मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके

ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.)

(मग पुढील काही दिवस canoe चालवून सराव केला गेला… यात हलत्या नावांत उभे राहून गोळीबार करण्याच्या सरावाचाही समावेश होताच. गरज पडेल तेंव्हा या canoe पाण्यात पालथ्या करून त्या पालथ्या झालेल्या canoeवर बंदुका टेकवून, पाण्यात तरंगत राहातही निशाणेबाजीचा सराव झाला! या प्रयत्नांत हत्यारे पाण्यात पडत, बुडून तळाशी जात. मग आपले पाणबुडे सैनिक ही हत्यारे शोधून परत आणीत. असे वीस पंचवीस दिवस झाल्यावर एकेदिवशी ‘टार्गेट’ (लक्ष्य)च्या किती जवळ जाता येईल याची चाचणी झाली… यशस्वी चाचणी झाली! ) 

इथून पुढे – –

दिवस… नव्हे रात्र निश्चित झाली… हल्ला करण्याची! केवळ बारा सैनिक, तीन नावा… एका नावेत मोहिमेचे नेतृत्व करणारे अधिकारी आणि इतर दोन नावांत सहा-सहा सैनिक. सैनिकांना बुलेट प्रुफ जाकेटस घालून चालणार नव्हते… कारण जर पाण्यात पडावे लागले तर वजनाने बुडण्याची शक्यता अधिक होती. अतिरेकी असलेल्या फुमदीपासून अगदी सुरक्षित अंतरावर आणखी नावांनी वेढा घातला… अतिरेकी तेथून निसटले तर ते तावडीत सापडावेत म्हणून ही योजना होती. पण यामध्ये काही झाले असते तर वेढा गोलाकार असल्याने आपला गोळीबार आपल्याच सैनिकांसाठी धोकादायक ठरू शकला असता. पण हा धोका पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हतेच. अर्थात याचाही सराव झाला होताच!

जे टार्गेट होते, त्याच्या अगदी समोर गवताचे एक छोटे बेट होते. तिथे पोहोचायचे आणि तिथून गोळीबार करावा, अशी योजना होती. त्यानुसार तीनही नावा निघाल्या आणि टार्गेटपासून सुमारे एक किलोमीटरभर अंतरावर पोहोचल्या… पाहतात तो काय? ज्या बेटावर चढून गोळीबार करायचा होता ते बेटच नाहीसे झालेले होते! गवताचा तो मोठा पुंजका वा-याने कित्येक मीटर्स दूर वाहून निघून गेलेला होता!

आता? आधी सराव झालेला असल्याने त्या नावा पलटी करणे आणि त्यांवर बंदुका ठेवून गोळीबार करणे अशी योजना झाली! पण ही बाब सोपी नव्हती… पाण्यात पोहोताना शरीर कितीतरी हलते, नाव तर हलणारच… अशा स्थितीत अचूक निशाणा कसा लागणार? अंधार तर होताच… मध्यरात्र उलटून गेलेली होती. चांदणरात्र होती म्हणून थोडं दिसत होतं. मागील नावा आणि किना-यावरून नाईट विजन यंत्रणा वापरून मोहिमेच्या प्रमुख अधिका-यांना इत्यंभूत माहिती दिली जात होती.

परंतू ते गवताचे बेटच नाहीसे झाल्याने थोडी अडचण झाली होती. म्हणून मोहिमेच्या प्रमुखांनी canoeवर उभे राहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला… पण त्यामुळे canoe कलंडली आणि साहेबांच्या सोबत त्या नावेत असलेले सर्वजण पाण्यात पडले… परंतु हत्यार हवाबंद प्लास्टिक पिशव्यांत आणलेली असल्याने बचावली! Canoe सरळ केली, तिच्यातलं पाणी काढलं… आणि मोहीम पुन्हा सुरु झाली!

ज्याने तिथली खबर आणली होती, त्या माणसाचं Code Name ठेवलं होतं… James Bond! मोहिमेचे नेतृत्व करणारे अधिकारी ज्या बोटीत बसले होते, त्या बोटीच्या पुढच्या भागात हा जेम्स बसला होता. आता तिन्ही नावा त्या अंधारातून हळूहळू मार्ग काढीत लक्ष्य जवळ करीत निघाल्या… वल्ह्यांचा (चप्पू) मात्र आवाज टाळता येत नव्हता. तेवढ्यात साहेबांच्या मानेला थंड हवेचा स्पर्श होऊ लागला… साहेब सावध झाले. त्यांच्या मागून वाहणारी हवा लक्ष्याच्या दिशेने वाहात होती… याचा अर्थ पहा-यावर असलेल्या अतिरेक्याला आवाज तर निश्चित येईल. साहेबांनी जेम्सला वल्ह्याने टोचलं! तो बिचारा.. त्याला वाटलं हे सर्व कमांडो आहेत म्हणजे काहीही करू शकतात… थेट जायचं आणि अतिरेक्यांना गोळ्या घालायच्या! पण तसं शक्य नव्हतं… काहीच वेळात या तिन्ही नावा अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात येणार होत्या… आणि लपायाला कुठेही संधी नव्हती… कारण आजूबाजूला फक्त पाणी!

साहेबांनी नावा तिथून मागे घेण्याचा आदेश दिला. आणि सुमारे चार किलोमीटर्सचा वळसा घ्यायला लावला… जेणेकरून वल्ह्यांचा आवाज अतिरेक्यांना ऐकू जाणार नाही! या कामाला आणखी दीड दोन तास लागणार होते… पण त्याला इलाज नव्हता!

दूरवर अंधारातही पाहू शकणा-या दुर्बिणीतून टेहळणी करणारे पथक साहेबांना संदेश वहन उपकरणाच्या साहाय्याने प्रत्येक गोष्ट सांगत होते… एक अतिरेकी पहा-यावर होता… त्याने त्या झोपडीशेजारी एक उंच मचाण बांधले होते… आणि तो जागा होता… हातातली विजेरी अधून मधून इकडे तिकडे फिरवत सावधपणे पहारा देत होता!

आता नशीब आपल्या सैनिकांच्या बाजूने फिरले. आधी मार्गातून वाहून गेलेली फुमदी नेमकी सैनिक ज्या बाजूने त्या बेटावर जाण्याचा प्रयत्न करणार होते… त्याच बाजूला येऊन स्थिरावली होती. तिच्यावर चढून सैनिकांनी आपापल्या शस्त्रांसाठी भक्कम जागा तयार केली! आता अतिरेक्यांना पुरते घेरले गेले होते… अकरा अतिरेकी तावडीत सापडले होते… त्यातील दहा झोपलेले होते. एक पहा-यावर होता!

ठरलेल्या बाजूने न आल्याने नेमक्या झोपड्या कोणत्या याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला होता. पण साहेबांनी किना-यावर असलेल्या पथकाकडून पुन:पुन्हा खात्री करून घेतली… कारण कोणत्याही परिस्थितीत निष्पाप सामान्य नागरीकांवर गोळीबार होऊ द्यायचा नव्हता. किना-यावरून दिसणारे दृश्य आणि आता दुस-या बाजूने आल्याने दिसणारे दृश्य यात फरक असू शकत होता. शिवाय सतत जागा बदलणारी गवताची बेटं होतीच. बेटाला वेढा घालून थांबलेल्या काही पथकांचा गोंधळ उडाला होता… त्यांना योग्य मार्गदर्शन केले गेले… आणि नक्की कोणत्या झोपड्यांवर हल्ला चढवायचा हे निश्चित झाले! अन्यथा त्या अंधारात स्थानिक गरीब मच्छीमार लोक मारले गेले असते! सतत केलेला सराव, आणि योग्य पद्धतीने योजना आखलेली असल्याने हे करणे सोपे झाले!

पहाटेचे साडेतीन वाजले होते. मचाण सुमारे १५ मीटर्स अंतरावर होतं. तेवढ्यात तो अतिरेकी पहारेकरी मचाण उतरून खाली येऊ लागला… आणि त्याच बरोबर अतिरेक्यांच्या झोपड्यांमधून चार पाच जण बाहेर पडले. त्यांचा तो नेहमीचा शिरस्ता असावा. त्यांपैकी काही जण प्रात:विधीसाठी निघाले असावेत.

मचाणावरचा पहारेकरी खाली उतरल्याची संधी साधत साहेबांनी आणि त्यांच्या सहका-याने त्यांची नाव गवताच्या फुमदीवर चढवली… गोळीबार करण्यासाठी स्थिर जागा तयार करून घेतली… दृष्टीपथात येणारे गवत थोडे थोडे करीत तोडून टाकले… जेणेकरून अचूक नेम साधता येईल!

नेमबाजीत माहीर असलेल्या साहेबांनी नेम धरला… एवढ्यात किना-यावरून संदेश आला… साहेब… आणखी एक अतिरेकी मचाण चढतो आहे. तर खरंच एक अतिरेकी मचाणावर चढताना दिसला अंधुकसा. तो वर आला आणि त्याने तिथेच आळोखे-पिळोखे देत व्यायाम करायला सुरुवात केली. आता दोन नेम धरले गेले… आपल्या आधुनिक रायफल्समधून दोन गोळ्या निघाल्या… आणि ते दोघेही अतिरेकी खाली कोसळले! काही क्षण शांततेत गेले आणि… त्या चारही झोपड्यांमधून आपल्या सैनिकांच्या दिशेने तुफान गोळीबार सुरु झाला. आपल्या सैनिकांनी केलेला सराव यावेळी कामाला आला. अवघ्या चारच मिनिटांत अकरा पैकी नऊ अतिरेकी ठार केले गेले. एक महिला अतिरेकी जखमी अवस्थेत सापडली… तिला वैद्यकीय उपचारांचे आश्वासन देऊन ताब्यात घेण्यात आले… एक अतिरेकी मात्र कट्टर निघाला… सात गोळ्या लागूनही तो जिवंत राहू शकला… त्याने फुमदी वरून खाली उडी मारून पाण्यात बुडी मारली… हलकेच डोके वर काढून गवताला धरून तो तरंगत राहिला आणि आपले सैनिक तिथून मागे फिरल्यावर एका मच्छीमाराच्या मदतीने तो किना-यावर गेला… स्थानिक डॉक्टरकडून उपचार मिळवले आणि तो घरी गेला. पण काही तासांतच त्याला पोलिसांनी अटक केली… त्याचा पाय कापावा लागला! मात्र त्याला जिवंत पकडले गेल्याने त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली!

४५ दिवसांचा सराव, योजना, योजनेत वेळोवेळी केले गेलेले बदल यांमुळे मुख्य कारवाई केवळ चार मिनिटांत आटोपली… आणि आपले सर्व सैनिक सहीसलामत परतले! ज्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली हे रोमांचक ऑपरेशन पार पडले… त्यांची ही ख्यातीच होती… त्यांनी ज्या ज्या सैनिकाला सोबत मोहिमेवर नेले… ते ते सर्व सैनिक सुरक्षित परत येत असत… कामगिरी फत्ते करूनच!

पुढील सहा दिवस या सर्व सरोवराची भारतीय लष्कराने काटेकोर तपासणी केली. अनेक हत्यारे जप्त केली… ज्यांत rocket launchers सुद्धा होते… अतिरेक्यांची तयारी पुरेपूर होती. त्यांना नेस्तनाबूद केल्यामुळे पुढील अनेक अतिरेकी कारवायांना लगाम तर बसलाच शिवाय अतिरेक्यांच्या मनात भारतीय लष्कराची भीती अधिक गडद झाली!

 या मोहिमेचे नेतृत्व अगदी स्वत: आघाडीवर राहून करणारे ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.) यांची माहिती आणि महती सांगण्यासाठी खरं तर दोन स्वतंत्र लेख लागतील. ब्रिगेडीअर साहेब आता सेवानिवृत्त असून त्यांची खूप प्रेरणादायी जीवन कहाणी विविध मुलाखती, लेख आणि बातम्यांतून मी समजावून घेतो आहे.

समाप्त

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ५४, ५५, ५६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५४, ५५, ५६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्र ५४

गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं|

अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम् ||”

अर्थभगवंतावरील या प्रेमाला कोणतेही गुण नाहीत, त्यामध्ये कोणतीही वासना नाही, ते अखंड, अतिसूक्ष्म, प्रत्येक क्षणी वाढणारे, आणि केवळ अनुभवरूप आहे.

विवेचन:

नारद मुनी इथे आपला अनुभव सांगत आहेत. आपण इथे असे समजू की नारद मुनींनी भगवंतावर कसे प्रेम केलं असेल…

इथे नारद महर्षी आपल्याला सहा गुण अथवा प्रकार सांगत आहेत. त्यातील तीन हे थोडे नकारात्मक आणि तीन सकारात्मक आहेत. आधी नकारात्मक पाहू.

१. गुणरहित: 

सर्वसाधारण मनुष्य प्रेम करतो ते स्वार्थासाठी. स्वार्थाचा रंग वेगवेगळा असू शकतो. पण खरे अर्थात भगवंतावरील प्रेम हे निःस्वार्थ असते. त्याला सत्व, रज अथवा तम असा कोणताही गुणदोष चिकटत नाही. एका अर्थाने ते निर्गुण असते.

२. कामनारहितं: 

सामान्यतः कोणतीही गोष्ट करताना प्रत्येक मनुष्याच्या मनात काही विशिष्ट असा उद्देश असतो, कामना असते. कधी ती लौकिक असते तर कधी अलौकिक. कधी सकाम असते तर कधी निष्काम. पण खरा भक्त भगवंतावर अकारण प्रेम करीत असतो. अमुक व्हावे किंवा अमुक होऊ नये म्हणून तो काहीही करीत नसतो. तो फक्त प्रेम करीत असतो.

समर्थ रामदास याचे वर्णन पुढील प्रमाणे करतात – – 

“देवाचें जें मनोगत । तेंचि आपुलें उचित।

इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥”

(दासबोध ०४. ०८. २२)

– – – जो भक्त आपल्या सर्व कामना /इच्छा भगवंताच्या इच्छेत मिसळतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो.

३. अविच्छिन्नं:

आपण सर्वांनी आपल्या लहानपणी आईकडे हट्ट करून तेलाच्या डब्यातून तेल ओतून पाहण्याचा प्रयोग नक्की केला असेल. आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ती तैलधार अखंड असते. देवावर प्रेम करण्याची सवय लावून घ्यावी. सवय झाली की ज्याप्रमाणे वाहन चालवताना गप्पा मारता येतात, गाणी म्हणता येतात, तसे प्रपंच करता करता, प्रपंचाची स्थिती कशीही असली भगवंतावर त्याचे स्मरण ठेवून अखंड प्रेम करता येते.

४. अनुभवरूपम् 

आपण अनेक वेळा एक वाक्य ऐकतो. अमक्या मनुष्याचा मी चांगलाच अनुभव घेतला आहे. याचा व्यावहारीक अर्थ असा आहे की त्या माणसाने याला वाईट अनुभव दिला आहे. भगवंताच्या प्रेमाचा अनुभव अर्थात भगवंताचा अनुभव. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासारखे व्हावं लागेल. किंवा त्याच्याशी तादात्म्य पावावे लागेल. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

“अणुरेणिया थोकडा | तुका आकाशा एवढा ||”

संत सोयराबाई म्हणतात,

“अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥”

५. सूक्ष्मतरं :

प्रेम जात्याच सूक्ष्म आहे. इथे नारदमहाराज सूक्ष्मतरं असे म्हणतात. आपली सूक्ष्मतेची व्याख्या आपल्या देहबुद्धीप्रमाणे असते. प्रेमाची अनुभूती सुद्धा अधिक सूक्ष्म असते. अशी अनेक उदाहरणे आहेत की भक्ताला कोणीतरी शारीरिक त्रास दिला आणि त्याचे वळ मात्र भगवंताच्या पाठीवर उठले. ज्ञाना नावाच्या रेड्याला पैठण येथे लोकांनी मारले आणि त्याचे वळ माउलींच्या अंगावर उठले. उदा. म्हणून आपण याचा आधार घ्यावा.

६. प्रतिक्षणवर्धमानं :

एखाद्या व्यक्तीवरील एखाद्या मनुष्याचे प्रेम ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत किंवा त्या व्यक्तीचे सौंदर्य टिकेल तोपर्यंत असते, असे आपल्या लक्षात येते. भगवंत अमर आहे, त्यामुळे त्याच्यावरील केलेले प्रेम हे सुद्धा अमर होते. मीरा प्रेमात एवढी तल्लीन होऊन गेली (अर्थात तिचे प्रेम इतके वाढत गेले..) की समोर आणलेला विषाचा प्याला ठाकूरजींचा प्रसाद समजून तिने प्यायला आणि ती अमर झाली.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्ति सूत्रे ५५

तत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव श्रृणोति

तदेव भाषयति तदेव चिंतयति ||”

अर्थ: या प्रेमाचा, अर्थात भागवतांच्या प्रेमाचा लाभ झाल्यावर तो सर्वत्र ते प्रेमच पाहतो. सर्वत्र ते प्रेमच ऐकतो. त्या प्रेमाबद्दलच बोलता आणि सर्वकाळ त्या प्रेमाचेच चिंतन करतो.

विवेचन: संत नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. माझ्यामते तो या सूत्रांचे स्पष्टीकरण अधिक सुलभतेने करू शकेल…

“तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥ नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥”

– – भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा अभंग म्हणजे नामदेवांच्या “नामभक्तिचे” एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणावे लागेल. “चक्रवाक पक्षी वियोगे बाहती । जाहले मज प्रती तैसे आता ॥” असे म्हणणाऱ्या नामदेवांना जेव्हा विठ्ठल सापडला तेव्हा त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विठ्ठल दिसू लागला. खरं तर “तीर्थ” म्हणजे पाण्याने भरलेली अशी जागा जी सहज ओलांडता येईल. म्हणून चंद्रभागा नदी हे “तीर्थ” आणि त्याकाठी वसलेलं “पंढरपूर” हे “क्षेत्र” म्हणजे स्थान! नामदेवांसाठी हे तीर्थक्षेत्र विठ्ठलमय झाले. ह्या विठ्ठल नामाच्या गजरात “माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली” आणि म्हणून “देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥. ” पुढे नामदेवांना माय, बाप, आप्त, इष्ट, गण, गोत, गुरू ह्या सगळ्यातच विठ्ठल दिसू लागतो आणि अखेर ते सुखाच्या परमोच्च बिंदूला जाऊन मिळतात, ते सुख जे ह्या मायिक विश्वाच्या अतीत आहे, जे कालातीत आहे आणि निरंतर आहे म्हणजेच “नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥”. त्या सुखाचं “निधान” म्हणजे साठाही विठ्ठलच आहे असे ते सांगतात. आता ह्या जागेला पोचल्यावर, विठ्ठलाशी एकरूप झाल्यावर मला मृत्यू जरी आला तरी त्याचे भय नाही.

नारद मुनी जी स्थिती सांगतात की भक्ति मार्गातील परमोच्च स्थिती आहे असे मला तर्काने वाटते. यानंतर काही मिळवायचे असेल किंवा मिळवायची इच्छा राहील असे वाटतं नाही.

संतांचे आपल्यावर उपकार आहेत की त्यांनी ही स्थिती अनुभवली आणि स्वतःचे अवतरण करून ती अभंगाच्या रूपात आपल्या समोर ठेवली, अन्यथा त्याची शाब्दिक अनुभूति आपल्याला घेणं शक्य झालं नसतं…!

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५६ 

गौणी त्रिधा गुण भेदादार्तादिभेदाद्वा||५६||”

अर्थसत्त्व, रज आणि तम या तीन प्रकारांच्या भेदांमुळे किंवा आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी या तीन प्रकारच्या भेदांमुळे गौण भक्तीचे तीन प्रकार होतात, करता येतात.

विवेचन: भक्तीचे प्रामुख्याने दोन भाग केलेले आढळतात. एक मुख्य भक्ति आणि दुसरी गौणी भक्ति. सर्वसाधारण मनुष्य बरेच वेळेस अपघाताने या भक्तिमार्गात खेचला जातो, असे म्हटले तर वावगे होऊ नये. कधी हा अपघात सुखद असतोझ तर बरेच वेळेस तो वेदनेचा असतो, असे आपल्या लक्षात येईल. जन्माला आला आणि भक्तिमार्गाला लागला असा जीव सापडणे म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यास सारखे म्हणता येईल..!

प्रत्येक मनुष्यच नव्हे तर सारी सृष्टि त्रिगुणाची बनलेली आहे असे आपल्या लक्षात येईल. सत्व, रज आणि तम. प्रत्येक मनुष्यात या तिन्ही गुणांचे प्रमाण कमीअधिक प्रमाणात असते. ज्याप्रमाणे ते त्या त्या मनुष्याचा अंगी हे तीन गुण असतात, त्यानुसार तो करीत असलेली भक्ति सात्विक, राजस किंवा तामस स्वरूपात प्रकट होत असते. भक्ति न करणाऱ्यापेक्षा तामस भक्ति करणारा बरा. तामस भक्ति करता करता कालांतराने बदल होऊन मनुष्य राजस भक्ति करू लागतो आणि अशी राजस भक्ति वृद्धिंगत होत गेली हा मनुष्य सात्विक भक्ति करू लागतो. या तिन्ही भक्ती चढत्याक्रमाने उत्तम मानल्या जातात.

समर्थ रामदास स्वामी या त्रिगुणांचे वर्णन पुढील प्रमाणे करतात – –

“मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा ।

त्यामध्यें सत्त्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥

सत्वगुणें भगवद्भवक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।

तमोगुणें अधोगती । पावति प्राणी ॥ २ ॥”

(दासबोध दशक २, समास ५)

आता मुख्य भक्ति कशी असते हे सुद्धा आपण अभ्यासले पाहिजे. एकूण चार प्रकारचे भक्त सांगितले जातात. याचे वर्णन गीताई मध्ये पुढील प्रमाणे आले आहे – – 

“भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना|

ज्ञानी तसे चि जिज्ञासू हितार्थी आणि विहृ़ल||”

(गीताई ०७:१६)

– – – सात्विक भक्ति फळास येते तेव्हा तो भक्त सिद्ध स्थितीस पोहोचतो.

मी आहे, हे भक्तिमार्गातील पहिली पायरी. मी आहे आणि देव आहे ही दुसरी पायरी म्हणता येईल आणि देहबुद्धीचा लय होऊन देव आहे आणि मी नाही अशी स्थिती येणे ही भक्तिमार्गातील सर्वोच्च पायरी म्हणता येईल. थोडक्यात काम्य भक्तीतून निष्काम भक्तीकडे वाटचाल होणे म्हणजे भक्तिमार्गात प्रगती होणे असे म्हणता येईल.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ५४ / ५५ / ५६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.)

मणिपुरच्या मैतेई बांधवांच्या भाषेत ‘लोक’ म्हणजे वाहता प्रवाह आणि ‘टक’ म्हणजे शेवट… टोक! ‘लोकटक’ म्हणजे वाहत्या प्रवाहाचे अंतिम टोक!

हे लोकटक म्हणजे एक विशालकाय गोड्या पाण्याचे सरोवर आहे.. क्षेत्रफळ सुमारे २५० चौरस किलोमीटर्स जे पावसाळ्यात ५०० चौरस किलोमीटर्सपर्यंत विस्तारत जाऊ शकते! आणि या सरोवरात एक जागतिक आश्चर्य नांदताना दिसते… या सरोवरात सुमारे सहा हजार माणसं राहतात!

या सरोवरात एक विशिष्ट प्रकारचे गवत उगवते आणि कालांतराने हे गवत तळापासून वेगळे होऊन पाण्यावर तरंगू लागते. तळातून सोबत आलेली माती, पाण्यातील रासायनिक घटक आणि इतर नैसर्गिक प्रक्रिया घडत जाऊन हे गवत पुंजक्या पुंजक्यांनी एकमेकाला जोडले जाते आणि दोन-तीन मीटर्स जाडी असलेले जणू एक तरंगणारे बेटच अस्तित्वात येते… असे बेट जे माणसांचे, घरांचे वजन पेलू शकेल! या पुंजक्याला ‘फुमदी’ म्हणतात. मासेमार बांधव असा फुमदी एकत्रित करतात आणि त्या जोडून एक मोठे वर्तुळ तयार करतात… त्या वर्तुळातल्या पाण्यात जाळी टाकतात व मासे पकडतात. याच वर्तुळात माशांची पैदासही केली जाते.

बांबू, प्लास्टिक आणि अन्य हलक्या वस्तू वापरून या तरंगत्या बेटांवर इथल्या मच्छीमार बांधवांनी राहण्याजोगती घरं निर्माण केलीत. सरोवरातील मासळी पकडून शहरांत जाऊन विकणे हा इथला प्रमुख व्यवसाय! वर्षाला साधारण दीड हजार टन मासळी इथून मिळते. एरव्ही ही बेटं त्या भव्य सरोवरात एकाकीच… चहूबाजूंनी पाणी आणि जमिनीवर पाय ठेवण्याचं एकमेव साधन म्हणजे निमुळत्या हलक्या, लाकडी नावा.. canoes!

मणिपूरची राजधानी इंफाळ इथून ३८ किलोमीटर्सवर आहे. शेजारचा ब्रम्हदेश मात्र इथून हाकेच्या अंतरावर… एवढा जवळ की काही तासांत तिकडे जाऊन इकडे सहीसलामत परत येता यावे!

उत्तर-पूर्व भारताचे मणिपूर… महाराजा बोधाचंद्र सिंग यांनी घेतलेल्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबर, १९४९ रोजी भारतात विलीन झाले आणि १९७२ मध्ये मणिपूरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला. परंतू साधारणत: १९६४ पासून या प्रदेशातील काही विशिष्ट समाजसमूहातील काही गट भारतापासून वेगळे होण्याच्या दृष्टीने शेजारील काही देशांच्या मदतीने भारतविरोधात सशस्त्र संघर्ष करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध नावांनी कार्यरत असलेल्या या संघटनांत हजारो सशस्त्र, प्रशिक्षित अतिरेकी होते आणि आहेत! अपहरण, हत्या आणि खंडणी गोळा करणे हा यांचा प्रमुख उद्योग आहे. भारतात कारवाया करून म्यानमार (तत्कालीन ब्रम्हदेश)मध्ये पलायन करायचे अशी यांचा कामाची पद्धत आहे.

भारताचे सार्वभौमत्व अखंडित राखण्यासाठी भारतीय सैन्यदल इथे सातत्याने डोळ्यांत तेल घालून कार्यरत असते… सीमा सुरक्षा बल, आसाम रायफल्स, आसाम पोलिस इत्यादी आणि भारतीय सैन्यातील शेकडो जवान-अधिकारी यांनी यासाठी प्राणांची आहुतीही दिलेली आहे! शिवाय घनदाट जंगल, दमट हवामान, पर्वतराजी अशी बिकट स्थिती आहेच.

२००८… याच तरंगत्या ‘फुमदी’ पैकी एका फुमदी वर काही झोपड्या होत्या. त्यांपैकी मध्यभागी असलेल्या चार झोपड्यांत दहा-बारा अतिरेकी वस्ती करून असल्याची पक्की खबर भारतीय सेनेला प्राप्त झाली! एका स्थानिक व्यक्तीला त्या अतिरेक्यांनी धमकावून पैसे मागितले होते अन्यथा त्याची हत्या केली जाईल, असा दमही दिला होता. त्या व्यक्तीच्या भावाकडून ही माहिती स्थानिक पोलिसांना आणि तिथून आपल्या सैन्याला मिळाली होती… खात्री करून घेणे गरजेचे होते… पण एवढ्या मोठ्या संख्येने अतिरेकी सापडणार असतील तर धोका पत्करणे अपरिहार्य होते!

परंतू वरिष्ठ अधिकारी अशा कोणत्याही मोहिमेला परवानगी देत नव्हते. कारण या मोहिमेत प्रचंड धोका होता. मणिपूरची त्यावेळची राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, जर मोहीम फसली तर स्थानिक जनतेचा मोठा रोष पत्करावा लागण्याची शक्यता होती… किंबहुना देशविघातक शक्ती असे काही होण्याची ववाटच पहात असतात. नकार ऐकून या मोहिमेवर जाऊ इच्छिणारे आपले कथानायक अधिकारी मनातून खट्टू झाले… पण शेवटी आज्ञा ती आज्ञाच.

परंतू दुर्दैवी योगायोगाने आपल्या बी. एस. एफ. च्या तळावर काहीच दिवसांत मोठा अतिरेकी हल्ला झाला आणि अनेक जवानांची आहुती पडली. यामुळे चिडलेल्या अधिका-यांनी या अतिरेक्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्याची व त्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता व्यक्त केली. अर्थातच या लोकटक मोहिमेस हिरवा कंदील मिळाला… आणि सैनिक, अधिकारी तयारीला लागले!

अतिरेक्यांचा ठावठिकाणा समजावा म्हणून खब-याला घेऊन सैन्य पथकाच्या प्रमुखांनी काही सैनिकांना सोबत घेऊन एका बोटीतून तिकडे प्रयाण केले. काही अंतरावर असताना त्यांना लाकूड तोडण्याचा आवाज आला. खबरी म्हणाला, “हे लोक म्यानमारमधून इकडे घुसतात, बांबू, लाकडे तोडून घेऊन जातात. ते लोक तिथून जाईपर्यंत साहेबांनी दबा धरून वाट पाहिली. कोणतीही सैन्य कारवाई करण्यापूर्वी अगदी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते! आरंभी असे ऑपरेशन अतिशय धोकादायक, अव्यवहार्य आहे, असं सांगून प्रमुख अधिका-यांनी या मोहिमेस परवानगी नाकारली होती. इथे काही हजार सामान्य नागरिकही रहात असल्याने हवाई हल्ला हा पर्याय असूच शकत नव्हता. त्यांना सर्व बाजूंनी घेरायचे म्हटले तर तिथपर्यंत पोहोचायला नावांशिवाय पर्याय नव्हता. यांत्रिक नावा, रबर बोटी वापरणे सोयीचे नव्हते… कारण सरोवरातील ‘फुमदी’ तरंगत असतात आणि सतत जागा बदलतात.. त्यांच्या गवतात नाव अडकून बसतात. दिवसा-उजेडी अतिरेक्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचायचे म्हणजे अतिरेक्यांना येणा-या बोटी सहज दिसणार… आणि त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांनी ते पाण्यातून येणा-या सैन्यावर सहज आणि अचूक गोळीबार करू शकणार! अशी परिस्थिती होती. त्यांनी गोळीबार आरंभला तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात स्थानिक सामान्य लोकांच्या जीवाला धोका होता!

इथून सुरु झालं.. ४५ दिवसांचं एक अद्भूत ऑपरेशन… एक सैन्य मोहिम… जिचं नाव ठेवलं गेलं.. ऑप. लोकटक विजय! जमिनीपासून अतिरेकी वस्ती सुमारे सात किलोमीटर्सवर असावी. विविध प्रकारची त्यावेळची आधुनिक संपर्क साधने, दुर्बिणी वापरून या वस्तीवर बारीक नजर ठेवली जाऊ लागली. एका उंच झाडावर चढून एका सैनिकाला ते ठिकाण नेमके कुठे आणि कसे आहे, यावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली गेली. त्या सैनिकाने तेवढ्या उंचीवर चढून मचाण बांधले आणि आधुनिक उपकरणे वापरून बरीच माहिती गोळा करून दिली! अचूक हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांच्या वस्तीचे निश्चित ठिकाण समजणे गरजेचे होते. त्यासाठी ज्याने खबर आणली होती, त्यालाच मासेमार म्हणून तिथपर्यंत जाऊन यायला सांगितले… त्याच्याकडे आधुनिक यंत्रणा लपवून दिली… त्यामुळे तांत्रिक भाषेत co-ordinates मिळू शकले!

नावा घेऊन जाणे अशक्य असल्याने तिथपर्यंत पोहत जाण्याचा मार्ग निवडला गेला… पण अंतर होते सात किलोमीटर्स. अवजड शस्त्रं घेऊन पोहत जाणे… कल्पना करता येईल का? यासाठी सराव पाहिजे. दिवसा सराव करता येणार नव्हता. कारण सरोवरात दिवसभर म्हणजे पहाटे चार ते रात्री दहा-साडेदहापर्यंत मासेमारी चालते… लोक सैनिकांना सराव करताना दिसता कामा नव्हते! यावर उपाय म्हणून या सरोवराच्या एका बाजूला असलेल्या चार-साडेचार किलोमीटर्स लांबीच्या एका कालव्याचा वापर करण्याचे ठरले. त्यानुसार रात्री अकरा ते पहाटे साडेतीन पर्यंत सैनिक शस्त्रं घेऊन त्या थंडीत पोहण्याचा सराव करू लागले. एवढे काटक, कणखर सैनिक परंतू इतका वेळ पोहणे म्हणजे मानवी क्षमतेची कसोटी पाहणारे ठरत होते. कित्येक सैनिक आजारी पडले आणि त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. कित्येकांचे पाच-सहा किलो वजन कमी झाले. कालव्याच्या पाण्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागला. पण तरीही सराव सुरु होताच! पण पुढे असे लक्षात आले की, एवढे पोहूनही रात्रीच्या अंधारात आणि मर्यादित वेळेत लक्ष्य गाठता येणार तर नाहीच, पण गाठले गेले तरी प्रचंड थकलेले सैनिक लढणार तरी कुठल्या बळाने!

काही दिवसांनी ही योजना मागे ठेवण्यात आली. आणि रबरी नावा आणल्या गेल्या, पण सरोवरातील गवतामुळे त्याही प्रभावीरीत्या चालेनात… अडकून राहू लागल्या. निमुळत्या नावा अर्थात canoes मधून जायचे ठरले. पण ह्या नावा स्थानिक पातळीवरून खरेदी केल्या असत्या तर त्याचा बोभाटा झाला असता म्हणून दुस-या राज्यातून त्या मागवून घेतल्या गेल्या! पण canoe चालवण्यासाठीही सराव पाहिजे. कारण canoe म्हणजे जणू सायकल. सराव नसला म्हणजे सायकल चालवताना जसा माणूस कोसळतो, तसे पाण्यात कोसळावे लागणार!

मग पुढील काही दिवस canoe चालवून सराव केला गेला… यात हलत्या नावांत उभे राहून गोळीबार करण्याच्या सरावाचाही समावेश होताच. गरज पडेल तेंव्हा या canoe पाण्यात पालथ्या करून त्या पालथ्या झालेल्या canoeवर बंदुका टेकवून, पाण्यात तरंगत राहातही निशाणेबाजीचा सराव झाला! या प्रयत्नांत हत्यारे पाण्यात पडत, बुडून तळाशी जात. मग आपले पाणबुडे सैनिक ही हत्यारे शोधून परत आणीत. असे वीस पंचवीस दिवस झाल्यावर एकेदिवशी ‘टार्गेट’ (लक्ष्य)च्या किती जवळ जाता येईल याची चाचणी झाली… यशस्वी चाचणी झाली!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ”आगळा वेगळा Father’s Day.” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “आगळा वेगळा Father’s Day” ☆ संध्या बेडेकर ☆

आज morning walk ला श्री साठे आले नाहीत. सर्वांचे एकमेकांना विचारून झाले. ज्येष्ठांचा हा दहा जणांचा गृप रोज बगीच्यात एकत्र होतो. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार व्यायाम करतात. walk करतात. सात ते आठ ही यांची व्यायामाची / walk ची ठरलेली वेळ आहे. त्यानंतर एक तास गप्पा गोष्टी.

 वर्तमान पत्रातील बातम्या, आयुष्याचे अनुभव, किस्से या जेष्ठांजवळ भरपूर असतात. नवीन टेक्नॉलॉजी चे अर्धवट ज्ञान असते, शेअर्स चे चढ उतार, अनेक अनुभवांनी श्रीमंत असलेला हा वर्ग, कधी कधी तर बायकांच्या वरताण गप्पा मारण्यात पटाईत आहेत, असं वाटतं. सध्या तर Cricket World Cup च्या रोजच मॅचेस असतात, त्यावर चर्चा होते, खरंतर गप्पा थाबवाव्या लागतात.

 येथे त्यांना हळु बोला,

अहो! हे खूपदा सांगनू झाले तुमचे,

असं म्हणणार कोणी नसतं.

सांगता सांगता विसरल तरी चालतं. नाव आणि आडनाव तर बहुतेक आठवत नाहीच, तरी सर्व ऐकतात, दाद देतात.

नाईलाजाने साधारण नऊ वाजता सगळे जण आपापल्या घरी जातात. या पिढीची शिस्त मात्र वाखाणण्याजोगी आहे. सर्व रिटायर्ड पण वेळेवर येणार अन् वेळेवर जाणार.

संध्याकाळी पुन्हा बस स्टॉप वर एकत्र भेटतात, तास दोन तास गप्पा झाल्या की आपापल्या घरी जातात.

ही मंडळी काही लहान पणापासून चे मित्र वगैरे नाहीत. Retired झाल्यावर हळूहळू एकमेकांशी ओळख झाली आणि हा गृप वाढत गेला. आता तर भेटणे हा त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांपैकी एक आनंदाचा कार्यक्रम झाला आहे. रोज सकाळी उठल्यावर बगीच्यात जायचा त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो.

काही कारणास्तव कोणी येऊ शकलं नाही तर ते स्वतः आणि बाकीचे सुद्धा बैचेन होतात. विचारपूस करताना कुठेतरी काळजी चे सूर असतात. आपली काळजी करणारे कोणी आहेत, ही भावना शक्ति देते. निराशा दूर करते. जगण्याचा आनंद वाढवते.

यांना एक गोष्ट चांगली समजलेली आहे ती म्हणजे आयुष्य आनंदात जगायला, गप्पा मारायला मित्र लागतात.

हमारे दुनिया में अकेलेपन की कोई जगह नहीं है। किसी को अपना हम बनालो  

हा मंत्र त्यांना समजला आहे.

यातील प्रत्येकाचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळा आहे. कोणी खूप चांगल्या नोकरीतून अवकाश प्राप्त अधिकारी आहेत. तर काही सर्व साधारण नोकरी केलेले आहेत. काही आजही सहजीवन जगतायेत, तर काही आज आयुष्याच्या संध्याकाळी एकटे आहेत. कोणी एकटेच राहतात तर कोणी आपल्या मुलासूने बरोबर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या घरांतील वातावरण, समस्या, आधार, प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाची लढाई वेगळी आहे.

या गृपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः चां एकटेपणा घालवायला, active रहायला एक उत्तम मार्ग शोधला आहे. मधून मधून बाहेर जेवायला जातात. पार्टी करतात.

या गृपचे काही नियमही आहेत बरं का??

आपल्या घरातील गोष्टींची चर्चा येथे करायची नाही. औषध आजारपण याबद्दल ही बोलायचे नाही. मदत हवी असल्यास निःसंकोचपणे बिनधास्त मागायची. घरच्या चांगल्या गोष्टी, आनंददायी घटना सांगायच्या, बरोबर त्यादिवशी चां चहा पण सर्वांना द्यायचा.

थोडक्यात रडगाणे गायचे नाही. आनंद शोधायचा आणि साजरा करायचा. त्यामुळे चहाच्या टपरीवर हा गृप वारंवार दिसतो.

आज माझ्याकडून चहा यांची सर्वांना आता सवय झाली आहे.

आनंदी जगायची यांनी सवय लावून घेतली आहे.

बरोबर आहे,

म्हणतात ना, •••

आनंदी जगणे ही निवड असावी, नाही की अपेक्षा. तुम्हाला तोपर्यंत कोणतीच गोष्ट आनंद देणारं नाही, जोपर्यंत तुम्ही त्याची निवड करणार नाही.

Sometimes you hv to remind yourself that life can even more beautiful even though the things are not moving in your own way. 

**आज Father’s Day **

बहुतेकांची मुलं जवळ नाहीतच. बहुतेकांना मुलांचा 

**Happy Father’s Day** असा मेसेज आला.

पण श्री साठे या मेसेज ची, फोन ची वाट बघत होते. जूने अल्बम बघत होते, डोळ्यांतून अश्रू घळघळ वाहात होते. आयुष्याचा सिनेमा *Real story * डोळ्यासमोरून सरकत होती. श्री व सौ. साठे उदास होते. कधी कधी असं होतं, कितीही मनाला समजवा, पण चांगल्या तर नाहीच नाही, पण वाईट आठवणी मनाच्या कोपऱ्यातून आपलं अस्तित्व दाखवायला जराही वेळ लावत नाही.

आज श्री साठे मुलांच्या आठवणीने उदास होते.

मागच्या वर्षी श्री साठे आजारी पडले, दवाखान्यात अॅडमिट होते. सकाळी साताऱ्याहून *तो* आला आणि संध्याकाळी परत गेला. एक दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

एक फोन करण्याइतपत ही त्याला वेळ मिळत नाही का?? मग मेसेज चे तरी काय करायचे म्हणा??

श्री साठे म्हणाले, ••• 

अग!! आपण मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवतो का?? एखादं दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

सौ. साठे म्हणाल्या, ••• 

अहो!! असेल त्याला काही महत्वाचे काम. तुमची मित्रावळ आहे की आपल्याकडे, आधार द्यायला. सोबत आहे की त्यांची.

तेंव्हाच श्री कुलकर्णी श्री साठेंची विचारपूस करायला म्हणून घरी आले होते. दोघांच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या.

एकंदर दोघांच्या मनस्थितीचा अंदाज त्यांना आला.

ते तसेच परत फिरले. श्री कुलकर्णी स्वतः बरोबरच बोलत होते. विचार करत होते.

खरंच श्री व सौ साठे मनाने हळवे झाले आहेत. बायका छोट्या छोट्या गोष्टीं आठवून रडतात. मन हलकं करतात. परंतु आज श्री साठे रडतायेत, तर रडू द्यावे. मनात साचून ठेवण्यापेक्षा रडून मोकळ व्हावे.

का पुरूषांना रडायची बंदी आहे का?? त्यांना मन नसतं की भावना नसतात?? त्यांना दुःख होत नाही का?? त्यांनी भावना का दाबून ठेवायच्या?? दुःख एकत्र झालं आणि हा बांध अचानक फुटला, स्फोट झाला तर अनर्थ होईल. •••

भावनांचा बांध फुटण्याआधी त्याला outlet देणे आवश्यक आहे. 

काय करणार?? लहान पणापासून मुलांनी हेच ऐकलेल असतं ना.

अरे!! तू मुलगा आहेस ना तरी रडतो. मुलं रडत नाहीत. 

हे चूकच आहे.

मनसोक्त हसावं, तसंच जेंव्हा रडावसं वाटतंय तेंव्हा मनसोक्त रडाव सुद्धा. रडून मन हलकं होतं. मनावरचं प्रेशर कमी होत. मनातील अडगळ, कचरा बाहेर पडणं आवश्यक आहे.

आपल्याच विचारात श्री कुलकर्णी घरी आले. त्यांना अस्वस्थ बघून सौ कुलकर्णी नी विचारले •••

काय झाले.?? तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात??

श्री कुलकर्णीचें बोलणे ऐकून सौ कुलकर्णी ना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, •••

 ** आज सर्वांना घरी बोलवा हो. बहुतेकांची मुले बाहेरच आहेत. आपण सर्व एकत्र बसून, गप्पा मारू. सर्वांनाच बरं वाटेल आपला अजय तरी आपल्या जवळ कुठे आहे??

आज गृपवर श्री कुलकर्णी यांनी सर्वांना आमंत्रणाचा मेसेज पोस्ट केला.

आज माझ्याकडून वडापाव आणि चहा पार्टी.

सर्वांनी संध्याकाळी घरी यावे.

मी आणि आपण सर्वच चांगले बाबा होतो. आपली सांपत्तिक परिस्थिती, क्षमता, कुवतीनुसार आपण सर्वांनी आपापले परिवार छान सांभाळले. आज आपण सर्व आपल्या स्वतः चाच कौतुक समारंभ साजरा करूया. स्वतः चीच पाठ थोपटूया. 

**Father’s Day ** साजरा करूया.

आज श्री कुलकर्णींच्या घरी आगळावेगळा Father’s Day झाला. काहींच्या सौ. पण आल्या होत्या.

श्री व सौ साठेही आले होते. गप्पांत रंगले होते.

श्री व सौ कुलकर्णी यांचा उद्देश सफल झाला होता. खरंतर आजची पार्टी खास करून त्यांच्या साठीच होती.

बरोबर आहे, ••••

 ***आज कोणीतरी आपल्या मुळे आनंदी आहे. ***

ही एक सर्वोत्तम feeling आहे. ***

**When life gives you hundred reasons to break down and cry. Show life you have millions reasons to smile and laugh. ***

एकतर म्हातारपण म्हणजे वेगळीच फेज, त्यात शरीर नाजूक आणि मन हळव झालेलं असतं. त्यात भरपूर रिकामा वेळ हातात असतो. प्रत्येकाचे प्रश्न, समस्या, वेगवेगळे असतात. फक्त ते 

**स्वीकार करायची हिम्मत असावी/ ठेवावी, आणि त्याच परिस्थितीत सुधार करण्याची ईच्छा असली तर, ••••

Life becomes easy and happy. 

म्हणतात ना, •••

**You can not find happiness with negative mindset. Start thinking positive and happiness will find you. **

 श्री व सौ कुलकर्णी सारखा एक तरी मित्र प्रत्येकाला नक्की असावा.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अंधारातून प्रकाशाकडे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अंधारातून प्रकाशाकडे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

खूप वर्षापूर्वी`रिडर्स डायजेस्टमध्ये वाचलेली ही कथा. ती मनाच्या कुपीत कायमची वसली.

तेरा-चौदा वर्षाचा अंध मुलगा डेव्हिड हार्टमन, आपल्या बाबांना मोठ्या उमेदीने विचारतो, `बाबा… अगदी मनापासून सांगा हं… मी डॉक्टर होऊ शकेन? ‘

स्वभावाने प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले त्याचे बाबा आतून हलतात. एकदम गप्प होतात. गहन विचारात गढून जातात. `काय सांगायचं या अंध मुलाला? पण या अति उत्साही आणि उमद्यामुलाचा तेजोभंग तरी कसा करायचा? ‘

ते म्हणतात, `डॉक्टर? बेटा, तू प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल? तू प्रयत्न करशील ना? ‘

जन्मताच डोळ्याच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन आलेला डेव्हिड, आठ वर्षाचा झाला आणि त्याला पूर्ण अंधत्व आलं. तेव्हापासून तो आपल्या बाबांना, `मी हे करू शकतो का? .. ते करू शकतो का? … ‘ असं सतत विचारायचा.

दहा वर्षाचा असताना त्याने बाबांना विचारले, `बाबा, मी बेसबॉल खेळू शकेन? ‘

`वेल, चल! प्रयत्न करूया. ‘ त्याचे बाबा म्हणाले. त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला. बाबांनी तो बॉल जमिनीवरून सरपटत त्याच्या दिशेने सोडायला सुरुवात केली. डेव्हिड हळूहळू बॉलच्या गतीचा आवाज ओळखून बॉल पकडायला शिकला. नंतर तो बॅटिंग शिकला. गवतातून फिरत येणार्‍या बॉलचा आवाज एकदम आतून ऐकून तो बॉल कॅच करायला शिकला. काही काळाने त्याने यात प्राविण्य मिळवले.

Realm of possibility… काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात… या तत्वानुसार डेव्हिडच्या कुटुंबाने दृढ निश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी बनवायला सुरुवात केली. काही वेळा काहीच न दिसल्यामुळे तो रडायला लागायचा आणि म्हणायचा, `ममा, मी काहीच करू शकत नाही. ‘ मग त्याची आई त्याला कुशीत घेऊन म्हणायची, `माहीत आहे रे… ‘ डेव्हिडची बहीण बार्बरा मात्र कठोर होती. अर्थात त्याच्या भल्यासाठीच. आपलं ब्रेलचं घड्याळ जर पहिल्या मजल्यावर विसरला, तर डेव्हिड तिला आणून द्यायला सांगायचा. बार्बारा म्हणायची, `तुझा तू जा आणि आण. तुला काय वाटतं, कायम तुझ्या दिमतीला कुणी ना कुणी असणार आहे? ‘ 

– – तर असा डेव्हिड मोठा होऊ लागला. त्याला नक्की कळलं, की अंधत्व ही ट्रॅजिडी नाहीये. आपण काहीही करू शकतो. त्याचा हा आत्मविश्वास दिवसेंदिवस बळावत गेला. तेराव्या वर्षी त्याने आपल्या आई-बाबांना आणि बहिणीला सांगून टाकलं, की त्याला डॉक्टर व्हायचय…

डेव्हिडने शिक्षणाचा मार्ग नक्की केला आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरू केला. त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव `हारटाउन्स हायस्कूल ‘ मध्ये घातलं. सगळ्यांना Realm of possibility चं.. तत्व मान्य होतं, तरीही… मनोदोष चिकित्सक होणं, त्या Realm of possibilityच्या नक्कीच बाहेरचं होतं. त्यांना वाटत होतं, डेव्हिडची महत्वाकांक्षा मूर्खपणाची आहे. कॉलेजमध्ये त्याच्या शिक्षकांनीदेखील त्याला समजावायचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, `तुझ्या आवाक्यातले इतर विषय का निवडत नाहीस? म्हणजे इतिहास वगैरे… ‘

डेव्हिड म्हणाला, `मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये. `मला दिसत नाही, हे खरय, पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व असतंच! मला वाटतं, जे कुणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत, ते खरं तर अपंग आहेत. मी सायकीअ‍ॅट्रिस्ट व्हायचं ठरवलय, कारण माझा माझ्यावर ठाम विश्वास आहे. मी डॉक्टर झाल्यावर माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकेन. ‘

कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात त्याची भेट, मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या चेरील वॉकरशी झाली. हिरवे डोळे असलेली ही चेरील वॉकर अतिशय हुशार होती. नंतर त्यांच्या मैत्रिचं रुपांतर त्यांच्या प्रेमात झालं. १९७२मध्ये कॉलेजमध्ये असताना त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले.

डेव्हिडने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केले. त्यापैकी आठ कॉलेजेसनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला. २७ एप्रीलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजमधूनही नकाराचं पत्र मिळालं. त्याला वाटत होतं, की हे कॉलेज तरी त्याला प्रवेश देईल. पण इथेही नकारच आला. डेव्हिड मनातून एकदम खचला. हताश झाला.

– – फिलाडील्फियामधलं दहावं कॉलेज, टेंपल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन… त्याचे असिस्टंट डीन आणि प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख होते, डॉ. एम. प्रिन्सब्रिगहॅम. त्यांनी डेव्हिडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं. त्यांनी सांगितलं, `जर आपण ऑलिम्पिकच्या समितीत असतो, आणि शंभर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता, तर आपण त्याला धावू दिलं असतं ना! … डेव्हिडने आधीच अनेक अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरित्या करून स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया, तो कुठपर्यंत जातो. ‘

दुसर्‍या दिवशी डेव्हिडला त्याच्या आईचा फोन आला, ती म्हणाली, `तू खूप दिवस ज्याची वाट पाहत होतास, ते पत्र तुला आलय. ‘ त्याच्या आईचा आवज दाटून आला. तिला पुढे फोनवर बोलणं अशक्य झालं. बार्बाराने फोन घेतला आणि म्हणाली, `यू हॅव डन इट… ‘ तिलादेखील अश्रू आवरले नाहीत. `तुला टेंपल युनिव्हर्सिटीने स्वीकारलय. ‘ आणि डेव्हिड ध्येयाच्या वाटेवर चालू लागला.

… वाट बिकट होती. डेव्हिडला त्याची कल्पनाही होती. पण त्याला डोंगरमाथा आणि तिथून दिसणारं निसर्गाचं दिव्य रूप… त्याचं ध्येय दिसत होतं.

सुरुवातीलाच त्याला अ‍ॅनाटॉमीच्या इंट्रोडक्टरी कोर्सेसच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या. हातात रबराचे ग्लोव्हज घालून, अनेक मोठे अवयव तो चाचपून ओळखायला लागला. पण लहान अवयव विशेषत: nerve plexuses ओळखायला त्याला ग्लोव्हज काढावे लागले. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधीर होत. हे सगळं चालू असताना डेव्हिडने या विषयांना अनुसरून असलेली असंख्य पुस्तके विकत घेतली. या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिकाही विकत घेतल्या.

मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेव्हिड आणि चेरीने लग्न केले. तिसर्‍या वर्षात असताना खरं आव्हान सुरू झालं. युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये रोग्यांना तपासणं, त्यांना ट्रीटमेंट देणं सुरू झालं. त्याला x-ray बघता येत नसल्याने, तो कान, डोळे, तोंड आपल्या सहका-यांच्यावाचून तपासू शकत नसे. x-ray चं वर्णन त्याला त्याचे सहकारी किंवा नर्स सांगतील, त्याप्रमाणे त्याला उपचार करावे लागत. त्या बाबतीत तो त्यांच्यावर अवलंबून होता, पण पुढे त्याने स्टेथॉस्कोप आणि स्पर्शज्ञान खूप विकसित केलं.

२७ मे १९७६ला त्याला मेडिकलची डिग्री मिळाली. त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली, की तो इतरांपेक्षा वेगळा नाही. त्याला अगोदर नकार देणारे प्रोफेसरही पदवीदान समारंभाला आले होते. ते म्हणाले,

` Devid is not normal… he is super normal… ‘

अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर. त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. अनेक लोक त्याच्या जिद्दीवर, अथक परिश्रमावर, दिगंत आत्मविश्वासावर भरभरून बोलले. RFB चे प्रेसिडेंट जॉन कॅसल, त्याचं कौतुक करताना म्हणाले, ‘माणसाच्या अत्युच्च तेजाचं हे दर्शन आहे. ‘ भाषण संपवताना ते म्हणाले, `डेव्हिडच्या या उदाहरणाने, आपल्याला एक नवीन विश्वास मिळालाय, तो म्हणजे, माणसाला काहीही मिळवणं शक्य आहे. ‘

… सभागृहातील सगळे जण त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले.

– – डेव्हिडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं, `माझ्या बाबांचं बरोबर होतं. ते म्हणायचे, ‘ प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल, तू काय करू शकशील ते? ‘

– – – आपण आपल्याकडे सगळं आणि भरभरून असलं, तरी `हे नाही, ते नाही’, म्हणून रडगाणं गातो. डेव्हिडचं आभाळाएवढं कर्तृत्व आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल.

लेखक :  अज्ञात 

प्रस्तती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

आमचे एक सुहृद शांतिनिकेतनच्या विश्वभारती संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले होते. तेंव्हा त्यानी मला हा फोटो पाठवला व सांगितले की हे रविंद्रनाथ टागोर यांचे नोबेल पुरस्कार पदक आहे पण मूळ पदक नाही तर त्याची प्रतिकृती आहे कारण मूळ पदक २५ मार्च २००४ रोजी चोरीला गेलं म्हणून नोबेल फाउंडेशनने ही प्रतिकृती डिसेंबर २००४ मध्ये विश्वभारती संग्रहालयाला भेट दिली आहे.

मला हे ऐकून धक्काच बसला. ज्या पदकाचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला पाहिजे, ते पदक कुणी चोरू कसं शकतं? जे पदक आजपर्यंत दुसरं कुणीही मिळवू शकलं नाही. एवढी दुर्मिळ, लाख मोलाची वस्तू, जी पुढच्या पिढ्यांना शतकानुशतके प्रेरणा देत राहिली असती ती कांही पैशांसाठी चोरायची? नोबेल फाउंडेशनने त्याची प्रतिकृती दिली म्हणून बरे, नाहीतर पुढील पिढ्यांना हे पदक डोळे भरून बघायला सुद्धा मिळालं नसतं. तरीपण त्या खालच्या ‘Replaced’ या शब्दाने प्रत्येक भारतीयाची मान शरमेने खाली जातच असणार आणि जातच राहणार. हा भारतमातेच्या शुभ्र वसनावरचा कधीही पुसला न जाणारा डाग आहे. ज्या पदकामुळे भारतमाता गौरवान्वित झाली होती, त्याच पदकाच्या चोरी मुळे ती अवमानित झाली आहे. याहून शरमेची गोष्ट म्हणजे आजतागायत या चोरीचा छडा लागलेला नाही. असो. आपण प्रतिकृती मध्येच समाधान मान

 

गीत : ४३

THE day was when I did not keep myself in readiness for thee; and entering my heart 

unbidden even as one of the common crowd, unknown to me, my king, thou didst press 

the signet of eternity upon many a fleeting moment of my life.

And to-day when by chance I light upon them and see thy signature, I find they have lain scattered in the dust mixed with the memory of joys and sorrows of my trivial days forgotten.

Thou didst not turn in contempt from my childish play among dust, and the steps that I heard in my playroom are the same that are echoing from star to star.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४३ ☆

*

अज्ञानाचा मेरू

लिप्त मी संसारू

मनाचे ते वारू

उधळतसे॥

*

ना सांगावा धाडला

नकळत आला

प्रवेश त्वां केला

माझ्या काळजात॥

*

माझे किती क्षण

तुझे स्पर्श लेवून

अमर होऊन

विस्मरतो मी॥

*

आज पाही जेंव्हा 

त्या क्षणांकडे तेंव्हा

तुझिया स्पर्शाची

अनुभूती येते॥

*

जपून ना ठेविले

मोल ना जाणिले

उदारे जे दिले

पडे धुळीमध्ये॥

*

माझे मूढपण

बाल्य समजून

मान अपमान

लेखिशी समान॥

*

अप्रुप त्या दिसाचे

तुझ्या पदरवाचे

दैवी अस्तित्वाचे

कळले नाही॥

*

ब्रम्हांडी ध्वनीत

पदरव होत

ताऱ्यांवर तेथ

ऐकू येती॥

*

आता चमत्कार

फोल बाह्यात्कार

होई साक्षात्कार 

अंतिम वेळी॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

——

☆ गीत : ४४ ☆

THIS is my delight, thus to wait and watch at the wayside where shadow chases light and the rain comes in the wake of the summer.

Messengers, with tidings from unknown skies, greet me and speed along the road. My heart is glad within, and the breath of the passing breeze is sweet.

From dawn till dusk I sit here before my door, and I know that of a sudden the happy moment will arrive when I shall see.

In the meanwhile I smile and I sing all alone. In the meanwhile the air is filling with the perfume of promise.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४४ ☆

*

कधीतरी बसतो, रस्त्याच्या कडेला

प्रकाश सावल्यांचा खेळ पाहण्या

आणि अनुभवतो पहिला पाऊस,

जो येतो ग्रीष्माची चाहूल देण्या

*

असेच भेटतात प्रेषित मजला,

नभाशी अनामिक बंध बांधण्या

अशीच वाऱ्याची झुळूक येते,

सुवासांचा गोडवा चाखण्या

*

बसतो दारी, उषेपासून निशेपर्यंत,

क्षण सुखाचा अवचित वेचण्या

झोका हवेचा अलगद येतो,

सुगंध आश्वासक वचनांचा भरण्या

*

एकटाच मग मी मन भरुन हसतो,

बंद मुठीतील सुख वाटण्या

अजूनही दारी मी बसतोच आहे

आलाच तो, तर संधी न दवडण्या

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ४५ ☆

HAVE you not heard his silent, steps? 

He comes, comes, ever comes.

Every moment and every age, every day and every night he comes, comes, ever comes.

Many a song have I sung in many a mood of mind, but all their notes have always proclaimed, “He comes, comes, ever comes. ” 

In the fragrant days of sunny April through the forest path he comes, comes, ever comes.

In the rainy gloom of July nights on the thundering chariot of clouds he comes, comes, ever comes.

In sorrow after sorrow it is his steps that press upon my heart, and it is the golden touch of his feet that makes my joy to shine

—–

मराठी भावानुवाद : गीत ४५ ☆

*

दिवस असो वा रात्र असो,

बाल्य असो वा जरा

त्याचे पदरव पडती कानी,

तो येतो, येतोच खरा॥

*
गीते गातो प्रीतीची,

कधी विरहाची 

कितीक त्या तऱ्हा

परि शब्दांचा घोष एकच,

तो येतो, येतोच खरा॥

*

वसंतातला सुगंध प्राशिता 

वा धुंद बरसता जलधारा

दौडत दौडत मेघ-रथातून,

तो येतो, येतोच खरा॥

*

चरण कमल ते हृदयी उमटे,

हरवता जीवनी किनारा

हेम-स्पर्श तो कुशीत घेतो,

तो येतो, येतोच खरा॥

*

– क्रमशः भाग १५.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बुद्धी दे रघुनायका” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बुद्धी दे रघुनायका” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

साधक समर्थांच्या अंतःकरणातील आर्त स्वर

प्रस्तावना

दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची कबुली आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.

समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. _“युक्ति नाही बुद्धि नाही”_ अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ कबुली देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे !

ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.

आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.

साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही कबुली म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.

मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…

मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.

ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.

परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका.

हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.

सामाजिक अपुरेपणाची वेदना

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…

येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?

ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.

असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश

चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…

मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.

कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…

येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.

निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…

ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.

समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.

समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया

ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.

स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे बुद्धी दे रघुनायका.

ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.

समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—

मी कमी पडतोय देवा… मला सद्बुद्धी दे.

– – – 

☆ “संध्या तांडव” ☆ श्री दिवाकर बुरसे

(राग शंकरा)

समर्थांची मूळ कविता…

 बुद्धि दे रघुनायका 

*

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥

*

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥

कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥

*

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥

बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥

*

तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥

सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥

*

नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥

अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥

*

प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥

मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥

*

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥

*

चित्त दुश्चित्त होता हे। ताळतंत्र कळेचिना॥

आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥

*

काया वाचा मनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥

हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥

*

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥

आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥

*

– – – सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामी

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ … आणि पायऱ्या बोलू लागल्या… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ … आणि पायऱ्या बोलू लागल्या… ☆ श्री जगदीश काबरे ☆

राष्ट्रीय विज्ञान दिनी सांगली जवळील जयसिंगपूर येथील ‘अनेकांत इंग्लिश मीडियम’च्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे आणि व्याख्याता म्हणून जायची संधी मिळाली होती. त्या शाळेला भेट दिल्यानंतर प्रथमदर्शनी नजरेत एक अशी विशिष्ट गोष्ट भरली की, जी मला संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शाळांमध्ये गेली 40 वर्षे व्याख्यानासाठी जात असतानाही कुठेही निदर्शनास आलेली नव्हती – अगदी इंटरनॅशनल बिरुद लावलेल्या शाळेतही. ती म्हणजे या शाळेच्या पायऱ्या बोलक्या आहेत. आश्चर्य वाटले ना! बोलक्या पायऱ्या…? त्या तर निर्जीव असतात. मग त्या कशा काय बोलतील? थांबा साथींनो, असे आश्चर्यचकित होऊ नका. सांगतोच तुम्हाला नेमके त्या पायऱ्यांनी मला काय दाखवले ते…

तुम्हाला माहीतच आहे की, जिन्यावर साधारणत: दहा पायऱ्यानंतर सपाटी असते. तर अशा प्रत्येक दहा पायऱ्या विविध रंगात रंगवलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना चढताना शिक्षित करत होत्या. म्हणजे असे की, पहिल्या दहा पायऱ्यांवर ‘2 ते 10’चे पाढे लिहिलेले होते. दुसऱ्या दहा पायऱ्यांवर ‘2 ते 30’चे वर्ग आणि एक ते दहा पर्यंतचे घन लिहिलेले होते. तिसऱ्या दहा पायऱ्यांवर रासायनिक पदार्थांची नावे आणि त्यांची सूत्रे लिहिलेली होती. चौथ्या दहा पायऱ्यांवर वजन, लांबी आणि आकारमानांची मापे लिहिली होती. तर पाचव्या दहा पायऱ्यांवर विज्ञानातील शोध आणि शोधक यांच्या जोड्या लिहीलेल्या होत्या. सहाव्या दहा पायऱ्यांवर देशातील विविध राज्ये आणि त्यांच्या राजधान्या लिहिल्या होत्या. सातव्या दहा पायऱ्यांवर सेकंदापासून वर्षापर्यंतची कालगणना लिहिलेली होती. आठव्या दहा पायऱ्यांवर 11 ते 30 पर्यंतचे पाढे लिहिलेले होते. महत्त्वाचे म्हणजे जिथे फक्त दोन-दोन पायऱ्या होत्या तिथे त्यांनी विषम संख्या आणि सम संख्यांची मांडणी केली होती.

आता मला सांगा, ही अभिनव कल्पना आहे की नाही? कारण दररोज विद्यार्थी त्या पायऱ्या चढत असताना या गणिती संख्या त्यांच्या डोक्यात घट्ट बसतील आणि त्यांची गणिताविषयीची भीती कमी होईल, अशी या पायऱ्यांची तजवीज केलेली आहे. म्हणूनच म्हटले की, या बोलक्या पायऱ्या शिक्षकांची पुस्तकी ज्ञानापलीकडे शिक्षण देण्याची वृत्ती दाखवतात. असे जर संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये घडले तर किती चांगले होईल! नाही? अनेक विद्यार्थ्यांच्या मनातून गणिताची भीती तर पळून जाईलच; पण शिक्षणाची गोडीही त्यांच्यात निर्माण होईल. या शाळेतील शिक्षकांचे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

(सूचना : छायाचित्रावर क्लिक करून ते झूम करून पहावे म्हणजे पायऱ्या तुमच्याशीही बोलू लागतील.)

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कोई मौसम नहीं होता… – लेखिका : वसुंधरा काशीकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कोई मौसम नहीं होता… – लेखिका : वसुंधरा काशीकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

एक इंचसुद्धा अवैध बांधकाम करणार नाही अशा दुर्मिळ तत्ववादी माणसांपैकी एक असलेला तो आर्किटेक्ट. महानगर पालिकेत त्याच्या सहीचा बांधकाम प्लॅन आला की, अधिकारी तो न बघता मंजूर करत. कारण त्याने प्लॅन केला आहे तर त्यात काहीही गैर नसणारच ही खात्री होती.

ती भारतीय शास्त्रीय संगीताची प्राध्यापक. अभिजात-अभिरुचीसंपन्न जोडपं. त्यांना मधुरा नावाची एक गोड, ८-९ वर्षांची चुणचुणीत मुलगी. असं सगळं छान. पण सगळं छान छान राहत नाही… हीच तर जीवनाची खरी गंमत आहे… एक दिवस मधुरा मैत्रिणींसोबत नदीवर खेळायला जाते आणि जे होऊ नये ते होतं… नदीच्या पाण्यात मधुरा वाहून जाते. जीवनात कोणतंही दु:ख चालेल पण अपत्य जाण्याचं दु:ख शत्रूच्याही वाटयाला येऊ नये.

अमरावतीचे गझललेखक, शायर आणि आर्किटेक्ट विश्वजीत तुळजापूरकर यांच्या जीवनात घडलेली ही सत्य घटना. तुळजापूरकरांचं आयुष्य या घटनेनं बदलून गेलं. त्यानंतर तुळजापूरकर यांनी ‘मधुरा’ नावाचा कवितासंग्रह लिहिला जो मौज प्रकाशनानं छापला. ‘किसी पर दिल के आने का कोई मौसम नहीं होता’ ही तुळजापूरकरांनी मुलगी गेल्यानंतर लिहिलेली गझल. तुळजापूरकरांच्या ‘बात ज़रासी’ या गझल संग्रहात ही गझल आहे. ही गझल वेगळ्या दृष्टीनं महत्वाची आहे कारण शायर स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात आत्यंतिक दु:खाला सामोरा गेला आहे. पोटचं मुल जाण्याचं दु:ख शायरनं भोगलं आहे.. अनुभवलं आहे… तरीही शायर म्हणतो ‘’खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता’’… एवढं दु:ख भोगल्यावर असं लिहायला खूप ‘कलेजा’ लागतो… आणि म्हणून या गझलेला वेगळं मूल्य आणि महत्व प्राप्त होतं ते यामुळेच.. सलाम!!

सामान्यत: गझलेबाबत फार कमी गझला या आशावाद दर्शवणाऱ्या असतात असं म्हटलं जातं. पण ही गझल मात्र त्याला अपवाद आहे.

दरिचा एक कमसे कम खुला रखिये सदा घर का

खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता..

दरिचा म्हणजे खिडकी… घराची किमान एक खिडकी कायम उघडी ठेवा. ही खिडकी प्रतिकात्मक वापरली आहे.. ही खिडकी उमेदीचे प्रतिक आहे… शक्यतेचे प्रतीक आहे… सध्याच्या घडीला आयुष्यात कदाचित दु:ख असेल, प्रतिकूलता असेल पण ही परिस्थिती अशीच राहणार नाही. तुम्ही लढाई हरत असाल पण युद्ध जिंकू शकता. भविष्य सुंदर.. आश्वासक असू शकतं.. म्हणून ‘खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता’… अनेकदा आयुष्यात नाती तुटतात. नात्यांमध्ये दुरावा येतो. त्यावेळी होणारी मनाची तगमग, घालमेल भयंकर असते. काही लोक आयुष्यभर ते नात्यांचं तुटलेपण घेऊन जगाशी फारकत घेऊन बसतात. अशा लोकांसाठी शायर म्हणतो… ”ज़रा हँस कर किसी से बात करने में बुरा क्या है”???….

एका नात्यात अपयश आलं म्हणून सर्वच नात्यात अपयश येईल असं थोडंच आहे. आणि नवं नातं जोडणं हा काही गुन्हा असू शकत नाही. ‘नयें रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता’.. या शेरवर मला नारायण सुर्वेंची एक कविता आठवतेय.. कविता पत्नीला उद्देशून आहे. स्वत:च्या मृत्यूनंतर कवी बायकोला तीनं काय करावं याबद्दल काय सुंदर सांगतोय..

जेव्हा

मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन,

तेव्हा तू एक कर,

तू नि:शंक मनाने डोळे पूस.

ठीकच आहे,

चार दिवस धपापेल जीव गदगदेल

उतू जाणारे हुंदके आवर

कढ आवर, नवे हिरवे चुडे भर

उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नको !

खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर!

मला स्मरून कर

हवे तर, मला विस्मरून कर !

यातलं चिरवेदनेच्या नादी लागू नको… हे किती महत्वाचं.. जगणं हा कायम उत्सवंच असायला हवा… म्हणून ‘नये रिश्ते बनानें का कोई मौसम नहीं होता’… जे मनात आहे ते सांगून दयावं मोकळेपणाने.. तो राग असेल वा प्रेम.. ’ज़ुबा पर बात लाने का कोई मौसम नहीं होता… ’

ही गझल ऐकताना मला खूपदा Shawshank Redemption या चित्रपटातलं वाक्य आठवतं. नायक म्हणतो, Remember Red, hope is a good thing, may be the best of things, and no good thing ever dies. फारच अप्रतीम सिनेमा… कितीतरी अर्थांच्या शक्यता दाखवणारा हा सिनेमा. पण यातला मला अत्याधिक आवडलेला एक अर्थ म्हणजे आशा.. उम्मीद.. Hope.. आणि प्रयत्नवाद.. बायकोच्या खुनाच्या खोट्या आरोपात अडकलेला नायक… जेलमध्ये गेल्यावर कसल्या कसल्या संकटातून स्वत:ला निभावत नेत तो स्वत:ची सुटका करुन घेतो. त्याचा अतूट आशावाद… प्रयत्नांची पराकाष्ठा हे बघण्यासारखे आहे. मी Spoiler होणार नाही तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच ते बघावं.

‘किसी पर दिल के आने का कोई मौसम नही होता’ ही गझल ऐकताना मला हा चित्रपट आठवतो. आयुष्यामध्ये जोवर आपण डाव सोडून उठत नाही तोवर संपलं असं काही नसतंच. आयुष्यात कोणत्याही वयामध्ये तुम्ही नवी इनिंग सुरू करु शकता.

दाजीसाहेब पटवर्धनांनी वयाच्या ५६ व्या वर्षी कुष्ठरोग्यांसाठी अमरावतीला तपोवन सुरू केलं. शरद जोशींनी वयाच्या ४५ व्या वर्षी शेतकरी संघटना काढली. नेल्सन मंडेला २७ वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अगदी आताच उदाहरण घ्यायचं झालं तर मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद हे वयाच्या ९४ व्या वर्षी २०१९ साली मलेशियाचे पंतप्रधान झाले. तेव्हा आयुष्य कुठुनही सुरू करता येतं.

मला स्वत:ला या गझलेची चाल खूप म्हणजे खूपच आवडते. गझल गायक आणि माझा मोठा भाऊ आल्हाद काशीकर याने ही गझल गायली आहे. या गझलेच्या मूडला साजेशी अशी चाल त्यांनी दिलीय. अतिशय सुंदर… मेलोडियस अशी कंपोझिशन आहे.. आणि आल्हाद काशीकर यांनी अतिशय मन लावून ही गझल त्यांच्या सुकुनभऱ्या आवाजात गायली आहे. आत्मस्तुतीचा दोष पत्करुन सांगते मी अक्षरश: हजारो गझला ऐकल्या आहेत. आणि मला त्या तोंडपाठ आहेत. कोणी विचारलं की सगळ्यात आवडती गझल कोणती तर मी निर्विवाद ‘किसी पर दिल के आने का’ ही गझल सांगेन… कारण त्यातील आशावाद आणि तुळजापूरकरांनी ज्या Background वर ही गझल लिहली आहे ती पार्श्वभूमी… क़ैफी आज़मींच्या शब्दात…

जिस तरह से हंस रहा हूं मैं पी पी के अश्क़ो ग़म

कोई दुसरा हसे तो कलेजा निकल पड़े… असं आहे ते…

तुम्ही दु:खात असाल तर ही गझल सांत्वना आहे, तुम्ही विरहात असाल तर दिलासा आहे आणि वर्तमानात अपयशी असाल तर भविष्यातली यशाची आशा आहे… क्यूँ की, ‘’खुशी के लौट आने का कौई मौसम नहीं होता.. नए रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता’’…

नवीन वर्षात खूप देखणी नाती तयार करा… प्रेमात पडा… पडा आणि पुन्हा उभे रहा… कारण ‘किसीपर दिल के आने का कोई मौसम नहीं होता’… शुभेच्छा!

*

किसी पर दिल के आने का, कोई मौसम नहीं होता

के हाले दिल सुनाने का, कोई मौसम नहीं होता

*

दरिचा एक कमसे कम, खुला रखिये सदा घर का

खुशी के लौट आने का, कौई मौसम नहीं होता

*

ज़रा हँस कर किसी से बात करने में बुरा क्या है?

नये रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता

*

बता दे जो बताना है, अभी है वक़्त दीवाने

ज़ुबाँ पर बात लाने का, कोई मौसम नहीं होता…

– – – विश्वजीत तुळजापूरकर

लेखिका : वसुंधरा काशीकर

मुक्त पत्रकार, निवेदक आणि लेखक.

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “देवाघरचे ज्ञात कुणाला – –” ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “देवाघरचे ज्ञात कुणाला – –” ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

नारायण गंगाराम सुर्वे बाळ कोल्हटकर

देवाघरचे ज्ञात कुणाला – –

२०२५, २०२६ मध्ये बऱ्याच लेखक, कवी, नाटककार, संगीतकार, गायक यांची जन्मशताब्दी होती आणि काहींची अजून आहे. त्यातील दोघांच्या स्मृती जागविण्याचा मी प्रयत्न केला आहे. एक आहेत नारायण सुर्वे, जन्म १५ ऑक्टोबर १९२६ आणि दुसरे आहेत बाळ कोल्हटकर, जन्म २५ सप्टेंबर १९२६

१) देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम या ओळींची सत्यता पटवणारा प्रसंग!

कुणीतरी एक बाळ रस्त्यावर टाकून देतं, एका पन्नाशी ओलांडलेल्या गिरणी कामगाराला ते दिसतं, तो उचलून घरी आणतो, दोन घास स्वतःला मिळायची मारामार पण त्यातलाच एक घास देऊन पोराला जगवतो, वाढवतो, आपलं नांव देतो. तुम्हाला वाटेल व्वा! अनाथ मुलाला घर मिळालं, माणसं मिळाली. नशीबवान आहे पोर! पण नाही, अजून त्याचे हाल संपले नव्हते. जरा पोर मोठ्ठं होत नाही तोच हा उसना बाप रिटायर होतो. आता खायचं काय? मोठ्ठा प्रश्न आवासून उभा राहतो. मग तो बाप गावाकडे जाऊन रहाण्याचा विचार करतो. आपल्याच पोटापाण्याचं काय नक्की नाही, हे पोर नेऊन काय करायचं? इथं काहीतरी काम करेल पण जगेल, याविचारानं मुलाच्या हातावर १० रुपयाची नोट ठेवतो, आणि म्हणतो, पुढचं आयुष्य कसं जगायचं तुझं तू ठरव. आणि ते पोर पुन्हा एकदा अनाथ होतं. मुंबईच्या अफाट जनसागरात लोटलं जातं. मग काय हॉटेल मधल्या पोऱ्यापासून मिळेल ते काम करून पोटाचं खळगं भरू लागलं. कधी कधी ते ही भरायचं नाही, पण मिळेल तिथलं पाणी होतंच. हाच तो मुलगा पुढे साहित्यिक होणारा नारायण गंगाराम सुर्वे!

नंतर त्यांना गिरणी कामगार म्हणून नोकरी मिळाली, आणि ते कामगार चळवळीशी जोडले गेले. त्यावेळी पत्रकं तयार करणं, ती वाटणं, भाषणे करणं, मतदान कसं करायचं याचं कामगारांना प्रशिक्षण देणं, पोस्टर्स चिकटवणं, ही कामे करताना कामगारांच्या वेदनेने त्यांना कवी बनवलं. त्यामुळे त्यांच्या कवितात कष्टकरी वर्गाची भाषा होती. मारकस बाबा या कवितेत ते आपली कार्ल मार्क्सशी ओळख कशी झाली ते सांगतात. मार्क्स वादाने ते प्रभावित झाले होते. त्याच दरम्यान कामगार वस्तीमधील आपल्या काकांच्या घरी राहणाऱ्या अनाथ मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले, परिणिती लग्नात झाली.

मुळातच हुशार होते. त्यांनी एका शाळेत शिपाई म्हणून नोकरी धरली. कविता करणं सुरूच होतं. त्यांची पहिली कविता नवयुग मासिकात ‘ डोंगरी शेत माझं गं ‘ प्रसिद्ध झाली. नोकरी करता करता सातवीची परीक्षा पास झाले. अध्यापक प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केला व त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

त्यांना स्वतःचं पुस्तक काढायचं होतं. पण खिसा कधीच परवानगी द्यायचा नाही. शेवटी पत्नी कृष्णाबाई यांनी गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं आणि पाहिलं पुस्तक ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ प्रकाशित झालं. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे १००० रु बक्षिसही मिळाले. त्यामुळे कृष्णाबाई नव्या मंगळसूत्रात मानाने सजल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलंच नाही. त्यांच्या ‘ माझे विद्यापीठ ‘ ह्या काव्य संग्रहाची अनेक भाषांत भाषांतरे झाली. प्रतिष्ठेचा सोविएत लँड नेहरू पुरस्कार मिळाला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले.

त्यांनी अनेक साहित्य संमेलने गाजवली. काव्य मैफिलीत ते खड्या सुरात कविता म्हणायचे. ‘ मास्तर तुमचंच नाव लिवा ‘ ही त्यांची कविता प्रचंड गाजली. त्यांच्या साहित्यात जीवनानुभव होते. त्यांनी जीवनातील संघर्षाच्या कविता केल्या पण कधीच जातपात, उच्चनीच, ईश्वरवाद, प्रारब्ध यांचा कधीही उल्लेख केला नाही. अशा या वल्लीचा पदपथापासून विद्यापीठापर्यंत व कामगारापासून बुद्धिनिष्ठ समीक्षकापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. शेवटी त्यांच्याच ‘माझे विद्यापीठ’ मधून

ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती

दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती ———

२) दुसरे आहेत नाट्य वेडे म्हणजे अक्षरशः वेडेच, छोटा गडकरी, बाळ कोल्हटकर! एक नाट्यलेखक, कवी, दिग्दर्शक, उत्कृष्ठ कलाकार असे बहुगुणसंपन्न!

लहानपणीच मातृ – पितृ छत्र हरवलं. साताऱ्याला एकत्र कुटुंबात राहणाऱ्या बाळ ने १५ व्या वर्षी नाट्यगृह पाहू न शकलेलं जोहार हे नाटक लिहिलं. नाटकाच्या वेडाने पछाडल्याने घर सोडलं आणि मुंबईचा रस्ता धरला.

ह्या नाती व माणसं सांभाळणाऱ्या अवलियाचाही खारच्या झोपडपट्टीपासून अंबरनाथच्या भूषण बंगल्यापर्यंतचा प्रवास कल्पनातीत आहे.

सुरवातीला तर हा माणूस नाटक लिहायचा, त्यातील गाणी लिहायचा, महत्त्वाची भूमिका स्वतः करायचा, बाकीचे नट शोधायचा, नाटक बसवायचा, वेशभूषा, मेकअप स्वतः करायचा, नाटकासाठी स्टेज मिळवणं, प्रकाशयोजना, स्टेज सजावट सगळी कामं एकहाती करायचे. कारण पैसा नसायचा. अशी एक दोन नाहीत तर ३० पेक्षा जास्त नाटके त्यांनी लिहिली. सुरवातीला साधी कौटुंबिक नाटके होती. त्यांचे विषय, प्रेमविवाह त्याला विरोध, मुलांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी, मुलीचं लग्न, सासर माहेर यातली ओढाताण

असे सामान्यांचे प्रश्न घेतले होते. त्यांचे काव्यात्मक संवाद, सुभाषित वजा वाक्ये अशी की टाळ्यांचा कडकडाट झाल्याशिवाय राहायचा नाही. त्यांना प्रेक्षकांची नस सापडली होती. पडदा उघडल्यावर घराला छोटे फाटक, बाहेर टाकलेली खाट, पाय धुवायला छोटी मोरी, दारात रांगोळी, तुळशी वृंदावन, त्यासमोर तेवणारी पणती, मनाच्या श्लोकाचे पडसाद इतकं प्रभावी, पवित्र वातावरण बघूनच प्रेक्षक भरवून जायचे. प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या घरी किंवा आपल्या आसपास घटना घडताहेत असंच वाटायचं. इतकी नाटकातल्या पात्रांशी जवळीक निर्माण व्हायची. त्याचे संवाद इतके प्रभावी, संवेदनशील असायचे की प्रेक्षक नाट्यगृहात ढसाढसा रडताना, मनमोकळं हसताना दिसायचे. त्यांच्या काही नाटकांवर, कथानकांवर खूप टीकाही झाल्या, पण त्यांची नाटके प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. दुरितांचे तिमिर जावो, वाहतोही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसं, एखाद्याचे नशीब या नाटकांचे तर १०००ते २००० प्रयोग झाले.

त्यांनी काही वेगळे प्रयोगही केले. देव दीनाघरी धावला, या नाटकातून कृष्ण व सुदामा यांच्यातील निःस्वार्थ मैत्री दाखवतात. त्या काळातील राजकारणावरही भाष्य करतात. सीमेवरून परत जा, या नाटकात अलेक्झांडर व पौरस यांच्यातील संघर्ष मांडला आहे. त्यातून देशप्रेम, संघटन यांचे महत्व प्रतीत होते. उघडले स्वर्गाचे दार यात वशिष्ठ व विश्वामित्र यांच्यात राजर्षी की महर्षी म्हणावे यातून झालेला बौद्धिक वाद आहे. त्यांची नाटके व्यावसायिक असली तरी प्रत्येक नाटक काही मूल्यं अधोरेखित करतं.

त्यांची गेय काव्य लिहिण्याची हातोटीही वाखाणण्याजोगी आहे. काही गाजलेली गाणी, आई तुझी आठवण येते, मलयगिरीचा चंदन गंधित, निघाले आज तिकडच्या घरी, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, तू जपून टाक पाऊल जरा इत्यादी.

त्यांना शिक्षणात, शाळेत फारसा रस नव्हताच पण नशीब चांगले की याच शाळेत त्यांना शां. गो. गुप्ते यांच्यासारखे नाटककार शिक्षक म्हणून लाभले. पण खरं सांगू, मला असं वाटतं हे जर नाटक वेड नसतं तर यांनी सहज ३० एक कादंबऱ्या, ३० एक कथासंग्रह, ३० एक कवितासंग्रह सहज प्रसिद्ध केले असते, इतका अफाट कल्पनासंग्रह, भाषेवर प्रभुत्व, लेखनासाठी लागणारे बारीक सारीक तपशील, लिखाणात सातत्यता त्यांच्याकडे होती. नाही, पण मग हा इतका विविध विषयांवरील नाटकांचा खजिना आपल्याला कसा मिळाला असता?

दोघांच्याही स्मृतींना त्रिवार वंदन!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares