मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे मृत्यो… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

 

☆ हे मृत्यो... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

फक्त एकदा मला पाहू दे हिमशिखरांच्या उत्तुंग राशी

फक्त एकदा मला पाहू दे तोरण गगनी इंद्रधनुष्यी

फक्त एकदा मला पाहू दे वसंत पुलकित हिरवी राने

फक्त एकदा मला ऐकू दे वसंतातले कोकीळ गाणे

 *

निळ्या नभातील रंगपंचमी मला पाहू दे फक्त एकदा

गिरीशिखरातील निर्झर संगीत मला ऐकू दे फक्त एकदा

शिशिरामधला पहाट वारा मला घेऊ दे फक्त एकदा

रेशीम वस्त्रे चंद्राची ती मला लेऊ दे फक्त एकदा

 *

कोसळणा-या सहस्रधारांमध्ये नाहू दे फक्त एकदा

अन् मातीच्या कुशीत शिरूनी मला राबू दे फक्त एकदा

फक्त एकदा मला पाहू दे अवघ्या सृष्टीमधला ईश्वर

फक्त एकदा मला मरु दे इथले जगणे सरल्यानंतर

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पत्र लेखन + अभिनंदन – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌺  अ भि नं द न  🌺

कर्मयोगिनी महिला संस्था, पुणे यांनी ‘पत्रलेखन स्पर्धा’ आयोजित केली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील साहित्यिका विभावरी कुलकर्णी यांच्या पत्रलेखनास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई-अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे विभावरी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐💐

आजच्या अंकात वाचूया त्यांचे प्रथम पुरस्कार प्राप्त रचना – “पत्रलेखन…”

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆

🔅 विविधा 🔅

☆ पत्रलेखन ☆ विभावरी कुलकर्णी

(प्रथम पुरस्कार प्राप्त)

****

आदरणीय मॅडम,

सप्रेम नमस्कार.

आज तुम्ही आमच्यात देहरूपाने नसलात, तरी तुमची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. आपली पहिली भेट झाली तेव्हा जणू काही जन्मांतरीचे ऋणानुबंध असावेत, असा भास झाला होता. तुमच्या भेटीमुळे कोड्यासारखे गुंतागुंतीचे वाटणारे माझे आयुष्य एखाद्या सुंदर फुलासारखे उलगडत गेले. तुम्ही मला आयुष्याचा खरा उद्देश समजावून सांगितलात आणि त्यामुळेच मला जीवनाची एक नवी दिशा सापडली.

आज मी जी काही यशस्वी ‘रेकी मास्टर’ आहे, ते केवळ तुमच्यामुळेच. तुम्ही दिलेली दीक्षा, तुमची शिकवण आणि तुम्ही करून घेतलेली प्रात्यक्षिके माझ्या यशाचा पाया ठरली. तुमच्या मार्गदर्शनाखाली मी विविध ध्यानाचे (Meditation) प्रकार शिकले. तुमच्या सान्निध्यात आल्यावरच मला जाणीव झाली की माझी ज्ञानाची झोळी किती रिकामी होती. प्रत्येक शिष्याला समान वागणूक आणि समान ज्ञान देण्याची तुमची वृत्ती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होती.

रेकीचा खरा अर्थ आणि या पवित्र प्राणशक्तीचा उपयोग कसा करावा, याचे पूर्ण ज्ञान तुम्ही मला दिलेत. पंचमहाभूते, त्यांची उपयुक्तता आणि त्यांची ऊर्जा कशी प्राप्त करावी, हे तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलेत. रेकीचा उगम आणि त्यामागचे शास्त्र तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले की, त्यामुळेच मला आज समाजसेवेची संधी प्राप्त झाली आहे. तुम्ही दिलेल्या शिकवणीचा उपयोग मी आज लोकांसाठी करत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत.

कृतज्ञतेत कसे राहावे, आभार मानण्याचे महत्त्व काय असते, चराचर सृष्टीशी स्वतःला कसे जोडून घ्यावे आणि भूतदया कशी असावी, सर्वात राहून अलिप्त कसे असावे, लोभ – मोह दूर कसे ठेवावेत, निरपेक्ष वृत्तीने सेवा कशी करावी.

हे संस्कार तुम्ही माझ्यावर बिंबवलेत. आजही एखादा कठीण प्रसंग समोर उभा ठाकला की, तुमच्या नोट्स आणि तुमची शिकवण मला मार्ग दाखवते. आजही मनातल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या आठवणींतून मिळतात. आपल्यात गुरु-शिष्या पलीकडचे एक अतूट नाते निर्माण झाले होते. आपण दोघींनी मिळून मेडिटेशनवर एक पुस्तक लिहायचे ठरवले होते, पण काळाने ती इच्छा अपूर्णच ठेवली.

तुमची शिकवण आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत, याची मला खात्री आहे. ते आशीर्वाद असेच कायम लाभोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सदैव आपल्या कृतज्ञतेत,

तुमची शिष्या,

विभावरी

—–

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जलसाक्षर… भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ जलसाक्षर… भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे

(22 मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो. या जलदिनाच्या निमित्ताने नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने एक कथा स्पर्धा आयोजित केली होती. त्या कथा स्पर्धेतील माझी पारितोषिक प्राप्त कथा. जलदिनानिमित्ताने रसिकांसमोर सादर.)

(आणि या सर्व गोष्टी आपण उद्यापासून आपल्या घरात करायच्या असा त्यांने दीर्घ संकल्प केला. या संकल्पनेवर विचार करीतच वाचू रात्री शांत झोपी गेला.)

इथून पुढे  

सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलवर वाचून जाहीर केले की आपण आदर्श जलसाक्षर कुटुंब व्हायचे. आजपासून शॉवर बंद. फक्त एक बदली पाण्यातच अंघोळ करायची. वसू वसकन ओरडली “ते तुमचं जलसाक्षर वगैरे तुमचं तुम्ही बघा. मला मनसोक्त शॉवर घेतल्याशिवाय स्वच्छच वाटत नाही.शी! एक बादली म्हणे! आणि तुम्हाला काय ती थैरं करायची ना ती तुमच्यापुरती ठेवा. आम्ही निरझर ठीक आहोत” वासूने जलतज्ञाचे म्हणणे परोपरीने समजावून देण्याचा प्रयत्न केला, पण जलतज्ञा एवढी प्रतिभा शक्ती त्याच्याकडे नव्हती व मुळातच तो नवरा असल्याने साहजिकपणे वसूला आपलं म्हणणं पटवून देऊ शकला नाही. नेहमी प्रमाणेच सपशेल पराभव पत्करून गप्प बसण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय काय असणार होता? आता सू बरोबरच्या चर्चेचा निष्कर्ष काही वेगळा नसणार हे आमच्या चरणाक्ष वाचकांनी ओळखले असणारच. सासू म्हणजे प्रत्यक्ष बायकोची आई! तिच्यासमोर तोंड उघडणे त्याला आजपर्यंत जमले नव्हते ते आज कसे जमेल? त्यामुळे त्या आघाडीवर संपूर्ण शांतताच. पण सखू मोलकरीण जेव्हा धुणे भांडी होईपर्यंत नळ तसाच चालू ठेवून पाणी वाया घालवीत होती त्यावेळी मात्र वरील सर्व अपयशाचा राग एकवटून तो तिच्यावर ओरडला “आधी पाणी बंद कर. येथून पुढे असे पाणी वाया घालवलेले मला चालणार नाही.” असे काहीसे मोठ्या जोशात बोलून आपण निदान एक तरी शौर्यकृत्य करू शकतो याचे समाधान वाटून विजयी मुद्रेने तो ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यावर त्याने शिपायाला पंखा चालू करून पाणी आणायला सांगितले पाण्याचा ग्लास समोर आल्यावर त्याने शिपायाला सांगितले पाणी फक्त अर्धा ग्लास द्यावे शिपायाने लगेच अर्धा बेसिन मध्ये ओतला आणि त्याच्यासमोर ठेवला. वासू म्हणाला 

“अरे ते पाणी वाया का घालवतोस? अनेक लोक अर्धा ग्लास पाणी पिऊन अर्धा वाया घालवतात. आपणाला पाणी वाचवले पाहिजे. जलसाक्षर झालं पाहिजे.”

“हे बगा सायेब, तुमाला अर्धा ग्लास पाणी पायजे होतं, ते मिळालं ना? उरलेल्याचं काय झालं तुमाला काय करायचंय? समजा कुणाला अर्धा ग्लास नाही, पूर्ण हवा तर मी काही येरझारे घालत बसू काय? ते जमायचं नाय! आणि माझं वागणं खटकत असंल तर तुमी सोत्ता पाणी घेत जावा आजपासून.” 

पुन्हा दुपारी असाच ऑफिसमधील कलिग्ज कडूनही चेष्टाचा विषय बनलेला व जलसाक्षरतेच्या जागृती मध्ये सपशेल अपयशी ठरलेला आपला कथा नायक खिन्न मनाने घरी परतला. तिथेही वेगळंच संकट त्याची वाट बघत होतं. 

दारातून आत आल्या आल्या चहा सुद्धा न देता वसू त्याच्यावर ओरडली “तुमचं ते जलसाक्षरता वगैरे बंद करा बघू आधी! साऱ्या शहराचा ठेका काय तुम्ही घेतलाय का? तुम्ही आज सकाळी सखूवर ओरडला. ती काम सोडून चालली होती. आता काय धुणं भांडी तुम्ही करणार का? त्या जलसाक्षरते साठी? एक तर कामाला बाई मिळत नाही. तुम्ही असलेल्या बायांना पळवून लावा. मी कशीबशी तिची समजूत घातली, पण घरच्या बाबतीत अक्कल पाजळू नका! काय कोणाला जलसाक्षर करायचं ना ते ऑफिसमध्ये करा. घरी नको‌.”

आपल्या जलसाक्षरता मोहीमे मध्ये असाच चारी मुंड्या चितपट झालेला वासू श्रांत व क्लांत मनाने झोपी गेला. 

वासू सकाळी उठला कालच्या संपूर्ण दिवसाची नकारात्मकता त्याच्या मनात अजूनही भरून राहिली असल्याने त्याला निरुत्साही वाटत होते. अंगात थोडी कणकण असावी असेही त्याला वाटू लागले. कुणाशीही न बोलता चहा पिऊन तो आराम खुर्ची बाल्कनीत टाकून, आज फिरायला जाण्याचे रहित करून, आराम खुर्चीत विसावला. आज सिकलीव्ह टाकण्याचा निर्णय घेत डोळे मिटून शांत पडून राहिला. सखुबाई अजून आली नव्हती. आज ती आली नाही तर घडणाऱ्या महायुद्धाला कसं तोंड द्यायचं याचा तो विचार करू लागला आणि तो अधिकच अस्वस्थ होऊ लागला. घरातही सगळीकडे वादळापूर्वीची शांतता पसरली होती.

वासूला जरा डुलकी लागली आणि बेलच्या आवाजाने जाग आली. उशिरा का होईना सखुबाई आल्यामुळे त्याचा जीव भांड्यात किंवा अक्षरशः धुणंभांड्यात पडला असेही म्हणायला हरकत नाही. सखुबाईची तब्येत बरी नसावी. आल्या आल्या सासूने विचारले 

“काय झालं? वसू ss जरा सखुबाई साठी चहा टाक आणि मलाही टाक घोटभर तिच्याबरोबर” 

आणि संभाषण सुरू झालं 

“अवो, काय सांगू? आज पयलं पाणी आलं उशिरा, ते सुदा थेंब थेंब, काल पाणीबंदीचा दिवस, त्यामुळं पाण्यापाई भांडाभांड सुरू, कसंतरी चार बादल्या पाणी मिळालं. ते सुदा मारामारी करून. जीव मेटाकुटीला आला बघा. त्यात एका बाईनं कळशी मारली फेकून, कंबर दुखायला लागली. आता असं रोजच झालं तर काय करायचं आजीबाई? ” “सखू अगं यंदा धरणातलं पाणी आता संपायला आलंय. नगरपालिकेनं तरी कुठून आणायचं पाणी? आता आमच्याकडे बोरिंग आहे म्हणून चाललंय. पण ते सुद्धा किती पुरेल उन्हाळ्यात कुणास ठाऊक? अगं, जावईबापू तुला काल बोलले ते का आमच्यासाठी बोलले? आम्हाला पाणी थेंबा थेंबानं किंवा टँकरनं भरावं लागतं का? ते लागतं तुम्हालाच! आमच्या लहानपणी गावाकडं हौदभर पाणी आम्ही मुली हसत मजेत विहिरीचं ओढून भरायचो. त्यामुळे मला पाण्याचे महत्व कळतं. मी अजूनही कधी शॉवर घेतला नाही. एका बादलीत अंघोळ करते आणि माझं लुगडं मी स्वतः अर्धी वारली पाण्यातच धुवून टाकते. होय की नाही? हे बघ आपल्या गावाची लोकसंख्या समज दहा लाख. एका कुटुंबात चार माणसे धरली तर अडीच लाख कुटुंबं. आमच्या सारखी फ्लॅट बंगल्यात राहणारी निदान एक लाख कुटुंब तरी असतील. त्यांच्या घरी तुझ्यासारख्या बाया काम करतात ना? ” 

तेवढ्यात वसूनं चहा आणून ठेवला. आणि तीही आईच आईचं बोलणं ऐकू लागली. 

*सखू घे, चहा घे आणि ही गोळीही घे, अंग दुखायचं कमी होईल. तर मी असं म्हणत होते, या एक लाख घरांमध्ये तुझ्यासारख्या बायांनी जर पाच बादल्या पाणी वाचवलं. फक्त त्रास काय तर सारखा नळ चालू बंद करायचा. तेवढाच ना? पण तुझ्या या दुखण्यापेक्षा कमीच नाही का? जर एका कुटुंबात पाच तर एक लाख कुटुंबात पाच लाख बादल्या पाणी वाचेल ना? आता जावईबापू रोज चार बादल्या पाणी वाचवतात. वसु आणि सू नं निदान तीन-तीन बादल्या पाणी वाचवलं तर आमच्या दहा बादल्या. अशा एका घरातून पंधरा बादल्या पाणी वाचलं, तर एकूण 15 लाख बादल्या पाणी वाचलं ना? म्हणजे जर तुमच्या घरी पाच बाटल्या पाणी लागत असेल, तर तुमच्यासारख्या तीन लाख कुटुंबाची सोय होईल की नाही? मग हा वैताग मारामाऱ्याच बंद नाही का होणार? मी बाई फार शिकले नाही. पण अजूनही पाणी वाचवायचे अनेक मार्ग या तज्ञ लोकांना माहीत असतात. जावईबापू हुशार आहेत. जास्त शिकलेले आहेत. ते अशा तज्ञांची भाषणे ऐकून आपल्याला जे सांगतात ते आपल्याच भल्यासाठी ना? उलट त्यांचे कडून अशी भाषणे आपण समजून घेतली आणि ते उपाय आचरणात आणले तर! आपलाच सगळ्यांचा सर्व शहरवासीयाचा फायदा होणार आहे, होय की नाही! ”

आजीबाई खरं आहे तुमचं म्हणणं, मला पटलं बर का! काल मला साहेबांच्या बोलण्याचं वाईट वाटलं, पण आता पटलं की त्यांचं बोलणं आमच्यासाठीच होतं. आम्ही जर हित पाणी वाचवलं, तर आमचाच फायदा होईल. मी चुकले आजीबाई. साहेबांना सांगा चुकी झाली म्हणून. मी आजपासून पाणी वाचवणार नक्की! ” 

“आता कसं? आता तू हेच तुझ्या जवळच्या सर्व बायांना सांगायचं बरं का? आणि तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून पाण्याची बचत करायची, म्हणजे हा पाण्याचा प्रश्न सोपा होऊन जाईल” 

वसू सुद्धा आईचं बोलणं ऐकून म्हणाली “आई माझं सुद्धा चुकलंच. मी सुद्धा हे म्हणाले तसेच वागीन! ” या सर्व जाणांमध्ये सू कशी मागे राहील?

“आजी मी तुझ्यासारखंच माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सांगेन” 

असं म्हणत क्लासला पळाली. बाल्कनी मध्ये हे ऐकणाऱ्या वासू च्या डोक्यात जलसाक्षरतेचा प्रकाश पडत होता आणि सासूच्या अभिमानाने त्याचा उर भरून आला होता! एवढ्यात वसु बाल्कनीत आली आणि वासूला बघताच

 “आज असे का बसलात? बरं नाही का वाटंत? चला करू आत मध्ये बसा मी चहा आणते”

असं म्हणत चहा बेडरूम मध्ये घेऊन आली आणि म्हणाली 

“अहो माझं चुकलं बरं! मला माफ करा ना प्लीज! ” 

वसु म्हणाला “इतक्या दुरून माफी कशी करता येईल? त्यासाठी जवळ यावे लागेलच ना? ” 

“चला चावट कुठले” 

असं म्हणत असतानाच वाचू ने तिला माफ केले. 

आता वासूने वसूला कसे माफ केले असेल हे आमच्या चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच!

वासू आणि वसू सारखे माफीनामे तुमच्या आमच्या ही घरात घडोत. अशी ही जलसाक्षरतेची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!!!

– समाप्त –

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गावजत्रा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ गावजत्रा… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा झाला की महाराष्ट्रातील गावोगावच्या उत्सवांना आरंभ होतो. 

रब्बीची पिके घरी येवून पडलेली असतात. बुरुडाकडून आणलेल्या, गोमयाने अंतर्बाह्य लिंपून उन्हात खडखडीत वाळवून निर्जंतुक केलेल्या धान्यांच्या कणग्यांची पोटे नवधान्यांनी तट्ट भरल्यावर त्यांच्या तोंडी कडुनिंबाच्या पानांचे तोबरे भरून, वर राख आणि शेणांनी ती तोंडे लिंपली जातात. आता अश्विनापर्यंत तोंडे बंद!

उरलेल्या धान्यांच्या खरेद्या-विक्र्या होऊन शेतकऱ्यांच्या कनवटीला चार पैसे खुळखुळू लागतात. सगळीकडे आनंदीआनंद असतो. मुलं, नातवंडांना नवी कापडं, नातींना परकर-पोलकी- गवानं, तान्ह्याला आंगडी, टोपडी, कुंच्या, करगोटं आणि घरधणीन, सुना, लेकींना लुगडी-चिरे-चोळ्या घ्यायच्या असतात. जमलं तर कारभारणीला एखादा सोन्याचा डागही करायची इच्छा असते घरधन्याची. 

गावातील सार्वजनिक ग्रामदैवतांच्या मंदिरात नामसप्ताह आयोजित केले जातात. अखंड नामसंकीर्तनाखेरीज रोज संध्याकाळी वारकरी कीर्तने होतात. आठवडाभर ग्रामस्थ विठूभजनात मग्न राहतात. रामनवमी उत्साहाने पार पडते. हनुमानाचा जन्मोत्सव होतो. रामाला आणि हनुमंताला वाहिलेल्या मोगरा-दवण्याचा सुगंध मंदिराच्या गाभाऱ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत पुढे आठवडाभर दरवळत असतो. गावभर सुंठवडा वाटला जातो. एकूण मजा असते, आनंदी आनंद असतो.

आमच्या माळशिरस (भुलेश्वर) गावाचा भैरवनाथाचा उत्सव प्रतिवर्षी चैत्र बारशीला (चैत्र शु. द्वादशी) असतो. सकाळी सहा वाजता ग्रामदैवत, ‘पुण्याचे वेरुळ’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या भुलेश्वराला महाभिषेक, सात वाजता गावातील भैरवनाथाला महाभिषेक केला जातो. दुपारी बारा वाजता पाण्याची कावड नाचवत भुलेश्वरला नेली जाते. नंतर देवाच्या तांदळ्यावर (शिवपिंडीवरील दंडगोलाकार शाळिग्राम) जलधारा धरून अभिषेक केला जातो. रात्री साठेआठला गावात छबिना निघतो. ढोल-लेझिम पथके नाचतात. तरुण देहभान विसरून नाचतात, वाजवतात, नामगजर करतात. महिला, मुली, बालके नवी वस्त्रे लेऊन, नटूनथटून सहभागी होतात.

गावात पारावर, चौकात विविध वस्तू, मिठाया, खेळणी, कपडे, खाद्यपदार्थांची हाटेले इ. फिरत्या विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटलेली असतात. बाया घोळक्याने बाजारात फिरत, हसंत खिदळत, कलकल करीत खरेदी करीत असतात. एक लेकरु कडेवर, दुसरं बोटाला धरलेलं, तिसरं जरा थोरलं, आईच्या मागून ढकलंत घरंगळंत चालल्यासरखं चाललेलं, गर्दीतून चाँवचाँव करीत वाट काढीत पुढं पुढं जात असतात. लेकरासाठी जिलबी, गुडीशेव, भेळ, गारेगार घेत असतात. 

जत्रेच्या निमित्ताने घरोघरी सोयरेधायरे, व्याही मंडळी, मित्रमंडळी, पाहुण्यांचे आगमन झालेले असते. गोडाधोडाच्या जेवणावळी झडत असतात. आग्रह करकरून वाढले जाते. सारा दिवस धामधुमीत जातो. 

या दोन-चार दिवसाच्या धामधुमीत उपवर किंवा उपवधू कन्या-पुत्रांच्या विवाहासाठी योग्य उमेदवाराची चाचपणी, टेहाळणी काही धूर्त, चाणक्ष पालक करून घेतात. आपल्या कुटुंबासाठी सुयोग्य, आनुरूप सून-जावई हेरून ठेवतात. काही व्यवहारी मंडळी जमीन, घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सूतोवाच्य करून ठेतात, जुजबी बोलणी करून घेतात. विवाहाचे आणि जमीन, घर खरेदी विक्रीचे प्रत्यक्ष व्यवहार नंतर सोईने संपन्न होतात.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे चैत्र शु. त्रयोदशीला घरोघरी सामिष भोजने होतात. दुपारी चिंचेच्या बागात कुस्त्यांचे फड उभे राहतात. पंचक्रोशीतले मल्ल त्यात सहभागी होऊन आपापल्या क्रिडा नैपुण्याचे प्रदर्शन करतात. प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यांच्यावर कौतुक म्हणून रेवड्या उधळल्या जातात. उधळलेल्या रेवड्या हस्तगत करण्यासाठी त्यांच्यावर पोरा-टोरांच्या, प्रेक्षकांच्या उड्या पडतात. मोठ्या तरुणांच्या कुस्त्यांमधे विजेत्याला रोख रकमांची पारितोषिके दिली जातात. हौशी कुस्तीप्रेमी गावकरी पारितोषिकांच्या बोल्या लावतात. उत्तरोत्तर खेळ रंगत जातो. प्रेक्षकांपैकी काही जण विजयी वीरांना खांद्यावर घेऊन नाचवतात, मिरवतात. रात्री पारावरील मोकळ्या मैदानावर उभारलेल्या रंगमंचावर एखादे लोकनाट्य (तमाशा) रंगते.

नमन, गण-गौळण, लावणी, बतावणी झाली की मुख्य वगाला आरंभ होतो. ढोल्या विविध ताल व लयकाऱ्या वाजवून ढोलकीवरील आपले प्रभुत्व वारंवार सिद्ध करतो. पायपेटी वादक त्याच्या करामती दाखवतो. नृत्यांगनांचा लयबद्ध पदन्यास, गिरक्या, फिरक्या, मुरक्या, ठुमके आणि अदकारीला प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवून, डोईचे फेटे हवेत उडवून भरभरून दाद देतात. मावशी मजा आणते. सोंगाड्या आपल्या अंगविक्षेपांनी आणि द्विअर्थी शाब्दिक कोट्यांनी धमाल उडवतो, प्रेक्षकांना खळखळून हसवतो. असे हे उत्तरोत्तर रंगलेले लोकनाट्य पहाटे पहाटे संपते. गावकरी पुढील वर्षभर पुरेल येवढ्या आनंदाची साठवण मनात करीत आपापल्या घरी परततात.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

 

??

☆ ✍️ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करावा असे म्हणतात. पण संकल्प हा संकल्प च रहातो हा आपला अनुभव आहे. असे का घडते यावर थोडे चिंतन केले तर जाणवते आपण काही तरी वेगळे करु किंवा काहीतरी वेगळे मिळवू असा मनात विचार करुन आपण संकल्प करतो हे जाणवले. मग काहीतरी विशेष भले ही ते छोटे का असेना करावे असे वाटते इथेच आपली खरी चूक होते. काहीही वेगळे न करता आहे तेच जर सातत्याने केले तरी समाधान मिळते. 

सण समारंभ उत्सव साजरा करण्यामागे आनंद मिळणे ही भावना असते. सणाच्या दिवशी करण्यात येणारी विशेष तयारी ती फक्त एक दिवस न करता दैनंदिन जीवनातच थोडं थोडं करत गेलो तर रोजच तो आनंद मिळणार नाही का? (जर त्या दिवशी तो मिळतो हा अनुभव आहे तर रोजही मिळणारच! ) 

उदा. गुढीपाडवा पहाटे उठणे, रांगोळी काढणे, तुपाचा दिवा लावणे व रामरक्षा या मूलभूत गोष्टी रोज केल्या तर त्याची शिस्त मनाला शरीराला लागेल व रोज व गुढिपाडव्याला मुहूर्तावर गुढी उभारल्यानंतर तो आनंद द्विगुणित होईल. दैनंदिन व नैमित्तिक गोष्टी एकात एक मिसळतील व समाधान सतत मिळेल केवळ सातत्याने!

नैमित्तिक तर करायचेच मुहूर्तावर पण त्यातील मूलभूत गोष्टी करुन त्या शिस्तीत जीवन जगले तर वर्तमानाचाही आनंद घेता येईल. 

आनंद समाधान केवळ एका विशिष्ट क्षणी कसे असेल. 

वर्तमानात जगण्यासाठी सातत्य व शिस्त लागतेच तर त्या मुहूर्तावरील आनंद शाश्वत असेल. 

करचरण कृतं वाक्कयजं कर्मजं वा

।श्रवणनयनजं वा मनसं वपराधं” ।

विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व ।

जय जय करुणाबद्ध श्रीमहादेव शम्भो ॥

पवित्र विचार, पवित्र वातावरण, दिवा लावणे स्तोत्र म्हणणे या नित्याच्या गोष्टी मनापासून, सतत करत करत नैमित्तिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सहज वागणे शक्य करणे म्हणजे हा संकल्प नसून सहजता ठरेल. ही सहजताच ताण न देता खरे समाधान देणारी ठरू शकते.

आचार्य म्हणतात जे जे कृत्य करू ते सगळे भगवंताच्या साक्षीने केले तर तीच त्याची सेवा ठरते. वेगळं काही करण्याच्या नादात सहजता निसटते व‌ वर्तमानातील आनंद न मिळता संकल्प हा ताण ठरतो व तो पूर्ण होत नाही. 

आचार्य तर म्हणतात ईश्वरसाक्ष जीवन असेल तर निद्रा सुद्धा समाधी ठरेल. यावर मनन केल्यास साधेपणा व नैसर्गिकताच आपले समाधान आहे. 

संकल्प म्हणजे रोजचेच वागणे सहज केले तर वेगळाच अनुभव मिळू शकेल असे वाटते.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांच्या इंग्रजी गीतांजलीला सुप्रसिद्ध आयरिश कवी विल्यम बटलर यीट्स यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. या कवितांनी त्यांना भारावून टाकलं आहे. या कवितांचा आधारभूत पाया म्हणजे प्राचीन भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञान, त्यातील साधेपणा, भाबडेपणा, खरेपणा, पारदर्शकता, स्वयं मूल्यांकन करण्याचा धीटपणा, निरपेक्ष समर्पणाची भावना यांच्या कवितेतून होणाऱ्या दर्शनाने ते स्तिमित झाले आहेत. टागोरांच्या कवितांचा गर्भितार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांच्या मनाला भिडलं आहे. म्हणूनच त्यांनी एवढी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली असावी. यीट्स यांना देखील सन १९२३ मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. 

केवळ गीतांजलीतील कविताच नाही तर रविंद्रनाथांच्या पूर्ण आयुष्याच्या दर्शनाने यीट्स भारावून गेले आहेत. टागोरांच्या आयुष्याबद्दल च्या कल्पना, आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन त्यांना अद्भुत वाटतो. 

त्यांच्या मते रविंद्रनाथांचे वडील, भाऊ व इतर कुटुंबीय देखील असाधारण होते. भारतीय तत्वज्ञानाची अध्यात्मिक बैठक, शतकानुशतके चालत आलेला भक्तिमार्ग, बंगालचे साहित्य आणि कलेमध्ये रमलेले जनजीवन या सर्वांचे सार म्हणजे गीतांजली, असे त्यांना वाटते. 

तासनतास निसर्गाकडे बघत राहणे, जगण्याचे, व्यवहाराचे भान विसरणे हे रविंद्रनाथांच्या असामान्य असण्याचे दाखले आहेत असं त्यांचं मत आहे. 

विश्वविधात्याबद्दलच्या टागोरांच्या भावना निर्व्याज आहेत. त्यांना कसलाही राजकीय वा सामाजिक गंध नाही असं यीट्सना खात्रीपूर्वक वाटतं आणि यामुळेच ते युरोपियन तत्वज्ञांपेक्षा वेगळे आहेत असं ते म्हणतात. 

ते म्हणतात की, गीतांजलीची खरी थोरवी, तिच्या साधेपणात आहे. मोजके शब्द, खऱ्या भावना आणि स्वतःच्या मनात डोकावून घेतलेला हा चैतन्याचा शोध आहे. रविंद्रनाथ कवी म्हणून कसे उमलत गेले याबद्दल लिहितांना ते म्हणतात, ” वयाच्या १५ ते २० वर्षे या कालावधीतील त्यांच्या कविता साध्या, सोप्या व जास्त करून निसर्गाविषयी आहेत. वयाच्या २५ ते ३५ वर्षे या टप्प्यामधील कविता प्रेम आणि शोक या दोन मूलभूत भावनांविषयी भाष्य करतात आणि त्यानंतरच्या काळात ते हळूहळू अध्यात्माकडे वळतात.” 

कोणताही हेतू मनात न धरता टागोरांनी त्या त्या वेळच्या आपल्या सच्च्या भावनांना शब्दरूप दिलं आहे. त्यावेळी हे पुस्तक कोण वाचेल, कोण त्याचा अभ्यास करेल, त्याचा परिणाम काय होईल असे कोणतेही विचार त्यांच्या मनात नव्हते. यीट्सना रविंद्रनाथ एखाद्या निरागस बालकासारखे वाटत. कोणत्याही लौकिक गोष्टींनी, विचारांनी त्यांना बंदिस्त केलेले नव्हतं. 

‘देव काय आहे’ या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या कवितांमधून खूप सोप्या प्रकारे मिळतं. वर्षानुवर्षे हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो पण टागोरांच्या कविता वाचून आपल्याला समजतं की इतकी वर्षे देव आपल्या मधेच होता, फक्त आपल्याला ते माहित नव्हतं. आपल्या सगळ्या शुद्ध भावना म्हणजेच देवत्व म्हणजेच देव. हे मान्य करण्यासाठी लागणारी प्रामाणिक निरागसता हा टागोरांच्या लिखाणाचा गाभा आहे. स्वत:शी संपूर्ण पारदर्शक राहून, एखाद्या बालकाप्रमाणे मनाची कवाडं सताड उघडी ठेवून घेतलेला स्वत:मधल्या देवत्वाचा शोध म्हणजे गीतांजली आहे व हीच टागोरांची थोरवी आहे, असं कविवर्य यीट्सना वाटतं.

—–

☆ गीत ४६ ☆

I KNOW not from what distant time thou art ever coming nearer to meet me. Thy sun and stars can never keep thee hidden from me for aye.

In many a morning and eve thy footsteps have been heard and thy messenger has come  within my heart and called me in secret. 

I know not why to-day my life is all astir, and a feeling of tremulous joy is passing through my heart. 

It is as if the time were come to wind up my work, and I feel in the air a faint smell of thy sweet presence. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४६ ☆

ठाऊक नाही कधी, सौंदर्य तुझे मज भावले

सूर्य अन् तारे तुजला, ना लपवू शकले

*

कितीक दिवस मी ऐकते, पदरव तुझा तो

प्रेषित तुझा, हृदयात माझ्या, हळूच डोकावतो

*

आज अचानक कां थरथरे मी आतुनी

हृदयातील कंपने, आनंद लहरी उठवुनी,

*

मज सांगती चल आता, कर्म इथले संपले

तुझा सुगंध येता, अस्तित्व तव जाणले

*

ठाऊक नाही मी कधी तुजकडे आकर्षिले

किती काळ लोटला, भेटीसाठी चालले

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ४७ ☆

THE night is nearly spent waiting for him in vain. I fear lest in the morning he suddenly come to my door when I have fallen asleep wearied out. Oh friends, leave the way open to him ⎯ forbid him not. 

If the sound of his steps does not wake me, do not try to rouse me, I pray. I wish not to be called from my sleep by the clamorous choir of birds, by the riot of wind at the festival of morning light. Let me sleep undisturbed even if my lord comes of a sudden to my door. 

Ah, my sleep, precious sleep, which only waits for his touch to vanish. 

Ah, my closed eyes that would open their lids to the light of his smile when he stands before me like a dream emerging from darkness of sleep. 

Let him appear before my sight as the first of all lights and all forms. The first thrill of joy to my awakened soul let it come from his glance. And let my return to myself be 

immediate return to him. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४७ ☆

व्यर्थ रात्र गेली, त्याची पाहता वाट

मी असे निद्राधीन, होता भली पहाट

*

नका उठवू विनवितो, आला तो जरी दाराशी

पाखरांनो नका गाऊ, पवना नको पंगा नीरवतेशी

*

निद्रेच्या तमातून तो, स्वप्नासम उलगडू दे

त्याचीच पहिली प्रतिमा, मम नयनी उमटू दे

*

मनाचे जागेपण, त्याच्या तेजातून निथळू दे

जागृती येण्याआधी, नंदनवन त्याचे गाठू दे

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ४८ ☆

THE morning sea of silence broke into ripples of bird songs; and the flowers were all merry by the roadside; and the wealth of gold was scattered through the rift of the clouds 

while we busily went on our way and paid no heed. 

We sang no glad songs nor played; we went not to the village for barter; we spoke not a word nor smiled; we lingered not on the way. We quickened our pace more and more as the time sped by. 

The sun rose to the mid sky and doves cooed in the shade. Withered leaves danced and whirled in the hot air of noon. The shepherd boy drowsed and dreamed in the shadow of the banyan tree, and I laid myself down by the water and stretched my tired limbs on the grass. 

My companions laughed at me in scorn; they held their heads high and hurried on; they never looked back nor rested; they vanished in the distant blue haze. They crossed many meadows and hills, and passed through strange, far-away countries. All honour to you, heroic host of the interminable path! Mockery and reproach pricked me to rise, but 

found no response in me. I gave myself up for lost in the depth of a glad humiliation ⎯ in the shadow of a dim delight. 

The repose of the sun-embroidered green gloom slowly spread over my heart. I forgot for what I had travelled, and I surrendered my mind without struggle to the maze of shadows and songs. 

At last, when I woke from my slumber and opened my eyes, I saw thee standing by me, flooding my sleep with thy smile. How I had feared that the path was long and 

wearisome, and the struggle to reach thee was hard!

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४८ ☆

पक्ष्यांची गीते, जागी सकाळ झाली

साज फुलांचा लेऊन, उषा नटली

*

ना खेळलो, ना हसलो, ना बोललो

ना उद्यमा गेलो, ना वाटेत रेंगाळलो

*

न कांही पाहिले, न कांही ऐकले

शोध घेता तुझा, मन पुढे धावले

*

ढगांतून सोनेरी प्रभा पसरली

तरी ना आनंदाची गाणी गायिली

*

माथ्यावर सूर्य, पाऊले वेगात निघाली

नाचऱ्या पानांनी उगाच गिरकी घेतली

*

गुराखी सावलीत पेंगुळले, हाती लाठी

गवतावर पहुडलो मी, पाण्याच्या काठी

*

अनंताच्या वाटेवरचे सहप्रवासी मज हसले

अनेक देश, टेकड्या, कुरणे; पार करण्या गेले

*

वेगात, न पलटता, अदृश्य झाले क्षितिजापार

व्यर्थ यत्न उठण्याचा केला, ऐकून तो तिरस्कार

*

शाल पांघरून आरामाची, घेतले निद्रेचे सुखासन

विसरलो, काय होते या प्रवासाचे प्रयोजन

*

जागा झालो, साक्षात् तू पडलास दृष्टी

स्मित हास्य तुझे, तूच निर्मिल्या या सृष्टी

*

मी वेडा, तुला भेटण्या वणवण करीत होतो

त्या सौंदर्या, त्या गीतांना पारखा होत होतो

– क्रमशः भाग १६.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “2FA”: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन  ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

“2FA”: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

घराला दोन कुलुपे लावता – – 

– – मग सोशल मीडियाच्या अकाउंटला दोन कुलुपे का नाहीत?

घराच्या सुरक्षेसाठी एक लाकडी दरवाजा बिल्डर देत असतोच. पण आपण त्याला सांगून बाहेरून एक लोखंडी दरवाजा (सेफ्टी डोअर) बसवतो ना? आणि दोन्ही दरवाजाला कुलुपे लावतो ना? का लावतो? तर एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून न?

मग जशी घराची काळजी घेता तशीच तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटची पण घेतली पाहिजे न! जसे घरी चोरी झालेली आपल्याला झेपत नाही तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅक झालेलेही झेपत नाही. मग त्यासाठीच सोशल मीडिया अकाउंटला दुहेरी सुरक्षा आजच बसवा. ज्याचे नाव आहे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)… ही प्रणाली तुम्ही ऍक्टिव्ह केल्यानंतर प्रामुख्याने तुमचे अकाउंट हॅक होण्याचा धोका संपुष्टात येतो. अर्थात ज्यांनी ऑलरेडी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऍक्टिव्ह केले आहे त्यांना दंडवत आहेच पण असेही अनेकजण आहेत ज्यांना हे माहीतच नाही किंवा माहित आहे पण कसे करायचे ते माहित नाही, त्यांच्यासाठी हि पोस्ट आहे. यामध्ये महत्वाचे असे ईमेल अकाउंट, व्हाट्स अप अकाउंट आणि फेसबुक अकाउंट यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर देतोय. नीट पाहून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करा. 

*

ईमेलसाठी :

स्टेप 1: तुमच्या ईमेल अकाउंटमध्ये लॉग इन करा

स्टेप 2: तुमच्या अकाउंटच्या सेटिंग्स किंवा प्रोफाइल सेटिंग्समध्ये जा.

उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा > मग अकाउंट सेटिंग्स > मग सिक्युरिटी.

स्टेप 3: –टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” किंवा “2FA” शोधा आणि त्यावर क्लिक करा. “Enable” किंवा “सक्षम करा” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: – तुमचा फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप (उदा. Google Authenticator, Authy) निवडा. फोन नंबर निवडल्यास, तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड येईल.

स्टेप 5: तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड एंटर करा. – “Verify” बटणावर क्लिक करा.

स्टेप 6: तुम्हाला बॅकअप कोड मिळतील. ते सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा. – हे कोड तुम्हाला तुमचा फोन नसताना अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी मदत करतील.

स्टेप 7: 2FA सक्षम झाले आहे का ते तपासा – त्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. – तुम्हाला 2FA कोड मागितला जाईल. तसे झाले की समजा सर्व सेट झाले आहे 

*

व्हाट्सअपसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअप ओपन करा.

स्टेप 2: सेटिंग्स मध्ये जा, उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा > मग सेटिंग्स > मग अकाउंट > टू-स्टेप व्हेरिफिकेशन.वर क्लिक करा 

स्टेप 3: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम (ऍक्टिव्ह) करा त्यासाठी “Enable” बटणावर क्लिक करा. – तुमचा फोन नंबर व्हेरिफाई करा.

स्टेप 4: आता तिथे सहा डिजिट पिन (पासवर्ड) सेट करा आणि पुष्टी करा.म्हणजे ओके द्या. 

– हा पिन सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा.

स्टेप 5: ईमेल आयडी सेट करा (वैकल्पिक)

– तुम्हाला हवे असल्यास, ईमेल आयडी सेट करा जेणेकरून तुम्हाला पिन रीसेट करण्यासाठी मदत होईल.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम केल्याने तुमच्या व्हाट्सअप अकाउंटची सुरक्षा वाढते. 

*

फेसबुक साठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये फेसबुक ओपन करा.

स्टेप 2: सेटिंग्स मध्ये जा तिथं उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील तीन लाइनवर क्लिक करा > सेटिंग्स & प्रायव्हसी > सेटिंग्स > सिक्युरिटी आणि लॉगिन.तिथं क्लिक करा. 

स्टेप 3: “टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” किंवा “2FA” शोधा आणि त्यावर क्लिक करा.

-ते “Enable” किंवा “सक्षम करा” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप निवडा

– तुमचा फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप (उदा. Google Authenticator, Authy) निवडा. फोन नंबर निवडल्यास, तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड येईल.

स्टेप 5 : तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड एंटर करा. नंतर “Verify” बटणावर क्लिक करा.

झालं काम!

*

डॉ. डीडी क्लास : पाच दहा मिनिटांचे काम आहे पण तुमचं अकाउंट हॅकिंगचे टेन्शन कायमचे नष्ट करणार आहे. त्यामुळे नक्की करा. शिवाय घरच्यांनाही हे सांगून त्याचेही अकाऊंट सुरक्षित करा. वाटल्यास हि पोस्ट सेव्ह करून नंतर इतरांना पाठवून त्यांनाही सजग करा. 

©️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor : transcendental-technologies, Asso. with Pune University (SPPU)

5) Mentor : Canadian Asso. for Security and Intelligence Studies – CANADA

6) Mentor : Direct Action International – UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिचे थांबणे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तिचे थांबणे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

असं म्हणतात की, वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही,

पण वेळेचं गणित साधणाऱ्या ‘ती’ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात.

उदाहरणार्थ : साध्या-साध्या गोष्टी.

पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद.

पण ‘ती’ तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही.

कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते, तरीही.

सगळी कामे आटोपल्यावरही, ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून वाया जाऊ नये म्हणून.

तशीच, जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत, ‘ती’ थांबते.शी-शू सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत ‘ती’ थांबते.मुलं लहान असो नाहीतर मोठी. परीक्षा, पालक-सभा, त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं. सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.

चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते. तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण, शेअर करण्यासाठी.

घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत, कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत ‘ती’ थांबते, जेवायची. सगळ्यांच्या पाठीशी ‘ती’ थांबते.

खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय. व्यवस्थित.

काय हरकत आहे हे मान्य करायला. तिच्या या, ‘थांबण्यात’ही एक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळेचं वेळ चांगली चालली आहे.

अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी ‘थांबून’ आहे. अगदी स्ट्रॉंग.

एकही दिवस स्वयंपाकघर बंद नाहीये, कंटाळा येतो, थकवाही. तरीही रोजच्या-रोज सगळी स्वच्छता, एक्स्ट्रा काळजी, कोणत्याही आजारपणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही, असं तिने मनाशी पक्क ठरवलंय.

म्हणूनच म्हटलं, तिच्या या थांबण्यातही एक ऊर्जा आहे. त्या उर्जेमुळेच ही अशी कठीण वेळही निघून जाईल.

प्रत्येक घरातील ‘तिला’ सादर नमन!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “एक चिरंतन चित्रपट : मुगल -ए -आझम” – लेखिका : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय –  श्री विश्वास देशपांडे☆

श्री विश्वास देशपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “एक चिरंतन चित्रपट : मुगल -ए -आझम” – लेखिका : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय –  श्री विश्वास देशपांडे ☆

पुस्तक : एक चिरंतन चित्रपट: मुग़ल-ए-आज़म 

लेखिका – डॉ. मीना श्रीवास्तव

प्रकाशक- लोकव्रत प्रकाशन 

पाने – १५४

किंमत – ₹ ३००

डॉ. मीना श्रीवास्तव

डॉ. मीना श्रीवास्तव हे नाव माझ्या माहितीनुसार बहुतेक मराठी वाचकांना परिचित आहे. त्यांची लेखनशैली आवडणारे अनेक वाचक आहेत. माझ्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांवर त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि लालित्यपूर्ण भाषेत परीक्षणे लिहिली आहेत. त्याचप्रमाणे माझ्या लेखनावर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रिया वाचक वर्गाची दाद घेऊन गेल्या आहेत. माझ्या ‘ रामायण महत्व आणि व्यक्तीविशेष’ आणि ‘महर्षी वाल्मिकी’ या दोन्ही पुस्तकांचे त्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये केलेले अनुवाद रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. तसेच प्रा. हेमंत सामंत यांच्या अनामिक क्रांतिकारकांच्या आंदोलनाविषयी मराठी लेखांवर आधारित त्यांची दोन हिंदी अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लेखन वाचताना वैद्यकीय व्यवसायात असलेली ही व्यक्ती इतके सुंदर मराठी लेखन करू शकते याचेही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

मुगले आजम म्हणजे काळाच्या पडद्यावर अमिट ठसा उमटवून गेलेली अजरामर कलाकृती. हा चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला असला तरी त्यातील कथा आजही ताजी आणि टवटवीत वाटते. ही प्रेम कथा म्हणजे कलेच्या प्रांतातील सगळ्याच कलाकारांनी पाहिलेले एक भव्य दिव्य स्वप्न असे म्हणता येईल. या पुस्तकात डॉ. मीना श्रीवास्तव यांनी या स्वप्नाचा प्रवास, त्यामागील निर्मिती प्रक्रिया आणि तो तयार होत असताना करावा लागणारा संघर्ष अतिशय सुंदर रीतीने उलगडला आहे. 

खरे म्हणजे एखाद्या चित्रपटावर एखादे सुंदर पुस्तक लिहिले जाऊ शकते ही कल्पनाच मुळात आपल्याला सुखद धक्का देणारी आहे. तेही १९६० मध्ये निर्माण झालेल्या चित्रपटाबद्दल लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. त्या काळात जाऊन, त्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ शोधून त्यांचे हे पुस्तक सिद्ध झाले आहे. त्यांचे हे पुस्तक वाचत असताना आपण थेट त्या काळात जाऊन पोहोचतो. हे भव्यदिव्य स्वप्न साकार करीत असताना निर्माते आणि कलाकार यांच्या मनातील दडलेल्या संवेदना, त्यांनी केलेला त्याग आणि के. आसिफ यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक यांच्या जिवापाड केलेल्या प्रयत्नांची माहिती त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्या आहेत.

हे पुस्तक पाहताक्षणीच आपले मन आकर्षून घेते. मधुबाला म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य! मुखपृष्ठावरील आपल्या हाताने आपल्या चेहऱ्यावरील घुंघट बाजूला करणाऱ्या मधुबालाची आकर्षक छबी आपले मन मोहून घेते. तिचा हसतमुख चेहरा, बोलके डोळे हे चित्र जिवंत करतात. या पुस्तकात या चित्रपटाबद्दल सगळं काही सांगणारी माहितीपूर्ण अशी १५ प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची यादी लेखिकेने दिली आहे. त्यातून लेखिकेची पारदर्शकता, प्रामाणिकपणा तर दिसतोच परंतु पुस्तकातील माहितीची अधिकृतता सुद्धा प्रमाणित होते. पुस्तकामध्ये ठिकठिकाणी या चित्रपटाशी संबंधित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदींची कृष्णधवल छायाचित्रे दिली आहेत. त्यामुळे पुस्तक अधिक बोलके होते.

या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखिकेने अपार कष्ट घेतले आहेत. मुगले आजम या चित्रपटाने लेखिकेच्या मनावर आधीपासूनच गारुड केले होते. परंतु हे पुस्तक लिहायचे ठरल्यानंतर संदर्भ ग्रंथ मिळवणे, आंतरजालावरील माहिती मिळवणे या सगळ्या गोष्टीत त्या कमालीच्या गढून गेल्या आणि जवळपास दोन वर्षे त्या मुगले आजमच्या जगातच मनाने वावरत होत्या याची साक्ष त्यांचे मनोगत वाचल्यानंतर मिळते.

शहजादा सलीम आणि दासी अनारकली तरुण वयामध्ये भेटतात. त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते पण हे दोन प्रेमी जीव एकत्र येऊ शकत नाहीत. शहजाद्याचे वडील त्यांच्या प्रेमात भिंत बनून उभे राहतात आणि दोघांचे मार्ग वेगळे होतात. अशी ही खरंतर साधी सोपी कथा. परंतु या कथेमध्ये दिग्दर्शक के. आसिफ यांनी इतके सुंदर रंग भरले की ही कथा पडद्यावर जिवंत झाली आणि युगानुयुगे लोकांना ती आठवत राहील अशा प्रकारे तिचे सादरीकरण त्याने आणि इतर कलाकारांनी केले. 

या चित्रपटाचे संगीत आणि गाणी हा सुद्धा एक वेगळ्याच संशोधनाचा आणि लेखनाचा विषय व्हावा इतके ते उच्च दर्जाचे आहे. ती गाणी आजही ताजी टवटवीत वाटतात. या सगळ्या गोष्टींचा मनोरम धांडोळा खास स्वतंत्र प्रकरणातून लेखिकेने घेतला आहे. चित्रपटाचे संगीतकार नौशाद अली यांच्याबद्दलची आणि गीतकार शकील बदायुनी यांच्याबद्दलची अतिशय सुंदर माहिती लेखिकेने दिली आहे. लिहिण्याची शैली तर एवढी ओघवती आहे की वाचक उत्सुकतेने पुढे पुढे वाचत जातो.

आधी श्वेतधवल असलेला हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेने नंतर नवरंगात न्हाऊन आला. त्याचप्रमाणे त्याचे रंगमंचीय सादरीकरण देखील झाले. त्या चित्रपटाची ही सगळी रूपे लेखिकेला अपार भावली. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या के. आसिफ यांच्या जीवन चरित्रावर लेखिकेने टाकलेला प्रकाशझोत आणि चित्रपटाला आर्थिक सहाय्य करणारे शापूरजी पालोनजी यांच्या बद्दलची माहिती आपल्याला चित्रपट कसा तयार झाला हे समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत करते.

त्याचप्रमाणे या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयासाठी अमर झालेले पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, दुर्गा खोटे, निगार सुलताना, इत्यादी कलाकारांबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल लेखिकेने फार रोचक शब्दात माहिती दिली आहे. त्यांचे जीवनातील फारसे कोणाला माहीत नसलेले हृद्य प्रसंग सांगितले आहेत. 

या चित्रपटातील संवादांचे सौंदर्य लेखिकेने चित्रपटातील प्रत्यक्ष संवाद देऊन वाचकांच्या नजरेस आणले आहे. त्यामुळे चित्रपटातील कथा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या चित्रपटाशी संबंधित छोटे-मोठे कलाकार, तंत्रज्ञ, त्यासाठी प्राणपणाने मेहनत करणारी सगळी माणसे या सगळ्यांची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. या चित्रपटाशी संबंधित कुठलीही छोटीशी माहिती देखील दुर्लक्षित होणार नाही याची काळजी हे पुस्तक लिहिताना लेखिकेने घेतलेली दिसते. त्यामुळेच चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे मस्ट रीड असे आहे. 

एकदा हातात घेतल्यानंतर हे पुस्तक सोडवत नाही. लेखन, भाषाशैली, चित्रे, छपाई या सर्व दृष्टीने पुस्तक अत्यंत देखणे झाले आहे. केवळ चित्रपट रसिकांसाठीच नव्हे तर साहित्य आणि कलेचा अभ्यास करणाऱ्या प्रांतातील सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा ठरणार आहे.

अशा या सुंदर पुस्तकासाठी मी लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव आणि प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हे पुस्तक वाचकांना नक्कीच एक चांगले पुस्तक वाचल्याची अनुभूती देईल अशा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो.

परिचय : श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव,  मो. ९४०३७४९९३२

– – (पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी डॉ. मीना श्रीवास्तव यांच्याशी ९९२०१६७२११ या व्हाट्सऍप नंबर वर संपर्क साधावा.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # १४२ – बुन्देली कविता – ”नागन सी भन्नाउत जा रइ” ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – नागन सी भन्नाउत जा रइ।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १४२ – बुन्देली कविता – नागन सी भन्नाउत जा रइ ☆ आचार्य भगवत दुबे ✍

नागन सी भन्नाउत जा रइ

मैं ओ खें समझाउत जा रइ

*

साँप मरै, ने लठिया टूटे

एई सें बरकाउत जा रइ

*

बो तौ दैरी खूँदे खा रव

रोज-रोज टरकाउत जा रइ

*

साँप-छछूदर सी गत हो गइ

अपनी खैर मनाउत जा रइ

*

बा इतनी फरफन्दहाउ है

दो की चार लगाउत जा रइ

*

चली बिलइया हज करबे खें

सौ-सौ चुखरा खाउत जा रइ

*

‘भगवत’ हो रव आग बबूला

ओ खें गम्म खुबाउत जा रइ

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares