मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०६ ☆ कळेना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०६ ?

☆ कळेना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आता तुझ्याविना मी वागू कशी कळेना

होतास तू सुकाणू सांगू कशी कळेना

*

नौकेस जीवनाच्या नव्हता कधी किनारा

आधार वादळाचा मागू कशी कळेना

*

मी एक मुग्ध-वेडी जग हे असे विखारी

अंधार – रात्र येता जागू कशी कळेना

*

तू कोणत्या दिशेला गेलास या अवेळी

मी या कुडीस आता त्यागू कशी कळेना

*

 होतेच चांगले की जाळून टाकलेले

 दुःखास त्या पुराण्या टांगू कशी कळेना

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “माफ करा तात्या…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “माफ करा तात्या” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

…माफ करा तात्या आता रहावत नाही.

काही बोलायाचे आहे, गप्प रहावत नाही.

काही जाळायाचे आहे, पण जाळणार नाही.

प्रदूषण काट्यावर, गाव तोलणार नाही.

माझ्या अंगणात गंध पाना फुलांचा हुंगला.

आता अंगण ते कधी मला दिसणार नाही.

 *

माळावरून वाऱ्याचा येई भरारा थंडावा

आता मनोऱ्यांच्या खाली माळ राहिलाच नाही

 *

खेळ निसर्ग रंगांचा मन लुभावत असे‌.

खेळ रक्ताच्या रंगाचा आता पहावत नाही.

 *

किती माणसे भोवती नाते कुणाशीही नसे.

संख्या वाढली कितीही कुणी वेळेवर नाही.

 *

आता जगू कसे तरी श्वास शिल्लक तोवरी.

श्वास घेण्यासाठी आता शुद्ध हवा सुद्धा नाही.

 *

आता हवा तरी ठेवा माझ्या पुढील पिढ्यांना.

त्यांच्या भविष्याचे चित्र मला पहावत नाही.

 *

सारा शोषला निसर्ग आता हवा तरी ठेवा.

हात जोडून सांगतो काही जाळायाचे नाही.

 *

काही जाळायाचे आहे, पण जाळणार नाही.

प्रदूषण काट्यावर, गाव तोलणार नाही.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अभावातून प्रभावाकडे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ अभावातून प्रभावाकडे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

✍️प्रारब्ध व नशिब!

प्रारब्धात कर्म व स्वीकार असेल तर ते नशिब आहे असं म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

नशीब स्वीकारण्यासाठी सुद्धा धैर्य व आत्मविश्वास लागतो यात २ भाग स्पष्ट आहेत.

पहिला अनुकूल व सकारात्मक परिस्थिती असेल तर नशीब हा भाग लक्षात येत नाही

नकारात्मक परिस्थिती असेल तर नशीबालाच दोष दिला जातो

दोन्ही ठिकाणी नशिबाचा भाग असतोच पण तो अहं त्या आवरणाखाली असतो.

पण जर जीवनाकडे तटस्थपणे पहाता आले तर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही ही परिस्थिती एकाच जीवनाचा अविभाज्य घटक आहेत हे जाणवतं व संपूर्ण जीवन मात्र वेगळंच आहे हे लक्षात येतं. या क्षणी नशिब किंवा स्वकर्तव्य काय यावर विचारमंथन घडतं.

असे विचारमंथन घडले तर बाहेर पडणारे नकारात्मक विचार म्हणजेच मर्यादित अहं ची जाणीवच असतात‌ व अमृत म्हणजे विस्तारित स्वयंची अनुभूती असते.

प्रारब्धातूनच आपल्याला ही जाणीव होऊ शकते हे लक्षात यायला हवं. प्रारब्ध आपल्या जीवनाचा नकाशा असतो प्रत्येक गोष्ट आपल्याच कर्माचे फळ असते म्हणून च वैयक्तिक अनुभव येतात हे सत्य स्वीकारले तरच तटस्थ भूमिकेतून स्वतः च्या आयुष्याचा अभ्यास करता येईल. म्हणून मिळालेले हे आयुष्य ही सुसंधी आहे हे समजायला जी बुद्धी लागते त्यासाठी विवेक आवश्यक आहे. दुसरे कुणीही यात बदल करु शकत नाही हे ही त्रिकालाबाधित सत्य आहे.

शिक्षक पूर्ण वर्गाला शिकवतात पण मोजकेच विद्यार्थी याचा खरा फायदा घेतात त्याप्रमाणे सद्गुरू आत्मकल्याणाचा मार्ग दाखवतात त्यांची महावाक्ये समजून घेणे हे सद्षिष्याचे लक्षण आहे. सनातन धर्मात गुरु शिष्य जोडीला म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सूर्यप्रकाश सर्वत्र असतो पण जो खिडकी बंद करेल त्याला तो प्रकाश अनुभवता येणार नाही व ज्याने खिडकी उघडली, त्याच्या घरातील अंधार राहूच शकणार नाही

तसेच प्रारब्धाचा आनंदाने व साक्षीभावाने स्वीकार करणे म्हणजे आपले नशीब आपण ठरवणे आहे , हा विवेक सद्गूरु व सद्संगाशिवाय शक्य नाही म्हणूनच

महाजनो येन गत स पंथ: ……..

आपले प्रारब्ध हे आपले नशिब ठरवण्याची शिडी आहे हे मात्र निश्चित!

मग आपण नशिबवान ठरायचे की करंटे हा आपलाच निर्णय नाही का?

कृतज्ञ मी कृतार्थ मी 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाऊ बामण… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ भाऊ बामण… ☆ सौ.प्रभा हर्षे

भाऊ बामण गेल्याची बातमी समजली आणि क्षणात मी हताश झालो. काही केल्या डोळ्यातून बाहेर यायला तयारच होईना भाऊ बामण. तसाच डोळ्यांच्या पापणीत घट्ट रुतून बसलेला. कधी काळी त्यानं म्हंटलेला कानात अजूनही तोच आवाज, “तुज्या बापाच्या लग्नाचा आंतरपाट म्याच धरला अन तुजा बी म्याच! तुमच्या आज्ज्या-पंज्ज्या सकट सगळ्यांचं महाळ बी म्याच केलं, पण कधी तुमच्याकडून एक रुपया बी घेतलेला नाय!” माणसं म्हणायची, “झोपलेला देव जागा करण्याची हिम्मत फ़क्त पांडोबाच्या हलगीत अन भाऊ बामणाच्या घंटीतच आहे. ” भाऊ बामण नुसत्या गावाचा बामण नव्हता तर अख्ख्या पंचक्रोशीचा बामण होता. तांबडं फुटायच्या आधीच जाग यायची त्याला. अगोदर भाऊ बामण जागा व्हायचा मग जाग यायची गावाला. अंधारात गोठ्यातली रिकामी बादली घेऊन मंदिरापुढच्या आडावर हजर व्हायचा भाऊ बामण. राहाटावरून खाली बादली सोडून साखर झोपेत असलेलं पाणी शेंदायचा भाऊ बामण. कितीही कडाक्याची थंडी असो, पावसाची कितीही उभी धार असो, तरीही थंड पाण्याने गावात पहिली अंघोळ उरकायचा भाऊ बामण. कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगावर दानवं घातलेला भाऊ बामण गावच्या देवळातली ठण-ठण आवाज घुमवत जेव्हा पहिली घंटा वाजवायचा, तेव्हा कुठे जाग यायची गावाला. माणसं म्हणायची, “गड्या भाऊ बामण उठला! पहाट झाली! उठा आता!”

गावात तशी बामणाची मोजून चार घरं. एकाच बुडक्यातली. एकाच रांगेत उभी. छोटीशी बामण गल्लीच. गावच्या प्रमुख मंदिरातील पूजा अर्चा यांच्याकडेच आळी पाळीने येई. कालमानानुसार यातील तीन घरे कायमची शहराकडे स्थलांतरित झाली. गावगाड्यात उरलेला भाऊ बामण मात्र गावाला चिकटून मागं राहिला. कशासाठी राहिला असेल? माहीत नाही. पण वडिलोपार्जित मिळालेल्या शेताच्या तुकड्यात आयुष्यभर तो राबला. नेमका कुणासाठी तो राबला असेल? माहीत नाही. त्यानं त्याचं अख्खं आयुष्य गावकी करण्यातच का घालवलं असेल? ते ही माहीत नाही.

भाऊ बामणानं सबंध आयुष्यात पायाला कधीही चप्पला घातल्या नाहीत. आयुष्यभर तो अनवाणी पायानं जमीन तुडवत आणि सायकलचं पायंडल मारीत राहिला. माणसं म्हणायची, “कोणताही विधी करावा तर भाऊनच!” घाई नाही की गडबड नाही. सगळं कसं त्याच्या हातून शांततेत पार पडणार. भाऊ बामणानं अख्ख्या पंचक्रोशीतील कित्येक पिढ्यांची लग्ने लावली. कित्येक घरात शांततेचे होमहवन पेटवले. कित्येकांचे अभिषेक घातले. कित्येक घरात सत्यनारायणाचे सकळ खंडाचे अध्याय वाचले. कित्येक घरांच्या कुंडल्या जुळवल्या. कित्येक घरांची साडेसाती घालवली. सत्यनारायणाची पूजा वाचताना त्याने एका विशिष्ट लयीत वाचलेली साधू वाण्याची कथा अजून माणसांच्या कानात तशीच घुमते. खरं खोटं माहित नाही पण अजून जुनी माणसं सांगतात, “भाऊ बामणाचा हात जर पिंडाला लागला नसेल तर कावळा सुद्धा शिवायचा नाही पिंडाला!”

बारशापासून ते चौदाव्या पर्यंतचे सर्वच कार्यक्रम अगदी यथासांग पार पाडायचा भाऊ बामण. पितृ पंधरावड्यात तर त्याची सायकल कधी थांबायचं नावच घ्यायची नाही. गावासोबत साऱ्या पंचक्रोशीत महाळ घालायच्या विधीचा मान हा भाऊ बामणालाच असणार. त्याशिवाय वाडवडील जेवले असं म्हणताच यायचं नाही. आता कदाचित तुम्हाला वाटेल की, भाऊ बामणानं त्याच्या आयुष्यात चिक्कार कमाई केली असेल. पण मंडळी, यातलं काहीच त्यानं केलं नाही. मिळेल त्या पसा-मूठ शिदोरीवर त्यानं आयुष्यभर गावगाड्यातली गावकी सांभाळली. मंदिराच्या दानपेटीत कधीही त्याच्या हाताची बोटे शिरली नाहीत की तिजोरीत असलेल्या देवीच्या जुन्या दागिन्यावर त्याची नजर रुतली नाही. की कधी त्याच्या बायकोच्या गळ्यातल्या काळ्या मण्यांचं, सोन्याच्या मण्यात रूपांतर झालं नाही. इतका प्रामाणिक आणि विश्वासू होता भाऊ बामण.

पण त्याचं दुर्दैव हे की भाऊ बामणाला फक्त पाच वर्षेच संसार लाभला. एका सकाळी आडावर धुणं धुवायला गेल्यावर पाणी शेंदताना त्याची बायको आडात पडली. आडावर ओरडून बायकांनी नुसता कल्लोळ उठवला. सगळं गाव आडाकडं पळत सुटलेलं. पण बिन पायऱ्याचा आड. कोणी उडी मारायचं धाडसच करेना. अखेर मातंगवाड्यात कोणीतरी पळत जाऊन निरोप दिला. क्षणाचाही विलंब न लावता पट्टीचा पोहणारा चंदू नाईक आडाच्या दिशेने धावत सुटला. त्याने आडात कपड्यासहीत उडी टाकली. काही वेळातच तळातून रहाटाच्या साखळीला बांधून भाऊ बामणाच्या बायकोचं प्रेत त्यानं वर काढलं. उशीर झाला होता. तिला वर काढल्यावर “आरं रं रं लई वाईट झालं गड्या! नांदनं कडंवर जायाला पायजे व्हूतं! बयो कशी ग घसरलीसं आडात! लेकरानं कुणाला गं आय म्हणून हाक मारावी आता!” म्हणत चंदू नाईक मुळातून हळहळला.

दिवस पुढे सरकले. भाऊ बामण हळूहळू या दु:खातून बाहेर आला. पण त्यानं दुसरं लग्न काही केलं नाही. त्याच्या आई वडिलांसोबत त्यानं लहान पोर वाढवलं. शिकवलं. पोरगं मोठं झाल्यावर ते कामधंद्यासाठी शहराकडे बाहेर पडलं. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण हळूहळू पोरगं गावाला यायचं कमी झालं. भाऊ बामण गावाकडून पत्र पाठवायचा. सुरुवातीला उत्तर यायचं. पण नंतर-नंतर पत्राला उत्तर येईनासं झालं आणि अशातच एक दिवस गावात कोणी तरी बातमी आणली. ‘भाऊ बामणाच्या पोरानं तिकडंच कुठल्यातरी पोरीशी लग्न केलयं. ’ भाऊ बामणाच्या कानांवर ही बातमी पडली. खात्री करण्यासाठी एक दिवस भाऊ बामण शहराकडे जाऊन आला. माघारी आल्यावर पोराचा नवा संसार सुरळीत आणि सुखाचा चालू असल्याचं त्यानं गावाला सांगितलं. खरं खोटं काय ते भाऊलाच माहीत. काही दिवसातच गाव भाऊच्या पोराला विसरून कामाला लागलं…

… एक-दीड वर्षे उलटलं असेल. अचानक भाऊचा पोरगा मतदानाला म्हणून एकटाच गावाला आला. महिना झाला. दोन-महिने झाले तरी परत जाण्याचे काही नावच घेईना. गावात हळूहळू कुजबुज सुरू झाली. रिकामी डोकी वळवळू लागली. आणि कुठून तरी गावाला खरी बातमी समजली. भाऊ बामणाची सून त्याच्या पोराला घटस्फोट देऊन निघून गेलीय. भाऊनं हळूहळू माणसात उठणं बसणं बंद केलं. अन्न पाण्यावरची त्याची वासनाच उडाली. आजूबाजूच्या गावात जाणंही त्यानं बंद केलं. गावातलं विधीकार्यही त्यानं कमी केलं. काही महिन्यांनी भाऊचा पोरगा पुन्हा शहराकडे वळाला. पण पुन्हा काही तो गावाकडे परतला नाही.

काळ हळूहळू पुढे सरकत राहिला. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे संपत गेली. भाऊचे आई-वडीलही कधीच गेले होते. भाऊ बामणही म्हातारपणाकडे झुकला. मावळतीच्या सावल्या त्याच्या अंगावर कधी चढून बसल्या गावाला कळले सुद्धा नाही आणि एके दिवशी दिवस उगवायला भाऊ बामण गेल्याची बातमी गावभर पसरली. गावातले व्यवहार थांबले. नव्या दुकानांची उघडलेली शटरे पुन्हा झाकली गेली. भाऊ बामणाच्या पडक्या घरापुढं माणसांची तुडूंब गर्दी. माणसं हळहळली. जुन्या आठवणी काढू लागली. काही वेळाने तिरडीवर बांधलेल्या भाऊ बामणाचं प्रेत गावानं उचललं. रडायला जवळचं कोणी आलंच नाही. गावाचा शेवटचा बामण स्मशानात जळून राख झाला. एक वटवृक्ष कायमचा उन्मळून पडला…

… डोक्यात नुसता प्रश्नांचा भडीमार. काळासोबत जे बामण गावगाडा सोडून शहराकडे वळाले ते स्थिरस्थावर झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्याचं घडलंही असेल आयुष्य? त्यांच्या पुढच्या पिढ्या शिकून गेल्याही असतील देश-विदेशात? भलेही त्यांनी मोठमोठे प्रबंध लिहिले असतीलही. पण त्यात भाऊ बामणासारख्यांना किती स्थान? मंडळी, गावासोबत गावकीला जोडून घेत जे गावगाड्यातल्या प्रथा परंपरा जपत राहिले त्या भाऊ बामणासारख्यांची नेमकी नोंद तरी कुठे? भले नव्या जागतिकीकरणात त्यांनी केलेल्या पूजा अर्चा, होमहवन निव्वळ अंधश्रद्धाही ठरतील? पण त्यांनी ज्या निष्ठेने त्या श्रद्धा जपल्या असतील त्याचं काय?

आयुष्यभर भाऊ बामणानं साऱ्या गावाचे विधी पार पाडले असतील. कित्येकांच्या नावाने पिंड तयार केले असतील. कित्येकांचे चौदावे पार पाडले असतील. पण त्याच्याच मृत्यूनंतर त्याचा स्वतःचा विधी करायला गावाला बामण उरलाच कुठे? अख्ख्या गावाच्या मंडवळ्या भाऊ बामणानं बांधल्या असतील पण स्वतःच्या लेका-सुनाच्या मंडवळ्या बांधण्याचं भाग्य त्याच्या नशिबी आलंच कुठे? मंडळी, हे त्याचं भाग्य म्हणायचं की दुर्भाग्य? मरून जाण्याआधी स्वतःच्या जमिनीची आणि घरादाराची मालकी त्याने पोराच्या नावावर करण्या ऐवजी गावाच्या मंदिर ट्रस्टीच्या नावे का केली असेल? आयुष्यभर त्याने कित्येकांच्या घरात शांततेचे होम पटवले असतील. तितकेच मंत्र म्हटले असतील. पण त्याच्या घरात शांतता नांदायला आलीच कुठे?

शेवटी, गावात आता पहाटेच्या वेळी “ठणsss ठणsss” वाजणारी घंटा नेहमीसारखी वाजत नसेल तेव्हा गावाला आणि मंदिरातल्या देवाला चुकल्या-चुकल्यासारखं वाटत असेल का? नव्या काळात पूजा आरत्या, होमहवन, पिंडदान हे सगळं कालबाह्य होईलही. पण हे सारं प्रामाणिकपणे आणि ज्या निष्ठेने त्यानं गावकीसाठी केलं म्हणून निदान त्याच्या आठवणी तरी कुणाच्या काळजात मागे उरतील का? की ऊठ सूठ आजूबाजूला बामणांना खच्चून शिव्या घालायच्या या नव्या जमान्यात तुम्हीही म्हणाल, “साला एक बामण मेलं म्हणून काय बिघडलं? देशात चिक्कार गर्दी बामणांची…!”

 

लेखक : ज्ञानदेव पोळ

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ या रंगाला एक्सपायरी नाही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ या रंगाला एक्सपायरी नाही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मानवी जीवन विविध कंगोऱ्यांनी बनलेले असते, असे म्हटले तर वावगे होणार नाही…

कधीकधी मनुष्याला निर्मम, निर्व्याज, निर्मळ प्रेमाची अनुभूति येते…

कधीकधी एखाद्यावर मनुष्य अकारण प्रेम करू लागतो, तर कधीकधी एखाद्याला अशा अकारण प्रेमाचा लाभ होतो, तो अकृत्रिम स्नेह त्याला अनपेक्षितपणे प्राप्त होतो…

अशावेळी त्या त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेने हास्य विलसते…

अशा अकृत्रिम, निर्मळ हास्याने त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर एक विशेष रंग चढतो…

हा रंग कोणालाही दिसत नाही, पण तो जाणवू शकतो…

ज्याच्या चेहऱ्यावर हा रंग खुलतो, तो मनुष्य तो रंग दिवसभर अनुभवू शकतो…

हा रंग कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही…

तर तो निव्वळ अकृत्रिम स्नेहाचे आणि निर्व्याज प्रेमाने प्राप्त होऊ शकतो…

कारण हा रंग अशी दिव्य अनुभूती घेणाऱ्याच्या मनात तयार होत असतो आणि त्याच्या मनातच साठून राहत असतो…

… त्या रंगाला एक्सपायरी नाही…

हा अनुभव आपण कदाचित कधीतरी घेतला असेल…

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘स्वर्गदार…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘स्वर्गदार…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

सत्तरीच्या घरातल्या हसतमुख दमदार पावले टाकीत, येणाऱ्या जाणाऱ्यांचा राम राम स्वीकारत, झपाझप चालत माझ्याकडे येणाऱ्या काकांना मी विचारले “काय हो काका किती दिवसांनी भेटताय कुठे लपला होतात?

माझ्या कोपरखळीला दाद देत मिस्कील हंसत त्यांच उत्तर आलं, ” गेलो होतो मसणात” मी उडालेच, ” काय काका! काहीतरीच काय बोलणं?, नाही म्हणजे कुणी जवळचं माणूस.. त्यांचं काही बरवाईट?तुम्ही दुःखी आहात का? नाही म्हणजे स्मशानात? म्ह ण जे अशा जागी कोणी सहज, मुद्दामून जात नाही, नाही कां? माझा नुसता गोंधळ उडाला होता.

“कबूल आहे! नाही जात अशा ठिकाणी. पण मी गेलो आणि भरून पावलो. प्रसन्न मनाने त्या वैकुंठधामात वावरलो. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून काका पुढे म्हणाले, “माझ्या बोलण्याने गोंधळलीस ना नेहमीसारखी! बैस खाली. सगळं सांगतो. माझं कोड्यातलं बोलणं संभ्रमात टाकतय ना तुला? 

“हो ना हो!एक वेळ पुस्तकातलं कोडं सोडवणं सोप्प आहे पण स्मशान काय मसणात काय! काका हे माझ्याअल्पबुद्धी पलीकडचं आहे, तेव्हा आता फिरक्या घेणं पुरे आणि मुद्द्यावर या काकासाहेब “

आणि मग गाडी रुळावर आली वक्तृत्व स्पर्धेत 1ला नंबर असलेले माझे जेष्ठ मित्रवर्य बोलू लागले, “अगं इंदोरला गेलं होतं आमचं मित्र मंडळ. सगळं इंदोर पालथ घातलं. खाऊ गल्ली झाली, मंदिरें झाली, मार्केटिंग झालं. सगळे जाम दमले आणि म्हणाले, ” बस झालं! सगळं शहर फिरलोय आता उद्या पुण्याला निघायचं बघूया.

माझ्या मनात वेगळंच चाललं होतं. मला कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. इंदोर दहनघाट बघण्यासारखा आहे. ताड्कन उठलो आणि गर्जना केली “चलो दहनघाट ” दहनघाट???झोपलेले खाड्कन जागे झाले. जागे असलेल्यांनी डोळे विस्फारले, बसलेले ताड्कन उठून मला धरायला धावले, सगळ्यांना वाटलं परिणाम झालाय माझ्या डोक्यावर. बायको तर इतकी भेदरली की किंचाळून म्हणाली, “अहो काल उज्जेनला महाकालेश्वराची भस्मपूजा पाहयलीत त्याचा काही विपरीत परिणाम नाही ना हॊ झाला तुमच्यावर?

सगळ्यांच्या नजरेत कींव होती. “भ्रमिष्ट झालाय हा! अशा सुतकी अशुभ ठिकाणी कुणी जातं कां रें मुर्खा!” वशा खेकसलाचं.

आरडाओरडा, मित्रांच्या शिव्या, बायकोचं रडणं चालूच होतं. जणू काही मी शेवटच्या प्रवासाला निघालोय परत येणारच नाहीय्ये की काय असंच मला वाटायला लागलं. ” काका मजेत टाळ्या वाजवून गंमत सांगत होते.

न राहून मी म्हणाले”काकुंच बरोबर आहे काका, अहो मृत्यूचं नाव काढलं, प्रेतयात्रा पाहिली, ज्वाळा बघितल्या की माणूस घाबरतोच आणि अशा ठिकाणी सगळं सोडून जाण्याची तुम्हाला तरी काय बुद्धि झाली?काहीतरी असतं हं काका तुमचं !

“अगं बाई! पुढचं तर ऐक त्याचं असं झालं माझे एक मित्रवर्य ह्या उपक्रमात सहभागी आहेत. ते म्हणाले “मध्य प्रदेशात आलात ना की दहन घाटाला भेट द्यायला विसरू नका. ती जागा बघण्यासारखी आहे. उदास मनाला टवटवी आणणारी फुलझाडे आहेत तिथे.

असं बघ राधिका, जाणारा महाप्रवासाला पुढे निघून जातो पण मागे राहणाऱ्याचं काय? ते दुःख, वियोग ज्याचा त्यालाचं सहन करावा लागतो. दुखणं आणि दुःख एकमेकांना वाटून नाही घेता येत. अश्रूंचा पूर, वियोग, आक्रोशामुळे वातावरण गंभीर, उदास झालेलं असतं म्हणूनच आत्म्याला शांती आणि दुःखाला मुक्ती मिळावी ह्यासाठी कार्यकारी मंडळींनी त्याठिकाणी वृक्षराजी आणि बागबगीचा लावलाय. तिथे अत्यंत स्वच्छ स्वच्छतागृहे आहेत. मध्य प्रदेशातलं इंदौर शहरातलं उत्कृष्ट सुंदर सुरेख हिरव्यागार गारव्यातलं स्मशानगृह ‘ ऊपेक्षणीय ‘ नसून प्रेक्षणीय आहे. प्रवेशद्वारापासूनच या मोक्षद्वारात आत्म्याला शांती, श्रद्धांजली आणि इतरांच्या उदासी वातावरणाला तिलांजली मिळते. ती हिरवाई बघून क्षणभर कां होईना दुःखाचा विसर पडतो.

महान वृक्ष इथे उभे आहेत त्यांच्या प्रचंड सावलीखाली 100 सव्वाशे माणसं बसू शकतात. पिंपळावर भुते असतात म्हणे! पण हाच पिंपळवड, चिंच, कडुलिंब आपल्याला प्राणवायू पुरवतो. हे तर पट्तय नां तुला? आणि म्हणूनच असे वटवृक्ष शुद्ध हवेसाठी इथे लावलेले आहेत.

ऐक हं!एक सुंदर श्लोक आठवलाय बघ मला..

‘मुले ब्रम्हा, त्वचा विष्णू । शाखा शंकर मे वचं रादन्यो नमोस्तुते. ।। ‘ 

हे संस्कृत पंडित म्हणतात ‘ह्या अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाच्या मुळात ब्रह्मा, सालीत विष्णू, फांद्यात भगवान शंकर आहेत तर पानांपानांत देवी देवतांचा वास असतो अशा वृक्षराज पिंपळाला माझे नमन असो.

काकांचं अगाध ज्ञान, वक्तृत्व शैली आणि संकलन बघून मी अवाक झाले होते. मी म्हणाले, “मग तर काका त्या मुक्तीधाम मध्ये शंकराचा म्हणजेचं पिंपळवृक्षाचा निवास हवाच नाही का?”

“हॊ तर नक्कीच हवाय! पवित्र तुळसबनही इथे आहे. पर्यावरण, आणि निसर्गांनी दिलेलं दान आपण जपायलाच हवंय. तुला काय सांगू राधिका, तिथल्या व्यवस्थापक मंडळींनी खूप धोरणानी जागरूकतेने ते जपलयं. पर्यावरणाला पूरक असे उपक्रम ते राबवतात. कचऱ्यातून कला साधून, खत सांठवून 

west मधून best ते साधतात. ” 

“काय सांगताय काय काका तुम्ही!”माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

 “पुढचं तर ऐक! दहन केल्यावर फेकलेले बांबू एकत्र करून सुसज्ज, सजावटीचे कठडे विविध रंगाने रंगवून त्यांनी ते प्रेक्षणीय केलेआहेत. “

सारं काही ऐकतांना भारावून मी म्हणाले, ” किती वेगळ्या वातावरणात, निसर्ग सुखसानिध्यात नेऊन दुखितांच दुःख, ही मंडळी हलकं करतात नाही का! खरंच स्तुत्य, आदर्श आहे हा उपक्रम. मला नंबर मिळेल का हो त्यांचा? माझ्या प्रश्नावर काकासाहेब उत्तरले” हो नक्की! अगं पण अजून मला सांगायचंय, ऐक नां! इथे मोक्षकाष्ट मोफत मिळते. अंत्यसंस्कारासाठीची रक्षा हवेत, पर्यावरणात मिसळून प्रदूषण वाढू नये म्हणून खतासाठी ती रक्षा वापरतात. त्यासाठी निर्माल्य कलशासारखे मोठे रक्षाकलश इथे ठेवलेले आहेत.

काकांच्या तोडून ही नवीन आणि उपयुक्त माहिती ऐकून मी निशब्द झाले. खरंच कमाल आहे हं ह्या उपक्रमाची आणि त्या कल्पक मंडळींची. दुःखितांच्या दुःखावर फुंकर घालताना ते समाजकार्यही करताहेत. खरंच भन्नाट आयडिया, काका इथूनच माझा त्यांना मनापासून नमस्कार.

“राधिकाजी इससे भी बढकर और बढीया बात है l आगे सुनो, काकाजी बरेच मूडमध्ये आले होते. उत्साहाने त्यांचा धबधबा सुरू झाला, “अगं माणसांचा, पर्यावरणाचा त्यांनी विचार केला आहेचं पण पशुपक्ष्यांचीही त्यांनी सोय केलीय. त्यांनी अशी मनमोहक सुगंधी फुलझाडं लावली आहे की ती रंगीबेरंगी दुनिया बघून फुलपांखरे फुलाफुलांवर बागडतात. आणि भरपूर मकरंद प्राशन करतात. जवळची माणसं दुरावल्यामुळे आप्तेष्ट उदास निराश झालेली असतात. डोळ्यांची तळी तुडुंब भरतात पण अश्रूंच्या पडद्याआडून त्यांना दिसतील अशी गुलाब जाईजुई मोगरा, पारिजातक, सोनचाफा इत्यादी सुगंधी फुले वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलतात. ते दृश्य त्यांच्या दुःखी मनावर फुंकर घालून क्षणभर का होईना त्यांना दिलासा मिळतो. पक्षीगण मंजूळ आवाजात त्यांचं सांत्वन पण करतात”

हे सगळं काकांचं सांगणं ऐकून मी मंत्रमुग्ध झाले होते माझ्या तोंडून उस्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, ” काकासाहेब हे स्वर्गदार इतकं दिलासा देणार असेल तर पण मी पण जाईन त्या स्मशानात. घाटावरचा दिलासादायी निसर्ग बघायला “

काका टाळी वाजवून म्हणाले “ पटलं ना तुला? मग समजावून सांग तुझ्या काकीला” 

“नक्कीच काका ” असं आश्वासन देऊन मी बागेच्या बाहेर पडले. मनोमनी इंदोरकरांच्या अफलातून कल्पकतेला आणि उपक्रमाला मी इथूनच हात जोडले. या सगळ्या वेगळ्या अर्थपूर्ण उपक्रमाचे सार्थक करणाऱ्या या मंडळींना खरंच जीवनाचा अर्थ कळला आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा !! 

 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

आमचे एक सुहृद शांतिनिकेतनच्या विश्वभारती संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले होते. तेंव्हा त्यानी मला हा फोटो पाठवला व सांगितले की हे रविंद्रनाथ टागोर यांचे नोबेल पुरस्कार पदक आहे पण मूळ पदक नाही तर त्याची प्रतिकृती आहे कारण मूळ पदक २५ मार्च २००४ रोजी चोरीला गेलं म्हणून नोबेल फाउंडेशनने ही प्रतिकृती डिसेंबर २००४ मध्ये विश्वभारती संग्रहालयाला भेट दिली आहे.

मला हे ऐकून धक्काच बसला. ज्या पदकाचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला पाहिजे, ते पदक कुणी चोरू कसं शकतं? जे पदक आजपर्यंत दुसरं कुणीही मिळवू शकलं नाही. एवढी दुर्मिळ, लाख मोलाची वस्तू, जी पुढच्या पिढ्यांना शतकानुशतके प्रेरणा देत राहिली असती ती कांही पैशांसाठी चोरायची? नोबेल फाउंडेशनने त्याची प्रतिकृती दिली म्हणून बरे, नाहीतर पुढील पिढ्यांना हे पदक डोळे भरून बघायला सुद्धा मिळालं नसतं. तरीपण त्या खालच्या ‘Replaced’ या शब्दाने प्रत्येक भारतीयाची मान शरमेने खाली जातच असणार आणि जातच राहणार. हा भारतमातेच्या शुभ्र वसनावरचा कधीही पुसला न जाणारा डाग आहे. ज्या पदकामुळे भारतमाता गौरवान्वित झाली होती, त्याच पदकाच्या चोरी मुळे ती अवमानित झाली आहे. याहून शरमेची गोष्ट म्हणजे आजतागायत या चोरीचा छडा लागलेला नाही. असो. आपण प्रतिकृती मध्येच समाधान मान

 

गीत : ४३

THE day was when I did not keep myself in readiness for thee; and entering my heart 

unbidden even as one of the common crowd, unknown to me, my king, thou didst press 

the signet of eternity upon many a fleeting moment of my life.

And to-day when by chance I light upon them and see thy signature, I find they have lain scattered in the dust mixed with the memory of joys and sorrows of my trivial days forgotten.

Thou didst not turn in contempt from my childish play among dust, and the steps that I heard in my playroom are the same that are echoing from star to star.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४३ ☆

*

अज्ञानाचा मेरू

लिप्त मी संसारू

मनाचे ते वारू

उधळतसे॥

*

ना सांगावा धाडला

नकळत आला

प्रवेश त्वां केला

माझ्या काळजात॥

*

माझे किती क्षण

तुझे स्पर्श लेवून

अमर होऊन

विस्मरतो मी॥

*

आज पाही जेंव्हा 

त्या क्षणांकडे तेंव्हा

तुझिया स्पर्शाची

अनुभूती येते॥

*

जपून ना ठेविले

मोल ना जाणिले

उदारे जे दिले

पडे धुळीमध्ये॥

*

माझे मूढपण

बाल्य समजून

मान अपमान

लेखिशी समान॥

*

अप्रुप त्या दिसाचे

तुझ्या पदरवाचे

दैवी अस्तित्वाचे

कळले नाही॥

*

ब्रम्हांडी ध्वनीत

पदरव होत

ताऱ्यांवर तेथ

ऐकू येती॥

*

आता चमत्कार

फोल बाह्यात्कार

होई साक्षात्कार 

अंतिम वेळी॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

——

☆ गीत : ४४ ☆

THIS is my delight, thus to wait and watch at the wayside where shadow chases light and the rain comes in the wake of the summer.

Messengers, with tidings from unknown skies, greet me and speed along the road. My heart is glad within, and the breath of the passing breeze is sweet.

From dawn till dusk I sit here before my door, and I know that of a sudden the happy moment will arrive when I shall see.

In the meanwhile I smile and I sing all alone. In the meanwhile the air is filling with the perfume of promise.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४४ ☆

*

कधीतरी बसतो, रस्त्याच्या कडेला

प्रकाश सावल्यांचा खेळ पाहण्या

आणि अनुभवतो पहिला पाऊस,

जो येतो ग्रीष्माची चाहूल देण्या

*

असेच भेटतात प्रेषित मजला,

नभाशी अनामिक बंध बांधण्या

अशीच वाऱ्याची झुळूक येते,

सुवासांचा गोडवा चाखण्या

*

बसतो दारी, उषेपासून निशेपर्यंत,

क्षण सुखाचा अवचित वेचण्या

झोका हवेचा अलगद येतो,

सुगंध आश्वासक वचनांचा भरण्या

*

एकटाच मग मी मन भरुन हसतो,

बंद मुठीतील सुख वाटण्या

अजूनही दारी मी बसतोच आहे

आलाच तो, तर संधी न दवडण्या

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ४५ ☆

HAVE you not heard his silent, steps? 

He comes, comes, ever comes.

Every moment and every age, every day and every night he comes, comes, ever comes.

Many a song have I sung in many a mood of mind, but all their notes have always proclaimed, “He comes, comes, ever comes. ” 

In the fragrant days of sunny April through the forest path he comes, comes, ever comes.

In the rainy gloom of July nights on the thundering chariot of clouds he comes, comes, ever comes.

In sorrow after sorrow it is his steps that press upon my heart, and it is the golden touch of his feet that makes my joy to shine

—–

मराठी भावानुवाद : गीत ४५ ☆

*

दिवस असो वा रात्र असो,

बाल्य असो वा जरा

त्याचे पदरव पडती कानी,

तो येतो, येतोच खरा॥

*
गीते गातो प्रीतीची,

कधी विरहाची 

कितीक त्या तऱ्हा

परि शब्दांचा घोष एकच,

तो येतो, येतोच खरा॥

*

वसंतातला सुगंध प्राशिता 

वा धुंद बरसता जलधारा

दौडत दौडत मेघ-रथातून,

तो येतो, येतोच खरा॥

*

चरण कमल ते हृदयी उमटे,

हरवता जीवनी किनारा

हेम-स्पर्श तो कुशीत घेतो,

तो येतो, येतोच खरा॥

*

– क्रमशः भाग १५.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बुद्धी दे रघुनायका” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बुद्धी दे रघुनायका” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

साधक समर्थांच्या अंतःकरणातील आर्त स्वर

प्रस्तावना

दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची कबुली आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.

समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. _“युक्ति नाही बुद्धि नाही”_ अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ कबुली देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे !

ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.

आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.

साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही कबुली म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.

मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…

मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.

ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.

परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका.

हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.

सामाजिक अपुरेपणाची वेदना

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…

येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?

ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.

असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश

चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…

मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.

कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…

येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.

निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…

ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.

समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.

समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया

ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.

स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे बुद्धी दे रघुनायका.

ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.

समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—

मी कमी पडतोय देवा… मला सद्बुद्धी दे.

– – – 

☆ “संध्या तांडव” ☆ श्री दिवाकर बुरसे

(राग शंकरा)

समर्थांची मूळ कविता…

 बुद्धि दे रघुनायका 

*

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥

*

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥

कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥

*

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥

बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥

*

तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥

सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥

*

नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥

अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥

*

प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥

मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥

*

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥

*

चित्त दुश्चित्त होता हे। ताळतंत्र कळेचिना॥

आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥

*

काया वाचा मनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥

हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥

*

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥

आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥

*

– – – सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामी

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ करी ऑफ कॉन्स्पिरसी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ करी ऑफ कॉन्स्पिरसी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

पुरणपोळ्या खाण्याचं पुण्य कटाच्या आमटीसोबतच पोटाला मिळतं म्हणून आज ही रेसिपी वाचाच!

आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या हजारो घरांच्या किचनमधून एक विशिष्ट, खमंग आणि मसालेदार असा सुगंध दरवळतोय. प्रेशर कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज आता शांत झालाय, पण खऱ्या ‘कारस्थानाला’ आता कुठे सुरुवात झाली आहे. पुरणपोळीचा बेत म्हटला की घराघरात एक वेगळीच लगबग असते, पण त्या गोडधोड पोळीच्या सावलीत एक अशी डिश शिजत असते, जिच्याशिवाय जेवणाचं पान पूर्णच होऊ शकत नाही.

**

याला ‘करी ऑफ कॉन्स्पिरसी’ म्हणण्याचं कारण असं की, ही आमटी म्हणजे चण्याच्या डाळीने मागे सोडलेल्या अस्तित्वाचा एक हुशार अविष्कार आहे. पुरणासाठी डाळ शिजवून झाल्यावर जे पाणी उरतं, त्याला आपण ‘कट’ म्हणतो. खरंतर ते फेकून देण्यासारखं पाणी, पण गृहिणींच्या कल्पकतेने त्यातून जे अमृत बाहेर पडतं, त्यालाच आपण ‘कटाची आमटी’ म्हणून ओळखतो.

आजच्या या घाईघाईच्या जगात जिथे इन्स्टंट रेसिपीजचा सुळसुळाट झालाय, तिथे कटाची आमटी बनवणं ही एक ‘स्लो कुकिंग’ची कला आहे. त्याआधी घरातील पुरुषवर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि वैधानिक सूचना. जोपर्यंत किचनमधून तो विशिष्ट खमंग दरवळ येत नाही, तोपर्यंत उगाचच ‘काय होतंय?’ किंवा ‘डाळ शिजली का?’ हे बघायला तिथे जाऊ नये. डाळ शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी बोटचेपेपणा करणं म्हणजे सुगरणीच्या कामात खोडा घालण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत कट व्यवस्थित निघत नाही, तोपर्यंत डाळ शिजली असं म्हणता येणार नाही.

**

कटाची आमटी ही अत्यंत नाजूक पाककृती आहे, जी केवळ सरावानेच जमते. जर थोडंही गणित चुकलं, तर आमटीची ‘गुळवणी’ व्हायला वेळ लागत नाही. या आमटीचा जो सुगंध संपूर्ण गल्लीत पसरतो, तेच तिचं खरं ‘आयएसओ ४१०००’ प्रमाणपत्र असतं. त्यासाठी मसाल्याची तयारी ही एखाद्या युद्धाच्या तयारीसारखी असावी लागते. जिरं, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता मंद आचेवर खमंग भाजून घेताना जो आवाज येतो, तोच या रेसिपीचा खरा म्युझिक स्कोअर आहे.

खोबऱ्याचा एक तुकडा गॅसच्या निळ्या ज्योतीवर थेट धरून तो वरून काळा होईपर्यंत भाजणं, ही या रेसिपीतली सर्वात थरारक पायरी. तो भाजलेला काळा तुकडा आणि गरम मसाला जेव्हा मिक्सरमध्ये एकत्र फिरतात, तेव्हा तयार होणारा मसाला म्हणजे या कटाच्या आमटीचा आत्मा असतो. त्यात चिंचेचा कोळ, थोडा गूळ आणि चवीनुसार मीठ घातलं की बेस तयार होतो. पण थांबा, खरी जादू अजून बाकी आहे.

**

फोडणीची तयारी करताना आज थोडं उदार व्हावं लागतं. तेलाचा वापर रोजच्यापेक्षा थोडा जास्त हवा, कारण त्याशिवाय आमटीला ती ‘तर्री’ किंवा ‘कट’ येणार नाही. मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी बसली की त्यात तीळ आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे नाचू लागतात. मग त्यात भिजवलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप आणि आपल्या खिशाला परवडतील तसे काजूचे तुकडे टाकले की एक राजेशाही थाट येतो.

हा सगळा मसाला आणि कट एकत्र होऊन जेव्हा गॅसवर १० मिनिटं उकळायला लागतो, तेव्हा किचनमधलं वातावरण एखाद्या मंदिरातल्या गाभाऱ्यासारखं पवित्र होतं. वरून हिरवीगार कोथिंबीर पेरली की ‘करी ऑफ कॉन्स्पिरसी’ सर्व्ह करण्यासाठी तयार होते. ही आमटी नुसती चवीला लागते असं नाही, तर ती पुरणपोळी खाण्याचं पुण्य आपल्या पोटाला मिळवून देते.

**

एका बाजूला मऊशार पुरणपोळी आणि दुसऱ्या बाजूला झणझणीत कटाची आमटी, हा संगम म्हणजे मराठी खाद्यसंस्कृतीचं सर्वात मोठं यश आहे. ही आमटी म्हणजे केवळ जेवणातला एक पदार्थ नसून, तो संयम आणि कौशल्याचा एक परिपाक आहे. म्हणूनच, पुढच्या वेळी जेव्हा घरात पुरणपोळीचा बेत असेल, तेव्हा त्या कटाच्या आमटीकडे आदराने बघा, कारण ती डाळीच्या त्यागातून निर्माण झालेली एक चविष्ट क्रांती आहे.

ज्या घराच्या किचनमधून कटाच्या आमटीचा सुगंध बाहेर येत नाही, त्या घराला पुरणपोळीचा खरा आनंद कधीच कळू शकत नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते — स्वामी विवेकानंद” – लेखिका : अंजली गोखले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

“हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते — स्वामी विवेकानंद” – लेखिका : अंजली गोखले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते–स्वामी विवेकानंद 

– – संन्यासी योद्ध्याची जीवनगाथा

लेखिका : सौ. अंजली गोखले.

 संपर्क: ८४८२९३९०११

प्रकाशक : विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग पुणे.

संपर्क: ०२०-२४४३२३४२

पृष्ठे. : ३५६

मूल्य. : रु. ४००/-

स्वामी विवेकानंद म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करुन शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारे, श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य, ज्यांनी हिंदू धर्म व हिंदुस्थानची ध्वजा जगात फडकवली… बस्स ! बहुतांश लोकांना स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल एवढेच माहिती आहे. खरे ना ? पण प्रत्यक्षात स्वामीजींचे व्यक्तीमत्व असे होते की ज्याला अष्टपैलू हा शब्दही तोकडा पडेल. कसे होते स्वामीजी नेमके ? त्यांच्या कार्याचा आवाका केवढा होता ? धर्माविषयी त्यांची मते किती स्पष्ट आणि ठाम होती ? अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांना त्यांची भुरळ पडावी असे त्यांच्यात काय होते ? वेद आणि विज्ञान यावरील त्यांचे प्रभुत्व, धर्म आणि देशातील दरिद्रीनारायण यांच्याविषयी त्यांची असलेली मते, विचार आणि प्रत्यक्ष आचार यांचा त्यांनी साधलेला मेळ, युवक आणि शिक्षणपद्धती, उपासना आणि धर्माचरण, आत्मोन्नती आणि समाजोन्नती, त्या काळातील भारतीय महिलांची असलेली अवस्था,… अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मिरज येथील सौ. अंजली गोखले लिखित..

अंजली गोखले 

हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते… स्वामी विवेकानंद ‘ हे चरित्र एकदा तरी वाचावे.

एका असामान्य व्यक्तीमत्वाचे जीवन आणि कार्य अत्यंत साध्या, सोप्या भाषेत त्यांनी समजावून दिले आहे. स्वामीजींच्या बालपणापासून ते समाधीस्थ होण्याच्या दिवसापर्यंतचा विशाल कालपट त्यांनी अठ्ठावीस प्रकरणांमधून वाचकांसमोर मांडला आहे. स्वामीजींचे बालपण, तारुण्याच्या उंबरठ्यावरील कॉलेज जीवनातील प्रवेश, त्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस यांची होणारी भेट, या भेटीनंतर पुन्हा पुन्हा भेट घेण्याची लागलेली ओढ लेखिकेने अत्यंत सुलभपणे रंगवून सांगितले आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिल्यामुळे वाचकाला त्यांच्याविषयी दुर्मिळ अशी माहिती मिळते. पुढील काळात स्वामीजींच्या कुटुंबावर आलेली संकटे, व्यवहारातील चटके आणि त्यातून गुरुकृपेने बाहेर पडण्याचा उपलब्ध झालेला मार्ग याचे वर्णन येते.

आपल्या गुरूंच्या सहवासात स्वामीजींचे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा कशी ठरली हे या सर्व लेखनातून स्पष्ट होते. आपल्या पुढील कार्याचा एक भाग म्हणून स्वामीजींनी केलेली संपूर्ण देशाची पदयात्रा, त्यांचा पहिला परदेश प्रवास, त्यानंतर शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत त्यांनी केलेले भाषण, या ध्येयापर्यंत पोहचताना आलेल्या अनंत अडचणी, गुरुकृपेने त्यातून बाहेर पडण्याचा मिळालेला मार्ग, त्यांचे अमेरिकेतील कार्य या सर्व घटना लेखिकेने अत्यंत सविस्तरपणे आपल्यासमोर मांडल्या आहेत. स्वामीजींचे पुन्हा एकदा अमेरिकेला जाणे, त्यांचे इंग्लंडमधील दोन दौरे, तसेच अन्य युरोपीय देशांमधील दौरे, त्यांची व्याख्याने, वेदांत प्रसार, वेदांत आणि विज्ञान यांची सांगड घालण्यासाठी चाललेला आटोकाट प्रयत्न, पश्चिमात्य राष्ट्रांची श्रीमंती आणि भारतातील दारिद्र्य पाहून त्यांच्या मनात चाललेला वैचारिक कोलाहल, रामकृष्ण मिशनची स्थापना, मार्गारेट नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता यांच्यासारख्या शिष्योत्तमेचा झालेला लाभ, मातृभूमीला परतल्यानंतर झालेले स्वागत, सभा, व्याख्याने, जगभरातील अनेक नामवंत विचारवंत, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ, धनाढ्य यांच्याशी सर्व विषयावर झालेली चर्चा या सर्व बाबी अत्यंत सूक्ष्मपणे लेखिकेने नमूद केलेल्या आहेत.

समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारावून टाकणारे स्वामीजींचे व्यक्तिमत्व, त्यांचा मनोनिग्रह, त्यांची ध्येयपूर्तीची आस, या सर्वावर विविध व्याधीमुळे काय परिस्थिती निर्माण झाली होती व त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वामी आपल्या अंतिम ध्येयाकडे कशी वाटचाल करत होते याची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला येते. अनेक प्रकारच्या टीकांना सामोरे जाऊनही, वैयक्तिक बदनामी सहन करूनही, मनाचा तोल न ढळू देता एक संन्यस्त जीवन प्रवासी कशा प्रकारे मार्गक्रमण करत असतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामीजी !

त्यांच्या अलौकिक, असामान्य, अतुलनीय आणि अविश्वसनीय अशा कार्याचा आढावा घेताना लेखिकेने अनेक लहान-मोठे प्रसंग, भावनिक प्रसंग, स्वामीजींना भेटलेली लहान मोठी माणसे, त्यांच्याशी झालेले संवाद, मतभेद या सर्वांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे स्वामीजींचे कार्य अगदी सहजासहजी पार पडले असे कोणाला वाटत असेल तर ते किती चुकीचे आहे हे समजून येते. स्वामीजींचे विचार समजावून देताना लेखिकेने स्वामीजींच्या तोंडची अनेक वाक्ये उद्धृत केली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचे स्वामीजींनी केलेले पृथक्करण अत्यंत सोप्या शब्दांत लेखिकेने सांगितले आहे. त्यामुळे स्वामीजींचे विचार नेमके काय होते हे आपल्याला समजून येते.

शेवटच्या एका प्रकरणात त्यांनी स्वामीजींच्या काही ह्रद्य आठवणी कथन केल्या आहेत. त्यातून विविध लोकांची त्यांच्याविषयी असलेली मते वाचायला मिळतात. स्वामीजी चार वेळेला महाराष्ट्रात येऊन गेले होते. लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, नाटककार भा. वि. उर्फ मामा वरेरकर यांची व स्वामीजींची झालेली भेट, त्यांच्यातील विचारांची देवाणघेवाण, स्वामीजींनी केलेले मार्गदर्शन हे सर्व मराठी मनाला रंजक आणि स्फूर्तीदायक वाटणारे आहे.

परमपूज्य श्री रामकृष्ण परमहंस, माता सारदा देवी, भगिनी निवेदिता आणि श्री. गुडवीन यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात काय स्थान होते हे या पुस्तकाच्या वाचनानंतर लक्षात येते. गुडविन हे नसते तर स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचेल असते का ? त्यामुळे ते कोण होते हे जाणून घ्यायलाच हवे. प्रा. रोमा रोलॉनी स्वामीजींचे वर्णन ” विश्वात्म्याच्या वाद्यवृंदाने सादर केलेले उत्कृष्ट संगीत ” या शब्दात का करतात हे समजून घेतले पाहिजे.

स्वामीजींच्या पश्चात कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच विवेकानंद केंद्र या संस्थेचीही निर्मिती करण्यात आली. या विवेकानंद केंद्राचा परिचय व केंद्राचे महाराष्ट्रातील प्रकल्प याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

विवेकानंदांचे व्यक्तीमत्व ‘इंद्रधनुष्यी ‘ होते असे लेखिकेने म्हटले आहे. या इंद्रधनुष्याचे सर्व रंग खुलवून दाखवणे हे खूपच अवघड काम आहे. परंतु लेखिकेच्या लेखणीने हे आव्हान पेलले आहे. अवघ्या साडेएकोणचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामीजींच्या आयुष्यातील एक एक दिवस किती मोलाचा होता, आव्हाने आणि प्रतिकुलता यामुळे स्वामीजींना काय काय सहन करावे लागले, परंतु आपले गुरु श्री रामकृष्ण परमहंस व काली माता यांच्यावरील अगाध श्रद्धेमुळे झालेली ध्येयपूर्ती… हे सर्व वाचताना, स्वामीजी म्हणजे एक दैवी चमत्कारच होते याची खात्री पटते. या चमत्काराला शब्दबद्ध करुन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम सौ. अंजली गोखले यांनी केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. स्वामीजींचे हे जीवन चरित्र म्हणजे त्यातील मानाचा तुरा आहे. असेच बहुमूल्य लेखन भविष्यातही त्यांच्याकडून व्हावे ही सदिच्छा.!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares