मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- पुढं जे काही घडलं ते सगळं आपसूकच घडत जावं तसंच आणि कधी कल्पनाही केली नव्हती असं एक अनपेक्षित वळण येताच मी थबकलो. इथं वळायचं की आहे त्याच मार्गाने पुढं जायचं या माझ्या क्षणकाळाच्या द्विधा मन:स्थितीत ‘तो’ स्वतःशीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी… माझ्याजवळ! कारण पुढे जे घडत गेलं ते प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं असंच सगळं..!! )

स्वेच्छानिवृत्ती घ्यायचा माझा अट्टाहास नव्हता, पण आयुष्यात क्वचितच येणारी एकमेव संधी या दृष्टीने मी त्याकडे पहात होतो. या योजनेच्या अतिरिक्त आर्थिक मोहात न पडता, मिळू शकणारे ते लाभ माझ्या सर्व जबाबदाऱ्या विनासायास पार पडण्यासाठी पुरेसे आहेत कां याचाच विचार करणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे होते. सलिल आणि आरतीने जेव्हा नि:शंकपणे संमती दर्शवली त्यानंतर माझ्या विचारांना या दिशेने चालना मिळाली आणि मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक असल्याने मी हे कितपत फायदेशीर ठरेल हे पहायला सुरूवात केली.

या योजनेतील वरवर जाणवणारे मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येकाच्या शिल्लक राहिलेल्या नोकरीच्या मुदतीच्या अर्ध्या कालावधीचा पूर्ण पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता. या हिशोबाने माझ्या उर्वरित नऊ वर्षांच्या कार्यकाळाच्या निम्म्या म्हणजे साडेचार वर्षांच्या पगाराची रक्कम अतिरिक्त लाभ म्हणून मला मिळणार होती. त्या रकमेचे मासिक व्याज माझ्या त्यावेळेच्या पगारापेक्षा थोडे जास्तच येत होते. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार केला तर मला ते सोयीचे आणि पुरून उरणारेच होते. शिवाय माझे घरापासून लांब, एकटा राहिल्याने होणारे अतिरिक्त सर्व खर्च जे दरमहा माझ्या पगाराच्या निम्म्या रकमेइतके होते ते वाचणार होते. शिवाय नोकरीतल्या जबाबदाऱ्यांची कायम मनात असणारी व्यवधानं आणि दडपणं नाहिशी होणार होती आणि त्यासाठी द्यावा लागणारा रोजचा दहा- बारा तासांचा वेळ हा माझ्यासाठी पूर्ण मला हवा तसा व्यतित करण्यासाठी मोकळा मिळणार होता जे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं होतं!

असे सगळेच घटक निदान माझ्यापुरते तरी सर्वार्थाने सोयीचे होते तसेच फायद्याचेही! नकारात्मक म्हणता येईल अशी एकच गोष्ट होती ती म्हणजे बॅंकांमधे पूर्वी पेन्शन योजना आस्तित्त्वात नव्हती. तरीही सुरुवातीपासूनच आपला जॉब पेन्शनेबल नाही हे गृहित धरूनच मी माझे आर्थिक नियोजन केलेले होते. त्यानंतर १९९६ मधे सर्वप्रथम पेन्शन योजना बँकांसाठी लागू करण्यात आली होती. ती ऐच्छिक होती. त्यामुळे ती स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय अर्थातच खुला होता. आणि त्या वेळच्या हिशोबानुसार पेन्शन पर्याय न स्विकारता बऱ्याच जणांनी आणि मीही पीएफ् चा पर्यायच स्वीकारला होता. अर्थात पेन्शन नसणे हा योग्य अशा आर्थिक नियोजनामुळे माझ्यासाठी तरी तसा गौण मुद्दा होता. अर्थात स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर उच्चाधिकार पदांवरील बऱ्याच जागा रिक्त होणार असल्याने मागे राहिलेल्यांसाठी पुढच्या प्रमोशनच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होणार होत्या हे खरे, पण त्यामुळे वाढणाऱ्या अधिकारांबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि मला हव्यास नसणाऱ्या अॅमिनीटीज् भरपूर पण टॅक्सेशनचा विचार करता मिळणारे आर्थिक लाभ मात्र तुलनेने अतिशय नगण्य ही वस्तुस्थिती होती.

अर्थात इतर बऱ्याच जणांना या ना त्या कारणाने या योजनेचा फायदा घेता येणार नव्हता त्यामुळे त्याचे शल्य मनात घेऊनच उर्वरित काळ इच्छा नसूनही त्यांना शेवटपर्यंत नोकरी करणं क्रमप्राप्त होतं!

अशा रीतीने या सर्व बाबींचा विचार करून नोकरी चालू ठेवणे अधिक तोट्याचे आणि गैरसोयीचे होते याची खात्री झाल्यानंतर मी

स्वेच्छानिवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करायचे निश्चित केले. घरी आई, आरती आणि सलिल यांना यासंदर्भातल्या सर्व हिशोबांची आणि माझ्या नियोजनाची सविस्तर कल्पना देऊन त्यांचे समाधान झाल्यानंतर माझा अर्ज तयार केला. तरीही तो सबमिट करण्यापूर्वी वखरे साहेबांना माझ्या निर्णयाची पूर्वकल्पना देणे मला आवश्यक वाटले. मी माझा अर्ज सोबत घेऊन साहेबांच्या केबिनमधे गेलो पण त्यामुळे माझ्या या संकल्पात अडसर निर्माण होऊ पहातोय याची मला कल्पना कुठं होती?

मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी मला बसायची खूण केली. मी त्यांचं बोलणं संपायची वाट पहात बसलो खरा पण फोन महत्त्वाचा होता हे वखरे साहेबांच्या अदबीने बोलण्यावरून आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरून माझ्या लक्षात आले. आपण नंतर यावे असा विचार करून मी खुर्ची मागे सरकवून उठलो तेवढ्यांत त्यांनी बसायची खूण केली. पुढे कांही मिनिटातच फोनवरचं बोलणं संपलं तसं रिसिव्हर ठेवून ते क्षणभर शांत बसून राहिले आणि मग माझ्याकडे पहात सहज विचारल्यासारखं म्हणाले,

“फोन कुणाचा होता सांगा बरं…? “

“सेंट्रल ऑफिस? “

“एम्. डी. हिमसेल्फ वाॅज आॅन द लाईन… ” पाण्याचा ग्लास हातात घेत त्यांनी सांगितलं.

“कां? .. कांही प्राॅब्लेम..? “

“आपल्या ऑफिसपुरता तरी काही प्रश्न नसणाराय हे नशीब माझं. ” ते कांहीसे रिलॅक्स होत म्हणाले.

“म्हणजे? ” मला कांही अंदाजच येईना.

” आपल्याला डिपॉझिट, ॲडव्हान्सेस, रिकव्हरी.. अशी डोईजड टार्गेट्स दिली जातात ना नेहमी? आताही त्यांनी एक वेगळंच टार्गेट दिलंय. आश्चर्य म्हणजे ते ‘निगेटीव्ह टार्गेट’ आहे. पण ठीक आहे. फार टेन्शन घ्यावं असं कांही नाहीय. “

“निगेटिव्ह टार्गेट? म्हणजे? “

ते हसले.

“नुकत्याच आलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेच्या सर्क्युलरच्या संबंधातलं टार्गेट.. “

“म्हणजे? “

अतिरिक्त स्टाफची संख्या कमी करण्यासाठी ही योजना तयार केलेली असली तरी त्यामागे अनप्राॅडक्टीव्ह स्टाफसंख्या कमी करण्याचा प्रमुख उद्देश आहे. तरीही कायदेशीर आक्षेप घेतले जाऊ नयेत म्हणूनच केवळ ती सरसकट सर्वांसाठी खुली ठेवली गेलीय हे मला माहित होतं पण..

” पण यासंदर्भातलं ‘निगेटिव्ह टार्गेट’ म्हणजे काय ते नाही समजलं.. ” मी साहेबांना माझी शंका विचारली.

” त्या संदर्भातच सगळं फोनवर ऐकवून झालंय” ते हसत म्हणाले, ” त्याचं काय आहे, नुकत्याच झालेल्या एक्झिक्युटिव्ह प्रमोशन प्रोसेसमधले रिसेण्ट प्रमोटीज् आहेत ना तुमच्यासारखे ते बॅंकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अॅसेटस् आहेत. त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यापासून परावृत्त करण्याची सूचना एम्. डी. नी आम्हा सर्व झोनल हेडस् ना दिलीय. त्यापैकी कुणीही ही स्वेच्छानिवृत्ती स्विकारू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. या अर्थाने आपल्या झोनसाठी मला दिलं गेलेलं हे ‘निगेटिव्ह टार्गेट’च ना? “

वखरे साहेबांचं बोलणं त्यांच्या नकळत माझ्या निर्णयात मोठ्ठा अडसर निर्माण करणारं होतं. माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायलाच मी आलेलो असताना नेमका त्यातच हा अडसर निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तो अर्ज आत्ताच देणं मला योग्य वाटेना. न द्यावा तर मी इथे कां आलो होतो हा प्रश्न निर्माण होणार होताच. मनातली ही अनिश्चितता मनात तशीच घेऊन मी जायला उठलो..

“अरे, बसा ना, बोला, तुम्ही कां आला होतात? ” वखरे साहेबांनी विचारलंच.

आता मात्र खरं कारण सांगणं मला अवघड वाटेना….

” मी स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं ठरवलंय. ते सांगायलाच मी आलो होतो. ” मी मोकळेपणानं सांगून टाकलं.

ते अविश्वासाने पहातंच राहिले.

” तुम्ही आणि स्वेच्छानिवृत्ती? चेष्टा करताय कां माझी? ” त्यांचा आवाज थोडा चढल्या सारखा वाटला.

“नाही सर. खरंच सांगतोय. ” मी म्हंटलं, आणि सोबत आणलेला माझा अर्ज मी त्यांच्यासमोर ठेवला.

त्यांनी तो हातात घेऊन त्यावरून झरझर नजर फिरवताना त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मला अस्वस्थ करीत राहिले. तो अर्ज घडी घालून मला परत देत ते म्हणाले,

” हा सध्या तुमच्या जवळच राहू दे. यू प्लीज गिव्ह सेकंड थाॅट टू युवर डिसिजन. आपण यावर सविस्तर बोलू नंतर. मग ठरवू काय करायचं ते. ” ते शांत पण ठाम स्वरात म्हणाले.

त्यांचं म्हणणं मला स्विकारता येईना न् डावलताही.

” ठीक आहे. आपण बोलू नंतर ” असं म्हणत त्यांनी पुढे केलेला तो अर्ज मुकाट्याने परत घेऊन मी केबिनमधून बाहेर आलो.

जे सुरळीत पार पडणार हे मी गृहितच धरलं होतं ते गृहितच असं चुकीचं ठरलं होतं. त्यामुळं जे सहजसाध्य वाटत होतं तेच अप्राप्य ठरत असल्याचं लक्षात येताच माझी चलबिचल सुरू झाली. जे घडेल ते आपल्या हिताचंच असेल हा विश्वास मनात असूनही आपल्या हक्काचं कांहीतरी नाकारलं जातं असल्याची रूखरूख माझं मन अस्वस्थ करीत राहिली.

आता यातून अखेर काय निष्पन्न होणार हे नेहमीप्रमाणे अखेर ‘तो’च तर ठरवणार होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(सदानंद गेल्यावर लीना व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर टेकली. आत्यानंदाने तिचं हृदय धडधडत होतं. सदानंदने सही केलेल्या फॉर्मवर परत एकदा नजर फिरवत तिने मनात म्हटलं ॓ थँक गॉड. अखेर जिंकले मी आयुष्याचा डाव. आपल्या हुशारीला, चलाखीला नशिबाने साथ दिली. आता जन्मभराची काळजी मिटली झोपाळ्याला हलकी गती देऊन लीना आठवणींच्या झुल्यावर रमून गेली …) 

इथून पुढे – – 

नीरज एमिलीची जवळीक वाढल्याने आपल्याला स्वतःच्या भविष्याची चिंता पडली होती. नशिबाने अशाच एका पार्टीत सदानंदची ओळख झाली. भारतात स्वतःचा छोटा व्यवसाय असलेला सदानंद काही कामानिमित्त त्याच्या मित्राकडे अमेरिकेत आला होता गप्पांमधून कळलं की बराच काळ आजारी असलेली त्याची पत्नी नुकतीच त्याला सोडून गेली होती. श्रीधर आणि रमा या त्यांच्या मुलांना त्याने बारावीनंतर अमेरिकेतच शिकायला ठेवलं होतं. रुबाबदार पण मनाने थोडा खचलेला सदानंद आपल्या सहानुभूतीच्या शब्दांनी जरा मोकळा झाला. फोन नंबर्सची देवाण-घेवाण झाली. आता हा चान्स अजिबात सोडायचा नाही असा निश्चय करून आपण त्याला एका निवांत हॉटेलला जेवणाचं निमंत्रण दिलं. बोलता बोलता डोळ्यात पाणी आणून आपण नीरजबरोबर लग्न करून कसं फसलो ते सांगितलं. आता ही मायावी अमेरिका नको वाटते. भारतात येऊन आधीचं सगळं विसरून शांत आयुष्य जगण्याची आपली इच्छाही त्याच्या कानावर घातली.

– – – 

सदानंद भारतात परतला तरी फोनवरून आपण त्याच्याशी सतत संपर्क ठेवला. बायकोच्या प्रदीर्घ आजाराने कंटाळलेल्या सदानंदलाही त्याच्या पोझिशनला शोभेशी, उच्चभ्रू समाजात वावरणारी कम्पॅनियन हवी होतीच. महिनाभरात तो अमेरिकेला परत आला.

नीरजलाही आपण दुसरं काही जमविण्याचा प्रयत्न करीत आहोत याचा अंदाज आला होता. त्याच्या मार्गातला अडथळा विनासायास दूर होतोय म्हणून तोही आपल्या वागण्याकडे दुर्लक्ष करीत होता. आपण नीरज बरोबरचे कायदेशीर व्यवहार पूर्ण केले. घटस्फोट घेतला आणि सदानंद बरोबर रजिस्टर लग्न करून तिथे छोटीशी पार्टी देऊन भारतात परतलो.

अमेरिका सोडण्याच्या आधी सदानंद च्या दोन्ही मुलांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांना सांगितलं मी तुमच्याशी आईच्याच नात्यानं वागणार आहे. प्लीज तुम्ही मला आणि तुमच्या बाबांना समजून घ्या. सुट्टीमध्ये घरी या आम्ही तुमची वाट पाहू. त्या बुजलेल्या मुलांची थोडी समजूत काढून निरोप घेतला तेंव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरंगत होतं.

उपनगरातल्या एका को ऑपरेटिव्ह सोसायटीतला सदानंदचा बंगला स्टेशनपासून दूर असला तरी चांगला होता. फक्त देखभाल नसल्याने त्याची रया गेली होती. भारतात नोकरांची, कामगारांची काही कमता नसल्याने आपण त्यांच्या मदतीने बंगल्याचे, बागेचं रूप दोन दोन तीन महिन्यातच पालटलं.

आपल्या लग्नाच्या पार्टीला सदानंदचे दोन्हीकडचे नातेवाईक आवर्जून उपस्थित होते. आपल्या दिसण्याचं, मिळून- मिसळून वागण्याचं कौतुक करून त्यांनी सदानंदला चांगली सहचारिणी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. गेल्या काही वर्षात जवळच्या लग्नकार्यानाही न गेलेला सदानंद आपल्याला घेऊन अशा समारंभात उत्साहाने भाग घेऊ लागला. नाटक, सिनेमा, गाण्याचे कार्यक्रम, क्लब, पार्ट्या यात आपणही रमून गेलो.

सुट्टीसाठी श्रीधर आणि रमा तीन आठवडे येण्याचे ठरल्यावर आपण आवर्जून सारी तयारी केली. मुलांना आवडणारे पदार्थ करून घेतले. नवीन पडदे, रंग लावून त्यांच्या खोल्या सजवल्या. घरात बदललेलं रूप आणि बाबांची सुधारलेली प्रकृती बघून मुलही खुश झाली. श्रीधर रमाला सर्व नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना भेटता यावं म्हणून आपण एक गेट-टुगेदर अरेंज केलं. त्या पार्टीच्या चार दिवस आधी आपण सदानंदला नाश्त्याचे वेळी सांगत होतो की,  ॓अरे एकदा निमंत्रितांच्या लिस्टवर नजर टाक. आणि मेनू फायनल करण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरचा आता फोन येणारे तर मेनू बघून घे.॔ तेवढ्यात कॉन्ट्रॅक्टरचा फोन आलाच त्याच्याशी बोलत असताना सदानंदचाही फोन वाजला मुलं काल त्यांच्या एका मित्राकडे नाईट आऊटसाठी गेली होती.

सदानंद फोनवर आश्चर्याने विचारत होता एवढे पैसे आहेत तुझ्याकडे? बरं बरं! मग घे ते शूज तुला आवडले आहेत तर! फोन ठेवून सदानंद सांगू लागला, सकाळी घरी येता येता मुलं शॉपिंगला गेली. तिथे रमाला एक छान शूज आवडले पण त्यांची किंमत दहा हजार आहे म्हणून ती शूज घेऊ का म्हणून विचारत होती. पैशांबद्दल विचारलं तर ममाने दिलेत म्हणाली.

  ॓अरे हो! तुला सांगायचंच राहिलं. मी घरखर्चासाठी बँकेतून पैसे काढले तेव्हा मुलं येणार म्हणून त्यांच्यासाठीही वीस-वीस हजार काढले आणि मुलं आल्यावर त्यांना दिले. काय असतं ना, मित्र- मैत्रिणी बरेच दिवसांनी भेटतात. सिनेमा, हॉटेलिंग, खरेदी असते. मुलं आपली शिकताहेत. त्यांच्या जवळचे डॉलर्स, क्रेडिट कार्ड इथे कशाला वापरायचं? मुलांना कुठे कमीपणा येता कामा नये. तुझ्या पोझिशनप्रमाणे त्यांना सारं मिळालं पाहिजे. त्यांचा तो हक्कच आहे नाही का ?॔

आपलं बोलणं ऐकून सदानंदनं कृतज्ञतेने आपल्या हातावर हात ठेवला. लीना, कसं सांगू तुला? पैशाची काही कमी नाही पण असं काही करायला पाहिजे हे सुचलंच नसतं मला .॔

  ॓अरे मग मी कशाला आहे? काय ठरलंय आपलं? आता मागचं सगळं विसरून दोघांनी एकमेकांच्या सहवासात सुखात राहायचं. हो ना?॔ 

आपणही त्याच्या हातावर हात ठेवून त्याला आश्वस्त केलं पण पैसे काढताना जास्तीचे दहा हजार स्वतःसाठी काढले हे सांगायचं टाळलं. त्या आठवड्यात क्लबमध्ये रमी खेळताना आपण भरपूर हरलो होतो. त्यासाठी पैसे काढले हे सांगू त्याला नंतर कधीतरी असं मनाशी ठरवलं.

पार्टीमध्ये मुलं खुश होती. सर्वांशी मोकळेपणी बोलत होती. मुलांच्या आवडीचे पदार्थ करून घेऊन, त्यांच्यासाठी थोडी फार औषधं, कपडे सगळ्याचं व्यवस्थित पॅकिंग करून आपण त्यांच्या बॅगा भरल्या तेव्हा तिघेही कौतुकाने बघत आपल्याभोवती चिवचिवत होती.

काल रात्री श्रीधर- रमाला एअरपोर्टला पोहोचवून यायला उशीर झाला. सकाळी सदानंदला नाश्ता दिल्यावर आठवल्यासारखं करून आपण म्हटलं,  ॓अरे, आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरीबाईंचा रिमाइंडरचा फोन आला होता. मागच्या आठवड्यात त्यांनी घराच्या ॓चेंज ऑफ नॉमिनेशन ॔ साठी आपल्याकडे फॉर्म पाठवले होते पण मुलांच्या गडबडीत मी ते विसरले. त्यांची मीटिंग आहे शनिवारी. त्याआधी त्यांनी तो फॉर्म भरून मागितलाय.

  ॓एवढंच ना! दे तो फॉर्म. तुझ्या नावाने घराचं नॉमिनेशन करून तो फॉर्म भरून देतो.॔ सदानंद म्हणाला.

  ॓ अरे इतकी घाई नको करू. मुलांना विचार आणखी कुणाचा सल्ला घे.॔ आपण मानभावीपणे म्हटलं 

 ‌॓ कशाला? मुलांसाठी मी फॅक्टरीतला निम्मा-निम्मा हिस्सा ठेवलाय. ज्या घरासाठी तू एवढी जीव लावून धडपडतेस त्या घरावर तुझाच हक्क राहू दे. दे तो फॉर्म इकडे. बाकी काय त्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून देऊन दे तो सेक्रेटरीबाईंकडे.

नेहमीप्रमाणे सदानंदला हसतमुखाने बाय करून आपण इथे झोपाळ्यावरून येऊन बसलो. त्या सही केलेल्या फॉर्मवर डोळे भरून नजर फिरवली आणि मनातलं आवडतं गाणं ओठावर आलं….

 ‌॓ आय ॲम समथिंग स्पेशल!

आय हॅव टॅलेंट.. आय एम ग्रेट!

आय से थँक्यू फॉर द लाईफ 

आय ॲम एन्जॉईंग…!

समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फडक्यांची गोष्ट…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “फडक्यांची गोष्ट…” ☆ सुश्री शीला पतकी 

लीला आत्या जरा रागातच घरात आली म्हणाली, “संपलं बाई संपलं फडक्यांचे युग संपले”… मी तिला शांत करीत म्हणाले, ” अगं आता जुनी युग संपणारच ना. सि. फडकेंना एका काळात वाचणारी वाचक मंडळी खूप होती… तरुण मुलं फडक्यांच्या कादंबऱ्याचे फॅन होते. ना सी फडक्यांच्या लिखाणात तरुणांना आकर्षित करण्याची ताकत होती. तो कालखंड फडक्यांचा होता….

त्यावर लिला आत्या म्हणाली, ” ते नाही ग दुसऱ्या फडक्यांबद्दल बोलते”…. ” अच्छा अच्छा म्हणजे आपल्या सुधीर फडक्यांबद्दल.. बाबूजी असं म्हण की सरळ… बाबूजी बद्दल काय ग रामायणा ने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं. मराठी गाणी त्यांनीच संगीतबद्ध करावी आणि आशा ताईंनी ती म्हणावीत. फडक्यांच्या चाली सुंदर शब्दाला त्या माणसाने खऱ्या अर्थाने अर्थ दिला नाही ग” लीला आत्यांनी हात झटकला, “मी साहित्यातल्या फडक्यांबद्दल बोलत नाही” 

“ मग कशाबद्दल बोलतीयेस? “ माझा वैतागून तिला प्रश्न.

त्यावर ती म्हणाली… “ अगं माझ्या सुनेचा महिन्याचा खर्च सर्वाधिक कशावर होतो तर तो त्या हगीजवर… पंधरा हजार रुपयाचा खर्च त्या कापडावर आणि हात पुसायच्या त्या कागदांवर! त्यानंतर तोंड पुसायचे हात पुसायचा असे कागद आणखीन वेगळे सारखी कागद ओढत असते डब्यातून, नाहीतर त्या रीळातून फाडत असते. ताट पुसायला फाडला कागद… टेबल पुसायला फाडला कागद… तोंड पुसायला वेगळा कागद… काय कचरा का कचरा आणि खर्च केवढा…? मिळवता मिळवता म्हणजे काय उधळपट्टी करायची…?” 

माझ्या एकूण विषय लक्षात आला. आमची लीला आत्या म्हणजे…. आता सांगतेच तुम्हाला.. अहो कोणाचे लग्न ठरलं ना तर या बाईची जमवाजमवा कशाची असावी? … तर फडक्यांची.. जुने लुगडे, साड्या धोतरं, जुन्या पॅंटी, जुने गंजे फ्रॉक, हे फाडून फाडून ती शिवून ठेवायची. मी म्हणलं “ हे उद्योग का करतेस? ”

तर म्हणाली “ लग्नाकार्यामध्ये आचाऱ्याच्या हाताला फडके द्यावे लागतात. आणि ते आपल्या घरचे स्वच्छ असलेले बरे… ताट पुसायला फडके पाहिजेत.. भांडी पुसायला फडके पाहिजेत.. लादी पुसायला फडके पाहिजे… लादी पुसायचे फडके पूर्णपणे पाणी शोषून घेणारे आहेत. ते मी यांच्या बनियन चे करते. “ 

लिला आत्याच्या घरात गेलो तर अनेक ठिकाणी टांगलेले फडके दिसतील… आणि उगीचच इतस्ततः कसेही टाकलेले नाहीत बरं…! त्या त्या ठिकाणी त्यालाही हुक असेल. ताट पुसायचे फडके वेगळे…. वाट्या भांड्याचे वेगळे… टेबल पुसायचे वेगळे… देवाचे वस्त्र वेगळे… लादी पुसायचे वेगळे.. स्वयंपाकात हात पुसायचे वेगळे… आणि हे फडके जुन्या कपड्यांचे…. चारी बाजूच्या कडा शिवलेले त्याला अडकवायला कपड्याचा नाडा किंवा हुक बांधलेले आणि दररोज ते स्वच्छ धुतलेले! आणि शिवाय तिचं एक कपाट आहे त्यात सुद्धा मोड आणण्याच्या उसळी बांधायचे फडके वेगळे…. श्रीखंड करण्यासाठी चक्का बांधण्याचे फडके वेगळे.. ते खास पांढरे स्वच्छ धोतराचे असायचे… जानेवारी महिन्यात हलवा करताना घ्यावयाचे पांढरे स्वच्छ फडके वेगळे… रोज सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी स्वयंपाक घरातले डबे पुसण्याचे फडके ते वेगळे..!

मी तिला म्हणायची “ अग रोज कसले डबे पुसते.. “ 

ती म्हणायची “ स्वयंपाकाच्या घाईत कसले हात या डब्याला लागतात. मग डबे चिकट होतात तेव्हा घरच्या बाईनं दुपारच्या निवांतपणात असे डबे पुसून ठेवावेत. ” तो तिचा कार्यक्रम रोज दुपारी अर्धा तास चालत असे.

एकदा काय झालं…

एक छोटी बादली होती. तुळस वाळत चालली होती म्हणून मी त्या बादलीत पाणी घेऊन तुळशीला घालायला निघाले. तिने मला घाई घाईने थांबवलं.. “ ती कशाला बादली घेतलीस? “ 

“ मग काय झालं स्वच्छ तर आहे ना?

“अग ती फडक्यांची बादली आहे …”

मी म्हणलं “असू दे ना देऊन टाकते पाहिजे तर त्यांना…” कारण शेजारी फडके राहत होते ना…

ती म्हणाली “ नाही नाही तसं नाही. मी रोज दुपारी सगळे फडके म्हणजे कपडे पुसायचे त्या बादलीत भिजत घालते आणि स्वच्छ धुऊन टाकते… फरशी पुसायचे फडके ओट्याचे फडके… हे एकदा धुते आणि हातपुसणीचे वाट्या भांड्याच एकदा…. “

लीला आत्याच्या स्वयंपाक घरात जाल तर कपाटात पांढरे स्वच्छ फडके बांधलेल्या मोरावळ्याच्या बरण्या, उपवासाच्या लोणच्याच्या बरण्या, मुरंबाच्या बरण्या अगदी नटून डोक्यावर पदर घेतलेल्या बाईसारख्या बसलेल्या असायच्या. खालच्या फडताळ्यातल्या… मिठाच्या, लोणच्याच्या बरण्याही अशा नटून-तटून बसलेल्या असायच्या, अर्थात आता ते दृश्य नाही. मी मनात नेहमी म्हणायची ‘हिच्या सुनेच फार अवघड आहे…. ’ पण हिची सून वरचढ निघाली 

… तिने प्रश्नच मिटवला. ॲमेझॉन वरून मागवलेल्या हगीजमुळे लेकराचा लंगोटाचा प्रश्न मिटला, दुपट्यांचा प्रश्न मिटला, टिशू पेपरमुळे हात पुसायचा प्रश्न मिटला. आता लिलाआत्याला फारसा स्कोप उरला नाही.

 लिहीत असताना मला जाणवलं की पूर्वीच्या बायका किती निगुतिने घर स्वच्छ ठेवत असत. जुन्याचा पुनर्वापर.. त्याच शिवण टिपण… त्याची स्वच्छता.. हे सगळं कुठल्याही शाळेत न जाता त्या शिकल्या होत्या… त्यामुळे आजार घरात फिरकत नव्हते. माझी आई नेहमी म्हणायची, “अग ओट्यावरच हात पुसायचं फडकं आणि दारातला पाय पुसणं त्या घरातली स्वच्छता सांगत असत…! ” पायपुसण सुद्धा आई आमची दोन दिवसाला एकदा स्वच्छ धुऊन टाकायची कारण ते जाड कापडाचाच बनवलेल असायचं.

आता फडक्यांची दुनिया घरातून गायब झाली आणि त्यांची जागा ॲमेझॉनच्या कागदाने घेतली. उसळीला मोड आणायचे डबे बाजारात विकत मिळू लागले. चक्का बांधणे संपले. वस्तूंचा पुनर्वापर संपला. कचऱ्याचा ढिगारा वाढू लागला… स्वच्छतेच्या नावाखाली अस्वच्छतेचा पसारा आपण घालू लागलो. बंगल्याच्या समोर असणाऱ्या कचऱ्याच्या डब्यात कागदांचे ढीग वाढू लागले….! ॲमेझॉन चे असे कागद घरात वापरणे आता (कागद हा शब्द जरा लिहिता येतो.. तुम्हाला गावंढळपणाचा वाटेल.. बर ठीक आहे आपण पेपर म्हणूयात) तर असे पेपर घरात ठाई ठाई ठेवलेले आहेत…..

… तरीही लीला आत्याच्या घराचा लक्खपणा नाही. स्वच्छता ही बाईच्या अंगी असावी लागते आणि त्याच्यासाठी लिलाआत्यासारखं नियोजनही असावं लागतं. पैसे आहेत म्हणून ते कागदावर उधळणे कदाचित या पिढीला योग्य वाटत असावं. पैसा पैसा जमा करून भविष्याची तरतूद करणाऱ्या आमच्या पिढीला मात्र हे मानवणार नाही… अर्थात त्यांना जे करायचे ते करू द्यावं संघर्ष नको…!

… तुम्हाला काय वाटतं मंडळी? …. आमच्या लीलाआत्यासारखं फडक्यांवर प्रेम करावं? का त्यांच्या सुनेसारखा ॲमेझॉन चा मार्ग धरावा?

– – बाकी लीलाआत्याचं फडक्यांवर एवढं प्रेम की तिने जावई सुद्धा फडके शोधला आहे.

आहे की नाही गंमत…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बल्ब…” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “बल्ब …” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

खूप जुनी गोष्ट आहे. नुकतेच आम्ही नवीन घरात राहायला आलो होतो. त्यावेळी ट्युबलाईटचा विशेष प्रसार झाला नव्हता. घरोघरी पिवळे बल्बच असायचे.

दहा दिवसांच्या अवधीत तिसऱ्यांदा बल्ब गेला. पुन्हा बल्ब गेला, म्हटल्यावर आई आणि त्यामुळे मी व संध्याही कावऱ्याबावऱ्या झालो.

बंद दरवाजाचा जमाना तोपर्यंत आला नसल्याने शेजारीपाजारीही जमा झाले.

मग नवीन बल्ब आणून लावण्याचे सोपस्कार झाल्यानंतरही गप्पा चालूच होत्या.

“संध्याच्या आई, वरचेवर बल्ब जातो, म्हणजे वायरिंगचा प्रॉब्लेम असणार. “

“हो. हो. इलेक्ट्रिशियनला बोलावून चेक करून घ्या. “

“मला वाटतं…… “

तेवढ्यात आईला आठवलं, “वर राहतात ना, ते ठोकत असतात अधूनमधून. “

“बरोबर. मग त्यामुळेच हादरे बसून बल्ब जात असणार. “

“तुम्ही जाऊन सांगा त्यांना. म्हणावं, नवीन बल्बचे पैसे द्या. “

“हो, हो. जाच तुम्ही, संध्याच्या आई. “

“आता ‘यां’ची यायची वेळ झालीय. स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. उद्या सकाळी बघूया. “

मग शेजारणींनाही आपापल्या घरच्या स्वयंपाकाची आठवण झाली.

आजचं मरण उद्यावर गेलं, म्हणून हुश्श करत आई रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

बाबा आल्यावर त्यांनीही शेजारणींना दुजोरा दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा-अकराच्या सुमाराला पुन्हा वरून ठोकाठोकी सुरू झाली.

“संध्याच्या आई, आत्ता जा आणि रेडहॅन्डेड पकडा त्यांना. “

“पण त्या भांडायला लागल्या तर? “

“घाबरू नका तुम्ही. त्या भांडायला लागल्या, तर खाली आवाज येईलच. मग मी येईन वर. “

“मीही येईन, ” म्हणत सगळ्याच तयार झाल्या.

जीव मुठीत धरून आई वर गेली.

दहा-पंधरा मिनिटं झाली, तरी सारं कसं शांत शांत म्हटल्यावर कुमक गोंधळून गेली. मग एका दूताला वर पाठवण्यात आलं.

“संध्याच्या आई त्यांच्या घरात बसून चहा पित होत्या. “

पाच-दहा मिनिटांत आई आलीच. एकदम शांत दिसत होती.

“काय झालं? ” “काय झालं? ” सगळ्यांनी कल्ला केला.

मग आईने सुरुवात केली, “अहो, मी जरा भीतभीतच गेले वर. म्हटलं, त्या बाईंनी तोंड सोडलं, तर मी काय करणार? पण त्या चक्क म्हणाल्या, ‘गे, भायेरसून कित्याक, घरात येवन बसा आणि बोला. ‘ त्याबरोबर माझ्या जिवात जीव आला. त्या खलात काहीतरी घेऊन बत्त्याने कुटत होत्या. मग मी सांगितलं बल्बचं. तर म्हणाल्या, ‘अरे द्येवा! धा दिसांत तीन बल्ब गेल्यानी? माका ठावक न्हाय, गे, असा काय होईत म्हणान. आता काळजी घेयीन मिया. ‘मग त्या थोड्या सरकून बसल्या. सुनेकडून एक गोधडी मागून घेतली. तिची जाडशी घडी केली. तिच्यावर खल ठेवून त्यांनी आपलं कुटण्याचं काम चालू केलं.

‘माजो हातपण वाईच जोरात चलता. दोघांची शक्ती एकाच हातात इली हा मा? आता हळूहळू मारतंय. ‘

तेव्हा कुठे माझं लक्ष गेलं. त्या डाव्या हाताने बत्ता मारत होत्या. उजवा हात फक्त अर्ध्या दंडापर्यंतच होता.

‘म्हणजे? तुमचा हात? ‘

‘अगे, धाकटो चार वर्साचो होतो, त्या येळा त्येचो बापूस ग्येलो. माज्या पदरात चार पोरा. मगे घोवाच्या मिलमद्ये माका नोकरी दिल्यानी. द्येव त्येंचा भला करो. एक दिस मशनीत हात गावलो आन कापान टाकाचो लागलो. माका दिसला – संपला सगळा. पण पोरांकडे बघून पुन्ना उभ्या रवलंय. मिया डाव्या हाताक सांगलंय – इतकी वर्सां उजव्याच्या जिवाsर तू आराम क्येलंय. आता तुज्याsर दोगांच्या वाट्याचा काम करुची पाळी इली हा. मग तो लागलो कामाक. तेणा माका बगलंला मा, पोरांची आऊस आणि बापूस जालंला… अरे, मिया बोलत काय बसलंय? पयल्यांदाच इल्यात घरी. इल्लो च्या घेवा. ‘

मग त्यांच्या सुनेने चहा करून दिला.

‘अगो, थोडी कोकमां दी गो त्येंका. कालच पावण्यान हाडली गावसून, ‘ म्हणून आमसुलांची पुडीही हातात ठेवली.

‘थोरलो आयलो, का त्येका सांगतंय हां, तुमका बलब हाडून देवक. ‘

‘अहो, नको. राहू दे. आता लावला आम्ही. यापुढे जरा काळजी घ्या, एवढंच सांगायला आले होते. ‘ “

– – – बल्बची भरपाई मागायला गेलेली आई आयुष्यभर पुरेल एवढा सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन आली होती.

 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

देवबाभळी असे निरस नाव असलेलं एखादं नाटक असेल असं कधी वाटलं नव्हतं, त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते संगीत नाटक असेल आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तो एक थरारून टाकणारा नाट्यानुभव असेल असंही कधी वाटले नव्हते. पण म्हणतात ना Truth is stranger than fiction. तसंच काहीसं माझं या नाटकाच्या बाबतीत झालं आहे. पुण्यातील वास्तव्यात हे नाटक पाहण्याचा योग आला आणि जे पाहिले त्यामुळे भरून पावलो. हे नाटक पाहिलं नसतं तर एका चांगल्या आनंदाला निश्चितच मुकलो असतो.

खरं तर हे नाटक आहे संत तुकारामांची पत्नी आवली आणि विठूरायाची पत्नी देवी रुख्मिणी यांच्यावर. या नाटकात केवळ या दोघींच्याच भूमिका आहेत. तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांचा उल्लेख वारंवार झाला तरी या नाटकात पात्र म्हणून प्रत्यक्षात रंगमंचावर ते कधीच येत नाहीत पण ते अवघे नाटक व्यापून उरले आहेत. त्यांचे अस्तित्व सतत जाणवत राहते. मग प्रश्न असा आहे की देवबाभळी हे नाव आले तरी कसे?

यासाठी नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या प्राजक्त देशमुख यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. तुकारामांची पत्नी आवली हिच्या पायात बाभळीचा काटा मोडतो. तो काटा काढण्यासाठी कोण मदत करतं तर प्रत्यक्ष विठुराया. विठुरायाने पायातला काटा काढला तरी पायातल्या वेदनेची आणि जखमेची ठसठस घेऊन आवली नाटकभर वावरते. विठुराया केवळ तेवढं करून थांबत नाही, तर तिच्या मदतीला आपली पत्नी रुख्मिणी हिला पाठवतो. त्यावेळी आवली पोटुशी असते. देवबाभळीचा काटा मोडणं हे खरं तर निमित्त! पण या निमित्ताने विठुरायाचे आपल्या भक्तांवरील प्रेम दिसते. या निमित्तानेच रुख्मिणी आवलीच्या घरी येते. या दोघींचंही दुःख कुठेतरी एकसमान आहेत. पण त्या दोघींच्या मनातील वेदना, स्त्री सुलभ भावना आणि आपल्या पतीबद्दल असलेलं प्रेमही यानिमित्ताने दिसून येतं. या सगळ्या गोष्टींना कारण ठरते ती देवबाभळी!

नाटकाचा पडदा उघडतो आणि शेणानं आपलं अंगण सारवणारी आवली दृष्टीस पडते. सारवताना ती गात असते. सकाळचे प्रसन्न वातावरण दृष्टीला पडते. स्वयंपाकघरातून डोकावणारी सूर्यकिरणे दिसतात. चुलीतला धूर दृष्टीस पडतो. आवली भाकऱ्या करते आणि भंडाऱ्याच्या डोंगरावर असणाऱ्या आपल्या पतीला म्हणजेच तुकाराम बुवांना त्या नेऊन देत असते. तुकारामबुवांना हाक मारताना ‘ आवो आवो… ‘ अशा तिच्या आर्त हाका हृदयाला स्पर्शून जातात. डोंगर उतरताना आवलीच्या पायात बाभळीचा काटा घुसतो आणि ती खाली कोसळते. पुढचं तिला आठवत नाही.

आवलीला शुद्ध येते तेव्हा ती आपल्या स्वयंपाकघरात पडलेली असते. चुलीजवळ कोणीतरी स्त्री भाकऱ्या करताना तिला दिसते. आपल्या घरात ही कोण नवीन बाई? तुकारामबुवांनी काही नवीन तर..? अशी शंका तिच्या मनात येते. ती त्या स्त्रीला विचारते, ‘ कोण ग तू? आणि माझ्या घरात कशी आलीस? ‘ तेव्हा ती सांगते, ‘ माझं नाव लखुबाई. मला तुमची काळजी घ्यायलाच पाठवलं आहे. ‘ ही लखुबाई म्हणजेच रुख्मिणी. प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सांगण्यावरून ती इथं आली आहे. तशी आवली कजाग बाई. विठ्ठलाला चक्क शिव्या घालत असते. पण त्याचं कारणही तसंच असतं. तिचा पती म्हणजेच तुकाराम महाराज विठ्ठलाच्या नादी लागलेले असतात. आपल्या पत्नीकडे, घराकडे, संसाराकडे त्यांचे काडीमात्रही लक्ष नाही. त्यामुळे ती विठ्ठलाला शिव्या देते. आपल्या पतीला हे ‘ पंढरीचे भूत ‘ लागले आहे आणि त्याने आपल्या सगळ्या संसाराचे वाटोळे केले आहे अशी तिची भावना असते.

आवली विठ्ठलाला ‘ चिघळलेली जखम ‘ म्हणते. देवाच्या नादी लागण्याचा, नामस्मरणाचा काय उपयोग आहे असे म्हणते. पण आता घरात आलेल्या रुख्मिणीला मात्र तिचे हे विठ्ठलाला म्हणजे आपल्या पतीला शिव्या देणे आवडत नाही. अशी ही कजाग आवली असली तरी वरून काटेरी फणसासारखी दिसणारी आहे. अंतर्यामी मात्र फणसाचे गोड गरे आहेत. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती ही की आवली विठ्ठलाला शिव्या देत असली तरी त्यानिमित्ताने का होईना पण ती घेते त्याचेच नाव! या अर्थाने आवलीही विठ्ठलभक्त आहेच!

रुख्मिणी तिचा पाय हातात घेते. त्याला मलमपट्टी करते. तिच्याच घरात तिच्यासाठी भाकऱ्या बडवून तिला मदत करते. तेव्हा रुख्मिणी विचारते, ‘ यातला मला एखादा तुकडा दिला तरी चालेल. ‘ तेव्हा आवली म्हणते, ‘ तुकडा कशापायी? पूर्ण भाकरीच देईन की तुला. ‘ यातून आवलीचा प्रेमळ स्वभावही दिसून येतो. रुख्मिणी चुलीजवळ बसून जेव्हा भाकरी करते, तेव्हा चुलीतल्या निखाऱ्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. त्याने तिचा मुळातच तेजपुंज असलेला चेहरा उजळून निघतो. तिचं भाकरी करणं, भाकरी शेकणं हे कुठेही नाटकातलं वाटत नाही, इतकं ते जिवंत साकारण्यात ती आणि दिग्दर्शक दोघेही यशस्वी झाले आहेत. आवली जेव्हा घर सारवते, तेव्हाही ते नाटकातलं दृश्य वाटतच नाही.

घर सारवणं नाहीतरी आजकाल कोणाला माहिती आहे? पण आजच्या पिढीला ते यात माहिती होऊ शकेल.

आवलीचा तुकारामबुवांवर राग आहे तसाच रुख्मिणीचा सुद्धा विठ्ठलावर आहे. पंढरपुरात विठ्ठल आणि रुख्मिणीची देऊळं वेगवेगळी आहेत. विठ्ठल हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे. श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेला आला, तेव्हाही त्याने राधेशी असणारी प्रीती, स्नेहभाव कायमच ठेवला होता. त्यामुळे रुख्मिणी रागावून दिंडीर वनात निघून गेली होती. तोच संदर्भ इथे आहे. या कारणानेच रुख्मिणी विठ्ठलावर नाराज आहे. विठ्ठलाला आपल्यापेक्षा आपले भक्त अधिक प्रिय आहेत अशी तिची तक्रार आहे. विठ्ठलाने जेव्हा आवलीच्या पायातला काटा काढला, तेव्हा स्त्री सुलभ भावनेतून रुख्मिणी बघायला आली की कोण ही की जिच्या पायातला काटा आपला पती काढतो आहे. आवली त्याच्या भक्ताची पत्नी आहे. त्याची काळजी घेणारी ती आहे. ती गर्भार अवस्थेतही आपल्या पतीला जेवण घेऊन येते. म्हणून विठुराया रुख्मिणीला आवलीच्या घरी जाऊन तिची सेवा करायला सांगतो.

अशा या परिस्थितीत आवली आणि रुख्मिणी जवळ येतात. एकमेकींची दुःख समजून घेतात. त्यांच्यातील संवाद हृदयस्पर्शी तर आहेतच पण खूप काही सांगून जाणारे आहेत. तुकाराम बुवा घरात अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांच्या स्वयंपाकघरातील डबे, भांडी रिकामी आहेत. खरं तर आवलीच माहेर श्रीमंत होतं. ती आपल्या माहेरी परत जाऊ शकली असती. रुख्मिणी तिला विचारते, ‘ मग काय आहे तुमच्याकडे? कसा चालतो तुमचा संसार? ‘ त्यावेळी आवली उपरोधिकपणे तुकारामबुवांचा अभंग वापरून उत्तर देते, ‘ आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने… ‘ त्यावेळी प्रेक्षक अंतर्मुख होतात.

रुख्मिणी विचारते, ‘ मग तू निघून का जात नाहीस? ‘ त्यावर आवलीने दिलेले उत्तर सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे आहे. ती म्हणते, ‘ निघून जाऊन काय करू? मी आहे म्हणून त्यांना जेवण तरी मिळते. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला रुसून निघून जाण्याचा अधिकार कुठे आहे? मी काही रुख्मिणी थोडीच आहे रुसून निघून जायला? आणि निघून गेल्यावर घरी परत यावंसं वाटलं तर आल्यावर घर तरी जागेवर असेल का? मग कुठे जायचं? ‘ यातून तिने रुख्मिणीला बोध तर केला आहेच पण आजकाल क्षुल्लक कारणावरून नवऱ्यावर चिडून घरातून निघून जाणाऱ्या मुली, काही झाले की लगेच घटस्फोट घेणाऱ्या मुली यांच्यासाठीही दोन मोलाचे शब्द यातून तिने सुनावले आहेत असे वाटते. एकदा का घर सोडून निघून गेल्या आणि नंतर परत यावेसे वाटले तरी घर (पती) जागेवर असेलच याची शाश्वती कोणी द्यावी?

रखुमाई म्हणते, ‘ मी आणि तू दोघं गाभाऱ्याच्या बाहेर आहोत, पण तू मात्र गाभाऱ्याबाहेर राहूनही गाभाऱ्याचा घुमारा झालीस. ‘ आवली जशी रुख्मिणीला तिची चूक दाखवून देते, तशीच रुख्मिणी सुद्धा आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग आवलीला सांगते. ती पावसात आवलीला घेऊन जाते. हात पसरून सांगते, ‘ बघ पावसात असं मनसोक्त भिजायचं असतं सगळं विसरून. मुक्त, आनंदी व्हायचं असतं. ‘ या नाटकातील संवाद असेच हृदयाला हात घालणारे आहेत. नाटकाचा काळ प्राचीन असला तरी आजही हे संवाद स्त्री मनाची अवस्था स्पष्ट करतात. ‘ करपायच्या आत खरपूस झाल्या झाल्या उलथायची भाकरी, फोडणी तांबूस झाल्या झाल्या ओतायची भाजीत, उतू जायच्या आत उतरवायचं भांडं… का? कडेलोटाच्या क्षणापर्यंत पोहोचून पुन्हा माघारी का गं फिरायचं आपण बायकांनीच? ‘ आणखी एका संवादात म्हटलं आहे, रखुमाई आवलीला म्हणते, ‘ स्वतःसाठी जग. जगताना स्वतःसाठी काहीतरी जपून ठेव. ‘ ‘ प्रत्येकानं आपापल्या वाट्याचं शेत नांगरून ठेवायचं असतं. पाऊस पडेल किंवा नाही याची चिंता करायची नसते. ‘ ही वाक्यं कुठेतरी गीतेतल्या उपदेशाशी नातं सांगणारी आहेत असं मला वाटतं. आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करावं. बाकी गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढचं ईश्वरावर सोपवावं असंच गीतेत सांगितलं आहे ना!

एकंदरीत हे नाटक आपल्याला थेट विठ्ठलाशी जोडणारा सांगीतिक अनुभव देतं. या नाटकात एकाच रंगमंचावर जणू देहू नगरी अवतरली आहे. तुकारामबुवांचा वाडा, आवलीच स्वयंपाकघर, भंडाऱ्याचा डोंगर, इंद्रायणीचा घाट हे सगळे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. यात प्रकाश योजना, नेपथ्य या साऱ्यांचा भाग आहेच. आवली किंवा रुख्मिणी कपडे धुताना, इंद्रायणीच्या पाण्यात हात घातल्यानंतर होणारा आवाज इतका हुबेहूब आहे की खरोखरच इंद्रायणी नदी तिथे असल्याचा भास होतो. यात पारंपरिक संगीत वाद्यांचा वापर केला आहे. तबला, पखवाज, संवादिनी, सतार आदी वाद्यांचे स्वर मन प्रसन्न करणारे आहेत. प्राजक्त देशमुख यांचे संवाद आणि अभंगरचना यांना शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रुख्मिणी /लखुबाई) यांनी न्याय दिला आहे असे म्हणण्यापेक्षा त्याचे सोने केले आहे असे म्हणणे योग्य ठरेल. आनंद भाटे यांचे तुकाराम महाराजांच्या अभंगांचे पार्श्वगायन भक्तिरसाचा अनुभव देणारे आहे.

शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांचा जिवंत अभिनय हे नाटकाचं वैशिष्ट्य. आवली जेव्हा तुकारामांना साद घालते तेव्हा तिचे, ‘ आवो आवो ‘ हे शब्द अक्षरशः काळजाचं पाणी पाणी करतात एवढी ताकद, एवढी आर्तता त्या स्वरात आहे. मानसी जोशी विठ्ठलाच्या मूर्तीशी संवाद करीत असताना ती केवळ मूर्तीशी बोलते आहे असे वाटतच नाही. प्रत्यक्ष विठ्ठलच समोर आहे असे वाटते. तुकाराम बुवांची गाथा वाचताना आवली आणि रुख्मिणी दाखवल्या आहेत. आवलीचे गूढ रम्य स्वप्न, वाऱ्याने उडणारी तुकोबांच्या गाथेची पाने, इंद्रायणीत पडून वाहून जाणारी गाथेची पाने हे सगळे प्रसंग कमालीचे जिवंत वाटतात. चित्रपटाच्या तुलनेत दृश्ये दाखवताना नाटकांना अनेक मर्यादा पडतात पण इथे त्या सगळ्या मर्यादा असूनही सगळं काही रंगमंचावर जिवंत करण्यात दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार यशस्वी झाले आहेत. प्रेक्षकांना एक भव्यदिव्य अनुभव त्यांनी दिला आहे.

भद्रकाली प्रॉडक्शनने अनेक दर्जेदार नाटके दिली, त्याच परंपरेतील हे नाटक आहे. मच्छिंद्र कांबळी यांची दर्जेदार नाटकांची परंपरा प्रसाद कांबळी यांनी नुसतीच चालू ठेवली नसून आणखी पुढे नेली आहे. देवबाभळी हे संगीत नाटक असूनही इतर संगीत नाटकांपेक्षा आगळेवेगळे. प्रसाद कांबळी या नाटकाचे निर्माते आहेत. आनंद ओक यांचे संगीत आहे. विशेष म्हणजे या नाटकातील गीते शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी दर वेळी प्रत्यक्ष गातात. इतर नाटकांप्रमाणे त्या गीतांची रेकॉर्ड लावली जात नाही.

प्राजक्त देशमुख यांचे संवाद हृदयाला भिडणारे आहेत. लोकसंगीत, अभंग, ओवी इ. चा सुरेख वापर या नाटकात केला गेला आहे. संतपरंपरा, लोकपरंपरा आणि अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन हे या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या नाटकाला एकूण ४४ पारितोषिके मिळाली आहे. महाराष्ट्र शासन, साहित्य अकादमी इ. विविध पुरस्कार मिळाले आहेत. अनेक विक्रम या नाटकाने रचले आहेत. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने या नाटकाची सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणून नोंद घेतली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी हे नाटक गौरविले आहे.

केवळ दोनच स्त्री पात्रे एवढा सशक्त अभिनय करून दोघींच्या बळावर एखादे नाटक एवढे यशस्वी करू शकतात हे विस्मयचकित करणारे आहे. त्यासाठी शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या दोघीना सलाम. या नाटकाची वाटचाल लवकरच पाचशेव्या प्रयोगापर्यंत होईल. ज्यांनी अजूनपर्यंत एकदाही हे नाटक पाहिले नसेल त्यांनी एकदा तरी ते जरूर पाहावे असे आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ केळीचे डोहाळेजेवण – लेखिका: सौ. मंजिरी अभिजित वझे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सौ. सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ केळीचे डोहाळेजेवण लेखिका: सौ. मंजिरी अभिजित वझे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

चार दिवस घरात नुसती गडबड चालू होती. कारण काय, तर केळीचे डोहाळजेवण करायचे ठरले होते. गडबड म्हणजे काय, तर हिरवी साडी आणायची. तिला बांगड्या ब्लाऊज पीस, ओटीचे सामान, विड्याची पाने, हे आणायचे होते. घुगऱ्यांसाठी हरबरे, शेंगदाणे भिजत घालायचे होते. मनात खूप उत्सुकता होती, कारण मला पण हे नवीन होते.

दुसरा दिवस उजाडला. सगळी पूजेची तयारी केली. मग सगळ्याजणी म्हणजे कामाच्या 12 बायका आणि मी आम्ही निघालो. जवळ जवळ अडीच हजार झाडे लावलेली त्यातला जो पहिला घड पडला होता, तेच झाड आम्ही निवडले. तिथली जागा स्वच्छ केली. विड्याची पानं मांडली.

त्यावर सुपारी, हळकुंड मांडले. मग त्यावरच सगळा नैवेद्य घातला. म्हणजे दहीभात, वरणभात, मसालेभात, शेवयाची खीर, गव्हाची खीर (इथे त्याला हुग्गी म्हणतात), भाजी, मुख्य पदार्थ म्हणजे आंबील. ती नाचणीची असते. थंडावा देण्यासाठी असते म्हणे. नैवेद्य झाल्यावर ओटी भरली. ओटीत साडी, ब्लाउजपीस, पाच प्रकारची फळे, बांगड्या असे सगळे साहित्य ठेवले होते. मग ती साडी जशी आपण नेसतो तशी झाडाला निऱ्या वगैरे करून नेसवली. त्यानंतर आरती केली. फोटो सेशन तर सतत चालले होतेच. मग सगळ्या बायकांनी गारवा आणला होता. त्यात भाकऱ्या, मुगाची उसळ, दाण्याची चटणी, दहीभात, झुणका, गोड म्हणून मोतीचूराचे लाडू असे आणले होते. त्याचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर त्या सगळ्यांनी माझी ओटी भरली. अभिजितला टॉवेल टोपी दिली.

जो घरी केलेला राहिलेला नैवेद्य होता तो सगळा एकत्र केला आणि पूर्ण दोन एकराच्या रानात चारी बाजूंनी शिंपडला. मग दुसऱ्या झाडाचा तयार झालेला घड काढला.

हे सगळे का करतात, हा प्रश्न तर मनात होताच. तर केळीचे झाड असे आहे की जे फक्त आपल्या मुलासाठी जगते. जेव्हा झाड मोठे होते, तेव्हा त्याला कोका पडतो, तेव्हा त्याला पण त्रास होतो. झाडातून विव्हळण्याचा आवाज येतो, असे जुन्या बायका सांगतात. जसा घड मोठा होतो तसे त्याचे वजन सांभाळत स्वतःला झिजवत जायचे, आणि पूर्ण पोषण केळ्यांना द्यायचे. आणि जेव्हा घड काढला जातो, तेव्हा स्वतःला समर्पित करायचे. घड काढून झाला, की झाड आपोआप वाळत जाते. म्हणून ही पूजा त्या साठी असते की झाडाची माफी मागून घड कापायचा असतो. अशा प्रकारे आज नवीन माहिती कळली.

लेखिका:सौ. मंजिरी अभिजित वझे

 

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गरसोळीची श्वेतपाकळी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गरसोळीची श्वेतपाकळी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : पादाकुलक, मात्रा : 8+8=16)

तुझा नाजूक नखरा राजा 

जणू मोरणी चमचम नाकी

उमलली सान ती सूर्यफुले

बटव्यात तुझ्या पुंजी बाकी 

*

तुझ्या गुणाला तोडच नाही

बंदुकीचेच फूल शोभले

कंबरमोडी तव् नामाने

किती फायदे तुझे लाभले

*

एकदांडीत दगडी पाला

दिसे वेलीस वेढली पाने

असेे कुठेही रानोमाळी

कशी बहरली सजली राने

*

नाही केली कुठे लागवड 

नाही जपले तुझ्या फुलाला

माळरानात वाढवले रे

भगवंताने तुझ्या रुपाला

*

कुटकुटी तुला गुडघेमोळी

गरसोळीची श्वेत पाकळी

पिवळा गोंडा शोभून दिसे

किती नाजूक तुझी रे कळी

*

तुझ्या फुलाला गुंफत गेले

त्याचे गजरे सुंदर झाले

शब्द अलवार त्यात गोवता 

काव्यसाजात समोर आले

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आनंदी जीवन… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आनंदी जीवन… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

कुठे जन्मलो यास महत्व न देणे 

आशावाद हृदयी धारून येणे 

कुठेही कसेही फुलारून जाणे 

हेच जाणसी तू आनंदी जगणे ||

*

आनंदी जगणे देई दुसऱ्या आनंद

अवचित हृदयी येतसे मकरंद

जरी पंकात त्या विलसे अरविंद

विष्णू लक्ष्मी येती रूपे मिलिंद||

*

रूपे मिलिंदाचा होई गुंजारव

भ्रमणातून लाभे दूजा जागी ठाव

विस्तार किर्तीचा लाभे त्यास गाव

जिद्दीने जगे त्यास मिळे आदर्शाचा वाव||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # ३१४ – कविता – ☆ यूँ ही, होली के बहाने, मोबाइल के अफसाने… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता यूँ ही, होली के बहाने, मोबाइल के अफसाने” ।)

☆ तन्मय साहित्य  # ३१४ 

☆ यूँ ही, होली के बहाने, मोबाइल के अफसाने… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

वॉट्सपिटों की धूम है, फेसबुकिस्ट प्रचार।

टेगिष्टि   कॉपिस्ट   सँग, मेसेंजिष्ट   हजार।।

*

कॉपिस्टों की मार का, फैला हुआ बुखार।

वही – वही  संदेश फिर, मिलता बारम्बार।।

*

मोबाइल की भीड़ को, करें  क्लियर हम रोज।

ब्लॉक कभी हाइड करें, कभी करें हम क्लोज।।

*

कभी वायरस आ घुसे, हेंग कभी हो जाय।

या  करप्ट की मार से, अन्तर्मन कुम्हलाय।।

*

कहें, सुनें, देखें, लिखें,मोबाइल पर आज।

जीवन में यह यूँ घुसा,ज्यूँ खुजली में खाज।।

*

मिलना-जुलना,बातचीत, आना-जाना बंद।

मायावी  मोबाइल  के, आकर्षक  छलछंद।।

*

आत्ममुग्ध मद मोह में, यश-कीर्ति की चाह।

मोबाइल   से   हो   रही, नव  पीढ़ी  गुमराह।।

*

उठत-बठत, खावत-पिवत,मोबाइल में जान।

सतित पतित दुर्गतित सभी,चकित,थकित श्रीमान।।

*

यूँ  तो  उपयोगी  बहुत, जोड़े  देश – विदेश।

अति हो जाये जब कहीं, तब पहुँचाए क्लेश।।

*

समय  बचे  संवाद हो, नए पुराने  मित्र।

स्नेह भाव से देख लें, इक-दूजे के चित्र।।

*

हो उपयोग विवेक से, बहुत काम का यंत्र।

विश्व ज्ञान इसमें भरा, अभिनव  मैत्री मंत्र।।

*

मोबाइल का  हो  यदि, संयम  से  उपयोग।

ज्ञान ध्यान सम्मान के, बनें विविध संजोग।।

*

मोबाइल तो है हमें,  तकनीकी  वरदान।

भस्मासुर हम न बनें, करें नहीं विषपान।।

☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १३५ ☆ जाएँ तो कहाँ? ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “जाएँ तो कहाँ?”।)       

✍ जय प्रकाश के नवगीत # १३५ ☆ जाएँ तो कहाँ? ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

हम परिन्दों के लिए

डालते रहे दाना और पानी

और वे बिछाते रहे जाल

फँसाते रहे हैं सदा मछलियाँ

चुगते रहे हैं सबका दाना

बुन लिया गया है

उनके द्वारा ऐसा ताना-बाना

जिस तरह बुनती है मकड़ी

अपना जाल

और जब कोई कीट उलझता है

उस चक्रव्यूहनुमा जाल में

तब होता है शुरु शोषण

तब हम चाह कर भी नहीं निकल पाते

यह एक ऐसा व्यामोह है

जिसे ओढ़कर विवश हैं हम

और आने वाली पीढ़ियाँ

जीवन के इस संघर्ष में अपनी

जिजीविषा को लेकर जाएँ तो कहाँ?

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares