मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० … ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगातून समजलेले संत तुकाराम

गाथेतील एकेक अभंगांचे वाचन करत असताना संत तुकारामांचे पांडुरंगाशी असलेले भक्तीचे नाते आपल्याला हळु. हळू उलगडत चालले आहे. हे भक्तीचे नाते कायम तसेच राहावे एवढेच त्यांचे देवाकडे मागणे आहे. म्हणून ते म्हणतात, “अनेक जन्मात माझे आचरण चांगले नव्हते. म्हणून हे देवा मला तुमच्या पायांचा वियोग झाला. मात्र या जन्मात काहीतरी चांगले कर्म माझ्या हातून घडले असावे, आणि म्हणूनच तुमची माझी भेट झाली. आता तुम्ही कृपा करा. मी अपराधी, दुराचारी आहे. संसाराच्या तापाने त्रस्त झालो आहे. माझ्या अंतरंगातील काम, क्रोध, कल्पना विक्षेप यामुळे मी तुमच्या पर्यंत पोहोचत नाही असे झाले आहे. इकडे संसार धड नाही, तिकडे परमार्थात गती नाही, अशी माझी कुचंबणा झाली आहे मी निरुपयोगी ठरलो आहे”

 हा न तोसा ठाव झाला पांडुरंगा/

 नयेची उपेगा काय करू/

 आपुलिया नावा धावुनिया धावे/ लवकर यावे तुका म्हणे//

 अशा परिस्थितीत हे पतितपावना, तुझे नाव सार्थ कर आणि माझ्याकरता धावत ये.

 आता या अभंगात तुकाराम बुवा काय म्हणतात?

 कारे तुम्ही ठेवा बहुतानिमित्ते/

 माझीया संचिते वोढवले/

 भक्ती प्रेम गोडी बैसली जिव्हारी/

 आनंद अंतरी येणे झाला/

 पुसले पडळ तिमिर विठ्ठले/

 जगती भरले ब्रह्मानंदे//

 तुका म्हणे केलो कामने वेगळा/

 आवडी गोपाळा असे वरी//

तुकाराम लोकांना सांगत आहेत की जन हो, मी संसाराचा त्याग केला म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करता, पण खरं सांगायचं तर हेच माझं संचित आहे. माझ्या अंतःकरणातील विठूच्या प्रेमामुळे माझ्या दृष्टीतील अज्ञानाचा अंधार दूर झाला आहे, आणि मला सर्व जग ब्रह्मानंदाने भरलेले दिसत आहे. मी कामनाशून्य होऊन माझ्या मनात फक्त एका कृष्णाची प्रीती आहे.

या ठिकाणी संत तुकारामांची देह बुद्धी पूर्णतया  विनाश पावली आहे.

 आमुची विश्रांती/ तुमचे चरण कमळापती/

 हेचि एक जाणे/ काया वाचा आणि मने/

 नीच जना लोका/ तळील पायरीस तुका//

या ठिकाणी तुकाराम महाराज स्वतःस सर्वांहून नीच म्हणजे खालच्या पातळीवरचा असे संबोधित आहेत. देवा, तुमच्या चरणांवर अनेक भक्त लोटांगण घालतात, त्या सर्व भक्तात मी खालच्या तळाच्या पायरीवर आहे.

खरा भक्त हा नेहमी लीन असतो, विनम्र असतो हेच आपल्याला तुकारामांचे रूप या अभंगात पहावयास मिळते.

 संत प्रवृत्तीचे तुकाराम महाराज कसे होते यासंबंधी अधिक माहिती या खालील अभंगातून आपल्याला मिळते.

  होईल तो भोग/ भोगीन आपुला/

 न घालीन विठ्ठला/ भार तुज//

 तुम्हा पासाव हे / इच्छितसे दान/

 अंतरीचे ध्यान/ मुखी नाम//

 नये काकुळती/ गर्भवासासाठी/

 न धरी हे पोटी/ भय काही//

 तुका म्हणे मज/ उदंड एवढे/

 नाचेन मी पुढे/ मायबापा//

“विठ्ठला, प्रारब्धाने मला जे भोग भोगायचे असतील, ते मी आनंदाने भोगीन. तुझ्यावर त्याचा जराही भार टाकणार नाही. मला तुझ्याकडून हेच दान हवे आहे. तुझे ध्यान माझ्या अंतरंगात सदैव राहो आणि तुझे नाम माझ्या मुखी अखंड राहो. मला गर्भवासाचे भय नाही.

अनेक जन्म मला मिळाले तरी हरकत नाही, फक्त माझी एकच मागणी तू पूर्ण केलीस तर तुझ्यापुढे मी प्रेमभराने सदैव नाचत राहीन. “

सदैव भगवंताची भक्ती आणि प्रीती अंतरंगात राहावी एवढी एकच इच्छा तुकाराम त्यांच्या अनेक अभंगांतून वेळोवेळी व्यक्त करतात. परमेश्वराच्या दर्शनासाठी कितीही जन्म घेण्याची त्यांची तयारी आहे. ते देवाकडे मोक्षाची याचना करत नाहीत.

कधी कधी तुकाराम महाराज लहान होऊन आपल्या मायबापांकडे बाल हट्ट करतात.

 भोगलो मी आता/ आपुल्या स्वभावे/

 कृपा करून देवे/आस्वासीजे//

मी सांसारिक नित्य कर्म करून फार थकलो आहे, तेव्हा कृपा करून तुम्ही मला असे आश्वासन द्या की,

 देऊनी आलिंगन/ प्रीतीच्या पडीभरे/

 अंगेही दातारे/ निववावी//

 उदार अंतकरणाने हे देवा, तुम्ही मला आलिंगन देऊन माझ्या थकलेल्या शरीराला शांत कराल.

 अमृताची दृष्टी/ घालूनिया वरी/

 शीतळ हा करी/ जीव माझा//

 तुमच्या अमृतरुपी कृपादृष्टीचा वर्षाव करून माझ्या जीवाची तळमळ शांत कराल.

 घेई उचलोनी /पुसे तहानभूक/

 पुसी माझे मुख/ पितांबरे//

माझी तहानभूक जाणून मला कडेवर उचलून घ्याल, आणि माझे मुख आपल्या पितांबराने स्वच्छ कराल.

 बैसोनिया माझी धरी हनुवटी/

 ओवाळूनी दिठी करुनी सांडी//

  तुका म्हणे बापा अहो विश्वंभरा/

 आता कृपा करा ऐसी काही//

मला आपल्या मांडीवर घेऊन माझी हनवटी धराल, माझी दृष्ट काढाल, अशा प्रकारे विश्वंभरा तुम्ही माझ्यावर कृपा कराल. मला असे आश्वासन द्या.

काय हा तुकारामांचा बालहट्ट! भक्ताचे व देवाचे नाते कसे अधिकाराचे होऊ शकते हे आपल्याला या अभंगातून अगदी सहज समजते.

सतत पांडुरंगाचा धावा केल्याने तुकाराम महाराजांना पंढरीच्या विठोबाचे आता दर्शन घडलेले आहे आणि त्यामुळे धन्यता पावलेले तुकाराम ब्रह्मानंद अवस्थेत बेधुंद होऊन गात आहेत.

 पावलो पंढरी वैकुंठ भुवन/

 धन्य आजी दिन सोनियाचा//

 पावलो पंढरी आनंद गजरे/

 वाजतील तुरे शंखभेरी//

पावलो पंढरी क्षेम आळिंगणी/

 संत या सज्जनी निवविलो//

 पावलो पंढरी पार नाही सुखा/

 भेटला हा सखा मायबाप//

 पावलो पंढरी येरझार खुंटली/

 माऊली वोळली प्रेम पान्हा//

 पावलो पंढरी आपुले माहेर/

 नाही संसार तुका म्हणे//

भू वरचे वैकुंठ म्हणजे पंढरपूर, या ठिकाणी तुकाराम महाराज येऊन पोहोचले आहेत आणि त्यांचा दिवस धन्य धन्य झाला आहे. पंढरीत संत जनांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिल्यामुळे त्यांचे सर्व श्रम निमाले आहेत. मायबाप पांडुरंगाच्या भेटीने त्यांच्या आनंदाला पारावार नाही. आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची कायमची सुटका झाली आहे. विठाईच्या प्रेम पान्ह्याने त्यांना आता संसाराचे बंधन राहिले नाही. या ठिकाणी परमेश्वराशी ते संपूर्णपणे एकरूप झाले आहेत.

 जय जय विठ्ठल/ श्री हरी विठ्ठल/

 विठ्ठल विठ्ठल/ पांडुरंग//

 क्रमशः… १०  

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # तू नाही म्हणू नकोस… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # तू नाही म्हणू नकोस… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

#तू नाही म्हणू नकोस.. #

होकार तुझा ऐकण्यासाठी कान माझे आसुसलेले आपल्या त्या पहिल्या भेटी पासूनचे…

चांदण्याचा गालीचा अंथरून बसला चंद्र केव्हाचा अन शालू कितीएक बदलून गेले रात्रीचे…

कुंतलांच्या चुकार बटांनी ओढून धरला तलम पडदा नयनासमोरी रोखण्या रस्ता तुझ्या भावपूर्ण नजरेचा…

तरीही मौनात दडलेला होकार तो तुझेच भावविभोर बोलके डोळे विसरून नाही गेले तेच सांगायचा…

काय पाहशी मजला तू अशी भावुक नजरेने.. तुझ्या अंतरीच्या खळबळलेल्या लाटांची गाज अधरावरी धडकते…

नकाराचा विकल शब्द झुंजत राही अधर विलगण्यास… परी असमर्थ ठरले थरथर ती ओठांची थोपविण्यास..

सांगायचं काय तुला समजले आहे मला एकही शब्द न बोलता. ,. लपविण्याचा तू केलास कितीही आटापिटा तरीही चेहरा तुझा सारं काही बोलून गेला…

मनात जे आहे बोल एकदा मोकळेपणाने..

अडचणींच्या कोंदणात दडलेल्या होकाराला बोलतेस का जाहीरपणे…

अमुर्त नात्याला मुर्त रूप देण्याचा अवधी जवळी आला.. एक होकार तुझा ऐकण्यासाठी जीव आतुरला…

माझ्या तनमनाला दिठी बसावी तुझ्या होकाराची मिठी.. हिच आहे मनीची आस…

विलंब लाविलास होकार देण्यास तरी माझी त्याला ना नाही..

नाही सांगितलसं तरीही मी समजून घेईन… असतात काही गोष्टी बऱ्याच अडचणींच्या मुक्तपणे बोलता येत नसताना.. होकार देण्याची अडचण तुझी मला समजली.. पण पण माझीही एक हळवी

अट इतकीच कि तू मला कधीच नाही म्हणू नकोस हं!

##

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.

☆ तुझा तूच त्राता ☆

पहा मानवा, यंत्रक्रांतीमुळे आज

मानेवरी बैसली जोखडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।धृ।।

 *

जसा लागला शोध चक्रा-गतीचा

जगाने गती घेतली केवढी

कुणाला नसे थांबण्या वेळ आता

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

अशा जीवघेण्या प्रवाहातुनीही

तुला जायचे पैलतीराकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।१।।

 *

किती वादळी वेग हे वाहनांचे

तयातून जाणेच आहे सुखे

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

तरी पाळ सारे इशारे दिलेले

जराही नको वागणे वाकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।२।।

 *

पहा, वाहते गोगलीशंख पाठी

ढके वादळी उंटनाका सुखे

अती दक्षतेने चले सूरवंट

मधूमक्षिकांची पहा कौतुके

वनी अस्वलेभाकऱ्या साठवीती

मनू का असे हीन त्यांच्या पुढे?

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।३।।

 *

तुझा तूच त्राता, नसे अन्य कोणी

मनी जाण हे सत्य जे सांगतो

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो!

न घे काळजी देह, यंत्रा-धनाची

असा जीव देवा कदा नावडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।४।।

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मृत्युला सामोरं जाताना… –  लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ मृत्युला सामोरं जाताना… –  लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर

– एक बोधकथा

आजी तिचं आयुष्य तिनं केलेल्या आयुष्याच्या नियमाप्रमाणे जगली. सत्तरीत फुलांचे हार करून देवाला घालताना ती सुईत दोरा कसा ओवू शकायची हे तिचं तिलाच माहित! पोथी वाचताना डोळ्यातून आसवं का गाळायची हे पण तिचं तिलाच माहित. कामाच्या सरूबाईचा काळा निळा झालेला दंड बघून “सरू, सोड त्याला आता” म्हणून कडाकडा बोलताना ती रागवायची का हळवी व्हायची हे पण तिचं तिलाच माहित!

काही का असेना.. तिच्यातील सच्चेपणा मात्र प्रत्येकाला जाणवत असे. स्वत:ला जे पटतं तेच करण्याची तिची जी धडपड चाले ती बघून घर दार थक्क होत असे. वयाला तिनं कधीच प्राधान्य दिलं नाही. जोवर हात पाय चालत आहेत तोवर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो हा गाढा विश्वास तिच्याजवळ होता. वर्तमानपत्रात “तुमची आजी” सदर लिहणे काय, पंचाहत्तर वर्षाला स्पॅनिश भाषा शिकणं काय किंवा कराटेचा क्लास लावणं काय.. सारं तिला शोभून दिसायचं.

तिनं स्वत:च्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं होतं की कुठल्याही परीस्थितीत मला हॅास्पिटलमध्ये नळ्या जोडलेल्या अवस्थेत ठेवू नका. काय वाट्टेल ते झालं तरी. मी माझं आयुष्य माझ्या पध्दतीने जगले आहे आणि माझा मृत्युपण मला हवा तसाच यावा अशी माझी इच्छा आहे! नैसर्गिक पणे येणारा मृत्यु शरीर सुध्दा फार त्रास न होता स्वीकारतं अशी तिची खात्री होती.

आता आजी ऐशीला टेकली होती. पण मनाने वाकली नव्हती. हल्ली शरीर मात्र तिच्या दुर्दम्य इच्छा शक्तीला दाद देत नव्हतं.

एक दिवस सकाळी रोजनिशी लिहित बसलेली असताना ती अचानक जमिनीवर कोसळली…त्या आवाजाने मुलगा व सून धावत आले! त्यांनी क्षणभर विचार केला व तिला ॲंब्युलन्स बोलवून जवळच्या हॅास्पिटलला नेले.

डॉक्टरांनी त्वरीत उपचार करून अर्धांगापासून होणारे नुकसान थांबवण्याचा प्रयत्न केला तरी शरीराची उजवी बाजू पहिल्यासारखी होऊ शकली नाही.. जीव मात्र वाचला होता.

आजी शुद्धीवर आली व स्वत:ला नळ्या जोडलेल्या स्थितीत हॉस्पिटल मधल्या ICU मधे बघताच तिला हे स्वप्न असावं असं वाटलं. तिने स्वत:ला एक चिमटा काढला.. आणि हे स्वप्न नसून सत्य आहे याची तिला जाणीव झाली.

ती भडकली…

मुलगा येताच त्याला म्हणाली, “माझी काय इच्छा होती तुला माहित होतं.. पक्कं माहित होतं. माझ्या व ईश्वराच्या भेटीच्या आड येण्याचा अधिकार तुला कोणी दिला? ”

“अग आई, तू कशामुळे पडलीस हे तरी बघायला नको का? बघ उजवा हात नीट चालत नाही या व्यतिरिक्त तू ठणठणीत आहेस. ” मुलगा काकुळतीला येऊन बोलत होता. “आई, तुला वैद्यकिय उपचार दिले नसते तर तू कदाचित पूर्ण लुळी पांगळी झाली असतीस. त्याचा तुला किती त्रास झाला असता सांग बरं! ” मुलगा समजूत काढत होता.

आजी काही बोलली नाही. ती घरी आली पण घरी आलेली व्यक्ती आजीपेक्षा कुणी वेगळीच होती. रोजनिशी लिहिण्यासाठी हात वळत नव्हता.. प्रसादाचा शिरा अन् खमंग परतलेल्या बेसनाचे लाडू शेजारी पाजारी पाठवता येत नव्हते.. सुईत दोरा ओवता येत नव्हता आणि पोथी वाचण्याआधीच आसवं गळत होती.. तिच्यातलं चैतन्य हरपू लागलं होतं.. ती शुन्यात बघत अंथरुणात पडून रहात होती..

एक दिवस अशीच नैराश्यात पडून असताना तिनं खिडकीतून बाहेर बघितलं.. तीन पायावर चालणारा कुत्रा बघून तिला कौतुक वाटलं… फारसं उडता न येणारा एक पक्षी बागेत थोडं थोडं उडून चारा गोळा करत होता.. नातवानं त्याच्या फोनवर हात नसलेला माणूस पायाने लिहताना दाखवला…

स्वत:चं दु:ख कुरवाळत बसणाऱ्या मनाचा तिला राग आला. आपण कोणी न्यारे नाही! झाडाची फांदी तुटते, पक्षी उडू शकत नाही, कुत्र्याचा पाय तुटतो पण म्हणून ते काही निराश होऊन पडून रहात नाहीत. याच निसर्गाचा आपण एक भाग आहोत. शरीर नाशवंत आहेच! पण मी म्हणजे माझं शरीर नाही!

ती उठली व पूर्वीसारखी तयार झाली.. सुनेनं आश्चर्याने तिच्याकडे बघितलं..

तिनं रोजनिशीची वही घेतली.. डाव्या हातानं रोजनिशी लिहायचा प्रयत्न चालू केला. वेडीवाकडी लहान मुलासारखी लिहिलेली अक्षरे बघून मनापासून हसली.. तिनं ठरवलं की डाव्या हातानेच इतकं सुंदर लिहायचं की सर्वांनी बघत रहावं. एकदा मनाने घेतलं की शरीर पण साथ देऊ लागतं.. डाव्या हाताने परत एकदा श्रीगणेशा सुरू झाला.. जशी अक्षरं सुधारू लागली तशी तिच्या डोळ्यातील चमक वाढू वागली.

तिनं मुलाला जवळ बोलावलं.

“तुझं काही चुकलं नाही रे! माझी आई अशी पडली असती तर मी पण तिला लगेच डॅाक्टर कडेच नेलं असतं.. तू नाही आलास माझ्या व ईश्वराच्या मधे.. अजून ईश्वराला भेटायची वेळ आलेली नाही. रागाच्या भरात बोलले मी.. माफ कर मला! ” मुलाच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसत ती त्याला म्हणाली, “ज्या वयात उद्याची खात्री नाही त्या वयात सहा महिने मी नैराश्यात वाया घालवले! ”

तिनं वर्तमानपत्रात पाठवण्यासाठी लेख लिहायला घेतला..

मृत्युला सामोरं जाताना..

नुकतीच मी वर जाऊन दार ठोठावून आले आहे. परत आले म्हणून चार गोष्टी सांगते.. अर्धांगाचे निदान झाले आणि माझे मन भरकटले.

कसं मरण हवं असतं माणसाला? शांत, भीतीरहित, झोपेत, नकळत! डॉक्टर नको, हॉस्पिटल नको, नळ्या जोडलेल्या नकोत, व्हेंटिलेटर नको वगैरे लिहणं सोपं असतं.. पण खरी इमर्जन्सी जेव्हा उद्भवते तेव्हा आपण कुठलाच निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसतो.. अशा परिस्थितीत आपला ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीला पुढचे निर्णय घेण्यासाठी नेमा. तुमचं मन वाचणारी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी यासाठी हात पाय धड असताना सतत प्रयत्न करा. मुलगा, सून, नातवंड यांच्याशी अत्यंत विश्वासाचं नात आधीच निर्माण करा.

त्यानंतर मात्र जे घडेल तिच देवाची इच्छा होती हे समजून घ्या.. पण इतरांवर व स्वत:वर रागवण्यात वेळ घालवू नका..

शरीर नश्वर आहे. असेना का! शरीराला झाली इजा, मला नाही हे सतत स्वतःला सांगा.. तुम्ही म्हणजे तुमचे शरीर नाही. तुम्ही म्हणजे तुमची अर्धांगाने लुळी पडलेली बाजू नाही आणि तुम्ही म्हणजे तुमच्या व्याधी नाहीत हे समजून घ्यायचा प्रयत्न करत रहा.

जे त्याने दिले ते घ्यायचे व त्यातील सौंदर्य शोधायचं! मला कधी वाटले नव्हते की डाव्या हाताने मी लिहू शकेन.

आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं असतं.. राग, लोभ, हेवे दावे, मान-अपमान यात वाया घालवायचं नसतं!

काल मी तीन पायावर चालणारा कुत्रा बघितला. तो नाही हो रडत बसत. तो उठून अन्नाच्या शोधात हिंडत होता मग आपण आपल्या शरीराकडे बघून का रडत बसायचे?

आलेला दिवस आनंदात घालवा. सांभाळून रहा.

– तुमची आजी

तिनं पेन बंद केलं व सुनबाईला सांगितलं, “आज मी शिरा करते ग.. नैवेद्याला! जमेल मला डाव्या हाताने करायला!

 

लेखिका : ज्योती रानडे

प्रस्तुती :  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सगळंच काही वाईट नसतं…” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “सगळंच काही वाईट नसतं…” ☆ शीला पतकी 

काल परवा माझ्याकडे संस्थेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा फोन आला. त्यानी माझ्याकडे क्लार्क म्हणून संस्थेचा सगळा पसारा सांभाळला होता. बाई अत्यंत हुशार, बोलक्या, बुद्धीने काम करणाऱ्या आणि संस्थेबद्दल खूप अस्था! आता त्या पुणे मुक्कामी असतात.

त्यांचा मुलगा आहे तितकाच हुशार बारावीला बोर्डात आला आता अमेरिकेमध्ये आहे. बाई आणि त्यांचे मिस्टर यांची वर्षातन एकदा अमेरिका वारी असते. त्यांनी परवा सांगितलेला अनुभव…

 – – त्या म्हणाल्या, ” बाई मी मुंबई एअरपोर्टवर गेले.. तिकीट कलेक्ट करण्याच्या रांगेत उभारलो पासपोर्ट चेकिंगला दिले आणि चेक करणारा माणसाने आम्हाला सांगितले की जरा बाजूला येऊन थांबा… “त्या म्हणाल्या, ” माझ्या काळजाचा ठोका चुकला आता काय झाले? “साधी मध्यमवर्गीय माणसं असं काहीतरी झालं की घाबरणारच ना! त्या म्हणाल्या, पाच मिनिट माझा जीव वर खाली झाला त्या पस्तीस वर्षाच्या माणसाने आम्हाला बाजूला थांबून घेतले व पलीकडच्या रूम मध्ये नेऊन त्याने विचारले की आपण कुठे राहत होता त्यावर बाई म्हणाल्या मी सोलापुरात होते. तो म्हणाला मी तुम्हाला कुठेतरी पाहिले…? बाईंचा जीव थोडासा भांड्यात पडला…! त्या म्हणाल्या मी मोदीत राहत होते. तुम्हाला नाही मी तिथे नाही पाहिले मग त्या म्हणाल्या मी सेवा सदन संस्थेमध्ये बऱ्याचदा गेलेली आहे… कारण त्या आमच्या शाळेचे भांडार चालवत होत्या.. नाही माझा सेवा सदनशी काही संबंध नाही. मग त्या म्हणाल्या मी तडवळकर ट्रस्टमध्ये काम करत होते. मग बरोबर तिथेच मी तुम्हाला पाहिले तुम्ही पानसरे मॅडम आमचा फॉर्म तुम्ही भरला होता.

– – आणि मग तो भरभरून बोलू लागला. ” बाई तडवळकर ट्रस्ट मध्ये माझी दहावी झाली म्हणून आज मी या ठिकाणी आहे नाहीतर माझे काय झाले असते माहिती नाही आज मी या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करीत आहे माझ्या आयुष्याला एक चांगली कलाटणी मिळाली ती केवळ नापासांच्या शाळेमुळे शिकलो आज मी 10 कर्मचाऱ्या ंवरती काम करतो तुम्हाला भेटून मला खूप आनंद वाटला, सगळ्या पहिल्या गोष्टी आठवल्या खरंतर मला तुम्हाला चहा वगैरे देण्याची इच्छा आहे परंतु मला एवढा वेळ देता येत नाही” त्याने त्यांची तिकिटे पासपोर्ट वगैरे लगेच दिले.

बाईना इतका आनंद झाला.. की तडवळकर ट्रस्टचे विद्यार्थी आज यशस्वीरित्या आयुष्यामध्ये काहीतरी करत आहेत नापास मुलांना शिकवून काय करायचे? ते काय दिवे लावणार? अशा गोष्टी आमच्या कानावर यायच्या पण त्याकडे आम्ही सगळेच जण दुर्लक्ष करीत असू लोक म्हणायचे सुद्धा व नापास झालेले कुठे पास होत असतात का? पण आम्ही नेटाने ते काम 35 वर्षे चालू ठेवले आणि मग त्याची अशी सुमधुर फळ कुठे कुठे चाखायला मिळतात छान वाटतं आनंद होतो त्यांनी हा किस्सा माझ्याबरोबर शेअर केला आणि तो मी अभिमानाने तुमच्यासमोर मांडत आहे.

– – सगळंच वाईट नसतं सगळंच कधी संपत नसतं आपला विश्वास चांगुलपणावर हवा आणि त्या दिशेने काम करत राहायचं! देणार तो आहे तो काहीतरी चांगली फळे देतोच यावर श्रद्धा ठेवायची…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एन्जॉयग्राफी… ☆ नीला महाबळ गोडबोले ☆

नीला महाबळ गोडबोले

??

☆ एन्जॉयग्राफी… ☆ नीला महाबळ गोडबोले

” पोरींनो, सवडीला दीनानाथला ऍडमिट केलय काल दुपारी.. छातीत दुखत होतं म्हणे तिच्या.. ” 

शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर अप्पीचा मेसेज…

अप्पी सवडीच्या शेजारच्या अपार्टमेंटमधे रहात असल्याने तिला ही बातमी कळलेली..

आम्ही सगळ्या नर्व्हस झालो..

सगळ्याजणींनी पन्नाशी पार केलेली.. साठी दृष्टीपथात आलेली..

कुणाच्या रक्तात साखरेचा शिरकाव झालेला, कुणाचं रक्त विनाकारण उसळू लागलेलं, कुणाच्या डोळ्यांनी मोत्यालंकार धारण केलेले, कुणाच्या वेड्यावाकड्या दंतोजीपंतांच्या जागी आता ” कवळी” नामक कुंदकळ्यांची माळ विराजत असलेली…

कुणी जुन्या गुडघ्याला टाटा बायबाय करून नवीन गुडघोजींची स्थापना केलेली..

पण अजूनपर्यंत सगळ्यांची हृदयं तरूण आहेत, असा गोड गैरसमज होता… त्यामुळे ग्रुपचं नाव ” यंग हार्ट्स ” ठेवलेलं…

अन् म्हणूनच आजच्या या सवडीच्या बातमीनं सगळ्यांची काळीजं धडधडू लागलेली…

” सवडीला हृदयाचा त्रास होऊच कसा शकतो? “… हृदयविकार हा ताणतणावामुळे होतो”.. असा आपला आमचा समज..

आणि सवडीचा ताणतणावातल्या “त” शी दूरान्वयानेही संबंध नसलेला..

सवडी… म्हणजे कु. सविता

आमच्या बरोबरच तिने इयत्ता पाचवीत कन्या शाळेत प्रवेश केलेला..

सावळा रंग, कुरळे केस, जाडसर बांधा, चंद्रासारखा गोल गरगरीत चेहरा, तंद्री लागली की अचानक जोडीदाराशी फारकत घेऊन वेगळ्याच मार्गाने जाणारा उजवा डोळा आणि २४*७ चेह-याला धरून राहणारं दिलखुलास हास्य…

मुद्दामहून तिच्याशी मैत्री करावी असं तिच्यात काहीच नव्हतं… पण ती मात्रं सगळ्यांशी जवळीक करायची..

नाव सविता असलं तरी आम्ही सगळ्या तिला ” सवडी ” च म्हणायचो…

“हसणं” हा तिचा ट्रेडमार्क..

कुणी तिच्याशी भांडलं.. तिचा अपमान केला.. शिक्षक तिला रागावले.. तरी ती हसायचीच…

परीक्षेनंतर पेपर वाटपाच्या वेळी.. “सविता.. शंभरपैकी सात मार्क ” असं म्हणत जोशी सर तिच्या हातात पेपर द्यायचे तेंव्हाही ती तो घेऊन हसत हसत बाकावर जाऊन बसायची.. फक्त यावेळी दातांनी ओठ चावलेला असायचा…

परीक्षेच्या वेळी आम्ही सगळ्या पोरी पोतंभर टेन्शनमध्ये पुस्तकं वाचत असायचो.. ही मात्रं निवांत बसलेली.. मैदानातल्या कबुतरांकडं पहात..

” सवडे, अगं तुला परीक्षेचं टेन्शन येत नाही का गं? ” मी तिला विचारायचे.

” टेन्शन घ्यायचं नाही बघ कशाचच, एन्जॉय करायचं ” ती खळखळून हसायची..

शाळेचा पहिला दिवस. पाचवीचा आमचा वर्ग..

मुख्याध्यापक सर तासावर आलेले. त्यांच्या शिस्तीच्या, कडकपणाच्या कथा थोरल्या बहिणींकडून ऐकलेल्या. आम्ही सगळ्या पोरी टरकलेल्या. ओळखीचा कार्यक्रम सुरू झाला..

वर्षा विष्णु काळे

वैशाली अरूण फाटक

संगीता सखाराम कुलकर्णी

मंजुषा सुरेश महाजन

सुनिता विश्वंभर पाटील..

सुनितानं स्वत:चं नाव सांगितलं.. सरांच्या मनात काय आलं माहीत नाही..

” विश्वंभर हे नाव कुणाचं आहे, कोण सांगेल? “

सगळा वर्ग चिडिचूप..

” सर, मी सांगते.. ” सवडीचा हात वर..

” सांगा ” सरांचा करडा स्वर..

” सर.. विश्वंभर नाव आमच्या मावशीच्या चुलतदिराच्या पोराचं आहे. “

” अहो, कुणाचंं म्हणजे कुठल्या देवाचं? “

विष्णुचं नाव आहे हे.. ” सर डोक्याला हात लावत बोलले… तशी सवडी खदाखदा हसली… नि तिच्या पाठोपाठ सारा वर्ग..

एके दिवशी वर्गात सरस्वतीपूजन करायचं अचानक ठरलं. तयारी काहीच नव्हती.

बाजार शाळेच्याच बाहेर..

” सविता, हे पाच रुपये घे. फुलं आणि नारळ सोलून त्याच्या शेंड्या काढून आण.. ” बाईंनी सांगितलं.

पैसे घेऊन सवडी हसत हसत पळत गेली.

दहा मिनिटात हजर.. हातात पिशवी.

पूजा झाली. फुलं वाहिली..

बाई पिशवीतून नारळ काढू लागल्या.

हातात नारळाच्या फक्त शेंड्याच आल्या.

नारळ नव्हताच.

” सविता, नारळ कुठाय? “

” बाई, तुम्ही नारळ सोलून शेंड्या काढून आण म्हणून सांगितलत, मी शेंड्या काढून आणल्या.. सोललेला नारळ तिथेच ठेवला. ” सवडी तोंडावर हात धरून हसू लागली.

बाईंनी कपाळावर हात मारून घेतला..

सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा..

सवडी काय म्हणून या परीक्षेला बसली, हे तिला नि देवालाच ठाऊक..

परीक्षा केंद्रात नखशिखांत नटलेली सवडी तासभर आधी हजर होती.

” अगं, एवढी नटून का आलीस परीक्षेला? ” बाईंचा प्रश्न..

 

” काही नाही मज्जा, एन्जॉय करायची परीक्षा पण.. ” सवडीचं तत्त्वज्ञान ऐकून आमचे पालकही अवाक्..

गणिताचा पेपर… सवडी वीस मिनिटांत परीक्षाखोलीबाहेर…

शिक्षक, पालक झाडाखाली बसलेले..

” एवढ्या लवकर आलीस? “

” पेपर एकदम सोप्पा होता. सगळा सोडवून झाला. मग बसून काय करायचं? “

पेपर संपला. आम्ही सगळे रडत बाहेर… पेपर भयंकर अवघड. पाच-सात प्रश्न राहिलेले.

” ए, टेन्शन घ्यायचं नाही. एन्जॉय करायचं ” सवडीचा हसत हसत सल्ला…

दोन महिन्यांची रिझल्ट आला.

सवडीला तिन्ही विषयात प्रत्येकी पाच मार्क. शंभरपैकी.. तरी स्वारी जाम खूश..!!

” मला बघा कसे एकसारखे मार्क मिळाले तिन्ही विषयात.. अवघड असतय असं ” म्हणत सातमजली हास्य..

अन् आम्हाला स्कॉलरशिप मिळूनही नंबर जरा मागे गेला म्हणून आम्ही नाराज… तोंड पाडून…!!

चंद्रावर वातावरण कसं असतं?

 हे नववीच्या भुगोलाच्या परीक्षेतल्या

प्रश्नाचं उत्तर सवडीनं…

 

“चंद्रावर पाणी कमी असल्याने काटेरी झुडपं असतात. ससे मोठ्या संख्येनं असतात. “. वगैरे लिहून…

आणि

स्त्राच्या पेपरात…

“अन्न एनस मधून आत घेऊन इसोफॅगसमधून न पचलेलं अन्न बाहेर टाकलं जातं “… अशी एनस व इसोफॅगसच्या कामांची अदलाबदल केलेली भन्नाट उत्तरं लिहून… सा-या वर्गाला तासभर हसवलं होतं नि बरोबरीनं स्वत: हसली होती..

दहावीची परीक्षा झाली.

सुट्टीतच सवडीचं लग्न झाल्याचं कळलं..

शिक्षण, लग्न, मुलंबाळं, करीअर यात तीस वर्षे कशी गेली ते कळलच नाही..

ना कुणाची भेट ना कुणाची खबरबात…

एके दिवशी व्हॉट्स ऐप नामक जादुगारानं आम्हाला पुन्हा एकत्र आणलं..

त्यात सवडीही होती..

झूमवर एके दिवशी सगळ्या भेटलो..

सवडीचा संसार बराच पुढे गेला होता.

तिचा नवरा मोठा सरकारी अधिकारी होता. खूप पैसा मिळवला होता त्याने. पुण्यात मोठ्ठं नि अलिशान घर होतं. तिनं नव-याचा फोटो दाखवला. स्मार्ट नि हुशार दिसत होता.

” तुझ्यात काय पाहिलं गं त्यानं ” स्पष्टवक्त्या गीतानं विचारलं..

” अगं माझ्या हास्यावर भाळला तो.. ” तिचं हसत हसत उत्तर..

आता विषय मुलांवर आला…

” माझा थोरला मुलगा आय. टी. आय झालाय. अमेरिकेत असतो. नि मुलगी सी. ए. झाली. मुंबईत नोकरी करतेय. वीस लाखाचं पॅकेज आहे. ” इति सवडी…

“आय. टी. आय करून अमेरिकेत? “.. या विचारात असतानाच तिच्या शेजारी राहणारीअप्पी बोलली,

” ए बावळट, तुझ्या तेजसनं आय टी आय नाही, आय आय टी केलय.. पवईहून… “

” अगं आय आय टी काय अन् आय टी आय काय… चांगलं शिकला.. चांगला पगार आहे.. मस्त एन्जॉय करतोय.. झालं तर मग! “… सात मजली हास्य..

” तुझी दोन्ही पोरं एवढी शिकली, एवढी हुशार निघाली.. खूप कष्ट घेतले असशील नं तू त्यांच्यासाठी? काय काय केलंस? “.. आमचा प्रामाणिक प्रश्न..

” मी काही केलं नाही; हेच मोठं काम केलं. कधी त्यांच्या मागं लागले नाही अभ्यासासाठी. त्यांना पाहिजे ते करू दिलं. त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली होती..

टेन्शन घ्यायचं नाही.. निवांत रहायचं नि एन्जॉय करायचं.. नव-यावर गेलीत गं पोरं माझी.. हुशार.. अभ्यासू आहेत त्याच्यासारखी..!! “

… दाखवलं नाही तरी आम्हाला तिचा हेवा वाटला… आम्हा साऱ्या तथाकथित हुशार मुलींपेक्षा तिचा संसार जास्त यशस्वी होता…!!

एके दिवशी तिचे यजमान वारल्याची दु:खद बातमी आली… जेमतेम अठ्ठावन्न वय..

” हुशार, कर्तृत्त्ववान माणूस.. पण स्वभाव फार गंभीर… नुसता काम करत राहिला आमच्यासाठी. आयुष्य एन्जॉय केलं नाही आजिबात.. म्हणून इतक्या लवकर गेला.. ” आता मात्रं तिचे डोळे वहायचे थांबता थांबत नव्हते…

सहा महिन्यात बिचारी सावरली..

ट्रिप्सना जायचा सपाटा लावला…

नाटक, सिनेमा, गेट टुगेदर्स.. काही म्हणून सोडेना..

बरोबरच होतं.. एकटी कसे दिवस रेटणार होती?

” आता उरलेलं आयुष्य एकटीनं का होईना पण एन्जॉय करणार… ” तिचं स्पष्टीकरण..

अन् आज ही बातमी आली…

तिला हॉस्पिटलमधे हार्टच्या त्रासासाठी ऐडमिट केलेलं..

वाईट वाटत होतं…

दुसरे दिवशी तिला हॉस्पिटलमधे भेटायला जायचं ठरलं सगळ्यांनी मिळून…

रात्री बाराला व्हॉट्सएप मेसेजच्या नोटिफिकेशनची बेल वाजली..

एवढ्या रात्री ग्रुपवर मेसेज?

घाबरत ग्रुप उघडला…

सवडीचा मेसेज होता…

एन्जॉयग्राफी (enjoygraffy) झाली.

काही निघालं नाही. सगळं नॉर्मल..

उद्या घरी सोडतील..

घरीच या सगळ्याजणी..

मस्त एन्यॉय करू…

 

जिनं सगळं आयुष्य “एन्जॉय” या अजेंड्यावर निभावलं.. तिनं “अॅंजिओग्राफी” चं “एन्जॉयग्राफी” केलं तर काय नवल?

तिच्या त्या “एन्जॉयग्राफी” ला हसत नि एन्जॉय करत केंव्हा झोप लागली ते कळलच नाही…!!

 

©  नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.

भक्तीसूत्र ४८…

यः कर्मफलं त्यजति, कर्माणि संन्यस्यति, ततो निर्द्ंवद्वो भवति ॥४८॥

अर्थ : जो कर्मफलाचा त्याग करतो, सर्व कर्मांचाही त्याग करतो, त्यामुळे तो द्वंद्वरहित होतो, अर्थात मायेच्या पलिकडे जातो.

विवेचनमागील सूत्रात जो योगक्षेमाचाही त्याग करतो, जो निर्मम होतो, संगांचा त्याग करतो तो मायेतून तरून जातो असे सांगितले, या सूत्रात आणखी तीन साधने सांगतात. प्रथम कर्मफलत्याग सांगितला आहे. या साधनाचा मागील साधनाशी संबंध आहे. मानवप्राणी हा या जगात येतो तो कर्ता म्हणून येतो. कर्तृत्वाबरोबर येणारा दुसरा धर्म म्हणजे कर्मफलाचे भोक्तृत्व हा आहे. कोणीही जे कर्म करत असतो ते निष्फळ जावे म्हणून करीत नाही तर त्याचे फळ भोगावयास मिळावे याच हेतूने करीत असतो. यासच फलासक्ती म्हणतात. अशा आसक्तीने मानव कर्मे करतो. जर फल न मिळेल अथवा त्या फलाची आसक्ती नसेल तर कर्मे करण्याकडे प्रवृत्ती होणे कठीण आहे, हे जरी खरे आहे तरी जीव जो कर्मात अडकतो तो या फलासक्तीमुळेच. मी कर्ता हा अभिमान म्हणून मीच या कर्माचे फळ भोगावे ही आसक्ती, यासच कर्माचा बंध म्हणतात, असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात.

“तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥”

(ज्ञान. १८. २०५)

या फलासक्तीतूनच पुढे रागद्वेषादी विकार, अनुकूल-प्रतिकूल भावना, इत्यादी निर्माण होतात. त्यातल्या त्यात संसारी माणसाची सकाम कर्माकडे विशेष प्रवृत्ती होते ती आणखीही बंधनाला कारण होते. मनुष्याला जन्ममरण प्रवाहात वाहत जावे लागते त्याचे कारणही हे कर्मफळच आहे. याचा परिणाम असा होतो की मनुष्य असो वा साधक जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. आणि मिळणाऱ्या प्रत्येक नव्या जन्मात पुढील जन्माची बेगमी करतो.

माउली म्हणतात,

वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥

(ज्ञान. १७. ५८)

ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्याला फलासक्ती ठेवता येणार नाही. कारण तोही एक मायापरिणामच आहे. म्हणून विवेकी साधक हळूहळू मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरिता एक एक बंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच ‘कर्मफलंत्यजति’ याचा अंतर्भाव होतो.

कर्माचे चार प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य व प्रायश्चित्त. त्यांत साधकाने काम्य कर्मे करू नये असे सांगितले जाते. ज्ञात-अज्ञात पातकक्षालनाकरिता प्रायश्चित्त कर्मे करावीत व नित्यनैमित्तिक कर्मे न केली तर प्रत्यवाय आहे, म्हणून ती टाकू नयेत. अशा प्रकारे जर कर्मे करील तर तो कर्मत्यागीच मानला जाईल. मात्र ती कर्मे निरहंकार वृत्तीने कर्तृत्वमद व फलाशा टाकून करावीत. प्रारब्धाने आलेली किंवा आपली विहित कर्मे अवश्य करावीत. त्यांचा त्याग करणे उचित नाही असे माउली म्हणतात.

“जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे ।वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥”

(ज्ञा. ३. ६४/६५)

तीन प्रकारचा कर्मत्याग गीतेमध्ये सांगितला आहे.

१. वेद, ईश्वर, परलोक यावर विश्वास न ठेवणारा तमोगुणी पुरुष अविवेकाने जो विहित कर्माचा त्याग करतो तो तमोगुणी त्याग होतो.

२. शरीराला फार कष्ट होतात, दुःख होते या भीतीने जो कर्मत्याग केला जातो त्यास राजस त्याग म्हणतात

३. जो मनुष्य/साधक आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म कर्तृत्वमद व फलास्वादाची अभिलाषा टाकून करतो त्यास सात्त्विक त्याग म्हणतात.

कर्मत्यागाचे एक सोपे सूत्र सांगता येईल. एखाद्या कंपनीत मनुष्य नोकरी करत असतो. तेथील अधिकारी जे काम त्याला सांगतो, त्यानुसार तो मनुष्य ते काम करीत असतो. त्या कामातून होणाऱ्या लाभहानीकडे त्याचे फार लक्ष नसते. सांगितलेल्या कामात आपल्याकडून छोटीशीही चूक होऊ नये याची दक्षता तो मनुष्य घेत असतो. ते काम त्याने चोख केले की मालक/अधिकारी त्याला मासिक पगार देतो. आणि त्या व्यवसायात त्या मालकाला नफा झाला तर तो दिवाळीला भेटवस्तू (बोनस) पण देत असतो. इथे आपण भगवंताला आपले मालक करावे, त्याच्याकडे नोकरी करावी असे करता आले तर आपले काम अधिक सोपे होईल असे वाटते. संसारातील लाभ हानी स्वाभाविकपणे भगवंताची होईल. आपण त्यातून अलिप्त होऊ शकू. थोडक्यात मनुष्याने भगवंताच्या हातचे उपकरण बनून जावे. त्याला म्हणावं तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन. एकदा कर्तेपण भगवंताकडे दिले (अगदी मनापासून) की लाभहानी हा विषयच रहात नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच दाई सारखा करावा आणि परमार्थ आई सारखा करावा.

मायेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणिक एक त्याग करावा लागतो, त्याचा विचार पुढील सूत्रात पाहू.

जय जय रघुवीर समर्थ 

 – – 

भक्तिसूत्र ४९

वेदानपि संन्यसति, केवलमविच्छिन्नानुरागं लभते ॥ ४९ ॥

अर्थ : जो वेदांनी सांगितलेल्या विधिनिषेधात्मक कर्मसमूहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या उत्तरोत्तर वाढ शुद्ध, अखंड, एकरस प्रेमाचा लाभ होतो. अर्थात, तो मायेपासून मुक्त होतो.

विवेचनमागील सूत्रात कर्मफले व ती प्राप्त होण्याकरिता केली जाणारी विहित कर्मे यांचाही तो भक्त त्याग करतो असे सांगितले आहे.

वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांचे प्रामुख्याने चार अंगे आहेत. पहिले अंग आहे संहिता. दुसरे अंग आहे ब्राह्मण ग्रंथ आणि तिसरे आहे आरण्यके. चौथे आहे वेदांत.

संहितेमध्ये वेदकालीन देवतांचे मंत्र आले आहेत. ब्राह्मण ग्रंथात विविध यज्ञाबद्दल माहिती आलेली आहे तर तिसऱ्या भागात अर्थात आरण्यकात भगवंतासंबंधी चिंतन करून जे अनुभव घेतले, त्याचा उहापोह इथे आढळतो. चौथे आहे वेदांत, यात उपनिषदे येतात. या चारी अंगाचा अभ्यास अनेकांनी केला, पण वेदांचा अभ्यास केला, सर्व वेद तोंडपाठ केले म्हणून त्यांंना भगवंताची प्राप्ती झाली असे होत नाही. तर त्यातील मर्म लक्षात घेतले पाहिजे. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात की साधकांमध्ये एक दुर्गुण अवश्य येतो. त्याला परमार्थ छान बडबडता येतो. एक उदा. पाहू. चार धाम यात्रेला जाण्यासाठी एक जण रेल्वेचे तिकीट काढायला गेला. त्याने तिकीट काढले. त्या तिकीट देणाऱ्या माणसाने त्या मनुष्याला चार धाम यात्रेचे संपूर्ण वर्णन करून सांगितले. तसेच कुठे काय करावे? कुठे खरेदी करावी? कोणते हॉटेल स्वस्त आहे? धर्मशाळा कुठे आहेत? ते सर्व सांगितले. या मनुष्याने त्या तिकीट देणाऱ्या मनुष्याला सहज प्रश्न केला की तुम्ही बरेच वेळा यात्रा केलेली दिसते. तर तो तिकीट विकणारा म्हणाला मी एकदाही यात्रा केली नाही. लोकांनी सांगितलेल्या माहितीवरून मी हे सर्व तुम्हाला सांगू शकलो. नुसती माहिती झाली म्हणून उपयोग होत नाही.

वेदांचा, अभ्यास करून मनुष्य नुसती पोपटपंची करणार असेल, तर त्याचा काय उपयोग? त्यात अनुभूती असणे अत्यंत महत्वाचे. इथे तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो.

“वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।”

संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे.

“वेद अनंत अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावें ॥२॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुकाचि निर्धार ॥३॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हाचि होत ॥४॥”

कोणतेही तत्व नुसते पाठ करणे अपेक्षित नाही. तर त्याची अनुभूती घेतलेली असावी. तरच ते आपल्याला कळले असे होते. बाळ नीट चालायला शिकेपर्यंत पांगुळगाडा वापरतो. याच नियमाप्रमाणे ज्ञान प्राप्त करेपर्यंत ‘पांगुळगाडा’ वापरणे अपेक्षित आहे. आणि थोडे अधिक मोठे झाल्यावर त्या ‘पांगुळगाड्या’चा अभिमान न धरता त्याचा त्याग करणे अधिक उचित आहे. 

राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे रंग. अनु म्हणजे मागे जाणे, अथवा… ला शोभणे. भक्ताचे भगवंतावरील प्रेम वाढत जाते, तेव्हा त्याला प्रेमाचा रंग लागला असे म्हटले जाते. भक्त मिरेला कृष्ण भक्तीचा रंग लागला होता, असे म्हटले जाते. साधकाचे असेच व्हावे. *या प्रेमाला अनुराग असे म्हणतात. भिंतीला रंग लागला की आधीचे रंग संपूर्णपणे नष्ट होत असतात. अर्थात त्या साधकाच्या वासना निर्बीज होत असतात. 

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥२॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥३॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरीजना ॥४॥”

(अभंग क्रमांक ११५६, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

असे प्रेम प्रत्येकाला लाभावे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ईश्वर!” “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके

नायब सुबेदार ईश्वर सिंग 

‘ऑपरेशन ईश्वर! ‘

’भारतीय सैन्यावरची अनुभवसिद्ध ‘ईश्वर’कृपा!

“साब, आप परमिश्शन दें या मत दें… मैं तो जा रहा हूं उप्पर! आप भी पिच्चेछेसे आ जावो क्यूआर्टी लेक्कर! ये तीन तो हमने खतम कर दिये हैं… ओर सात मिलीटेन्ट हैं! ”

नायब सुबेदार ईश्वर सिंग यांनी हे शब्द असे काही उच्चारले की, त्यांच्यापेक्षा अधिकाराने मोठ्या पण वयाने लहान असलेल्या त्यांच्या साहेबांना त्यांचा तो हट्ट मान्य करावाच लागला!

वयाच्या अठराव्या वर्षात असताना सैन्यात शिपाई म्हणून भरती झालेला हा हरियानवी छोरा जणू आईच्या पोटातूनच सैन्यविद्या शिकून आलेला असावा! खाशी हरियानवी भरभक्कम शरीरयष्टी आणि थेट, रोखठोक परखड बोली. ताठ चाल आणि तिखट नजर… आणि जिद्दी पण निर्मळ स्वभाव! भारतीय फौजेची वर्दी परिधान करून नीडरपणे देशरक्षण करताना सेवेची पंधरा वर्षे अत्यंत धामधुमीत व्यतीत केलेला हा रांगडा गडी, शिपाई-लान्स नायक-नायक-हवालदार अशा पाया-या चढत चढत ‘नायब सुबेदार’ पदापर्यंत पोहोचला होता. पण एका वाक्यात सांगता येणारी ही वाटचाल अतिशय खडतर होती. ऑपरेशन ब्लू स्टार, भारतीय शांतीसेनेच्या श्रीलंकेतील ‘ऑपरेशन पवन’मध्ये अचूक निशानेबाज म्हणून ईश्वरसिंग यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. नागालॅंडमध्ये ते तेथील बंडखोरांशी लढून आलेले होते, पुढे सियाचीन ग्लेशियरवर त्यांनी यशस्वी पहारा दिला, एन. एस. जी. नॅशनल सिक्युरीटी गार्ड मध्ये त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तीनदा प्रोबेशन पूर्ण केले, यात सर्वोत्तम नेमबाज (best firer) म्हणून विशेष पारितोषिक पटकावले होते. (सेनेच्या विविध विभागातून निवडून निवडून घेतलेल्या एकूण प्रशिक्षणार्थी सैनिकांपैकी सुमारे ५० ते ८०% सैनिक प्रशिक्षण कालावधी पूर्ण करू शकत नाहीत… इतके हे प्रशिक्षण कठीण असते… एक प्रोबेशन पूर्ण करणे ही सुद्धा फार मोठी कामगिरी मानली जाते! ) तर ५, पॅराशूट रेजिमेंटमध्येही एक टर्म पूर्ण केली होती. कारगिल लढाईत शौर्य गाजवले होते… आणि हो… प्रत्येक शूर सैनिकाच्या सैनिकी जीवनातील अविभाज्य भाग म्हणजे जम्मू-कश्मीरमधील सेवा… ती ही घडली! “जिंदगी भर हमने फायरींग ही की है साब! ” असं जेंव्हा ईश्वर सिंग म्हणतात तेंव्हा त्यात जराशीही अतिशयोक्ती नसते… अचूक निशाणेबाजी हा त्यांच्या डाव्या हाताचा मळ जणू!

इतका प्रदीर्घ अनुभव घेतलेला सैनिक म्हणजे जणू कच्च्या लोहाचे पोलादात रुपांतर. अशा सैनिकास लष्करी भाषेत battle-hardened अशी संज्ञा आहे! आणि हे सैनिक सैन्याचा खड्गहस्त असतात! जनरल गिल साहेब, ब्रिगेडीअर करीअप्पा साहेब, मेजर युद्धवीर साहेब, कर्नल अभय साहेब इत्यादी मोठे लष्करी अधिकारी ईश्वर सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतात ते काही उगीच नव्हे!

२००१… ऑपरेशन रक्षक सुरु होते. कारगिलमधील उंचावरील काही टेकड्या ताब्यात घेण्याची मोहिम आखण्यात आली होती. ईश्वर सिंग यांची पलटण यावेळी नुकतीच सियाचीन मधून परतली होती. त्यांना या मोहिमेत घेण्यात आले. परंतु अमेरिकेत ९ सप्टेंबरचा अतिरेकी हल्ला झाला आणि त्यामुळे बहुदा ही योजना स्थगित करण्यात आली. मग या पलटणीच्या प्रमुखांनी काश्मीर खो-यात परत जाण्याऐवजी राजौरी ते पुंछ मार्ग सुरक्षित करण्यासाठीची जबाबदारी मागितली.. आणि त्यांना एल. के. जी. अर्थात लोअर कृष्णा घाटी भागात सेनेचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी रोड ओपनिंग पार्टीमध्ये काम करण्याचे कार्य सोपवले.

एका एका गटाला पाच पाच किलोमीटर्सचे काम विभागून देण्यात आले होते. ईश्वरसिंग यांच्या पुढे सुबेदार साहेबांचा एक गट कार्यरत होता. त्यांचे काम संपले की तिथून पुढे नायब सुबेदार ईश्वर सिंग साहेब यांच्या गटाला काम करायचे होते आणि निरोप येण्याच्या प्रतीक्षेत असतानाच त्यांच्या एका वरिष्ठाकडे, जे गुप्तवार्ता विभागात कार्यरत होते, त्यांच्याकडे एक स्थानिक माणूस आला. जिथे सुबेदार साहेबांचा गट काम करीत पोहोचला होता तिथल्या एका मोठ्या वळणावर एक नाला होता. त्या नाल्याच्या वरच्या बाजूला त्या व्यक्तीच्या भावाचे घर होते, आणि त्या घरात रात्रीपासून दहा पाकिस्तानी अतिरेकी जबरदस्तीने घुसून बसले होते. त्यांच्याकडे सहा एके-४७, एक पिका गन, दोन पिस्टलस आणि इतर काही दारुगोळा होता.

त्या भावाचा मुलगा सी. आर. पी. एफ. मधून सुट्टीवर आलेला असून त्याच्याकडे हत्यार नसल्याने त्याचाही नाईलाज झाला होता. त्या अतिरेक्यांकडे मोठी आधुनिक शस्त्रेही आहेत! ही खबर ईश्वर सिंग यांना दिली गेली… मग काय… साहेबांचे बाहू फुराफुरले! एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने अतिरेकी हाती लागण्याची शक्यता होती… ही संधी सोडता कामा नये! पण त्यांनी खबर घेऊन आलेल्या त्या माणसाची उलटतपासणी घेतली… कारण दोनच दिवसांपूर्वी त्या भागात एक मोठे अधिकारी शोध घेऊन रिकाम्या हाती परतले होते… पण त्या माणसाने शपथेवर सांगितले की खबर पक्की आहे! यावर ईश्वर सिंग यांनी त्यांचे वरिष्ठ अधिका-याला परवानगी विचारली… आणि मी पुढे जातो… तुमच्याकडचे वीस जवान घेऊन तुम्ही मागून मदतीला या! असेही सांगायला ते विसरले नाहीत!

आणि मग दहा जवान सोबत घेऊन ईश्वर सिंग निघाले… त्या खबर देणा-या माणसाला सोबत घेतले होतेच… त्या घरापासून हे पथक काही मीटर्सवर असताना त्यांनी वर पाहिले तर एका झाडाजवळ एक व्यक्ती अंगावर घोंगडी पांघरून उभी होती… त्या अतिरेक्यांनी त्याच घरातल्या वृद्ध व्यक्तीला दमदाटी करून पहा-यावर उभे केले होते! आता ते अतिरेकी तिथून निश्चित पळून वरच्या बाजूला जाणार हे ईश्वर सिंग साहेबांनी ताडले. यांनी दुस-या बाजूने अधिक वर जाऊन वरून खाली खाली येत अतिरेक्यांचा शोध घेण्याची योजना आखली. काही वेळातच ते त्या घराजवळ पोहोचले… तर त्या घरात फक्त एक महिला आणि ती वृद्ध व्यक्ती होती. घरात पाकिस्तानातील कराची येथे बनलेली बिस्कुटसची पाकिटे दिसली… यावरून ते निश्चित पाकिस्तानीच होते, याची खात्री पटली. ईश्वर सिंग यांनी ती पाकिटे आणि त्यांच्या काही चीजवस्तू पुरावा म्हणून जप्त केल्या. तोवर त्यांचे वरिष्ठ अधिकारी वीस सैनिकांचे पथक घेऊन तिथवर पोहोचले! आता काही योजना आखणे गरजेचे होते. घरातल्या महिलेने सांगितले की अतिरेकी तिच्या नव-याला, जो सी. आर. पी. एफ. मधून सुट्टीवर घरी आला होता, त्याला वाटाड्या म्हणून जबरदस्तीने सोबत घेऊन गेले आहेत. पथक त्या दिशेने चालू लागले. काही अंतर जाताच समोरच्या एका उतारावरून एक व्यक्ती आणि तिच्यासोबत एक लहान मुलगी खाली उतरताना दिसली. साहेबांनी त्या व्यक्तीला ती दहा माणसं पाहिली का? असे विचारताच त्या व्यक्तीने काहीही सांगितले नाही.. पण त्या लहानग्या मुलीने मात्र लगेच सांगितले… आणि दिशाही दाखवली! ती व्यक्ती म्हणजे त्या भागात राहणारे एक शासकीय सेवेत असलेले शिक्षक होते!

आता पुढे जाऊन शोध घेण्यात फार अर्थ नव्हता, म्हणून हे पथक विश्रांतीसाठी थांबले. सोबतच्या वरिष्ठ अधिका-याने त्यांच्या त्या भागातल्या इतर पथकांना ही खबर दिली. त्यानुसार त्या वरच्या भागात ठिकठिकाणी शोध पथके रवाना करण्यात आली. ईश्वर सिंग यांना काही गप्प बसवेना. ते म्हणाले… आता इथवर आलोच आहे आणि आर. ओ. पी. चे कामही करायचेच होते तर इथून पुढे ते काम करून येतो. दहा जवान होते.. त्यांतील पाच जण त्या जागी विविध ठिकाणी पेरून बसवले आणि इतरांसोबत रोड ओपनिंग चे काम करावे असे ठरले. रात्र झाली… उजाडले… सोबत आणलेल्या पुरी-भाजी खाऊन जवान ताजेतवाने झाले!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मान्यतेचे व्यसन” – लेखक  : अज्ञात  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मान्यतेचे व्यसन” – लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

Validation Addiction — मान्यतेचं व्यसन

ती नवीन साडी नेसली.

फोटो काढला. स्टेटस टाकलं.

दर ५ मिनिटांनी फोन उघडून बघते..

किती views? किती replies?

 

त्याने नवीन प्रोजेक्ट पूर्ण केला.

घरी येऊन शांत बसला.

पण ऑफिसमध्ये कोणी “well done” म्हटलं नाही म्हणून रात्रभर त्याचा mood off.

 

लहान मुलगा चित्र काढतो.

आई म्हणते, “छान आहे. ”

तो लगेच विचारतो — “खरंच? की फक्त बोलतेस? ”

 

ही सगळी एकच गोष्ट आहे —

Validation Addiction.

 

Validation म्हणजे काय?

इतरांनी आपल्याला मान्यता देणं.

आपण चांगले आहोत, सुंदर आहोत, यशस्वी आहोत —

हे बाहेरून ऐकायची गरज.

 

मान्यता हवी असणं नैसर्गिक आहे.

पण जेव्हा आपली किंमत फक्त वारंवार इतरांच्या शब्दांवर अवलंबून होते —

तेव्हा ती सवय व्यसन बनते.

 

आजची पिढी दुखावलेली नाही…

ती approval वर जगायला शिकली आहे.

 

Like कमी आले तर mood off.

Partner ने appreciate केलं नाही तर insecurity.

Boss ने कौतुक केलं नाही तर self-doubt.

 

आपण इतके बाहेरच्या टाळ्यांवर अवलंबून झालो आहोत की आतला आवाज ऐकणं विसरलो आहोत.

 

Validation Addiction ची मोठी समस्या काय?

ती आपल्याला कायम भुकेलं ठेवते.

 

आज १० लोकांनी कौतुक केलं तर छान वाटतं.

उद्या ८ लोकांनी केलं तर कमी वाटतं.

परवा ५ लोकांनी केलं तर दुःख होतं.

 

कारण व्यसन वाढत जातं.

 

मानसिक आरोग्यासाठी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे —

स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेत शोधणं.

 

जर तुमचा आत्मविश्वास

like, comment, appreciation, promotion

यावर उभा असेल —

तर तो कायम हलणार.

 

खरी ताकद कुठे आहे?

Self-validation मध्ये.

 

स्वतःला विचारणं —

मी माझ्या मूल्यांनुसार वागलो का?

मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला का?

मी स्वतःच्या नजरेत ठीक आहे का?

 

जर उत्तर “हो” असेल,

तर बाहेरचं कौतुक बोनस आहे…

गरज नाही.

 

Validation Addiction मध्ये माणूस लोकांना खूश ठेवतो.

Self-respect मध्ये माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो.

 

आज depression चं एक मोठं मूळ म्हणजे आपण स्वतःला स्वतः मान्यता देत नाही. आपण स्वतःला टाळ्या देत नाही.

आपण स्वतःला “मी पुरेसा आहे” असं म्हणत नाही.

 

लक्षात ठेवा —

जगाचं approval बदलत राहील.

तुमची किंमत बदलत नाही.

 

मनाची मोठी सवय म्हणजे —

टाळ्यांची वाट पाहू नका…

स्वतःला शांतपणे मान्यता द्या.

 

कारण जेव्हा आत्मसन्मान आतून उभा राहतो,

तेव्हा बाहेरच्या टाळ्या फक्त आवाज असतात.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # ४०२ ☆ आलेख – “डॉ धर्मवीर भारती की रचनाओं में व्यंग्य दृष्टि” ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # ४०२ ☆

?  आलेख – डॉ धर्मवीर भारती की रचनाओं में व्यंग्य दृष्टि ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

 धर्मवीर भारती के लेखन में व्यंग्य उनकी संवेदना के भीतर घुली हुई वह कसक है जो करुणा, नैतिक बेचैनी और उनके लेखन में ऐतिहासिक दृष्टि के साथ मिलकर प्रकट होती है। वे हँसाने वाले व्यंग्यकार नहीं हैं बल्कि मुस्कान के भीतर छिपी हुई पीड़ा दिखाने वाले रचनाकार हैं। उनके नाटक , उपन्यास , कविता में व्यंग्य पात्रों की सहज अभिव्यक्ति से पाठक की अंतरात्मा को कुरेदता है।

उनका काव्य नाटक अंधा युग इसका सबसे सशक्त उदाहरण है। महाभारत के युद्ध के बाद की कथा के माध्यम से उन्होंने आधुनिक मनुष्य के नैतिक अंधेरे,  सत्ता की क्रूरता और विजेताओं की खोखली विजय पर ऐसा व्यंग्य किया है जो सीधे किसी व्यक्ति पर नहीं पूरी सभ्यता पर लक्षित है। उनके ये प्रयोग किसी नितांत व्यंग्य का टैग लगाए आज की कई  रचनाओं से अधिक प्रभावी हैं ।

उनकी अभिव्यक्ति में धृतराष्ट्र का अंधापन केवल शारीरिक नहीं रह जाता वह सत्ता में बैठे हर उस व्यक्ति का प्रतीक बन जाता है जो सच जानते हुए भी उसे देखना नहीं चाहता। उदाहरण स्वरूप नाटक में धृतराष्ट्र का संवाद “मैंने कुछ नहीं देखा कुछ नहीं सुना” आधुनिक शासकों की जानबूझकर की अज्ञानता पर तीखा व्यंग्य है जो युद्ध की विभीषिका को नजर अंदाज कर सत्ता की भूलभुलैया में भटकते हैं। गांधारी का क्षोभ और अश्वत्थामा का अंध प्रतिशोध आधुनिक राजनीतिक वर्गों की मानसिकता को उघाड़ते हैं जहाँ एक अन्य पंक्ति “विजय तो हुई पर मनुष्य कहाँ बचा” विजेताओं के खोखले दंभ पर प्रहार करती है।

उनके उपन्यास गुनाहों का देवता में भी व्यंग्य सामाजिक संरचनाओं पर है। स्वयं उपन्यास के नाम में ही व्यंग्य का कंट्रास्ट दिखता है। यह कृति प्रेमकथा का उपन्यास  मानी जाती है किन्तु, इसमें व्यंग्य अंतर्निहित है। प्रेम के नाम पर त्याग का महिमामंडन करने वाला समाज स्वयं प्रेम से डरता है। चंदर और सुधा के संबंधों की विवशताएँ पाठक को द्रवित करती हैं पर साथ ही यह प्रश्न भी उठाती हैं कि क्या हमारी नैतिकता वास्तव में मानवीय है या केवल सामाजिक सुविधा है। एक उदाहरण है चंदर का वह अंतर्मन जहाँ वह सोचता है “प्रेम तो देवत्व है पर समाज इसे गुनाह बना देता है” जो प्रेम को पवित्र बताकर त्याग थोपने वाली सामाजिक मान्यताओं पर सूक्ष्म व्यंग्य है। दूसरा उदाहरण सुधा का विवाह बिंदु है जहाँ प्रेम का बलिदान सामाजिक सम्मान के नाम पर मजबूर किया जाता है यह दर्शाते हुए कि हिन्दू समाज नारी को देवी बनाकर उसी के गुनाहों का देवता कैसे थोप देता है। यहाँ व्यंग्य खुलकर नहीं बोलता बल्कि परिस्थितियों की विडंबना में स्वतः उभरता है।

डॉ भारती की कविताओं विशेषकर कनुप्रिया में भी पारंपरिक प्रेम आख्यानों पर एक सूक्ष्म पुनर्पाठ दिखाई देता है। राधा का स्वर कहीं कहीं उस पुरुष केंद्रित मिथकीय संरचना पर प्रश्न करता हुआ प्रतीत होता है जिसने स्त्री को प्रतीक्षा और विरह की मूर्ति बनाकर स्थापित किया। कनुप्रिया नारी के अंतर्मन की परतें खोलती है जहाँ सुख के क्षणों में घिर आने वाली निर्व्याख्या उदासी और विप्र लब्धा रस की पीड़ा को सौंदर्यपूर्ण ढंग से व्यक्त करती है। यह व्यंग्य आक्रामक नहीं आत्म संवादी है। ठंडा लोहा संग्रह में शहर की उदासीनता अकेलेपन और मूल्य क्षय पर प्रतीकात्मक व्यंग्य है । जैसे मेरी दुखती हुई रगों पर ठंडा लोहा रखना उस व्यवस्था का प्रतीक है जो संवेदनशीलता पर कठोरता चढ़ाती है ।

पत्रकार और संपादक के रूप में जब वे धर्मयुग का संचालन कर रहे थे तब उनके संपादकीय लेखों में सामाजिक और राजनीतिक विसंगतियों पर संयत किन्तु तीक्ष्ण टिप्पणी मिलती है। वे शोर नहीं मचाते पर शब्दों के बीच ऐसी रिक्ति छोड़ते हैं जहाँ पाठक स्वयं व्यवस्था की विडंबना पहचान लेता है। धर्मयुग के माध्यम से उन्होंने नई पीढ़ी को विसंगति पहचानने की संवेदना दी।

उनके व्यंग्य की सबसे बड़ी विशेषता यही है कि वह व्यक्ति विरोधी नहीं स्थिति विरोधी है। उसमें क्रोध कम नैतिक पीड़ा अधिक है। वे उपहास नहीं करते बल्कि यह दिखाते हैं कि मनुष्य अपनी ही बनाई संरचनाओं में कैसे फँस गया है। इसलिए उनका व्यंग्य समय के साथ पुराना नहीं पड़ता क्योंकि वह किसी घटना पर नहीं मनुष्य की प्रवृत्ति पर केंद्रित है।

धर्मवीर भारती को पढ़ते हुए लगता है कि व्यंग्य तब सबसे प्रभावी होता है जब वह हँसी पैदा न करे बल्कि भीतर एक असुविधाजनक चुप्पी छोड़ जाए। वही चुप्पी उनकी रचनाओं की वास्तविक शक्ति है और वही उन्हें केवल साहित्यकार नहीं अपने समय का आत्मद्रष्टा बनाती है।

एक प्रसंग डॉ पुष्पा भारती के संस्मरण पढ़ने में मिला, रागदरबारी का प्रारंभिक लेखन श्रीलाल शुक्ल जी ने डॉ धर्मवीर भारती के मुंबई के जुहू वाले समुद्र किनारे के फ्लैट में ही किया था।

पुष्पा जी ने लिखा है, “मुंबई शहर के छोर पर महासागर से अभिप्रेरित ही रागदरबारी की पहली पंक्तियां हैं – महानगर के छोर से ही भारत में देहात का महासागर प्रारंभ हो जाता है…

तो जिन धर्मवीर भारती जी के घर में ही व्यंग्य का राग दरबार उपजा हो , उनके लेखन में व्यंग्य  स्वाभाविक रूप से घुला होना स्वाभाविक ही है।

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares