मराठी साहित्य – विविधा ☆ सारेच झपाटलेले… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? विविधा ?

☆ सारेच झपाटलेले… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

(स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान जे आजच्या पिढीला माहित नाही)

सारेच झपाटलेले…

मंडळी, आमच्या वाड्यात ज्या घरात मोराण्याच्या कमलताई भाड्याने रहात होत्या व बालवाडीचे काम करत होत्या तेव्हा त्यांचा मुलगा शाम अवघ्या सहा/सात महिन्यांचा नुकताच बसायला लागला होता व सहा महिन्याच्या पोराला घेऊन त्या एकट्या आमच्या आश्रयाने बालवाडीचे काम करत होत्या. (नाही तर आम्ही बघा! )तेव्हा ही राष्ट्रसेवादलाची(नाव ही राष्ट्र सेवा दल वाह वा! ) ही सारीच माणसे देशसेवेने झपाटलेली होती व त्यांनी नाना प्रकारे आपल्याला कामात झोकून दिले होते. कमल ताईंचे यजमान दशरथ तात्या अधून मधून कापडण्याला ताईंना व अप्पांना म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला येत असत. मोठ्या उमद्या मनाचे व मोकळ्या स्वभावाचे गृहस्थ होते ते! मला वाटते त्यांनीही राष्ट्रसेवादलाला वाहून घेतले होते. म्हणजे पहा देशातल्या प्रत्येकच माणसाच्या मनात देशासाठी काही ना काही करण्याची प्रबळ इच्छा होती, देश स्वतंत्र होण्याच्या कामी माझी काय व कोणत्या प्रकारे मदत होऊ शकते याचा प्रत्येक भारतीय मनातून विचार करत होता व जमेल त्या मार्गाने देशसेवेत सामिल होत होता. (आज कमल ताई व तात्याही नाहीत पण माझ्या नजरेत मी लहानपणी पाहिलेले आज ही तसेच्या तसे आहेत.)कारण ह्या सर्व मंडळींचे झपाटलेपण माझ्या बालमनावर कायमचे ठसले आहे. हे फक्त एक उदा. मी तुम्हाला दिले पण त्यावेळी हे झपाटलेपण प्रत्येकच देशभक्तांत होते असे मी पाहिलेले आहे. क्रांतीपासून ते देश स्वतंत्र झाल्यानंतरही ही देश प्रेमाची लाट कित्येक वर्षे टिकून होती व विष्णुभाऊंसारखे कार्यकर्ते कित्येक वर्षे नव्हे आयुष्याच्या अखेरी पर्यंत देशासाठी प्राण पणाला लावून काम करत होते नि माझ्या वयाच्या पिढीवर हेच चांगले संस्कार होत होते. (आज हे देशप्रेम लयाला जाऊन त्याची जागा स्वार्थ व देशद्रोहाने घेतली की काय? असे म्हणण्या इतपत परिस्थिती भयावह झाली आहे की काय या विचारानेही आमच्या सारख्यांना प्रचंड भीती वाटून एवढ्या कष्टाने मिळवलेल्या व त्यागाने भारलेल्या स्वातंत्र्याच्या गळ्याला नख तर लागणार नाही ना? या विचारानेही अस्वस्थ व्हायला होते.)

बेचाळीसच्या चळवळीच्या आधी पासूनच ३०/३५ साला पासून ही सर्व देशभक्त मंडळी देशासाठी अक्षरश: झपाटून तहानभूक विसरून काम करत होती. माझे वडिल व त्यांचे सहकारी तर घरदार वाऱ्यावर सोडून देशासाठी काम करत होते. बाळूभाई मेहतां सारखी मंडळी पाठीशी होती व त्यांचा माझ्या वडिलांवर प्रचंड विश्वास होता. त्या मुळे भूमिगत राहून विष्णुभाऊ रात्री बेरात्री पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी सायकलवरून कित्येक मैलांची पायपिट करत कार्यकर्त्यांशी संपर्क साधूनच त्यांना कामे नेमून देत व पैसाही पाठवत असत. समाजातील दानशूर मंडळी गुपचूप ह्या क्रांतिकार्याला पैसे पाठवत असत. कारण इतक्या लोकांचे जेवणखाणं व दारूगोळा पिस्तुले या साठी ही पैसा लागत असे. तो वरच्या नेत्यांकडून किंवा समाजातूनच येत असे. ब्रिटिश सरकारला सहकार्य न करता त्यांच्या पुढे अडचणी निर्माण करून त्रास देऊन त्यांना जेरीस आणायचे की जेणे करून ते देश सोडतील. पण ते काही कच्या गुरूचे चेले नव्हते. अतिशय धूर्त, पोहोचलेले व संयमी लोक होते ते! ते एवढ्या सहजा सहजी थोडीच जाणार होते!

खादी भांडाराचे ही काम चालू होतेच. त्या साठी विष्णुभाऊंना महाराष्ट्रभर फिरावे लागे. सुतकताईचे धडे देऊन विद्यार्थी तयार करावे लागत. त्या मुळे चांद्या पासून बांद्यापर्यंत कुठे ही बदली होई व मुलांना आजोळी ठेवून माझ्या आईला सोबत घेऊन भाऊंची भ्रमंती चालू असे. आई सुद्धा खादीच्याच साड्या नेसून प्रेमाताई कंटकांसारख्या महिला नेत्यांसोबत जमेल तसा क्रांतिकार्यात भाग घेत असे. वर्ध्याला दोन वर्षे गांधी आश्रमात रोज प्रार्थनेला हजेरी व हरिजन वस्तीत राहून हरिजन बांधवांची सेवा, त्यांच्या समवेत जेवणखाण करून अस्पृश्यता निर्मूलनाचेही काम वेगात चालू होते. संडास धुण्यापासून सारी कामे आईवडील करत असत. देशा साठी काहीही.. अशी त्यांची भावना असे.

खानदेशातील विरदेल दलवाडे चिलाणे नवलनगर मुक्टी कापडणे अशा पंचक्रोशितील अनेक गावांत भाऊंनी सुतकताई व चरख्याचे, पेळू कसे तयार करायचे इथ पासून धडे देत शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते तयार केले. मग त्यांची ठिकठिकाणी सुतकताई केंद्रावर नेमणूक होत असे व ते स्वतंत्रपणे ते केंद्र चालवत व त्याचा अहवाल सादर करत असत. स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही धुळे व कापडणे सहित भाऊंचे हे खादी भांडाराचे काम चालूच होते. कापडण्याला तर महिला मोठ्या प्रमाणावर हे कताईचे काम करत असत. नंतर भांऊंनी अंबर चरखे ही मागवले होते. केंद्रात स्वतंत्रपणे माणूस नेमलेला असे तो हे काम बघत असे. मी खूप वेळा चिल्लर मोजायला अप्पांबरोबर बोरसे गल्लीच्या शेवटच्या घरात जात असे व रूपयाच्या नाण्यांच्या गड्ड्या करून अप्पांना देत असे, मग ते रूपये मोजून हिशोब लिहीत असत.

३० रूपये पगाराचे मिळत त्यातील १५ रूपये घरी पाठवून भाऊ १५ रूपयांत कार्यकर्त्यांसह संसार चालवित असत. त्यातून बदल्या व संसार जोडीला होताच. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आमचे पूर्ण कुटुंबच क्रांतिकार्यात सामिल होते. माझे आजोबा काका व मुक्टीची आत्या व मामा सारेच तुरूंगात जाऊन आले होते. याला म्हणतात देशभक्ती! कापडणे गावच मुळी स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते एवढे देशभक्त कापडण्यात होते. कापडण्याचे लोक क्रांतिकारकांची माहिती देत नाहीत, त्यांना छुपी मदत करतात म्हणून चिडून ब्रिटिश सरकारने कापडणे गावालाच सामुहिक दंड ठोठावल्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. अशी कापडणे गावाची महती आहे. कापडणे गावातील शेकडो लोकांनी या ना त्या प्रकारे ब्रिटिशांना जेरीस आणले होतेच पण फैजपूर कॅांग्रेसचे अधिवेशन भरले तेव्हा कापडण्यातील महिलांनी रातोरात ३/४ क्विंटल गहू जात्यावर दळून अधिवेशनासाठी पिठाचा पुरवठा केला होता व एकप्रकारे क्रांतिकार्याला हातभारच लावला होता. असे आहे कापडणे गाव! का बरे अभिमान वाटणार नाही त्याचा?

भूमिगत असतांना विष्णुभाऊ व त्यांचे सैनिक आताच्या नाशिकच्या थत्तेवाडीत लपून छपून कार्य करत होते. पोलिसांना सुगावा लागताच रातोरात पळायचे व दुसरे गाव गाठायचे असा खो खो सतत चालू असे. देशभर पळापळ चालत असे. माझी आई उत्तरप्रदेशची भाषा फार छान बोलत असे. म्हणायची कसला संसार बाई? कागदावर जेवायचो, रात्रीतून कधी कधी तीन घरे बदलावी लागत असत. पोलिस मागावरच असत कारण त्यांचे खबरे पेरलेले असत ते त्यांना सतत माहिती पुरवायचे. थत्तेवाडीतून मग माझ्या मामाच्या गावाला हिरापूरला

मामाच्या शेतात ही मंडळी बरेच दिवस भूमीगत होती. मामा चोरून लपत छपत त्यांना भाकऱ्या पोहोचवत असत. माझ्या आईची आत्या गंगू आत्या मुलांचा सांभाळ करत असे, एकप्रकारे त्याही घरात बसून क्रांतिकार्यालाच मदत करत नव्हत्या का? नक्कीच करत होत्या. हे क्रांतिकारक सतत ब्रिटिशांना जेरीस आणत असत. टेलिफोनच्या तारा तोडणे, जेणे करून ब्रिटिशांची दळणवळण यंत्रणा बंद पडेल, सरकारी कार्यालये लुटणे, जाळणे, तलाठी ॲाफिस जाळणे, ठिकठिकाणी आगी लावणे जेणे करून सरकारी कागदपत्रे जळून खाक होतील अशी अत्यंत जोखमीची कामे हे देशभक्त जीवावर उदार होऊन करत असत. त्यात ते ही जखमी होत असत, पण सापडून जाऊ म्हणून दवाखान्यात जायची सोय नसे असे मोठे जिकिरीचे जीवन या देशभक्तांनी देशासाठी पत्करले होते हे पाहून आज ही अभिमानाने ऊर भरून येतो. आज वाटते लक्षावधी लोकांनी एवढ्या कष्टाने देश स्वतंत्र केला आहे तो जपून ठेऊन तो प्रगती पथावर नेण्यासाठी कष्टाची व देशभक्तिची आस आम्हाला का नसावी? की आयते मिळालेल्या या स्वातंत्र्याची आम्हाला किंमतच नाही?

जणू काही हा देश आमचा नाही असेच अत्यंत अशोभनिय असेच आमचे वर्तन असते.

आपला देश सुंदर व संपन्न व्हावा म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो? झाडे लावतो? पाणी जपून वापरतो? पेट्रोल कमी वापरतो? ध्वनी प्रदूषण कमी व्हावे या साठी प्रयत्न करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नकारार्थी आहेत ही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे? ही माती हा देश आम्हाला आमचा वाटत नाही काय? मग देशाकडून काही मागण्याचा तरी आम्हाला काय अधिकार आहे? तर मंडळी देश सेवा अशा प्रकारेही करता येते, सध्या आपण अशा प्रकारे ही देशसेवा करू शकतो. आपल्या देशाला साधन संपत्तीची गरज आहे, ती कशी वाढवता येईल हे आपण बघू या..

बरंय् मंडळी.. धन्यवाद..

जय हिंद.. जय महाराष्ट्र…

आपलीच..

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

 

© प्रा. सौ. सुमती पवार 

नाशिक – ९७६३६०५६४२, email: svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संवेदनशीलता… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

🌸 विविधा 🌸

☆ संवेदनशीलता… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

मे महिन्याची सुट्टी संपत आली होती. नवीन वर्षाची शाळा आता सुरू होणार होती. काही मुले शाळेत जाण्यासाठी आनंदली होती, तर काही मुले आता खेळायला, उनाडक्या करायला मिळणार नाही म्हणून हिरमुसली झाली होती. तरीसुद्धा नवीन वर्ष, नवा वर्ग, नवे सोबती मिळणार म्हणून प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता होती.

अजय एका गावातील शाळेत शिकत होता. गावातील शाळा चौथीपर्यंतच असल्यामुळे त्याला आता शहरातील शाळेमध्ये जावे लागणार होते. तो सुद्धा शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होता. नवीन शाळेतील वातावरण कसे असेल, मित्र कसे वागतील, नवीन गुरुजी व बाई आपल्याशी कशाप्रकारे जुळवून घेतील, याविषयी त्याच्या मनात अनेक विचार येत होते. गावात राहिल्यामुळे त्याच्या वागण्यात, बोलण्यात व राहणीमानातही थोडासा गावंढळपणा होता. तरीसुद्धा त्याच्याकडे खेळाचे व चित्रकलेचे उत्तम कौशल्य होते. गावातील शाळेच्या गुरुजींचा तो लाडका विद्यार्थी होता. अनेक चित्रकला स्पर्धेमध्ये व खेळण्याच्या स्पर्धेत त्याने बक्षीसे मिळवली होती. त्याच्याकडील कौशल्ये शहरातील शाळेतही अशीच विकसित व्हावीत असे त्याच्या गुरुजींना मनोमन वाटत होते.

जून महिना उजाडला. अजयच्या वडिलांनी शहरातील आदर्श विद्यालयात अजयला प्रवेश घेतला. या शाळेतील अनेक मुले शहरी संस्कृतीमध्ये वाढलेली होती. अजयला ही मुले चिडवू लागली. त्याला भाषेवरून, राहणीमानावरून हसू लागली. मात्र अजयने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तो नियमितपणे शाळेत जायचा. मन लावून अभ्यास करायचा. शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होवू लागला. अल्पावधीतच तो या शाळेतीलही गुरुजींचा आवडता विद्यार्थी बनला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अजयच्या वर्गातील तसेच शाळेतील बऱ्याच मुलांनी यात सहभाग घेतला होता. स्पर्धेदिवशी अजयने मन लावून चित्र काढले. आकर्षक रंगसंगतीने चित्र सुबक बनविले. इतर मुलांना त्याच्याइतके सुंदर चित्र काढायला जमले नव्हते. नेहमी त्याला हसणारी चिडविणारी मुले आज मात्र कौतुकाने त्याचे चित्र न्याहाळत होती. स्पर्धा संपल्यावर गुरुजींनी सर्वांची चित्रे गोळा केली. काही वेळाने स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. अर्थातच अजयचा शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला होता. अजयला खूप आनंद झाला. त्याचबरोबर अजयमुळे आपल्या वर्गालासुद्धा बक्षीस मिळाल्याचा आनंद इतर मुलांना झाला. सर्व मित्रांनी अजयचे कौतुक केले. “आजपासून आम्ही तुला चिडवणार नाही, तुझ्याबरोबर पक्की मैत्री करणार, ” असे प्रत्येकाने अजयला सांगितले. अजयने नम्रपणाने सर्वांचे कौतुक स्विकारले.

वर्गशिक्षक वर्गात आले. वर्गातील मुलांमध्ये झालेला बदल व मुलांना झालेला आनंद पाहून त्यांनाही समाधान वाटले. ते म्हणाले, “पाहिलेत विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाजवळ काही ना काही कौशल्य हे असतेच. कोण अभ्यासात हुशार असतो; तर कोणाजवळ इतर कौशल्ये असतात. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करायला शिकले पाहिजे. एकमेकांविषयी संवेदनशील असले पाहिजे.”

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोपाळ काला / काल्याचे कीर्तन… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ गोपाळ काला / काल्याचे कीर्तन… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

बारसे हा आपल्या संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. बाळाचा जन्म झाला, त्याचा पाळणा झाला, नाव ठेवलं. श्रीकृष्ण! बाळ हळूहळू मोठं झालं आणि कृष्णाच्या खोड्या वाढल्या. त्याच्या बाललीला वाढल्या. पुढे तो कांबळीवाला झाला आणि काठी घेऊन गोधन चारायला जाऊ लागला. त्याचे अनेक सोबती होते. गरीब – श्रीमंत! सगळेच त्या ठिकाणी सारखे होते. सर्वांची शिदोरी एकत्र करून ते एकत्र खात तोच हा गोपालकाला.

पुढे हा गोपालकाला वारकरी संप्रदायात प्रमुख ठरला. कीर्तन करून हा गोपालकाला केला जाई. काल्याचे किर्तन म्हणजे कृष्णाच्या बाललीला! गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाशी संबंधित असलेले कीर्तन कृष्णाच्या विविध कथा भक्ती आणि तत्वज्ञानावर आधारीत – असे हे किर्तन असते. काला हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळांबरोबर जो काला केला, अगदी तसाच्या तसा काला वारकरी संप्रदायात केला जातो. जीवा – शिवाचे ऐक्य सांगणारे काल्याचे किर्तन म्हणजे प्रसन्नतेचे कीर्तन. काला हे त्याग, समर्पण, विश्वास, असे परिपूर्णतेचे कीर्तन आहे. सामान्य माणसाला प्रसाद हा काल्याच्या कीर्तनातून मिळत असतो. वाळवंटात केलेला काला, भगवान कृष्णाच्या चारित्र्याचा विचार म्हणजेच काला.

काल्याचे वांङ्मयात तीन प्रकार आहेत. दहिभात अभेद आणि काला! असे हे तीन प्रकार असून काल्याच्या कीर्तनात तीन प्रकारचे अभंग घेतले जातात. बाळक्रीडा, गवळण आणि काला. दुसऱ्यांना खाऊ घालण्याची भारतीयांची संस्कृती यात आहे. भगवान कृष्णाच्या अवतारात परिपूर्णता आहे. कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे काळ, कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा असेही कृष्ण शब्दाचे तीन अर्थ होतात.

वैकुंठामधे सर्व काही आहे. परंतु काला नाही, म्हणून तो अवीट असणारा काला खाण्याकरता आम्ही पुन्हा वैकुंठातून मृत्यूलोकात परत येऊ, असं प्रत्यक्ष देव म्हणतात. वाळवंटाचे तीन गुण आहेत. बरे, नीट आणि उत्तम. काल्यात भारतीय संस्कृती बघायला मिळते. स्वतः जेवणे ही प्रकृती, दुसऱ्यांचे हिसकावून घेणे ही विकृती ‘ आणि दुसऱ्यांना जेवू घालणे ही संस्कृती. काल्याचा विषय हा – श्रीकृष्णाचे चरित्र, काल्याचे ठिकाण – वाळवंट, काल्याचा देव – श्रीकृष्ण, काल्याचे भक्त – गोपाळ! देव भक्तीचे आवीट सुख. श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटात जो काला केला, तो काला देऊन सर्व गोपाल यांना तृप्त केले.

गोपालकाला – ज्याला दहीहंडी असे म्हणतात, हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्रात विशेषत्वाने हा साजरा होतो. तिथे लोक मानवी मनोरा तयार करून दही आणि लोणी असलेले माठ फोडतात.

कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादाला सुद्धा गोपालकाला असं म्हणतात. या व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे किर्तन होते, तेव्हा तेव्हा कीर्तनानंदात गोपाल काला होतो. म्हणून याला गोपालकाल्याचे कीर्तन असे म्हणतात. ज्ञानेश्वरी किंवा दासबोधाचे पारायण किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथ वाचनानंतर, एक्का, एकादशीचे पारणे, कीर्तन महोत्सव, अशावेळी शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपालकाला करूनच होते.

गोपाल म्हणजे गाईचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे किंवा आंब्याचे लोणचे, दही – ताक, चण्याची डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिळून काला तयार केला जातो. हा कृष्णाला फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण आणि सर्व सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा काला तयार करीत असत आणि सर्वजण वाटून स्वतः भगवान खात असे मानले जाते.

गोपालकाला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात, निर्गुण चैतन्याची संबंध दर्शविणारा व पूर्णावतारी कृष्ण कार्याचे दर्शक असलेला समुच्चय! काला हा शब्द एकसंध व सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे. श्रीकृष्णाच्या वेदांगी पूर्णकारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो. पोहे दही दूध ताक लोणी हे प्रमुख पाच घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत. पोहे – वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक. म्हणजेच श्रीकृष्णाला धरून ठेवणारे त्याचे सवंगडी! दही – वात्सल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक आहे. दूध – गोपींच्या सहज, सगुण, मधुरा भक्तीचे प्रतीक तर ताक – गोपींच्या विरोध भक्तीचे प्रतीक आहे. लोणी – सर्वांच्या श्रीकृष्णावरील अव्दैत प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी ब्रम्हांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

शरीर व मन यांना पोषक असे या दिवशी वायुमंडल आपतत्वाने भारित असल्याने, देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने, मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढविणारे असते. सर्व सृष्टी आनंदी असते.

कीर्तनामधे मधोमध एक छोटीशी दहीहंडी टांगली जाते. त्याला एक मातीचे गाडगे बांधले जाते. त्यात थोड्याशा लाह्या आणि दही असतं. कुठले तरी वारकरी आपल्या टाळानेच ते गाडगे फोडतात आणि “गोपालकाला गोड झाला – दैवी होता त्याला मिळाला ” हा गजर करतात आणि त्यानंतर गोपालकाल्याचं भजन होतं एक भजन आपण बघूया.

चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी

मांडीयेल्या काल्या भवती गोपाळांची दाटी ॥

*

आनंदे कवळ देती एका मुखी एक

न म्हणती सानथोर अवघे सकळीक ॥

*

हमामा हुंबरी पोवा वाजविती मोहरी

घेतलासे फेरा माजी घालुनिया हरी ॥

*

लुब्धल्या नरनारी अवघ्या पशुजाती

विसरल्या देहभान शंका नाही चित्ती ॥

*

पुष्पांचा वर्षाव झाला आरतीयांची दाटी

तुळशी गुंफोनिया माळा घाली कंठी ॥

*

यादवांच्या गोपी मनोहर कान्हा

तुका म्हणे सुख वाटे मोहुनिया मना ॥

*

तर असे हे गोपालकाल्याचे कीर्तन किंवा भजन. आजच्या पिढीला किमान काही शब्द कळावेत म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या संबंधात अनेक कथाही आहे.

मात्र स्वानुभवाने एक गोष्ट इथे सांगते आहे. मंदिरात वगैरे अनेक वेळा मोठ्या प्रमाणात काला कालवण्याचे काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. गावातल्या अनेक घरातून काल्याचं सामान येतं. ते काही एकदम एकत्र येत नाही. तेव्हा आलेली प्रत्येक वस्तू / मग ते ताकदही असो, पोहे असूदेत किंवा लोणचे! काल्याच्या चवीत तसूभरही फरक पडत नाही. तो तेवढाच अप्रतिम लागतो.

असो.

पुढेही सण येतच आहेत. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाल्याच्या शुभेच्छा देते आणि थांबते!

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “राष्ट्रीय सण…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “राष्ट्रीय सण…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“कोणत्याही सणांपेक्षा राष्ट्रीय सण सर्वात महत्त्वाचे. “

जुलै, आॉगस्ट महिने म्हणजे बारा महिन्यांपैकीच. पण खास, वेगळे महिने. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी. पूर्ण वातावरण छान, सुंदर हिरवेगार, आल्हाददायक प्रत्त्येकच दिवशी काही तरी विशेष आहे, असं वाटत. आणि खरच काही न काही असतही. नागपंचमी, जिवतीची पूजा, श्रावणसोमवार, जन्माष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, महालक्ष्मी पूजन, आणि बाप्पा चे आगमन ही असतेच. •••••

असे अनेक सणवार. प्रत्त्येकाचे विशेष महत्व. कधी आपल्या मुलांच्यासाठी, तर कधी मुली माहेरी येतात म्हणून. तर कधी घरच्या कान्हा करिता. तर कधी नववधू ची मंगळागौर. शुक्रवारी हळदीकुंकू, तर श्रावणातला सत्यनारायण. बरोबर खाण्यापिण्याची रेलचेल. पूरणपोळी, भजी शुक्रवारी गुळ चणे, सत्यनारायणाचा प्रसाद, राखीचा नारळीभात, कृष्ण जन्माष्टमी नंतरचा गोपाळकाला. मज्जाच मज्जा असते. ••••

महालक्ष्मीची पूजा हा एक मोठा सण. •••••

देशस्थांचे महालक्ष्मी पूजन म्हणजे अगदी प्रशस्त कार्यक्रम /सोहळा. त्या दिवशी सोळा भाज्या, चार पाच कोशिंबीरी, पाच प्रकारची भजी, पडवळ टाकून कढी, ज्वारीची आंबिल, व सांजोरया, पुरणपोळी, करंजी, लाडू पात्या यांचा फुलोरा असतोच. हा सगळा कार्यक्रम जेष्ठा आणि कनिष्ठा माहेरी आलेल्या असताना, त्यांच्या स्वागतासाठी. माहेरी आलेल्या मुलींचे कौतुक. स्वागत. दोघी बहिणींचे आगमन त्यांचा पाहुणचार, दागिने साड्या, सर्व तयारी अगदी दहा बारा दिवसांआधी च सुरू होते. त्यांची मुले ही असतातच बरोबर. एक दिवस राहुन आपल्या घरी परत जातात. ••••

प्रत्येक दिवशी एक नवीन कार्यक्रम उत्साह आनंद सगळीकडे. •••••

याच बरोबर 15 ऑगस्ट म्हणजे देशाचा, सर्व नागरिकांचा मोठा सण. राष्ट्रीय सण. सर्व सणांपेक्षा मोठा, एकत्र येऊन साजरा होणारा सण.

तस बघीतल तर राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम दखवायच, म्हणजे फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला देश भक्ती गाणी ऐकायची, झेंडावंदन, भाषण ऐकायच एवढच नव्हे.

आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला मिळालेल व्यक्ती स्वातंत्र्य, आपली सुरक्षा, प्रगती हे सर्व आपण दररोज अनुभवतो. मग काय? फक्त या दोनच दिवस देशाचा विचार करायचा का?

आपल्याच घरच उदाहरण घ्या…. घरचा प्रमूख कितीही चांगला जबाबदार असला, तरी घरच्या मेंबर्स ची पण काही जबाबदारी असतेच.

घरातील चार लोकांची मत एकसारखी नसतात. त्यावर आपापसात चर्चा होते.

कधी कधी तर अगदी गरमागरम चर्चा होते. विषय किती वाढवायचा? कुठे थांबायच हे कळल तर पुन्हा सर्व एकत्र गुणागोविंदाने नांदतात. एकमेकांना मदत करतात. घरातील शांती, प्रगती याकडे लक्ष देतात. शेजारी जाऊन आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना आपल्या घरच्या आंतरिक गोष्टींबद्दल चर्चा करायचा, आपल्या घरात ढवळाढवळ करायला चांस देत नाही. माझ्या भावाबहिणींबद्दल एकही अशी तशी गोष्ट ऐकायला आपण तयार नसतो. हे नियम घराचे स्वास्थ्य टिकवायला आपण पाळतो. आपला स्वाभिमान जपतो. दररोज लक्ष देतो. बरोबर शेजारचा अडचणीत असला तर लगेच मदतीचा हात पूढे करतो. हे सर्व आपला विवेक, संतुलना आणि शिस्त, परस्पर आदर यामुळे शक्य होत.

जेंव्हा एकाच घरातील चार जण एकाच मताचे नसतात, तेंव्हा देशातील 140 करोड लोकांमध्ये मतभेद असतीलच. फक्त त्यात स्वार्थ् नसावा. देश सर्वोपरी असावा……

मग हाच विचार, हीच भावना, असच वागण, , ही समज आपल्या देशासाठी पण असायला हवी ना. फक्त दोन दिवस नाही तर दररोजचचच..

इतक्यातच घडलेली घटना…..

41 वर्षानंतर अंतराळातून

भारत कसा दिसतो?

याबद्दल बोलताना Wing Commander Sudhanshu Shukla म्हणाले…

अंतराळातून भारत महत्वाकांक्षी दिसतो. निडर दिसतो, confident दिसतो, येथून भारत गौरवशाली दिसतो म्हणूनच आपला भारत सारे जहां से अच्छा आहे.

त्या दिवशी देशभरातील सर्व नागरिक शुधांशुच्या सुखरूप परत येण्याची वाट बघत होते. प्रार्थना करत होते. त्यांना बघून सर्वांचा ऊर दाटून आला. सर्वत्र टाळयांचा कडकडाट ऐकू आला.

अंतराळातून भारताबद्दल उद्गारलेली ही वाक्य, त्या भावना, त्या आशा, अपेक्षा, इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत.

मग माझ्या सारख्या सामान्य नागरिकाची जबाबदारी काय? मान्य आहे,…. मी माझ्यासारखे बहुतेक सगळेच अंतराळात जाऊ शकत नाही, सीमेवर देशाचे रक्षण करायलाही जाणे जमणार नाही. प्रत्येकाकडून ही अपेक्षाही नाही आणि गरजही नाही. पण मी काहीच करणार नाही का? फक्त टाळया वाजवेन, हेही अजिबातच नाही.

सिंदूर ऑपरेशन  च्या वेळेस देशावर आलेल संकट आपण बघीतल. कोविडचा महामारीचा पिरेडही आपण बघीतला.

परिस्थिती चे गांभिर्य कळल्यावर लगेचच आपण नवीन झालेले बदल मान्य केले. कुठलाही हट्ट न करता, तक्रार न करता, जसं जे नियमात बसेल तसं सहर्ष करत गेलो. ही किती मोठी, किती कौतुकाची गोष्ट आहे ही. आपल्या देशाची गरज आहे, फक्त एवढी समज सर्वांना समजली. व त्याप्रमाणे सर्व वागू लागले. सध्या सर्व देव पांढरा कोट घालून दवाखान्यात आहेत हे म्हणणे तेंव्हा आपल्याला पटले. •••••

 हा सर्व सणाहुन मोठा असा समजदारीचा, जबाबदारीचा, देशभक्तीचा, परिचय आपण दिला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापेक्षा अजून जास्त एक भारतीय आपला परिचय काय देऊ शकतो?? . म्हणजे देशाची गरज, आपली जबाबदारी, आपल्या सर्वांना चांगली समजते. सर्वांच्या सहकार्याने देशावर आलेल्या संकटाला आपण नेहमीच सामोरे जातो.

ही समजदारी, देशभक्ति, जबाबदारीने वागण हे नेहमीच असाव ना. त्यासाठी कठीण परिस्थितीतच यायला हवी का?

कोणत्याही सणापेक्षा ‘ राष्ट्रीय सण/प्रश्न ‘ मग तो स्वतंत्रता दिवस असो, किंवा देशावर आलेले संकट असो. सर्वांचे एकत्र येणे, मजबूती ने सामोरे जाणे, ही महत्वाची गोष्ट आहे. देशाला सांभाळणारे बरेच आहेत. फक्त मी काय करावे? व काय करू नये? एवढच समजणे सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त कठीण परिस्थितीतच नाही, तर नेहमीच आहे. ••••••

देशाचे नागरिक, त्यांचे विचार, शिस्त देशाची संपत्ती असते. देशाचे वैभव, शान असते. असे जबाबदार नागरिक देशाची ढाल असते.

मी माझ्या घराची शांतता, स्वच्छता सांभाळतो, शेजारयांशी चांगले संबंध ठेवतो. प्रत्त्येकाचा आदर करतो. हीच एक बेसिक गोष्ट सर्वांनी पाळली तर या आंतरिक शक्तिमुळे देशातच काय? देशाच्या बाहेर सुद्धा सुरक्षिततेचे कवच आपोआपच तयार होईल.

मग फक्त आपणच नाही तर दूसरे बाहेरचे पण म्हणतील..

ये भारत है। ये भारत के लोग है । सारे जहां से अच्छे है।

म्हणतात ना…

Your greatest weapon is your mind. Train it

To make right decisions.

To make right selectios.

To make right choices.

जय हिंद.

 

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “समिधाच सख्या या…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? विविधा ?

☆ “समिधाच सख्या या…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येऊ लागतो तसतसं मनात आठवणींचे मोहोळ उठतं! ब्रिटिश राजवटीचं दाटलेलं, दाट, गर्द सावट; लाखों-करोडोंनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात केलेलं जीवांचं समर्पण!! अनेक स्मरणीय, काही मात्र विस्मृतीत! काहींचं बलिदान लक्षणीय, तर काही अलक्षित!! पण बलिदान मात्र सगळ्यांचंच! ते व्यर्थ नाहीच! पण तरीही इतिहासात नोंद न झालेल्या अशा अनेक स्त्री हुतात्म्यांच्या प्रेरणा स्त्रोतांच्या झाकोळलेल्या कर्तृत्वाला नव्याने झळाळी देण्याचा हा प्रयत्न!

राणी वेलू नचियार….

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील रामनाथपुरम च्या राज परिवारात जन्मलेली एकुलती एक कन्या. जन्मजात विलक्षण प्रतिभेचं लेणं लेऊन आलेली! पित्याने तिचं लालन-पालन राजकुमारासारखंच केलेलं. अस्त्र, शस्त्र, तलवारबाजी, तिरंदाजी, भाला फेक, लाठी चालविणे, आदि सर्व युद्धकलेत पारंगत झालेल्या वेलू ने, ‘सिलंबम’ या तामिळी मार्शल आर्ट मध्ये ही कुशलता प्राप्त केली होती.

युद्धकला प्रविण वेलू नचियार ने तमीळ, तेलगू, मल्याळी, फ्रेंच, उर्दू… या भाषांवर ही प्रभुत्व मिळवले होते. हे कमी होतं म्हणून की काय तिने महान अशा तामिळ ग्रंथांचे वाचन करून ही, आपलं व्यक्तित्व बहुपेडी, बहुआयामी, बहुश्रुत बनवून स्वतः ला राज्याची उत्तराधिकारी म्हणून सिद्ध ही केले.

वयाच्या १६ व्या वर्षी राजा शशीवर्मा यांचे सुपुत्र… मुत्तू वेदुंगानाथ थेवर यांच्याशी विवाह झाला. वेलू आपल्या जीवनसाथी ची ख-या अर्थाने ‘ संगिनी’ सिद्ध झाली. वेळोवेळी आपल्या पतीची… मित्र, सल्लागार, एक विश्वासू सहयोगी सिद्ध झाली ती! पण दुर्दैवाने ईस्ट इंडिया कंपनी ची नजर शिवगंगा वर पडली, त्यांनी १७७२ मध्ये शिवगंगा वर आक्रमण केले. एक विध्वंसक युद्ध म्हणून इतिहासात नोंदलं गेलेलं हे युद्ध! निर्दयता आणि नृशंसता याची हद्द पार केली इंग्रज सैनिकांनी! अगदी वृद्ध, महिला, बालके ही नाही सुटली त्यांच्या हिंसाचारातून! वेलू नचियार च्या पतीला ही हौतात्म्य प्राप्त झाले.

वेलू आणि तिची कन्या वेल्लाची स्वतः ला सुरक्षित वाचवंत, तामिळनाडूतील डिंडिगुल येथील जंगलातील एका सुरक्षित जागी जाऊन पोहोचल्या आणि तेथेच वास्तव्य केले.

आपलं राज्य परत मिळविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा, या राणीला स्वस्थ बसू देईना. तिचा आत्मविश्वास तिला आतून सारखा लढ, आगे बढो… अशी साद घालत होता.

वेलू नचियार ने कंबर कसली. आपली अस्त्र-शस्त्र विद्येतली पारंगतता पणाला लावायचं ठरवलं आणि आसपासच्या महिलांना गोळा करून त्यांच्यात देशाचं रक्षण करण्याचं स्फुल्लिंग चेतवलं या समिधेने! स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या होमकुंडात स्वतः ला समर्पित करणा-या अशा अनेक महिलांची सांगड घालंत, जणू एक मोळीच बांधली तिने! स्त्रियांना स्वतः तलवारबाजी, निशाणे बाजी सातत्याने ८ वर्षे शिकवत राहिली, तयारी करीत होती ती युद्धाची!

तिने त्यांना सैन्य रणनीती शिकवली. राणी वेलू नचियार चा हा मार्ग अतिशय खडतर होता. एकटीने बांधलेली सांगड तिला योग्य वेळी अर्पण करायची होती. पण दुर्दैवाने त्या त्याग आणि बलिदानासाठी, स्वातंत्र्य मंत्रोच्चारांनी सिद्ध आणि सिक्त समिधांमधील एक समिधा जिला युद्धा आधीच… राणीच्या शोधात आलेल्या इंग्रज सैनिकांना तिचा ठाव-ठिकाणा सांगितला नाही म्हणून हौतात्म्य पत्करावं लागलं! ती होती ऊदइयाल… राणीची मानसकन्या! जिने जणू काही आपल्या प्राणांचे बलिदान देऊन, मातृ वंदना दिली आणि ही समिधा निमाली!!

मग तिच्या वीर गती प्राप्ती च्या स्मरणार्थ राणीने स्थापिली एक नारी सेना… आणि तिला नाव दिले उदयियाल!!

एका समिधेच्या समर्पणाने चेतविलेल्या अनेक समिधा गोळा झाल्या… देश प्रेमाने बांधलेल्या, भारलेल्या, एकजुटीने!!

राणीने त्यांचं सेनापतीपद सोपवलं… तिच्या दुस-या मानसकन्येला… विश्वासू, तीक्ष्ण बुद्धी, वीरांगनेला… कुयिली ला!! आणि मग सुरू झाली युद्धाची तयारी!!

राणी वेलू नचियार… आपलं राज्य परत मिळविण्यासाठी ज्या योजना मोठ्या योजकतेने आखत होती, त्यांत एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिने म्हैसूर च्या राजाला हैदरअली ला पत्र लिहून केलेली भेटीची विनंती!

राजाने ही तिचे अगदी राणीचा आब, इतमाम, आणि स्वाभिमान कायम राखणारं असं सन्मानित स्वागत केले. तिचे आतिथ्य ही केले. राणीने ही आपल्या उर्दू भाषेत संवादी होत, त्याला खूप प्रभावित केले. त्यानंतर हैदरअली ने राणीला मदत करण्याचे नुसते वचन नाही दिले, तर प्रत्यक्षात ४०० पौंड आणि ५००० सैनिकांची फौज ही दिली. इतकंच नाही तर असं म्हणतात की, राजाने त्यांच्या या आगळ्या, पवित्र, आणि एकाच ध्येयासाठी झपाटलेल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून महालात एक मंदीर ही बांधले.

अशी ही युद्धाची तयारी ८ वर्षे चालली होती. आणि शेवटी तो दिवस आला. ज्याची वाट राणी आणि तिची नारी सेना… “रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग”… असं म्हणंत त्या प्रसंगाची वाटच बघत होती.

दस-याचा दिवस उजाडला! शिवगंगा किल्ल्यात देवी राजराजेश्वरी चं मंदीर! प्रतिवर्षी दसरा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया येत. तशाच आल्या. स्त्रियांसाठी मंदिराचा दरवाजा उघडला गेला. मंदिराजवळच इंग्रजांचे शस्त्रागार असल्याची खबर नारी सेनेच्या सेनापती ला… कुयिली ला आधीच लागलेली. त्याच क्षणी तिच्या मनात एक विचार, विजेच्या लोळासारखा शिरला. त्याचा तिने कुणाला थांगपत्ता ही नाही लागू दिला.

तिच्या विचारांत ते विद्युल्लतेचं तेज झिरपू लागलं हळूहळू!!!

मंदिराचा दरवाजा उघडला… उदायल नारी सेना साधारण वेषात… फुला-फळांच्या टोपलीत; हत्यारे लपवून आत प्रवेशल्या. दस-याचा क्षणी कुयिली ने क्षणाचाही विचार न करता… एक क्षण ही न दवडता… सेनेला आपल्या अंगावर पूजेसाठी आणलेल़ सगळं तूप ओतायचा जणू हुकूमच दिला… आणि तशी कार्यवाही होताच… तिने आग लावली स्वतः ला! पापणी लवायच्या आत… आगीचे लोळ उठले… कुयिलीने उडी घेतली थेट शस्त्रागारात… आणि कानठळ्या बसविणा-या, एकामागोमाग एक होणा-या स्फोटात, संपूर्ण शस्त्रागार राख झाले… आणि त्यातच

इतिहासातला पहिला आत्मघातकी मानवी बॉंब… कुयिली… एक जळती, तेज:पुंज, पवित्र उद्देशाने भरलेली, आणि भारावलेली समिधा समर्पित झाली, त्या अग्नी दाहात! नाही कुठेच नोंद फारशी… आणि तिच्या दहनभूमी वर नाही चिरा नाही पणती.

अशा या दोन समिधा आपल्या जुडीत, सांगडीत बांधून घेणा-या तिस-या समिधेने… राणी वेलू नचियार ने * मग… सर्वशक्तीनीशी शिवगंगा किल्ला काबीज केलेल्या इंग्रजांवर हल्ला बोल करून… आपल्या युद्ध कौशल्याने आणि रणनीती ने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आणि शेवटी विजयश्री माला तिच्या गळ्यात पडली. त्यानंतर राणी ने १० वर्षे राज्य केले. राजा हैदरअली शी असलेली मैत्री थेट पर्यंत टिकवून ठेवली. त्याचा मुलगा, टिपू सुलतान वर ही सख्ख्या भावासारखं प्रेम केलं. आणि नंतर आपल्या लेकीच्या हाती राज्य सोपवून ही पती निधनानंतर, सतत जळंत, धगधगंत, प्रज्वलित राहून, प्रजा हितासाठी स्वतः चं जळंत राहणं, प्रज्ज्वलन टिकवून ठेवणारी ही समिधा ही १७९६ मध्ये निमाली!!

राणी वेलू नचियार ला प्रजा वीर मंगई… वीर महिला या नावाने संबोधायची. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई च्या जवळ जवळ ७५ वर्षे आधीचा हा वेलू चा संघर्ष! त्यामुळे ती एका अर्थाने राणी लक्ष्मीबाई ची प्रेरणा स्त्रोत च ठरते!

२००८ मध्ये भारतीय पोस्ट खात्याने तिच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट काढलं!

वेलू नचियार आजही… साहस, रणनीती, आणि नेतृत्व याचा आदर्श आहे महिलांसाठी!!

पण तरीही… भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दुर्लक्षित नायिका च ठरतीये! समिधांच्या सांगडीतल्या या… उदयियाल, कुयिली आणि वेलू नचियार… तिनही समिधांना कोटी कोटी प्रणाम!

स्मृतीतल्या संपुटीत जपू यात ही त्रिपुटी… आणि म्हणू यात ना… तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हां घडो!

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देवकीचे बाळ बाई नंदाघरी आले ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ देवकीचे बाळ बाई नंदाघरी आले…  ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण महिना आणि आपले सण याचं अतूट असं नातं आहे. वर्षाचे अनेक सण या श्रावणातच येतात. त्यात श्रावण महिना हा शिवशंकराचा आहेच. श्रावण सोमवार असतोच. पुढे येणाऱ्या मंगळागौरी / भराडी गौर, वरद लक्ष्मी व्रत, श्रावणी शुक्रवार म्हणजे देवीची पूजा आहेच. पण यासोबतच श्रावणाचं आणि श्रीकृष्णाचं एक अतूट असं नातं आपल्याला दिसतं. अगदी दीपपूजेला जो जिवतीचा कागद आपण घेतो, त्यात सुद्धा कालियामर्दनाचं म्हणजेच पर्यायाने श्रीकृष्णाचे चित्र आहे. आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की सुभद्रा, कृष्ण आणि द्रौपदी यांच्या संबंधातली एक चिंधीची गोष्ट आपल्याला आठवते. अगदी लक्षात येतं ते शामची आई या चित्रपटातलं गाणं. ते म्हणजे,

“भरजरी ग पितांबर दिला फाडून

द्रौपदीशी बंधू शोभे नारायण

किंवा पारंपारिक असं गीत – – –

हरी बंधू शोभे द्रौपदी बाईला

ही गाणी सर्वांच्या ओठावर आहेत. बहीण भावाच्या प्रेमाचा राखीचा सण अतिशय उत्साहात पार पडतो.

पुढे आठच दिवसात जन्माष्टमी येते आहे. नंतर दहीहंडी आणि गोपालकाला. म्हणजे पुन्हा भगवान श्रीकृष्ण आहेतच. हरिहराचं हे नातं असलेला श्रावण महिना. या महिन्यात फक्त चारच शनिवारी काय काय लिहायचं? मोठा प्रश्न आहे कारण विषय खूप आहेत आणि वेळ कमी. पण वेगळं असं काहीतरी लिहावं वाटतं, म्हणून हा लेखप्रपंच.

श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्मोत्सव हा सकल हिंदूंचा एक पवित्र सण आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार. कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. लोकांचे स्वातंत्र्य जिथे नाकारले गेले होते, तिथे झाला. सर्वत्र वाईट गोष्टी होत्या. सख्ख्या मामाकडूनच भाच्याच्या जिवाला धोका होता. सख्खी बहीण, देवकी बंदिवासात होती. जन्मापूर्वीच त्या बाळाच्या हत्येचे अनेक कट रचले गेले होते.

बाळाचा जन्म झाला आणि जन्मानंतर काही क्षणातच वसुदेवाने, यमुना ओलांडून मथुरे मधून कृष्णाला गोकुळात नेले. नंद – यशोदा यांनी कृष्णाचे पालन केले. दोन मातांचं प्रेम कृष्णाला मिळालं. अनेक लोक या दिवशी उपवास करतात. विविध प्रकारे पूजा करतात. कुठेकुठे परंपरागत फुलोरा असतो.

आज निसर्गाशी साम्य साधणारे अनेक सण आपण करतो. अगदी गणपती सुद्धा शाडूचाच हवा – इकोफ्रेंडली वगैरे शब्द आत्ता आत्ता आम्हाला कळले. पण ही सणांची पद्धत अतिशय पूर्वीपासूनच खेड्यापाड्यात इकोफ्रेंडलीच आहे. माझ्या माहेरी सांगायचं झालं, तर कृष्ण जन्माष्टमीचा सण तिथे मोठ्या धडाक्यात साजरा होतो. माझे वडील स्वतः गणपतीच्या मूर्ती करत असल्यामुळे, घरी माती तयार असायचीच. त्याचेच आम्ही गोकुळ बनवायचो. बाबा कृष्णाची सुरेख मूर्ती बनवायचे. इतर मुर्त्या बनवायला भावंडं त्यांना मदत करायची. आणि आजी सांगायची की, “आजच्या दिवशी जर मातीला हात लावला नाही तर पुढला जन्म गाढवाचा मिळतो. ” पण तिच्या अशा युक्तीमुळे पुढचा जन्म गाढवाचा नको म्हणून त्या माती पासून आम्ही काही तरी तयार करायचोच. नाहीच काही झालं तर किमान एक डोंगी / पाण्याचं टाकं तरी आम्ही तयार करायचो. मूर्तीकलेला अशाप्रकारे बालपणापासूनच प्रोत्साहन दिलं जायचं.

मग कृष्णाची पूजा व्हायची. संपूर्ण गोकुळाची पूजा करायची. लेकुरवाळं घर असल्याने सर्वांना पूर्ण उपास नसून धान्यफराळ असायचा. कृष्ण जन्मासाठी आई आणि पुढे वहिनी सुंठवडा तयार करून ठेवत. कारण त्या दिवशी सुंठवड्याचाच प्रसाद असायचा.

रात्री भजन असायचं. या भजनात पंचपदी झाल्यानंतर शक्यतो कृष्णाची गाणी म्हटली जायची. अनेक ठिकाणी कृष्ण जन्माची कहाणी सुद्धा वाचली जाते. काही ठिकाणी मध्यरात्री कृष्ण जन्मानंतर कृष्णरूप, याच्या बालरूपाला आंघोळ घातली जाते. नवे कपडे आणि दागिने घातले जातात. आणि नंतर त्याला पाळण्यात घालून झोके दिले जातात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दारावर बाहेर लहान पावलांचे घराकडे चालत येणारे रांगोळीचे ठसे काढतात. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे.

कृष्ण सगळ्यांना जवळचा का वाटतो? प्रत्येक मातेला आपलं मूल हे कृष्णा समान वाटतं. प्रत्येक बहिणीला आपला भाऊ हा कृष्णा समान वाटतो. प्रत्येक पत्नीला आपला पती हा कृष्णा सारखाच वाटतो. एवढेच काय? प्रत्येकच स्त्रीला कृष्णा सारखा एकतरी सखा असावा असं वाटू लागतं आणि आपण त्याची राधा असावी असंही वाटतं. कारण श्रीकृष्ण वाटाडे आहेत. मार्गदर्शक आहेत. तत्त्वज्ञ आहेत. नर्तक आहे / गायक आहे /वादक आहे. समाज सुधारक सुद्धा आहे. अशा या कृष्णाच्या रूपात आपण एकरूप होऊन जातो. आणि म्हणूनच कदाचित मुलगी सासरी निघताना तिला दिली जाते ती अन्नपूर्णा आणि सोबत बाळकृष्ण. तिच्या आयुष्यभरासाठी तिचा सोबती म्हणून.

म्हणूनच हा सण मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने सर्वत्र साजरा केला जातो.

माझ्या माहेरी रात्री बरोबर बारा वाजता कृष्ण जन्म केला जायचा. गुलाल उधळला जायचा आणि त्यानंतर कृष्णाच्या पाळण्याचं गाणं म्हटलं जायचं. कृष्णाचे अनेक पाळणे आहेत. पण त्याच्या सख्ख्या मातेला कृष्णाला पाळण्यात घालून झोका देता आला नाही आणि म्हणूनच जो पाळणा मला ठाऊक आहे तोच मी या ठिकाणी देत आहे.

देवकीचे बाळ बाई नंदाघरी आले

माय यशोदा गं देई पाळण्यात झोले ॥ धृ ॥

*

मांडीवरी जोजविते कुण्या माऊलीचा कान्हा

आई पण जागे झाले फुटे यशोदेला पान्हा

पिता अमृताच्या धारा बाळ झोपी गेले ॥१ ॥

*

गोकुळीच्या गवळणींनो दूध आणा वाटी वाटी

हळूहळू वाढे कान्हा भूक त्याची होई मोठी

रोप यादव वंशाचे दारी लावियेले ॥ २ ॥

*

आईबाप ठाव नाही माझ्या लाडक्या कृष्णाला

त्याच्या माऊलीच्या दैवी मथुरेची बंदीशाळा

त्याच्या काळजाची माया माझ्या उरी हाले ॥३ ॥

*

माय यशोदा ग देई पाळण्याचा झोले

हा पाळणा म्हणून झाला की, आरती व्हायची. सर्वांना सुंठवड्याचा प्रसाद दिला जायचा. इतरत्र सुंठवडा होत नसल्याने अनेकजण घरच्यांसाठी प्रसाद सोबत बांधून न्यायचे. या साऱ्या आठवणी माझ्याजवळ आहेत आणि कधीतरी वाटतं की हा कृष्ण जन्म पुन्हा एकदा माहेरी जाऊन अनुभवावा. कारण अजूनही त्याच पद्धतीने त्याच परंपरेने कृष्णजन्म तिथे भावांकरवी आजही होत असतो.

याचा दुसरा दिवस म्हणजे गोपालकाल्याचा. गोपालकाला हा वेगळा विषय आहे गोपालकाल्याचे किर्तन आणि गोपालकाल्याचं गाणं एक वेगळा विषय असल्यामुळे पुढल्या लेखात तो भाग येईल. आज मी इथेच थांबते. पुन्हा एकदा कृष्ण द्रौपदीच्या रूपातल्या सर्व भावा – बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या जन्माष्टमीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा.

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा  ☆ ‘कोमल वाचा दे रे राम!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘कोमल वाचा दे रे राम!’ ☆ श्री दिवाकर बुरसे

बोलण्याची क्षमता हे निसर्गाने मानवाला दिलेले विशेष वरदान होय. विकसित वाणी, तिन्ही काळाचा विचार करणारी अलौकिक बुद्धी व स्मरणशक्ती ही वरदाने केवळ मानवालाच मिळालेली आहेत. त्यातले ‘वाणी’ हे आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे.

तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय जगाला होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातली सत्यता, विषयाचे गांभिर्य, विषयाचा व्यासंग, अनुभव, प्रामाणिकपणा, समोरच्या व्यक्तीविषयीचा आदर, आपुलकी सारे काही बोलण्यातून कळते. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आसतात.

समर्थांच्या मते बोलणे आणि बोलणारा कसा असू नये ते प्रथम समजून घेऊया.

अल्पमती आणी वादक l दीनरूप आणी भेदक l सूक्ष्म आणी त्रासक l कुशब्देकरुनि ll

कठिणवचनी कर्कशवचनी l कापट्यवचनी संदेहवचनी l दुःखवचनी तीव्रवचनी l क्रूर निष्ठुर दुरात्मा ll

न्यूनवचनी पैशून्यवचनी l अशुभवचनी अनित्यवचनी l द्वेषावचनी अनृत्यवचनी l बाष्कळवचनी धिःकारू ll

(दासबोध द. २ स. ३)

पुढे एके ठिकाणी समर्थ आपल्याला बोलणे हा विषय समजाऊन सांगताना म्हणतात….

बरें बोलता सुख वाटतें l हें तों प्रत्यक्ष कळतें ल आत्मवत परावें तें l मानीत जावें ll

कठिण शब्दें वाईट वाटतें l हे तो प्रत्ययास येतें l तरी मग वाईट बोलावें तें l काये निमित्त ll

आपणास चिमोटा घेतला l तेणे कासाविस जाला l आपणावरुन दुस-याला l राखत जावे ll

जे दुस-यास दुःख करी l ते अपवित्र वैखरी l आपणास घात करी l कोणियेकें प्रसंगी ll

पेरलें तें उगवतें l बोलिण्यासारिखें उत्तर येतें l तरी मग कर्कश बोलावें तें l काये निमित्त ll

आपल्या पुरुषार्थ वैभवें l बहुतास सुखीं करावें l परंतु कष्टी करावें l हे राक्षेसी क्रिया ll

दंभ, दर्प, अभिमान l क्रोध आणी कठिण वचन l हे अज्ञानाचे लक्षण l भगवद्गीतेंत बोलिलें ll

(दासबोध द. १२ स. १०)

बोलणे हे इतके महत्त्वाचे असूनही आपण आपले बोलणे अधिक चांगले करण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही. ब-याच वेळा आपला अहंकार आपल्याला तसे करू देत नाही.

‘आपलं जे आहे हे असंच आहे’, ‘माझा आवाजच मोठा आहे’ ‘मला अशीच सवय आहे’ ‘असं बोललं की मगच समजतं ‘ असे म्हणत आपण स्वतःचे समर्थन करतो. पण लक्षात घ्या, चांगले बोलणे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते, आत्मसात करावे लागते आयुष्यभर याची साधना करावी लागते.

सुसंस्कृत वाणी हाच खरा अलंकार

वाणेक्या समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते

क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ll

अर्थः- वाणी संस्कृतियुक्त एकच नरा शोभा खरी देतसे

वाणी हीच अपूर्व भूषण सदा, नाशा दुजें जातसे ll

(राजा भर्तृहरिकृत नीतिशतक)

‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम लोक अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पहात- खरे तर ‘कान देऊन ऐकंत’ असंत. उत्तम शब्दसंग्रह, स्पष्ट शब्दोच्चारण, आवाजाचा चढ-उतार- लय इ. शिकायचे असेल, तर हा बच्चन महोदयांचा आवाज आणि त्यांची बोलण्याची शैली अभ्यासायलाच हवी. आवाजाची, बोलण्याची, वाणीची साधना, तपस्या याचे साक्षात उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन!काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरे कोणी करु शकत नाही हे हळूहळू कळत जाते.

सत्यार्थाने शब्द जगलेला माणूस शब्द उच्चारताना ते ज्या ऊर्जेने उच्चारतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो.

बोलण्याचा ध्वनी आतून, अंतःकरणातून उमटतो. माणसाच्या चेतनेला स्पर्श करुन बाहेर पडतो. माणूस म्हणून आपण जितके व जसे घडत जातो तसा, तितका आपला आवाजही सुंदर होत जातो. आशाताईंचे साधे बोलणेही गाण्याइतकेच सुश्राव्य का वाटते? कारण जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे!

एक प्रयोग करून पहा. सुंदर शब्दांची यादी करा आणि ती दररोज वाचा. सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल, तशी मोठ्याने वाचायची. सरावाने वाढवत जायचे हे आपले शब्दभांडार. सततच्या प्रयत्नाने हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. याने बोलणे चांगले होतेच पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावेसे वाटतच नाही. नकळत आपल्या अभिरुचीचा स्तर उंचावत जातो.

आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे. आपले शब्द जसे असतील, तशाच घटना, तशाच व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. शब्द बदलले तर आयुष्यही बदलता येते हे ‘शब्दशः’ सत्य आहे!

सावकाश, स्पष्ट, भावपूर्ण, शक्यतो मृदु, हळू बोलणे या सवयी जाणीवपूर्वक लावून घ्याव्या लागतात. वाचनाने आपले विचार अधिक स्पष्ट, मुद्देसूद, प्रगल्भ होतात. आपल्याला नेमके व मोजके बोलण्याची कला अवगत होते.

काव्यवाचनाने कवितेतील भाव आणि शब्दयोजना समजून घेता घेता आपल्या बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि ‘ ये हृदयिचे तें हृदयीशी’ संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी प्रकट वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे आहे.

कानात प्राण आणून ऐकावे असे बोलणारी माणसे या जगात आहेत. आपल्याला ती शोधता-ऐकता आली पाहिजेत येवढेच.

बोलताना कटाक्षाने टाळायच्या गोष्टी म्हणजे तार स्वरात न बोलणे, पाल्हाळ न लावणे, अति संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ न बोलणे. वेळ ही संपत्ती असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये? फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर चर्चेचा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.

‘आपल्या’ माणसांशी बोलण्याने मनावरचा ताण हलका होतो. बोलणे म्हणजे निव्वळ शब्द नाहीत तर त्यामागे बोलणाराचे अनुभव, विषयाचे चिंतन, भावभावना, तळमळ असते. काही प्रसंगी तर मौन बाळगणे हेच सर्वात प्रभावी बोलणे ठरू शकते. ‘शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ असे होते.

वेळात वेळ काढून घराघरात, समाजात संवाद – सुसंवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते. नात्यातले, मनामनातले गैरसमज बोलून दूर करता येतात.

परिणामकारक कसे बोलावे हे या जगाच्या शाळेत शिकावेच लागते. हा जगण्याचा प्रवास अवघड असला तरी अशक्य मुळीच नाही.

सोबत कोणी बोलणारे मिळाले की प्रवास सोपा होतो.

तात्पर्य:- ज्याच्या वाणीमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, शब्द जपून वापरतो, आपले बोलणे सहज, अकृत्रिम, प्रवाही, यमकअनुप्रासादि अलंकार, समर्पक दृष्टांत, उदाहरणे, उद्धरणे, अवतरणे यांनी शृंगारतो, जग त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीला अशक्य गोष्टी शक्य होतात!

वाणीचे आणि शब्दांचे महत्व व सामर्थ्य जाणून समर्थ रामरायाला विनवतात….

कोमल वाचा दे रे राम

बहुत पाठांतर दे रे राम

शब्द मनोहर दे रे राम

दास म्हणे रे सद्गुणधाम

उत्तम गुण मज दे रे राम!

*

llजय जय रघुवीर समर्थ ll

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्राचीन कोकण… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ प्राचीन कोकण ☆ प्रा. भरत खैरकर 

मागील कित्येक वर्षे कोकणात गणपतीपुळेला जाणं होतय.. साधारणतः २५-३० वर्षांपूर्वीचा कोकण आणि अलीकडच्या दशकातला कोकण फारच बदललेला आहे.. “पर्यटनातून रोजगाराची निर्मिती” तयार झाली आहे आणि ह्याच एक छानसं उदाहरण नुकत्याच गणपतीपुळेच्या झालेल्या भेटीत सापडलं..

गणपतीपुळ्याच्या बाजूलाच असलेल्या मालगुंड येथे कवी केशवसुतांचं घर व प्राचीन कोकण संग्रहालय ही दोन ठिकाणं मला खूप स्पर्शून गेली.. एवढी वर्षे कोकणात येऊन नुसते किनारे फिरून.. मासे खाऊन.. कोकणी माणूस समजून घेतला नव्हता..! पण प्राचीन कोकण संग्रहालयातील गाईड असलेल्या मुलीने जो कोकण समजावला तोच सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे..

संग्रहालयात प्रवेश करतानाच ज्याच्या त्याच्या ‘जन्मनक्षत्रा’नुसार त्या त्या व्यक्तीचे ‘आराध्यवृक्ष’ इथे बघायला मिळतात.. पिंपळपाराची पार जुनी परंपरा आपण येथे बघू शकतो.. प्रवेशगुहेच्या आधी अलीकडचा कोकण आणि आतमध्ये प्राचीन कोकण दाखविला आहे.. प्रवेशद्वारावर कवी माधव यांची “हिरवे तळकोकण” ही सुंदरशी कविता लावली आहे.. त्यानंतर लगेचच कोकणचं वैभव असलेलं कोकमच झाड आपलं लक्ष वेधून घेत.. त्याची औषधी उपयोगीता ऐकून आपण थक्क होतो.. शरबत, तेल, आमसूल, अशा विविध उपयोगासाठी आमसूल वापरलं जातं.

परशुरामभूमी असलेल्या ह्या कोकणात.. परशुरामाने ज्यावेळी पूर्ण भूमी जिंकली आणि ती लगेच दान देवून टाकली. त्यावेळी त्याला राहायला जागा उरली नाही.. मग तो ज्याठिकाणी चिपळूण, (गणपतीपुळे) आहे त्या ठिकाणी समुद्राला आव्हान करतो.. समुद्राशी लढाई करतो आणि त्याला जिंकून तिथला समुद्र ३०-४० किलोमीटर मागे जायला परावृत्त करतो.. हीच तयार झालेली किनारपट्टी वरची भूमी म्हणजे कोकण होय!

गुहेच्या आत प्रवेश केल्यावर जांभा ह्या लाल दगडात तयार केलेली ‘पाखाडी’ म्हणजे कच्चा रस्ता आपणास दिसतो.. हा रस्ता ग्रामदेवतेकडे जाण्याचा मार्ग आहे.. आजूबाजूला नानाविध मसाल्यांची झाडे.. त्यात काळीमिरी, दालचिनी, लवंग, वेखंड, वेलदोडा, हळद, इत्यादी मसाले आपण बघू शकतो.. सोबतच माडीवाला, ताडीवाला, यांचे पुतळे बघत बघत आपण कोकणी लोकांच दैवत असलेल्या ‘वाघजाई ‘ मंदिरात येतो.. ज्या ठिकाणी वाघांच जास्त प्रमाण असतं तिथला निसर्ग समृद्ध असतो असं म्हणतात.. कोकणी लोक हे

निसर्गपूजक असल्याने नाग, वड, पिंपळ इत्यादींची पूजा व त्यांची स्थापना आपण ठिकठिकाणी बघू शकतो.

कोळी समाजातील बांधव रात्रभर समुद्रात जाऊन पहाटे पहाटे मासे घेऊन येतात.. त्यानंतर ते मासे समुद्रकिनारी असलेल्या बाजारात विकतात.

बारा बलुतेदार, खोत व सामान्य जनता यांचा एकमेकांशी असलेला संबंध.. वैशिष्ट्यपूर्ण जीवन.. कोकणी समाज व्यवस्थेत दिसतं. त्यामध्ये खोत प्रामुख्याने न्यायदान करणे, महसूल जमा करणे, कायदा सुव्यवस्था बघणे व जमीनदारी सांभाळणे अशी महत्त्वाची कामे करायचे.

कोकणी माणसाच्या घराला ओसरी, पडवी, देवघर, स्वयंपाकघर, माजघर, छप्पर, अंगण आणि तुळस शिवाय आजूबाजूला ताड, माड आणि नारळ, सुपारीची झाडे आपण बघू शकतो. इथला शेतकरी सर्वांना अन्नधान्य पुरविणारा अन्नदाता.. त्याच्या घरात कणगी, भात, नाचणी, भात, वरई इत्यादी धान्य चिरफळाच्या पानांनी झाकून त्याला कणगी मध्ये लिंपून ठेवल्या जात असे. तीन-चार वर्षेपर्यंत हे धान्य कीड न लागता टिकून राहायचे.

इथला कुंभार गणपती.. देवी.. मडकी.. पणत्या.. दिवे..

इत्यादी संपूर्ण गावाला पुरवायचा.. त्यांनीच तयार केलेली अनेक मोजमापाची भांडी जशी की चवली, पावली चिपटं, मापटं, इत्यादी याठिकाणी आपण बघू शकतो. इथला सुतार लाकडी अवजारे, शेतीसाठीची नांगर, फाळ, तयार करून द्यायचा.. सावंतवाडीची लाकडी खेळणी आधीपासूनच तशीही जगप्रसिद्ध आहेत..

गावात येणारा अस्वलाचा खेळ दाखवणारा दरवेशी.. तसेच सापाचा खेळ दाखवणारा गारुडी.. आपण ह्या ठिकाणी बघू शकतो.. गावातला लोहार कोयती, विळी, नांगर, कुऱ्हाड, तलवारी इत्यादी अवजारे तयार करून धान्याच्या बदल्यात द्यायचा.. गावचा तेली व त्याची बायको तेलघाणा वापरून खोबऱ्याचं तेल काढून द्यायचे. त्याच्यातील घाण्यांमध्ये खुंट, सुके खोबरे, लाट, जोखड, दगड, अशी एक मशीनवजा यंत्रणा असायची ज्यावर बसून तो तेली पसा दिडपसा तेल दिडदोन तासात काढायचा!

बांबूच्या टोपल्या, सुपं, परडी, रोवडी, तयार करणारा बुरुड.. गावच्या शुभकार्यात महत्त्वाची भूमिका बजावायचा.. कोकणामध्ये भाजणीचे वडे, उकडीचे मोदक, भात-मासे, माशाची आमटी, हे मुख्य जेवणाचे पदार्थ आहे.. तांदूळ मुख्य धान्य असल्यामुळे धानातून तांदूळ आणि भुसा अलग करण्यासाठी… ‘घिरटं किंवा जातं ‘ वापरात यायचं.. वेगवेगळ्या शेवयायंत्र, किटली, टिफिन बॉक्स, चमचे, उखळ, दगडी मुसळ, अडकित्ते, इत्यादी प्राचीन वस्तू आपण ह्या संग्रहालयात बघू शकतो.. गावातला कासार मुली आठ दहा वर्षाच्या होईपर्यंत त्यांना मोफत बांगड्या भरून द्यायचा.. मात्र जेव्हा तिचं लग्न व्हायचं तेव्हा तिचे वडील कासाराला लहानसा सोन्याचा दागिना किंवा मणी भेट म्हणून द्यायचे ही पद्धत कोकणात होती..

कोकणी लोकांच्या ग्रामदेवता व पाणवठा ह्या दोन्ही मुख्य जागा.. या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येतो.. चर्चा करतो.. पाणवठा तर आंघोळीसाठी, पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, गुरांना पाणी पाजण्यासाठी, असलेलं हक्काचं ठिकाण… गावातला चांभार म्हणजे चर्मकार चामड्याची चप्पल जोडे शिवणारा.. कोकणातील सुप्रसिद्ध मार्लेश्वराच्या कथेमध्ये शंकराला चर्मकारानेच त्या गुहेपर्यंत पोहोचवल्याचं बोलल्या जातं.. तिथे प्रत्यक्ष शंकराने चर्मकाराला दर्शन दिल्याचं कथानक उपलब्ध आहे.. धनगर ही भरपूर धन असलेली जमात! चामड्याची वाहणं (चप्पल), घोंगडी आणि घुंगराची काठी असा पोशाख असलेला हा धनगर शंभर ते सव्वाशे गाईंचा मालक, तसेच पंधरा ते पंचवीस म्हशींचा मालक शिवाय अगणित मेंढ्या- बकऱ्या त्याच्याकडे असायच्या..!

अशी ही सर्व बारा बलुतेदारांची इतिहास वजा माहिती या ठिकाणी दीड ते दोन तासात आपणास सहज मिळते.. त्यामुळे गणपतीपुळ्याला जाणाऱ्या कुटुंबांनी.. पर्यटकांनी.. आवर्जून आपल्या मुलांसह ह्या संग्रहालयाला भेट द्यावी म्हणजे प्राचीन कोकणासह महाराष्ट्राचा इतिहास.. परंपरा.. संस्कृती.. मुलांना वेगळं शिकविण्याची.. सांगण्या गरज पडणार नाही असे वाटते..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गर्भसंस्काराचा सापळा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “गर्भसंस्काराचा सापळा☆ श्री जगदीश काबरे ☆

गर्भसंस्कार केल्यामुळे मूल सुसंस्कारी जन्माला येते. कारण गर्भाला आवाज ऐकू येतो, असे समर्थन करणारे हे शिक्षित असतात आणि ते अवैज्ञानिक पद्धतीने या भंपक कर्मकांडाचे समर्थन करत असतात. गर्भसंस्काराला महाभारतातील अभिमन्यूच्या कथेची सांगड घालून धार्मिकतेचे वलय दिल्यामुळे या अज्ञानी मंडळींना आपण काही चुकीचे करत आहोत असे वाटतच नाही. गर्भाला आवाज ऐकू येतात, गर्भ वेगवेगळ्या आवाजांना वेगवेगळा प्रतिसाद देतो, हे वैज्ञानिक सत्य आहे. पण त्याला शब्द कळतात, त्याचे अर्थ कळतात, हे मान्य नाही. कारण त्यासाठी भाषा अवगत असावी लागते. गर्भाला जर गर्भातच भाषा कळत असती तर बाळ जन्माला आल्यानंतर त्याला भाषा शिकवण्याची गरज पडली नसती. पण गर्भ आवाजाला प्रतिसाद देतो म्हणजे त्याला सगळे कळते असे समजून गर्भसंस्काराचे मूढ समर्थक सुतावरून स्वर्ग गाठत असतात आणि चुकीच्या पद्धतीने म्हणजेच छद्म वैज्ञानिक पद्धतीने समर्थन करत असतात. असे समर्थन करणे म्हणजे ख्राईस्ट हा कृष्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे म्हणून मागच्या जन्मी येशू हा कृष्ण होता असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे. तेव्हा खऱ्या अभ्यासाची गरज या शिक्षित विचारशत्रूनाच आहे.

खरे संस्कार तर आयुष्यभर करावे लागतात. कौटुंबिक संस्काराबरोबर सामाजिक संस्कारही महत्त्वाचे असतात. त्याची सांगड धर्म, अध्यात्म याच्याशी फारशी घालू नये. गर्भवतीच्या भावनिक कमजोरीचा गैरफायदा घेऊ नये. संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले, त्याबद्दल विचार केला तर आपल्यावर नकळतपणे अनेक संस्कार होत राहतात. अनुभव हाच मोठा शिक्षक असतो. जी माणसं समाज बदलण्याचं काम करतात, लढे उभारतात, माणसांना चांगल्या कामाची स्फूर्ती देतात, निःस्वार्थीपणे काम करणाऱ्यांच्या फौजा उभ्या करतात, अशा माणसांवर कोण संस्कार करतं? त्यांच्या म्हणण्यानुसार, लहानपणी पालक, शिक्षक, आणखीही कोणी जवळची माणसं यांचं मार्गदर्शन होतं. पण ते काही काळच असतं. त्यांच्याकडून एक गोष्ट घडते की, या माणसांचे मन टिपकागद बनतो. आजूबाजूच्या घटना त्याच्यावर परिणाम करतात. ते संवेदनशील बनतात आणि त्या संवेदनेला प्रामाणिक प्रतिसाद देत ते मोठे होत जातात. गांधीजी म्हणत, ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे. ‘ त्यांनी स्वतः सफाईपासून राजकीय लढा उभारण्यापर्यंत सर्व कामं केली. सर्व कामं ते जीव ओतून करत, ते त्यांच्या आईवर कोणी कुठल्याही प्रकारचे गर्भसंस्कार केले नाहीत तरीही…

हातातलं काम जीव ओतून आणि चांगलंच करायचं हा संस्कार आपण मुलांवर करू शकतो. घरातलं काम करताना हे काम मुलाचं आणि हे काम मुलीचं असा भेद न करण्याचा संस्कार आपण घरातच करू शकतो. तसं घरात वातावरण असलं तर मुलांनाही ती सवय लागते. आई तिचं काम नीटनेटकं करते, तिच्या मनात उद्याचं प्लॅनिंग असतं. ‘डबा करायला विसरलेच! ‘, असं ती म्हणत नाही, बाबा त्यांचं काम मनापासून, जबाबदारीने करतो हे घरात पाहणारं मूल तसाच विचार करणार. मनापासून, जबाबदारीने याबरोबर ‘वेळेवर’ हेही महत्त्वाचं असतं. वेळेवर पोचण्यासारखे इतरही अनेक किरकोळ वाटणारे पण अतिशय उपयोगी संस्कार असतात. संस्कार साधेपणाचे असतात, कामाबद्दलचे असतात, पर्यावरणा-बद्दलचे असतात, साफसफाईचे असतात, पैसे योग्य प्रकारे वापरण्याचे असतात, माणसांशी वागण्याचे असतात, काटकसरीचे असतात, व्यायामाचे असतात, भाषेचेही संस्कार असतात. महत्त्वाची कागदपत्रं नीटनेटकी ठेवण्याचे असतात. पण लक्षात कोण घेतो? 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सिग्नलवरचा भारत… + संपादकीय निवेदन – डॉ. शैलजा करोडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

डॉ. शैलजा करोडे

💐 अ भि नं द न 💐

 

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका डॉ शैलजा करोडे यांचा निशीगंध हा ललित लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

डॉ शैलजा करोडे यांचा लेख  ‘सिग्नलवरचा भारत’ आज प्रकाशित होत आहे. 🪻

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

🌸 विविधा 🌸

☆ सिग्नलवरचा भारत ☆ डॉ. शैलजा करोडे

आज ट्रफिक जाम होतं. आॅफिसची वैळ असल्याने गर्दीत अजूनच भर पडली होती. अकरा वाजता माझी महत्वाची मिटींग होती, त्यामुळे सर्कल आॅफिसला वेळेत पोहोचणं महत्वाचं होतं. मी ड्रायव्हरला गाडी लवकर चालवण्याबद्दल बोलले. ” मॅडम कशी चालवणार हो. समोरची गाडी तर हालली पाहिजे. भरीत भर गाडीभोवती एक एक फेरीवाला नाहीतर भिकारी येत होता.

“मॅडम, ही खेळणी घ्या ना. स्वस्तात देईन.”

“नाही ग, मला नकोत खेळणी” “घ्या हो ताई, तुमच्या बाळासाठी” “माझ्या घरी कोणी लहान मूल नाही आहे. जा तू येथून” गाडी थोडी पुढे सरकली. एक दहा/बारा बर्षाचा मुलगा हातातील फडक्याने गाडी पुसू लागला. गाडी पुसली थोडीफार लगेच पैशांसाठी हात पुढे. तुला कोणी सांगितली रे गाडी पुसायला. दहा ₹ ची नोट त्याच्या हातात सरकवली.

थोड्या अंतराने एक बाई कडेवर मूल घेऊन भीक मागायला आली. “दे बाई, माझ्या लेकराला दे. कालपासून भूखी आहे” ड्रायव्हरने तिला पळवलं. प्रत्येक सिग्नलला गाडी थांबली कि लिंबूमिरची विकणारे, गाडीतील देवासाठी छोटा फुलांचा हार विकणारे, गाडी पुसण्यासाठी छोटे टाॅवेल, व अन्य सामुग्री विकणारे, गुलाबाची फुले विकणारे. , एकतर मिटींगचं टेन्शन, व वरून हा त्रास, मी वैतागले.

मुंबईत हजारोंच्या संख्येने लोकं येतात. दिवसा कमवतात. रात्री फूटपाथवर राहातात. काम नाही मिळाले भीक मागतात. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना भीकेला लावले जाते. म्हातारी माणसेही अशा गुंडाच्या हाती सापडतात व त्यांच्यासाठी भीक मागतात.

अशा गरजू भिखारी मुले व वद्धांना पैसे न देता पूर्ण जेवण देणे, आपले जुने कपडे देणे हे दान करावे. जेणे करून ह्या भिखारी जोपासणार्‍या टोळ्यांना आळा बसेल. भीक मागणारी मुले गुन्हेगारी प्रवत्तीचीही असतात, त्यांच्यासाठी संस्कार शाळा असाव्यात. कमवा व शिका योजने अंतर्गत त्यांना वसतिगृृृहात प्रवेश मिळावा व त्यांचे पुनर्वसन व्हावे.

एकांगी, एकलकोंडे वृध्दांनाही त्यांना झेपेल तसा रोजगार, वृृृध्दाश्रमात प्रवेश मिळावा.

शेवटी समाजातील हे वंचित पर्यायाने आमचीही जवाबदारी असल्याने आपल्याकडून होईल तेवढी मदत जरूर करावी

शेवटी जनसेवा हीच ईशसेवा, खरंय ना?

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares