरी हे जेवण अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने दिले जाते.
या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा गरजू विद्यार्थ्यांना होत आहे. पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाचा मेसचा खर्च करणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी शंकर बाबांची माधुकरी म्हणजे खरोखरच एक मोठा आधार आहे.
पूर्वी दोन वेळच्या जेवणासाठी पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर असायचा. मात्र हा उपक्रम सुरू झाल्यापासून अनेक गरजू विद्यार्थी जेवणाची चिंता बाजूला ठेवून अधिक निर्धास्तपणे आपल्या ध्येयासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत करू शकत आहेत.
या संपूर्ण उपक्रमामागे काम करणारे कर्मचारी आणि सेवेकरी हे या कार्याचे खरे आधारस्तंभ आहेत. ताई असो, काका असो, दादा असो, आजी असो किंवा मावशी असो प्रत्येक जण मुलांशी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने वागतो. मुलांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही त्रास, राग किंवा कंटाळा दिसत नाही.
कोणाशी वाद नाही, कोणाशी भांडण नाही; अगदी मनापासून आणि निःस्वार्थ भावनेने सेवा देण्याची त्यांची वृत्ती दिसून येते.
इथे फक्त जेवण दिले जात नाही, तर विद्यार्थ्यांना माणुसकी, आपुलकी आणि आधार दिला जातो. त्यामुळे येथे काम करणारे सेवेकरी आणि कर्मचारी हे केवळ कर्मचारी राहात नाहीत; ते विद्यार्थ्यांसाठी कधी ताई, कधी काका, कधी दादा, कधी आजी, तर कधी मावशीसारखेच वाटतात.
या ठिकाणची शिस्तसुद्धा खूप सुंदर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मुले रोज जेवायला येत असूनही संपूर्ण व्यवस्था श्री सद्गुरू शंकर महाराज मठातील विश्वस्त, कर्मचारी व त्यांचा सहकारी वर्ग अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालवतात. एवढ्या मोठ्या उपक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.
या उपक्रमातील आणखी एक छोटी पण मनाला आवडणारी गोष्ट म्हणजे साधारण ११:३० वाजता WhatsApp ग्रुपवर त्या दिवसाच्या जेवणाचा फोटो येतो. फोटो पाहिला की लगेच कळते—“आज जेवायला काय आहे! ” ही छोटीशी गोष्टसुद्धा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आणि आपुलकीची बनली आहे.
मी स्वतः जवळपास एक वर्षापासून येथे जेवतो आणि माझ्या अनुभवातून एवढे नक्की सांगू शकतो की, येथील जेवण चांगले आहेच; पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते जेवण ज्या प्रेमाने आणि सेवाभावाने दिले जाते, ते मनाला स्पर्शून जाते.
आज पुण्यात अनेक विद्यार्थी मोठी स्वप्ने घेऊन येतात. कोणाला अधिकारी व्हायचे असते, कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते, तर कोणाला आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची असते. पण या स्वप्नांच्या प्रवासात आर्थिक अडचणी अनेकदा मोठा अडथळा ठरतात.
… अशा वेळी “शंकर बाबांची माधुकरी” या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
म्हणूनच माझ्या मते—
गरजू विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि आर्थिक अडचणींमुळे दोन वेळच्या जेवणाची चिंता करणाऱ्या प्रत्येकासाठी “शंकरबाबांची माधुकरी” हे खरोखरच एक वरदान आहे.
या उपक्रमामागे काम करणाऱ्या प्रत्येक सेवेकरी, प्रत्येक कर्मचारी आणि या सेवेला हातभार लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून कौतुक आणि आभार.
हे अन्नदान केवळ पोट भरत नाही; ते एखाद्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद देते.
आणि म्हणूनच…
शंकरबाबांची माधुकरी —
.. भुकेल्या पोटासाठी अन्न,
.. गरजू विद्यार्थ्यांसाठी आधार,
.. आणि त्यांच्या स्वप्नांसाठी एक सुंदर हातभार!
लेखक : M. B. Wagh… विद्यार्थी
प्रस्तुती : मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“भाजीत चिमूटभर साखर घाल गं, म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते, ” स्वयंपाक करताना आजी म्हणायची. भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते.
मला नवल वाटतं, आजीवर्गाचं.
त्यांना बरोबर माहीत असायचं, कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते.
पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी, थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा.
कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी, “हो, हो. बरोबर आहे तुमचं, ” म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची.
चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो, असं म्हणायची.
घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही, कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही.
सावकाशीने समजावून सांगायचे, ज्यावेळेस ते समजून घेईल. चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो, असं आईपण म्हणायची.
म्हणूनच त्यांचे संसार विनाकलह झाले.
कामवाल्या बाईबाबतही असंच. तिने कधी दांडी मारली, कधी उशिरा आली, तरी ती पण एक संसारी बाई आहे, आपल्यापेक्षा तिला आव्हानं असतात जास्त. मग अशा वेळेस “का गं आज उशीर झाला? बरी आहेस ना? काळजी घे गं बाई. चल. दोन घास खाऊन घे, ” म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील.
थोडी माणूसकी खूप मोठं काम करते.
थोडा विश्वास, थोडं प्रेम, थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात.
आजी नेहमी म्हणायची – आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण. एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं.
आताची सतत ‘अरे ला कारे’ करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत, असं वाटतं.
ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.
थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमूटभर आनंदाची नक्कीच भर घालू शकतो.
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈