☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ५ – टिक टिक – ☆ विभावरी कुलकर्णी ☆
सध्या लहानमुलांसाठी खूप आकर्षक म्हणजे अगदी मोठ्या माणसांना सुद्धा भुरळ पडावी अशी खेळणी दिसून येतात. ती खूप महाग पण असतात. काही खेळणी ज्ञान वाढवणारी असतात. परंतु साधारण चाळीस वर्षांपूर्वी एक लोकप्रिय असलेले खेळणे मला आठवते. त्याची किंमत असेल दहा किंवा पंधरा पैसे. पण मुलांच्या दृष्टीने उपयुक्त! त्याचे नाव टिक टिक किंवा टीन क्लिकर
या वस्तूला ‘कडकडी’ सुद्धा म्हटले जाते. इंग्रजीत याला ‘Metal Clicker’ किंवा ‘Cricket’ असेही नाव आहे. खेळणी म्हणून: ८० च्या दशकातील मुलांचे हे सर्वात आवडते आणि स्वस्त खेळणे होते. अंगठ्याने तो धातूचा पत्रा दाबला की ‘कडक’ असा आवाज येतो, म्हणून मुले याचा वापर गंमत म्हणून किंवा एकमेकांना खुणावण्यासाठी करत असत.
फार कमी लोकांना माहीत आहे की, अशा प्रकारच्या क्लिकरचा वापर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांद्वारे (विशेषतः पॅराट्रूपर्स) रात्रीच्या वेळी अंधारात एकमेकांना सांकेतिक संदेश देण्यासाठी केला जात असे. एकदा ‘क्लिक’ केल्यास उत्तर म्हणून दोनदा ‘क्लिक-क्लिक’ करणे, ही त्यांची ओळख पटवण्याची पद्धत होती.
निर्मिती
हे खेळणे लवचिक स्प्रिंग स्टील (Spring Steel) किंवा कथील (Tin) च्या पातळ पत्र्यापासून बनवले जाते.
एका छोट्या धातूच्या चौकटीत किंवा डबीत हा पत्रा अशा प्रकारे बसवलेला असतो की तो थोडा फुगीर राहतो.
जेव्हा आपण या पत्र्यावर दाब देतो, तेव्हा तो आपला आकार बदलतो आणि पुन्हा मूळ स्थितीत येताना हवेच्या दाबामुळे एक विशिष्ट ‘टीक’ आवाज निर्माण होतो. सुरुवातीला हे अगदी साधे पत्र्याचे असायचे. कधीकधी तो पुढचा पातळ पत्रा हाताला लागायचा. किंवा ते खिशात ठेवले की पत्र्याच्या टोकामुळे खिशाला छिद्र पडायचे. पण कोणालाही कळू न देता मित्रांना संकेत द्यायला उपयोगी होते.
मुले फक्त मजेसाठी हा आवाज काढत असत.
खेळताना (उदा. लपाछपी किंवा पकडापकडी) एकमेकांना दूरून संकेत देण्यासाठी किंवा बोलावण्यासाठी याचा वापर व्हायचा.
गाणी म्हणताना किंवा ठेक्यावर वाजवण्यासाठी मुले याचा वापर करत.
काही मुले हे आपल्या सायकलच्या हँडलला लावून बेलसारखा वापर करायची.
नंतर या साध्या दिसणाऱ्या टिकटिकला आकर्षक रंग लावून किंवा काही प्राण्यांचे आकार देऊन रंगीबेरंगी करुन आकर्षक केले गेले.
याच्या आवाजाच्या मदतीने कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जात होते.
हे खेळणे आता दुर्मिळ झाले असले तरी, आजही जत्रेत किंवा जुन्या वस्तूंच्या दुकानात पाहायला मिळते.
☆ ते लोक… (अनुवादित) – हिन्दी लेखक : सुशांत सुप्रिय ☆ उज्ज्वला केळकर ☆
रेल्वेच्या या डब्यात ते चौघे आहेत. मी मात्र एकटाच आहे. ते हट्टे -कट्टे आहेत. मी मात्र अशक्त, मरतुकडा आहे. ते उंच, तगडे आहेत, मी मात्र सर्वसामान्य आहे. घाईघाईत मी चुकीच्या डब्यात चढलो की काय? मी यावेळी त्या लोकांच्या मध्ये असायला नको आहे. माझ्या अंतरात कुणीतरी मला चेतावणी देत आहे.
देशातील अनेक भागात दंगे होताहेत. आमचा भाग त्यापासून अस्पर्शित आहे. पण केव्हा काय होईल, कुणास ठाऊक? पुढचा तासभर मला यांच्यापासून सावध राहायला हवं.. जपर्यंत माझं स्टेशन येत नाही, तोपर्यंत…
मी चोरट्या नजरेने त्यांच्याकडे बघतो. दोघांची लांब दाढी आहे. चौघांनी हिरवा कुडता आणि पायजमा घातलाय आणि पांढरी जाळीची गोल टोपी घातलीय. ते चौघे माझ्याकडे टवकारून का पहाताहेत? काही गडबड तर नाही. त्यांचे विचार धोकादायक तर नाहीत.?
भयाचा एक सूक्ष्म गंध हवेत मिसळला होता. मी तो वास घेऊ इच्छित नव्हतो, तरी तो माझ्या नाकात घुसत होता आणि डोक्यापर्यंत संदेश पोचवत होता, त्यामुळे मी अस्वस्थ होत होतो. कुठल्या तरी अघटिताची, अनिष्टाची अशुभ सावली माझ्यावर पडते आहे आणि बेचैनी माझ्या आत पंख फडफडू लागते आहे. देशातील अनेक भागात आतंकवाद्यांनी बॉम्ब -स्फोट केले आहेत. शेकडो लोक मारले गेले आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी दंगे सुरू झाले. दगडफेक, आगी लावणे, लूट-पाट होऊ लागली. त्यानंतर अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला. मी शांतपणे जगू इच्छतो. पण शांतता आज एक दुर्मिळ गोष्ट झालीय. दुर्मिळ आणि अप्राप्य. नरभक्षी जनावरांसारख्या शंका मला चिरू -फाडू लागल्या आहेत.
एकदा माझे डोळे त्यांच्या डोळ्यांना भिडतात. त्यांच्या सावळ्या चेहऱ्यावर उगवलेले थंड डोळे माझ्याकडे बघताहेत. ते लोक आमच्यापेक्षा किती वेगळे आहेत. आम्ही सूर्याची पूजा करतो, तर त्यांचं चंद्रावर प्रेम आहे. आम्ही डावीकडून उजवीकडे लिहितो, तर ते अगदी उलट, उजवीकडून डावीकडे लिहितात. आमची सगळी पवित्र तीर्थस्थाने याच देशात आहेत, तर त्यांची या देशाच्या बाहेर आहेत. त्यांचं नाक, त्यांचे डोळे, त्यांचा बांधा, त्यांचं रूप-रंग सगळं आमच्यापेक्षा वेगळं आहे,
ते माझ्याकडे टक लावून का बघताहेत? ते आतंकवादी तर नसतील? त्यांच्या बॅगेत ए. के. 47 आणि बॉम्ब तर नसतील? बाहेर थंडी असूनही मला घाम येतोय. शरीर कापतय. जसं काही लाल तिखट डोळ्यात गेलय. तहानेनं माझा घसा कोरडा पडलाय. जीभ टाळूला चिकटलीय. मी ओरडू इच्छितोय, पण गळ्यातून आवाज बाहेर येत नाही. माझ्या खाका घामान भिजल्या आहेत. कपाळावरून गंगा, यमुना, सरस्वती वहातेय. आज मी बी. पी. ची गोळी खाल्ली नाही का? माझ्या डोक्यातील नसांमध्ये इतका तणाव का भरला गेलाय? माझ्या डोळ्यांपुढे अंधार पसरत चाललाय. मला चक्कर येतेय का? मला श्वास घ्यायला इतका त्रास का होतोय? माझ्या छातीवर इतका जड दगड कुणी ठेवलाय?
अरे, तो दाढीवाला माणूस उठून माझ्याकडे का येतोय? मला सुरा मारेल की काय तो… अरे देवा, डब्यात कोणी पोलिसवालाही नाही. आज काही मी वाचत नाही. त्याच्या गोळ्या आणि बॉम्बचा घास बनेन मी! नाही तर यांच्या सुऱ्याचा घास बनेन! भिंतीवर टांगलेल्या फ्रेममधील फोटो बनेन मी! भूतकाळ आणि इतिहास बनेन मी! असं मरायचं होतं तर मला! दंगेखोरांच्या हाताने… ऐन तारुण्यात. रेल्वेच्या रिकाम्या डब्यात. अकारण. पण आता माझं वय तरी काय आहे? माझ्यानंतर माझ्या बायको-मुलांचे काय होईल? नाही… नाही… थांबा थांबा. माझ्याजवळ येऊ नका. तुम्हाला तुमच्या देवाची शपथ. माझे प्राण वाचवा.
ओह! माझ्या मनात या माशा का भिणभिणताहेत?
‘भाईजान, आपली तब्बेत बिघडलीय का? इतक्या थंडीतही आपल्याला घाम आलाय. आपण कापत आहात. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे, असं वाटतंय. आपण घाबरू नका. धीर धरा. आम्ही आपल्याबरोबर आहोत. अल्लाह सगळं ठीक करेल. ’
तो माझ्या चेतनेच्या मुखाशी टकटक करतोय. तो कुणी भला माणूस वाटतोय. आता त्याचा चेहरा १९६५च्या भारत-पाक युद्धाचा हिरो अब्दुल हमीदच्या चेहऱ्यात बदललाय. नाही… नाही… आता त्याचा चेहरा आपले भूतपूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अबुल कलामध्ये रूपांतरित झालाय…
आता त्याचा चेहरा सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अलीसाखा ओळखीचा वाटतोय. आता तो माणूस गुलाम अलीच्या अंदाजात गातोय,
ये बातें झूठी बातें हैं
ये लोगों नें फैलाई हैं… बातें
आह! … ही डोकेदुखी… हा अंधार.
गाडी थांबलीय. बहुतेक स्टेशन आलं वाटतं. ते लोक मला आधार देऊन गाडीतून उतरवताहेत. आता ते मला कुठे तरी घेऊन जाताहेत… आता मी हॉस्पिटलमधे आहे… त्यांनी माझ्याकडून फोन नंबर घेऊन सुमीला, माझ्या पत्नीला बोलावून घेतलय.
नाही… नाही ते वाईट लोक नाहीत. मी चुकलो होतो. ते चांगले लोक आहेत. माणुसकी अजून जिवंत आहे.
‘यांचं बी. पी. खूप हाय झालं होतं. या लोकांनी योग्य वेळी त्यांना इथे आणलं. मॅडम, तुम्ही या चौघांचे आभार माना. औषधांनी बी. पी. आता कमी झालाय. आपण यांना घरी घेऊन जाऊ शकता. यांना जास्तीत जास्त आराम करू द्या. ’ डॉक्टर सुमीला सांगत होते.
आता मी पहिल्यापेक्षा बरा आहे. माझी पत्नी आणि ते चौघे मला हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन येत होते.
‘भाईसाहब मी आपल्या सगळ्यांची अत्यंत ऋणी आहे. मी आपले आभार कसे मानू? आपल्यामुळेच आज यांचे प्राण… ’ सुमीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते.
‘कैसी बात करती हो बहन! आम्ही जे केलं, ते आमच्या भावासाठी केलं. अल्लाहची हीच मर्जी होती. ’
मी अतिशय शरमिंदा झालो. आपलं सारं कामकाज सोडून ते चौघे मला मदत करत होते. आम्ही सगळे एकाच आईची लेकरे आहोत. आम्ही एका माणसाचे दोन डोळे आहोत. आम्ही एकाच प्रदेशातील रहिवासी आहोत. आमचं रक्त आणि घाम एक आहे. ते परके नाहीत. आमच्यापैकीच आहेत.
” ख़ुदा हाफ़िज़, भाई. आपली काळजी घ्या. ’
” ख़ुदा हाफ़िज़! ’
टॅक्सी निघाली. दूर जाणार्या त्यांच्या पाठी खूप ओळखीच्या वाटू लागल्या. जशी त्यांची पाठ माझ्या वडलांची पाठ आहे. जशी त्यांची पाठ माझ्या भावाची पाठ आहे. असं वाटत होतं, मी त्यांना कित्येक वर्षे ओळखतो आहे.
टॅक्सी माझ्या घराकडे जात होती. बाहेर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. उशिरा उगवणारा चंद्र्देखील आकाशात वर चढून तेजाने चमकत होता आणि माझा रस्ता प्रकाशित करत होता आणि सुमी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत होती, ‘ ती माणसं नव्हती, देवदूत होते. ‘
मूळ हिन्दी कथा- ‘वे’ –
मूळ लेखक – सुशांत सुप्रिय
मो. – 8512070086
मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर
संपर्क –निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “नोकरीमधली एक मजेशीर आठवण (टेल्को फौंड्री)…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
– – रॉबर्ट यांचा विश्वास!
नोकरीमधला सगळ्यात मोठा पिरियड मी तेव्हाच्या टेल्को मधे चिंचवडला फौंड्री या विभागामधे काम केले. फौंड्री म्हणजे इथे लोखंडाचा रस तयार करतात आणि तो रस निरनिराळ्या साच्यांमधे ओतून गाड्यांना लागणारी कास्टिंग तयार करतात. मी मेंटेनन्स म्हणजे मशीन ची दुरुस्ती आणि देखभाल ह्या विभागात काम करत होतो. त्यामुळे माझ्याकरता ८ तासांची म्हणजे एक शिफ्ट ची नोकरी असा प्रकार नव्हता. बऱ्याच वेळा २ किंवा ३ शिफ्ट पण थांबावं लागायचं. एकदा शॉपमध्ये मेजर ब्रेक डाऊन आल्यामुळे, मी सलग ५ शिफ्ट शॉप मधे काम केले आहे. म्हणजे आज सकाळी कामावर गेलो आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२. ३० घरी आलो. तेव्हा घरी फोन करून काही कळवण्याची सोय पण नव्हती. बायकोला माहित असायचं, कि हे आले नाहीत म्हणजे कंपनीमधे आहेत, आणि काळजीचे काही कारण नाही. जास्त थांबल्याचा फायदा म्हणजे नंतर कॉम्पेन्सेटरी ऑफ घेता यायचा.
लोखंडाच्या रसाची हाताळणी सतत होत असल्यामुळेअसुरक्षितता, मशीनचे कर्कश्य आवाज, आणि शॉपमधे चांगल्यापैकी एक्झॉस्ट सिस्टीम असूनही खूप धूळ, असे वातावरण कायमच शॉपमधे असायचे. पण सवय झाल्यानंतर त्याचे काही वाटायचे नाही.
लोखंडाचा रस करण्याकरता आमच्याकडे १२ टन क्षमतेच्या तीन विजेच्या भट्टी होत्या. अजून सुधारणा करण्याकरता ४० टन क्षमतेची होल्डिंग फर्नेस घेण्याचे मॅनेजमेंट ने ठरवले. आपली ८ फूट बाय ८ फूट खोली असते, तेवढी मोठी ही भट्टी असणार होती. १९७८ चा पिरियड होता. त्याप्रमाणे स्वीडन मधल्या ASEA या कंपनीवर ऑर्डर निघाली. भट्टीचे सगळे सामान आले. आणि भट्टीची उभारणी करण्याकरता स्वीडनचे इंजिनियर श्री निमीनन इथे आले. उभारणी करण्यात त्यांच्याबरोबर काम करण्याची मला छान संधी मिळाली. कधी कधी निमीनन यांना कार मधून हॉटेल मध्ये सोडणे किंवा तिथून ऑफिस ला आणणे हे काम माझ्याकडे यायचे. कार मध्ये बसल्यावर ते डोळे मिटून बसायचे, कां? तर, रस्त्यावरचा बेशिस्त ट्रॅफिक बघून त्यांना टेन्शन यायचे. ते म्हणायचे, स्वीडन मध्ये कोणीही कुठलाही ट्रॅफिक नियम कधीच मोडत नाही. त्यामुळे रस्त्यावर एकदम सुरक्षित वाटते. इथे अगदीच विरुद्ध आहे. मी चूप व्हायचो, काय उत्तर देणार!
निमीनन यांचे उभारणीचे काम संपले. आणि ते परत गेले. भट्टी सुरु करण्याकरता कमिशनिंग इंजिनियर ही वेगळी व्यक्ती येते. त्याप्रमाणे ASEA कंपनीचे जर्मनी मधले श्री रॉबर्ट इथे आले. कारमधून ऑफिस समोर उतरल्यावर ते बॅगेतून एक नवीनच घेतलेली कॅप काढायचे आणि डोक्यावर घालायचे. त्यावर समोरच्या फ्लॅप वर ASEA असे लिहिलेले होते. शॉपमध्ये काम करतांना त्यांच्या डोक्यावर ती कॅप कायम असायची. त्यांच्याबरोबर पण काम करण्याची मला छान संधी मिळाली. त्यामुळे शिकायला पण भरपूर मिळाले. म्हणता म्हणता रॉबर्ट यांचे काम संपले, भट्टी व्यवस्थित सुरु झाली, तिचा वापर पण सुरु झाला. रॉबर्ट यांची परत जाण्याची वेळ जवळ आली.
त्यावेळी श्री चौधरी साहेब हे फौंड्री चे मुख्य होते. रॉबर्ट यांच्या जाण्याच्या दिवशी सकाळी ११ वाजता चौधरी साहेबांनी स्पेशल मिटींग बोलावली. सगळ्या डिपार्टमेंट्स चे मुख्य, संबंधित स्टाफ, यांनां बोलावले होते. अर्थात मी पण त्यामधे होतोच. श्री रॉबर्ट पण हजर होते. ऑफिस च्या कॉन्फरन्स हॉल मधे मोठा अंडाकृती टेबल आहे. दोन्ही टोकांना एक एक खुर्ची आहे आणि दोन्ही बाजूला साधारण ८ – ८ खुर्च्या आहेत. आणि बाजूनी पण मागच्या भागात खुर्च्या आहेत. महत्वाची मिटिंग असल्यामुळे ११ ला हॉल पॅक झाला. चौधरी साहेब पहिल्या चेयर वर बसले होते आणि त्यांच्या डाव्या बाजूला श्री रॉबर्ट बसले. त्यांच्या बाजूला श्री सेठीसाहेब, राजाराव, के एस राव, नाडगर, देवधर, शेखर अशी सिनियर मंडळी होती. आणि दुसऱ्या साईडला श्री होडीवाला, इक्बाल सिंग, कोपरकर, बसूतकर, गद्रे, ताराबादकर ही सिनियर मंडळी बसली होती. माझा नंबर टेबलच्या दुसऱ्या टोकाच्या म्हणजे चौधरी साहेबांच्या बरोबर समोर दुसऱ्या टोकाच्या च्या खुर्चीवर लागला.
चौधरी साहेबांनी आधी फर्नेस च्या उभारणीचा उल्लेख केला आणि श्री निमीनन यांचे आभार मानले. फर्नेस व्यवस्थित सुरु करून दिल्याबद्दल श्री रॉबर्ट यांना पुष्पगुच्छ आणि गिफ्ट देऊन त्यांचे आभार मानले. आता रॉबर्ट यांचे काम संपले आहे आणि आज दुपारी ते आपल्या मायदेशी परत जाणार आहेत असे सांगितले. त्यांच्या संपर्कात राहून सगळ्यांनी आवश्यक ती माहिती घेतली असणार आहेच. पण अजून कुणालाही काही लास्ट मोमेन्ट शंका असतील, तर त्या त्यांनी श्री रॉबर्ट यांना आज जरूर विचाराव्या, जेणेकरून आपल्या सगळ्यांना फर्नेसचा वापर करतांना यापुढे काहीही अडचण येणार नाही. पुढचे नियंत्रण त्यांनी रॉबर्ट यांच्याकडे दिले.
श्री रॉबर्ट : (रॉबर्ट जर्मनी मधे रहात असूनही इंग्रजी छानच बोलायचे) माझ्या कामात सगळ्यांनीच मला छान सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. माझे सगळेच काम खेळीमेळीच्या वातावरणात छानच झाले. माझ्या राहण्याची आणि इथे रोज जाण्या-येण्याची पण व्यवस्था खूपच छान होती. चौधरी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शंका जरूर विचारा —
(सगळ्यांना वाटले की आता लोक शंका विचारतील आणि रॉबर्ट उत्तरे देतील)
पण रॉबर्ट यांनी एकदम गुगली टाकली. त्यांनी स्वतःच्या डोक्यावरची ASEA लिहिलेली कॅप हातात घेतली आणि टेबलवरून ती माझ्याकडे भिरकावली. कॅप बरोब्बर माझ्यासमोर येऊन थांबली.
रॉबर्ट : Karandikar, This cap is for you and cap is now yours.
रॉबर्ट : (सगळ्यांना उद्देशून) चौधरी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शंका जरूर विचारा, पण त्यांना मी उत्तरे देणार नाही, माझ्या वतीने मिस्टर करंदीकर उत्तरे देतील.
मी स्वतःला चिमटा काढून जागे असल्याची खात्री करून घेतली. माझ्या बाजूला बसलेल्यांनी हात मिळवून माझे अभिनंदन केले.
प्रश्नोत्तरे सुरु झाली. सगळ्यांनीच सहभाग घेतला. थोड्याच वेळात चहा आणि बिस्किटे आली. १ वाजता मिटिंग संपली. सगळ्यांनी रॉबर्ट यांना बाय बाय केले आणि आम्ही जेवायला कँटीन मध्ये गेलो.
असा आणि इतका विश्वास कोणी अनोळखी परदेशी माणूस आपल्यावर दाखवू शकतो, हा एक आगळा वेगळा आणि स्फूर्तिदायक अनुभव आज मला मिळाला. (मी मनात देवाचे आभार मानले आणि फौंड्री चे आभार मानले, आणि रॉबर्ट यांचे आभार मानले)
‘श्रद्धा’ ही जगण्यातली ॲबस्ट्रॅक्ट भावना आहे असं मला वाटतं. आपण कुठल्यातरी गोष्टीवर श्रद्धा ठेवतो म्हणजे नक्की काय करतो? श्रद्धा ही फक्त सगुण उपासने पुरतीच मर्यादित नाही. ईश्वर हे जर आपण मोठं तत्व मानलं तर ते ठराविक रूपात, ठराविक आकारात ठराविक प्रकारेच व्यक्त होईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे जर आपण त्या शक्तीवर विश्वास ठेवला तर ती शक्ती म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट भावनेसारखीच वाटू लागते. एखाद्या कृतीतून, एखाद्या विचारातून आपण त्या भावनेशी जोडले जातो आणि मग नंतर मात्र ती भावना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात पण मूर्त रूपात आपल्याला जाणवायला लागते. ती दृष्टी आपली असते ते व्हिज्युअलायझेशन आपलं असतं. सगळ्यांना ते त्या प्रकारेच जाणवेल असं म्हणता येत नाही. त्याला कधी आपण प्रचिती आली असं म्हणू शकतो कधी दृष्टांत झाला असा म्हणू शकतो किंवा आणखीन काही. पण ती असते अमूर्त. आपण जशीच्या तशी आपल्याला आलेली अनुभूती दुसऱ्याला दाखवू शकत नाही. कारण प्रत्येकाचं मन त्यातला भावना आणि त्याचं या ईश्वरी शक्तीशी जोडलं जाणं हे वेगळ्या प्रकारे असतं. एका झाडाच्या सगळ्या फांद्या जशा एकसारख्या नसतात हे आपण समजतो त्याचप्रमाणे एका भावनेच्या प्रगटीकरणाची अनेक रूपं असू शकतात. हेही जाणून घेतलं की ईश्वरी शक्ती आहे /नाही अमुक एक रूपात आहे किंवा नाही हे सगळे वाद निरर्थक आणि व्यर्थ वाटू लागतात.
कधी कधी प्रश्न पडतो माणसाला या शक्तीचं इतकं आकर्षण का आहे? जेव्हा जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सोडवण्याचा माझ्यापरीनं प्रयत्न करते तेव्हा जाणवतं की स्वामी समर्थ असे म्हटल्यानंतर जी एक मनात प्रबळ भावना येते ती स्वामीत्वाची असते. माणसाला स्वामित्व हवं असतं पण ते त्याला मिळण्यासाठी कुठेतरी कनेक्ट होणं गरजेचं असतं. ते कनेक्शन देणारी कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी विशेष आणि आदरणीय असते. स्वामींच्या चरणी लीन होत असताना आपल्या जगण्यातल्या अनेक समस्या दूर होऊन आपल्याला त्यांचं स्वामित्व मिळावं आणि त्यासाठी त्यांनी कृपा करावी हा साधा विचार मनात असतो. म्हणजे एकूण जर आपल्या श्रद्धेच्या पाठीमागचं कारण सच्चेपणाने शोधायला गेलो तर अनेकदा ते जगण्यावरचं स्वामित्व मिळवणं असतं. कारण खूपदा अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर नियंत्रण नसतं. अशा वेळी स्वतःवर नियंत्रण आणि परिस्थितीवर नियंत्रण या दोन्हीचा संयोग साधण्यासाठी ही श्रद्धा कामी येते. काही प्रसंग काही घटना यातून पुन्हा पुन्हा जेव्हा आपल्याला हा दिलासा मिळतो, तेव्हा आपली श्रद्धा अधिकाधिक बळकट होत जाते.
आज स्वामी प्रगट दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला ही श्रद्धा मिळो आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होऊन सर्व काही मंगल होवो या शुभेच्छा! बाकी मला सगुण आणि निर्गुण दोन्ही रुपात स्वामी तितकेच आपलेच वाटतात.
मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे… हे एवढं १९५ मीटर्सचं अंतर चढून गेलं… दोन रात्रींत की… भारतीय सैन्याचे शूर जवान पाकिस्तानी खंदकांमध्ये घुसून हाहा:कार माजवणार आणि शत्रूला तिथून हुसकावून लावणार हे निश्चित होतं… ही सैन्यचौकी परत भारताच्या ताब्यात येणार हेही निश्चित होतं. आणि असं असताना सर्वांत पुढे असणा-या सैनिकाला मोहिमेचे प्रमुख लष्करी अधिकारी आज्ञा देत आहेत… माघारी फिर!
“नाही, साहेब! मी माघारी नाही जाणार मोहिम अर्धवट सोडून! ” ब्रावो निर्धाराने म्हणाला!
तो पर्वत त्याच्या मागील बाजूने पाच हजार फूट उंच वर चढून जायचं होतं. खरं तर पुढच्या बाजूने चढत जाणे सोपे आणि कमी वेळ घेणारं होतं… पण या बाजूने वर चढण्याचं धाडस करणं म्हणजे मरणाला स्वत: हाक मारण्यासारखं! कारण कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांच्या वेशात घुसखोरी करून भारताची काही ठिकाणं काबीज करून ठेवलेली होती. अनेक तरुण वीरांच्या प्राणांची बलिदाने देत देत ही सर्व ठिकाणं पुन्हा हस्तगत करण्याची मोहीम सुरु होती. या ठिकाणांपैकी हा पर्वत एक अतिशय अवघड आणि उंच पर्वत होता. शत्रू पर्वताच्या त्या उंच शिखरावर खंदक बनवून बसला होता.. आणि शत्रूच्या सैनिकांची संख्या होती दोनशेपेक्षा अधिक. आणि शस्त्रसज्जता खूप आधी, नियोजनपूर्वक करून ठेवलेली होती. उंचीवर असल्याचा फायदा घेत पाकिस्तान वरून भारतीय फौजांवर थेट आणि अचूक गोळीबार करू शकत होता. आणि म्हणूनच ही पोस्ट पाकिस्तानच्या हातून परत हिसकावून घेणं अनिवार्य झालं होतं!
मेजर साहेबांनी निवडक वीस जवान सोबत घेतले. योजना तयार होतीच. पण योजना कागदावर जेवढी सोपी वाटत होती तेवढीच अंमलात आणायला महाकठीण. या बाजूने कधीच कुणी वर चढून येऊ शकणार नाही, अशी खुद्द शत्रूचीच खात्री होती. कारण, चढण भयावह सरळसोट. त्यात बर्फ. पाय ठेवण्यात किंचित चूक म्हणजे हजारो फूट खाली कोसळून मृत्यू ठरलेला. इथून वर चढण्याचा विचार कोण करेल?
हा विचारच नव्हे तर कृतीही करू शकणारी एक सेना जगात आहे… भारताची… हिंद की सेना! एक प्रचंड वळसा घेत सेना निघाली. प्रत्येकाच्या खांद्यावर जगण्यासाठी, झोपण्यासाठी आणि लढण्यासाठीचं सारं अत्यावश्यक साहित्य… वजन खूप.. किमान चाळीस किलो तर निश्चित! एखादा ग्राम जरी वजन कमी नेता यावं म्हणून खाद्यपदार्थांची वेष्टने सुद्धा काढून टाकलेली होती… कारण शरीर त्याच्यावर लादलेल्या प्रत्येक ग्रामचा हिशेब मागत राहतं चालताना, डोंगर चढताना. पायांत खास बर्फातले बूट… बर्फातून वाट काढायची होती… आणि विरळ हवेतील प्राणवायू शक्ती लावून शरीरात ओढून घ्यायचा होता.
सारा प्रवास रात्रीच्या अंधारात… तशी चंद्रप्रकाशाची थोडीसी सोबत मिळायची पण ती थोडीशीच. चालताना चंद्रप्रकाशही धोक्याचाच होता. वरून जर शत्रूने खाली पाहिले आणि त्याला हालचाल दिसली तर प्राण वाचणार नाहीत असा गोळीबार होणार. दिवसा चालण्याचा प्रश्नच नव्हता. दिवस उजाडू लागला की पांढ-या रंगाचा पोंचू म्हणजे पावसाळ्यात घालतात तसा कोट अंगावर घ्यायचा आणि काहीही हालचाल न करता बर्फात पडून राहायचं… बर्फ मरणाचं थंड… तापमान दर्शवणारा पारा खाली खाली सरकतो आहे. लपण्यासाठी आडोसा कुठेच नाही… सर्वजण जमेल तिथे झोपून जात… पण झोप केवळ म्हणायला… दिवसभर वेळ घालवण्यासाठी गप्पा आणि हास्यविनोद… दबक्या आवाजातले! मोहिमेच्या मुख्य दोन-तीन जणांनी तर ठरवून टाकलं… पुढे आयुष्यात याच जागी यायचं आणि दिवस असाच काढायचा! मरणाच्या वाटेवर चालत असताना भविष्यकाळाचा विचार केवळ शूरच करू जाणे! तसं मोहिमेवर निघताना कमांडर साहेबांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रिय व्यक्तीच्या नावे एक पत्र लिहून द्यायला सांगितलं होतं. जो कुणी मोहिमेवरून परतू शकणार नाही, त्याच्या घराच्या पत्त्यावर हे पत्र पोहोचवले जाणार होतं!
रात्रीचे चालणं आणि दिवसा बर्फात एखाद्या दगडासारखं पडून राहणं… असं पाच-सहा दिवस चाललं. मुख्य पर्वत लागला तेंव्हा एका रात्रीत शे-सव्वाशे मीटर्सच प्रवास होई… पुढे चालणारे… नव्हे बर्फाच्या पहाडाला स्वत:चं शरीर चिकटवून वर वर जाणारे दोन जवान. अत्यंत अनुभवी आणि कुशल. त्या पर्वतीय भागाची खडानखडा माहिती असलेले जुने जवान. कमरेला दोर. एका हातात टोकदार कुदळ-कु-हाड. खांद्याच्या थोडंसं वर बर्फात कु-हाड टोचायची… मग दुस-या हातातली कु-हाड टोचायची… त्या कु-हाडीवर शरीराचं वजन पेलायचं… एक पाय खालच्या किंचितशा कपारीवर टेकवायचा… पहाडाच्या छातीत खिळा ठोकायचा… त्यात दोर ओवायचा… दोर खाली सोडायचा… त्या दोराला धरून खाली थांबलेले सैनिक वर चढणार… असे एक पाऊल वर टाकायचे म्हणजे घरच्या सपाट बागेत पंधरा मिनिटे सलग फावडे मारण्याइतके श्रम. कोपरापासून हात थंडीने आकडून जायचे. म्हणून एका वेळी एकाने एकएकदा दोर लावण्यासाठी वर जायचे… असे दोघे जण आळीपाळीने हे काम पार पाडीत होते… अजून वरून शत्रूने पाहिले नव्हते! या प्रवासात किती विश्रांती मिळाली असेल? काय खाल्ले असेल? शरीरधर्म कसा पार पाडला असेल? कुटुंबियांची किती आठवण आली असेल? शेवटच्या पत्रात काय लिहिलं असेल? शत्रू संख्येने किती आहे हे माहीत नाही… मोहिमेचा शेवट कसा होईल हे ठाऊक नाही! पण सैनिकांची पावलं थबकली नव्हती!
वाटेतल्या एका विशिष्ट जागी जवळचं इतर साहित्य ठेवलं गेलं… कारण ते घेऊन वर चढणं कठीण जात होतं. दोर लावून झाला की परत यायचं आणि हे साहित्य सोबत आणण्यासाठी जोडी जोडीने जायचं आणि यायचं. हे अंतर सुमारे दीडशे मीटर्स होतं. एकेदिवशी हे सामान परत आणायला गेलेल्या सैनिकांच्या जोडीच्या हालचाली शत्रूने टिपल्या… त्यांना आपले सैनिक दिसले नाहीत… पण एके ठिकाणी काही खुणा दिसल्या असाव्यात… त्यांनी त्या जागी बॉम्बगोळे टाकले. ते दोघेही सैनिक जबर जखमी झालेच असावेत!
आता पुढे आलेले अधिकारी आणि एक डॉक्टर त्यांच्या B. F. N. A. (Battle Filed Nursing Assistant) सह मागे पळत निघाले… बर्फात पळणं म्हणजे जमेल तेवढं वेगात चालणं. तेवढ्यात ते दोघे सैनिक यांच्याकडेच येताना दिसले… पुढे असणा-या सैनिकाच्या हातातून रक्ताची धार लागलेली होती.. दुसरा सैनिक त्याच्या काही पावलं मागे होता… डॉक्टर पुढे झाले आणि त्या सैनिकाचा हात हातात घेऊ लागले… तेवढ्यात त्या सैनिकाने डॉक्टरांना जोरात मागे ढकलले… आणि म्हणाला… ”साहब… पिछे वाले मेरे बडी को देखो… उसके सिर में घाव हुआ है! ”
डॉक्टर आणि नर्सिंग असिस्टंट मागे धावले… बॉम्बचा एक तुकडा त्या सैनिकाच्या डोक्याला खोलवर जखम करून गेला होता… रक्त वाहत होतं… त्याही गडबडीत नर्सिंग असिस्टंटने त्या सैनिकाच्या डोक्यावरचे त्या जखमेवरचे केस काढले… आणि एखाद्या सुसज्ज ऑपरेशन थिएटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स घालतात तसे अचूक, नीटस टाके घातले… त्यामुळेच त्या सैनिकाचे प्राण वाचणार होते. सैनिकांनाच नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते… रक्तस्राव थांबवणे, रुग्णाला स्थिर करणे, उपचारासाठी तिथून हलवणे अशी कौशल्ये सैनिकांना अवगत असतात. सफाईदारपणे रायफलचे ट्रिगर्स दाबणारी खडबडीत बोटं एखाद्या विणकर पक्ष्यासारखे नाजूक, अचूक टाके घालतात हे विशेषच म्हणावे लागेल.
आता केवळ १९५ मीटर्स अंतर उरलं… ते चढून गेलं की थोडी सपाट जागा येईल. तिथं शत्रूचे खंदक असतील… शत्रू आरामात खंदकाच्या खोलीत खोलवर बसून गोळीबार करीत असेल… आणि आपण त्यांच्यावर तुटून पडायचं!
शेजारच्या पहाडांवरून आपले इतर सैनिक आपल्या या बहादरांचा प्रवास पाहू शकत होते… श्वास रोखून. शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठी आपल्या तोफा खालून वर मारा करीत होत्याच पुढच्या दिशेने… यांना मागून वर चढता यावं अशासाठी ही योजना होती. ही शेवटची चढण चढायला आरंभ करण्याच्या वेळी, म्हणजे अंधार पडायच्या बेतात असताना या मोहिमेच्या प्रमुखाला वरिष्ठ पातळीवरून वायरलेस मेसेज आला… ”ब्रावोला परत पाठवून द्या! त्याच्या घरी आणिबाणीची वैद्यकीय परिस्थिती उदभवली आहे. त्याचे घरी असणे अत्यावश्यक आहे! ”
ब्रावो बर्फाच्या एका कड्याखाली वर चढायला सुरुवात करण्याआधी थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून बसला होता… साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं… त्याच्या चेह-यावर नेहमीचं एक हास्य होतं… पण त्या हास्याच्या थराखाली एक पुसटशी चिंताही दिसली! सैन्यात बारा-पंधरा वर्षांची सेवा झालेला ब्राव्हो… गावाकडे कुटुंब… आई-वडील, पत्नी. आदर्श मुलगा आणि प्रेमळ पती म्हणून गावात याची ओळख. एक शल्य मात्र मनाला टोचणी लावून होतं… पदरी अपत्य नव्हतं. पत्नी दोनदा आई होण्याच्या अगदी जवळ असतानाच वैद्यकीय कारणांनी घात केला… आणि अपत्यसुख दूर गेलं.
आणि आज मोहिमेच्या प्रमुख साहेबांना बेस वरून मेसेज आला आहे… पत्नी त्याच अवस्थेत आहे… यावेळी तिच्या जीवाला खूप धोका आहे! या मोहिमेच्या प्रमुखांसमोर एक यक्षप्रश्न उभा राहिला. मोहिम महत्त्वाची आहे… हा सैनिक महत्त्वाचा आहे… त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानेच इथवर दोर लावत लावत आपल्या दलाला सुरक्षित आणलं आहे… आता तर एक दोन रात्रीचीच चढण शिल्लक आहे! पण हा ब्रावो तर जीवाला जीव देणारा… तहान-भूक हरपून याने काम केलं आहे! आता याच्या पत्नीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा तिच्याजवळ तिच्या या निकराच्या प्रसंगी असला पाहिजे… कारण घरी म्हातारे आई-वडील… अशावेळी आपलं माणूस जवळ असावं!
मोठ्या काळजाच्या प्रमुखाने त्याही स्थितीत एक निर्णय घेतला… ब्रावोने त्याचं काम चोख बजावलं आहे… आता आम्ही उरलेलं काम करू! ते म्हणाले, ”ब्रावो… निघ. घरच्या मार्गाला लाग. इथून खाली जाणं तुलनेने सोपे आहे… वर यायला पाच दिवस लागले… खाली जायला दोनच दिवस लागतील… सोबत एक बडी देतो… जा… वहिनीला तुझी जास्त गरज आहे! ”
यावर ब्रावो एखाद्या लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला! ते पाहून प्रमुख अधिका-याचेही डोळे भरून आले! अंधार होऊ लागला होता… चढण सुरु करायला पाहिजे… वेळ गमवता कामा नये. पण ब्रावो काही केल्या तयार होईना… म्हणाला… ”साहेब, आपण अगदी जवळ आलोय… दोन रात्रींत पोहोचू वर. या मोहिमेत सहभागी होण्याचे भाग्य लाभावं म्हणून स्वयंस्फूर्तीने तुमच्या दलात आलो… कारण मला माहित आहे… मी डोंगर सफाईदारपणे चढू शकतो… माझा उपयोग होईल मोहिमेत! ”
यावर साहेब म्हणाले, ”ब्रावो, तुझी तर वार्षिक रजाही तू घेतली नव्हतीस. आता संधी आहे आणि गरजही. जा तू! ” त्यावर ब्रावो उत्तरला… ”अशा स्थितीत रजेचा विचारही मनाला शिवला नाही, साहेब! ” “हा तर माझ्या रेजिमेंटच्या इज्जतीचा सवाल आहे… नाम, नमक और निशान! ”
“साहेब, माझ्या सोबतीने आळीपाळीने दोरी लावण्यासाठी वर चढणा-या माझ्या बडीच्याअल्फाच्या पायांना मोठ-मोठे फोड आलेत… मी त्याला सांगितलं आहे… इथून पुढची सर्व चढण मी एकटा चढेन आणि दोर लावेन! ”
हे बोलणे सुरु असताना ज्याच्या पायांना फोड आलेले आहेत, असा त्याचा बडी, अल्फा पुढे झाला आणि त्यानेही ब्रावोची समजूत काढायला सुरुवात केली… एक एक क्षण पुढे जात होता… मोहिमेला उशीर होत होता!
सहका-याचे वाक्य पुरे होण्याआधीच ब्रावो एखादा स्फोट व्हावा तसा ओरडून म्हणाला… ”मला मूल झालंच आणि त्याने मला विचारलं… तुम्ही तुमच्या सहका-यांना ऐन लढाईत सोडून घरी निघून का आलात? तर त्याला मी काय सांगू? ”
सर्वच शांत झाले… प्रत्येकाच्याच मनात हाच सवाल होता. सर्वच जण एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे सैनिक. कुटुंबांपेक्षा जास्त सहवास लाभलेले वीर. कित्येक मरणं अनुभवलेली पहाडी मनं.
यात अर्धा पाऊण तास गेला… शेवटी प्रमुखांनी… Its an order, Bravo! असं म्हटल्यावर जड पावलांनी ब्रावो तिथून खाली जायला तयार झाला… त्यानेच लावलेल्या दोरावरून खाली खाली घसरत चालला… एखादी निर्जीव वस्तू असावी तसा!
इकडे दोन रात्री चढण चढत चढत सैन्य वर पोहोचले… आता केवळ काही मीटर्स अंतर राहिले होते… शत्रूचे खंदक आणि आपल्या सैनिकांत… प्रमुखांनी कवर फायर साठी बेसला मेसेज दिला… तिथून मेसेज आला… नो गन फायर! युद्ध थांबवण्याचा आदेश आला होता… Cease-fire घोषित झाले होते. भारताने ऑपरेशन विजय पूर्ण केले होते. पराभूत पाकिस्तानी सैन्य त्या पर्वतावरून खाली उतरायला सुरुवातही झाली होती!
इकडे याच वेळी ब्रावो घरी पोहोचला होता… त्याने साहेबांना मेसेज केला… ”साहेब, बाळ-बाळंतीण सुखरूप! मी बाप झालो! ”
घरची काळजी बाजूला ठेवत मोहिमेत सहभागी झालेला, डोंगराएवढी समस्या असतानाही डोंगर चढत राहण्यासाठी अडून बसलेला सैनिक, मोहिमेची काळजी असतानाही सहकारी सैनिकाच्या कौटुंबिक समस्येची काळजी वाहणारे कमांडिंग ऑफिसर, मोहिमेतले प्रमुख अधिकारी… या सर्वच गोष्टी अलौकिक! या सर्वांचीच जणू दैवानेच धर्म संकटातून सुटका केली होती!
(प्रस्तुत कहाणी कारगिल युद्धादरम्यान घडलेली आहे. मेजर दीपेंद्रसिंग सेंगर (सेवानिवृत्त) यांनी त्यांच्या एका भाषणात ही कथा सांगितली होती. सैनिकी पद्धतीनुसार त्यांनी त्यावेळी ब्रावो, अल्फा ही नांवे वापरली होती. ही नावे म्हणजे रेडीओ सिग्नल्स असतात. पण पुढे Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी ब्रावोच्या नावाचा उल्लेख केला आहे… सुभेदार मेजर बाळू मोहारे (निवृत्त)! आणि त्यांचे छायाचित्रसुद्धा दाखवले आहे.)
‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.
म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—
जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र.
*शास्त्राची तात्त्विक व्याख्या*
भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.
प्राचीन व्याख्या सांगते—
“शासनात् शंसनात् शास्त्रम्”
म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—
“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”
म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.
*शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप*
कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.
– – या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—
न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)
यांखेरीज—
वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु _त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे. _
*शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार*
भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.
शास्त्रांचा पाया उभा आहे—
श्रुति (अध्यात्मिक परंपरा)
युक्ति (तर्कबुद्धी)
अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)
शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.
म्हणूनच शास्त्र हे—
_वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे. _
*शास्त्र आणि विवेकबुद्धी*
शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.
ते शिकवते—
सत्य आणि असत्य यातील भेद.
नित्य आणि अनित्य यातील भेद
आत्मा आणि अनात्म याची ओळख
परंतु—
शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.
म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—
विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता
*शास्त्र आणि साधकाची भूमिका*
नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर
शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.
बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.
*कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन*
काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.
म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे
नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.
*शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे*
थोडक्यात—
जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.
शास्त्र हे—
जीवनाला दिशा देते
मनाला स्थैर्य देते
बुद्धीला स्पष्टता देते
*समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत*
शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.
☆ आई-वडिलांनी ठेवलेली मौल्यवान ठेव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆
☆
भाऊ-बहिणी म्हणजे केवळ नातं नसतं…
त्या आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी जपून ठेवलेल्या सर्वांत मौल्यवान ठेवी आहेत. याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खी भावंडं नाहीत तर चुलत, मावस, मामे, आत्ते सर्व भावंडांसाठी हे खरं आहे.
आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. आयुष्यात पुढे जाऊन आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ… अशी पुसटशीसुद्धा कल्पना आमच्या मनाला कधी शिवली नाही.
मोठे होत गेलो तसे आयुष्याला पंख फुटले…
स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले, आपापल्या संसारात रमलो, जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलो. दिवस, महिने, वर्षं सरकत गेली आणि कधी नकळतच भाऊ-बहिणींच्या भेटी ‘कधीतरी’ या शब्दात अडकून राहिल्या.
आज आम्ही क्वचितच भेटतो, पण मनातल्या आठवणी मात्र अजूनही रोजच भेटायला येतात…
आमचे आई-वडील हा एकमेव दुवा होता, ज्याने आम्हा सर्वांना जोडले.
ज्यांच्या प्रेमाच्या एका धाग्याने आम्हा सगळ्या भावंडांना एकत्र बांधून ठेवलं होतं.
नंतर मात्र आपण वेळेची वाटच पाहत राहतो… हळूहळू म्हातारे होईपर्यंत. तेव्हाच लक्षात येतं की आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत, आणि आजूबाजूची नाती एकेक करत कमी होत चालली आहेत आणि नेमकं तेव्हाच आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळायला लागते.
मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये शब्द कमी पण भावना अनावर झाल्या होत्या. थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. ते दृश्य बघताना शेवटी असं वाटतं… जणू ते भाऊ बहीण मनोमन एकमेकांना हेच आश्वासन देत असावेत की कदाचित ह्या जन्मात पुन्हा भेट नाहीच झाली, तर पुढच्या जन्मात मात्र आपण नक्कीच एकमेकांना भेटू…
असे काही नेटिझन्स होते, ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.
होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेलं असणे किती महत्त्वाचे आहे. तेव्हा संपत्ती, मान-सन्मान, यश सगळं मागे पडतं.
जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही या जगातून निघून गेलेले असतील, तेव्हा या विशाल, गर्दीच्या जगात तुमचे भाऊ बहिणीच सर्वात जवळचे लोक असतात.
मित्र काळाच्या ओघात दूर जाऊ शकतात… मुलं मोठी होतात… तीही आपापल्या विश्वात रमून दूर निघून जातात. पण आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा हाताला हात हवा असतो, तेव्हा खर्या अर्थाने साथ देत उरतात ते फक्त दोनच आधारस्तंभ —
तुमचा जीवनसाथी आणि तुमचे बहीण-भाऊ…
आपण कितीही म्हातारे झालो, तरी सर्व भाऊ-बहिणी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे.
त्यांच्या सहवासात वयाचं ओझंही हलकं होतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनाला उबदारपणाची कधीच कमतरता भासणार नाही.
त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही. म्हणूनच, वृद्धापकाळ येण्याआधीच…
कृपया, आपल्या भाऊ आणि बहिणींशी जुळवून घ्या, नाती जपा! कारण ही रक्ताची नातीच शेवटपर्यंत साथ देतात.
भूतकाळात काहीही अप्रिय घडलं असलं तरीही… भाऊ बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील, अधिक समजूतदार आणि अधिक क्षमाशील असले पाहिजे.
अशी कोणतीही गाठ नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यात बांधता येत नाही.
अशी कोणतीही ढाल नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यातून काढली जाऊ शकत नाही.
भाऊ बहिणींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत, कधीही जुनी नाराजी मनात बाळगू नये.
थोडे अधिक परस्पर अवलंबित्व, थोडं अधिक परस्पर पालनपोषणाने भाऊ बहिणीचे संबंध दिवसेंदिवस अधिक चांगले आणि अधिक घट्ट होतील… कारण या जगात, आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी ठेवलेली ही सर्व नातीच सर्वात मौल्यवान ठेवी आहेत.
शेवटचा प्रश्न…
एकुलते एक मुलं lucky की lonely?
आपल्या सोयीसाठी आजची पिढी स्वातंत्र्य, करिअर, आर्थिक सुरक्षितता, आरामदायी जीवन यांचा विचार करते…
परंतु भविष्यातील माणसं जगात येऊ न देणं… हे खरंच योग्य आहे का…?
समाज हळूहळू एकाकी, स्वार्थी आणि नात्यांपासून दूर जात तर नाही ना?
मुलं म्हणजे आपल्या जीवनाचा पुढचा अध्याय.
पण कधी शांतपणे आपण स्वतःला विचारतो का?
आपल्या मुलाच्या आयुष्यभराच्या एकटेपणाचा हिशोब आपण भरू शकणार आहोत का?
आपण मागे काय सोडून जाणार आहोत?
आपण ज्या Western world ची आंधळी नक्कल करतो, तोच पश्चिमेकडचा समाज आज पुन्हा ४–५ मुलांना जन्म देण्याकडे वळतोय.
कारण त्यांनी अनुभवलेय –
मोठी घरे, प्रचंड पैसा, प्रगत सुविधा असूनही त्यांच्या मुलांचं आयुष्य एकाकी, नैराश्यग्रस्त आणि संस्कृतिहीन होत चाललं आहे.
ते आता म्हणतात —
“We lost families in the race for freedom. ”
आपण इथे आहोत, कारण कुणीतरी आपल्याला जन्म देण्याचं धाडस केलं.
हजारो वर्षे आपल्या पूर्वजांनी दुष्काळ, रोगराई, युद्ध, गरीबी, अपमान, कष्ट अशा कितीतरी संकटांना तोंड देऊन आपल्याला जगवले.
आज काही जोडपी जाणीवपूर्वक “मुलंच नको” असा निर्णय घेत आहेत.
पण हा निर्णय फक्त त्या दोन व्यक्तींचा नसतो…
तो परिणाम करतो सर्व समाजावर, आपल्या गौरवशाली संस्कृतीवर आणि येऊ घातलेल्या अनेक पिढ्यांवर…
कृपया आजच्या आपल्या संस्कृतीच्या शिलेदारांनी शांत मनाने सारासार विचार जरूर करावा…
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत है, आपके काव्य संग्रह ‘उजास ही उजास’ की एक भावप्रवण कविता – शब्द नहीं रहे शब्द…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २७९ – अब तो जागो…२
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “कहने को आखिर क्या कहते...”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ # २७८ ☆।। अभिनव गीत ।। ☆
☆ “कहने को आखिर क्या कहते...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆