मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५७ – – 

जगीं होइजे धन्य या रामनामे ।

क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥

उदासीनता तत्त्वता सार आहे ।

सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

अर्थ :  भक्ताने सतत रामनाम घेऊन या जगात धन्य व्हावे. नुसते नामस्मरण करण्यापेक्षा क्रिया म्हणजे कृतीने, भक्तीने सातत्याने उपासना करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका न येऊ देता, उदासीनपणे (म्हणजे आजूबाजूच्या घटनांचा मनावर परिणाम न होऊ देता) मोकळ्या मनाने रामनामाची उपासना करावी आणि या जगात भक्त म्हणून धन्य व्हावे.

विवेचन : या आधीच्या दहा श्लोकांमध्ये समर्थांनी आदर्श भक्त कसा असावा, त्याची लक्षणे सांगितली आणि त्यावरून साधकांना देखील आपण कसे असावे याचा बोध होतो. पण त्या मार्गाने जायचे कसे किंवा त्यासाठी काय करायचे याचा उपाय ते या श्लोकात आपल्याला सांगत आहेत.

आधीचे श्लोक वाचून जर आपल्याला समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सर्वोत्तम भक्त व्हावेसे वाटले तर समर्थांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. परंतु असे भक्त होण्यासाठी संस्कारांची आणि प्रयत्नांची गरज असते. लहानपणापासूनच संस्काराचे महत्त्व असते. ओल्या मातीला आकार देणे सोपे असते. म्हणून मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि प्रत्यक्ष आपल्या वागणुकीतून त्यांच्यासमोर चांगल्या वागण्याचा आदर्श ठेवणे या गोष्टी संस्कारात येतात.

त्याचप्रमाणे समर्थांनी सांगितलेला भक्त होण्यासाठी देखील संस्काराची मनाला गरज असते. आपले मन सतत विषयाकडे ओढ घेत असते. त्यामुळे मनाला जाणीवपूर्वक भगवंताचे स्मरण, त्याची उपासना करण्याची सवय लावून घ्यावी लागते. हे एक प्रकारचे संस्कारच असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात सामान्य माणसाला देवात सुद्धा विषय दिसतात. परंतु संतांना विषयात सुद्धा देव दिसतो.

संतांजवळ प्रत्येक गोष्टीत देव पाहण्याची जी दृष्टी असते, ती विकसित व्हावी लागते आणि ती संस्कारानेच विकसित होते. म्हणून नामस्मरण, त्यासोबतच कृती आणि उपासना यांच्या माध्यमातून परमेश्वराचे ध्यान करावे. भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात नाना प्रकारचे विकल्प किंवा शंका येतात. खरा भक्त अशा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देता मनापासून भगवंताची उपासना करतो. म्हणूनच त्याच्यावर उपासनेत मोकळेपणा असतो.

भक्ताने उदासीन असावे असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदासीन हा शब्द इंद्रियांच्या बाबतीत वापरला गेला आहे. म्हणजे आपले मन जे सतत विषयांकडे ओढ घेते ती आवरणे, आणि विषयांच्या बाबतीत विरक्त राहणे म्हणजेच उदासीन राहणे होय. थोडक्यात म्हणजे विषयांच्या बाबतीत आपली वृत्ती उदासीन असली पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीबद्दल नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत म्हणून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना मग त्या अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्या संबंधात आपल्याला त्यांची योग्य ती दखल घेऊन वागावे लागेल. आपले जे कर्तव्य आहे त्याबाबत सजग राहावे लागेल. म्हणजेच त्या बाबतीतली उदासीनता कामाची नाही. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. तेव्हा जी उदासीनता आहे ती विकारांबद्दल असावी. अशा प्रकारची सवय एकदा आपल्या मनाला लागली की मग भगवंताची मोकळेपणाने आपण उपासना करू शकू.

आपल्यासारख्या सामान्य माणूस अनेक गोष्टींना आणि विषयांना मनाने बांधला गेलेला असतो आपण जोपर्यंत ही बंधने तोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवंताचे होऊ शकत नाही किंवा त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. मनाने प्रपंचाचा संग टाकावा आणि भगवंताचा संग जोडावा. मग खरोखरच भगवंताचे धन्य भक्त होण्यासाठी आपण पात्र होऊ.

स्वसंवाद :: 

१) माझी उपासना “नित्यनेमाने” होते का? मी सुखात किंवा दुःखात असताना सुद्धा?

२) “सामान्य माणसाला देवात विषय दिसतो” माझ्या उपासनेत माझे खरोखर देवाकडे लक्ष असते का की मनात इतर विचारच जास्त असतात?

३) विकारांबद्दल उदासीन आणि कर्तव्याबद्दल सजग या दोन्ही गोष्टींचा समतोल माझ्या जीवनात आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ५८ – – – 

नको वासना वीषई वृत्तिरुपें।

पदार्थी जडे कामना पूर्वपापें |

सदा राम निष्काम चिंतीत जावा।

मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥

अर्थ :  हे मना, भौतिक विषयांमध्ये वृत्तीरूपाने वासनांमध्ये अडकू नकोस. पूर्व पापांमुळेच आपले मन विषय वासनांमध्ये अडकते. म्हणून भगवंताचे नेहमी निष्काम भावाने चिंतन कर आणि मनामध्ये कल्पनेचा लवलेशही ठेवू नकोस.

(पदार्थी- दृश्य/बाह्य विषयांमध्ये, निष्काम- कोणतीही इच्छा न ठेवता, कल्पना-सुखाच्या गोष्टींचे मनोरे रचणे, लेश- मागमूस)

विवेचन :  ५७ ते ६० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला विषयवासनेचा त्याग करण्याबद्दल सांगत आहेत. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आहे. या श्लोकात म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की विषयांमध्ये वृत्ती रूपाने आपली वासना अडकता कामा नये. या दृश्य किंवा भौतिक जगात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्यामध्ये आपले मन अडकते. ही सवय पूर्वपापामुळे लागते असे समर्थ सांगतात. हे पूर्वपाप म्हणजे पूर्व संचित संस्कार असे म्हणता येईल. हे संस्कार किंवा वृत्ती केवळ एका जन्माची नसून अनेक जन्मांची असते. त्यातूनच असे वागण्याची बुद्धी होते. यावर उपाय म्हणून निष्कामपणे रामाचे चिंतन करावे आणि विषयवासनांची कल्पना देखील मनामध्ये अजिबात उरू देता कामा नये.

वस् धातूपासून वासना हा शब्द आला आहे. वस् म्हणजे राहणे किंवा स्थिर होणे. आपले मन सतत इंद्रियांमध्ये म्हणजेच विषयांमध्ये राहते आणि सवयीने ते तेथेच स्थिर होते. म्हणून त्याला आपण वासना असे नाव देतो. स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध यांच्या सहाय्याने इंद्रियां मार्फत आपण विषय सेवन करीत असतो. थोडक्यात वासना म्हणजे हवेपण! आपल्याला जोपर्यंत हे हवे, ते हवे असे वाटत असते तोपर्यंत आपली चित्त त्या त्या विषयांमध्ये गुंतलेले असते.

वृत्ती, कामना आणि वासना असा प्रवास आपण बाह्य जगतातील वस्तूंसाठी करीत असतो. आपले मन अतिशय चंचल आहे. या मनावर वारंवार वेगवेगळ्या विषयांचे तरंग उठतात. असे अनेक तरंग जेव्हा तयार होतात, तेव्हा त्यातून त्या विषयाबद्दलची कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. ही कामना जेव्हा तीव्र होते तेव्हा तिचे रूपांतर वासनेमध्ये होते. हा वृत्ती, कामना आणि वासनेपर्यंतचा प्रवास माणसाला त्यातून बाहेर पडू देत नाही आणि शेवटी अध:पतनाकडे घेऊन जातो.

माणूस एकदा वासनेच्या अधीन झाला की त्याला दुसरे काही सुचत नाही. तो त्या सवयीचा गुलाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीचे समर्थन करू लागतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणारे त्या गोष्टींचे समर्थन करीत असतात असे आपण अनेकदा पाहतो. म्हणजे त्यांना त्यात आपण काही वावगे करीत आहोत असे वाटतच नाही. राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात सुधाकर दारूच्या सवयीचा गुलाम होतो आणि त्यात त्याला काही वाटेनासे होते. परंतु नंतर ही दारू त्याच्या संसाराची धूळधाण करते. प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांना देखील मदिरेचे व्यसन लागले होते आणि अति व्यसनामुळे त्यांचे अकाली निधन झाले. मुले लहान असताना संसार उघड्यावर टाकून निघून जावे लागले.

माणूस वृद्ध झाला, इंद्रिये थकली तरी देखील माणूस त्यातून बाहेर पडत नाही. शेवटपर्यंत विषय वासना त्याला त्रास देतच असतात. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळाली नाही की मग तो कल्पनेच्या राज्यात रमतो, कल्पनेचे मनोरथ करू लागतो. आजच्या काळात तर टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्या आभासी गोष्टी कल्पनेच्या राज्यात माणसाला गुंतवून ठेवतात.

मग या सर्व गोष्टीतून सुटका करून घेण्याचा काही उपाय आहे का? निश्चितच आहे! समर्थ म्हणतात, “आपण निष्कामपणे रामाची चिंतन करावे, त्याचे ध्यान, मनन, चिंतन, पूजा करावी. हे सर्व संस्कार आहेत. त्यातून हळूहळू वाईट विषयांची कामना कमी होत जाते, मनामध्ये सद्वासना निर्माण होतात आणि शेवटी निर्वासना अवस्था निर्माण होऊन साधक मोक्षापर्यंत पोहोचतो. असा त्याचा प्रवास वाईटाकडून चांगल्याकडे होऊ शकतो.

पण इथे समर्थ आपल्याला निष्काम भक्ती करायला सांगतात हे लक्षात घ्यायला हवे. आपण सामान्य माणसे परमेश्वराची भक्ती देखील काहीतरी हेतू किंवा इच्छा मनात धरून करीत असतो. त्यामुळे आपली वासना शेवटपर्यंत सुटत नाही. हे ईश्वरा, मला अन्य काही नको. फक्त तू हवा आहेस अशा प्रकारची आर्तता जेव्हा भक्तीत येईल, तेव्हा आपली वाटचाल मोक्षमार्गाकडे व्हायला सुरुवात होईल.

या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा अरे अरे ज्ञाना झालासी पावन हा अभंग आठवतो. त्यात ते म्हणतात,

वृत्तीची निवृत्ती आपणा सकट |अवघेची वैकुंठ चतुर्भुज ||

जेव्हा साधकाची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ लागते, तेव्हा त्याच्या वृत्तीची निवृत्ती होऊ लागते. ती देखील कशी? तर आपणा सकट म्हणजे त्याचा मी पणा, अहंकार सगळे काही नष्ट होते आणि संपूर्ण वैकुंठच त्याला विष्णूरूप दिसू लागते. कामना, वासना सर्वच गोष्टी नाहीशा होतात. कल्पनेचा लवलेश देखील राहत नाही आणि मग आपोआपच जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील त्याची सुटका होते.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात वारंवार येणाऱ्या कोणत्या इच्छा हळूहळू वासनांमध्ये रूपांतरित होत आहेत?

२) “मला हे हवेच आहे” असे वाटते तेव्हा मी त्यामागचा विचार करतो का?

३) मी एखादी गोष्ट मिळाली नाही तर अस्वस्थ होतो का, की शांत राहू शकतो?

४) माझ्या आयुष्यात कल्पनाविलास (दिवास्वप्ने / आभासी जग) किती प्रमाणात आहे?

५) मी दररोज किमान काही वेळ निष्काम भावाने नामस्मरण किंवा चिंतन करतो का?

– क्रमशः श्लोक ५७ आणि ५८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १० – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १०. – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆

पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई

“मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागंत? नाव ही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!

आता मीच देते ओळख करून…

मी… सगुणाबाई! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!

सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!

गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!

पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??

तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?

पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,

दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.

तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??

असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!

पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!

आणि… आणि… पेशवाईतील…

*पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली!!

– लेख क्र. १० .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५५ आणि ५६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५५ आणि ५६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५५ – – – 

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।

वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥

ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥

अर्थ: ज्याच्या मनातील दुष्ट वासना आणि वाईट विचार नाहीसे झाले आहेत, भगवंताला आपल्या प्रेमपाशात बांधण्याची उत्कट इच्छा ज्याच्या मनामध्ये तीव्रतेने आहे आणि ज्याच्या प्रेमामुळे आणि शरणागत वृत्तीमुळे स्वतः भगवंत त्याचा ऋणी झाला आहे, असा भक्त भगवंताचा जगातील सर्वात उत्कृष्ट किंवा धन्य भक्त आहे.

(नष्ट -त्याज्य/वाईट, दुराशा – दुष्ट वासना वासना /इच्छा, प्रेमपाश- प्रेमाने बांधून ठेवणे, पिपाशा – तृष्णा /तहान)

विवेचन : भगवद भक्तीत जो रंगून गेला आहे, तो मनाने अंतर्बाह्य निर्मळ असतो. आत एक आणि बाहेर एक असे त्याच्याजवळ असत नाही. वासना, विकार आणि दुष्टभावना यांना त्याच्या मनात थारा नसतो. किंबहुना ह्या गोष्टी त्याला सहनच होत नाहीत. जसे आपल्याला शुभ्र वस्त्रावर एखादाही डाग चालत नाही, त्याप्रमाणे त्याचे मन शुभ्र वस्त्रासारखे आणि पारदर्शक असते. अशा भक्त विषयी बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, ” जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे हृदयी. “

“मना वासना दुष्ट कामा नये रे.. ” असे समर्थ सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. रावणाच्या मनामध्ये सीतेची कामना होती. धृतराष्ट्राच्या मनात पुत्रमोह होता. दुर्योधनाच्या मनात राज्याची कामना होती. अशा वाईट आणि दुष्ट विचारांमुळे त्यांचा नाश झाला.

आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ऐहिक सुखाची कामना असते. सत्ता, पैसा, सोनेनाणे कितीही मिळाले तरी हवेच असते. पण भगवंताचा खरा भक्त मात्र या गोष्टींपासून दूर असतो. तो कामना करतो ती भगवंताचीच! त्याच्या मनात तळमळ असते ती भगवंतप्राप्तीचीच! त्याची समर्पण भावना एवढी तीव्र असते की स्वतः भगवंत त्याच्या ऋणात राहतो. त्यांना कोणतेही ऐहिक सुख नको असते. तुकाराम महाराज म्हणतात, ” न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.. ” त्यांचे भगवंताशी प्रेमाचे नाते जोडलेले असते. “तूंचि बापधनी” अशी भावना परमेश्वराबद्दल भक्ताच्या मनात असते. तोच त्यांचे आई-वडील, गुरु सगळे काही असतो.

भगवंताला देखील अशा भक्तांचा दास व्हावेसे वाटते. आपल्या दासाला कोणताही त्रास झालेला भगवंताला चालत नाही. मग जनाईला तो दळण दळू लागतो, नाथांच्या घरी तो पाणी भरतो, विठू महाराच्या रुपात दामाजींचे कर्ज फेडतो, पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो, अर्जुनासाठी त्याच्या रथाचे सारथ्य पत्करतो. यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.

देव बांधला जात नाही आणि त्याला कोणी बांधू शकत नाही. श्रीकृष्ण लहान असताना यशोदेने त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु जो जो त्याला बांधायला जावे तो तो दोरी अपूर्ण पडत होती. मग भगवंताने स्वतःच तिच्याकडून बांधून घेतले. असा भगवंत भक्तांच्या प्रेमाने बांधला जातो. हे अदृश्य बंधन असते. देव भावाचा भुकेला असतो.

सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तो श्रीकृष्णाचा परमभक्त होता. तो जेव्हा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेला आला तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः त्याच्या पायात मोडलेले काटे काढले, त्याचे पाय धुतले, सेवासुश्रुषा केली. अशा रीतीने भगवंत हा भक्तांचा ऋणी होतो. परंतु त्यासाठी भक्ताची देखील तेवढी योग्यता असावी लागते.

आपले सगळे संत भगवंताचे असेच प्रेमळ भक्त होते. “संतांचीया गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश ” असे उद्गार संतांच्या बाबतीत तुकाराम महाराज काढतात. म्हणूनच आपण सगळ्या संतांना माउली म्हणून संबोधतो. अशा संतांचा तर भगवंत देखील ऋणी असतो आपण अशा संतांचे दास व्हावे म्हणजे दासानुदास व्हावे. एवढी समर्पण भावना जर आपल्याजवळ असेल तर भगवंत प्राप्ती दूर नाही.

स्वसंवाद :: 

१) माझ्या मनातील दुराशा आणि वाईट विचार मला जाणवतात का? आणि ते नाहीसे करण्याचा मी प्रयत्न करतो का?

२) भगवंताला प्रेमपाशात बांधण्याची तळमळ माझ्या मनात आहे का? की माझी भक्ती केवळ ऐहिक गोष्टींसाठीच आहे?

३) “दासानुदास” होण्याची माझी तयारी आहे का – संतांच्या चरणी नम्रतेने जाण्याइतकी समर्पण भावना माझ्यात आहे का?

== == == 

मनाचे श्लोक क्र. ५६ – – – 

दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू |

स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू |

तया अंतरी क्रोध संताप कैचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५६|

अर्थ :  जो अनाथ आणि दुःखितांवर प्रेम करतो, जो मनाने अत्यंत मृदू आहे, प्रेमळ आणि सर्वांवर कृपेचा वर्षाव करणारा आहे, तसेच शरणागताला आश्रय देणारा आहे आणि ज्याच्या अंतरात राग किंवा संताप यांना त्रास नाही, असा परमेश्वराचा भक्त जगामध्ये खरोखरच धन्य होय.

(मवाळ – मृदू, स्नेहाळ – प्रेमळ, दासपाळू – शरणागताला आश्रय देणारा, संताप -त्रास)

विवेचन ::  हा श्लोक “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा” या पालुपद-मालिकेचा सुंदर समारोप आहे.

हा श्लोक वाचताना एक विशिष्ट लय आपोआपच प्राप्त होते. ‘ ळ ‘ची पुनरावृत्ती याला एक वेगळेच सौंदर्य देते. परंतु हे केवळ भाषिक दृष्टीने जरी असले तरी अर्थाच्या दृष्टीने देखील हा श्लोक तेवढाच सुंदर आहे. जो भक्त भगवंताचा होऊन राहिला आहे, त्याच्यामध्ये काही गुणांचा परिपोष आपोआपच होत असतो. अशा भक्ताच्या अंगी कोणते गुण असतात ते समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे.

संत हे भगवंताचे श्रेष्ठ भक्त असतात म्हणून संतांमध्ये वरील श्लोकातील गुण आपल्याला प्रकर्षाने दिसतात किंवा जाणवतात. अत्यंत प्रेमळपणा हा संतांचा गुण! ते अनाथांची, दिनांची, दुःखी जनांची माउली होतात. संत एकनाथांनी तप्त वाळवंटात रडत असलेले हरिजनाचे मूल कडेवर उचलून घेतले. पूर्वजांचे श्राद्ध करीत असताना भुकेल्या हरिजनांना जेवू घातले, तृषार्त गाढवाच्या मुखी गंगेचे पाणी घातले. प्रसंगी परमेश्वर तरी कठोर होतो, परंतु संतांना मात्र सर्वसामान्यांचा अपार कळवळा असतो. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी मी अवतार घेतो असे गीतेमध्ये भगवंत म्हणतात. परंतु ज्ञानेश्वर माउलींसारखे संत दुष्ट नाहीसे होवो असे म्हणत नाहीत तर दुष्टांचा दुष्टपणा नाहीसे होवो असे म्हणतात.

सर्वसामान्यांच्या त्रासाने संत संतापत किंवा दुःखी होत नाहीत. त्यांच्याजवळ अपार करुणा असते. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास.. असे संत तुकाराम महाराज म्हणतात ते याचसाठी. संत कधी कधी कठोरपणे वागले किंवा बोलले तरी देखील त्यात लोककल्याणाची तळमळ आणि प्रेम असते. दासपाळू म्हणजे भगवंताच्या भक्ताला ते आश्रय देणारे असतात.

गीतेत भगवंतांनी स्थितप्रज्ञ पुरुषाची जी लक्षणे वर्णन केली आहेत, असे स्थितप्रज्ञ म्हणजे संत असतात. परंतु अशा व्यक्तींबद्दल बोलताना समर्थ त्यांना संत, महात्मे किंवा साधू असे म्हणत नाहीत तर अशा व्यक्तींसाठी ते ‘दास सर्वोत्तमाचा ‘शब्द वापरतात. हे शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहेत. दास म्हटले म्हणजे अहंता येत नाही. ज्या व्यक्ती आपल्याला साधू, संत, महात्मे म्हणवून घेतात, अशांच्या ठिकाणी अहंकार येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अशी माणसे आपल्याला सिद्धी प्राप्त आहे अशा प्रकारचा दावा करतात. खरे तर सिद्धी या परमार्थापासून दूर नेतात. परंतु सामान्य माणसे सिद्धीला भुलतात. याच गोष्टीचा गैरफायदा अशी मंडळी घेऊन समाजातील लोकांना फसवत असतात. फसवणुकीची अशी खूप उदाहरणे आपल्याला वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. सुशिक्षित लोक देखील अशा प्रकारच्या चमत्कारांना बळी पडतात. म्हणून समर्थांच्या उपदेशामध्ये सिद्धींचा उल्लेखही नाही. समर्थांच्या दृष्टीने संत पुरुष तोच की जो परमेश्वराचा दास असतो.

परमेश्वराचा साक्षात्कार झालेले संत निरिच्छ असतात. विपरीत परिस्थितीने ते दुःखी होत नाहीत आणि अनुकूल परिस्थिती आली म्हणून हर्षित होत नाहीत. लोककल्याणाची त्यांना तळमळ असते. त्यासाठीच ते आपले आयुष्य घालवतात आणि म्हणून आता उरलो उपकारापुरता… असेच ते म्हणतात. असेच सर्वोत्तमाचे दास जगामध्ये धन्य भक्त म्हणवले जातात.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात दुसऱ्यांबद्दल खरी करुणा आहे का – की ती केवळ दिखाव्यापुरती असते?

२) “दुष्टपणा नाहीसे होवो” असे म्हणण्याइतकी उदारता माझ्या मनात आहे का – की मला माणसेच नको असतात?

३) मी “दास” आहे की “महात्मा” होण्याच्या मागे आहे – नम्रतेने परमेश्वराचा दास राहणे मला खरोखर पसंत आहे का?  

– क्रमशः श्लोक ५५ आणि ५६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “The Unsung Indian” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “The Unsung Indian” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

डॉ. गणेश राख!

पुण्यातील एका मजुराने पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली. खर्च किती येईल याची त्याला कल्पना नव्हती; घर गहाण ठेवावे लागेल की काय अशी त्याची भीती होती.

डॉक्टर, मूल काय झालं? तो विचारतो.

“तुमच्या घरी परी आली आहे—मुलगी झाली आहे, ” डॉक्टर उत्तर देतात.

“फी किती आहे?”

“परी जन्माला आली की मी फी घेत नाही, ” डॉक्टर शांतपणे म्हणाले.

भावनांनी भरून आलेला तो मजूर डॉक्टरांच्या पायांवर कोसळला—“साहेब, तुम्ही देव आहात. ”

हे पुण्याचे डॉ. गणेश राख! … गेली दहा वर्षे ते असेच करत आहेत—मुलगी झाल्यावर एक पैसाही न घेता प्रसूती. आतापर्यंत १, ००० हून अधिक कन्यांचे जन्म त्यांनी विनामूल्य घडवले आहेत.

“मला लहानपणापासून कुस्तीगीर व्हायचं होतं; पण आई म्हणाली—‘डॉक्टर हो आणि या परींचं रक्षण कर, ’” ते अभिमानाने सांगतात.

लंडनच्या बीबीसीने त्यांच्यावर ‘Unsung Indian’ या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध केला आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं.

… त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा—अशा देवदूतांचा जन्म झाला की खरंच समाज धन्य होतो…!

 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – १ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – १ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक १ ते १० 

समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्

महैश्वर्यं लीलाजनितजगतः खण्डपरशोः ।

श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां

सुधासोदर्यं ते सलिलमशिवं नः शमयतु ॥ १॥

*

दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां

द्रुतं दूरीकुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणिम् ।

अपि द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुरिह

प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु नः ॥ २॥

*

उदञ्चन्मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननी-

कटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः ।

भवन्तु त्वङ्गन्तो हरशिरसि गङ्गातनुभुव-

स्तरङ्गाः प्रोत्तुङ्गा दुरितभयभङ्गाय भवताम् ॥ ३॥

*

तवालम्बादम्ब स्फुरदलघुगर्वेण सहसा

मया सर्वेऽवज्ञासरणिमथ नीताः सुरगणाः ।

इदानीमौदास्यं भजसि यदि भागीरथि तदा

निराधारो हा रोदिमि कथय केषामिह पुरः ॥ ४॥

*

स्मृतिं याता पुंसामकृतसुकृतानामपि च या

हरत्यन्तस्तन्द्रां तिमिरमिव चन्द्रांशुसरणिः ।

इयं सा ते मूर्तिः सकलसुरसंसेव्यसलिला

ममान्तःसन्तापं त्रिविधमपि पापं च हरताम् ॥ ५॥

*

अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा

विलोलद्वानीरं तव जननि तीरं श्रितवताम् ।

सुधातः स्वादीयस्सलिलभरमातृप्ति पिबतां

जनानामानन्दः परिहसति निर्वाणपदवीम् ॥ ६॥

*

प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी-

गतो यावन्मातर्मिलति तव तोयैर्मृगमदः ।

मृगास्तावद्वैमानिकशतसहस्रैः परिवृता

विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनम् ॥ ७॥

*

स्मृतं सद्यः स्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि

प्रगीतं यत्पापं झटिति भवतापं च हरति ।

इदं तद्गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं

मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तर्विलसतु ॥ ८॥

*

यदन्तः खेलन्तो बहुलतरसन्तोषभरिता

न काका नाकाधीश्वरनगरसाकाङ्क्षमनसः ।

निवासाल्लोकानां जनिमरणशोकापहरणं

तदेतत्ते तीरं श्रमशमनधीरं भवतु नः ॥ ९॥

*

न यत्साक्षाद्वेदैरपि गलितभेदैरवसितं

न यस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः ।

निराकारं नित्यं निजमहिमनिर्वासिततमो

विशुद्धं यत्तत्त्वं सुरतटिनि तत्त्वं न विषयः ॥ १०॥

– – – –

मराठी भावानुवाद 

वसुधेचे सौभाग्य जगाची ज्याच्या लीलेने

खंडितपरशू महादेवाच्या सजली ऐश्वर्याने

वेदसार मंगल रूपाचे मनोपावनांचे

अमृतजल तव हरण करावे दुःख सर्व आमुचे ॥१॥

*

दैन्य दरिद्री दुष्ट भावना पापवासनांचे

दृष्टी पडता तत्क्षणी हरिशी दुःख या मनाचे

अविद्या तरू झणी उखडते नीर तुझे वरदा

क्षणात आम्हा समृद्ध करो देउनि धनसंपदा ॥२॥

*

क्षितिजावरती सुवर्ण उधळित मित्र उभा ठाकता

तीव्र कटाक्षे क्षोभ निर्मिते मंगलमूर्तीमाता

पापा हरण्या भया मोचण्या शिवमस्तका वरी

तव प्रवाही पावन असुदे उच्च तुंग लहरी ॥३॥

*

अवलंबुनी मी तुझिया वरती मोठ्या अभिमाने

दुर्लक्षुनिया समस्त देवा आलो सहजपणे

उदासीन तू झालिस देवी अशीच माझ्याप्रती

निराधार मी होउनी जाऊ शरण कुणा पुढती ॥४॥

*

पुण्य न गाठी तरीही देवी स्मरण तुझे करिता

मोहा हटविसी अंतर्यामी स्मरण तुझे करिता

चांदणे जणू नष्ट करी तिमिराला लीलया

संतापादि त्रिवीध पापे जलमूर्ती क्षालाया ॥५॥

*

बृहद्राज्यही तृणासारखे सहज त्याग करुन

झुळुकेनी झुकणाऱ्या तीरी आश्रय घेती जन

अमृतासम रुचकर नीर तव प्राशुनिया तृप्त

मोदानंदित जणू जाहला मोक्ष तयांना प्राप्त ॥६॥

*

प्रभात स्नानी राज्ञिकुचाला मृगनाभीचा गंध

तव पाण्याने प्राप्त मृगाचा तितुका कस्तुरिगंध

प्रवेश करती शत मृग ऐसे तुझिया नंदनवनी

विमालांगी ते समस्त परिसर घेती घेरूनी ॥७॥

*

पापघ्नी अन् पीडाहारी एकवार गाता

आहे भवतापाचे हर्ता केवळ आठव करिता

तव लहरींचे गंगासंगित कर्णमधुर तोषवी

अंतसमयीला मुखकमलावर आळवीत ठेवी ॥८॥

*

क्रीडा करिती अतीव मोदे गंगाजलि वायस

आम्ही देखिल मनात नसुनी इंद्रलोकिची आंस

गंगा नष्ट करी फेऱ्यांची पीडा जननमरण

अमुचे सारे हरण करो श्रम ग॔गातिर पावन ॥९॥

*

साक्षात्कारे चतुर्वेदही जयासी ना जाणती

जीव वाणी वा मनही ज्याते प्रवेश करू ना शकती

हटवुनी अज्ञानास विशुद्ध निराकार नित्य

अगम्य ऐसे गंगादेवी पावन तुमचे तत्व ॥१०॥

– क्रमशः भाग पहिला – 

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पत्रास कारण की…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“पत्रास कारण की… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

 

 Capt. Amol Kalia,

 12, JAK LI

 02, June, 99

प्रिय आई आणि बाबा! चरणस्पर्श!

मी इथं छान आहे आणि तुम्ही सर्व छानच असाल अशी आशा करतो. मी २८ मे रोजी तुमच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही सर्वजण माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेल्याचे समजले.

मी २९ तारखेलाच इथं पोहोचलो. इथं सर्वकाही आलबेल असून तुम्ही माझी काहीही चिंता करू नका.

मी बहुदा या महिना अखेरीस दिल्लीत परतेन. तुम्हांला माझ्या लग्नाची घाई झालेली असेल तर, मी दिल्लीत आल्यावर तुम्ही माझं लग्न ठरवू शकाल! अ

आता मला तुम्हांला फोन करणे शक्य होणार नाही, मी पत्रं लिहित राहीनच. मनूदादा आणि वहिनीला माझा नमस्कार सांगा. त्यांचा कुठं आणि कधी फिरायला जाण्याचा बेत आहे?

 तुमचा,

 अमोल

पंजाबातील रोपड जिल्ह्यातल्या नांगल गावात २६ फेब्रुवारी, १९७४ रोजी जन्मलेले अमोल कालिया पुढे भारतीय सैन्यातील JAK.. JAMMU AND KASHMIR LIGHT INFANTRY दलात प्रवेश करीत पुढे कॅप्टनपदी पोहोचले. श्री. सत्पाल आणि श्रीमती उषा कालिया यांच्या पोटी जन्मलेल्या अमोल यांच्या धाकट्या भावानेही, अमन कालिया यांनीही भारतीय वायू दलात प्रवेश मिळवला होता. एकाच कुटुंबातील दोन सुपुत्र भारतमातेच्या रक्षणार्थ तैनात होते. १९९९.

पाकिस्तानने कारगिल पर्वत परिसरातील भारतीय सैन्यचौक्या कपटाने ताब्यात घेऊन तिथवर पोहोचू पाहणा-या भारतीय रसद वाहनांवर वरून अचूक हल्ले करायला प्रारंभ केला. बटालिक नावाच्या परिसरातील सुमारे १७०० फूट उंचीचा पर्वत पाकिस्तानी सैन्याने बळकावला होता. तेथून त्यांना खाली गोळीबार करणं अगदी सहज शक्य होत होतं. त्यामुळे आपल्या सैन्याच्या वाहनांचे खूप मोठे नुकसान झाले होते. शत्रूला तेथून हुसकावून लावणे अनिवार्य झाले होते. पण यासाठी पर्वतांवर चढून जाऊन लढाई करू शकणा-या सैनिकांची आवश्यकता होती.

कॅप्टन अमोल नेमके याचवेळी त्यांच्या सैन्यासह चंडीगढ येथे पोहोचले होते आणि पुढे त्यांना आराम करण्यासाठी शांतता क्षेत्रात पाठवले जाणार होते. पण एवढ्यात युद्ध पेटल्याने त्यांची सुट्टी रद्द झाली आणि त्यांच्या दलाला कारगिलमध्ये तातडीने बोलावून घेण्यात आले. कारण त्यांची J. A. K. L. I. डोंगर-द-यांत लढण्यासाठी प्रशिक्षित केली गेली होती. कॅप्टन अमोल कालिया तर पट्टीचे गिर्यारोहक आणि सैनिकी नेता होते… ते तातडीने युद्धक्षेत्राकडे निघाले. त्या दिवसाच्या आधी कॅप्टन साहेबांनी वर उल्लेख केलेले पत्र त्यांच्या घरी पाठवण्यासाठी संबंधित संपर्क यंत्रणेकडे सोपवले होते.

७ जूनच्या मध्यरात्री कॅप्टन अमोल कालिया यांच्या मातोश्री अचानक जाग्या झाल्या… त्यांनी त्यांच्या पतीला, जे सेवानिवृत्त शिक्षक होते, झोपेतून हलवून जागे केले… म्हणाल्या, ”आपल्या मुलांची खूप आठवण येते आहे… हे दोघेही ठीक असतील ना? ” कालिया सरांनी आपल्या पत्नीची कशीबशी समजूत काढली!

कालिया साहेबांच्या कुटुंबियांना हे पत्र ९ जून रोजी मिळाले… आणि एक अत्यंत धक्कादायक बातमी!

इकडे कारगिलमध्ये ७ जूनचा दिवस बुडाला मध्यरात्र झाली… ८ जून सुरु झाला… पहाटेचे तीन वाजले होते. कॅप्टन अमोल कालिया आपल्या १३ सैनिकांना सोबत घेऊन तो १७ हजार फुटांचा पर्वत चढू लागले. अंधार, बर्फाळ वाट आणि प्रचंड थंडी… खडा पहाड… एक एक पाऊल वर चढत सैन्य आगेकूच करीत होतं. काही वेळातच वर आरामात बसलेल्या शत्रूला यांची चाहूल लागली… आणि… पाकिस्तानी सैन्याने वरून यांच्यावर तुफान गोळीबार आरंभला. याही वादळी गोळीबारात कॅप्टन अमोल थांबले नाहीत… ते सर्वांच्या पुढे होते… शत्रूच्या अगदी जवळ पोहोचलेही होते… त्यांच्या सैनिकांपैकी LIGHT MACHINE GUN मधून गोळीबार करणारा सैनिक धारातीर्थी पडल्यावर कॅप्टन साहेबांनी स्वत: त्या GUNचा ताबा घेत तीन पाकिस्तानी सैनिक ठार मारले… आणि तितकेच जखमी केले!

सकाळी ९ वाजेपर्यंत हा संघर्ष सुरु राहिला… कॅप्टन साहेबांच्या तुकडीत असलेल्या १३ पैकी १० सैनिकांनी… हवालदार राजिंदर सिंग, नाईक पवन कुमार, लान्स नाईक लियाकत अली, लान्स नाईक मोहमद खान, रायफलमन दर्शन लाल आणि अब्दुल सलाम दार, रविंदर सिंग, ईश्तीयाक अहमद यांनी सर्वोच्च बलिदान दिले होते… आणि हवालदार कर्तार सिंग आणि रायफलमन तर्सैम लाल प्राणांतिक जखमांनी विव्हळत पडले होते… स्वत: कॅप्टन साहेबही प्रचंड जखमी झालेले होते… तरीही त्यांनी गोळीबार थांबवला नाही. पाकिस्तानी सैन्य यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक संख्येने आणि मोक्याच्या जागी होते… त्यांचे नेम चुकत नव्हते! कर्तार सिंग आणि तर्सेम लाल काही वेळातच देवाघरी गेले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे नेतृत्व करणारे बहादूर कॅप्टन अमोल कालिया साहेबही. साहेबांच्या मातोश्रींना पडलेले स्वप्न अशा रीतीने खरे झाले होते… त्यांनी त्यांचा सुपुत्र गमावला होता! भारतीय सैन्याला हा एक मोठा धक्का होता. पुढे आपल्या इतर सैनिकांनी आणखी बलिदाने देत हा ५२०३ बटालिक पर्वत २१ जूनला जिंकून घेतला! आणि यामुळे भारताची लढाई आणखी परिणामकारक होण्यात साहाय्य झाले!

पुढे १३ दिवस या वीरांचे मृतदेह कारगिलच्या त्या पर्वतांवर पडून होते… पाकिस्तानी सैन्याच्या तोफांच्या मा-यामुळे हे मृतदेह खाली आणणे अशक्य झाले होते! पुढे युद्ध थांबल्यावर हे काम करण्यात आले… तोवर कालिया कुटुंबीय प्रतीक्षेत राहिले… आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहण्यासारखी कठीण गोष्ट जगात अन्य नसावी… त्यांच्या पार्थिवाला खांदा देत त्याच्या चितेला अग्निडाग देणे तर महाकठीण. वीरपिता श्री. सत्पाल सिंग यांनी हे कर्तव्य पार पाडले. वीरमाता उषा यांनी आपल्या लाडक्या लेकाला अंतिम मानवंदना दिली… त्याच्या विवाहाचे स्वप्न त्यांच्यासमोर चितेवर जळत जळत भस्म झाले! देशाने कॅप्टन अमोल कालिया यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करून त्यांच्या शौर्याला वंदन केले!

कारगिल युद्धात कालिया आडनावाचे दोन सैनिक भारताने गमावले… आधी कॅप्टन सौरभ कालिया आणि नंतर कॅप्टन अमोल कालिया. या अधिकारी आणि सैनिकांच्या बलिदानांच्या पायावर आजची आपली स्वातंत्र्याची इमारत भक्कमपणे उभी आहे… आपण स्वतंत्र श्वास घेतो आहोत! आज २ जून, २०२६. कॅप्टन साहेबांनी त्यांच्या माता-पित्यांना लिहिलेल्या पत्रास सत्तावीस वर्षे पूर्ण झालीत… पत्र आलं… पण कॅप्टन साहेब हुतात्मा होऊन स्वर्गाकडे प्रयाण करते झाले!

(कारगिल स्मृती.).

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आडनावांचा इतिहास…” – माहिती संग्राहक / लेखक : मोरेश्वर कुंटे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आडनावांचा इतिहास…” – माहिती संग्राहक / लेखक : मोरेश्वर कुंटे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

आपले आडनाव किती जुने असेल? दोनशे वर्षे? पाचशे वर्षे? काही चित्पावन आडनावांचा इतिहास थेट हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रपटांपर्यंत पोहोचतो, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल..!

एखाद्या समाजाचा इतिहास लिहिताना राजे, युद्धे किंवा राज्यकारभार यांच्याइतकाच महत्त्वाचा विषय म्हणजे त्या समाजातील व्यक्तींची नावे आणि आडनावे. कारण आडनावे ही केवळ ओळख नसते; ती स्थलांतर, व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक परंपरांची साक्ष देत असतात. चित्पावन ब्राह्मण समाजाच्या आडनावांचा मागोवा घेतला असता काही आश्चर्यकारक ऐतिहासिक धागे समोर येतात.

आज सर्वपरिचित असलेली अनेक चित्पावन आडनावे किमान हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, याचे पुरावे ताम्रपट, शिलालेख आणि तत्कालीन कागदपत्रांतून मिळतात. चित्पावन आडनावांचा सर्वांत जुना उल्लेख गुजरातमधील जुनागढ परिसरात सापडलेल्या शिलादित्य राजाच्या ताम्रपटात आढळतो. गुप्त संवत २८६ (शके ५२७, इ. स. ६०५) च्या या ताम्रपटात बापट (वपटक) आणि भानू या आडनावांचा उल्लेख आहे. आजही चित्पावन समाजात प्रचलित असलेली ही आडनावे किमान चौदाशे वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, हे या पुराव्यावरून स्पष्ट होते.

त्यानंतरचा महत्त्वाचा पुरावा रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सापडलेल्या शके ९८२ (इ. स. १०६०) च्या मराठी ताम्रपटात दिसतो. या ताम्रपटात देवल आणि घेसास या आडनावांचा उल्लेख आहे. मराठी भाषेतील प्रारंभीच्या ताम्रपटांपैकी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.

गोव्यातील मांद्रे परिसरातील जमिनींच्या जुन्या नोंदी आणखी एक वेगळा धागा देतात. तेथे भाटले लिमये, भाटले गोखले, भाटले पटवर्धन आणि भाटले गाडगीळ अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जमिनींची नोंद आढळते. या जमिनींना त्या कुटुंबांची नावे प्राप्त झाली होती. यावरून इ. स. १४९८ पूर्वीच या घराण्यांची तेथे वस्ती झालेली असावी, असा निष्कर्ष काढला जातो.

पटवर्धन हे नाव हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखात सापडते, तर गोखले या उपनावाचा उल्लेख इ. स. १४८८ मधील एका पत्रात आढळतो. याचप्रमाणे शिदोरे आणि बर्वे ही उपनावे इ. स. १५२४ च्या चौलच्या अधिकाऱ्यांच्या दप्तरी नोंदलेली दिसतात.

आडनावांच्या इतिहासात भाषाशास्त्रीय निरीक्षणेही महत्त्वाची ठरतात. गोठणे परिसरातील एका जुन्या गोत्रावळीत ‘निमये’ असा उल्लेख सापडतो. हेच नाव पुढे ‘लिमये’ झाले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जाते. संस्कृत व्याकरणातील ध्वनीबदलांच्या नियमांच्या आधारे या परिवर्तनाचा विचार करता येतो.

आडीवरे गावातील श्री सत्येश्वर देवस्थानाशी संबंधित एक उल्लेख विशेष लक्षवेधी आहे. शके १२५० मध्ये मंदिरातील प्रमुख धार्मिक कार्यातील ‘ब्रह्मा’ या मानाच्या पदाचे अधिकार तेथील एका प्रतिष्ठित लिमये घराण्यास बहाल करण्यात आले होते. या परंपरेची आठवण म्हणून त्या घराण्यातील मंडळी स्वतःचा उल्लेख ‘लिमये ब्रह्मे’ असा करीत असत, अशी नोंद उपलब्ध आहे.

या सर्व पुराव्यांचा एकत्रित विचार केला असता एक गोष्ट स्पष्ट होते—चित्पावन आडनावांचा इतिहास हा पेशवाईपासून सुरू होत नाही. त्याची मुळे शिलाहार, कदंब आणि यादवकालीन महाराष्ट्र-कोकणाच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. प्रत्येक आडनावामागे केवळ एक कुटुंब नसून स्थलांतर, वसाहत, धार्मिक संस्था आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा अनेक शतकांचा प्रवास दडलेला आहे.

माहिती संकलक / लेखक : मोरेश्वर कुंटे

(संदर्भ – देव दर्शन, जिल्हा रत्नागिरी) 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहजीवन श्रद्धा.. – लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ सहजीवन श्रद्धा.. – लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या व्हिजीटर्सकडून फी वसूल करून ती रूग्णांच्या बिलातून वजा करतात अशा आशयाचा एक व्हॉट्सॲप मेसेज वाचला, तेव्हा आमचे धुळ्याचे परममित्र व मार्गदर्शक धरमचंद चोरडीया यांनी पक्ष-कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला फार पूर्वीचा एक किस्सा आठवला.

शहाद्याचे डॉ. कांतीलाल टाटीया हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील गरीब, वंचित आदिवासी बांधवांच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्ण वेळ झोकून दिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे – एक ज्येष्ठ स्वयंसेवक व भाजपाचे कार्यकर्ते. जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातील आदिवासी गावे, पाडे, अतिदुर्गम भागातील लहानलहान वस्त्या येथे ते जाऊन पोहोचायचे. रस्त्यांची, विहिरींची कामे, एकशिक्षकी का होईना शाळा, वनखाते, तलाठी, पोलिस या ठिकाणांची असंख्य कामं, पाण्याचे टँकर्स, आवश्यक असलेली बी-बियाणे, रोजगार, रूग्णांना, गर्भवतींना धुळ्यापर्यंत आणून उपचारांची व्यवस्था करणे, अशा कुणालाही माहित नसलेल्या रचनात्मक कामांमध्ये ते अहोरात्र बुडालेले असायचे.

भौगोलिकदृष्ट्या अवघ्या जगापासून तुटलेल्या वनवासी जीवांना जगायला सर्व मदत ते मनापासून आणि जमेल तेवढी करायचे आणि हे सगळं त्यांच्या जुनाट मोटरसायकलवर फिरून. उन्हातान्हाची, पाऊसपाण्याची, थंडीवाऱ्याची अजिबात पर्वा न करता प्रचंड प्रवास करून घराघराशी संपर्क, लग्नकार्य, उत्सव, सुखदुःखात ते सतत सामील होत.

– – – पण हे निवेदन प्रामुख्याने फक्त डॉ. टाटीयांविषयी नाही.

त्यांच्या याच वाहनाने एकदा दगा दिला. त्यांना गंभीर अपघात झाला. पायाचे हाडच मोडल्यामुळे प्रदीर्घ काळ दवाखान्यात बेडवर खिळून राहणे भाग होते.

त्यांच्या अपघाताची बातमी खेडोपाडी पोहोचायला बराच वेळ लागला. पण ती पोहोचली, तेव्हा ते दाखल असलेल्या हॉस्पिटलपुढे एक मोठीच समस्या उभी राहिली. डॉ. टाटीयांच्या समाचाराला येणाऱ्या वनवासी लोकांची जत्रेसारखी रीघ लागली.

त्यात उघडेवाघडे पुरूष होते, ठिपक्याठिपक्यांच्या तांबड्या ‘फडक्या’ डोक्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या शेकडो लेकुरवाळ्या बहिणी होत्या. म्हातारे, म्हाताऱ्या, तरूण मुलं, मजूर झाडून सगळे भेटायला येऊन जात होते. आठवड्याकाठी एखादी दहा रूपयांची नोट कशीबशी पहायला मिळणारी, ३-४ रूपये रोजावर कंबरतोड मेहनत करणारी, ही शापित माणसं.

भेटीनंतर त्या दवाखान्याच्या आवारातच ठिय्या मारून मिरच्या–भाकरी बांधलेली कळकट फडकी सोडून पोटात भरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत घरी परत जात.

उसनेपासने घेतलेले पैसे बसभाड्यासाठी खर्च करून आणि तेही शक्य नसेल, तर मैलोन् मैल रस्ता अनवाणी पायांखाली तुडवत रस्ता विचारत विचारत ही माणसं डॉक्टरांना बघायला रांगेने येत होती..

भेटणंही कसं असे? एक एक जण घाबरत घाबरत बेडजवळ जाई. शिस्तीत, आवाज न करता. डॉ. टाटीयांचा हात हातात घेई. आयाबाया त्यांची बला घेत, म्हातारी कोतारी माणसं त्यांच्या डोक्यावरून, कपाळावरून, गालांवरून मायेनं हात फिरवीत आणि गहिंवरलेल्या अहिराणीत आशीर्वाद देत…

पण हा प्रत्येक ‘व्हिजिटर’ एक गोष्ट न चुकता करीत होता. निरोपाचा रामराम झाला, की, त्यांचा हात डॉक्टरांच्या उशीखाली जाऊन बाहेर येई.

टाटीया कुटुंबातील कुणालाच कळेना, हे काय सुरू आहे? एकाला विचारले, तर उत्तर आलं, “काही नही भाऊ, आहेर करना पडस. आजारी मानुसले. ”

हे ऐकताक्षणी डॉ. टाटीयांनी चट्कन उशी बाजूला करून पाहिलं. सगळे उपस्थित थक्क झाले आणि डोळ्यांत पाणी तरारलं. काही क्षणातच त्या पाण्याचं अश्रुधारा आणि हुंदक्यांत रूपांतर झालं…

उशीखाली एक रूपया, दोन रूपये, पाच रूपयांच्या बारीक घड्या घातलेल्या असंख्य मळक्या नोटा, चार आणे, आठ आण्याची, अगदी दहा-वीस पैशांचीदेखील काही नाणी होती.

आजारी माणसाला उपचारांचा न झेपणारा खर्च असतो आणि त्याचे मित्र, सगेसंबंधी, जातभाई, रक्ताची माणसं यांनी त्यात जमेल तेवढा खारीचा वाटा उचलणं हे त्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं या धारणेतून निर्माण झालेली “आजारपणाच्या आहेरा”ची पिढ्यान् पिढ्या सुरू असलेली परंपरा ही माणसं डॉ. टाटीयांच्या बाबतीतही इमानाने पाळत होती.

खरं तर हॉस्पिटलचं बिल बरंच होणार होतं आणि टाटीया परिवारही काही फार श्रीमंत नव्हता. ही ‘आहेराची’ सगळी रक्कम मोजली तरीही दवाखान्याच्या एका दिवसाच्या खर्चाहून अधिक होणार नव्हती. पण एक रूपया, दोन रूपयांची किंमत काय असते हे धुळे जिल्हयातल्या त्या निष्कांचन, आदिवासी भागात गेल्याशिवाय आपल्यातल्या कुणालाही अजिबात कळणार नाही.

हे सगळं सांगतांना धरमचंदच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या आणि आमच्यासारख्या तरूण कोवळ्या कार्यकर्त्यांना देखील ऐकतांना अश्रु अनिवार झाले. त्या क्षणी सगळ्यांनाच असं वाटत होतं की आपणही डॉ. टाटीयांसारखंच व्हायचं.

तो निर्धार आता अनेक कारणांनी इतिहासजमा झाला. पण त्या तीव्र आणि अपूर्ण इच्छेच्या सावल्या भुते बनून अद्यापही माझ्याप्रमाणेच सर्वांना त्रास देत असणार हे नक्की.

शहरी भागात कितीही कष्ट उपसले तरीही एवढी कृतज्ञता, एवढा सन्मान, एवढं प्रेम कुणाही सामाजिक कार्यकर्त्याच्या नशिबी क्वचितच येतं.

कुणीही कसलीही भाषणं, प्रवचनं न देता, कुठलाही थोर संत न लाभलेल्या या मंडळींची चांगुलपणावरची, सत्कृत्यावरची ही श्रद्धा.

जिथे ते या जगात आले, वाढले, आणि जिथे त्यांचा जन्मभराचा रहिवास असणार होता, त्या जंगलातच उगवून वाढलेल्या झाडांइतकीच नैसर्गिक आणि तेवढीच उंची असलेली अशी ही ‘सहजीवन श्रद्धा’ आहे. नाही का?

अशी ‘मेडिकल इन्शुअरन्स स्कीम’ त्यांच्या अक्षरशत्रु पूर्वजांना शेकडो वर्षांपूर्वी सुचली आणि तिचं एका गुप्त व अखंड चालणाऱ्या परंपरेत रूपांतर झालं असणार.

आपणां तथाकथित सुविद्यांना देखील असं काही सुचेल, तो सुदिन!

परमेश्वरा, पुढील जन्मी मला फार मोठा माणूस नको बनवूस. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर तेवढंच निष्कपट प्रेम करणारा, वेळ पडली तर त्या प्रेमापोटी अगदी न झेपणारा देखील त्याग करणारा असा त्या गर्दीतील एखादा उपाशीपोटी, अशिक्षित पण कृतज्ञ आदिवासी बनलो, तरी मी तुझा आभारी राहीन.

लेखक : श्री मिलिंद हिरे 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २७ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २७ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

नाटककार रविंद्रनाथ – २ 

वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच १८८१ साली त्यांनी ‘वाल्मिकी प्रतिभा’ हे गीत नाट्य लिहिले. त्या काळात प्रसिद्ध असलेल्या बिहारीलाल रचित ‘शारदा मंगल’ या दीर्घ काव्यावर हे नाटक बेतलेले होतं. त्याच वर्षी २५ फेब्रुवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग ठाकूर कुटुंबाच्या जोराशांको वाड्याच्या गच्चीवर झाला. टागोरांच्या विशाल कुटुंबातील लोक, मित्रपरिवार व बंकिमचंद्रांसारखे अनेक सुजाण रसिक आमंत्रित होते. या नाटकातील सर्व गाणी रविंद्रनाथांनी संगीतबद्ध केली होती. कांही गाणी रागदारी वर आधारित होती तर काही चक्क इंग्रजी बॅन्ड च्या चालीवर बांधली होती. या नाटकामुळे टागोर कुटुंबीय काळाच्या पुढे एक पाऊल असल्याचं सिद्ध झालं. कारण या नाटकात स्वतः रविंद्रनाथांनी वाल्मिकीची तर त्यांची पुतणी प्रतिभा हिने सरस्वतीची भूमिका केली होती. एकोणिसाव्या शतकात कुलीन घरच्या मुलींनी रंगमंचावर पाऊल टाकणे ही गोष्ट क्रांती पेक्षा कमी नव्हती. यावर वर्तमानपत्रांतून टागोर कुटुंबावर टीका देखील झाली.

आपल्या अन्य नाटकातून देखिल त्यांनी समाजसुधारणेचा एल्गार केला होता. ‘रथयात्रा’ मध्ये चातुर्वर्ण्य पद्धतीवर टीका आहे तर ‘रक्तकरबी’ मध्ये स्वातंत्र्याच्या कल्पनेविरोधातली राजसत्ता दाखवली आहे. ‘राजा’ नाटकात सामान्य जनतेचा सत्तेत सहभाग असण्या विषयीचा आग्रह आहे. ‘विसर्जन’ मध्ये देवीला बळीचे रक्त वाहण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध संघर्ष आहे. ‘अचलायतन’ मध्ये पोपटपंचीलाच ज्ञान म्हणणाऱ्या शिक्षण पद्धतीवर भाष्य आहे. ‘डाकघर’ मध्ये नियतीचे कठोर दर्शन आहे. ‘फाल्गुनी’ नाटकातल्या कवीच्या तोंडी एक वाक्य आहे, “काव्यरचनेचं रसग्रहण करण्यापेक्षा तिच्या निर्मितीतला आनंद साजरा केला पाहिजे. ” ‘जत्रा’ नाटकात संस्कृत नाटकातल्या सूत्रधारासारखं एक सर्वगामी पात्र आहे.

‘राजा’ नाटकात प्रजासत्ताकाची कल्पना मांडल्यामुळे, हा इंग्रजांविरोधातला राजद्रोह आहे अशी हाकाटी तथाकथित राजनिष्ठांनी मारली होती. गीतनाटक, नृत्यनाटक याबरोबरच त्यांनी रोचक विनोदी शैलीत नाटकं लिहून आपल्या सर्वांगीण मुक्तीच्या विषयाचा पुरस्कारही केला आहे. ‘वैकुंठेर खाता’, ‘छात्रेर परिक्षा’, ‘सूक्ष्म विचार’, ‘अन्त्येष्टी संस्कार’

अशी उपहासात्मक विनोदी नाटके लिहून त्यांनी प्रचलित सामाजिक रूढींवर प्रहार केला आहे. ‘ताशेरे देश’, ‘शोध बोध’, ‘चिर कुमार प्रभा’ ही देखील अशीच सामाजिक रूढींवर, अंधानुकरणावर विनोदी अंगाने प्रहार करणारी नाटके आहेत.

चित्रांगदा हे नृत्यनाट्य त्यांनी वयाच्या ७५व्या वर्षी लिहिलं, ते सुद्धा अवघ्या सात दिवसांत! ‘प्रकृतीर परिशोध’ या नाटकात, मुक्तीच्या शोधात संसारातून पळून जाणं म्हणजे भ्याडपणा असल्याचं प्रतिपादन आहे. नाट्यक्षेत्रात एवढी मोलाची भर घालणाऱ्या रविंद्रनाथांना; नटश्रेष्ठ शिशिर भादुरी व श्रेष्ठ नाट्यदिग्दर्शक शंभू मित्रा यांचा अपवाद वगळता, व्यावसायिक बंगाली रंगभूमीने मात्र साथ दिली नाही.

(संदर्भ- रविंद्रनाथ तीन व्याख्याने ले. पु ल देशपांडे)

—– 

☆ गीत : ७९ ☆

IF it is not my portion to meet thee in this my life then let me ever feel that I have missed thy sight ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my 

dreams and in my wakeful hours.

As my days pass in the crowded market of this world and my hands grow full with the 

daily profits, let me ever feel that I have gained nothing ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.

When I sit by the roadside, tired and panting, when I spread my bed low in the dust, let me ever feel that the long journey is still before me ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.

When my rooms have been decked out and the flutes sound and the laughter there is 

loud, let me ever feel that I have not invited thee to my house ⎯ let me not forget for a 

moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ७९ ☆

तुला ना पाहीन,

जर हेच प्राक्तन,

सुनेसुनेच जीवन,

डोळे असुनि, आंधळा गा॥

*

इथल्या बाजारी,

नफ्यात कारभारी,

दर्शनाची उधारी,

ठेउनि व्यर्थ जन्म हा॥

*

दमुनि सांजेला,

टेकुनि माथ्याला,

येईल ध्यानाला,

अजुनि प्रवास लांबचा हा॥

*

घर माझे सजेल,

सूर सनई वाजेल,

मधु हास्यही फुलेल,

तुझ्याविना सर्व व्यर्थ बा॥

*

दर्शनास मी मुकावे,

वैषम्य मज न साहवे,

दुःख हे सतत वहावे,

स्वप्नी वा जागृतीत म्या॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत : ८० ☆

I AM like a remnant of a cloud of autumn uselessly roaming in the sky, O my sun everglorious! Thy touch has not yet melted my vapour, making me one with thy light, and 

thus I count months and years separated from thee.

If this be thy wish and if this be thy play, then take this fleeting emptiness of mine, paint it with colours, gild it with gold, float it on the wanton wind and spread it in varied wonders.

And again when it shall be thy wish to end this play at night, I shall melt and vanish away 

in the dark, or it may be in a smile of the white morning, in a coolness of purity transparent.

—–  

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८० ☆

हे दिनमणी!

हेमंती मेघावशेष फिरे नभी मी अनासक्त

जल माझे विरू दे, होऊ दे मला रिक्त

*

तव प्रकाशी लुप्त होऊ दे।

धवल रूप ते तुझे घेऊ दे।

दोघांमधले अंतर ढळू दे।

*

अशक्य जर हे!

पोकळी जाणवे अंतरात मज

विविध रंगी तव रंगू दे तिज

*

सुवर्ण मुलामा त्यावरी देई।

सोडून उनाड वार्‍यावर देई।

दिशा दिशांना पसरत जाई।

*

या नाट्याचा अंक अंतिम!

होईन निशेच्या मी तमात लुप्त

अथवा दिवसाच्या प्रकाशी लिप्त

*

अस्तित्वहीन मज रूप मिळू दे।

पारदर्शी अन् पवित्र बनू दे।

समर्पणातच लीन होऊ दे।

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत : ८१ ☆

ON many an idle day have I grieved over lost time. But it is never lost, my lord. Thou hast taken every moment of my life in thine own hands.

Hidden in the heart of things thou art nourishing seeds into sprouts, buds into blossoms, and ripening flowers into fruitfulness.

I was tired and sleeping on my idle bed and imagined all work had ceased. In the morning I woke up and found my garden full with wonders of flowers.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत :८१ ☆

पळे वाया जावी।

खंत का करावी।

त्याच्या हाती द्यावी।

सारी सत्ता॥

*

अंकुर बियांचे।

फूल कळीयांचे।

फळ हो फुलांचे।

त्याच्या हाता॥

*

दमुनि झोपतो।

स्वप्नात बघतो।

काजा संपवितो।

विठू माझा॥

*

– क्रमशः भाग २७

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भुताटकीची सायकल आणि बरंच काही – – – ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भुताटकीची सायकल आणि बरंच काही  – –  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

सुरत, गुजरात. गल्ली क्रिकेट रंगात आलेलं. पण अचानक मुलांनी क्रिकेट खेळणे थांबवले. समोर रस्त्यावरून एक सायकल येत होती. पण त्या सायकलवर कोणीही स्वार नव्हता. फक्त बाहुल्यांचे पोकळ पाय स्वतःच पॅडल मारत होते आणि सायकल चालत होती.

सुरतमध्ये ही भुताटकीची सायकल आता सगळीकडे दिसू लागली होती.

आणि या भुताटकीच्या सायकलीचा जनक होता शिवम मौर्य.

या सगळ्याची सुरुवात झाली ती शिवमच्या इलेक्ट्रिक सायकलने. तो १५ वर्षांचा असताना शाळेत सायकलने जाताना त्याला एक चढाव चढावा लागायचा, त्यात त्याची चांगलीच दमछाक व्हायची. त्यावर उत्तर म्हणून या शाळकरी मुलाने नववीत असताना, महिनोन्महिने आपले पॉकेटमनीचे पैसे वाचवले आणि आपल्या गच्चीवर त्या सायकलीला इलेक्ट्रिक सायकल बनवली.

आता चढ चढण्यासाठी, जोर लाऊन पायडल मारायची गरज नव्हती.

आता शिवमला हा छंदच जडला. त्याचे आई-वडील “शिक्षणावर लक्ष केंद्रित कर” असे म्हणत असताना, शिवम यूट्यूबवरून स्वतःच इंजिनिअरिंग शिकत होता. आपल्या प्रयोगाचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून पुढचे प्रयोग करत होता.

शिवमने इंजिनियरिंग डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर भगवान महावीर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. केले. वयाच्या २४ व्या वर्षी, शिवमचे “क्रिएटिव्ह सायन्स” नावाचे यूट्यूब चॅनल होते आणि तेव्हापान, त्यावर तो आपली एकाहून एक भन्नाट संशोधने सादर करत असतो.

मित्र गुरप्रीत अरोरा आणि गणेश पाटील यांच्यासोबत, त्याने एक वर्ष आणि १.८ लाख रुपये खर्च करून “गरुडा” तयार केली. ही भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणारी चालकविरहित सुपरबाईक होती. बॅटमॅनच्या मोटारसायकलसारखी (बॅटपॉड) हबलेस चाके. या मोटारसायकलचे निम्म्याहून अधिक भाग अक्षरशः भंगारातून घेतले होते, ही बाईक रिमोटने, तोंडी आदेशानुसार (व्हॉइस कमांड्स) आणि अगदी चालकाशिवायसुद्धा चालू शकते. तिच्यातील वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाने ती सेल्फ-बॅलन्सिंग आहे, स्टँडशिवाय सुद्धा ती न पडता उभी राहू शकते.

आज तक चॅनेलने या बाईकला “मेक इन इंडिया इनोव्हेशनचे प्रतीक” म्हटले.

याच्यानंतर आली ती भुताटकीची सायकल. फक्त ३५,००० रुपये खर्चात ३ महिन्यांत शिवमने ही तयार केली.

एका तिचाकीच्या (ट्राय-सायकल) पुढच्या चाकाला मोटर त्याने लावली आणि पॅडलला रोबोटिक मॅनक्विनचे पाय जोडले. जेव्हा मोटर पुढचे चाक फिरवत असे, तेव्हा मागची चाके चेन फिरवत. चेन पॅडल हलवत असे. पॅडल पाय हलवत. आणि यामुळे, डोके आणि धड नसलेला एक स्वार सुरतमधून पॅडल मारत जात होता असं दिसत होतं.

ही तिचाकीसुद्धा रिमोटने किंवा मोबाईल ॲपने नियंत्रित करता येते किंवा एका विशिष्ट मार्गावर, विशिष्ट स्थळी पोचण्यासाठी चालण्यासाठी तिला प्रोग्रामसुद्धा करता येते. मुले त्याच्या मागे धावत असत.

त्याने रिक्षा खेचणारा यंत्रमानव बनवला, एक चाकाची स्कूटर बनवली, एका चाकाची मोटारसायकल बनवली, इलेक्ट्रिक कॅपसुल कार बनवली, केळ्याच्या आकाराची “बनाना कार” बनवली.

आणि या सगळ्या भन्नाट उत्पादनांचे वैशिष्ट्य हे आहे की शिवमने याचे तंत्रज्ञान ना गुपित ठेवले ना त्याचे पेटंट केले. आपली ही उत्पादने कशी बनवायची याची अथपासून इतिपर्यंतची माहिती तो त्याच्या “क्रिएटिव्ह सायन्स” या यूट्यूब पेजवर शेअर करत असतो.

त्याच्या या अनोख्या पेजला तब्बल २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

डॉलर्स कमावण्यासाठी परदेशात जाऊन स्थायिक होणं म्हणजेच यशस्वी होणं या सरधोपट मान्यतेला शिवमने धोबीपछाड दिली आहे, आणि भारतातच राहून आपले तंत्रज्ञान सर्वांना देऊ करून आत्मनिर्भर “मेक इन इंडिया” ला भरघोस आणि सक्रीय पाठिंबा दिला आहे.

शिवमचे अभिनंदन आणि त्याला हार्दिक शुभेच्छा!!

 

श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares