☆ “स्वित्झर्लंड, लंडन की भारत?” – लेखक : डॉ. सुशांत पाटील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
… आपण कुठे जास्त सुखी आहोत?
आजकाल सोशल मीडियाच्या काळात आपल्याला अमेरिका, लंडन किंवा स्वित्झर्लंडचे फोटो पाहून वाटतं, “काय नशीब आहे या लोकाचं””! किती सुंदर बर्फ आणि किती स्वच्छ हवा!” पण मित्रांनो, एक डॉक्टर म्हणून आणि निसर्गाचा अभ्यासक म्हणून मी तुम्हाला सांगेन, ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.
आज आपण जगातील मोठ्या देशांची हवामान स्थिती आणि आपला भारत किती ‘नशिबवान’ आहे, याचा वास्तववादी आढावा घेऊया.
१. स्वित्झर्लंड: केवळ पर्यटनासाठी सुंदर, जगण्यासाठी कठीण!
स्वित्झर्लंड म्हटलं की डोळ्यासमोर येतो पांढराशुभ्र बर्फ. पण विचार करा:
गोठलेले आयुष्य: तिथे वर्षातील ७ ते ८ महिने कडाक्याची थंडी असते. जो बर्फ फोटोंमध्ये छान वाटतो, तोच बर्फ जेव्हा घराच्या दारासमोर ३-४ फूट साचतो, तेव्हा तो काढताना नाकी नऊ येतात.
शेतीचा अभाव: हवामानामुळे तिथे आपल्यासारखी विविध कडधान्ये, फळे किंवा भाजीपाला पिकवणे अशक्य आहे. त्यांना बहुतेक अन्नधान्य आयात करावे लागते.
२. लंडन (यूके): सूर्यप्रकाशासाठी आसुसलेले लोक लंडनच्या हवामानाचा भरवसा कोणीच देऊ शकत नाही.
नेहमीचा पाऊस: तिथे कधीही पाऊस पडतो, त्यामुळे लोक सतत छत्री घेऊन फिरतात. पण तो पाऊस आपल्यासारखा ‘चिंब भिजवणारा’ नसतो, तर तो हाडे गोठवणारा आणि ओलसर असतो.
विटामिन-डी ची कमतरता: तिथे कित्येक आठवडे सूर्यदर्शन होत नाही. यामुळे तिथल्या लोकांमध्ये हाडांचे आजार आणि ‘डिप्रेशन’ (उदासीनता) मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणूनच तिथे उन्हाळ्यात थोडा जरी सूर्य दिसला की लोक पार्क मध्ये धावतात.
३. अमेरिका: निसर्गाचा रुद्रावतार
अमेरिका हा देश जेवढा प्रगत आहे, तेवढाच तो नैसर्गिक आपत्तींनी घेरलेला आहे.
बर्फाची वादळे (Blizzards): अमेरिकेत जेव्हा बर्फाची वादळं येतात, तेव्हा वीज पुरवठा खंडित होतो, हीटिंग सिस्टम बंद पडते आणि लोक घरातच गोठून मृत्यू पावल्याच्या घटना दरवर्षी घडतात.
टोर्नेडो : तिथल्या काही राज्यांमध्ये इतकी भयानक चक्रीवादळं येतात की अख्खी घरं हवेत उडून जातात. अशा भीतीखाली जगण्यापेक्षा आपला भारत कितीतरी पटीने सुरक्षित आहे.
४. रशिया आणि कॅनडा: उणे ५० अंशांचा छळ
या देशांतील काही भागांत तापमान उणे ४० ते ५० अंशांपर्यंत जातं. तिथे साध्या पाण्याचा बर्फ व्हायला काही सेकंद लागतात. अशा ठिकाणी राहणं म्हणजे निसर्गाशी रोजचं युद्ध असतं.
मग आपला भारत ‘नशिबवान’ का?
आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राहणारे लोक खरंच भाग्याचे आहोत,
कारण:न मोजता मिळणारा सूर्यप्रकाश: आपल्याला वर्षभर मोफत ‘व्हिटॅमिन-डी’ देणारा सूर्य मिळतो, जो जगातील निम्म्या देशांना मिळत नाही.
मोजून चार-चार महिने: निसर्गाने आपल्याला बदलायची संधी दिली आहे. उन्हाळ्यात आपण आंबे खातो, पावसाळ्यात निसर्गाच्या हिरवाईचा आनंद घेतो आणि हिवाळ्यात आल्हाददायक वातावरणात काम करतो.
अतिरेक नाही: आपल्याकडे रशियासारखा हाडे गोठवणारा बर्फ नाही की दुबईसारखं अंगाची राख करणारं ऊन नाही. आपल्याकडे ‘मध्यम’ मार्ग आहे.
अन्नधान्याची श्रीमंती: आपल्या हवामानामुळे आपण वर्षातून ३-३ पिके घेऊ शकतो. ताज्या भाज्या, फळे जे आपल्याला सहज मिळतात, ते परदेशात ‘लक्झरी’ मानले जातात.
डॉक्टरांचा सल्ला:
परदेशाचे फोटो पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. आपण अशा भूमीत जन्माला आलो आहोत जिथे निसर्ग आपली ‘माय’ बनून काळजी घेतो, ‘वैरी’ बनून नाही. या सुवर्ण हवामानाचा आनंद घ्या, व्यायाम करा आणि निरोगी रहा.
लेखक: डॉ. सुशांत पाटील
(मोरया क्लिनिक, अक्कोळ)
संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४५ आणि ४६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
मश्लोक क्र. ४५ – – –
जयाचेनि संगे समाधान भंगे |
अहंता अकस्मात येऊनि लागे |
तये संगतीची जनी कोण गोडी |
जिये संगतीने मति राम सोडी |४५|
अर्थ :ज्यांच्या संगतीत मनाचे समाधान नष्ट होते आणि अहंकार वाढीस लागतो अशा लोकांची संगत चांगली नाही. ज्यांच्या संगतीत आपण बुद्धीने परमेश्वरापासून दूर जातो अशांच्या संगतीत राहण्यात गोडी ती कोणती ?
विवेचन :या श्लोकात समर्थांनी अप्रत्यक्षपणे सत्संगतीची महती सांगितली आहे. व्यवहारात आणि परमार्थातही संगत अतिशय महत्त्वाची असते. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचे गुण किंवा दोष आपल्याला लागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात …..
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला
कुसंगे नाडला साधू तैसा ||
हिरा अत्यंत कठीण असतो परंतु त्याला ढेकणाचे रक्त लागले की तो भंग पावतो असे म्हणतात. त्याप्रमाणेच दुर्जनांच्या संगतीत राहिले की साधू देखील बिघडतो एवढे संगतीचे महत्त्व आहे. ‘संगती संग दोषेंण’ असे म्हटले जाते. म्हणूनच मोरोपंत म्हणतात, ” सत्संगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो” व्यसनी माणसाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे आपल्यालाही व्यसन लागण्याची शक्यता असते. सतत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण राहत असू तर आपल्याला तसे वागणे योग्यच वाटायला लागते. श्रीमंत व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्यालाही तसेच श्रीमंत व्हावेसे वाटते. या सगळ्या अशा प्रकारच्या संगतीत आपण भगवंताला मात्र विसरतो आणि आपला अहंकार मात्र वाढत असतो. ‘मी ‘पणाला खतपाणी मिळते.
क्षमा हे वीराचे भूषण आहे. नम्रता हे विद्येचे भूषण आहे. गर्व नसणे हे श्रीमंतीचे भूषण आहे. परंतु ज्या माणसांना हे माहिती नसते त्यांचा अहंकार बळावतो. अशांच्या संगतीत राहिल्याने आपलाही अहंकार आपण जोपासत राहतो. संत कबीर यांचा एक दोहा फार सुंदर आहे…
‘बडें बडाई न करे, बडे न बोले बोल| हिरा मुख से न कहे, लाख टका मम मोल||
“मैं मैं” बडी बलाई है, सके निकल तो निकले भाग| कहे कबीर कब लग रहै, रुई लपेटी आग||’
समर्थ म्हणतात, “प्राप्त झालेले ज्ञान ‘अहंकारामुळे’ नष्ट होते. ” अहंकारामुळे काम, क्रोध आदी दुर्गुण वाढीस लागतात. वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीमुळे अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आर्थिक सुबत्ता आहे. परंतु शांतता आणि समाधान मात्र हरवलेले दिसते. आपल्याला त्यांची प्रगती जरी आकर्षक वाटली तरी त्यातील फोलपणा समजून घेतला पाहिजे.
तात्पर्य, ज्या संगतीने भगवंताचे नाम मुखात येऊन ते संगत म्हणजे सत्संगत ! सत्संगती धरली तर सद्गुणांची वृद्धी होऊन भगवद्कृपा प्राप्त होते.
स्वसंवाद ::
१) ज्या लोकांच्या सहवासात गेल्यानंतर मला अशांत वाटते किंवा स्वतःबद्दल उगाचच बडेजाव (मीपणा) मिरवावासा वाटतो, असे लोक माझ्या लक्षात येतात का ?
२)माझ्या मित्रांच्या किंवा परिचितांच्या वर्तुळात गेल्यानंतर आमचा संवाद भगवंताकडे/सद्गुणांकडे वळतो की केवळ परनिंदा आणि ऐहिक सुखांच्या गोष्टींकडे ?
३) श्रीमंतांच्या संगतीत स्वतःबद्दलचा न्यूनगंड आणि सत्ताधीशांच्या संगतीत वाढलेला माझा अहंकार मला जाणवतो का ? (हे देखील समाधान भंग पावण्याचे लक्षण आहे).
४) ‘अहंकाराचा वारा’ लागून माझी बुद्धी रामापासून (सत्यापासून) दूर जात आहे, हे ओळखण्याची सतर्कता माझ्यात आहे का?
– – – –
श्लोक क्र. ४६ – –
मना जे घडी राघवेवीण गेली |
जनी आपुली ते तुवा हानी केली |
रघुनायकावीण तो सीण आहे|
जनी दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे|४६|
अर्थ : हे मना, जो क्षण राघवाच्या स्मरणाशिवाय गेला त्याने तू आपले नुकसान करून घेतले असे समज. ज्या गोष्टीत रामाचे अधिष्ठान नाही अशा गोष्टी करणे म्हणजे व्यर्थ शीणणे असे समजून या जगात तू अत्यंत सावधपणे वावर.
विवेचन : श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. एक क्षणही आपण श्रीरामाच्या स्मरणाशिवाय घालवावा असे त्यांना वाटत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देखील हेच आपल्याला सांगतात. आपण जर स्वतःला साधक मानत असू आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला वाटचाल करायची असेल तर भगवंताच्या नामाशिवाय एक क्षणही व्यर्थ घालवू नये. असा वाया घालवलेला वेळ म्हणजे साधकाने आपले स्वतःचेच करून घेतलेले नुकसान.
आपल्याला दृश्य गोष्टी जास्त आकर्षित करतात. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे म्हणून त्याची ओढ आपल्याला वाटत नाही. त्यासाठीच संतांनी आपल्याला सगुण भक्ती करायला सांगितले आहे. डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आणि चित्तात त्याचेच ध्यान अशी साधकाची अवस्था असावी. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम अशी संत परमेश्वराला प्रार्थना करतात यासाठीच.
विज्ञानाच्या प्रगतीने आणि भौतिक समृद्धीने माणसाला ज्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यातच माणूस सुख मानतो. त्या प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय समजतो आणि ज्याने आपल्याला जन्म दिला त्या परमेश्वराला आपण विसरतो. भगवंताशिवाय आपल्या हिताचे कोणी नाही आणि उपासनेशिवाय आपल्याला पर्याय नाही हे साधकाने पक्के लक्षात ठेवले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीचे जीवनामध्ये कोणते तरी ध्येय असते हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला त्या ध्येयाचा विसर पडून चालत नाही म्हणजेच त्या ध्येयाकडे सतत लक्ष असावे लागते. ते साध्य होण्यासाठी दक्ष असावे लागते. परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त करणे हे विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यासाठी अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागते. इतर गोष्टींमध्ये आपला फार वेळ जाणार नाही याबाबत दक्ष असावे लागते. एखाद्याला उत्तम गायक व्हायचे असेल, तर त्याला रोजचा रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गळ्याचे आरोग्य बिघडणार नाही याबाबतीत त्याला दक्ष असावे लागते. थंड, तेलकट पदार्थ खाल्लेले त्याला चालत नाहीत.
त्याप्रमाणेच साधकाने देखील सदैव दक्ष असावे असे समर्थ म्हणतात. सर्वत्र सावधानता बाळगावी असा समर्थांचा आग्रह आहे. मग साधना मार्गावर तर सावधानता अत्यंत आवश्यक आहे. कारण साधकाला आपल्या मोहात पाडून त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यासाठी विवेक हवा.
रोज मी भगवंताच्या नामस्मरणासाठी किती वेळ देतो याचा विचार प्रत्येक साधकाने करायला हवा. आजकाल सगळ्या गोष्टी आपण अतिशय घाईने उरकतो. भगवंताची पूजा, नामस्मरण यासारख्या गोष्टी रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात. ज्या गोष्टी मनापासून किंवा समर्पण भावनेने केल्या जात नाहीत, त्या गोष्टी उपचार ठरतात. इतरही अनेक गोष्टींमध्ये आपण आपला वेळ घालवत असतो. परंतु समर्थ म्हणतात की भगवंताच्या स्मरणाशिवाय वेळ घालवणे म्हणजे आपली हानी आपण करून घेणे. तो केवळ ‘ सीण आहे ‘ म्हणूनच आपण आपला एक क्षणही परमेश्वराच्या स्मरणाशिवाय जाणार नाही याबाबत दक्ष असले पाहिजे.
स्वसंवाद (नवीन)
१) मी स्वतःला साधक मानतो का?
२) माझी पूजा, नामस्मरण या गोष्टी मनापासून होतात की केवळ रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात ?
३) ध्येयापासून विचलित करणाऱ्या कोणत्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत असे मला वाटते ? त्याबाबत मी खरोखर दक्ष आहे का ?
☆ “वन रुपी इडली ट्रस्ट” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
कोणीच घेत नव्हतं. वर्ष २०२६. एका रुपयात चॉकलेटही मिळत नाही—आणि इडली? लोक त्यांना वेडा समजून हसत होते.
माझं नाव अरविंद. मी एका Infosys सारख्या आयटी कंपनीत काम करतो. रात्रीची शिफ्ट संपवून घरी जात होतो. एसी गाडी, चांगली नोकरी… पण भूक लागली होती. स्टेशनवरील स्टॉलवर इडली ₹५० ला मिळत होती.
त्या आजोबांकडे लक्ष गेलं. टोपलीत साधारण १०० इडल्या. एकही ग्राहक नाही. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं.
मी खाली उतरलो.
“आजोबा, एक रुपयाला इडली? तोटा होत नाही का?”
ते हसले.
“बाळा, हा तोटा नाही. हा नफा आहे. ”
“कसा आजोबा? तांदूळ, गॅस, सगळ्याचे भाव वाढले. एक इडली किमान ₹५ ला पडते. तुम्ही ₹१ ला विकता?”
ते टोपली बंद करून म्हणाले,
“एक गोष्ट सांगतो. ”
“१९७५ साल. मी २५ वर्षांचा. रेल्वेत हमाल होतो. महिन्याला ₹१०० पगार. एक दिवस जोरदार पाऊस. काम नाही. पैसे नाहीत. सलग ३ दिवस उपाशी. स्टेशनच्या बाकावर बेशुद्ध पडलो. ”
“तेव्हा एक बाई आली—ती प्लॅटफॉर्मवर इडली विकायची. एक रुपयाला. तिने मला उचललं, पाणी शिंपडलं, ४ इडल्या खायला दिल्या. पैसे विचारले नाहीत. ”
“मी रडलो… म्हणालो, माझ्याकडे पैसे नाहीत. ती म्हणाली— ‘बाळा, मीही एकदा अशीच उपाशी होते. कुणीतरी मला खायला दिलं. म्हणून मी व्रत घेतलं—मरेपर्यंत एक रुपयाला इडली विकणार, जेणेकरून भुकेल्याला अन्न मिळेल. तूही मोठा झालास की एखाद्या भुकेल्याला खाऊ घाल. ’”
आजोबांनी डोळे पुसले.
“ती १९९५ मध्ये गेली. शेवटच्या क्षणी माझा हात धरून विचारलं—‘वचन पाळशील ना?’ मी हो म्हटलं. ”
“त्यानंतर मी रेल्वेचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. चांगले पैसे कमावले. तीन घरे. दोन मुलं. दोघेही United States मध्ये. पण १९९५ पासून आजपर्यंत—दररोज पहाटे ३ वाजता—१०० इडल्या. एक रुपया. याच स्टेशनवर. ३० वर्षे. ”
माझ्या अंगावर काटा आला.
“आजोबा… रोज ₹४०० तोटा. महिन्याला ₹१२, ०००. वर्षाला ₹१. ५ लाख. ३० वर्षांत ₹४५ लाख!”
ते शांतपणे म्हणाले,
“पैशाने पाहिलं तर तोटा. मनाने पाहिलं तर नफा. ३० वर्षांत किती लोकांना खाऊ घातलं असेल? १० लाख इडल्या. १० लाख पोटं. १० लाख आशीर्वाद. त्याची किंमत किती कोटी?”
इतक्यात एक १२ वर्षांचा मुलगा धावत आला. फाटका शर्ट.
“आजोबा… इडली… ३ दिवसांपासून काही खाल्लं नाही. आई हॉस्पिटलमध्ये. पैसे नाहीत. ”
आजोबांनी ४ इडल्या पानात ठेवल्या, चटणी घातली.
“हळूहळू खा बाळा. ”
तो मुलगा खात होता… आणि रडत होता.
“उद्या पैसे देतो…”
“नको. तू मोठा झाल्यावर एखाद्या भुकेल्याला खाऊ घाल. तेवढंच पुरे. तीच किंमत. ”
तो मुलगा त्यांच्या पाया पडला.
“वचन देतो आजोबा. मीही एक रुपयाला इडली विकेन. ”
मी ₹१००० ची नोट काढली.
“आजोबा, कृपया… सगळ्या इडल्या मी घेतो. ”
ते हसले.
“या एका माणसासाठी नाहीत. भुकेल्यांसाठी आहेत. तुला भूक असेल तर एक इडली घे. एक रुपया ठेव. ते पुरे. ”
मी ₹१ ठेवलं. एक इडली घेतली. आयुष्यात खाल्लेली सर्वात चविष्ट इडली होती. डोळ्यांत पाणी आलं.
मी विचारलं,
“तुमच्या मुलांना काही वाटत नाही? पैसे वाया जातात असं?”
त्यांनी फोन काढला. व्हिडिओ कॉल. मुलगा अमेरिकेत.
“अप्पा, इडल्या विकल्या? तब्येत कशी? डॉक्टर काय म्हणाले?”
“ठीक आहे. आज एक तरुण भेटला. गोष्ट ऐकली. ”
त्यांचा मुलगा माझ्याकडे पाहून हसला.
“सर, धन्यवाद. कृपया माझ्या वडिलांची काळजी घ्या. आम्ही दर महिन्याला ₹५०, ००० पाठवतो—इडल्यांसाठी. त्यांची इच्छा म्हणजे आमचं भाग्य. त्यांचं व्रत म्हणजे आमचं व्रत. ”
आजोबा म्हणाले,
“पाहिलंस? माझी मुलंही वचन पाळत आहेत. मी गेल्यावरही ही टोपली थांबणार नाही. एक रुपयाची इडली थांबणार नाही. ”
आज २०२६ आहे. ते आजोबा आता हयात नाहीत. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. जाण्यापूर्वी त्यांनी माझा हात धरून सांगितलं—
“बाळा, टोपली सांभाळ. वचन पाळ. ”
आता दररोज पहाटे ३ वाजता, त्याच बाकावर, Chennai Central railway station मध्ये मी बसतो. टोपलीभर इडल्या. एक रुपया.
मी नोकरी सोडली नाही. पण रोज २ तास… इडल्यांसाठी देतो.
माझ्या कंपनीत २०० कर्मचारी आहेत. प्रत्येक जण महिन्याला ₹१०० देतो.
“वन रुपी इडली ट्रस्ट. ”
तो १२ वर्षांचा मुलगा—गणेश—आता बारावीत शिकतो. संध्याकाळी येतो आणि मदत करतो.
“अण्णा, मीही वचन घेतलं आहे. मोठा झाल्यावर मीही हेच करणार. ”
मित्रांनो, पैसा कमावणं मोठेपण नाही. पैशाचा उपयोग करून पुण्य कमावणं हे खऱ्या अर्थाने मोठेपण आहे.
घरात मुलं असतील तर एक छोटा डबा ठेवा.
“₹१ ची पेटी. ”
दररोज ₹१ टाकायला सांगा. महिन्याला ₹३० होतील. त्या पैशातून एखाद्या भुकेल्याला जेवण द्या.
कारण तुमच्यासाठी ₹३० कदाचित किरकोळ खर्च असेल…
पण कोणासाठी तरी ते ३० दिवसांच्या अन्नासारखं असू शकतं.
एक संकल्प करा — किमान एका भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या.
पैसा जाईल… पण पुण्य राहील.
टोपली रिकामी होईल… पण मन भरून जाईल.
लेखक : अज्ञात
संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४३ आणि ४४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ४३ – – –
मना सज्जना एक जीवी धरावे|
जनी आपुले हीत तुवा करावे|
रघूनायकावीण बोलो नको हो |
सदा मानसी तो निजध्यास राहो|४३|
अर्थ :हे सज्जन मना, आपल्या जीवाशी एक खूणगाठ बांधून ठेव. जीवनामध्ये आपले तू कल्याण करून घे. एकदा भगवंताशिवाय अन्य गोष्टी बोलण्याचे सोडून दे. सदासर्वदा आपल्या मनाला त्याचाच ध्यास लागू दे.
विवेचन :आपले कल्याण व्हावे ही समर्थांची तळमळ मनाच्या श्लोकांमध्ये ठायी ठायी जाणवते. म्हणून पुनरुक्तीचा दोष पत्करून काही गोष्टी ते पुन्हा पुन्हा सांगतात. आपल्या मनाला उपदेश करताना ते म्हणतात, ” हे सज्जन मना, एक गोष्ट आपल्या जीवाशी निश्चित करून ठेव. तुला जर तुझे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुनायकाचा म्हणजे भगवंताचा ध्यास घे. त्याच्याशिवाय दुसरे काही बोलू नको. “
व्यवहारात आपल्या वाणीला म्हणजे बोलण्याला अतिशय महत्त्व असते. आपल्या बोलण्यावरून आपले व्यक्तिमत्व लोकांना समजते. म्हणून व्यवहारात लोकांशी आवश्यक तेवढे बोलावेच लागेल. व्यवहार सोडता येणार नाही. समर्थांनी देखील “आधी प्रपंच करावा नेटका” असे सांगितले आहे. पण जेव्हा व्यवहारातील बोलणे संपेल तेव्हा आपल्या मुखातून भगवंताचे नामच बाहेर पडले पाहिजे. असे नाम सातत्याने येण्यासाठी मनामध्ये त्याचा विचार हवा कारण जसा विचार, तसा उच्चार आणि तसा आचारही होतो.
हा झाला बाह्य आचार. एक वेळ मुखात भगवंताचे नाम येणे, भगवंताबद्दल बोलणे सहज जमू शकते. पण आपल्या अंतरंगात भगवंताचे अनुसंधान टिकवणे सोपे नाही. त्याच्यासाठी सतत जागेपणी जेवढे शक्य होईल तेवढे भगवंताचे नाव घेत राहण्याचा अभ्यास करायला हवा. इंग्रजी शब्दांचा वापर करून सांगायचे झाले तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन भगवंताच्या नामाचा ध्यास असायला हवा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात तुम्ही जागेपणी मनाला नाम घेण्याची सतत सवय लावून घ्या. एकदा हे साधले की मग तुमच्या झोपेत किंवा तुमच्या आजारपणात देखील आपोआप हे नाम घेतले जाईल.
हे विवेचन वाचत असताना आपल्याला असे वाटेल की हे म्हणजे फारच झाले व्यवहारात आपल्याला एवढे शक्य नाही. परंतु समर्थांचे हे सांगणे आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठीच आहे. आपण भगवंताचे नाम का घ्यायचे ?त्याची भक्ती का करायची ? तर आपण साधना मार्गावर चालणारे साधक आहोत. सुरुवातीलाच समर्थांनी आपल्याला “गमू पंथ अनंत या राघवाचा” असे सांगितले आहे. ही गोष्ट एकदा मान्य केली की मग समर्थांचा उपदेश सहज पचनी पडतो.
जसे रोग्याला डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळणे त्याच्या हिताचे असते, तसेच साधकाला देखील काही गोष्टींची पथ्ये असतात. ती त्याने सांभाळायला हवीत. तुकाराम महाराज म्हणतात, ” जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी. ” आपण साधक आहोत आणि परमेश्वराची प्राप्ती हे आपले साध्य आहे. हे जीवनध्येय एकदा ठरले की मग पुढील वाटचाल सोपी होते. परमेश्वराच्या नामात रममाण व्हायचे की लोकांमध्ये मिसळून आपला वेळ अन्य गोष्टींमध्ये व्यर्थ घालवायचा ? यातील कोणती गोष्ट निवडायची हे खऱ्या साधकाला सांगावे लागत नाही. आपल्या परमार्थाला हानिकारक होतील अशा गोष्टींपासून खरा साधक दूरच राहतो. “विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो… ” असे संत नामदेव म्हणतात. तसेच आपलेही झाले पाहिजे.
स्वसंवाद ::
१) माझ्या दिवसातील किती वेळ भगवंताचे नाम किंवा विचार माझ्या मनात असतो – प्रामाणिकपणे सांगायचे तर किती टक्के ?
२) “जसा विचार, तसा उच्चार, तसा आचार” – माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का ?
३) साधकाला पथ्य असते – माझ्या परमार्थाला हानिकारक कोणती सवय मी अजून सोडलेली नाही ?
४) गोंदवलेकर महाराज म्हणतात जागेपणी नामाची सवय लावा – मी आज या क्षणापासून हे सुरू करण्यास तयार आहे का ?
– – – –
श्लोक क्र. ४४ – –
मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी |
कथा आदरे राघवाची करावी |
नसे राम ते धाम सोडोनी द्यावे |
सुखालागि आरण्य सेवीत जावे |४४|
अर्थ :हे मना, समाजात वावरताना शक्यतो मौन धारण करावे. बोलायचेच झाले तर अत्यंत आदराने श्रीरामाचे गुणगान करावे. ज्या ठिकाणी श्रीरामाबद्दल म्हणजेच भगवंताबद्दल प्रेम नाही अशा ठिकाणी राहू नये. ते ठिकाण तत्काळ सोडून द्यावे. भगवंताच्या नामातील सुख प्राप्त करण्यासाठी खुशाल अरण्यात जाऊन राहावे.
विवेचन : मन म्हणजे विचार करणे. ज्याला मन आहे तो माणूस ! म्हणजेच जो विचार किंवा चिंतन करू शकतो तो माणूस होय. मौन हा शब्द देखील मन या धातूपासून तयार झाला आहे. केवळ न बोलणे म्हणजे मौन नव्हे तर ज्याच्या अंतरात भगवंताच्या नामाचे चिंतन सुरू आहे आणि अन्य काही बोलण्याची ज्याला आवश्यकता राहत नाही अशी गोष्ट म्हणजे मौन. अशी व्यक्ती केवळ भगवंताचे गुणगान करण्याकरताच बोलते. त्याचीच कथा सांगते.
मौनाचा हा अर्थ साधकांसाठी सांगितला आहे. अनेक लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी सोयीस्कर मौन धारण करतात. त्या अर्थाने मौन हा शब्द इथे अपेक्षित नाही. “मौनम् सर्वार्थ साधनं” असे एक प्रसिद्ध संस्कृत वचन आहे. मौनाने सर्व काही साध्य होते असा त्याचा अर्थ आहे. जे लोक मौन पाळतात आणि वायफळ बडबड करत नाहीत, अशांच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होते. आपण बोलून जे साध्य करू शकत नाही ते मौनाने साध्य होते. अशा वेळी मौन हेच शस्त्र आणि शास्त्र ठरते. सतत बडबड करणाऱ्या लोकांच्या बोलण्याला लोक फारशी किंमत देत नाहीत.
काही अपवादात्मक साधुसंत खरोखरच साधनेसाठी मौन धारण करतात. परंतु बरेचसे साधू मौन तर धारण करतात, परंतु त्यांच्याकडे कोणी आले आणि त्यांना काही विचारले तर ते हातवारे करून बोलतात किंवा आपले म्हणणे पाटीवर लिहून सांगतात. काही साधुसंतांनी मौनाच्या काळात ग्रंथ देखील लिहिल्याचे ऐकण्यात येते. असे मौन खऱ्या अर्थाने पूर्ण मौन म्हणता येणार नाही.
समर्थांनी जनी मौन्यमुद्रा धरावी असे म्हटले आहे. एक वेळ एकांतातील मौन सोपे आहे परंतु भोवती लोकांची गर्दी असताना सोपे नाही. विपश्यना शिबिरात तर खुणेने देखील बोलायचे नसते. अशा ठिकाणी माणसे दहा दिवस कसाबसा धीर धरतात. परंतु एकदा शिबिर संपले की दहा दिवसांची भर काढून घेतात.
जो खरा साधक असतो तो भगवंताच्या चिंतनात अंतर्बाह्य बुडालेला असतो. त्यामुळे त्याला इतर अनावश्यक बडबड करण्याची आवश्यकता भासत नाही. तो जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या वाणीने भगवंताच्या गुणांचे वर्णन करतो, भगवंताचे कीर्तन करतो.
जेथे त्याला सुखाने राहून भगवंताचे गुणगान करता येते असे ठिकाण म्हणजे त्याच्या दृष्टीने स्वर्ग. परंतु अशीही काही ठिकाणी असतात की जेथे भगवंताचे चिंतन नामस्मरण केलेले आवडत नाही. भगवंताला न मानणारी माणसे अशा ठिकाणी राहतात. अशा ठिकाणी खऱ्या भक्ताला राहणे कठीण होते. अशा ठिकाणी त्याचा आणि भगवंताचा देखील अवमान होतो. म्हणून ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो आहे, निंदा होते आहे असे दिसले तर ते ठिकाण तत्काळ सोडावे.
अशाप्रसंगी वनात जाऊन देखील राहण्यास हरकत नाही तेथे सुखाने भगवंताचे नाम घेता येते त्याच्या स्मरणात राहता येते संत तुकाराम महाराज म्हणतात, ” येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप, पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. ” साधकाला मग अशा एकांतातील सुख अनुभवता येते कुठलाही व्यत्यय न येता परमेश्वराचे नामस्मरण घडते. परमेश्वराच्या चिंतनासाठी अनेक संतांनी जनामध्ये राहणे सोडून वनामध्ये निवास केला त्याचे कारण हेच आहे.
सध्या काळ बदलला आहे. हल्ली समर्थांच्या सांगण्याप्रमाणे वनात जाऊन निवास करणे सर्वसामान्य माणसांसाठी सोपे नाही. हल्ली रोजच्या व्यवहारात शांतता मिळणे कठीण झाले आहे. तीर्थस्थानांना देखील बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. जिथे सुखाने भगवंत चिंतन करता येईल अशा जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी आरण्य सेवन याचा अर्थ एकांत सेवन असा घ्यायला हरकत नाही. ज्या ठिकाणी सुखाने आपल्याला हरीचे नाम घेता येईल असे ठिकाण म्हणजे अरण्यच असे म्हटले तर हरकत नाही.
स्वसंवाद ::
१) माझ्या बोलण्यात किती वेळ भगवंताचे गुणगान असते आणि किती वेळ निरर्थक गोष्टी असतात ?
२) मला भगवंत चिंतनासाठी मौन आवश्यक आहे ही गोष्ट पटते का ?
३) ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो अशा ठिकाणी राहणे मला जड जाते का, की मी त्याशी तडजोड करतो ?
४) माझ्या दैनंदिन जीवनात “आरण्य” म्हणजे एकांताची जागा कोणती आहे आणि मी ती नियमितपणे वापरतो का ?
अंबानीही रांगा लावतात ते सिद्धिविनायक मंदिर कुणी बांधलंय माहितीये_ इतिहास ऐकून रडू येईल!
आज कोट्यवधी भक्तांच्या पदरात सुख टाकणारं मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर… एका अशा मराठी माऊलीने बांधलंय, जिला स्वतःला कधीच आई होता आलं नाही!
१९ नोव्हेंबर १८०१ रोजी दादर-प्रभादेवीत _देऊबाई पाटील आणि लक्ष्मण विठू पाटील या सधन आगरी-कोळी दांपत्याने स्वतःच्या पैशाने हे मंदिर बांधलं. देऊबाईंना स्वतःला मूलबाळ नव्हतं. वांझोटी म्हणून समाजाने दिलेले टोमणे त्यांनी निमूटपणे सहन केले. पण, जे दुःख माझ्या वाट्याला आलं, ते इथल्या इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, बाप्पाने प्रत्येकीची ओटी भरावी याच एका उदात्त हेतूने त्यांनी हे सिद्धिविनायकाचे मंदिर उभारले !
आज याच मंदिरात अंबानींपासून ते सुपरस्टार्सपर्यंत सगळेच अनवाणी पायाने रांगा लावतात. पण स्वतः मातृत्वाला पारख्या झालेल्या आणि कोट्यवधी लोकांना आशेचा किरण देणाऱ्या या मराठी माऊलीचा इतिहास मात्र कुठेतरी हरवलाय.
– – हा अंगावर काटा आणणारा इतिहास बाप्पाच्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचलाच पाहिजे !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अर्थ: भक्ती (प्रेमरूप भक्ति) एकच असूनही ती अकरा प्रकारे प्रकट होते. श्रीमहाराज एका ठिकाणी भक्ति बद्दल म्हणतात, “प्रपंचात जशी आसक्ति, तशी भगवंतावर प्रीती, त्या नाव भक्ति. “ प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असल्याने प्रत्येक व्यक्तीची आसक्ति कुठे असेल ते सांगणे कठीण आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याने आपापल्या आसक्तीचा विचार करून, त्या आसक्तीला भगवंताकडे वळविता आले की त्याचे अर्धे काम झाले असे म्हणता येईल. श्रीमहाराज म्हणायचे की भगवंताशी काहीतरी नाते जोडावे. त्याला भाऊ, बहीण, आई, बाबा, पुत्र किंवा अन्य कोणतेही. त्याचा भक्तिमार्गात खूप उपयोग होतो.
आसक्तीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
गुण माहात्म्यासक्ति :
भगवंताचे गुण, महिमा, दया, करुणा, सौंदर्य, सामर्थ्य इ. श्रवण करून, मनन करून त्याच्यावर प्रेम करणे. नारद मुनी आणि महर्षी व्यास यांची भक्ति वरील प्रकारात मोडते.
रूपासक्ति :
भगवंताच्या सुंदर स्वरूपावर प्रेम करणे. त्याच्या मूर्तीचे, दर्शनाचे, सौंदर्याचे चिंतन करणे. गोकुळातील गोपींची भक्ति या प्रकारची आहे असे मानले जाते.
पूजासक्ति :
भगवंताची सेवा, पूजा, आरती, अभिषेक, अलंकार इत्यादींमध्ये प्रेम वाटणे.
स्मरणासक्ति :
सतत भगवंताचे नामस्मरण, गुणस्मरण, लीला चिंतन करणे हेच जीवनाचे ध्येय मानणे.
दास्यासक्ति :
आपण भगवंताचे सेवक आहोत, ही भूमिका घेत त्याची सेवा करणे.
सख्यासक्ति :
भगवंताशी मित्रभाव ठेवून त्याच्याशी मनमोकळा संवाद साधणे.
वात्सल्यासक्ति :
भगवंताच्या लीलांचे बालरूप धरून त्याच्यावर आई-वडिलांसारखे प्रेम करणे.
कान्तासक्ति :
भगवंतावर पतीप्रेमासारखे गाढ, उत्कट, अनन्य प्रेम करणे.
आत्मनिवेदनासक्ति :
स्वतःचे सर्वस्व भगवंताला अर्पण करणे. “तूच सर्वकाही आहेस, मी नाहीच” असे मनोधारणे.
तन्मयतासक्ति :
भगवंतात इतके एकरूप होणे की स्वतःचा विसर पडणे.
परमविरहासक्ति :
भगवंताच्या वियोगाने अतीव तगमग, विरह, वेदना याचा अनुभव घेणे.
समर्थ रामदास भक्तीचे नऊ प्रकार सांगतात.
भक्ती एकच असते ते भगवंतावरचे प्रेम. पण “व्यक्ती तितक्या प्रकृती” या उक्तीप्रमाणे भक्तीचे अनंत प्रकार होऊ शकतात.
“जशी भक्ताची भावना, तशी त्याची भक्तीची अभिव्यक्ती!”
जय जय रघुवीर समर्थ
– – – –
भक्ति सूत्रे ८३ – –
“इत्येवं वदन्ति जनजल्पनिर्भयाः एकमताः कुमार व्यास शुक शाण्डिल्य गर्ग विष्णु कौण्डिण्य शेषोद्धवारुणि बलि हनुमद् विभीषणादयो भक्त्याचार्याः ॥ ८३॥”
अर्थ : सनत्कुमार, वेदव्यास, शुकदेव, शाण्डिल्य, गर्ग, विष्णु, कौण्डिन्य, शेष, उद्धव, अरुणि, बलि, हनुमत्, विभीषण आदि भक्तीचे आचार्य लोकांच्या निंदा स्तुतीची पर्वा न करता (भीती न बाळगता) एकमताने असेच सांगतात की भक्तीच श्रेष्ठ आहे.
विवेचन : भक्तीमार्ग हा एक प्राचीन, समन्वयपूर्ण आणि अनुभवाधारित भगवंत प्राप्तीचा मार्ग आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारद मुनींनी ही सूत्रे लिहिली आहेत, ती त्यांच्या अनुभूतीची आहेत. भक्तीची रचना त्यांनी केलेली नाही, त्या आधीच्या ऋषि आणि पूर्वसुरींनी भक्तिशास्त्राची रचना केली. आणि ती परंपरेने आपल्यापर्यंत आलेली आहे. हा मागील कालावधी एका अर्थाने अनंत असा आहे. या भक्तिमार्गाचे काही प्रमुख आचार्य आहेत, त्यांची नावे वरती दिलेली आहेत. आपण या सर्वांना भक्तिमार्गाचे प्रमुख “वारकरी” (वाहक, प्रचारक) म्हणू शकतो. भक्तीच्या या पवित्र मार्गावर चालताना लोकांच्या टीकेची भीती न बाळगता भगवंताच्या प्रेमाला प्राधान्य देत निष्ठेने भक्ती करणे हे जीवनाचे सार आहे.
ज्या प्रमुख वारकऱ्यांचा उल्लेख नारद महर्षींनी केला आहे, त्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात आपण समजून घेऊ.
सनत्कुमार:
महाविष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टि रचनेचा संकल्प केल्यावर प्रथम सनक, सनंदन, सनातन, सनातकुमार हे चार कुमार प्रकट झाले. हे नारद मुनींचे सद्गुरू. भक्तिशास्त्राच्या आचार्यांचे वर्णन करण्याआधी नारद महाराज आपल्या सद्गुरुंचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करीत आहेत.
व्यास :
महर्षी नारद हे कीर्तन कलेचे उद्गाते आहेत, तसे वेदव्यास हे प्रवचन कलेचे उद्गाते मानले जातात. जिथे कीर्तन केले जाते त्याला नारदाची गादी म्हटले जाते तर जिथे प्रवचन केले जाते त्याला व्यासपीठ असे संबोधले जाते. व्यास हे एक महान ऋषी. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलेज संपादन केले. त्यांनी महाभारतादि अनेक ग्रंथ लिहिले. पण इतके सारे लिहून त्यांना समाधान लाभले नाही. मग सद्गुरू नारद मुनींनी महर्षी व्यासांना भगवंताचे गुणवर्णन करणारे भागवत त्यांना लिहायला सांगितले. भागवत लिहिल्यावर त्यांना मनःशांती लाभली असे वर्णन आहे.
शुक :
व्यासांचे पुत्र, ते जन्मतःच वैराग्य संपन्न होते. श्रीमद्भागवताचे ते आद्य वक्ते मानले जातात. त्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितले.
शाण्डिल्य :
शाण्डिल्य ऋषींची भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. नारद मुनींनी त्यांचा उल्लेख 18व्या सूत्रात केला आहे.
गर्ग :
कृष्णाचे नामकरण करणारे ऋषी. यांनी सुद्धा भक्ति सूत्रे लिहिली होती, पण काळाच्या पोटात ती गडप झाली असे म्हणावे लागते.
विष्णु :
हे एक महान ऋषी होऊन गेले. त्यांची अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.
कौण्डिन्य :
धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्याचे प्रमुख कौडिन्य ऋषी होते असा उल्लेख आढळतो.
शेष :
क्षीरसागरात महाविष्णू शेषावर शयन करतात. लक्ष्मणाला शेषाचा अवतार मानले जाते.
उद्धव :
यादव कुळातील हा कृष्णाचा परमभक्त. गोपींनी त्याला भक्ति शिकवली.
आरुणि :
छादोंग्य उपनिषदात यांचा उल्लेख आहे.
बलि :
भक्त श्रेष्ठ प्रल्हाद यांचा मुलगा विरोचन यांचा हा मुलगा. हा महान भक्त होता. वामन अवतारात त्याला पाताळाचे राज्य भगवंताने त्याला देऊ केले.
हनुमान :
एका शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ते असे करता येईल… रामदास (हनुमान).
बिभीषण : रावणाचा भाऊ. महान भक्त. रामभक्तीने चिरंजीव पद प्राप्त केले.
– – या सर्व महान भक्तांच्या चरित्राचे स्मरण करून प्रत्येकाने या पवित्र अशा भक्तिमार्गावर अनुसरण करायचा प्रयत्न करावा.
जय जय रघुवीर समर्थ
– – – – –
भक्ति सूत्रे ८४ – –
“य इदं नारदप्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिति श्रद्धत्ते स प्रेष्ठं लभते स प्रेष्ठं लभत इति ॥ ८४॥”
अर्थ : जो मनुष्य नारदांनी सांगितलेली ही शिवमय, कल्याणकारक शिकवण (भक्तिमार्ग) श्रद्धेने व विश्वासाने स्वीकारतो, तो सर्वोत्तम असलेल्या भगवंताची प्राप्ती करतो.
विवेचन : भक्ति करणे जरी शास्त्र असले तरी भक्ति करायला सांगणे, सुचवणे हा उपदेश नव्हे.
भक्ति हे गुह्य ज्ञान आहे. ते सुलभ साध्य आहे, पण सहजसाध्य नाही. इथे वाचकांचा घोळ होऊ शकतो. निसर्गात हवा आहे आणि ती सर्वांना सुलभ आणि सहज साध्य आहे. पण भक्तीच्या बाबतीत थोडा वेगळा विषय आहे. भक्ति करण्यासाठी कोणतीही अट नाही, पण ती करावी लागते, त्यासाठी काही अथवा किमान नीतीनियम पाळावे लागतात. तसे हवेच्या बाबतीत म्हणता येत नाही. प्रयत्न केले, सांगितलेले नीती नियम पाळले तर भक्तीची प्राप्ती सुलभतेने होऊ शकेल.
“जितकी भक्ति तितकी प्राप्ति” हे सूत्र आपण पाहिले आहे. नारद महाराज स्वतः ठामपणे सांगतात की, जो भक्तीच्या या मार्गावर श्रद्धा ठेवतो, तो “प्रेष्ठं”( सर्वोत्तम गोष्ट) ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
या जगात आपण नव्हतो, तेव्हा भगवंत होता. आज आपण आहोत, भगवंत आहे. उद्या कदाचित आपण नसू, पण भगवंत नक्कीच असेल. कारण न बदलणारा एकमेव भगवंत आहे. तो आपल्याच नव्हे तर चराचर सृष्टीच्या अंतर्यांमी तो स्थित आहे. त्याला जाणून घेणं हे मनुष्य जन्माचे खरे उद्दिष्ट आहे. आपल्याला नरदेह लाभला आहे तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. अन्यथा, आपण जन्ममरणाच्या चक्रात फसलेले आहोत, यातून बाहेर पडण्यासाठी भक्तिमार्गासारखा सुलभ मार्ग नाही.
महर्षी नारद ऋषींनी सामान्य मनुष्याचे दुःख दूर होण्यासाठी, नव्हे तर प्रत्येक मनुष्याला शाश्वत सुखाचा मार्ग मिळावा म्हणून ही परमप्रेमा भक्ति सांगितली आहे.
माझ्या सारख्या अल्पमती मंदबुद्धि असलेल्या मनुष्याने नारद भक्ति सूत्र विवेचनाचे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस केले ते माझ्या सद्गुरूंच्या आधाराने. हे विवेचन करण्यात जी काही त्रुटी राहिली असेल ती माझी आहे आणि जे काही चांगले असेल तो मात्र माझ्या श्रीमहाराजांचा कृपाप्रसाद आहे अशी माझी श्रद्धा आहे. आपण हा कृपा प्रसाद गोड मानून घ्यावा आणि भक्तीमार्ग आचरावा.
भस्मासूराची राखरांगोळी करण्यासाठी हृदयात अग्निचा संचार व्हावा लागतो… आणि हा अग्नी प्रज्वलित व्हावा यासाठी मुखाने त्या अग्नीला आवाहन करावे लागते… मरणावर चालून जाताना एकाच वेळी हजारो मुखांतून ज्वाला माता की जय! असा जयकारा उच्चारला जातो… आणि उर्वरित कार्यभार अग्नी देवता तिच्या शिरावर घेते!
भारतीय सैन्यातील Gentlemen Warriors अर्थात सभ्य, सुसंस्कृत लढवय्ये अशी ख्याती असलेले डोग्रा सैनिक जेंव्हा सैनिकी कारवाईस निघतात, आनंदाचे क्षण साजरे करतात तेंव्हा त्यांची पहाडी गर्जना असते… ज्वाला माता की जय!
जळी, स्थळी, अग्नी आणि पाषाणी आपल्या देवता वास करतात! पाषाण कितीही कठीण असला तरी त्याच्यातून भावनांचा झरा प्रवाहित करण्याची मानवी मनांत शक्ती असते. आभाळातून बर्फ पडतो हे जरी खरं असलं तरी त्या बर्फाने मनातल्या शिवलिंगाचं दृश्य स्वरूप धारण केलं तर तो बर्फच शिवस्वरूप होऊन जातो! अग्नीचं तरी काय निराळं असतं… प्राणिसृष्टि सदैव सचेतन राखण्यासाठी जे चैतन्य आवश्यक असतं त्यासाठी अग्नीच कारणीभूत. अशावेळी या अग्नीची एक पुसटशी ज्वालासुद्धा देवता बनते!
अग्नी प्रज्वलित होण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते हे कुणीही नाकारणार नाही, पण या इंधनाचा स्रोत, त्याची निर्मिती कुणीतरी करत असेलच… आणि निर्मितीचे पितृत्व निसर्गाच्या भाळी स्पष्टपणे गोंदवलेलं दिसतं!
सुमारे हजार वर्षांपूर्वी देवभूमी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एका पर्वताच्या पायथ्याशी एकाच वेळी नऊ ज्वाला प्रकटल्या असं इतिहास सांगतो… आणि हे उघड्या डोळ्यांना दिसतं… आणि स्पर्शाला जाणवतं!
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि सामूहिक मानसशास्त्र यांच्यात मानवी मनाची शक्ती अजेय ठरते. एखाद्या घटनेचा अर्थ कसा लावायचा ते समूह ठरवतो… आणि त्याचा निर्णय शिरसावंद्य मानला पाहिजे, असा संकेत आहे!
भूगर्भातून वायू उत्सर्जित होत राहतो आणि त्याला अग्निचा स्पर्श घडल्यास त्यातून ज्योत उमलते हे साहजिकच. परंतु एवढ्या मोठ्या प्रदेशात, विशिष्ट ठिकाणी असं घडणं याला दैवी चमत्कार अशी संज्ञा प्राप्त होणंही काही आश्चर्याचं नाही.
मनातील भावनांच्या ज्योती मालवून टाकणं शक्य नसतं. भौतिक ज्योत फुंकून टाकता येते… पण इथं तर तेही शक्य झालेलं नाही आजवर. तरवारीच्या जोरावर तसं करूनही बघितलं गेलं… पण ज्योती आजही लवलवत आहेतच. भूगर्भ वायूतज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून पाहिले आहेत. किमान याक्षणापर्यंत तरी कुणाला स्रोत समजला नाही… ! असो.
मानवी बुद्धीच्या, आकलन शक्तीच्या पल्याड बरंच काही असतं. एखाद्या श्वानाला जो गंध जाणवतो तो विकसित मानवी घ्राणेंद्रिय टिपू शकत नाहीत… याचाच अर्थ आपल्याला मर्यादा आहेत आणि त्या मान्य करणे किंवा न करणे यावर सर्वसामान्य मानवी व्यवहाराचे काहीही अवलंबून नाही! यास्तव सामान्यत्वाचा छाप घेऊन जगणाऱ्यांनी चमत्कारांना नमस्कार करणे क्रमप्राप्तच असते.
जम्मू – काश्मीर, हिमाचल प्रदेश इत्यादी ठिकाणी डोग्रा नावाच्या समाजसमूहातून अत्यंत नीडर, कर्तव्यदक्ष, कणखर आणि त्याचवेळी सुसंस्कृत, सभ्य सैनिकही जन्म घेतात. त्यांच्या माध्यमातून भारत भूमीच्या पर्वतीय सीमा अभेद्य आहेत. या सैनिकांनी ज्वाला मातेला त्यांची रक्षक, पूज्य आणि स्मरणीय देवता मानली आहे. आणि याच भक्तीचा आधारे त्यांनी शक्तीची जोपासना केली आहे.
ज्वालामुखी, ज्वालाजी अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या या क्षेत्राचा जीर्णोद्धार, विकास डोग्रा सैनिक मोठ्या आस्थेने करत असतात, हे लक्षणीय आहे!
अखेरीस, भारतभूमी देवता मानली असता तिची अशी पूजा बांधणे सर्वथा वंदनीय मानले पाहिजे!
सैनिक आहेत म्हणून देश आहे… आणि हे सैनिक जिथे माथा टेकवतात.. ते ठिकाण आपल्यालाही पूजनीय असावे!
यानिमित्ताने कर्तव्यं अन्वात्मा अर्थात मृत्यूआधी कर्तव्य पूर्ण करण्यास प्राधान्य देणारे डोग्रा सैनिक आणि व्याघ्रावर आरूढ ज्वालामाता यांना नमस्कार.. जय हिंद… जय हिंद की सेना!
(धरमशाला/धर्मशाला येथे स्थापित war memorial पाहण्यासारखे आहे. त्याचे अनुकरण महाराष्ट्रात व्हावे!)
(लेखात व्यक्त केलेल्या भावना माझ्या वैयक्तिक आहेत. हिमाचल प्रवासातून..)
☆ “संतवाणी म्हणजे नेमकं काय ?? ” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेला हा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग आहे.
ते सांगतात—पुण्यातील मंडईत संतवाणीचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचा अभंग झाला होता. पेटी, तबला आवरले जात होते, कलाकार उठू लागले होते. भीमसेन जोशीही शांतपणे उभे राहून स्टेजवरून उतरण्याच्या तयारीत होते. सभागृहात “कार्यक्रम संपला” अशीच भावना होती.
तेवढ्यात, प्रेक्षकांमधून एक हमाल पुढे आला. साधा, घामेजलेला, काम करून आलेला. हात जोडून, थोड्या संकोचाने तो म्हणाला—
“जोशीबुवा… ‘तीर्थ विठ्ठल’ म्हणाल का?”
क्षणभर सगळे थांबले. कार्यक्रम संपलाच होता. साथीदारांनी वाद्यं आवरली होती. अशा वेळी अभंग म्हणणं म्हणजे पुन्हा सगळं उलगडणं. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
पण भीमसेन जोशी थांबले.
त्या हमालाकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आग्रह नव्हता, हट्ट नव्हता—फक्त भक्ती होती. जोशीबुवांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून म्हटलं,
“अहो, पेटी-तबला काढू नका… तीर्थ विठ्ठल म्हणूया. ”
… सगळे स्तब्ध झाले.
पुन्हा पेटी उघडली गेली. तबल्यावर हात बसला. आणि मग भीमसेन जोशींनी
“ तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…” सुरू केलं.
सुधीर गाडगीळ सांगतात— ‘ तो अभंग मैफिलीचा फाके एक भाग नव्हता.. तर तो करुणेचा, माणुसकीचा आणि भक्तीचा उद्गार होता. आवाजात विलक्षण आर्तता होती. जणू त्या हमालाच्या आयुष्याचं ओझं त्या स्वरांत उतरलं होतं. हमाल रडत उभा होता. प्रेक्षक नुसते ऐकत नव्हते— तर ते अनुभवत होते.
… अभंग संपल्यावर टाळ्या नव्हत्या. फक्त गहिरं मौन होतं.
गाडगीळ शेवटी म्हणतात—
“त्या दिवशी कळलं, भीमसेन जोशी हे मोठे गायक होतेच; पण त्याहून मोठं होतं त्यांचं मन. कार्यक्रम संपला होता, पण भक्ती संपलेली नव्हती—आणि जोशीबुवांनी ती ओळखली. ”
हा प्रसंग ‘ संतवाणी म्हणजे नेमकं काय ’ हे कायमचं समजावून जातो.
संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ शिंग्रोबा.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
शिंग्रोबा
शिंग्रोबा धनगर कोण होते? त्यांचं नाव मिसिंग लिंकला देण्याची मागणी का होतेय? वाचून अभिमान वाटेल – – –
एक असा माणूस ज्यानं खऱ्या अर्थानं मुंबई-पुण्याला जोडलं. एक असा माणूस ज्यानं बक्षीसात मरण मागितलं. एक असा माणूस ज्यानं इंग्रजी जुलमी राजवटीला शर्मेनं मान खाली घालायला भाग पाडलं…
अर्थातच ते व्यक्ती होते शिंग्रोबा धनगर… मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.
मुंबई-पुणे मार्गाचे खरे शिल्पकार
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या आणि आडवाटांची खडान् खडा माहिती असणारा हा माणूस! आज ‘मिसिंग लिंक’ लोकांसाठी खुला झाला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या बोगद्याकडे पाहिलं जातंय, पण हा मार्ग शोधण्याचं खरं श्रेय जातं ते शिंग्रोबा धनगर यांना! ते कसं? यासाठी आपल्याला इतिहासाची पानं जरा चाळावी लागतील…..
शिंग्रोबा कोण होते? त्यांनी मुंबई-पुणे मार्गाचा शोध कसा लावला? आणि बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांची हत्या का केली? – –
साल होतं १८५०. भारतमातेच्या अंगावर पारतंत्र्याच्या बेड्या होत्या. इंग्रज आपल्या देशाला अक्षरशः ओरबाडत होते. देशातलं धन, धान्य, मसाले आणि प्रत्येक मौल्यवान वस्तू लंडनला पाठवण्यासाठी त्यांना गरज होती ती वेगवान कनेक्टिव्हिटीची. याच गरजेपोटी १६ एप्रिल १८५३ रोजी देशात पहिली रेल्वे धावली- बोरीबंदर ते ठाणे..
… पण इंग्रजांचं खरं टार्गेट होतं ते थेट पुणे गाठणं. मात्र, मुंबई आणि पुण्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा होता, आसमानाशी स्पर्धा करणारा राकट सह्याद्री. या सह्याद्रीच्या दुर्गम कडेकपाऱ्यांतून रेल्वेचा मार्ग काढायचा कसा? हे इंग्रजांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आणि कोडं होतं. अनेक समित्या नेमल्या गेल्या. कित्येक गोरे तज्ज्ञ आले, डोकं खाजवून परतले. पण सह्याद्रीनं कुणालाही वाट दिली नाही. इंग्रज अधिकारी जंग जंग पछाडत होते, पण डोंगरवाटा काही सापडत नव्हत्या.
शिंग्रोबा धनगर आणि इंग्रजांची भेट – –
त्या काळात बोरघाटाच्या कुशीत एक धनगर वस्ती होती आणि तिथे राहायचे शिंग्रोबा धनगर. शिंग्रोबा म्हणजे सह्याद्रीचा श्वास! मेंढरं चारणाऱ्या या माणसाला सह्याद्रीचा प्रत्येक खडक, प्रत्येक दरी आणि प्रत्येक आडवाट तोंडपाठ होती. इंग्रजांची ही रोजची पळापळ शिंग्रोबा लांबून बघत होते.
शिंग्रोबांनी ‘राजमार्ग’ दाखवला
‘रोज गोरी माणसं येतात, डोंगर मोजतात आणि हताश होऊन परत जातात, ‘ हे शिंग्रोबांच्या कुतूहलाचा विषय ठरला. शेवटी राहवलं नाही आणि शिंग्रोबांनी विचारलं- “काय हरवलंय का तुमचं? काय शोधताय एवढं?” हताश झालेल्या इंग्रजांनी त्यांना आपली अडचण सांगितली “आम्हाला मुंबई-पुण्याला जोडणारा रेल्वेचा मार्ग हवाय… ” हे सांगताना त्या गोऱ्या अधिकाऱ्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की या डोंगराच्या राजाकडे त्याचं उत्तर दडलंय. शिंग्रोबा हसले आणि म्हणाले- “चला माझ्या मागं, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. “
शिंग्रोबांच्या बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले
काही वेळातच शिंग्रोबांनी इंग्रजांना तो मार्ग दाखवला, जो आज जगासाठी अभियांत्रिकीचा चमत्कार आहे! एका धनगराच्या अनुभवापुढे सातासमुद्रापारची विद्या थकली होती. शिंग्रोबांच्या अफाट बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले. सह्याद्रीचं जे कोडं भल्याभल्या इंजिनिअर्सना सुटलं नव्हतं, ते एका सामान्य धनगरानं एका क्षणात सोडवलं.
स्वाभिमान आणि बलिदानाची गोष्ट – –
कमालीचे खूश झालेले गोरे अधिकारी शिंग्रोबांना म्हणाले- “माग काय मागायचं तुला? पैसा, जमीन की जहागिरी?” ती वेळ अशी होती की शिंग्रोबांनी सोन्याची वीट जरी मागितली असती, तरी इंग्रजांनी त्यांच्या पायाशी ठेवली असती. पण शिंग्रोबांचा पिंड हा स्वार्थाचा नव्हता, स्वाभिमानाचा होता. आपल्या मातीला ओरबाडणारे, आपल्याच भावंडांवर अत्याचार करणारे हे परकीय इंग्रज शिंग्रोबांनाही बोचत होते.
शिंग्रोबा शांतपणे म्हणाले “साहेब, द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या!” हे शब्द म्हणजे साक्षात ठिणगी होती. एका मेंढपाळाने सातासमुद्रापारच्या सत्तेला जाब विचारणं, हे इंग्रजांच्या अहंकाराला लागलेलं शिसं होतं. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. ज्या माणसाने त्यांना मार्ग दाखवला, ज्याच्यामुळे त्यांचा रेल्वेचा रस्ता सोपा झाला, त्या शिंग्रोबांवर कृतघ्न इंग्रजांनी गोळ्या झाडल्या. सह्याद्रीच्या कुशीत शिंग्रोबांचं रक्त सांडलं, पण त्या बलिदानाने हा घाट अमर झाला.
शिंग्रोबांचे स्मारक : मिसिंग लिंकला नाव देण्याची मागणी – –
शिंग्रोबांनी जिथे प्राणाची आहुती दिली, तिथेच आज त्यांचं एक छोटंसं श्रद्धेचं देऊळ उभं आहे. आजही जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरच्या बोरघाटात प्रवासी या वाटाड्या हुतात्म्यापुढे नतमस्तक होऊन त्याचं दर्शन घेतात. आज मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचा ‘मिसिंग लिंक’ लोकांसाठी खुला झालाय. त्याला शिंग्रोबांचं नाव द्यावं*, अशी मागणी जोर धरतेय. सरकार काय निर्णय घेईल तो घेईल, पण शिंग्रोबांमुळे आज मुंबई उर्वरित महाराष्ट्राशी जोडली गेली, हे त्रिकालबाधित सत्य आहे.
अपरिचित पण अलौकिक व्यक्तिमत्त्व शिंग्रोबा.
☆
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
मागच्या भागात आपण रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथांविषयी थोडी माहिती घेतली. रविंद्रनाथांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक म्हणजे देवेंद्रनाथ! त्यांनी बंगालचं सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक विश्व समृद्ध केलं. त्यांच्याविषयी आणखी माहिती आज घेऊया.
ब्राह्मोसमाजाचे अनुयायी देवेंद्रनाथांचा उल्लेख महर्षी देवेंद्रनाथ असा करीत. तत्त्वबोधिनी पत्रिका ह्या ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिकाद्वारे बंगाली गद्याच्या वाटचालीस गती देऊन त्यांनी मोठाच हातभार लावला. भारदस्त वैचारिक गद्यलेखनाची परंपरा बंगालीत ह्या पत्रिकेने सुरू झाली. ऋग्वेदाच्या बंगाली अनुवादास प्रथम देवेंद्रनाथांनीच हात घातला. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत प्रथम त्यांनीच लिहिले. ‘स्वरचित जीवनचरित’ हे त्यांचे आत्मचरित्र फारच मनोरंजक आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्राचे पुढे त्यांची मुले, सत्येंद्रनाथ आणि इंदिरा देवी ह्या दोघांनी ‘देवेंद्रनाथ ठाकूरेर स्वरचित जीवनचरित’ नावाने इंग्रजीत भाषांतरही केले.
देवेंद्रनाथांच्या मुलांनी देखिल विविध विषयात आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवली. द्विजेंद्रनाथ कवि, दार्शनिक और गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. सत्येंद्रनाथ पहले भारतीय ICS अधिकारी बनले. ज्योतिरिंद्रनाथ नाटककार, संगीतकार व संपादक झाले. रवींद्रनाथांनी नोबेल पुरस्कार मिळवून जागतिक किर्ती प्राप्त केली. त्यांची कन्या स्वर्णकुमारी देवी देखिल प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार व संपादक होत्या.
देवेंद्रनाथांच्या नातवंडांपैकी अनेकजण लेखक, चित्रकार, संगीतकार, संपादक, राजकारणी वा समाजकारणी आहेत.
देवेंद्रनाथांच्या अंतःकरणात वास्तव्य करणारा साहित्यिकच द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांचा साहित्यगुरू होय. देवेद्रनाथांमधील खरा साहित्यिक त्यांच्या स्वतःच्या आनुषंगिक लेखनात व्यक्त झालेला नसून, तो त्यांनी आप्तेष्टांना व स्नेह्यासोबत्यांना अनौपचारिकपणे लिहिलेल्या पत्रांमधून आणि त्यांच्या आत्मचरित्रातून व्यक्त झाला आहे. अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या बरोबरीने देवेंद्रनाथही, स्वतःच्या नकळत नव्या बंगाली गद्याची जडणघडण करीत होते. त्यांची ही गद्यशैली त्यांच्या मुलांनी, विशेषतः द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांनी उचलली व खूपच विकसित केली.
सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती. शिक्षणप्रसार व लोककल्याणकारी कार्यात देवेंद्रनाथांनी आपले सर्व जीवन वेचले. सर्वतत्त्वदीपिका सभा, तत्त्वबोधिनी सभा, हिंदू हितार्थी विद्यालय, समाजोन्नतिविधायिनी सुहृदसमिती इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि त्यांद्वारे धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक जागृती केली. हिंदू महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीवर असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.
बोलपूर येथील ब्रह्मचर्याश्रम देवेंद्रनाथांनीच स्थापन केला होता. रवींद्रनाथांनी पुढे त्याचे रूपांतर जगप्रसिद्ध ‘शांतिनिकेतन’मध्ये व नंतर ‘विश्वभारती’मध्ये केले.
देवेंद्रनाथांचा मृत्यू वयाच्या ८८ व्या वर्षी १९ जानेवारी १९०५ रोजी त्यांच्या राहत्या घरी झाला.
—–
☆ गीत : ७० ☆
IS it beyond thee to be glad with the gladness of this rhythm? To be tossed and lost and broken in the whirl of this fearful joy?
All things rush on, they stop not, they look not behind, no power can hold them back, they rush on.
Keeping steps with that restless, rapid music, seasons come dancing and pass away ⎯colours, tunes, and perfumes pour in endless cascades in the abounding joy that scatters and gives up and dies every moment.
THAT I should make much of myself and turn it on all sides, thus casting coloured shadows on thy radiance ⎯ such is thy maya.
Thou settest a barrier in thine own being and then callest thy severed self in myriad notes. This thy self-separation has taken body in me
The poignant song is echoed through all the sky in many-coloured tears and smiles, alarms and hopes; waves rise up and sink again, dreams break and form. In me is thy own defeat of self.
This screen that thou hast raised is painted with innumerable figures with the brush of the night and the day. Behind it thy seat is woven in wondrous mysteries of curves,
casting away all barren lines of straightness.
The great pageant of thee and me has overspread the sky. With the tune of thee and me all the air is vibrant, and all ages pass with the hiding and seeking of thee and me.
HE it is, the innermost one, who awakens my being with his deep hidden touches.
He it is who puts his enchantment upon these eyes and joyfully plays on the chords of my heart in varied cadence of pleasure and pain.
He it is who weaves the web of this maya in evanescent hues of gold and silver, blue and green, and lets peep out through the folds his feet, at whose touch I forget myself.
Days come and ages pass, and it is ever he who moves my heart in many a name, in many a guise, in many a rapture of joy and of sorrow.