☆ आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
१९९२ मध्ये भारत सरकारने जे आर डी टाटा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ही आनंदाची बातमी त्यांना रतन टाटा यांनी कळवली. ही बातमी ऐकल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, ती त्यांचे मोठेपण दर्शवणारी आहे. ते म्हणाले, ” O my God, why I am selected for this honour? आपण हे थांबवण्यासाठी काही करू शकतो का? भारतात इतरही अनेक महान लोक आहेत जे भारतरत्न या किताबास पात्र आहेत. मी असे काय मोठे केले? मी जे काही माझ्या आयुष्यात केले ते माझे कर्तव्यच होते. मी ते उत्तम प्रकारे पार पाडले एवढेच! मी देशाला विमानसेवा दिली आणि मूल्याधारीत उद्योगसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला. पण म्हणून मी एवढ्या मोठ्या सन्मानाला पात्र आहे का? “
पदव्यांसाठी, पुरस्कारांसाठी हव्यास करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. आज प्रत्येक जण मोठेपणाला हपापलेला असतो. मी इतरांपेक्षा किती श्रेष्ठ, मला किती समजते हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. कधी कधी हे दाखवण्याच्या प्रयत्नात ती व्यक्ती केविलवाणी दिसते हेही खरेच! राजकारण हे खरे तर समाजसेवेचे क्षेत्र. परंतु या क्षेत्रात काम करणारे समाजसेवेच्या उद्देशाने अभावानेच येतात. बहुतेकांना सत्ता किंवा पद हवे असते. ते नाही मिळाले तर ते वाटेल त्या थराला जाण्यासाठी कमी करत नाही हे आजकाल आपण पाहतो आहोत. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात असे सारखे पक्षांतर सत्तेसाठी सुरू राहते.
ज्याप्रमाणे जेआरडी टाटा यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया दिली ती पाहून म्हणावेसे वाटते की खरोखर अशा व्यक्ती धन्य होत. भारताचे भूषण होत. कोणतीही अपेक्षा न बाळगता अशा व्यक्ती आपले कर्तव्य निरलसपणे करीत राहतात.
असेच आणखी एक उदाहरण आठवते. १९५२ सालची गोष्ट आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी जर्मनीतून इस्रायलमध्ये स्थलांतर केले होते. त्यावेळी इस्रायलचे पहिले अध्यक्ष चॅम वेजमेन यांचे नुकतेच निधन झाले होते. अशावेळी आईन्स्टाईन यांना इस्रायलचे दुसरे अध्यक्ष होण्याबद्दल विचारण्यात आले. त्यांच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तीने इस्रायलचे अध्यक्ष व्हावे अशी जनतेची इच्छा होती. वास्तविक जर्मनीतून आलेल्या एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा हा फार मोठा सन्मान होता. परंतु आईन्स्टाईन यांनी अत्यंत नम्रपणे ही ऑफर नाकारली. ते आपल्या उत्तरात म्हणाले, ” तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. त्यासाठी आपला मनापासून आभारी आहे. परंतु त्याचबरोबर मला हेही आपल्याला सांगितले पाहिजे की आपण जे पद मला देऊ करत आहात त्या पदावर बसण्याची माझी पात्रता नाही. कारण गुंतागुंतीच्या अशा मानवी संबंधांच्या क्षेत्रात मला फारसं कळत नाही. त्या विषयाचा मी कधी अभ्यासही केला नाही. मला गणितात आणि भौतिकशास्त्रात थोडीफार गती असेल पण माझी मनापासून अशी इच्छा आहे की त्याच क्षेत्रात मी आणखी परिश्रम करावेत आणखी अभ्यास करावा. “
महान व्यक्ती खरोखरच महान का असतात त्याचे उत्तर म्हणजे मला वाटतं वर आईन्स्टाईन यांनी दिलेली प्रतिक्रिया. नाहीतर आपल्याला एखादे पद मिळावे म्हणून आपण किती आसुसलेले असतो. आपल्याला कोणत्याही विषयात गती आहे आणि आपल्याला कोणतेही काम जमू शकते अशा विचाराने सत्तेकडे किंवा पदांकडे धाव घेणाऱ्यांची सध्या कमतरता नाही. परंतु जेव्हा अशा अयोग्य किंवा अपात्र व्यक्ती पदावर येतात तेव्हा ते त्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत हे आपण पाहतो.
रामकृष्ण परमहंस, संत गाडगेबाबा, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्यासारखी थोर मंडळी कोणालाही आपल्या पाया पडू देत नसत. वास्तविक ते काय किंवा आणखी इतर संत काय यांची योग्यता खरोखरच फार मोठी! पण त्यांचे म्हणणे असे असायचे की वाकायचंच असेल तर त्या सर्वशक्तिमान अशा परमेश्वरापुढे वाका. इतरांपुढे नाही. दुसऱ्याला आपल्यापुढे वाकायला लावून काहीच साधत नाही. वाकायला लावणाऱ्याचा अहं वाढत जातो आणि वाकणाऱ्याच्या मनात कमीपणाची भावना!
आम्हाला तर आमच्या कोणी पाया पडले तर केवढा आनंद होतो! आमचा अहम सुखावतो! मला किती लोक नमस्कार करतात हे आपण इतरांना अप्रत्यक्षपणे दाखवून देतो आणि आपण किती मोठे आहोत हेही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. अर्थात सगळेच असे असतात असे नाही. काही जण ज्यांच्या पुढे वाकावे किंवा नम्र व्हावे अशा योग्यतेचे असतातच!
या सगळ्या थोर व्यक्तींनी दाखवून दिले आहे की, ‘पद’ माणसाला मोठे करत नाही, तर ‘कर्तृत्व’ आणि ‘नम्रता’ या गुणांमुळे माणूस मोठा होतो. कवी दत्ता हलसगीकर आपल्या कवितेत म्हणतात
“आभाळाएवढी उंची ज्यांची, त्यांनी थोडे खाली झुकावे,
मातीत मळले जन्म ज्यांचे, त्यांना जरा उचलून घ्यावे…”
महाराष्ट्राच्या मातीतील संतांनी तर ही ‘उंची’ प्रत्यक्ष जगून दाखवली. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हातात खराटा घेऊन स्वच्छतेचे कार्य केले. लोक त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे, पण ते स्वतः मात्र गरिबांच्या झोपड्यांत जाऊन त्यांना ‘उचलून धरण्याचे’ काम करत राहिले. त्यांनी सत्तेच्या सावलीलाही स्पर्श केला नाही. तर दुसरीकडे साने गुरुजी यांनी आपल्या साध्या राहणीतून आणि उच्च विचारांतून समाजाला माणुसकीचे धडे दिले. त्यांनी कधीही राजकीय पदाची अभिलाषा धरली नाही, उलट मातीत मळलेल्या कष्टकरी वर्गाला स्वाभिमान मिळवून दिला.
आज आपण पाहतो की, कोणत्याही छोट्या पदासाठी लोक एकमेकांचे पाय ओढतात. ‘आधी सिद्धी आणि मग प्रसिद्धी’ हे जीवनाचे सूत्र आहे. यशाचा मंत्र आहे. पण याचा विसर पडल्यामुळे केवळ नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी धावणारी माणसांची शर्यत दिसते. खरी श्रेष्ठता आधी ‘सिद्ध’ करण्यात असते. मग प्रसिद्धी आपोआपच मिळते. ‘ न मागे तयाची रमा होय दासी ‘ असे म्हटले जाते. ज्यांच्याकडे खरोखरच ‘उंची’ असते, त्यांना ती ओरडून सांगावी लागत नाही; ती त्यांच्या नम्रतेतूनच झळकत असते.
शिखरावर जाणे महत्त्वाचे आहेच, पण त्याच वेळी पाय जमिनीवर असणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. कारण जमिनीवर पाय असतील तरच माणसाला दुसऱ्याची वेदना समजते आणि आकाशाचा आवाका उमजतो. या सगळ्या व्यक्तींच्या कवेत आकाश होते पण पाय मात्र जमिनीवर होते.
कविवर्य बा भ बोरकर यांच्या ‘लावण्यारेखा’ या कवितेतील या ओळी मला फार आवडतात. ते म्हणतात
अर्थात जलसाक्षरतेची कहाणी… जेहेत्ते कालाचे ठायी एका आटपाट नगरीमध्ये वासू हा एक मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, मध्यममार्गी असा एक सर्वसामान्य मध्यम माणूस रहात असे. आता मध्यम म्हटले की त्याचा फ्लॅट असणार बंगला नव्हे. त्याची दुचाकी असणार चारचाकी नव्हे. मध्यमवयीन म्हणल्यानंतर तो कुठेतरी नोकरी करीत असणार रिटायर्ड नव्हे. तसेच त्याला वाङ्मयाची व्याख्यानांची आवड वगैरे असणारच. ओघानेच त्याच्या बायकोचे नाव वसू असायलाच हवे. वाङ्मयीन नियमानुसार त्याला एक सासू असायला हवी. हो ना? तशी ती या वासुला सुद्धा आहे. जेहेत्ते कालाच्या पद्धतीनुसार वासुला एकच मूल असणार आणि ती मुलगीच असायला काय हरकत आहे? नाही का? म्हणजे समाज प्रबोधन वगैरेच्या दृष्टीने ते बरे असावे. होय की नाही? तर असे हे चौकोनी कुटुंब आपल्या कथानायकाचे. अरे हो पण त्या कन्यारत्नाचे नाव काय? ते काहीही असू शकेल. सुशीला, सुकन्या, सुधन्वा वगैरे वगैरे. छे छे ही नावे जुनी वाटतात. त्यामानाने सुधन्वा
ठीक वाटेल नाही का? पण ते आपल्याला काय करायचंय? कारण त्या कन्यकांना शॉर्ट फॉर्म ची सवय. आणि प्रत्येक नावाचा शॉर्ट फॉर्म करूण्याचा वसा त्या आटपाट नगरीच्या लोकांनी इतिहासकाळापासून घेतलेला होता असे म्हणतात. तेथील एका नव्या दमाच्या इतिहास संशोधकाने पुरातन काळी श्रीराम दशरथ रघुवंशी यांना एसडीआर व लक्ष्मण दशरथ रघुवंशी यांना एलडीआर म्हणत असत असे कोणत्या तरी जवळपास सापडलेल्या पुराणकालीन शिलालेखावरून स्पष्ट होते. असे विधान करून पुराव्या दाखल संबंधित शिलालेखाचे फोटो व्हाट्सअप वरून व्हायरल केलेत असे ऐकले आहे. अरे पण हे असे जुन्या जाणत्या लेखकांसारखे मी विषयांतर का बरे करीत आहे? पण. तर आपला मूळ विषय म्हणजे वासू. तर या वासूच्या कन्येचे नाव काय ते काही का असेना? पण तिच्या सर्व मित्रमैत्रिणी तिला सू या नावानेच पुकारत असल्याचे व त्यांनाही तिचे नक्की नाव माहित नसल्याने आपणालाही ते माहित करून घेण्याची आवश्यकता नाही. असो. तर ते कन्यारत्न म्हणजे सू. तर असे हे चौकोनी कुटुंब वासू, वसू, सासू आणि सू ही झाली या चौकोनी कुटुंबाची ओळख. तूर्त एवढीच ओळख पुरे. तर झालं काय की वासुने एका दिवशी पेपरात वाचलं अर्थात मध्यमवर्गीय व मध्यमवयीन म्हटल्यावर तो पेपर लहान सहान बातम्यांसह संपूर्ण वाचत असणार हे ओघाने आलंच. असो. तर त्याने वाचलं की अर्थात अत्यंत छोट्या व न दिसणाऱ्या कोपऱ्यात छापलेल्या बातमीत वाचलं. या आटपाट नगरीमध्ये जलसाक्षरता या विषयावर एका प्रसिद्ध जलतज्ज्ञाचं व्याख्यान आहे. अर्थात तज्ज्ञ म्हणजे मराठी नसणार. जलतज्ज्ञ म्हणजे उत्तरेकडील असू शकतो. त्याचं आडनाव सिंग वगैरे असायला काहीच हरकत नाही. अर्थात तो कोणी का असेना. पण तो अत्यंत बुद्धिमान, प्रभावी वक्ता व त्या विषयावरील जाणकार मराठी आहे असे वासुला खात्रीने वाटले. हे मात्र नक्की. असो. तर त्या जाणकाराच्या व्याख्यानाला जायचे वासुने ठरवले. अर्थात मध्यम वगैरे असल्यामुळे वासुची अशीही इच्छा होती की आपले संपूर्ण कुटुंब जलसाक्षर व्हावे. परंतु कौटुंबिक सभेमध्ये नेहमीप्रमाणे त्याचा हा प्रस्ताव एक विरुद्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला. सासूचा अर्थातच भजनी मंडळाचा कार्यक्रम असल्याने ते मत विरोधी पडलं. साड्यांच्या भव्य सेलची पानभर जाहिरात आजच्याच पेपरला असल्याने वसूचं मत सुद्धा विरोधात गेलं आणि चि. सू पूर्ववतच सायंकाळी मैत्रिणींबरोबर भटकंतीस जात असल्याने व तारुण्यपूर्व वयोमानात असल्याने वडिलांबरोबर जाण्याची शक्यता नसल्याने ते मत विरोधात जाणार हे वासुने कायमचे गृहित धरलेले असते. अशा तऱ्हेने फेटाळल्या गेलेल्या ठरावाचा एकमेव समर्थक वासुने एकट्यानेच व्याख्यानाला जायचे असे वाचून ठरवले असणार हे आमच्या चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आत्तापर्यंत आले असेलच.
तर अशा तऱ्हेने आपला कथानायक श्री वासूजी हे बरोबर सहा वाजता तेथे पोहोचले येथे एकही वाहन अथवा प्रेक्षक वा संयोजक यांचे पैकी कोणाचाही पत्ता नव्हता. फक्त दोन कर्मचारी गेटवर फ्लेक्स लावण्याच्या खटपटीत होते. गेटवरचा बोर्ड पाहून वासूने मोठा आ वासला. बोर्डवर ‘जलसा मंडळ’ असे लिहिले होते. त्यांनी त्या कर्मचाऱ्याला विचारले “अहो येथे व्याख्यान आहे ना? ”
“ कुणास ठाऊक? आम्हाला फक्त इथे हा जलसाचा बोर्ड लावायला सांगितले आहे”.
बुचकळ्यात पडलेल्या वासूचा आs असून तसाच उघडा असताना, घाईघाईत एक मनुष्य हातात पिशवी व काही गुच्छ सांभाळण्याची कसरत करत करत आत शिरला. त्याच्या मागोमाग आत शिरत वासूने त्याला विचारले “अहो येथे व्याख्यान आहे का हो? ”
“हो”
“मग हे जलसा मंडळ काय आहे? ”
“ ते आमच्या संस्थेचं नाव आहे. ‘जल ललकार साहित्य मंडळ’ या संस्थेतर्फे ते व्याख्यान आहे.”
“मग ते व्याख्यान आहे केंव्हा? ”
“सात वाजता”
“अहो पण पेपर मध्ये सहा वाजता छापलंय”
“हो बातमीत वेळ सहाची दिली की आटपाट नकरीचे लोक सात वाजेपर्यंत येतात. तुम्ही इथले दिसत नाही? आता बघा ना, सहाची वेळ द देऊन सुद्धा तुमच्याशिवाय अजून कोणी दिसते का? जर पाहुणे चुकून वेळेवर आले तर संस्थेच्या इभ्रतीचा पंचनामा होणार ना? पण तुम्ही जाऊ नका, चहा येईलच इतक्यात आपण चहा घेऊ”
चहा आला. चहा पिता पिता मी त्याला विचारलं
“का हो पण या कार्यक्रमाला किती प्रेक्षक येतील! ”
कार्यक्रम ठरवतानाच त्याची सोय करून ठेवावी लागते. आता असं पहा स्वागत गीतासाठी आम्ही पाच मुली घेतल्यात. आवाज कसा का असेना पण त्यांचे मित्र मंडळ मोठे असावे. कुठल्यातरी क्लासच्या असाव्यात, म्हणजे ते मित्र मंडळ, त्यांच्या घरची व काही कॉलनीतली मंडळी यापैकी साधारण हिशोबासाठी कमीत कमी 15 पकडा. एक सामूहिक जलनृत्य आहे. त्यांचीही अशाच हिशोबाने २० धरा, जलकाव्य स्पर्धेचे पाच विजेते त्यांची पंधरा, जलावतरण सन्मान चिन्हासाठी मनपाचे पाणी सोडणारे कर्मचारी व प्लंबर यांचे कुटुंबीय किमान 20 धरू. म्हणजे 70 संस्थेचे किमान पाच. असे 75 नक्की. मग बातमी वाचून येणारे काही रिकामटकडे बावळट चार-पाच, असे 80 जण आले की चित्कार गर्दी झाली. हो की नाही? ”
वासूने पुन्हा एकदा आ वासला बायको व्यतिरिक्त आपला बावळटपणा तोंडावर बोलणारे असेही काही लोक असू शकतात ही शक्यता त्यांने कधीच गृहीत धरली नव्हती. तेवढ्यात त्यांच्या वॉर्ड मध्ये मनापाचे पाणी सोडणारा कर्मचारी (आता वाचकांना त्याचं नाव कशाला हवंय? त्याची काही गरज नाही. आणि कुणाला हवं असल्यास त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने काहीही समजावं. सगळं लेखकांनंच कशाला सांगायला हवं? वाचकांनीही थोडसं स्वतःचं डोकं वापरायला काय हरकत आहे? ) असो.
“काय वासूनाना;” करत तो सहकुटुंब त्यांचे जवळ येऊन बसला आणि आपण कसे प्रामाणिक व कर्तबगार कर्मचारी आहोत याचे रसभरीत वर्णन करत वासूला कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत पकडून ठेवले. अर्थात नंतरचा कार्यक्रम रटाळपणा आणि गोंधळाने भरलेला असला तरी जलतज्ञाचे भाषण मात्र अत्यंत उद्बोधक प्रभावी व समर्पक होते. वासूला आपण तो रटाळपणा सहन करत थांबल्याचे सार्थक झाले असे वाटले. पूर्वीच्या सर्व नकारात्मक गोष्टींना झटकून तो जलतज्ञांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे मनात घोळवीत राहिला.
सतत तीन वर्षाच्या कमी पावसामुळे पाणीसाठे कमी झाले आहेत. मुळातच पाणी अपुरे. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद करून सुद्धा उपलब्ध पाणीसाठा अपुरा असल्याने पाणी बचती शिवाय पर्याय नाही. नागरिकांनी पाणी अत्यंत काटकसरीनेच वापरणे आवश्यक आहे. श्रीमंतांनी बाथटब बंद ठेवले पाहिजेत. शॉवर मुळे एका बादलीत होऊ शकणारऱ्या स्नानासाठी पाच सहा ल्या पाणी वापरले जाते. म्हणजे चार-पाच बदल्यांचा अपव्यय होतो. सतत नळ बंद ठेवणे आवश्यक आहे. पण त्यांच्या ऐवजी नळ सतत चालू ठेवून पाण्याचा अपव्य केला जातो. शर्ट एक दिवस वापरत असाल तर तीन दिवस वापरून मग धुवायला टाका. जीन्सच्या पॅन्ट वापरा त्या आठवड्यातून एकदा धुतल्या तरी चालतात. वाहने पाईपने धुण्यापेक्षा ओल्या फडक्याने पुसा वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आपल्याला अमलात आणता येण्यासारख्या आहेत हे वासूला मनोमन पटले. आणि या सर्व गोष्टी आपण उद्यापासून आपल्या घरात करायच्या असा त्यांने दीर्घ संकल्प केला. या संकल्पनेवर विचार करीतच वाचू रात्री शांत झोपी गेला.
☆ पंचेचाळीशीनंतरची नवी सप्तपदी… लेखक : श्री मंगेश दोरके ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)☆
– – सहजीवनाचे नवे ऋतू
– – पंचेचाळीशीनंतरची नवी सप्तपदी – –
१. पहिले पाऊलः जोडीदाराच्या बदलत्या रूपाचा आणि वयाचा मूक स्वीकार करणे. २. दुसरे पाऊलः मुले मार्गी लागल्यानंतरच्या रिकाम्या घरट्यात एकमेकांना नव्याने शोधणे. ३. तिसरे पाऊल: जोडीदाराच्या मूक त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि नवे सामायिक छंद शोधणे. ४. चौथे पाऊलः समाजाच्या अपेक्षांतून मुक्त करून हरवलेल्या स्वप्नांना नवे पंख देणे. ५. पाचवे पाऊलः जुने हिशेब सोडून भूतकाळाचे ओझे कायमचे उतरवून ठेवणे. ६. सहावे पाऊल: आजारपणातील निस्वार्थ आधार आणि एकमेकांचा ‘समांतर एकांत’ जपणे. ७. सातवे पाऊल: वेळेचे भान ठेवून कोणत्याही मृगजळामागे न धावता निखळ मैत्री जपणे.
≡ ≡ ≡ ≡ ≡
काल माझ्या मावस भावाच्या लग्नाचा मांडव सनईच्या मंगल सुरांनी ओसंडून वाहत होता. होमकुंडातून उसळणाऱ्या पवित्र धुराच्या लोटामुळे माझे डोळे किंचित पाणावले आणि माझी नजर सहजच शेजारी बसलेल्या माझ्या अर्धांगिनीकडे वळली. उकाड्याने तिच्या कपाळावर घामाचे मोत्यांसारखे थेंब चमकत होते. मी खिशातून रुमाल काढला आणि अत्यंत सहजतेचा स्पर्श देत ते टिपले. तिने माझ्याकडे पाहून एक अत्यंत आश्वासक स्मितहास्य केले. समोर सनईचे सूर आकाशाला भिडत होते आणि त्या तरुण जोडप्याने एकमेकांचा हात धरून अग्नीभोवती फेरे घ्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या डोळ्यांत भविष्यातली सोनेरी स्वप्ने होती आणि जग जिंकण्याची एक खळाळती उमेद होती. ते दृश्य पाहताना मला अचानक पंचवीस वर्षांपूर्वीचा माझा तो दिवस आठवला ज्या दिवशी आम्हीही अशीच एकमेकांना वचने देत ती पहिली सप्तपदी घेतली होती.
विशीच्या उंबरठ्यावर घेतलेली ती पहिली सप्तपदी मुळात संसाराचा डोलारा उभा करण्यासाठी होती. त्यात स्वतःचे घर घेण्याची शर्यत होती; मुलांचे भविष्य घडवण्याची धावपळ होती आणि समाजाला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवण्याची एक अथांग धडपड होती. पण आज पंचेचाळीशीचा उंबरठा ओलांडताना मला तीव्रतेने जाणवत होते की तो धावपळीचा ग्रीष्म ऋतू आता मागे पडला आहे. आता पैशांची पूर्वीसारखी ओढाताण नाही पण वेळेची आणि शरीराची मर्यादा पावलोपावली जाणवू लागली आहे. त्यामुळे आता मृगजळामागे धावायचे नाही तर थांबून निवांतपणे हा उभा केलेला संसार केवळ साजरा करायचा आहे. त्या क्षणी त्या मंडपाच्या कोलाहलातच मी मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधू लागलो. कोणत्याही अग्नीच्या साक्षीने नाही तर आमच्यातल्या या प्रगल्भ शांततेच्या साक्षीने मी आज स्वतःला आणि तिला संसाराच्या या सांजवेळी एक नवी सप्तपदी देत होतो.
माझे पहिले पाऊल तिच्या बदलत्या रूपाचा आणि वयाचा मूक स्वीकार करण्याचे असेल. तारुण्यातला तो तजेलदारपणा आणि शरीराची ओढ आता ओसरली आहे आणि हे निसर्गाचे सत्य मला हसत हसत स्वीकारायचे आहे. तिचे ते रुपेरी होणारे केस; हसताना डोळ्यांच्या कडेला जमा होणाऱ्या अनुभवांच्या सुरकुत्या आणि शरीराचा वाढलेला डौल या सगळ्या बदलत्या ऋतूंमध्ये मला तिची अभेद्य ढाल बनायचे आहे. पूर्वी तिच्या सुगंधाने मला भुरळ पडायची पण आता रात्री झोपताना सांधेदुखीवर तिने लावून दिलेल्या औषधाच्या वासात मला अधिक सुरक्षित वाटते. तिने विसरलेला चष्मा न रागावता शोधून देण्यापासून ते वयोमानानुसार येणाऱ्या उष्ण झळांमध्ये मी आहे ना हा दिलासा देण्यापर्यंतचा हा आपला नवा बहरलेला रोमान्स असेल.
माझे दुसरे पाऊल या रिकाम्या घरट्यात एकमेकांना नव्याने शोधण्याचे असेल. पहिली सप्तपदी मुलांचे घरटे विणण्यासाठी होती पण आज आपला छावा मोठा होऊन त्याच्या नव्या आकाशात उडून गेला आहे. घर पुन्हा एकदा तसेच रिकामे आणि शांत झाले आहे जसे लग्नाच्या सुरुवातीला होते. पण आता आपण दोघेही काळाच्या प्रवाहात प्रगल्भ झालो आहोत. या रिकाम्या घरात हरवून न जाता आलेल्या या शांततेची कोणतीही भीती न बाळगता मी तिच्या डोळ्यांत माझा तो जुना सखा नव्याने शोधेन. हीच तर खऱ्या प्रेमाची पावती नाही का?
माझे तिसरे पाऊल तिच्या मूक त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि नवे सामायिक छंद शोधण्याचे असेल. गेल्या दोन तपांत तिने स्वतःच्या आवडीनिवडी मारून या घरासाठी जो मूक त्याग केला त्याची जाण मला या वळणावर ठेवायची आहे. संसाराच्या इमारतीचा पाया होताना तिने स्वतःला चंदनासारखे झिजवले आणि त्याची कृतज्ञता केवळ शब्दांत नाही तर माझ्या कृतीत असावी. आता सकाळी उठल्यावर रोजच्या धावपळीऐवजी तिच्या हातात चहाचा गरम कप देणे किंवा बाल्कनीतल्या कुंडीत एकत्र रोपटे लावणे हा आमचा नवा सामायिक छंद असेल. या छोट्या सवयी संसाराची दुसरी इनिंग अधिक सुगंधी करतील.
माझे चौथे पाऊल तिला समाजाच्या अपेक्षांतून मुक्त करण्याचे आणि तिच्या हरवलेल्या स्वप्नांना नवे पंख देण्याचे असेल. आजवर तो संसार आपण केवळ समाजासाठी आणि नातेवाईकांसाठी केला पण इथून पुढचा प्रवास लोक काय म्हणतील या अनामिक भीतीखाली जगायचा नाही. घरात एखादी वस्तू जागेवर नसली किंवा कंटाळा आला म्हणून एखादे काम राहिले तर आता आमच्यात कसलाच अपराधीपणा नसेल. आता आमच्याकडे वेळेची शिदोरी आहे त्यामुळे तिने तिची ती राहून गेलेली सफर करावी; मैत्रिणींसोबत मनसोक्त हसावे किंवा एखादा जुना विसरलेला छंद नव्याने जोपासावा. आयुष्याच्या या दुसऱ्या पर्वात मी माझा पुरुषी अहंकार पूर्णपणे विसरून तिचा सर्वात मोठा चाहता बनेन.
माझे पाचवे पाऊल भूतकाळाचे ओझे कायमचे उतरवून ठेवण्याचे असेल. संसाराच्या पहाटे आपल्या दोघांकडूनही अनेक चुका झाल्या; पैशांच्या ओढाताणीतून झालेले वाद; एकमेकांचे दुखावलेले अहंकार आणि नात्यांमधील कटकटी या सगळ्यातून आपण तावून सुलाखून निघालो आहोत. पण आता उरलेल्या प्रवासात हे जुने हिशेब मला सोबत न्यायचे नाहीत. ज्या गोष्टी आपण बदलू शकलो नाही त्याचे ओझे आता वाहायचे नाही. तिला मनापासून माफ करून आणि स्वतःच्या चुकांची क्षमा मागून एक पूर्णपणे कोरी पाटी घेऊन मला आयुष्याच्या वाटेवर पुढे चालायचे आहे.
माझे सहावे पाऊल आजारपणातल्या निस्वार्थ आधाराचे आणि समांतर एकांताचे असेल. विशीत आपण एकमेकांच्या हातात हात घालून जग जिंकण्यासाठी धावलो पण आता ती जीवघेणी शर्यत उरलेली नाही. ती बाल्कनीत तिच्या पुस्तकात रमलेली असताना आणि मी माझ्या जुन्या गाण्यांत हरवलो असताना आमच्यातली ती अथांग शांतता आम्हाला अधिक जोडेल. हा समांतर एकांत आम्ही जपू. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा औषधांच्या वेळा सांभाळताना किंवा दवाखान्याबाहेर वाट पाहत असताना मी तिचा तोच हात तितक्याच आश्वासकपणे धरेन. तारुण्यातला स्पर्श केवळ आवेगाचा होता पण आताचा माझा स्पर्श हा थेट तिच्या आत्म्याला मायेची ऊब देणारा असेल.
आणि माझे सातवे पाऊल वेळेचे भान ठेवून निखळ मैत्री जपण्याचे असेल. तारुण्यात वाटायचे आपल्याकडे अमर्याद वेळ आहे पण आता जाणवते आहे की आयुष्याच्या पुस्तकातील वाचून झालेली पाने आता उरलेल्या पानांपेक्षा नक्कीच जास्त आहेत. हातातून आयुष्याची वाळू वेगाने निसटते आहे. त्यामुळे आता कोणत्याही मृगजळामागे न धावता उरलेला अमूल्य वेळ मला तिच्यासोबत शांतपणे जगायचा आहे. इथून पुढचा प्रवास केवळ पती आणि पत्नी म्हणून नाही तर दोन अत्यंत जवळचे मित्र म्हणून आपण पार करू. मिळवण्याची धडपड कायमची संपवून या आयुष्याच्या सांजवेळी सूर्य मावळताना मी तिच्या अस्तित्वाचा आणि ती माझ्या प्रवासाची एकमेव आणि सर्वात सुंदर साक्षीदार बनेल.
माझ्या विचारांची तंद्री अचानक तुटली. मंडपात गुरुजींनी शेवटचा मंत्र म्हटला आणि समोरच्या माझ्या मावस भावाने शेवटचा फेरा पूर्ण केला. मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी भानावर आलो. माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या अर्धांगिनीकडे मी पाहिले. ती अत्यंत शांतपणे आणि कौतुकाने तो सोहळा पाहत होती. मी माझा हात हळूच तिच्या मांडीवर विसावलेल्या तिच्या हातावर ठेवला. तिने दचकून माझ्याकडे पाहिले पण माझ्या डोळ्यांतला तो प्रगल्भ आणि आश्वस्त भाव तिने एका क्षणात वाचला. मंडपातल्या त्या अथांग गोंधळातही आम्ही एकही शब्द न बोलता एकमेकांशी खूप काही बोललो होतो. तिने माझ्या हातावरची तिची पकड थोडी अधिक घट्ट केली आणि तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत तृप्त हास्याची लकेर उमटली. कोणत्याही अग्नीची साक्ष न घेताही पंचेचाळीशीनंतरची आमची ही नवी सप्तपदी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली होती.
लेखक : श्री मंगेश दोरके
प्रस्तुती : श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
विजय – पराभव, यश – अपयश, जिंकणं – हरणं या सर्वांमध्येच एक सूक्ष्म रेषा असते जी यशातलंही अपयश किंवा अपयशातलं यश, जिंकण्यातलं हरणं, हरण्यातलं जिंकणं ठरवत असते.
जगाच्या इतिहासात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांचे विचार, कार्य किंवा लष्करी प्रतिभा विशाल असूनही त्यांना त्यांच्या अंतिम किंवा एखाद्या मोठ्या संघर्षात भीषण पराभवाला सामोरे जावे लागले.
फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट ज्याने युरोप जिंकला पण वॉटर्लूच्या लढाईत तो पराभूत झाला आणि त्याला आपले साम्राज्य गमवावे लागले.
विसाव्या शतकातील सर्वात शक्तिशाली हुकूमशहा हिटलर यांनी जर्मनीला एका मोठ्या युद्धाच्या खाईत लोटले पण शेवटी त्याचा स्वतःचाच पराभव झाला.
अलेक्झांडरने बहुतेक ज्ञात जग जिंकले परंतु भारतीय उपखंडातला प्रतिकार आणि सैन्याची झालेली दमणूक यामुळे त्याच्या विजयाची मोहीम खंडित झाली.
रोमन सम्राट नीरो याच्या राज्यातील अस्थिरतेमुळे त्यालाही सत्ता गमवावी लागली आणि त्याचा अंत शोकांतिक झाला.
अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या अब्राहम लिंकन यांचाही त्यांच्याच देशात खून झाला.
गॅलिलिओ, टॉलस्टाॅय, साॅक्रेटीस यांच्यासारख्या महापुरुषांनाही प्रस्थापित सत्तेपुढे हार मानावी लागली.
महात्मा गांधीजी नाही पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा म्हटले जाते. वैचारिक पातळीवर ते विजयी झाले पण राजकीय स्तरावर मात्र पराभूत झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाही मुंबई आणि भंडाऱ्यातून दोनदा पराभूत व्हावे लागले.
मुळात महापुरुषांना विशिष्ट जातीत आणि गटात वाटल्यामुळेही ते पराभूत ठरले. त्यांच्या अनुयायांच्यातल्या स्पर्धा त्यास कारणीभूत ठरल्या.
एकंदर या सर्वांचा विचार करत असताना सहज मनात येते पराभूत असूनही या सर्व व्यक्ती मानवी मनातून दूर झाल्या नाहीत कारण एकेकाळचा इतिहास त्यांनी त्यांच्या धोरणाने घडवला होता.त्यांच्या पराभवाची कारणेही विविध होती.
मात्र *महापुरुषांचा पराभव* या विषयाचा विचार करताना, त्याची कारणे ठरवताना तो नक्की कुणामुळे आणि कशामुळे झाला याचा अभ्यास करताना, तो दोन ठळक भागात करावा लागतो एक त्यांच्या तत्त्वांचा त्यांच्याच अनुयायांकडून झालेला पराभव आणि दुसरा म्हणजे त्यांची तत्त्वेच, अति महत्त्वाकांक्षा त्यांच्या वैयक्तिक अपयशाची किंवा पराभवाची मूलभूत कारणे ठरू शकतात.
एखाद्या महान व्यक्तीचा त्यांच्या अनुयायांकडूनच कसा पराभव होतो याचा विचार करताना काही ठळक बाबी मनात उतरतात. कुठलीही व्यक्ती ही तिच्या कर्माने महान ठरते. प्राप्त परिस्थितीकडे निराळ्या दृष्टिकोनातून बघून समाजावरची संकटे दूर करण्याचा किंवा समाज उद्धाराचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो. त्या कार्यामुळेच ती व्यक्ती महान ठरते. छत्रपतींनी स्वराज्याच्या प्राप्तीला नेहमी “श्रींची इच्छा” असे म्हटले कारण कार्य श्रेष्ठ असते. व्यक्ती कार्यामुळे महान बनते.
कार्यापेक्षा जास्त कुठलीच व्यक्ती श्रेष्ठ नसते. महापुरुषांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचे अनुयायी मात्र त्यांनी आरंभिलेले कार्य पुढे नेण्याऐवजी त्या महापुरुषाची पूजा करण्यात धन्यता मानतात. इथूनच व्यक्ती पूजेला सुरुवात होते आणि महापुरुषांच्या तत्त्वांचा पराभवही सुरू होतो. त्यांच्या तत्त्वांना काळानुरूप बदलतं स्वरूप देण्याऐवजी, अथवा त्यातील निकड, गरज समाजाला समजावण्याऐवजी त्यांचे (त्या व्यक्तींचे) फक्त पुतळे उभारण्यात धन्यता मानतात आणि एक प्रकारे समाजाची दिशाभूल होऊन वैचारिक कुजवणूकही होते. पर्यायाने महापुरुषाचे कार्य, कार्यकारणता, उद्देश हे सर्व विरून जाते. केवळ गळ्यात पुष्पमाळा घालून कोनाड्यात बसवलेलं देवत्त्व त्यांना दिलं जातं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्या केल्या जातात. कधी त्यांच्याविषयी केलेल्या विधानांचा त्यांच्या अनुयायांकडून निषेध वगैरे होतो.
थोडक्यात व्यक्तीपूजन होते. जेव्हा कार्यापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ होते तिथेच महापुरुषांचं अपयश मोजलं जातं आणि याला जबाबदार त्यांचे अनुयायी असतात. गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांचे उदात्त विचार, पराकोटीची सामाजिक बांधिलकी, नैतिकतेचा आग्रह, यांच्याशी जेव्हा त्यांच्याच अनुयायांयांकडून प्रतारणा होते किंवा त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते तेव्हा नाईलाजाने म्हणावे लागते की महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात.अधिक तीव्रतेने, अथवा कठोरपणे असंही म्हणता येईल की ज्यांना आपण या महापुरुषांचे अनुयायी म्हणतो ते प्रत्यक्षात फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांचे “तोंडीलावणं” करतात तेव्हा या महापुरुषांचे झालेले आत्मिक पराभव जाणवतात.
याच विषयाच्या दुसऱ्या भागात “अनुयायी” हा घटक दूर ठेवला तर त्या व्यक्तीच्या आचारसंहितेतच कुठेतरी त्यांच्या पराजयाची बीजे सापडतात आणि यासाठी मला पुराणकालीन युगपुरुषांचाही वेध घ्यावासा वाटतो. प्रजाहितदक्ष, मर्यादापुरुष श्रीरामाचे चरित्र वाचतानाही त्यांनी केलेल्या “सीतेच्या त्यागाचं”समर्थन ओढूनताणूनच करावं लागतं.
पुराणातल्या महापुरुषांचा विचार माझ्या मनात जेव्हा येतो तेव्हा नकळत आणि अगदी अलगद माझं मन महाभारतातल्या महापुरुषांचा विचार करू लागतं. महाभारतातल्या कथा लहानपणापासून जशा सांगितल्या गेल्या तशा स्वीकारल्या गेल्या पण त्यानंतर जेव्हा जाणीवा काहीशा प्रगल्भ होत गेल्या तेव्हा महाभारतात गणल्या जाणाऱ्या थोर, धोरणी, कर्तव्यनिष्ठ शब्दकठोर, वचनबद्ध महापुरुषांविषयी संदेह निर्माण होऊ लागला. त्यात द्रोणाचार्य, अश्वत्थामा, युधिष्ठीर, कर्ण हे सुद्धा सारे महापुरुषच होते पण कुठे ना कुठे ते पराभूत होते, त्यांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची महानताच त्यांना पराभूत करण्यासाठीचे कारण ठरली असे ठामपणे वाटतं.
त्यापैकी एका व्यक्तीचा मला या लेखात जाणीवपूर्वक परामर्श घ्यावासा वाटतो आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी आजन्म ब्रह्मचर्य आणि हस्तीनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची भीषण शप्पथ घेतली होती ते कुरू साम्राज्याचे पितामह, एक महान योद्धे आणि नीतीज्ञ. त्यांची जीवनकथा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांच्या प्रतिज्ञा, कुरु साम्राज्यात घडलेल्या प्रसंगाशी त्या त्या वेळच्या त्यांच्या भूमिका, त्या भूमिकांना दिलेलं वचनबद्धतेचं उदात्त कवच, कुरुक्षेत्रातल्या लढाईतलं त्यांचं सेनापतीपद आणि धोरण या अनेक बाबींचा एखाद्या विस्तृत कॅनव्हासवर मांडणी करून आढावा घेतला तर हा महापुरुष पराभूतच होता हे जाणवतं.
देवव्रत ते भीष्म ते भीष्माचार्य ते पितामह हा त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या भूमिकेवर नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आकारतं. सोमवंशातील राजा शंतनु आणि गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष म्हणजे भीष्म. मूळ नाव देवव्रत परंतु सत्यवती नामक धीवर कन्येवर त्यांच्या वडिलांचे मन बसले आणि तिच्याशी विवाह व्हावा म्हणून “माझ्याच मुलाला राज्य प्राप्त व्हावे” या तिच्या अटीला त्यांनी मान्यता दिली त्याचवेळी देवव्रतने ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना भीष्म असे उपनाव प्राप्त झाले आणि तेच प्रख्यात झाले. या प्रतिज्ञेपासूनच खरं म्हणजे भविष्यातल्या त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्मनीती इत्यादी क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अलौकिक होते.
“सर्वशास्त्रवेत्ता” म्हणूनच त्यांना मानले जायचे. कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. चित्रांगद आणि विचित्रवीर्य या सावत्र भावांचे ते संरक्षक बनले. आंबा, अंबिका, अंबालिका या राजकन्यांचे स्वयंवर त्यांनी जिंकले पण या मुली त्यांनी त्यांचा सावत्र भाऊ विचित्रवीर्यासाठी जिंकून आणल्या. स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हा त्यांचा स्वभाव म्हणून आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते अशा रीतीने चिकटून राहिले.
परशुरामांनी अंबेशी विवाह करण्याची त्यांना आज्ञा केली होती पण तीही त्यांनी पाळली नाही परिणामी अंबा सूडबुद्धीने ग्रासली गेली आणि कुरुक्षेत्री याच अंबेने शिखंडीच्या रूपात पुनर्जन्म घेऊन अर्जुनासोबत लढताना भीष्मास हरवले. शिखंडी रुपातल्या अंबेकडून म्हणजेच एका स्त्री कडून आलेल्या बाणांचा भीष्मांनी प्रतिकार केला नाही म्हणूनच ते रणांगणात अखेर कोसळले.
दु:शासनाने भर दरबारात केलेली द्रौपदीची विटंबना हा महापुरुष थांबवू शकला नाही हा केवढा तरी मोठा कलंक या महान विद्वान व्यक्तीवर कायमचा लागलेला आहे. द्रौपदीने त्यांना प्रश्न केला होता, ” जुगारात हरलेल्या युधिष्ठीरास मला पणाला लावायचा काय अधिकार होता? वस्त्रहरणाच्या वेळी पितामह तुम्ही मौन धारण करून न्यायाच्या दरबारात माझा अपमान का केलात? ”
द्रौपदीचा हा प्रश्न म्हणजे भीष्माच्या आचारसंहितेवर आणि न्यायाच्या उल्लंघनावर केलेला थेट आरोप होता. त्यांचा कायदेशीरपणा आणि नीतिमत्तेवरच तिने प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि इथेच या महापुरुषाचा दारुण पराभव अधोरेखित होतो.
“कुरुवंशाचे खाल्लेले मीठ विरोधास रोकतं” हे त्यांनी केलेलं त्यांच्या मौनाचं समर्थन अत्यंत पांगळं नव्हतं का? कौरवांचे दोष दिसत असतानाही युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होण्याची चिन्हे दिसत असतानाही केवळ प्रतिज्ञेला चिकटून राहण्यासाठी असत्य, अधर्माविषयी मौन बाळगणं हे या महापुरुषाच्या नैतिक पराभवाचं मूळ कारण आहे.
युद्धानंतर इच्छामरणी, मृत्युला उत्तरायण सुरू होईपर्यंत थांबवणारे, शरपंजरी पहुडलेले पितामह भीष्म कृष्णास प्रश्न विचारतात.
“एका क्रूर वास्तवास मला का सामोरे जावे लागत आहे? इतिहास माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघेल? ” त्यावेळी कृष्ण सांगतात, ” कुरुक्षेत्रातील रक्तपात हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी गरजेचा होता. जरी त्यात पितृतुल्य व्यक्तींचा वध होणे वेदनादायी होते.” श्रीकृष्ण पुढे सांगतात, ” जेव्हा क्रूरता आणि अधर्म मर्यादा ओलांडतात तेव्हा प्रतिज्ञा, वचनबद्धता, शब्दकठोरता हा आत्मघाती मार्ग ठरतो. पितामह! तुमच्या वैचारिकतेत नैतिकता असली तरी वास्तविक लवचिकता नव्हती. असत्य आणि अधर्म दिसत असतानाही तुम्ही तुमच्या विचारांची माघार पत्करली असती तर आज हा रक्तपात नव्हे हे युद्धच वाचले असते. पितामह! म्हणून नेमके इथेच तुम्ही खऱ्या अर्थाने पराभूत झालात.”
एका महापुरुषाचा पराभव कलियुगात किंवा युद्धाच्या काळात हेच सूचित करेल की भीष्माचार्यांसारख्या जुन्या नियमांपेक्षा अन्यायाविरुद्ध लढण्याचे कृष्णा सारखे धोरणच उपयुक्त आहे. कृष्ण -भीष्म यांच्या संवादातून हेच स्पष्ट होते की न्यायाच्या रक्षणासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. स्वीकृत धोरणांना छेद द्यावे लागतात. जे भीष्मासारख्या ज्ञानी पुरुषाला का समजू शकले नाही?
महापुरुषांचा पराभव याविषयाचा विचार करतांना भीष्माचार्यांचे उदाहरण प्रातिनिधीक स्वरूपातले आहे.
वर्तमानात होणाऱ्या निवडणुकांचा, युद्धांचा, युद्धात कोसळणाऱ्या अथवा हत्या होणाऱ्या त्या त्या देशांतील नेत्यांचा, त्यांच्या पराभवाचा विचार भविष्यात जेव्हा कधी होईल तेव्हा त्यांच्याही पराभवाची कारणे अशीच त्यांचे अनुयायी, राजकीय आणि वैयक्तिक स्तरावर तपासली जातील हे नक्कीच.
राऊळात जाता श्री विठ्ठलाची भेट झाली नाही म्हणजे पांडुरंग परमात्मा कुठे तरी दूर, बाहेर गेले असतील. त्यांना येण्यास का बरं वेळ लागतो आहे? असं कुठल्या कामात अडकलेत देव, कुणाच्या भेटीत एवढे गुंतून राहिले असतील? जी अवस्था संत जनाबाईंची तीच अवस्था मूल गमावलेल्या आईची आणि अर्थात बापाचीही! जनाबाईंचा विठ्ठल तरी त्यांना भेटला…पण या आई-बापास त्यांचा विठ्ठल किमान या जन्मी तरी दिसणार नाही प्रत्यक्ष. त्याची जागा दुसरं कुणी घेऊ शकेल अशीही स्थिती नव्हती. त्याच्याऐवजी नव्हे, पण त्याच्यासारखं कुणीतरी आयुष्यात आलं तर…ते कुणाला नको असेल?
एकुलता एक मुलगा…देशरक्षणासाठी जातो म्हणाला. त्याला अडवून उपयोग नव्हताच. प्रकाश पसरवणारा तो संदीप…यांच्या संदीपने देशाचा प्रकाश तेवत राहावा म्हणून स्वत: विझून जाणं पसंत केलं.
हिंदुस्थानला युद्धात पराभूत करू शकत नाही…पण त्याला सतत रक्तबंबाळ तर करूच शकतो…असं शत्रूच्या म्होरक्याने त्यांच्या पळपुट्या सेनेला शिकवून ठेवलं आहे. “we will bleed them a thousand times” आम्ही एक हजार वेळा युद्ध करू…अशी त्यांची दर्पोक्ती असते..आणि प्रत्येक पराभवानंतर ते हेच म्हणत राहतात. त्यानुसार ते एकेदिवशी देशाच्या आर्थिक राजधानीत घुसले. शेकडो निष्पाप नागरीकांना ओलीस धरले! त्यांना हुसकावून लावण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली!
२६ नोव्हेंबर, २००८. केरळ(मूळ गाव), कर्नाटक(जन्म, बालपण) आणि महाराष्ट्राशी (एन.डी.ए.खडकवासला) नाते असलेले मेजर संदीप उन्नीकृष्णन…मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांवर चालून गेलेला झंझावात! Operation Tornado मध्ये 51, Special Action Group (51 SAG) चे पथक प्रमुख म्हणून मेजर साहेब दहा कमांडोजसह ताजच्या सहाव्या मजल्यावर पोहोचले. ओलिसांची सहाव्या मजल्यावरून सुटका करीत ते पाचव्या मजल्यावर पोहोचले. तोच चौथ्या मजल्यावरील एका मोठ्या दालनात अतिरेकी असल्याची शंका आली…दालनाचा दरवाजा आतून बंद होता!
दरवाजा तोडून उघडला गेला…आतून प्रचंड गोळीबार झाला…आपला एक कमांडो जबर जखमी झाला. त्या दालनात हातगोळा फेकून अतिरेकी तिथून दुस-या ठिकाणी निसटून गेले.
मेजर साहेबांनी उर्वरीत कमांडोज सोबत घेत आणखी सुमारे १५ तास ओलिसांची सुखरूप सुटका करण्याचे काम केले. २७ नोव्हेंबरची मध्यरात्र. ताज मधील मध्यभागी असलेल्या जिन्याने वरच्या मजल्यावर एकट्याने शोध घेत जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला!
याच प्रयत्नात त्यांनी चार अतिरेक्यांना एका खोलीत आश्रय घ्यायला भाग पाडले…आता त्यांचा पळण्याचा मार्ग बंद…मध्ये मेजर साहेब होते. ते त्यांच्या साथीदारांना म्हणाले…”तुम्ही कुणीही वर येऊ नका…ते धोक्याचे आहे. मी यांचा बंदोबस्त करेन…! आणि मेजर साहेब त्या अंधा-या, धुराने भरलेल्या दालनात घुसले…चार रायफली धडाडल्या…साहेबांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला…पण अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मेजर साहेबांना पुरते घायाळ करून टाकले! एक दीप विझून गेला होता!
साहेबांचे आई-वडील ताज मधील त्या दालनाला दरवर्षी २७ नोव्हेंबरच्या रात्री, मध्यरात्री भेट देतात…जिथे मेजर साहेबांनी शेवटचा श्वास घेतला, त्या खोलीत थांबतात…त्यांच्या अश्रूंना वाटा फुटतात. या दोघांनी आपल्या लेकाच्या स्मृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु ठेवला आहे…काळ जखमा भरून टाकतो…पण यांच्या जखमा अजूनही ओल्याच आहेत!
पुतळे उभारले गेले, रस्त्यांना नांवे दिली गेली. चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जो प्रभाव एखादा ग्रंथ करू शकणार नाही, तो प्रभाव काही तासांत एखादा उत्तम चित्रपट निर्माण करू शकतो. विषय अतिशय रोमांचक असल्याने अनेक चित्रपट निर्माते मेजर साहेबांचे वडील के.उन्नीकृष्णन (ISRO मधील सेवानिवृत्त संशोधक) आणि साहेबांच्या मातोश्री धनलक्ष्मी यांना भेटले. “आम्ही मेजर साहेबांच्या कामगिरीवर चित्रपट बनवू म्हणाले. पण या व्यावसायिक लोकांचा आविर्भाव “आम्ही तुमच्यावर उपकारच करतो आहोत” असा असल्याचे या दोघांना वाटले. त्यामुळे त्यांनी कुणालाच परवानगी दिली नाही. माझा मुलगा देशासाठी हुतात्मा झाला..त्यामुळे तो सर्व देशाचा मुलगा ठरला. पण राजकीय मंडळी त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी अशा बलिदानांचा वापर करून घेतात, याचा त्यांना राग होता. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला घरी येण्यास थेट मज्जाव केला होता. मध्ये असेच काही दिवस गेले!
हैदराबादेत जन्मलेला पण अमेरिकेत वाढलेला एक युवा अभिनेता, लेखक आणि अनेक तेलगु चित्रपटांत चमकलेला आणि बाहुबली चित्रपटात खलनायकाच्या वेशात दिसलेल्या देखण्या आदिवी सेश याच्याही मनात मेजर साहेबांची कथा घोळत होती. त्यांनी उन्नीकृष्णन दांपत्याचे मन वळवले…आणि एक नातं आकार घेऊ लागलं! आदिवी यांनी स्वत: कथा, पटकथा लिहिली आणि मेजर संदीप यांची भूमिकाही निभावली…किंबहुना जगली! चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत तन-मन आणि धनाने सहभागी झाले. मध्येच उपटलेल्या कोरोना संकटातही हार न मानता एक सामाजिक जबाबदारी म्हणून ‘मेजर’ चित्रपट तयार व्हावा म्हणून मेहनत घेतली. या काळात कोरोनाने जगाला हैराण करून ठेवले होते, या चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या अनेकांचे जवळचे आप्त यात दगावले. या सर्व परिस्थितीमध्ये धैर्य न गमावता आदिवी काम करीत राहिले…Mission Major!
पण आदिवू यांनी संदीप उन्नीकृष्णन यांचे जीवन समजावून घेतले. Don’t come up! I will handle them! हे मेजर साहेबांनी त्या रात्री उच्चारलेले वाक्य त्यांनी मनात बिंबवून घेतलं. मेजर साहेबांच्या आयुष्यात आलेल्या जवळजवळ सर्वांशी आदिवू स्वत: बोलले, त्या त्या ठिकाणांना भेटी दिल्या…आणि पडद्यावर एक वीर गाथा साकारली गेली.
‘मेजर’ चित्रपटाच्या पहिल्या प्रदर्शनाला मेजर साहेबांच्या मातोश्री, मेजर साहेबांनी त्यांना भेट दिलेली साडी परिधान करून आल्या होत्या. आदिवी त्यांना ‘अम्मा’ संबोधतात! मी मेजर संदीप यांची जागा कदापि घेऊ शकणार नाही…पण अम्माचा धाकटा मुलगा तर होऊच शकतो. आदिवी यांच्यामुळे उन्नीकृष्णन दांपत्याच्या चेह-यावर कित्येक वर्षांनी पहिल्यांदा हास्य उमटलं…ही खूप मोठी गोष्ट होती.
आदिवू यांनी चित्रपटातून मिळणा-या पैशांचा विचार केला नाही. हिंदी आणि तेलगु भाषांत हा चित्रपट वेगवेगळा चित्रित केला. हा चित्रपट त्यांनी जागतिक पातळीवर पोहोचावा यासाठी खूप प्रयत्न केले. याचवेळी दक्षिणेतील महान अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले होते…पण तरीही ‘मेजर’ चित्रपटाने उत्तम पैसे मिळवले. अधिकाधिक तरुणांपर्यंत मेजर संदीप यांची शौर्यगाथा पोहोचावी म्हणून कित्येक ठिकाणी हा चित्रपट विनामूल्यही दाखवण्यात आला. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा जन्म केरळ येथे झाला होता. केरळसाठी हा चित्रपट खास मल्याळम भाषेतही ‘डब’ करण्यात आला होता. मेजर आणि मेजर संदीप अशी दोन शीर्षके या चित्रपटासाठी राखून ठेवण्यात आलेली होती. तत्पूर्वी अमिताभ बच्चन यांचा मेजर साहब हा हिंदी चित्रपट येऊन गेला होताच. अर्थात याची कथा वेगळी होती.
भारतात चित्रपट निर्मिती हा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. अभिनेते, अभिनेत्री यांचा चाहता वर्ग मोठा आहेच…शिवाय या लोकांचे अनुकरणही खूप केले जाते…लोक यांनाच हिरो मानतात. पण देशासाठी खरेखुरे बलिदान देणा-या सैनिकांच्या कथा सामान्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. अनेक वीरांची माहितीच लोकांना कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आदिवी सेश या अभिनेत्याने दाखवलेले धाडस कौतुकास्पदच म्हणावे लागेल! अभिनंदन, आदिवी! मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. १५ मार्च हा यांचा वाढदिवस! यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवण्याचा हा प्रयत्न. जय हिंद!
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं।
आज प्रस्तुत है, आपके काव्य संग्रह ‘उजास ही उजास‘ की एक भावप्रवण कविता – कुछ दिनों से…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # २७७ – कुछ दिनों से – २ –