मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि – नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा भग्न आज जयदुर्ग आसवांमाजी

ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहली राजधान्यांची । जंगले

परदास्य – पराभवि सारी । मंगले

या जगती जगू, ही आज गमतसे लज्जा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 –  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

प्रस्तुत कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना १९२६ मधे लिहिली आहे. (ते शाळकरी असताना लिहिली असा कांही लोकांचा गैरसमज आहे.)

या कवितेत प्रखर बुद्धिमंत सावरकरांनी फारशा प्रचलित नसलेल्या पण चपखल अशा मराठी व संस्कृत शब्दांचा वापर केला आहे. उदा. संभूत, दिप्तितम, चर्ची, गूढाशा, शोणित इ. या कवितेची रचना भूपतिवैभव या मात्रावृत्तात केलेली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज हे भारतीयांचे स्फूर्तिस्थान आहेतच पण त्यांच्याविषयी सावरकरांसारखा प्रखर देशभक्त जेंव्हा स्फुर्तीगीत लिहितो तेंव्हा ते महाराजांच्या भवानी तलवारीसारखं तेजःपुंज व धारदार होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर व गानकोकिळा लता मंगेशकर या द्वयीने हे गीत स्फूर्तिदायक व रोमांचक बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सूर व संगीत इतकं अर्थवाही आहे की गीत ऐकल्यानंतर कुणीही भारतीय रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या तीन कडव्यांच्या गीताच्या पहिल्या कडव्यात महाराजांचं स्तुतीपर वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. दुसर्‍या कडव्यात हिंदुस्थानातील सद्यस्थितीचं (त्या काळातलं -१९२६ मधलं) वर्णन केलं आहे आणि तिसऱ्या कडव्यात महाराजांकडं मागणं मागितलेलं आहे. जेणेकरून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी होईल.

पहिल्या कडव्यात ते महाराजांचं वर्णन ” हिंदूंच्या शक्तीतून प्रकट झालेलं तेज, हिंदूंच्या वर्षानुवर्षांच्या तपस्येचं फलित म्हणून जन्मलेला तेजःपुंज ईश्वरी अवतार, हिंदुदेवतेचा सौभाग्यालंकार, नरसिंहाप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलेला प्रभूचा अवतार” असं केलं आहे. आणि ते म्हणतात हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करीत आहे, चंदनाचा लेप लावून तुझं पूजन करीत आहे, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे. सावरकर म्हणतात, ” माझ्या मनात ज्या गूढ आशा आहेत त्या मी तुला कथन करू शकत नाही. तरी त्या ओळखून, हे नृसिंहाचा अवतार असणाऱ्या शिवाजीराजा माझ्या या इच्छा तू पूर्ण कर. ” ही कविता लिहिली तेंव्हा सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे स्वातंत्रप्राप्तीची इच्छा प्रकट करू शकत नव्हते म्हणून ‘गूढाशा’ हा शब्द वापरला आहे.

दुसर्‍या कडव्यात परकीय आक्रमणामुळे देशाच्या झालेल्या दुरावस्थेचं वर्णन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या, जतन केल्या गड किल्ल्यांची अवस्था सांगितली आहे. कुठे तट भंगले आहेत, गड, कोट, किल्ले, जंजिरे भग्न पावले आहेत, राजधान्यांची जंगले झाली आहेत, साऱ्या मंगलगोष्टी परदास्यामुळे पराभूत झाल्या आहेत. महाराजांसारखे वीरपुरूष नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे. अशातच आई भवानीही आधार देत नाही. अशा या जगात जगणं अत्यंत लज्जास्पद झालं आहे.

तिसऱ्या कडव्यात सावरकर म्हणतात, ” ज्या शुद्ध हृदयाच्या राजाला रामदास स्वामींनी आपलंसं केलं होतं, ज्या बुद्धिमान राजाने विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही व वऱ्हाडची इमादशाही अशा पाच शाह्यांना ‘त्राहि भगवान’ करून सोडलं होतं, जो राजा कूटनीतीचा युक्तीने उपयोग करून, वेळप्रसंगी तह करून, बलवान शत्रुला गाफील ठेऊन पराभूत करीत असे ; त्या राजाची अंतःकरणाची शुद्धी आमच्या कृतीत उतरू दे. ती बुद्धी माझ्या भाबड्या देशबांधवांना लाभूदे. ती शक्ती आमच्या नसानसातून (रक्तातून) वाहू दे. हे राजा, जो स्वराज्याचा मूलमंत्र तुला समर्थ रामदास स्वामींनी दिला, तो मंत्र तू आम्हाला दे. म्हणजे त्या मंत्रसामर्थ्याने, ती शक्ती व युक्ती वापरून, त्या शुद्धी व बुद्धीच्या योगाने आम्ही हिंदुस्थानचे बांधव परकियांना येथून हुसकावून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेऊ. “

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

राज कपूर, हिंदी चित्रपट सृष्टीचा शोमॅन. सगळे कलाविष्कार शो करणारा तो शोमॅन राजकपूर. त्या कलाकाराचे कौतुक करायला कवी निशिकान्त श्रोत्री यांनी वाहिलेल्या अनोख्या काव्यांजलीचे रसग्रहण करायचा मला मोह झाला….

कलाविश्वात आणि मनोरंजन विश्वात चित्रपटसृष्टीचे स्थान खूपच वरचे आहे. उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करणारे प्रतिभावंत लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री यांची मोठी  आहे मांदीयाळी आहे. राज कपूर हे यातलेच एक लोकप्रिय नाव.  ‘राजकपूर’ ही डॉ. निशिकांत श्रोत्री यांची  एक आगळी वेगळी कविता आहे. राजकपूर म्हणजे एक यशस्वी अभिनेता, निर्माता, आणि दिग्दर्शक. त्याच्या अनेक सिनेमांनी यशाचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. यातीलच अतिशय गाजलेले तीन यशस्वी चित्रपट म्हणजे आवारा,  श्री ४२०, जागते रहो. याच तीन चित्रपटांच्या कथानकावर आधारित,   एकदम वेगळेच हटके काव्यसूत्र असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे.

☆ राजकपूर … कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||ध्रु||

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी    ||१||

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||२||

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||३||

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री

मो. ९८९०११७७५४

☆ शोमॅन…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||

चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथानक, संगीत, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असतो. या सर्वच आघाड्यांवर राज कपूरनी वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आणि त्या जास्तीतजास्त लोकप्रिय बनवल्या. त्याच्या गाणी आणि संगीतांने बहार उडवून दिली. राज कपूर यातला एक चांगला जाणकार होता. मूळामध्ये तो एक अस्सल हिंदुस्तानी कलाकार होता. एक यशस्वी चित्रपट कसा बनवायचा यात तो माहीर होता. म्हणून तो ‘या सम हा !’ अशा पदापर्यंत पोहोचला होता.

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||१||

प्रत्येक जीवाला आयुष्यात वात्सल्याची ओढ असते. तितकीच प्रेमाची, मायेची पण आस असते. यासाठी फक्त नातीच गरजेची नसतात तर त्या बरोबरीने चांगले संस्कारही होणे खूप गरजेचे असते. हाच संदेश विनोदी ढंगाने हसवत हसवत  ‘आवारा’ हा सिनेमा देतो. ही गोष्ट कवीने अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितली आहे. माणूस प्रेम, वात्सल्य, माया मिळाली की शांत, संयमी, विवेकी बनतो. या उलट यापासून वंचित असणारे जीव भडक स्वभावाचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनतात. प्रेम, जिव्हाळाच त्यांना पुन्हा सन्मार्गावर आणतो. हेच रंजक पद्धतीने हा सिनेमा सांगतो. प्रेक्षकांची अचूक नस ओळखून अतिशय मनोरंजक पद्धतीने कथानक फुलवत नेलेले आहे. अर्थपूर्ण गाणी आणि श्रवणीय संगीताने चित्रपट खूप लोकप्रिय झाला.

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||२||

राज कपूरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट म्हणजे श्री ४२०. त्याचीच ही कथा. देशामध्ये बेकारी वाढल्यामुळे त्यात शिकलेले लोकही भरडले जातात. अशावेळी धन दांडगे लोभापायी त्यांची फसवणूक करतात. दीनदुबळ्यांची परिस्थिती आणखीनच हलाखीची बनते. ही सर्व परिस्थिती कवीने पहिल्या दोन ओळींमध्ये नेमक्या शब्दात वर्णन केलेली आहे. हे पाहून नायक  धनाढ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. अगदी चारसोबीसी करून गरिबांना न्याय मिळवून देतो आणि तो श्री चारसोबीस ठरतो. कारण तो सर्व सामान्यांसाठी लढणारा एक सर्वसामान्य नायक असतो.

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||३||

धनाढ्यांच्या मुखड्यामागे पाप दडलेले असते त्यामुळे गरजवंत कायम वंचितच रहातात. पण हा काळा पैसा, ही बनवेगिरी या मागचा खरा गुन्हेगार कोण ते कळतच नाही. या खोट्या मुखवट्यां मागचे खरे चेहरे आणि बंद दाराच्या आत चालणारे भ्रष्ट उद्योग बघून नायक सर्व सामान्यांना त्याची जाणीव करून देतो आणि जागते रहो अशी साद घालतो. राज कपूरच्या ‘ जागते रहो ‘ चित्रपटाची ही कहाणी. कवीने अतिशय मोजक्या पण अचूक शब्दात ती सांगितली आहे.

सर्व सामान्यांची दीनदुबळी दुनिया त्याच वेळी धनाढ्य, ढोंगी, अत्याचारी लोकांचे अन्यायी जग आणि या अन्यायाविरुद्ध झगडणारा सामान्यातलाच एक नायक हे या तीनही चित्रपटातले सूत्र आहे. केवळ चार ओळींमध्ये ते नेमके कथानक सांगणे हे कवीचे खास कसब आहे. कसलेही बोजड शब्द, अलंकारिक भाषा न वापरता साध्या सरळ शब्दात सहजपणे पण परिणामकारक पद्धतीने ते सांगितले आहे. एक लयबद्ध अशी ही कविता राज कपूरच्या चित्रपट कारकीर्दीतील या तीन महत्त्वाच्या सिनेमांची उत्तम दखल घेणारी आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

ही दुनिया एक प्रचंड मोठा रंगपट आहे. त्यावर प्रत्येक जण आपल्या वाट्याला आलेली भूमिका यथाशक्ती वठवत असतो.  कोणी अगदी नटश्रेष्ठ ठरतो तर कुणाची नुसती दखल सुद्धा घेतली जात नाही. या सर्व खेळाचा सूत्रधार चराचर व्यापून उरलेला तो विश्वेश असतो. हा एक खूप मोठा चिंतनशील, विचारप्रवर्तक अभ्यासाचा विषय आहे. याच विषयावरील डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांची ‘संसाराच्या रंगपटावर’ ही अतिशय सुंदर कविता आहे. ती आपल्याला या खेळाचा जणू ट्रेलरच दाखवते.

☆ संसाराच्या रंगपटावर ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

 

मंचावर येतांना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेवुनी येई नाना वेश ||१||

 

जगण्याला भूमिका घेवूनी

          सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

 

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधत राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||३||

 

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||४||

©️ डॉ.  निशिकान्त श्रोत्री

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

☆ रसग्रहण ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

हे तीन ओळींचे वेगळे असे या गीताचे वैशिष्ट्यपूर्ण ध्रुवपद आहे. या अखिल ब्रम्हांडात तो विश्वेश लपलेला असतो. सर्वत्र भरून राहिलेला असतो. वेळोवेळी तो वेगवेगळी रुपे घेऊन साकार होतो. प्रत्येकातच हृदयस्थ आत्माराम म्हणजे तोच ईश्वरी अंश असतो. तोच वेगवेगळ्या जीवांच्या रूपाने प्रकट होतो.

मंचावर येताना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||१||

या पहिल्या कडव्यात कवीने जन्म आणि मृत्यू या घटनांचे सुयोग्य शब्दात वर्णन केले आहे. बाळ जन्माला आले की सर्वांना अतिशय आनंद होतो. नव्या जीवाचे जल्लोषात स्वागत होते. तोही आपल्या बाललीलांनी,  पुढे आपल्या गुणांनी सर्वांना कधी आनंद देतो तर कधी रडवतो. हे करीत असताना स्वतः त्यात न गुरफटका तो मात्र वाट्याला आलेली भूमिका जगून घेतो. शेवटी डाव संपला की खेळाची कनात उतरवली जाते म्हणजे त्याचा मृत्यू होतो. त्यावेळी मात्र त्याच्या जाण्याने सर्वांना खूप दुःख होते. याच पद्धतीने तो विश्वेश वेगवेगळ्या जीवांमधून वेगवेगळी भूमिका साकारत असतो. इथे कनात उतरवण्याच्या रूपकातून मृत्यूची संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. एखाद्या डाव किंवा खेळ संपला की उभारलेली कनात उतरवतात. त्याचप्रमाणे जन्माला आलेला जीव मृत्यू पावतो. ही कनात उभारण्याची आणि कनात उतरवण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते.

जगण्याला भूमिका घेवूनी

सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

जन्माला आलेला जीव आपली भूमिका कशी निभावतो हे कवीने या दुसऱ्या कडव्यात विशद केलेले आहे. कधी कधी जगण्यासाठी काही विहित कर्म बरोबर घेऊन त्याला योग्य अशी भूमिका घेऊनच हा जीव जन्माला येतो. कधी राजा म्हणून, तर कधी उच्चपदस्थ कार्यनिपुण अधिकारी म्हणून, कधी कलानिपुण कलाकार म्हणून, तर कधी समाजाचे भूषण अशी सन्माननीय व्यक्ती म्हणून जन्माला येतो. कर्तृत्वाचा, सन्मानाचा शेला पांघरून येतो. तर कधी तपस्वी, संन्याशी, विरक्त योगी बनून सर्वांना जीवनाचे वर्म, जगण्याचे प्रयोजन, सार्थकता याविषयी प्रबोधन करतो. असा हा विश्वेश अखंड ब्रम्हांडाला व्यापून राहिलेला असतो. सगळी पृथ्वी किंवा अख्खी सूर्यमालाही जिथे त्याला सामावून घेऊ शकत नाही तिथे देशाच्या सीमांचा तर प्रश्नच येत नाही. त्यात तो मावणारच नाही.

समाजात आदर्श म्हणून आदर सन्मान मिळून सन्मानाचे उच्च पद मिळणे आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य, सौख्य उपभोगणे यालाच भरजरी शेल्याचे रूपक योजिले आहे. तर उग्र तपश्चर्या करून वैराग्य प्राप्त केलेले विरक्तयोगी तपस्वी यांच्यासाठी नागव्याचे रूपक योजिले आहे. म्हणजे ते जगरुढीत न गुरफटता आपली वाट आपल्या मनाप्रमाणे चोखाळतात.

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधात राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||३||

या तिसऱ्या कडव्यात अविनाशी आत्म्याचा प्रवास कवीने स्पष्ट केलेला आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति  नरोऽपराणी

तथा शरीराणि विहाय  जीर्णा-

न्यन्यानि संयाति नवानि देही ||

गीतेतील या श्लोकाचा अर्थ कवीने इथे अधिक स्पष्ट केलेला आहे. जसा खेळ संपला की पडदा पडतो. त्याप्रमाणे आपले विहितकर्म संपले की जीवाचा शेवट म्हणजे मृत्यू होतो. आत्मा हा जीव सोडून निघून जातो. ज्याप्रमाणे आपण आपले जुने वस्त्र जीर्ण झाले की ते बदलून नवीन वस्त्र परिधान करतो. त्याप्रमाणे आत्मा एका देहातून निघाला की दुसऱ्या नवीन देण्यात अवतीर्ण होतो. इथे कवी म्हणतो की त्या जीवाचे जगणे संपले, पण कर्म अजून शिल्लक राहिलेले असते. ते पूर्ण करण्यासाठी आत्मा नवीन देहाला शोधत फिरतो. अशाप्रकारे तो एका देहानंतर दुसऱ्या देहाच्या शोधासाठी नव्या जोमाने फिरत राहतो आणि नवीन वेश परिधान करून नव्या भूमिकेत रंगपटावर येतो.

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||४||

एक भूमिका संपते. पुढे दुसरी,  त्यातून तिसरी असा जीवाचा प्रवास सुरूच असतो. त्याचे वर्णन कवीने या शेवटच्या कडव्यात केलेले आहे.

पुन्हा नवा खेळ सुरू होतो. नवीन भूमिका असते. पण त्याची नेमकी कथा कुणालाच ठाऊक नसते. आपण म्हणतो ना,  ” प्रारब्धात काय काय लिहून ठेवले आहे कुणास ठाऊक ?” पण त्या अज्ञानात सुख मानून जगताना आपण कशासाठी जन्माला आलो?  आपल्याला नेमके काय करायचे आहे ? याचाच विसर पडतो आणि या देहाचे चोचले पुरविण्यात देहात रमून जातो. त्या जीवाला आपल्या संवादाची तोंड ओळखली नसते. हा नवा प्रवेश किती काळाचा आहे हेही ठाऊक नसते. तरीही तो सतत वेगवेगळी रूपे घेऊन रंगपटावर येत असतो.

या सर्व प्रवासातून हे कळते की, आत्मा अविनाशी आहे, तो जुने वस्त्र बदलावे तसा देह बदलतो. पण एका जीवातून दुसऱ्यात प्रवेश, एका भूमिकेतून नव्याने वेषांतर करून नवी भूमिका वठवत या आत्म्याचा प्रवास अव्याहतपणे सुरू असतो. कथा, संवाद, कार्यकाळ काहीही आधी माहीत नसताना काही भूमिका अप्रतिम ठरतात. समाज मानसात कायमच्या कोरल्या जातात. तर काही उत्तम, काही ठाकठीक, काही सुमार, तर काही अगदीच नाकारल्या जातात.

ही संपूर्ण कविता रूपकात्मक आहे. प्रत्येक जीवात ईश्वर असतो आणि तो वेगवेगळी रूपे घेत प्रकटतो. तर प्रत्येक जीव अंतरात्म्यामुळे वेगवेगळ्या भूमिका वठवतो हे मुख्य रूपक आहे.

पहिल्या कडव्यात कनात खाली उतरणे या रूपकातून मृत्यू होणे हा अचूक अर्थ स्पष्ट होतो.

दुसऱ्या कडव्यात भरजरी शेला हे सामाजिक मानसन्मान, ऐश्वर्य, सौख्य यासाठी योजलेले रूपक आहे. तर नागवा हे रूपक निर्भीडपणे, परखडपणे समाज प्रबोधन करणारा विरक्त योगी, संन्यासी यांच्यासाठी योजले आहे .

तिसऱ्या कडव्यात पडदा पडला की खेळ संपतो या रूपकातून मृत्यू झाला की  जीवात्मा तो देह सोडून जातो आणि ती भूमिका संपते ही गोष्ट स्पष्ट होते.

अशा रीतीने उत्तम शब्द योजनेतून ही कविता जन्म-मृत्यूचे अव्याहत सुरू असणारे चक्र, त्या मागचा सूत्रधार आणि त्याच्या विविध भूमिका अतिशय सुंदर रीतीने विशद करते. जगाच्या व्यवहारावर अगदी चपखल शब्दात प्रभावीपणे प्रकाश टाकणारी डॉक्टर श्रोत्री यांची ही एक अतिशय सुंदर  कविता आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर ☆

? काव्यानंद ?

☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर

वैभव जोशी यांच्या गझलचं रसग्रहण

आज त्यांची  देवप्रिया(कालगंगा)वृत्तातली एक गझल मी रसग्रहणासाठी घेतली असून त्यातील प्रत्येक शेराचा आशय माझ्या कुवतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी अनेकांना यातील शेरांच्या अर्थाचे वेगळे पदर उलगडतीलच.

आजची रचना

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

 

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

 

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

 

काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

 

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वैभव जोशी

आता प्रत्येक शेराचा आशय आपण पाहू..

शेर क्र.१

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

एका लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी त्याची लेखणी हीच त्याला मिळालेली अमोघ अशी ताकद असते.आपल्यापाशी असलेली शब्दसंपदा लेखणीच्या माध्यमातून तो रसिक मायबापापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पण या लेखणीतून फक्त शब्दबुडबुडे बाहेर न पडता जगातल्या दुःखितांच्या,पीडितांच्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ्य दे असं मागणं गझलकार ईश्वराकडे मागत आहे!खूप सुंदर असा मतल्याचा शेर!

शेर क्र.२

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

या शेरात गझलकार वरवर अगदी साधं वाटणारं पण अतिशय कठीण,सत्वपरीक्षा पाहणारं मागणं ईश्वराकडे मागत आहेत.आपल्या अवतीभवती भुकेने तडफडणारे अनेक लोक आहेत आणि अशी वेळ कुणावरही,कधीही येऊ शकते!यदाकदाचित असा प्रसंग स्वतःवर कधी आलाच तर एकवेळ पोटाची खळगी भरायला भाकरी नाही दिलीस तरी चालेल,पण भूक सहन करण्याचं बळ दे,आणि तशा अवस्थेतही स्वत्वाची भावना कधी ढळू देऊ नकोस,पोटासाठी लाचारी पत्करायला लावू नकोस असं गझलकारांचं मागणं आहे..असं कुणी एखादाच मागू शकतो कारण आज माझं हक्काचं आहे ते हवंच पण दुसऱ्याचं आहे तेही हवं अशी लोकांची मनोधारणा बनत चालली आहे!खूप गहन अर्थाचा शेर!

शेर क्र.३

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

वाह! या जगात जसे असामान्य लोक आहेत तसेच अतिसामान्यही आहेत.कुणी सडेतोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतो तर कुणी मूग गिळून बसत सतत अन्याय सहन करत राहतो.बळी तो कान पिळी या न्यायाने मोठा अधिक मोठा होत जातो आणि सर्वसाधारण आहे तो जैसे थे अवस्थेत पिचून जातो.प्रत्येक युगात हे असंच चालत आलंय पण अशा वंचितांना आपली व्यथा बोलून दाखवण्याची स्फूर्ती परमेश्वराने द्यावी,त्यांच्या जाणिवा जागृत व्हाव्यात असं या शेरात गझलकारांचं मागणं आहे!सुंदर शेर!*ज्येष्ठ दिवंगत गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांची

बोल बाई बोल काही

हा अबोला ठीक नाही

असा शेर असलेली गझल मला सहज आठवली हा शेर वाचताना!

शेर क्र.४

काय कामाचा गड्या ओठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

हाही शेर खूप उंचीचा खयाल असलेला!आधीच्या शेरात म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे केवळ अन्याय सहन करत कुढत जगणाऱ्या माणसांच्या शब्दांना कधी तरी वाचा फुटावी आणि मनात दाटून आलेलं सगळं बाहेर यावं जेणेकरून पुढची वाटचाल सुकर होईल!

हो मोकळी बोलून तू हृदयात जे जे दाटले

का भावनांना आपल्या अव्यक्त मग ठेवायचे

या शेरात म्हटल्याप्रमाणे मनातल्या भावनांची कोंडी फुटल्याशिवाय जगणं सुखाचं होणार नाही आणि त्यासाठीच ईश्वराने आपलं मन मोकळं करण्याची स्फूर्ती माणसांना द्यावी,मूक हुंदके सहन करण्यापेक्षा परिस्थितीचं,काळाचं आव्हान पेलण्याची ताकद दे,अश्रूंपेक्षा हिम्मत दे असं गझलकार इथे सुचवतात.

शेर क्र.५

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वाह,हा शेवटचा शेर तर एखाद्या पोथीचा कळसाध्याय असावा तसा आहे!सामान्य माणसाला रोजची भाकरी आणि रहायला मठी असावी एवढीच अपेक्षा असते,त्याला कुठल्या शिखरावर जायची आस नसते आणि किमान सुखाचं आयुष्य लाभावं इतकं त्याचं अल्प मागणं असतं.

प्रस्तुत शेरात गझलकार म्हणतात की मला त्या ध्रुवासारखं आकाशातलं अढळपद मिळण्याची लालसा नाही तर अवतीभवतीच्या माणसांच्या काळजातच जागा हवी आहे जेणेकरून त्यांची सुखदुःख,व्यथा वेदना जाणून घेता येतील.स्वतःपुरेसंच जगण्याची संकुचित वृत्ती न जोपासता इतरांची मनं वाचण्याचा व्यापक दृष्टिकोन या शेरात प्रभावीपणे व्यक्त झाला आहे आणि म्हणूनच या शेरातला खयाल खूप उच्च दर्जाचा वाटतो!एका कवीसाठी, गझलकारासाठी माणसं वाचण्याहून  दुसरं मोठं काही नसतं असाही एक विचार इथे गवसतो!खूप आवडला हा शेर!

ही रचना मला का आवडली?

देवप्रिया वृत्तातली ही खूप सुंदर रचना आदर्श मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यातला प्रत्येक शेर खास आहे. दे रे ईश्वरा या रदिफला अगदी समर्पक असे वरदान,जाण, त्राण, स्फूर्तीगान,आव्हान आणि स्थान हे कवाफी चपखलपणे वापरले आहेत. लेखणी,भूक,भाकरी,हुंदका,गगनातलं अढळपद अशी प्रतीकं, रूपकं आणि प्रतिमा या रचनेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे प्रत्येक शेर वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतो!श्री.वैभव जोशी यांच्या तरल आणि संपन्न प्रतिभेला मनापासून नमस्कार!आजच्या वाढदिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा!

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गांठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई ।

मिठी घालू मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

“संन्यस्त खड्ग” ह्या संगीत नाटकांतील हे पद म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या अत्त्युच्च पदांमधील एक!! ह्या माणसाच्या प्रतिभेवर साक्षात सरस्वतीने भाळून जावे इतक्या विलक्षण प्रतिभेचा धनी, बौद्धिक संपदा अशी की चक्क कुबेराला आपली पारमार्थिक संपत्ती त्याच्यापुढे फिकी वाटावी, आणि राष्ट्रभक्ती तर अशी की भारतमातेने तिच्या ह्या पुत्राला झालेल्या यातनांनी आसवे गाळावीत तर तिचे अश्रूचं विनायक दामोदर सावरकर ह्या तेजपुंज व्यक्तिमत्वासमोर थिजून जावेत!! स्वातंत्र्यवीर/हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणजे अग्निकुंड. अटलजी म्हणायचे तसे सावरकर म्हणजे तितीक्षा, सावरकर म्हणजे तिखट. अशा राष्ट्रपुरुषाला प्रेम काव्य सुचलं तर ते कसे असेल ह्याची दिव्यानुभूती म्हणजे वरील पद!! 

अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना ”संन्यस्त खड्ग“ लिहिले. ह्या नाटकात पात्रे आहेत बुद्ध, विक्रमसिंग, वल्लभ आणि सुलोचना. सुलोचना ह्या पात्राच्या तोंडी हे गीत आहे. सुलोचना ही वल्लभची पत्नी. त्यांच्या लग्नाला जेमतेम काही दिवस झालेले असतात. नवीन-नवीन संसाराची आता कुठे वेल फुलायला लागली असते. एकेदिवशी त्यांचा प्रेमळ संवाद सुरु असतांना अचानक राज्यसभेचा निरोप येतो म्हणून वल्लभ तो प्रेमळ संवाद उमलायच्या आत अर्ध्यावरच सोडून तडक उठून राज्यसभेत निघून जातो. उशिरा केंव्हातरी सैनिक निरोप घेऊन सुलोचनेकडे येतो की सेनापती तर राज्यसभेतूनच थेट रणांगणावर युद्धासाठी गेले आहेत. तेंव्हा सुलोचनेच्या मनात आलेल्या ह्या भावना म्हणजे हे गीत.

आता गंमत बघा सुलोचना ही साधी स्त्री नाहीय. ती कर्तृत्ववान आहे. त्यामुळे ती फक्त प्रेमळ विरह गीत कसे गाईल?? सावरकरांची विलक्षण प्रतिभा बघा . प्रेम विरह गीतात देखील सुलोचनेच्या जाणिवा प्रगल्भ आहेत.तिचे विचार परिपक्व आहेत. अशी दमदार स्त्री जेंव्हा विरह गीत गात असेल ते देखील किती अत्त्युच्च असेल नाही??

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

सुलोचना म्हणते माझा प्रियकराचा शोध हा जन्मोजन्मांचा आहे. माझ्या ह्या शोधापुढे ‘शत’ आर्ति (दुःख, पीडा) व्यर्थ आहेत, आणि ह्यात सुलोचनेने कशाची आहुती दिली आहे तर शत सूर्य मालिकांच्या दीपावलीची.  म्हणजे सामान्य माणसांप्रमाणे सुलोचनेची दीपावलीची पणती ही मातीची नाहीय तर ती आहे शंभर सूर्यमालिकेची!! कल्पना देखील किती भव्य असावी??

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गाठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

प्रियकर मिलनाचे सायास तिला (सुलोचना) कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाहीत.  तिच्यासाठी तर ही आनंदाने केलेली साधना आहे, जिची सिद्धी आता कुठे तिने ’गाठली’ आहे. सावरकरांची शब्दप्रभू संपन्नता बघा गांठी (गाठभेट) आणि गाठी (पोचणे किंवा गाठणे) काय भन्नाट यमक त्यांनी जुळविले आहे!!

हा हाय जो न जाई ।

मिठि घालु मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

पुढे सुलोचना म्हणते नुकतीच तर आमची भेट झाली आहे. त्याला (वल्लभाला) मिठी मारायला म्हणून मी उठले तर, तर तो क्षण एका क्षणात माझ्या हातून सुटून गेला, संपून गेला!! पु.ल.देशपांडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या एका ओळीसाठी सावरकरांना खरोखर साहित्यातील नोबेल पुरस्कार द्यायला हवा.

सावरकरांची अनेक रूपं मला आवडतात. विज्ञानाधिष्ठित सावरकर, शब्दप्रभू सावरकर, लढवय्ये सावरकर, कवी सावरकर, लेखक सावरकर, सामाजिक चळवळीचे प्रणेते सावरकर, ब्रिटिशांवर तुटून पडलेले सावरकर, धाडसी सावरकर, राष्ट्रासाठी आपल्या घराची राखरांगोळी केलेले सावरकर. एक मनुष्य त्याच्या सबंध आयुष्यात कदाचित परमेश्वरही घेण्यास धजावणार नाही इतकी जाज्वल्य रूपं घेऊ शकतो?? आणि ह्या प्रतिभावान आत्म्याला आपण करंटे भारतीय एका जातीत तोलून त्याला माफीवीर म्हणतो?? ह्याहून करंटा समाज कुठल्या तरी देशात असेल. सावरकरांच्या त्या जाज्वल्य आयुष्यातील धगधणाऱ्या अग्निकुंडातील एकतरी अग्निशिखा होण्याचे सौभाग्य मिळाले तरी एखाद्याचा जन्म सत्कारणी लागायचा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना शतशः नमन!!

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆  हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

काव्यानंद

☆तुकाराम गाथा – अभंग ☆

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

रसग्रहण 

मला जाणवलेला व उमगलेला अर्थ…….

मनाचा निर्धार आणि संपूर्ण श्रद्धा यांचा अर्थ प्रकट करणारा हा अभंग आहे.

आता हाच माझा नेम (निश्चय केला, व्रत घेतले  किंवा मी ठरवले ) आहे.गोविंदा जवळ आहे,तिथून माघारी फिरायचे नाही.

संसाराचा मोह धरायचा नाही.

त्या गोविंदाच्या घरात मोठ्या प्रयासाने ( जप,तप,नामस्मरण, सदाचारी वर्तणूक, भूतदया इ.मुळे) आले आहे.व माझ्या वर्तणुकी मुळे पट्टराणी झाले आहे. त्या सावळ्या परब्रह्माला मनापासून वरले आहे.आता तेथून माघारी फिरणे नाही.

त्या बलवान म्हणजे सर्वव्यापी,सर्वांना जीवदान देणारा,चिंता हरणारा व षडरिपूं पासून दूर नेणारा असा जो गोविंद आहे त्याचा सहवास लाभला आहे.म्हणून आता कोणतेही भय,चिंता राहिली नाही.

यात गोविंद हा शब्द अचूक वापरला आहे. गो म्हणजे गायी पण त्याचा अजून एक इंद्रिये असाही अर्थ आहे.गोविंद म्हणजे इंद्रियांचा व्यवहार जाणतो व त्याचे नियमन  ( इंद्रिय विषयी विचारांचे उन्नयन ) करतो.

“घररिघी झाले” या चरणात “बळे” म्हणजे बळजबरीने असा अर्थ नसून बळे म्हणजे जो सर्वशक्तिमान आहे त्याची पट्टराणी असा आहे.

या वर विचार केल्यावर असे लक्षात आले की ते जीव व आत्मा यांच्या संदर्भात बोलत आहेत.जो जीव आजवर द्वैताच्या भावनेने वेगळा रहात होता,तोच जीव आता आत्मस्वरूपाच्या आनंदाने सर्वशक्तिमान परब्रह्माशी एकरूप झाला आहे. व संपूर्ण स्वयंभू झाला आहे.

अशा सर्वसाक्षी सर्वव्यापी गोविंदा पासून दूर जायचे नाही. इतर कोणत्याच मोहपाशात परतायचे नाही.परत षडरिपूंच्या आहारी जायचे नाही.आता कोणतीच भय,चिंता राहीली नाही.असे तुकाराम महाराज म्हणतात.

हा अर्थ व्यक्ती परत्वे भिन्न असू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मला पावसात जाऊ दे… कै. वंदना विटणकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

 ☆ मला पावसात जाऊ दे… कै. वंदना विटणकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

काव्यानंद:

☆ मला पावसात जाऊ दे… कै. वंदना विटणकर ☆

     ए आई मला पावसात जाऊ दे

    एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे..

 

मेघ कसे बघ गडगड करिती

विजा नभातून मला खुणविती

 त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे..

 

 बदकांचा बघ थवा नाचतो

बेडूक दादा हाक मारतो

 पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे .

 

धारे खाली उभा राहुनी

 पायाने मी उडविन पाणी

ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे  

 

 ए आई मला पावसात जाऊ दे

 एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे…

रसग्रहण: 

हे बालगीत सुप्रसिद्ध कवियत्री कै. वंदना विटणकर यांचे आहे. वंदना विटणकर यांनी प्रेम गीते, भक्ती गीते, कोळी गीते, बालगीते लिहिली.  जवळजवळ ७०० गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या बालकथा, बालनाट्ये आणि बालगीते खूप गाजली आहेत.  त्यापैकीच  “ए ! आई मला पावसात जाऊ दे..” हे आठवणीतले बालगीत.

या बालगीतात ध्रुव पद आणि नंतर तीन तीन ओळीचे चरण आहेत.  प्रत्येक चरणात, पहिल्या दोन ओळीत यमक साधलेले आहे.  जसे की करिती— खुणाविती, नाचतो —मारतो, राहुनी— पाणी.  आणि प्रत्येक चरणातील शेवटच्या ओळीतील, शेवटचा शब्द ध्रुवपदातल्या दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी यमक साधते,.

मला चिंब चिंब होऊ दे— या ध्रुवपदातल्या  दुसऱ्या ओळीशी, खूप खूप नाचू दे, पाठलाग करू दे ,वाटेल ते होऊ दे, या प्रत्येक चरणातल्या शेवटच्या पंक्ती छान यमक जुळवतात. त्यामुळे या गीताला एक सहज लय आणि ठेका मिळतो.

हे संपूर्ण गीत वाचताना, ऐकताना आईपाशी हट्ट करणारा एक अवखळ लहान मुलगा दिसतो.  आणि त्याचा हट्ट डावलणारी त्याची  आई सुद्धा अदृष्यपणे  नजरेसमोर येते.  पावसात भिजायला उत्सुक झालेला हा मुलगा त्याच्या बाल शब्दात पावसाचे किती सुंदर वर्णन करतोय! मेघ गडगडत आहेत, विजा चमकत आहेत, आणि त्यांच्या संगे खेळण्यासाठी मला अंगणात बोलवत आहेत. या लहान मुलाला पावसात खेळण्याची जी उत्सुकता लागलेली आहे ती त्याच्या भावनांसकट या शब्दांतून अक्षरशः दृश्यमान झाली आहे.

साचलेल्या पाण्यात बदके पोहतात, बेडूक डराव डराव करतात ,त्या पाण्यामधून त्यांचा पाठलाग या बालकाला करायचा आहे.हा  त्याचा बाल्यानंद आहे.  आणि तो त्याने का उपभोगू  नये याचे काही कारणच नाही. या साऱ्या बालभावनांची आतुरता, उतावीळ वंदनाताईंच्या या सहज, साध्या शब्दातून निखळपणे सजीव झाली आहे.  स्वभावोक्ती अलंकाराचा या गीतात छान अनुभव येतो.

“पावसाच्या धारात मी उभा राहीन, पायांनी पाणी उडवेन, ताप, खोकला, शिंका, सर्दी काहीही होऊ दे पण आई मला पावसात जाऊ दे…”.हा बालहट्ट अगदी लडीवाळपणे या गीतातून समोर येतो.यातला खेळकरपणा,आई परवानगी देईल की नाही याची शंका,शंकेतून डोकावणारा रुसवा सारे काही आपण शब्दांमधून पाहतो.अनुभवतो.आठवणीतही हरवतो या गीतात सुंदर बालसुलभ भावरंग आहेत.

खरोखरच ही कविता, हे गीत वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आपले वयच विसरायला लावते.  आपण आपल्या बालपणात जातो.  या काव्यपटावरचा हा पाऊस, ढग, विजा,  बदके, बेडूक,  तो मुलगा सारे एक दृश्य रूप घेऊनच आपल्यासमोर अवतरतात.  एकअवखळ बाल्य घेउन येणारे,आनंददायी  रसातले हे रसाळ गीत आहे.

वंदना विटणकर यांचे शब्द आणि मीना खडीकर यांचा सूर यांनी बालसाहित्याला दिलेली ही अनमोल देणगीच आहे.  सदैव आठवणीत राहणारी सदाबहार.

 – कै. वंदना विटणकर

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझे मृत्यूपत्र…. – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?  काव्यानंद  ?

 ☆ माझे मृत्यूपत्र… – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(देशभक्त वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.)

माझे मृत्युपत्र या कवितेचे रसग्रहण.

सावरकरांना न ओळखणारा या पृथ्वीतलावर विरळाच. भारतमातेच्या मुकुटातील हा दैदिप्यमान हिराच.mयांचे अमरत्व म्हणजे यांचा जाज्वल्य देशाभिमान, देशभक्ती, उदात्त देशप्रेम होय. भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला तोडण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देवासमोर शपथ घेतली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत  मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.

असा हा तेजस्वी तारा भारतीय क्षितिजावर चमकत राहिला..

स्वातंत्र्य वीर सावरकर हे उत्तुंग प्रतिभेचे कवी होते.यांनी साहित्याच्या सर्व दालनात प्रवेश केला.यांचे साहित्य सर्व व्यापी आहे.

माझे मृत्युपत्र हे यांचे वहिनीस  लिहिलेले पत्रात्मक काव्य‌ आहे.

राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना इंग्रजांनी पकडले. त्यांना पन्नास वर्षांची काळया पाण्याची शिक्षा जाहीर केली. यातून आपली सुटका नाही.हे त्यांनी जाणले. हे‌ कटू सत्य वहिनीला कसे सांगायचे? घरची परिस्थिती मोठी प्रतिकूल होती.१९०९मध्ये त्यांच्या ‌मोठया भावाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचा चार वर्षांचा मुलगा देवाघरी गेलेला. अशा‌ परिस्थितीत ही मर्मभेदी गोष्ट कशी‌ सांगावी या विचारात ते असताना काव्य प्रतिभा हात जोडून उभी‌ राहिली.असा हा या कवितेचा जन्म.ही कविता देशभक्ती ने‌ ओथंबली आहे.आजपर्यत अनेक कवींनी देशभक्तीच्या कविता लिहिल्या.परंतु झाले ‌बहु, होतील बहु परी या सम नसे.

 ☆ माझे मृत्यूपत्र… ☆

हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले,

वकृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,

तुतेची अर्पियली नवी‌ कविता रसाला

लेखाप्रती विषय तुचिं अनन्य झाला.

त्वत्स्थंडिली ढकलिले प्रियमित्रसंघा

केले स्वयें दहन यौवन देह भोगा

तत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा

तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा

त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमता

दावानलात वहिनी नव पुत्रकांता

त्वत्स्थंडिली अतुल धैर्यनिष्ठ बंधू

केला हवि परम कारुण पुण्य सिंधू

त्वत्स्थंडिली वरी  प्रिय बाळ झाला

त्वत्स्थंडिली वरी आता मम देह ठेला

हे काय बंधू असतो जरी सात आम्ही

त्वत्स्थंडिली च असते,दिधले बळी मी

की घेतले  न व्रत हे आम्ही अंधतेने

लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने

जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे

बुद्धयाची वाण धरिले सतीचे.

माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी

हा वत्सवत्सल तुझ्या पदी  शीर्ष ठेवी

सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हाते

आलिंगन प्रियकरा मम अंगनेते

प्रस्तुत कविता सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्ती चे प्रतीक आहे. सावरकरांची त्यागी भावना दर्शविणाऱ्या या ओळी बघु या.      

हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले

या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्नि कुंडात

माझा परिवार, मित्र, यौवन सारे भोग

यांची आहुती दिली आहे.

या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या काव्यातील शब्दसंपदा संस्कृत प्रचुर आहे.या काव्यात वीर रसाला करूण रसाची झालर लावली आहे.

भगवान् श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेचे प्रबोधन केले व त्यात ज्ञान,कर्म, भक्ती या योगांची माहिती दिली.सावरकर हे बुद्धिमत्तेचे पुतळे होते.त्यांनी ज्ञान,कर्म,भक्ती मार्गाचा अवलंब केला. ही कविता राष्ट्रीय भावनेची व देशभक्ती ने ओतप्रोत भरलेली आहे. कविता आशय संपन्न आहे.

आम्ही हे मातृभूमीची सेवा आंधळेपणाने घेतली नसून डोळे उघडे ठेवून घेतली आहे. कवि म्हणतो की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ठिकठिकाणी सावरकरांचे मातृभूमी विषयीचे प्रेम कळसास पोहचले आहे. सावरकरांचा निस्वार्थी भाव या ओळीत दिसून येतो 

हे आपले कुलही त्यामध्ये ईश्र्वरांश

निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश

सावरकरांना पुढील चित्र दिसत असून ते त्यांनी सुंदर विरोधाभास अंलकाराने रेखाटले आहे.

हिंदुस्थान हा आमचा देश आहे. आमच्या देशात आमचेच राज्य हवे या तत्वनिष्ठ स्वभामुळे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.

त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे.

अंदमानच्या काळ्याभोर कोठडीत खिळ्यांचया साह्याने भिंतीवर लिहिलेली कविता आहे.या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिभेला आमचा खरोखरी सलाम.

सौ.विद्या पराडकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆  सुश्री शोभना आगाशे

☆ पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆

निर्गुणाचे डहाळी।

पाळणा लाविला।

तेथे सुत पहुडला।

मुक्ताईचा॥

निज निज बाळा।

न करी पै आळी।

अनुहात टाळी।

वाजविते॥

तेथे निद्रा ना जागृती।

भोगी पै उन्मनी।

लक्ष तो भेदूनी।

निजवतो॥

निभ्रांत पाळी।

पाळणा विणुनि।

मन हे बांधुनि।

पवन दोरा॥

एकवीस सहस्र।

सहाशे वेळा बाळा।

तोही डोळा।

स्थिर करी॥

बालक चुकले।

सुकुमार तान्हुले।

त्याने पै सांडले।

मायाजाळ॥

जो जो जो जो।

पुत्राते निजवी।

अनुहाते वाव।

निःशब्दांची॥

अविनाश पाळणा।

अव्यक्तेने विणला।

तेथे पहुडला।

योगिराज॥

निद्रा ना जागृती।

निजसी काई।

परियेसी चांगया।

बोले मुक्ताबाई॥

– संत मुक्ताबाई 

☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

रसग्रहण/अर्थ

चवदा वर्षांच्या मुक्ताबाईंच शिष्यत्व १४०० वर्षांच्या चांगदेवांनी, श्री ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून पत्करलं. त्यानंतर गुरूमाऊलीच्या भूमिकेतून मुक्ताबाईंनी चांगदेवांना उद्देशून हा उपदेशपर पाळणा रचला.

मुक्ताबाई म्हणतात,

निर्गुणाच्या फांदीवर तुझा पाळणा मी बांधला आहे जेणेकरून निर्गुण भक्तीच्या मार्गाने परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याचं ज्ञान तुला मी देईन. आता तू हट्ट न करता झोप त्यासाठी मी अनाहत टाळी वाजवते आहे. आहत म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींच्या (वस्तु, विचार, भाव, अहंकार, इच्छा इ.) एकमेकांवरील आघातामुळे निर्माण होणारा नाद म्हणजेच द्वैत तर अनाहत जो आहत नाही तो म्हणजे अद्वैत. ॐ कार नाद हा अनाहत नाद आहे. हा अनाहत नाद तू मनाच्या उन्मनी अवस्थेतच ऐकू शकशील. सामान्यपणे मनाच्या चार अवस्था असतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा व  तुर्या म्हणजे आत्मशोध किंवा स्वतःची स्वतःला ओळख पटणे, ब्रम्ह व माया दोन्हींचे पूर्ण ज्ञान होणे. पण या अवस्थेत द्वैत असते. यापुढची अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. या अवस्थेत मन तदाकार होते. विश्वातील दिव्यत्व व आत्म्यातील दिव्यत्व यांच्या एकरूपतेची जाणीव होते. अद्वैताचा अनुभव येतो. म्हणून मुक्ताबाई आपल्या शिष्याला सांगत आहेत की तू या उन्मनी अवस्थेचा अनुभव घे. निभ्रांतीच्या म्हणजे निर्मोहाच्या दोरीने तुझा पाळणा विणला आहे. त्याला झोका देण्यासाठी मनाची दोरी बांधली आहे. म्हणजे तुझं मन या निर्मोही अवस्थेचा आनंद घेऊ दे.

सामान्यपणे आपण १०८०० वेळा दिवसा व १०८०० वेळा रात्री श्वास घेतो. मुक्ताबाई सांगतात, सामान्य माणसांप्रमाणे तू एकवीस सहस्र सहाशे वेळा श्वास न घेता, तू तो स्थिर कर म्हणजेच त्यावर ताबा मिळवून त्याची गती कमी कर. (ही गती १०८ पर्यंत खाली आणली तर  परमेश्वर प्राप्ती होते असे म्हणतात.) 

माझं बाळ लहान आहे ते वाट चुकलं होतं.(चांगदेव हे सर्व शास्त्रात पारंगत होते. त्यांना योगीराज म्हटलं जायचं. परंतु त्यांचे ज्ञान सत्संग विरहित होते कारण त्यांना अहंकाराची बाधा झाली होती.) पण आता त्याने माया मोह यांचा त्याग केला आहे. म्हणून अशा आपल्या पुत्राला मुक्ताबाई निःशब्दपणे अनाहत नाद ऐकवून झोपवत आहेत.

हा योगीराज चांगदेव बाळ, गुरूंनी विणलेल्या ज्ञानाच्या अविनाशी पाळण्यामध्ये पहुडला आहे आणि उन्मनी अवस्थेमध्ये आपल्या गुरूंनी सांगितलेल्या योगमार्गातील उपदेशपर गोष्टी ऐकत आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली

मो. 9850228658

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? काव्यानंद ?

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆

राजास जी महाली

   सौख्ये कधी मिळाली

   ती सर्व प्राप्त झाली

   या झोपडीत माझ्या….

 

भूमीवरी पडावे

ताऱ्यांकडे पहावे

प्रभूनाम नित्य गावे

या झोपडीत माझ्या..

 

पहारे आणि तिजोऱ्या

त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या

या झोपडीत माझ्या

 

  जाता तया महाला

    ‘मज्जाव’शब्द आला

    भीती न यावयाला

     या झोपडीत माझ्या.

 

   महाली मऊ बिछाने

   कंदील श्यामदाने

    आम्हा जमीन माने

     या झोपडीत माझ्या..

 

   येता तरी सुखे या

    जाता तरी सुखे जा

    कोणावरी ना बोजा

     या झोपडीत माझ्या

 

  पाहून सौख्य माझे

       देवेन्द्र तो ही लाजे

        शांती सदा विराजे

         या झोपडीत माझ्या..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

 – कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार

झोपडी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती झोपडपट्टी,झोपड्यांची गळकी वस्ती,दुःख, दैन्य,दारिद्र्य,बकाल वस्ती आणि तिथली व्यसनाधीनता,अस्वच्छता,

गुन्हेगारी.थोडक्यात जिवंतपणी नरक.

मोठमोठ्या शहरात अशाच प्रकारचे चित्र असते.आणि बऱ्याचदा झोपड्या हटत नाहीत त्याला झोपडपट्टीचे एक राजकारण असते.बऱ्याचदा बेरकी माणसांच्या  परिस्थितीची ती एक ढाल असते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी  त्यांच्या एका कवितेत वर्णन केलेली झोपडी मात्र खूपच आगळी वेगळी आहे.प्राप्त परिस्थितीत सुखी राहण्याचा जणू आनंदी मंत्र!

  राजास जी महाली

   सौख्ये कधी मिळाली

   ती सर्व प्राप्त झाली

   या झोपडीत माझ्या….

राजाचा महालसुद्धा माझ्या झोपडीपुढं फिका आहे कारण त्याला इतका खर्च करून बांधलेल्या महालात जी सुख समृद्धी लाभल्या ती माझ्या चंद्रमौळी झोपडीमध्ये काहीच खर्च न करता अनुभवतो आहे.कोणती सौख्ये कवी अनुभवत आहे?

भूमीवरी पडावे

ताऱ्यांकडे पहावे

प्रभूनाम नित्य गावे

या झोपडीत माझ्या..

साधी गोष्ट आहे!तुम्ही सहजच माझ्या झोपडीतल्या जमिनिवर झोपलात तर आकाशात नजर जाईल आणि असंख्य लुकलुकत्या चांदण्या तुमचं मन वेधून घेतील.ते चांदण्याचे आभाळ दिलासा देत असतानाच मुखात मात्र प्रभूचे नाव नित्य असते  कारण त्याचीच तर सर्व कृपा आहे.हे चांदण्यांचे आकाश,ही हवा, हा स्वच्छ सूर्यप्रकाश त्याचीच तर रूपे आहेत!त्याच्याच कृपेने आपण हे सारे अनुभवतो आणि श्वासदेखील घेतो.या माझ्या झोपडीत फक्त इतकेच करायचेआहे.

महालात हे काहीच तुम्हाला अनुभवता येणार नाही.

पहारे आणि तिजोऱ्या

त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या

या झोपडीत माझ्या

महालात रात्रंदिवस पहारेकरी दाराशी असतात, गस्त घालतात.संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मोठमोठ्या अवजड तिजोऱ्या असतात तरीही तिथं चोरी होतेच पण झोपडीत माझ्या ही भीती मुळीच नाही.माझ्या झोपडीला दरवाजा नाही,पहारेकरी नाहीत की लुटारूनी चोरून नेण्यासाठी ऐहिक संपत्तीदेखील ;त्यामुळं चोरी होऊच शकत नाही. अष्टौप्रहर माझी झोपडी कुणालाही सामावून घेण्यास सज्ज असते.असे असूनही चोर मात्र कधीच चोरी करत नाहीत.(कारण ऐहिक असते त्यालाच लोक मौल्यवान म्हणतात आणि आत्मिक अदृश्य चिरंतन असते त्याला मात्र सोडून देतात)

      जाता तया महाला

    ‘मज्जाव’शब्द आला

    भीती न यावयाला

     या झोपडीत माझ्या..

महालात तुम्ही सहज जावयाचे म्हणले तर पहारेकरी लगेच अडवतात,आत जायला मज्जाव अर्थात बंदी असते पण इकडं माझ्या झोपडीच्या शब्दकोशात मज्जाव हा शब्दच नाही.ती कुणालाही सहजच आत सामावून घेते.कुठलाही पहारेकरी तुम्हाला दरडावणार नाही की भीतीही घालणार नाही.सहजच कुणीही यावे न माझ्या झोपडीत विसावावे.

       महाली मऊ बिछाने

   कंदील श्यामदाने

    आम्हा जमीन माने

     या झोपडीत माझ्या..

महालात सर्वांना झोपायला मऊ मऊ बिछाने असतात.परांच्या गाद्या,मऊ उश्या डोक्याखाली, पांघरायला ऊबदार पांघरुण असतात.वर छताला छान छान ,आकर्षक झुंबरे,प्रकाशासाठी कंदील- शामदाने लटकवलेली असतात.छान,शांत झोपेसाठी सर्वप्रकारच्या सोयी सुविधा केलेल्या असतात पण तरीही सुखाच्या झोपेची शाश्वती नसते; मात्र आमच्या झोपडीत जमीन अंथरायला, आभाळ पांघरायला असते,जमिनीला पाठ लागताच शांत सुखाची झोप लागते.

      येता तरी सुखे या

    जाता तरी सुखे जा

    कोणावरी ना बोजा

     या झोपडीत माझ्या..

महालात जाताना सर्वसामान्य माणसाला एक अनामिक भीती,दडपण असते.तिथल्या भव्य -दिव्यपणाने उर दडपतो; पण झोपडीत तुम्हाला असे काही वाटणार नाही.माझ्या या झोपडीत प्रत्येकाने कधीही केंव्हाही आनंदाने यावे-जावे,इथं कुठलंच भय नाही की अवघडलेपण वाटणार नाही.

      पाहून सौख्य माझे

       देवेन्द्र तो ही लाजे

        शांती सदा विराजे

         या झोपडीत माझ्या..

असं हे झोपडीतलं वैभव आणि सौख्य पाहून प्रत्यक्षात इंद्राला सुद्धा लाज वाटते,इंद्रसुद्धा माझ्या झोपडीचा आणि तेथील सौख्याचा हेवा करतो,यापेक्षा झोपडीतली महानता मी काय वर्णावी?माझ्या या झोपडीत नेहमीच शांतता वसते.आणि जिथे शांती तिथेच सौख्य आणि समाधानही.

अगदी साध्या सोप्या शब्दात तुकडोजी आपल्या झोपडीचे वर्णन करतात.माणसाचे चित्त समाधानी असेल तर त्याला कोणत्याही भौतिक ऐश्वर्याची गरज नसते हेच यातून सूचित होते.माणूस भौतिक सुखांच्या मागे लागतो आणि चिरंतन,शाश्वत मनाची शांती हरवून बसतो.कितीही सुख मिळाले तरी त्याचे मन भरत नाही आणि हाव सुटत राहते.यातच त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवते आणि सुखाची निद्रा देखील.

एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावरील खोपसुद्धा अशीच असते ना?खोपीत सुद्धा हेच सुख असते.

काय नसते या झोपडीत?

समोरील शेत शिवार,नाना पाखरांचे नाना आवाज,भिरभिरता मोकळा वारा,काम करून भूक लागल्यावर खाल्लेली अमृताहून रुचकर खर्डा भाकरी महालातील पंच पक्वान्नाला मागे सारते.

सुखाचे परिमाण आपल्या मनातच असते.म्हणूनच महालात सर्व सुखे असून तिथली माणसे सुखी असतीलच असे नाही आणि झोपडीत काही नाही म्हणून तिथली माणसे दुःखी असतीलच असेही नाही.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print